Monday, April 26, 2021

‘वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा’

- घनश्याम पाटील

संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

‘प्रेस फ्रिडम’च्या यादीत भारताचा दुर्दैवाने 142 वा क्रमांक आहे. 150 देशात भारतात कोणत्याही प्रकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असा जागतिक अहवाल आहे. निर्भिड आणि निपक्षपणे लिहिणार्‍या पत्रकारांना ट्रोलर्स शिव्या देऊन गप्प बसवतात हे त्यात त्यांनी मांडलंय. भारतात लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे तो संध्याकाळी सातनंतर झुलायला लागतो. तो काँग्रेसच्या काळातही झुलत होता आणि भाजपच्या काळातही झुलतो आहे. आता तर तो नुसता झुलत नाही तर त्याचा झोपाळा झालाय.

आपल्याकडे इंदिराबाईंनी या देशावर अणीबाणी लादली. तशी अणीबाणी न जाहीर करताही सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. रायबरेलीत राजनारायण निवडून आले हे त्याकाळी जाहीर करण्यात आलं. न्यायमंडळावर ताबा घेणं हे इंदिराबाईंना आयुष्यात कधी जमलं नाही परंतु भारताची न्यायव्यवस्था सध्या राज्यकर्त्यांनी ताब्यात घेतली आहे असे स्पष्टपणे दिसून येते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगई निवृत्त झाल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेवर घेतलं जातं. मग निस्पृह न्याययंत्रणा राहिली कुठे? अनेक आरोपी वर्षानुवर्षे तुरूंगात राहतात आणि अर्णब गोस्वामी मात्र पाच-सात दिवसात बाहेर येतो. रूटीन केसमध्ये एखाद्या आरोपीनं जामिनासाठी अर्ज केला असता तर तो न्यायाधीशांपर्यंत पोहोचायलाच महिना गेला असता. इथं मात्र अर्णबच्या अर्जावर आदेश येऊन तो आठवडाभराच्या आत बाहेरही येतो. न्यायदानाची ही प्रक्रिया न्यायमंडळ स्वतंत्र राहिलं नसल्याचं द्योतक आहे. हे सगळं पाहता आपली प्रसारमाध्यमंही राज्यकर्ते जे म्हणताहेत तेच बोलताहेत. माध्यमं आणि न्यायव्यवस्था ताब्यात राहणं, त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांना पूर्णपणे जमलेलं दिसतंय.

उदाहरण घ्यायचे तर फिल्डवरचे लोक सांगतात की ममता बॅनर्जी यांचं बहुमत कमी झालं तरी त्या पुन्हा सत्तेत येतील. मात्र आपल्या केंद्रीय नेतृत्वाचं ‘मायक्रो प्लॅनिंग’ सातत्यानं दिसून येतं. सभा घेतल्या, तिथं प्रचंड गर्दी जमवली. समाजमाध्यमातून बातम्या पसरवल्या. ‘ममता बॅनर्जी यांचा पराभव अटळ’ हे त्यातून मांडण्यात आलं. जिथं शंभर टक्के विजय ठरलेला असतो तिथं तो उमेदवार कसा पडणार याचे आडाखे बांधून ते लेख समाजमाध्यमाद्वारे जबरदस्त व्हायरल करण्यात आले. अशा पद्धतीनं वातावरणनिर्मिती करण्यात येते. निवडणुकीचं शेवटचं मतदान झालं की एक्झिट पोल येतात, तेही हवे तसे मॅनेज करण्यात येतात, तिथं सगळे अंदाज आपल्या बाजूनं दाखवतात, इव्हीएममध्ये छेडछाड केली जाते असे अनेक आरोप 2019च्या निवडणुकीत करण्यात आले.

महाराष्ट्रात मात्र एक गोष्ट कळत नाही. शिरूर मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झालाच कसा? अतिशय चांगलं काम होतं त्यांचं. इथून अमोल कोल्हे यांच्यासारखा कलाकार कसा निवडून आला? औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले. तिथून हा संदेश द्यायचा होता का की औरंगाबादमध्ये हिंदू मताचं विभाजन झालं तर एमआयएमचा उमेदवार निवडून येतो! स्वतःला हवे तसे निकाल मिळवायचे, हवी तशी सत्ता घ्यायची आणि ती सत्ताही सामान्याच्या हातात ठेवायची नाही असं काही घडतंय का? राहुल गांधी म्हणतात की दोन-तीन उद्योजकांनीच देश ताब्यात घेतलाय आणि ते देश लूटताहेत! सध्याची परिस्थिती पाहता ती गोष्ट अक्षरशः खरी वाटतेय.  

परदेशातले कलाकार इथल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात आणि इथले ट्रोलर त्यांच्यावर तुटून पडतात. त्याचं इतकं भयंकर स्वरूप असतं की जगभर असा संदेश जातो की इथल्या प्रश्नांवर बोलल्यानंतर इथले ट्रोलर संबंधितांची ससेहोलपट करतात. अनधिकृत ट्विटर हँडलाचा अभ्यास करणार्‍यांचा अधिकृत अंदाज असा आहे की पंतप्रधानांचे चाळीस टक्के फॉलोअर्स हे फेक आणि बोगस आहेत. पंतप्रधान जे धोरण राबवत आहेत त्याचेच अनुसरण थोड्याफार फरकाने महाराष्ट्राचे आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री व इतर छोटे-मोठे नेते करत आहेत. ‘हे असंच करायचं असतं, यालाच राजकारण म्हणतात’ असा या सर्वांचा समज झालाय. मोदी आणि शहा यांच्याप्रमाणेच वागण्याचा सर्वांचा प्रयत्न दिसतोय. माध्यमांवर दबाव आणणे, कुणालाही न जुमानणे, धाकदडपशाही करणे हे सगळे त्यात ओघाने आलेच.

हिटलर असो, मुसोलिनी किंवा आणखी कोणी! हुकूमशाही फार काळ टिकत नाही हाच इथला इतिहास आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीही बोललं, लिहिलं तर त्याला वैयक्तिक पातळीवर शिवीगाळ केली जाते, काही वेळा मारहाणही केली जाते आणि त्याचं तोंड बंद केलं जातं. आपल्या हौसेचं मोल आपण आपल्या देशाला किती चुकवायला लावतोय हे या लोकांच्या अजून लक्षात येत नाहीये. राम मंदिर व्हावं असं या देशातल्या प्रत्येकाला वाटत होतं. अनेक कट्टर काँग्रेसवाल्यांच्याही त्या भावना होत्या. पवारांवर प्रेम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांनाही तसं वाटायचं. त्यांनी विटा देण्यापासून पैसे देण्यापर्यंत सर्वकाही उत्फूर्तपणे केलं होतं. आजही या देशात अत्यंविधीच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ म्हणतच त्याला उचललं जातं. राम हे सगळ्यांचंच दैवत आहे पण संघाच्या खांद्यावर बंदुक ठेवत मोदी आणि शहा यांनी जे ओरबाडलंय त्याची कशातच मोजदाद करता येणार नाही. त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागतेय. अनेक माणसांची, संस्थांची सध्याच्या काळात प्रचंड ससेहोलपट झालीय. 370 कलम रद्द झाल्यावर काश्मीरचा प्रश्न सुटेल असं श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून सगळ्यांनाच वाटत होतं. राममंदिर, 370 कलम हे अस्मितेचे मुद्दे बनले. यात सामान्य माणसाच्या जगण्याचे आणि आता तर मरणाचेही मुद्दे मागे पडलेत. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याने तुम्ही पाकिस्तानातच्या हिंदुनांही नागरिकत्व दिलंत. आज हिंदुंना मात्र तुम्ही ना ऑक्सिजन देऊ शकताय, ना रेमडेसिव्हिर. अशी सत्ता फार उपयोगाची नाही. ती आणखी पाच-दहा वर्षे टिकवून ठेऊ शकाल. काळ आणि इतिहास मात्र तुम्हाला क्षमा करणार नाही.

रोज दोन हजार माणसं भारतात कोरोनामुळे मरताहेत. अनलॉक करताना भाजपच्या कुण्यातरी तुषार भोसलेने मंदीर उघडण्याची जोरदार मागणी केली होती. हा त्यांना धार्मिक अधिकार वाटत होता. मग मंदिरं उघडली. कुणीतरी सुप्रिया सुळे यांच्याकडं गेलं. नाभिकांची दुकानं उघडण्याची मागणी केली. कुणी राज ठाकरे यांच्याकडे गेलं आणि जिम उघडण्याची मागणी केली. लगेच संबधितांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून असे निर्णय घ्यायला भाग पाडलं. या सगळ्या उद्योगामुळं कोरोनो जो वाढलाय त्याची जबाबदारी घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये समक्ष जाऊन काम करताय का? रूग्णांच्या नातेवाईकांना तुम्ही जेवणाचे डबे पुरवत आहात का? एखाद्या कोविड युनिटमध्ये पीपीई किट घालून जात तुम्ही तुमच्या चाहत्या रूग्णांना गोळ्या देत आहात का? ज्यांचं यात निधन झालं त्यांच्या कुटुंबीयांसाठी तुम्ही काही करताय का? स्वतःच्या घरात सुरक्षित राहत कॉन्फरन्स कॉल करणं सोपं असतं भाऊ!

आजच्या घडीचे सर्वपक्षिय राजकारणी त्या योग्यतेचे नाहीत असंच म्हणावं लागेल. राज्यसत्तेला जेव्हा व्यभिचार करायचा असतो तेव्हा ती नित्यनव्या ओठांना स्पर्श करत असते आणि नित्य नव्या लोकांबरोबर शय्यासोबत करत असते. ‘वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा’ इतक्या स्पष्ट शब्दात भर्तृहरींनी याचं वर्णन केलंय. कधी खरं तर कधी खोटं बोलणारी, कधी कठोर तर कधी गोड बो
णारी, कधी हिंसक तर कधी दयाळूपणे वागणारी, कधी पैशाचा हव्यास बाळगणारी तर कधी उदारता दाखवणारी, कधी उधळपट्टी करणारी तर कधी कंजुषीत रमणारी अशी राजसत्ता ही वारांगनेसारखी म्हणजे वेश्येसारखी असते असं ते म्हणतात. आजची परिस्थिती पाहता त्याचीच प्रचिती देशवासियांना येत आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

दै. पुण्य नगरी, मंगळवार, 27 एप्रिल 2021

Monday, April 19, 2021

विधानपरिषद बरखास्त करा

 - घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक,’ पुणे
7057292092

दैनिक 'पुण्य नगरी' - मंगळवार, 20 एप्रिल 2021.

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे दिसून आले. आपली आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. अशावेळी राज्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असताना खर्च कमी करणे आणि तो टाळणे गरजेचे आहे. हे करायचे तर एक उपाय ताबडतोब करता येईल, तो म्हणजे विधानपरिषद बरखास्त करणे.

तसाही आजवर विधानपरिषदेचा राज्याला काही उपयोग झालाय असे चित्र नाही. ‘तुम्हाला पाहिजे असेल तर विधानपरिषद स्थापन करा’ असे घटनेने सांगितले आहे. केंद्रात मात्र संसद तयार करतानाच लोकसभा आणि राज्यसभा तयार करण्यात आली. त्या पार्श्वभूमिवर निवडून आलेल्या विधानसभेच्या सदस्यांच्या प्रमाणात विधानपरिषद तयार केली गेली. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे 288 आमदार असल्याने विधानपरिषदेचे 78 आमदार निवडले जातात. दक्षिणेतल्या काही राज्यांनी आपल्या विधानपरिषदा रद्द करून त्यावरील खर्च वाचवलेला आहे. मग अशावेळी विधानपरिषद ठेवून आपण तरी काय करायचे?

काही भुरट्या आणि भामट्या असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी
आजवर विधानपरिषदेचा वापर केला आहे. सर्वच राजकीय नेत्यांना त्यांच्या पक्षातील पडके वाडे बांधण्यासाठीचा हा एक पर्याय झाला आहे. मग असली विधानपरिषद काय कामाची? ती नसलेलीच बरी. शशिकांत शिंदे विधानसभेत पडले मात्र पवार साहेबांचे त्यांच्यावर विशेष प्रेम असल्याने त्यांना विधानपरिषदेवर घेतले. एकनाथ खडसे पडले आणि आता त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आमिष दाखवले गेले. कंगना रानौतला विरोध करण्यासाठी म्हणून उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या. अमोल मिटकरीसारखे नौटंकी करणारे इथे आले. विधानपरिषद नसती तर चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसलेच नसते. प्रवीण दरेकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा लक्षात घ्यायला एवढे एकच उदाहरण पुरेसे आहे.

वर्षानुवर्षे जे शिक्षक आमदार विधानपरिषदेवर येतात त्यांनी शिक्षकांसाठी नेमके काय केले? विधानपरिषदेचा महाराष्ट्राच्या राजकारणाला कसलाही उपयोग नाही, हे सत्य आपण स्वीकारायला हवे. विद्यार्थी परिषदेच्या मतांवर नितीन गडकरी सतत विधानपरिषदेवर निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा काय फायदा झाला? विधानसभेवर निवडून येणारे अभ्यासू आहेत की नाही, तज्ज्ञ आहेत की नाही माहीत नाही पण ते कामे तरी करतात. लोकांतून थेट निवडून येतात. विधानपरिषदेवर कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, कायदा, संशोधन अशा क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य जाणे अपेक्षित होते. मात्र सर्व पक्षांकडून राज्यपालांकडे जी यादी दिली जाते ती त्यांच्याकडे दावणीला बांधलेल्या लोकांचीच असते.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर कोट्यवधी रूपये खर्च होतात. ते पैसे वाचवून जनतेच्या कोणत्याही कामासाठी वापरले तरी चालतील. राज्यातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके मोफत द्या, शिवचरित्राचे मोफत वाटप करा, शेतकर्‍यांना-कामगारांना मदत करा परंतु हा अनाठायी खर्च टाळा. विधानपरिषेवर निवडून येणारे तरी कोण आहेत? एकूण एक धनदांडगे! पैसेवाल्यांना लोकशाहीचा खेळ करण्यासाठीच विधानपरिषदेवर पाठवले जाते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांची खरेदी-व्रिकी करणे सहज सोपे होते हे सत्य आहे. परत म्हणायचे, ते राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. तिथे नेमके काय केले जाते? तिथे खरेच कोणी तज्ज्ञ आहेत का?

शिक्षकांचे, पदवीधरांचे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी विधानपरिषदेवर घेतले जातात. इथे गेलेल्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांसाठी नेमके काय केले? पदवीधरांच्या आमदारांनी काय केले? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांविषयी कधी कोणी आवाज उठवला का? स्थानिक स्वराज्य संस्था आणखी मोठ्या, कार्यक्षम, सक्षम व्हाव्यात यासाठी या आमदारांनी काय केले? मंगळसूत्र चोरणारा जर महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत असेल तर यापेक्षा त्या सभागृहाचे अवमूल्यन कोणते असेल? कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांना इथे घेतले गेले असावे? अजितदादांचे लांगूनचालन सोडले तर मिटकरींनी नेमके काय केले? मग जनतेच्या खिशातून या सदस्यांसाठी खर्च का केला जातो? त्यांच्या अधिवेशनाचा तरी नेमका लाभ काय होतो? या सदस्यांना गलेलठ्ठ पगार आणि पुन्हा निवृत्तीवेतन काय म्हणून दिले जाते? विधानसभेच्या एका साध्या ठरावाने विधानपरिषद रद्द करता येईल. ती ताबडतोब रद्द करणे गरजेचे आहे. भाजपच्या आमदारांनी ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हे दाखवले पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘अशा कठीण प्रसंगात आम्ही खर्च करायला जरासुद्धा कचरलो नाही, घाबरलो नाही,’ हे दाखवून दिले पाहिजे. राज्यपालांनी बारा आमदारांच्या निवडीचे घोंगडे भिजते का ठेवले? असा प्रश्न विचारण्याऐवजी विधानपरिषदच बरखास्त करून टाका.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत कुणी पाच-दहा नामवंत लेखक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, कायदेतज्ज्ञ आहेत, संपादक आहेत असे काही आहे का? आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ इथे येऊन कायदे करण्यासाठी काही मदत करत आहेत असे दिसत नाही. मग हा यांच्यासाठी होणारा कोट्यवधी रूपयांचा खर्च म्हणजे इथल्या सामान्य माणसाच्या डोक्यावर लादलेले ओझेच आहे. विधानपरिषदेच्या माध्यमातून होणारा खर्च म्हणजे जनतेच्या खिशाला लावलेली कातरी आहे. अलीकडच्या काही वर्षाचे चित्र बघितले तर विधानपरिषदेच्या निवडणुका हा चेष्ठेचा भाग झालाय. या करोनाच्या काळात ही मंडळी नेमके काय करत आहेत? आपल्याला पदवीधरांचा प्रतिनिधी नेमका कशाला हवाय? विधानपरिषेदेत डॉक्टरांचा प्रतिनिधी आहे का? प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधी आहे का? शेतकर्‍यांचा, शेतमजुरांचा, कष्टकर्‍यांचा प्रतिनिधी आहे का? वकीलांचा-लेखकांचा, व्यापार्‍यांचा-उद्योजकांचा प्रतिनिधी आहे का? मग हे ठराविक वर्गाचे प्रतिनिधी तिथे जाऊन नेमके करतात तरी काय? गावगाड्यात अनेकदा ‘ए मास्तर, तुला खूप कळतंय’ असे म्हणत शिक्षकांना बैठकीत बाजूला बसवले जाते. तशीच अवस्था आपल्या शिक्षक आमदारांची झालीय का? मग त्यांनी इथे यावे तरी का? अत्यंत स्वाभिमानशून्य आणि लाचार शिक्षक त्या त्या ठिकाणच्या पुढार्‍यांपुढे जो लाळघोटेपणा करताना दिसतात ते अत्यंत वाईट आहे.

महाराष्ट्राची विधानपरिषद कायदे करण्यात, राज्यासमोरील गंभीर संकटात काही करताना दिसते अशातला भाग नाही. एखादी महानगरपालिका त्या त्या शहरात चिमुकल्यांसाठी एखादे क्रीडांगण बांधून देते तसेच राजकारण्यांनी त्यांच्या पक्षातील धनदांडग्यांना आणि खूशम्हस्कर्‍यांना सामावून घेण्यासाठी या सभागृहाची तजबीज केलीय. बिनकामाचे राजकारणी किंवा समाजातील कुचकामे गर्भश्रीमंत यांची इथे वर्णी लावली जाते. त्यासाठी जनतेच्या खिशातला पैसा वापरला जातोय आणि अक्षरशः कोट्यवधी रूपयांचा अकारण चुराडा होतोय. जीएसटीचे पैसे केंद्राकडून थोडे उशिरा आले तरी राज्यातील कर्मचार्‍यांचा पगार करणे अवघड झालेय. शेतकर्‍यांना आपण मदत करू शकत नाही. राज्यातून जे सदस्य विधानसभेवर निवडून येतात तेही या पदवीधरांचे आणि या विधानपरिषदेच्या सदस्यांचेही प्रतिनिधित्व करतातच की! आता अडाणी, अशिक्षित आमदार विधानसभेत निवडून येतात असे फारसे चित्र दिसत नाही. अपवादात्मक उदाहरण सोडले तर विधानसभेतील बहुतेक आमदार पदवीधर, द्विपदवीधर आहेत.

विधानपरिषदेवरील बहुतेक आमदारांच्या निष्ठाही पक्षावर, विचारधारेवर नसतात. तिथे सगळाच पैशांचा खेळ असतो. जर त्या त्या पक्षाला या लोकांविषयी सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी यांना त्यांच्या पक्ष संघटनेत, पक्षाच्या कार्यकारणीत सामावून घ्यावे. पूर्वी कार्यकर्त्यांना विचारलं जायचं की तो कोणत्या पक्षात काम करतो? आता हा प्रश्न वाझेसारख्या अधिकार्‍यांना विचारला तर ते सांगतील मी शिवसेनेत आहे, परमबीरसारख्या अधिकार्‍याला विचारला तर ते सांगतील मी भाजपमध्ये आहे, कुमार केतकर यांच्यासारख्या पत्रकाराला विचारला तर ते म्हणतील मी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे विधानपरिषद म्हणजे केवळ पांढरा हत्ती पोसणे आहे. आपल्या राज्याला, इथल्या सामान्य माणसाला तो पोसणे यापुढे परवडणारे नाही.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक,’ पुणे
7057292092


Monday, April 12, 2021

भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं की, गुरूजींनी आता तोंडावर आवर घालायला हवा.

‘मनोहर’ नावाच्या या माणसानं जर ‘संभाजी’ हे नाव धारण केलं असेल तर छत्रपती संभाजीराजांचे काही गुण तरी त्यांच्या अंगात असायला हवेत. निर्धार म्हणजे काय, पराक्रम म्हणजे काय यासह संभाजीराजांचे सद्गुण त्यांना कळायला हवेत. संभाजीराजांचं नाव वापरायचं तर तसं वागलं पाहिजे. नाही तर मग मनोहर हे नाव ठीकच होतं. नाही मनोहर तरी, आहे मनोहर तरी, गेला मनोहर तरी, चुकला मनोहर तरी हे असं चालू शकतं. छत्रपती संभाजीराजांचं नाव घ्यायचं तर त्यांच्या किमान एखाद्या गुणाच्या पदचिन्हावर चालण्याची मनोवृत्ती असायला हवी. जर तुम्ही केमिस्ट्रीचे गोल्ड मेडिलिस्ट असाल तर विज्ञानाचा आणि तुमचा काय संबंध? असा प्रश्न आम्हाला पडण्याइतपत तुमची घसरण का झाली?

पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सर्वपक्षिय नेत्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला जी ताकद दिली गेली, जे बळ दिलं गेलं ते केवळ संभाजी ब्रिगेडची दहशत कमी करण्यासाठी दिलं गेलं हे अनेकदा सांगितलं जातं. यामध्ये निश्चितच तथ्य आहे आणि हे कुणीही विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तरूणांना असणार्‍या आकर्षणातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना उभी केली गेली. ही संघटना काही वेगळं निर्माण करेल असं वाटत होतं. संभाजी ब्रिगेडनं छत्रपती संभाजीराजांचं नाव घेत विध्वंसाचं, द्वेषमूलक राजकारण केलं. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात त्याप्रमाणे ‘‘कोणतीही क्रांती ही मत्सरप्रेरित, स्पर्धात्मक वा द्वेषमूलक नको.’’ ब्रिगेडचा तर पायाच हा होता. एकीकडं संभाजीराजांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं ब्राह्मणांना ठोकायचं, त्यांच्या स्त्रियांविषयी वाटेल तसं विष पेरायचं यामुळं ब्रिगेडला बाकी सोडा पण मराठा समाजातूनही पाठिंबा मिळू शकला नाही. संभाजी ब्रिगेडची अशी दहशत अनुभवत असतानाच संभाजी भिडे नावाचा एक माणूस पुढं येतो आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून तरूणांना बळ देतो हे सकारात्मक चित्र होतं. मात्र ब्रिगेडप्रमाणेच तुमच्याही अनेक भूमिका द्वेषमूलक आणि कट्टरतावादी दिसल्या. कोणताही कट्टरतावाद हा समाजासाठी घातकच असतो. त्यामुळं जी वाताहत ब्रिगेडची झाली तशीच केविलवाणी अवस्था तुमचीही झाली. दुर्दैवानं ब्रिगेडच्या मागं असणारे असतील किंवा तुमच्या सोबत असणारे कार्यकर्ते असतील त्यांची मात्र पुरती ससेहोलपट आणि यथेच्छ फरफट झाली. ‘कट्टर’ कार्यकर्ते तयार करण्याऐजवी ‘निष्ठावान’ अनुयायी मिळवले असते तर आजच्या महाराष्ट्राचं चित्र वेगळंच असतं.

तुम्ही वेगवेगळ्या गडावरच्या दुर्गयात्रा काढल्या. व्यसनमुक्त नवीन पिढी घडविण्यासाठी तुमच्याकडून काही चांगले प्रयत्न केले गेले पण त्याचा वापर जर तुम्ही अशाप्रकारे राजकारणासाठी करत असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळाले नाहीत असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल.

आजवरच्या तुमच्या अनेक भूमिका हास्यास्पद आणि विकृत वाटाव्यात अशाच आहेत. तुमच्या बागेतला आंबा खाऊन मुलगा होतो? अहो गुरूजी, असं काही असतं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक निपुत्रिक दिग्गजांनी तुमची आमराई कधीच मुळासकट पळवली असती. तुम्ही अंधश्रद्धांना अशा पद्धतीनं खतपाणी घालत असाल तर तुम्ही ज्या हेतूनं संघटना चालवताय ती पुढं कशी जायची? तुमचा बचाव करणार्‍या तुमच्या कार्यकर्त्यांचीही आता गैरसोय होतेय. तुमच्या वादग्रस्त विधानामुळं ते तोंडघशी पडत आहेत. परवाच कुपवाडच्या एका धारकर्‍याचा एक फोन व्हायरल झाला. त्यात गेल्या वीस वर्षांपासून तुमचा धारकरी असलेला तो कार्यकर्ता तुमच्या एका अध्यक्षाला विचारतोय की ‘‘माझे काका कोरोनानं गेले तर ते गांडू होते का? त्यांची जगण्याची लायकी नव्हती का? इतकी वर्षे तुमच्या विचारावर ठाम राहत काम करतोय पण आज मला घरातून बाहेर पडणं अवघड झालंय.’’ त्यावर तुमचे अध्यक्ष सांगताहेत की, ‘‘वयानुसार असं होतं, ते चुकीचं बरळले, त्यांचं चुकलं, घ्या सांभाळून!’’

अमेरिकेनं एकादशीला सोडलेलं चांद्रयान वरती गेलं? कारण त्यादिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते? अरे तुम्ही बोलताय काय? छत्रपती शिवाजी महाराजांनीही अशा भंकस गोष्टीवर कधी विश्वास ठेवला नाही. किंबहुना त्यांनी सर्व लढाया अमावस्येला लढल्या. ते एकादशीची वाट बघत बसले नाहीत. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला भेटले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. स्वतःच्याच लाल महालावर शिवाजी महाराजांनी जो छापा मारला तो 5 एप्रिल 1664 ला मारला. ज्या दिवशी छापा मारला तो तर रमजानचा महिना होता आणि तेव्हा मुस्लिम समाजाचे रोजे सुरू होते. महाराज एकादशीची वाट बघत बसले असते तर भिडे गुरूजी आज दिसले नसते आणि त्यांना ‘संभाजी’ हे नावही धारण करता आलं नसतं. ज्या महापुरूषांची नावं घेऊन पुढं चालण्याचा प्रयत्न करताय त्यांची थोडी तरी बूज राखा.

तुम्हाला शिवसेनेच्या दारातून म्हणजे ‘मातोश्री’वरून भेट न देताच हाकलून लावलं. तुमचा तो अवमान बघून आम्हालाही वाईट वाटलं होतं; मात्र तुमच्या सततच्या भूमिका बघता तेच बरोबर होते असं वाटायला लागलंय. तुम्हाला गुरूजी म्हणत गावागावात तुमच्या मागं लोक आले. तुमच्या साधेपणावर ते भाळले. छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासह तुम्ही तयार करणार आहात म्हणून तुमच्या सोबत आले. अरबी समुद्रातल्या महाराजांच्या सगळ्यात मोठ्या स्मारकाला मात्र तुमचा विरोध आहे. तरीही शिवप्रेमींनी तुम्हाला सिंहासनासाठी पैसे दिले. तुमचा विरोध वैचारिक पातळीवर आहे का? महाराजांचं स्मारक करण्यापेक्षा घराघरात महाराज पोहोचायला हवेत असं तुम्हाला वाटतं का? तसं तुम्हाला काही वाटत नाही! तुमचं म्हणणं इतकंच की महाराजांचं सोन्याचं सिंहासन करायचं आणि त्यासाठी मीच पैसे गोळा करणार! ज्या राजानं हिंदुंचं आरमार तयार केलं त्याच्या समुद्रातील स्मारकाला तुमचा विरोध का? कुणी काही चांगली गोष्ट केली की तुम्ही त्याला विरोध केलाच म्हणून समजा.
 
गुरूजी, नवीन पिढी विज्ञाननिष्ठ बनू द्या. तुमच्या भल्या मोठ्या मिशा तुमचं संरक्षण करत असतील पण इतरांना मास्क घालण्यापासून रोखू नका. सामान्य माणसाला ही अशी आजारपणं परवडणारी नाहीत. कोरोना जर फक्त गांडू लोकांनाच होत असेल तर मोहनजी भागवत, भैय्याजी जोशी, अमित शहा, राज्यपाल कोश्यारी या सर्वांना काय म्हणाल? अमित शहा यांना तर दोन वेळा कोरोना झाला होता. मग तुमच्या भाषेत ते ‘डबल गांडू’ ठरतात का? सुधाकरपंत परिचारिक यांच्यापासून ते रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न लेखकांपर्यंत अनेकजण कोरोनाचे बळी ठरले. त्या दुःखातून मराठी माणूस सावरलेला नसताना तुमचं हे विधान तुम्हाला स्वतःला तरी पटतं का?

तुम्ही गुरूजी असूनही तुमची भाषा नेहमी अशी शिवराळ का बरं असते? किमान सभ्यता आणि सुसंस्कृतपणाही अंगी नसावा? अशी भाषा वापरायचा अधिकार महाराष्ट्रात राज ठाकरे, अजित पवार अशा मोजक्याच लोकांना आहे. तुम्हाला ती शोभत नाही. शिवभक्ताची भाषा कशी असावी? महाराजांच्या आयुष्यातून तुम्ही नेमकं  काय शिकलात? तुमचे कार्यकर्ते काय कौतुक करतात? तर ‘‘व्याख्यानाच्या वेळी गुरूजी दीड तास एकाच ‘पोझिशन’मध्ये होते... ते हलले सुद्धा नाहीत... बोलायला बसल्यावर ते जसे बसले होते तसेच एक हात गुडघ्यावर आणि एक हात माईकवर ठेऊन होते...’’

अरे हा काही कौतुकाचा विषय नाही! तुम्ही गदागदा हललात तरी चालेल. त्यानं काही फरक पडत नाही! पण असं काहीही बोलून लोकांना त्रास देऊ नका. तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः धुता याचंही कौतुक तुमचे शिष्य करत असतात. त्यासाठी तुम्ही एखादी बाई कामाला ठेवली तरी चालेल पण समाजात जातिद्वेष, धर्मद्वेष निर्माण करू नका. दंगली निर्माण होतील असं वागू नका. तुमच्या वागण्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना छोटं करू नका. तुमचं कौतुक करताना त्यांना कमीपणा येईल असं कोणीही वागू, बोलू नये याचं तरी भान ठेवा.
 
गावातली दारू-मटका विकणारी, छोटी-मोठी कामं करणारी, कामाच्या शोधात असणारी, वडाप वाहतूक करणारी पोरं तुमच्या पाठिशी उभी राहिली. त्यांचं आयुष्य काय बदललं? थोडक्यात काय तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षात ज्यांना फारसा थारा मिळत नव्हता त्यांना तुम्ही मोठं व्यासपीठ दिलं.  साळी, कोळी किंवा इतर बारा बलुतेदारांच्या पोरांना कुठंच स्थान मिळत नाही. त्या तरूणांना तुम्ही प्राधान्य दिलं. त्यांचं अस्तित्व निर्माण करून दिलं. तुमचं बघून पोरं सायकल वापरू लागली, साधे कपडे घालू लागली, काहींनी मिशा वाढवल्या. आता हीच तरूण मंडळी तुमचं बघून, तसंच अनुकरण करायचं म्हणून अशीच भाषा बोलतील. त्यांच्या तोंडात ओव्याऐवजी शिव्या असतील! तुम्ही जर म्हणता ‘जो जितका जास्त शिकला तो तितका मोठा गांडू...’ तर गुरूजी यातल्या किती तरूणांनी तुमची शिकवण ऐकत त्यांचं शिक्षण सोडलं? तुम्ही विज्ञान शाखेचे पदवीधर आहात हे ते सगळीकडं अभिमानानं का सांगतात? त्यांना तुम्हाला ‘सुपर गांडू’ म्हणायचं असतं का? तुमच्यामुळं जर त्यांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं असेल तर त्याला नेमकं जबाबदार कोण? मग काय कळले तुम्हाला महाराज? महाराजांचे गडकिल्ले अशासाठी पहायचे की त्यातून महाराजांचा पराक्रम शोधावा आणि नव्या पिढीनं प्रेरणा घेऊन नवा इतिहास निर्माण करावा. एका पिढीनं तुम्हाला त्यांचा गुरू मानलं असताना असा विश्वास तुम्ही त्यांच्या मनात निर्माण केला का?
 
पंढरीच्या वारीत वारकरी म्हणून सहभागी व्हायचं असेल तर वारकरी म्हणून या ना! तुम्हाला कोणी अडवलंय? गळ्यात तुळशीची माळ घालून भक्तिमार्गानं तुम्ही जरूर या!! हजारो पिढ्या पंढरीच्या वारीत भाविक सहभागी होतात. तुम्ही तिथं तलवार घेऊन येताय? इथं कसला शक्ती-भक्तीचा संगम आलाय? तलवार घेऊन जायचं तर सीमेवर जा ना! जो एकाचवेळी अनेक शस्त्र चालवू शकतो तो धारकरी! मग वारकरी आणि धारकरी हे कसलं समीकरण मांडताय? धारकर्‍यांनी सीमेवर जाऊन त्यांचा पराक्रम सिद्ध करावा. सियाचीन भागातल्या चिनी घुसखोरांना बाहेर काढणं तुमचे पट्टशिष्य असलेल्या मोदींना जमत नाहीये. तिकडं जाऊन त्यांना काही मदत करा. संभाजीराजांच्या काळात वारकर्‍यांना संरक्षण देण्यात आलं हे खरंय पण आता त्याची गरज आहे का? आणि तुम्ही स्वतःची तुलना संभाजीराजांसोबत करता का? भक्तीचा संगम पांडुरंगाच्या दारात असताना तिथं तलवार कशाला?
 
जागतिक महामारीच्या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम कोणीही करू नये. संभाजीराजांच्या मृत्युच्या आधी तुम्ही बलिदान सप्ताह साजरा करता आणि महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढता? मृत्युच्या छाताडावर थयथया नाचून जगाच्या इतिहासात अजरामर झालेले छत्रपती संभाजीमहाराज येशू ख्रिस्तापेक्षा महान आहेत. या धर्मयोध्याची कसली अंत्ययात्रा काढता? मृत्युशी झुंज देत मृत्युलाही पराभूत करणारा जगाच्या इतिहासातील हा अद्वितीय योद्धा आहे. त्यांचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर त्यांची अंत्ययात्रा काढण्याऐवजी महिनाभर त्यांच्या चरित्राचं पारायण करा. एकाचवेळी हा योद्धा अनेकांशी लढत होता. हे त्यांचं अलौकिक वेगळेपण होतं. ते पुढं यायला हवं.

महाराष्ट्रात कोरोनाच्या लसी कमी पडत असूनही महाविकास आघाडीची नेतेमंडळी तितक्या आक्रमतेनं लढताना दिसत नाहीत. लसींचा तुडवडा असताना त्यावरून वातावरण तापण्यापूर्वी लक्ष वेधून घ्यायचं म्हणून संभाजी भिडे गुरूजींना हे विधान करायला लावलं की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणसाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तुमच्या बोलण्यामागं असू शकतो. या वयात तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून ‘एजंटगिरी’ करताय की वयानुसार तुम्ही ‘भ्रमिष्ट’ झालाय हे कळायला मार्ग नाही. स्वतःच थोडंफार केलेलं काम स्वतःच्याच हातानं पुसून टाकण्याचा विक्रम मात्र तुम्ही करत आहात. एक शिवप्रेमी म्हणून आमच्यासाठीही हे सगळं तटस्थपणे पाहणं वेदनादायी आहे.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Wednesday, April 7, 2021

राजकारणातल्या संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आवरा

 



- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

महाराष्ट्राने आजवर कधीही झुंडशाहीला पाठिंबा दिलेला नाही. रॅन्डच्या काळातही ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं विचारणार्‍या लोकमान्य टिळकांची परंपरा महाराष्ट्राला आहे. एखादा माणूस माझ्या मनाविरूद्ध लिहितो म्हणून त्याच्यावर आक्रमण करायचं ही महाराष्ट्राची परंपरा नाही.

फ्रेंच तत्त्वज्ञ व्हाल्टेअरने फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू आणि विलासी उमरावांवर कडाडून हल्लाबोल केला. दोन हजारहून अधिक पुस्तके लिहिणारा व्हाल्टेअर म्हणतो, ‘‘एखाद्या माणसाचे आणि माझे विचार एकमेकांशी जुळत नाहीत, तो माझ्या विरूद्ध बोलतोय, ते मला आवडत नाही पण तरीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला तर मी तसे प्रयत्न करणार्‍यांच्या विरूद्ध जाईन! कारण माझ्याविरूद्ध बोलणार्‍यालाही बोलण्याचा मुलभूत हक्क आणि अधिकार आहे. त्याचं बोलणं ऐकून घेण्याची क्षमता निर्माण होणं गरजेचं आहे.’’

‘शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ’ असं म्हटल्यामुळं व्हाल्टेअरला दोनदा तुरूंगात डांबलं होतं आणि फ्रान्समधून हद्दपार सुद्धा करण्यात आलं होतं. त्याच्या विचारामुळं जागृती झाली आणि लोकांनी तिथल्या अन्याय आणि जुलूमाच्या विरूद्ध बंड पुकारलं. याच विचारवंताच्या म्हणण्याप्रमाणे समोरच्या माणसाचं ऐकून घेण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर ही लोकशाही समृद्ध होण्याची लक्षणं नाहीत. प्रत्येकानं आपले काही आयडॉल्स ठरवलेले आहेत. त्या मूर्तींना किंवा त्यांच्या आयडॉल्सबद्दल बोलल्यानंतर काही समुदायांना असा काही राग येतोय की ते समुदाय कुठलाही विधिनिवेष न ठेवता अशा पद्धतीनं लेखन करणार्‍याविरूद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा आक्रमकांना एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला रोखलं नाही तर महाराष्ट्राचं पुढचं स्वरूप फारसं चांगलं नसेल.

आजची पत्रकारितेता कशी आहे?, पत्रकारितेचं स्वरूप काय?, पत्रकारितेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत?, कोणत्या वाईट गोष्टी आहेत? याबाबतची चर्चा परत कधीतरी करूच! प्रश्न एवढाच आहे की एखाद्या व्यक्तिविरूद्ध, एखाद्या गटाविरूद्ध, एखाद्या पक्षाविरूद्ध लिहिल्यानंतर लिहिणार्‍यालाच आम्ही पकडू, त्याला बडवू, त्याच्याकडे बघून घेऊ, मारू, त्याला धमक्या देऊ अशा प्रवृत्ती वाढता कामा नयेत. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो हे वाक्य काय फक्त आमच्यासारख्यांच्या श्रद्धांजली सभेतच वापरणार का? याचं प्रशिक्षण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे.

एखाद्या व्यक्तिचं लेखन आवडलं नाही तर त्याच्याशी वैचारिक वाद आणि प्रतिवाद करा! कारण वैचारिक वाद आणि प्रतिवाद करण्याची आमची क्षमता नाही म्हणून आम्ही तुमच्याशी मारामारीच करू असं तुम्हाला वाटत असेल तर या देशातल्या निवडणुका रद्द करून टाका. मग होऊन जाऊ द्या मारामार्‍या! प्रत्येक पक्षानं बाऊंसर गोळा करावेत, पैलवान, ब्लॅक बेल्टवाले कराटेपटू गोळा करावेत. ज्याच्याकडं जास्त शक्तिमान लोक असतील त्यांना सत्ता देऊन टाका. सभा नकोत, पत्रकार परिषदा नकोत, राजकीय आंदोलनं नकोत, चर्चा तर नकोच नको! असलं काहीच नको. लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांना हरताळ फासणार्‍या या प्रवृत्ती महाराष्ट्रात जर काम करत असतील तर त्यांना थांबवण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे.

हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. महाराजांचे सहिष्णुतेचे संस्कार अनेक वर्षे महाराष्ट्रावर झालेत. महाराष्ट्राला संत परंपरा लाभलीय. सहिष्णुता म्हणजे काय हे संतांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून लोकांना दाखवून दिलंय. असा महाराष्ट्र असताना आम्ही या दोन्ही परंपरा विसरणार असू आणि एखाद्यानं आमच्याविरूद्ध, आमच्या नेत्याविरूद्ध लिहिलं म्हणून त्याच्या मागं लागणार असू तर ते वाईट आहे. विचार मांडणार्‍यांना धमक्या देणं हा प्रकार तुम्ही करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि इथल्या संतांच्या विचारांचा विसर तुम्हाला पडलाय आणि त्यांचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही.
 
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विरूद्ध ‘केसरी’ आणि ‘मराठा’मध्ये लेखन येत होतं. एकदा शाहू महाराज जेवायला बसले असताना लोकमान्यांच्या मृत्युची बातमी आली. त्यावेळी महाराजांनी समोरचं ताट बाजूला सारलं. एक चांगली व्यक्ती गेली म्हणून त्यांनी जेवण बंद केलं. महाराष्ट्राला अशी एक सशक्त परंपरा आहे. माधव गडकरी, गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे अशा अनेकांनी यशवंतराव चव्हाणांना वेळोवेळी फैलावर घेतलं. यशवंतरावांनी तर त्या त्या लेखक आणि संपादकांचं वेळोवेळी कौतुकच केलेलं आहे. शरद पवार यांच्याकडूनही विरोधात लिहिणार्‍या संपादकांवर हल्ले झाले नाहीत. आपल्याविरूद्ध लिहिणार्‍या व्यक्तिंच्या मताचा आदर करणं, त्याला सन्मानानं वागवणं, विरोधी विचारधारेचं स्वागत करताना त्याच्या आत्मसन्मानाला धक्का लागू न देणं हे सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचं लक्षण असतं. असं व्यापक दर्शन आपण महाराष्ट्राला घडवणार आहोत की नाही?

ज्यांना व्यापक हिंदुत्व स्वीकारायचंय त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत तर असहिष्णुता बसतच नाही. सहिष्णु वृत्तीनं विचारांचा विरोध विचारांनी न करता अशा पद्धतीनं लेखन करणार्‍यांना तुम्ही बोलणार असाल तर भविष्यात कोणी लिहिणारच नाही, आपले विचार चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे मांडणारच नाही. भविष्यात लिहिणारे हात तुम्ही असं वागून कलम करणार असाल तर उद्याच्या महाराष्ट्रातले चार चांगले लेखक संपवण्याचा अक्षम्य अपराध तुमच्याकडून घडतोय.
 
सभागृहात बोलणार्‍यांना विशेष संरक्षण असतं. सभागृहाच्या बाहेर असं संरक्षण नसतं. सभागृहाच्या बाहेर सत्य बोलून लोकशाही बळकट करण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमच्यासारखे लोक करतात. आम्हाला संरक्षण देणं सोडा तुम्ही किमान सभ्यताही पाळत नाही. ‘‘मी माझ्या मताशी आणि विचारांशी ठाम आहे, मी माझी मतं आणि विचार बदलणार नाही’’ असं सांगणार्‍या सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यायला भाग पाडलं गेलं. विचारवंत म्हणून जी वेळ सॉक्रेटिसवर आली तीच वेळ प्रत्येक पिढीत त्याच्या वारसांवर यावी असं आवर्जून म्हणण्याची गरज नाही. महाराष्ट्राला अशाप्रकारची झुंडशाही लाजीरवाणी आहे. ‘काचेच्या कपाटातील सिंह’ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आचार्य अत्र्यांनी लेख लिहिल्यावर त्यांच्यावर पुण्यातील एका कॉलेजच्या सभेत हल्ला झाला होता. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ‘मला मारणारे मेले, मी जिवंत आहे’ अशा आशयाचा लेख लिहिला होता. अत्र्यांना त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि वृत्तपत्रांनी पाठिंबा दिला होता. हा महाराष्ट्र अशा झुंडशाहीला सातत्यानं विरोध करत आलाय याची किती उदाहरणं द्यायची?

अलीकडं हे झुंडशाहीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्याची कारणं काय आहेत याचं मूल्यमापन त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी करावं आणि बोलणार्‍यांना नावं ठेवण्यापेक्षा, त्याला ट्रोल करण्यापेक्षा, त्याला धमक्या देण्यापेक्षा आपल्याबद्दल असं का बोललं जातंय याचं आत्मचिंतन करावं. त्या त्या पक्षाची राजकीय अधिवेशन होत असती, वार्षिक सभा होत असत्या, चर्चासत्रं होत असती, बौद्धिकं होत असती तर त्यांना व्यक्त व्हायला संधी मिळाली असती. कोणत्याही पक्षाकडून कार्यकर्त्यांना व्यक्त व्हायची संधी मिळत नसल्यानं अशा पद्धतीनं बेजाबदार वागून आपण आपला पुरूषार्थ गाजवतोय, आपल्या निष्ठा सिद्ध करतोय असं त्यांना वाटतं.

जो माझ्या विचारांच्या विरोधी बोलेल, जो माझ्या विचारांना विरोध करेल त्याच्याशी कुस्तीच खेळायली, त्याला मारायचं, ठोकायचं ही प्रवृत्ती जर वाढत गेली तर ती गोष्ट लोकशाहीला जसी शोभा देणारी नाही तशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेलाही शोभणारी नाही. आपण जेव्हा म्हणतो की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे तेव्हा एका सुसंस्कृत महाराष्ट्राचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर असतं. अशा महाराष्ट्रात लेखन केलं आणि वैचारिक विरोध केला म्हणून त्याला विचारांनी उत्तर न देता त्या व्यक्तिला धमक्या देणं, त्याचं वैयक्तिक आयुष्य डिस्टर्ब करणं असे प्रकार होत असतील तर असे प्रकार करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई व्हायला हवी. त्यांच्या विरूद्ध गुन्हेही दाखल व्हायला हवेत. अशा पद्धतीनं लेखन करण्याचं सामर्थ्य भविष्यात कोणी दाखवलं नाही तर ही एकतर्फा हुकूमशाहीकडं होणारी वाटचाल ठरू शकते. प्रत्येक पिढीत सर्वांना पुरून उरणारा आचार्य अत्रे जन्माला यावा अशी अपेक्षा ठेवण्याचं काहीही कारण नाही. सर्वसामान्य माणसाचा आवाज जेव्हा जेव्हा दाबण्याचा प्रयत्न झालाय तेव्हा तेव्हा त्या त्या समाजसमूहात विपरित घटना घडलेल्या आहेत. सामान्य माणसाचा आवाज कोणत्याही संघटित टोळीनं बंद करू देत त्या टोळीचा विनाश हा ठरलेला आहे. अशा टोळ्यांच्या प्रमुखांनी स्वतःच्या टोळ्या सांभाळताना लोकशाही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढं जाईल याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जर तुम्ही भारतीय संविधानावर विश्वास ठेऊन लोकशाही मार्गानं राजकीय पक्ष चालवत असाल तर तुम्हाला तुमच्यावरची टीका स्वीकारता आली पाहिजे आणि त्या टिकेला वैचारिक उत्तरही देता आलं पाहिजे. मात्र हे न करता लिहिणाराच मूर्ख आहे, तो विकला गेलेला आहे, त्याच्याकडं बघून घेतो, त्याला हिसका दाखवतो ही आणि याहून कठोर भाषा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगली नाही इतकंच.
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Monday, April 5, 2021

जगाला हेवा वाटेल अशी ‘सेटलमेंट’ मला करायचीय!


- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटतेय. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्वात मोठा ‘नटसम्राट’ म्हणून राज ठाकरे यांना पुरस्कार द्यायला हवा असे कुणाला वाटल्यास त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचाय’  असे बेंबीच्या देठापासून ओरडत सांगणारे राज ठाकरे ‘जगाला हेवा वाटेल अशा कोलांटउड्या’ मारत आहेत.

‘नाणार, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही!’ हे त्यांनी केवढ्या आवेशात सांगितले होते! त्यानंतर नाणारची मंडळी त्यांना भेटली आणि लगेच त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला. टोलनाक्यावरून त्यांनी जे आंदोलन हाती घेतले त्यावेळीही त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, ‘जयाचे जिवाशी वाटते भय, त्याने क्षात्रधर्म करू नये.’ लालूप्रसाद यादव तुरूंगात जाऊन बसले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘टाका मला जेलमध्ये. बघेन मी काय करायचं ते.’ शरद पवार तर ‘काय करताय ते बघू’ म्हणत न बोलावता स्वतःच इडीच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. राज ठाकरे मात्र इडीला घाबरले असे चित्र आहे.

उत्कृष्ट वक्तृत्व असणं एवढंच नेतृत्वाला पुरेसं नाही. ज्याला स्वतःला कशाचीही भीती वाटते तो नेतृत्व करू शकत नाही. छगन भुजबळ तीन वर्षे तुरूंगात राहिले, बाहेर पडले आणि पुन्हा सत्तेत सहभागी झाले. वाय राजशेखर रेड्डीचा मुलगा आंध्रचा मुख्यमंत्री झाला. त्यांच्याविरूद्धही केसेसचा पाऊस पडला होता. राजकारण काहीही असू द्या पण एकेकाळी तडीपार केलेले अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले. जर तुम्ही मराठी पोरांना लढायला सांगताय, ‘केसेस पडल्या तर पडू द्या, मी आहे तुमच्या पाठिशी’ असा धीर देताय तर एका इडीच्या केसला काय घाबरता? ‘लाव रे तो व्हिडीओ’पासून ‘राहू दे तो व्हिडिओ’पर्यंत केवढ्या भूमिका बदलल्या तुम्ही?

प्रारंभी मराठी माणसाच्या कल्याणाची भूमिका घेणार्‍या राज ठाकरे यांनी अचानकच मराठी माणसाला वार्‍यावर सोडले असे दिसतेय. राजकारणातल्या घराणेशाहीवर सतत बोलत असणार्‍या या नेत्याने आता त्यांच्या मुलाला यात सक्रिय केले आहे. कथनी आणि करणीत एवढे अंतर का बरे? ‘बोले तैसा चाले’ या उक्तीचा आणि राज ठाकरे यांचा काही संबंध आहे का? त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वावर फिदा होऊन, मराठी माणसांसाठी काहीतरी करायचेय अशी इच्छा उराशी बाळगून असलेले अनेक तरूण दिशाहीन झालेत. त्यांना दिशा देणे, मार्गदर्शन करणे हे कर्तव्य असताना आज अशा तरूणांची ओळख ‘खंडणीखोर’ अशी होतेय.
 
पंधरा वर्षात मराठी भाषेसाठी काय केले? याचे उत्तर आता राज ठाकरे यांनी द्यायला हवे. किमान त्या बेळगा
च्या सीमा प्रश्नात तरी मनसेचे अस्तित्व दाखवून द्यायला हवे होते. प्रत्येक निवडणुकीत तुमची भूमिका वेगळी! दहा वर्षांपूर्वी गुजरातचा दौरा करून आल्यावर भूमिका घेतली की, ‘नरेंद्र मोदी चांगले नेतृत्व आहे, तुम्ही मला मत द्या म्हणजे मी माझ्या खासदारांचा त्यांना पाठिंबा देतो.’ लोकांना मध्यस्थ नकोच होता. त्यामुळे लोकांनी थेट भाजपला मतदान केले. या सगळ्यात ‘गुजरातच्या विकासापासून ते गुजरातच्या विनाशापर्यंत’ बोलण्याइतकी तुमची भूमिका बदलली. काळ बदलला की माणूस बदलतो, दिवस बदलतो. रोजच्या रोज अनेक संदर्भही बदलतात. हे सगळे खरे आहे पण तुमच्यात होणारे हे जे बदल आहेत ते राजकारणाला पसंत नाहीत, सामान्य माणसाला पसंत नाहीत, समाजाला पसंत नाहीत, इतकेच काय, जीवशास्त्रालाही असे इतके बदल पसंत नाहीत. आत्तापर्यंत ज्या ज्या सरड्याच्या प्रजाती सापडल्या त्याही इतक्या वेगात रंग बदलू शकत नाहीत. इतक्या झपाट्याने भूमिका बदलण्यामुळे नेमके काय साध्य होतेय राजसाहेब?

तुम्हाला सामान्य मराठी माणूस हवाय तो पक्ष वाढवायला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा हवीय तीही पक्ष विस्तारायला. शिवसेनेने निदान महाराजांचे नाव घेत पक्ष तरी वाढवला. महाराजांची राजमुद्रा वापरायची तर महाराजांच्या विचारांसाठी, त्यांच्या विचारांच्या प्रचारासाठी काही कराल की नाही? कोणत्याही विशिष्ट विचारांच्या वळचणीला न बांधले जाता निदान जो कोणी शिवभक्त आहे त्या प्रत्येकाला प्रेमाने मिठी मारायचे तरी धाडस दाखवा. कॉमे्रड डांगेंनी मांडलेले शिवचरित्र असेल, पानसरेंचे शिवचरित्र असेल, बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबर्‍या असतील किंवा श्रीमंत कोकाटेंची मांडणी असेल! ‘जो कोणी शिवचरित्रापासून प्रेरणा घेईल आणि आपल्या सामर्थ्याने सामाजिक हिताचे काम करेल तो माझा भाऊ’ असे तुम्ही म्हणायला हवे. अर्थात, त्यांची चुकीची मांडणी तुम्ही दुरूस्त करू शकाल पण प्रत्येक शिवप्रेमीच्या पाठिशी तुम्ही उभे असायलाच हवे. पक्षाच्या झेंड्यात तुम्ही राजमुद्रा वापरलीय म्हणून हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. हीच राजमुद्रा इतर कोणत्या पक्षाने वापरली असती तर काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या हे आम्ही तुम्हाला सांगायला हवे? ‘राज ठाकरे’ या नावामुळे आणि त्याच्या भूमिकेमुळे तुम्हाला राजमुद्रा वापरायला विरोध झाला नाही याचे भान तुम्ही ठेवायला हवे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा जर तुम्हाला वापरायची असेल तर जेव्हापासून तुम्ही ही राजमुद्रा वापरायला सुरूवात केली त्या दिवसापासून महाराष्ट्रात जिथे जिथे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार झाले तिथे तिथे तुम्ही संघटना म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे अपेक्षित होते.

या देशात अत्यंत स्वार्थी आणि हलकट जर कोणी असतील तर आपल्याकडील कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोक आहेत. अत्यंत नीच आणि स्वार्थी माणसे या क्षेत्रात कार्यरत आहेत. जे कोणी भारतरत्न आहेत ते त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूने बाह्या सरसावून उभे राहता? कोणत्या शेतकर्‍याला हे पसंत पडेल? तुम्ही पक्ष चालवताय की सुरक्षा एजन्सी हे तरी एकदा जाहीर करा. अमुकला संरक्षण, तमुकला संरक्षण असं करण्यापेक्षा सरळ सिक्युरेटी एजन्सी चालवा ना!
 
प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्या स्वतःच्या काही वैचारिक भूमिका होत्या. मतदारसंघातील जातीचे प्राबल्य न पाहता बाळासाहेबांनी अनेकांना उमेदवार्‍या दिल्या आणि केवळ हिंदू म्हणून त्यांना निवडून आणायला लावले. मित्रपक्षाने चार महत्त्चाच्या जागा घेतल्या तर ‘त्यालाच निवडून द्या, त्याला पाडायला तो काय पाकिस्तानी आहे का? आपल्या पक्षाचा नसला म्हणून काय झाले? तो हिंदू आहे इतके पुरेसे नाही का?’ असे खडसावण्याचे त्यांचे धाडस होते. जी गोष्ट मोदी आणि योगींना जमली नाही तो चमत्कार बाळासाहेबांनी करून दाखवला होता. तुमच्याकडे तोही करिष्मा दिसत नाही. आपले मतदारसंघ तयार करावे लागतात, तिथल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते याचा तुम्हाला विसर पडतोय का? एक साधा पंचायत समितीचा सदस्य सोडून चालला तर अजित पवार त्याला भेटून अडचणी समजून घेतात. गरज पडलीच तर स्वतः शरद पवार त्याला विचारतात, ‘तुझी अडचण काय?’ आणि तुम्ही म्हणताय, ‘राम कदम गेला आणि पक्ष शुद्ध झाला...’, ‘प्रवीण दरेकर गेला’ आणि पक्षाची स्वच्छता झाली? अरे होतेच कोण तुमच्याकडे? आहे ते सगळे सोडून जाताहेत आणि तुम्ही पक्ष शुद्ध करत बसलाय? एवढ्या एकाच बाबतीत तुमची आणि राहुलबाबाची बरोबरी होऊ शकते. जाणार्‍यांना थांबवायचं नाही, अडवायचं नाही हा प्रकार अतिशय घातक असतो. तुमच्या पक्षाचे झेंडे किती तर दोन! आणि आमदार किती? तर एक! खासदार नाही. लोकसभेला उमेदवारच नाहीत. मग ‘सगळा महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे’ असे का म्हणता? ‘मला महाराष्ट्राची बारामती करायचीय’ असे म्हणताना तुम्ही नेमके काय करता हे स्पष्ट व्हायला हवे.

लोकांना फक्त विकासाची ब्ल्यू प्रिंट देऊन चालत नाही. ती स्वप्ने सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुमचे नेते आणि कार्यकर्तेही ही ब्ल्यू प्रिंट सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडले हे सत्य तुम्ही लक्षात का घेत नाही? कार्यकर्त्यांसाठी मेहनत घेणे, त्यांना उभे करणे, त्यांना ताकद देणे, त्यांना सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे हे सगळे फक्त उत्तम भाषणे करून साधणार नाही. भाषणे देऊन पक्ष उभे राहत असते तर आज अमोल मिटकरी मोदींना टक्कर देणारा नेता झाला असता. बानुगडे पाटील यांनी शहाची जागा घेतली असती. गोपीचंद पडळकर केंद्रीय नेतृत्वात दिसले असते.

राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाचे अनेक गुण असल्याचे वाटल्याने या राज्याने त्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. मराठी माणसाने त्यांच्यावर निर्व्याज आणि आत्यंतिक प्रेम केले. मात्र पंधरा वर्षात पक्षसंघटना, विचार या सगळ्याची माती झालीय. तुमची बांधिलकी नेमकी कुणाशी हे तरी एकदा स्पष्ट करा. खडसेसारखा नेता इडीला घाबरत नाही. राऊत यांच्यासारखे बोरूबहाद्दर इडीला घाबरत नाहीत. ममता बॅनर्जी सगळ्यांच्या अंगावर चालून जातात आणि हा मराठी गडी इडीला घाबरला? हा काही क्षात्रधर्म नाही हो! ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ अशी डरकाळी फोडणारे बाळासाहेब आठवा. प्रबोधनकारांच्या ज्वलंत भूमिका पुन्हा एकदा समजून घ्या. राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श आणि त्यांचा विचार प्रबोधकारांनी पुढे नेला. बाळासाहेब आणि प्रबोधकारांच्या विचारात साम्य नसले तरी एक गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे दोघेही ‘रोखठोक’ होते. त्यांच्याकडे विचारांसाठी लागणारी किंमत मोजण्याची निर्भयता होती. तुम्ही कोणत्या बाबतीत त्यांच्या जवळपास फिरकता हे तरी एकदा कळू द्या.

प्रत्येक विषयावरची तुमची मते एकदा विस्ताराने लोकांपर्यंत यायला हवीत. आरक्षणाबाबत तुमचे मत काय? मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध? दीपाली चव्हाण नावाच्या एका तरूण अधिकारी असलेल्या महिलेला आत्महत्या करावी लागली तरी तुम्ही गप्पच? अ‍ॅट्रोसिटी कायद्याबद्दल कधी तरी मत मांडाल की नाही? पत्रकार परिषदा घेणे म्हणजे पक्ष चालवणे नाही. पक्ष चालवणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे हे तुम्हाला तुमचे कोणतेही सल्लागार सांगत नाहीत का? मध्यंतरी एकदा पवार साहेबांनी तुम्हाला सांगितले होते की ‘पक्ष चालवायचा असेल तर सकाळी लवकर उठावे लागते आणि रात्री कार्यकर्ते भेटायला आल्यावर त्यांना ओळखता येईल इतक्या शुद्धित असावे लागते.’ पवार साहेबांना तुम्ही म्हणालात, ‘मी शिकतो.’ ती ‘शिकवण’ तुमच्या आचरणात दिसून का येत नाही?

तुमची नेमकी भूमिका कोणती? तुम्ही पवार साहेबांची मुलाखत घेतली. त्या आधी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली. पवारांच्या मुलाखतीची स्क्रिप्ट बारामतीहून आली होती असाही आरोप झाला. तुम्ही मुलाखतकार आहात का? आमच्या सुधीर गाडगीळांसोबत तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर मग राजकीय नेतृत्वाची अपेक्षा सोडून द्या आणि इथेच पूर्णवेळ करिअर करा. ज्या त्वेषाने, ज्या तळमळीने, वैयक्तिक माझ्यावर अन्याय झाला म्हणून ज्या जिद्दीने तुम्ही शिवसेना सोडून बाहेर पडलात ते पाहता तुमचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि आता तुम्ही नेमके कुठे आहात? हे पडताळून बघितले पाहिजे. तुमचे विधानसभेत आमदार नाहीत, लोकसभेत खासदार नाहीत. एकदा म्हणता महाराष्ट्राच्या विकासासाठी मला सत्ता द्या, एकदा म्हणता मला विरोधी पक्ष कसा चालवायचा हे दाखवायचेय... नाशिकमध्ये तुम्ही खरेच खूप विकासाची कामे केली. तरीही त्याठिकाणी सत्ता का गेली याचे कधीतरी आत्मचिंतन करा. तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा हेकट, मनमानी करणारा अधिकारी असला तरी लोक त्याच्या पाठिशी उभे राहतात. सगळं प्रशासन, सत्ताधारी, विरोधक त्यांच्या विराधात असले तरी लोक त्यांना पाठिंबा देतात. त्यांनी घरपट्टी वाढवली, कर्मचार्‍यांचे निलंबन केले तरीही ते त्या त्या ठिकाणहून बदलून गेले त्या त्या वेळी नागरिकांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सामान्य माणूस जर चांगल्या अधिकार्‍याच्या मागे उभे राहण्यासाठी उत्स्फूर्तपणे येत असेल तर तुमची कामे इतकी प्रामाणिक आणि पारदर्शी असूनही लोक का दूर ढकलताहेत? ‘एवढे सगळे करूनही नाशिकच्या लोकांनी आम्हाला नाकारले’ अशी खंत जेव्हा तुम्ही व्यक्त करता तेव्हा ते सामान्य माणसावरचे दोषारोप असते. लोकांना असे नालायक समजणे, गद्दार समजणे बरे नाही!

नाना पटोलेंनी परवा संजय राऊतांना ‘तुम्ही यूपीएचे घटक नाही त्यामुळे तुम्ही यावर बोलू नका’ म्हणून झापडले. ‘तुम्ही प्रवक्ते शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? आणि पवारसाहेब राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे? हे एकदा कळू द्या’ असेही त्यांनी सांगितले. तशीच तुमची अवस्था झालीय. फडणवीसांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चे स्क्रीप्ट बारामतीहून आलेय, असे सांगितले होते. आता वाझे प्रकरणात त्याच फडणवीसांची बाजू तुम्ही घेता तेव्हा हे स्क्रिप्ट नागपूरच्या रेशीमबागेतून आले असे म्हणायचे का? बॅन्डवाले जसे जिकडे सुपारी मिळेल तिकडे वाजवायला जातात तसे तुमचे झालेय का? निदान स्वतःशी तरी प्रामाणिक रहा. मनसेचे ‘बॅन्डपथक’ होऊ देऊ नका. जो सर्वोत्तम बॅन्ड वाजवतो तो त्यांचा प्रमुख होऊन त्याला सगळीकडून सुपार्‍या येतात. कुणाचेही लग्न असले तरी बॅन्डवाला हजरच! बॅन्ड चांगला वाजतो म्हणून लोकही ऐकतात. यापेक्षा तुमचे खूप मोठे स्टेटस आहे याचा तुम्हाला विसर पडतोय का?

नाणार प्रकल्पात तुम्ही तुमची भूमिका बदलली असेल तर ती का बदलली हे राज्यातल्या लोकांसमोर आले पाहिजे. नाणारला तुमचा विरोध का होता आणि आता पाठिंबा का दिला हे जाहीरपणे सांगा. तुम्ही महाराष्ट्रातले सगळे टोलनाके बंद करणार होता. ते तर बंद झालेच नाहीत पण तुमचे आंदोलन का बंद झाले ते सांगा. महाराष्ट्रातल्या गावागावातल्या दुकानावरचे फलक मराठी भाषेत करणार होतात, बँकांचे कामकाज मराठीत करणार होतात त्याचे पुढे काय झाले ते सांगा. हे प्रश्न विचारले की तुम्ही म्हणता, ‘‘हे मलाच का विचारता? मी एकट्याने ठेका घेतलाय का? मक्ता घेतलाय का? बाकीच्यांनाही विचारा की!’’ हा मुद्दा जर तुम्ही मांडला असेल, त्यासाठी लढण्याची तयारी तुम्ही दाखवली असेल, आमच्यासारख्या अनेक तरूणांनी त्यासाठी तुम्हाला पाठिंबा दिला असेल तर तुमची ही भाषा बरोबर नाही. त्यामुळे तुम्हालाच या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. फक्त दुसर्‍यांची टिंगल करून, त्यांना नावे ठेवून एखादी संघटना किंवा पक्ष उभा राहू शकत नाही हे तुमच्यामुळे सगळ्या जगाला कळले.

महाराष्ट्राच्या इतिहासात जॉनी लिव्हरनंतर सर्वाधिक विनोदी कलाकार म्हणून तुमची नोंद व्हावी की उत्तम नेतृत्वगुण असलेला समाजाभिमुख नेता म्हणून दखल घेतली जावी हे आता तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. ‘ईव्हीएममुळे नरेंद्र मोदी निवडून आले’ हे तुम्ही ठामपणे मांडलेत. त्यासाठी ममता बॅनर्जींनाही जाऊन भेटलात आणि त्यांनाही याबाबतची काळजी घ्यायचा सल्ला दिला. तुम्हाला असे वाटत होते तर तुम्ही या मुद्याच्या शेवटपर्यंत का गेला नाहीत? त्यासाठी तुम्हाला कोणी फासावर लटकवणार होते का? गरज पडलीच तर चार महिने, सहा महिने जा ना तुरूंगात! काही फरक पडत नाही त्यामुळे. चुकीच्या प्रकरणात सूडबुद्धिने तुम्हाला त्रास दिला गेला असता तर बाहेर आल्यावर तरी हिरो झाला असता. तुम्ही घाबरलात. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा गुण ज्याच्यात नाही त्याला मराठी नेता म्हणवून घ्यायचा काय अधिकार आहे? मराठी माणूस उभा राहिला, कोलमडून पडला पण त्याने कधी पळपुटेपणा केला नाही हे मागच्या बाराशे-चौदाशे वर्षात अनेकदा दिसून आलेय. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, माधवराव पेशवे या सर्वांनी हेच तर दाखवून दिलेय.

माधवराव पेशव्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग आहे. माधवरावांनी त्यांच्या मामाला, मल्हारराव रास्तेंना दंड केला. पुण्यात निजामाने घरे लुटली आणि जाळली तेव्हा त्यांना घरे दाखवण्यात मल्हारराव होते यावरून त्यांना दंड केला होता. त्यावेळी माधवरावांच्या आईंनी सांगितले की ‘‘माझ्या भावाला दंड भरायला लावायचा नाही.’’

त्यावर माधवराव म्हणाले की ‘‘ठीक आहे, मामाला जमत नसेल तर त्यांचा दंड मी भरतो.’’
 
आई म्हणाल्या, ‘‘तुही दंड भरायचा नाही. माझ्या माहेरच्या परिस्थितीला काही भीक लागली नाही. ते दंड भरू शकतात पण शिक्षा म्हणून तो दंड माफ कर.’’

माधवरावांनी सांगितले की ,‘‘काहीही झाले तरी दंड माफ होणार नाही.’’

त्यावर आईने सांगितले, ‘‘तसे असेल तर मी पुण्यात राहणार नाही. मी पुणे सोडून निघून जाईल.’’

त्यावर माधवरावांनी सांगितले, ‘‘तुझी इच्छा. तुला कुठे जायचे, कुठे रहायचे!’’

त्यांनी स्वतःच्या निर्णयात बदल केला नाही. अशा न्यायनिष्ठुर आणि कर्तव्यकठोर, ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे. माधवराव हे फक्त एक उदाहरण आहे. बहलोलखानच्या हजारोच्या फौजेवर चालून गेलेले कुडतोजी गुजर आणि त्यांचे सहा मावळे ज्यांच्याविषयी तात्यासाहेबांनी ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ असे लिहून ठेवलेय त्यांना आठवा. मुघलांच्या खजिन्यावर एकाचवेळी दोन वाघांनी हल्ला केला होता. एक खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे प्रतापराव तथा कुडतोजी गुजर. ‘म्यानातुन उसळे तलवारीची पात’ अशी स्वाभिमानी माणसे प्रत्येक पिढ्यात मराठी मुलखात जन्माला आलीत. कराडच्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण असताना अणीबाणीच्या विरूद्ध बोलणार्‍या आणि यशवंतराव चव्हाणांना ‘तुमचे राजकीय जोडे संमेलनाच्या बाहेरच काढून या’ असे ठणकावणार्‍या दुर्गाबाई भागवतांचा हा महाराष्ट्र आहे.

असे सगळे असताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी मोडताय, वाकताय, शब्द फिरवताय. मग तुमचा पक्ष काय क्रांती करणार? तुमच्या पक्षात येणे म्हणजे स्वतःची फरफट करून घेणे नाही का? तुमचा आजवरचा प्रवास पाहता सुरूवातीच्या काळातला जोश कुठे गेला? तुमच्या भूमिकांवर, विचारांवर आम्ही प्रेम केले पण आता तो विचार कुठेच दिसत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता. काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकता. सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता पण सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही! आता तुम्ही आणि तुमचा पक्ष या चौथ्या स्टेजला आहात. या पक्षाचे आकर्षण राहिलेले नाही किंवा या पक्षाला महाराष्ट्रात 248 जागा मिळण्याची शक्यता राहिलेली नाही. नेतृत्वाबद्दल प्रेम राहिलेले नाही आणि तुमची दिशा कोणती असेल हेही कुणाला सांगता येणार नाही.

तुमचे सल्लागार कोण आहेत? याबाबत तुम्हाला कोणी काही सांगत नाही का? पक्षाचे वार्षिक अधिवेशन नाही, निवडणुकीत उमेदवार नाहीत. विचारधारा नाही, भूमिका नाही. फक्त पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही पक्ष चालवताय. बाळासाहेब ठाकरे यांनी दसर्‍याला मेळावा सुरू केला म्हणून तुम्ही पाडव्याला मेळावा सुरू केला. त्यांनी ते मेळावे सगल घेऊन दाखवले. अशी ‘सलगता’ हे तर तुमचे वैशिष्ट्यच नाही. दरवेळी यू टर्न (यूटी म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे) हेच तुमचे वैशिष्ट्य. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट’ तुम्ही करताय की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे.

राजसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र अजूनही एका संक्रमणावस्थेत आहे. मागच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, ‘महाराष्ट्राचा शरद पवारांचा वेढा संपुष्ठात येतोय.’ त्यांनी तसे विधान केले असले तरी त्यात सत्य नाही हे एव्हाना सिद्ध झालेय. पुढची पाच-सात वर्षे ती शक्यताही दिसत नाही. मात्र शरद पवारांचा वेढा जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा महाराष्ट्राचे एकहाती नेतृत्व करण्याची क्षमता आम्हाला फक्त तुमच्यात दिसतेय. त्यासाठी तुम्ही दिवसरात्र लोकांत मिसळायला हवे. त्यांचे सुखदुःख समजून घ्यायला हवे. घराबाहेर न पडणे, दुसर्‍यांच्या नकला करणे म्हणजे पक्ष चालवणे नाही. तुमच्या पक्षाचा एखादा नेता बाहेर पडत असेल तर किमान त्याचा अभ्यास करा. कसा जातोय, का जातोय, कुठे जातोय, काय करतोय, आधी काय केलेय इतके तरी बघा. तुमचे वेगळेपण तुमच्या कामातून दिसू द्या. महत्त्वाच्या बैठकींना जाताना, पत्रकार परिषदा घेताना मास्क न लावता जाणे हे वेगळेपण असू शकत नाही. ते वेडेपण आहे. नरेंद्र मोदींवर, भाजपवर टीका करायची आणि म्हणायचे, नितीन गडकरी चांगला माणूस आहे... हे कसले वेगळेपण? स्वतःची जर इतकी द्विधा अवस्था असेल तर कोण कशाला थांबेल तुमच्याबरोबर? कोण तुम्हाला पाठिंबा देणार? कोण तुमच्या मागे उभे राहणार?

तुम्ही आता एक विचार, एक झेंडा, एक भूमिका, एक नेतृत्व ठेवले आणि पक्ष चालवला तर अजूनही लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, बाबासाहेब पुरंदरे हे आमच्यासाठीही वंदनीयच आहेत पण ते म्हणजेच महाराष्ट्र नाही. इथल्या शेतकर्‍यांपर्यंत, श्रमिकांपर्यंत पक्षाचे काम जाऊ द्या. साहित्यिक आघाडी बळकट करा. उद्या तुम्ही कंगना रानौत आणि अर्णब गोस्वामीच्या संरक्षणासाठीही उभे राहिलात तर आश्चर्य वाटणार नाही इतकी घसरण होऊ देऊ नका. गेल्या पाच-सात वर्षात बेळगावात कन्नड राज्यकर्त्यांचा अत्याचार कमालीचा वाढतोय. तुम्ही मराठीचा मुद्दा घेतला असेल तर त्याविरूद्ध सर्वप्रथम आवाज तुम्ही उठवायला हवा होता. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात 2019 ला प्रचंड पाऊस पडला. आलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे भयावह पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यावेळी सगळे नेते या भागाच्या पाहणीसाठी आले होते. फक्त तुम्ही नव्हता. काय करत होता तेव्हा मुंबईत? अशावेळीही काय काम असते तुम्हाला? तुम्ही इकडे वहिनींना पाठवलंत. ही कुठली पद्धत? मोदींनी किमान अमित शहांना पाठवले. ते हेलिकॉप्टरने का असेना पण येऊन गेले. पवारसाहेब भरपूर फिरले. गिरीश महाजनसारख्या लोकांनी येऊन किमान नौकेत बसून सेल्फी काढले. त्यावेळी या सगळ्यांनी या लोकांना काय दिले? पवारसाहेब तर तेव्हा सत्तेतही नव्हते! पण नेत्यांचा आश्वासक हात पाठिवर पडला, त्यांच्याकडून सांत्वन झाले तर समाज उभा राहतो. लोकांना किमान तुम्ही असा धीर द्या, आधार द्या. भलेही मदत काय करायची हे तुम्ही ठरवा पण लोकांच्या दुःखात त्यांच्याबरोबर उभे तरी रहा. तुमच्याकडे चांगले सल्लागार नसले तरी अशा गोष्टी तुम्ही पवारसाहेबांकडे पाहून शिकू शकता. दरवेळी त्यांनी तुम्हाला सल्ले द्यावेत ही अपेक्षाही बाळगू नका.

पक्षाचा सामान्य कार्यकर्ता तुमच्यासमोर हे सगळे मोकळेपणे बोलू शकत नाही. कोकणातले नगरसेवक, नगराध्यक्ष तुम्हाला भेटायला आले तर तुम्ही कुत्र्यासोबत खेळत बसता? त्याच्याशी खेळत ‘‘काऽऽय रे! काय काम आहे? कशाऽऽला आलाय?’’ असे तुम्ही विचारता? ही तुमची भाषा? त्यापेक्षा तो राहुलबाबा परवडला. तो अशा लोकांना भेटतच नाही. मला वेळ नाही, असेच सांगतो आणि कुत्र्याबरोबर खेळत बसतो.

तुमचं राजकारण म्हणजे बाळासाहेबांची नक्कल आहे. नक्कल करायला अक्कल लागते हे जरी खरे असले तरी आता तुमच्याकडचे अस्सल बाहेर येऊ द्या. तुम्ही खरे हिरो असताना कितीकाळ स्टंटमॅन म्हणून काम करणार? तुमचे आजोबा, काका, वडील हे सगळे रिअल हिरो होते. तुम्ही तसेच हिरो म्हणून पुढे या.
 
या सगळ्यात तुमची एकच गोष्ट मला चांगली वाटली. तुम्ही दहावी आणि बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवसोहळ्याला कधी जात नाही. ‘मला दहावी-बारावीला खूप कमी मार्क होते म्हणून मी अशा सोहळ्यांना जात नाही’ असे तुम्ही प्रांजळपणे सांगितले. असा प्रामाणिकपणा सगळीकडे ठेवा. तसेच जगा. आमचे अमितभैय्या देशमुख लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत एकेका दिवशी पंधरा-पंधरा, वीस-वीस सभा घेतात आणि तुमची रोज फक्त एकच सभा? सत्तर वर्षांचे मोदी रोज स्वतःच्या अनेक सभा लावतात. तुम्ही जर महाराष्ट्रात सभा करत होतात आणि उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधून तुम्हाला ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या सभेसाठी निमंत्रणे असतील तर तुम्ही का गेला नाहीत? राजकारणात संकटाला संधी माणून काम करावे लागते. संधी आल्यावर असे पळणारे नेते कसे होऊ शकतात?

निवडणुका लढवताना भूमिका निश्चित असायला हव्यात. सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवायला हवी. समाजकारण तर करावेच लागते पण राजकीय पक्षांचे ध्येय निवडणुका लढणे, त्या जिंकणे, सत्ता मिळवणे, त्याचे लाभ पदरात पाडून घेणे, आपली विचारधारा राबवणे आणि जनतेच्या हिताची कामे करणे हे असावे लागते. त्यासाठी स्वतःची विचारधारा निश्चित करावी लागेल. तुम्ही फक्त ‘सेटलमेंट’मध्येच कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही असा संदेश जाणे कितपत योग्य आहे?

सध्या तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलीय. रेल्वे इंजिन रूळावरून घसरलेय. ही वेळ आहे ते इंजिन परत रूळावर आणायची. ही वेळ आहे रेल्वे इंजिनला दिशा देण्याची. ही वेळ आहे एका चांगल्या पद्धतीने प्रवास करण्याची. ही वेळ जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला काळ माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगला, यशस्वी राजकारणी म्हणून किंवा अयशस्वी, फसलेला राजकारणी म्हणून तुमची ओळख व्हावी. जॉनी लिव्हरची कॉमेडी ब्रेक करणारा, इतरांच्या नकला करणारा मिमिक्री कलाकार म्हणून महाराष्ट्राने तुमची नोंद घ्यावी असे आम्हास वाटत नाही. त्यासाठी सिंहावलोकन करावे लागेल, आत्मपरीक्षण करावे लागेल.
 
अजूनही तुमच्या अवतीभोवती काही चांगली माणसे आहेत. पुण्यासारखं शहर हलवणारा आणि सर्वांवर अंकुश ठेवणारा वसंत मोरे यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता अजूनही तुमच्यासोबत दिसतोय. ‘मनसेची वाघिण’ अशी ओळख असलेल्या अ‍ॅड. रूपालीताई ठोंबरे पाटील तुमच्या पक्षात आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी धडपडणारे गणेशअप्पा सातपुते अजूनही तुमच्यासोबत आहेत. सगळ्यात जास्त समर्पण देणारी माणसे तुमच्यासोबत आली पण तुम्हाला त्यांचा उपयोग करून घेता आला नाही. महाराजांची राजमुद्रा वापरायची असेल तर त्यांच्यासारखे वागण्याचा थोडाफार प्रयत्न तरी करावा लागतो. हे सगळे तुम्हाला सांगण्याचा हेतू म्हणजे आमचे तुमच्यावर खरेखुरे प्रेम आहे. एक चांगला नेता, एक चांगला मराठी माणूस, महाराष्ट्रातला, या नव्या पिढीतला, वक्तृत्वाचे इश्वरी वरदान लाभलेला नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. भाटगिरी करणारे अनेकजण तुमच्या अवतीभोवती असतील, आहेत पण तटस्थपणे हे सगळे तुमच्यासमोर मांडण्याची गरज होती म्हणून अंतःकरणापासून लिहितोय.
 
एका घरातली दोन माणसे मारली जाऊनही राहुलबाबा सगळीकडे बिनधास्त फिरतोय. जर राहुल गांधी असे धैर्य बाळगतोय तर प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाकडून आम्ही काही भल्याच्या अपेक्षा का बाळगायच्या नाहीत? जननिंदेला, जनटिकेला जराही न घाबरता आणि स्वतःच्या विचारांपासून जराही विचलित न होता लेखन करणारे ते प्रबोधनकार, त्यांचे विचार आजही प्रक्षोभक वाटतात. त्या काळात तर त्यांनी केवढी खळबळ माजवली होती! अशा प्रबोधनकरांचा वारसा सांगणार्‍या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. महाराष्ट्राला सध्या एक चांगली विचारधारा असणारा राजकीय पक्ष हवाय. काँग्रेस आणि भाजपची परस्सरविरोधी विचारधारा कायम असतानाही एका नव्या विचारधारेची सध्या फार मोठी गरज आहे. ती पोकळी तुम्ही भरून काढाल म्हणून हा शब्दप्रपंच! गोपाळकृष्ण गोखल्यांची काँग्रेस, प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाच्या मदतीवर उभा राहिलेला भाजप, ‘संधीसाधू पक्ष’ अशी ओळख असलेला राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष यात एक चांगला पर्यायी पक्ष हवाय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची विचारधारा पूर्णपणे संपवलीय. राष्ट्रवादीवाले सत्ता घेऊन सेटलमेंट करतात. तुम्ही तर सत्ता न घेताही सेटेलमेंट करता असा आरोप तुमच्यावर सातत्याने होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका बदनाम होऊनही किमान शेतकरी प्रश्नावर बोलतो, महिला अत्याचारावर बोलतो. सामान्य माणूस हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत असतो. तुम्ही अनेक कलाकारांना, खेळाडूंना मार्गदर्शन करत असता. आता एकदा स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा. या सिंहावलोकनातून काही चांगले साध्य झाले तर आम्हाला आनंदच वाटेल.

- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092