Sunday, November 13, 2016

वाचकांविषयी कायम कृतज्ञ!

‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी ‘अंधश्रद्धा’ काही प्रकाशक, लेखक आणि वृत्तपत्रेही सातत्याने पसरवतात. यामागचा त्यांचा उद्देश काय हे मला अजूनही कळले नाही; मात्र मराठीत अनेकजण उत्तमोत्तम लिहित आहेत आणि ते मोठ्या संख्येने वाचले जात आहे, हा माझा स्वानुभव आहे. बदलत्या पिढीनुसार त्यांची अभिरूची बदलत असेल; पण वाचकांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अनेक जिज्ञासू वाचक आमच्याकडे त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करण्यासाठी आमचे कार्यालय शोधत येतात, ग्रंथ प्रदर्शनात आमच्या दालनात तुडूंब गर्दी करतात आणि रोख रक्कम देऊन त्यांना हवी ती पुस्तके विकत घेतात. तरीही ‘वाचक नाहीत’ असे म्हणणे म्हणजे या सर्वांचा अवमान करण्यासारखेच आहे. असा करंटेपणा कोणीही करू नये.
7 मे 2013 ला माझ्या ‘दखलपात्र’ या अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन केसरीवाड्यात झाले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, निवेदक सुधीर गाडगीळ, श्रीपाल सबनीस, श्रीराम पचिंद्रे, प्रदीप नणंदकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मी अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित केली असली तरी माझे स्वत:चे हे पहिलेच पुस्तक होते. त्यामुळे माझ्या हितचिंतकांनी आणि मित्रांनी त्याच्या बारशाचा सोहळा वाजत गाजत पार पाडला. कार्यक्रम संपल्यावर जेवण आणि नंतरच्या गप्पांनी आमच्या दोस्त मंडळींनी रात्र जागवली.
पहाटेच्या सुमारास आम्ही जरा कलंडलो. मला झोप लागते न लागते तोच माझा फोन वाजला. अतिशय त्रासलेल्या मन:स्थितीत मी तो उचलला. समोरची व्यक्ती म्हणाली, ‘‘सर, मी इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे गावातून राहुल सवणे बोलतोय. रात्री तुमचे ‘दखलपात्र’ हे पुस्तक वाचले. ते आवडले. तुमचे अभिनंदन करण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी फोन केलाय.’’
एक तर आदल्या रात्री पुस्तकाचे प्रकाशन झालेले. दुसरे म्हणजे लेखकाबरोबरच प्रकाशकही मीच असल्याने हे मला पक्के ठाऊक होते की पुस्तक अजून बाजारात गेले नाही. मग लासुर्णेसारख्या छोट्या गावात, इतक्या कमी वेळात ते जाणेही शक्य नाही. त्यामुळे माझा कुणी मित्रच गंमत करत असेल म्हणून मी जरा आवाज चढवला.
समोरून सवणे शांतपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘सर, माझा रवीकिरण सासवडे हा मित्र कालच्या प्रकाशनच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्याने रात्री मला हे पुस्तक दिले. मला वाचनाची आत्यंतिक आवड आहे; मात्र काही दिवसांपूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाल्याने नवे काही वाचवत नव्हते. रवीने काल पुस्तक दिल्यावर मी चाळायला घेतले आणि वाचतच सुटलो. रात्री अकराच्या सुमारास लोडशेडिंगमुळे ‘लायटीने घोटाळा’ केला. आता पुस्तक वाचल्याशिवाय समाधान होणार नाही म्हणून मी चिमणी लावली. चिमणीच्या प्रकाशात रात्री संपूर्ण पुस्तक वाचून काढले. हे पुस्तक वाचल्यावर मला माझ्या पत्नीच्या मृत्युचाही विसर पडला. त्यामुळे इतक्या पहाटे तुम्हाला फोन करतोय...’’
माझी झोप कुठल्या कुठे पळाली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आलेली ही पहिली प्रतिक्रिया. माझेही डोळे पाणावले. मी त्यांना धन्यवाद दिले. त्यावर सवणे म्हणाले, ‘‘सर, मी माझ्या कमाईतील निम्मी रक्कम पुस्तकांच्या खरेदीसाठी खर्च करतो. त्यामुळे माझी झोपडी पुस्तकांनी समृद्ध झालीय. ती पुस्तके मी वाचलीत. माझ्या या दर्जेदार ग्रंथसंग्रहात तुमच्या पुस्तकाने भर पडलीय.’’
मी त्यांना ‘काम काय करता?’ असे विचारले. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने तर मी उडालोच. सवणे म्हणाले, ‘‘मी भंगार विक्रेता आहे. गोवागावी फिरून भंगार गोळा करतो आणि ते विकतो.’’ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाचनाची आवड जोपासणार्‍या या अवलियाची दाद मिळाल्याने मी खर्‍याअर्थी श्रीमंत झालो. साहित्यातील मोठ्यात मोठा पुरस्कारही यापुढे फिका ठरावा. भारावलेल्या अवस्थेतच मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही काही लिहिता का?’’ ते म्हणाले, ‘‘होय सर, मी ‘मोजमाप’ नावाचे आत्मचरित्र लिहिलेय. भंगारच्या गाड्यावर ठेऊन, ओरडून हे पुस्तक विकले. त्याची एक हजार प्रतींची आवृत्ती नुकतीच संपलीय.’’
पुढे मी मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. गावकुसाबाहेर त्यांची वस्ती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे अफाट वाचन आणि ग्रंथप्रेम पाहून हरखून गेलो. नेमके त्यादिवशी राखीपौर्णिमा होती. त्यांच्या मुलीने मला राखी बांधली. कवी महादेव कोरे, रवीकिरण सासवडे सोबतीला होतेच. आम्ही अक्षरशः भारावून गेलो. लेखणामुळे मिळालेले, कायमस्वरूपी जोडले गेलेले असे लोक हीच तर माझी मोठी संपत्ती आहे. त्यानंतर लवकरच म्हणजे 8 ऑगस्ट 2014 ला ‘दखलपात्र’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि लेखणी व वाणीवर उत्तम प्रभुत्व असणारे प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी मी राहुल सवणे यांना अगत्याने बोलावले. माझ्या पुस्तकाचे ‘पहिले वाचक’ म्हणून कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.
दुसरा अनुभव भुवड काकूंचा. आमच्या ‘चपराक’ कार्यालयाजवळ बाफना पेट्रोल पंपाच्यासमोर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. तिथे त्या लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या असे खाद्यपदार्थही विक्रीला ठेवतात. मुख्य म्हणजे हे सारे पदार्थ त्या स्वतः तयार करतात. ‘चपराक’ला बर्‍याचवेळा रात्री उशीरपर्यंत काम झाल्यानंतर सकाळी या दुकानात जाण्याचे प्रसंग अनेकदा येतात. मी ‘चपराक’मध्ये असतो इतकीच जुजबी माहिती त्यांना होती. एकदा ‘सकाळ’ या पुण्यातील आघाडीच्या वृत्तपत्राने माझ्या अग्रलेख संग्रहाचे परीक्षण प्रकाशित केले आणि माझा गौरव केला. त्याच दिवशी नेमका मी त्या दुकानात गेलो. काकूंनी मला सांगितले, ‘‘दादा तू चपराकमध्ये असतोस ना रे? मला ते पाटील सरांचे पुस्तक आणून देतोस का? मी त्याचे पैसे देईन.’’
मला गंमत वाटली. ते पुस्तक मी त्यांना नेऊन दिले. त्यांनी पुस्तकाचे पैसे आग्रहपूर्वक मला दिले. मी तिथून सटकलो. हा प्रसंग विसरूनही गेलो. काही दिवसांनी पुन्हा त्या दुकानात जाणे झाले. काकूंनी ते पुस्तक वाचले होते. मला पाहताच त्या एकदम भारावून गेल्या. अत्यानंदाने म्हणाल्या, ‘‘सर, माफ करा. तुम्हीच घनश्याम पाटील आहात, हे मला माहीत नव्हते. मला पुस्तक खुपच आवडले. लोकांच्या मनातला रोषच तुम्ही लेखणीतून मांडलाय.’’ त्यादिवशी त्यांनी आग्रहपूर्वक खूप ‘खाऊ’ दिला. नंतर जेव्हा कधी त्यांची भेट होते तेव्हा त्या आस्थेने विचारपूस करतात. त्यांची सुखदुःखे सांगतात. हा व्याप सांभाळत काही लिहिण्याचाही प्रयत्न करतात. मला ते आवर्जून दाखवतात आणि माझ्या प्रतिक्रियेवर खुशही होतात.
मध्यंतरी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुका झाल्या. मिलिंद जोशी यांनी त्यांच्या परिवर्तन पॅनेलमधून मला निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. खरेतर मी निवडून यायची शक्यता खुपच कमी होती. यातले राजकारण माहीत नव्हते. सभासद माहीत नव्हते; मात्र त्यांचा आग्रह मोडता आला नाही. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मी सहमती दर्शवली आणि शेवटचा अर्ज मी भरला. त्यात आमच्या पॅनलचे कार्याध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार चांगल्या मतांनी निवडून आले. आमचे पुण्याबाहेरीलही सर्व प्रतिनिधी निवडून आले; मात्र आम्ही पुण्यातले कार्यवाहपदाचे चारही उमेदवार सटकून आपटलो. आपटलो म्हणजे आमचे पूर्णच पानिपत झाले.
या निवडणुकीच्या प्रचारात फिरतानाही अनेक अनुभव आले. प्रामुख्याने ते वाचनसंस्कृतीशी निगडित होते. अरूण किर्लोस्कर हे आपल्याकडील सुप्रसिद्ध उद्योजक. त्यांचे वय जवळपास ऐंशीहून अधिक असावे. त्यांच्याशी माझा कधीच काही संबंध आला नव्हता. एकेदिवशी अचानक त्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही परिषदेच्या निवडणुकीला उभे आहात याबद्दल अभिनंदन. या निवडणुकीशी माझे काहीही देणेघेणे नाही; मात्र मी परिषदेचा सभासद आहे. मला मतपत्रिकाही आलीय. इथे आवर्जून मतदान करावे असे काहीच नाही; मात्र तुम्ही सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे पुस्तक प्रकाशित केलेय. त्यांचे ‘चपराक’ने केलेले ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक मी वाचलेय. ते माझे आवडते लेखक आहेत. इतके चांगले पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल माझे मत तुमच्या पॅनेलला. तुम्ही असेच लिहित रहा. उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करा. तुमची साहित्यसेवा मोलाची आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहेत.’’
केवळ एक दर्जेदार पुस्तक प्रकाशित केल्याने इतक्या ज्येष्ठ उद्योजकाने माझ्यावर हा विश्‍वास दाखवला होता. पुढे त्यांच्याशी चांगला स्नेह जुळला. माझ्या लेखनाला ते आवर्जून दाद देतात. मी लिहावे यासाठी प्रोत्साहन देतात. असाच प्रसंग हडपसरचा. प्रचारानिमित्त त्या परिसरात फिरताना आम्ही श्रीकांत कुमकर यांच्या घरी गेलो. त्यांच्याशी कसलाच परिचय नव्हता. ते दोघेही पती-पत्नी परिषदेचे सभासद आहेत. उत्तम वाचक आहेत. मी ‘चपराक’चा संपादक आहे हे कळताच त्यांनी अक्षरशः आमचे जोरदार स्वागत केले. मला कारण काही कळेना. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या आईची मुलाखत तुम्ही तुमच्या अंकात प्रकाशित केली होती. तेव्हापासून आम्ही ‘चपराक’चे नियमित वाचक आहोत. तुमची अशी भेट होईल असे वाटले नव्हते.’’ कुमकर मॅडमच्या आई भारतीताई पवार. त्या नंदुरबारच्या. हुतात्मा शिरीषकुमार यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले होते. साने गुरूजींच्या प्रभावाने या चिमुकल्यांनी नंदुरबारमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. माझे कर्तव्य म्हणून मी त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली होती; मात्र तेव्हापासून हे पूर्ण कुटुंब माझे ‘वाचक’ झाले होते.
आणखी एक अनुभव तर फारच वेगळा आहे. एकदा असाच एक फोन आला. त्या वाचकाने माझे पुस्तक वाचले होते. ते वाचून तो ‘चपराक’चा सभासदही झाला होता. त्याने पुस्तकाचे भरभरून कौतुक केले. माझ्या काही लेखांवर बोलला. अशावेळी लेखक म्हणून नकळतपणे आपला अहंकार सुखावतो. नंतर त्याने चाचरतच विचारले, ‘‘सर, मी तुमचे लेखन आवर्जून वाचतो. तुमचे स्पष्ट आणि परखड विचार आवडतात. त्यामुळे तुमच्यावर माझा विश्‍वास आहे. तुम्ही मला काही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही याची खात्री असल्याने काही मनातले सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलाय. आपला गैरसमज होऊ नये ही विनंती; पण मला तुमचा सल्ला हवाय...’’
मी त्याला म्हणालो, ‘‘दादा जे काही आहे ते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोला. मला जे शक्य आहे ते सहकार्य नक्कीच करेन.’’
तो म्हणाला, ‘‘सर, मी एका कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहे. मला तुटपूंजा पगार मिळतो. त्यात कसेबसे घर चालते. वडिलांना कॅन्सर होता. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या इच्छेखातर नात्यातल्याच एका मुलीशी लग्न केले. नंतर वडील गेले. माझा संसार सुरू झाला पण परिस्थितीने गांजलोय. तुम्हाला कसे सांगावे तेच कळत नाही...’’
मी विचारले, ‘‘तुम्हाला आणखी चांगली नोकरी हवीय का? काही कौटुंबिक अडचणी आहेत का? नेमके कारण सांगा म्हणजे आपल्याला काही मार्ग काढता येईल.’’
तो म्हणाला, ‘‘सर, आपली तशी ओळख नाही. आपण कधी भेटलोही नाही; मात्र तुमचे साहित्य वाचून मी तुमचा चाहता झालो आहे. तुम्ही योग्य तेच सांगाल.’’
मी पुन्हा म्हणालो, ‘‘मित्रा स्पष्ट बोल. मला जे शक्य आहे ते नक्की करेन.’’
त्यावर त्याने सांगितले, ‘‘सर, आम्ही परिस्थितीपुढे हतबल आहोत. घरी वडिलधारी मंडळी कोणीच नाहीत. भावकीचे वाईटावर टपून बसलेत. वडिलांच्या इच्छेखातर लग्न केले. त्यानंतर आम्ही काळजी घेतली, तरीही आमच्याकडून चूक झालीच. बायकोला दिवस गेलेत. हे पहिलेच मूल असणार आहे; मात्र... आम्ही ऍबॉर्शन करायचा विचार करतोय. आमचेच खायचे वांदे आहेत त्यात ही भर. बायको विरोध करतेय पण पर्याय नाही. मी काय करू? मला काहीतरी मार्ग दाखवा...’’
हा वाचक काळा की गोरा हेही मला माहीत नव्हते. मी त्याला कधी भेटलोही नव्हतो. केवळ लेखक या नात्याने तो त्यांची इतकी वैयक्तिक गोष्ट शेअर करत होता. इतक्या नाजूक विषयावर सल्ला मागत होता. मला दोन क्षण काय बोलावे तेच सुचेना. स्वतःला सावरत मी म्हणालो, ‘‘हे बघ मित्रा, आता वेळ गेलीय. निसर्गाने त्याचे काम केलेय. बाळ जन्मण्याच्या आधीच त्याला मारणे हे केवढे मोठे क्रौर्य? कदाचित हे होणारे मुलच तुझा भाग्योदय घेऊन येईल. त्यात बायकोच्या मनाचाही विचार कर. तिला मातृत्वाची आस लागली असेल. आणखी कणखर हो. कठोर परिश्रम कर. तुझ्या वडिलांनी असा काही विचार केला असता तर तुझा जन्मच झाला नसता...’’
तो फोनवरच रडायला लागला. कितीतरी वेळ आम्ही बोलत होतो. सुदैवाने त्याने माझे ऐकले. बाळाचा जन्म झाला. पुढे आमची मैत्रिही झाली. बाळाचे नावही मीच सुचवले. ती मुलगी आता मॉन्टेसरीत जातेय. एक लेखक म्हणून यापेक्षा मोठे समाधान कोणते? लेखनाने जोडलेला हा गोतावळा माझ्यासाठी अनमोल आहे.
अगदी आत्ता आत्ताचा अनुभव. ‘अंतर्नाद’ हे मराठीतले एक दर्जेदार मासिक. भानू काळे यांच्यासारखा साक्षेपी संपादक असल्याने या मासिकाने अल्पावधितच साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना मी माझा अंक नियमितपणे भेट म्हणून पाठवायचो. एका चांगल्या संपादकाने आपला अंक वाचावा ही त्यामागची अपेक्षा. परवा मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या पोस्टमनने एक पत्र आणून दिले. ‘अंतर्नाद’चे पाकिट बघून मी उत्सुकतेने ते फोडले. आत मला लेखनासाठी शुभेच्छेबरोबरच भानु काळे यांच्यातर्फे पाच हजार रूपयांचा धनादेश होता. केवढी मोठी पावती ही! एका ज्येष्ठ संपादकाने दिलेली दाद कितीपटीने बळ वाढवत असेल, हे शब्दात सांगता येत नाही. बाहेर पडणार्‍या पावसाहून अधिक वृष्टी आता माझ्या मनात होत होती आणि आनंदाश्रूने डबडबलेले माझे डोळे नवसृजनासाठीची मशागत करत होते.
हा लेख लिहित असतानाच मीनल सासणे यांची एक मनीऑर्डर आलीय. कितीची? तर तीन हजार रूपयांची. कोण या सासणे? तर गोविंदराव पवार यांच्या कन्या! बरोबर ओळखलेत!! ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भगिनी. त्यांनी पुस्तकांसाठी म्हणून हे पैसे चक्क टपालाने पाठवलेत. मग वाचक नाहीत असे म्हणणे म्हणजे या सर्वांच्या प्रामाणिक भावनेचा केवढा मोठा अवमान? तो प्रमाद मी कधीच करणार नाही. हे आणि असे वाचक आहेत म्हणून आम्ही आहोत.
असे कितीतरी वाचक आपल्या आजूबाजूला आहेत. पुस्तकांवर, लेखकांवर ते भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच मराठी प्रकाशन व्यवहार सुरळीत चालू आहे. प्रकाशक आणि लेखक या दोन्ही नात्याने वाचकांचे जे उदंड प्रेम लाभते त्यामुळे मी भरून पावतो. हेच माझे भांडवल आणि सामर्थ्य आहे. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी असे वाचक मोठी भूमिका बजावत आहेत. त्या सर्वांविषयी मी कायम कृतज्ञ आहे. 

- घनश्याम पाटील
प्रकाशक, संपादक 
चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092

Thursday, October 20, 2016

‘दखलपात्र’ घनश्याम!

'साहित्य चपराक' दिवाळी महाविशेषांकाचे प्रकाशन काल उत्साहात झाले. मान्यवरांची अभ्यासपूर्ण भाषणे हा या कार्यक्रमाचा आत्मा होता. परभणी येथील दैनिक 'समर्थ दिलासा'ने या दिवाळी महाविशेषांकाच्या निमित्ताने कालच्या अंकात माझ्यावर एक सुंदर लेख प्रकाशित केला. त्यांना आणि अत्यंत जिव्हाळ्याने हा लेख लिहिणा-या कवयित्री, लेखिका अर्चनाताई डावरे यांना मन:पूर्वक धन्यवाद!



‘चपराक’ या प्रकाशन संस्थेचे संचालक श्री. घनश्याम पाटील यांच्या 500 पानी दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून या निमित्ताने हा विशेष लेख...

पाच एक वर्षापूर्वीची गोष्ट. वेगवेगळ्या दिवाळी अंकासाठी मी माझे साहित्य पाठवित होते. इतक्यात दादांचा अर्थात श्री. दिवाकर खोडवे यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘अर्चना, एक पत्ता व फोन नंबर देतो आहे. तिथे तुझे साहित्य नक्की पाठव. संपादक दर्जेदार साहित्यांना स्थान देणारे सामाजिक नि साहित्यिक जाण असणारे आहेत.’’ त्यांनी लगेच मला पत्ता व फोन नंबर दिला. मी तो टिपून घेतला. परंतु मनाशीच ठरवलं, कुरिअरचा लिफाफा तयार करायच्या आधी संपादकांना फोन करायचा. प्रतिसाद योग्य आला तर तत्काळ साहित्य पाठवून द्यायचं नि मी लगेच फोन लावला.
‘‘हॅलो, मी आपल्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवू इच्छिते.’’
समोरून क्षणाचाही विलंब न करता संपादक बोलले, ‘‘होय ताई! लगेच पाठवा. प्रकाशनाची जबाबदारी माझीच. तेव्हा लगेच पाठवा. आमचा पत्ता ठाऊक आहे ना आपल्याला?’’
‘‘हो, सर’’ इति मी.
‘‘मग पाठवा साहित्य. आपलं स्वागत आहे ताई.’’
मी क्षणभर विचारात पडले. प्रकाशक आणि संपादक दोन्ही पदं भूषविणारा, सतत व्यग्र असणारा माणूस तत्काळ फोन उचलतो आणि साधी ओळखही नसणार्‍या समोरच्याचे उत्साहात स्वागतही करतो. नक्कीच कुशलतेने काम करणारे नि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे असले पाहिजेत, हे मनानी नक्की केलं आणि खरोखरच अनेक दिग्गजांकडून सन्मानित झालेले नि कैकवेळा अवघड कसोट्यांतूनही खरे उतरणारे ‘चपराक प्रकाशना’चे हृदयस्थ आणि साहित्यिकांचे लाडके लेखक श्री. घनश्याम पाटील यांची नि माझी ओळख झाली.
या स्पर्धेच्या युगात प्रकाशन विश्‍वात आपले पाऊल अगदी दृढपणे उभे करणे आणि केवळ आप्त स्वकियांनाच नव्हे तर दूरवरच्या राज्यातही आपल्या नम्रतेची छबी उमटवित हितचिंतक माणसांचा मेळा सतत सभोवार टिकविणे हे आजमितिला तरी मोठे जिकिरीचे काम आहे; पण हे अशक्यप्राय वाटणारं अवघड काम ते फार लिलया नि सहज करतात. चेहर्‍यावर कायम शांत स्मीतहास्य नि संयम असतो. उत्तम श्रोत्याचे गुण जणू जन्मत:च घेऊन आले असावेत, असं त्यांच्याशी बोलताना कायम जाणवतं. त्यांच्या तोंडून नकार घंटा कधी वाजणारच नाही. ‘‘हो, बरोबर आहे. अगदी तसंच करू’’ असे समोरच्याच्या वक्तव्यावर पुश्ती जोडणार्‍या वाक्यांचा वर्षाव होतो. साहजिकच समोरचाही तितक्याच उर्मीने, जिद्दीने आणि जीव ओतून मग त्यांच्या साप्ताहिकासाठी, मासिकासाठी, दिवाळी अंकासाठी सातत्याने लिहित राहतो.
नेमकं खरं कौतुक तर वेगळंच ठरावं. अगदी प्रथितयश दिग्गजांपासून नवोदित लेखकांपर्यंत विषय देऊन सगळ्यांनाच लिहितं करतात; परंतु कुठेही गर्वाचा दर्प किंवा अहंकार डोकावत नाही. उलट साहित्यिकांच्या साहित्याच्या शिदोरीमुळे घनश्याम घडला आणि त्यांच्या दर्जेदार लिखाणामुळेच आज हजारो वर्गणीदार ‘चपराक’शी जोडले गेले आहेत, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात. श्रेय न लाटणारे संपादक आताशा विरळच!
नवल तर तेव्हा वाटतं, जेव्हा कळतं की, मुळातच पत्रकारितेचा पिंड. जन्मत:च. हा संपादक सुरूवातीला पेपर विक्री करून तद्नंतर पुण्यात कै. वसंतराव काणे यांच्या ‘संध्या’ या सायंदैनिकात नोकरी करून आज स्वबळावर उभा आहे. स्वव्यवसायास आरंभ करणं, साप्ताहिक ते दिवाळी अंक प्रकाशित करणं, इतर पुस्तकांचेही प्रकाशन आणि त्यासोबत अग्रलेख लिहिण्याची जबाबदारी! एकाचवेळी विविध स्तरावर काम करूनही त्यांनी यशाचा आलेख वाढवतच नेला. खरंतर अशा बाबींचं वर्णन करणं अतिशय सोपं आहे; परंतु स्वत:च प्रकाशक आणि संपादक या दोन्ही बाजू सांभाळत आर्थिक डोलाराही मजबूत करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. गॉडफादर नसताना समाजात प्रस्थापित होऊन गरूडझेप घेणं तर त्याहूनही कठीण! पण आज ‘चपराक’ दिवाळी अंकाने महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रथम क्रमांक पटकाविला आणि कैक पुरस्कार ‘चपराक’च्या नावे नोंदविलेले आहेत. ते मानाचे स्थान जनमाणसात रूजविले आहे. पराकोटीची अभ्यासूवृत्ती, प्रगल्भता, स्पष्टता, सामाजिक भान, कष्ट, कौशल्य, प्रयत्न आणि स्वत:वर विश्‍वास असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्यामुळेच घनश्याम पाटील यशस्वी आहेत. किंबहुना त्यांची दखल केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्रंही घेत आहेत. ही सत्यता, लोकप्रियता आहे. पाटलांकडे पाहिल्यावर वाटतं स्वप्न पाहणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्नं वास्तवात आणणे हे आपले कर्तव्य आहे आणि कष्ट करण्याची सवय लागलेली असली ना की माणूस कार्यपूर्तीचा ध्यास घेतो नि यशस्वीही होतो. अशा ठिकाणी घनश्याम पाटलांचं नाव अगदी आग्रहाने अग्रभागी येतं. वय वर्षे जेमतेम बत्तीस अन् जणू स्वकर्तृत्वाचा इतिहासच रचलाय त्यांनी! स्वसामर्थ्यावर एकट्यानेच संघर्ष करणे खूप वेदनादायक गोष्ट असते; परंतु त्यातून माणूस घडत जातो ही सत्यता. कदाचित म्हणूनच अगदी लहान वयातच जाणिवांच्या तीव्र संवेदनेने पेटून प्रत्येक विषयावर सखोल व परखडपणे लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली. ते लेखन म्हणजे केवळ आरडाओरड नव्हती; ते झणझणीत अंजन होतं. म्हणूनच सामान्यांच्या मनात ते सहजपणे उतरलं. त्यांच्या कैक अग्रलेखात तीव्रच नाही तर मानसिक पातळीवर घडणार्‍या अनेक घटनांचे हळवे आंदोलनंही त्यांनी चपखलपणे लिहिली, मांडली. हळव्या विषयांचे कंगोरे तितक्याच साध्या भाषेत रेखाटले. ‘दखलपात्र’ ठरावे असेच ते लिखाण!
असा हा प्रचंड व्याप सांभाळताना माणूस म्हणून जगण्याचा सोपा मंत्र विसरले नाहीत. गिरमे मॅडमविषयी मातृदेवो भव: म्हणणारे घनश्याम पाटील सागर कळसाईत, महेश मांगले, सागर सुरवसे, गिरिश जंगमे, हणमंत कुराडे आणि व्यंकटेश कल्याणकर या नवोदित लेखकांचे, चपराक टीमचे कौतुक करायला, आभार मानायला विसरत नाहीत. म्हणूनच चपराक टीम एखाद्या कुटुंबासारखी गुण्यागोविंदाने व एका विचाराने सुखात नांदते आणि त्यामुळेच एवढ्या अल्पकालावधीत नामवंत लेखकांची व नवोदित लेखकांची मिळून 87 साहित्यिक पुस्तकांचे प्रकाशन चपराकने केले आहे. परंतु अभिमानाची गोष्ट ही की हा प्रवास करताना त्यांनी मुजोरीही केली नाही आणि जीहुजूरीही केली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस असोत की शरद पवार, जितेंद्र आव्हाड असोत वा सद्य स्थितीतले सरकार, जिथे उणीवा असतील तिथे घनश्याम पाटलांची लेखणी पोचणारच हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. म्हणूनच या हरहुन्नरी अवलियाची प्रस्तावना आपल्या पुस्तकास लाभावी ही नवलेखकांची तीव्र इच्छा असते आणि तशी कैक लेखकांची ही इच्छा त्यांनी पूर्णही केली आहे. बर्‍याचदा वाङ्मयीन व वैचारिक नियतकालिकांमधूनही त्यांनी लेख लिहिलेले आहेत, जे उत्कृष्ट, वाचनीय आहेत.
असं म्हणतात,
उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यदुर्गम पथ:॥
खरोखरच ध्येयापर्यंत पोचविणारा मार्ग पाटलांनी केव्हाच निवडलाय आणि म्हणूनच अगदी दिग्गजस्थानी असणारे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, द. ता. भोसले, सुधीर गाडगीळ, विश्‍वास वसेकर, संजय सोनवणी, सदानंद भणगे, मिलिंद जोशी ते सौ. श्रुती कुलकर्णी, अर्चना माने, प्रशांत चव्हाण, सागर सुरवसे यांच्यापर्यंत  त्यांच्या कर्तृत्वामुळे आपापल्या शब्दात, शब्दवैभवात त्यांना बद्ध करावंसं वाटलं, मनस्वी कौतुक करावंसं वाटलं.
संपादकाला शोभेल अशा ‘दखलपात्र’ नि ‘झुळूक आणि झळा’ या पुस्तकाच्या लेखकाचे, टिळकांचा वारसा जणू परखडपणात जपणार्‍या लेखकाचे, नम्र व सुस्वभावी प्रकाशकाचे खरंच मनस्वी कौतुक.
या पुढच्या देदिप्यमान वाटचालीला, मराठी साहित्याला परप्रांतात पोहचविणार्‍या पांथस्थाला, नवोदितांना आभाळ मुठीत घेऊन लिहितं करणार्‍या संपादकाला आणि सदोदित दर्जेदार लिखाण व साहित्य नव्या पिढीसमोर ठेवून साहित्याचा दर्जा जपणार्‍या प्रकाशकाला भरभरून शुभेच्छा!! शुभं भवतू!!
- अर्चना गिरीश डावरे, परभणी

Sunday, October 9, 2016

विचारांचे कवडसे

एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन करायचे झाल्यास त्या राष्ट्रातील तरूणाईच्या मनाचा वेध घ्यायला हवा. तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याचे निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूर येथील स्वप्निल कुलकर्णी हा असाच एक धडपड्या युवक. आपल्या उपजिविकेचे साधन असलेली नोकरी सांभाळत स्वप्निल कुलकर्णी या तरूणाने राज्यातील आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे धांडोळा घेतला आहे. विचारधारा, जात, पात, धर्म, प्रांत यापुढे जाऊन स्वप्निल यांनी चौफेर लेखन केले. त्यातील प्रासंगिक विषयावरील लेख काही नियतकालिकात प्रकाशित झाले. त्यामुळेच आजचा तरूण कसा व्यक्त होतोय हे पाहण्यासाठी स्वप्निल कुलकर्णी यांचे या पुस्तकातील एकवीस लेख वाचायला हवेत.
स्वप्निल यांच्या मनातील विचारांचे कवडसे या संग्रहात विखुरले आहे. संस्कार आणि संस्कृती जतन करावी यासाठीची त्यांची तळमळ दिसून येते. आजचे तरूण वाहवत चाललेत,  असा अपप्रचार सुरू असतानाच स्वप्निल यांच्यासारखे लेखक धडाडीने अन्याय, असत्यावर तुटून पडतात, लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक बाजू वाचकांसमोर आणतात ही कौतुकाची बाब आहे. स्वप्निल यांना लेखनासाठी स्थानिकपासून आंतरराष्ट्रीय घटनांपर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही. संवादी भाषा आणि तळमळ यामुळे हे लेख वाचताना वाचक अंतर्मुख होतो. एखाद्या विषयावर मांडलेली मते वाचताना आपल्या मनातील भावनाच व्यक्त झाल्यात असे वाचकांना वाटणे हीच तर लेखकाची मोठी उपलब्धी असते.
‘आई तू उन्हातली सावली’ या पहिल्याच लेखात स्वप्निल यांनी शब्दांची साखर पेरणी केली आहे. मातृत्वाची महती गाताना लेखक भावव्याकूळ होतो. जुलीया वार्डहो या अमेरिकन कवयित्रीपासून ते मराठमोळ्या फ. मु. शिंदे यांच्यापर्यंतच्या कवींचे ‘मातृत्व’ या विषयावरील दाखले या लेखात आले आहेत. स्वप्निल यांच्या वाचनाचा आवाका आणि त्यांची उपजत समज याची ही साक्ष ठरेल. ‘आई हा परमेश्‍वर, आई माझा गुरू आणि आईच माझा प्राण. त्यापलीकडं कुणी खूप वेगळा, मोठा, श्रेष्ठ असा परमेश्‍वर असलाच तर त्यालासुद्धा माझ्या आईची सर येणार नाही’, हे लेखकाचे विचार वाचताना त्याची मातृभक्ती दिसून येते. आपले सांस्कृतिक संचित जपताना आजच्या तरूणाईची मातृत्वाच्या गौरवाची ही भाषा म्हणूनच प्रत्येकाला प्रेरणादायी वाटावी.
असे म्हणतात की, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो, तेथील माणसे मरतात. काहीवेळा जनावरेही मरतात; मात्र जिथे संस्कारांचा दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हे संस्कार जिवंत ठेवणे, ते वृद्धिंगत करणे हे काम आजच्या तरूणाईने करायला हवे स्वप्निल कुलकर्णी त्यासाठी लेखणीच्या माध्यमातून पुढाकार घेताना दिसतो. ‘टिळक आणि गणपती उत्सव’, ‘शिवाजी महाराज एक धिरोदत्त राजा’, ‘चेतनाप्रवाह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या व्यक्तिचित्रणात्मक लेखांच्या माध्यमातून स्वप्निल कुलकर्णी यांनी तरूणांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. ‘करावयास लागा म्हणजे कळून येईल की तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य देताना लेखकातील सच्चेपणा दिसून येतो. ‘नवरात्र संकल्पना आणि महत्त्व’ या विषयावरही लेखकाने उत्तम मांडणी केली आहे. आपल्याकडील सण, उत्सव, चालीरिती, रूढी परंपरा यापासून आपण दूर जात असताना स्वप्निल यांनी त्यांच्या नजरेतून याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. उत्सवांना ‘इव्हेंट’ म्हणून बाजारू स्वरूप दिले जात असताना स्वप्निल यांनी त्यामागील संकल्पना नेटकेपणे मांडली आहे. ‘नवरात्र केवळ साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीची गाथाच नाही, येथे साधनाक्रमाचे निर्देशही दिले आहेत. प्रथम मनशुद्धी झाल्याशिवाय कोणीही ज्ञानप्राप्ती करू शकत नाही’ हे लेखकाने नोंदवलेले निरिक्षण खूप काही सांगून जाते.
लेखकाचा जन्म पंढरपूरचा असल्याने त्यात या शहराची गौरवगाथा, वारकरी संप्रदायाचे महात्म्य येणे स्वाभाविकच म्हणायला हवे. आपले पहिलेच पुस्तक वाचकांच्या हाती देताना ‘पंढरपूर आणि वारकरी संप्रदाय’, ‘पंढरीची वारी ः इतिहास, परंपरा व वैशिष्ट्ये’ असे दोन अभ्यासपूर्ण लेख लिहून त्यांचा या पुस्तकात समावेश केला आहे. वाढती अराजकता लक्षात घेऊन लेखक अस्वस्थ होतो आणि ‘कधी होशील रे माणूस?’ असा सवाल करतो. ‘लेक वाचवा, भविष्य वाचवा’ या लेखातूनही स्वप्निल कुलकर्णी सामाजिक प्रश्‍नांबाबत किती गंभीर आहेत याची प्रचिती येते. लेखकाच्या अभ्यासाची कुवत मोठी असल्याने पानिपत युद्धापासून ते ‘आपला देश महासत्ता कधी होईल?’ इथपर्यंत सर्व विषय त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. परदेशातील स्वच्छतेचे तोंड भरून कौतुक करताना आपल्या फलाटावरील पूलावर पानाच्या मारलेल्या पिचकार्‍या पाहून लेखकाला ही विसंगती खटकते आणि ‘हे देशप्रेम आहे का?’ असा रोकडा सवाल तो उद्विग्न होऊन करतो.
सरकारच्या दलालधार्जिण्या धोरणांमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. स्वप्निल कुलकर्णी यांनी या विषयावर जळजळीत भाष्य केले आहे. विकासाची गंगोत्री केवळ पश्‍चिम महाराष्ट्राकडेच वळवल्याचे वास्तव पाहून लेखक पेटून उठतो. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या पाहून त्याचे हृदय द्रवते. त्यांच्याविषयी वाटणार्‍या तळमळीमुळेच तो पेटून उठतो आणि राज्यकर्त्यांविरूद्धचा हा उद्रेक लेखणीतून धाडसाने मांडतो. तत्कालीन सरकारची अनागोंदी पाहून हा लेख लिहिला असला तरी आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे दुःख स्वप्निल कुलकर्णी यांनी नेमकेपणे मांडले आहे. शेतकरी, कष्टकरी यांचा कैवार घेणारी लेखणी कोणत्याही परिस्थितीत गौरवास पात्र ठरते. स्वप्निल यांचे त्यासाठी विशेष अभिनंदन.
‘पर्यावरण संतुलन आणि वृक्षसंवर्धन’, ‘भ्रष्टाचाराचा भस्मासूर’, ‘मोबाईल शाप की वरदान’, ‘दहशतवाद आणि मानसिक आरोग्य’, ‘तरूणाईची दिशा आणि दशा’, अशा वैविध्यपूर्ण विषयांवर स्वप्निल कुलकर्णी यांनी आपली मते मांडली आहेत. मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचे लेखकाचे चिंतन दखल घेण्याजोगे आहे.
रोजच्या रहाटगाड्यातून वेळ काढून वाचन, लेखन, चिंतन करणार्‍या स्वप्निल कुलकर्णी यांच्यासारख्या युवकांची आज आपल्या राष्ट्राला गरज आहे. स्वप्निल यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे लेखनात काही ठिकाणी नवखेपणाच्या खूणा स्पष्टपणे दिसून येतात. वृत्तपत्रातील लेख, पूरक बातम्या वाचून भाष्य केल्याने काही लेख निबंधाच्या अंगाने गेले आहेत. मात्र तरीही त्याचे संदर्भमूल्य आणि वाचनीयता कमी होत नाही. तरूणांची अभिव्यक्ती ही स्वागतार्हच म्हणायला हवी. भविष्यात स्वप्निल यांच्याकडून आणखी ताकतीचे लेखन व्हावे, स्वतंत्रपणे त्यांनी नवनवीन विषय आणि साहित्य प्रकार हाताळावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.
पाने - 112
किंमत - 110
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)



Saturday, October 1, 2016

‘आपले राष्ट्रसंत’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्तिचे मूर्तिमंत रूप! सध्याच्या काळात काही अपप्रवृत्तीमुळे ‘संत’ हा शब्दच बदनाम झाला आहे. मात्र आपल्याला अनेक देदीप्यमान संतांची परंपरा लाभली असून आपले राष्ट्र टिकवून ठेवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. भक्तिमार्गाच्या माध्यमातून लोकजीवन घडवण्यात त्यांनी जो वाटा उचलला त्याला तोड नाही. समाज घडविण्यात मोलाचा वाटा असलेल्या अशा संतांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे तुकड्यादास!
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे चरित्र आणि चारित्र्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अशा या महापुरूषाची सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे अहोभाग्य! नागपूरातील श्रावणजी पंचभाई यांना ते लाभले. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या पंचभाईंनी श्रद्धाभावाने त्यांची सेवा केली. राष्ट्रसंतांविषयी वाटणार्‍या अतीव आदरापोटी त्यांनी आपली स्वतःची काही जमीन विकली आणि आलेल्या पैशातून ‘ग्रामगीते’च्या भरपूर प्रती छापल्या. लोककल्याणार्थ त्या घरोघरी मोफत वाटल्या. अशा सत्पुरूषाच्या पोटी जन्म घेतलेल्या विनोदजी पंचभाई यांनीही ज्ञानदानाचा हा वारसा जपला आहे. सरकारी खात्यात नोकरीस असूनही त्यांनी आपल्या वडिलांनी घालून दिलेला मार्ग सोडला नाही. ‘शिकावे आणि शिकतच रहावे’ हा मूलमंत्र जपत ते सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लिहीत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे ‘थोडं मनातलं’ आणि ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकांच्या घवघवीत यशानंतर त्यांनी तिसरे पुस्तक त्यांचे ‘कुलसंत’ असलेल्या राष्ट्रसंतांवर लिहिले आहे.
हे पुस्तक म्हणजे पंचभाई यांच्या अंतःकरणातून राष्ट्रसंतांविषयी वाहणार्‍या श्रद्धेचा दीप आहे. यातून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होईल. राष्ट्रसंतांचे आयुष्य आणि त्यांचे साहित्य याविषयी आजच्या पिढीच्या मनात थोडीसी जरी उत्सुकता चाळवली गेली तरी या पुस्तकाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. पंचभाई यांच्या रसाळ भाषेमुळे आणि मुद्देसूद, नीटनेटक्या, अर्थपूर्ण मांडणीमुळे हे साध्य होईल. लाघवी भाषा, छोेटेछोटे परिच्छेद, नेमकी उपशीर्षके यामुळे कंटाळवाणे किंवा बोजड न होता हे पुस्तक सहजपणे वाचून होते आणि वाचनानंदाबरोबरच प्रेरणाही जागृत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कर्मकांडं, बुवाबाजी, तंत्र-मंत्र याच्या विरूद्ध होते. निकोप आणि सुदृढ समाजनिर्मितीचे अथांग ध्येय उराशी बाळगणार्‍या या संतांने मानवतेची शिकवण दिली. त्याच्या कितीतरी नोंदी या पुस्तकात आढळतात. बंडोजी आणि मंजुळादेवी ठाकूर यांच्या पोटी जन्मलेल्या माणिक या पुत्राच्या बाललीला भाईंनी थोडक्यात सांगितल्यात. ‘राष्ट्रसंत’ अशी मान्यता मिळण्यापूर्वीचा हा संदर्भ पाहता त्यांच्यातील अफाट सामर्थ्य, व्यापक दृष्टिकोन आणि दिव्यदृष्टिची प्रचिती येते. छोट्या माणिकला आई घरातील देव पूजेसाठी धुण्यास सांगते. माणिक ते देव गोळा करतो आणि शेजारच्या विहिरीजवळ जातो. दोर बांधलेल्या बादलीत ते देव टाकून बादली चक्क विहिरीत सोडतो. तीनदा बादली पाण्यात बुडवून त्यांना आंघोळ घालतो. वर आईने जाब विचारल्यानंतर ‘भाव तिथे देव’ असेही ठासून सांगतो. त्याकाळातले हे वर्तन म्हणजे भविष्याची नांदीच होती.
लहानपणी शिक्षणाअभावी फरफट झाली तरी राष्ट्रसंतांनी स्वतःला घडवण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली. जगाला मोहवून टाकणारे खंजरी भजन, सुश्राव्य गायन, आईवडिलांची सेवा यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक धुमारे फुटत गेले. आडकोजी महाराजांकडून आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. अंधश्रद्धेच्या विरूद्ध पेटून उठणारे, समाजाला व्यापक दृष्टी देणारे वंदनीय राष्ट्रसंत म्हणजे सद्गुणांची खाण होते. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी डोळसपणे कार्यरत रहा, अंधश्रद्धांना बळी पडू नका, असे त्यांचे सांगणे असायचे. नेरी या गावातील नादूशहा नावाच्या भोंदू फकिराला त्यांनी त्यामुळेच पळवून लावले होते. भोळ्याभाबड्या लोकाना मूर्ख बनवणे हे त्यांना मोठे पाप वाटायचे.
नेरीजवळ गोंदोडा नावाचे गाव आहे. तेथील घनदाट जंगलात तुकडोजी महाराज कधीकधी ध्यानधारणेसाठी जात. तेथील गुहेत बिनदिक्कत जाऊन बसत. काहीवेळा वाघासारखे हिंस्त्र श्‍वापद त्यांच्या शेजारी येऊन निमुटपणे झोपत असे. सापासारखे प्राणी त्यांच्या अंगावरून जात. अशा सत्य घटना काहीवेळा अंधश्रद्धा वाटतील, मात्र त्यात वस्तुस्थिती होती. आजही आपण प्रकाशजी आमटे आणि त्यांच्या मुला-नातवंडांना वाघासोबत खेळताना पाहतोच की! मात्र एखाद्या संताच्या आयुष्यात असे काही घडले की तिकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करण्याचा आणि त्यांची टर उडवण्याचा रोग काहींना जडलाय. त्याला आपला इलाज नाही. ‘वाघाच्या डोळ्यात आपले डोळे भिडवले की आपल्या डोळ्यात एवढे प्रेम व आपलेपणा येतो की वाघाचेही क्रौर्य आपोआप नाहीसे होते. ताडोबाच्या जंगलात मी हा प्रयोग आणि ही साधना करून पाहिली आहे’ असे राष्ट्रसंत सांगतात.
1930 साली मोझरी या गावी सर्वप्रथम आल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांच्या खंजरी भजनाला प्रतिसाद मिळाला. अनेकांना त्यांच्या महानतेची साक्ष पटली. मात्र वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री कात्यायन आणि काशीकर शास्त्रींनी त्यांचा अभ्यास तपासून पाहायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तुकडोजी महाराजांना काही प्रश्‍न विचारले. वंदनीय महाराजांनी त्याची समर्पक उत्तरे दिली आणि ‘हा वेडा अवलिया नाही तर आत्मप्रचिती असलेला परात्पर कोटीतील महात्मा आहे’ यावर त्यांनी डोळसपणे शिक्कामोर्तब केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चैतन्याचा जागृत ज्वालामुखी होते. जातीभेद, धर्मभेद दूर होऊन समाज सांधला जावा यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान दिले. त्यासंदर्भात आणखी संशोधन करून विस्ताराने लिहिण्याची गरज आहे. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात त्यांची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट झाली. गांधीजी राष्ट्रसंतांच्या प्रेमात पडले. त्यांच्या खंजरी भजनाने ते प्रभावीत होत. अनेकवेळी मौन व्रत सुरू असतानाही गांधीजींनी ‘बहुत बढियॉं’ अशी दिलखुलास दाद दिल्याचे संदर्भ खुद्द राष्ट्रसंतांच्याच साहित्यात आले आहेत. राष्ट्रसंत आजारी असताना स्वतः महात्मा गांधी त्यांना आपल्या हाताने जेवायला वाढायचे आणि राष्ट्रसंतांचे जेवण झाल्यानंतर ते जेवायचे, अशी नोंद पंचभाई यांनी या पुस्तकात संदर्भासह साक्षांकित केली आहे.
अध्यात्माबरोबरच राष्ट्रसंतांची भजने राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली असत. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनावेळी ‘हाक आली क्रांतिची’ असे म्हणत त्यांनी लोकाना भजनातून जागे केले. ‘पत्थर सारे बन बनेंगे, भक्त बनेगी सेना’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. स्वातंत्र्यचळवळीतील या योगदानामुळे त्यांना तुरूंगवासही झाला. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणि मध्यप्रदेश येथील रायपूर कारागृहात त्यांना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी इतकी मोठी किंमत मोजणारे, त्याग, सेवा, समर्पण भाव लोकात रूजवणारे तुकडोजी महाराज म्हणूनच खर्‍याअर्थी ‘राष्ट्रसंत’ आहेत.
‘ज्या मंदिरात हरिजनांना प्रवेश नसेल त्या मंदिरात सामुदायिक प्रार्थना घेता कामा नये’ असा आदेश त्यांनी काढला होता. म्हणूनच हरिजन बांधवांना घेऊन ते पंढरपूरला विठ्ठल मंदिरात गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यावेळी साने गुरूजींनी त्यांना आनंदाने आलिंगन दिले होते.
15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला; मात्र काही संस्थाने स्वतंत्र व्हायची होती. हैद्राबादचे निजाम संस्थान त्यापैकीच एक. सर्वसामान्य लोकावर तिथे क्रूर अत्याचार होऊ लागल्याने त्या लोकांनी विदर्भाचा रस्ता धरला. ही बाब कळताच राष्ट्रसंत अस्वस्थ झाले. या अन्यायाविरूद्ध त्यांनी सशस्त्र बंड पुकारले. बाबुराव धनवटे यांच्याकडून अकरा हजार रूपये घेतले आणि बंदुका खरेदी केल्या. सेवामंडळामार्फत कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली. ‘दैववादापेक्षा प्रयत्नवाद महत्त्वाचा’ असे सांगत त्यांनी अन्याय, असत्याविरूद्ध कायम युद्ध पुकारले. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यलढा आणि हैद्राबाद मुक्ती संग्राम यातील त्यांचे योगदान अद्वितीय आणि अविस्मरणीय राहिले.
राष्ट्रसंतांनी भजनासाठी थेट राष्ट्रपती भवनापर्यंत धडक मारली. गुरूकुंज मोझरी येथे 1949 च्या गांधी स्मृतीदिन महोत्सवात राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांचे भावोत्कट भजन ऐकून त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी बहाल केली. 23 जुलै 1955 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान येथील विश्‍वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथील त्यांचे भाषण अजरामर ठरले. ‘माणसांनी माणसाचा विनाश करण्याची प्रवृत्ती जेव्हा नष्ट होईल तेव्हाच जग जवळ आले, धार्मिक झाले असे म्हणता येईल. त्याचे नुसते ठराव घेऊन चालणार नाही, त्यासाठी सर्व धार्मिक नेत्यांनी सतत प्रयत्नशील रहायला पाहिजे’ असे त्यांनी सांगितले आणि विश्‍वधर्म परिषदेत भारताचा लौकिक वाढला.
विनोद श्रावणजी पंचभाई यांनी या सर्व घटना, प्रसंग साध्यासोप्या भाषेत मांडल्याने वाचकांना ते खिळवून ठेवतात. आपल्या राष्ट्राचा, संतांचा, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचा, संस्कृतीचा परिचय होण्यास हे पुस्तक हातभार लावणारे आहे. पंचभाई यांची राष्ट्रसंतांवरील श्रद्धा आणि बालपणापासून त्यांनी केलेले वाचन यामुळे या पुस्तकात अनेक संदर्भ सापडतात. राष्ट्रसंतांसारख्या महापुरूषाचे शब्द थोडक्यात मांडताना मोठी कसरत करावी लागते; मात्र हे शिवधनुष्य पंचभाई यांनी ताकतीने पेलले आहे.
भारतातील साधू संघटना, राष्ट्रसंतांचे साहित्य वैभव, त्यांची भारत दर्शन यात्रा, ‘जय जवान, जय किसान’ला दिलेला पाठिंबा हे सारेच वाचण्यासारखे आहे. राष्ट्रसंत आणि आचार्य अत्रे यांची भेट झाल्यानंतर अत्र्यांनी त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याप्रमाणे गुगली टाकली की, ‘तुमची ही ओघवती, प्रासादिक काव्यरचना, गद्य लेखन व विचार तुमचे नाहीत. ते दुसरेच कोणीतरी लिहितो आणि तुमच्या नावाने प्रकाशित करतो अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.’ अत्रे साहेबांचे हे बोलणे शांतपणे ऐकल्यानंतर वंदनीय राष्ट्रसंतांनी अवघ्या दहा मिनिटात दोन भजने तिथल्या तिथे कागदावर लिहून काढली आणि अत्र्यांना गाऊनही दाखवली. ती भजने ऐकताना आचार्य अत्रे डोलू लागले आणि त्यांच्या प्रेमातच पडले. दुसर्‍या दिवशी अत्र्यांनी ‘नवयुग’मध्ये पहिल्या पानावर लिहिले, ‘वंदनीय राष्ट्रसंत हे साक्षात्कारी राष्ट्रसंत आहेत. त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती नाचते आहे. राष्ट्रसंत केवळ कवीच नाहीत तर देदीप्यमान गायकही आहेत. त्यांची वाणी भक्तिरसाने अंतर्बाह्य ओथंबलेली आहे. नवभारताचा नवसमाज निर्माण करणारे ते एक प्रतिभाकारी शिल्पकार आहेत...’
राष्ट्रसंत कवीबाबत म्हणतात, ‘कवी हा प्रसंगाचे वर्णन करण्यापेक्षा आदर्शांची मशाल जगाला दाखवणाराच असावा लागतो. यातच त्याचे श्रेष्ठत्व असते.’
पंचभाई यांनी अशा अनेक बोलक्या साक्षी या पुस्तकात देऊन ह्या घटना जिवंत केल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी, तरूणांनी हे पुस्तक आधी वाचायला हवे. पंचभाईंना राष्ट्रसंत ‘आपले’च वाटत असल्याने ते लेखणीशी एकरूप झाले आहेत. म्हणूनच ‘आपले राष्ट्रसंत’ आपल्याला नवी दिशा देण्यास प्रेरणादायी ठरेल!
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’, पुणे
7057292092


Saturday, September 24, 2016

प्रेरणादायी व्यक्तिंचे सुरम्य दर्शन

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणजे लेखणी आणि वाणीवर प्रभुत्व असणारे जबरदस्त व्यक्तिमत्त्व. ते जसे बोलतात, लिहितात तसेच माणसांची मनेही तितक्याच संवेदनशीलपणे टिपतात. मराठी साहित्य विश्‍वात अल्पावधितच आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या प्रा. जोशी यांनी असंख्य माणसे जोडली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावित अशा अनेक दिग्गजांनी मिलिंद जोशी यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकला. अंतरिक कळवळ्यातून जडलेले हे नाते त्यांनी कायम जपले. त्यातल्या सतरा व्यक्तींची चरित्रे, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये, उत्तुंग मनोर्‍यासारखे त्यांचे भावविश्‍व जिवंतपणे साकारण्यात प्रा. जोशी यशस्वी ठरले आहेत. एखादी कथा उलगडून दाखवावी त्याप्रमाणे संवादी शैलीत त्यांनी या लेखांची मांडणी केली. अनेक प्रस्थापित मासिकातून, दिवाळी अंकातून प्रकाशित झालेेले हे लेख पुण्यातील ‘कॉन्टिनेन्टल’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणले आहेत.
‘माझे तुटले माहेर’ या पहिल्याच लेखात त्यांनी त्यांच्या मातोश्री सौ. वासंती जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. उस्मानाबाद जिल्ह्याचे पहिले खासदार कै. व्यंकटराव नळदूर्गकर यांच्या त्या कन्या. त्यांचे शिक्षण पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात झालेले. अभिनय, गायन, वादन या कला अंगी असल्याने त्यांनी सातत्याने संकटावर स्वार होण्याचा धिरोदात्तपणा दाखविला. आईच्या अंतरीचा कलेचा झरा माझ्यात आपोआप आला, असे प्रा. जोशी या लेखात सांगतात. कराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाच मिलिंद जोशी त्यांच्या वहिनीच्या सख्ख्या बहिणीच्या प्रेमात पडले. ही प्रेमकथा यशस्वीही झाली. लग्नानंतर त्यांच्या पत्नी मनिषाताईंनी बार्शीत रहावे व त्यांनी पुण्यात रहावे अशी त्यांची इच्छा होती. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर पुण्यात घर करावे, अशी इच्छा त्यांनी आईला बोलून दाखविली; मात्र आईने ‘सेटलमेंट शब्दाला अंत नाही’ असे म्हणत त्या दोघांनाही पुण्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. 10 ऑक्टोबर 2010 ला त्यांच्या आईंना देवाज्ञा झाली. तेव्हा त्या नवरात्रीच्या निमित्ताने होणार्‍या भजनाला जाण्याच्या तयारीत होत्या. त्या दु:खद घटनेनंतर लेखक पं. ना. कुलकर्णींनी जोशी यांना लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात म्हटले आहे, ‘‘शारदीय नवरात्रात तुमच्या आईने जगदंबेच्या चरणी जीवनमाळ अर्पण केली. जगदंबेच्या कुंकवात सौभाग्याचे कुंकू मिसळले.’’
त्यांचे वडील श्री. गोविंदराव जोशी यांच्यावरील ‘मुळीचा झरा’ हा लेखही हेलावून टाकणारा, वाचकांना अंतर्मुख करणारा आहे. एसपी कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या गोविंदराव तथा अप्पांनी आयुष्यभर अनेक खस्ता खाल्ल्या. शेतीपासून केटरिंगपर्यंत अनेक उद्योग केले. प्रतिकुल परिस्थितीत न डगमगता त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. साहित्याची तर त्यांना उपजतच आवड. संपूर्ण हयातीत त्यांनी एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चुकवले नाही. साहित्यिक वारकर्‍याची हीच पताका प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या संस्काराच्या मुळीच्या झर्‍यातून प्रेरणा घेऊनच आज मी काम करतो, असे ते गौरवाने सांगतात.
त्यांच्या कमळा आजी म्हणजेच कमळाबाई व्यंकटराव नळदूर्गकर यांचे शब्दचित्रही त्यांनी दमदारपणे साकारले आहे. या सगळ्या लेखातून मिलिंद जोशी यांची झालेली जडण-घडण, त्यांच्यावरील संस्कार, तेव्हाचे वातावरण, चालीरिती, रूढी-परंपरा हे सारे काही समर्थपणे वाचकांसमोर येते.
मिलिंद जोशी यांच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडलाय तो तीन शिवाजींचा. प्राचार्य शिवाजीराव भोसले, ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत आणि भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम हे ते तीन शिवाजी. या तीनही शिवाजींची त्यांनी करून दिलेली ओळख अत्यंत प्रेरणादायी आहे. या तिघांनीही जोशी यांच्यावर भरभरून प्रेम केले. महाराष्ट्राच्या समाजमनाची मशागत करणारे हे शिवाजी त्यांच्या जीवनात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. आजचे मिलिंद जोशी या तीन शिवाजींच्या परिसस्पर्शामुळे आपल्या पुढे आहेत, असे वारंवार वाटते. प्राचार्यांची नक्कल मिलिंद जोशी त्यांच्या बालपणापासून करत. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बेस्ट कल्चरल ऍन्ड सोशल आऊट गोईंग स्टुडंट’ म्हणून मिलिंद जोशी यांना सुवर्णपदक मिळाले. त्यावेळी त्यांचे प्राध्यापक बी. ए. पाटील यांनी अचानकपणे जोशी यांना भोसले सरांची नक्कल करायला लावली. ती पाहून आणि ऐकून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेेले भोसले सर त्यावेळी बोलताना म्हणाले, ‘‘मिलिंदचा मला हेवा वाटतो. कारण तो वक्ता आहे आणि अभियंताही आहे. मी वक्ता आहे पण अभियंता नाही. मला एक प्रश्‍न पडतो मिलिंद जर बोलत राहिला तर त्याच्या बांधकामाचं काय? त्यामुळे त्याने बांधकाम करता करता बोलावं आणि बोलता बोलता बांधकाम करावं किंवा ज्यामुळे समाजाचं बांधकाम होईल असं काहीतरी करावं.’’ प्राचार्यांचा हा आशावाद आणि अपेक्षा मिलिंद जोशी यांनी सत्यात आणला. हे काळाच्या ओघात दिसून आलेच. ‘मसाप’चे सर्वात तरूण कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे, सरसंघचालक गोळवलकर गुरूजी, प्रा. सोनोपंत दांडेकर, आचार्य अत्रे यांच्यासोबतचे भोसले सरांचे संबंधही या लेखातून सुस्पष्ट होतात. एका कार्यक्रमात सरसंघचालक आल्याचे त्यांना कळले तेव्हा ते गुरूजींजवळ जातात आणि ‘आपण इथे आहात हे कळले असते तर इथे येण्याचे धाडस मी केले नसते. मी पळून गेलो असतो.’ असे भोसले सर गुरूजींना सांगतात. त्यावर गुरूजी म्हणतात, ‘‘नागपुरकरांचा वेढा उठविणे भोसल्यांना शक्य झाले आहे का?’’ आचार्य अत्र्यांनी घरी बोलावून भोसले सरांचा सत्कार केला आणि ’’मला माझा वारसदार मिळाला’’ अशा शब्दात कौतुक केले. असे कितीतरी किस्से, संबंधित ज्ञानकेंद्रांची नाना रूपे, त्यांचे अनुभव मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात इतके ताकतीने मांडले आहेत की वाचक निश्‍चितपणे मंत्रमुग्ध होतील. पर्वतप्राय व्यक्तिमत्त्वांच्या चिंतनशील जीवनाचा सारच मिलिंद जोशी यांनी अतिशय प्रगल्भपणे काढला आहे. नैतिकतेचे, संस्काराचे आदर्श रूजवतानाच वाचकांना माणूस म्हणून सशक्त बनविण्यासाठी हे लेख बाळगुटीचे काम करतील.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचाही त्यांना दीर्घकाळ सहवास लाभला. मिलिंद जोशी यांच्या शालेय जीवनात बार्शीत एका व्याख्यानमालेत ‘मृत्युंजय’कारांनी ‘कर्ण’ मांडला. त्यांचे व्याख्यान संपल्यावर जोशी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या पाया पडून त्यांनी सावंत सरांना विचारले, ‘‘कृष्ण इतका पराक्रमी, कालियाला मारून टाकणारा, कंसाला मारून टाकणारा आणि तो एका पारध्याच्या बाणाने कसा मरतो?’’ त्यावर सावंत सरांनी जोशींचा एक हात धरून त्यांच्याकडे पाठ करायला लावली आणि एक जोराचा धपाटा देत म्हणाले, ‘‘प्रश्‍न छान विचारलास; पण थोडा मोठा झालास की उत्तर देईन.’’ पुढे जोशींचे आणि सावंत सरांचेही घरोब्याचे संबंध निर्माण झाले. सावंत सरांवरील ‘राजा माणूस’ हा या पुस्तकातील लेख पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आहे. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात गेल्यानंतर सावंत सरांनी देह सोडला. त्यांच्या अखेरच्या काळातही मिलिंद जोशीच त्यांच्यासोबत होते.
‘साहित्य मंदिरातील नंदादीप’ या प्राचार्य राम शेवाळकरांवरील लेखात त्यांनी एक आठवण सांगितली. जोशी यांच्या कॉलेजमध्ये शेवाळकर सरांचे व्याख्यान होते; मात्र त्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती बेताची होती. जोशींनी त्यांच्या प्रास्ताविकात ही खंत बोलून दाखविल्यानंतर शेवाळकर सर म्हणतात, ‘‘दारूच्या अड्ड्यावरती माणसं स्वत:हून जातात आणि दुधाचा रतीब मात्र घरोघरी जाऊन घालावा लागतो. या जगात ज्या ज्या वेळी चांगल्या घटना घडल्या त्या त्या वेळी फार कमी माणसं उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती मावळे उपस्थित होते? कमी माणसं म्हणजे विचारमंथनाला पोषक वातावरण असं मी मानतो.’’
‘वाईटपणा विकत घेणारा माणूस’ या डॉ. ग. ना. जोगळेकर यांच्यावरील लेखात ते म्हणतात, ‘माणूस पराक्रमी असला तरी नियती क्रूर असते.’ ‘अंतर्नाद’ या मासिकात प्रा. जोशी यांनी डॉ. जोगळेकरांच्या विरूद्ध प्रतिक्रिया दिली. त्यावेळी जोगळेकरांनी ‘साहित्य संस्थांवर टीका करणं सोपं असतं. इथं या काम करा, अनुभव घ्या, मगच आपली मतं बनवा’ असं सांगितलं. तो सल्ला शिरसावंद्य मानत जोशी परिषदेत सक्रिय झाले. जोगळेकर सरांच्या विरूद्ध पॅनलमधून निवडून आले आणि त्यांचा विश्‍वास संपादन करत स्वत:ला सिद्धही केले. परिषदेत मोठे परिवर्तन घडवत आज तर ते परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. द. भि. कुलकर्णी, कवी ग्रेस, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, ‘पोलीस चातुर्यकथा’कार व. कृ. जोशी, कवी जगदीश खेबुडकर, ज्योत्स्ना देवधर, सुनिता देशपांडे यांच्यावरील लेखही वाचकांना समृद्ध करणारे आहेत. ही सर्व माणसे प्रा. जोशी यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असल्याने त्यांनी अंत:करणापासून त्यांच्याविषयी लिहिले आहे. त्यात भावनेचा ओलावा आहे. या सर्वांच्या सानिध्यात जशी मिलिंद जोशी यांची जडण-घडण झाली तशीच हे लेख वाचून वाचकांचीही होईल.
रा. चिं. ढेरे सरांनी या पुस्तकाची केलेली पाठराखण, रविमुकुल यांचे बहारदार मुखपृष्ठ, अशोक बोकील यांनी साकारलेली चित्रे यामुळे हे पुस्तक परिपूर्ण झाले आहे. यातील प्रत्येक लेख म्हणजे त्या त्या महापुरूषांचा जीवनपट उलगडून दाखविणारी कादंबरीच! फक्त शब्दांचे खेळ न करता वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची प्रा. मिलिंद जोशी यांची हातोटी या पुस्तकातून दिसून येते. प्रत्येकाने वाचावे, संग्राह्य ठेवावे, इतरांना आवर्जून भेट द्यावे असे हे आदर्शांचे बेट आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या भावी लेखन प्रवासास आमच्या शुभेच्छा!

पाने - 210, मूल्य - 150
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे (020-24337982)


घनश्याम पाटील, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Monday, September 19, 2016

कविता काही करा चला तर...!

मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींची किंमतच कळत नाही. अनेक अनमोल गोष्टी आपल्या जवळच असूनही आपण त्यांची कदर न करता ‘आणखी हवे’ चा हव्यास धरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या शरीराच्या विविध अवयवांचे देता येईल. शरीराच्या कोणत्याही अवयवात बिघाड झाली तर आपण पुरते त्रासून जातो; मात्र याच अवयवांची निगा राखणे आपल्या गावीही नसते. आपण क्षणाक्षणाला श्‍वासोच्छ्वास घेतो पण या श्‍वासाचे महत्त्व आपल्या ध्यानात येत नाही. जेव्हा आपण शेवटचा श्‍वास घेतो तेव्हा आप्तेष्ट, मित्रमंडळी हळहळतात; मात्र आपल्याला त्याची पुसटशीही जाणीव नसते. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत श्‍वासाचे महत्त्व कळू नये, हे दुर्दैवच खरे! 

हे वैश्‍विक सत्य अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे कविता! माणसाच्या बारशापासून बाराव्यापर्यंत साथ देणारी कविता आपल्या खिजगणतीतही नसते. जन्मापासून मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर कविता आपल्याला साथ देते. ती अंगाईच्या माध्यमातून असेल, व्रतबंधाच्या श्‍लोकातून असेल, मंगलाष्टकाच्या माध्यमातून असेल किंवा अंत्येष्टीच्या मंत्राच्या माध्यमातून असेल! कविता आपली साथ सोडत नाही. देशभक्तीच्या गीतातून, पोवाड्यातून जसे क्रांतीचे अंगार फुलतात तशीच अनेक प्रेमगीतातून प्रीतही फुलून येते. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करायचा असले किंवा विरहाच्या वेदना थोड्याशा हलक्या करायच्या असतील; प्रत्येक ठिकाणी कविताच गीत आणि संगीताची साथ घेऊन आपल्या मदतीसाठी धावून येते. 

ज्यांनी समाजाची मानसिक, बौद्धिक जडणघडण केली त्यातील बहुतांश काव्यग्रंथ आहेत. महाराष्ट्रातील कवितेचा मागोवा घेतला तर आपल्याकडे काव्याचे प्रमुख तीन टप्पे आढळून येतात. संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य हे ते तीन प्रकार आहेत. संत काव्यात संत ज्ञानेश्‍वर, जगद्गुरू तुकोबा, रामदास स्वामी अशा असंख्य विभुतींचा समावेश होतो. वामन पंडित, कवी मोरोपंत अशा महान कवींचा पंत काव्यात समावेश होतो; तर शाहीर राम जोशी, होनाजी बाळा अशांच्या कविता तंतकाव्यात मोडतात. यानंतर आपला ज्याच्याशी सर्वाधिक संपर्क येतो त्या आधुनिक मराठी काव्याचा टप्पा सुरू होतो. आधुनिक मराठी कवितेने कवितेला अध्यात्म, ईश्‍वरचिंतन अशा विषयांतून बाहेर काढले आणि निसर्ग, सामाजिक सुधारणा, संसारातील वैयक्तिक सुखदुःखे या व अशा विषयांचा अचूक वेध आधुनिक कविता घेऊ लागली. यासंदर्भात आधुनिक मराठी कवितेत काही ठिकाणी बदल झालेला दिसतो. काही कवींनी छंद, वृत्त, मात्रा यांच्या बेड्या तोडून अधिक मोकळ्या शैलीत म्हणजे मुक्तछंदात आपल्या मानसिक, बौद्धिक गोष्टींच प्रगटीकरण केलं. यात केशवसूत, राम गणेश गडकरी, बा. सी. मर्ढेकर आदींची कारकिर्द पाहता येईल. 

गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत कविता हा दुर्लक्षित आणि उपेक्षित प्रकार होता. अधूनमधून कवी संमेलने होत; पण गर्दी रोडावलेली! ‘कवितेला मानधन द्यायच असतं’ ही संकल्पनाच त्यावेळी रूजलेली नव्हती. अशा प्रतिकूल काळातही लोककवी मनमोहन नातू, रॉय किणीकर अशा कविंनी असंख्य हालअपेष्टा सहन करत कवितेचा झेंडा डौलात फडकावला. लोककवी मनमोहनांचा एक किस्सा याठिकाणी आवर्जून नमूद करावासा वाटतो. अफाट प्रतिभेचे किमयागार असलेले मनमोहन समाजाकडून आणि राज्यकर्त्यांकडून कायम उपेक्षित राहिले. ‘उद्याचा कालीदास अनवाणी जात असेल तर त्यात अब्रु त्याची नाही, राजा भोजाची जाते’ असे ठणकावून सांगणारे मनमोहन कधीही धनप्राप्तीच्या मागे लागले नाहीत. एकेदिवशी सकाळी ते त्यांच्या घराबाहेर आंघोळीसाठी पाणी तापवत बसले होते. त्यांच्या अंगावर त्यावेळी मोजकेच कपडे होते. त्यांच्या घरासमोरून तेथील स्थानिक नगरसेवक त्यांच्या बगलबच्यासह चालले होते. उघडेबंब बसलेल्या मनमोहनांना पाहून त्यांची चेष्टा करायची लहर नगरसेवकाला आली. ते म्हणाले, ‘‘काय कवीराज? अंगावर कपडे का घातले नाहीत?’’ मनमोहन म्हणाले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, म्हणून घातले नाहीत.’’ नगरसेवकाने चेष्टेने विचारले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, की घालण्यासाठी कपडेच नाहीत?’’ त्याचा अहंकाराचा सूर ध्यानात आलेल्या मनमोहनांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. ते म्हणाले, ‘‘राजकीय पुरूषांची कीर्ती 
मुळीच मजला मत्सर नाही 
आज हुमायू बाबरपेक्षा 
गालिब हृदय वेधित राही’’ 
याला म्हणतात प्रतिभेचा स्फोट! हुमायू आणि बाबराचे दाखले आदर्श 
म्हणून कोणीही देत नाही मात्र कलावंत असलेले गालिबमियॉं त्यांच्या काव्यातून अजरामर झाले, ही वस्तुस्थिती आहे. 

प्रतिभेलाच आपले सामर्थ्य मानणार्‍या या कवींनी मराठी कविता जगवली; मात्र व्यवहाराच्या पातळीवर ते सपशेल अपयशी ठरले. आर्थिक चणचण असल्याने आलेला दिवस कसाबसा ढकलत कुटुंबाचा गाडा ओढणे त्यांच्यासाठी कष्टप्रद आणि प्रचंड आव्हानात्मक होते. मात्र आधुनिक मराठी कवितेने हे दिवस बदलले. आता कविंनाही सुगीचे दिवस आले आहेत. अनेक कवींच्या कवितासंग्रहाची गावपातळीवरही चांगली विक्री होऊ लागली आहे. या विक्रमी विक्रीतून आणि शहराबरोबरच खेड्यापाड्यातही होणार्‍या विविध काव्यविषयक उपक्रमातून चांगली अर्थप्राप्ती होऊ लागली आहे. प्रवीण दवणे, आमचे मराठवाड्यातील प्रा. इंद्रजित भालेराव, अशोक नायगावकर, विसुभाऊ बापट, संदीप खरे यांच्यासारखे अनेक कवी, गीतकार हजारो रूपये मानधन घेतात आणि लोकही त्यांना सन्मानाने काव्यविषयक उपक्रमांना सातत्याने बोलावतात. इंद्रजित भालेरावांनी कवितेच्या मानधनातून परभणीत हक्काचे घर बांधल्याचे आदर्श उदाहरण आम्हास ठाऊक आहे. 

ही चांगली परिस्थिती अधिक चांगली होण्यासाठी मात्र काही गोष्टी अधिकाराने मांडाव्याशा वाटतात. डार्विनने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे ‘जो लायक आहे तोच जगतो.’ त्यामुळे या स्पर्धेच्या युगात कवींनी आपल्या कवितेचा कस आणि सादरीकरणाचा दर्जा उत्तम असावा याची काळजी घ्यावी. लेखन आणि सादरीकरण या दोन्ही निकषांवर अव्वल उतरणार्‍या कविता मोजक्याच असतात. काही कविता वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून किंवा संग्रहातून वाचायलाच चांगल्या वाटतात; तर काही कविता प्रभावी सादरीकरणाने रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवता येतात. मात्र या कविता छापील स्वरूपात वाचताना त्या अगदीच सामान्य वाटतात. असे का होते आणि अशा परिस्थितीत काय करावे, हे ज्याने त्याने आपापल्या बुद्धिप्रमाणे ठरवावे. कवींचे विविध विषयांवर भरपूर वाचन असणे हे तर आवश्यकच आहे. आपले शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. सध्या अनेक छोटीमोठी काव्यसंमेलने, कवितांचे एकपात्री आणि समूह कार्यक्रमही मोठ्या संख्येने होतात. अशा संमेलनांना हजेरी लावून अन्य कवींच्या कविता ऐकणे, त्यांना दाद देणे, त्यांच्या कवितेचे आणि सादरीकरणाचे बारकावे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. कवींनी इतरांच्या काव्यवाचनाला हजेरी न लावणे ही व्यक्तिशः आम्हाला मोठी नैतिक विकृती वाटते. 

गटबाजी आणि तटबाजीला थारा न देता जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे तिथे हजर राहून अन्य कवींना मोठ्या मनाने दाद ही दिलीच पाहिजे. ‘चपराक’च्या वतीने आम्ही गेल्या दहाबारा वर्षात अनेक काव्यविषयक उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने अनेक कवी संमेलनांचे आयोजन, राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, नवोदित कवींचे काव्यसंग्रह प्रकाशित करणे आणि त्यांचे समारंभपूर्वक प्रकाशन सोहळे घेणे, कवीवर, कवितेवर चर्चा घडवणे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कवींनाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक वातावरण सुदृढ, पोषक ठेवणे आदींचा समावेश आहे. आम्हाला तर असेही वाटते की, सध्या नवोदित कवींनी स्वतःचे व्यासपीठ स्वतःच निर्माण करावे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजार आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याच्या धर्तीवर कविता वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. या कवितांचे एखादे कडवे कानावर पडल्यानंतर संपूर्ण कविता ऐकल्याशिवाय ऐकणार्‍याचे पाऊल पुढे पडणार नाही, इतक्या ताकतीच्या त्या ओळी असाव्यात. ब्लॉग, वदनपुस्तिका (फेसबूक), ट्विटर अशा माध्यमातून उगीच काहीतरी रतीब टाकून लोकांचे कवितेविषयीचे मत आणखी कलुषित करण्याऐवजी दर्जेदार कविता द्याव्यात. लोकांना कविता या साहित्याच्या सर्वोत्कृष्ट प्रकाराविषयी आणखी जिव्हाळा वाटायला हवा. कवी आणि कवितांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी सर्व कवींनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

आपल्या रचना विविध नियतकालिकांना आणि वृत्तपत्रांना पाठवूनही प्रकाशित न झाल्याने उदास असलेले अनेकजण आम्हास भेटतात. मात्र गुणात्मक दर्जा उत्तम असूनही जागेची मर्यादा असल्याने अनेक संपादकांना इच्छा असूनही अनेकवेळा काही चांगले साहित्य देता येत नाही. त्यामुळे कविता छापून आली नाही, याचे शल्य उराशी न कवटाळता आणखी चांगले काव्यलेखन करावे. गुणवत्ता आणि दर्जा असेल तर कुणाचाही बळी जाणार नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. प्रकाशमार्गावरच्या सर्व शब्दयात्रींकडून भविष्यात आणखी चांगल्या, आशयसंपन्न, अर्थपूर्ण कविता ऐकायला, वाचायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो! 

-घनश्याम पाटील
संपादक 'चपराक', पुणे 
 ७०५७२९२०९२

Saturday, September 17, 2016

मृत्युंजयी शोकांतिका!

छत्रपती संभाजीराजे म्हणजे शौर्याचं प्रतीक! शिवाजी सावंत, विश्‍वास पाटील अशा काही लेखकांनी मांडलेला संभाजी आपण वाचला, अनुभवला. 1 फेबु्रवारी 1689 ला संभाजीराजांना संगमेश्‍वरात कैद करण्यात आले. 11 मार्च 1689 ला त्यांची व कवी कलशाची हत्या करण्यात आली. या दोघांच्याही अटकेपासून हत्येपर्यंतचा प्रवास चिरवेदनांचा आहे. अनंत यातना देऊन त्यांचा शिरच्छेद केला गेला. या 39 दिवसातील संभाजीराजांच्या भावनांची दखल आजपर्यंत कोणीही घेतली नव्हती. ‘ते 39 दिवस’ धावत्या आणि प्रभावी शैलीत, इतिहासाशी प्रामाणिक राहत वाचकांसमोर आणण्याचे काम केले आहे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक संजय सोनवणी यांनी. सोनवणी यांची ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ ही कादंबरी पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’च्या जालिंदर चांदगुडे यांनी प्रकाशित केली आहे. अवघ्या 125 पानात संभाजीराजांच्या भावभावना जिवंतपणे साकारण्यात सोनवणी यांना यश आले आहे. या कादंबरीत एका सशक्त चित्रपटाची कथाबिजे आहेत. या विषयावर नाटक आल्यास तेही रंगभूमीवर विक्रमी ठरेल. संभाजीराजे म्हणजे साक्षात मृत्युवरही मात करणारे वीरपुरूष! घनघोर जंगलात असलेल्या, दर्‍याखोर्‍यांनी वेढलेल्या संगमेश्‍वर या सुरक्षित ठिकाणी त्यांना अटक झाली आणि त्यांचा मृत्युकडचा प्रवास सुरू झाला. मोगलांची अचानक पडलेली धाड, राजांना व कवी कलशाला झालेली अटक आणि पुढील 39 दिवसातील प्रवास वाचताना वाचक भारावून जातात. ‘झपाटलेपण’ हे तर लेखक संजय सोनवणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. वाचकही ही कादंबरी वाचताना झपाटून जातात. शिर्क्यांची खोड मोडून राजे संगमेश्‍वरला आले होते. संगमेश्‍वर दुर्गम आहे, दर्‍याखोर्‍यात आणि अरण्यात वेढलेले आहे, म्हणूनच नव्हे तर येथे येणारे मार्ग पूर्ण सुरक्षित केले गेलेले आहेत म्हणून सारेजण निगुतीत होते. मात्र स्वराज्याच्या शत्रुंनी, रायगडावरील मुत्सद्यांनी, काही घरभेद्यांनी कटकारस्थाने केली आणि कवी कलशासह संभाजीराजांना अटक झाली. सोनवणी लिहितात, ‘मानवी विश्‍वासाला सीमा असतात. स्वप्नातही कल्पना येणार नाही अशी आकस्मित संकटे माणसावर येतात. क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. संभाजीराजे म्हणजे आजवर अनवरत संघर्षांच्या तांडवांना छाताडावर झेलत स्थिरचित्त राहणारा साक्षात सह्याद्रीचा पहाड! पण दुष्टबुद्धीचे लोक विरोधात एकत्र आले की पहाडांनाही गलितगात्र व्हावे लागते हा मानवी जगाचा नियम! तो चिरकालिक नियम बनावा हे मानवजातीचे दुर्भाग्यच नव्हे काय?’ संभाजीराजांना अटक झाल्यानंतरही त्यांना सुटकेची आशा वाटत असते. त्यांच्या सहकार्‍यांवर त्यांचा विश्‍वास होता. कात्रज, शिरवळ, सातारा कुठूनतरी आपले शूरवीर मराठे चाल करून येतील, शत्रुचा नायनाट करून आपल्या बेड्या काढून टाकतील असे त्यांना वाटत राहते. मराठ्याच्या राजाला अत्यंत अपमानास्पदरित्या फरफटत नेले जाते; मात्र कुणीही मराठे त्यांना सोडवायला येत नाहीत. हातापायात बेड्या, चेहर्‍यावर पट्टी बांधलेली... संभाजीराजांना कुठे नेत आहेत हेही त्यांना ठाऊक नसते! या मानसिकतेतही त्यांची असहाय्यता, अगतिकता, उफाळून येणारा संताप, ठणकणार्‍या वेदना, आप्तस्वकियांकडून झालेली फसगत, त्यातूनच आलेली बेफिकीरी, मृत्युला दिलेले आव्हान असा सारा आशावादाकडून हतबलतेकडचा झालेला प्रवास वाचताना वाचकांच्या अंगावरही शहारे येतात. त्यांचे रक्त तापू लागते. मराठ्यांनीच ‘मराठा’ राजाची केलेली फसवणूक मांडणारा ‘काळाकुट्ट इतिहास’ आजच्या मराठ्यांनी जरूर वाचला पाहिजे. आपण मृत्युंजयी संभाजीराजांचे वारसदार आहोत की तेव्हाच्या गद्दार आणि ‘घरबुडव्या’ मराठ्यांचे वारस आहोत हे आता तपासून पाहिले पाहिजे. कटकारस्थाने रचत संभाजीराजांना मृत्युच्या दरीत ढकलणारे ब्राह्मण नव्हे तर तत्कालीन मराठेच होते हे सत्य या कादंबरीद्वारे अधोरेखित होते. संगमेश्‍वरातून बाहेर पडल्यानंतर संभाजीराजे कवी कलशाला उद्देशून वाचकांशी संवाद साधतात. ओघवती भाषाशैली आणि जेधे शकावली, साकी मुस्तैदखान (मासिरे आलमगिरी), ईश्‍वरदास नागर (फुतहाते आलमगिरी) असे अस्सल संदर्भ देत संजय सोनवणी यांनी ही कलाकृती फुलवली आहे. त्यासाठी त्यांनी आत्मनिवेदनात्मक शैली वापरल्याने संभाजीराजे त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलगडून दाखवतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, संभाजीराजांच्या बालपणीच्या आठवणी, महाराजांची आग्रा भेट, महाराजांच्या सुचनेनुसारच त्यांच्या विरोधातही केलेल्या लढाया, सत्तालोलूपांनी आखलेली आणि दुर्दैवाने तडीस गेलेले डावपेच, औरंगजेब, मोगल यांना दिलेल्या झुंजी, संभाजीराजांच्या अटकेनंतर राजारामाचा झालेला राज्याभिषेक, येसूबाईंच्या आठवणी हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. खुद्द संभाजीराजे असहाय्यपणे ही सारी परिस्थिती वाचकांसमोर मांडतात असेच ही कादंबरी वाचताना वाटते. संभाजीराजांचे भावविश्‍व साकारण्यात संजय सोनवणी पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. संवादी भाषा, विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, संतोष घोंगडे या तितक्याच मनस्वी कलाकाराच्या कुंचल्यातून साकारलेले जबरदस्त मुखपृष्ठ, सुबक आणि आकर्षक छपाई हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. संभाजीराजे मावळ्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘अरे या... लढा मर्दाप्रमाणे! आमची पर्वा नका करू! पर्वा करा आबासाहेबांनी तुम्हाला मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची! आम्ही मेलो तर राजारामाला गादीवर बसवा... औरंग्याला नष्ट करा... दिल्लीवर सत्ता गाजवा! या आभाळातून आम्ही कवतुकाने तुमचे सोहळे पाहू! अरे देह नश्‍वर आहे! गडबडून जाऊ नका. एक संभा पडला तर या मातीतून लाखो संभा पैदा होतील. होय... ही आमची महाराष्ट्रभूमी आहे!’’ मात्र महाराजांचा हा आशावाद सपशेल खोटा ठरतो. वेदनांच्या काळडोहात लोटणारे क्षण त्यांना अस्वस्थ करतात. वाचकही ते वाचून सुन्न होतात. संभाजीराजे जिवंत असताना राजारामांचा झालेला राज्याभिषेक त्यांच्या भावनांना साद घालतो. ‘आम्ही मुक्त असू, स्वराज्याचे पाईक असू’ हा आशावाद संपवतो. राजांना साखळदंडात बांधून बळजबरीने ओढत नेले जाते. त्यांच्या काळजाच्या चिंध्या होतात. वेदनांचा कल्लोळ उसळतो. त्यांच्या अंगावर विदुषकी कपडे घातले जातात. त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यांना उंटावर बसवून, नगारे वाजवत धिंड काढली जाते. बघ्यांची गर्दी जमते. लोक हसतात, चित्कारतात. एका राजाला गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. मृत्यू अटळ आहे हे समोर दिसू लागते. तरीही त्यांना सोडवण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अंधारच असतो. ‘‘संभा, उद्या सकाळी तुझे हात-पाय तोडून मग मस्तक छाटायची आज्ञा आलमगिरांनी दिली आहे. तुझा मित्र कलशालाही हीच सजा फर्मावण्यात आली आहे’’ असे त्यांना सांगण्यात येते. तेव्हा उद्विग्नपणे संभाजीराजे म्हणतात, ‘‘मरणा... ये लवकर. स्वागत आहे तुझे! पण लक्षात ठेव... आम्ही मृत्युंजय आहोत. जिवंतपणे कैकदा मेलो आम्ही. कधी आप्तांच्या हातून, कधी घरभेद्यांच्या हातून. आताचा हा मृत्यू म्हणजे आमच्या मृत्युवृक्षाला आलेले अंतिम फळ. आम्ही आनंदी आहोत कारण आम्ही तुझ्यावरही जीत मिळवणार आहोत.’’ संजय सोनवणी हे इतिहास संशोधक आहेत. त्यांची जवळपास 85 पुस्तके प्रकाशित आहेत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ज्यांची पुस्तके ठेवलीत असे ते एकमेव मराठी लेखक आहे. त्यांच्या कादंबर्‍यानी इतिहास घडवला. भल्याभल्या इतिहासकारांना हजारो पानात जे मांडता आले नाही ते ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ या कादंबरीत त्यांनी केवळ सव्वाशे पानात मांडले आहे. एका जाज्ज्वलनतेजस राजाची शोकांतिका त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत मांडली आहे. भाषेच्या पातळीवर हे पुस्तक सामान्यात सामान्य वाचकालाही वाचावेसे वाटेल. इतिहासापासून प्रेरणा घेतानाच संभाजीराजांसारख्या महापुरूषाची झालेली उपेक्षा, अवहेलना, फितुरी हे सारे समजून घेतले पाहिजे. केवळ संभाजीराजांचे नाव घेऊन ‘बी’च काय कोणत्याही ‘ग्रेड’चे राजकारण करणे म्हणजे मराठ्यांची फसवणुकच आहे. इतिहासापासून काही बोध घेण्याऐवजी आजही तोच प्रकार खुल्लमखुल्ला सुरू आहे. कृतघ्नतेची परिसिमा ओलांडणार्‍यांचे बुरखे सोनवणी यांनी या कादंबरीत टरटरा फाडले आहेत. मृत्युला आव्हान देऊन पराक्रमाची परंपरा तेवत ठेवणारी आणि प्रत्येक मराठी माणसात नवचैतन्याचे स्फूल्लिंग पेटवणारी संजय सोनवणी यांची ही कादंबरी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पाने - 125, मूल्य - 140 
प्रकाशन - प्राजक्त प्रकाशन, पुणे (9890956695) 

- घनश्याम पाटील, 
संपादक, 'चपराक', पुणे ७०५७२९२०९२