Monday, May 18, 2015

वैचारिक भ्रष्टतेविरुद्धची लढाई!

'चपराक'चे नवे पुस्तक 

लॉर्ड मेकॉले याची अवलाद शोभावेत असे अनेक महाभाग आपल्याकडे आहेत. ‘जातीजातीत, धर्माधर्मात फूट पाडा, येथील लोकाच्या भक्कम असलेल्या श्रद्धा कमकुवत करा, त्यांची शिक्षणव्यवस्था तकलादू करा आणि या देशावर हवे तसे राज्य करा’  असा मंत्र मेकॉलेने ब्रिटिशांना दिला आणि आपल्या नशिबी गुलामीच्या शृंखला आल्या. पुढे असंख्य क्रांतिविरांच्या बलिदानातून, त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; मात्र या मेकॉलेची पैदास पुरती नष्ट झाली नाही. त्याने जे तत्त्वज्ञान सांगितले त्यानुसार आपल्या समाजात जी फूट पडली आहे ती प्रयत्नपूर्वकही दूर होत नाही. मुख्य म्हणजे आपलेच अनेक बांधव यात सदैव आघाडीवर असतात.
एखाद्याची पैशात फसवणूक केली तर ती भरून येऊ शकते, मात्र जर कोणी एखाद्याच्या श्रद्धेला, विश्‍वासाला तडा दिला तर त्यातून सावरणे कठीण असते. अशा भंगलेल्या मनात क्रांतीच्या ज्वाला पेरणे हे महाकठीण काम होऊन बसते. ‘वाचकांना ज्ञानी आणि जागरूक करण्याचे व्रत’ स्वीकारलेल्या आपल्या प्रसारमाध्यमांची प्रतिमाही अशीच तडकली आहे, भंगली आहे. ‘विकाऊ’ वृत्तीच्या पत्रकारांमुळे हे क्षेत्र पुरते बदनाम झाले आहे. सत्य आणि न्याय भूमिका न घेता जसा धंदा होईल तसा गल्ला भरायचा, या वृत्तीमुळे साहित्य आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेकांची बुद्धी गंजली आहे. भूमिका न घेणारे लेखक आणि पत्रकार किंवा सोयीस्कर भूमिका घेणारे ‘विद्वान’ यामुळे ज्ञानाचे हे क्षेत्र डागाळले आहे. ‘आपण सांगू तेच खरे’ या वृत्तीमुळे अशा स्वयंघोषित विचारवंतांनी समाजमन कलुषीत केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन प्राध्यापकांनी त्यांच्या ‘तोकड्या’ कुवतीनुसार, सुमार आकलनानुसार ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’  हा ग्रंथ लिहिला आणि ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला. प्रकाशक दिनकर गांगल आणि अरूण साधू या दोघांनी या लेखकद्वयींना ‘मार्गदर्शन’ केले, सहकार्य केले आणि ‘अगा जे घडलेच नाही‘ तेही यांच्या ‘दिव्य’दृष्टिला दिसू लागले. केवळ शरद पवार यांची पाठराखण करण्यासाठी या सर्व ‘विचारवंतांनी’ त्यांना हव्या तशा थापा मारत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ वाचकांच्या हाती दिले. प्रत्येक परिच्छेदाला धडधडीत खोटी विधाने करत, वाचकांची दिशाभूल करत आपण फार मोठे तीर मारलेत अशा आविर्भावात या सर्वांनी पुढे विचाराच्या क्षेत्रात बिनदिक्कतपणे दुकानदारी सुरू केली.
ओंजळीत धरून ठेवलेले पाणी कितीकाळ टिकणार? त्याप्रमाणेच सत्य हे फार काळ लपून राहत नाही. या पुस्तकाचा सर्वत्र गवगवा होत असतानाच सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी हे पुस्तक वाचले आणि त्यातील फोलपणा पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. भाऊ तोरसेकर यांची पत्रकारिता आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये सुरू झाली आणि बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’मध्ये बहरली. सदैव जागता पहारा देणार्‍या भाऊंनी हा धादांत खोटेपणा लेखक आणि प्रकाशकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी ‘ग्रंथाली‘च्या प्रकाशकांनी आणि या लेखकद्वयींनी भाऊंना पत्र लिहून माफी मागितली आणि पुस्तकातील ‘चुका‘ तपासून घेण्यासाठी थोडा वेळ मागितला. स्वतःच लिहिलेल्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी लेखकाला किती वेळ लागावा?  19 ऑगस्ट 1997 पासून आजपर्यंत त्यांचा ‘अभ्यास‘च सुरू आहे आणि दुसरीकडे या पुस्तकाच्या आवृत्यावर आवृत्त्या निघाल्या आहेत. सुहास पळशीकर यांच्यासारखा माणूस सार्वजनिक जीवनात ज्या बेमालूमपणे भाषणबाजी करत असतो तो पाहता हा वेश्येेने पतिव्रता धर्म शिकवण्याचा भाग वाटतो. व्होरा आणि पळशीकर यांच्या चुकीच्या नोंदी व खोटेपणाला आक्षेप घेत भाऊंनी त्यांची परखड आणि सत्यनिष्ठ चिकित्सा करत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘चा प्रतिवाद केला आहे. येत्या 21 मे रोजी भाऊंनी प्रतिवाद केलेले हे पुस्तक ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ या नावाने ‘चपराक प्रकाशन‘कडून प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन सत्याचा कैवार घेणार्‍या उज्ज्वल निकम यांच्यासारख्या लढवय्या सरकारी वकीलाच्या हस्ते होत आहे, हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या विषयावर लिहिताना आणि ते प्रकाशित करताना लेखक आणि प्रकाशकांचे ‘मडके’ कच्चे होते असेही म्हणता येत नाही, कारण हा इतिहास केवळ पवारांची आरती ओवाळण्यासाठी आणि सेनेला कमी लेखण्यासाठी मांडलाय हे पानापानावर जाणवते. व्होरा आणि पळशीकरांनी त्यांच्याच पुस्तकात जे संदर्भ दिलेत, जी मांडणी केलीय त्याच्याशी विसंगत मजकूर त्याच पुस्तकात दिलाय. ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ अशातला हा मामला आहे. धडधडीत खोटी विधाने पेरत, आपल्या ‘धन्या’शी प्रामाणिक राहत हे पाखंडी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बदलायला निघालेत. जे घडलेच नाही ते यांनी कसलीही लाज न बाळगता ठोकून दिले आहेच; पण ‘महाराष्ट्रातील सत्तांतरा’च्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या व राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटनांना त्यांनी जाणीवपूर्वक टांग मारली आहे. भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या पुस्तकात या खोटेपणाची जंत्रीच दिली आहे.
शालीनीताईंची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा, पी. के. सावंत, राजाराम बापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (1970-74), शंकरराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, रजनी पाटील यांच्या मुंबई कॉंग्रेसकरवी महाराष्ट्र कॉंग्रेसला शह, 1960 पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडणारी कॉंग्रेस संघटना, टाळलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका (1970-80), मुंबईचा ऐतिहासिक गिरणी संप आणि त्यानंतर शिवसेनाला मिळालेली पालिकेतील सत्ता (1985), पवारांच्या नेतृत्व काळात डाव्या पक्षात आलेले शैथिल्य आणि नंतरचे पांगळेपण-दिशाहीनता (1986), औरंगाबाद महापालिकेत सेनेचा देदीप्यमान विजय, पार्ला पोटनिवडणुकीत हिंदुत्त्वावर जनतेचे शिक्कामोर्तब, 1991 ला संक्रांतीदिवशी पवारांच्या विरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल व रूपकुवर सतीचे वादळ अशा कितीतरी घटना ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ लिहिणार्‍या व्होरा आणि पळशीकरांनी दुर्लक्षित ठेवल्या आहेत. राज्यशास्त्राच्या सामान्य विद्यार्थ्याला या घटनांचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील या विभागाचे प्रमुख प्राध्यापक नालायक ठरले. ‘झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही’ या म्हणीप्रमाणे या प्राध्यापकांची लबाडी केवळ शरद पवारांची तळी उचलून धरण्यासाठी होती हे कुणाच्याही सहजपणे ध्यानात येईल.
मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणाचा डोळस अभ्यास असलेल्या भाऊ तोरसेकर यांनी सातत्याने सत्य पुढे आणण्यासाठी आपली लेखणी झिजवली आहे. त्यांच्या ब्लॉगचे सात लाखाहून अधिक वाचक आहेत. त्यांचे अचूक राजकीय विश्‍लेषण महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवले आहे. ‘चपराक प्रकाशन’ची सुरूवातीपासून ‘संवाद आणि संघर्ष’ हीच भूमिका असल्याने वैचारिक भ्रष्टतेच्या लढाईत भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या चतुरस्त्र लेखकाची निर्भिड आणि निःपक्ष बाण्याचे दर्शन घडविणारी काही पुस्तके लवकरच आपल्या भेटीस आणत आहोत. तुर्तास, ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाद्वारे भाऊ तोरसेकर यांनी राजकीय विश्‍लेषक आणि विचारवंत म्हणून सर्वत्र मिरवणार्‍यांचे जे बुरखे फाडले आहेत ते वाचकांनी आवर्जून वाचावेत, अभ्यासावेत, पडताळून पहावेत. यातूनच कणखर बाण्याची एक जबाबदार पिढी घडण्यास हातभार लागणार आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

1 comment:

  1. खुप छान! भाऊ तोरसेकरांचे लेखन म्हणजे वाचकाला दाखवलेला आरसाच असतो. भाऊंशिवाय कोणत्याच राजकीय पत्रकारावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. इतके निश्पक्ष कसे लिहू शकतात हेच खुप आश्चर्यकारक आहे. त्यांचे पुस्तक वाचायला मजा येईल.

    ReplyDelete