Monday, July 20, 2015

ही ठिणगी घातक!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतर अनेकांना पोटशूळ उठला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बोलबच्चन नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यांच्या वाचाळवीरतेचे प्रदर्शन मांडत जातीय तेढ निर्माण होईल, अशी गंभीर विधाने केली आहेत. भाजपाचे देवेंद्र आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र यांच्यातील कलगीतुर्‍यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रश्‍न मात्र तसेच पडून आहेत. राज्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करताना तारतम्य सोडल्याने महत्त्वाचे विषय बाजूला पडून राजकारणाला कसे रंग दिले जातात, हे सध्या महाराष्ट्र अनुभवतो आहे. पंकजा पालवे यांची चिक्की आणि विनोद तावडे यांची पदवी असे मुद्दे काढून सिंचन घोटाळ्यातील सुनिल तटकरे, अजित पवार, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील छगन भुजबळ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात सत्ताधारी आणि विरोधक यशस्वी ठरले आहेत.
मागची काही वर्षे सत्तेत असणारे राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ता गेल्याने बिथरले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्याला त्यांचा विरोध आहे. या विरोधाचे नक्की कारणही त्यांना सांगता येत नाही. बाबासाहेब केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर टीका सुरू आहे. त्यांच्या लेखनाविषयी ओढूनताणून जे आक्षेप घेण्यात आले आहेत त्या सर्व मुद्यांची चिकित्सा यापूर्वी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी ‘चपराक’मधून केलेली आहेच. असा रीतसर पंचनामा झाल्यानंतर कोणते मुद्दे मांडावेत हे कळत नसल्याने त्यांनी जातीजातीत तेढ निर्माण होईल, असे उद्योग सुरू केले आहेत.
सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने शिवसन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बाबासाहेबांना विरोध करताना  मिरज दंगलीचे सूत्रधार संभाजीराव भिडे गुरूजी असल्याचे आव्हाडांनी सांगितले आणि धुमश्‍चक्री माजली. पुरंदरे-भिडे समर्थक आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. माध्यमांना चघळायला आणखी एक नवा विषय मिळाला. मराठा आणि ब्राह्मण या समाजातील तेढ वाढावी यासाठी भडकलेल्या आगीत आणखी तेल ओतले गेले.
आज महाराष्ट्राला छत्रपती शिवाजीराजांची ओळख करून दिली ती बाबासाहेब पुरंदरे या ऋषितुल्य माणसाने! त्यांनी शिवचरित्र देशविदेशात पोहोचवले. बाबासाहेबांना विरोध करणार्‍यांच्या वडील आणि आजोबांना वाचनाची थोडीफार आवड असेल, त्यांना शिवाजीराजांविषयी थोडाफार आदर, जिव्हाळा असेल तर त्यांनी नक्कीच बाबासाहेब समजून घेतले असणार! त्यांच्या ‘जाणता राजा’ने कमाल केली. महाराजांचे कार्य त्यांनी तळागाळात पोहोचविले. गड, किल्ले पालथे घालून, अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांनी जे शिवसाहित्य लिहिले त्याला तोड नाही. त्यांच्या ‘जाणता राजा’च्या कार्याबद्दल ते महाराष्ट्र भूषणला पात्र ठरतात. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य अफाट आहे. त्यांनी किती पोवाडे लिहिले, किती कादंबर्‍या लिहिल्या, किती व्याख्याने दिली हे सर्व नंतर पाहू! फक्त ‘जाणता राजा’च्या अभूतपूर्व यशाबद्दलही ते महाराष्ट्र भूषणचे मानकरी ठरतात. त्याशिवाय तटस्थपणे बाबासाहेब समजून घेतले आणि त्यांच्या एकंदर कारकिर्दीचा अभ्यास केला तर त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नाही तर ‘भारतरत्न’ द्यायला हवा, असेच कुणालाही वाटेल.
आव्हाडांसारख्या वाचाळवीरांनी सूर्यावर थुंकल्याने सूर्याचे महत्त्व कमी होणार नाही. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवा तसा वापर करत हवे तसे वागावे; मात्र हे करताना त्यांनी जातीय तेढ निर्माण करणे आपल्या राज्याला परवडणारे नाही. त्यांचे म्होरके असलेल्या शरद पवारांचा जातीद्वेष सर्वश्रूत आहे. मात्र त्यांनी किमान काही मर्यादा पाळल्या होत्या. जितेंद्र आव्हाड ही त्यांची फार पुढची विकृत आवृत्ती आहे.
आव्हाड हे या राज्यातील एका जबाबदार पक्षाचे नेते आहेत. लोकांनी त्यांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. मात्र द्वेषमूलक भूमिकेतून त्यांचे तरूणांची टाळकी भडकवण्याचे जे राजकारण सुरू आहे ते आपल्यासाठी मारक आहे. विरोधी पक्षात असल्याने सरकारच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र असा विरोध करताना समाजाला त्याची किंमत मोजायला लागू नये. केवळ ब्राह्मणांना ठोकणे म्हणजेच पुरोगामीत्व, या खुळचट कल्पनेने त्यांची आणि त्यांच्या पक्षाची पुरती वाताहत झाली. केंद्रात आणि राज्यात सपाटून मार खावा लागला. मात्र ‘पडलो तरी नाक वर’या मनोवृत्तीच्या या नेत्यांनी सांस्कृतिक महाराष्ट्राला वेठीस धरले आहे.
‘सांगलीत आग लागली आहे, याचा वणवा मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचवू. ही मशाल राज्यातल्या घरातघरात पोहोचली पाहिजे’ असे प्रतिपादन एका जबाबदार (की बेजबाबदार) आमदाराने केले आहे. जाळणे, मारणे, तोडणे, फोडणे यातच वाकबगार असलेल्या या समदुःखींनी यापूर्वी भांडारकर प्राच्यविद्या संस्था जाळली. जेम्स लेनसारख्या माथेफिरूची गचांडी पकडण्याची, त्याला फरफटत आणत या प्रकरणाचा जाब विचारण्याची क्षमता नसल्याने त्यांनी आपलाच ऐतिहासिक ठेवा नष्ट केला. मंत्रालयापर्यंत आगीचा ‘भडका’ पसरविणे हेही त्यांच्यासाठी नवीन नाही. सत्तर हजार करोडच्या सिंचन घोटाळ्याचे सत्र सूरू असतानाच महाराष्ट्रात मंत्रालयाला लागलेली आग आपण बघितली आहे. देवेंद्र फडणवीस उसण्या आविर्भावात ‘भ्रष्टाचाराविरूद्धचे गाडीभर पुरावे आणू’ असे म्हणत असले तरी मंत्रालयाला आग लागली तेव्हाच महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त झाला आहे. त्यामुळे देवेंद्र आणि जितेंद्र हे दोघेही हवेचे बुडबुडे फोडत आहेत.
कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारकिर्दीला वैतागलेल्या जनतेने मोठ्या आशेने परिवर्तन घडवले आहे. काही बिनडोक आणि स्वार्थसाधू नेते त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेत आहेत. यात समाजातील तथाकथीत विचारवंत आणि पत्रकारही हिरीरीने सहभागी होतात. अन्यथा ‘दाभोलकर-पानसरेंचे खून ब्राह्मणांनीच केले’ असे ठाम आरोप करणार्‍या निखिल वागळेसारख्या चिरकुटावर केव्हाच कारवाई झाली असती. जो तपास आपल्या यंत्रणेला जमला नाही त्याबाबतचे निष्कर्ष निखिल वागळे देत आहेत. अनिरूद्ध जोशी आणि वागळे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्रभर फिरली आहे आणि त्याचे वागळे यांनी अजून तरी खंडण केले नाही. असे सारे असतानाही सत्ताधारी शांत राहतात म्हणजे विरोधकांशी त्यांची मिलीभगत असावी अशी शंका घेण्यास मोठा वाव आहे.
जितेंेद्र आव्हाड यांच्यासारख्या फुरफुरत्या घोड्यांना वेळीच आवरले नाही तर महाराष्ट्रातील वातावरण चिघळण्यास वेळ लागणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा तगडा आणि ठाम भूमिका घेणारा नेता आज नाही. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधःपतन होत असताना त्यांच्यासारख्या धडधडत्या तोफेच्या स्मृती जागवल्या जात आहेत. जातीवादाला खतपाणी घालणार्‍या आव्हाडांच्या ठिणगीवर वेळीच पाणी पडणे हेच आपल्यासाठी हितकारक ठरणारे आहे. 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

1 comment: