Wednesday, January 4, 2017

ही तर मेकॉलेचीच अवलाद!

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

असे महन्मंगल काव्य लिहिणारे राम गणेश गडकरी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासारख्या महानगरातून यापूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला होता. आज संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकून पुणे शहराचा ‘सिरीया’ झालाय हे काही अपप्रवृत्तींनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, पुण्यातील साहित्यिक, कलावंत, प्रकाशक यांनी तातडीने एकत्र येऊन या प्रवृत्तींचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडचे संघटनेतून राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर असे प्रकार घडणे अपेक्षित असले तरी ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रावरील हा सांस्कृतिक बलात्कार तमाम मराठी माणसांनी एकत्र येऊन थांबवायला हवा.
‘विचारांची लढाई विचाराने लढायला हवी’, हे गुळगुळीत वाक्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्‍यांची तालिबानी वृत्तीच यातून दिसून येते. उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे इतिहास, नाटके, कथा-कादंबर्‍या लिहिल्या जातात. मुळात हे लिखाण करणारे सर्वजण इतिहास संशोधक असतातच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कलाकृतीत काहीना काही आक्षेपार्ह असे असतेच. वाचकांची त्या त्यावेळची मानसिकता आणि बदलत्या काळानुसार ते लेखन कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. राम गणेश गडकरी यांनी त्या काळात लिहिलेले ‘राजसंन्यास’ हे नाटक तसे अपुरेच राहिले. या नाटकातील जिवाजी कलमदाने या पात्राने शिवाजी राजांची बदनामी केल्याचे आत्ता म्हणजे शंभरहून अधिक वर्षांनी काही जणांना उमजले. कुठून ना कुठून महापुरूषांची वादग्रस्त विधाने शोधायची आणि त्यावरून खल करत रहायचा हा काही समदु:खी लोकांचा उद्योगच होऊन बसलाय. जिवाजी कलमदाने हे पात्र या नाटकात देहू या पात्राजवळ फुशारकी मारताना छत्रपती शिवरायांविषयी वाईट बोलते. किंबहुना या जिवाजीने समर्थ रामदास स्वामींची यथेच्छ नालस्ती केली आहे. शिवरायांच्या कर्तृत्वावर संशय घेताना तो रामदास स्वामी यांच्याविषयी वाटेल ते तारे तोडतो. मुळात हे खलपात्र भ्रष्ट आहे. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशा ठेवता येतील? रावणाने रामाची महती गावी किंवा अफजलखानाने शिवरायांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे नाही का?
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरूनही आत्तापर्यंत झालेली झुंडशाही आपण बघितलेली आहेच. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’वरून राडा झाला. आता ‘राजसंन्यास’ या अर्धवट नाटकातील एका पात्राच्या संवादाने अकारण महाराष्ट्र पेटवला जात आहे. कोणत्याही साहित्य कृतीतून आपल्याला हवा तितका भाग सोयीस्करपणे घेतल्यास रामायण, महाभारत अशा महाकाव्यावरूनही राष्ट्र पेटवले जाऊ शकते.
संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याने ते नाट्यरसिकांच्या आणि वाचकांच्या हृदयातून मुळीच जाणार नाहीत. देशातील सर्वच साहित्यिकांचे, विचारवंतांचे, शास्त्रज्ञांचे पुतळे काढून टाकावेत आणि केवळ राजकारण्यांचे पुतळे देशभर लावावेत, अशी अपेक्षा यानिमित्ताने साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी अतिशय हताशपणे व्यक्त केली. देशभर अनेक छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांचे पुतळे असताना त्यांचे विचार समाजमनावर प्रभाव पाडून गेेलेत असे म्हणता येणार नाही.
पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?
सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?

अशा आशयाची एक वास्तववादी कविता आपणा सर्वांना ज्ञात आहेच; मात्र महापुरूषांचे असे पुतळे काढून आपण आपल्या श्रद्धास्थानांना तडा देतोय. ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता अशा ब्रिटीश सल्तनतचीही गडकरींना हात लावायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना गडकरींनी त्यांच्या अजरामर साहित्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या ‘एकच प्याला’तील तळीरामाचे वारसदार आज महाराष्ट्रात अकारण हैदोस घालत आहेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिले, त्याला तोड नाही.
‘जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’

असे म्हणणार्‍या गडकरींचा भगवा आजचा नव्हता. मराठी साहित्याचा विजयध्वज ठरणारा तो भगवा कुण्या एका पक्षाचा, कुण्या एका विचारधारेचा नव्हता.
‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’

असे गर्जून सांगणार्‍या गडकरींच्याबाबत आजच्या दरिद्री लोकांनी जे कारस्थान केले ते निश्‍चितच निंदणीय आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्याशी कसलेच देणे-घेणे नसलेल्या नीच लोकांचे हे काम आहे. लॉर्ड मेकॉले या ब्रिटीश शिक्षणतज्ज्ञाने त्यावेळी सांगितले होते की, ‘‘हिंदुस्तान हा सुजलाम् सुफलाम् देश आहे. या देशातून सोन्याचा धूर निघतो. इथल्या गुरूकुल शिक्षणपद्धतीमुळे इथली पिढी संस्कारशील आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव ओवाळून टाकणारे हे लोक प्रचंड श्रद्धावान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज्य करणे आपल्याला कदापि शक्य होणार नाही. बंदुकीच्या जोरावर हिंदुस्तान आपल्याला जिंकता येणार नाही. या देशावर राज्य गाजवायचे असेल तर इथली गुरूकुल शिक्षण पद्धत आधी नष्ट करा, यांच्या श्रद्धास्थानांना तडा द्या. यांची श्रद्धा कमकुवत झाली तरच ते डळमळीत होतील आणि त्यांच्यावर आपल्याला राज्य गाजवता येईल.’’ लॉर्ड मेकॉलेची औलाद शोभणार्‍यांनी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. लालमहालातून दादोजी कोंडदेवांंचा पुतळा काढणे असेल किंवा आज संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा काढणे असेल यातून मेकॉलेचीच वृत्ती दिसून येते.
‘कोणतीच भूमिका घ्यायची नाही’, ही एकच भूमिका साहित्यिक आणि विचारवंत इमानेइतबारे पार पाडत असताना साहित्यिक आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज आज रस्त्यावर उतरले आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सुप्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रविण तरडे, महेश मांजरेकर, सुनिल महाजन, डॉ. सतिश देसाई, योगेश सोमण अशा सर्वांनी संभाजी उद्यानात एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला आहे. ‘यानिमित्ताने राम गणेश गडकरी आजच्या पिढीला माहीत तरी होतील’ , असेही काहीजण सांगत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापासून अनेक दिग्गजांना घडविणारा गडकरीसारखा हिरा अशापद्धतीने प्रकाशात यावा, हे दुर्दैवी आहे.
आपल्याकडे औरंगजेब कायम चर्चेत राहतो मात्र संस्कृततज्ज्ञ असलेल्या दारा शुकोकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. कुपमंडूक वृत्तीच्या इथल्या विचारवंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सोयीस्कर असते. भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड असेल, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणे असेल किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणे असेल या सर्वांतून मेकॉलेची अवलाद पुन्हा कार्यान्वित झाल्याचे दिसून येते. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि देशाचे पंतप्रधान जातीभेद, धर्मभेद करू नका असे तळमळीने सांगत असतानाच आमच्या जातीय अस्मिता अधिक घट्ट होत चालल्यात.
गडकरींचा पुतळा काढून टाकणार्‍यांनीच यापूर्वी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही आक्षेप घेतले होते. वाघ्याचा पुतळाही त्यांनी काढून टाकला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी त्यांचे हे कारस्थान हाणून पाडले होत. दुर्दैव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच गडकरींचा पुतळा हटविण्यात आला. हा कट चार-दोन दिवसात शिजलेला नाही. संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्यावर असे अनेक विषय आहेत. त्यातूनच ते वेळोवेळी अनेक विखारी फुत्कार सोडतात. जून 2011 लाच संजय सोनवणी यांनी ‘राम गणेश गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे काय?’ हा लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात यायला इतकी आठवण पुरेशी आहे.
एकीकडे सामान्य माणसाची रोजची जगण्याची लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र जातीय विष पेरणे, श्रद्धास्थानांना तडे देणे हे काम सुरूच आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर हा पराभव जिव्हारी लागल्याने, सत्तेची ऊब मिळत नसल्याने काही नेते वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून ही अशी अराजकता माजवत आहेत. सुज्ञ मतदार येणार्‍या निवडणुकांमध्येही अशा विचारधारेला, अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना सणसणीत चपराक देईल हे वेगळे सांगायला नको.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’
7057292092

7 comments:

  1. सणसणीत चपराक...

    ReplyDelete
  2. जबरदस्त.... विचाराची विचारांशी लढण्याची वृत्ती नामशेष होत असताना आपण एक वैचारिक खिंड लढवत आहात......त्याबद्दल खुप शुभेच्छा...... नवतरुणांसाठी हे कार्य दिशादर्शक ठरेल...!

    ReplyDelete
  3. जबरदस्त.... विचाराची विचारांशी लढण्याची वृत्ती नामशेष होत असताना आपण एक वैचारिक खिंड लढवत आहात......त्याबद्दल खुप शुभेच्छा...... नवतरुणांसाठी हे कार्य दिशादर्शक ठरेल...!

    ReplyDelete
  4. शेवटी अशा प्रवृत्ती आपली ग्रेडच(b) दाखवतात.दुसरे काय

    ReplyDelete
  5. जबरदस्त आणि रास्त शब्दांत चपराक ......

    ReplyDelete
  6. जबरदस्त आणि रास्त शब्दांत चपराक ......

    ReplyDelete
  7. परखड आणि रास्त चपराक!

    ReplyDelete