Saturday, January 28, 2017

पद्मविभूषण शरद पवार!

देशपातळीवर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा लोकनेता अशी ज्यांची  ख्याती आहे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अलीकडेच पद्मविभूषण जाहीर झाला, याचा आनंद राज्यातील प्रत्येक मराठी माणसाला झाला आहे.
देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 45 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.
10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.
काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी पवारांचे बोट धरूनच राजकारणात आलोय’ असे जाहीर सभेत सांगितले होते. आता शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’ मिळाल्याने मराठी अस्मितेचा गौरवच झाला आहे. त्यांच्यावर असंख्य आरोप झाले. आरोप करणारे त्यामुळे मोठे झाले; मात्र पवार साहेब कधी डगमगले नाहीत. अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी सतत कार्यरत राहून इतिहास निर्माण केला आहे.
‘पद्मविभूषण’ जाहीर झाल्यानंतर त्यांनी ‘हा सामुहिक कष्टाचा सन्मान’ असल्याचे सांगत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आणि आईची आठवण जागवली. ‘माझ्या घरात पद्म पुरस्कार मिळवणारा मी तिसरा आहे. एका आईच्या तीन मुलांना हा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे. माझे बंधू अप्पासाहेब पवार आणि प्रतापराव पवार यांना यापूर्वी पद्मश्रीने गौरविण्यात आले. आता मला पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने आई संतुष्ट झाली असती’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जगाच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या या महानेत्याची कुटुंबवत्सलताच यातून दिसून येते.
शरद पवार यांच्यावर आजवर अनेक आरोप झाले. राज्यात आणि देशात कोणताही मोठा घोटाळा झाला, कोणताही मोठा प्रकल्प आला की त्यासोबत त्यांचे नाव जोडले जायचे. ‘पवारांवर टीका केली की आपल्याला मोठे होता येते’ हे अनेकांना उमगले होते. त्यामुळेच त्यांच्यावर अनेकांनी वाटेल तसे तोंडसुख घेतले. ‘या सर्व आरोपांचा तुम्हाला त्रास होत नाही का?’ असे विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते. ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत लोक म्हणणार नाहीत की, किल्लारीचा भूकंप तुमच्यामुळे झालाय तोपर्यंत मला चिंता करण्याचे काही कारण नाही.’’
शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान कोणीही नाकारणार नाही. सर्व विषयांचा अभ्यास असलेला आणि तळागाळातील लोकांशी संपर्क असलेला असा दुसरा नेता दिसणार नाही. पत्रकार या नात्याने त्यांना जवळून ऐकता आले. त्यांच्यावर आम्ही अनेक विशेषांक केले. आम्ही प्रकाशित केलेल्या ‘शिवप्रताप’ या ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. या नेत्याची जादू सांगण्यासाठी ‘शिवप्रताप’च्या प्रकाशनाचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
‘शिवप्रताप’ ही ‘चपराक’ने प्रकाशित केलेली पहिली कादंबरी. एका दैनिकाने या कादंबरीची प्रकाशनपूर्व माहिती दिली. त्यातील रामदास स्वामींचा उल्लेख वाचून काही संघटनांनी ‘ही कादंबरी प्रकाशित करू देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून आम्हाला धमक्याही आल्या. लेखक उमेश सणस यांची ही पहिलीच कलाकृती आणि प्रकाशक म्हणून आमचीही ही पहिलीच कादंबरी. ‘काय करावे?’ हा प्रश्‍न असतानाच आम्हाला पवार साहेबांची आठवण झाली. आम्ही सर्वजण त्यांना भेटलो आणि या कादंबरीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘छत्रपती शिवाजीराजांवर अनेक पुस्तके असताना तुम्ही यात काय मांडलेय?’ असा सवाल त्यांनी केला. ‘शिवाजीराजे आणि अफजलखान यांच्या भेटीवर आणि प्रतापगडाच्या पराक्रमावर ही शिवदिग्वीजयाची रोमांचकारी कलाकृती आहे’ असे सांगताच त्यांनी ती ठेऊन घेतली आणि ‘कळवतो’ असे सांगितले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी निरोप दिला की, ‘‘साधेपणाने कार्यक्रम घ्या. बारामती हॉस्टेलच्या सभागृहातही याचे प्रकाशन होऊ शकेल.’’ मग 1 एप्रिल 2006 रोजी त्यांच्या हस्ते ‘शिवप्रताप’चे प्रकाशन झाले आणि ही कादंबरी तुफानी गेली. मराठी साहित्यात या कादंबरीने अनेक विक्रम निर्माण केले. या कादंबरीला विरोध करणारे नंतर कुठे गेले हे अजूनही आम्हाला कळले नाही. त्यांच्या नावाचा असा दबदबा आहे.
शरद पवार यांचे मित्र धनाजीराव जाधव यांनी त्यांच्याबाबतच्या काही आठवणी आम्हाला सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘त्यावेळी शरदची परिस्थिती खूपच नाजूक होती. पुण्यात शुक्रवार पेठेत ही सारी भावंडे एका छोट्या खोलीत रहायची. आमचा मित्र विठ्ठल मणियार याने आग्रह धरला की आपण मुंबई बघायला जाऊ. त्यापूर्वी शरदसह आम्ही कोणीही मुंबई बघितली नव्हती. सर्वजण तयार असताना शरद एकटाच सोबत येत नव्हता. त्याची आर्थिक अडचण होती हे कळल्यावर विठ्ठलने सांगितले की, मी माझ्याकडून सगळ्यांना घेऊन जातोय. मग खूप आग्रह केल्यावर तो तयार झाला पण त्याने तीन अटी घातल्या. ‘तुम्ही मला मुंबईचे विमानतळ, मुंबईचा समुद्र आणि मुंबईचे मंत्रालय दाखवणार असाल तरच मी सोबत येतो.’ विमानतळ आणि समुद्र या गोष्टी आम्हाला सहज शक्य होत्या. मंत्रालयाचे काय करायचे म्हणून विठ्ठलने त्याच्या वडिलांना सांगितले. मुलांना मंत्रालय बघावेसे वाटते म्हणून तेही खुश झाले. त्यांनी दारवटकर जगताप नावाच्या एका आमदारकडून मंत्रालयाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास मिळवले. आम्ही विमानतळावर गेलो, समुद्र बघितला आणि मंत्रालयात गेलो. तिथे गेल्यावर आमदारांच्या कंटाळवाण्या चर्चा ऐकून आम्हालाही आळस येत होता. मग आम्ही आपापसात बोलत होतो. तिथल्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला तीन-चार वेळा सांगितले की इथे बोलू नकात. आम्ही थोडावेळ शांत बसायचो आणि पुन्हा गप्पा सुरू. नंतर त्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, आता तुम्ही बोललात तर मला तुम्हाला बाहेर काढावे लागेल... ते ऐकून शरद ताडकन उठला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही काय आम्हाला बाहेर काढताय? आम्हीच निघतो. आता मी या वास्तुत येणार नाही! आणि आलोच तर इथे न बसता समोर आमदारात बसून चर्चा करेन!’’  कॉलेज जीवनातील त्याची ही महत्त्वाकांक्षा पाहून आम्ही सगळेच थक्क झालो...’’
शरद पवारांनी अनेक नेते घडवले. स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्तेचीही पर्वा केली नाही. कच्छच्या भूकंपावेळी अटलजींनी त्यांना मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी बोलवले होते. किल्लारी परिसरातील 52 गावांचे पुनर्वसन करताना त्यांनी जी तत्परता दाखवली त्याची ही फळे होती. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ म्हणून त्यांनी वेगळी चूल थाटली. महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात भरीव योगदान दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशा सगळ्या भूमिकांतून त्यांनी लोकहिताचे कल्याणकारी निर्णय घेतले. कबड्डीपासून किक्रेट असोसिएशनपर्यंत आणि रयत शिक्षण संस्थेपासून अनेक शिक्षणसंस्थांपर्यंत त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. नाट्य परिषद असेल किंवा साहित्य संस्था असतील शरद पवार मदत करण्यात सदैव तत्त्पर असतात. अनेक कलावंतांना त्यांच्यामुळे अस्तित्व लाभलेय.
प्रत्येक प्रश्‍नाची उत्तम जाण, सामाजिक भान, सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, कलावंतांचा गौरव आणि संयमित भाषा यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आजही सकाळी सहाच्या आत आंघोळ, व्यायाम उरकून जगभरातील महत्त्वाची वृत्तपत्रे वाचत बसणारे आणि सकाळी सहा पासून रात्री बारापर्यंत लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे, त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे हे दुर्मीळात दुर्मीळ नेतृत्व आहे.
भ्रष्टाचारापासून ते जातीय राजकारणापर्यंत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्या कशालाही न जुमानता शरद पवार नावाचे हे अग्निहोत्र सतत धगधगत आहे. म्हणूनच निवडणुकीच्या काळात ‘एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी’ अशी टीका करणारे मोदी आज ‘त्यांचे बोट धरून राजकारण शिकलो’ असे सांगतात आणि त्यांच्याच कारकिर्दीत त्यांना ‘पद्मविभूषण’ देऊनही गौरवितात. दुर्दैवाने आपल्याकडे माणसांपेक्षा माणसांच्या राखेचा इतिहास पुजण्याचा रिवाज नवा नाही. त्यामुळेच या जबरदस्त नेत्यावर आपण अन्याय केलाय. देशाचे नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असलेले शरद पवार भविष्यात किमान राष्ट्रपती व्हावेत असे अनेकांना वाटते. त्यांना ‘पद्मविभूषण’सारखा सन्मान प्राप्त झाल्याने मोदी सरकारकडूनही त्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या या लोकनेत्यास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

5 comments:

  1. सर मनापासून धन्यवाद । खुप छान लेख लिहीलाय । ह्याची गरज होती साहेबांची महती कळण्यासाठी ।
    रविंद्र कामठे

    ReplyDelete
  2. खूपच विवेचनात्मक व
    माहितीपूर्ण लेख!!

    ReplyDelete
  3. शरद पवार यांच्याबद्दलचा एक उत्तम संग्राह्य लेख!

    ReplyDelete
  4. सर खूपच योग्य रितीने मांडणी केली आहे.यामध्ये आणखी एक गोष्ठ नमूद करन्यासारखी आहे ती म्हणजे सत्तेची किंवा पदाची पर्वा न करतो मंडल आयोगाची स्थापना करण्याचा अतिशय धाडसी आणि दूरदृष्टी चा निर्णयही साहेबांनी घेतला होता. आणि या सगळ्या गोष्ठींची माहिती आजच्या युवा पिढीला होने गरजेचे आहे.असे मला वाटते.
    धन्यवाद आपल्या लेखणीला सलाम.
    विकास माने मा.सरपंच
    ग्रामपंचायत सोनगाव ता. बारामती

    ReplyDelete