Monday, April 20, 2015

सत्तेतून संघर्षाकडे!

कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिला यशस्वी व्हायला काय लागतं?
त्यासाठी त्या क्षेत्रातील गरजेपुरती अक्कल आणि थोडासा अनुभव लागतो.
ही अक्कल आणि अनुभव कशाने मिळते?
ती मिळते, तो करत असलेल्या कामातील यश आणि मुख्यत: अपयशाने!
लोकसभा निवडणुकीत दणकून आपटल्यानंतर मोठे अपयश पदरी पडले आणि कॉंग्रेसचे तथाकथित युवराज राहुल गांधी अनुभवाचे धनी ठरले.
ज्याच्या ठायी अनुभव आहे आणि त्या अनुभवातून काहीतरी शिकण्याऐवढी प्रज्ञा आहे तो यशस्वी होतोच.
आपल्या अपयशाचे चिंतन करण्यासाठी राहुलबाबांनी देश सोडला आणि तब्बल 57 दिवस विदेशात जाऊन विपश्यनेचे धडे घेतले. शौर्य आणि शांतीची परंपरा प्रस्थापित करणार्‍या हिंदुस्थानात राहुन आत्मपरीक्षण करण्याऐवजी परदेशी जाऊन त्यांनी मौन बाळगणे सोयीस्कर समजले. संसदेत महत्त्वाचे निर्णय घेतले जात असताना, एक प्रभावी विरोधक म्हणून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची संधी असताना राहुल गांधी देशाबाहेर गेले. ते नेमके कुठे गेले याचे कॉंग्रेसने किंवा राहुल यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्टीकरण दिले नसले तरी, ते विपश्यनेत मग्न होेते, हे मात्र ठामपणे सांगण्यात येत आहे.
युवा अवस्थेनंतर गृहस्थी जीवनात पदार्पण करण्याऐवजी राहुल यांच्यावर साधनेत व्यग्र राहण्याची वेळ आली आहे. संन्यास स्वीकारण्याऐवढी बौद्धिक प्रबळता त्यांच्यात नसली तरी पराभवाच्या अनुभवातून ते तावून सुलाखून निघाले आहेत. विदेशी आईच्या पोटी जन्म घेतलेल्या या स्वदेशी बाळाने देशाच्या राजकारणाचा अभ्यास पुन्हा एकदा गंभीरपणे सुरू केला आहे. सत्तावन्न दिवसाच्या अज्ञातवासानंतर ते हिंदुस्थानात परतले आणि त्यानंतर त्यांनी रामलीला मैदानावर शेतकर्‍यांचा भव्य मेळावा घेतला.
राहुल गांधी यांचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात ही सत्तेत सहभागी होण्यापासूनच झाली आहे. सलग दहा वर्षे देशावर राज्य करताना त्यांनी आपल्या बापजाद्यांचा इतिहास अभ्यासला नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सत्ता हे राहुल यांचे जसे सामर्थ्य आहे तसेच तीच त्यांची मर्यादाही आहे. विरोधी पक्षाच्या कामकाजाचा मात्र त्यांना यत्किंचितही अनुभव नाही. सत्तेत दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी दोन महिने स्वत:च्या सिद्धतेसाठी दिले. आता ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीय होत आहेत.
राहुल यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला असला तरी ते स्वत: मात्र खासदार म्हणून निवडून आले आहेत. विपश्यनेसाठी सर्व शासकीय कर्मचार्‍यांना पगारी सुट्टी मिळते. या सुविधेचा लाभ घेत राहुल यांनी दोन महिन्यांची सुट्टी काढली. दरम्यान सोनिया गांधी यांना ‘राहुल कुठे आहेत?’ असे विचारल्यानंतर त्या मौन बाळगायच्या. कॉंग्रेसचे अन्य महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांनाही राहुल यांच्या बेपत्ता होण्याची खबर नव्हती. त्यावेळी वैतागलेल्या सोनिया यांनी ‘राहुल लवकरच पुन्हा देशाच्या राजकारणात सक्रीय होतील’, असे जाहीर केले आणि प्रसारमाध्यमांनी त्यांचा चिवचिवाट बंद केला. ‘राहुल पुन्हा सक्रीय होतील’ म्हणजेच निवडणुकीनंतर ते ‘निष्क्रीय’ होते, हे खुद्द पक्षाध्यक्षांनीच जाहीर करूनही त्याच्या बातम्या देण्याचे शहाणपणही माध्यमांनी दाखवले नाही. असो.
सोनियाजींच्या म्हणण्यानुसार त्यांचे सुपुत्र राहुल आता पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करण्याची त्यांची तयारी आहे. काही फासे उलटे पडल्याने रथारूढ नेते आता जमिनीवर आहेत. जमिनीवर असताना त्यांनी जमिनीचेच शस्त्र केले आहे. गेल्या अकरा महिन्यात मोदीशेठचा सुसाट सुटलेला वारू रोखण्यासाठी त्यांनी भूमिअधिग्रहण कायद्याचा आधार घेतला आहे. कॉंग्रेसवाले ज्याप्रमाणे उद्योजकांना हाताशी धरायचे तीच रीत मोदींनी सुरू ठेवली आहे. ‘उद्योजक खुश तर सरकार स्थिर’ हे सर्वमान्य सत्य आहे.
मोदीशेठ आणि कॉंग्रेस यांच्यात उद्योजकांच्या लांगुलचालनाचे साम्य असले तरी दोघांचे रस्ते मात्र भिन्न आहेत. कॉंग्रेसकडे सत्तेतून आलेली अक्कल होती. मोदी त्यादृष्टिने बरेच नवखे आहेत. देश चालवणे म्हणजे गुजरातसारखे छोटे राज्य चालवण्याऐवढे सोपे नाही, हे कळण्याची त्यांची ही पहिली पायरी आहे. सत्तेच्या उन्मादातून बाहेर पडल्यानंतर आता कुठे ते वास्तवाला सामोरे जात आहेत.
कॉंग्रेसवाले उद्योजकांचे हीत पाहत असले तरी, गरीबांविषयी आपल्याला किती कळवळा आहे हे दाखवून द्यायचे. सत्ताधार्‍यांना असा बेमालुम अभिनय जमायला हवा. मोदींना अजूनतरी नाटकी अभिनय जमत नाही. त्यामुळे निवडणुकीत उद्योजकांनी केलेल्या मदतीची परतफेड करताना ते शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचे चित्र कॉंग्रेसवाले निर्माण करत आहेत. अनेक दुबळ्या राजकीय पक्षांच्या कुबड्या हाती असल्याने कॉंग्रेसने देशावर इतकी वर्षे राज्य केले. त्यामुळे त्या धुंदीत असलेल्या कॉंग्रेसजनांना विरोध म्हणून लोकानी भाजपला मतदान केले. कॉंग्रेसची हीच धुंदी मोदी यांच्यातही दिसून येते. त्यांच्याकडे भलेही ‘कुबड्या’ नसतील मात्र स्वत:ची ‘हिटलरशाही’ ही प्रतिमाही ते खोडून काढू शकले नाहीत. हिंदुस्थानासारख्या बलाढ्य लोकशाही राष्ट्रात ‘हिटलर’ला फारसे कुणी जुमानणार नाही.
या राष्ट्रातली जमीन कुणाची? कष्टकर्‍यांची, शेतकर्‍यांची की उद्योजकांची? असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. एकही पायरी न चुकवता ज्याचे गणित बरोबर येईल तो देशावर राज्य करेल. मोदी यांची स्वत:च्याच अडेलतट्टू वृत्तीमुळे कोंडी झालेली आहे. ते अशाप्रसंगी आपली मूळ प्रवृत्ती बाजुला ठेवून सर्वसमावेशक भूमिका घेतात की, कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या आरोपांना बळी पडतात ते लवकरच कळेल. विपश्यनेच्या साधनेतून बाहेर पडल्यानंतर राहुल यांचा आवाज मात्र आणखी बुलंद झाल्यासारखा वाटतोय. पराभवाचे खापर त्यांच्या माथी फुटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा व्युहनीति आखण्यास सुरूवात केलेली आहे. फेसबुक, ट्वीटर, ब्लॉग अशा समाजमाध्यमाद्वारे मोदी भक्तांनी कितीही घंटा बडवल्या आणि मोदी नामाचा गजर केला तरी सत्यापासून आपल्याला फारकत घेता येणार नाही. सत्ताधार्‍यांविषयी त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल लोकाच्या मनात राग हा असतोच. तो राग व्यक्त करणे, उफाळून येणे आणि सत्तेचा कायापालट होणे हे चक्र कायम सुरू असते. हा राग व्यक्त करण्यात राहुल गांधी त्यांच्या नव्या चमूसह कितपत यशस्वी होतात आणि मोदीशेठ तो राग कशा पद्धतीने थोपवतात यावर राष्ट्राची पुढील दशा आणि दिशा ठरणार आहे.   


- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक'
७०५७२९२०९२

1 comment:

  1. विचार करण्यास भाग पाडणारा लेख

    ReplyDelete