सध्या थंडीचे दिवस आहेत. या गारव्यात वैचारिक
ऊब देण्याचे काम साहित्य संमेलने करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे वारे वाहू लागताच राज्यभर अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने
धडाक्यात पार पडतात. विविध ठिकाणी होणारी आणि विविध विचारधारांचा जागर
घालणारी ही संमेलने आपल्या सांस्कृतिक समृद्धीत मोलाची भर घालतात. त्यामुळे
या सगळ्या संमेलनांचे महत्त्व मोठे आहे.
गेल्या 25 आणि 26 डिसेंबर
रोजी बदलापूर येथे विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. ‘संमेलनपूर्व संमेलन’
अशी जाहिरात आयोजकांनी केली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची
कुळगाव-बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम - डोंबिवली (यंदाच्या अ. भा. मराठी
साहित्य संमेलनाचे आयोजक), सुहृद एक कलांगण - बदलापूर आणि ग्रंथसखा वाचनालय
यांनी एकत्र येऊन हे संमेलन भरवले होते. नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार
काळे हेच याही संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
श्याम जोशी हे
ग्रंथालय चळवळीतील एक मोठे नाव. नुकतेच महाराष्ट्र शासनाने त्यांना
ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून मराठी वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी
महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावे दिला
जाणारा ‘भाषा संवर्धक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. बदलापूर
येथे ते ‘ग्रंथसखा’ हे अतिशय नेटके आणि समृद्ध ग्रंथालय चालवतात. ‘दुर्मीळ
ग्रंथसंग्रहक’ अशी त्यांची ओळख आहे. तर या श्याम जोशी यांच्या प्रयत्नातून
हे संमेलन पार पडले.
विचारयात्रा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी
उद्घाटन सोहळा झाल्यानंतर निमंत्रितांचे कवीसंमेलन झाले. अशोक नायगावकर,
प्रदीप निफाडकर, दामोदर मोरे, राजीव जोशी, मंदाकिनी पाटील, वैजनाथ जोशी,
अनुपमा बेहेरे, विश्वास जोशी यांनी ही मैफल रंगवली. सुप्रसिद्ध कवी अरूण
म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत झाली. याठिकाणी ‘सदानंद मोरे ग्रंथ महोत्सव’
भरवला होता. मात्र त्यात कोणीही सहभागी झाले नाही. मोरेंच्या नावे
ग्रंथमहोत्सव भरवल्याची कुत्सित चर्चा मात्र सुरू होती. रात्री ‘प्रतिबिंब’
हा नृत्य, नाट्य आणि कवितांचा कोलाज असलेला कार्यक्रम झाला.
दुसर्या
दिवशी पहिला परिसंवाद होता, ‘अश्लिलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या
विषयावर. अनंत देशमुख यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण बीजभाषण झाले. यात मसापचे
कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत आणि
‘चिन्ह’ या नियतकालिकाचे संपादक सतीश नाईक सहभागी झाले होते. सावंतांनी
त्यांचे लैंगिक विषयावरील वाचनाचे आणि लेखनाचे अनुभव सांगितले. सतीश नाईक
यांनी मात्र स्वअनुभव सांगताना अत्यंत पाल्हाळीक आणि रटाळ माहिती दिली.
प्रत्येकाला वीस मिनिटे दिलेली असताना त्यांनी पहिली वीस मिनिटे
‘सनातन’च्या साधकांनी त्यांना कसा त्रास दिला, ते दिसायचे कसे, बोलायचे
कसे, वागायचे कसे, अंक चालवताना दडपण कसे येते यावरच घालवली. त्यांची चाळीस
मिनिटे झाल्यावर नाईलाजाने संयोजकांनी त्यांना चिठ्ठी पाठवली. ती
त्यांच्याकडे देत असताना त्यात काय लिहिलेय हेही न पाहता त्यांनी ‘माझे
भाषण थांबविल्याचा निषेध आणि यावर मी आता कसे लिहितो ते पहाच’ असे म्हणत
सभागृह सोडले. त्यांनी सभा संकेताचा भंग करत व्यासपीठ सोडल्यावर प्रा.
मिलिंद जोशी यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत वेळ निभावून
नेली. त्यांच्या समारोपाच्या भाषणाने रसिक तृप्त झाले.
पुढच्या सत्रात
‘कथा कशी समजून घ्यावी’ या विषयावर संजय भास्कर जोशी यांनी व्याख्यान दिले.
निलिमा बोरवणकर यांची आवेशपूर्ण कथा झाली. प्रतिमा इंगोले यांनी वैदर्भिय
भाषेत कथाकथन केले मात्र ते रसिकांच्या डोक्यावरून गेले. संध्याकाळचा
‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते?’ या विषयावरील परिसंवाद मात्र उत्तम
झाला. विनय हर्डीकर, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी,
सदानंद मोरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मिलिंद
जोशी यांनी हा परिसंवाद रंगवला.
या परिसंवादाला आणि एकूणच साहित्य
संमेलनाला जेमतेम शंभरएक लोक उपस्थित होते. श्रीकांत जोशी, श्याम जोशी,
रवींद्र गुर्जर या सर्वांनी संमेलन यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
मात्र उपस्थिती आणि काही अपवाद वगळता कार्यक्रमांचा दर्जा अत्यंत सुमार
होता. मान्यवर लेखक, त्यांचा पाहुणचार, बडेजाव, भोजन आणि निवासाची उत्तम
व्यवस्था असे साहित्यबाह्य विषय दखलपात्र होते; मात्र लाखो रूपये खर्च
करूनही या संमेलनाचे फलित काय, हा मात्र चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
सोलापूरच्या
संमेलनाची परिस्थिती याउलट होती. हे पहिलेच आदिवासी धनगर साहित्य संमेलन!
मात्र यात नवखेपणाच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. भंडारा उधळून या
संमेलनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि
संशोधक संजय सोनवणी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूरातील
हुतात्मा स्मारक मंदिर रसिकांनी खचाखच भरले होते. बाहेर पडद्यावर लोक
कार्यक्रम पाहत होते. पुस्तकांची विक्री तडाख्यात होती. ‘आपले संमेलन‘
म्हणून सर्वजण आत्मियतेने सहभागी होते. संजय सोनवणी यांच्यासारखा अभ्यासू
संमेलनाध्यक्ष, डॉ. अभिमन्यू टकले यांच्यासारखे आयोजक, अमोल पांढरे
यांच्यासारखे तळमळीने अहोरात्र कार्यरत असलेले कार्यकर्ते या सर्वांचे
साध्य म्हणजे हे अभूतपूर्व आणि पूर्ण यशस्वी संमेलन. धनगर आणि आदिवासींच्या
नावे होणार्या या संमेलनाला किती लोक गोळा होणार अशी सर्वांनाच चिंता
होती! मात्र सर्वांचेच अंदाज साफ खोटे ठरले आणि सभागृह खचाखच भरले.
समाजबांधवांची बौद्धिक भूक भागविणारा हा कार्यक्रम ठरला.
या संमेलनात
आदिवासी धनगरांचे गजनृत्य आणि ओव्यांचे सादरीकरण झाले. आदिवासी धनगर
पुरातनाचे एक वास्तव, आदिवासी धनगरांच्या महिलांसमोरील समस्या आणि
नवयुगातील आव्हाने, आदिवासी धनगर समाजाचा इतिहास, माध्यमातील धनगर समाजाचे
चित्रण, मराठी साहित्यात धनगर समाज दुर्लक्षित का?, धनगर समाजाच्या उज्ज्वल
भवितव्याचा राजमार्ग, धनगर आरक्षण लढाई अशा अभ्यासपूर्ण विषयांवर परिसंवाद
झाले. अत्यंत नेटके नियोजन, शिस्तबद्धता, एका जातीच्या अस्मितेला उजाळा,
पंढरपूरच्या पांडुरंगापासून ते सातवाहन, महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर,
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकर अशा
सर्वांच्या आदर्शवादी तत्त्वांचा जागर घालण्यात आला.
मुख्य म्हणजे
सध्या जातीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना यात सर्व जातीचे लोक
वक्ते म्हणून आणि रसिक म्हणून सहभागी होते. इतर जातींविषयी कोणीही द्वेष
व्यक्त केला नाही. आपले बांधव एकत्र येऊन या बिकट परिस्थितीतून कसे मार्ग
काढू शकतील याविषयी सर्वजण तळमळीने बोलत होते. या साहित्य संमेलनात धनगर
इतिहास परिषद आणि धनगर साहित्य परिषद सुरू करण्याचा ऐतिहासिक संकल्प
करण्यात आला. त्यादृष्टिने सर्वांनी जोरदार तयारीही सुरू केली.
प्रस्थापितांविरूद्ध रडत बसण्याऐवजी स्वाभिमानाने पुढाकार घेत एक नवा
इतिहास निर्माण करण्याचे हे धाडस हेच या संमेलनाचे मोठे फलित आहे.
प्रस्थापित संमेलने मानपानात आणि रिकामटेकड्या डामडौलात अडकलेले असताना एक
उपेक्षित वर्ग पुढे येऊन त्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे स्मरण करत असेल,
त्यातून नव्या पिढीपुढे आदर्शांचे मनोरे उभे करत असेल तर हे निश्चितच
अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. संजय सोनवणी, डॉ. टकले, जयसिंगतात्या
शेंडगे, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे या सर्वांच्या प्रयत्नांना आलेले हे
मधुर फळ आहे.
मुळात आपण सर्वजणच पशुपालक. पूर्वी शिकारीवर आपली
उपजिविका चालायची. त्यानंतर मनुष्य पशुपालन करू लागला आणि त्यातून शेतीचा
शोध लागला. याच शोधातून वेगवेगळे उद्योग निर्माण झाले आणि या उद्योगातून
जातींचा जन्म झाला. या जातीपातीत आपण इतके अडकलोय की, आपल्या अस्मिताच बोथट
झाल्यात. जे मूळ आदिवासी आहेत त्यांनाच दुर्दैवाने आपण कमी लेखू लागलोय.
त्यामुळे या संमेलनाची नितांत गरज होती. ती गरज पहिल्या आदिवासी धनगर
साहित्य संमेलनाने पूर्ण केली आहे.
बदलापूर आणि सोलापूर या दोन्ही
साहित्य संमेलनात हाच तर फरक होता! मात्र काहीही असले तरी अशी संमेलने आपली
भाषा, साहित्य, संस्कृती जिवंत ठेवण्यात मोठा हातभार लावत असल्याने
त्यांचे स्वागतच करायला हवे. आदिवासी - धनगरांनी यादृष्टिने एक पाऊल पुढे
टाकून महाराष्ट्राचा सांस्कृतिक परिघ तिकडे सरकल्याचे सिद्ध केले आहे.
‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने ही संमेलनेच समाजाचे वैचारिक भरणपोषण
करू शकतील.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
आभाळ दाटल्यावर काय होतं?
पाऊस कोसळतो!
आणि ‘अंतरी’चे आभाळ दाटल्यावर?
अस्सल कविता बरसतात!!
पाऊस पडल्यानंतरची प्रसन्नता आणि अंतःकरणातले काव्यमय विचार कागदावर
उतरल्यानंतरची भाव्यात्मकता फारशी वेगळी नसते. धो धो बरसणार्या सरी
पाण्याचा दुष्काळ नष्ट करतात आणि अंतरीच्या सरसर येणार्या ओळी मन मोकळे
करतात. ‘आकाश’ आणि ‘आभाळ’ याच्यात हाच तर फरक आहे. आकाश कसं? नेहमीच
निरभ्र! ‘आभाळ’ मात्र भरून आलेलं! आपल्या वर्षावानं धरतीला तृप्त
करण्यासाठी सरसावलेलं! आमची मराठवाड्याची ‘बहिणाबाई’ म्हणजे कवयित्री सौ.
विद्या बयास ठाकूर यांचा ‘आभाळ अंतरीचे’ हा कवितासंग्रह याच पठडीतला!
मनातलं सारंसारं व्यक्त करताना त्यांची काव्यात्म अनुभूती वेगळ्याच उंचीवर
जाते.
सुटून जातात माणसं
तुटून जातात नाती
आयुष्यभर काळजावरती
एक जखम भळभळती
असं लिहिणार्या विद्या बयास यांनी त्यांचे जीवनानुभव समर्थपणे मांडले
आहेत. अर्थात, यातल्या सर्वच कविता अनुभवातून आल्यात असंही नाही.
स्त्रीत्त्वाच्या हृदयानं घेतलेली अनुभूतीही त्यांनी लेखणीच्या माध्यमातून
मांडली आहे. कवयित्री मुळूमुळू रडत बसणारी कोणी अबला नाही. स्वतंत्र
विचारधारेची, आजच्या पिढीचे नेतृत्व करणारी, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी
ती एक बंडखोर प्रतिनिधी आहे. ‘फिनिक्स’ या पहिल्याच कवितेत ती म्हणते,
मी एक फिनिक्स राखेआड दडलेला
कितीही गाडलं तरी पुन्हा पुन्हा उडणारा
स्त्रीत्वाचं सामर्थ्य मांडतानाच
झुंजूमुंजू होण्याआधी
रात नको होऊ देऊ
गर्भातल्या अंधारात माझा
घात नको होऊ देऊ
अशी रास्त अपेक्षा व्यक्त करत ही ‘माय माऊली’ स्त्री भ्रुणहत्या थांबविण्याचे कळकळीचे आवाहन करते.
आपल्या मनातल्या जोडीदाराविषयी लिहिताना या कवयित्रीचा आविष्कार पहा -
असा हवा जोडीदार
स्वप्नातला राजकुमार
धडपडत्या पावलांना
नकळत जो देईल आधार
आकाशाची ओढ मला
क्षितिजापर्यंत माझ्या कक्षा
धावण्याचा कैफ मला
उडण्याची डोक्यात नशा
विद्या बयास यांचा हा पहिलाच कवितासंग्रह! तरीही मी त्यांना ‘मराठवाड्याची
बहिणाबाई’ असंच म्हणतो. काहींना हे विशेषण म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. वाटू
देत! पण त्या त्या क्षेत्रातील मनोर्यांचा वारसा पुढे कुणीतरी चालू ठेवावा
लागतो. विद्याताई हा वारसा जपत आहेत. त्यांच्या काही ओळी बघाच -
एखादी स्त्री मुक्त होताना
समाज इतका का अस्वस्थ होतो?
बाईच्या देहातसुद्धा
एक स्वतंत्र आत्मा वसतो/ (अनुत्तरीत प्रश्न)
रोज नवीन प्रश्न समोर
रोज नवी आव्हाने
सांग कसे लक्षात राहिल
जीवनाचे मंजूळ गाणे/ (झिंग)
माझ्या बदलत्या मोसमांचा
तुला कधीच अंदाज नसतो
रम्य, अहंकारी मोरसुद्धा
मेघांसाठी नाही
त्याच्या सहचारिणीसाठी नाचतो/ (शिकायत)
प्रेताचं एक बरं असतं
एकदाच ते तर जळत असतं
बाईतल्या रूपातलं एक जीवन
रोज कितीदा मरत असतं/ (बाई)
विद्या बयास यांच्या या संग्रहात 59 रचना आहेत. मम्मटाची ‘स्वान्तसुखाय’ची
कल्पना इथे दिसत नाही. विद्याताई त्यांच्या लेखणीतून आजचे प्रश्न
मांडतात. अनेक तरल भावना व्यक्त करतानाच मधुनच अंगार फुलवतात. जीवनात
समरसून गेलेल्या प्रत्येकालाच हा आपल्याच भावनांचा आविष्कार वाटेल. मनातील
वेदना शब्दबद्ध झाल्याची जाणीव होईल. आभाळ कोसळल्यानंतर जो मृद्गंध दरवळतो
तशी प्रसन्नता अनुभवता येईल. शब्दलालित्य आणि यमकांचा हव्यास न धरता,
त्यात न गुरफटता विद्याताई प्रांजळपणे आणि उत्फुर्तपणे व्यक्त होतात.
जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत उमटते. मानवी स्वभावाचे मुलभूत चिंतन
त्यातून प्रगट होते.
संघर्षातून शिक्षण पूर्ण केेलेल्या विद्याताई
मराठवाड्यातील शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक या नात्याने विद्यादानाचेच काम
करतात. या परिसरावर उर्दू आणि कन्नड भाषेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे
काही ठिकाणी त्यांनी हिंदी (खरंतर उर्दू) शब्दांचा चपखल वापर केला आहे.
मात्र हे शब्द मराठवाड्याच्या लोकजीवनात इतके एकरूप झालेत की ते मराठी
नाहीत हे कुणाला सांगूनही पटणार नाही.
बाईच्या काळजाचा
कुणा लागना कधी ठाव
वरून शिनगार साजरा
काळजात खोल घाव
असं मानणार्या विद्याताईंनी अनेक घाव यशस्वीरित्या पचवलेत. त्याची तमा मात्र त्या बाळगत नाहीत.
आभाळ अंतरीचे
तू चंद्र त्यात माझा
चुकवून चांदण्याला
उधळून ऊन गेला
अशी स्त्रीसुलभ अंतर्व्यथा त्या मांडतात.
आई, मुलगी, जोडीदार यांच्याविषयीच्या त्यांच्या प्रामाणिक भावना या
कवितांतून शब्दांकित झाल्या आहेत. त्यामुळे वाचकांना या कविता आपल्याच
आयुष्याचा चलचित्रपट वाटेल. त्यात कुठंही नैराश्य नाही तर नव्याने उभं
राहण्याची, सुसज्ज होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. हा असा आशावादच
प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची दारं उघडतो. हतबलता, नैराश्य पळवून लावून
वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करतो. हीच तर कोणत्याही प्रतिभावंताची कसोटी
असते. विद्याताई या कसोटीत अव्वल उतरल्यात. प्रेमाचा आविष्कार व्यक्त
करतानाच त्यांनी जीवनातील सत्य त्यांच्या कवितेतून ठळकपणे अधोरेखित केले
आहे. काव्यक्षेत्रातील त्यांची सुरूवात दमदार झाली असून भविष्यात
त्यांच्याकडून विपुल साहित्यनिर्मिती होईल अशी अपेक्षा ठेवायला मोठा वाव
आहे. त्यांच्या भावी लेखनप्रवासास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कवयित्री - विद्या बयास (7841968366)
प्रकाशक - निर्मल प्रकाशन नांदेड
पाने - 71, किंमत - 80
- घनश्याम पाटील, पुणे
७०५७२९२०९२
आपल्या समाजाला सध्या एक मोठी कीड लागलीय. सर्व महापुरूषांना आपण जातीपातीत वाटतोय. बरे, त्यांचे काही विचार अंमलात आणतोय असेही नाही. आचार्य विनोबा भावे म्हणायचे की, ‘महापुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात.’ त्यांच्या या विचाराची सत्यता गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. आमच्या जातीय अस्मिता अधिक टोकदार होत चालल्यात. यातून किमान त्या त्या समाजाचे भले होतेय असेही नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने ‘समाजशास्त्रीय भूमिका’ म्हणून जातीवादाला खतपाणी घातले. त्या-त्या जातीपातीतील लोक एकत्र आल्यास त्यांच्या समस्या सुटायला हातभार लागेल अशी त्यांची भाबडी समजूत; मात्र आपण स्वार्थाच्या आणि विविध विचारधारांच्या इतके आहारी गेलोय की आपले स्वत्वच हरवत चाललेय.
पुण्यात संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही समाजकंटकांनी रात्रीतून काढून टाकला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही या दुष्कृत्याची जबाबदारी घेतली. एखादी अतिरेकी, दहशतवादी संघटना एखादा घातपात घडल्यानंतर तो आपण घडवल्याचे ज्या आविर्भावात सांगते तोच आवेश ही जबाबदारी घेणार्यांचा होता. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच घटना अभिमानाने मिरवणार्यांना काय म्हणावे? यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडणार्यांनी, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढणार्यांनी, वाघ्याचा पुतळा फोडणार्यांनीच राम गणेश गडकरींचा पुतळा काढून टाकला आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील धुरिणांनी या घटनेचा निषेध केला असला तरी या गुन्हेगारी कृत्याची आणि त्यांच्या निगरगट्ट मानसिकतेची गंभीर नोंद घ्यायलाच हवी.
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचे नुकतेच राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. यापूर्वीही या मंडळींनी एक राजकीय पक्ष काढला होता. त्यावेळीही सपशेल तोंडावर आपटल्यानंतर त्यांनी हाच प्रयत्न पुन्हा केला आहे. सध्या पुण्या-मुंबईसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जनतेचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून त्यांचे असे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्मितीची क्षमता नसल्याने हे लोक विध्वंसच घडवणार हे पुन्हा पुन्हा त्यांच्या कृत्यातून दिसून येतच आहे. आजवर या लोकांचे भरणपोषण ज्यांनी केले त्यांच्यासाठीही ही मोठी डोकेदुखी झाली आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्यांनी काढून टाकल्यानंतर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ‘लवकरच तो त्या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येईल’ असे सांगितले आहे. मुख्य म्हणजे दादोजींचा पुतळा हटवला त्यावेळीही मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच महापौर होते. जगतापही राष्ट्रवादीचेच आहेत. त्याहीवेळी ‘दादोजींचा पुतळा आठ दिवसाच्या आत पुन्हा बसवण्यात येईल,’ अशी घोषणा राजपालांनी राणा भीमदेवी थाटात केली होती. अजूनही त्याचे काय झाले हे कळले नाही.
राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले. खरेतर ते अपूर्णच होते. त्यातील जिवाजी कलमदाने हे एक खलपात्र आहे. दुष्ट वृत्तीचे हे पात्र शिवाजी महाराजांविषयी चुकीचे बोलते. मुख्य म्हणजे याच पात्राने समर्थ रामदास स्वामी यांचीही निंदानालस्ती केली आहे. गडकरी हे काही इतिहासकार नाहीत. त्यांनी हे चरित्रात्मक लेखन केले नाही. रावणाने रामाचे गोडवे गावेत किंवा अफजलखानाने शिवाजीराजांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवताच येणार नाही. हे खलपात्र ज्या भाषेचा वापर करते ते चूक की बरोबर हा वाद होऊ शकतो. मात्र ‘महाराष्ट्र गीत’ लिहिणारे आणि लक्षवेधी साहित्य संपदा असणारे गडकरी ‘व्हिलन’च होते असा निष्कर्ष काढणे अविवेकी आहे. 1907 साली लिहिलेल्या या नाटकावरून 2017 साली ‘ड्रामा’ करणे हे निव्वळ राजकारण आहे.
चार तरूण कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यानातून हा पुतळा काढला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. ही चारही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय, याचा पत्ता असणे शक्य नाही. देशभक्ती काय असते हेही यांना सांगून उपयोग नाही. मात्र हे अविचारी, तालिबानी वृत्तीचे, दहशतवादी स्वरूपाचे कृत्य आहे इतकेही कळू नये याचे आश्चर्य वाटते. संभाजी ब्रिगेडच्या चिथावणीवरून ज्या तरूणांनी भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड केली त्यांचे काय हाल झाले हे एकदा मुद्दामहून बघायला हवे. या कुणालाही कसल्याही नोकर्या मिळत नाहीत. त्यांना धड व्यवसाय-उद्योग करता येत नाही. कोर्टाच्या तारखा पडल्यानंतर उपस्थित राहण्यासाठी, प्रवासासाठीही यांच्याकडे पैसे नसतात. बाहेरचे सोडा पण कुटुंबातील सदस्यही यांच्याशी परकेपणे वागतात. अशावेळी कोणतेही ‘माफीवीर’, ‘शिवीश्री’ त्यांच्याबाजूने उभे राहत नाहीत. यांची होणारी ससेहोलपट पाहिल्यानंतर असे गुन्हेगारी कृत्य करायला कोणीही धजावणार नाही. तरूणांचा ‘ब्रेन वॉश’ करून राजकारण करणारे मात्र नामानिराळे राहतात.
पुतळ्यामुळे कुणाला फार स्फूर्ती मिळते असेही नाही. मात्र आपल्या देशात पुतळ्यांचे ‘फॅड’ आहे. त्यात सर्वाधिक पुतळे राजकारण्यांचे आहेत. काही राज्यात साहित्यिक, विचारवंत, संतमहात्मे, समाजसुधारक, शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत; पण त्यामुळे कुणी फार प्रेरणा घेतलीय आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेय असेही नाही. उलट पुतळ्यांची सुरक्षा, त्यांची विटंबना यामुळे अनेक वाद निर्माण होतात. शिवसागरात तयार करण्यात येणारा शिवरायांचा पुतळा असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पुतळा असेल किंवा आता इंदू मिलमध्ये संकल्पित असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल... या प्रत्येक पुतळ्यावर, त्या प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. पैशाचा असा बाजार मांडण्याऐवजी त्या त्या महापुरूषांचे विचार जपण्यासाठी काही करता आले तर अवश्य विचार व्हावा.
इतिहासाची तोडफोड हा तर अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय झालाय. आपल्याला हवे ते वाक्य घ्यायचे, त्याचे मागचे-पुढचे संदर्भ न लावता त्याचा अर्थ लावायचा आणि श्रद्धास्थानांना तडा देऊन राजकारण पेटवायचे हे इथल्या व्यवस्थेत काहीजणांच्या ‘उपजिविकेचे’ साधन झालेय. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’चे घेता येईल. बाबासाहेबांनी लिहिले, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच...’ या वाक्यावरून आऊसाहेबांची बदनामी झाली म्हणून काहींनी महाराष्ट्र पेटवला. ते मूळ वाक्य असे होते, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच... ते म्हणजे सह्याद्री!’ यातील ‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढून टाकायचे आणि आपणच आपल्या श्रद्धास्थानांची बदनामी करायची असे निलाजरेपण काहीजण करतात.
गडकरींच्या ‘एकच प्याला’तले तळीराम शोभावेत असे काही लोक कोणत्याही काळात असतात. त्यांना पर्याय नसतो. त्यांच्या विकृत मानसिकतेचा राष्ट्राला मात्र मोठा फटका बसतो. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. रोजच्या भाकरीचा प्रश्न बिकट असताना आपण पुतळ्यासारख्या विषयावरून राजकारण करतोय, राज्य पेटवतोय याचे काहीच सोयरसुतक अशांना नसते. त्यांच्या बोलबच्चनगिरीला बळी पडलेल्यांची मात्र पुढे केविलवाणी अवस्था होते. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे मात्र अशा प्रकारानंतर मूग गिळून गप्प बसतात. त्यांचा ‘निषेध’, ‘प्रतिक्रिया’ हे सर्व काही सोयीस्कर असते.
महापुरूषही काळाच्या रेट्यात कसे दुर्लक्षित राहतात याबाबत रॉय किणीकर यांनी त्यांच्या एका रूबाईत सांगितलेय,
कोरून शिळेवर जन्म मृत्युची वार्ता
जा ठेवा त्या जागेवर पणती आता
वाचेल कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा? कशास याचे स्मरण?
गडकरींचा पुतळा काढल्याने थोडेसे विस्मृतीत गेलेले त्यांचे साहित्य पुन्हा चर्चेत आले आहे. जे ‘राजसंन्यास’ फार कुणी वाचले नव्हते ते यानिमित्ताने पुन्हा घराघरात पोहोचले आहे. गडकरींच्या नाटकावरून ‘ड्रामा’ करणार्यांचे हे यश आहे की अपयश आहे हे त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
असे महन्मंगल काव्य लिहिणारे राम गणेश गडकरी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासारख्या महानगरातून यापूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला होता. आज संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकून पुणे शहराचा ‘सिरीया’ झालाय हे काही अपप्रवृत्तींनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, पुण्यातील साहित्यिक, कलावंत, प्रकाशक यांनी तातडीने एकत्र येऊन या प्रवृत्तींचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडचे संघटनेतून राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर असे प्रकार घडणे अपेक्षित असले तरी ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रावरील हा सांस्कृतिक बलात्कार तमाम मराठी माणसांनी एकत्र येऊन थांबवायला हवा.
‘विचारांची लढाई विचाराने लढायला हवी’, हे गुळगुळीत वाक्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्यांची तालिबानी वृत्तीच यातून दिसून येते. उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे इतिहास, नाटके, कथा-कादंबर्या लिहिल्या जातात. मुळात हे लिखाण करणारे सर्वजण इतिहास संशोधक असतातच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कलाकृतीत काहीना काही आक्षेपार्ह असे असतेच. वाचकांची त्या त्यावेळची मानसिकता आणि बदलत्या काळानुसार ते लेखन कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. राम गणेश गडकरी यांनी त्या काळात लिहिलेले ‘राजसंन्यास’ हे नाटक तसे अपुरेच राहिले. या नाटकातील जिवाजी कलमदाने या पात्राने शिवाजी राजांची बदनामी केल्याचे आत्ता म्हणजे शंभरहून अधिक वर्षांनी काही जणांना उमजले. कुठून ना कुठून महापुरूषांची वादग्रस्त विधाने शोधायची आणि त्यावरून खल करत रहायचा हा काही समदु:खी लोकांचा उद्योगच होऊन बसलाय. जिवाजी कलमदाने हे पात्र या नाटकात देहू या पात्राजवळ फुशारकी मारताना छत्रपती शिवरायांविषयी वाईट बोलते. किंबहुना या जिवाजीने समर्थ रामदास स्वामींची यथेच्छ नालस्ती केली आहे. शिवरायांच्या कर्तृत्वावर संशय घेताना तो रामदास स्वामी यांच्याविषयी वाटेल ते तारे तोडतो. मुळात हे खलपात्र भ्रष्ट आहे. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशा ठेवता येतील? रावणाने रामाची महती गावी किंवा अफजलखानाने शिवरायांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे नाही का?
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरूनही आत्तापर्यंत झालेली झुंडशाही आपण बघितलेली आहेच. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’वरून राडा झाला. आता ‘राजसंन्यास’ या अर्धवट नाटकातील एका पात्राच्या संवादाने अकारण महाराष्ट्र पेटवला जात आहे. कोणत्याही साहित्य कृतीतून आपल्याला हवा तितका भाग सोयीस्करपणे घेतल्यास रामायण, महाभारत अशा महाकाव्यावरूनही राष्ट्र पेटवले जाऊ शकते.
संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याने ते नाट्यरसिकांच्या आणि वाचकांच्या हृदयातून मुळीच जाणार नाहीत. देशातील सर्वच साहित्यिकांचे, विचारवंतांचे, शास्त्रज्ञांचे पुतळे काढून टाकावेत आणि केवळ राजकारण्यांचे पुतळे देशभर लावावेत, अशी अपेक्षा यानिमित्ताने साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी अतिशय हताशपणे व्यक्त केली. देशभर अनेक छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांचे पुतळे असताना त्यांचे विचार समाजमनावर प्रभाव पाडून गेेलेत असे म्हणता येणार नाही.
पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?
सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?
अशा आशयाची एक वास्तववादी कविता आपणा सर्वांना ज्ञात आहेच; मात्र महापुरूषांचे असे पुतळे काढून आपण आपल्या श्रद्धास्थानांना तडा देतोय. ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता अशा ब्रिटीश सल्तनतचीही गडकरींना हात लावायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना गडकरींनी त्यांच्या अजरामर साहित्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या ‘एकच प्याला’तील तळीरामाचे वारसदार आज महाराष्ट्रात अकारण हैदोस घालत आहेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिले, त्याला तोड नाही.
‘जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’
असे म्हणणार्या गडकरींचा भगवा आजचा नव्हता. मराठी साहित्याचा विजयध्वज ठरणारा तो भगवा कुण्या एका पक्षाचा, कुण्या एका विचारधारेचा नव्हता.
‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’
असे गर्जून सांगणार्या गडकरींच्याबाबत आजच्या दरिद्री लोकांनी जे कारस्थान केले ते निश्चितच निंदणीय आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्याशी कसलेच देणे-घेणे नसलेल्या नीच लोकांचे हे काम आहे. लॉर्ड मेकॉले या ब्रिटीश शिक्षणतज्ज्ञाने त्यावेळी सांगितले होते की, ‘‘हिंदुस्तान हा सुजलाम् सुफलाम् देश आहे. या देशातून सोन्याचा धूर निघतो. इथल्या गुरूकुल शिक्षणपद्धतीमुळे इथली पिढी संस्कारशील आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव ओवाळून टाकणारे हे लोक प्रचंड श्रद्धावान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज्य करणे आपल्याला कदापि शक्य होणार नाही. बंदुकीच्या जोरावर हिंदुस्तान आपल्याला जिंकता येणार नाही. या देशावर राज्य गाजवायचे असेल तर इथली गुरूकुल शिक्षण पद्धत आधी नष्ट करा, यांच्या श्रद्धास्थानांना तडा द्या. यांची श्रद्धा कमकुवत झाली तरच ते डळमळीत होतील आणि त्यांच्यावर आपल्याला राज्य गाजवता येईल.’’ लॉर्ड मेकॉलेची औलाद शोभणार्यांनी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. लालमहालातून दादोजी कोंडदेवांंचा पुतळा काढणे असेल किंवा आज संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा काढणे असेल यातून मेकॉलेचीच वृत्ती दिसून येते.
‘कोणतीच भूमिका घ्यायची नाही’, ही एकच भूमिका साहित्यिक आणि विचारवंत इमानेइतबारे पार पाडत असताना साहित्यिक आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज आज रस्त्यावर उतरले आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सुप्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रविण तरडे, महेश मांजरेकर, सुनिल महाजन, डॉ. सतिश देसाई, योगेश सोमण अशा सर्वांनी संभाजी उद्यानात एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला आहे. ‘यानिमित्ताने राम गणेश गडकरी आजच्या पिढीला माहीत तरी होतील’ , असेही काहीजण सांगत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापासून अनेक दिग्गजांना घडविणारा गडकरीसारखा हिरा अशापद्धतीने प्रकाशात यावा, हे दुर्दैवी आहे.
आपल्याकडे औरंगजेब कायम चर्चेत राहतो मात्र संस्कृततज्ज्ञ असलेल्या दारा शुकोकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. कुपमंडूक वृत्तीच्या इथल्या विचारवंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सोयीस्कर असते. भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड असेल, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणे असेल किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणे असेल या सर्वांतून मेकॉलेची अवलाद पुन्हा कार्यान्वित झाल्याचे दिसून येते. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि देशाचे पंतप्रधान जातीभेद, धर्मभेद करू नका असे तळमळीने सांगत असतानाच आमच्या जातीय अस्मिता अधिक घट्ट होत चालल्यात.
गडकरींचा पुतळा काढून टाकणार्यांनीच यापूर्वी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही आक्षेप घेतले होते. वाघ्याचा पुतळाही त्यांनी काढून टाकला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी त्यांचे हे कारस्थान हाणून पाडले होत. दुर्दैव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच गडकरींचा पुतळा हटविण्यात आला. हा कट चार-दोन दिवसात शिजलेला नाही. संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्यावर असे अनेक विषय आहेत. त्यातूनच ते वेळोवेळी अनेक विखारी फुत्कार सोडतात. जून 2011 लाच संजय सोनवणी यांनी ‘राम गणेश गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे काय?’ हा लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात यायला इतकी आठवण पुरेशी आहे.
एकीकडे सामान्य माणसाची रोजची जगण्याची लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र जातीय विष पेरणे, श्रद्धास्थानांना तडे देणे हे काम सुरूच आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर हा पराभव जिव्हारी लागल्याने, सत्तेची ऊब मिळत नसल्याने काही नेते वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून ही अशी अराजकता माजवत आहेत. सुज्ञ मतदार येणार्या निवडणुकांमध्येही अशा विचारधारेला, अशा कृत्यात सहभागी असणार्यांना सणसणीत चपराक देईल हे वेगळे सांगायला नको.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’
7057292092
सोमवार ते रविवार असा विचार आपण करत असलो
तरी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक वार महत्त्वाचा आहे. त्याशिवाय
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडूच शकत नाहीत. तो वार आहे, ‘प-वार!’
देशातील
बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा
सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची
म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्चात्य
राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 45
वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ
ठरविणार्या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला
हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट
उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील
संशोधक करत नाहीत.
10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची
स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात
आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे
देशाच्या राजकारणात त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी
वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत
पवारांचे गोडवे गातात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने
महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.
पुण्यातील
स्वामी विजयकुमार हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक. ‘ज्योतीष’ आणि ‘साहेब’ ही
खरे तर विसंगतीच! नियती न मानणारे पवार साहेब नियतीच्या अनेक तडाख्यातून
सहीसलामत सुटले आहेत! तर या स्वामींनी त्यांचे अल्पचरित्र वाचकांसमोर
मांडले आहे. शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला इतक्या नेमक्या
शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. तरीही विजयकुमार स्वामी
यांनी या विषयाला पुरेपूर न्याय देत पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची
‘तोंडओळख’ करून दिली आहे. ही ओळख करून घेताना वाचकांना ‘शरद पवार’ या
ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. साधी, सोपी, ओघवती शैली आणि
महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची दखल लेखकाने सजगतेने घेतली आहे.
केवळ
‘दिवे ओवाळणे’ असाही या पुस्तकाचा सूर नाही. शरद पवार यांनी आणीबाणीचे
समर्थन करताना ज्या खेळ्या केल्या त्याविषयी सूचक भाष्य करताना लेखक
म्हणतात, ‘साहेबांची आजच्या एवढी प्रगल्भता पस्तीसाव्या वर्षी नव्हती.’
त्यामुळेच हे पुस्तक प्रत्येक राजकीय अभ्यासकाने, कार्यकर्त्याने वाचले
पाहिजे. शरद पवार हा माणूस आहे तरी काय? हे भल्याभल्यांना उलगडले नसताना
‘कर्णधार’ या पुस्तकाद्वारे स्वामीजींनी ते ताकदीने मांडले आहे.
‘राजकारण
हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची
नीतिमूल्ये या पुस्तकात आली आहेत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे
म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्यांना सोबत घेऊन पवार
साहेबांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली.
देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी
सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण
उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या
नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे.
वाजपेयींनी पंतप्रधान
असताना गुजरातच्या भूकंपावेळी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी
किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात
टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका
ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक
विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे
मोठेपण सिद्ध करतात.
गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘जो
माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे
भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’ म्हणूनच
महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार
साहेबांचे नाव जोडले जाते. ‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’ असे
विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले,
‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही
तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करत नाही.’
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा
विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास
टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते आणि याचा नेमकेपणे
वेध स्वामी विजयकुमार यांनी या पुस्तकाद्वारे घेतला आहे.
शरद पवार यांचे
राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे यात कॉंग्रेसचीही बरीचशी वाटचाल आली
आहे. स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी पवारांची तुलना लेखकाने
अनेक ठिकाणी केली आहे आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव
आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्याअर्थी छाप
टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र
कायम त्यांच्या ऋणात असेल.
पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात
एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी
लागली नाही; मात्र ‘इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष
या नात्याने साहेबांनी माफी मागितली’ असे स्पष्ट मत नोंदवत स्वामी यांनी
अजित पवारांच्या ‘त्या’ विधानाची आठवण करून दिली आहे.
शरद पवार हे नाव
नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय.
इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र
त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. (फारतर आपण
त्याला राजकीय ‘कसब’ म्हणूया.)
या पुस्तकात त्यांची जशी राजकीय
कारकिर्द आलीय तशीच कौटुंबिक पार्श्वभूमीही आलीय. ते कसे कुटुंबवत्सल
आहेत, हे लेखकाने अचूकपणे टिपले आहे. किंबहुना नंतरच्या काळात त्यांना
पानपराग (खरेतर ‘माणिकचंद’ गुटखा) खाल्ल्याने कर्करोग झाला. त्यानंतर
त्यांना झालेल्या त्रासाचे वर्णन केवळ एका परिच्छेदात आले आहे. तरीही ते
वाचून कुणी तंबाखू, गुटखा खाण्याचे ‘धाडस’ करणार नाही. विलासराव देशमुख,
आर. आर. पाटील अशा सच्च्या आणि अच्छ्या नेत्यांवरही व्यसनांनी घाला घातला.
त्यामुळे आजच्या नेत्यांनी ‘व्यसनापासून दूर रहावे’ हा संदेश ते तळमळीने
मांडतात आणि त्याचे यथायोग्य वर्णन या पुस्तकात आले आहे.
स्वामी
विजयकुमार यांचे आडनाव ‘जंगम’; मात्र या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास आणि
अधिकार यामुळे सर्वजण त्यांना ‘स्वामी’ असेच म्हणतात. स्वामींनी आजवर पंधरा
पुस्तके लिहिली आहेत. ‘भविष्य’ हा दिवाळी अंक ते एकहाती लिहितात आणि
स्वतःच प्रकाशित करतात. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांच्याकडे
भविष्य पहायला येतात; तरीही या पुस्तकाचे ‘भविष्य’ चांगलेच आहे हे
सांगण्यासाठी माझ्यासारख्या कुण्याही बोरूबहाद्दराची गरज नाही.
भारतीय
राजकारणावर प्रभाव पाडणार्या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या
कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहेच. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील,
जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते
(पूर्वाश्रमीचे), काही प्रमाणात छगन भुजबळ (हेही पूर्वाश्रमीचेच!), सुनील
तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी
त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला
आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.
म्हणूनच या पुस्तकाचे
महत्त्व मोठे आहे. सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे आणि या लोकनेत्याविषयी
माहिती मिळवण्याबरोबरच आपापल्या सामाजिक, राजकीय क्षमता विकसित कराव्यात
इतकेच या निमित्ताने सांगतो. स्वामी विजयकुमार यांचे आणखी लेखन वाचकांना
पुढच्या काळात वाचायला मिळो याच सदिच्छा व्यक्त करतो.
कर्णधार
लेखक - स्वामी विजयकुमार
प्रकाशक - भक्ती प्रकाशन, पुणे (9822785055)
पाने - 48, मूल्य - 100/-
-घनश्याम पाटील
संपाकद, ‘चपराक’, पुणे
7057292092
नव्या
वर्षाची चाहूल लागली की मराठी सारस्वतांना वेध लागतात साहित्य संमेलनाचे.
या संमेलनांना उत्सवी स्वरूप आले आहे. न. चिं. केळकर, लोकमान्य टिळक अशा
दिग्गजांनी ग्रंथकारांचे संमेलन सुरू केले. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे
पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यापक रूपांतर झाले. माय
मराठीच्या सर्वंकश विकासासाठी मोलाचे योगदान देणार्या साहित्य संमेलनांनी
जनमाणसाची नैतिकता वृद्धिंगत करण्यात हातभार लावला. गेल्या वर्षी 15 ते 18
जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन धडाक्यात
पार पडले. धडाक्यात यासाठी की गेल्या वर्षीचे आयोजक होते शिक्षणसम्राट पी.
डी. पाटील! मोठा आयोजक आणि खुजा संमेलनाध्यक्ष असे चित्र असल्याने या
संमेलनात अनेक गंमती-जंमती घडल्या. यंदाचे नव्वदावे संमेलन डोंबिवली येथे
3, 4, 5 फेब्रुवारी रोजी होणार असून अक्षयकुमार काळे यांच्यासारखा अभ्यासू
समीक्षक आणि स्वतःला कवितेचा ‘प्रियकर’ मानणारा संवेदनशील लेखक संमेलनाध्यक्ष
म्हणून मिळाला आहे.
सध्याच्या बाजारू युगात साहित्य संमेलनांची आवश्यकता
आहे का? असा प्रश्न काहीजण सातत्याने उपस्थित करतात. भालचंद्र नेमाडे
यांच्यासारखा ज्ञानपीठ विजेता लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांची
जत्रा’ असे म्हणतो तेव्हा या क्षेत्रातील लोकांनी गंभीरपणे सिंहावलोकन
करायला हवे.
महाराष्ट्रात वर्षभर अनेक लहान मोठी साहित्य संमेलने होतात.
त्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. या छोट्या संमेलनांचा प्रवाह बनून
पुढे तो अखिल भारतीयसारख्या विराट सागराला मिळतो. अखिल भारतीयची तयारी सुरू
झाली की पहिला वाद रंगतो तो संमेलनाध्यक्षाच्या निवडीवरून. 1080 लोक अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडून देतात. मराठी भाषा,
साहित्य, संस्कृती, समीक्षा याचा ध्वज संमेलनाध्यक्षाने डौलात फडकत ठेवावा
अशी अपेक्षा असते. ही धुरा खांद्यावर आल्यानंतर काहीजण या अपेक्षेला न्याय
देतात; तर काहीजण केवळ आक्रस्ताळेपणा करणे, वाद-विवाद निर्माण करणे,
विसंगती असणारी वक्तव्ये करणे यातच रममाण होतात. गेल्या वर्षीच्या
संमेलनाध्यक्षांनी याचा कळस गाठला आहे. सामान्य वाचकांचे मन आणि जीवन
समृद्ध बनावे, त्यांच्यात भाषेविषयीची प्रेमभावना वाढीस लागावी, मायमराठीची
मरगळ दूर होऊन त्यात सुदृढता यावी यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत
नाहीत. ‘पंतप्रधान तिकडे (पाकिस्तानात) कशाला बोंबलत फिरतोय?’ असे
अप्रस्तुत आणि खुळचट सवाल मात्र संमेलनाध्यक्षांनी केले. सामान्य माणसाचा
कैवार घेऊन ‘सांस्कृतिक अनुबंध’ प्रस्तापित करता न आल्याने कसलेही
‘साहित्यिकसंचित’ साध्य झाले नाही. भलेमोठे आणि अतिशय रटाळ, कसलाही ’विचार’
न देणारे 130 पानांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या पूर्वसंध्येला
महामंडळाकडे दिल्याने ते छापणेही शक्य झाले नाही. संमेलनानंतर अध्यक्षांनी
साहित्य परिषदेसमोर सपत्निक उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काही प्रती छापून
त्यांची बोळवण करावी लागली. ही निश्चितच मराठी भाषेच्या दृष्टीने
लाजिरवाणी बाब आहे.
संमेलनातील डामडौल टाळून ती साधेपणाने व्हावीत अशी
भूमिका अनेकजण घेतात. सहभागी लेखकांच्या ‘सर्व प्रकारच्या’ मागण्या पूर्ण
करून पैशांची होणारी उधळपट्टी थांबवावी असे अनेकांना वाटते. महाराष्ट्र
साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि घुमानच्या संमेलनाचे
अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मात्र याबाबत वेगळी भूमिका आहे. प्रा. जोशी
म्हणतात, ‘‘लेखक सेलिब्रिटी झाला तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे कारण नाही.
समाजातील इतर वलयांकित घटकांप्रमाणे लेखकांना प्रतिष्ठा मिळायला हवी.
संमेलनात इतर बाजारबुणग्यांऐवजी लेखक केंद्रबिंदू असायला हवा.’’ डॉ. मोरे
म्हणतात, ‘‘आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आपण जिव्हाळ्याने
करतो. दिवाळी उत्साहातच साजरी व्हायला हवी. त्या दिवशी पंचपक्वान्ने न करता
आपण सुतकी वातावरणात बसत नाही. आयोजकांना त्यांच्याकडे येणार्या
साहित्यिक व रसिकांचे उत्साहात स्वागत करावे वाटले, कोट्यवधींची उधळपट्टी
करावी वाटली तर त्यात आम्हा लेखकांचा काय दोष? अगदीच वाटले तर आयकर
विभागाने त्यांच्यावर छापे मारावेत.’’
गेल्या वर्षी पी. डी. पाटील यांनी
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर पैशांची खिरापत वाटली.
(संमेलनाध्यक्षांना ती खीर कितपत पचली हे आपण बघितले आहेच.) मागच्या
वर्षीच्या अध्यक्षांचे सोडा मात्र त्यापूर्वीच्या अध्यक्षांनी हे पैसे का
घेतले, हे उमजत नाही. पी. डी. पाटील यांची राजकीय (नकारात्मक) पार्श्वभूमी
माहिती असूनही साहित्यिक त्यांच्या दावणीला बांधले जातात. मुख्य म्हणजे हे
पैसे स्वीकारलेल्या माजी अध्यक्षांपैकी कुणाचेही पोट साहित्यावर अवलंबून
नाही. यापैकी कुणीही पूर्णवेळ लेखक नाही आणि या पैशाशिवाय त्यांच्या घरची
चूल पेटणार नाही असेही नाही. मग इतके मिंधेपण, इतकी लाचारी साहित्य
क्षेत्राचे नेतृत्व करणार्या धुरीणांनी का बरे स्वीकारावी? याच विकलांग
मानसिकतेतून मराठी साहित्य अपंग तर बनत चालले नाही ना?
यंदा अखिल भारतीय
साहित्य महामंडळ नागपूरला गेले आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासारखा
चळवळीतला आणि सच्चा पत्रकार महामंडळाला अध्यक्ष म्हणून लाभला. त्यांनी
नुकतेच सांगितले की, ‘‘वारीला येणारा वारकरी कधी कुणाकडून मानधन घेत नाही.
संस्कृती आणि संस्कार जिवंत ठेवणे, भक्तिचा मळा फुलविणे हे त्याला त्याचे
कर्तव्य वाटते. साहित्यिकांनीही हाच आदर्श घ्यायला हवा. लोकशाही
व्यवस्थेतून निवडून आलेल्या संमेलनाध्यक्षांवरही महामंडळ कसलेही ‘सेन्सॉर’
लादणार नाही. विचारांची प्रक्रिया प्रवाही असायला हवी.’’ मुख्य म्हणजे
नुकतेच बदलापूरला विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. त्यात श्रीपाद जोशी
यांनी त्यांना मिळालेले मानधनाचे पाकीट व्यासपीठावर सर्वांच्या साक्षीने
आयोजकांना परत केले. त्यांची ही कृती पाहून कवी अशोक नायगावकर यांनीही
त्यांचे पाकीट लोकलज्जेस्तव परत दिले. यापूर्वी तीन पानाच्या संहितेसाठी
तीस हजार रूपये मानधन घेणार्या अध्यक्षा आपण बघितल्याच. श्रीपाद जोशी
यांनी मात्र निस्वार्थ वृत्तीचे दर्शन घडवित नवा पायंडा पाडला आहे.
आपल्याकडे
कायदा आणि सुव्यवस्था धाकदपटशाहीने टिकून नाही. बालपणापासून घरात, शाळेत
माणुसपणाचे जे संस्कार होतात, त्यातून आपली नीतिमत्ता टिकून राहते.
साहित्यिक संस्कारामुळे माणसाचे जनावरात रूपांतर होत नाही. केवळ मराठी
भाषेतच साहित्य संमेलनाची इतकी मोठी परंपरा आहे. साहित्य संमेलनरूपी भरलेली
विहिर संपन्नता निर्माण करते; मात्र या विहिरीतील झरे आटायला नकोत. यातील
साचेबद्दपणा दूर झाला, कंपूशाही टाळून नवनवीन लेखक आणि कवींना सहभागी करून
घेतले तर साहित्य संस्था आणि संमेलने समाजाभिमुख आणि लोकाभिमुख होतील.
सामान्य लोकही साहित्याभिमुख होतील. 11 करोडहून अधिक लोकसंख्या असलेल्या
महाराष्ट्रात बहुतेक पुस्तकांची आवृत्ती हजार प्रतींची असते. दरवर्षी
संमेलनात तेच-तेच विषय असतात आणि निमंत्रित कवीही त्याच-त्याच कविता सादर
करतात. हे चित्र बदलणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल
भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी गेल्या
वर्षीच्या संमेलनानंतर बदललेले आहेत. हे परिवर्तन केवळ व्यक्तिंचे नाही तर
विचारांचेही आहे. संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष अशा पदांवरील कोती
माणसे जाऊन व्यापक भूमिका घेणारे लोक आले आहेत. त्यामुळे हे चित्र
बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्या वर्षात साहित्याचे झरे
अविरतपणे प्रवाही राहतील आणि वैचारिक दुष्काळ नष्ट होईल असे म्हणण्यास मोठा
वाव आहे. देशातच परिवर्तनाची लाट जोरात असताना मराठी भाषा, साहित्य आणि
संस्कृतीचा विकास अटळ आहे. त्यासाठी वाचक म्हणून आपणही एक पाऊल पुढे
टाकायला हवे. उमलते अंकूर फुलत राहिले तर एक विशाल वृक्ष निर्माण होण्यास
वेळ लागणार नाही. या वर्षात आपल्या साहित्यिक जाणिवा आणखी समृद्ध व्हाव्यात
आणि मातृभाषेचे पांग फेडण्यास हातभार लागावा याच सदिच्छा व्यक्त करतो.
(दैनिक 'संचार', इंद्रधनू पुरवणी)
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तोंडावर आलेले असताना ‘कोण हे
संमेलनाध्यक्ष?’ असे म्हणण्याची एक ‘फॅशन’ रूढ होत आहे. अर्थात गेल्या
वर्षीच्या ‘खुज्या’ अध्यक्षांनी या फॅशनला खतपाणीच घातले आहे. मात्र
लोकशाही व्यवस्थेत साहित्यिक मतांच्या बळावर निवडून आलेल्या अध्यक्षांबाबत
हा प्रश्न अप्रस्तुत वाटतो. साहित्यिकांच्या या क्षेत्रातील योगदानाबाबत,
त्यांच्या विचार आणि भूमिकेबाबत मतभेद असू शकतात; किंबहुना ते असावेत!
मात्र ‘कोण हे संमेलनाध्यक्ष?’ असा खुळचट सवाल करणे हे त्यांचे नाही तर
आपले अज्ञान आहे. संबंधितांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अभ्यास करून हे
अज्ञान कुण्याही वाचकाला प्रयत्नपूर्वक दूर करता येईल.
नव्वदाव्या अ.
भा. मराठी साहित्य संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष अक्षयकुमार काळे
यांच्याबाबतही एका वृत्तपत्राने ‘कोण हे?’ हा प्रश्न त्यांच्या
स्वभाववृत्तीप्रमाणे केला. काळे यांनीही त्यांना समर्पक उत्तर दिले.
‘टाटायन लिहिणार्यांना सारस्वतायन वाचायला वेळ मिळत नसेल’ असे एका वाक्यात
त्यांनी सर्वकाही सांगितले आहे. लेखकांच्या लेखनाबाबत प्रश्नचिन्ह
उपस्थित करण्यासाठी निदान त्यांचे साहित्य तरी वाचायला हवे. इतकी तसदीही
संमेलनाध्यक्षांवर टीका करणारी मंडळी घेत नाहीत. महाराष्ट्रात जवळपास तीनशे
वृत्तपत्रे रोज प्रकाशित होतात. त्यातील अनेकांचा खप किमान काही हजारात
आहे. मात्र तो परिसर वगळता बहुसंख्य महाराष्ट्राला या वृत्तपत्रांची नावेही
माहीत नाहीत. रोज प्रकाशित होणार्या आणि काही हजारांच्या घरात खप
असलेल्या वृत्तपत्रांची ही अवस्था! मग पाचपन्नास उत्तम पुस्तके लिहूनही ती
वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचली नसतील तर हा दोष कोणाचा?
साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षपदी अनेक मोठमोठे लेखक होते हे सत्य आहे. टीका
करणार्यांच्या आरोपाप्रमाणे असे ‘मानदंड’ ठरणारे अध्यक्ष कदाचित आज
होणारही नाहीत. हे सत्य स्वीकारताना आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आज
आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. वा. बेहेरे, प्रबोधनकार ठाकरे, गेला बाजार
गोविंदराव तळवलकर असे संपादकही होणार नाहीत. त्या त्या क्षेत्रात अनेकांनी
दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरावे असे नेत्रदीपक काम केले आहे. त्यामुळे
आधीच्या पिढीची तुलना समकालीन कुणाशीही होणार नाही. हे म्हणजे छत्रपती
शिवरायांची तुलना त्यांच्या आजच्या वंशजाशी करण्यासारखे हास्यास्पद झाले.
प्रत्येकाचे एक वेगळे महत्त्व असते. स्वयंभू प्रतिभा असते. काही क्षमता
असतात. त्या ध्यानात घेतल्यास असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. ‘केस
वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा’ हे सांगायला
आणि ऐकायला बरे वाटत असले तरी देवानंद होणेही केस वाढवण्याइतके सोपे नाही
हेच आम्ही लक्षात घेत नाही. इतके साधे सुत्र कळल्यास साहित्य आणि प्रकाशन
व्यवहारास आणखी गती मिळेल आणि माय मराठीची पताका सर्वदूर डौलात फडकेल.
अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या
उमेदवारास या क्षेत्रातील लोकच निवडून देतात. महाराष्ट्र साहित्य परिषद,
अखिल भारतीय साहित्य महामंडळ, परिषदेच्या घटक संस्था, प्रसारमाध्यमांचे
प्रतिनिधी, आयोजक समिती असा सर्वांचा त्यात समावेश असतो. अध्यक्षांना
निवडून देणारी साहित्यिक आणि वाचक मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर
आक्षेप घेता येणार नाही. मुख्य म्हणजे ज्यांचा साहित्याशी किंवा साहित्य
संस्था, साहित्यिक उपक्रम यांच्याशी काहीही संबंध नाही अशी मंडळी
अध्यक्षांवर आणि निवड प्रक्रियेवर टीका करतात. त्यांनी किमान एका साहित्य
संस्थेचे सभासदत्व घ्यावे. निवडून आलेल्या अध्यक्षांची पुस्तके पहावित आणि
मग खुशाल हवी तितकी टीका करावी.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
(प्रसिद्धी : दैनिक 'लोकमत', नाशिक)