Saturday, January 28, 2017

कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट

भाऊ तोरसेकर हे गेली पन्नासएक वर्षे मराठी पत्रकारितेत कार्यरत आहेत. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून त्यांच्या पत्रकारितेला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील एक सडेतोड व परखड राजकीय विश्‍लेषक म्हणून त्यांची ओळख आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक लिहिले. शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन त्यांनी वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या बड्या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. केवळ शरद पवारांची तळी उचलण्यासाठी पळशीकरांसारख्या प्राध्यापकांनी या पुस्तकात जी खटपट, लटपट केली ती केविलवाणी आहे. त्यामुळेच यातील सत्य मांडण्याच्या उद्देशाने भाऊंनी अतिशय मुद्देसूदपणे, पुराव्यासह ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ची, व्होरा-पळशीकर या दांभिक  आणि ढोंगी प्राध्यापकांची आणि एकंदरीत वैचारिक भ्रष्टतेची केलेली चिकित्सा म्हणजे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट.’ पत्रकारितेचे विद्यार्थी, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते-नेते, सत्याची चाड असणारे अभ्यासक आणि ज्या कुणाला महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचाय त्या प्रत्येकाने भाऊंचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक वाचायलाच हवे.
‘अभिनव वाचक चळवळ’ अशी बिरूदावली मिरवणार्‍या ‘ग्रंथाली’ने साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी वाचकांना चक्क ‘गिर्‍हाईक’ केले आहे. भाऊ लिहितात, ‘झटपट पुस्तकांचे प्रकाशन करणारे आणि वारेमाप कमाई करणारे प्रकाशक भारतात वा मराठी भाषेत कमी नाहीत; परंतु वाचकांचा विश्‍वास संपादन केल्यावर ब्रँडचा माल म्हणून त्याच्या गळ्यात भेसळीचा, दुय्यम दर्जाचा माल बांधण्याचा धंदा मराठीत बहुधा आजवर कुठल्या प्रकाशनाने केला नाही. अगदी ‘धंदा’ म्हणून प्रकाशन व्यवसाय करणार्‍या कंपन्या देखील असा फ्रॉड, भेसळीचा माल विकत असल्याचा निदान मराठीत अनुभव नाही. असे असताना केवळ ‘वाचकांचीच चळवळ’ म्हणून उदयास आलेल्या ‘ग्रंथाली’ने वडापाव, भाजीपाव, झुणका-भाकर, बर्गर, पिझ्झा स्टाईलने ग्रंथाचा धंदा करावा काय? कसदार, दर्जेदार, गुणवान, अभिरूचीपूर्ण पुस्तकांचा हवाला देऊन ‘अभिनव वाचक चळवळ‘ म्हणवून घेणार्‍या ‘ग्रंथाली’ने राज्यात सत्तांतर होताच वाचकांच्या मनातील उत्कंठा, कुतूहल, उत्सुकतेचा लाभ उठवण्यासाठीच ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे झटपट खपणारे पुस्तक काढून वाचकांची घोर फसवणूक करावी काय?’
सुहास पळशीकर हे ‘राजकीय अभ्यासक’ म्हणून सगळीकडे मिरवत असतात. मात्र त्यांनी त्यांच्या या पुस्तकात धादांत खोट्या, न घडलेल्या घटना बिनधास्तपणे घुसडल्या आहेत. त्यात अभ्यास, संशोधन, सत्य किंवा कारणमीमांसेचा लवलेशही नाही. यातील खोटेपणा, चुकीचे संदर्भ, घटना, बनावट गोष्टी यांची यादीच भाऊंनी तयार केली आणि ती ग्रंथालीचे प्रकाशक दिनकर गांगल यांच्याकडे दिली. ‘पुढच्या आवृत्तीत दुरूस्त करू’ असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली, पण त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होऊनही चूक सुधारली नाही. उलट ‘तुमचेही एखादे पुस्तक प्रकाशित करू’ असे लांच्छनास्पद आमिष ग्रंथालीने दाखवले. या पुस्तकाच्या लेखकांनीही ‘या दिवसात असे स्पष्टपणे, सडतोडपणे, निर्भिडपणे एखाद्या लेखनाची चिकित्सा होणे किती दुरापास्त झाले आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. म्हणून तुमचे मनःपूर्वक आभार मानणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. ज्या वैचारिक संस्कृतीचा आग्रह आपण सर्वजण धरतो आहोत, त्याचा तुमचे पत्र म्हणजे एक परिपाठच आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. तुमची आमची यापूर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशित होण्यापूर्वीच दाखवले असते. परंतु असे होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्‍या व तुम्हाला न पटणार्‍या मुद्यांची जंत्री दिली आहे. ते पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यास काही दिवस लागतील. म्हणून आम्हाला पत्र मिळाल्या मिळाल्या हे प्राथमिक उत्तर तुम्हाला पाठवित आहोत. आम्ही तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत व लवकरच त्यास योग्य ते उत्तर आम्ही तुम्हाला पाठवू’ असे पत्र भाऊंना पाठवले.
19 ऑगस्ट 1997 ला हे पत्र त्यांनी लिहिले. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्या झाल्या. लेखक आणि प्रकाशकांनी रग्गड पैसा कमावला. मात्र त्यांच्या या धंद्यासाठी ते चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘संदर्भ पुस्तक’ म्हणून वापरले जाते. केवळ पवारांची खुशमस्करी करायची आणि शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांना ‘टार्गेंट’ करायचे यासाठी लिहिलेल्या या पुस्तकामुळे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भाऊंनी या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले; मात्र तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वा संबंधितांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. शिवसेनेची अकारण होणारी बदनामी पुराव्यासह पुस्तकरूपात मांडूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा अन्य शिवसैनिकही गप्प का, तेही कळायला मार्ग नाही. वास्तविक केवळ हितसंबंध जोपासण्यासाठी सुहास पळशीकरांसारख्या प्राध्यापकाने जो लाळघोटेपणे केला त्याबद्दल त्यांना गंभीर शिक्षा व्हायला हवी आणि त्यांच्या पुस्तकावर बंदीही यायला हवी. जागतिक दर्जाचे विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असे अशास्त्रीय, चुकीची मांडणी करणारे, शब्दाशब्दाला खोटे संदर्भ देणारे पुस्तक ‘संदर्भ’ म्हणून वापरले जाणे हे आपणा सर्वांचे मोठे अपयश म्हणावे लागेल.
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’मधील चुकीची आणि परस्परविरोधी माहिती असलेले मुद्दे भाऊंनी तपशीलवार दिलेत. इतकेच नाही तर त्यातील नेमके सत्य काय होते हेही त्यांनी दिलेय. त्यामुळे राजकीय अभ्यासकांनी हे वाचलेच पाहिजे. चुकीच्या, धडधडीत खोट्या माहितीचा भाऊ तोरसेकर यांनी पद्धतशीर पंचनामा केलाय. ही वैचारिक भ्रष्टतेची चिकित्सा झाली असली तरी रोग अजून पूर्णपणे बरा झाला नाही. पळशीकरांनी बेलाशक खोट्या घटना, न घडलेले प्रसंग आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे उल्लेख व संदर्भ त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. ही माहिती त्यांनी कुठून, कशी मिळवली आणि ती कोणत्या हेतूने वापरली याचा खुलासा होणे गरजेचे आहे. गेली वीस-बावीस वर्षे आपले राज्यशास्त्राचे विद्यार्थी हा चुकीचा इतिहास गिरवत आहेत. ‘तपशीलाला फारसा अर्थ नाही, हा आमचा ‘थिसीस’ आहे, तपशील दुय्यम आहे, त्यात चुका, गफलत असल्याने बिघडत नाही’ असे निर्लज्जपणे सांगणार्‍या पळशीकरांवर खरेतर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. भाऊ तोरसेकर यांनी त्यांचे बेगडीपण पुराव्यासह पुढे आणले आहे. चोरांना पकडण्यासाठी भाऊ सर्वांना जागे करत आहेत; मात्र आपण सुस्तावलोय. इथली व्यवस्था, यंत्रणा, कायदा या वैचारिक भ्रष्टतेची दखल घेत नसेल तर आता शिवसेनेने पुढाकार घेऊन त्यांची बदनामी थांबवायला हवी आणि सत्यही पुढे आणायला हवे. मागच्या सत्तांतराच्या वेळी हा इतिहास लिहिला गेला. आता अठरा-वीस वर्षाने पुन्हा सत्तांतर घडले तरी तोच चुकीचा इतिहास आपण गिरवत आहोत. यातील ‘चोर’ ते उघडपणे मान्यही करत आहेत. तरी त्यांना ‘शिक्षा’ देण्याऐवजी आपण त्यांचा ‘गौरव’च करतोय. शिवाय हे अनेक वृत्तवाहिन्यांवरून, वृत्तपत्रांतून प्रामाणिकपणाचे डोस पाजत असतात. हे म्हणजे ‘वेश्येने पतीव्रता धर्म’ शिकवण्यासारखे आहे. म्हातारी कोंबडं झाकून ठेवण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी सत्य फार काळ लपून राहत नाही हेच खरे! भाऊंनी या सत्यावर प्रकाश टाकला आणि प्रकाशक या नात्याने आम्हाला ‘चपराक’च्या माध्यमातून तो वाचकांसमोर आणता आला. आता वाचकांनीच संबंधितांना योग्य तो धडा शिकवायला हवा!
कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
‘चपराक प्रकाशन,’ पुणे (7057292092)
पाने - 148, मूल्य - 150 रूपये
(महत्त्वाचे - डोंबिवली येथे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाऊंचे हे पुस्तक ‘चपराक’च्या बी 53 आणि 54 या ग्रंथदालनात अवघ्या शंभर रूपयात मिळेल.)

1 comment:

  1. सडेतोड व पर्दाफाश लेखन!

    ReplyDelete