Monday, November 12, 2018

अगम्य, अतर्क्य!

एका खेडेगावात एक व्याख्याता तावातावात बोलत होता. त्यानं सांगितलं, ‘‘स्त्री आणि पुरूष ही रथाची दोन चाकं आहेत. ती एकसाथ चालली तरच कुटुंबाचा, संसाराचा गाडा धडपणे चालतो. ही चाकंच आपल्याला समानतेची शिकवण देतात...’’

त्या व्याख्यात्याचं लंबंचौडं भाषण थांबवत एक आजीबाई उठल्या. त्या म्हणाल्या, ‘‘कसली समानता आलीय साहेब? स्त्री-पुरूष ही समानतेची चाकं न्हायीत. रथाची तर न्हायीतच न्हायीत. असलीच तर ती सायकलची चाकं असत्याल. एक फुडं, एक म्हागं... त्यात कसली आलीय समानता? सायकल चालवणारा गडी माणूस! ब्रेक त्याच्या हातात. हॅन्डल त्योच धरतो. त्यो नेयील तिकडं आपसूक जायाचं. ब्रेक मारला की झिज मागच्या चाकाची व्हनार! धावती सायकल आपसूक थांबणार! कॅरिअर म्हागं लावलेलं. म्हणून ओझं असंल तर ती बी मागच्या चाकावर. आपण कुरबुर न करता गुमानं पुरूषांच्या मागोमाग जायाचं...’’

अर्थातच त्या व्याख्यात्याचं भाषण गडबडलं... 

आजीबाईंनी नेमकेपणं समानतेचं सार सांगितलं. स्त्री शिकली. प्रगती झाली. ती स्वावलंबी झाल्यानं अनेक क्षेत्रात तिनं नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. देशाच्या पंतप्रधानापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रीनं मजल मारली. असं सारं असूनही काही सन्माननीय अपवाद वगळता ही स्वावलंबी स्त्री आज स्वतंत्र आहे का? तर त्याचं उत्तर नकारात्मकच येईल. कोणी कितीही आव आणला, स्त्रियांच्या प्रगतीचे गोडवे गायले तरी हे वास्तव नाकारता येणार नाही. ‘हृदयी अमृत, नयनी पाणी’ हे चित्र कसं बदलणार? तिच्या हृदयातलं अमृत अवश्य पाझरत रहावं पण डोळ्यात पाणी हवंच का?

आपल्याकडं असमानतेचा पाया इतका भक्कम असताना आपल्यात समानता कशी येणार? स्त्री-पुरूष मैत्री निकोप कशी राहणार? आजच्या जमान्यात स्त्री-पुरूष मैत्री ही गरज आहे, आकर्षण आहे की फॅशन? की यापुढचं आणखी काही नवं नातं रूढ होतंय?

स्त्री म्हणजे जननी! निर्मितीचा आविष्कार! मातृसत्ताक परंपरेचे गोडवे गाणार्‍या आपल्या देशात तीच सर्वाधिक पिडली जाते, नागवली जाते. ‘नर आणि मादी’ या संकल्पनेच्या पुढे आपला गाडा काही जातच नाही. म्हणूनच सारं काही व्यर्थ ठरतं. 

युगानुयुगे या नात्याच्या समानतेसाठी अनेकांची धडपड सुरू आहे. त्यात यश आलंय असं ज्यांना वाटतं ते त्यांचं ‘भासात्मक सत्य’ आहे. काहीवेळा असं सत्य आरशासारखं असतं. त्यात चेहरा बघितल्यावर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. आपण खूश होतो. आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे याची जाणीव आपल्याला होते. मात्र आरशातील हा चेहरा म्हणजे ‘मिरर’ इमेज असते. तो आपल्याला आपला ‘उलटा’ चेहरा दाखवत असतो आणि आपण तोच सत्य समजून आनंदी राहतो.

असा आनंद कशातही मानता येईल. त्यात गैरही काही नाही! पण म्हणून स्त्री-पुरूष समानता आलीय असं धाडसी विधान मात्र कोणीही करू नये. शहरी भागातल्या, ग्रामीण भागातल्याही स्त्रिया शिकल्यात. त्यांची कमाईही सुरू आहे. अनेकजणी आपापल्या नोकरी-व्यवसायात मग्न आहेत. ‘ठेविले अनंते तैसेही रहावे’ या उक्तीप्रमाणे त्या समाधानी असल्याचा आवही आणतात. घरच्या आणि बाहेरच्या लढाईसाठी सदैव सज्ज असतात. म्हणून काही त्या स्वतंत्र ठरत नाहीत. सुरक्षित राहत नाहीत. जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. 

स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आपण किती जागरूक आहोत हे पाहण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ! अनेकजणी प्रवासाला निघाल्यावर कमी पाणी पितात. त्याचे कारण काय? तर रस्त्यात शौचालये नाहीत! जी आहेत ती इतकी अस्वच्छ असतात की इन्फेक्शन आणि अन्य आजारांना निमंत्रणच जणू! जागोजागी महिलांसाठी सुलभ शौचालेयही उपलब्ध नसलेल्या आपल्या देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवलं जातं. पूर्वी किमान दोन गावात अंतर असायचं. आता शहरीकरणाच्या नादात गावं इतकी जवळ आलीत की रस्त्यात कुठं थांबणंही मुश्किल होऊन जातं. माग एकदा वाचण्यात आलं होतं की, घरोघरी जाऊन मार्केटिंगची कामं करणार्‍या तरण्या-ताठ्या मुलींना शौचालयं उपलब्ध नसल्यानं हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. एकतर आधीच तुटपुंजं उत्पन्न! त्यात हॉटेलला खाणं परवडत नसल्यानं या मुली शौचालयाची सुविधा असणारं एखादं चांगलं हॉटेल पाहतात. तिथं जाऊन चार-पाच जणी अर्धा-अर्धा चहा घेतात. टॉयलेटचा वापर करून, पुन्हा कमी पाणी पिऊन बाहेर पडतात. केवळ या एका कारणासाठी कमी पाणी प्याल्यानं अनेक मुलींना विविध आजारांनी ग्रासलं आहे. हे असं सगळं भयानक चित्र असताना आपण समानतेवर परिसंवाद ठेवतो. त्यात भाषणं ठोकतो. स्त्री सगळ्या बंधनातून मुक्त झाल्याचं सांगतो. ती स्वतंत्र, स्वावलंबी आणि सुरक्षित असल्याचे ढोल पिटतो. ‘लाज’ नावाचा प्रकार ना आपल्या ढिम्म व्यवस्थेत उरलाय ना आपल्या निर्ढावलेल्या मनात!

स्त्री सन्मानाबाबत एक कहाणी सांगितली जाते. ही गोष्ट आहे आद्य शंकराचार्यांच्या काळातली. म्हणजे झाली असतील त्याला हजार-बाराशे वर्षे! आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात धर्म, संस्कृती, रूढी-परंपरा, वेद यावरून वाद सुरू झाले. थोडावेळ दोघांनी चर्चा केली. एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पण शंकराचार्यांनी मंडन मिश्र यांना थांबवले. ते म्हणाले, ‘‘आपण भांडतोय खरे! पण आपल्या दोघांत बरोबर कोण हे कसं ठरवणार? याचा न्यायनिवाडा कोण करणार?’’

त्यांच्या या प्रश्नावर मंडन मिश्र म्हणाले, ‘‘माझी पत्नी भारती ही विवेकी आहे. अभ्यासू आहे. तिची सारासार बुद्धी तटस्थ आणि न्यायप्रिय आहे. ती ठरवेल. तिचा निर्णय आपण अंतिम मानू...’’

त्यानंतर आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. वाद-प्रतिवाद झाले. विविध विषयांवर मंथन घडलं. हे सगळं भारती यांनी ऐकलं. सर्व बाजू समजून घेतल्या आणि त्या काळात आपल्या पतीच्या विरूद्ध आणि शंकराचार्यांच्या बाजूनं कौल दिला. शंकराचार्य बरोबर आहेत हे भारती यांनी ठामपणे सांगितलं. 

ते ऐकून प्रभावित झालेल्या आद्य शंकराचार्यांनी सांगितलं की, ‘‘मी तुमच्या न्यायबुद्धीचा आदर करतो. तुम्ही तुमच्या पतीच्या विरूद्ध तटस्थपणे माझ्या बाजूनं न्याय दिला. एका स्त्रीच्या या विवेकाची पुढच्या पिढीला कल्पना यावी म्हणून वचन देतो की, यापुढे जे कोणी माझ्या म्हणजे शंकराचार्याच्या गादीवर बसतील ते त्यांच्या नावापुढं तुमचं नाव लावतील...’’

तेव्हापासून शंकराचार्यांच्या नावापुढं ‘भारती’ हा शब्द लावलेला असतो. उदा. वरदानंद भारती! 

म्हणजे शंकराचार्यांसाठी सुद्धा ‘न्यायाधीशा’ची भूमिका घेत न्यायनिवाडा करणारी स्त्री आपल्या धर्मात कशी कमी लेखली जाते यावर तावातावात भाषणं ठोकली जातात. त्यासाठी दरवेळी आपल्या सोयीनुसार ‘मनुस्मृती’चा आधार घेतला जातो.

खरंतर मनुस्मृती हा काही आपला धर्मग्रंथ नाही. त्यानुसार आजवर कुणीही राज्यकारभार केला नाही, करू शकणार नाहीत. अगदी पुण्यात पेशवे सत्तेवर असताना जर तिकडं लोकमाता अहिल्यादेवी होळकर न्यायबुद्धीनं राज्य करू शकत असतील तर स्त्रियांनी सत्ताकारण करू नये, असा मनुस्मृतीचा दाखला देण्यात काय अर्थ? 

काळ झपाट्यानं बदलतोय. नाण्याला दोन्ही बाजू असतात. त्याप्रमाणं स्त्रियाही बदलत आहेत. स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांविषयी खूप लेखन झालंय. अजूनही होतच राहतं. त्यात ‘बाईची भाईगिरी’ हा विषय मात्र फारसा चर्चेला येत नाही. तो स्वतंत्र लेखाचा, नव्हे पुस्तकाचाच विषय आहे. स्त्रिया सगळ्या क्षेत्रात ज्या हिरिरीनं पुढे येत आहेत ते पाहता त्या गुन्हेगारीच्या क्षेत्रातही कमी नाहीत. जगभरातील कुख्यात स्त्री गुन्हेगारांचा मागोवा घेतला तर तो रंजक आणि तितकाच भेदकही आहे. आईच्या महत्तेचं, तिच्या त्यागाचं वर्णन मोठ्या संख्येनं झालं. ते पाहता, ‘दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये, जिची ममता आटली तिले माय कधी म्हणू नये...’ हेही आपण लक्षात घ्यायला हवं. ममता आटलेल्या, वात्सल्याची जागा द्वेषानं, सूडानं घेतलेल्या, क्षणिक स्वार्थापोटी वाटेल त्या थराला जाणार्‍या स्त्रिया कमी थोड्याच आहेत?

सध्या ‘मी टू’ ही चळवळ (?) सुरू आहे. त्यात अभिनय आणि पत्रकारितेतील मुली पुढं येऊन त्यांना पुरूषांकडून काय काय सहन करावं लागलं हे धाडसानं सांगत आहेत. कोणतीही मुलगी आपल्या चारित्र्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल असं विधान कधी करणार नाही. आजचा काळ पाहता मात्र स्त्रिया किंवा पुरूष काहीही करू शकतात, कोणत्याही पातळीला उतरू शकतात हे वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं अशा तथाकथित चळवळीमागं काही षडयंत्र आहे का हेही तपासून पहायला हवं. ‘लग्नाच्या आमिषानं पाच वर्षे बलात्कार,’ ‘नोकरीच्या-बढतीच्या आमिषानं बलात्कार,’ ‘पैशाची-पदाची, संपत्तीची लालसा दाखवून बलात्कार’ या व अशा बातम्या वाचल्या की आश्‍चर्य वाटतं. म्हणजे ही ‘फसवणूक’ ठरू शकेल! पण याला बलात्कार कसं म्हणावं? म्हणजे काम होईपर्यंत ‘ये तू’ आणि इप्सित साध्य झाल्यास किंवा त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास ‘मी टू’ हे काही खरं नाही. वाटेल ते उद्योग करून ‘मिटवू’ म्हणणार्‍यांत आणि या ‘मी टू’ म्हणणार्‍यांत मग कितीसा फरक उरतो? यातून आपण काय संदेश देतोय हे तपासून पहायला हवं. कोणत्याही अन्याय, अत्याचाराच्या विरूद्ध कधीही आवाज उठवणं हे गरजेचंच आहे. ते धाडसं ‘ती’नं करायलाच हवं. ते करताना अकारण कुणाच्या आयुष्याची रांखरांगोळी मात्र करू नये!

मध्यंतरी काही घटना उघडकीस आल्या. केवळ दणकून पोटगी मिळावी म्हणून काही मुली, स्त्रिया समाजातील ‘गब्बर’ लोकांसोबत लग्न करतात. काही दिवस त्यांच्यासोबत घालवून घटस्फोट मागतात. त्यासाठी वाटेल ते बनाव रचतात. आरोपांच्या फैरी झाडून समोरच्याचं जगणं उद्ध्वस्त करतात. हा लेख लिहित असतानाच परभणीहून एक बातमी येतेय. एका बाईनं तिथल्या एका तरूणाला सतत ‘ब्लॅकमेल’ करून शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्यानं आत्महत्या केलीय. म्हणजे आपण नक्की कोणत्या दिशेनं जातोय हे पाहणं गरजेचं आहे. 

सध्या ‘स्वीट डॉल’ हा एक प्रकार काही ठिकाणी दिसून येतोय. परदेशातील अशा खुळचट कल्पना आपल्याकडं झपाट्यानं पसरतात. स्वीट डॉल म्हणजे काय तर आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या वयाचे जे सधन पुरूष आहेत त्यांना हेरायचं, त्यांच्यासोबत बायकोप्रमाणं वागायचं आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण करून घ्यायच्या. विसी-बाविशीतल्या मुली पन्नासीच्या पुढच्या ‘श्रीमंत’ माणसांसोबत ‘राहतात’ आणि आर्थिक कमाईसोबतच त्यांची हौस-मौज पूर्ण करून घेतात. अशा मुलींनी ‘मी टू’ चळवळीला पाठिंबा दिला तर दोष कुणाला द्यायचा?

आपली कायदा आणि न्याय व्यवस्थाही नवनवीन आदेश काढत असते. विविध प्रकरणात न्यायनिवाडे करताना जे निर्णय दिले जातात त्यावरून समाजस्वास्थ धोक्यात येतं. ‘समलिंगी संबंधांना मान्यता’ असे निर्णय घेतले गेल्यास ‘तुमचा बाप समलिंगी असता तर तुमचा जन्मही झाला नसता’ असं ठणकावून सांगण्याचं धारिष्ट्य आपल्यात का शिल्लक राहत नाही? 

बरं, स्त्रियांची आणि पुरूषांची विचार करण्याची पद्धतही वेगवेगळी! म्हणजे एखादी स्त्री तिच्या प्रियकराचा विचार करते तेव्हा ‘त्याचा’ हात आपल्या हातात गुंफलाय इथून तिचं स्वप्नं सुरू होतं. इकडं हा पठ्ठ्या जेव्हा तिचा विचार सुरू करतो तेव्हा थेट बेडरूमची कडी लावण्यापासूनच त्याची विचारप्रक्रिया सुरू असते. चित्रातली, चित्रपटातली नग्नता पाहताना अनेकजण सांगतात की, आधी तुमच्या डोळ्यातली नग्नता पहा! तिच्या कपड्यावरून शेरेबाजी करण्याऐवजी तुमची नीतिमत्ता सुधारा! पण या प्रवचनांचा खरंच काही उपयोग होतो का? या सर्वांमुळं बहुतेकांच्या मनातली वासना चाळवली जाते हे सत्य आपण का स्वीकारत नाही? पुरूषांच्या अंडरवेअरची जाहिरात करतानाही इथं स्त्रीच लागते आणि एखाद्या परफ्युममुळं त्याच्याकडं आकर्षित होऊन थेट त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार असणार्‍या जाहिरातीतही स्त्रीच असते. हा त्यांचा अवमान नाही का? याविरूद्ध कोणत्याही स्त्रीवादी संस्था, संघटना, कार्यकर्त्या कसलाही आवाज का उठवत नाहीत? शनिशिंगणापुरला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून पेटून उठणार्‍या तृप्ती देसाई इथं का बरं थंडावतात? की अशा कोणत्याही बड्या कंपन्यांच्या उत्पादनाविरूद्ध ब्र ही काढायचं धाडस आपल्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांत नाही? 

स्त्री-पुरूष समानतेचा जयघोष करताना आपल्या मनात अहंकारही नको आणि न्यूनगंडही नको! ‘आमच्याकडं स्त्रियांना किती मोकळीक आहे....’ असं सांगणारे पुरूष घरात प्रत्यक्षात कसे वागतात हे आपण सर्वजण जाणतोच. बाकी सोडाच, पण एखाद्यानं प्रेमविवाह केला तर ‘आपण आंतरजातिय प्रेमविवाह केला’ असे ढोल पिटण्यातच तो धन्यता मानतो. काहीजण तर निश्‍चयानं आपापल्या जातीबाहेरील मुलीशी लग्न करून त्याची जाहिरात करत असतात. म्हणजे प्रेमही असं ठरवून, मुलींचे जाती-धर्म पाहून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढून केलं जातं का? प्रेम कधीही, कुणावरही होऊ शकतं. ते व्यक्त केलं, समोरच्यानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर दोन मनं एकत्र येतील. तिथं जात-पात, धर्म, वय, शिक्षण असे निकष लावून कसं चालेल? जर मियांबिबी राजी असतील, ते एकमेकांना समजून घेत असतील, त्यांच्या सुख-दुःखात एकरूप होत असतील तर इतरांनी त्यात लुडबूड करण्याचं कारणच काय? समाजानंही हे सारं प्रगल्भपणे स्वीकारायला हवं.

‘स्त्री ही क्षणिक काळची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ असं म्हणतात ते उगीच नाही. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते हेही सांगितलं जातं. अनेक ठिकाणी ते अनुभवायलाही येतं. तिचं तरल आणि संवेदनशील मन पुरूषाला उभारी देतं. ती जितकी मायाळू असते तितकीच प्रसंगी ती कणखरही होते. तिच्या निश्चयापुढं मोठमोठे पर्वतही थिटे ठरतील. आमच्या मराठवाड्यात, विदर्भात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. खरंतर या सगळ्यात सर्वाधिक ससेहोलपट होते ती घरातल्या स्त्रीची! तिला जे सहन करावं लागतं, जे भोगावं लागतं त्यापुढं पुरूषांचं दुःख निश्चितपणे नगण्य आहे. तरीही कोणत्याही शेतकरी स्त्रीनं कधी आत्महत्या केल्याचं दिसून आलं नाही. ती दुष्काळाशी, समाजाशी, उदासीन प्रशासनाशी झगडत राहते. नवर्‍यानं आत्महत्या केली तरी नेटानं जगते, लेकरा-बाळांना शिक्षण देते. प्रसंगी मोलमजुरी करून आपल्या पाल्याला विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून देणार्‍या महानायिका आपल्याकडं चिक्कार आहेत. त्यांचा स्वाभिमान, त्यांची जिद्द, चिकाटी, त्यांचे अथांग परिश्रम, त्यांचा संघर्ष हे सारं काही अतुलनीय आहे. त्यामुळं छोट्या-मोठ्या गोष्टींचा बागुलबुवा करून काही स्त्रिया जेव्हा आकांडतांडव करतात तेव्हा आश्चर्य वाटते.

स्त्री कुटुंब जोडते, ती कुटुंब तोडतेही! तिची सगळीच रूपं अतर्क्य, अगम्य. तिचं मन जाणणारा, तिला समजून घेणारा पुरूषही तितकाच दुर्मीळ! ही दोन चाकं कधी फारशी एकत्र येतच नाहीत. 

असं सारं असलं तरी या नात्यात एक गोडवा असतो. स्त्री-पुरूष समानतेचा जागर करताना आपण आधी एकमेकांविषयी आपल्या मनात व्यापक, उत्तुुंग प्रेमभावना ठेवू. एकमेकांकडं माणूस म्हणून बघितलं तरी अनेक समस्या सुटतील. एक तरल, निकोप नातंच समाज सुदृढ ठेऊ शकतं. त्यासाठी आपला विवेक वाढत जावो, मनातील गैरसमजाचं, उच्च-नीचतेच, खोट्या प्रतिष्ठेचं, दिखाव्याचं मळभ दूर होवो याच या निमित्तानं शुभेच्छा! 
(अपेक्षा मासिक दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092


5 comments:

  1. नेहमीप्रमाणेच छान मांडलाय सर.... दोन्ही बाजूने समान न्याय... त्यामुळे अर्थपूर्ण आणि उद् बोधक..... धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप छान लेख.उद्बोधक विचाराधीन लेख.

    ReplyDelete
  3. जबरदस्त आणि दमदार

    ReplyDelete
  4. छान लेख आहे, खरंच दखलपात्र!

    ReplyDelete