Saturday, September 24, 2016

प्रेरणादायी व्यक्तिंचे सुरम्य दर्शन

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणजे लेखणी आणि वाणीवर प्रभुत्व असणारे जबरदस्त व्यक्तिमत्त्व. ते जसे बोलतात, लिहितात तसेच माणसांची मनेही तितक्याच संवेदनशीलपणे टिपतात. मराठी साहित्य विश्‍वात अल्पावधितच आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या प्रा. जोशी यांनी असंख्य माणसे जोडली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावित अशा अनेक दिग्गजांनी मिलिंद जोशी यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकला. अंतरिक कळवळ्यातून जडलेले हे नाते त्यांनी कायम जपले. त्यातल्या सतरा व्यक्तींची चरित्रे, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये, उत्तुंग मनोर्‍यासारखे त्यांचे भावविश्‍व जिवंतपणे साकारण्यात प्रा. जोशी यशस्वी ठरले आहेत. एखादी कथा उलगडून दाखवावी त्याप्रमाणे संवादी शैलीत त्यांनी या लेखांची मांडणी केली. अनेक प्रस्थापित मासिकातून, दिवाळी अंकातून प्रकाशित झालेेले हे लेख पुण्यातील ‘कॉन्टिनेन्टल’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणले आहेत.
‘माझे तुटले माहेर’ या पहिल्याच लेखात त्यांनी त्यांच्या मातोश्री सौ. वासंती जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. उस्मानाबाद जिल्ह्याचे पहिले खासदार कै. व्यंकटराव नळदूर्गकर यांच्या त्या कन्या. त्यांचे शिक्षण पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात झालेले. अभिनय, गायन, वादन या कला अंगी असल्याने त्यांनी सातत्याने संकटावर स्वार होण्याचा धिरोदात्तपणा दाखविला. आईच्या अंतरीचा कलेचा झरा माझ्यात आपोआप आला, असे प्रा. जोशी या लेखात सांगतात. कराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाच मिलिंद जोशी त्यांच्या वहिनीच्या सख्ख्या बहिणीच्या प्रेमात पडले. ही प्रेमकथा यशस्वीही झाली. लग्नानंतर त्यांच्या पत्नी मनिषाताईंनी बार्शीत रहावे व त्यांनी पुण्यात रहावे अशी त्यांची इच्छा होती. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर पुण्यात घर करावे, अशी इच्छा त्यांनी आईला बोलून दाखविली; मात्र आईने ‘सेटलमेंट शब्दाला अंत नाही’ असे म्हणत त्या दोघांनाही पुण्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. 10 ऑक्टोबर 2010 ला त्यांच्या आईंना देवाज्ञा झाली. तेव्हा त्या नवरात्रीच्या निमित्ताने होणार्‍या भजनाला जाण्याच्या तयारीत होत्या. त्या दु:खद घटनेनंतर लेखक पं. ना. कुलकर्णींनी जोशी यांना लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात म्हटले आहे, ‘‘शारदीय नवरात्रात तुमच्या आईने जगदंबेच्या चरणी जीवनमाळ अर्पण केली. जगदंबेच्या कुंकवात सौभाग्याचे कुंकू मिसळले.’’
त्यांचे वडील श्री. गोविंदराव जोशी यांच्यावरील ‘मुळीचा झरा’ हा लेखही हेलावून टाकणारा, वाचकांना अंतर्मुख करणारा आहे. एसपी कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या गोविंदराव तथा अप्पांनी आयुष्यभर अनेक खस्ता खाल्ल्या. शेतीपासून केटरिंगपर्यंत अनेक उद्योग केले. प्रतिकुल परिस्थितीत न डगमगता त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. साहित्याची तर त्यांना उपजतच आवड. संपूर्ण हयातीत त्यांनी एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चुकवले नाही. साहित्यिक वारकर्‍याची हीच पताका प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या संस्काराच्या मुळीच्या झर्‍यातून प्रेरणा घेऊनच आज मी काम करतो, असे ते गौरवाने सांगतात.
त्यांच्या कमळा आजी म्हणजेच कमळाबाई व्यंकटराव नळदूर्गकर यांचे शब्दचित्रही त्यांनी दमदारपणे साकारले आहे. या सगळ्या लेखातून मिलिंद जोशी यांची झालेली जडण-घडण, त्यांच्यावरील संस्कार, तेव्हाचे वातावरण, चालीरिती, रूढी-परंपरा हे सारे काही समर्थपणे वाचकांसमोर येते.
मिलिंद जोशी यांच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडलाय तो तीन शिवाजींचा. प्राचार्य शिवाजीराव भोसले, ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत आणि भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम हे ते तीन शिवाजी. या तीनही शिवाजींची त्यांनी करून दिलेली ओळख अत्यंत प्रेरणादायी आहे. या तिघांनीही जोशी यांच्यावर भरभरून प्रेम केले. महाराष्ट्राच्या समाजमनाची मशागत करणारे हे शिवाजी त्यांच्या जीवनात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. आजचे मिलिंद जोशी या तीन शिवाजींच्या परिसस्पर्शामुळे आपल्या पुढे आहेत, असे वारंवार वाटते. प्राचार्यांची नक्कल मिलिंद जोशी त्यांच्या बालपणापासून करत. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बेस्ट कल्चरल ऍन्ड सोशल आऊट गोईंग स्टुडंट’ म्हणून मिलिंद जोशी यांना सुवर्णपदक मिळाले. त्यावेळी त्यांचे प्राध्यापक बी. ए. पाटील यांनी अचानकपणे जोशी यांना भोसले सरांची नक्कल करायला लावली. ती पाहून आणि ऐकून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेेले भोसले सर त्यावेळी बोलताना म्हणाले, ‘‘मिलिंदचा मला हेवा वाटतो. कारण तो वक्ता आहे आणि अभियंताही आहे. मी वक्ता आहे पण अभियंता नाही. मला एक प्रश्‍न पडतो मिलिंद जर बोलत राहिला तर त्याच्या बांधकामाचं काय? त्यामुळे त्याने बांधकाम करता करता बोलावं आणि बोलता बोलता बांधकाम करावं किंवा ज्यामुळे समाजाचं बांधकाम होईल असं काहीतरी करावं.’’ प्राचार्यांचा हा आशावाद आणि अपेक्षा मिलिंद जोशी यांनी सत्यात आणला. हे काळाच्या ओघात दिसून आलेच. ‘मसाप’चे सर्वात तरूण कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे, सरसंघचालक गोळवलकर गुरूजी, प्रा. सोनोपंत दांडेकर, आचार्य अत्रे यांच्यासोबतचे भोसले सरांचे संबंधही या लेखातून सुस्पष्ट होतात. एका कार्यक्रमात सरसंघचालक आल्याचे त्यांना कळले तेव्हा ते गुरूजींजवळ जातात आणि ‘आपण इथे आहात हे कळले असते तर इथे येण्याचे धाडस मी केले नसते. मी पळून गेलो असतो.’ असे भोसले सर गुरूजींना सांगतात. त्यावर गुरूजी म्हणतात, ‘‘नागपुरकरांचा वेढा उठविणे भोसल्यांना शक्य झाले आहे का?’’ आचार्य अत्र्यांनी घरी बोलावून भोसले सरांचा सत्कार केला आणि ’’मला माझा वारसदार मिळाला’’ अशा शब्दात कौतुक केले. असे कितीतरी किस्से, संबंधित ज्ञानकेंद्रांची नाना रूपे, त्यांचे अनुभव मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात इतके ताकतीने मांडले आहेत की वाचक निश्‍चितपणे मंत्रमुग्ध होतील. पर्वतप्राय व्यक्तिमत्त्वांच्या चिंतनशील जीवनाचा सारच मिलिंद जोशी यांनी अतिशय प्रगल्भपणे काढला आहे. नैतिकतेचे, संस्काराचे आदर्श रूजवतानाच वाचकांना माणूस म्हणून सशक्त बनविण्यासाठी हे लेख बाळगुटीचे काम करतील.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचाही त्यांना दीर्घकाळ सहवास लाभला. मिलिंद जोशी यांच्या शालेय जीवनात बार्शीत एका व्याख्यानमालेत ‘मृत्युंजय’कारांनी ‘कर्ण’ मांडला. त्यांचे व्याख्यान संपल्यावर जोशी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या पाया पडून त्यांनी सावंत सरांना विचारले, ‘‘कृष्ण इतका पराक्रमी, कालियाला मारून टाकणारा, कंसाला मारून टाकणारा आणि तो एका पारध्याच्या बाणाने कसा मरतो?’’ त्यावर सावंत सरांनी जोशींचा एक हात धरून त्यांच्याकडे पाठ करायला लावली आणि एक जोराचा धपाटा देत म्हणाले, ‘‘प्रश्‍न छान विचारलास; पण थोडा मोठा झालास की उत्तर देईन.’’ पुढे जोशींचे आणि सावंत सरांचेही घरोब्याचे संबंध निर्माण झाले. सावंत सरांवरील ‘राजा माणूस’ हा या पुस्तकातील लेख पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आहे. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात गेल्यानंतर सावंत सरांनी देह सोडला. त्यांच्या अखेरच्या काळातही मिलिंद जोशीच त्यांच्यासोबत होते.
‘साहित्य मंदिरातील नंदादीप’ या प्राचार्य राम शेवाळकरांवरील लेखात त्यांनी एक आठवण सांगितली. जोशी यांच्या कॉलेजमध्ये शेवाळकर सरांचे व्याख्यान होते; मात्र त्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती बेताची होती. जोशींनी त्यांच्या प्रास्ताविकात ही खंत बोलून दाखविल्यानंतर शेवाळकर सर म्हणतात, ‘‘दारूच्या अड्ड्यावरती माणसं स्वत:हून जातात आणि दुधाचा रतीब मात्र घरोघरी जाऊन घालावा लागतो. या जगात ज्या ज्या वेळी चांगल्या घटना घडल्या त्या त्या वेळी फार कमी माणसं उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती मावळे उपस्थित होते? कमी माणसं म्हणजे विचारमंथनाला पोषक वातावरण असं मी मानतो.’’
‘वाईटपणा विकत घेणारा माणूस’ या डॉ. ग. ना. जोगळेकर यांच्यावरील लेखात ते म्हणतात, ‘माणूस पराक्रमी असला तरी नियती क्रूर असते.’ ‘अंतर्नाद’ या मासिकात प्रा. जोशी यांनी डॉ. जोगळेकरांच्या विरूद्ध प्रतिक्रिया दिली. त्यावेळी जोगळेकरांनी ‘साहित्य संस्थांवर टीका करणं सोपं असतं. इथं या काम करा, अनुभव घ्या, मगच आपली मतं बनवा’ असं सांगितलं. तो सल्ला शिरसावंद्य मानत जोशी परिषदेत सक्रिय झाले. जोगळेकर सरांच्या विरूद्ध पॅनलमधून निवडून आले आणि त्यांचा विश्‍वास संपादन करत स्वत:ला सिद्धही केले. परिषदेत मोठे परिवर्तन घडवत आज तर ते परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. द. भि. कुलकर्णी, कवी ग्रेस, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, ‘पोलीस चातुर्यकथा’कार व. कृ. जोशी, कवी जगदीश खेबुडकर, ज्योत्स्ना देवधर, सुनिता देशपांडे यांच्यावरील लेखही वाचकांना समृद्ध करणारे आहेत. ही सर्व माणसे प्रा. जोशी यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असल्याने त्यांनी अंत:करणापासून त्यांच्याविषयी लिहिले आहे. त्यात भावनेचा ओलावा आहे. या सर्वांच्या सानिध्यात जशी मिलिंद जोशी यांची जडण-घडण झाली तशीच हे लेख वाचून वाचकांचीही होईल.
रा. चिं. ढेरे सरांनी या पुस्तकाची केलेली पाठराखण, रविमुकुल यांचे बहारदार मुखपृष्ठ, अशोक बोकील यांनी साकारलेली चित्रे यामुळे हे पुस्तक परिपूर्ण झाले आहे. यातील प्रत्येक लेख म्हणजे त्या त्या महापुरूषांचा जीवनपट उलगडून दाखविणारी कादंबरीच! फक्त शब्दांचे खेळ न करता वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची प्रा. मिलिंद जोशी यांची हातोटी या पुस्तकातून दिसून येते. प्रत्येकाने वाचावे, संग्राह्य ठेवावे, इतरांना आवर्जून भेट द्यावे असे हे आदर्शांचे बेट आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या भावी लेखन प्रवासास आमच्या शुभेच्छा!

पाने - 210, मूल्य - 150
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे (020-24337982)


घनश्याम पाटील, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment