Thursday, October 20, 2016

‘दखलपात्र’ घनश्याम!

'साहित्य चपराक' दिवाळी महाविशेषांकाचे प्रकाशन काल उत्साहात झाले. मान्यवरांची अभ्यासपूर्ण भाषणे हा या कार्यक्रमाचा आत्मा होता. परभणी येथील दैनिक 'समर्थ दिलासा'ने या दिवाळी महाविशेषांकाच्या निमित्ताने कालच्या अंकात माझ्यावर एक सुंदर लेख प्रकाशित केला. त्यांना आणि अत्यंत जिव्हाळ्याने हा लेख लिहिणा-या कवयित्री, लेखिका अर्चनाताई डावरे यांना मन:पूर्वक धन्यवाद!



‘चपराक’ या प्रकाशन संस्थेचे संचालक श्री. घनश्याम पाटील यांच्या 500 पानी दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून या निमित्ताने हा विशेष लेख...

पाच एक वर्षापूर्वीची गोष्ट. वेगवेगळ्या दिवाळी अंकासाठी मी माझे साहित्य पाठवित होते. इतक्यात दादांचा अर्थात श्री. दिवाकर खोडवे यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘अर्चना, एक पत्ता व फोन नंबर देतो आहे. तिथे तुझे साहित्य नक्की पाठव. संपादक दर्जेदार साहित्यांना स्थान देणारे सामाजिक नि साहित्यिक जाण असणारे आहेत.’’ त्यांनी लगेच मला पत्ता व फोन नंबर दिला. मी तो टिपून घेतला. परंतु मनाशीच ठरवलं, कुरिअरचा लिफाफा तयार करायच्या आधी संपादकांना फोन करायचा. प्रतिसाद योग्य आला तर तत्काळ साहित्य पाठवून द्यायचं नि मी लगेच फोन लावला.
‘‘हॅलो, मी आपल्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवू इच्छिते.’’
समोरून क्षणाचाही विलंब न करता संपादक बोलले, ‘‘होय ताई! लगेच पाठवा. प्रकाशनाची जबाबदारी माझीच. तेव्हा लगेच पाठवा. आमचा पत्ता ठाऊक आहे ना आपल्याला?’’
‘‘हो, सर’’ इति मी.
‘‘मग पाठवा साहित्य. आपलं स्वागत आहे ताई.’’
मी क्षणभर विचारात पडले. प्रकाशक आणि संपादक दोन्ही पदं भूषविणारा, सतत व्यग्र असणारा माणूस तत्काळ फोन उचलतो आणि साधी ओळखही नसणार्‍या समोरच्याचे उत्साहात स्वागतही करतो. नक्कीच कुशलतेने काम करणारे नि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे असले पाहिजेत, हे मनानी नक्की केलं आणि खरोखरच अनेक दिग्गजांकडून सन्मानित झालेले नि कैकवेळा अवघड कसोट्यांतूनही खरे उतरणारे ‘चपराक प्रकाशना’चे हृदयस्थ आणि साहित्यिकांचे लाडके लेखक श्री. घनश्याम पाटील यांची नि माझी ओळख झाली.
या स्पर्धेच्या युगात प्रकाशन विश्‍वात आपले पाऊल अगदी दृढपणे उभे करणे आणि केवळ आप्त स्वकियांनाच नव्हे तर दूरवरच्या राज्यातही आपल्या नम्रतेची छबी उमटवित हितचिंतक माणसांचा मेळा सतत सभोवार टिकविणे हे आजमितिला तरी मोठे जिकिरीचे काम आहे; पण हे अशक्यप्राय वाटणारं अवघड काम ते फार लिलया नि सहज करतात. चेहर्‍यावर कायम शांत स्मीतहास्य नि संयम असतो. उत्तम श्रोत्याचे गुण जणू जन्मत:च घेऊन आले असावेत, असं त्यांच्याशी बोलताना कायम जाणवतं. त्यांच्या तोंडून नकार घंटा कधी वाजणारच नाही. ‘‘हो, बरोबर आहे. अगदी तसंच करू’’ असे समोरच्याच्या वक्तव्यावर पुश्ती जोडणार्‍या वाक्यांचा वर्षाव होतो. साहजिकच समोरचाही तितक्याच उर्मीने, जिद्दीने आणि जीव ओतून मग त्यांच्या साप्ताहिकासाठी, मासिकासाठी, दिवाळी अंकासाठी सातत्याने लिहित राहतो.
नेमकं खरं कौतुक तर वेगळंच ठरावं. अगदी प्रथितयश दिग्गजांपासून नवोदित लेखकांपर्यंत विषय देऊन सगळ्यांनाच लिहितं करतात; परंतु कुठेही गर्वाचा दर्प किंवा अहंकार डोकावत नाही. उलट साहित्यिकांच्या साहित्याच्या शिदोरीमुळे घनश्याम घडला आणि त्यांच्या दर्जेदार लिखाणामुळेच आज हजारो वर्गणीदार ‘चपराक’शी जोडले गेले आहेत, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात. श्रेय न लाटणारे संपादक आताशा विरळच!
नवल तर तेव्हा वाटतं, जेव्हा कळतं की, मुळातच पत्रकारितेचा पिंड. जन्मत:च. हा संपादक सुरूवातीला पेपर विक्री करून तद्नंतर पुण्यात कै. वसंतराव काणे यांच्या ‘संध्या’ या सायंदैनिकात नोकरी करून आज स्वबळावर उभा आहे. स्वव्यवसायास आरंभ करणं, साप्ताहिक ते दिवाळी अंक प्रकाशित करणं, इतर पुस्तकांचेही प्रकाशन आणि त्यासोबत अग्रलेख लिहिण्याची जबाबदारी! एकाचवेळी विविध स्तरावर काम करूनही त्यांनी यशाचा आलेख वाढवतच नेला. खरंतर अशा बाबींचं वर्णन करणं अतिशय सोपं आहे; परंतु स्वत:च प्रकाशक आणि संपादक या दोन्ही बाजू सांभाळत आर्थिक डोलाराही मजबूत करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. गॉडफादर नसताना समाजात प्रस्थापित होऊन गरूडझेप घेणं तर त्याहूनही कठीण! पण आज ‘चपराक’ दिवाळी अंकाने महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रथम क्रमांक पटकाविला आणि कैक पुरस्कार ‘चपराक’च्या नावे नोंदविलेले आहेत. ते मानाचे स्थान जनमाणसात रूजविले आहे. पराकोटीची अभ्यासूवृत्ती, प्रगल्भता, स्पष्टता, सामाजिक भान, कष्ट, कौशल्य, प्रयत्न आणि स्वत:वर विश्‍वास असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्यामुळेच घनश्याम पाटील यशस्वी आहेत. किंबहुना त्यांची दखल केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्रंही घेत आहेत. ही सत्यता, लोकप्रियता आहे. पाटलांकडे पाहिल्यावर वाटतं स्वप्न पाहणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्नं वास्तवात आणणे हे आपले कर्तव्य आहे आणि कष्ट करण्याची सवय लागलेली असली ना की माणूस कार्यपूर्तीचा ध्यास घेतो नि यशस्वीही होतो. अशा ठिकाणी घनश्याम पाटलांचं नाव अगदी आग्रहाने अग्रभागी येतं. वय वर्षे जेमतेम बत्तीस अन् जणू स्वकर्तृत्वाचा इतिहासच रचलाय त्यांनी! स्वसामर्थ्यावर एकट्यानेच संघर्ष करणे खूप वेदनादायक गोष्ट असते; परंतु त्यातून माणूस घडत जातो ही सत्यता. कदाचित म्हणूनच अगदी लहान वयातच जाणिवांच्या तीव्र संवेदनेने पेटून प्रत्येक विषयावर सखोल व परखडपणे लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली. ते लेखन म्हणजे केवळ आरडाओरड नव्हती; ते झणझणीत अंजन होतं. म्हणूनच सामान्यांच्या मनात ते सहजपणे उतरलं. त्यांच्या कैक अग्रलेखात तीव्रच नाही तर मानसिक पातळीवर घडणार्‍या अनेक घटनांचे हळवे आंदोलनंही त्यांनी चपखलपणे लिहिली, मांडली. हळव्या विषयांचे कंगोरे तितक्याच साध्या भाषेत रेखाटले. ‘दखलपात्र’ ठरावे असेच ते लिखाण!
असा हा प्रचंड व्याप सांभाळताना माणूस म्हणून जगण्याचा सोपा मंत्र विसरले नाहीत. गिरमे मॅडमविषयी मातृदेवो भव: म्हणणारे घनश्याम पाटील सागर कळसाईत, महेश मांगले, सागर सुरवसे, गिरिश जंगमे, हणमंत कुराडे आणि व्यंकटेश कल्याणकर या नवोदित लेखकांचे, चपराक टीमचे कौतुक करायला, आभार मानायला विसरत नाहीत. म्हणूनच चपराक टीम एखाद्या कुटुंबासारखी गुण्यागोविंदाने व एका विचाराने सुखात नांदते आणि त्यामुळेच एवढ्या अल्पकालावधीत नामवंत लेखकांची व नवोदित लेखकांची मिळून 87 साहित्यिक पुस्तकांचे प्रकाशन चपराकने केले आहे. परंतु अभिमानाची गोष्ट ही की हा प्रवास करताना त्यांनी मुजोरीही केली नाही आणि जीहुजूरीही केली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस असोत की शरद पवार, जितेंद्र आव्हाड असोत वा सद्य स्थितीतले सरकार, जिथे उणीवा असतील तिथे घनश्याम पाटलांची लेखणी पोचणारच हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. म्हणूनच या हरहुन्नरी अवलियाची प्रस्तावना आपल्या पुस्तकास लाभावी ही नवलेखकांची तीव्र इच्छा असते आणि तशी कैक लेखकांची ही इच्छा त्यांनी पूर्णही केली आहे. बर्‍याचदा वाङ्मयीन व वैचारिक नियतकालिकांमधूनही त्यांनी लेख लिहिलेले आहेत, जे उत्कृष्ट, वाचनीय आहेत.
असं म्हणतात,
उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यदुर्गम पथ:॥
खरोखरच ध्येयापर्यंत पोचविणारा मार्ग पाटलांनी केव्हाच निवडलाय आणि म्हणूनच अगदी दिग्गजस्थानी असणारे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, द. ता. भोसले, सुधीर गाडगीळ, विश्‍वास वसेकर, संजय सोनवणी, सदानंद भणगे, मिलिंद जोशी ते सौ. श्रुती कुलकर्णी, अर्चना माने, प्रशांत चव्हाण, सागर सुरवसे यांच्यापर्यंत  त्यांच्या कर्तृत्वामुळे आपापल्या शब्दात, शब्दवैभवात त्यांना बद्ध करावंसं वाटलं, मनस्वी कौतुक करावंसं वाटलं.
संपादकाला शोभेल अशा ‘दखलपात्र’ नि ‘झुळूक आणि झळा’ या पुस्तकाच्या लेखकाचे, टिळकांचा वारसा जणू परखडपणात जपणार्‍या लेखकाचे, नम्र व सुस्वभावी प्रकाशकाचे खरंच मनस्वी कौतुक.
या पुढच्या देदिप्यमान वाटचालीला, मराठी साहित्याला परप्रांतात पोहचविणार्‍या पांथस्थाला, नवोदितांना आभाळ मुठीत घेऊन लिहितं करणार्‍या संपादकाला आणि सदोदित दर्जेदार लिखाण व साहित्य नव्या पिढीसमोर ठेवून साहित्याचा दर्जा जपणार्‍या प्रकाशकाला भरभरून शुभेच्छा!! शुभं भवतू!!
- अर्चना गिरीश डावरे, परभणी

3 comments:

  1. अतिशय रास्त शब्दात अापण घनश्यामजींच्या कर्तृत्त्वाचा वेध घेतलाय.आपण व्यक्त केलेल्या भावना या चपराकचा विशाल परिवाराच्या जणू प्रातिनिधिक भाववा आहेत.

    ReplyDelete
  2. दिलासादायक लेखन! व्वा, दादा तुमच्या कार्याचा आलेख असाच वाढत जाओ आणि तुमच्याविषयी असं वाचायला मिळत राहो...!

    ReplyDelete
  3. चपराक परिवारतील प्रत्येक सदस्याच्या मनातील विचार या लेखात उमटले आहेत. खूप छान लेख !!

    ReplyDelete