Sunday, May 17, 2015

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’

सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक येत्या 21 मे रोजी प्रकाशित होत आहे. ‘चपराक प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची तटस्थपणे आणि प्रांजळ भूमिकेतून केलेली परखड चिकित्सा या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. त्याविषयी थोडेसे...

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’
'चपराक प्रकाशन,'पुणे 

पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन प्राध्यापकांनी चुकीच्या नोंदी व खोटेपणा करत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक लिहिले आणि ‘ग्रंथाली’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले. अनेक न घडलेल्या घटना, प्रसंग अथवा अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टी, काल्पनिक माहिती-घटनांवर  आधारित केलेली विधाने व निष्कर्ष देऊन वाचकांची दिशाभूल या प्राध्यापकद्वयींनी केली. सामाजिक बांधीलकीची भाषा बोलणार्‍या व्यक्ती व संस्थांकडून झालेली अशी बेपर्वाई, दडपेगिरी खटकल्याने सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी ही बाब संबंधित लेखक आणि प्रकाशकांच्या लक्षात आणून दिली. दोघांनीही तोरसेकर यांची लेखी दिलगिरी व्यक्त करत पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे मान्य केले. मात्र 1997 पासून आजवर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि त्यात तोरसेकर यांनी निदर्शनास आणून दिलेल्या सर्व चुका तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. या वैचारिक भ्रष्टतेचा पर्दाफाश  करणारे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक पुण्यातील ‘चपराक’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होत आहे. 
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या पुस्तकात शब्दाशब्दात चुकांची जंत्री देण्यात आली आहे. शरद पवार यांचे गुणगाण करण्यासाठी, वाचकांच्या मनात त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे की काय अशी शंका येण्याइतपत खोटे संदर्भ पेरण्यात आले आहेत. या चुकीच्या व धडधडीत खोट्या माहितीने वाचकांची दिशाभूल होत आहे. उदा. लेखक आपल्या ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या पुस्तकात पृष्ठ क्र. 6 वर लिहितात की, ‘‘अल्पवाधितच त्यांनी (शरद पवारांनी) संयुक्त मंत्रिमंडळाला सुरूंग लावला आणि अठरा आमदारांसह समाजवादी कॉंग्रेस या नावाने प्रादेशिक गट स्थापन करून बिगर कॉंग्रेस पक्षांचे नेतृत्त्व स्वत:कडे घेतले.’’
हे धादांत खोटे विधान खोडून काढताना भाऊ तोरसेकर पुढील वस्तुस्थिती मांडतात. ‘‘पवारांनी स्थापलेल्या गटाचे नाव समांतर कॉंग्रेस होते, कारण त्याच काळात शंकरराव चव्हाण, विखे-पाटील यांचा महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस नावाचा प्रादेशिक पक्ष अस्तित्त्वात होता. पुलोदचा भागीदार म्हणून त्याचे नेते शंकरराव चव्हाण पवार सरकारात अर्थमंत्री होते.’’
प्रत्येक पानावरील अशा विधानांची अभ्यासपूर्वक चिकित्सा केल्याने भाऊ तोरसेकर यांचे हे पुस्तक केवळ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’चा प्रतिवाद करणारे ठरले नसून, महाराष्ट्राचा राजकीय सत्य इतिहास उलगडून दाखविणारे झाले आहे. ‘मराठा’ सारख्या मान्यवर दैनिकातून पत्रकारितेची सुरूवात झालेल्या भाऊ तोरसेकर यांची निर्भिड व नि:पक्ष लेखनासाठी ख्याती आहे. राज्यशास्त्राचे आणि पत्रकारितेचे विद्यार्थी, महाराष्ट्राविषयी जिज्ञासा असणारे वाचक यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. 
 शरद पवारांची अब्रू झाकण्याच्या नादात ‘ग्रंथाली प्रकाशन’ची स्थिती शरद पवारांसारखीच होईल आणि ही संस्था रसातळाला जाईल असा धोका तोरसेकर यांनी या पुस्तकातून वर्तविला आहे. ‘चपराक’सारख्या परखड बाण्याच्या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित होत असल्याने या विषयाला पुरेपुर न्याय मिळणार आहे.

No comments:

Post a Comment