Sunday, January 22, 2017

आयुष्य समृद्ध करणारे अरुणिमा

प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी असते. समृद्ध जीवनानुभव असल्यास आयुष्यातील असंख्य घडामोडी काव्यात्म रूप घेतात आणि लेखणीतून पाझरू लागतात. हे झरे अविरतपणे वाहत असतात. आयुष्याची कादंबरी कवितांच्या ओळीत विरघळून जाते आणि या सर्वोत्कृष्ट भावनांचा आविष्कार दिसून येतो. त्यासाठी लागते फक्त थोडीशी सजगता, डोळसता आणि अर्थातच कल्पकता. जो समाजाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो, शोधक नजरेने बरेवाईट टिपू शकतो, ज्याचा विवेक कायम जागृत असतो तो नेहमीच संस्कारशील साहित्य जन्मास घालतो. आमच्या ‘चपराक’च्या उपसंपादिका 
सौ. चंद्रलेखा बेलसरे त्यापैकीच एक. त्यांचे हे साहित्यातले पाचवे आणि कवितांचे तिसरे पुस्तक. यासोबतच ‘सत्याभास’ हा गूढ कथांचा संग्रहही प्रकाशित होतोय. ‘माणूसपण’ ही त्यांच्या साहित्याची जातकुळी आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून भावभावनांच्या प्रगटीकरणाबरोबरच सत्याचा कैवार हे त्यांच्या लेखणीचे अंगभूत सामर्थ्य आहे. प्रस्तुत संग्रहातील अनेक रचना त्याची साक्ष पटवून देतील.
‘आदिमाया, आदिशक्ती’ या पहिल्याच कवितेतून त्यांनी स्त्रीशक्तीचा जागर घातलाय. व्यवस्थेपुढे, निसर्गापुढे, दैववादापुढे त्या हतबल नाहीत! तर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देणार्‍या ब्रह्मा, विष्णु, महेशालाही त्या चक्क ‘निर्लज्ज’ ठरवत स्त्रीमुक्तीचा एल्गार पुकारतात. सृष्टीच्या निर्मितीचे मूळ असलेल्या एका मातेचा हा हुंकार आहे. जुलमी शोषकांच्या विरूद्ध आवाज उठवताना इथल्या पुरूषी मानसिकतेच्या विषवल्ली कशा फोफावल्यात हे त्या सप्रमाण सांगतात आणि म्हणूनच आता कोणताही राम-कृष्ण आपल्या मदतीसाठी धावून येणार नाही हे सत्य अधोरेखित करतात.
अरूण म्हणजे सूर्य आणि ‘अरूणिमा’ म्हणजे सूर्याची किरणे. ही किरणे अंधार चिरत जातात. अंधार नष्ट करण्याचे सामर्थ्य ज्याप्रमाणे प्रकाशात असते अगदी तसेच इथले हलाहल दूर करायचे असेल तर आपल्या लेखणीचा लखलखीत आविष्कार दाखवून द्यायलाच हवा. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी ही किमया यशस्वीरित्या साधलीय. आशयसंपन्नता, वास्तवावर ठेवलेले नेमके बोट, दुष्ट-दुर्जनांवर ओढलेले कठोर कोरडे आणि सज्जनांचा, सद्गुणांचा गौरव हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. आजची मराठी कविता छंदापासून मात्र दूर चाललीय. या संग्रहातीलही बहुतेक रचना मुक्त छंदातल्या आहेत. तंतकाव्य, पंतकाव्य आणि संतकाव्य यापुढे जाऊन आधुनिक मराठी कवितांचा विचार केला तर अनेक प्रतिभासंपन्न कवी छंदाला, व्याकरणाला महत्त्व द्यायचे; त्यामुळे मराठी कविता समृद्ध झाली. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी छंदाकडे विशेष लक्ष दिले नसले तरी या कवितांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. कारण या कविता आशय आणि भावनांनी ओथंबलेल्या आहेत.
चंद्रलेखाताईंचे यापूर्वी ‘आर्यमा’ आणि ‘अनुभूती’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यातील ‘अनुभूती’ हा संग्रह तर भावनांच्या पातळीवर अव्वल आणि काव्याच्या कसोटीवर चिरंतर टिकणारा आहे. स्त्रीला दिवस गेल्यापासून ते बाळाचा जन्म आणि नंतर काही काळ आईची जी मनोवस्था असते त्या अनुभूतीचे सशक्त चित्रण त्यांनी केले आहे. ‘अरूणिमा’ या संग्रहातीलही काही कविता त्यांनी त्यांच्या मुलीलाच केंद्रस्थानी ठेवून केल्या आहेत. असे असले तरी या कविता त्यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक ठरत नाहीत. त्या वैश्‍विक झाल्यात. प्रतिकात्मक झाल्यात. सूर्यकिरणांवर काय कुण्या एकाचा अधिकार असतो? तो नित्यनेमाने प्रकाश पेरत जातो. या प्रकाशात आपण काय ‘उजेड’ पाडायचा हे आपल्या इच्छाशक्तीवर व कर्तबगारीवर अवलंबून असते. सूर्य त्याचे काम चोखपणे पार पाडतो. चंद्रलेखाताईंनीही समाजाला जागृत करण्याचे काम त्यांच्या लेखणीद्वारे केलेय. आपल्या मुलीमध्ये आपले प्रतिरूप दिसते असे सांगत त्या लिहितात,
अशाच गौरी, दुर्गा, अंबा
अवतरू दे या पृथ्वीतलावर
शक्तीपीठाचा जागर होता
स्वर्ग अवतरे भूतलावर!
सर्व अनिष्ठ दूर सारून पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या कवयित्रीची आहे. आजची पुरूषी मानसिकता सांगताना त्या लिहितात,
असा कोणताच दिवस उगवत नाही 
ज्या दिवशी स्त्री मरत नाही
सावित्री, अहिल्या, सीते
अजूनही तुमची अग्निपरीक्षा टळत नाही
माणसाने निसर्गाची प्रचंड हानी केली. स्वार्थापायी आपण वृक्षसंहार केला. धरणी बोडकी केली. मग निसर्गही कोपला. दुष्काळांच्या झळांनी माणूस होरपळला. सगळीच दैन्यावस्था झाली. त्यामुळे या वरूणराजाला कवयित्रीने विनवणी केली,
निसर्गाचा समतोल
आम्ही जीवापाड जपू
नाही तोडणार झाडे
त्यांचे जतनही करू
माझ्या पोरांच्या डोळ्यातील
आता अश्रू तू थांबव
दे दे जीवदान आम्हा
आता रूसवा संपव
शेवटी त्या म्हणतात
या सृष्टीची निर्माती 
आज विनविते तुला
कर आम्हावर कृपा
अन् वाचव विश्‍वाला
आपण सारे निसर्गाचा समतोल जपू याची सर्वांच्या वतीने ग्वाही देतानाच त्या विश्‍वाला वाचवण्याची विनंती सृष्टीच्या निर्मात्याकडे करतात. यात कुठेही वैयक्तिक स्वार्थाची जळमटे नाहीत. ही सर्वात्मकतेची भावना रूजवण्याचे कार्य सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्यासारखे संवेदनशील साहित्यिक जोमाने करीत आहेत. म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. विचारांचा असा हा यज्ञ नेहमीच विवेक पेरतो. त्याची मधूर फळे समाजात ऐक्य, सामंजस्य, शांती, सुजलाम्-सुफलाम्ता निर्माण करतात. 
‘अरूणिमा’तील कवितात विषयांचे वैविध्य जबरदस्त आहे. प्रेमविवाहापूर्वीची आणि नंतरची अवस्था, पंचवीस वर्षापूर्वी ज्याला नकार दिलाय त्या प्रेमवीराची जाणीव, भरभरून प्रेम करण्याचा केलेला गुन्हा, मर्यादांची लक्ष्मणरेषा, आपटे विद्यालयाजवळील आनंदयात्रींच्या स्मृती, तारूण्याचा कालानुरूप कुचकामी ठरणारा जोश, ब्रह्मांडाच्या साक्षात्काराचे गणित, युगुलांचा श्रावण-वसंत असे असंख्य विषय या संग्रहात आलेत. एक चिमुकली आपल्या अशिक्षित आईला शिकून मोठ्ठं झाल्यावर काय करणार हेही सांगते.
चंद्रलेखा बेलसरे यांनी त्यांच्या कवितेत शेतकर्‍यांविषयी कनवाळाही व्यक्त केलाय. एकेकाळी शरद जोशी यांच्या कांदा आंदोलनात सक्रीय असलेल्या कवयित्रीला शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदना चांगल्याच ज्ञात आहेत. म्हणूनच त्या म्हणतात,
नाही पोटामध्ये अन्न
नाही प्यावयास पाणी
अशी कशी रे शेतकर्‍या
तुझी करूण कहाणी
तू तर पोशिंदा जगाचा
धान्य पिकवून देई
तुझे तुलाच न उरे
अशी कशी दैना होई?
या संग्रहातील ‘वेदना’ ही शेवटची कविता तर मनाचा थरकाप उडवते.
बालपणी कधीच जाणवले नाहीत
वेदनेचे डंख
मोकळ्या अवकाशात विहरत होते
लेवून स्वातंत्र्याचे पंख
असे सांगणार्‍या कवयित्री लिहितात,
मृत्युलाही नाही पहावले
सर्वांगावरील ते असंख्य डंख
घातली मायेची गोधडी
वेदनांचे मिटले पंख
यातील ‘वेदनांनी पंख मिटणे’ ही वाटते तितकी सोपी कल्पना नाही. त्यासाठी परपीडा अनुभवता यायला हव्यात. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक संदर्भांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवताना भावनाही समजून घ्यायला हव्यात. चंद्रलेखा बेलसरे यांची ही समज त्यांच्या अंत:करणातून आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या रचनात मानवी भावभावनांचे प्रतिबिंब चकाकत असते. 
सूर्याची किरणे ज्याप्रमाणे प्रकाशाची पेरणी करतात त्याप्रमाणेच ‘अरूणिमा’ मानवी मनातील अंधार, जळमटं, किल्मिषं दूर सारेल असा आशावाद व्यक्त करतो आणि त्यांना भावी लेखन प्रवासास भरभरून शुभेच्छा देतो.

घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

कवितासंग्रह - अरुणिमा 
कवयित्री - सौ. चंद्रलेखा बेलसरे 
प्रकाशक - 'चपराक प्रकाशन', पुणे (०२०-२४४६०९०९)
पाने - ८८, मूल्य - ८०
 

Saturday, January 21, 2017

‘चपराक’चं संमेलनपूर्व संमेलन!



सध्याच्या नोटाबंदीच्या काळात प्रकाशन व्यवहार ठप्प होत असल्याची ‘अफवा’ तेजीत असतानाच आम्ही पुण्यात चौथा ‘चपराक साहित्य महोत्सव’ घेतला. गुरूवार 19 जानेवारी 2017 रोजी झालेल्या या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकाचवेळी तब्बल 19 पुस्तके ‘चपराक‘तर्फे प्रकाशित करण्यात आली. सुप्रसिद्ध लेखक प्रा. द. ता. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. घुमानच्या साहित्य संमेलनाचे आयोजक आणि ‘सरहद’चे प्रुमख संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा झाला. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची मुलाखत, सागर कळसाईत लिखित ‘कॉलेज गेट’ कादंबरीच्या एका प्रकरणाचे अभिवाचन, माधव गिर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेले कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमामुळे हे खर्‍याअर्थी ‘संमेलनपूर्व संमेलन’ रंगले.
प्रकाशन व्यवहाराला गती मिळण्यासाठी मराठीत उत्तमोत्तम पुस्तके सातत्याने प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची संकल्पना पुढे आली. यापूर्वी या संमेलनास सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे अशा दिग्गजांनी अध्यक्ष, उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली. गुरूवारी झालेल्या समारंभात ‘चपराक’ने 19 पुस्तके प्रकाशित करून मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना कृतिशील ‘चपराक’ दिली आहे.
‘‘ग्रामीण भागाची पार्श्‍वभूमी असतानाही पुण्यासारख्या महानगरात येऊन ‘चपराक’च्या प्रकाशकांनी हे कार्य उभे केले आहे. आज महाराष्ट्र साहित्य परिषद आणि चपराक मासिक ही साहित्य चळवळीची दोन अविभाज्य अंग झाली आहेत. या दोन्ही संस्थांचे काम मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आणि नैतिक अधिष्ठान असणारे असून ‘चपराक’ हे नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ झाले आहे’’ असे गौरवोद्गार द. ता. भोसले यांनी काढले.
संजय नहार यांनी ‘चपराक’चा पाचशे पानांचा विक्रमी दिवाळी अंक, वेळोवेळी घेतलेल्या धाडसी भूमिका यांचे कौतुक केले. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष संजय सोनवणी यांनीही ‘चपराक’मध्ये लेखन येणे कसे प्रतिष्ठेचे आहे आणि ही साहित्य चळवळ जोमाने कशी पुढे येत आहे हे सविस्तरपणे सांगितले.
‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने मी आणि ज्येष्ठ पत्रकार आबा माळकर यांनी भाऊ तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. लेखक, पत्रकार म्हणून भाऊ सर्वांना सुपरिचीत आहेत; मात्र या मुलाखतीतून भाऊंची अनेक रूपे समोर आली. महाविद्यालयीन जीवनात विविध आंदोलनात सक्रिय असणारे भाऊ, भाऊंच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार, बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे या दिलदार नेत्यांच्या आठवणी, शरद पवारांचे राजकारण, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गंमतीजंमती आणि त्यांचे भवितव्य, ‘चपराक’चे साहित्यिक योगदान, शिवसेना, मुंबईतील गिरणी कामगार, भाऊंचा ‘पँथर’मधील सहभाग आणि नामदेव ढसाळांच्या आठवणी, त्यांचे लेखन, नरेंद्र मोदी यांच्याबाबतची त्यांची मते, आचार्य अत्रे यांच्या सभेच्या आणि भाऊंच्या ‘मराठा’मधील कामाच्या आठवणी अशा चौफेर विषयांवर ही मुलाखत रंगली. मुख्य म्हणजे भाऊ तोरसेकर हे एक उत्तम कवी आहेत हे अनेकांना माहीत नव्हते. या संमेलनात अनेक दर्जेदार कविता प्रभावीपणे सादर करून त्यांनी ही मुलाखत अत्यंत उंचीवर नेली.
‘मार्मिक’मधील त्यांच्या सहभागाबाबत सांगताना त्यांनी सांगितले की, ‘‘लेखनासंदर्भात एका विषयावर त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा होती. सुभाष देसाई, मनोहर जोशी असे नेते त्यात सहभागी होते. बाळासाहेबांनी सांगितले की, हा विषय योग्य होणार नाही. भाऊ निर्धाराने आणि ठामपणे म्हणाले, ‘‘हे असेच आले पाहिजे.’’ तेव्हा बाळासाहेब उभे राहिले आणि म्हणाले, ‘मी शिवसेनाप्रमुख आहे...’ भाऊही उभे राहिले आणि म्हणाले, ‘मीही पत्रकार आहे...’ उपस्थित सर्वच नेत्यांच्या चेहर्‍यावर तणाव जाणवत असताना बाळासाहेब हसू लागले आणि त्यांनी सांगितले, ‘मार्मिकला असा भूमिका घेणारा आणि स्वतःच्या मतावर ठाम असणारा संपादक हवाय....’ त्यानंतर माझं आणि त्यांचं नातं अधिक दृढ झालं.’’
शिवसेनेमुळं मुंबईतील मराठी माणूस कसा सुरक्षित आहे हे सांगतानाच भाऊंचं एक विधान तर खरंच खूप विचार करण्यासारखं होतं. ते म्हणाले, ‘‘मुंबईत पोलीस ठाणे नसले तरी चालेल पण शिवसेनेची शाखा पाहिजेच पाहिजे. मुंबई सुरक्षित आहे ती शिवसेनेमुळे आणि त्यात बाळासाहेबांनी रूजवलेला विश्‍वास लोकांच्या मनात आणि हृदयात आहे.’’
सागर कळसाईत हा मराठीतील एक प्रतिभावंत लेखक. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी या तरूणाने बार्शीहून पुण्यात येऊन एम. बी. ए. केले. त्या अनुभवावर ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. ‘चपराक’ने ती प्रकाशित केली आणि मागच्या चार वर्षात या कादंबरीच्या चार आवृत्या झाल्यात. यावर लवकरच एक चित्रपटही येतोय. सागरची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही कादंबरीसुद्धा सध्या वाचकप्रिय ठरतेय. सागर आणि त्याच्या सहकार्‍यांनी या महोत्सवात ‘कॉलेज गेट’चे प्रभावी अभिवाचन केले.
शेवटच्या सत्रात माधव गिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनाने तर वेगळीच उंची गाठली. स्वप्निल पोरे, रमजान मुल्ला, नागेश शेलार, सरिता कमळापूरकर, लक्ष्मण खेडकर, विद्या बयास, रविंद्र कामठे, प्रल्हाद दुधाळ, सौ. चंद्रलेखा बेलसरे, जयंत वाघ, कस्तुरी देवरूखकर, योगेश राऊत, संगीता झिंजुरके, रमेश जाधव, दत्तु ठोकळे अशा कवींनी मैफल गाजवली.
संजय सोनवणी हे महाराष्ट्रातील सुपरिचित नाव आहे. त्यांनी आजवर 85 कादंबर्‍या लिहिल्या. विपुल वैचारिक आणि संशोधनात्मक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘चपराक’ने यापूर्वी ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत सुंदर पुस्तक प्रकाशित केले होते. यंदाच्या साहित्य महोत्सवात त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. गंमत म्हणजे या संग्रहाचे मुखपृष्ठही त्यांनीच साकारले आहे. सदानंद भणगे हे सुद्धा एक मोठे लेखक. त्यांच्या विनोदी कथा, नाटके सर्वश्रूत आहेत. अस्सल आणि गुणवत्तापूर्ण लेखन असलेल्या सदानंद भणगे यांची ओळख प्रामुख्याने ‘विनोदी लेखक’ अशीच आहे. यापूर्वी ‘चपराक’नेही त्यांचे विनोदी लेखन प्रकाशित केले आहे; मात्र या महोत्सवात त्यांचा ‘हॅपी रिटर्न्स’ हा गंभीर कथांचा अत्यंत वाचनीय कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘एमरल्ड ग्रीन’नंतर समीर नेर्लेेकर यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’, गोविंद गव्हाणे यांचा ‘बाजीराव मस्तानी आणि इतर प्रेमकथा’ परभणी येथील लेखिका अर्चना डावरे यांचा ‘जुलूस’ हे कथासंग्रहही यावेळी प्रकाशित झाले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या कवितासंग्रह फारसे कोणी वाचत नाहीत, अशी ‘अंधश्रद्धा’ असताना ‘चपराक’ने सहा कवितासंग्रह प्रकाशित केलेत. त्यात माधव गिर यांच्या ‘शेतीबाडी’ या तंत्रशुद्ध, अष्टाक्षरी खंडकाव्यासह चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अरूणिमा’, रविंद्र कामठे यांचा ‘प्रांजळ’, कस्तुरी देवरूखकर यांचा ‘स्वप्नसखा’, जयंत वाघ यांचा ‘शब्दमाला’, योगेश राऊत यांचा ‘झळा’ आणि दत्तू ठोकळे यांचा ‘माझा सावन’ या संग्रहांचा समावेश आहे.
प्रल्हाद दुधाळ यांचा ‘मना दर्पणा’, विनोद श्रा. पंचभाई यांचे ‘ती’च्या मनातलं’, दत्तात्रय वायचळ यांचं ‘स्वप्नातलं पुणं’ ही पुस्तके प्रकाशित झाली. नाशिक येथील लेखक संजय वाघ यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही प्रेरणादायी किशोर कांदबरीही मराठी साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल.
करमाळा येथील लेखक निलेश सूर्यवंशी हे एक असेच दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व! त्यांनी 2009 साली ‘आभाळ फटकलं’ ही ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेली कादंबरी लिहिली. अनेक प्रकाशकांकडे चकरा मारूनही या हरहुन्नरी लेखकाची फारशी कुणी दखल घेतली नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेने ‘चपराक’च्या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमाची बातमी वाचून त्यांनी ही कादंबरी ‘चपराक’कडे पाठवली आणि आता ती वाचकांच्या भेटीस आली आहे. ‘चपराक नवोदित लेखकांच्या दर्जेदार लेखनास हक्काचे व्यासपीठ देते’ असे सांगत सविस्तर बातमी देणारी सोलापूरातील वृत्तपत्रं आणि मसापची जुळे सोलापूर शाखा यांच्यामुळे हा अस्सल लेखक उजेडात येऊ शकला. उद्या या कादंबरीवर आधारित चित्रपट आला तर कुणाला आश्‍चर्य वाटू नये.
जाता जाता आणखी एक महत्त्वाचे.
सध्या ‘लिहिणारे’ प्रकाशक ही कल्पनाच दुर्मीळ होत चाललीय. सातत्याने येणारी पुस्तके, त्यासाठी त्यांचे पुन्हा पुन्हा करावे लागणारे वाचन, त्याचे वितरण आणि विक्री, प्रसिद्धी यात प्रकाशक इतके अडकून पडतात की क्षमता असूनही ते लेखनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. इतरांना ‘प्रकाशात’ आणणारा प्रकाशकच दुर्लक्षित राहतो. हे आम्ही जाणिवपूर्वक होऊ दिले नाही. माझी ‘दखलपात्र’ आणि ‘झुळूक आणि झळा’  ही अग्रलेखांची दोन पुस्तके प्रकाशित झाली. आता या महोत्सवात ‘अक्षर ऐवज’ हे निवडक प्रस्तावनांचे आणि परीक्षणांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
भविष्यातही आम्ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करू ही ग्वाही देतो. कसदार लेखन असणार्‍यांनी खचून न जाता उमेदीने सातत्याने लिहित रहावे आणि माय मराठीची सेवा करावी हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. असे म्हणतात की, ‘प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो.’ त्या लेखकाला ‘जागे’ करणे आणि मराठी भाषेच्या सर्वंकश विकासाला हातभार लावणे यादृष्टिने ‘चपराक’चे उपक्रम आणि हा संमेलनपूर्व संमेलन ठरणारा महोत्सव मोलाचा ठरणार आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, January 15, 2017

‘चपराक साहित्य महोत्सवा’ची मेजवानी

असे म्हणतात की, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरे मरतात! काहीवेळा माणसेही मरतात; मात्र जिथे विचारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते! ही मानवता जिवंत ठेवायची तर वाचकांना संस्कारशील साहित्य उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा पर्याय उरतो. त्यामुळे आम्ही ‘चपराक प्रकाशन’तर्फे सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्य प्रकाशित करतो. याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी होणारा ‘चपराक’चा साहित्य महोत्सव! एकाचवेळी राज्यभरातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा मानदंड ‘चपराक’ने घालून दिलाय. येत्या गुरूवारी म्हणजे दि. 19 जानेवारी रोजी ‘चपराक’चा चौथा साहित्य महोत्सव पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात पार पडतोय.
या महोत्सवाला पहिल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. दुसर्‍या महोत्सवात महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखकांना आशीर्वाद दिले, तर गेल्या वर्षी तिसर्‍या महोत्सवात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. यंदाच्या महोत्सवासाठी नामवंत लेखक प्रा. डॉ. द. ता. भोसले, घुमानच्या संमेलनाचे आयोजक आणि ‘सरहद्द’ संस्थेचे प्रमुख संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.
यंदा ‘चपराक साहित्य महोत्सवा’त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे. सुरूवातील एकाचवेळी तब्बल अठरा पुस्तकांचे प्रकाशन होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक भाऊ तोरसेकर यांची प्रकट मुलाखत होईल. ज्येष्ठ संपादक हरीश केंची आणि दै. ‘आपलं महानगर’चे वृत्तसंपादक आबा माळकर हे दोघे भाऊ तोरसेकर यांच्याशी दिलखुलास संवाद साधतील. त्यानंतर एक हटके कार्यक्रम म्हणजे ‘कॉलेज गेट’ फेम युवा लेखक सागर कळसाईत यांच्या कादंबरीतील एका प्रकरणाचे अभिवाचन. स्वतः सागर आणि त्याचे काही सहकारी हे अभिवाचन करतील. शेवटच्या सत्रात राज्यभरातील निमंत्रित कवी-कवयित्रींचे संमेलन होईल.
संजय सोनवणी हे मराठी साहित्यातील एक सशक्त नाव. त्यांच्या आजवर 85 कादंबर्‍या प्रकाशित झाल्यात. ते मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की, ज्यांची पुस्तके अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ठेवलीत. त्यांनी आजवर अनेक कथा लिहिल्या; मात्र त्यांच्या कथा पुस्तकरूपात आल्या नाहीत. त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा पहिला कथासंग्रह ‘चपराक’कडून या महोत्सवात प्रकाशित होतोय. सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे हे नावही मराठी साहित्याला नवे नाही. त्यांची काही पुस्तके यापूर्वी ‘चपराक’ने प्रकाशित केलीत आणि ती सर्वच वाचकप्रिय ठरलीत. यंदाच्या महोत्सवात त्यांचा ‘हॅप्पी रिटर्न्स’ हा संग्रह प्रकाशित होतोय. आमच्या उपसंपादिका आणि ज्येष्ठ कवयित्री सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्याभास’ हा गूढ कथांचा संग्रहही वाचकांच्या भेटीस येणार आहे. मराठीत गूढ कथा लोप होत चाललेल्या असताना हा संग्रह मोलाचा ठरणार आहे. परभणी येथील लेखिका सौ. अर्चना डावरे याही सध्या कथाकार म्हणून पुढे येत आहेत. त्यांचा ‘जुलूस’ हा दुसरा कथासंग्रह यंदाच्या महोत्सवात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
विनोद श्रा. पंचभाई हे गेल्या काही काळात सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लिहित आहेत. आपले प्रशासकीय कामकाज सांभाळत त्यांचा लेखनगाडा सुसाट सुटलाय. ‘थोडं मनातलं’,  ‘मुलांच्या मनातलं’, ‘आपले राष्ट्रसंत’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली. आता त्यांचे ‘तीच्या मनातलं’ हे हटके पुस्तक प्रकाशित होतंय. ‘ती’च्या मनात काय चाललंय हे खुद्द देवाधिदेवालाही कळत नाही, असे म्हणत असताना पंचभाईंनी हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्या या ‘धाडसा’ला आपण दाद द्यायलाच हवी.
नाशिक येथील लेखक आणि पत्रकार संजय वाघ हे माणसांची मने वाचण्यात निष्णात आहेत. सध्या बालसाहित्य दुर्मीळ होत चाललेय, अशी हाकाटी पिटली जात असतानाच त्यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही किशोर कादंबरी आम्ही आकर्षक स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. पुणे शहराचा आरसा दाखणारं ‘स्वप्नातलं पुणं’ हे दत्तात्रय वायचळ यांचं पुस्तकही लक्षवेधी ठरेल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या कवितासंग्रह कोणीही प्रकाशित करीत नाही, अशी एक अंधश्रद्धा जाणिवपूर्वक पसरवली जाते. त्याला उत्तर म्हणून आम्ही उत्तमोत्तम कवितासंग्रह प्रकाशित करीत आहोत. यातील कवी माधव गिर यांचे ‘शेतीबाडी’ हे खंडकाव्य तर मराठी काव्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरेल. केवळ ‘शेती आणि शेतकरी’ हाच विषय घेऊन तीनशे छंदोबद्ध (संपूर्ण अष्टाक्षरी) कडवी त्यांनी केलीत. रविंद्र कामठे यांचा ‘प्रांजळ’, जयंत वाघ यांचा ‘शब्दमाला’, योगेश राऊत यांचा ‘झळा’, कस्तुरी देवरूखकर यांचा ‘स्वप्नसखा’, चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अरूणिमा’, दत्तू ठोकळे यांचा ‘माझा सावन’ असे दर्जेदार कवितासंग्रह आम्ही यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त प्रकाशित करीत आहोत.
समीर नेर्लेकर हे लेखक, कवी, तंत्रज्ञ आणि चित्रकार म्हणून आपणास परिचित आहेत. यापूर्वी त्यांचा ‘एमरल्ड ग्रीन’ हा कथासंग्रह प्रचंड वाचकप्रिय ठरला. आता त्यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हा लघुकथासंग्रह प्रकाशित होतोय. नांदेड येथील लेखक प्रा. गोविंद गव्हाणे यांचेही एक आगळेवेगळे पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत. ‘बाजीराव मस्तानी आणि इतर प्रेमकथा’ हे त्यांचे जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रेमकथांचे पुस्तक वाचकांना नक्कीच भावेल. सामाजिक विषयावर भाष्य करणारे प्रल्हाद दुधाळ यांचे ‘मना दर्पणा’ हे वैचारिक लेखांचे पुस्तक, करमाळा येथील लेखक नीलेश सूर्यवंशी यांची ‘आभाळ फटकलं’ ही ग्रामीण राजकारणावर आधारित कादंबरी हे यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
जाता जाता एक महत्त्वाचे! लेखक, वाचक, प्रकाशक आणि संपादक या नात्याने आजवर वाचकांनी माझे बरेच लाड पुरवलेत. त्यामुळेच मी यापूर्वी ‘दखलपात्र’ आणि ‘झुळूक आणि झळा‘  ही अग्रलेखांची दोन पुस्तके प्रकाशित केली. त्याच्या आवृत्याही हातोहात जात आहेत. सर्वात कमी वयात अग्रलेखांची पुस्तके प्रकाशित करणारा संपादक म्हणून सगळ्यांनी आम्हाला गौरविले. दै. ‘आपलं महानगर’मध्ये गेला काही काळ मी सातत्याने विविध पुस्तकांचे रसग्रहण करीत आहे. यातील निवडक पंचवीस लेखांचे ‘अक्षर ऐवज’ हे माझे तिसरे आणि ‘चपराक प्रकाशन’चे शंभरावे पुस्तक आपल्या सेवेत सादर करतोय.
सध्या वाचक कमी होत चाललेत, अशा अफवा काही प्रकाशक जाणिवपूर्वक पसरवत असताना आम्ही साहित्य आणि प्रकाशन विश्‍वात नवनवे प्रयोग करतोय. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळतोय. ‘चपराक’चा साहित्य महोत्सव हे नव्या जुन्या लेखकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरतेय. आपले प्रचंड प्रेम आणि मिळणारा पाठिंबा या बळावर भविष्यातही आम्ही असेच जोमाने कार्यरत राहू, याची प्रकाशक या नात्याने ग्वाही देतो आणि 19 जानेवारीला दुपारी 2 ते सायंकाळी 9 पर्यंत चालणार्‍या या महोत्सवाला आपणही उपस्थित रहावे यासाठी प्रकाशक या नात्याने निमंत्रण देतो.
अधिक माहितीसाठी संपर्क - 7057292092

Saturday, January 14, 2017

बदलापूर आणि सोलापूर

सध्या थंडीचे दिवस आहेत. या गारव्यात वैचारिक ऊब देण्याचे काम साहित्य संमेलने करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागताच राज्यभर अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने धडाक्यात पार पडतात. विविध ठिकाणी होणारी आणि विविध विचारधारांचा जागर घालणारी ही संमेलने आपल्या सांस्कृतिक समृद्धीत मोलाची भर घालतात. त्यामुळे या सगळ्या  संमेलनांचे महत्त्व मोठे आहे.
गेल्या 25 आणि 26 डिसेंबर रोजी बदलापूर येथे विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. ‘संमेलनपूर्व संमेलन’ अशी जाहिरात आयोजकांनी केली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची कुळगाव-बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम - डोंबिवली (यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक), सुहृद एक कलांगण - बदलापूर आणि ग्रंथसखा वाचनालय यांनी एकत्र येऊन हे संमेलन भरवले होते. नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे हेच याही संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
श्याम जोशी हे ग्रंथालय चळवळीतील एक मोठे नाव. नुकतेच महाराष्ट्र शासनाने त्यांना ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून मराठी वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावे दिला जाणारा ‘भाषा संवर्धक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. बदलापूर येथे ते ‘ग्रंथसखा’ हे अतिशय नेटके आणि समृद्ध ग्रंथालय चालवतात. ‘दुर्मीळ ग्रंथसंग्रहक’ अशी त्यांची ओळख आहे. तर या श्याम जोशी यांच्या प्रयत्नातून हे संमेलन पार पडले.
विचारयात्रा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा झाल्यानंतर निमंत्रितांचे कवीसंमेलन झाले. अशोक नायगावकर, प्रदीप निफाडकर, दामोदर मोरे, राजीव जोशी, मंदाकिनी पाटील, वैजनाथ जोशी, अनुपमा बेहेरे, विश्‍वास जोशी यांनी ही मैफल रंगवली. सुप्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत झाली. याठिकाणी ‘सदानंद मोरे ग्रंथ महोत्सव’ भरवला होता. मात्र त्यात कोणीही सहभागी झाले नाही. मोरेंच्या नावे ग्रंथमहोत्सव भरवल्याची कुत्सित चर्चा मात्र सुरू होती. रात्री ‘प्रतिबिंब’ हा नृत्य, नाट्य आणि कवितांचा कोलाज असलेला कार्यक्रम झाला.
दुसर्‍या दिवशी पहिला परिसंवाद होता, ‘अश्‍लिलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर. अनंत देशमुख यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण बीजभाषण झाले. यात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत आणि ‘चिन्ह’ या नियतकालिकाचे संपादक सतीश नाईक सहभागी झाले होते. सावंतांनी त्यांचे लैंगिक विषयावरील वाचनाचे आणि लेखनाचे अनुभव सांगितले. सतीश नाईक यांनी मात्र स्वअनुभव सांगताना अत्यंत पाल्हाळीक आणि रटाळ माहिती दिली. प्रत्येकाला वीस मिनिटे दिलेली असताना त्यांनी पहिली वीस मिनिटे ‘सनातन’च्या साधकांनी त्यांना कसा त्रास दिला, ते दिसायचे कसे, बोलायचे कसे, वागायचे कसे, अंक चालवताना दडपण कसे येते यावरच घालवली. त्यांची चाळीस मिनिटे झाल्यावर नाईलाजाने संयोजकांनी त्यांना चिठ्ठी पाठवली. ती त्यांच्याकडे देत असताना त्यात काय लिहिलेय हेही न पाहता त्यांनी ‘माझे भाषण थांबविल्याचा निषेध आणि यावर मी आता कसे लिहितो ते पहाच’ असे म्हणत सभागृह सोडले. त्यांनी सभा संकेताचा भंग करत व्यासपीठ सोडल्यावर प्रा. मिलिंद जोशी यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत वेळ निभावून नेली. त्यांच्या समारोपाच्या भाषणाने रसिक तृप्त झाले.
पुढच्या सत्रात ‘कथा कशी समजून घ्यावी’ या विषयावर संजय भास्कर जोशी यांनी व्याख्यान दिले. निलिमा बोरवणकर यांची आवेशपूर्ण कथा झाली. प्रतिमा इंगोले यांनी वैदर्भिय भाषेत कथाकथन केले मात्र ते रसिकांच्या डोक्यावरून गेले. संध्याकाळचा ‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते?’ या विषयावरील परिसंवाद मात्र उत्तम झाला. विनय हर्डीकर, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, सदानंद मोरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मिलिंद जोशी यांनी हा परिसंवाद रंगवला.
या परिसंवादाला आणि एकूणच साहित्य संमेलनाला जेमतेम शंभरएक लोक उपस्थित होते. श्रीकांत जोशी, श्याम जोशी, रवींद्र गुर्जर या सर्वांनी संमेलन यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र उपस्थिती आणि काही अपवाद वगळता कार्यक्रमांचा दर्जा अत्यंत सुमार होता. मान्यवर लेखक, त्यांचा पाहुणचार, बडेजाव, भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था असे साहित्यबाह्य विषय दखलपात्र होते; मात्र लाखो रूपये खर्च करूनही या संमेलनाचे फलित काय, हा मात्र चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
सोलापूरच्या संमेलनाची परिस्थिती याउलट होती. हे पहिलेच आदिवासी धनगर साहित्य संमेलन! मात्र यात नवखेपणाच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. भंडारा उधळून या संमेलनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूरातील हुतात्मा स्मारक मंदिर रसिकांनी खचाखच भरले होते. बाहेर पडद्यावर लोक कार्यक्रम पाहत होते. पुस्तकांची विक्री तडाख्यात होती. ‘आपले संमेलन‘ म्हणून सर्वजण आत्मियतेने सहभागी होते. संजय सोनवणी यांच्यासारखा अभ्यासू संमेलनाध्यक्ष, डॉ. अभिमन्यू टकले यांच्यासारखे आयोजक, अमोल पांढरे यांच्यासारखे तळमळीने अहोरात्र कार्यरत असलेले कार्यकर्ते या सर्वांचे साध्य म्हणजे हे अभूतपूर्व आणि पूर्ण यशस्वी संमेलन. धनगर आणि आदिवासींच्या नावे होणार्‍या या संमेलनाला किती लोक गोळा होणार अशी सर्वांनाच चिंता होती! मात्र सर्वांचेच अंदाज साफ खोटे ठरले आणि सभागृह खचाखच भरले. समाजबांधवांची बौद्धिक भूक भागविणारा हा कार्यक्रम ठरला.
या संमेलनात आदिवासी धनगरांचे गजनृत्य आणि ओव्यांचे सादरीकरण झाले. आदिवासी धनगर पुरातनाचे एक वास्तव, आदिवासी धनगरांच्या महिलांसमोरील समस्या आणि नवयुगातील आव्हाने, आदिवासी धनगर समाजाचा इतिहास, माध्यमातील धनगर समाजाचे चित्रण, मराठी साहित्यात धनगर समाज दुर्लक्षित का?, धनगर समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा राजमार्ग, धनगर आरक्षण लढाई अशा अभ्यासपूर्ण विषयांवर परिसंवाद झाले. अत्यंत नेटके नियोजन, शिस्तबद्धता, एका जातीच्या अस्मितेला उजाळा, पंढरपूरच्या पांडुरंगापासून ते सातवाहन, महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर,  स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकर अशा सर्वांच्या आदर्शवादी तत्त्वांचा जागर घालण्यात आला.
मुख्य म्हणजे सध्या जातीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना यात सर्व जातीचे लोक वक्ते म्हणून आणि रसिक म्हणून सहभागी होते. इतर जातींविषयी कोणीही द्वेष व्यक्त केला नाही. आपले बांधव एकत्र येऊन या बिकट परिस्थितीतून कसे मार्ग काढू शकतील याविषयी सर्वजण तळमळीने बोलत होते. या साहित्य संमेलनात धनगर इतिहास परिषद आणि धनगर साहित्य परिषद सुरू करण्याचा ऐतिहासिक संकल्प करण्यात आला. त्यादृष्टिने सर्वांनी जोरदार तयारीही सुरू केली. प्रस्थापितांविरूद्ध रडत बसण्याऐवजी स्वाभिमानाने पुढाकार घेत एक नवा इतिहास निर्माण करण्याचे हे धाडस हेच या संमेलनाचे मोठे फलित आहे. प्रस्थापित संमेलने मानपानात आणि रिकामटेकड्या डामडौलात अडकलेले असताना एक उपेक्षित वर्ग पुढे येऊन त्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे स्मरण करत असेल, त्यातून नव्या पिढीपुढे आदर्शांचे मनोरे उभे करत असेल तर हे निश्‍चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. संजय सोनवणी, डॉ. टकले, जयसिंगतात्या शेंडगे, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे या सर्वांच्या प्रयत्नांना आलेले हे मधुर फळ आहे.
मुळात आपण सर्वजणच पशुपालक. पूर्वी शिकारीवर आपली उपजिविका चालायची. त्यानंतर मनुष्य पशुपालन करू लागला आणि त्यातून शेतीचा शोध लागला. याच शोधातून वेगवेगळे उद्योग निर्माण झाले आणि या उद्योगातून जातींचा जन्म झाला. या जातीपातीत आपण इतके अडकलोय की, आपल्या अस्मिताच बोथट झाल्यात. जे मूळ आदिवासी आहेत त्यांनाच दुर्दैवाने आपण कमी लेखू लागलोय. त्यामुळे या संमेलनाची नितांत गरज होती. ती गरज पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने पूर्ण केली आहे.
बदलापूर आणि सोलापूर या दोन्ही साहित्य संमेलनात हाच तर फरक होता! मात्र काहीही असले तरी अशी संमेलने आपली भाषा, साहित्य, संस्कृती जिवंत ठेवण्यात मोठा हातभार लावत असल्याने त्यांचे स्वागतच करायला हवे. आदिवासी - धनगरांनी यादृष्टिने एक पाऊल पुढे टाकून महाराष्ट्राचा सांस्कृतिक परिघ तिकडे सरकल्याचे सिद्ध केले आहे. ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने ही संमेलनेच समाजाचे वैचारिक भरणपोषण करू शकतील.
 - घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, January 8, 2017

मराठवाड्याची बहिणाबाई!


आभाळ दाटल्यावर काय होतं?
पाऊस कोसळतो!

आणि ‘अंतरी’चे आभाळ दाटल्यावर?
अस्सल कविता बरसतात!!

पाऊस पडल्यानंतरची प्रसन्नता आणि अंतःकरणातले काव्यमय विचार कागदावर उतरल्यानंतरची भाव्यात्मकता फारशी वेगळी नसते. धो धो बरसणार्‍या सरी पाण्याचा दुष्काळ नष्ट करतात आणि अंतरीच्या सरसर येणार्‍या ओळी मन मोकळे करतात. ‘आकाश’ आणि ‘आभाळ’ याच्यात हाच तर फरक आहे. आकाश कसं? नेहमीच निरभ्र! ‘आभाळ’ मात्र भरून आलेलं! आपल्या वर्षावानं धरतीला तृप्त करण्यासाठी सरसावलेलं! आमची मराठवाड्याची ‘बहिणाबाई’ म्हणजे कवयित्री सौ. विद्या बयास ठाकूर यांचा ‘आभाळ अंतरीचे’ हा कवितासंग्रह याच पठडीतला! मनातलं सारंसारं व्यक्त करताना त्यांची काव्यात्म अनुभूती वेगळ्याच उंचीवर जाते.
सुटून जातात माणसं
तुटून जातात नाती
आयुष्यभर काळजावरती
एक जखम भळभळती

असं लिहिणार्‍या विद्या बयास यांनी त्यांचे जीवनानुभव समर्थपणे मांडले आहेत. अर्थात, यातल्या सर्वच कविता अनुभवातून आल्यात असंही नाही. स्त्रीत्त्वाच्या हृदयानं घेतलेली अनुभूतीही त्यांनी लेखणीच्या माध्यमातून मांडली आहे. कवयित्री मुळूमुळू रडत बसणारी कोणी अबला नाही. स्वतंत्र विचारधारेची, आजच्या पिढीचे नेतृत्व करणारी, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी ती एक बंडखोर प्रतिनिधी आहे. ‘फिनिक्स’ या पहिल्याच कवितेत ती म्हणते,
मी एक फिनिक्स राखेआड दडलेला
कितीही गाडलं तरी पुन्हा पुन्हा उडणारा

स्त्रीत्वाचं सामर्थ्य मांडतानाच
झुंजूमुंजू होण्याआधी
रात नको होऊ देऊ
गर्भातल्या अंधारात माझा
घात नको होऊ देऊ

अशी रास्त अपेक्षा व्यक्त करत ही ‘माय माऊली’ स्त्री भ्रुणहत्या थांबविण्याचे कळकळीचे आवाहन करते.
आपल्या मनातल्या जोडीदाराविषयी लिहिताना या कवयित्रीचा आविष्कार पहा -
असा हवा जोडीदार
स्वप्नातला राजकुमार
धडपडत्या पावलांना
नकळत जो देईल आधार
आकाशाची ओढ मला
क्षितिजापर्यंत माझ्या कक्षा

धावण्याचा कैफ मला
उडण्याची डोक्यात नशा

विद्या बयास यांचा हा पहिलाच कवितासंग्रह! तरीही मी त्यांना ‘मराठवाड्याची बहिणाबाई’ असंच म्हणतो. काहींना हे विशेषण म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. वाटू देत! पण त्या त्या क्षेत्रातील मनोर्‍यांचा वारसा पुढे कुणीतरी चालू ठेवावा लागतो. विद्याताई हा वारसा जपत आहेत. त्यांच्या काही ओळी बघाच -
एखादी स्त्री मुक्त होताना
समाज इतका का अस्वस्थ होतो?
बाईच्या देहातसुद्धा
एक स्वतंत्र आत्मा वसतो
/ (अनुत्तरीत प्रश्‍न)

रोज नवीन प्रश्‍न समोर
रोज नवी आव्हाने
सांग कसे लक्षात राहिल
जीवनाचे मंजूळ गाणे
/ (झिंग)

माझ्या बदलत्या मोसमांचा
तुला कधीच अंदाज नसतो
रम्य, अहंकारी मोरसुद्धा
मेघांसाठी नाही
त्याच्या सहचारिणीसाठी नाचतो
/ (शिकायत)

प्रेताचं एक बरं असतं
एकदाच ते तर जळत असतं
बाईतल्या रूपातलं एक जीवन
रोज कितीदा मरत असतं
/ (बाई)

विद्या बयास यांच्या या संग्रहात 59 रचना आहेत. मम्मटाची ‘स्वान्तसुखाय’ची कल्पना इथे दिसत नाही. विद्याताई त्यांच्या लेखणीतून आजचे प्रश्‍न मांडतात. अनेक तरल भावना व्यक्त करतानाच मधुनच अंगार फुलवतात. जीवनात समरसून गेलेल्या प्रत्येकालाच हा आपल्याच भावनांचा आविष्कार वाटेल. मनातील वेदना शब्दबद्ध झाल्याची जाणीव होईल. आभाळ कोसळल्यानंतर जो मृद्गंध दरवळतो तशी प्रसन्नता अनुभवता येईल. शब्दलालित्य आणि यमकांचा हव्यास न धरता, त्यात न गुरफटता विद्याताई प्रांजळपणे आणि उत्फुर्तपणे व्यक्त होतात. जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत उमटते. मानवी स्वभावाचे मुलभूत चिंतन त्यातून प्रगट होते.
संघर्षातून शिक्षण पूर्ण केेलेल्या विद्याताई मराठवाड्यातील शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक या नात्याने विद्यादानाचेच काम करतात. या परिसरावर उर्दू आणि कन्नड भाषेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी हिंदी (खरंतर उर्दू) शब्दांचा चपखल वापर केला आहे. मात्र हे शब्द मराठवाड्याच्या लोकजीवनात इतके एकरूप झालेत की ते मराठी नाहीत हे कुणाला सांगूनही पटणार नाही.
बाईच्या काळजाचा
कुणा लागना कधी ठाव
वरून शिनगार साजरा
काळजात खोल घाव

असं मानणार्‍या विद्याताईंनी अनेक घाव यशस्वीरित्या पचवलेत. त्याची तमा मात्र त्या बाळगत नाहीत.
आभाळ अंतरीचे
तू चंद्र त्यात माझा
चुकवून चांदण्याला
उधळून ऊन गेला

अशी स्त्रीसुलभ अंतर्व्यथा त्या मांडतात.
आई, मुलगी, जोडीदार यांच्याविषयीच्या त्यांच्या प्रामाणिक भावना या कवितांतून शब्दांकित झाल्या आहेत. त्यामुळे वाचकांना या कविता आपल्याच आयुष्याचा चलचित्रपट वाटेल. त्यात कुठंही नैराश्य नाही तर नव्याने उभं राहण्याची, सुसज्ज होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. हा असा आशावादच प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची दारं उघडतो. हतबलता, नैराश्य पळवून लावून वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करतो. हीच तर कोणत्याही प्रतिभावंताची कसोटी असते. विद्याताई या कसोटीत अव्वल उतरल्यात. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करतानाच त्यांनी जीवनातील सत्य त्यांच्या कवितेतून ठळकपणे अधोरेखित केले आहे. काव्यक्षेत्रातील त्यांची सुरूवात दमदार झाली असून भविष्यात त्यांच्याकडून विपुल साहित्यनिर्मिती होईल अशी अपेक्षा ठेवायला मोठा वाव आहे. त्यांच्या भावी लेखनप्रवासास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कवयित्री - विद्या बयास (7841968366)
प्रकाशक - निर्मल प्रकाशन नांदेड
पाने - 71, किंमत - 80


- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२ 

गडकरींचे नाटक आणि ब्रिगेडचा ‘ड्रामा!’

आपल्या समाजाला सध्या एक मोठी कीड लागलीय. सर्व महापुरूषांना आपण जातीपातीत वाटतोय. बरे, त्यांचे काही विचार अंमलात आणतोय असेही नाही. आचार्य विनोबा भावे म्हणायचे की, ‘महापुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात.’ त्यांच्या या विचाराची सत्यता गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. आमच्या जातीय अस्मिता अधिक टोकदार होत चालल्यात. यातून किमान त्या त्या समाजाचे भले होतेय असेही नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने ‘समाजशास्त्रीय भूमिका’ म्हणून जातीवादाला खतपाणी घातले. त्या-त्या जातीपातीतील लोक एकत्र आल्यास त्यांच्या समस्या सुटायला हातभार लागेल अशी त्यांची भाबडी समजूत; मात्र आपण स्वार्थाच्या आणि विविध विचारधारांच्या इतके आहारी गेलोय की आपले स्वत्वच हरवत चाललेय.
पुण्यात संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही समाजकंटकांनी रात्रीतून काढून टाकला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही या दुष्कृत्याची जबाबदारी घेतली. एखादी अतिरेकी, दहशतवादी संघटना एखादा घातपात घडल्यानंतर तो आपण घडवल्याचे ज्या आविर्भावात सांगते तोच आवेश ही जबाबदारी घेणार्‍यांचा होता. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच घटना अभिमानाने मिरवणार्‍यांना काय म्हणावे? यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडणार्‍यांनी, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढणार्‍यांनी, वाघ्याचा पुतळा फोडणार्‍यांनीच राम गणेश गडकरींचा पुतळा काढून टाकला आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील धुरिणांनी या घटनेचा निषेध केला असला तरी या गुन्हेगारी कृत्याची आणि त्यांच्या निगरगट्ट मानसिकतेची गंभीर नोंद घ्यायलाच हवी.
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचे नुकतेच राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. यापूर्वीही या मंडळींनी एक राजकीय पक्ष काढला होता. त्यावेळीही सपशेल तोंडावर आपटल्यानंतर त्यांनी हाच प्रयत्न पुन्हा केला आहे. सध्या पुण्या-मुंबईसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जनतेचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून त्यांचे असे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्मितीची क्षमता नसल्याने हे लोक विध्वंसच घडवणार हे पुन्हा पुन्हा त्यांच्या कृत्यातून दिसून येतच आहे. आजवर या लोकांचे भरणपोषण ज्यांनी केले त्यांच्यासाठीही ही मोठी डोकेदुखी झाली आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्यांनी काढून टाकल्यानंतर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ‘लवकरच तो त्या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येईल’ असे सांगितले आहे. मुख्य म्हणजे दादोजींचा पुतळा हटवला त्यावेळीही मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच महापौर होते. जगतापही राष्ट्रवादीचेच आहेत. त्याहीवेळी ‘दादोजींचा पुतळा आठ दिवसाच्या आत पुन्हा बसवण्यात येईल,’ अशी घोषणा राजपालांनी राणा भीमदेवी थाटात केली होती. अजूनही त्याचे काय झाले हे कळले नाही.
राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले. खरेतर ते अपूर्णच होते. त्यातील जिवाजी कलमदाने हे एक खलपात्र आहे. दुष्ट वृत्तीचे हे पात्र शिवाजी महाराजांविषयी चुकीचे बोलते. मुख्य म्हणजे याच पात्राने समर्थ रामदास स्वामी यांचीही निंदानालस्ती केली आहे. गडकरी हे काही इतिहासकार नाहीत. त्यांनी हे चरित्रात्मक लेखन केले नाही. रावणाने रामाचे गोडवे गावेत किंवा अफजलखानाने शिवाजीराजांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवताच येणार नाही. हे खलपात्र ज्या भाषेचा वापर करते ते चूक की बरोबर हा वाद होऊ शकतो. मात्र ‘महाराष्ट्र गीत’ लिहिणारे आणि लक्षवेधी साहित्य संपदा असणारे गडकरी ‘व्हिलन’च होते असा निष्कर्ष काढणे अविवेकी आहे. 1907 साली लिहिलेल्या या नाटकावरून 2017 साली ‘ड्रामा’ करणे हे निव्वळ राजकारण आहे.
चार तरूण कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यानातून हा पुतळा काढला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. ही चारही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय, याचा पत्ता असणे शक्य नाही. देशभक्ती काय असते हेही यांना सांगून उपयोग नाही. मात्र हे अविचारी, तालिबानी वृत्तीचे, दहशतवादी स्वरूपाचे कृत्य आहे इतकेही कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. संभाजी ब्रिगेडच्या चिथावणीवरून ज्या तरूणांनी भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड केली त्यांचे काय हाल झाले हे एकदा मुद्दामहून बघायला हवे. या कुणालाही कसल्याही नोकर्‍या मिळत नाहीत. त्यांना धड व्यवसाय-उद्योग करता येत नाही. कोर्टाच्या तारखा पडल्यानंतर उपस्थित राहण्यासाठी, प्रवासासाठीही यांच्याकडे पैसे नसतात. बाहेरचे सोडा पण कुटुंबातील सदस्यही यांच्याशी परकेपणे वागतात. अशावेळी कोणतेही ‘माफीवीर’, ‘शिवीश्री’ त्यांच्याबाजूने उभे राहत नाहीत. यांची होणारी ससेहोलपट पाहिल्यानंतर असे गुन्हेगारी कृत्य करायला कोणीही धजावणार नाही. तरूणांचा ‘ब्रेन वॉश’ करून राजकारण करणारे मात्र नामानिराळे राहतात.
पुतळ्यामुळे कुणाला फार स्फूर्ती मिळते असेही नाही. मात्र आपल्या देशात पुतळ्यांचे ‘फॅड’ आहे. त्यात सर्वाधिक पुतळे राजकारण्यांचे आहेत. काही राज्यात साहित्यिक, विचारवंत,  संतमहात्मे, समाजसुधारक, शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत; पण त्यामुळे कुणी फार प्रेरणा घेतलीय आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेय असेही नाही. उलट पुतळ्यांची सुरक्षा, त्यांची विटंबना यामुळे अनेक वाद निर्माण होतात. शिवसागरात तयार करण्यात येणारा शिवरायांचा पुतळा असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पुतळा असेल किंवा आता इंदू मिलमध्ये संकल्पित असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल... या प्रत्येक पुतळ्यावर, त्या प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. पैशाचा असा बाजार मांडण्याऐवजी त्या त्या महापुरूषांचे विचार जपण्यासाठी काही करता आले तर अवश्य विचार व्हावा.
इतिहासाची तोडफोड हा तर अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय झालाय. आपल्याला हवे ते वाक्य घ्यायचे, त्याचे मागचे-पुढचे संदर्भ न लावता त्याचा अर्थ लावायचा आणि श्रद्धास्थानांना तडा देऊन राजकारण पेटवायचे हे इथल्या व्यवस्थेत काहीजणांच्या ‘उपजिविकेचे’ साधन झालेय. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’चे घेता येईल. बाबासाहेबांनी लिहिले, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच...’ या वाक्यावरून आऊसाहेबांची बदनामी झाली म्हणून काहींनी महाराष्ट्र पेटवला. ते मूळ वाक्य असे होते, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच... ते म्हणजे सह्याद्री!’ यातील ‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढून टाकायचे आणि आपणच आपल्या श्रद्धास्थानांची बदनामी करायची असे निलाजरेपण काहीजण करतात.
गडकरींच्या ‘एकच प्याला’तले तळीराम शोभावेत असे काही लोक कोणत्याही काळात असतात. त्यांना पर्याय नसतो. त्यांच्या विकृत मानसिकतेचा राष्ट्राला मात्र मोठा फटका बसतो. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. रोजच्या भाकरीचा प्रश्‍न बिकट असताना आपण पुतळ्यासारख्या विषयावरून राजकारण करतोय, राज्य पेटवतोय याचे काहीच सोयरसुतक अशांना नसते. त्यांच्या बोलबच्चनगिरीला बळी पडलेल्यांची मात्र पुढे केविलवाणी अवस्था होते. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे मात्र अशा प्रकारानंतर मूग गिळून गप्प बसतात. त्यांचा ‘निषेध’, ‘प्रतिक्रिया’ हे सर्व काही सोयीस्कर असते.
महापुरूषही काळाच्या रेट्यात कसे दुर्लक्षित राहतात याबाबत रॉय किणीकर यांनी त्यांच्या एका रूबाईत सांगितलेय,
कोरून शिळेवर जन्म मृत्युची वार्ता
जा ठेवा त्या जागेवर पणती आता
वाचेल कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा? कशास याचे स्मरण?

गडकरींचा पुतळा काढल्याने थोडेसे विस्मृतीत गेलेले त्यांचे साहित्य पुन्हा चर्चेत आले आहे. जे ‘राजसंन्यास’ फार कुणी वाचले नव्हते ते यानिमित्ताने पुन्हा घराघरात पोहोचले आहे. गडकरींच्या नाटकावरून ‘ड्रामा’ करणार्‍यांचे हे यश आहे की अपयश आहे हे त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Wednesday, January 4, 2017

ही तर मेकॉलेचीच अवलाद!

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

असे महन्मंगल काव्य लिहिणारे राम गणेश गडकरी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासारख्या महानगरातून यापूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला होता. आज संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकून पुणे शहराचा ‘सिरीया’ झालाय हे काही अपप्रवृत्तींनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, पुण्यातील साहित्यिक, कलावंत, प्रकाशक यांनी तातडीने एकत्र येऊन या प्रवृत्तींचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडचे संघटनेतून राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर असे प्रकार घडणे अपेक्षित असले तरी ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रावरील हा सांस्कृतिक बलात्कार तमाम मराठी माणसांनी एकत्र येऊन थांबवायला हवा.
‘विचारांची लढाई विचाराने लढायला हवी’, हे गुळगुळीत वाक्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्‍यांची तालिबानी वृत्तीच यातून दिसून येते. उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे इतिहास, नाटके, कथा-कादंबर्‍या लिहिल्या जातात. मुळात हे लिखाण करणारे सर्वजण इतिहास संशोधक असतातच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कलाकृतीत काहीना काही आक्षेपार्ह असे असतेच. वाचकांची त्या त्यावेळची मानसिकता आणि बदलत्या काळानुसार ते लेखन कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. राम गणेश गडकरी यांनी त्या काळात लिहिलेले ‘राजसंन्यास’ हे नाटक तसे अपुरेच राहिले. या नाटकातील जिवाजी कलमदाने या पात्राने शिवाजी राजांची बदनामी केल्याचे आत्ता म्हणजे शंभरहून अधिक वर्षांनी काही जणांना उमजले. कुठून ना कुठून महापुरूषांची वादग्रस्त विधाने शोधायची आणि त्यावरून खल करत रहायचा हा काही समदु:खी लोकांचा उद्योगच होऊन बसलाय. जिवाजी कलमदाने हे पात्र या नाटकात देहू या पात्राजवळ फुशारकी मारताना छत्रपती शिवरायांविषयी वाईट बोलते. किंबहुना या जिवाजीने समर्थ रामदास स्वामींची यथेच्छ नालस्ती केली आहे. शिवरायांच्या कर्तृत्वावर संशय घेताना तो रामदास स्वामी यांच्याविषयी वाटेल ते तारे तोडतो. मुळात हे खलपात्र भ्रष्ट आहे. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशा ठेवता येतील? रावणाने रामाची महती गावी किंवा अफजलखानाने शिवरायांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे नाही का?
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरूनही आत्तापर्यंत झालेली झुंडशाही आपण बघितलेली आहेच. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’वरून राडा झाला. आता ‘राजसंन्यास’ या अर्धवट नाटकातील एका पात्राच्या संवादाने अकारण महाराष्ट्र पेटवला जात आहे. कोणत्याही साहित्य कृतीतून आपल्याला हवा तितका भाग सोयीस्करपणे घेतल्यास रामायण, महाभारत अशा महाकाव्यावरूनही राष्ट्र पेटवले जाऊ शकते.
संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याने ते नाट्यरसिकांच्या आणि वाचकांच्या हृदयातून मुळीच जाणार नाहीत. देशातील सर्वच साहित्यिकांचे, विचारवंतांचे, शास्त्रज्ञांचे पुतळे काढून टाकावेत आणि केवळ राजकारण्यांचे पुतळे देशभर लावावेत, अशी अपेक्षा यानिमित्ताने साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी अतिशय हताशपणे व्यक्त केली. देशभर अनेक छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांचे पुतळे असताना त्यांचे विचार समाजमनावर प्रभाव पाडून गेेलेत असे म्हणता येणार नाही.
पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?
सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?

अशा आशयाची एक वास्तववादी कविता आपणा सर्वांना ज्ञात आहेच; मात्र महापुरूषांचे असे पुतळे काढून आपण आपल्या श्रद्धास्थानांना तडा देतोय. ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता अशा ब्रिटीश सल्तनतचीही गडकरींना हात लावायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना गडकरींनी त्यांच्या अजरामर साहित्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या ‘एकच प्याला’तील तळीरामाचे वारसदार आज महाराष्ट्रात अकारण हैदोस घालत आहेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिले, त्याला तोड नाही.
‘जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’

असे म्हणणार्‍या गडकरींचा भगवा आजचा नव्हता. मराठी साहित्याचा विजयध्वज ठरणारा तो भगवा कुण्या एका पक्षाचा, कुण्या एका विचारधारेचा नव्हता.
‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’

असे गर्जून सांगणार्‍या गडकरींच्याबाबत आजच्या दरिद्री लोकांनी जे कारस्थान केले ते निश्‍चितच निंदणीय आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्याशी कसलेच देणे-घेणे नसलेल्या नीच लोकांचे हे काम आहे. लॉर्ड मेकॉले या ब्रिटीश शिक्षणतज्ज्ञाने त्यावेळी सांगितले होते की, ‘‘हिंदुस्तान हा सुजलाम् सुफलाम् देश आहे. या देशातून सोन्याचा धूर निघतो. इथल्या गुरूकुल शिक्षणपद्धतीमुळे इथली पिढी संस्कारशील आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव ओवाळून टाकणारे हे लोक प्रचंड श्रद्धावान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज्य करणे आपल्याला कदापि शक्य होणार नाही. बंदुकीच्या जोरावर हिंदुस्तान आपल्याला जिंकता येणार नाही. या देशावर राज्य गाजवायचे असेल तर इथली गुरूकुल शिक्षण पद्धत आधी नष्ट करा, यांच्या श्रद्धास्थानांना तडा द्या. यांची श्रद्धा कमकुवत झाली तरच ते डळमळीत होतील आणि त्यांच्यावर आपल्याला राज्य गाजवता येईल.’’ लॉर्ड मेकॉलेची औलाद शोभणार्‍यांनी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. लालमहालातून दादोजी कोंडदेवांंचा पुतळा काढणे असेल किंवा आज संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा काढणे असेल यातून मेकॉलेचीच वृत्ती दिसून येते.
‘कोणतीच भूमिका घ्यायची नाही’, ही एकच भूमिका साहित्यिक आणि विचारवंत इमानेइतबारे पार पाडत असताना साहित्यिक आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज आज रस्त्यावर उतरले आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सुप्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रविण तरडे, महेश मांजरेकर, सुनिल महाजन, डॉ. सतिश देसाई, योगेश सोमण अशा सर्वांनी संभाजी उद्यानात एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला आहे. ‘यानिमित्ताने राम गणेश गडकरी आजच्या पिढीला माहीत तरी होतील’ , असेही काहीजण सांगत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापासून अनेक दिग्गजांना घडविणारा गडकरीसारखा हिरा अशापद्धतीने प्रकाशात यावा, हे दुर्दैवी आहे.
आपल्याकडे औरंगजेब कायम चर्चेत राहतो मात्र संस्कृततज्ज्ञ असलेल्या दारा शुकोकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. कुपमंडूक वृत्तीच्या इथल्या विचारवंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सोयीस्कर असते. भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड असेल, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणे असेल किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणे असेल या सर्वांतून मेकॉलेची अवलाद पुन्हा कार्यान्वित झाल्याचे दिसून येते. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि देशाचे पंतप्रधान जातीभेद, धर्मभेद करू नका असे तळमळीने सांगत असतानाच आमच्या जातीय अस्मिता अधिक घट्ट होत चालल्यात.
गडकरींचा पुतळा काढून टाकणार्‍यांनीच यापूर्वी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही आक्षेप घेतले होते. वाघ्याचा पुतळाही त्यांनी काढून टाकला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी त्यांचे हे कारस्थान हाणून पाडले होत. दुर्दैव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच गडकरींचा पुतळा हटविण्यात आला. हा कट चार-दोन दिवसात शिजलेला नाही. संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्यावर असे अनेक विषय आहेत. त्यातूनच ते वेळोवेळी अनेक विखारी फुत्कार सोडतात. जून 2011 लाच संजय सोनवणी यांनी ‘राम गणेश गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे काय?’ हा लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात यायला इतकी आठवण पुरेशी आहे.
एकीकडे सामान्य माणसाची रोजची जगण्याची लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र जातीय विष पेरणे, श्रद्धास्थानांना तडे देणे हे काम सुरूच आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर हा पराभव जिव्हारी लागल्याने, सत्तेची ऊब मिळत नसल्याने काही नेते वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून ही अशी अराजकता माजवत आहेत. सुज्ञ मतदार येणार्‍या निवडणुकांमध्येही अशा विचारधारेला, अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना सणसणीत चपराक देईल हे वेगळे सांगायला नको.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’
7057292092