Friday, July 5, 2019

फक्त लढ म्हणा!


‘चपराक’चा ज्ञानयज्ञ सुरू!

विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या आहेत. त्यामुळं मराठी साहित्यात थोडफार योगदान द्यावं असा विचार आम्ही केला. त्यानंतर एक वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक, दिवाळी महाविशेषांक आणि पुस्तक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ते कृतीतही आणले. हे सर्व करताना शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव झाली आणि स्वतःचाच हेवा वाटू लागला.

जेव्हा आम्ही एक दर्जेदार वाङमयीन मासिक सुरू केलं तेव्हा काही समदुःखी लोकानी ‘मासिक ही संकल्पनाच मृतावस्थेत गेल्याची’ आवई उठवली. साप्ताहिक सुरू केल्यावर ते म्हणू लागले, ‘क्षणाक्षणाला जगातल्या सगळ्या बातम्या कळतात, त्यात काही साप्ताहिकवाल्यांनी  इतकी दुकानदारी सुरू केलीय की, सर्व साप्ताहिकं बदनाम झालीत.’ 

‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक वाचकप्रिय ठरत असतानाच ‘बाजारात सात-आठशे दिवाळी अंक येतात आणि त्यातील बहुतेक पावसाळी छत्र्यांप्रमाणं फक्त जाहिराती मिळवण्यासाठीच प्रकाशित होतात; त्यामुळं दिवाळी अंकाचे वाचक घटलेत’ असंही त्यांनी सांगितलं. 

‘नव्या लेखकांची पुस्तकं सध्या कोणीही प्रकाशित करत नाही, वाचनसंस्कृती राहिलीयच कुठं?’ असंही काहींनी विचारलं.

या सर्वांच्या नकारात्मक मानसिकतेचा अभ्यास केल्यावर आमच्या लक्षात आलं की या क्षेत्रातील अंधश्रद्धा मोठ्या आहेत. महाराष्ट्रात, भारतात आणि जगात हजारो वृत्तपत्रं रोज प्रकाशित होतात. प्रत्येकाचा वाचकवर्गही मोठा आहे. अर्थकारण मोठं आहे. त्यावर अवलंबून असणारे लोकही अनेक आहेत. अनेक उत्तमोत्तम मासिकांची वाचक आतुरतेनं वाट बघत असतात. आपल्या आवडीचे दिवाळी अंक आधी नोंदवून ठेवतात. एखादा हवा असणारा अंक वेळेत उपलब्ध झाला नाही तर ते अस्वस्थ होतात. पुस्तकांसाठी तर अनेकजण ‘वेटिंग’ला असतात. 

राज्याचं, देशाचं, जगाचं सोडून द्या; फक्त पुणे शहरातूनच रोज किमान पाच-पन्नास पुस्तकं प्रकाशित होतात. ही पुस्तकं प्रकाशित करणारे बहुतांश प्रकाशक सांगतात की, सुरूवातीला आम्ही रस्त्यावर बसून पुस्तकं विकायचो, घरोघर जाऊन पुस्तकं विकायचो, शिपाई म्हणून काम करत असताना पुस्तकं पोचवू लागलो आणि त्यातून या क्षेत्रात आलो... शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम करताना पुस्तकांचं जग खुणावू लागलं आणि प्रकाशक झालो... 

गंमत म्हणजे आपल्या गरिबीचा, दुःखांचा, परिश्रमांचा बाजार मांडणारे बहुतेक प्रकाशक गब्बर आहेत. त्यांच्या पुण्या-मुंबईत स्वतःच्या मोठमोठ्या इमारती आहेत. सातत्यानं विदेश वार्‍या होतात. आलिशान गाड्या आहेत. मुलांचं शिक्षण देश-विदेशातील चांगल्या संस्थांत सुरू आहे. असं सारं असूनही त्यांची एक सार्वत्रिक ओरड असते; ती म्हणजे ‘पुस्तकं खपत नाहीत! सध्या वाचतं कोण?’ इतक्यावर न थांबता ते सरकारला आणि व्यवस्थेलाही कायम दूषणं देत असतात.

आचार्य अत्रे म्हणायचे की, ‘‘कृतज्ञता हे मानवाला मिळालेलं मोठं वरदान आहे आणि कृतघ्नता हा मोठा शाप...’’ मग ही सगळी मंडळी कृतघ्न नाहीत का? ज्या वाचकांच्या जिवावर त्यांनी त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण केली त्यांना दोष देणं, जाणिवपूर्वक गैरसमज निर्माण करणं आणि त्यातून साहित्याचं, भाषेचं, ग्रंथ व्यवहाराचं नुकसान करणं कितपत योग्य आहे?

म्हणूनच आम्ही जरा वेगळा विचार केला. आपल्याकडील ज्ञानोपासकांची भूक भागविण्यासाठी या वर्षात 365 पुस्तकं प्रकाशित करायची. साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक हे सर्व प्रयोग यशस्वी झाले असताना केवळ आणि केवळ वाचकांच्या विश्‍वासाच्या बळावर हे धाडसी पाऊल उचलायचं. त्यासाठीचं आमचं नियोजन सुरू झालं आणि आता त्याला मूर्त स्वरूपही मिळत आहे. 

महाराष्ट्राची मराठी माती शौर्य आणि पराक्रमाची परंपरा जपणारी आहे. इथल्या अनेकांनी आदर्शांचे मनोरे उभे केले आणि जगभरातील अनेकांसाठी ते दिशादर्शक ठरले. असं असतानाही सध्या अनेक क्षेत्रात एक मोठी नकारात्मकता निर्माण झाली आहे. ती नेमकी का झाली याचाही अनेकांनी आपापल्या परीनं उहापोह केला आहेच! मात्र या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गंभीरपणे जे काही प्रयत्न करावे लागतात त्याबाबत मोठी उदासीनता दिसून येते.

 सध्या एक करंटी मानसिकता जोपासत आपली वाटचाल सुरू आहे. इथली सामाजिक, राजकीय व्यवस्था पाहता भव्यदिव्यतेची स्वप्नं पाहणं हाही गुन्हा ठरतोय की काय असं एकंदरीत वातावरण आहे. पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्याचं त्राण आपल्यात नाही म्हणूनच उद्यमशीलतेकडं अक्षम्य दुर्लक्ष होतं. 

इतरांवर टीका करणं, त्यांच्या चांगल्या योजनांना, परिश्रमांना नावं ठेवणं, कुत्सित स्वरूपात टिंगलटवाळी करणं थांबवायला हवं. पुण्यासारख्या नगरीत कधीकाळी रिक्षा चालवणारे एखादे अविनाश भोसले कोेट्यवधींची मिळकत कमावतात तेव्हा त्यांच्यावर शंका उपस्थित करण्याऐवजी जर त्यांच्या परिश्रमाचा, जिद्दीचा अभ्यास केला, त्यातून काही बोध घेतला तर अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतील. आपल्या आजूबाजूला शून्यातून विश्‍व निर्माण करणारे असे असंख्य लोक असूनही आपण परिस्थितीला दूषणं देतो, आणखी कुणावर आपल्या अपयशाचं खापर फोडतो तेव्हा आत्मपरीक्षणाची वेळ आलेली असते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे अगदी खरं आहे. अनेकांनी आपल्या कृतीतून ते दाखवूनही दिलं आहे.

साहित्य आणि ग्रंथ प्रकाशनविश्‍वाला तर कधीचीच घरघर लागल्याचं सांगण्यात येतं. वाचनसंस्कृती कमी होत चाललीय असं सांगणारी, ऐकणारी ही नेमकी कितवी पिढी आहे हे सांगता येणार नाही. साधारण 1909 साली वि. का. राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी भाषा मृतावस्थेला गेली आहे काय?’ या विषयावर परिसंवाद झाल्याचं वाचनात आलं. आजही ही व अशी चर्चा सुरूच असते हे आपल्या मायबोलीचं दुर्दैवच!

हे सगळं पाहून व्यक्तिशः मी अस्वस्थ झालो. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला, अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत साकारायचा तर आपण आपल्या क्षेत्रात खारीचा वाटा उचलावा असं अनेक दिवस मनात घोळत होतं. सध्या पुस्तकं कोणी वाचत नाही, नवीन लेखकांना व्यासपीठ मिळत नाही असं सातत्यानं ऐकून ही नकारात्मकता मोडीत काढण्याचा चंग आम्ही बांधला. त्यासाठी मागची दोन-अडीच वर्षे आमचे अव्याहत प्रयत्न सुरू होते. अजूनही ते थांबलेले नाहीत.

मराठी साहित्यात पुढची किमान काही वर्षे टिकून राहील असं काम उभं करण्याचा संकल्प आम्ही केला. त्यातून एक योजना सुचली. रोज एक याप्रमाणं वर्षभरात साधारण 365 पुस्तकं प्रकाशित करायची! ही योजना या क्षेत्रातील दिग्गजांना सांगितल्यावर अनेकांनी आम्हाला वेड्यात काढलं. त्यांच्या या नकारात्मक प्रतिक्रिया आमचा संकल्प आणखी दृढ करत गेल्या. एका ज्येष्ठ प्रकाशकांनी सांगितलं, ‘‘घनश्यामजी, जरा सबुरीनं घ्या... आत्महत्या करावी लागेल...’’ 

मग त्यांना मी बजावलं, ‘‘तशी वेळ आलीच तर घुशीचं औषध खाऊन मरणार नाही! मी परिश्रमानं, कष्टानं इतकं वैभव मिळवेन की हिरा चाटून मरेन!’’

‘चपराक’च्या माध्यमातून अनेक ग्रंथालयांशी, महाविद्यालयांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. इतकंच नाही तर आमच्या असंख्य वाचकांपैकी कित्येकजण असे आहेत की ‘चपराक’चं कोणतंही पुस्तक प्रकाशित झालं तरी ते आवर्जून विकत घेतात. 

आम्ही ही 365 पुस्तकांची योजना जाहीर करताच अनेक वाचकांनी सांगितलं की, ‘त्या-त्या महिन्यात प्रकाशित होणारी पुस्तकं आमच्याकडं पाठवून द्या! आम्ही त्याची वेगळी ऑर्डर द्यायची गरज नाही. ही सर्व पुस्तकं आमच्या संग्रहात हवीतच!’ इतक्या उदारपणे प्रेम करणारे मराठी वाचक असताना ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असं म्हणणं केवळ कृतघ्नपणाचं ठरेल.

एक मोठा वर्ग असाही तयार झालाय की त्यांना आमची ‘बुके ऐवजी बुक’ ही कल्पना आवडलीय. अनेक संस्थांचे विविध कार्यक्रम ‘चपराक’च्या दर्जेदार पुस्तकांसह साजरे होतात. लग्न, मुुंज, वाढदिवस, निवड, नियुक्ती अशा कोणत्याही प्रसंगी भेट आणि प्रतीभेट (रिटर्न गिफ्ट) म्हणूनही आमची पुस्तकं दिली जातात. त्यामुळं अनेक लेखकांच्या पुस्तकांची आवृत्ती अवघ्या चार-दोन दिवसात संपवण्याचे विक्रमही आम्ही केले आहेत. 

या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कोणतीही शासकीय मदत आजवर घेतली नाही, भविष्यात घेणार नाही. काही लेखक त्यांच्या पुस्तकांच्या प्रती विकत घेतात. आमच्या नियतकालिकांना मिळणार्‍या जाहिराती, त्यांच्या विक्रीतून-वर्गणीतून मिळणारा नफा आणि या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री यामुळंच नवनवीन पुस्तकं प्रकाशित करणं आम्हाला शक्य होतं. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकरांचं पुस्तक प्रकाशित केल्यावर तीन दिवसात जवळपास अकराशे प्रतींची नोंदणी होणं, राजेंद्र थोरात यांच्या पुस्तकाची आवृत्ती केवळ आठवड्याभरात संपणं किंवा सुनील जवंजाळ यांच्या कादंबरीच्या प्रती भेट देण्यासाठी एखाद्या पोलीस अधिकार्‍यानं, आमदारानं मागवणं हे सगळंच आमच्यासाठी सुखद आहे. म्हणूनच मराठीत कोणीही लेखक उपेक्षित राहणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. हे करतानाच मराठी लेखक जागतिक स्तरावर जावेत या उद्देशाने आम्ही त्यांची पुस्तकं इंग्रजीत अनुवादीत करण्याचा शुभारंभही केला आहे. भाऊ तोरसेकरांचे ‘व्हाय मोदी अगेन’ हे पुस्तक भारतातल्या आणि जगातल्या वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले आहे. ‘चपराक’च्या अन्य काही पुस्तकांचे इंग्रजी आणि अन्य काही भाषांतील अनुवाद लवकरच आपल्या भेटीस आणत आहोत.

मराठीत पूर्णवेळ लेखन हे उपजिविकेचं साधन होऊ शकत नाही असाही आक्षेप घेतला जातो. काही सन्माननीय अपवाद वगळता हे खरंही आहे. मात्र इतर असंख्य संकल्पाप्रमाणेच आमचा हाही संकल्प आहे की, गुणवत्तापूर्ण, कसदार लेखन करणारा लेखक सन्मानानं जगू शकेल इतपत काम आम्हाला उभं करायचं आहे. या सर्वात वाचकांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. 

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर, वाचकमित्रांनो, तुम्ही फक्त लढ म्हणा! नवा जिज्ञासू वाचकवर्ग तयार करणं आणि काही कारणांनी वाचनापासून दूरावत चाललेला वर्ग पुन्हा पुस्तकांकडं वळवणं हे आमचं, माझं जीवनध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं त्यात यश मिळेल याची पूर्ण खात्री आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक'
७०५७२९२०९२

Tuesday, February 12, 2019

प्रकाशनविश्वाला संजीवनी



मराठी प्रकाशनविश्वावर सध्या मरगळ आली असल्याने हजाराची आवृत्ती पाचशेवर आणण्याची, नव्या लेखकांना संधी न देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे एकुण पुस्तक प्रकाशन संख्याही मर्यादित होण्याचा धोका उभा ठाकला आहे. किंबहुना प्रकाशकांनीच निरुत्साही धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. बरे, असा निरुत्साह दाखवणारे प्रकाशक आजच उगवताहेत असे नाही. पंचविसेक वर्षांपूर्वी ’श्रीविद्या’च्या मधुकाकांनीही ‘तीनशेच्या वर आवृत्ती विकली जाणे अशक्य झाले आहे,’ अशा स्वरुपाची मुलाखत वृत्तपत्रांत दिली होती. 

सरकारी पुस्तक खरेदी आणि टेंडर्स यात यश मिळवण्यात पटाईत झालेल्या प्रकाशकांना आवृत्ती बाजारात विकली जाते की नाही याच्याशी काही घेणेदेणे नसल्याने पुस्तकाचा साहित्यिक अथवा माहितीपर दर्जा सांभाळण्याचीही गरज पडत नाही. कारण ही पुस्तके शेवटी गोदामातच धूळ खात पडत उंदीर-घुशींच्याच उदरभरणाची सोय करणार हे माहितच असते. दहा कोटींच्या मराठी भाषकांच्या राज्यात हजाराही आवृत्ती जेमतेम खपावी आणि तीही आता खपत नाही म्हणून आवृत्तीच कमी पुस्तकांची करावी लागावी हे साहित्यरसिकांसाठी काही भूषणावह म्हणता येणार नाही! पण याला जबाबदार वाचक अहेत की निरुत्साही प्रकाशक याचाही विचार करणे गरजेचे आहे. कारण पुस्तकनिर्मिती करणारेच निर्मिती आणि वितरण या आघाडीवर अपयशी ठरत असतील, त्यांच्या कार्यात जोम आणि उत्साह नसेल तर वाचकांनी उत्साहाने त्यांच्या पुस्तकांकडे का वळावे हाही प्रश्न निर्माण होईल. 
या प्रश्नाचे उत्तर काय तर तरुण आणि जोम-उत्साहाने यंदाच्या वर्षी दिवसाला एक याप्रमाणे तब्बल 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा ‘चपराक प्रकाशना’चे घनशाम पाटील यांनी हाती घेतलेला विक्रम घडवणारा प्रकल्प. 

बाजारपेठच नसेल तर एवढा मोठा महत्त्वाकांक्षी, प्रचंड गुंतवणुकीचा प्रकल्प कोणीही हाती घेणार नाही हे उघड आहे. बरे, या पुस्तकांचे लेखक म्हणजे जुन्या-नव्याचा संगम आहे. म्हणजे नवोदितांना स्थान दिले तर आपले व्यावसायिक गणित कोलमडेल अशी व्यावहारिक भीतीही घनश्याम पाटील यांना शिवलेली दिसत नाही. मग बाकी प्रकाशक जी निरुत्साही आणि निराशावादी भाषा करतात ती खरी का खोटी हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

बरे, पाटील हे नुसते पुस्तक प्रकाशक नाहीत; ते साप्ताहिक चपराक तर चालवतातच पण साहित्य चपराक हे मासिकही गेली 15-16 वर्ष नियमितपणे आणि यशस्वीपणे चालवत आहेत. एकीकडे भली-भली मासिके बंदची पाटी लावून मोकळे होताहेत तर काही त्या वाटेवर आहेत. मग ही मासिके बंद पडली त्याला वाचक जबाबदार आहेत की स्वत: अव्यावसायिक असलेले, नव्या पिढीची साहित्यिक भूक भागवण्यात अपयशी ठरलेले संपादक/प्रकाशक? प्रकाशन बंद पडले की हमखास वाचकांवरच त्याचे खापर फोडण्यात ही मंडळी तरबेज झाली आहेत हे एक वास्तव आहे पण वाचक कमी झालेत काय? चांगले नवे लेखक खरेच आता दुर्मीळ झालेत काय? या प्रश्नांवर घनशाम पाटील यांच्याशी वेळोवेळी जी चर्चा झाली आहे ती सर्वांचेच डोळे उघडणारी आहे.

वाचक कमी झालेला नाही तर त्याच्या जागतिकीकरणाच्या काळातील वातावरणाने बदललेल्या सांस्कृतिक व साहित्यिक अभिरुची सकसपणे भागवणारे लेखन फारसे येत नाही ही खरी अडचण. असे लेखन करणार्‍या लेखकांना प्रस्थापित नाही म्हणून नाकारणारे प्रकाशक असल्याने ते वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग बंद होतो. नवलेखकही वैतागून लेखनाचा तसा कष्टप्रद उद्योग थांबवून आपापल्या कामांना लागतो. जुने प्रस्थापित लेखक अजूनही त्यांच्याच जुन्या काळात अडकत आपल्या जुन्या यशांची आणि कथानकांची फिरवाफिरव करत लेखन देत राहतात. आधीच्या लेखनावर प्रेम करणारे वाचक मग हळूहळू दुरावत जातात आणि शेवटी त्या लेखकांना गुडबाय करतात. हे लेखक फक्त माध्यमांत आपले प्रसिद्धीवलय मिरवण्यात धन्यता मानत राहतात पण वाचक दूर जातो आणि नवेही काही मिळत नाही म्हणून पुस्तकांपासूनच दुरावत जातो. या चक्रव्यूहात वाचक अडकलेत आणि नवी दृष्टी असलेले प्रकाशक दुर्मीळ असल्याने तेही निराशेच्या गर्तेत अडकलेत.

घनशाम पाटील यांचा वर्षात 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम या मरगळलेल्या वातावरणाला संजीवनी देणारा ठरतो. 365 पुस्तके वर्षात प्रकाशित करण्याचे आव्हान त्यांनी घेतले ती केवळ प्रकाशनांची संख्या वाढवण्यासाठी नाही. आजच्या वाचकाला प्रगल्भ करेल, जाणिवा विस्तारेल आणि साहित्यिक भान देईल अशाच पुस्तकांची निवड ते करत आले आहेत. जवळपास दीडशेहून अधिक पुस्तके त्यांनी तयार करुन ठेवलीत. त्यातील काही यंदा वर्षारंभीच प्रकाशितही झालेली आहेत. यामागे मागील त्यांची काही वर्षाची तपश्चर्या आहे. काव्य ते कादंबरी हे सर्व साहित्यप्रकारही त्यात सामील आहेत. जुने लेखक असले तरी त्यांच्याकडून साहित्य मिळवताना ते वर्तमानाशी सुसंगत असेल याचेही भान ठेवले आहे. नव्या लेखकांकडून उत्तम ते काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात ज्यामुळे मराठी प्रकाशनविश्वाची कोंडी झाली आहे ती फोडण्यासाठी योग्य ती दूरदृष्टी दाखवली आहे. ही पुस्तके इ-बुक आणि श्राव्य माध्यमातूनही प्रकाशित केली जाणार आहेत कारण आजची पिढी या नव्या वाचन-माध्यमांना सरावत चालली आहे. थोडक्यात एका तरुणाने तरुणांच्या साहित्यविषयक गरजा ओळखून हाती घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे म्हणावे लागेल.

समस्या वाचक किंवा लेखक नसून स्वत: प्रकाशकच आहेत. प्रकाशकांनाच बदलावे लागेल नाहीतर त्यांना या व्यवसायातूनच बाहेर पडावे लागेल हा इशारा वाचकांनीच दिलेला आहे. या इशार्‍याला समजावून घेण्याची कुवत बव्हंशी प्रकाशकांत नाही. घनशाम पाटील यांनी तो ओळखून हा प्रकल्प हाती घेतला आहे तो अभिनंदनीय ठरतो तो यामुळेच! 

- संजय सोनवणी 
दैनिक 'संचार', सोलापूर 
१२ फेब्रुवारी २०१८ 

Thursday, January 10, 2019

साहित्यिक दहशतवाद घातक


साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिले नाही. दरवेळी काहीतरी खुसपट काढायचे आणि वादाची ठिणगी पडताच त्याचा वणवा कसा होईल याची दक्षता घ्यायची हा काही समदुःखी लोकांचा धंदाच होवून बसला आहे. या सगळ्यात प्रसारमाध्यमेही न्यायाधीशाच्या भूमिकेत जातात आणि मग हे वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळत जातात. यंदा अरूणाताई ढेरे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेची निवड सर्वानुमते संमेलनाध्यक्षपदी झाल्याने हे संमेलन वादाशिवाय होणार असे वाटत होते. मात्र काहींनी आपल्या कद्रू मनोवृत्तीचे दर्शन घडवत यंदा काही खेळ्या केल्या आणि उद्घाटकावरून यवतमाळला होणारे हे संमेलन चर्चेत आले. 

नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिकेचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काय काम? या मुद्यावरून या वादाला सुरूवात झाली. त्यानंतर त्या पंडित नेहरूंच्या भाची आहेत आणि नरेंद्र मोदी सरकारच्या विरूद्ध एल्गार पुकारत साहित्य अकादमीच्या पुरस्कार वापसीची सुरूवात त्यांनी केली होती हे कळल्यावर याला राजकीय रंग चढला. त्यातही त्यांनी त्यांचे भाषण आयोजकांकडे पाठवल्यावर त्यांची गोची झाली आणि त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

कोणत्याही भाषेतील लेखकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येण्यास मज्जाव करणे हा अविवेक आहे. हे अखिल भारतीय संमेलन असल्याने सर्व भाषा भगिणीतील सौहार्द वाढण्याच्या दृष्टिने उलट हे अत्यावश्यक आहे. गेल्या काही काळातला विचार केल्यास घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाने याबाबत स्तुत्य पायंडा पाडला आहेे. आजवर इतर प्रांतातील अनेक लेखक साहित्य संमेलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे मराठी भाषेची पताका सर्वत्र डौलात फडकण्यात मदतच झाली आहे. पुण्याच्या साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अमराठी महानायकाला बोलावण्यात ज्यांनी पुढाकार घेतला तेही सहगल यांच्या ‘इंग्रजी लेखिका’ असण्यावरून टीकाटिपण्णी करत आहेत. त्यामुळे नयनतारा सहगल यांच्यासारख्या लेखिकेला नकार कोणी दिला यावरून चर्चा करतानाच त्यांना बोलवण्याचा निर्णय कोणाचा होता हेही तपासून पाहिले पाहिजे. आयोजकांचा आणि साहित्याचा अर्थाअर्थी दुरान्वयानेही संबंध नसताना ही खेळी नेमकी कोणी खेळली? यामागे काही ‘व्यापक कटाचा’ भाग होता का? हे पडताळून पाहणे अगत्याचे आहे.

सहगल यांचे साहित्यात फार काही मोठे योगदान आहे अशातलाही भाग नाही. त्या इथे येवून काय बोलणार याचा अंदाज बांधणेही अवघड नव्हते. त्या काही साहित्यिक मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे साहित्य व्यवहाराला काही वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा ठेवणे निव्वळ खुळेपणाचे होते. मग त्यांना साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून का बोलावले आणि पुन्हा नकार देण्याचा करंटेपणा का केला हे स्पष्ट झालेच पाहिजे. या सगळ्या प्रकारामुळे आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत.

साहित्य संमेलने बंद करा, असा एक मतप्रवाह गेल्या काही वर्षात सुरू आहे. हा म्हणजे ‘संधीवाचून ब्रह्मचारी’ अशातला प्रकार आहे. या संमेलनाला एक मोठी परंपरा आहे आणि भाषेच्या अस्तित्वाच्या, सन्मानाच्या दृष्टीने हा सोहळा साहित्यप्रेमींत चांगलाच रूजला, रूळला आहे. या निमित्ताने दरवर्षी साहित्यिक मंथन घडते,  साहित्यातीन चैतन्य बहरते आणि खळाळते राहते. या प्रेरणा अनेकांसाठी स्फूर्तिदायी ठरतात. हे संमेलन आणखी सर्वसमावेशक कसे होईल, प्रतिभावंतांचा सहभाग या संमेलनात कसा वाढेल, ते अधिकाधिक वाचकाभिमुख कसे होईल यादृष्टीने बरेच काम करता येण्यासारखे आहे आणि ते सुरूही आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाविषयी असलेली नकारात्मकता दूर सारून प्रत्येकाने यात योगदान दिले पाहिजे. पंढरीची वारी ज्याप्रमाणे असंख्य वारकर्‍यांना जगण्याचं बळ देते त्याचप्रमाणे साहित्य संमेलन बौद्धिक क्षेत्रातील माणसांना प्रवाही ठेवते.

ह. भ. प. बंडातात्या कर्‍हाडकर यांच्या विरोधामुळे यापूर्वी महाबळेश्‍वर येथील संमेलन अध्यक्षाविना पार पडले. आनंद यादव आणि त्यांचे प्रकाशक ‘मेहता’ यांनी जाहीर माफी मागितली. यादवांनी त्यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेतली त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे कुठे होते? चिपळूणच्या संमेलनात व्यासपीठावर परशुरामाची प्रतिमा लावल्याने ती बदलायला लावणारे आज गळे काढत आहेत. ठाण्याचे संमेलन दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होतेय म्हणून त्याला विरोध झाला होता. आपल्याकडे राजकारणात जाहीर केलेल्या उमेदवार्‍या रद्द होतात, आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघारी घेतला जातो, एखाद्या विषयावर ठेवलेली चर्चा ऐनवेळी रद्द केली जाते किंवा संबधितांच्या मताला अनुकूल नसलेले पाहुणे बदलले जातात; मग उद्घाटक बदलले तर सामान्य रसिकाला त्रास होण्यासारखे काहीच नाही. माघार घेणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याने त्यात जे कोणी दोषी असतील त्यांचा निषेध जरूर करावा परंतु यानिमित्ताने संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भाषा अत्यंत गैर आहे. 

महत्त्वाचे म्हणजे "अरूणा ढेरे यांना दुर्गा भागवत होण्याची संधी आहे' असे म्हणत त्यांच्यावर मानसिक दबाव आणणे हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे? हा लेख प्रकाशित होईपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली असेल किंवा त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्या या विषयावर बोलतील, लिहितील! मात्र त्यांनी निषेध नोंदवलाच पाहिजे म्हणून त्यांना भंडावून सोडणे हा साहित्यिक दहशतवाद नाही काय? गेल्या काही वर्षात खुज्या वृत्तीच्या संमेलनाध्यक्षांमुळे संमेलनाची रया गेलीय असा आरोप करणार्‍यांना अरूणाताई यांच्यासारख्या व्यासंगी कवयित्रीचा, प्रतिभावान लेखिकेचा सन्मान करणेही शक्य होऊ नये? हे सगळेच आपल्या व्यवस्थेला न शोभणारे आणि लाज आणणारे आहे.

अरूणा ढेरे या संमेलनाध्यक्ष आहेत. त्यामुळे जे कोणी त्यांच्यावर दोषारोप करीत आहेत किंवा अप्रत्यक्षरित्या वेठीस धरत आहेत त्यांनी त्यांची यत्ता तपासून पाहणे गरजेचे आहे. गेल्या काही काळात संमेलनाध्यक्षांनी प्रत्येक विषयावर त्यांची मते मांडायलाच हवीत असा एक नवीन प्रघात सुरू झालाय. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा यादृष्टीने हे वाईट आहे. ‘नरेंद्र मोदी सीमेवर कशाला बोंबलत फिरतोय? त्याला कुठून, कशी गोळी घुसेल हेही कळणार नाही’ असे विधान करून यापूर्वी एक संमेलनाध्यक्ष चर्चेत आलेच होते. मागच्या संमेलनातही ‘राजा तू चुकतोस’ असे म्हणत तेव्हाच्या संमेलनाध्यक्षांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. या सर्व साहित्यबाह्य विषयात साहित्याचा आत्माच हरवत चालला आहे. कधी प्रकाशक परिषदेचा बहिष्कार, कधी खाण्या-पिण्याच्या पदार्थावरून वाद, कधी साहित्यिक सहभागावरून मतभिन्नता, अध्यक्षांच्या निवडीवरून नाराजी या व अशा सगळ्या प्रकारात भाषेच्या विकासाकडे सगळ्यांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. साहित्यातले पुढारी त्यांच्या उंचीला साजेशी विधाने करून या परंपरेला गालबोट लावण्यात आणखी पुढाकार घेतात.

यापूर्वी यवतमाळला झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष गदिमा होते. त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा साहित्यप्रेमी नेता उपस्थित होता. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षपदी अरूणाताई ढेरे आहेत ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. 

काही सन्माननीय अपवाद वगळता साहित्य संमेलनाचे आयोजक, स्वागताध्यक्ष यांचा साहित्याशी काहीही संबंध नसतो. ते त्यांची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने काम करत असतात. शिवाय या संमेलनाला राजकीय पाठबळ आणि पुरेशा प्रमाणात पोटबळही लाभते. त्यामुळे संमेलनात राजकीय सहभाग नको, असे म्हणणे गैरलागू आहे. ज्यांना साहित्याचा पुळका येतो त्यांनी हे लक्षात घ्यावे की यापूर्वी एकदाच नव्हे तर अनेकदा शरद पवारांची साहित्य संमेलनातील भाषणे अध्यक्षांपेक्षाही जास्त प्रभावी ठरलेली आहेत. राजकारण हा सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी घरातही आपण ते टाळू शकत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात राजकारण आणि पुढार्‍यांचा वावर टाळता येणे शक्य नाही. हे सर्व पुढारीही मराठीच आहेत आणि मराठी माणसांचेच प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवा, असा गळा काढणारे टिकोजीराव ढोेंगी आहेत. 

साहित्यिकांनी त्यांच्या विचारधारा, गटतट याच्या पुढे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, गाडून किंवा पुरून टाका’ असे जर नव्या पिढीला वाटू लागले तर ते प्रस्थापितांचे मोठे अपशय असणार आहे. त्यांनी संकोचित भूमिका घेणे सोडून व्यापक दृष्टी बाळगणे आणि नवोदितांना प्रोत्साहन देणे, ही परंपरा समृद्ध करणे हेच त्यांच्या आणि साहित्यविश्‍वाच्या दृष्टीनेही भल्याचे आहे.
- घनश्याम पाटील
पुणे 
7057292092
( दैनिक 'पुढारी' संपादकीय पान)

Thursday, November 15, 2018

कशासाठी? भुकेसाठी!


एका लेखात मी लिहिलं होतं की, ‘आजच्या राजकारण्यांना भस्म्या झालाय आणि कितीही खाऊनसुद्धा त्यांची भूक भागतच नाही...’
मग मला प्रश्न पडला की ‘भूक’ म्हणजे नेमकं काय? भूक लागणं, भूक भागवणं, भूक मारणं असे अनेक शब्दप्रयोग आपण करत असतो. मग ही ‘भूक’ लागते म्हणजे नेमकं काय होतं? ते सिद्ध कसं करावं?
भूक ही एक पूर्णपणे आवर्ती म्हणजे निश्चित कालावधीनंतर पुन्हा पुन्हा निर्माण होणारी संवेदना आहे. आपण अन्न विकत घेतो, पण भूक कशी विकत घेणार? जठर रिकामं झाल्यावर जी वखवख होते, जाणवते त्यालाच तर भूक म्हणतात. या भुकेसाठी आजवर अनेक युद्धं झाली. प्रचंड क्रौर्य दाखवत माणसं मारली गेली. भूक भागावी म्हणून लोकांनी नको नको ते उद्योग केले. ही भूक नेमकी कशी असते हे मात्र कोणी ठामपणे सांगू शकत नाही. भुकेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. अनेक लेखकांनी भुकेचा धर्म, भुकेची संस्कृती यावर लेखन केलं. जगभर भुकेविषयी मोठ्या प्रमाणात संशोधन झालं. ते अजूनही सुरूच आहे. भुकेचा तळ गाठणं मात्र भल्याभल्यांना जमलं नाही.
भुकेची संवेदना भागली नाही तर माणूस अस्वस्थ होतो. त्याला ग्लानी येते. हा अस्वस्थ माणूस पुढे अत्यवस्थ होतो आणि काहीवेळा त्याचा ‘भूकबळी’ही जातो.  इतकं सारं होऊनही भूक काय असते हे मात्र त्याला कळतच नाही. अन्न खाण्याची इच्छा निर्माण होणं आणि त्यावेळी ते चवीनं खाणं याला ‘भूक भागणं’ म्हणतात. ही भूक भागवण्यासाठी माणसानं आजवर जो संघर्ष केला त्याला तोडच नाही.
पूर्वी माणूस भूक भागवण्यासाठी झाडाची पडलेली फळं खायचा. निसर्गाच्या विरूद्ध जाऊन एखादं फळं तोडायचीही त्याची हिंमत व्हायची नाही. त्यानंतर त्यानं शिकारी सुरू केल्या. ते करतानाही त्यांना स्वतःच्या भुकेबरोबरच जो प्राणी ‘शिकार’ होणार आहे त्याचीही चिंता वाटायची. या चिंतेवर भूक विजय मिळवायची. मग तो त्याला मारण्याआधी त्याची माफी मागायचा. त्याची म्हणजे देवाची माफी नव्हे! संबंधित प्राण्याची!! उदा. त्याला एखादं हरीण मारायचं असेल तर तो त्याला मनोभावे नमस्कार करायचा. ‘माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भुकेसाठी तुझा जीव घेणं मला गरजेचं आहे. त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. त्यामुळं आम्हाला माफ कर’ असं म्हणून तो शिकार करायचा व ते मांस खायचा.
त्यानंतर शेतीचा शोध लागला आणि माणूस विचार करू लागला. भुकेच्या गरजेतून त्याची ‘विचार’ करण्याची क्षमता विकसित झाली आणि त्यानं नवनवे प्रयोग सुरू केले. त्यातून अनेक शोध लागले आणि त्याची भूक वाढतच गेली. त्याच्या पारड्यात त्या शोधाचं फळ पडलं. त्यातून त्याचा हव्यास वाढतच गेला. ही भूक कमी होण्याऐवजी त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा-आकांक्षा वाढत गेल्या. त्याचं समाधान, त्याची तृप्ती या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या. भूक लागणं, ती भागवणं हेच त्याचं चक्र सुरू झालं. भुकेची सवय झाली. ती लागल्यावर कशी भागवावी याचं ज्ञान त्याला मिळालं.
शेतीचा शोध लागल्यावर वेगवेगळे समूह तयार झाले. त्यातून त्यांच्या टोळ्या आल्या. मग सुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं सुरू केलं. इतरांवर ते संघटितपणे तुटूनही पडू लागले. या टोळ्या नवनवीन शोधाच्या बळावर, त्यांच्या कौशल्यावर जगू लागल्या. मग या गटांच्या जाती झाल्या. आलुतेदार-बलुतेदार पद्धती निर्माण झाल्या. या जातींनाही प्रतिष्ठा मिळू लागली. त्यांच्या त्यांच्या जाती या त्यांच्यासाठी अहंकाराचा, स्वाभिमानाचा विषय झाला. म्हणजे चप्पल चांभारानं तयार करायची, कुणब्यानं शेती करायची, ब्राह्मणानं ज्ञानदान करायचं, ढोरानं जनावरांची कातडी सोलायची, माळ्यानं बागकाम करायचं, वडारानं मुर्तीकाम साकारायचं, मराठ्यानं अनिष्ठतेविरूद्ध लढा द्यायचा आणि सामान्य माणसाला संरक्षण द्यायचं असं त्यांच्या त्यांच्या कामाचं विभाजन झालं. त्यातून त्यांच्या अस्मिता टोकदार झाल्या. आजतर त्या खूपच भयावह वाटतात. केवळ कर्मानुसार, भुकेच्या गरजेनुसार ज्या समुहांनी ज्या जाती स्वीकारल्या होत्या त्यामुळं देश दुभंगला आहे. राजकारण्यांनी त्याला सातत्यानं खतपाणीच घातलं. आज आपल्यासमोर सर्वात मोठी समस्या ही जाती-धर्माची आहे. माणूस एकसंध रहावा, त्याच्या हाताला काम मिळावं, त्याचं साहचर्य वाढावं म्हणूज जी संकल्पना साकारली होती तिच आज त्याच्या मुळावर उठली आहे.
भूक लागल्यावर माणसाला किंवा कोणत्याही सजीव प्राण्याला अन्न लागते. ते वेळेत मिळाले नाही तर तो बिथरतो. उपासमार सुरू झाली की तो भ्रमिष्ट होतो. त्याचा सारासार विवेक संपतो. मग भूक भागवण्यासाठी तो वाटेल ते करतो. क्षुधानाश झाल्यावर अनेक भयगंड वाढतात. एकप्रकारची उद्विग्नता येते. त्यातून शरीराचं आणि मनाचं कुपोषण वाढत जातं. ते माणसाला मारतं. काहीवेळा इतरांना मारायला प्रवृत्त करतं. 
भूक ही संवेदना मनाशी निगडित असते, शरीराशी निगडित असते. तिचा विस्तार संबंधिताच्या महत्त्वाकांक्षेनुसार, गरजेनुसार होत जातो. जी माणसं भुकेसाठी काही दुष्कृत्ये करतात त्यांना आपण जनावरांची उपमा देतो. हा खरं तर जनावरांचा अपमान आणि त्या माणसाचा सन्मान असतो. एखादा वाघ त्याला भूक नसेल तर उगीच शिकार करत नाही. त्याच्या आजूबाजूला कितीही प्राणी असले तरी तो ढुंकूनही बघत नाही. भूक लागली तरच तो शिकारीसाठी बाहेर पडतो. या क्षेत्रातले जाणकार सांगतात की त्याला मिळणार्‍या शिकारीचं प्रमाणही खरंतर खूप कमी असतं. म्हणजे त्यानं वीसवेळा शिकार करण्याचा प्रयत्न केला तर तो त्यात एकदा यशस्वी होतो. जनावरांत बलात्काराचं प्रमाण नगण्य आहे. विशिष्ठ अपवाद वगळता कोणतंही जनावर मादीवर अत्याचार करत नाही. मादी माजावर आली, तिनं स्वतःहून आव्हान दिलं, तिनं परवानगी दिली तरच त्यांच्यात संबंध येतात. भूक आणि मैथुन सोडले तर अनेक प्राण्यांना फार बुद्धिही नसते. तरीही ते अतिरेक करत नाही. माणसानं या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याला बुद्धी मिळाली पण त्यानं सातत्यानं त्याचा गैरवापरच केला. अगदी पूर्वी राजे-महाराजे युद्धं जिंकायचे तेव्हा शत्रूपक्षातील स्त्रियांवर त्यांचा डोळा असायचा. छत्रपती शिवरायांसारखा एखादाच राजा असा होऊन गेला की ज्यानं शत्रूंच्या स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. उलट त्यांना सन्मानानं परत पाठवलं. असे काही अपवाद सोडले तर माणसानं सातत्यानं वर्चस्ववादी प्रवृत्तीच बाळगली. त्याची भूक काही संपता संपली नाही, संपणार नाही.
 भुकेसाठी माणूस अनेकांच्या जिवावर उठत असताना जगभर असंख्य लोक एकवेळच्या खाण्यासाठी मोताद आहेत. त्यांची ही तडफड पाहून आपल्या मनात कालवाकालव होईल. मग या भुकेचा बाजार मांडला जातो. त्यांची भूक भागवण्यासाठी त्यांना आमिषं दाखवली जातात. त्यातून संहार घडतो. ‘हंगर इकॉनॉमी’ जगावर राज्य करतेय. आपली भूक भागवण्यासाठी माणूस इतरांवर अन्याय-अत्याचार करतो. भूक भागवण्यासाठी तो इतरांच्या अन्यायाला बळीही पडतो. काहीही करून भूक भागली पाहिजे असा त्याचा पवित्रा असतो. आपली आणि आपल्या कुटुंबियांची भूक भागावी यासाठी सामान्य माणसाची धडपड असते. 
ही भूक भागणार नाही अशी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की तो नवनवीन मार्ग निवडतो. त्यातून त्याची भूक वाढतच जाते. या भुकेच्या भयातून जगभर धर्मसंस्कृती बळावली. अक्षरशः मुजोर झाली. त्यातून ‘टेंपल इकॉनॉमी’ची दहशत निर्माण झाली. जगभरात अनेक चर्च प्रतिसरकार चालवतात. मस्जिदीतून त्या समुदायाची सूत्रं हलतात. मंदिरातून नको ते उद्योग केले जातात. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते की, ‘राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे.’ त्यांच्या या विधानावर गहजब माजवला गेला; पण हे वैश्विक सत्य आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात त्यांचा पोप राष्ट्राच्या निर्णयावर परिणाम होईल इतकी शक्ती स्वतःजवळ बाळगतो. विविध चर्चच्या माध्यमातून धर्मांतरासाठी जे पैसे वापरले जातात त्यात कित्येक राष्ट्रातील भुकेची समस्या कायम निकाली निघू शकते. यावर संबंधितांनी विचार केला नसेल असे नाही पण ही समस्या संपली तर त्यांचे महत्त्व संपले. जोपर्यंत भूक अस्तित्वात आहे तोपर्यंत भीती आहे. ही भीती असेपर्यंत कोणत्याही राज्यसत्तेला, धर्मसत्तेला भय नाही. भय आणि भूक यावर जगाची धोरणं ठरतात.
भूक लागली की गरज पडते ती अन्नाची! मग अर्थातच ‘फूड इंडस्ट्री’ प्रबळ ठरते. अन्न तयार करण्यासाठीचे धान्य पिकवतो तो शेतकरी! या शेतकर्‍याची मात्र भूक भागेल इतकंही त्याच्या वाट्याला येत नाही. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, अन्नपदार्थ विकणारे हॉटेल्स हे मात्र अर्थसत्तेचे केंद्रबिंदू आहेत. 
मध्यंतरी वाचले होते की आपल्या खाण्याची आवड निर्माण करण्यात काही जागतिक संघटना पुढाकार घेतात. म्हणजे मुलांनी गोड चॉकलेट खायला हवीत, त्यांच्या प्रत्येक खाऊमधून त्यांच्या पोटात जास्तीत जास्त ‘शुगर’ जायला हवी, त्यांना कमीत कमी प्रथिने मिळून ते त्या सवयीचे गुलाम व्हावेत यासाठी ही लॉबी काम करते. मग अनेकांचे वजन वाढते. लठ्ठपणा येतो. विविध आजार जडतात. मधुमेह तर जवळपास प्रत्येकाचीच पाठ पुरवतोय. असे आजार नाहीत असा माणूस मिळणे दुर्मीळ झालेय. प्रत्येक खाद्यपदार्थात भेसळ केली जाते. त्यात तात्कालिक फायदा व्हावा ही अपेक्षा तर असतेच पण माणूस जास्तीत जास्त असहाय्य कसा होईल, त्याला शारीरिक दौर्बल्य कसे येईल, विविध आजार त्याचा पिच्छा कसा पुरवतील, तो परिस्थितीपुढं हतबल कसा होईल इकडं या कंपन्यांचं लक्ष असतं. त्यातून वैद्यकिय व्यवसाय उभा राहिला. औषधोपचार पुरविणार्‍या कंपन्यांनी त्यांचे ग्राहक तयार केले. त्यांचं जाळं जगभर विखुरलं. आज ‘हेल्थ इंडस्ट्री’ जगावर राज्य करतेय. साधी ऍसिडीटी झाली तरी अँजिओप्लास्टी करणारी रूग्णालयं कमी नाहीत. अशावेळी रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड घाबरविण्यात येतं. काही बोलावं तर जिवाशी खेळ. म्हणून यांचं फावतं. या सगळ्याचं मूळ खाण्यात आहे. खाण्याचा संबंध भुकेशी येतो.
खाण्यावर कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही. पूर्वी आपण सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळाच खायचो. जाता-येता ‘चरणं’ आपल्या जुन्या पिढीला माहीत नव्हतं. आपली ती आवड प्रयत्नपूर्वक विकसित केली गेली. खाण्याच्या चुकीच्या सवयी लावल्या गेल्या. काहीजण जगण्यासाठी खातात! अनेकजण खाण्यासाठीच जगतात. मग सगळ्या आजारांना निमंत्रण मिळणं स्वाभाविक आहे. जिभेचे चोचले पुरवणं आणि जिभेवर ताबा न ठेवणं यामुळं अनेकजण आयुष्यातून उठलेत. त्यांच्याकडं बघूनही आपण काही बोध घेत नाही. अकारण बोलत सुटतो. खात सुटतो...
डॉ. श्रीकांत जिचकार यांनी यावर मोठा अभ्यास केला होता. त्यांनी सांगितलं की, दिवसात दोनच वेळा जेवत जा! त्याही वेळा निश्‍चित ठेवा. म्हणजे सकाळी नऊ आणि रात्री नऊ असे दोनदा जेवत असाल तर त्या 55 मिनिटांत जे खावेसे वाटेल ते खा! उदा. नऊची वेळ ठरली असेल, सव्वानऊ पर्यंत जेवण झाले आणि थोड्या वेळात पुन्हा तुम्हाला काही खावे वाटले तर 55 मिनिटांच्या आत खा. एकदा एक घास खाल्ला की शरीरात इन्शुलिन तयार होते. ते 55 मिनिट असते. तोपर्यंत जे वाटेल ते खा. त्यानंतर मात्र दोन जेवणात पुरेसे अंतर ठेवा. पुन्हा रात्रीच्या जेवणात पुढची 55 मिनिटं! इतकं साधं सूत्र ठेवल्यानं अनेकांचे आजार पळाले. ज्यांना मधुमेह आहे तोही आटोक्यात आला. डॉ. जिचकार यांच्यानंतर मराठवाड्यातील डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी हा विचार जगभर पोहोचवला. त्यांचे अनुयायी सर्वत्र आहेत. त्यांनी आरोग्यविषयक, आहारविषयक जी तत्त्वं घालून दिलीत ती मानणारी आणि त्याचा फायदा लक्षात आलेली असंख्य माणसं आहेत. 
जशी खाण्याची भूक असते तशी सत्ता, पद, पैसा, प्रतिष्ठा याचीही भूक असते. मग त्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार होतो. बायकांच्या मनाची भूक भागत नाही. पुरूषांची शरीराची भूक भागत नाही. त्यातून अन्याय-अत्याचाराची मालिका घडते. पैशांचे व्यवहार येतात. फसवणूक केली जाते, नागवणूक केली जाते. अडवणूक केली जाते. वर्चस्व गाजवले जाते. धमकावले जाते. फायदा करून घेतला जातो. गैरफायदा घेतला होतो. त्यासाठी प्रसंगी कायदा विकत घेतला जातो, विकला जातो. हे सगळं भुकेतून घडतं. भूक माणसाला स्वस्थ बसूच देत नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, शरीराची गरज भागवण्यासाठी, मनाचे समाधान करून घेण्यासाठी, इच्छा-आकांक्षांचे मनोरे उभारण्यासाठी काहीही, म्हणजे अगदी काहीही केले जाते. त्यावर कुणाचेच निर्बंध राहत नाहीत. 
राजघराण्यातील अनेक मंडळी, काही राजकारणी, उद्योजक, खेळाडू, अभिनेते-अभिनेत्री, कलावंत... थोडक्यात विविध क्षेत्रातील धनाड्य मंडळींची भूक काही संपत नाही. मग ते कोणत्याही थराला जातात. त्यातून मानवी-अमानवी कृत्यं घडतात. ‘नरडीचा घोट घेणं’ हा वाक्प्रचार तंतोतंत लागू पडतो. माणसं मारली जातात. काही हकनाक मरतात. तरीही त्यांची क्षुधाशांती होत नाही. भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते. त्यात सध्या श्रमापेक्षा प्रेमाला जास्त प्रतिष्ठा मिळतेय. ते प्रेमही खरंच असेल असं नाही. किमान तसं दाखवलं जातं. जो कष्ट करतो तो उपाशी राहणं, त्याची भूक न भागणं हे आपल्या समाजाचं मुर्दाडपण आहे. त्याउलट आपली ‘हवी ती’ भूक भागवण्यासाठी माणसांना वेठीस धरणं, त्यांच्याकडून वाटेल ते करून घेणं हा अनेकजण त्यांचा धर्मच समजतात.
चार ठुमके घेतल्यानंतर एखाद्या नाचणारीला लाखो रूपये मिळतात. त्याला कलेचं, साधनेचं आवरण घातलं जातं. त्याउलट दिवसभर मोलमजुरी करून, काबाडकष्ट करून कुटुंबियांचं एकवेळचं जेवणही भागत नसल्यानं असंतोष वाढत जातो. त्यातून विषमता पसरते. द्वेष वाढतो. माणसाचा सैतान होतो. या परिस्थितीतूनच अनेक गुन्हेगारांचा जन्म झालाय. हत्याकांडं घडलीत. दहशतवादी निर्माण झालेत. नक्क्षली फोफावत गेलेत. या सगळ्यांच्या भुकेचा बाजार मांडण्यात राजकारणी पटाईत असतात. ते बरोबर त्याचा फायदा घेतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात,
भुके नाही अन्न
मेल्यावरी पिंडदान
हे तो चाळवाचाळवी
केली आपणाची जेवी! 
स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी माणूस इतरांच्या भुकेचा आधार घेतो. त्याला रूढी, परंपरा, संस्कृतीचं कोंदण लावतो. ज्याची भूक भागलीय ते तृप्त होत नाहीत. कारण भूक ही चिरंतन अवस्था नाही. उलट त्याची भूक वाढतच जाते. मग इतरांच्या भुकेचा तो विचारच करत नाही. 
भूक लागल्यानंतर आपण जे खातो त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ती आपल्याला तंदुरूस्त ठेवते! पण भूक भागल्यानंतरही जे खावंसं वाटतं त्यामुळं खरे प्रश्न सुरू होतात. मग ते आरोग्याचे असोत वा मनाचे! काहीवेळा भूक नसते पण भुकेचा भास होतो.  पोट भरलेलं असतानाही एखादा अन्नपदार्थ पाहून तो खाण्याची इच्छा होणं, एखाद्या चित्रपटातील, चित्रातील भाव पाहून आपल्या मनात तशी इच्छा निर्माण होणं हे ‘हंगर सिग्नल’ असतात. ही  भूक शारीरिक असेल, लैंगिक असेल! त्यावेळी ती भावना पूर्ण करायलाच हवी असं अजिबात नाही. भुकेच्या वेळी योग्य तेच आणि योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं असतं. 
जगात कोणीही उपाशी राहू नये, त्याची भूक भागावी, त्याच्या भुकेला दोन घास मिळावेत, तो तृप्त व्हावा, त्याच्या भुकेचा हव्यास वाढू नये आणि त्याला काही कमीही पडू नये! असं झालं तर चराचरातील चैतन्य बहरून येईल. भुकेच्या वेळात तो त्याला आवडेल ते, पचेल ते खाऊ शकेल आणि भुकेमुळे कोणीही उपाशी राहणार नाही, तो आपल्यासाठी सुदिन! हजारो वर्षाच्या संघर्षानंतर का होईना पण तो दिवस यावा हीच यानिमित्ताने प्रार्थना! 
(सोलापूर व्हिजन, दिवाळी अंक 2018)

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Tuesday, November 13, 2018

दुर्बल ‘सबल’ व्हावेत!


ही गोष्ट आहे दोन तगड्या माणसांची! 
एक प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी होता; तर दुसरा अतिशय शून्यातून राजकारणात आपलं नाव गोंदवणारा! 
त्याचं झालं असं की, ‘शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतचि होता’ असं सांगणारे लोककवी मनमोहन नातू आजारी पडले. वयानुसार त्यांनी अंथरूण धरलं तरी त्यांची उमेद, त्यांचा स्वाभिमान हा मात्र तसाच होता. ती बातमी तेव्हाच्या एका आघाडीच्या वृत्तपत्रात आली. त्याकाळी वृत्तपत्रात काय छापून यायचं याकडं राजकारण्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. माहिती, मनोरंजन आणि ज्ञान समाजाला एकाचवेळी देणारी वृत्तपत्रं असल्यानं राजकारण्यांवर त्यांचा अंकुश असायचा. 
तर ही बातमी महाराष्ट्राच्या तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी वाचली. त्यांचं मन भरून आलं. डोळे पाझरू लागले. आपल्या आवडत्या कवीचं आपल्याला विस्मरण झालं म्हणून त्यांना उचंबळून आलं. त्यांनी हातातली सर्व कामं बाजूला सारली. मुंबईहून गाड्यांचा ताफा निघाला तो थेट पुण्याकडं. मनमोहनांच्या घरासमोर अर्थमंत्र्यांची लाल दिव्याची गाडी थांबली.
सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अर्थमंत्र्यांच्या साहित्यप्रेमाचं कौतुकही वाटलं. मंत्रीमहोदय मनमोहनांजवळ गेले. त्यांना त्यावेळी धड बोलता येत नव्हतं की उठून बसता येत नव्हतं. 
अर्थमंत्र्यांनी त्यांची अडचण ओळखली आणि सांगितलं, ‘‘तुम्ही उठू नकात. बोलूही नकात. मी फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला आलोय.’’
अर्थमंत्री म्हणाले, ‘‘माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता आकाशवाणीवरून ऐकायचो. त्या अनेकांना म्हणून दाखवायचो. मी कोर्टात नोकरी केली. राजकारणात आलो. आता अर्थमंत्री आहे. तुमच्या कवितेचा संस्कार माझ्यात रूजलाय. मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. आज वृत्तपत्रात तुमच्या तब्येतीविषयी वाचले आणि तुम्हाला भेटायला आलोय. माझ्या आवडत्या कवीराजाला मला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तुम्हाला काय देऊ ते सांगा....’’
त्यावर सगळे शांत झाले. त्यांचा नम्रपणा पाहून भारावूनही गेले. काहींच्या पोटात गोळा आला की हे आता काय मागणार? कदाचित सरकारी कोट्यातून घर मागतील, मुलासाठी नोकरी मागतील, गाडी मागतील किंवा त्यांच्या नावे काही सरकारी कार्यक्रम, उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतील....
सगळ्यांचं लक्ष मनमोहनांकडं होतं. 
अफाट प्रतिभेचा हा अवलिया अर्थमंत्र्यांकडं पाहत होता. त्याला शब्द फुटत नव्हते. मग त्यांनी खुणेनं सांगितलं की मला कागद-पेन द्या...! ते दिलं गेलं. त्यावर मनमोहन नातू या अफाट प्रतिभेच्या बेफाट माणसानं चार ओळी लिहिल्या. सगळ्यांना वाटलं, त्यांना जे हवंय ते त्यांनी लिखित स्वरूपात मागितलंय. काय लिहिलं असावं त्यावर? सगळेच विचारात पडले.
थरथरत्या हातानं लिहिलेलं ते अक्षर कुणालाही कळत नव्हतं. आजचे आघाडीचे लेखक असलेले डॉ. न. म. जोशी हा तरूण त्यावेळी तिथं होता. त्यांना मनमोहनांचं अक्षर लागायचं. तो कागद अर्थातच त्यांच्याकडं दिला गेला. त्यावर लिहिलं होतं,
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको; 
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
खाटेवर असले म्हणून काय झाले? ते तर साहित्यातले राजेच होते. त्यांना आणखी कोण काय देणार? 
या वयातही इतकी निस्पृहता आणि स्वाभिमान हा आजच्या काळात चेष्टेचा विषय ठरावा. या अर्थमंत्र्यांनी पुढे बरीच मजल मारली. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. देशाचे गृहमंत्री झाले. कोर्टातला शिपाई ते देशाचे गृहमंत्री असा प्रवास असलेले सोलापूरचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतची ही सत्य घटना. मनमोहनांना जाऊन आज कितीतरी वर्षे झाली. मात्र सुशीलकुमारच काय तर कोणीही त्यांना उपेक्षेशिवाय काहीच देऊ शकले नाही. युगानुयुगाची अवहेलना वाट्याला आलेला हा कवी अनेकांच्या हृदयात मात्र आजही बेगुमानपणे राज्य करतोय. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हे वाचा -
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू-बाबरपेक्षा
गालिब हृदय वेधित राही!
काळाच्या ओघात कितीतरी हुमायू-बाबर येतील-जातील... समाजाच्या अंतःकरणात मात्र गालिबच ठाण मांडून बसलेला असेल.
असे ‘गालिब’ आज किती आहेत? त्यांच्यातला ‘स्वाभिमान’ जिवंत आहे का? मग त्यांना ‘पुरस्कार वापसी’च्या कुबड्या का बरे घ्याव्या लागतात?
लोकमान्य टिळकांच्या बाबत एक किस्सा सांगितला जातो. त्यावेळी ते मंडालेच्या तुरूंगात होते. इकडं त्यांच्या मुलानं एका परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर त्यांनी लोकमान्यांना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं, ‘‘माझं हे शिक्षण पूर्ण झालंय. आता पुढं काय करू?’’
त्यावर उलटटपाली टिळक लिहितात, ‘‘पुढं काय करायचं हे तुच ठरव! पण जे काही करशील ते सर्वोत्तम कर! भलेही तू चप्पल विकण्याचा व्यवसाय कर... पण लोकांनी म्हटलं पाहिजे, चप्पल घ्यायची तर टिळकांच्या मुलाकडूनच!’’
गुणवत्तेचा, दर्जाचा ध्याय घेणारे असे आज किती लोक आहेत?  समाजाचं नेतृत्व करणार्‍या धुरिणांचं सोडा! आपण आपल्या मुलांना तरी असं स्वातंत्र्य देतो का? त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं किती प्रमाणात लादतो? त्या पूर्ण झाल्या नाहीत तर कुणाकुणाचं आणि किती नुकसान होतं? ‘जे करशील ते सर्वोत्तम कर’ असं त्याला सांगण्याचं धाडस आपल्यापैकी कितीजण करतात? अगदी एखादं नवं हॉटेल सुरू झालं, तिथल्या पदार्थांची चव भन्नाट असली तरी काही दिवसातच त्याची रया गेलेली असते. एखाद्या लेखकाची एक-दोन पुस्तकं गाजली की तो ओढून-ताणून लिहायला लागतो. त्यासाठी करावे लागणारे अविरत परिश्रम त्याला नको असतात. नाव झालं की काहीही खपवता येतं असा अहंकार वाढतो आणि क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं होतं. 
पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांना फोन केला. त्यांना सांगितलं, ‘‘तुम्हाला केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची शपथ घ्यायचीय...’’
खरंतर ही वार्ता ऐकून कोणीही हर्षोल्हासित होईल. त्याला त्याच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. इथं मात्र नेमकं उलटं घडलं. क्षणाचाही विलंब न करता यशवंतराव म्हणाले, ‘‘मी बोलून कळवतो.’’
खुद्द देशाचे पंतप्रधान एका प्रादेशिक नेत्याला त्याचं क्षितिज विस्तारण्याची संधी देत होते आणि हे म्हणत होते, ‘‘मी बोलून कळवतो...’’
इतकी मोठी संधी येत असताना आणि खुद्द पंतप्रधान सोबत असताना आणखी कुणाशी बोलायला हवं? नेहरूंनाही हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याबाबत विचारणा केली.
यशवंतराव म्हणाले, ‘‘जिने माझ्यासोबत सुख-दुःखात राहण्याचा, मला साथ देण्याचा निश्‍चय केलाय त्या माझ्या अर्धांगिनीला, वेणुबाईला विचारावं लागेल... तिच्या सल्ल्याशिवाय, परवानगीशिवाय मी काहीच करत नाही...’’
नेहरूंनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी यशवंतरावांच्या या पत्नीप्रेमाचं, स्त्री-पुरूष समानतेचं कौतुक केलं. 
आपल्या बायकोला असा सन्मान देणारे, तिच्या इच्छा-आकांक्षांचा विचार करणारे, तिला प्रेम आणि जिव्हाळ्याबरोबरच योग्य तो आदर देणारे असे किती लोक आज शिल्लक आहेत? 
दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्याबाबतचाही एक किस्सा सर्वश्रुत आहे.
ते त्यावेळी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य होते. दरमहा त्यांना पन्नास रूपये मानधन मिळायचं. त्यात त्यांचं घर चालायचं.
एकदा एक मित्र अचानक त्यांच्याकडं आला. त्यानं सांगितलं की, ‘‘माझ्या बायकोची तब्येत बिघडलीय. तिला डॉक्टरकडं नेणं गरजेचं आहे. शक्य तितकी आर्थिक मदत करा...’’
शास्त्रीजींपुढं प्रश्‍नचिन्ह उभं होतं. आता काय करावं? आपल्याला जेवढं मानधन मिळतं तितक्यात घरखर्च चालतो. शिल्लक अशी काही नव्हतीच. मित्र तर संकटात आहे. त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. काय बरं करावं? 
ते विचारात असतानाच त्यांच्या पत्नी ललितादेवी घराबाहेर आल्या. त्यांनी या दोन मित्रांमधील संवाद ऐकला होता. ललितादेवींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पन्नास रूपये दिले. मित्र निघून गेला.
शास्त्रीजींना कळत नव्हतं की हे पैसे आले कुठून?
त्यांनी त्याबाबतची विचारणा केली. 
तेव्हा ललिताबाई म्हणाल्या, ‘‘तुम्ही दरमहा तुमचे पन्नास रूपये मानधन मला घरखर्चासाठी देता. दरमहा मी पंचेचाळीस रूपयांत घर भागवते आणि उरलेले पाच रूपये बचत करते. एखाद्याच्या अडचणीला हे पैसे आले नाहीत तर त्यांचा काय उपयोग? म्हणून ते मी त्यांना दिले...’’
शास्त्रीजींना त्यांच्या पत्नीचा अभिमान वाटला. त्यांनी ललिताबाईंचं कौतुक केलं. इतरांची सहवेदना अनुभवण्याइतकी संवेदनशीलता त्यांच्याकडं आहे याचं त्यांना अप्रूप वाटलं. 
ललिताबाई आतल्या खोलीत वळल्या आणि शास्त्रीजींनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिलं, ‘‘माझं घर दरमहा पंचेचाळीस रूपयात चालतं. पाच रूपये जादा येत असल्यानं माझी पत्नी त्याची बचत करत आहे. असलेला पैसा चलनात असावा आणि गरजेपुरताच पैसा सोबत ठेवावा या विचाराचा मी असल्यानं या महिन्यापासून माझे वाचवलेले पाच रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूंना द्यावेत.’’
सदैव राष्ट्रसेवेसाठी तत्पर असलेल्या अशा देशभक्ताचं हे वागणं आज अनेकांना खुळेपणाचं वाटू शकेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्याला ‘सद्गुण विकृती’ म्हणायचे ती यापेक्षा वेगळी थोडीच असते? आज असे किती लोक आपल्या आजूबाजूला आहेत बरं? नसतील तर यात दोष कुणाचा? आदर्शाची ही महान परंपरा नेमकं कुणामुळं, कशी आणि का खंडित झाली असावी?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतचीही एक छान गोष्ट आहे.
ते आश्रमात होते. त्यावेळी एक गृहस्थ त्यांच्याकडं आले. बापूजींचं सूतकताईचं काम सुरू होतं. ते म्हणाले, ‘‘बापूजी मी एक उद्योजक आहे. भरपूर पैसा कमावला. मुलं मार्गी लागलीत. सारं काही करून झालंय. त्यामुळं आता मला देशसेवा करायचीय. आपण मला मार्गदर्शन करा. मी नेमकं काय करू शकतो?’’
बापूजी म्हणाले, ‘‘माझं हातातलं हे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही बसा. मग आपण चर्चा करू!’’
ते गृहस्थ बाजूला जाऊन बसले. गांधीजींचं काम सुरूच होतं. पाच मिनिटं, दहा मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास...
या महाशयांना अशी कुणाची वाट पाहण्याची सवय नव्हती. त्यामुळं त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती.
थोड्या वेळानं बापूजी जवळ आले. म्हणाले, ‘‘माफ करा. माझं काम सुरू होतं. आता बोला. काय म्हणालात?’’
ते गृहस्थ म्हणाले, ‘‘मला देशसेवा करायचीय. काहीतरी काम सुचवा.’’
गांधीजी म्हणाले, ‘‘भल्या गृहस्था, मी सुतकताई करत होतो तेव्हा माझं लक्ष तुमच्याकडेच होतं. तुम्ही माझी वाट पाहताना चार वेळा या जागेवरून उठलात. या माठातलं ग्लासभर पाणी घेतलंत. अर्धा ग्लास पाणी तुम्ही प्यालं आणि अर्धा ग्लास टाकून दिला. यापुढं एक काम करा. जेवढी तहान असेल तितकंच पाणी ग्लासात घ्या. इतकं जरी प्रामाणिकपणे केलंत तरी तुमच्या हातून राष्ट्राची खूप मोठी सेवा घडेल. या आता...’’
त्यांचे हे विचार आपण कितीजण आचरणात आणतो? ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत अशा किती गोष्टी टाळतो? जे सहजशक्य आहे तेही करताना आपण अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष का बरं करतो? आपल्याला आणखी वेगळे आदर्श कसले हवेत?
आता थोडंसं मागं जाऊया. 
तो काळ होता महाभारताचा. 
पांडव वनवासात होते. तहानेनं व्याकुळलेले असताना एका डोहात पाणी आणण्यासाठी एकेकजण जात होते. त्यांना तिथून यक्षाचा आवाज येत होता. काही प्रश्‍न विचारले जात होते. तो आवाज न ऐकल्यावर, त्याच्या प्रश्‍नाला उत्तरं देता न आल्यावर एकेकजण मूर्च्छित होऊन पडत होता. सगळेजण पाणी आणायला जाऊनही एकही परतला नाही म्हणून शेवटी न्यायप्रिय युधिष्ठिर तिकडं गेले. त्यांनाही यक्षाचा आवाज आला. त्यांना विचारलं गेलं, ‘‘जगात सर्वात श्रेष्ठ कोण?’’
युधिष्ठिराकडून उत्तर आलं, ‘‘ब्राह्मण!’’
मग अर्थातच पुढचा प्रश्‍न आला. ‘‘खरा ब्राह्मण कोण?’’
युधिष्ठिरानं सांगितलं, ‘‘जो न्याय, नीतीनं वागतो, ज्याची ज्ञानाची लालसा आहे, ते ज्ञान जो इतरांना देतो, जो धनसंचय करत नाही तो खरा ब्राह्मण.’’
पुढचा प्रश्‍न आला, ‘‘हे गुण एखाद्या ब्राह्मणात नसतील तर?’’
युधिष्ठिरानं क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, ‘‘मग तो खरा शूद्र!’’
‘‘आणि एखाद्या शूद्रात हे गुण असतील तर?’’
युधिष्ठिर महाराज म्हणाले, ‘‘मग तो शूद्र कसा राहील? तोच खरा ब्राह्मण!’’
या व अशा संवादानंतर यक्ष खूश झाला. त्यानं सांगितलं, ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू योग्य उत्तरं दिल्याबद्दल मी तुझ्या दोन भावाला शुद्धीत आणतो. कुणाला ते तू ठरवं आणि सांग.’’
यक्षाला अर्थातच अपेक्षित होतं की तो सर्वशक्तीमान भीम आणि अर्जुनाला शुद्धीत आणायची विनंती करेल. या लढाईत त्या दोघांची खरी गरज आहे.
युधिष्ठिरांनी सांगितलं, ‘‘आपण नकुल आणि सहदेवाला शुद्धीत आणावं...’’
आता आश्चर्यचकित व्हायची वेळ यक्षाची होती. त्यानं त्याचं कारण विचारलं.
युधिष्ठिर म्हणाले, ‘‘जे दुर्बल आहेत त्यांना आपण उभं करायला हवं. जे सबल आहेत त्यांना थोडा त्रास झाला तरी ते त्यांच्या क्षमतेच्या बळावर उभे राहतील...’’
यक्षानं युधिष्ठिराच्या या समतोल बुद्धीचा मान राखत सर्वांनाच शुद्धीत आणलं.
आज आपली ‘शुद्ध’ जागेवर आहे का? 
दुर्बलांना सबल करण्यासाठी आपण काय करतोय?
राजकीय घोषणाबाजी काय होते? लोककल्याणकारी राज्याच्या नावावर कुणाकुणाला कसे अडवले जाते, नागवले जाते हे आपण पाहतोच आहोत. ‘बळी तो कान पिळी’ असा जणू अलिखित नियमच झालाय. मग दुर्बलांचं काय? त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं काय करता येईल?
सध्या आपण सर्व एका अराजकाकडं निघालोय. 
प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतंय. 
ते गोंजारताना ना आपल्यात सहवेदना अनुभवण्याची ताकत उरलीय ना आपल्यात विश्वात्मक विचार उरलाय. 
सगळं काही लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलण्यासाठी!
आदर्शांचे जे काही मनोरे उभारलेत त्याचे इमले ढसढसा कोसळत आहेत. देव, देश आणि धर्माच्या विरूद्ध वागण्याला प्रतिष्ठा मिळतेय. एकीकडं महासत्तेची स्वप्नं पाहताना दुसरीकडं आपण आपलं जे ‘अस्सल’ आहे तेच निकालात काढायला निघालोय. 
या सगळ्याचा विचार व्हायला हवा. जे परिस्थितीनं आणि विचारानं ‘दुर्बल’ आहेत ते सबल झाले तर आणि तरच हे चित्र पालटू शकेल. ती क्षमता सर्वांत जागृत होवो यासाठी सदिच्छा देतो.
(संचार दिवाळी अंक 2018)

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092


Monday, November 12, 2018

अगम्य, अतर्क्य!

एका खेडेगावात एक व्याख्याता तावातावात बोलत होता. त्यानं सांगितलं, ‘‘स्त्री आणि पुरूष ही रथाची दोन चाकं आहेत. ती एकसाथ चालली तरच कुटुंबाचा, संसाराचा गाडा धडपणे चालतो. ही चाकंच आपल्याला समानतेची शिकवण देतात...’’

त्या व्याख्यात्याचं लंबंचौडं भाषण थांबवत एक आजीबाई उठल्या. त्या म्हणाल्या, ‘‘कसली समानता आलीय साहेब? स्त्री-पुरूष ही समानतेची चाकं न्हायीत. रथाची तर न्हायीतच न्हायीत. असलीच तर ती सायकलची चाकं असत्याल. एक फुडं, एक म्हागं... त्यात कसली आलीय समानता? सायकल चालवणारा गडी माणूस! ब्रेक त्याच्या हातात. हॅन्डल त्योच धरतो. त्यो नेयील तिकडं आपसूक जायाचं. ब्रेक मारला की झिज मागच्या चाकाची व्हनार! धावती सायकल आपसूक थांबणार! कॅरिअर म्हागं लावलेलं. म्हणून ओझं असंल तर ती बी मागच्या चाकावर. आपण कुरबुर न करता गुमानं पुरूषांच्या मागोमाग जायाचं...’’

अर्थातच त्या व्याख्यात्याचं भाषण गडबडलं... 

आजीबाईंनी नेमकेपणं समानतेचं सार सांगितलं. स्त्री शिकली. प्रगती झाली. ती स्वावलंबी झाल्यानं अनेक क्षेत्रात तिनं नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. देशाच्या पंतप्रधानापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रीनं मजल मारली. असं सारं असूनही काही सन्माननीय अपवाद वगळता ही स्वावलंबी स्त्री आज स्वतंत्र आहे का? तर त्याचं उत्तर नकारात्मकच येईल. कोणी कितीही आव आणला, स्त्रियांच्या प्रगतीचे गोडवे गायले तरी हे वास्तव नाकारता येणार नाही. ‘हृदयी अमृत, नयनी पाणी’ हे चित्र कसं बदलणार? तिच्या हृदयातलं अमृत अवश्य पाझरत रहावं पण डोळ्यात पाणी हवंच का?

आपल्याकडं असमानतेचा पाया इतका भक्कम असताना आपल्यात समानता कशी येणार? स्त्री-पुरूष मैत्री निकोप कशी राहणार? आजच्या जमान्यात स्त्री-पुरूष मैत्री ही गरज आहे, आकर्षण आहे की फॅशन? की यापुढचं आणखी काही नवं नातं रूढ होतंय?

स्त्री म्हणजे जननी! निर्मितीचा आविष्कार! मातृसत्ताक परंपरेचे गोडवे गाणार्‍या आपल्या देशात तीच सर्वाधिक पिडली जाते, नागवली जाते. ‘नर आणि मादी’ या संकल्पनेच्या पुढे आपला गाडा काही जातच नाही. म्हणूनच सारं काही व्यर्थ ठरतं. 

युगानुयुगे या नात्याच्या समानतेसाठी अनेकांची धडपड सुरू आहे. त्यात यश आलंय असं ज्यांना वाटतं ते त्यांचं ‘भासात्मक सत्य’ आहे. काहीवेळा असं सत्य आरशासारखं असतं. त्यात चेहरा बघितल्यावर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. आपण खूश होतो. आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे याची जाणीव आपल्याला होते. मात्र आरशातील हा चेहरा म्हणजे ‘मिरर’ इमेज असते. तो आपल्याला आपला ‘उलटा’ चेहरा दाखवत असतो आणि आपण तोच सत्य समजून आनंदी राहतो.

असा आनंद कशातही मानता येईल. त्यात गैरही काही नाही! पण म्हणून स्त्री-पुरूष समानता आलीय असं धाडसी विधान मात्र कोणीही करू नये. शहरी भागातल्या, ग्रामीण भागातल्याही स्त्रिया शिकल्यात. त्यांची कमाईही सुरू आहे. अनेकजणी आपापल्या नोकरी-व्यवसायात मग्न आहेत. ‘ठेविले अनंते तैसेही रहावे’ या उक्तीप्रमाणे त्या समाधानी असल्याचा आवही आणतात. घरच्या आणि बाहेरच्या लढाईसाठी सदैव सज्ज असतात. म्हणून काही त्या स्वतंत्र ठरत नाहीत. सुरक्षित राहत नाहीत. जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. 

स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आपण किती जागरूक आहोत हे पाहण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ! अनेकजणी प्रवासाला निघाल्यावर कमी पाणी पितात. त्याचे कारण काय? तर रस्त्यात शौचालये नाहीत! जी आहेत ती इतकी अस्वच्छ असतात की इन्फेक्शन आणि अन्य आजारांना निमंत्रणच जणू! जागोजागी महिलांसाठी सुलभ शौचालेयही उपलब्ध नसलेल्या आपल्या देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवलं जातं. पूर्वी किमान दोन गावात अंतर असायचं. आता शहरीकरणाच्या नादात गावं इतकी जवळ आलीत की रस्त्यात कुठं थांबणंही मुश्किल होऊन जातं. माग एकदा वाचण्यात आलं होतं की, घरोघरी जाऊन मार्केटिंगची कामं करणार्‍या तरण्या-ताठ्या मुलींना शौचालयं उपलब्ध नसल्यानं हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. एकतर आधीच तुटपुंजं उत्पन्न! त्यात हॉटेलला खाणं परवडत नसल्यानं या मुली शौचालयाची सुविधा असणारं एखादं चांगलं हॉटेल पाहतात. तिथं जाऊन चार-पाच जणी अर्धा-अर्धा चहा घेतात. टॉयलेटचा वापर करून, पुन्हा कमी पाणी पिऊन बाहेर पडतात. केवळ या एका कारणासाठी कमी पाणी प्याल्यानं अनेक मुलींना विविध आजारांनी ग्रासलं आहे. हे असं सगळं भयानक चित्र असताना आपण समानतेवर परिसंवाद ठेवतो. त्यात भाषणं ठोकतो. स्त्री सगळ्या बंधनातून मुक्त झाल्याचं सांगतो. ती स्वतंत्र, स्वावलंबी आणि सुरक्षित असल्याचे ढोल पिटतो. ‘लाज’ नावाचा प्रकार ना आपल्या ढिम्म व्यवस्थेत उरलाय ना आपल्या निर्ढावलेल्या मनात!

स्त्री सन्मानाबाबत एक कहाणी सांगितली जाते. ही गोष्ट आहे आद्य शंकराचार्यांच्या काळातली. म्हणजे झाली असतील त्याला हजार-बाराशे वर्षे! आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात धर्म, संस्कृती, रूढी-परंपरा, वेद यावरून वाद सुरू झाले. थोडावेळ दोघांनी चर्चा केली. एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पण शंकराचार्यांनी मंडन मिश्र यांना थांबवले. ते म्हणाले, ‘‘आपण भांडतोय खरे! पण आपल्या दोघांत बरोबर कोण हे कसं ठरवणार? याचा न्यायनिवाडा कोण करणार?’’

त्यांच्या या प्रश्नावर मंडन मिश्र म्हणाले, ‘‘माझी पत्नी भारती ही विवेकी आहे. अभ्यासू आहे. तिची सारासार बुद्धी तटस्थ आणि न्यायप्रिय आहे. ती ठरवेल. तिचा निर्णय आपण अंतिम मानू...’’

त्यानंतर आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. वाद-प्रतिवाद झाले. विविध विषयांवर मंथन घडलं. हे सगळं भारती यांनी ऐकलं. सर्व बाजू समजून घेतल्या आणि त्या काळात आपल्या पतीच्या विरूद्ध आणि शंकराचार्यांच्या बाजूनं कौल दिला. शंकराचार्य बरोबर आहेत हे भारती यांनी ठामपणे सांगितलं. 

ते ऐकून प्रभावित झालेल्या आद्य शंकराचार्यांनी सांगितलं की, ‘‘मी तुमच्या न्यायबुद्धीचा आदर करतो. तुम्ही तुमच्या पतीच्या विरूद्ध तटस्थपणे माझ्या बाजूनं न्याय दिला. एका स्त्रीच्या या विवेकाची पुढच्या पिढीला कल्पना यावी म्हणून वचन देतो की, यापुढे जे कोणी माझ्या म्हणजे शंकराचार्याच्या गादीवर बसतील ते त्यांच्या नावापुढं तुमचं नाव लावतील...’’

तेव्हापासून शंकराचार्यांच्या नावापुढं ‘भारती’ हा शब्द लावलेला असतो. उदा. वरदानंद भारती! 

म्हणजे शंकराचार्यांसाठी सुद्धा ‘न्यायाधीशा’ची भूमिका घेत न्यायनिवाडा करणारी स्त्री आपल्या धर्मात कशी कमी लेखली जाते यावर तावातावात भाषणं ठोकली जातात. त्यासाठी दरवेळी आपल्या सोयीनुसार ‘मनुस्मृती’चा आधार घेतला जातो.

खरंतर मनुस्मृती हा काही आपला धर्मग्रंथ नाही. त्यानुसार आजवर कुणीही राज्यकारभार केला नाही, करू शकणार नाहीत. अगदी पुण्यात पेशवे सत्तेवर असताना जर तिकडं लोकमाता अहिल्यादेवी होळकर न्यायबुद्धीनं राज्य करू शकत असतील तर स्त्रियांनी सत्ताकारण करू नये, असा मनुस्मृतीचा दाखला देण्यात काय अर्थ? 

काळ झपाट्यानं बदलतोय. नाण्याला दोन्ही बाजू असतात. त्याप्रमाणं स्त्रियाही बदलत आहेत. स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांविषयी खूप लेखन झालंय. अजूनही होतच राहतं. त्यात ‘बाईची भाईगिरी’ हा विषय मात्र फारसा चर्चेला येत नाही. तो स्वतंत्र लेखाचा, नव्हे पुस्तकाचाच विषय आहे. स्त्रिया सगळ्या क्षेत्रात ज्या हिरिरीनं पुढे येत आहेत ते पाहता त्या गुन्हेगारीच्या क्षेत्रातही कमी नाहीत. जगभरातील कुख्यात स्त्री गुन्हेगारांचा मागोवा घेतला तर तो रंजक आणि तितकाच भेदकही आहे. आईच्या महत्तेचं, तिच्या त्यागाचं वर्णन मोठ्या संख्येनं झालं. ते पाहता, ‘दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये, जिची ममता आटली तिले माय कधी म्हणू नये...’ हेही आपण लक्षात घ्यायला हवं. ममता आटलेल्या, वात्सल्याची जागा द्वेषानं, सूडानं घेतलेल्या, क्षणिक स्वार्थापोटी वाटेल त्या थराला जाणार्‍या स्त्रिया कमी थोड्याच आहेत?

सध्या ‘मी टू’ ही चळवळ (?) सुरू आहे. त्यात अभिनय आणि पत्रकारितेतील मुली पुढं येऊन त्यांना पुरूषांकडून काय काय सहन करावं लागलं हे धाडसानं सांगत आहेत. कोणतीही मुलगी आपल्या चारित्र्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल असं विधान कधी करणार नाही. आजचा काळ पाहता मात्र स्त्रिया किंवा पुरूष काहीही करू शकतात, कोणत्याही पातळीला उतरू शकतात हे वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं अशा तथाकथित चळवळीमागं काही षडयंत्र आहे का हेही तपासून पहायला हवं. ‘लग्नाच्या आमिषानं पाच वर्षे बलात्कार,’ ‘नोकरीच्या-बढतीच्या आमिषानं बलात्कार,’ ‘पैशाची-पदाची, संपत्तीची लालसा दाखवून बलात्कार’ या व अशा बातम्या वाचल्या की आश्‍चर्य वाटतं. म्हणजे ही ‘फसवणूक’ ठरू शकेल! पण याला बलात्कार कसं म्हणावं? म्हणजे काम होईपर्यंत ‘ये तू’ आणि इप्सित साध्य झाल्यास किंवा त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास ‘मी टू’ हे काही खरं नाही. वाटेल ते उद्योग करून ‘मिटवू’ म्हणणार्‍यांत आणि या ‘मी टू’ म्हणणार्‍यांत मग कितीसा फरक उरतो? यातून आपण काय संदेश देतोय हे तपासून पहायला हवं. कोणत्याही अन्याय, अत्याचाराच्या विरूद्ध कधीही आवाज उठवणं हे गरजेचंच आहे. ते धाडसं ‘ती’नं करायलाच हवं. ते करताना अकारण कुणाच्या आयुष्याची रांखरांगोळी मात्र करू नये!

मध्यंतरी काही घटना उघडकीस आल्या. केवळ दणकून पोटगी मिळावी म्हणून काही मुली, स्त्रिया समाजातील ‘गब्बर’ लोकांसोबत लग्न करतात. काही दिवस त्यांच्यासोबत घालवून घटस्फोट मागतात. त्यासाठी वाटेल ते बनाव रचतात. आरोपांच्या फैरी झाडून समोरच्याचं जगणं उद्ध्वस्त करतात. हा लेख लिहित असतानाच परभणीहून एक बातमी येतेय. एका बाईनं तिथल्या एका तरूणाला सतत ‘ब्लॅकमेल’ करून शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्यानं आत्महत्या केलीय. म्हणजे आपण नक्की कोणत्या दिशेनं जातोय हे पाहणं गरजेचं आहे. 

सध्या ‘स्वीट डॉल’ हा एक प्रकार काही ठिकाणी दिसून येतोय. परदेशातील अशा खुळचट कल्पना आपल्याकडं झपाट्यानं पसरतात. स्वीट डॉल म्हणजे काय तर आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या वयाचे जे सधन पुरूष आहेत त्यांना हेरायचं, त्यांच्यासोबत बायकोप्रमाणं वागायचं आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण करून घ्यायच्या. विसी-बाविशीतल्या मुली पन्नासीच्या पुढच्या ‘श्रीमंत’ माणसांसोबत ‘राहतात’ आणि आर्थिक कमाईसोबतच त्यांची हौस-मौज पूर्ण करून घेतात. अशा मुलींनी ‘मी टू’ चळवळीला पाठिंबा दिला तर दोष कुणाला द्यायचा?

आपली कायदा आणि न्याय व्यवस्थाही नवनवीन आदेश काढत असते. विविध प्रकरणात न्यायनिवाडे करताना जे निर्णय दिले जातात त्यावरून समाजस्वास्थ धोक्यात येतं. ‘समलिंगी संबंधांना मान्यता’ असे निर्णय घेतले गेल्यास ‘तुमचा बाप समलिंगी असता तर तुमचा जन्मही झाला नसता’ असं ठणकावून सांगण्याचं धारिष्ट्य आपल्यात का शिल्लक राहत नाही? 

बरं, स्त्रियांची आणि पुरूषांची विचार करण्याची पद्धतही वेगवेगळी! म्हणजे एखादी स्त्री तिच्या प्रियकराचा विचार करते तेव्हा ‘त्याचा’ हात आपल्या हातात गुंफलाय इथून तिचं स्वप्नं सुरू होतं. इकडं हा पठ्ठ्या जेव्हा तिचा विचार सुरू करतो तेव्हा थेट बेडरूमची कडी लावण्यापासूनच त्याची विचारप्रक्रिया सुरू असते. चित्रातली, चित्रपटातली नग्नता पाहताना अनेकजण सांगतात की, आधी तुमच्या डोळ्यातली नग्नता पहा! तिच्या कपड्यावरून शेरेबाजी करण्याऐवजी तुमची नीतिमत्ता सुधारा! पण या प्रवचनांचा खरंच काही उपयोग होतो का? या सर्वांमुळं बहुतेकांच्या मनातली वासना चाळवली जाते हे सत्य आपण का स्वीकारत नाही? पुरूषांच्या अंडरवेअरची जाहिरात करतानाही इथं स्त्रीच लागते आणि एखाद्या परफ्युममुळं त्याच्याकडं आकर्षित होऊन थेट त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार असणार्‍या जाहिरातीतही स्त्रीच असते. हा त्यांचा अवमान नाही का? याविरूद्ध कोणत्याही स्त्रीवादी संस्था, संघटना, कार्यकर्त्या कसलाही आवाज का उठवत नाहीत? शनिशिंगणापुरला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून पेटून उठणार्‍या तृप्ती देसाई इथं का बरं थंडावतात? की अशा कोणत्याही बड्या कंपन्यांच्या उत्पादनाविरूद्ध ब्र ही काढायचं धाडस आपल्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांत नाही? 

स्त्री-पुरूष समानतेचा जयघोष करताना आपल्या मनात अहंकारही नको आणि न्यूनगंडही नको! ‘आमच्याकडं स्त्रियांना किती मोकळीक आहे....’ असं सांगणारे पुरूष घरात प्रत्यक्षात कसे वागतात हे आपण सर्वजण जाणतोच. बाकी सोडाच, पण एखाद्यानं प्रेमविवाह केला तर ‘आपण आंतरजातिय प्रेमविवाह केला’ असे ढोल पिटण्यातच तो धन्यता मानतो. काहीजण तर निश्‍चयानं आपापल्या जातीबाहेरील मुलीशी लग्न करून त्याची जाहिरात करत असतात. म्हणजे प्रेमही असं ठरवून, मुलींचे जाती-धर्म पाहून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढून केलं जातं का? प्रेम कधीही, कुणावरही होऊ शकतं. ते व्यक्त केलं, समोरच्यानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर दोन मनं एकत्र येतील. तिथं जात-पात, धर्म, वय, शिक्षण असे निकष लावून कसं चालेल? जर मियांबिबी राजी असतील, ते एकमेकांना समजून घेत असतील, त्यांच्या सुख-दुःखात एकरूप होत असतील तर इतरांनी त्यात लुडबूड करण्याचं कारणच काय? समाजानंही हे सारं प्रगल्भपणे स्वीकारायला हवं.

‘स्त्री ही क्षणिक काळची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ असं म्हणतात ते उगीच नाही. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते हेही सांगितलं जातं. अनेक ठिकाणी ते अनुभवायलाही येतं. तिचं तरल आणि संवेदनशील मन पुरूषाला उभारी देतं. ती जितकी मायाळू असते तितकीच प्रसंगी ती कणखरही होते. तिच्या निश्चयापुढं मोठमोठे पर्वतही थिटे ठरतील. आमच्या मराठवाड्यात, विदर्भात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. खरंतर या सगळ्यात सर्वाधिक ससेहोलपट होते ती घरातल्या स्त्रीची! तिला जे सहन करावं लागतं, जे भोगावं लागतं त्यापुढं पुरूषांचं दुःख निश्चितपणे नगण्य आहे. तरीही कोणत्याही शेतकरी स्त्रीनं कधी आत्महत्या केल्याचं दिसून आलं नाही. ती दुष्काळाशी, समाजाशी, उदासीन प्रशासनाशी झगडत राहते. नवर्‍यानं आत्महत्या केली तरी नेटानं जगते, लेकरा-बाळांना शिक्षण देते. प्रसंगी मोलमजुरी करून आपल्या पाल्याला विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून देणार्‍या महानायिका आपल्याकडं चिक्कार आहेत. त्यांचा स्वाभिमान, त्यांची जिद्द, चिकाटी, त्यांचे अथांग परिश्रम, त्यांचा संघर्ष हे सारं काही अतुलनीय आहे. त्यामुळं छोट्या-मोठ्या गोष्टींचा बागुलबुवा करून काही स्त्रिया जेव्हा आकांडतांडव करतात तेव्हा आश्चर्य वाटते.

स्त्री कुटुंब जोडते, ती कुटुंब तोडतेही! तिची सगळीच रूपं अतर्क्य, अगम्य. तिचं मन जाणणारा, तिला समजून घेणारा पुरूषही तितकाच दुर्मीळ! ही दोन चाकं कधी फारशी एकत्र येतच नाहीत. 

असं सारं असलं तरी या नात्यात एक गोडवा असतो. स्त्री-पुरूष समानतेचा जागर करताना आपण आधी एकमेकांविषयी आपल्या मनात व्यापक, उत्तुुंग प्रेमभावना ठेवू. एकमेकांकडं माणूस म्हणून बघितलं तरी अनेक समस्या सुटतील. एक तरल, निकोप नातंच समाज सुदृढ ठेऊ शकतं. त्यासाठी आपला विवेक वाढत जावो, मनातील गैरसमजाचं, उच्च-नीचतेच, खोट्या प्रतिष्ठेचं, दिखाव्याचं मळभ दूर होवो याच या निमित्तानं शुभेच्छा! 
(अपेक्षा मासिक दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092


Sunday, November 11, 2018

स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची!

12 जानेवारी 1863! या दिवशी आपल्याकडे बंगालमध्ये नरेंद्र विश्वनाथ दत्त नावाच्या एका महान युगपुरूषाचा जन्म झाला. त्यांच्याबाबतची एक गोष्ट सांगतो. 1880 च्या कालखंडातील ही घटना. हा तरूण त्याच्या गुरूकडे गेला. गुरू कालिकादेवीच्या पूजेत मग्न होते. त्याने गुरूंना वंदन करून सांगितलं, ‘‘गुरूवर्य, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या वडिलांचं निधन झालंय. मला प्रचंड नैराश्य आलंय. हे जग सोडून कुठंतरी दूर निघून जावंसं वाटतं.’’

गुरूंनी सांगितलं, ‘‘तुला असं का वाटतं? तू तर एक संन्यस्त वृत्तीचा राष्ट्रप्रेमी तरूण आहेस...! हा विचार तुझ्या मनात का यावा?’’

त्या तरूणानं सांगितलं, ‘‘हे दुःख, या वेदना फक्त माझ्यासाठी नाहीत. मला माझ्या आईच्या वेदना पाहवत नाहीत. बहिणीच्या डोळ्यातले अश्रू अस्वस्थ करतात. त्यातून मी प्रचंड बेचैन झालोय.’’

गुरूंनी सांगितलं, ‘‘ठीक आहे. आत कालिकादेवीच्या समोर जा आणि तुला हवं ते माग. तुझं हे दुःख दूर व्हावं यासाठी कालिकामातेकडं साकडं घाल. ही माता तुला दुःखमुक्त करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.’’

हा तरूण पुढं गेला. डोळे भरून कालिकादेवीला बघितलं. त्याला स्वत्वाचा विसर पडला आणि भारावून जात त्यानं मागणं मागितलं, ‘‘माते, मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ 

गुरूंनी विचारलं, ‘‘काय रे! आईचं, बहिणीचं दुःख दूर कर, असं तू देवीला सांगितलंस का?’’

तो म्हणाला, ‘‘मी हे विसरूनच गेलो.’’ 

गुरूंनी सांगितलं, ‘‘पुन्हा आत जा. तुला जे हवं ते माग...’’

पुन्हा हा तरूण आत गेला. कालिकादेवीकडं पाहत त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले, ‘‘माते, मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ आणि त्यातूनच भगवान रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं, ‘‘नरेंद्रा, तुझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे. तू राष्ट्राला नवा विचार देऊ शकतोस. अनेकांचा उद्धारकर्ता होऊ शकतोस. तू नेहमी स्वतःचा नाही तर समाजाचा, राष्ट्राचाच विचार करशील...’’ आणि आपण सर्वांनी त्यांनी पुढे घालून दिलेला आदर्श बघितलाच आहे. 

सध्या आपल्याकडं तरूणाईच्या संस्कारांचा विषय सातत्यानं चर्चेला येतो. कितीही नावं ठेवली तरी आजचे हे तरूण आपले संस्कार जिवंत ठेवत आहेत, हे खरंय! असं म्हणतात, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात. काहीवेळा माणसंही मरतात! मात्र जिथं संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हा संस्कारांचा दुष्काळ पडू नये यासाठी तरूणांनीच पुढं येणं गरजेचं आहे. तसे ते येतही आहेत. 

नाण्याच्या दोन्ही बाजू आपण बघायला हव्यात. ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ असं म्हटलं की मोठ्या लोकांचा विषय संपतो. तरूणांनी काय केलं पाहिजे हे मात्र कोणी सांगत नाही. त्यांना दुषणं देण्यात, बोल लावण्यात मात्र सगळेच आघाडीवर.

एक गोष्ट सांगतो. एका राजपुत्राची दृष्टी अधू झाली. सूर्यप्रकाशात गेलं की त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचं भान हरपून तो वाटेल ते चाळे करू लागला. त्यावर खूप उपचार झाले. अनेक वैद्य-हकिमांनी त्याची तपासणी केली. मात्र त्याच्या या आजारावर उपचार काही होत नव्हते. मग एका वैद्यानं राजाला सांगितलं, ‘‘राजपुत्राला आपण फक्त हिरवा रंग दाखवा. अन्य रंग त्यांच्या दृष्टिस पडला तर त्यांना त्रास होतो. सर्वत्र हिरवा रंग असेल तर त्यांना कसलाच धोका नाही, कसला त्रास नाही.’’

तो प्रयोग राजानं करून बघितला. महालात सर्वत्र हिरवे गालीचे अंथरले. भिंतींना हिरवा रंग दिला. पडदेही हिरवेच लावले.. आणि चमत्कार घडला. राजकुमार सामान्य मुलांप्रमाणे वावरू लागला. त्याला होणारा त्रास संपुष्टात आला.

या उपायामुळे राजा मात्र चिंतीत झाला. राजपुत्राला असं चार भिंतीत कोंडून ठेवणं त्याच्या मनाला पटणारं नव्हतं. बाकी सगळे उपाय झाले होते. त्यामुळं दुसरा काही मार्गही दिसेना. आता संपूर्ण राज्य हिरवं करायला हवं. राजानं प्रधानाला विनंती केली. यावर विचारपूर्वक काहीतरी तोडगा काढायला सांगितला. अर्थातच, प्रत्येक कथेतला प्रधान हुशार असतो. तो नवनवीन कृप्त्या लढवतो. हा प्रधानही त्याला अपवाद नव्हता. त्यानं सांगितलं, ‘‘महाराज, यावर उपाय आहे. आपल्याला राज्यभर हिरवा रंग न देताही राजपुत्राला बाहेर नेता येईल. राजपुत्र सर्वत्र आनंदानं फिरू शकतील, बागडू शकतील...’’

राजानं सांगितलं, ‘‘खर्चाची चिंता करू नका. तातडीने उपाय करा...’’

प्रधानानं सांगितलं, ‘‘महाराज यासाठी काहीच खर्च नाही. जेमतेम शंभर-दीडशे रूपयांत काम होईल.’’

सगळेजण आश्‍चर्यचकित झाले. इतक्या कमी पैशात सगळं राज्य हिरवं कसं करावं, हे कुणालाच कळेना.

प्रधान बाहेर गेला आणि त्यानं एक हिरवा चष्मा आणला. तो राजकुमाराच्या डोळ्यावर घालायला सांगितला. आता राजकुमाराला सगळं जग हिरवं दिसू लागलं. त्यासाठी वेगळे असे काहीच प्रयत्न करावे लागले नाहीत.


आपलंही तसंच असतं. प्रत्येक प्रश्‍नावर छोटे-छोटे उपाय असताना आपण नको ते विचार करत बसतो. त्यातून सोप्या गोष्टी अवघड होतात. 

आता आपण ग्रीस देशाकडं वळूया! ग्रीसमध्ये उत्तमोत्तम नाटके व्हायची. ही नाटकं करताना पात्र कुणाचं आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे राजा कोण, प्रधान कोण, राणी कोण, सेवक कोण हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी ‘पर्सोने’ तयार केले गेले. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे मुखवटे सगळ्यांना दिले गेले. हा राजाचा मुखवटा, हा राणीचा मुखवटा, हा प्रधानाचा तर हा शिपायाचा मुखवटा. त्यातून कळायला लागलं की हे पात्र नक्की कुणाचं आहे ते! हा जो ‘पर्सोना’ आहे त्यातूनच पुढं ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द आला. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्व! आपल्या सगळ्यांना एक व्यक्तिमत्त्व असतं. ते वैचारिक, बौद्धिक तर असतंच पण शारीरिकही असतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्त्व असतं. एक चेहरा, मुखवटा असतो. आपल्यापैकी प्रत्येकाला एक मुखवटा आहे, व्यक्तिमत्त्वही आहे. त्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात. त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व पुढं येतं. त्यातूनच चांगले लेखक, कलाकार भेटतात. राजकारणी भेटतात. प्रत्येक क्षेत्रातील चांगले-वाईट लोक घडतात. प्रत्येकाची घडण्याची-बिघडण्याची रीत न्यारी. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, कष्टानुसार त्याचं फलित त्याच्या पदरात पडतं. म्हणून आपला ‘पर्सोना’ महत्त्वाचा. चेहरा आणि मुखवटा यातलं अंतर गळून पडलं की माणसाचं व्यक्तिमत्त्व उजळतं. ते अधिक प्रकाशमान होऊन इतरांच्याही आयुष्यात चैतन्य निर्माण करतं. चांगलं व्यक्तिमत्त्व असलेले प्रज्ञावंत, कलावंत पुढे यायला हवेत. त्यावर आपल्या देशाच्या प्रगतीचं मूल्यमापन होईल. आपलं क्षेत्र कोणतंही असेल, आपण कुठलंही काम करत असू, माणूस म्हणून असलेलं ‘चांगुलपण‘च आपल्याला तारून नेणार आहे एवढं लक्षात ठेवायला हवं. असं चांगूलपण हीच तर खरी गौरवाची बाब असते. तेच समाजाचं आणि राष्ट्राचं भूषण असतं. 

आजच्या तरूणाईला सांगावंसं वाटतं, तुम्ही लिहित रहा, वाचत रहा, नाचावंसं वाटतं नाचत रहा, गावंसं वाटतं गात रहा. ज्याला जे जमेल त्यानं ते करावं. क्षमता असूनही काहीच न करणं हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे आणि आपण सर्वजण तो सातत्यानं करतोय. गाणं सुंदर गाता येतं पण गात नाही. वेळच नाही आपल्याकडं! छान कविता करता येते पण करत नाही. उत्तम कादंबरी लिहिता येते पण लिहित नाही. मग आपण दोष कुणाला देणार? 

ज्यांच्याकडं निश्‍चित ध्येय आहे, त्या ध्येयाकडं वाटचाल करण्याची ज्यांची जिद्द आहे त्यांच्यात हजार हत्तींचं बळ संचारतं. अत्यंत प्रतिकूलतेतूनही ते विजयाच्या दिशेने घोडदौड करतात. अनेकांत अशी सुप्त शक्ती असते पण ती दिसायला तर हवी ना? त्याची अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुमच्या क्षमता दाखवून द्यायला हव्यात. संस्कार जिवंत ठेवायचं पवित्र कर्तव्य आपण सार्‍यांनी मिळून पार पाडायला हवं. तरूणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! आपल्यात खूप काही आहे. प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा. सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय. 

आपल्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. धर्माधर्मात आपण वाटले गेलोय. देश विकलांग होत चाललाय. म्हणजे आपण हे जातीय मोर्चे पाहतोय. कुणाचा थांगपत्ता कुणाला नाही. सगळ्या विचारधारा... त्याही लादल्या जातात. शब्दशः कुठल्याही विचारधारेला बळी पडू नका. सगळं काही पडताळून पहा आणि मग अनुनय करा. म्हणजे, स्वामीजीच म्हणायचे, ‘‘आपल्या राष्ट्राला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही.’’ 

तर असे बौद्धिक क्षत्रिय खरोखर निर्माण व्हायला हवेत. म्हणजे धर्म कशात आहे? खरा धर्म कोणता? स्वामीजीच सांगतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं तो खरा धर्म! स्वतःतल्या क्षमता ओळखायला हव्यात. त्या आणखी विकसित करायला हव्यात आणि त्यातून व्यापक राष्ट्राची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास आणायला हवी. म्हणजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं, ‘‘2020 ला आपला भारत हा महासत्ता असेल.’’ 

अरे, कसा असेल? आपण त्यासाठी निश्‍चित काय करतोय? आपले काय प्रयत्न आहेत? कोण कुठला कन्हैया कुमार उगवतो आणि राष्ट्रविरोधी घोषणा देतो. सैनिकांवर आरोप करतो. देश पेटवतो. त्याचे पडसाद पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत उमटतात. जिग्नेष मेवानी, उमर खालिदसारखे लोक शनिवारवाड्यावर येऊन सभा घेतात. समाजा-समाजात फूट पाडण्यासाठी जो तो तेल ओतत असतो. आपणही त्याच्या आहारी जातो. राजकारणी तर राजकारणच करणार! ते काही संत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवाव्यात असे चित्र नाही. अशावेळी आपली सद्विवेकबुद्धी, आपला विवेक कुठं जातो? आपण कुणाच्याही बोलण्याला बळी पडून आपापसात का भांडत राहतो? हे कसलं भिकार लक्षण आहे? हे सगळं थांबायला हवं. आपली प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारीच आहे.

सध्या सगळ्या क्षेत्रांचं बाजारीकरण झालंय. हे बाजारीकरण थांबायलाच हवं. म्हणजे मी अनेक ठिकाणी फिरत असतो. बरेचजण मला विचारतात, ‘‘तुमचे आईवडिल तुमच्याकडेच राहतात का?’’ मी सांगतो, ‘‘नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहतो.’’ स्वतःचे कुटुंब, आईवडील यांचीही आपण पर्वा करत नाही आणि जगाशी संपर्क वाढवायला निघालोय. मग ‘‘भाजी बिघडलीय’’ असं नवर्‍यानं सांगितलं तर बायको म्हणणारच, ‘‘असं कसं, याच भाजीच्या इमेजला मला फेसबुकवर 300 लाईक आणि 102 कमेंट आल्यात. अनेकांच्या तोंडाला पाणीही सुटलंय...’’ 

घरात काय चाललंय, आजुबाजूला काय चाललंय, गावात काय चाललंय हे माहीत नसतं आणि आपल्या जगभरच्या चर्चा सुरू असतात. ट्रम्पनं असं करावं, नरेंद्र मोदींनी हे केलं, योगी आदित्यनाथ हे करताहेत, ममता बॅनर्जी ते करताहेत! अरे, आता तू काय करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं पडणारं प्रत्येक पाऊल विकासाच्या दृष्टिनं जायला हवं. आपण आधी ‘माणूस‘ म्हणून संपन्न व्हायला हवं. त्यासाठी आपले मुळात काय प्रयत्न आहेत? 

सगळ्यात मोठं ज्ञानकेंद्र कोणतं? तर विद्यापीठ! महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फक्त कुलगुरूंची नावं तरी आपल्याला माहीत असतात का? मुळीच नसतात कारण आपल्याला त्याची गरजच वाटत नाही. पूर्वी ऋषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे.  ज्ञान द्यायचे. आजचे कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक नेमकं काय करतात? विद्यार्थ्यांच्या मनावर आणि जीवनावर त्यांचा कसा प्रभाव पडतो? त्यातून काही साध्य होतं का? शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना फक्त माहिती मिळते की ज्ञान?  मग ही शोकांतिका नाही का? यादृष्टिने काही विचार होणार का? आपली ज्ञानकेंद्रच दुर्लक्षित आहेत... इंग्लंडसारख्या राष्ट्रात तुम्ही गेलात तर ते सांगतील, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू; पण आमचा शेक्सपिअर आणि आमचं क्रिकेट आम्ही कुणालाच देणार नाही...’ याला म्हणतात अस्मिता! आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ यासाठी आपण काय करतोय? इथले मराठमोळे खेळ जिवंत रहावेत यासाठी कोणी काही प्रयत्न करतंय का? क्रिकेटवर तुम्ही जरूर प्रेम करा पण कबड्डीची काय अवस्था आहे हेही बघा. आपल्या खेळाडूंची, इथल्या मातीतल्या कलावंतांची काय उपेक्षा आहे ती बघा. आपलं टॅलेंट आपणच ओळखायला हवं. आपल्यातल्या क्षमता जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. एक चांगलं राष्ट्र, एक चांगलं राज्य, एक चांगलं गाव आणि एक चांगलं कुटुंब निर्माण व्हायला हवं. अर्थात याची सुरूवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी. मला खात्री आहे, आपण नक्कीच या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकू. आपण जे काही उत्तमोत्तम करू तेच सत्य आणि चिरंतन असणार आहे. ‘राष्ट्र’ ही संकल्पना खूप व्यापक असते. ती आपण सातत्यानं समजून घेऊ! सुरूवात स्वतःपासून करू!

भारत हा असा एक देश आहे जिथे सध्या सर्वाधिक तरूणांचं प्रमाण आहे. ‘तरूणांचा देश’ अशी आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि इथली आदर्श संस्कृती आपणा सर्वांना माहीतच आहे. आपण कितीजण रोज किमान दहा मिनिट व्यायाम करतो? म्हणजे श्‍वासोच्छ्वास आपण कुणाला विचारून करतो का? तो ठरवून करत नाही तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे. तसंच रोज व्यायाम ही सुद्धा एक गरज आहे. रोज किमान अर्धा तास अवांतर वाचन ही गरज आहे. याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचा ठेका माझ्याकडेच आहे, मलाच जग सुधारायचंय अशा आविर्भावात आपण असताना आपण स्वचिंतन करत नाही. स्वविकास साधत नाही. स्वतःकडं आपण लक्षच देत नाही, ही शोकांतिका आहे. ती थांबवायला हवी. 
(पुढारी दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092