Monday, May 18, 2015

वैचारिक भ्रष्टतेविरुद्धची लढाई!

'चपराक'चे नवे पुस्तक 

लॉर्ड मेकॉले याची अवलाद शोभावेत असे अनेक महाभाग आपल्याकडे आहेत. ‘जातीजातीत, धर्माधर्मात फूट पाडा, येथील लोकाच्या भक्कम असलेल्या श्रद्धा कमकुवत करा, त्यांची शिक्षणव्यवस्था तकलादू करा आणि या देशावर हवे तसे राज्य करा’  असा मंत्र मेकॉलेने ब्रिटिशांना दिला आणि आपल्या नशिबी गुलामीच्या शृंखला आल्या. पुढे असंख्य क्रांतिविरांच्या बलिदानातून, त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; मात्र या मेकॉलेची पैदास पुरती नष्ट झाली नाही. त्याने जे तत्त्वज्ञान सांगितले त्यानुसार आपल्या समाजात जी फूट पडली आहे ती प्रयत्नपूर्वकही दूर होत नाही. मुख्य म्हणजे आपलेच अनेक बांधव यात सदैव आघाडीवर असतात.
एखाद्याची पैशात फसवणूक केली तर ती भरून येऊ शकते, मात्र जर कोणी एखाद्याच्या श्रद्धेला, विश्‍वासाला तडा दिला तर त्यातून सावरणे कठीण असते. अशा भंगलेल्या मनात क्रांतीच्या ज्वाला पेरणे हे महाकठीण काम होऊन बसते. ‘वाचकांना ज्ञानी आणि जागरूक करण्याचे व्रत’ स्वीकारलेल्या आपल्या प्रसारमाध्यमांची प्रतिमाही अशीच तडकली आहे, भंगली आहे. ‘विकाऊ’ वृत्तीच्या पत्रकारांमुळे हे क्षेत्र पुरते बदनाम झाले आहे. सत्य आणि न्याय भूमिका न घेता जसा धंदा होईल तसा गल्ला भरायचा, या वृत्तीमुळे साहित्य आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेकांची बुद्धी गंजली आहे. भूमिका न घेणारे लेखक आणि पत्रकार किंवा सोयीस्कर भूमिका घेणारे ‘विद्वान’ यामुळे ज्ञानाचे हे क्षेत्र डागाळले आहे. ‘आपण सांगू तेच खरे’ या वृत्तीमुळे अशा स्वयंघोषित विचारवंतांनी समाजमन कलुषीत केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन प्राध्यापकांनी त्यांच्या ‘तोकड्या’ कुवतीनुसार, सुमार आकलनानुसार ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’  हा ग्रंथ लिहिला आणि ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला. प्रकाशक दिनकर गांगल आणि अरूण साधू या दोघांनी या लेखकद्वयींना ‘मार्गदर्शन’ केले, सहकार्य केले आणि ‘अगा जे घडलेच नाही‘ तेही यांच्या ‘दिव्य’दृष्टिला दिसू लागले. केवळ शरद पवार यांची पाठराखण करण्यासाठी या सर्व ‘विचारवंतांनी’ त्यांना हव्या तशा थापा मारत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ वाचकांच्या हाती दिले. प्रत्येक परिच्छेदाला धडधडीत खोटी विधाने करत, वाचकांची दिशाभूल करत आपण फार मोठे तीर मारलेत अशा आविर्भावात या सर्वांनी पुढे विचाराच्या क्षेत्रात बिनदिक्कतपणे दुकानदारी सुरू केली.
ओंजळीत धरून ठेवलेले पाणी कितीकाळ टिकणार? त्याप्रमाणेच सत्य हे फार काळ लपून राहत नाही. या पुस्तकाचा सर्वत्र गवगवा होत असतानाच सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी हे पुस्तक वाचले आणि त्यातील फोलपणा पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. भाऊ तोरसेकर यांची पत्रकारिता आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये सुरू झाली आणि बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’मध्ये बहरली. सदैव जागता पहारा देणार्‍या भाऊंनी हा धादांत खोटेपणा लेखक आणि प्रकाशकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी ‘ग्रंथाली‘च्या प्रकाशकांनी आणि या लेखकद्वयींनी भाऊंना पत्र लिहून माफी मागितली आणि पुस्तकातील ‘चुका‘ तपासून घेण्यासाठी थोडा वेळ मागितला. स्वतःच लिहिलेल्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी लेखकाला किती वेळ लागावा?  19 ऑगस्ट 1997 पासून आजपर्यंत त्यांचा ‘अभ्यास‘च सुरू आहे आणि दुसरीकडे या पुस्तकाच्या आवृत्यावर आवृत्त्या निघाल्या आहेत. सुहास पळशीकर यांच्यासारखा माणूस सार्वजनिक जीवनात ज्या बेमालूमपणे भाषणबाजी करत असतो तो पाहता हा वेश्येेने पतिव्रता धर्म शिकवण्याचा भाग वाटतो. व्होरा आणि पळशीकर यांच्या चुकीच्या नोंदी व खोटेपणाला आक्षेप घेत भाऊंनी त्यांची परखड आणि सत्यनिष्ठ चिकित्सा करत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘चा प्रतिवाद केला आहे. येत्या 21 मे रोजी भाऊंनी प्रतिवाद केलेले हे पुस्तक ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ या नावाने ‘चपराक प्रकाशन‘कडून प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन सत्याचा कैवार घेणार्‍या उज्ज्वल निकम यांच्यासारख्या लढवय्या सरकारी वकीलाच्या हस्ते होत आहे, हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या विषयावर लिहिताना आणि ते प्रकाशित करताना लेखक आणि प्रकाशकांचे ‘मडके’ कच्चे होते असेही म्हणता येत नाही, कारण हा इतिहास केवळ पवारांची आरती ओवाळण्यासाठी आणि सेनेला कमी लेखण्यासाठी मांडलाय हे पानापानावर जाणवते. व्होरा आणि पळशीकरांनी त्यांच्याच पुस्तकात जे संदर्भ दिलेत, जी मांडणी केलीय त्याच्याशी विसंगत मजकूर त्याच पुस्तकात दिलाय. ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ अशातला हा मामला आहे. धडधडीत खोटी विधाने पेरत, आपल्या ‘धन्या’शी प्रामाणिक राहत हे पाखंडी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बदलायला निघालेत. जे घडलेच नाही ते यांनी कसलीही लाज न बाळगता ठोकून दिले आहेच; पण ‘महाराष्ट्रातील सत्तांतरा’च्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या व राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटनांना त्यांनी जाणीवपूर्वक टांग मारली आहे. भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या पुस्तकात या खोटेपणाची जंत्रीच दिली आहे.
शालीनीताईंची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा, पी. के. सावंत, राजाराम बापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (1970-74), शंकरराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, रजनी पाटील यांच्या मुंबई कॉंग्रेसकरवी महाराष्ट्र कॉंग्रेसला शह, 1960 पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडणारी कॉंग्रेस संघटना, टाळलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका (1970-80), मुंबईचा ऐतिहासिक गिरणी संप आणि त्यानंतर शिवसेनाला मिळालेली पालिकेतील सत्ता (1985), पवारांच्या नेतृत्व काळात डाव्या पक्षात आलेले शैथिल्य आणि नंतरचे पांगळेपण-दिशाहीनता (1986), औरंगाबाद महापालिकेत सेनेचा देदीप्यमान विजय, पार्ला पोटनिवडणुकीत हिंदुत्त्वावर जनतेचे शिक्कामोर्तब, 1991 ला संक्रांतीदिवशी पवारांच्या विरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल व रूपकुवर सतीचे वादळ अशा कितीतरी घटना ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ लिहिणार्‍या व्होरा आणि पळशीकरांनी दुर्लक्षित ठेवल्या आहेत. राज्यशास्त्राच्या सामान्य विद्यार्थ्याला या घटनांचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील या विभागाचे प्रमुख प्राध्यापक नालायक ठरले. ‘झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही’ या म्हणीप्रमाणे या प्राध्यापकांची लबाडी केवळ शरद पवारांची तळी उचलून धरण्यासाठी होती हे कुणाच्याही सहजपणे ध्यानात येईल.
मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणाचा डोळस अभ्यास असलेल्या भाऊ तोरसेकर यांनी सातत्याने सत्य पुढे आणण्यासाठी आपली लेखणी झिजवली आहे. त्यांच्या ब्लॉगचे सात लाखाहून अधिक वाचक आहेत. त्यांचे अचूक राजकीय विश्‍लेषण महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवले आहे. ‘चपराक प्रकाशन’ची सुरूवातीपासून ‘संवाद आणि संघर्ष’ हीच भूमिका असल्याने वैचारिक भ्रष्टतेच्या लढाईत भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या चतुरस्त्र लेखकाची निर्भिड आणि निःपक्ष बाण्याचे दर्शन घडविणारी काही पुस्तके लवकरच आपल्या भेटीस आणत आहोत. तुर्तास, ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाद्वारे भाऊ तोरसेकर यांनी राजकीय विश्‍लेषक आणि विचारवंत म्हणून सर्वत्र मिरवणार्‍यांचे जे बुरखे फाडले आहेत ते वाचकांनी आवर्जून वाचावेत, अभ्यासावेत, पडताळून पहावेत. यातूनच कणखर बाण्याची एक जबाबदार पिढी घडण्यास हातभार लागणार आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Sunday, May 17, 2015

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’

सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक येत्या 21 मे रोजी प्रकाशित होत आहे. ‘चपराक प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची तटस्थपणे आणि प्रांजळ भूमिकेतून केलेली परखड चिकित्सा या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. त्याविषयी थोडेसे...

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’
'चपराक प्रकाशन,'पुणे 

पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन प्राध्यापकांनी चुकीच्या नोंदी व खोटेपणा करत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक लिहिले आणि ‘ग्रंथाली’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले. अनेक न घडलेल्या घटना, प्रसंग अथवा अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टी, काल्पनिक माहिती-घटनांवर  आधारित केलेली विधाने व निष्कर्ष देऊन वाचकांची दिशाभूल या प्राध्यापकद्वयींनी केली. सामाजिक बांधीलकीची भाषा बोलणार्‍या व्यक्ती व संस्थांकडून झालेली अशी बेपर्वाई, दडपेगिरी खटकल्याने सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी ही बाब संबंधित लेखक आणि प्रकाशकांच्या लक्षात आणून दिली. दोघांनीही तोरसेकर यांची लेखी दिलगिरी व्यक्त करत पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे मान्य केले. मात्र 1997 पासून आजवर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि त्यात तोरसेकर यांनी निदर्शनास आणून दिलेल्या सर्व चुका तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. या वैचारिक भ्रष्टतेचा पर्दाफाश  करणारे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक पुण्यातील ‘चपराक’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होत आहे. 
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या पुस्तकात शब्दाशब्दात चुकांची जंत्री देण्यात आली आहे. शरद पवार यांचे गुणगाण करण्यासाठी, वाचकांच्या मनात त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे की काय अशी शंका येण्याइतपत खोटे संदर्भ पेरण्यात आले आहेत. या चुकीच्या व धडधडीत खोट्या माहितीने वाचकांची दिशाभूल होत आहे. उदा. लेखक आपल्या ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या पुस्तकात पृष्ठ क्र. 6 वर लिहितात की, ‘‘अल्पवाधितच त्यांनी (शरद पवारांनी) संयुक्त मंत्रिमंडळाला सुरूंग लावला आणि अठरा आमदारांसह समाजवादी कॉंग्रेस या नावाने प्रादेशिक गट स्थापन करून बिगर कॉंग्रेस पक्षांचे नेतृत्त्व स्वत:कडे घेतले.’’
हे धादांत खोटे विधान खोडून काढताना भाऊ तोरसेकर पुढील वस्तुस्थिती मांडतात. ‘‘पवारांनी स्थापलेल्या गटाचे नाव समांतर कॉंग्रेस होते, कारण त्याच काळात शंकरराव चव्हाण, विखे-पाटील यांचा महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस नावाचा प्रादेशिक पक्ष अस्तित्त्वात होता. पुलोदचा भागीदार म्हणून त्याचे नेते शंकरराव चव्हाण पवार सरकारात अर्थमंत्री होते.’’
प्रत्येक पानावरील अशा विधानांची अभ्यासपूर्वक चिकित्सा केल्याने भाऊ तोरसेकर यांचे हे पुस्तक केवळ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’चा प्रतिवाद करणारे ठरले नसून, महाराष्ट्राचा राजकीय सत्य इतिहास उलगडून दाखविणारे झाले आहे. ‘मराठा’ सारख्या मान्यवर दैनिकातून पत्रकारितेची सुरूवात झालेल्या भाऊ तोरसेकर यांची निर्भिड व नि:पक्ष लेखनासाठी ख्याती आहे. राज्यशास्त्राचे आणि पत्रकारितेचे विद्यार्थी, महाराष्ट्राविषयी जिज्ञासा असणारे वाचक यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. 
 शरद पवारांची अब्रू झाकण्याच्या नादात ‘ग्रंथाली प्रकाशन’ची स्थिती शरद पवारांसारखीच होईल आणि ही संस्था रसातळाला जाईल असा धोका तोरसेकर यांनी या पुस्तकातून वर्तविला आहे. ‘चपराक’सारख्या परखड बाण्याच्या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित होत असल्याने या विषयाला पुरेपुर न्याय मिळणार आहे.

Sunday, May 10, 2015

वादाला का भीता?

संजय सोनवणी (साहित्यिक आणि संशोधक)

... होय, संजय सोनवणी हे एक तटस्थ वृत्तीचे आणि ठाम भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. वेगवेगळ्या साहित्य प्रवाहात कणखर आणि परखड भूमिका घेऊन त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले असले तरी त्यांनी सत्याची कास सोडली नाही. त्यांच्या काही भूमिकांविषयी मतभेद जरूर असू शकतात; मात्र हा माणूस नेक वृत्तीचा आणि साहित्य क्षेत्राशी प्रामाणिक आहे हे मान्य करावेच लागेल.
सध्या एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे दिवस आहेत, तर दुसरीकडे या स्वातंत्र्याचा अतिरेकही केला जातो. मध्यंतरी  पेरूमल मुरूगन या लेखकाने या व्यवस्थेला कंटाळून स्वतःतील लेखकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, हा  आपल्याकडील काळाकुट्ट इतिहास आहे. ही मुस्कटदाबी कुणा एका विचारधारेकडून, समाजाकडून होते असे नाही. सत्य काय हे जाणून न घेता केवळ आपला स्वार्थ पुढे दामटण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे.
क्षमा आणि शांतीचा संदेश देणार्‍या आपल्या देशात आजवर अनेक समाजद्रोह्यांनी थयथयाट सुरूच ठेवला आहे. राजकीय लाभापायी इथल्या पोखरलेल्या व्यवस्थेने अशा दुष्प्रवृत्तींना सातत्याने खतपाणी घातले. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा तो स्वबळावर पूर्ण करू शकतोय. इतकी समज आणि कुवत त्याच्यात निर्माण होण्याइतपत बदल नक्की झालाय. मात्र तरीही समाजाच्या अनेक गरजा आज दुर्लक्षित आहेत. साहित्य आणि संस्कृती हा आपल्या आदर्श समाजरचनेचा पाया आहे. तो मात्र दिवसेंदिवस तकलादू होत चालला आहे.
’महाराष्ट्र भूषण’ श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची संपूर्ण हयात शिवसेवेसाठी घालवली. युगपुरूष शिवरायांचे चरित्र तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी जे कष्ट घेेतले, जे कार्य उभे केले त्याला तोड नाही. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज घडू शकेल, लोकापुढे शौर्य आणि पराक्रमाची मशाल तेवत राहील यादृष्टिने बाबासाहेबांनी जे कार्य उभे केले आहे त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांचे हे काम अद्वितीय आहे. महाराष्ट्र सरकारने उशीरा का होईना पण त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे सारे असताना काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्यांच्यावर खोटे आरोप घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राला जात, धर्म, प्रांत यावरून भांडत राहणे परवडणारे नाही, हे ठाऊक असूनही केवळ स्वतःचा स्वार्थ पुरा करण्यासाठी काहीजण आपल्यात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू ठेवत आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लेखन केले त्यातील आपल्याला हवा तो भाग, हव्या त्या पद्धतीने घेऊन टाळकी भडकवण्याचे काम वेगात सुरू आहे. आजची विचारी तरूणाई अशा भूलथापांना बळी पडणार नाही, मात्र त्यांच्यापुढे यातील सत्य आले पाहिजे. बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातील काही वाक्ये उचलून, त्याचे कपोलकल्पित संदर्भ जोडून समाजात दुही निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे. अशा बिकट वेळी संजय सोनवणी या लढवय्या लेखकाने अत्यंत अभ्यासपूर्वक, जिद्दीने सत्य पुढे आणण्याचा चंग बांधला. बाबासाहेबांचे पुस्तक त्यांनी अभ्यासले आणि तथाकथीत काही अविचारी लोकाचे सर्व आरोप पुराव्यासह खोडून काढले. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जे आक्षेप घेतले जात होते ते राजकीय हेतूने, पूर्वग्रह ठेवून आणि जातीय भूमिकेतून होते हे सिद्ध झाले. अशाने आधीच बंद पडत चाललेली आपली दुकानदारी बंद होणार, हे ध्यानात येताच काही ब्रिगेडी टाळकी पेटून उठली आहेत. वाटेल त्या थराला जाऊन, खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे ठरवून हे लोक आपले घोडे पुढे दामटत आहेत. संजय सोनवणी यांनी मुद्देसूदपणे आणि अभ्यासपूर्वक बाबासाहेबांवरील सर्व आरोप फेटाळून लावल्याने यांची गोची झाली आहे.
संजय सोनवणी हे मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की ज्यांचे पुस्तक अमेरिकेत, व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरंस बुक’ म्हणून ठेवण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजीत त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांचे साहित्य जगभर वाचले जाते. वंचित, उपेक्षित, भटके विमुक्त, आदिवासी, दलित यांचे सुखदुःख मांडण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या सूड भावनेने वागणार्‍या माणसाला न्यायालयात अधिकृत माफी मागण्यास भाग पाडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर मार्गाने लढत दिली. हिंदू आणि हिंदुत्व या दोन्हीपासून हजारो मैल दूर असणार्‍या सोनवणी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील आरोप विवेकाने खोडून काढले आहेत. त्यासाठी लागणारी सच्चाई आणि अच्छाई त्यांच्याठायी आहे. जातीपातीच्या बाहेर पडून अशी न्याय भूमिका घेणार्‍या आणि धाडसाने सत्य पुढे आणणार्‍या सोनवणी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास पूत्र आहेत. त्यांनी शिवकाल जिवंत केला आहे. एव्हरेस्टसारख्या उंचीचा हा ध्येयवेडा माणूस अनेकांच्या हृदयावर राज्य करतोय. ज्यांचा प्रत्येक श्‍वास शिवमय होऊन गेलाय, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण शिवाजीराजांच्या प्रेमात घालवलाय त्यांच्याविषयी आमच्या मनात श्रद्धाभाव आहे. बाबासाहेबांवर केवळ ‘ब्राह्मण’ म्हणून टीका करणे हे काही ‘ब्रिगेडियर’ नेत्यांचे कारस्थान आहे. संभाजीनगर येथे बोलताना बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ बद्दल अभिनंदन करणार्‍या शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मात्र पक्षाची नसून ती त्यांची स्वतःची आहे, असे केविलवाणे विधान केले. यातून पवारांसारख्या नेत्याची विखारी वृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला जवळून पाहता आली.
संजय सोनवणी यांच्या चिकित्सेनंतर नगर येथील ‘शिवप्रहार’ या संस्थेचा अध्यक्ष असलेल्या संजीव भोर नावाच्या एकाने सोनवणी यांना धमक्या देणे सुरू केले आहे. त्याने सोनवणी यांना सूड भावनेने  आव्हान देऊन नगरला बोलवून घेतले. आजपर्यंत अनेकवेळा लेखकांना काळे फासले गेले, त्यांच्यावर शाई टाकण्यात आली, लेखकांचा निषेध करण्यात आला किंबहुना लेखकाला स्वतःतील लेखक मेल्याचेही जाहीर करावे लागले. मात्र मराठीच्या इतिहासात प्रथमच असा एक लेखक पुढे आला की ज्याने आव्हान देणार्‍याला ठामपणे सांगितले,  की ‘‘ठिकाण आणि वेळ तू ठरव, तू मला काळे फासण्याच्या आधी मी तुझ्या कानाखाली ओढतो. तुझ्या मुस्कटात ठेऊन देतो!’’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सांगितले होते की, ‘‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या!’’ सोनवणी यांनी ज्या बेडरपणे हे आव्हान स्वीकारले ते पाहता आता स्वातंत्र्यवीरांचे विचार खोलवर रूजलेत असे मानायला हरकत नाही.
मात्र या संजीव भोरने संजय सोनवणी यांना बोलवण्याचा आततायीपणा केला. आपली आता काही खैर नाही हे ध्यानात येताच त्याने काही महिला गोळा केल्या. संजय सोनवणी यांच्या अंगावर या महिलांना सोडायचे आणि विनयभंग, ऍट्रॉसिटी असे गुन्हे दाखल करायचे असे कारस्थान त्याने रचले. याची माहिती मिळताच नगरला गेलेल्या सोनवणी यांनी माघार घेतली आणि भोर याचा कुटील डाव हाणून पाडला.
आगरकरांनी विचारले होते की, ‘‘वादाला का भीता?’’
ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांची चर्चेची तयारी असते. ते कोणत्याही तात्त्विक वादाला कधीही घाबरत नाहीत. मात्र संजीव भोर याच्यासारख्या भ्याड माणसाने सोनवणी यांच्यासारख्या दिग्गजाला आव्हान देऊच नये. भोर याच्या आडून हे आव्हान सरळ सरळ ‘संभाजी ब्रिगेड’चे आहे हे पुरते ठाऊक असल्याने सोनवणी यांनी ते स्वीकारले पण भोरने पळपुटेपणा करत कट रचला.
बाबासाहेब पुरंदरे आणि संजय सोनवणी यांच्यात वैयक्तिक काहीही संबंध नाहीत. बाबासाहेबांच्या लेखनावर चुकीचे आक्षेप घेतल्याने  संजय सोनवणी यांच्यासारखा एक सत्लेखक दुखावला गेला आणि त्याने सत्य पुढे आणण्याचे काम धाडसाने केले. पुरंदरे आणि सोनवणी या दोन मात्तबर लेखकांची भेट ‘चपराक’च्या पुढाकाराने लवकरच घडवून आणत आहोत, मात्र यात कसलेही राजकारण, स्वार्थ नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. केवळ सत्य पुढे यावे आणि आजच्या तरूणाईच्या मनात जे जातीभेदाचे विष कालवले जात आहे ते दूर व्हावे या प्रांजळ भूमिकेतून संजय सोनवणी यांच्यासारख्या खमक्या लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्यावर सध्या राळ उडवण्यात येत असून त्यांची वैयक्तिक बदनामी केली जात आहे. हे सारे संतापजनक आहे. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वजण संजय सोनवणी यांच्या पाठिशी राहणे, बाबासाहेबांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव करणे हे आपले कर्तव्यच आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
संजीव भोर याने संजय सोनवणी यांच्याविरुद्ध अशी राळ उडवली.




Monday, May 4, 2015

महाराष्ट्र भूषण बाबासाहेब!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेताना घनश्याम पाटील
ज्यांच्या श्‍वासाश्‍वासात शिवचरित्र आहे अशा ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयाला उशीर झाला हे जरी खरे असले तरी फडणवीस आणि त्यांच्या चमूला यासाठी धन्यवादच द्यायला हवेत. ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात आणि मनामनात पोहोचले त्या वंदनीय बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ देणे ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
माझे 'दखलपात्र' हे पुस्तक आपुलकीने पाहाताना महाराष्ट्र भूषण बाबासाहेब.
देश-विदेशात छत्रपती शिवरायांचे कार्य तळमळीने पोहोचविणार्‍या बाबासाहेब पुरंदरे यांच्या या सन्मानाने छत्रपती शिवरायांविषयी ज्यांना हृदयातून आत्मीयता वाटते, महाराजांविषयी ज्यांच्या मनात डोळस श्रद्धाभाव आहे त्यांचा ऊर गौरवाने भरून आला आहे. वयाच्या 93 व्या वर्षीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्या तडफेने, जिव्हाळ्याने कार्यरत आहेत, ते पाहता हे निश्‍चितच देवाचे काम आहे.
11 फेब्रुवारी 2015 रोजी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा ‘चपराक साहित्य महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘शिवप्रतापकार’ उमेश सणस यावेळी बोलताना म्हणाले होते की, ‘‘इतिहासकाळातील कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला आज भेटण्याची संधी मिळाली असती तरी आपण त्यांना शिवाजीराजांविषयी विचारले असते. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, मदारी मेहतर, राजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणीही किंवा राजांच्यासोबत असणारे कोणीही भेटले असते आणि त्यांना आपण राजांविषयी विचारले असते तर ते निश्‍चितपणे म्हणाले असते की आधी तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटा. त्यांच्याकडून शिवरायांविषयी माहिती घेतल्यानंतर जर तुमची काही शंका राहिलीच तर आम्हाला भेटा...’’
सणस यांचे हे विधान अगदी खरे आहे. शिवरायांच्या सहकार्‍यांनी त्यांचे वर्णन केले नसते इतक्या जिवंतपणे महाराज डोळ्यांसमोर आणण्याचे अभूतपूर्व काम बाबासाहेब करतात. गडकोट, किल्ले, संशोधन हेच ज्यांचे आयुष्य बनून राहिले त्यांनी कायम शिवचरित्राचाच ध्यास घेतला. याठिकाणी गोनी दांडेकरांची एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. गोनी तथा अप्पा दांडेकर एसटी बसने महाबळेश्‍वरहून पुण्याकडे येत होते. मुसळधार पाऊस सुरू होता. त्यांनी पाहिले की एक तरूण इतक्या पावसात सायकल चालवत जात आहे. त्यांना जवळून या तरूणाचा चेहरा दिसला आणि ते लगबगीने गाडीतून उतरून त्याच्या जवळ गेले. ‘‘इतक्या पावसात कुठे निघालात?’’ अशी त्यांनी चौकशी केली. त्या तरूणाने सांगितले, ‘‘प्रतापगडावरून हाडपांचा निरोप आलाय. एक शिवकालीन पत्र त्यांना मिळाले आहे. ताबडतोब या. त्यामुळे पुण्यातून निघालो. तिकिटाला पैसे नसल्याने सायकल काढली...’’ हा तरूण म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!
बाबासाहेबांनी शिवसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि महत प्रयासाने तो पूर्णत्वासही आणला. ‘जाणता राजा’ या भव्यदिव्य नाटकाचे प्रयोग त्यांनी जगभर केले. त्यासाठी घोडे, हत्ती त्यांनी रंगमंचावर आणले. भारत इतिहास संशोधक मंडळातून इतिहास संशोधनाची दिशा मिळाल्यानंतर त्यांनी शिवकार्यासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केेले. कशाचीही तमा न बाळगता त्यांनी सातत्याने राजांची महती लोकापर्यंत जावी, यासाठीच प्रयत्न केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची जाहीर मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांनी त्यांना शिवजयंतीवरून प्रश्‍न विचारला. ‘‘शिवजयंतीची नक्की तारीख कोणती?’’ असे विचारताच या शिवशाहीराने जे उत्तर दिले ते प्रत्येकाला विचार करायला लावणारेच आहे. ते म्हणाले, ‘‘हा प्रश्‍न विचारण्याच्या निमित्ताने तुम्हाला शिवाजीराजे आठवले ना! मग तुमच्या मनात शिवरायांचा जन्म झाला. अरे, शिवजयंतीवरून वाद कसला घालता? शिवरायांचे रूप आठवा, त्यांचा प्रताप आठवा. रयतेसाठी त्यांनी जे अमाप काम केले ते आठवा. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.’’ इतके छान आणि तात्त्विक उत्तर बाबासाहेब त्यांच्या जीवनसाधनेच्या बळावर देऊ शकतात.
वंदनीय बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच काही पूर्वग्रहदूषित लोकानी कोल्हेकुई सुरू केली आहे. स्वयंघोषित शिवश्रींनी आपली ‘शिवीश्री’ वृत्ती दाखवून देत कायम जातीय तेढ निर्माण केली आहे. त्याबद्दल त्यांनी न्यायालयात माफीही मागितली आहे. अशा लोकानी बाबासाहेबांवर लिहिणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. यावर बाबासाहेबांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दिलेले उत्तरही नेहमीप्रमाणे मार्मिकच होते. ते म्हणाले, ‘’मला शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचावे यासाठी आणखी बरेच काम करायचे आहे. अशा प्रवृत्तींना उत्तर देण्यात वेळ घालवणे मला परवडणारे नाही...’’ ज्यांनी सातत्याने शिवाजीराजांची पूजा बांधण्यात, त्यांचा आदर्श नव्या पिढीपुढे ठेवण्यात आपल्या देहाची काडे केली त्यांना अशा थिल्लरबाजांची दखल घेण्याएवढी उसंत नसणे हे रास्तच आहे.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असला तरी या पुरस्कार निवड समितीत सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, दिलीप वेंगसरकर, कीर्तनकार मंगल कांबळे, सांस्कृतिक कार्यसचिव वल्सा नायरसिंह, सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर, नामवंत चित्रकार वासुदेव कामत अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मनात ज्यांच्याविषयी अत्यंत आदराचे स्थान आहे आणि ज्यांचे आयुष्य शिवसेवेसाठी समर्पित आहे अशा एका महान विभुतीची निवड या सदस्यांनी केली आहे. बाबासाहेबांच्या महाराष्ट्र भूषणला विरोध करणे म्हणजे या सर्वांच्या निवडीला आव्हान देण्यासारखेच आहे. तटस्थ वृत्तीच्या आणि आपापल्या क्षेत्रात मानदंड ठरलेल्या या विचारवंतांनी बाबासाहेबांची निवड करणे हे आपले सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे त्यांच्यावर चिखलफेक करणे म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्रावर आरोप डागण्यासारखे आहे. केवळ द्वेषमूलक, जातीच्या चष्म्यातून असे करंटेपण कोणी करत असेल तर करू देत बापूडे!
बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य यापूर्वीच जागतिक स्तरावर गेले आहे. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणजे आपण आपल्या बाजूने कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे आहे. अशा पुरस्काराचा सोस त्यांना नक्कीच नाही; मात्र मराठी माणूस त्यांच्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नसताना हे एक निमित्त आहे.
इतरांना सतत प्रोत्साहन देणारे, कार्यक्रमांपेक्षा कार्याला महत्त्व देणारे शिवशाहीर बाबासाहेब यांचे आयुष्य सुयोग्य ध्येयाने प्रेरीत आहे. नव्या पिढीसाठी त्यांचे चरित्र निश्‍चितपणे प्रेरणादायी आहे. या बलाढ्य शिवशाहीरास 'चपराक' परिवारातर्फे मानाचा मुजरा!

 
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Thursday, April 30, 2015

घुमान, पंजाब आणि आम्ही!

घुमान येथील 'चपराक प्रकाशन'च्या दालनात साहित्य रसिकांनी अशी गर्दी केली होती.
साप्ताहिक ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांचा एक आग्रह मला टाळताच आला नाही. काय होता तो आग्रह? तर, ‘‘काय वाट्टेल ते झाले तरी तुम्ही आमच्याबरोबर पंजाबच्या घुमान येथील साहित्य संमेलनाला आलेच पाहिजे.’’ त्यांच्या आग्रहात कळकळ होती. विलक्षण कळकळ! त्यांना नाही म्हणणं शक्यच झालं नाही. दरम्यानच्या काळात उत्सुकता म्हणून घुमान व संत नामदेवांबद्दल हाताशी लागेल ते वाचत होतोच. त्यातून एक लक्षात आलं होतं. मराठ्यांचा भारतभर संचार हा खूप पूर्वीपासून होताच. मात्र, त्याही आधी संतांची देखील एक फळी दोन-दोन हजार मैल पायपीट करत भारतभर फिरत होती. मराठी योद्ध्यांच्या व मराठी संतांच्या या हालचालींमुळं खूप मोठं राजकारण आकाराला येत होतं त्या काळात! ते राजकारण माणसं जोडण्याचं होतं. देश जोडण्याचं होतं. महाराष्ट्राची राजकीय व आध्यात्मिक ताकत सगळ्या देशालाच कवेत घेत होती व देशही या ताकदीवर विसंबून होता. महाराष्ट्रावर विश्‍वास ठेवून होता. दळणवळणाची कसलीही आधुनिक साधनं नसलेल्या काळात हा चमत्कार घडत होता. आपल्या पूर्वजांचे हे उपद्व्याप (उपद्व्याप हा शब्द सकारात्मक अर्थानं घ्यावा) वाचताना जीभ आश्‍चर्यानं टाळूला चिकटत होती. पानिपतावर दोन वेळा जाऊन आलो होतो. एकदा तर पुणे ते पानिपत हे एकवीसशे किलोमीटर अंतर दुचाकीवर पार केलं. जिथं एक लाख मराठी बांगड्या फुटल्या, तिथं नुसतं जाऊन येणं कठीण होतं का? हीच गोष्ट घुमानबद्दल होती. संत नामदेव तिथं अठरा वर्षे राहिले होते. त्यांची 61 पदे ‘गुरूग्रंथसाहिब’ या शीखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. गुरूनानक व गुरूगोविंदसिंगांइतकंच महत्त्वाचं स्थान नामदेवांनी प्राप्त केलं होतं. हा काय चमत्कार होता? घुमानला गेल्याशिवाय ते कळणार नव्हतं. तिथं जाऊन भोजन झोडून परतायचं असं अजिबातच नव्हतं. परिस्थिती जाणून घ्यायची होती. इतिहास व वर्तमानाची सांगड घालता येते का ते पहायचं होतं. खरंतर घुमानला संमेलन होतंंय हे जाहीर झाल्यावर माझं पित्त खवळलं होतं, हे मोकळेपणानं सांगितलं पाहिजे; मात्र नंतर जाणवलं, आपण खूप लवकर संतापतो. तसंही डॉ. भालचंद्र नेमाडे व डॉ. सदानंद मोरे या दोन दिग्गजांमध्ये सापडून माझ्यासारख्या अनेकांचं सँडविच झालं होतं; पण शेवटी मनानं कौल दिला, गेलं पाहिजे. डॉ. भालचंद्र नेमाडे हे कायमच श्रद्धास्थानी असतील यात वादच नाही; मात्र काही वेळा आतला आवाज ऐकावा लागतो आणि तो आवाज तुम्हाला निराश करत नाही. संमेलनातली प्रत्येक गोष्ट आवडली असं अजिबातच नाही; मात्र उठता-बसता आयोजकांच्या नावानं बोटं मोडावीत असं तर त्याहून नाही. शेकडो माणसं संमेलनासाठी राबत होती. यात पंजाबमधले अनेक शीख बांधवदेखील आले. त्यांच्या या कष्टाला मोठं  मोल नक्कीच होतं. पंजाबची राजकीय, प्रशासकीय व पोलीस यंत्रणा. ती तर तन, मन, धनानं या संमेलनासाठी धावून आली. मग या प्रेमाला नुसता प्रतिसाद देण्यानं काय बिघडणार होतं?
एक एप्रिलला पहाटे साडेचार वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोचलो, तर तिथं शेकडो जणांची गर्दी उसळलेली! सगळे घुमानला निघालेले; पण पहाटे पहाटे पहिल्याच घासाला खडा लागावा असं घडलं. ‘‘रेल्वे लेट आहे’’ असं कुणीतरी म्हणालं. त्यावर कुणीतरी म्हणालं, ‘‘हे एप्रिल फूल आहे.’’ मात्र, एक तास-दोन तास झाले तरी गाडीचा पत्ता नाही. तीन तास, चार तास उलटून गेले आणि अनेकांचा संयम सुटला. महामंडळाच्या नावानं बोंबाबोंब सुरू झाली. पुणेकर अशा तावातावानं बोलू लागले की जणू काही माधवी वैद्यच रेल्वे चालवत होत्या!! पेटापेटी सुरू झाली आणि बातमीच्या प्रतिक्षेत असलेल्या पत्रकारांनी आपापली दांडकी बाहेर काढली. मला ‘पुण्यनगरी’च्या पत्रकारानं विचारलं. मी म्हटलं, ‘‘दोन हजार कि. मी. प्रवास करायचा आहे. मुख्य म्हणजे संमेलनाला गांभीर्यानं उपस्थित रहायचं आहे. हे असले अडथळे गृहित धरले पाहिजेत.’’ मात्र गाडी उशीरा आल्याचा एक फायदा झाला. त्यामुळं एकमेकांशी बोलता आलं. संवाद, संवादामुळं ओळखी झाल्या. गाडी वेळेवर आली असती तर अनेकजण गाडीत सरळ झोपून गेले  असते. माझा पत्रकार मित्र प्रशांत चव्हाण व त्याच्या सहकारी अर्चना माने, दैनिक ‘सुराज्य’चा विजय म्हस्के व ‘मिड डे’ची चैत्राली देशमुख अशा आम्ही पाच सहा जणांनी सरळ जवळचं इराण्याचं हॉटेल गाठलं व गप्पा मारत बनमस्का व चहाचा आस्वाद घेतला. अखेर एकदाची गाडी आली ती सकाळी दहा वाजता. पाच तास लेट! पण गाडी आली हे काय कमी होतं?
आमचा डबा होता ‘एम-9.’ साप्ताहिक ‘चपराक’ची बारा जणांची टीम होती. गाडी सुरू झाली व एकेक चमत्कार सुरू झाला. घनश्याम पाटलांनी सूत्रं हातात घेतली व काव्यशास्त्रविनोदाची अशी काही मैफल जमली की विचारता सोय नाही. कवी व लेखक समीर नेर्लेकर, कवयित्री सौ. मंजिरी पाटील, कवी शांताराम डफळ ही ‘चपराक’ टीम मधील मंडळी. त्यांच्या काव्यवाचनानं मन तृप्त तृप्त झालं! सुरूवातीला काही गंभीर कवितांचं वाचन केल्यानंतर नेर्लेकरांनी एक मिश्किल कविता आपल्या पोतडीतून बाहेर काढली. एका बाजूला ती मिश्किल होती व दुसर्‍या बाजूला हसता हसता डोळ्यात टचकन अश्रू यावेत अशीदेखील,
मी रचिले प्रेमकाव्य तुझ्यावर
तू लसूण सोलीत होतीस तेव्हा
टाकला तुझ्यावर कटाक्ष तिरका
तू वरणाला दिलास तडका
मनी चांदणे बरसत होते
तू हिशोब लिहित होतीस तेव्हा
मी गजर्‍याची पुडी उलगडली
तू नाक मुरडले होतेस तेव्हा
मी प्रणयाचे गीत गायिले
तू दार लोटले होतेस तेव्हा
पुढे हा जिंदादिल कवी म्हणतो,
मी नकार समजत होतो ज्यांना
ते तर अव्यक्त होकारच होते
लाडात येऊन तुज जवळ घेतले
लाजून तू इश्श म्हणालीस तेव्हा...

मैफलीची सुरूवातच अशी जोरदार झाली. टाळ्या व वाहव्वाची दाद व काव्याची बरसात!! नेर्लेकरांच्या आणखी काही पंक्ती उद्धृत केल्याशिवाय या ताकदीच्या कवीची कल्पना येणार नाही.
क्षितीजावर आलो तरीही
येथून परतणे आहे
नशिबात फकिराच्या
बेधुंद भटकणे आहे
प्रत्येक अक्षरापाशी
का उगा अडूनी बसतो
ठाऊक मला का नसते
हे पान उलटणे आहे
एकेक शब्द स्मरताना
हा ऊर दाटूनी येतो
नि:शब्द तिचे स्मरताना
हा देह हरपणे आहे

क्या बात है दादा! क्या बात है!! सगळ्यांनीच दाद दिली. आमचं संमेलन दोन दिवस आधीच सुरू झालं होतं. एवढ्यात सौ. मंजिरी पाटील त्यांची कवितांची वही घेऊन मैफलीत दाखल झाल्या. त्या गातात केवळ अप्रतिम!! लेखिका, कवयित्री व गायिका असं त्यांचं तिरंगी व्यक्तिमत्व! त्या त्यांची कविता गाऊ लागल्या आणि जणू काळ काही क्षणांसाठी थांबावा असं घडलं.
मेघवेडा मोर मोर, नाचे थुई थुई
गच्चावले नभ नभ, झाकळून येई...
पाने फुले झाडे वेली, गारवा गारवा
आठवांचे गीत गीत, मारवा मारवा
हिर्वा ताजा कंच वारा, लहरून जाई...
गच्चावले...
चिंब चिंब झाडावर, पाखरू वेल्हाळ
ओली ओली पाने पाने, नव्हाळ नव्हाळ
पावसाचा जोर जोर, गंधाळली भुई...
गच्चावले...
थेंब आला आला जसा, तान्हुला तान्हुला
शिंपल्यात मोती मोती, सानुला सानुला
सर पावसाची मोती, उधळून जाई...
गच्चावले...

‘अमृतातेही पैजा जिंके’ असे मंजिरीताईंचे शब्द व सूर. त्यांना अशी दाद मिळाली की त्या स्वत:ही ती दाद कधी विसरू शकणार नाहीत. त्यांचं काव्यवाचन संपतंय तोच घनश्याम पाटील यांनी एक शेर ऐकवला...
अगर इस दुनिया मे खुदा है,
तो इस मस्जिदको हिलाकर दिखा
नही, तो आ, मेरे साथ बैठ
दो जाम ले
और मस्जिद को हिलता हुआ देख...

पाटलांचा शेर ऐकून कुठल्या कलंदर माणसानं त्यांना दाद दिली नसती? इतक्यात कवी शांताराम डफळ त्यांची कविता उत्कृष्ट उच्चारात वाचू लागले,
विश्‍वात शोधतो मी
माझे अस्तित्व किती ते
खिन्न दुपारल्या वेळी
मन एकाकी झुरते
सागरातल्या थेंबांमध्ये
एक थेंब काय त्याचे!
एक वेदना जळते उरी
हे सारे खेळ दैवाचे

डफळ हे शिक्षक. कवितांचे सगळे प्रकार हा मनस्वी कवी हाताळतो. मग त्या कविता छंदबद्ध असोत किंवा मुक्तछंदातील! डफळांच्या इतर कवितांनी देखील मैफलीत जान आणली.

चपराक'च्या पुढाकाराने रेल्वेत कविता, विनोद, व्याख्यान, मुलाखत असे कार्यक्रम सुरु होते. 
प्रभाकर तुंगार हे ज्येष्ठ लेखक आमच्या टीममध्ये होते. त्यांचे वडील वा. ना. तुंगार. त्यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रव्यवहार चालायचा. पाली भाषेतल्या जातक कथांबद्दल काही विचारणा करणारं पत्र आंबेडकरांनी तुंगारांना पाठवलं होतं. त्याची झेरॉक्स तुंगारांनी आम्हाला दाखवली तेव्हा, ते पत्र पाहून आम्ही थक्क झालो. प्रत्येकजण आपल्या पोतडीतून असं काहीतरी काढत होता. वेळ कसा जातोय हेही कुणाला कळत नव्हतं. स्वयंसेवक चहा, जेवण अगदी वेळेवर आणून देत होते. आणखी एक गोष्ट जाणवली. आलेला प्रत्येकजण रसिक आहे. चांगलं ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी वेडा झालेला आहे! तर स्वयंसेवकांपैकी देखील काहीजण साहित्याचे चांगले जाणकार आहेत. ही सगळी चांगली लक्षणं होती. जवळपास पन्नास तासांचा रेल्वे प्रवास; पण घनश्याम पाटलांच्या पुढाकारानं सुरू असलेल्या या मैफलींनी एक क्षणही कंटाळवाणा होऊ दिला नाही. एक प्रसंग तर सांगण्यासारखा आहे. लुधियाना स्टेशन आलं होतं. समीर नेर्लेकर व ’चपराक’च्याच टीममधील असलेले अमर कुसाळकर गप्पा मारत होते. माझ्या लक्षात आलं, ते सुप्रसिद्ध हिंदी गीतकार साहिर लुधियानवीबद्दल बोलत आहेत. ‘‘साहिर लुधियानवी लुधियानाचा. आपण त्याच्या शहरात आलो आहोत.’’ ते दोघे मला म्हणाले. अवाक् झालो. मग दोघांनी साहिर लुधियानवीच्या गीतांबद्दल भरभरून बोलायला सुरूवात केली. अशी दर्दी व रसिक मंडळी तुमचं जगणं श्रीमंत करतात! बाकी काही नाही.
दि. 3 एप्रिल. शेवटच्या ‘बियास’ या स्टेशनवर पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. त्या आधी पहाटेच्या कडक चहासोबत वेगवेगळ्या विषयांवर मनसोक्त गप्पा होत होत्या. खास रेल्वेने सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून पंजाबमध्ये पाहोचलो होतो. सुमारे दीड हजार जण होतो आम्ही सगळे! घुमानच्या अलीकडे एका भव्य शाळेत आमची सोय करण्यात आली होती. आमच्यात मुलींची, स्त्रियांची संख्यादेखील लक्षणीय होती. लुधियाना येण्यापूर्वी डॉ. सदानंद मोरे यांना मी एसएमएस पाठविला. म्हटलं ‘‘सर, घुमानमध्ये भेटतो’’. त्यांचं उत्तर आल, ‘‘वेलकम’’!
शाळेतच दाढी, आंघोळ सर्वांनी उरकली. नाश्त्याची सोय होती. घुमानमध्ये पोहोचेपर्यंत दुपारचे तीन वाजले. नुकतंच ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन झालं होतं. ग्रंथ दिंडी निघाली होती. स्टॉल्स सुरू झाले. सगळीकडे नुसता उत्साह होता. घनश्याम पाटलांनी ‘चपराक प्रकाशन’चा स्टॉल सुरू केला व आणखी एक चमत्कार झाला. एकापाठोपाठ एक पुस्तकांची विक्री सुरू झाली. साप्ताहिक ‘चपराक’ व मासिक ‘साहित्य चपराक’चे अंकही उपलब्ध होते. धडाधड पुस्तकं जातायत हे पाहून पाटलांसहित सर्वांचाच उत्साह वाढला. शेवटच्या दिवशी हिशोब केला तेव्हा लक्षात आलं, ‘चपराक’ प्रकाशनाची जवळपास पन्नास हजार रूपयांची पुस्तकं विकली गेली होती व अनेकजण मासिकाचे व साप्ताहिकाचे सभासदही झाले. स्टॉल खूप नव्हतेच. फार तर पंचवीस एक असतील; मात्र काही स्टॉल्सना चांगला प्रतिसाद मिळाला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘महाराष्ट्र टाईम्स’नं ‘चपराक’ला चांगली प्रसिद्धीदेखील दिली.
आता उद्घाटनाचा सोहळा सुरू होणार होता. त्याआधी मी ‘शब्द’ प्रकाशनच्या स्टॉलवर गेलो व काही पुस्तकांची खरेदी केली. त्यात नामदेव ढसाळांचे कवितासंग्रह होते. विश्राम गुप्त्यांची ‘नारी डॉट कॉम’ व भाऊ पाध्यांची ‘राडा’ ही शिवसेनेवरील कादंबरी मी घेतली.
दुपारची चारची वेळ. उद्घाटन सोहळा सुरू झाला. तुळजापूर तालुक्यातल्या आर्वी बुद्रुक या गावच्या ख्वाजा सय्यद यांनी रात्रंदिवस खपून संमेलनाचा भव्य मंच उभारला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, फ. मु. शिंदे अशी सगळी मंडळी व्यासपीठावर हजर होती. मुत्सद्दी राजकारणी व चांगला वाचक ही शरद पवारांची ओळख आहेच. एकाचवेळी ते प्रकाशसिंह बादल व डॉ. मोरे यांच्याशी व्यासपीठावर बसल्या बसल्या सहजपणे संवाद साधत होते. बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. अवतीभवतीच्या इमारतींवर पोलीस उभे होते व सगळीकडे घारीसारखं लक्ष ठेऊन होते. संमेलन संपेपर्यंत ही परिस्थिती कायम होती. मुख्य मंडपात जाताना कसून तपासणी होत होती. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं व संमेलनाला सुरूवात झाली. सुरूवातीला भारत देसडला बोलले. देसडला हा माणूस मराठीवर प्रेम करणारा आहे. उमद्या मनाचा आहे; मात्र त्यांचं राजकीय थाटातलं भाषण खटकलंच. वेळही खूप खाल्ला त्यांनी. व्यासपीठावरून स्वत:ला मिरवणं व माईक समोर आला की वेळेचं भान न ठेवता बोलत सुटणं ही खूप घाण सवय! आपल्याला ती जडलीच आहे. सुटकाच नाही आपली त्यातून! संजय नहार हे संयोजकांपैकी एक; मात्र त्यांनी भाषणबाजी टाळली. गरजेपुरतं बोलायचं व बाजूला व्हायचं हे धोरण ठेवलं. भाषणबाजीपेक्षा इतर छोट्या मोठ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. आपण पैसे दिले म्हणून भाषणं ठोकायला मिळाली पाहिजेत हे बरोबर नाही. खरं दातृत्व पडद्यामागं राबण्यात असतं. उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांसाठी बोलण्याचा वेळ राखून ठेवला पाहिजे हे सांगायला लागतं का? उद्घाटनाच्या सत्रात मोरे, शरद पवार, नितीन गडकरी व प्रकाशसिंह बादल यांची अप्रतिम भाषणं झाली. शरद पवार हे अतिशय समयोेचित बोलतात. त्यांचा एक शब्ददेखील विषयाला सोडून नसतो. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी भालचंद्र नेमाडेंचा आवर्जून उल्लेख केला हे विशेष!! मोरेंनी देखील चांगली मांडणी केली. त्यांचा व्यासंग अफाट आहे, हे त्यांच्या भाषणाच्या पुस्तिकेवर नजर टाकली तरी लक्षात येतं. मोरेंच्या भाषणात ब्रिटीश प्रशासक व इतिहासकार सर विल्यम विल्सन हंटरचा उल्लेख होता. हंटरनं फ्लॉरेन्स नाइटिंगेल बाईंना म्हटलं होतं, ‘‘मराठाज आर पिपल प्राऊड नॉट ओन्ली ऑफ देअर हिस्ट्री ऍज कॉन्करिंग अँड गवर्निंग रेस, बट अल्सो ऑफ देअर नॅशनल लिटरेचर’’ म्हणजेच, मराठे ही जशी विजेत्यांची व प्रशासकांची जमात आहे तशीच ती साहित्यकारांची व लेखक कवींचीदेखील जमात आहे. आता ब्रिटिशांच्या प्रमाणपत्राची मराठ्यांना फार गरज होती असे नाही. मात्र बर्‍याचदा आपणच आपली ओळख विसरतो म्हणून त्यांनी हे उदाहरण दिलं असावं. शेवटी अशी संमेलनं स्वत:ची नेमकी ओळख करून घेण्यासाठीच असली पाहिजेत, असं वाटतं. न पेक्षा नुसता उत्सवी बाज पदरात काहीच टाकत नाही. मोरेंचं भाषण लांबलं व ते भूतकाळातच अडकून पडले, अशी बोंबाबोंबदेखील नंतर झाली; मात्र ते पोटतिडकीनं एक भूमिका मांडत होते. त्यांची भूमिका या शंकासूरांनी लक्षातच घेतली नाही. केवळ टाळीबाज भाषणं हीच खरी भाषणं नसतात. भाषणातली वैचारिक ताकद महत्त्वाची; मात्र ती वैचारिक ताकत कळायला आपल्याकडेही काही वैचारिक ताकत असायला लागते. असो! उद्घाटनाचा कार्यक्रम एकूण शानदार होता. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल. या माणसाचं भाषण थेट मनाला भिडणारं होतं. तो माणूस राजकारणी वाटलाच नाही. बोलणं, वागणं प्रांजळ होतं. कसलाही ‘मी’पणा व काहीतरी जगावेगळं करत असल्याचा आव तर अजिबात नव्हता. बादलांनी मोरेंनाच एक विनंती केली. ‘‘नामदेवांवर आणखी संशोधन झालं पाहिजे व त्यासाठी तुम्ही सहकार्य करा,’’ असं ते म्हणाले. या माणसानं पंजाबचं सगळं प्रशासन या संमेलनासाठी कामाला लावलं होतं. संमेलन चालू होतंं तेव्हा बाहेर पाचशे पोलीस छातीचा कोट करून उभे होते. मायमराठीला असलेलं ते पंजाबी संरक्षण पाहून कृतज्ञतेनं नतमस्तक व्हावं अशीच ती परिस्थिती होती. जणू नामदेवांना गुरूगोविंदसिंगांनी संरक्षण दिलं होतं.
संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी मात्र सगळ्यांना एकच वेध लागले, ते म्हणजे अमृतसरचं सुवर्णमंदिर व वाघा बॉर्डर बघण्याचे. घनश्याम पाटील, सागर सुरवसे, समीर नेर्लेकर व तुषार उथळे पाटील ‘चपराक’च्या ग्रंथ विक्री दालनात पाय रोवून उभे होते. त्यांना तिथून हलता येणं शक्यच नव्हतं. मात्र त्यांनी आम्हाला अडवलं नाही. हा त्यांचा मोठेपणा होता. जगबीरसिंग हा लष्करात 15 वर्षे सेवा केलेला जवान. अत्यंत नेक! त्याच्या ओळखीनं सकाळीच आम्ही एक जीप केली व लेखक प्रभाकर तुंगार, कवी शांताराम डफळ, ‘ओडर संदेश’चे संपादक अमर कुसाळकर, कवयित्री मंजिरी पाटील, पत्रकार प्रज्ञा कांबळे, मुकुंद वाघमोडे, अनिल ढमाळ, कवी संदिपान पवार व मी सरळ अमृतसर गाठलं. तिथल्या वाहनतळापासून आम्ही सायकल रिक्षा केल्या व सुवर्ण मंदिराजवळ पोहोचलो. या देशात कुठंही फिरा एक गोष्ट जाणवते, माणसांचा पोटापाण्यासाठी प्रचंड संघर्ष चालू असतो. सायकल रिक्षा हे एक उदाहरण. असो. तर सुवर्णमंदिराच्या आवारात आम्ही पाऊल ठेवलं. केवढंभव्य आवार! व हजारो भाविकांची गर्दी! इतकी गर्दी का तर कुणीतरी म्हणालं, चैत्र पौर्णिमा आहे म्हणून! या हजारोंच्या गर्दीत आम्ही शिरलो ते अकाल तख्तापुढं नतमस्तक होण्यासाठी! चहूबाजूंनी पाण्याचं प्रचंड तळं व मध्ये सुवर्णमंदिर असं ते शीखांचं सर्वात पवित्र धर्मपीठ! रांगेत किती तास उभे असू आम्ही, तर तब्बल अडीच तास! मात्र सुवर्णमंदिरात आल्याचं समाधान मोठं होतं. ऐंशीच्या दशकात खलिस्थानवाद्यांनी पंजाबला भारतापासून तोडायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी आपला तळ कुठे ठोकला तर याच सुवर्णमंदिरात! किती दुर्दैव! देश संकटात होता तेव्हा मात्र, इंदिरा गांधींनी लष्करी कारवाई केली. त्या कारवाईत अनेक खलिस्थानवादी अतिरेकी याच सुवर्णमंदिरात मारले गेले. 1984 चा जून महिना होता तो. तेव्हा लष्करप्रमुख अरूणकुमार वैद्य होते. देशाच्या ऐक्यासाठी अनेक पंजाबी जवानांनी देखील या खलिस्थानविरोधी कारवाईत भाग घेतला. यात अनेक शीख व पंजाबी जवानांचेदेखील बळी पडले हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे याचा सूड म्हणून खलिस्थानवाद्यांनी इंदिरा गांधी व अरूणकुमार वैद्यांना मारलं. पुन्हा इंदिराजींच्या हत्येचा सूड म्हणून दिल्लीत शेकडो शीख बांधवांना मारण्यात आलं. हा दुर्दैवी इतिहास सुवर्णमंदिर पाहताना समोर उभा राहतो; मात्र जाणवत राहते ती एक गोष्ट. आता या सर्व कटू आठवणी खूप मागे पडल्या आहेत. अधूनमधून त्या डोकं वर काढतात. मात्र त्या अनुभवातून देश खूप काही शिकला आहे. एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. पंजाब जेव्हा जळत होता त्यावेळी संजय नहार नावाचा एक महाराष्ट्रीय तरूण तेव्हा अनेक मराठी तरूणांना हाताशी धरत होता. त्यांना घेऊन पंजाबात जात होता. शांततेचा संदेश देत होता. तोच तरूण नंतर अनेक वर्षांनी या घुमान येथील संमेलनाचा प्रमुख सुत्रधार व संयोजक झाला. कालाय तस्मै नम:!
सुवर्णमंदिरातच आम्ही लंगर म्हणजे दुपारचं भोजन घेतलं. भोजनगृहात एकाचवेळी शेकडो भाविकांच्या भोजनाची सोय होती. नंतर सरळ वाघा बॉर्डरकडे निघालो. बॉर्डरवर पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होेती. अमृतसर ते वाघा बॉर्डर हे अंतर साधारण चाळीस किलोमीटर असावं. वाघा बॉर्डरवरही तुफान गर्दी होती. अनेकांची बेशिस्त मात्र बघवत नव्हती. ही बेशिस्त पाहून बॉर्डरवरच्या लष्करी अधिकार्‍यांनाही संताप येत होता. प्रत्येकाला संध्याकाळचं सीमेवरचं ते विशिष्ट लष्करी संचलन पहायचं होतं. त्यासाठी नुसती रेटारेटी व धक्काबुक्की! बॉर्डरच्या दिशेनं चालत निघताना अचानक माझ्या एक लक्षात आलं, गाडीचा चालक जगजितसिंग सकाळपासून उपाशीच आहे. मी शंभर रूपये त्याच्या हातात ठेवले. म्हटलं,‘‘सुबह से कुछ खाया नही आपने. कुछ खालो.’’ तर तो गहिवरून गेला. जगजित हा घुमान जवळच असलेल्या बलिहार गावचा.
बॉर्डरवरचं ते संचलन आम्ही पाहिलं. ‘फ्रीडम ऍट मिडनाईट’, ‘फाळणी-युगांतापूर्वीचा सूर्यास्त’ ही फाळणीवरची पुस्तके वाचली होती. शेषराव मोर्‍यांचा ‘गांधी आणि कॉंग्रेसने अखंड भारत का नाकारला?‘ हा ग्रंथही संग्रही होताच. फाळणीचा सगळा इतिहास समोर उभा राहिला. समोरच्या पाकिस्तानच्या चेकपोस्टवर बॅरिस्टर महंमदअली जीनाचा फोटो झळकत होता. कुणीतरी म्हटलं, ‘‘आपल्या चेकपोस्टवर कुणाचा फोटो असेल?’’ ‘‘बहुधा महात्मा गांधींचा असेल.’’ मी अंदाजाने म्हणालो. कारण प्रचंड गर्दीमुळं आपलं चेकपोस्ट बाहेरून दिसणं शक्यच नव्हतं. तरी एक सत्य होतंच, गांधीजींना जग आजही आदरानं ओळखतं व बॅ. जीनाला त्याच्या देशातही पुरेशी ओळख नाही. इकडे स्टॉलवर पुस्तकांच्या विक्रीत गढून गेलेले असतानाही घनश्याम पाटलांना आमची काळजी होती. त्यांचे दोनदा फोन आले. शेवटी आम्ही परतीकडे निघालो तेवढ्यात डफळांनी प्रस्ताव ठेवला, ‘‘कुठेतरी ढाब्यावर जेवूया’’. सगळ्यांनी ती सूचना उचलून धरली. पोटात कावळे ओरडत होतेच, शिवाय पंजाबी ढाबा म्हणताच ते अधिकच ओरडू लागले. जगजितसिंगला म्हटलं, ‘‘एक अच्छा ढाबा देखो!’’ त्यानं एका चांगल्या ढाब्यापुढं गाडी थांबवली. गरमागरम तंदूर रोटी, दालफ्राय, कांदा, लोणचं असं सगळं पुढ्यात आलं. जगजितसिंगला शेजारीच जेवायला बसवलं व आग्रह करून वाढलंदेखील. तो संकोचत होता, पण मनातून सुखावला होता. ढाब्यातून बाहेर पडताना त्यानं आग्रह केला, ‘‘आप सबको मेरे घर चाय पीने अभी आना पडेगा.’’ घुमानपासून जवळच होतं त्याचं गाव. रात्री साडेदहा वाजता त्यानं त्याच्या घरापुढं गाडी उभी केली. सगळं घर आम्हाला पाहून खूश! त्याचा भाऊ, भावजय, आई, बहिणी सगळे खूश झाले. चहा बिस्किटं झाली. गप्पा झाल्या. सगळ्या कुटुंबाबरोबर फोटोसेशन झालं. नंतर घुमान बाहेरील मुक्कामाच्या ठिकाणी जगजितसिंगनं आम्हाला सोडलं, तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले असावेत. जगजितच्या कुटुंबाचा निरोप घेतला तेव्हा सगळं कुटुंब निरोप द्यायला घराबाहेर आलं होतं.
एक सांगायचं राहून गेलं. सुवर्णमंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही जालियनवाला बागेत गेलो. ही बाग सुवर्णमंदिरापासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावर आहे. लहानपणापासून इतिहासात जालियनवाला बागेबद्दल वाचत होतो. आज प्रत्यक्ष तिथं जायचा योग आला. दि. 13 एप्रिल 1919. या दिवशी या बागेत स्थानिक लोकांची सभा भरली होती. बैसाखीचा दिवस होता तो. हा दिवस म्हणजे शीखांचा नववर्षदिन. लोेकानी जमावबंदीचा आदेश मोेडला म्हणून  जनरल डायरनं बागेतील सभेवर याच दिवशी गोळीबार केला. दुपारी सव्वाचारची ती वेळ होती. या गोळीबारात 371 जण मारले गेले. बागेत मृतदेहांचा खच पडला. लोकांनी घाबरून बागेतील विहिरीत उड्या टाकल्या. ती विहीर आजही बागेत आहे. शेकडो जखमी झाले. कित्येकांचे अवयव तुटून पडले. डोळे बाहेर आले. शरीरातले अवयव बाहेर आले. इतक्या नीच पातळीचं हे हत्याकांड होतं. ब्रिटिशांचा साम्राज्यवाद काय लायकीचा होता हे जाणून घ्यायचं असेल त्यानं हा इतिहास वाचावा आणि आयुष्यात एकदा तरी या बागेला भेट द्यावी. इतिहास असं सांगतो, त्यावेळी सभेत पंचवीस हजार माणसं होती. मृतांमध्ये 41 मुले आढळून आली व एक मृत बालक तर सहा आठवड्यांचं होतं. काही वस्तू तिथं आजही जतन करून ठेवल्या आहेत. त्यात एक नाणं आहे. एका व्यक्तिच्या खिशातील त्या नाण्याचा गोळीनं टवका उडाला व तेवढा भाग जळून गेला. ते जळकं नाणं ब्रिटिश साम्राज्यवादाचा खरा इतिहास सांगतं. खरी छायाचित्रेही आहेत तिथं. त्यात अर्धनग्न माणसांच्या पार्श्‍वभागावर चाबूक मारणारे शिपाई दिसतात. पुढं दि. 17 डिसेंबर 1928 साली भगतसिंगांनी लाहोरमध्ये ब्रिटिश अधिकारी सँडर्सवर लागोपाठ आठ गोळ्या झाडल्या. त्यामागं जो राग होता तो जालियनवाला बाग येथील हत्याकांडाचा होता. अमृतसरमध्ये त्याकाळात घडत असलेल्या अत्याचारांचा होता. सध्या भालचंद्र नेमाडेंनी केलेली देशीवादाची मांडणी अभ्यासतो आहे. साम्राज्यवादाच्या याच राक्षसी प्रवृत्तीवर नेमाडे सगळ्या बौद्धिक ताकदीनिशी तुटून पडल्याचं क्षणोक्षणी जाणवतं. या साम्राज्यवादानं आपल्या भाषा, साहित्य, अर्थकारण, संस्कृती, राजकारण, सामाजिक व राजकीय ऐक्य या सगळ्यांचीच वाट लावली आहे, असं ते सांगतात. हे गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजीचं आक्रमण रोखण्याचा उपाय ते सांगतात. अफूवर बंदी आहे तशी इंग्रजी शाळांवर घाला असं ते म्हणतात. यामागं त्यांच्या अभ्यासाची प्रदीर्घ बैठक आहे. मात्र आपल्याकडे विचारवंतांची दखल घेतली जात नाही व मूळ प्रश्‍न अधिकाधिक चिघळत जातात. त्यामुळंच दाभोलकर व पानसरेंच्या हत्येमागं परकीय शक्तींचे हात असू शकतात, असं ते जे सांगतात त्याकडेही फारसं गांभीर्याने कुणी पाहत नाही. परकीय शक्ती असं म्हणताना त्यांनी लिबिया व इजिप्तमध्ये अमेरिकेने घडवून आणलेल्या उत्पाताकडे बोट दाखवलं आहे हे विशेष. असो.
दिनांक 5 एप्रिल. सकाळी 11 ची वेळ. मुख्य सभामंडपात एका मोठ्या माणसाची मुलाखत होती. भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी. शांताराम डफळ, मंजिरी पाटील व मी या मुलाखतीला गेलो. अरूण जाखडे व सुषमा करोगल हे मुलाखतकार होते. जाखडे काही प्रश्‍न विचारत होते. मात्र त्यांची देहबोली मरगळल्यासारखी होती. खणखणीतपणे प्रश्‍न विचारावेत व मुलाखतीत जान आणावी हा प्रकारच नाही. त्यांचं प्रश्‍न विचारणं म्हणजे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणं होतं! तर सुषमा करोगल या प्रश्‍न विचारतच नव्हत्या. माईक समोर केला की त्या सरळ भाषणच सुरू करायच्या. त्यामुळं या मुलाखतीचा बराच चुथडा झाला. शेवटी गणेश देवींनीच काही अप्रतिम मुद्दे मांडत उत्तम वैचारिक प्रबोधन केलं. वसाहतवाद व जागतिकीकरणामुळं जगातील व आपल्या देशातील अनेक भाषा मरत आहेत, हा त्यांचा प्रमुख युक्तिवाद होता. इथं मात्र जाखडेंनी देवी यांची तुलना भालचंद्र नेमाडेंशी केली. नेमाडेंचा देशीवाद व देवींचं भाषाविषयक काम यात साम्य असल्याचं सांगितलं. यावरचं देवींचं उत्तर मार्मिक होतं, ‘‘नेमाडे हे खूप महान आहेत. मी आदीवासींसाठी काम करतो, ते करत नाहीत. मी उपेक्षित घटकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरतो, ते उतरत नाहीत; पण मी महान कादंबर्‍या लिहित नाही.’’ देवी हा खरोखर बाप माणूस! त्यांना आता भारतासह जगभरातील सर्वच भाषांचं सर्वेक्षण करायचं आहे. मुलाखतीत देवी यांच्या अत्यंत नम्र असण्याचा मुद्दा सुषमा करोगल यांनी मांडला. यावर देवींची प्रतिक्रिया होती, ‘‘जन्माला येताना कुणी राजा नसतो वा रंक नसतो. राजा वा रंक असणं हा आपला भ्रम असतो. मग भ्रमाला किती महत्त्व द्यायचं?’’ हे उत्तर थक्क करणारं होतं. ‘‘किती जमिनीवर आहे हा माणूस?’’ मी शेजारी बसलेल्या मंजिरी पाटलांना म्हणालो. ‘‘विद्या विनयेनं शोभते’’ त्या म्हणाल्या. मी पुन्हा अवाक् आणि थक्क!
जवळच्या काकासाहेब गाडगीळ सभागृहात एक परिसंवाद होता. त्यालाही आम्ही गेलो. ‘आधुुनिक तंत्रज्ञान व मुद्रित साहित्याचे भवितव्य‘ असा विषय. मात्र प्रत्येकजण माईकपुढं येऊन निबंध वाचल्यासारखे आपले मुद्दे वाचू लागला. एक महत्त्वाचा विषय त्यामुळे कंटाळवाणा झाला. तरीही काही हाताशी लागलंच. उदा. ‘पुस्तक वाचताना जी एकाग्रता साधली जाते ती इंटरनेटवर साधली जाईल असं वाटत नाही. पुस्तकाचं एकेक पान उलटून वाचण्यात सुख आहे. पुस्तकाला आपण स्पर्श करण्यातलं सुख महत्त्वाचं!’, असं माधव चौसाळकर म्हणाले. असं जे वेचता येईल ते आम्ही वेचत होतो.
शेवटी समारोपाचा क्षण जवळ आला. दुपारी 4 च्या आसपास सगळा मंडप भरून गेला. शीख बांधवांनी गर्दी केलीच होती. या गर्दीमागं प्रेम व उत्सुकता होती. प्रकाश पायगुडे यांनी ठराव वाचन केलं. घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे बरेच ठराव त्यांनी मांडले. ‘घुमानचं नाव नामदेवनगरी घुमान करावं’ असाही एक ठराव होता. या सगळ्यात प्रत्येक संमेलनात मांडला जाणारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा ठराव मात्र महामंडळानं मांडला नाही. ही घोडचूक म्हटली पाहिजे. मध्यंतरी एक नाट्यकलावंत बेळगावात गेला व ‘सीमाप्रश्‍न तुमचा तुम्ही सोडवा’ असं म्हणाला. त्या बेवड्याला सीमाप्रश्‍न किती कळला होता हाच प्रश्‍न आहे. मात्र महामंडळानं सीमाप्रश्‍नाकडं दुर्लक्ष का करावं? उद्या काश्मीरमध्ये संमेलन झालं तरी, सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडलाच गेला पाहिजे. कानडी पोलिसांनी येल्लूरच्या गावकर्‍यांना मध्यंतरी जनावरासारखं मारलं. ती घटना आपण एवढ्यात विसरलो की काय? निदान त्या अत्याचाराचा निषेध करणारा ठराव मांडायला काय हरकत होती? सीमावासीयांचं मनोबल त्यामुळे वाढलं असतं, पण आपण सगळे सीमावासीयांचं खच्चीकरण करण्यात फार सराईत झालो आहोत. त्याबाबतीत आपण घरच्या म्हातारीचे काळ आहोत पक्के! शरद पवारांच्या उद्धाटनाच्या भाषणात मुंबईतल्या कमी होत जाणार्‍या मराठी माणसांच्या टक्केवारीचा मुद्दा होता. ‘मुंबईत अवघी बावीस टक्के मराठी माणसे उरली आहेत’ असं ते म्हणाले. ही सगळी आपल्या पायाखाली जळणारी दुखणी आहेत. स्वत: डॉ. मोरेंचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा व सीमाप्रश्‍नाचा विलक्षण अभ्यास आहे. तरीही सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडला गेला नाही, याचं दु:ख झालं. आतातर कानडी सत्ताधार्‍यांनी सीमाभागात पहिलीपासून कानडी सक्तीची केली आहे. आपला हा वाद कानडी जनतेशी नाही तर, कानडी सत्ताधार्‍यांशी आहे व या प्रश्‍नाकडे गांभीर्यानंच पाहिलं पाहिजे.
समारोप सत्रात अनेकांची भाषणं झाली. माजी लष्करप्रमुख जोगिंदरसिंग, पत्रकार जतिंदर पन्नू, महाराष्ट्राचे  सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, डॉ. सदानंद मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू असे वक्ते होते. एक प्रभू सोडले तर सगळ्यांची भाषणं समयोचित व चांगली झाली. संत नामदेवांच्या नावानं महाराष्ट्र सरकारने पुरस्कार सुरू करावा व तो दरवर्षी महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकाला द्यावा, अशी सूचना सदानंद मोरे यांनी केली. ती अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. सगळ्या भारतीय भाषांना एका सूत्रात जोडणारी व राष्ट्रीय ऐक्याला बळकट करणारी ही सूचना सरकारनं त्वरित अंमलात आणायला हवी.
सूत्रसंचालन करणारी गौरी देशमुख-दामलेनं अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत अप्रतिम सूत्रसंचालन केलं. शेवटी राष्ट्रगीत झालं व सांगता झाली. त्याक्षणी नाही म्हटलं तरी मनात कालवाकालव झाली. पंजाबी माणसाचं प्रेम, मनाचा मोठेपणा याला तोड नव्हती. ते प्रेम मनात साठवत परतायचं होतं. संमेलनस्थळी जेवणाची सोय केवळ अप्रतिम होती. तिथं जेवण घेतलं तेव्हा रात्रीचे साडेआठ-नऊ वाजले असावेत. तिथून मुक्कामस्थळी आलो. आवराआवर केली. बियास स्टेशनवर आम्हाला सोडायला पंजाब सरकारच्या बसेस होत्याच. रात्री रेल्वेत बसलो तेव्हा बरोबर अनेक आठवणी होत्या. रात्री शांत झोप लागली. मनात दोन गोष्टी होत्या. हुरहुर व समाधान. सकाळी डब्यात पुन्हा काव्यशास्त्रविनोदाच्या मैफिली सुरू झाल्या. एका स्टेशनवर मी हरिवंशराय बच्चन यांचं ‘मधुशाला’ घेतलं. आम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमचा काव्यसंग्रह घ्यायचा होता, पण स्टेशनच्या कुठल्याच बूकस्टॉलवर तो मिळाला नाही. हिंदी भाषिक पट्ट्यात त्यांचा एकही काव्यसंग्रह मिळू नये, खरं तर ही शोकांतिकाच म्हणावी, पण आम्ही ती कसर भरून काढायचा प्रयत्न केला. समीर नेर्लेकर व शांताराम डफळ यांनी ‘मधुशाला’ व ‘तुही यंता कंची’ या नामदेव ढसाळांच्या काव्यसंग्रहाचं अप्रतिम काव्यवाचन केलं. घनश्याम पाटलांनी पत्रकारितेत आलेले भन्नाट अनुभव सांगितले. हसता हसता पुरेवाट झाली. सागर सुरवसे यांनी कळस केला. त्यांच्या एका किस्स्यावर आम्ही असे खदाखदा हसायला लागलो की, शेजारच्या बर्थमधून निरोप आला, ‘जरा हळू हसा’. जोडीला मंजिरी पाटलांची बहारदार गीतं. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे...’ व ‘तुने ओ रंगिले ऐसा जादू किया, पिया पिया बोले मतवाला जिया...’ ही गीतं त्यांनी गायली. तेव्हा मनात काहूर व डोळ्यात अश्रू अशी अवस्था झाली. एक धडा मिळाला होता. आनंदानं जगायला पैसा, प्रतिष्ठा काहीही लागत नाही. लागते ती कलंदर वृत्ती! प्रेम! हे सगळे धडे आम्हाला अतिशय उत्साहानं शिकवणारा एक कलंदर माणूस होता. त्याचं नाव घनश्याम पाटील.
सरतेशेवटी डॉ. सदानंद मोरे यांचं एक वाक्यही मनात साद घालत राहिलं, ‘‘रिकामटेकड्यांनी बरंच काही

साध्य केलं! रिकामटेकड्यांनी बरंच काही साध्य केलं!!’’
पुणे रेल्वे स्थानकावरून निघताना 'चपराक'चे सदस्य आणि इतर
* 'साहित्य चपराक' मे २०१५ मधील लेख 
- महेश मांगले (मुक्त पत्रकार आणि समीक्षक)
९८२२०७०७८५

Monday, April 20, 2015

सत्तेतून संघर्षाकडे!

कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिला यशस्वी व्हायला काय लागतं?
त्यासाठी त्या क्षेत्रातील गरजेपुरती अक्कल आणि थोडासा अनुभव लागतो.
ही अक्कल आणि अनुभव कशाने मिळते?
ती मिळते, तो करत असलेल्या कामातील यश आणि मुख्यत: अपयशाने!
लोकसभा निवडणुकीत दणकून आपटल्यानंतर मोठे अपयश पदरी पडले आणि कॉंग्रेसचे तथाकथित युवराज राहुल गांधी अनुभवाचे धनी ठरले.
ज्याच्या ठायी अनुभव आहे आणि त्या अनुभवातून काहीतरी शिकण्याऐवढी प्रज्ञा आहे तो यशस्वी होतोच.
आपल्या अपयशाचे चिंतन करण्यासाठी राहुलबाबांनी देश सोडला आणि तब्बल 57 दिवस विदेशात जाऊन विपश्यनेचे धडे घेतले. शौर्य आणि शांतीची परंपरा प्रस्थापित करणार्‍या हिंदुस्थानात राहुन आत्मपरीक्षण करण्याऐवजी परदेशी जाऊन त्यांनी मौन बाळगणे सोयीस्कर समजले. संसदेत महत्त्वाचे निर्णय घेतले जात असताना, एक प्रभावी विरोधक म्हणून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची संधी असताना राहुल गांधी देशाबाहेर गेले. ते नेमके कुठे गेले याचे कॉंग्रेसने किंवा राहुल यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्टीकरण दिले नसले तरी, ते विपश्यनेत मग्न होेते, हे मात्र ठामपणे सांगण्यात येत आहे.
युवा अवस्थेनंतर गृहस्थी जीवनात पदार्पण करण्याऐवजी राहुल यांच्यावर साधनेत व्यग्र राहण्याची वेळ आली आहे. संन्यास स्वीकारण्याऐवढी बौद्धिक प्रबळता त्यांच्यात नसली तरी पराभवाच्या अनुभवातून ते तावून सुलाखून निघाले आहेत. विदेशी आईच्या पोटी जन्म घेतलेल्या या स्वदेशी बाळाने देशाच्या राजकारणाचा अभ्यास पुन्हा एकदा गंभीरपणे सुरू केला आहे. सत्तावन्न दिवसाच्या अज्ञातवासानंतर ते हिंदुस्थानात परतले आणि त्यानंतर त्यांनी रामलीला मैदानावर शेतकर्‍यांचा भव्य मेळावा घेतला.
राहुल गांधी यांचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात ही सत्तेत सहभागी होण्यापासूनच झाली आहे. सलग दहा वर्षे देशावर राज्य करताना त्यांनी आपल्या बापजाद्यांचा इतिहास अभ्यासला नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सत्ता हे राहुल यांचे जसे सामर्थ्य आहे तसेच तीच त्यांची मर्यादाही आहे. विरोधी पक्षाच्या कामकाजाचा मात्र त्यांना यत्किंचितही अनुभव नाही. सत्तेत दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी दोन महिने स्वत:च्या सिद्धतेसाठी दिले. आता ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीय होत आहेत.
राहुल यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला असला तरी ते स्वत: मात्र खासदार म्हणून निवडून आले आहेत. विपश्यनेसाठी सर्व शासकीय कर्मचार्‍यांना पगारी सुट्टी मिळते. या सुविधेचा लाभ घेत राहुल यांनी दोन महिन्यांची सुट्टी काढली. दरम्यान सोनिया गांधी यांना ‘राहुल कुठे आहेत?’ असे विचारल्यानंतर त्या मौन बाळगायच्या. कॉंग्रेसचे अन्य महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांनाही राहुल यांच्या बेपत्ता होण्याची खबर नव्हती. त्यावेळी वैतागलेल्या सोनिया यांनी ‘राहुल लवकरच पुन्हा देशाच्या राजकारणात सक्रीय होतील’, असे जाहीर केले आणि प्रसारमाध्यमांनी त्यांचा चिवचिवाट बंद केला. ‘राहुल पुन्हा सक्रीय होतील’ म्हणजेच निवडणुकीनंतर ते ‘निष्क्रीय’ होते, हे खुद्द पक्षाध्यक्षांनीच जाहीर करूनही त्याच्या बातम्या देण्याचे शहाणपणही माध्यमांनी दाखवले नाही. असो.
सोनियाजींच्या म्हणण्यानुसार त्यांचे सुपुत्र राहुल आता पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करण्याची त्यांची तयारी आहे. काही फासे उलटे पडल्याने रथारूढ नेते आता जमिनीवर आहेत. जमिनीवर असताना त्यांनी जमिनीचेच शस्त्र केले आहे. गेल्या अकरा महिन्यात मोदीशेठचा सुसाट सुटलेला वारू रोखण्यासाठी त्यांनी भूमिअधिग्रहण कायद्याचा आधार घेतला आहे. कॉंग्रेसवाले ज्याप्रमाणे उद्योजकांना हाताशी धरायचे तीच रीत मोदींनी सुरू ठेवली आहे. ‘उद्योजक खुश तर सरकार स्थिर’ हे सर्वमान्य सत्य आहे.
मोदीशेठ आणि कॉंग्रेस यांच्यात उद्योजकांच्या लांगुलचालनाचे साम्य असले तरी दोघांचे रस्ते मात्र भिन्न आहेत. कॉंग्रेसकडे सत्तेतून आलेली अक्कल होती. मोदी त्यादृष्टिने बरेच नवखे आहेत. देश चालवणे म्हणजे गुजरातसारखे छोटे राज्य चालवण्याऐवढे सोपे नाही, हे कळण्याची त्यांची ही पहिली पायरी आहे. सत्तेच्या उन्मादातून बाहेर पडल्यानंतर आता कुठे ते वास्तवाला सामोरे जात आहेत.
कॉंग्रेसवाले उद्योजकांचे हीत पाहत असले तरी, गरीबांविषयी आपल्याला किती कळवळा आहे हे दाखवून द्यायचे. सत्ताधार्‍यांना असा बेमालुम अभिनय जमायला हवा. मोदींना अजूनतरी नाटकी अभिनय जमत नाही. त्यामुळे निवडणुकीत उद्योजकांनी केलेल्या मदतीची परतफेड करताना ते शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचे चित्र कॉंग्रेसवाले निर्माण करत आहेत. अनेक दुबळ्या राजकीय पक्षांच्या कुबड्या हाती असल्याने कॉंग्रेसने देशावर इतकी वर्षे राज्य केले. त्यामुळे त्या धुंदीत असलेल्या कॉंग्रेसजनांना विरोध म्हणून लोकानी भाजपला मतदान केले. कॉंग्रेसची हीच धुंदी मोदी यांच्यातही दिसून येते. त्यांच्याकडे भलेही ‘कुबड्या’ नसतील मात्र स्वत:ची ‘हिटलरशाही’ ही प्रतिमाही ते खोडून काढू शकले नाहीत. हिंदुस्थानासारख्या बलाढ्य लोकशाही राष्ट्रात ‘हिटलर’ला फारसे कुणी जुमानणार नाही.
या राष्ट्रातली जमीन कुणाची? कष्टकर्‍यांची, शेतकर्‍यांची की उद्योजकांची? असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. एकही पायरी न चुकवता ज्याचे गणित बरोबर येईल तो देशावर राज्य करेल. मोदी यांची स्वत:च्याच अडेलतट्टू वृत्तीमुळे कोंडी झालेली आहे. ते अशाप्रसंगी आपली मूळ प्रवृत्ती बाजुला ठेवून सर्वसमावेशक भूमिका घेतात की, कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या आरोपांना बळी पडतात ते लवकरच कळेल. विपश्यनेच्या साधनेतून बाहेर पडल्यानंतर राहुल यांचा आवाज मात्र आणखी बुलंद झाल्यासारखा वाटतोय. पराभवाचे खापर त्यांच्या माथी फुटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा व्युहनीति आखण्यास सुरूवात केलेली आहे. फेसबुक, ट्वीटर, ब्लॉग अशा समाजमाध्यमाद्वारे मोदी भक्तांनी कितीही घंटा बडवल्या आणि मोदी नामाचा गजर केला तरी सत्यापासून आपल्याला फारकत घेता येणार नाही. सत्ताधार्‍यांविषयी त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल लोकाच्या मनात राग हा असतोच. तो राग व्यक्त करणे, उफाळून येणे आणि सत्तेचा कायापालट होणे हे चक्र कायम सुरू असते. हा राग व्यक्त करण्यात राहुल गांधी त्यांच्या नव्या चमूसह कितपत यशस्वी होतात आणि मोदीशेठ तो राग कशा पद्धतीने थोपवतात यावर राष्ट्राची पुढील दशा आणि दिशा ठरणार आहे.   


- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक'
७०५७२९२०९२

Saturday, April 11, 2015

पंजाब हिरो; महामंडळ झिरो!

केंद्रीय पर्यटन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'चपराक'च्या दालनाला आवर्जून भेट दिली.


सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने 'चपराक'ची पुस्तके पाहताना



संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. पंजाबी बांधवांकडून झालेले जोरदार स्वागत, उत्तम आदरातिथ्य, चोख व्यवस्था, खाण्यापिण्याची चंगळ यामुळे साहित्य रसिक भारावून गेले. आयोजन आणि नियोजनात कसलीही कमतरता नसल्याने मराठी रसिकांसाठी हे संमेलन संस्मरणीय ठरले; मात्र वशिल्याच्या तट्टूमुळे एकाहून एक सुमार, रद्दड साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याने या संमेलनातून मराठी भाषेला नक्की काय मिळाले? हा मात्र प्रश्‍नच आहे.
घुमानला साहित्य संमेलन झाल्याने संत नामदेवांच्या कार्याला निश्‍चितपणे उजाळा मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावी असे कार्य त्यांनी उभे केले आहे. आपल्या करंटेपणामुळे आपणास त्यांचा विसर पडत चालला असला तरी पंजाबी बांधव मात्र त्यांना देवाप्रमाणेच श्रेष्ठ मानतात. त्याकाळात संत नामदेवांनी जे काम उभे केले त्या बळावर आता मराठी माणसे मिरवून घेत आहेत. यानिमित्ताने का होईना महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्ये एकमेकांच्या जवळ आली आहेत. या दोन्ही राज्यात ऐक्य साधण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
पुण्यापासून जवळपास दोन हजार किलोमिटर अंतरावर हे संमेलन होत असल्याने प्रकाशक परिषदेने या संमेलनावर बहिष्कार टाकला होता. ‘चपराक’सारख्या स्वाभिमानी बाण्याच्या आणि कणखर संस्थांनी या बहिष्काराला भीक घातली नाही. ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी साहित्य संमेलन झाले आणि तिकडे मराठी रसिक येणार असतील तर आम्ही आनंदाने आणि अभिमानाने संमेलनाला जाणार! धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा, अशी आमची भूमिका आहे’ असे ‘चपराक’ने जाहीर करताच मराठी रसिकांनी ‘चपराक’ला अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘एकही मराठी प्रकाशक संमेलनाला जाणार नाही’ अशी अडेलतट्टूची भूमिका घेतलेल्या प्रकाशक परिषदेची हवाच निघून गेली आणि त्यांनी त्यांची भूमिका सौम्य केली. या सर्व पाश्‍वर्र्भूमिवर ‘घुमानसारख्या अमराठी भागात ‘चपराक’ची पुस्तके विकली जाणार नाहीत’ असे भाकीत या क्षेत्रातील डुढ्ढाचार्यांनी केले. मात्र मराठी वाचकांच्या उदंड प्रेमामुळे त्यांचा हा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि ‘चपराक’च्या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री झाली.
घुमान येथील ‘चपराक’च्या पुस्तक विक्री दालनाला पंजाब, हिमाचलप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटकातील बेळगावपासून बिदर-भालकीपर्यंत तसेच दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात येथील मराठी बांधवांनी आवर्जून भेट दिली. या राज्यातील लेखकांचे त्यांच्या मातृभाषेतील आणि हिंदीतील साहित्य ‘चपराक’च्या माध्यमातून मराठीत यावे अशी अपेक्षा यावेळी येथील लेखक आणि विचारवंतांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही पुढाकार घ्यायचा ठरविला असून हिंदुस्थानातील भाषिक ऐक्य साधण्यात ‘चपराक’ निश्‍चितपणे खारीचा वाटा उचलेल.
एक एप्रिलला पहाटे पाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर ‘रिपोर्टिंग’ करायचे असल्याने चार-साडेचार पासून राज्यभरातून साहित्य रसिक स्थानकावर जमले होते. पुण्याच्या महापौर-उपमहापौरांसह अनेकजण या साहित्ययात्रींना शुभेच्छा देण्यासाठी तेथे आले होते. मात्र अर्धा तास-तास असे करत रेल्वे तब्बल पाच तास उशीरा आली आणि अनेकांचा संयम सुटला. अनेकांना महामंडळाचे हे ‘एप्रिल फूल’ वाटले. रेल्वेची वेळ आपल्या हातात नसली तरी महामंडळाचा एकही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. पुढचे नियोजन काय यासंदर्भात कोणालाही निश्‍चितपणे काही सांगता येत नव्हते. मात्र एकदाची रेल्वे आली आणि पुढचा प्रवास अत्यंत सुखद झाला. साहित्यिकांसाठी ही विशेष रेल्वे असल्याने अन्य गाड्यांचा वेळ साधत या गाडीला मार्ग काढावा लागत होता; मात्र ‘राजधानी एक्सप्रेस’प्रमाणे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने हा प्रवास कुणालाही कंटाळवाणा वाटला नाही.

सुप्रसिद्ध कथाकार डॉ. भास्कर बडे आणि त्यांचे सहकारी. 

 पुण्यातून गाडी सुटल्यानंतर ‘चपराक प्रकाशन’च्या पुढाकाराने रेल्वेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सलग सहा तास कवी संमेलनाचा विक्रम आम्ही केला. ‘चपराक‘ परिवाराचे सदस्य समीर नेर्लेकर, शांताराम डफळ, सागर सुरवसे, तुषार उथळे पाटील यांनी सूत्रे हाती घेऊन सर्वांचे रंजन केले. त्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर तुंगार, समीक्षक आणि मुक्त पत्रकार महेश मांगले, ‘ओडर संदेश’चे संपादक अमर कुसाळकर यांनी आणखी बहार आणली. या डब्यात ‘तरूण भारत‘चे पुणे विभागीय संपादक प्रशांत चव्हाण, ज्येष्ठ कवी मनोहर सोनवणे, बारामतीचे कवी हणुमंत चांदगुडे, सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी आदींनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई प्रकाश आमटे यांच्या भगिनी श्यामा देशपांडे यांची मुलाखत, प्रभाकर तुंगार यांनी सांगितलेल्या विनोदमूर्ती वसंत शिंदे यांच्या आठवणी, ‘दखलपात्र’, ‘झुळूक आणि झळा’, ‘एमरल्ड ग्रीन‘ या पुस्तकांचे अभिवाचन, समीर नेर्लेकर यांनी केलेले ‘मधुशाला’चे वाचन, नामदेव ढसाळांच्या कविता असे अनेक कार्यक्रम झाल्याने पुणे ते घुमान आणि घुमान ते पुणे अशा प्रवासातच आमचे खर्‍याअर्थी संमेलन रंगले.
पुण्याहून निघालेल्या गाडीला तब्बल पाच तास उशीर झाल्याने पुढील सर्व कार्यक्रम लांबले. बियासपूरला उतरल्यानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी गेले. मात्र आम्ही थेट संमेलन स्थळ गाठून ‘चपराक प्रकाशन‘चे पुस्तक विक्रीचे दालन ताब्यात घेतले. पुस्तकांची मांडणी केली आणि काय आश्‍चर्य! ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होण्यापूर्वी पहिल्या तासाभरात 18 पुस्तके विकली गेली. नंतर औपचारिक उद्घाटन झाले आणि साहित्य रसिकांची पुस्तके विकत घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. महाराष्ट्रभरातून आलेले रसिक ‘चपराक’च्या दालनाला मुद्दाम भेट देत होते. ‘चपराक’च्या परखड आणि प्रामाणिक भूमिकेबद्दल कौतुक करत होते. पुस्तकांचे संच विकत घेत होते.
ग्रंथ प्रदर्शनात मोजकेच प्रकाशक सहभागी झाल्याने ‘चपराक’ हाच संमेलनातील चर्चेचा विषय होता. प्रसारमाध्यमांनीही एव्हाना ही बातमी सर्वत्र पोहोचवली होती. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आयोजक भारत देसडला, कवी रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, नामवंत अभिनेते संजय मोने आदींनी ‘चपराक’च्या दालनाला सदिच्छा भेट दिली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांना मात्र नट्टापट्टा करण्यातून आणि मिरवण्याची हौस भागवून घेण्यातून वेळ मिळाला नसल्याने त्या ग्रंथ प्रदर्शनाकडे फिरकल्या नाहीत. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सुद्धा औपचारिकता म्हणून शब्दशः तीस सेकंदात ‘लोकराज्य’च्या एकमेव दालनाला भेट देऊन तावडेंच्या सोबत घाईघाईत पळ काढला.
दुसर्‍या दिवशी बहुतेक साहित्य रसिकांनी अमृतसर आणि वाघा बॉर्डरला जाणे पसंत केले. त्यादिवशी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शुकशुकाट होता. एकाहून एक टुकार कविता सादर करण्याची स्पर्धा निमंत्रितांच्या कवीसंमेलनात लागली होती. बळेबळे आणि सगळ्यांची ओरड सुरू झालेल्या कवी कट्ट्याकडेही कुणी फारसे फिरकले नाही. अभिरूप न्यायालयात सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी रंगत आणली. प्रमाण भाषेवरून राजन खान यांनी नेहमीप्रमाणे आक्रस्थाळेपणा केला. डॉ. गणेश देवी यांच्या मुलाखतीत मात्र कहर झाला. ज्यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्कार टाकून संमेलनाच्या आयोजकांची कोंडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्या ‘पद्मगंधा’च्या अरूण जाखडे यांनी मुलाखतीचा रसभंग केला. तब्बल सात-सात, आठ आठ मिनिट भाषणबाजीचे त्यांचे प्रश्‍न होते. गणेश देवी यांनी उत्तर देण्याच्या आधीच जाखडेंचे पुढचे प्रवचन सुरू व्हायचे. 
‘पंजाब केसरी’चे संपादक विनोद चोप्रा यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत मात्र बरेच काही देऊन गेली. अध्यक्षीय भाषणही रटाळ, कंटाळवाणे आणि लंबेचौडे झाले. रसिकांना टाळ्या वाजवून मोरेंना ‘आता पुरे‘ असे खास पुणेरी शैलीत सुचवण्याची वेळ आली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावरही चांगलीच हुल्लडबाजी झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असे काही उद्योग करून या लोकानी संमेलनाची अप्रतिष्ठा केली आहे.

'चपराक' तर्फे रेल्वेतील स्वयंसेवकांचा सत्कार घेण्यात आला. 

उत्तम पाहुणचार आणि चोख व्यवस्था यासाठी पंजाबी बांधवांना शंभर पैकी शंभर गुण द्यावे लागतील. त्याउलट इतके भिकार कार्यक्रम ठेऊन स्वतःची तुंबडी भरणार्‍या साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची मात्र कीव करावीशी वाटते. भारत देसडला यांच्यासारख्या रसिक वृत्तीच्या उद्योजकाने स्वतःची ‘बिल्डर’ ही मळकट प्रतिमा साफ करण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या निमित्ताने केला, मात्र आपल्या साहित्य संस्थांनी त्यांची उरलीसुरली अबु्रही घालवली. केवळ आपले हितसंबंध जोपासण्यासाठी गुणात्मक दर्जाशी तडजोड करून त्यांनी साहित्यरसिकांचा रसभंग केला, हे कोणीही अमान्य करणार नाही.
घुमानच्या संमेलनासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली होती. सुरक्षा व्यवस्था, निवास व्यवस्था, भोजन यासाठी त्यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. यानिमित्ताने घुमानसारख्या खेड्याचा विकास झाला. एका रात्रीत ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका करण्यात आली. मागच्या पन्नास वर्षापासून प्रथमच गावात डांबरी रस्ता झाला. बसेस सुरू करण्यात आल्या. महाविद्यालयाला मान्यता मिळाली. पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यात सांस्कृतिक एकोपा साधताना घुमानचा झालेला हा विकास ही मराठी माणसाची देण आहे.
घुमानहून परतीच्या प्रवासालाही उशीर झाल्याने काही अडथळे आले. मात्र छोट्याशा गोष्टींचा बागुलबुवा करून त्या रंजक पद्धतीने मांडण्यात आल्या. प्रवासात असतानाच महाराष्ट्रातील माध्यमांनी रेल्वे प्रशासन, आयोजक आणि स्वयंसेवक यांच्यावर जाळ काढल्याच्या बातम्या आम्हाला कळल्या. या सपशेल खोट्या वृत्ताला कोणीही दुजोरा दिला नाही. गाडीतील स्वयंसेवक हे वयाने आणि अनुभवाने लहान असले तरी त्यांना साहित्यिक जाण होती. त्यातील कुणी पुणे विद्यापीठातून एम. ए. करत होते तर कुणाची पीएचडी पूर्ण झालेली होती. आम्ही ‘चपराक’तर्फे मनमाड स्थानकावर रेल्वेतील सहप्रवाशांच्या साक्षीने या स्वयंसेवकांविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचे सत्कार घेतले. स्वयंसेवक, आचारी, सफाई कामगार यांचे सत्कार केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान आम्हाला पुढील प्रवासात ऊर्जा देत राहिले.
पंजाबी बांधवांचे आदरातिथ्य आणि मराठी लोकांचा करंटेपणा या निमित्ताने जवळून अनुभवता आला. चहा, नाश्ता, मिष्ठान्नावर यथेच्छ ताव मारूनही काहीजणांनी जेवणाविषयी असमाधान व्यक्त केले. ही निव्वळ विकृती आहे.
घुमानला साहित्य संमेलन झाल्याने दोन्ही राज्यात सांस्कृतिक दुवा साधला जाणार आहे. या संमेलनाच्या यशावरून माधवी वैद्य आणि त्यांचे चेले स्वतःची पाठ थोपटून घेतील, मात्र यात सर्वात मोठे अपयश त्यांचेच आहे आणि ते प्रत्येक मराठी रसिकांनी जवळून पाहिले आहे. त्याचा पुराव्यासह पंचनामा पुढच्या लेखातून आम्ही नक्की करू! मात्र यानिमित्ताने आयोजक भारत देसडला, संजय नहार, पंजाब सरकार आणि सर्व सहभागी साहित्य रसिकांचे अभिनंदन करायलाच हवे!

- घनश्याम पाटील 
संपादक, चपराक 
७०५७२९२०९२