Tuesday, July 17, 2018

ओवीचं पुनरूज्जीवन करणारा अवलिया!


आज जर संत ज्ञानेश्वर महाराज असते तर?

तर कदाचित त्यांनाही आजच्या प्रकाशकांनी, समीक्षकांनी सांगितलं असतं, ‘‘बाबा रे! ही असली पुस्तकं लिहिण्याचं तुझं वय नाही. काहीतरी हलकफुलकं लिही!’’

असं वाटण्याचं कारण म्हणजे आमचे राजगुरूनगर येथील प्राध्यापक मित्र दादासाहेब मारकड! 

मारकडांनी एक अचाट काम केलंय. त्याबद्दल खरंतर त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला हवं; पण त्यांच्या नशिबीही उपेक्षाच येतेय. कलावंतांची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय असल्यानं त्याचं मारकडांना फारसं वैषम्य वाटत नाही पण आपल्या मुर्दाड मानसिकतेचं प्रतिबिंब मात्र ठळकपणे दिसून येतं.

वाचकमित्रांना वाटत असेल कोण हे मारकड? आणि त्यांनी असा कोणता पराक्रम केलाय...?

व्यवस्थेच्या नकारात्मक मानसिकतेमुळंच मारकडांचा ‘पराक्रम’ वाचकांपर्यंत गेला नाही आणि त्यामुळं त्याचा दोष त्यांना देता येणार नाही.

दादासाहेब मारकड या अवलियानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं तब्बल 1104 पानांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय. त्यात एकूण 82 अध्याय आहेत.

याचं फलित काय हे सांगितल्यास कोणताही माणूस हादरून जाईल.

काही कीर्तनकारांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले की, ओवी हा साहित्यप्रकार केवळ संतांनी वापरलाय. यात लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

काहींनी सांगितलं, आजच्या काळात ओव्या कोण वाचणार? हा साहित्यप्रकार केव्हाच कालबाह्य झालाय...

त्यांना ओळखणारे काहीजण म्हणाले, तुम्ही भुगोलाचे प्राध्यापक आहात. चांगलं शिकवता. मग घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचे असे उद्योग करण्यापेक्षा अभ्यासक्रमाची पुस्तकं लिहा. निदान चार पैसे तरी मिळतील!

मात्र ज्यानं काळावर मोहोर उमटवणार्‍या छत्रपती शिवरायांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय तो हरहुन्नरी लेखक अशा प्रवृत्तीला काय भीक घालणार? त्यांनी पदरचे जवळपास अडीच लाख रूपये खर्च करून हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणार्‍या संस्था, संघटनांनी, राजकीय पक्षांनी आणि सामान्य मराठी माणसानं मात्र त्यांची कदर केली नाही. वारंवार प्रती पाठवूनही कोणत्याही वृत्तपत्रांनी या पुस्तकाचा परिचय दिला नाही. विक्रेत्यांनी तर विक्रीसही नकार दिला.

इतकं सारं होऊनही दादासाहेब डगमगले नाहीत.

त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत हे पुस्तक स्वतः पोहचवलं. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताहात या ‘शिवायन’चं पारायण करण्यात आलं. भजनी मंडळातल्या लोकांनी त्याला चाली लावल्या. ज्या कीर्तनकारांनी सांगितलं की, दादा मारकडांना ओवीबद्ध ग्रंथ लिहिण्याचा अधिकार नाही त्याच ठिकाणी या ग्रंथाची सात-सात दिवसांची पारायणं झाली.

एकनाथ महाराजांच्या ‘भावार्थ रामाणण’पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यासाठी अहोरात्र अभ्यास केला. ‘ओवी छंद’ समजून घेण्यासाठी त्यांनी संत महिपती महाराजांपासून अनेकांचे अनेक ग्रंथ सातत्यानं अभ्यासले. ‘ओवी ही फक्त धार्मिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली. इतिहासातील महापुरूषांचे जीवन आणि त्यांचे ऐहिक कार्य मांडण्यासाठी ओवीचा वापर झाला नाही’ याची खंत त्यांना वाटते. दादासाहेबांचे बंधू विनायकमहाराज मारकड यांनी त्यांना या लेखनासाठी उद्युक्त केले. मग त्यांची गाडी सुसाट सुटली. 

‘शिवायन’नंतर त्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज, छत्रपती संभाजीमहाराज यांचेही ओविबद्ध चरित्र साकारले आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांचे असेच चरित्र लिहिण्यास सुचवले आहे आणि त्याची तयारी त्यांनी सुरू केलीय.

दादासाहेब सांगतात, ‘शिवायन’ हा ग्रंथ लिहिताना मी त्यात एकरूप झालो होतो. त्यावेळी संभाजीराजांच्या नावानं राजकारण करणार्‍या एका संघटनेनं सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. तेे त्यांनी पूर्ण तर केलं नाहीच पण मला अडचणीत सोडून एकटं पाडलं. या ग्रंथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर प्रकाशन होणार होतं पण तो योग काही आला नाही. 

ओवीसारखे साहित्यप्रकार संपले असं म्हणणार्‍यांना ग्रामीण महाराष्ट्र कळलाच नाही. आजही खेड्यापाड्यात ओवीबद्ध ग्रंथाविषयी लोकांच्या मनात श्रद्धाभाव आहे. त्यामुळं उलट या साहित्यप्रकाराचं पुनरूज्जीवन करायला हवं. ते काम दादासाहेब मारकड मोठ्या नेटानं करीत आहेत. त्यांच्या पत्नी आणि उत्तम कथाकार जयश्री मारकड यांची त्यांना समर्थ साथ मिळत आहे. त्यामुळं जमाना काय म्हणतोय यापेक्षा आपली माणसं आपल्यासोबत असल्यानं काहीतरी भव्यदिव्य साकारू असं त्यांना वाटतं.

हा अद्वितीय ग्रंथ सिद्धीस नेताना त्यांना अनंत अडचणी आल्या. बरंच हलाहल पचवावं लागलं. मराठ्यांच्या मुलखातलं अमर महाकाव्य साकारताना हे होणारच हे त्यांनी गृहित धरलं होतं. 

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे तर मराठी माणसाचे पंचप्राण! दादासाहेबांचं विश्‍वही याभोवतीच फिरतं. अत्यंत चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्ती असल्यानं त्यांनी सत्याची कास सोडली नाही. लेखन करताना काहीजणांकडून दिशाभूल झाली, चुकीची माहिती मिळाली मात्र मी त्याच्या खोलात जाऊन सत्याचा तळ गाठतोय असं ते सांगतात. माणसानं हजार चुका कराव्यात पण एकच चूक हजारवेळा करू नये यावर त्यांचा विश्‍वास आहे. म्हणूनच अनावधानानं काही गोष्टी उशिरा कळल्या तरी ते सत्य स्वीकारण्याचं धाडस त्यांच्याकडं आहे. 

ज्यांना छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि चरित्राचा अभ्यास करायचाय त्यांनी हा ग्रंथ अवश्य वाचावा. दादासाहेब मारकड यांची त्यामागची साधना मोठी आहे. 

सध्या लोककवी, रानकवी, प्रेमकवी, महाकवी अशी बिरूदं लावायची एक ‘फॅशन’ झालीय. म. भा. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणं 
कोण लेकाची कोणाची देशसेवा पाहतो!
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो! 

असा काहीसा प्रकार सुरू आहे. साहित्यिकांचे कळप झाल्यानं त्यात जो सहभागी होत नाही तो जाणिवपूर्वक उपेक्षित ठेवला जातो. त्याला अनुल्लेखानं मारण्यात अनेकजण वाकबगार आहेत. ही कंपूशाही भेदून मराठी साहित्यातील सकस काही स्वीकारायचं असेल तर दादासाहेब मारकड यांच्यासारख्या धडपडणार्‍या प्रतिभावंतांची कदर करायला हवी.

मुख्य म्हणजे त्यांचा ‘मी कोणी फार मोठा लागून गेलोय’ असा आविर्भाव अजिबात नाही. त्यांचा सतत अभ्यास सुरू असतो. 

बहुजन समाजातला एक माणूस पुढे येऊन ‘शिवायन’सारखं  ओवीबद्ध महाकाव्य लिहितो याची इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद घेतली जाईल. ती घेताना मराठी माणसाच्या कद्रूपणाचं दर्शन घडू नये इतकंच! म्हणूनच दादासाहेब मारकड यांच्या या अवाढव्य कार्याची दखल घेतानाच त्यांच्या भावी उज्ज्वल लेखन कारकिर्दीस शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक पुण्य नगरी, ८ जुलै २०१८)

Monday, July 16, 2018

वर्चस्ववादाला आव्हान!


मागच्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी परीक्षक होतो. त्यात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाला मी पुरस्कार दिला. त्यावेळी  विश्वंभर चौधरी नावाच्या एका विदुषकाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे होते की, एका हिंदुत्त्ववाद्याच्या पुस्तकाला पुरस्कार दिलाच कसा? हे पुस्तक वाचायचीही त्यांना गरज वाटली नव्हती. शेवडेंनी लिहिलंय ना? मग त्यात काय वाचायचं? असा काहीसा सूर होता. असाच प्रकार मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्याबाबतही  सातत्यानं घडतोय. सोनवणी यांनी लिहिलंय ना? मग ते केवळ हिंदू धर्मात फूट पाडायचंच काम करतात. त्यांचं या विषयावरील लेखन कशाला वाचायचं असा अपप्रचार केला जातो.

हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे संजय सोनवणी यांचं ‘हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास’ हे पुस्तक नुकतंच पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केलंय. या पुस्तकात त्यांनी जे लिहिलंय त्यावर मोठी चर्चा होऊ शकते! किंबहुना तशी चर्चा व्हायला हवी. लोकमान्य टिळक यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक रथीमहारथींचे सिद्धांत संजय सोनवणी यांनी सप्रमाण खोडून काढले आहेत. हिंदू आणि वैदिक यांच्यातील फरक माहीत नसणार्‍यांना किंवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित ठेऊ इच्छिणार्‍यांना हे पटणारे नाही. मात्र ज्यांना अभ्यास करायचाय, ज्ञान मिळवायचंय, सत्य शोधायचंय त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं.

आद्य शंकराचार्यही वैदिक नाहीत हे सोनवणी यांनी यात मांडलं आहे. आपला इतिहास पुराणकथांनी गढूळ झालेला असताना आणि आपण जे ऐकत आलोय तेच सत्य मानणार्‍यांना कदाचित हे रूचणार नाही; पण सत्यापासून फारकत का घ्यावी? सोनवणी यांच्यावर तोंडसुख घेणारे काही महाभाग त्यांच्या मुद्यांचा प्रतिवाद करून ते खोडून काढू शकत नाहीत आणि हे सत्यही स्वीकारत नाहीत. पुराणातली वाणगी (वांगी नव्हे!) पुराणात म्हणून काहीजण दुर्लक्षही करतील; पण याच्या तळाशी जाऊन चिकित्सा करायलाच हवी. 

यापूर्वी त्यांनी ‘जातीसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तकही लिहिले. ‘चपराक’ने प्रकाशित केलेले ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकही सिद्धीस नेले. घग्गर नदीलाच सरस्वती नदी समजणार्‍यांना सणसणीत चपराक दिली. या सर्व पुस्तकांचा सार म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे. आपल्याकडे संस्कृतलाच आद्य भाषा, देवभाषा समजून आपण मराठीला दुय्यम स्थान दिले आहे. यावर ‘जिच्यावर संस्कार झाले ती संस्कृत’ इतकी साधी सोपी व्याख्या करून सोनवणी यांनी प्रकाश टाकला आहे. जर संस्कृत ही आद्य भाषा असती तर आपल्या खेड्यापाड्यातील म्हातारी-कोतारी लोक संस्कृतच बोलली नसती का? असा बिनतोड सवालही ते करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं नौटंकी करणार्‍या चमकोछाप लोकांनी हे समजून घ्यायला हवं.

आर्यवंश श्रेष्ठत्ववादाचा जन्म म्हणजे काळीकुट्ट किनार, हे मत ते ठामपणे मांडतात. रामायण-महाभारताचा काळ हा वैदिक भारतात येण्यापूर्वीचा हेही ठासून सांगतात. हे कुणाला पटेल किंवा पटणार नाही पण आपल्याला सत्य स्वीकारावेच लागेल. भारतीय संस्कृतीचा धावता आढावा, असूर संस्कृती, वेदपूर्व भारतीय असूर संस्कृती, वेदपूर्व तत्त्वज्ञान व विकास, वैदिक धर्माची स्थापना कोठे झाली?, सिंधू-घग्गर संस्कृतीची भाषा, बौद्ध-जैन ते सातवाहन काळ, वैदिक भाषा, पाणिनी, मनुस्मृती आणि कौटिल्याचा काळ, श्रेणी संस्था, विकास, उत्कर्ष, अधःपतन आणि वैदिक वर्चस्वाची सुरूवात आणि ब्रिटीश काळ - वैदिक वर्चस्वावर अधिकृत शिक्कामोर्तब अशा 11 प्रकरणातून त्यांनी हा व्यापक विषय अत्यंत अभ्यासपूर्ण रीतिने मांडला आहे. हिंदू धर्मावर होणारे आक्रमण, वैदिकांचा वर्चस्ववाद याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यामुळे वेदप्रामाण्याच्या नावावर काहीही ठोकून देणारे आपोआप उघडे पडले आहेत. 

‘सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच’ या सिद्धांताला संजय सोनवणी यांनी तडा दिला आहे. वैदिक व पाश्‍चात्य विद्वानांच्याच मतांवर अवलंबून असलेल्यांनी सत्य कधी पुढे येऊच दिले नाही. आपल्या नसलेल्या अस्मिता आणि खोटा अहंकार कुरवाळत त्यांनी हिंदू आणि वैदिक यांच्यात मोठी गल्लत केली. हा सगळा मामला काय हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचण्यावाचून गत्यंतर नाही. मनुस्मृती नेमकी का आणि कुणासाठी याबाबतचेही विवेचन या पुस्तकात आले आहे. सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भाषिक स्थित्यंतराचा एक मोठा पट उलगडून दाखवणे तसे जिकिरीचे काम. त्यातही पुस्तकाच्या केवळ 320 पानांत हे मांडणे म्हणजे तर शिवधनुष्यच! पण ते आव्हान संजय सोनवणी नावाच्या प्रतिभेच्या जागृत ज्वालामुखीने लिलया स्वीकारलं आणि ते इतिहासाशी, प्रामाणिकपणाशी तडजोड न करता, त्याच्याशी प्रतारणा न करता पूर्णत्वासही नेलं. आपल्या संस्कृतीची पाळंमुळं समजून घ्यायची असतील तर कोणतेही पूर्वग्रह न बाळगता हे पुस्तक तटस्थपणे वाचायला हवं, त्यावर चिंतन करायला हवं. 

हिंदू आणि वैदिक हे दोन्ही धर्म वेगळे कसे आहेत याचा पुरातन काळापासूनचा त्यांनी घेतलेला धांडोळा कुणालाही अचंबित करणारा आणि अभ्यासकांना व्यापक दृष्टी देणारा आहे. वैदिक धर्माचा आणि हिंदू धर्माचा काळ यातील तफावतही त्यांनी अधोरेखित केली आहे.  सूर आणि असूर संस्कृतीतील फरक सांगितला आहे. पौराणिक कथामधून सत्याशी घेतलेली फारकत दाखवून दिली आहे. दोन्ही धर्मातील श्रद्धा, अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी परंपरा, आचार-विचार, संस्कृती, संघर्ष या सर्वाची नेटकी आणि नेमकी मांडणी त्यांनी या पुस्तकात केलीय. तंत्र-मंत्र, देवादिकांच्या प्रतिमांचे पूजन, त्यातून बनवली गेलेली मिथके यावरही त्यांनी प्रभावी भाष्य केलंय. भाषा गटांचे प्रश्‍न मांडलेत. या भाषांचे जाळे कसे निर्माण झाले, प्रांतिक भाषा कशा विस्तारत गेल्या हेही साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. 

‘विषमतेचे तत्त्वज्ञान असलेले वैदिक धर्मतत्त्व की समतेचे स्वतंत्रतावादी तत्त्वज्ञान असलेले हिंदू धर्मतत्त्व ही निवड हिंदुंना डोळस व नीटपणे करावी लागेल. वैदिकांनाही आपल्याच धर्माचा पुनर्विचार करणे आवश्यक बनून जाते’ असे मत संजय सोनवणी या पुस्तकातून मांडतात. त्यावर प्रत्येकानं विचार केलाच पाहिजे.

हिंदू धर्म आपल्या कृषी संस्कृतीतून जन्माला आलाय आणि अफगाणिस्तानात स्थापन झालेला व विस्थापितांच्या माध्यमातून धर्मप्रसारासाठी आलेला वैदिक धर्म आपल्याकडे नंतर स्थिरावलाय याकडं ते लक्ष वेधतात. या पुस्तकाचा गाभाच हा असल्यानं या दोन्ही धर्मधारांची चिकित्सा त्यांनी या पुस्तकाद्वारे केलीय. वैदिकांचा वर्चस्ववाद कसा वाढत गेला आणि त्यात हिंदू धर्म कसा अडकत गेला हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. धर्मइतिहासावर सुस्पष्ट प्रकाश टाकतानाच वर्चस्ववाद झुगारून देण्याचं मोठं धाडस संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे दाखवलं आहे. वैदिक-अवैदिक या विषयाचा ध्यास घेऊन, अहोरात्र अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. आम्ही मित्रमंडळी त्यांना गंमतीनं ‘वैदिक धर्माचे शंकराचार्य’ म्हणत असलो तरी या विषयाची व्याप्ती आणि त्यांचा त्यातील व्यासंग किती मोठा आहे ते हे पुस्तक वाचल्यावर समजते. त्यांच्या भावी लेखन प्रवासाला आणि साहित्यातील संशोधनाला आमच्या शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक 'पुण्य नगरी, १५ जुलै २०१८)

Monday, July 2, 2018

संमेलाध्यक्षपदी ‘दादा’च हवेत!


साहित्य संमेलन हा मराठी भाषेतील मोठा साहित्योत्सव आहे.  आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकशाही व्यवस्थेप्रमाणे निवडून न येता ‘निवडून’ देण्याचा घाट साहित्य महामंडळाने घातला आहे. म्हणजे यापुढे निवडणूक न घेता संमेलनाध्यक्ष सर्वसहमतीने निवडून देण्याचे ठरवले जात आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर साहित्य आणि संस्कृतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आदींना सढळ हाताने मदत करण्याचा त्यांचा गुण सर्वश्रूत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले असले तरी त्यातील एकही सिद्ध झालेला नाही. प्रत्येक गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडले जात असल्याने त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे पवार साहेब आरोप सहन करण्यास पुरते निर्ढावलेले आहेत. संमेलनाध्यक्षांच्या निवडप्रक्रियेत त्यांचा असलेला वाटा आजवर अनेकदा दिसून आलेला आहे. आता थेट ते सांगतील तो अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पवार साहेब हा महाराष्ट्राचा आणि देशाचाही चालताबोलता इतिहास आहे. साहित्यात वैचारिक भ्रष्टता आलेली असताना साहित्यिक अकारण राजकारण करतात आणि राजकारणी साहित्यात रमतात हे चित्र सध्या सर्रास दिसते. त्यामुळे पवारांनी संमेलनाध्यक्ष सुचवला तर त्याचे स्वागतच करायला हवे. 

या साहेबांनी त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी सुचवले तर कसला बहार येईल?  संमेलनाध्यक्षपदी दादा म्हटल्यावर साहित्य क्षेत्राबरोबरच प्रसारमाध्यमे, सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्ते, नेते यांच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला उधाण येईल. साहेबांचे ‘एकेकाळचे’ कार्यकर्ते असलेल्या रामदास आठवलेंना कवी संमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दोन शक्तिंचे मनोमिलन झाले तर ते त्या दोघांसाठीही पोषकच ठरणारे आहे. 

गेल्या काही वर्षातील उथळ संमेलनाध्यक्ष पाहता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘खमक्या’ असायला हवा. त्यासाठी तूर्तास तरी आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आहे, ते म्हणजे अजित पवार यांचे! अजित पवार यांच्यासारखा नेताच मराठी साहित्याला आता दिशा देऊ शकतो.

एकतर साहित्य आणि राजकारण यात आता तसा फारसा फरक शिल्लक राहिलेला नाही. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. त्यातही साहित्यिक शोधून काढावे लागतात. प्रत्येकाला ‘करंगुळी’ दाखवत त्यांच्याकडून पुरेशा मतपत्रिका मिळवणे हे दादांच्या कार्यकर्त्यांना सहज शक्य झाले असते. आता तर त्याचीही गरज पडणार नाही. साहित्यातील संस्था आणि त्यांच्या घटकसंस्था दादांच्या नावाला विरोध करण्याइतक्या परिपक्व नाहीत. त्यामुळे दादा संमेलनाध्यक्ष झाले तर त्यांना सध्याच्या राजकीय उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडता येईल. त्यांना नवी आणि प्रतिष्ठेची ओळखही प्राप्त होईल. जितेंद्र आव्हाडासारखा नेता मतपत्रिका गोळा करण्यासाठी पाठवला तर एरवीही हा मार्ग सुकर झाला असता. 

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे मोलाचे कार्य नामदार अजित पवारांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात तुकाराम महाराज आणि काही प्रमाणात रामदास स्वामी कळण्यास कारणीभूत ठरलेले दादा हेच यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. याच महिन्यात (म्हणजे 22 जुलै) दादांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन दादांच्या अध्यक्षपदाची तयारी सुरू करायला हवी. घुमानच्या संमेलनातील पंचपक्वान्नाचे कोडकौतुक करणार्‍यांना आणि पी. डी. पाटलांनी वाटलेल्या खिरापतीची सातत्याने चर्चा करणार्‍यांना दादा सणसणीत चपराक देऊ शकतात. साहित्यिकांना बिअरपासून ते रेड वाईनपर्यंत आणि कोंबड्या-बकर्‍यापासून ते मराठमोळ्या पुरणपोळ्यापर्यंत जे ‘हवे ते’ उपलब्ध करून देण्याची ‘ताकत’ या नेत्यात आहे. 

अजित पवार अध्यक्ष होणार असतील तर महामंडळाला निधीसाठी पायपीट करावी लागणार नाही. घुमानच्या संमेलनात व्यासपीठावर महामंडळाच्या अध्यक्षांची ‘नथ’ दिसली पण संमेलनाचे ‘नाक’ (अध्यक्ष) मागे दडले होते’ अशी टीका आम्ही केली होती. अजित पवार अध्यक्ष झाले तर जगबुडी झाली तरी प्रसारमाध्यमे सविस्तर वार्तांकन करतील. महामंडळाच्या अध्यक्षापेक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला जास्त मान मिळेल. आतापर्यंत प्रत्येक संमेलनात राजकारणी असतातच आणि ते संमेलनाध्यक्षांचे औपचारिकपणे गोडगोड कौतुक करून निघून जातात. संमेलनाध्यक्षही तेच तेच विचार रेटून नेत असतात. या असल्या थिल्लर प्रकाराची मराठी भाषेला आता गरज नाही. मराठीला आता खमकेपणे बोलणारा, प्रसंगी साहित्यिकांचीही कानउघाडणी करणारा, भाषेचा ठसा उमटवणारा, त्यातील रांगडेपणा सिद्ध करणारा अजित पवार यांच्यासारखा अध्यक्ष हवाय. ‘शिव्या देण्यात माझी पीएचडी आहे’ असे मोठ्या साहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे. काकणभर त्यांच्या पुढे जाऊन हा वारसा चालवणार्‍या त्यांच्या या शिष्याची कदर मराठी बांधवांनी केलीच पाहिजे. 

शरद पवार यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक ‘तत्त्वा’नुसार आजवर अनेक संमेलने झाली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही त्यांच्या इशार्‍यावर ‘नेमले’ गेले आहेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय संमेलनाचे पानही हलत नाही. त्यांच्या सहभागाशिवाय संमेलनाचे व्यासपीठ रितेरिते वाटते. मात्र सत्ताबदल होताच रंगबदलूपणा करत महामंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. ‘सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षाची निवड’ ही त्यासाठी एक चांगली संधी आहे. या निमित्ताने का होईना पण अजित पवारांना थोडीफार किंमत मिळेल. त्यामुळे यंदाच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी दादांच्या नावाचा आग्रह जरूर धरावा! 
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092