Sunday, May 10, 2015

वादाला का भीता?

संजय सोनवणी (साहित्यिक आणि संशोधक)

... होय, संजय सोनवणी हे एक तटस्थ वृत्तीचे आणि ठाम भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. वेगवेगळ्या साहित्य प्रवाहात कणखर आणि परखड भूमिका घेऊन त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले असले तरी त्यांनी सत्याची कास सोडली नाही. त्यांच्या काही भूमिकांविषयी मतभेद जरूर असू शकतात; मात्र हा माणूस नेक वृत्तीचा आणि साहित्य क्षेत्राशी प्रामाणिक आहे हे मान्य करावेच लागेल.
सध्या एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे दिवस आहेत, तर दुसरीकडे या स्वातंत्र्याचा अतिरेकही केला जातो. मध्यंतरी  पेरूमल मुरूगन या लेखकाने या व्यवस्थेला कंटाळून स्वतःतील लेखकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, हा  आपल्याकडील काळाकुट्ट इतिहास आहे. ही मुस्कटदाबी कुणा एका विचारधारेकडून, समाजाकडून होते असे नाही. सत्य काय हे जाणून न घेता केवळ आपला स्वार्थ पुढे दामटण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे.
क्षमा आणि शांतीचा संदेश देणार्‍या आपल्या देशात आजवर अनेक समाजद्रोह्यांनी थयथयाट सुरूच ठेवला आहे. राजकीय लाभापायी इथल्या पोखरलेल्या व्यवस्थेने अशा दुष्प्रवृत्तींना सातत्याने खतपाणी घातले. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा तो स्वबळावर पूर्ण करू शकतोय. इतकी समज आणि कुवत त्याच्यात निर्माण होण्याइतपत बदल नक्की झालाय. मात्र तरीही समाजाच्या अनेक गरजा आज दुर्लक्षित आहेत. साहित्य आणि संस्कृती हा आपल्या आदर्श समाजरचनेचा पाया आहे. तो मात्र दिवसेंदिवस तकलादू होत चालला आहे.
’महाराष्ट्र भूषण’ श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची संपूर्ण हयात शिवसेवेसाठी घालवली. युगपुरूष शिवरायांचे चरित्र तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी जे कष्ट घेेतले, जे कार्य उभे केले त्याला तोड नाही. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज घडू शकेल, लोकापुढे शौर्य आणि पराक्रमाची मशाल तेवत राहील यादृष्टिने बाबासाहेबांनी जे कार्य उभे केले आहे त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांचे हे काम अद्वितीय आहे. महाराष्ट्र सरकारने उशीरा का होईना पण त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे सारे असताना काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्यांच्यावर खोटे आरोप घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राला जात, धर्म, प्रांत यावरून भांडत राहणे परवडणारे नाही, हे ठाऊक असूनही केवळ स्वतःचा स्वार्थ पुरा करण्यासाठी काहीजण आपल्यात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू ठेवत आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लेखन केले त्यातील आपल्याला हवा तो भाग, हव्या त्या पद्धतीने घेऊन टाळकी भडकवण्याचे काम वेगात सुरू आहे. आजची विचारी तरूणाई अशा भूलथापांना बळी पडणार नाही, मात्र त्यांच्यापुढे यातील सत्य आले पाहिजे. बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातील काही वाक्ये उचलून, त्याचे कपोलकल्पित संदर्भ जोडून समाजात दुही निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे. अशा बिकट वेळी संजय सोनवणी या लढवय्या लेखकाने अत्यंत अभ्यासपूर्वक, जिद्दीने सत्य पुढे आणण्याचा चंग बांधला. बाबासाहेबांचे पुस्तक त्यांनी अभ्यासले आणि तथाकथीत काही अविचारी लोकाचे सर्व आरोप पुराव्यासह खोडून काढले. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जे आक्षेप घेतले जात होते ते राजकीय हेतूने, पूर्वग्रह ठेवून आणि जातीय भूमिकेतून होते हे सिद्ध झाले. अशाने आधीच बंद पडत चाललेली आपली दुकानदारी बंद होणार, हे ध्यानात येताच काही ब्रिगेडी टाळकी पेटून उठली आहेत. वाटेल त्या थराला जाऊन, खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे ठरवून हे लोक आपले घोडे पुढे दामटत आहेत. संजय सोनवणी यांनी मुद्देसूदपणे आणि अभ्यासपूर्वक बाबासाहेबांवरील सर्व आरोप फेटाळून लावल्याने यांची गोची झाली आहे.
संजय सोनवणी हे मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की ज्यांचे पुस्तक अमेरिकेत, व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरंस बुक’ म्हणून ठेवण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजीत त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांचे साहित्य जगभर वाचले जाते. वंचित, उपेक्षित, भटके विमुक्त, आदिवासी, दलित यांचे सुखदुःख मांडण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या सूड भावनेने वागणार्‍या माणसाला न्यायालयात अधिकृत माफी मागण्यास भाग पाडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर मार्गाने लढत दिली. हिंदू आणि हिंदुत्व या दोन्हीपासून हजारो मैल दूर असणार्‍या सोनवणी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील आरोप विवेकाने खोडून काढले आहेत. त्यासाठी लागणारी सच्चाई आणि अच्छाई त्यांच्याठायी आहे. जातीपातीच्या बाहेर पडून अशी न्याय भूमिका घेणार्‍या आणि धाडसाने सत्य पुढे आणणार्‍या सोनवणी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास पूत्र आहेत. त्यांनी शिवकाल जिवंत केला आहे. एव्हरेस्टसारख्या उंचीचा हा ध्येयवेडा माणूस अनेकांच्या हृदयावर राज्य करतोय. ज्यांचा प्रत्येक श्‍वास शिवमय होऊन गेलाय, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण शिवाजीराजांच्या प्रेमात घालवलाय त्यांच्याविषयी आमच्या मनात श्रद्धाभाव आहे. बाबासाहेबांवर केवळ ‘ब्राह्मण’ म्हणून टीका करणे हे काही ‘ब्रिगेडियर’ नेत्यांचे कारस्थान आहे. संभाजीनगर येथे बोलताना बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ बद्दल अभिनंदन करणार्‍या शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मात्र पक्षाची नसून ती त्यांची स्वतःची आहे, असे केविलवाणे विधान केले. यातून पवारांसारख्या नेत्याची विखारी वृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला जवळून पाहता आली.
संजय सोनवणी यांच्या चिकित्सेनंतर नगर येथील ‘शिवप्रहार’ या संस्थेचा अध्यक्ष असलेल्या संजीव भोर नावाच्या एकाने सोनवणी यांना धमक्या देणे सुरू केले आहे. त्याने सोनवणी यांना सूड भावनेने  आव्हान देऊन नगरला बोलवून घेतले. आजपर्यंत अनेकवेळा लेखकांना काळे फासले गेले, त्यांच्यावर शाई टाकण्यात आली, लेखकांचा निषेध करण्यात आला किंबहुना लेखकाला स्वतःतील लेखक मेल्याचेही जाहीर करावे लागले. मात्र मराठीच्या इतिहासात प्रथमच असा एक लेखक पुढे आला की ज्याने आव्हान देणार्‍याला ठामपणे सांगितले,  की ‘‘ठिकाण आणि वेळ तू ठरव, तू मला काळे फासण्याच्या आधी मी तुझ्या कानाखाली ओढतो. तुझ्या मुस्कटात ठेऊन देतो!’’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सांगितले होते की, ‘‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या!’’ सोनवणी यांनी ज्या बेडरपणे हे आव्हान स्वीकारले ते पाहता आता स्वातंत्र्यवीरांचे विचार खोलवर रूजलेत असे मानायला हरकत नाही.
मात्र या संजीव भोरने संजय सोनवणी यांना बोलवण्याचा आततायीपणा केला. आपली आता काही खैर नाही हे ध्यानात येताच त्याने काही महिला गोळा केल्या. संजय सोनवणी यांच्या अंगावर या महिलांना सोडायचे आणि विनयभंग, ऍट्रॉसिटी असे गुन्हे दाखल करायचे असे कारस्थान त्याने रचले. याची माहिती मिळताच नगरला गेलेल्या सोनवणी यांनी माघार घेतली आणि भोर याचा कुटील डाव हाणून पाडला.
आगरकरांनी विचारले होते की, ‘‘वादाला का भीता?’’
ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांची चर्चेची तयारी असते. ते कोणत्याही तात्त्विक वादाला कधीही घाबरत नाहीत. मात्र संजीव भोर याच्यासारख्या भ्याड माणसाने सोनवणी यांच्यासारख्या दिग्गजाला आव्हान देऊच नये. भोर याच्या आडून हे आव्हान सरळ सरळ ‘संभाजी ब्रिगेड’चे आहे हे पुरते ठाऊक असल्याने सोनवणी यांनी ते स्वीकारले पण भोरने पळपुटेपणा करत कट रचला.
बाबासाहेब पुरंदरे आणि संजय सोनवणी यांच्यात वैयक्तिक काहीही संबंध नाहीत. बाबासाहेबांच्या लेखनावर चुकीचे आक्षेप घेतल्याने  संजय सोनवणी यांच्यासारखा एक सत्लेखक दुखावला गेला आणि त्याने सत्य पुढे आणण्याचे काम धाडसाने केले. पुरंदरे आणि सोनवणी या दोन मात्तबर लेखकांची भेट ‘चपराक’च्या पुढाकाराने लवकरच घडवून आणत आहोत, मात्र यात कसलेही राजकारण, स्वार्थ नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. केवळ सत्य पुढे यावे आणि आजच्या तरूणाईच्या मनात जे जातीभेदाचे विष कालवले जात आहे ते दूर व्हावे या प्रांजळ भूमिकेतून संजय सोनवणी यांच्यासारख्या खमक्या लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्यावर सध्या राळ उडवण्यात येत असून त्यांची वैयक्तिक बदनामी केली जात आहे. हे सारे संतापजनक आहे. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वजण संजय सोनवणी यांच्या पाठिशी राहणे, बाबासाहेबांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव करणे हे आपले कर्तव्यच आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
संजीव भोर याने संजय सोनवणी यांच्याविरुद्ध अशी राळ उडवली.




2 comments: