Sunday, November 11, 2018

‘राहिलेलं’ राहूच द्या!

ज्यानं खूप काही उभं केलंय, सोसलंय, अनुभवलंय त्याचं बरंच काही करायचं राहून जातं! कारण त्याची स्वप्नं, त्याची ध्येयं, त्याचं क्षितिज सगळं काही अवाढव्य असतं. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याचा परिघ असून असून केवढा? इवलंसं आयुष्य! त्यात काय करणार आणि काय राहणार? तरीही ‘राहून गेलेल्या गोष्टीं’ची विचारणा होतेच...! कोणी एकदम असं काही विचारलं की आयुष्याचं सिंहावलोकन सुरू होतं. काय राहून गेलंय याचा शोध घेताना काय काय करामती केल्यात याही डोळ्यासमोर येतात आणि मग गंमत वाटते. असो. आज फक्त राहिलेल्या गोष्टीच सांगायच्यात.

मराठवाड्यातल्या चाकूर तालुक्यातलं हिंप्पळनेर हे माझं गाव. गाव तसं छोटसंच पण आडवळणाचं. सातवीत असताना ते सोडावं लागलं. त्यानंतर आयुष्याची दिशाच बदलली. संघर्षाशिवाय काही मिळत नाही, हे परिस्थितीनुरूप बसणार्‍या चटक्यांनी शिकवलं होतं. त्यामुळं भविष्यात काय करायचंय हे त्या नकळत्या वयातच ठरलं होतं.

हिंप्पळनेरला असताना घराजवळ असलेल्या विठ्ठल-रूकमाई मंदिरातील काकडआरतीच्या आवाजानं जाग यायची. मग ‘मंजन’ घेऊन दात घासायचे, चपलात पाय ढकलायचे आणि रानाकडं पळत निघायचं. पाच-सहा किलोमीटर पळत गेल्यावर कधी विहिरीत किंवा कधी डोहात मस्तपैकी पोहायचं. त्यानंतर रानातले ताजे अंजीर, बोरं, चारं, बिब्याची फुलं, जांब (पुणेरी भाषेत पेरू), मक्याची कणसं, कोवळ्या काकड्या, भुईमुगाच्या शेंगा, उडदाच्या-मुगाच्या शेंगा, ऊस असं काहीतरी घ्यायचं आणि ते खात सावकाश घर गाठायचं. घरी आल्याआल्या चुलीवरची गरमागरम भाकरी दुधात चुरायची आणि शेंगदाणा चटणीसोबत हादडायची. त्यानंतर शाळा. आमच्या गावाजवळ असलेल्या हणमंतजवळगा या गावाजवळ असलेले वीर हनुमान विद्यालय हे चार-पाच किलोमीटर अंतरावर! अर्थात तिथपर्यंत चालतच जायचं आणि चालतच यायचं. सुटीच्या दिवशी रानातील माळवं (भाजीपाला) काढायचा आणि आठवडी बाजारात विकायचा. सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्याचवेळी आमची जमीन गावकीच्या भांडणात गेली. क्षणार्धात सगळं होत्याचं नव्हतं झालं. निसर्गाच्या कुशीत वावरताना अचानक घाव बसला आणि गावाची नाळच तुटली. अजूनही हे बंध जोडता आले नाहीत. गावातलं ते मनसोक्त जगणं राहूनच गेलं. गावात काही कटू अनुभव नक्की आले. त्यामुळं मन विटलं... पण चांगुलपणाची शिदोरीही भक्कम होती. मायेच्या पदरात घेणारं गाव तुटलं ते तुटलंच!

त्यावेळची एक गंमत सांगाविशी वाटते. तेव्हा श्रीकृष्णा, रामायण या मालिकांनी सर्वांनाच भुरळ घातली होती. मीही त्याला अपवाद नव्हतो. जंगलात, डोंगरात जाऊन जप-तप केलं की देवबाप्पा प्रसन्न होतो आणि मागेल तो वर देतो हे त्यामुळं ठाऊक होतं. मग काय! एकेदिवशी जवळच्या डोंगरावर गेलो. चालून थकल्यावर डोंगराच्या सपाट भागावरील एक मोठा दगड पकडला. त्यावर बैठक मारून रामनामाचा जप सुरू केला. ‘श्रीराम जयराम जयजयराम’च्या घोषात घशाला कोरड पडली. अन्न-पाण्याचा विषयच नव्हता. मग मनातल्या मनात जप सुरू केला. त्यात तल्लीन झालो. सांच्यापार झाली, काळोख दाटला तरी घरी न आल्यानं सगळे परेशान! मग झाली शोधाशोध सुरू. नको नको त्या चर्चा. त्यावेळी मुलं पळविणारी टोळी सक्रिय होती म्हणे! सगळा गाव धुंडाळून झाल्यावर पोलिसांकडं तक्रार द्यायची ठरलं. काहींनी तर ‘नदी, डोह, विहिर इकडंही शोध घ्या’ असं सुचवलं. मग आईची रडारड. वडिलांचं उद्वेगानं चिडणं... तेवढ्यात एका गुराख्यानं सांगितलं, ‘‘मी बंटीभैय्याला माळावर जाताना बघितलं...’’

आता मात्र सगळ्यांनाच धस्स झालं! गावकर्‍यांनी कंदील घेतले आणि सगळे डोंगराच्या दिशेनं निघाले. वरपर्यंत आल्यावर बघतात तर काय, एका मोठ्या धोंड्यावर बसून एक ‘दगड’ रामनामाचा जप करत होता... मग कशा पद्धतीनं जोरदार स्वागत झालं असेल आणि कसली भारी वरात निघाली असेल हे वेगळं सांगायला हवंय का? पण मिसुरडंही न फुटलेल्या वयात साधना पूर्ण करून परमेश्‍वराकडून वरदान मागून घेणं राहूनच गेलं...

त्यानंतर नारंगवाडी गाठली. ही वाडी उमरगा तालुक्यात येते. भूकंपग्रस्त भाग. सास्तूर आणि किल्लारी या दोन महत्त्वाच्या भूकंपकेंद्रांचा मध्यबिंदू म्हणजे नारंगवाडी. तिथल्या भारत शिक्षण संस्थेच्या जयराम विद्यालयात आठवीला प्रवेश घेतला. इथलं वातावरण मात्र एकदम वेगळं होतं. आपण घर सोडून, गाव सोडून इथं आलोय याची जाणीव होती. शिवाय झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचं भूत मानगुटावर घट्ट बसलं होतं. मग कराटेचं प्रशिक्षण सुरू झालं. कधी नव्हे तो जोरदार अभ्यास सुरू झाला. अवांतर विषयांवरील वाचन झपाट्यानं वाढवलं. कुटुंबाला हातभार लावायचा म्हणून रोज पहाटे वृत्तपत्र विक्री सुरू केली. सायकलवर घरोघरी जायचं आणि पेपर टाकायचे हा दिनक्रम सुरू झाला. त्यातून माणसं कळू लागली. जगरहाटी समजली. बरे-वाईट अनुभव आले. 

या नारंगवाडीत आठवीच्या वर्गात असताना प्रारंभी मी वाचकपत्रं लिहायला सुरूवात केली. नंतर कविता, लेख, कथा छापून यायला लागल्या. गाव आणि परिसरातील छोट्या-मोठ्या बातम्या पाठवू लागल्यानं ‘तरूण भारत‘सारख्या दैनिकानं त्यांचा ‘वार्ताहर’ म्हणून जबाबदारी दिली. आपण लिहिलेलं साहित्य, आपल्या बातम्या नावासह छापून येत आहेत आणि तो अंक आपणच घरोघर वाटप करतोय याचा आनंद असायचा. सुरूवातीला काही काळ वाटायचं, परिस्थितीनं आपल्यावर ही वेळ आणलीय. विशेषतः मैत्रिणींच्या घरी पेपर टाकताना संकोचल्यासारखं व्हायचं. मात्र त्यात आपलं नाव छापून येतंंय म्हटल्यावर मग तोच अभिमानाचा विषय झाला.  या परिसरातील जमीन एकदम भुसभुशीत, काळीशार! इथं थोडी जागा घ्यावी, रानातच शेड उभारून रहावं, जनावरं पाळावीत, छान शेती करत आनंदानं जगावं असं वाटायचं! पण ते शक्य नव्हतं. ही सगळी स्वप्नं स्वप्नच राहिली. असं मस्तमौला जगणं राहूनच गेलं. 

पुढं किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात दाखल झालो. तेव्हा नव्या किल्लारीत मुख्य बसस्थानकाजवळ ‘पाटील न्यूजपेपर एजन्सी’ची सुरूवात केली. स्थानिक विषयांवर जोरदार हल्लाबोल करायचा, शाब्दिक फटकेबाजी करताना कुणाचाच मुलाहिजा राखायचा नाही या वृत्तीमुळं अनेक वाद आणि वितंडवाद ओढवून घेतले. नवनव्या जबाबदार्‍या पेलल्या. हरतर्‍हेच्या आव्हानांना सामोरा गेलो. हे सगळं करताना बालपण कसं सरलं ते कळलंच नाही. सगळ्यांसोबत खेळायला जाणं, मौजमजा करणं, मोठ्यांकडून कोडकौतुक करून घेणं असलं काही वाट्याला आलं नाही. आपण भले आणि आपले काम भले असाच खाक्या! घरातील आणि नात्यातील ‘मोठ्यां’नाही माझ्या या सर्व उचापत्यांचं कौतुक वाटायचं. आज यशाचे नवनवीन उच्चांक गाठताना, व्यावसायिक विक्रम रचनाता लक्षात येतंय की, अरेच्चा! आपण तर बालपण जगलोच नाही. परिस्थितीच्या ओझ्यानं असेल किंवा महत्त्वाकांक्षेच्या ध्येयवादानं असेल पण बालपण अनुभवणंच राहून गेलं... आयुष्यातली ही महत्त्वाची वर्षे नियतीनं माझ्या आयुष्यातून बहुधा वजा केली असावीत असंच आता वाटतंय.

पुढं पुण्यात आलो. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ‘संध्या’ या पहिल्या सायंदैनिकात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा वय होतं सोळा! काम करत करत शिकावं म्हणून टिळक रस्त्यावरून जवळच असलेल्या ‘गरवारे महाविद्यालयात’ बारावीच्या कला शाखेसाठी प्रवेश घेतला. तेव्हा मी पुणे महानगरपालिकेचं वार्तांकन करायचो. ‘संध्या’चा अग्रलेख लिहायची जबाबदारीही माझ्याकडं आली होती. त्यामुळं आत्मविश्‍वास दुणावला होता. त्याचकाळी ‘पत्रकारितेतील भीष्माचार्य’ अशी ओळख असलेल्या दैनिक संध्याचे संस्थापक संपादक वसंतराव तथा तात्या काणे यांनी संध्या हे दैनिक पिंपरीतील कांबळे नावाच्या एका गृहस्थास विकले. नव्या व्यवस्थापनाशी माझं काही जुळलं नाही आणि मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘वयाने कमी, पुण्यातील नाही आणि अजून शिक्षणही पूर्ण नाही’ म्हणून इतर वृत्तपत्रांनी कामाची संधी काही दिली नाही. एखादा मासा पाण्याबाहेर राहू शकेल काय? अगदी तशीच माझी तडफड सुरू झाली आणि मग त्या उद्रेकातून मी स्वतःचीच संस्था सुरू करण्याचा घाट घातला. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ‘मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक’ असं बिरूद माझ्या नावामागं लागलं. मग सगळ्यांच्या अपेक्षा कैकपटींनी वाढल्या आणि एका नव्या अध्यायाची सुरूवात झाली.

एकीकडं संपादक, लेखक आणि प्रकाशक म्हणून लौकिक मिळत होता तर दुसरीकडं मोरपंखी दिवसांची चाहूलही स्वस्थ बसू देत नव्हती. बेभान होऊन प्रियतमेसोबत पतंगप्रीती करावी असं या वयात कुणाला बरं वाटणार नाही? आपलं वय आपल्या हातून काही प्रमाद घडवून आणतं. दुर्मीळात दुर्मीळ अपवाद वगळला तर हा निसर्गनियमच आहे. मी  अपवाद नव्हतो, हे काय वेगळं सांगायला हवं? मीही एका पुणेरी छोकरीच्या प्रेमात पडलो. पुण्यातल्याच पोट्ट्या या! आमचं बिनसलं आणि माझ्या लक्षात आलं की, भाऊ हे आपलं काम नाही. मुळात कुटुंबासाठी आपण वेळच देऊ शकत नाही तर कुणाचं आयुष्य का बरबाद करा? आपल्या समाजात बाबा आमटेंची कमतरता नाही, त्यांची ‘साधना’ बनायला मात्र आजकालच्या मुली तयार नसतात. मग त्या विषयाला मी कायमचा पूर्णविराम दिला. अविवाहीत रहायचा निर्णय पक्का केला आणि माझ्या कामाचा रथ अजून जोरात दामटला. त्या निर्णयाचं आज समाधान वाटतंय. लग्न करणं, मुलांचं संगोपन, त्यांचे लाडप्यार ही सगळी स्वप्नं मी बघितली होती पण त्या सगळ्यांचा ‘खेळखंडोबा’ होऊन बसला. जबाबदार्‍यांच्या ओझ्यांनी जसं बालपण गेलं तसं परिस्थितीच्या प्रवाहात तारूण्यही संपत आलंय. आईवडिलांची काळजी घेणं, त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणं, त्यांना हवं-नको ते बघणं हे सोडलं तर कुटुंबाच्या, परिवाराच्या अन्य जबाबदार्‍या माझ्यावर पडल्या नाहीत. त्यामुळं हे असले सगळे ‘उद्योग’ करणं राहूनच गेलं...

‘करून दाखवलं’ या सदरातली काम विचाराल तर ती ढिगभर होतील. ‘करायची कामं’ विचाराल तर मग पर्वतच! त्याच्यापुढं राहून गेलेल्या गोष्टी नगण्यच! म्हणून त्याचं वैषम्य वाटत नाही. 

श्री, म्हणजे श्रीराम हा माझा सख्खा छोटा भाऊ! त्याच्या लग्नाला जाण्याइतका वेळही माझ्याकडं नव्हता. माझ्या व्यवसायाची ही हतबलता आहे. चुलत भाऊ-बहिणी, आते-मावस भाऊ-बहिणी ही तर फारच दूरची गोष्ट. बाहेर खंडीभर माणसं जोडलीत. अवतीभोवती माणसांचाच सागर असतो. मात्र आईवडील सोडले तर बाकी रक्ताच्या कुठल्याच नात्याशी कसलेच पाश राहिले नाहीत. त्यामुळं गर्विष्ठ, अहंकारी, कूपमंडूक, एकलकोंडा अशी माझ्याविषयी मतं बनणं यात नवल नाही. पहाटे साडेतीनला सुरू झालेला माझा दिवस रात्री अकरा-साडेअकराला संपतो तर मग हे सगळं कसं सांभाळणार? प्रत्येकांचे रूसवे-फुगवे कसे काढणार? नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी कसा होणार? त्यामुळं सगळ्यांविषयी हृदयात व्यापक, उदात्त भावना असून, प्रेमाचा सागर ओथंबून वाहत असूनही या सर्वांपासून दूर लोटला गेलो. या सगळ्यांसोबत ‘जगणं’ राहूनच गेलं की!

आम्हा मराठवाड्यातल्या लोकांवर भूकंपानं एक उपकार केलाय. कितीही मोठं संकट आलं तरी आम्हाला ते कस्पटासमान वाटतं. मृत्युचं तांडव बघितलंय आम्ही! या वेदनेपेक्षा मोठी भळभळती जखम अजून कोणती असू शकते? त्यामुळं कितीही संकटं आली, प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, काही कारणानं होत्याचं नव्हतं झालं तरी आम्ही खचत नाही, डगमगत नाही. पुन्हा नव्यानं तितक्याच जोमात, दमदारपणे सुरूवात करतो. ‘चार द्यायचे आणि चार घ्यायचे’ इतकं साधं सूत्र! मग कसलाच त्रास होत नाही. कितीही गोष्टी राहून गेल्या तरी नवनवीन आव्हानं आम्हाला खुणावत राहतात. म्हणूनच वैयक्तिक आयुष्याची राखरांगोळी झाली तरी मी त्यावर आनंदानं तुळशीपत्र ठेऊ शकलो. जे घडणारच नाही त्याचा शोक का बाळगावा? 

साहित्य, ग्रंथ प्रकाशन आणि पत्रकारिता क्षेत्रातील खूप मोठी स्वप्नं मी बघितलीत. ती सगळीच पूर्ण होतील असं अजिबात नाही! पण मोठी स्वप्नं पाहणं आणि ती पूर्णत्वास आणण्यासाठी धडपडणं हे मला माझं प्राथमिक कर्तव्य वाटतं. मराठी भाषेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, या क्षेत्रातील नकारात्मकता हटवण्यासाठी, प्रतिभावंतांना त्यांची हक्काची दालनं उभी करून देण्यासाठी कुणी ‘मसीहा’ येणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. जे काही चांगलं घडेल ते आपणच घडवू. जे काही चुकीचं आहे ते आपणच थोपवू! भलेही हे करताना हजार चुका करू पण एकच चूक हजारवेळा होणार नाही याचीही काळजी घेऊ! युगपुरूष स्वामी विवेकानंदांना त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी शंभर युवकांची गरज होती. कशावरून त्या शंभरातला मी एक नसेन? मग माझ्यावरील जबाबदारी किती पटीनं वाढली असेल याचा विचार करा मित्रांनो! 

हास्य, विरोध आणि स्वीकृती अशा परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. आम्ही लढत होतो, पडत होतो. त्यावर अनेकजण हसत होते. त्यांना डोईजड जाईल असे वाटल्यावर प्राणपणानं विरोधही करत होते. त्या कशालाच न जुमानता, काय कमावले, काय गमावले याचा हिशोब न ठेवता आम्ही आमची ध्येयमार्गानुयात्रा सुरूच ठेवली. त्यामुळं हा विरोधही आम्ही हसत-हसत मोडून काढला. ती अवस्थाही  पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. त्यामुळं आता आमची पुढची वाटचाल अधिक वेगानं होईल. म्हणूनच ‘करायच्या राहून गेलेल्या गोष्टीं’चे तपशील मनात आणि हृदयात साठवत पुढच्या मोहिमेसाठी आम्ही सज्ज आहोत. 

आजवर अनेक गोष्टी केल्या आहेत. करण्यासारखी चिक्कार कामं डोळ्यासमोर आहेत. काहीवेळा पानगळ झाली तरी नव्यानं फुटणार्‍या पालवीची चाहूल सातत्यानं जाणवते. म्हणून ‘राहून गेलेल्या गोष्टी’पेक्षा ‘करायच्या गोष्टी’ मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. कोणीतरी म्हटलं आहे की, गाडीची समोरची काच मोठी असते आणि मागचा रस्ता दाखवणारा आरसा मात्र इवलासा! त्यामुळं मागून कोणी ठोकू नये यासाठी भूतकाळावर आरशाद्वारे लक्ष जरूर असावं पण लांबचा पल्ला गाठण्यासाठी समोरच्या काचेतून दूरवर पहावं... रस्त्यावरील खाचखळगे, छोटे-मोठे अपघात, आलेल्या तांत्रिक अडचणी, क्वचित प्रसंगी जाणवलेला शिणवटा या सर्वांवर यशस्वी मात करत प्रवाशानं पुढे पुढे जायला हवं. मीही तेच तर करतोय. चालकानं गाडी चालवायची असते. प्रवासी त्यांचं इच्छित स्थळ आलं की उतरतात. चालकानं त्याची तमा बाळगू नये! अर्थात, ही गाडी चालवताना काहीजण इंजिनाप्रमाणं घट्ट चिकटूनही राहतात. त्यांची समर्थ साथ आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देत असते. असे इंजिनाप्रमाणे जोडलेले अनेक मित्र, सहकारी मला प्रेरणा देतात, जगण्याचं बळ देतात. त्यामुळंच राहून गेलेल्या गोष्टी मांडणं माझ्यासाठी जिकिरीचं आहे. काही प्रश्‍न सोडले की सुटतात! अगदी त्याच न्यायानं राहून गेलेल्या काही गोष्टी तशाच राहू द्याव्यात! त्यातच सगळ्यांचं भलं असतं.
(साहित्य स्वानंद दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

9 comments:

  1. मनस्वी जीवन संघर्षाचे रोखठोक वर्णन ! भावलं ! परमेश्वर तुम्हाला अखंड स्वप्नपूर्तीचा आनंद मिळण्यासाठी आशीर्वाद देवो ही प्रार्थना !

    ReplyDelete
  2. शून्यातून हवे ते निर्माण करण्याची धमक व नव्हत्याच होत करणं म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण,घनश्याम पाटील

    ReplyDelete
  3. अनअनुभूत आणि हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  4. चांगला झालाय लेख. पारदर्शी लेखन.

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय

    ReplyDelete