Friday, November 13, 2015

‘चपराक’चा विक्रमी महाविशेषांक

  1. 'चपराक' दिवाळी अंकाचे प्रकाशन करतानाडावीकडून संपादक घनश्याम पाटील, प्रा. मिलिंद जोशी, समीर नेर्लेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे, डॉ. भास्कर बडे, सुधीर गाडगीळ, ज्ञानेश्वर तापकीर आणि चंद्रलेखा बेलसरे.
वाचनसंस्कृती कमी होतेय, दिवाळी अंकाचा दर्जा हरवत चाललाय, त्याच्यात साचलेपण आलेय अशी ओरड सुरू असतानाच ‘चपराक’ने प्रत्यक्ष कृतीशीलतेतून या वाचाळवीरांना चपराक देत तब्बल 468 पानांचा महाविशेषांक प्रकाशित केला आहे. यंदाच्या दिवाळी अंकात सर्वात मोठा अंक प्रकाशित करण्याचे धाडस ‘चपराक’ने केले आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय साहित्य आणि नामवंत लेखकांबरोबरच नवोदितांच्या अस्सल साहित्याला दिलेले व्यासपीठ यामुळे दिवाळी अंकाच्या आश्‍वासक परंपरेत ‘चपराक’ने भर घातली आहे. या विक्रमी अंकाने दिवाळी अंकाच्या वाटचालीत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
‘चपराक’चा यंदाचा अंक फक्त चाळायचा म्हटला तरी किमान दोन तास लागतील. कोणताही लेख, कथा, कविता वाचून झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतका गुणात्मक दर्जा टिकवलाय. लेखकांच्या श्रेयनामावलीवर नजर फिरवली तरी या अंकाचे सामर्थ्य लक्षात येईल. सर्व विषयांचा धांडोळा घेणारे अभ्यासपूर्ण लेख, अंकाची उत्तम मांडणी, सुबक छपाई, आकर्षक मुखपृष्ठ यामुळे वाचक या अंकाच्या प्रेमातच पडतात. मराठीत सातशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होत असताना आशय आणि गुणवत्ता या आघाडीवर ‘चपराक’ अव्वल ठरला आहे.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर, मिलिंद जोशी, सदानंद भणगे, पराग करंदीकर, प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, ह. मो. मराठे, नागनाथ कोत्तापल्ले, संजय सोनवणी, श्रीराम पचिंद्रे, वासुदेव कुलकर्णी,  डॉ. न. म. जोशी, शेखर जोशी, प्रा. द. ता. भोसले, प्रदीप नणंदकर, महेश मांगले, प्रशांत चव्हाण, डॉ. भास्कर बडे, सरिता कमळापूरकर, चंद्रलेखा बेलसरे, श्रीपाद ब्रह्मे, स्वप्निल पोरे, बी. एन. चौधरी, उमेश सणस, रवींद्र शोभणे, डॉ. सुनीलकुमार लवटे, समीर नेर्लेकर, डॉ. विद्या देवधर, डॉ. सच्चिदानंद शेवडे अशा एकाहून एक 143 साहित्यिकांचा या अंकात समावेश आहे. महाराष्ट्रातील वीस जिल्हे आणि इंदोर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद,  गोवा, बेळगाव आणि थेट दुबईतील साहित्यिकांचाही या दिवाळी अंकात समावेश आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांचा साहित्य संमेलनाच्या समकालीन वास्तवावर लिहिलेला खुसखुशीत लेख, ह. मो. मराठे यांची व्यंग्यकथा, नागनाथ कोत्तापल्ले आणि व्यंकटेश कल्याणकर यांच्या सारांश कथा, ज्योती कदम यांनी मराठवाड्याच्या तर श्रीराम पचिंद्रे यांनी गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची करून दिलेली ओळख, सुधीर गाडगीळ यांचे अमेरिकेतील मराठी मित्र, भाऊ तोरसेकर यांनी घेतलेला राष्ट्रीय राजकारणाचा वेध तर त्यांच्या पत्नी सौ. स्वाती तोरसेकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी मुस्लिम प्रश्‍नावर केलेली अभ्यासपूर्ण मांडणी हे सारेच वाचनीय आहे. प्रभाकर येरोळकर, डॉ. मुग्धा जोर्वेकर, शांताराम डफळ, मनिषा वाणी, माधव गिर, दत्तात्रेय वायचळ, नागेश शेवाळकर यांच्या कथा वाचनीय आहेत.
बण्डा जोशी, अजय कांडर, माधव गिर, रेणु पाचपोर, सविता करंजकर, आमीन सय्यद, विद्या बयास, मुरारीभाऊ देशपांडे, आबा महाजन, हणमंत चांदगुडे, ईश्‍वरचंद्र हलगरे, बाळासाहेब कारले, रूक्मिणी येवले, गोविंद केळकर, वसंत गोखले, देविदास फुलारी, महेश मोरे आदी 48 कवींच्या कविता या अंकाची शोभा वाढवतात. प्रा. बापू घावरे, अरविंद गाडेकर आणि महादेव साने यांची व्यंग्यचित्रे, समीर नेर्लेकर यांनी रेखाटलेली चित्रे आणि मुखपृष्ठ व व्यंकटेश कल्याणकर यांनी केलेली आकर्षक मांडणी हेही या अंकाचे सामर्थ्य आहे.
106 वर्षाच्या दिवाळी अंकाच्या परंपरेत दिवाळी अंकांनी मराठीला अनेक नामवंत लेखक दिले. केवळ मराठी भाषेतच दिवाळी अंकाच्या माध्यमातून अक्षर दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा टिकून रहावी, वृद्धिंगत व्हावी या दृष्टिने ‘चपराक’चे कायम प्रयत्न आहेत. संपादक घनश्याम पाटील हे गेल्या चौदा वर्षापासून ‘चपराक’चा दिवाळी विशेषांक प्रकाशित करतात. इतकेच नाही तर अन्य दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी राज्यस्तयीय दिवाळी अंक स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्वतः दर्जेदार अंक प्रकाशित करणे आणि इतर अंकांचीही आत्मीयतेने दखल घेणे, त्यांना कौतुकाची थाप देणे यामुळे घनश्याम पाटील आणि ‘चपराक’ यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘साहित्य चपराक’चा हा दिवाळी विशेषांक त्यांनी चपराकच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध करून दिला आहे. 

या अंकासाठी संपर्क : 020-24460909/7057292092

Saturday, October 31, 2015

साहित्य धर्म वाढवावा!

सध्या महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय. शेतकर्‍यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात. त्यांची जगण्याची उमेद नाहीशी होतेय. अशा हलाखीच्या काळात दुष्काळग्रस्तांच्या आयुष्यात थोडीशी झुळूक यावी यासाठी काहींनी पुढाकार घेतलाय. तो स्तुत्य आहे. धान्याअभावी, पाण्याअभावी जिथे जिथे दुष्काळ पडेल तिथे मदतीचा हात देऊन त्यांना बाहेर आणता येते; मात्र विचारांचा दुष्काळ पडला तर माणुसकीचा खून पडतो. त्यामुळे ज्यांना निसर्गाने तडाखे दिलेत त्यांच्यासाठी सहकार्याचा हात पुढे करतानाच ‘चपराक’ने वैचारिक दुष्काळ संपुष्टात यावा यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘चपराक’चे विविध उपक्रम आणि प्रस्तुत दिवाळी विशेषांक हे त्याचेच प्रतीक आहे. अनावश्यक राजकारणाला फाटा देऊन साहित्य धर्म वाढीस लागला तरच पुन्हा एकदा वैचारिक क्रांती घडेल आणि आपण अक्षरदिवाळी उत्साहात साजरी करू शकू असे आम्हास वाटते.
साहित्य क्षेत्र सध्या अनेक अपप्रपृत्तींनी बरबटलेय. साहित्यिक वातावरण कलुषित झालेय. साहित्य रसिकांवर सांस्कृृतिक बलात्कार होतोय. मात्र प्रत्येकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय. विचारांच्या लढाईची भाषा करणारे सदैव आपल्याच धुंदीत असतात आणि साहित्यबाह्य विषयांवरून खल करत चमकोगिरी करतात. ज्यांचा साहित्याशी कसलाही संबंध नाही ते लोक साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होतात, साहित्य संमेलने गाजवतात आणि वर आपणच साहित्यक्षेत्राचे कसे तारणहार आहोत याचे ढोलही पिटतात. हे सारेच क्लेषकारक आहे. प्रकाशाचा सण साजरा करत असताना अंधार आपसूकच दूर होतो. यंदाच्या दिवाळीत तरी साहित्य आणि प्रकाशन विश्‍वातील तिमीर संपावा आणि साहित्यिकांत नवचैतन्य निर्माण व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो.
साहित्यातही मूठभर लोकांची मक्तेदारी निर्माण झाल्याने सामान्य माणूस साहित्यापासून दूर जातोय. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ अशी खोटी आवई उठवत वर हे लोक सर्वांना वेठीस धरतात. नगद रक्कम मोजून पुस्तके विकत घेणार्‍या वाचकांशी प्रतारणा करतात. संकुचित वृत्तीच्या या समदुःखी लोकांनी ग्रंथ व्यवहाराचे वाटोळे करण्याचा विडा उचलला आहे. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना चपराक देताना आम्ही यांचे ढोंगही सातत्याने चव्हाट्यावर आणले आहे. सत्याला डावलण्याची हिंसा करण्याचे पाप जे कोणी करतात त्यांच्यासाठी आमच्या हातात सदैव हंटर आहे. लेखणीच्या माध्यमातून त्याचे फटके देताना आम्ही कधीही कचरणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची आमची तयारी आहे. तत्त्व, तळमळ, आणि तिडिक या त्रिसुत्रीच्या जोरावर संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून आम्ही कार्यरत आहोत; पुढेही राहू! वाचकांशी इमान राखताना साहित्य धर्म वाढावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असतील.
‘चपराक’ हे विविध प्रश्‍नांवरून वेळोवेळी ठाम भूमिका आणि सत्याचा कैवार घेणारे नियतकालिक आहे. आमची नाळ वाचकांशी जोडली गेलीय. मराठीत एक प्रभावी मासिक देताना आम्ही सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके समारंभपूर्वक प्रकाशित केली आहेत. मागच्या वर्षभरातील प्रमुख कार्यक्रम आणि ‘चपराक’ची परखड भूमिका पाहता त्यातील सत्य वाचकांच्या लक्षात येईल. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘चपराक दिवाळी विशेषांक 2014’चे प्रकाशन झाले. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘चपराक’च्या दुसर्‍या साहित्य महोत्सवात विविध साहित्य प्रकारातील आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लेखकांची तब्बल बारा पुस्तके आम्ही एकाचवेळी प्रकाशित केली. मराठीतील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांनी आमच्या या उपक्रमाची गौरवाने दखल घेतली.
भाऊ तोरसेकर हे मराठी पत्रकारितेतील एक अव्वल नाव. आचार्य अत्रे यांच्याच ‘मराठा‘तून त्यांच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला. विविध प्रश्‍नांवर तुटून पडताना भाऊंची लेखणी तळपत असते. सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचे, पानापानावर धादांत खोटी माहिती देणारे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले. या पुस्तकातून लेखकांनी शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यापुढे लाळघोटेपणा करताना स्वतःला जे वाटते ते सत्य म्हणून कसे घुसडले आहे याची चिकित्सा केली. लेखक आणि प्रकाशकांनी भाऊंना लेखी पत्र लिहून दिलगीरी व्यक्त केली आणि नव्या आवृत्तीत त्याची दुरूस्ती करू असे सांगितले. मात्र त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होऊनही काहीच घडले नाही. सर्व प्रकारचा लाभ घेत, समाजात उजळ माथ्याने मिरवत, रग्गड पैसा कमवत लेखक आणि प्रकाशक वाचकांची दिशाभूल करत होते. हा खोटेपणा असह्य झाल्याने  भाऊंनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले आणि ‘चपराक‘ने आपल्या वृत्तीप्रमाणे ते प्राधान्याने प्रकाशित केले. वाचकांनी या पुस्तकाचे जोरदार स्वागत केले आणि सुहास पळशीकरांसारख्यांचे बुरखे टरटरा फाटले. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. निकम हे फक्त वकील नाहीत, तर ते न्यायासाठी लढणारे देशभक्त वकील आहेत. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणे ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट होती.
‘चपराक’चा हा चौदावा दिवाळी विशेषांक. वाढत्या चंद्रकलेप्रमाणे उत्तमोत्तम आणि वाचनीय दिवाळी विशेषांक प्रकाशित करणे ही आता आमची स्वभाववृत्तीच झाली आहे. एखादा अंक पूर्ण करताना किती परिश्रम करावे लागतात हे स्व-अनुभवातून आम्ही जाणू शकतो. त्यामुळेच सर्वोत्तम दिवाळी विशेषांकाचा गौरव करण्याची परंपरा आम्ही याच वर्षापासून सुरू केली आहे. ‘चपराक’ची राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाली. राज्यातून आणि राज्याबाहेरूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नांदेड येथील दै. ‘उद्याचा मराठवाडा’, सोलापूर येथील दै. ‘संचार’, मुंबईचा साप्ताहिक ‘विवेक’, पुण्यातील ‘आपले छंद‘, आणि ‘ग्राहकहित’ या दिवाळी विशेषांकांचा गौरव ‘चपराक‘ने केला. खास अंधासाठी मुंबईतून ब्रेल लिपीत प्रकाशित होणार्‍या ‘स्पर्शज्ञान‘ या अंकालाही विशेष पुरस्कार दिला. आपल्याच क्षेत्रातील चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करणे यापेक्षा मोठा आनंद कोणता बरे असू शकेल?
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागले. यंदाचे संमेलन संत नामदेव महाराज यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पंजाब येथील घुमान या गावात घ्यायचे ठरले. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. सदानंद मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली. अमराठी भागात संमेलन होणार असल्याने पुस्तक विक्री होणार नाही, असा ग्रह काही प्रकाशकांनी करून घेतला आणि या संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘एकही मराठी प्रकाशक या संमेलनाला जाणार नाही‘ अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांतील ही कोंडी फोडणे गरजेचे होते. ‘धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा’ हे आचार्य अत्रे यांचे सूत्र आचरणात आणत आम्ही पुढाकार घेतला आणि ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी आम्ही तिथे नक्की जाऊ’ अशी भूमिका घेतली.
आमच्या या सकारात्मक भूमिकेची दखल सर्व वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी घेतली. प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली; मात्र मराठीतील एका संस्मरणीय संमेलनासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. संमेलन ‘अखिल भारतीय’ असल्याने कधीतरी राज्याबाहेर झाले तर असा काय फरक पडणार? पण धर्माचा धंदा करणार्‍यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. आम्ही हा धर्म जपत आवाज उठवला. घुमानचे संमेलन यशस्वी करण्यात हातभार लावला. ‘चपराक’च्या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री घुमानला झाली. त्यातून अनेक लेखक मिळाले, नवे मित्र मिळाले. इतकेच काय नंतर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ‘चपराक’ने घुमानबाबत घेतलेल्या भूमिकेचे जाहीर कौतुक केले.
याच वर्षात आम्ही शांताराम डफळ यांचा ‘अस्तित्व’, सरिता कमळापूरकर यांचा ‘माझी कविता’, प्रल्हाद दुधाळ यांचा ‘सजवलेले क्षण’ हे काव्यसंग्रहही धडाक्यात प्रकाशित केले. कवितासंग्रह कोणीही प्रकाशित करायला धजावत नाही, असे सांगितले जात असताना या वर्षात ‘चपराक‘ने जवळपास दहा कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत.
‘चपराक’चा तिसरा साहित्य महोत्सव 8 ऑगस्ट 2015 रोजी नारायण पेठेतील केसरी वाड्यात संपन्न झाला. यात पुस्तकांची संख्या होती पंधरा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे या संमेलनाला उपस्थित होते. पंधरा-पंधरा पुस्तके एकावेळी प्रकाशित करूनही जर कोणी ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असा कांगावा करत असेल तर वाचकांनीच आता त्यांना झोडपून काढले पाहिजे. उत्तमोत्तम विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी लेखक आणि प्रकाशक काय परिश्रम घेतात हे पाहणे गरजेचे आहे. वाचक कमी होताहेत असे म्हणण्यापेक्षा ते वाढावेत यासाठी काय प्रयत्न होतात हे बघितले पाहिजे.
‘चपराक’च्या चमुने या वर्षात पंजाब येथील घुमान, मराठवाड्यातील लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, परभणी, त्यानंतर  नाशिक, बेळगाव, नगर, संगमननेर असे दौरे करून वाचकांचा कौल जाणून घेतला. नवनवे लेखक शोधले. रमेश पडवळ यांच्या ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे लोकार्पण नाशिकला झाले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, नाशिकातील प्रसिद्ध उद्योजक आणि व्याख्याते गिरीश टकले असे मान्यवर उपस्थित होते. गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या ‘चौथा स्तंभ’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन बेळगावला झाले. जिथे जिथे मराठी वाचक आहे तिथे तिथे पोहोचण्याचा आणि त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याचा, त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मराठी वाचकांना जास्तीत जास्त दर्जेदार मजकूर द्यायचा आणि शक्य तितक्या लेखकांना लिहिते करायचे या उद्देशाने यंदा दिवाळीचा महाविशेषांक करायचे ठरले. संपादकीय बैठक घेऊन सर्वानुमते आम्ही तो निर्णय जाहीर केला आणि सुरू झाली या अंकाची तयारी. पुस्तक प्रकाशनाचा व्याप, सततचा प्रवास, साप्ताहिक आणि मासिकाचे नियमित अंक हे सारे सांभाळून दिवाळी अंकाचे काम करायचे होते. त्यातही एखादा विषय घेऊन अंक केला तर त्या विषयात ज्यांना अभिरूची नाही ते तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत. विषय घेऊन अंक केल्यानंतर व्यवसाय होतो पण त्यात सर्वसमावेशकता येत नाही. त्यामुळे  मराठीतील नव्या जुन्या लेखकांना एकत्र आणत त्यांच्याकडून जे सर्वोत्तम आहे ते लिहून घ्यायचे ठरले.
आम्ही काम सुरू केले आणि बघता बघता हा डोंगर कधी उभारला ते लक्षातच आले नाही. भाऊ तोरसेकर, ह. मो. मराठे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, सुधीर गाडगीळ, पराग करंदीकर, श्रीराम पचिंद्रे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, सदानंद भणगे, डॉ. भास्कर बडे, अंजली कुलकर्णी, प्रा. द. ता. भोसले, वासुदेव कुलकर्णी, श्रीपाद ब्रह्मे, प्रा. बी. एन. चौधरी, डॉ. सुनीलकुमार लवटे, अरूण खोरे, शेखर जोशी, स्वप्निल पोरे, प्रशांत चव्हाण, सुभाष धुमे, स्वाती तोरसेकर, सरिता कमळापूरकर अशा मान्यवरांचे साहित्य धडाधड आले. सागर कळसाईत, व्यंकटेश कल्याणकर, डॉ. मुग्धा जोर्वेकर, हणमंत कुराडे, सतीश देशपांडे, अर्चना डावरे, पवन घटकांबळे या तरूणांनीही खिंड लढवली. नवोदित आणि प्रस्थापित यांच्यातील भेद दूर व्हावा इतके ताकतीचे ही मंडळी लिहित आहेत.
‘चपराक’च्या सदस्य सौ. चंद्रलेखा बेलसरे, माधव गिर, महेश मांगले, समीर नेर्लेकर, विनोद श्रा. पंचभाई, मच्छिंद्र कामंत यांनीही आपल्या सशक्त लेखणीची झलक दाखवून दिली आहे. यंदाचा आपला महादिवाळी विशेषांक प्रकाशित होणार हे कळताच देशभरातून प्रचंड साहित्य आले. वेळेअभावी आणि जागेअभावी अनेकांच्या साहित्याला न्याय देता आला नाही याची खंत आहे. मात्र त्याला पर्याय नाही. काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. त्यामुळे ज्यांच्या साहित्याचा अंकात समावेश करता आला नाही त्यांनी नाराज न होता सातत्याने लिहित रहावे. पुढच्या अंकातून ते साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करू!
या महाविशेषांकातील अंकाचे वैविध्य तरी पहा! फक्त अंक चाळायचे म्हटले तरी निदान तासभर सहज जाईल. भाऊ तोरसेकर यांनी देशाचे राजकारण उलगडून दाखवले आहे. सध्या प्रकाशकही  अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत उतरले असल्याने प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘रद्दीवाले आणि बारवालेही’ या निवडणुकीत उतरले तर काय होईल याविषयी खुसशुशीत शैलीत लिहिले आहे. साहित्यातील या समकालीन वास्तवावरील त्यांचे भाष्य जरूर विचारात घेण्यासारखे आहे. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ हे महिनाभराच्या अमेरिका दौर्‍यावरून नुकतेच पुण्यात परतले. त्यांना त्यांच्या अमेरिकेतील मराठी मित्रांविषयी लिहिण्याचा प्रेमळ आग्रह आम्ही केला आणि कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी रात्रभर जागून ‘माझे अमेरिकेतील मित्र’ हा लेख पूर्ण करून दिला. वासुदेव कुलकर्णी याचा सातार्‍यावरील लेख, ज्योती कदम यांनी मराठवाड्याच्या तर श्रीराम पचिंद्रे यांनी गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची करून दिलेली ओळख, विद्या देवधर यांनी हैद्राबादच्या मराठी माणसांविषयी लिहिलेला लेख, थेट दुबईहून प्रदीप मार्कंडेय यांनी रक्तदानाचा पाठवलेला एक अनुभव, ‘चपराक साहित्य महोत्सवा’तील बाबासाहेबांच्या भाषणाचा संक्षिप्त भाग, मराठी चित्रपटाविषयी उमेश सणस आणि चित्रपट निर्माते विकास पाटील यांचे लेख, स्वाती तोरसेकर यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा लेख, आसावरी इंगळे यांनी लिव इन रिलेशनशिप सारख्या विषयावर, बी. एन. चौधरी यांनी लैंगिक शिक्षणावर तर पवन घटकांबळेसारख्या तरूणाने महिलांच्या मासिक पाळीवर लिहिलेले लेख विचारप्रवर्तक आहेत. या विषयावर अजूनही मोकळेपणाने चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे.
अंकातील कथा, कविता आणि व्यंग्यचित्रांनीही वाचनीयता वाढवली आहे. प्रा. बापू घावरे, अरविंद गाडेकर यांची व्यंग्यचित्रे नवा विचार देणारी आहेत. सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि चित्रकार समीर नेर्लेकर यांनी सर्व लेखांच्या शीर्षकांचे सुलेखन केले आहे. आतील चित्रे आणि साजेसे मुखपृष्ठ त्यांनीच साकारले आहे. व्यंकटेश कल्याणकर यांनी अल्पावधीत उत्कृष्ट मांडणी केली. ‘चपराक’च्या ‘सुप्रिमो’ शुभांगी गिरमे, ‘छोटा भीम’ तुषार उथळे पाटील, माधव गिर, महेश मांगले, मोरेश्‍वर ब्रह्मे, बजरंग लिंभोरे यांनी अंकासाठी शब्दशः दिवसरात्र एक केला. ‘चपराक’वर नितांत प्रेम करणारे ज्ञानेश्‍वरभाऊ तापकीर, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक मच्छिंद्र कामंत यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि काही जाहिराती मिळवून दिल्या. त्यामुळेच एक छोटासा बिंदू बघता बघता अथांग सिंधूसारखा कधी झाला ते कळलेच नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लेखकांचे साहित्य तर या अंकात आहेच; पण महाराष्ट्राबाहेरील प्रतिभावंतांनीही लेखन सहभाग घेतला आहे. त्यात प्रामुख्याने हैदराबादच्या डॉ. विद्या देवधर, बेळगावचे सुधीर जोगळेकर, सुरतच्या मनिषा वाणी, अहमदाबादच्या आसावरी इंगळे, इंदूरचे विश्‍वनाथ शिरढोणकर, गोव्याचे श्रीराम पचिंद्रे, दुबईचे प्रदीप मार्कंडेय आदींचा समावेश आहे. वाचक कमी होत आहेत, लेखनसंस्कृती नष्ट होतेय असे म्हणणार्‍यांना ही चपराक आहे.
पत्रकारांचा समाजातील सर्व क्षेत्रातल्या लोकांशी नियमित संबंध येतो. त्यांचे अनुभवविश्‍व दांडगे असते. त्यामुळे त्यांनी सातत्याने नवनव्या विषयावर लिहावे असा आमचा आग्रह असतो. आलेल्या प्रेसनोटवरून बातमी करण्याच्या काळातही अनेक पत्रकार उत्तमोत्तम लिखाण करतात. ‘पत्रकारांच्या लेखणीत शाई नाही तर घाई असते’ असे म्हणतात. त्यामुळे प्रतिभा असूनही अनेक पत्रकार इतर विषयांवरील लेखनाकडे दुर्लक्ष करतात. मात्र ‘चपराक’ने पत्रकारांना कायम लिहिते केले आहे. विविध वृत्तपत्रातील अनेक पत्रकारांचे या अंकातील साहित्य बघितल्यावर वाचकांना त्याची खात्री पटेल. कोणतीही संस्था, संघटना, राजकीय पक्ष, विचारधारा यांच्या दावणीला बांधले न जाता जे चांगले अकाहे ते ‘चपराक’ने स्वीकारले आहे आणि जे चुकीचे आहे ते अव्हेरले आहे. भविष्यातही आमची हीच भूमिका कायम असेल.
मराठी मासिकांचा आवाज वाढावा यासाठी प्रत्येकाने किमान दोन मासिके आपल्या घरी सुरू करायला हवीत. त्यातही कोणतीही विचारधारा न लादणार्‍या, सत्य धाडसाने मांडणार्‍या आणि साहित्य आणि संस्कृतीचे जतन करणार्‍या मासिकांना प्राधान्य द्यायला हवे. ‘चपराक’च्या माध्यमातून आम्ही नेकीने हे काम करतोय आणि वाचकांचाही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रस्थापितांचे शब्दधन आणि नवोदितांचे मोकळे मन यांचा सुंदर मिलाफ साधल्याने ‘चपराक’चा वाचकवर्ग सर्वदूर निर्माण झाला आहे. अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्यापासून ते राज्याच्या जबाबदार मंत्र्यापर्यंत सर्वांच्या हातात सध्या ‘चपराक’ दिसतोय. साहित्याच्या क्षेत्रात ‘चपराक’ची भूमिका महत्त्वाची ठरतेय. कारण चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून आमची वाटचाल सुरू आहे. यात आमचे सर्व लेखक, वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतक यांचा सहभाग आहे. आपणा सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळेच ‘चपराक’चा इवलासा वेलू गगनावरी जात आहे.
भविष्यात ‘चपराक’ चे आणखी नवे उच्चांक आणि नवनवे मापदंड तयार होतील. जे उत्तम लिहितात पण ज्यांना व्यासपीठ मिळत नाही त्यांनी ‘चपराक’शी संपर्क साधावा. तुमच्या साहित्यात गुणात्मक दर्जा असेल तर ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची. रामदास स्वामींनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे सांगितले आहे; मात्र त्यांना ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ असे अपेक्षित होते. सध्या ‘काहीतरीच’ लिहिणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने आणि साहित्य क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा उंचावल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. पैसे घेऊन वाटेल तसे रद्दड साहित्य प्रकाशित करणार्‍या प्रकाशकांनी, त्यामुळे प्रसिद्धीची हौस भागवणार्‍या लेखकांनी, लेखकांचा कस सुधारावा यासाठी कसलेच प्रयत्न न करणार्‍या साहित्य संस्थानींच मराठीचे वाटोळे केलेय. हे चित्र बदलायचे असेल तर अभ्यासू आणि लिहिण्याची क्षमता असणार्‍यांनी पुढे यायला हवे. आम्ही अशा लेखकांच्या शोधात आहोत.
लिहिणं हा आपला धर्म आहे. त्याअर्थी आपण समानधर्मी आहोत. फक्त आता या धर्मात काही सुधारणा करायला हव्यात. पुरस्कार मिळवण्यासाठी आणि ते पुन्हा परत करण्यासाठी या क्षेत्रात यायची गरज नाही. अनेक क्षेत्रांना कीड लागली असल्याने ती साहित्य क्षेत्राकडेही आलीय. हा संसर्ग थांबला पाहिजे. लेखकांनी सत्यासाठी, न्यायासाठी, सामाजिक प्रबोधनासाठी लिहायला हवे. साहित्याचा आजवरचा फार मोठा वारसा आहे. फार मोठी परंपरा आहे. अनेक चमत्कार घडविण्याची ताकत फक्त आणि फक्त शब्दांत आहे. कित्येकांचे आयुष्य बदलणार्‍या, त्यांना दिशा दाखवणार्‍या, त्यांच्यात चैतन्य निर्माण करणार्‍या, माणुसकीची शिकवण देणार्‍या चिरंतन साहित्याशिवाय दुसरे काहीच शाश्‍वत नाही. आपले ‘लिहिणे‘ समाजाच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलते हे कायम लक्षात ठेवायला हवे. मोठमोठ्या साहित्यिकांचे हे भान सुटल्यानेच ते कुणापुढे तरी मिंधे होतात आणि राजकारणाचा घटक बनून स्वतःचे अस्तित्व संपवतात.
त्यामुळे लिहिते व्हा! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करा! जे उदात्त, व्यापक, मंगल आहे अशा सद्गुणांची पूजा बांधा. अन्याय-असत्यावर प्रहार करा. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना चपराक देताना मुळीच कचरू नका. निर्भयता हा लेखकाचा सर्वात मोठा गुण असतो. निर्भयपणे निर्मळ विचार मांडा. हा साहित्यधर्म वाढला तरच संस्कृती आणि संस्कार जपता येतील. नवनवे महापुरूष त्यातूनच जन्माला येतील. त्यासाठी तुम्हाला खंडीभर शुभेच्छा!
तसेच, ही दिवाळी आपणास सुखसमृद्धीची, आनंद, ऐश्‍वर्यदायी, आरोग्यदायी जावो याही अंतःकरणापासून शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील 

संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Monday, October 5, 2015

परिषदेत बदल घडवा!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच साहित्य परिषदेच्या निवडणुकीचेही संकेत मिळाले आहेत. इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी त्यांची कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडून कशी कुचंबणा होत आहे हे परखडपणे सांगितले आहे. प्रा. द. मा. मिरासदार हे सुद्धा वैद्य बाईंच्या राजकारणाला कंटाळूनच परिषदेतून बाहेर पडल्याचे त्यांनी कबूल केले आहे. मिरासदारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘चपराक’ने हे वास्तव वाचकांसमोर आणले होते. मात्र त्यावेळी द. मा. स्वतःच शांत राहिल्याने त्या विषयांवर फारशी चर्चा झाली नव्हती. शेजवलकरांनी ही कोंडी फोडल्यानंतर मिरासदारांनीही ते मान्य केले आहे.
माधवी वैद्य या कशा भ्रष्टाचाराच्या डबक्यात रूतत गेल्या आहेत, त्यांनी कसे सूडाचे राजकारण केले, त्यामुळे साहित्याची आणि साहित्य परिषदेची कशी हानी झाली हे ‘चपराक’ने सातत्याने वाचकांसमोर मांडले आहे. आता दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच सर्वसाधारण सभेत तशी स्पष्ट भूमिका घेऊन ‘चपराक’च्या विश्‍वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी फक्त घुसमट व्यक्त केली नसून या परिस्थितीतून कशाप्रकारे मार्ग काढता येईल हेही ठामपणे मांडले आहे. ‘महाराष्ट्रातील सुविख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ’ अशी ओळख असलेल्या शेजवलकरांच्या बोलण्यातील तथ्य लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
मुळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि साहित्याचा तसा फारसा संबंध राहिला नाही. नवोदितांच्या प्रतिभेला वाव मिळेल असे तिथे किंवा त्यामाध्यमातून काही घडत नाही. एकमेकांच्या कुचाळक्या करणे, मिरवण्याची हौस भागवून घेणे, मिळालेल्या निधीवर डल्ला मारणे, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची तुंबडी भरणे हे व अशा प्रकारचे उद्योग तिथे खुलेआमपणे चालू असतात. तीन पानांची संहिता लिहिण्यासाठी तीस हजार रूपये, अनावश्यक विमानप्रवास, परिसंवादात जावयाची वर्णी, बालगोपाळांसाठी काढलेल्या दिवाळी अंकात स्वतःच्याच नातवंडांचे फोटो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी मदत, स्तुतीपाठक आणि भाटांचे हीत जोपासताना अस्सल प्रतिभावंतांची केलेली उपेक्षा या व अशा अनेक कारनाम्यातून डॉ. माधवी वैद्य यांनी त्यांचे गुण-अवगुण दाखवून दिले आहेत.
घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या बाईंनी संमेलनाध्यक्षांची अशीच उपेक्षा केली होती. व्यासपीठावर त्यांनी डॉ. सदानंद मोरे यांना चक्क मागे ढकलले आणि त्यांच्या पुढे येऊन  राजकारण्यांच्या बाजूला थांबल्या. तेव्हा संमेलनात ‘महामंडळाच्या अध्यक्षांची नथ दिसली पण त्यामागचे नाक दिसले नाही’ या शब्दात आम्ही संमेलनाध्यक्षांची केविलवाणी अवस्था सांगितली होती. मात्र आपले लोकही निलाजरे आहेत. पद आणि प्रतिष्ठेसाठी कितीही अवमान सहन करतील. निवडून येण्यासाठी राजकारण्यांची चमचेगिरी करणारे, लाळघोटेपणा करणारे आणि निवडून आल्यानंतरही स्वाभिमान गहाण ठेवणारे असे अध्यक्ष मिळाल्यानेच मराठी भाषेची वाताहत झाली आहे.
श्रीपाल सबनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साहित्य परिषदेत एक पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. सदानंद मोरेही तिथे आले होते. मागच्या वर्षी सबनीसांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने मोरेंनी यावेळी त्याची परतफेड केली हे उघड होते. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ अशातला हा मामला होता. मात्र या परिषदेत पत्रकारांनी सबनीसांना विचारले की, ‘‘राजकीय मदत घेणार का?’’ त्यावर त्यांनी ‘‘साहित्यात कोणीही वर्ज्य नसते, मात्र मी माझे अवमूल्यन करून घेणार नाही. राजकारणी व्यासपीठावर असले तर फरक पडणार नाही मात्र माझी खुर्ची कुणी ढकलत ढकलत मागे नेली तर ते मला चालणार नाही’’, अशा शब्दात सदानंद मोरे यांना टोलवले होते.
यावर्षीच्या साहित्य संमेलन निवडणुकीत पहिल्या फळीतील एकही साहित्यिक नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोणीही झाले तरी मराठी भाषेला तसा काहीच फरक पडणार नाही. अर्थात, मोठा आणि कार्यक्षम लेखक संमेलनाध्यक्ष झाल्याने मराठीत आजवर काही मोठे परिवर्तन घडलेय असेही नाही. मात्र आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रतिभावंत ज्या खुर्चीवर बसले होते तो वारसा फारच भुक्कड लोकांकडे येऊन ठेपला आहे. नाहीतर फ. मुं. शिंदे सारखे किरकोळ प्रतिभेचे अनेक हौसी नकलाकार संमेलनाध्यक्ष झालेच नसते. या पदाची प्रतिष्ठा कधीच लयास गेली आहे. आता केवळ एक सोपस्कार उरलाय. ‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे संमेलने पार पडत आहेत. त्यापासून मराठी भाषेला, मराठी माणसाला नक्की काय मिळते याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे विधान करतो. त्याला साहित्यातील अशा प्रवृत्ती कारणीभूत आहेत.
असो! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! माधवी वैद्य यांच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या प्रा. मिलिंद जोशी यांच्याविषयी डॉ. शेजवलकरांनी गौरवोद्गार काढले आहेत. जोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, अशी अपेक्षाही शेजवलकरांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. मिलिंद जोशी परिषदेतून बाहेर पडल्यानंतर परिषदेचे वाटोळे झाले हेही त्यांनी सूचित केले आहे. प्रशासनावर पकड असलेला, स्वतः साहित्यिक आणि फर्डा वक्ता असलेला जोशी यांच्यासारखा नेता परिषदेला मिळाला तरच काहीतरी आशादायक चित्र दिसू शकेल. येणार्‍या निवडणुकीत मिलिंद जोशी यांनी पुन्हा सक्रिय व्हावे आणि परिषदेला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी भूमिका डॉ. शेजवलकर यांच्यासारख्या अभ्यासू, व्यवस्थापन क्षेत्रात मानदंड ठरणार्‍या आणि स्वच्छ प्रतिमेच्या सद्गृहस्थाने घेतली आहे. त्याचे समर्थन करायलाच हवे.
माधवी वैद्य, सुनील महाजन यांनी परिषदेची, महामंडळाची आणि एकूणच साहित्य क्षेत्राची केली तेवढी शोभा पुरे झाली. आता यात परिवर्तन घडावे आणि साहित्य क्षेत्रात मराठीचा विजयध्वज सर्वत्र डौलात फडकावा, एवढीच यानिमित्ताने माफक अपेक्षा! 

- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

Monday, September 28, 2015

नाना, महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे…

त्यानं काही दिवसांपूर्वी सिंहगडाजवळ शेत घेतलं अन् मग एकदा त्याला एकानं विचारलं की, ‘‘तू शेतावर काय लावतोयस रे?’’ हा म्हणाला, ‘‘लाकडं. माझी मी उगवतोय. हो! नाहीतर हे सगळे दोस्त लोक ओल्या लाकडावर जाळायचे. धूर डोळ्यात गेल्यावर यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि जळताना भला वाटायचं की माझ्यासाठी रडतायत. असले नालायक आहेत. त्यामुळं मी माझ्यासाठी सुकी लाकडं आणणार. धूर कमी. त्यामुळं मला जळताना कळेल की खरा कोण आणि खोटा कोण? काय सांगावं, तिथेसुद्धा कदाचित मी उठेन मुस्काटीत मारायला.’’ त्याचं हे उत्तर फटकळ आहे; मात्र खूप काही सांगणारं. माणूस येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. त्याला या गोष्टीचं पक्कं भान आहे. त्याला पक्कं माहिती आहे, माणसाच्या गरजा किती असतात, किती असाव्यात! त्याच्याकडे तरी काय होतं एकेकाळी? नववीत होता तो त्यावेळी. वय तेरा वर्षे. त्या वयात पोटासाठी नोकरी केली त्यानं. मुंबईत दादरच्या समर्थ विद्यालयात शिकायचा. दुपारी घरी यायचा माहिमला. असेल ते खायचा व नोकरीसाठी आठ किलोमीटर चालत जायचा. पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचा. हातात कला होती. पेंटींग छान करायचा. नोकरी पेंटींगचीच. सिनेमाची पोस्टर्स करायचा. वय होतं का त्याचं ते नोकरी करण्याचं? मात्र पर्यायच नव्हता. वडिलांना कोणीतरी फसवलं म्हणून त्यात त्यांचं सगळंच गेलं. त्याआधी दोन वेळची भ्रांत नव्हती; मात्र आता एका वेळेचीही भ्रांत निर्माण झाली. कोवळं वय. आईवडिलांकडे हट्ट करण्याचं. खेळण्याबागडण्याचं; मात्र संकट आलं तेव्हा तो कोवळ्या वयातही डगमगला नाही. लढला सरळ! परिस्थितीशी दोन हात केले. मुख्य म्हणजे मन कटू करून घेतलं नाही स्वत:चं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर जी लढण्याची ताकत मिळाली ती त्याच दिवसातून मिळाली. पुढं काय घडलं मग? हिंदी चित्रपटसृष्टीतला ‘बाप माणूस’ झाला तो पुढं वीस एक वर्षानंतर! भलेभले त्याच्या अभिनयाला सलाम करू लागले. आत्मविश्‍वास थक्क करणारा होता त्याचा! एका टप्प्यावर तर अमिताभ बच्चनपेक्षा जास्त मानधन घेत होता म्हणे तो! चिकार लोकप्रिय झाला; मात्र एक गोष्ट कधीही विसरला नाही तो. महिना पस्तीस रूपये पगार व एक वेळचं जेवण यावर केलेली नोकरी. प्रसंगी मुंबईच्या फुटपाथवर झोपून काढलेले दिवस! त्याच्या वाईट दिवसात अनेकांनी त्याला आधार दिला. विजया मेहता, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, मोहन तोंडवळकर, दिलीप कोल्हटकर ते अगदी अशोक सराफपर्यंत. या कुणालाही तो विसरला नाही. ‘पाहिजे जातीचे’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘महासागर’ ही त्याची सुरूवातीची नाटकं. मग आलं त्याचं ‘पुरूष’ हे नाटक. ‘पुरूष’ तर त्याच्यावरच बेतलेलं. खलनायकी भूमिका होती ती; मात्र आख्खं नाटक त्यानंच उचलून धरलेलं. कितीतरी चर्चेत राहिलेलं ते नाटक; मात्र त्यावेळी त्यातून तरी त्याला काय मिळत होतं? पन्नास रूपये मिळायचे एका प्रयोगाचे. त्याची बायको निलकांती. ती तेव्हा बँकेत अधिकारी होती. तिला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळायचे; मात्र तिनं याची उमेद खचू दिली नाही. मुळात नाटकात तो टिकून राहिला तो तिच्याच प्रोत्साहनामुळं. हा या सगळ्यांचे ऋण मानतो. ऋणानुबंध तो विसरत नाही. आईवडिलांचे ऋणही तो विसरला नाही. वडील माळकरी. अत्यंत सज्जन! वडिलांनी एकच सांगितलं होतं, ‘नाना, कधीही कोणाकडून पैसे घेऊ नकोस आणि कुणाला दिलेस तर लक्षात ठेऊ नकोस.’ वडिलांचे हे शब्द. ते त्यानं आयुष्यात प्रमाण मानले. आपण समाजाला जे काही देऊ ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. फूल असो वा फुलाची पाकळी, सत्पात्री गेली पाहिजे. त्याचे ढोल वाजवायचे नाहीत. आव आणायचा नाही. कसलाही दांभिकपणा टाळायचा. या गोष्टी त्यानं लक्षात ठेवल्या. त्यानं देवाकडे दोन वेळची भाकरी मागितली होती. त्याच्या करोडो पटीनं देवानं त्याला सर्व काही दिलं ही त्याची भावना. ‘‘माझी ओंजळ तेवढीच आहे. ती मोठी नाहीच झाली. ती भरलेलीच आहे’’ तो म्हणतो. पैशांचा त्याला तिटकारा नाही; मात्र पैसा हे त्याच्यासाठी सर्वस्व कधीच नव्हतं. म्हणूनच पैशानं विकत मिळणारी सुखं. ती विकत घेण्याच्या भानगडीतच तो कधी पडला नाही. ‘‘मला गाडी-घोड्यांची किंवा मोठ्या घराची हौस नव्हती. तू माझा मित्र आहेस. मी तुझी किंमत लावायची म्हटलं तर लावता येईल का?’’ तो मित्रांना सरळ विचारतो. त्याच्या या विचारण्यात मोल माणसांचं आहे. पैशाचं नाही.
तो रमला माणसांमध्ये. त्याला माणसं प्रिय! तो बाबा आमट्यांकडे खेचला गेला तसा बाळासाहेब ठाकर्‍यांकडेही. त्यात त्याला काही विरोधाभास वाटत नाही. त्याच्या मते ही दोन्ही माणसं खूप मोठी होती. खूप निखळ होती. तो कुठल्याच जातिधर्मात अडकून पडलेला नाही. ‘मुरूड-जंजिरा’ हे त्याचं गाव. सहावीपर्यंत तो तिथं शिकला. रात्री बेरात्री उठून तो समुद्रावर जाऊन बसत असे. त्या समुद्रानं त्याला भेद शिकवला नाही. ‘‘मुरूडला समोर नेहमीच समुद्र असायचा. त्यामुळं जे काही पहायचं ते भव्यच पहायचं अशी सवयच लागली’’ तो सांगतो. त्याच्या मते समुद्र हा उदात्त असतो. खळखळता असतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनाचा कोतेपणा गळून पडतो. 1968 साली तो ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये होता मुंबईच्या. त्याचं चित्रकार असणं हा केवळ योगायोग नाही. त्याच्या कॅनव्हासवर त्यानं एका चांगल्या राज्याचं चित्र रेखाटलं आहे. एक नागरिक म्हणून त्याला एक बर्‍यापैकी ‘सिस्टिम’ हवी आहे. माणसांचं जगणं निदान सुसह्य करेल अशी सिस्टिम. दुसरीकडे आपणही या राज्याचे, या देशाचे नागरिक आहोत व आपलीही काही जबाबदारी आहे हे तो मानतो. जात, धर्म नंतर. ‘‘मला ‘कुराण’मधली खूप आयतं बोलता येतात. माझ्या गळ्यात ताईत आहे व कृष्णसुद्धा’’ तो सांगतो.
नाना पाटेकर! काही माणसं घरातलीच वाटतात. तसा हा माणूस. आता पुन्हा चर्चेत आलाय तो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या! हा विषय त्यानं उचलून धरल्यामुळं. विदर्भ, मराठवाड्यात परिस्थिती भिषण! तिथं हा फिरतोय. त्याला शक्य ते सर्वकाही करतोय. मकरंद अनासपुरेही मराठवाड्यातला. त्यालाही माहीत आहे, दुष्काळ ही काय चीज असते ते! मात्र नानाची आर्थिक मदत किती जणांना पुरणार? किती काळ पुरणार? तरीही त्याचं महत्त्व मोठं आहे. माणसांची उमेद मारून टाकतो दुष्काळ. नानाच्या प्रयत्नांमुळे ही उमेद टिकून राहिल माणसांची. होणार्‍या आत्महत्या टळू शकतात त्याच्या या कामामुळं. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हा व्यवस्थेपुढचाच प्रश्‍न नाही फक्त. तो तुम्हा आम्हा नागरिकांपुढचा देखील प्रश्‍न आहे.
नानाचं वेगळेपण एवढंच, त्यानं हा प्रश्‍न आपला मानला. प्रश्‍न आपलेच आहेत सगळे अवतीभवती निर्माण झालेले. आपणच ते प्रत्येकवेळी राजकारण्यांवर ढकलतो का? ती एक सोय आहे का? पळवाट आहे का? आपली जबाबदारी टाळण्याची? ‘राजकारणातली विश्‍वासार्हता संपली’ हे म्हणायला ठीक आहे; मात्र आपल्या विश्‍वासार्हतेचं काय? हा लेख लिहिताना रात्रीचे आठ वाजतायत. नारायण पेठेतल्या ऑफिसमध्ये बसून हे लिहितो आहे. दुसर्‍या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसच्या भिंती व खिडक्यांच्या काचा. थरथरतायत त्या. का? खाली गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू आहे. सहज खिडकी उघडली. खाली नजर टाकली तर विशी-तिशी-चाळीशीतली जमात नाचण्यात धुंद आहे! त्यात मुलीही आहेत. एक मुलगी. अंगात आल्यासारखं नाचतेय ती! काय सिद्ध करायचं असतं या सगळ्यातून समजत नाही. हायकोर्टाचे सगळे निर्णय धाब्यावर बसवून चाललेला हा उन्माद! भयानक आहे तो! आपल्याच राज्यातल्या एका भागाला ‘मराठवाडा’ म्हणतात. एका भागाला ‘विदर्भ’ म्हणतात. तिथं मागच्या काही वर्षात तीस एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही आत्महत्या चालू आहेत हे या नर्तक व नृत्यांगनांच्या गावी आहे की नाही माहीत नाही.
तर वातावरण हे असं आहे. कुणाला कुणाचं पडलेलं नाही फारसं. मग नानाचं वेगळेपण का जाणवणार नाही? शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर त्यानं काम सुरू केलं. त्याची स्वत:ची विश्‍वासार्हताच मुळात मोठी! आज माणसं मुख्यमंत्री निधीला पैसे देत नाहीत तर नाना व मकरंदकडे मदतीचे पैसे देताहेत. नानाला यातून प्रसिद्धी नकोय. त्याच्या सहकार्‍यांनाही ती नकोय. हा अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रापुढचा प्रश्‍न आहे. प्रत्येकानं तो आपला प्रश्‍न मानला पाहिजे. निदान तशी जाणीव तरी आपण ठेऊ शकतो. या क्षणी इतकंच म्हणता येईल, ‘नाना, तू माणूस विश्‍वासार्ह आहेस व महाराष्ट्र नेहमीच तुझ्या सोबत आहे.’
- महेश मांगले

९८२२०७०७८५
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
२८ सप्टेंबर २०१५

Saturday, September 26, 2015

‘सत्तांतर’ उलगडणारा ग्रंथ

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या 'कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट' या सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित पुस्तकाचे परीक्षण आजच्या दैनिक 'संचार'ने 'इंद्रधनू' पुरवणीतून करून दिले आहे. संचार आणि श्री. प्रशांत जोशी यांना मन:पूर्वक धन्यवाद! हे पुस्तक आपण आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावरून विकत घेवू शकाल.

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय मोलाचे वाटते. यातील विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत आलेच पाहिजेत.
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्वान प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ आहे.
हेनरिख हायने नावाचा जर्मन कवी, विचारवंत म्हणतो, ‘‘आपल्यालाच सत्य गवसते आहे असा ज्यांना भ्रम होतो, असे लोक तेच सत्य सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेपणाचा मार्ग चोखाळू शकतात.’’
‘सत्तांतर’ हा ग्रंथ केवळ वाचकांची दिशाभूल करणारा नाही तर, तो एक फ्रॉड आहे, कारण केवळ पैसा मिळवणे एवढेच त्या लेखकांचे उद्दिष्ट नव्हते तर अभ्यासू विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्फत नव्या पिढीला संपूर्णत: चुकीची माहिती शिकवूण समाजाला भरकटायला लावणारे आहे. हे भरकटणे म्हणजे फार मोठा पुरोगामीपणा, आधुनिकता, वैचारिक दृष्टेपणा आहे अशी समजूत दृढ करायला लावण्याचा अत्यंत दूषित वैचारिक भ्रष्टतेचा कळस करणारा प्रकार आहे.
‘तपशील चुकीचा असेल तरी आमचा थिसिस खरा आहे’, असा युक्तीवाद करून या लेखकद्वयांनी विद्यापीठीय शिक्षणात असेच शिक्षण दिले जाते की काय अशी शंका निर्माण करण्याइतपत वैचारिक दारिद्र्य प्रगट केले आहे. ‘ग्रंथाली’ या प्रतिष्ठित संस्थेने असा विकृतीपूर्ण ग्रंथ भाबड्या, बेसावध, निरागस ग्रंथप्रेमी वाचकांच्या गळ्यात मारून धंदा केलाच, परंतु वर आपण फार मोठे सत्कर्म करीत आहोत अशी शेखी मिरविण्याचे औचित्य दाखविले आहे. ग्रंथालीने केलेला हा फ्रॉड आहे. त्यांनी कोंबडं कितीही झाकले तरी या म्हातारीची गोष्ट लोकांना सांगितलीच पाहिजे, या कळकळीने हे पुस्तक नव्हे ही चिरफाड ‘चपराक’ने मांडली आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन!
हे लेखक आणि प्रतिष्ठित प्रकाशक विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या मेंदूशी खेळ करीत असल्याने शिक्षणमंत्री, कुलगुरू यांनीसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीच पाहिजे.
इतिहासाची मांडणी अलिप्तपणे न करता आपल्याला जो दृष्टिकोन, जीवनध्येय किंवा जीवन तत्त्वज्ञान लोकाच्या गळी उतरवायचे आहे, त्या दृष्टिकोनातून खर्‍याचे खोटे करून किंवा काल्पनिक घटना घडवून त्याचा इतिहास लिहिला जात आहे. अलीकडे हा एक धंदा पुरोगामी चळवळीच्या नावावर सुरू आहे. प्रतिष्ठा व त्यातून मिळणारी समाजमान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबांचा, लोककल्याणाचा कळवळा घेणारी दांभिक सत्ताकेंद्रही त्याला पाठिंबा देण्यात मग्न झालेली आहेत. त्यामुळे असे प्रयत्न करणारे इतिहासकार, लेखक समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठित म्हणून मिरवले जात आहेत. ही तर भयानक गुन्हेगारी स्वरूपाची गोष्ट आहे आणि याचा केवळ निषेध नव्हे तर न्यायालयीन चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
विकृत स्वरूपाचे इतिहास लेखन आणि त्याचे दूरगामी परिणाम हे कमी अधिक प्रमाणात समाजालाच भोगावे लागतात. सामान्य चूक भीषण अपघात घडवू शकते म्हणून त्या चुकीचे परिणाम किती गंभीर होतील याचा विचार करणे महत्त्वाचे असते. शरद पवार कॉंग्रेस पक्षात नामोहरम झाले म्हणून महाराष्ट्रातील निरंकुश सत्ता गमवावी लागली तसेच महाराष्ट्रातील राजकारण हे जाती-जमाती यांच्या हितसंबंधातून पुढे सरकत असते हे त्यांचे सिद्धांत आहेत.
‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाचे दोन लेखक, प्रकाशक यांनी खरं तर या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल केलेला गुन्हा मान्य करून ताबडतोड जनतेची विशेषत: वाचकांची व विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. या पुस्तकाच्या प्रती नष्ट करायला पाहिजेत. तसेच विद्यापीठाच्या पातळीवर एखादी तज्ज्ञांची समिती नेमून याची गंभीर चौकशी केली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या कृत्यांना, फसवणूक करणार्‍यांना जरब बसेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून 1985 पर्यंत व पुढे 1995 पर्यंत महाराष्ट्रातील जनता सातत्याने कॉंग्रेस विरोधात राहूनही आणि तसे सावध संकेत सातत्याने मिळूनही कॉंग्रेस सत्तेत राहिली आणि विरोधी पक्ष सत्तेपर्यंत पोहचू शकले नाहीत याचे उत्तम पुरावे दिलेले आणि अखिल भारतीय राजकारणाचा संदर्भ देऊन केलेेले मुद्देसुद विवेचन श्री. तोरसेकरांनी पुस्तकात मांडून ऐतिहासिक सत्य अलिप्त पत्रकाराच्या भूमिकेतून या पुस्तकात मांडले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.
कॉंग्रेस पक्षाची चौकट यशवंतरावांनी कशी बांधली व नेतृत्व मराठा समाजाच्या हाती कसे राखले याची माहिती देऊन श्री. तोरसेकर लिहितात, ‘तीन दशकात कॉंग्रेस कधीही सदृढ वा सशक्त राजकीय संघटन म्हणून निवडणूक जिंकू शकला नाही. दुबळा विरोधी पक्ष आणि पांगळे विरोधी राजकारण हेच कॉंग्रेसचे बळ राहिले.’
‘धोरण, कार्यक्रम, योजना, विचार अथवा जातीय हितसंबंधांच्या कारणास्तव कॉंग्रेसकडे कुठलाही कार्यकर्ता आकर्षित होऊ शकला नव्हता. तर सत्तेकडे जाण्याचा सोपा मार्ग, स्वार्थ साधायची संधी म्हणून कार्यकर्ते व नेते कॉंग्रेसकडे येत राहिले. पक्ष व संघटना न राहता सत्तालंपट स्वार्थसाधू  हावरटांची टोळी बनत गेली.
त्यात समस्त मराठा-कुणबी जातीलाही स्थान नव्हते. तर घराणेशाही स्थापन झालेली होती. बारामतीचे पवार, सांगलीचे वसंतदादा, पुसदचे नाईक, नाशिकचे िंहरे, नांदेडचे चव्हाण, माळशिरसचे माहिते-पाटील, लातूरचे देशमुख... यांच्या पलीकडे कुण्या मराठ्याला या रचनेत, सत्तावर्तुळात स्थान नव्हते.’ हळूहळू साखर कारखानदारीच्या माध्यमातून अशी नवी घराणी तयार झालेली होती. पण पळशीकर-व्होरांच्या अभ्यासात या कशाचीही दखल घेतलेली नाही.
वस्तुस्थितीचे अत्यंत सुस्पष्ट विश्‍लेषण श्री. तोरसेकरांनी मांडलेले आहे. ते लिहितात, ‘समाजवादी, कम्युनिष्ट, शेकाप आदी डावे पक्ष पुस्तकी, निष्क्रिय तोंडाळ असे कागदावरले पक्ष उरले आहेत. लोकामध्ये पुरोगामी-प्रतिगामी या गुळगुळीत शब्दांना महत्त्व उरलेले नाही. फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही वस्तुस्थिती नव्हे तर बहुजनांना भुलविण्यासाठी वापरले जाणारे खोटी नावे बनली आहते. (पृष्ठ क्र. 33)
तोरसेकरांनी प्रकरणश: या लेखकद्वयांनी मांडलेले लेखन उद्ध्वस्त करून त्याचा खोटेपणा, चुकीची विधाने यांचा सोदाहरण परामर्श घेतला आहे.
शिवसेना कधी स्थापन झाली, कसकशी आपले वर्चस्व वाढवत गेली याचा थांगपत्ता नसावा किंवा शिवसेनाच ठाऊक नसावी असे म्हणणे भाग आहे. स्थापनेपासूनच शिवसेनेने मुंबईवर आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलेले आहे (पृष्ठ क्र. 55) हे तोरसेकरांनी ठणकावून सांगितले आहे.
समजूत आणि समज यावर आधारित मते नेहमीच फसवी कशी असतात याचे सोदाहरण विश्‍लेषण, ‘आत्याबाईला मिशा असत्या तर’ या प्रकरणात वाचायला मिळते. लेखकांची पाहणी, तर्कट, अनेक निष्कर्ष हे कसे फसवे आहेत हे वाचणे हा ज्ञानाबरोबरच करमणुकीचा विषय या लेखकांच्या लिखाणामुळे कसा बनला हे मुळातून वाचकांनी वाचलेच पाहिजे.
भाऊ तोरसेकरांनी ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ याची चिरफाड करून आपले काम थांबवले नाही तर नंतरच्या पानांमध्ये त्यांनी अतिशय सविस्तर महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्तांतराचं विश्‍लेषण करून केवळ शवविच्छेदन करून न थांबता वाचकांना मोलाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे झाकणार्‍या म्हातारीला उघडं केल्यानंतर कोंबडं नक्की काय आहे हे वाचकांना समजते.
शेवटच्या 8-10 पानात तोरसेकरांनी त्यांचा या संबंधितांशी झालेला पत्रव्यवहार दिलेला आहे आणि ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकातील चुकांची पान क्रमांकासहित यादी दिलेली आहे.
11 ऑगस्ट 1997 साली दिनकर गांगल यांनी तोरसेकरांना लिहलेल्या मोहक पत्रात ‘तुमच्या अनुभवाचे पुस्तक होते का ते पाहू या का?’ असे लिहिले आहे.
तसे ते पुस्तक झालेले दिसत नाही. असो तोरसेकरांच्या या पुस्तकाने एक महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे म्हणून त्याचे मूल्य फार आहे. विशेषत: राजकारणात ज्यांना रस आहे, जे विद्यार्थी आहेत, पत्रकार आहेत त्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे संदर्भ मुल्यही या पुस्तकास आहे.
कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पृष्ठ - 148, मूल्य - 150
-सुधाकर द. जोशी.
9860777440



Monday, September 21, 2015

संगमनेरच्या पत्रकारांचा आदर्श

पत्रकार संघाच्या उपहारगृहात काही पत्रकार गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात एका सद्गृहस्थाने त्यातील एका पत्रकाराला विचारले, ‘‘हजार रूपयांचे सुट्टे आहेत का हो?’’ पत्रकाराने ताबडतोब सांगितले, ‘‘माझ्याकडे पैसे तर नाहीत पण मला हा प्रश्‍न विचारून माझा गौरव केल्याबद्दल धन्यवाद!’’
यातील विनोदाचा भाग सोडला तरी पत्रकारांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच आहे. विशेषत: तालुका व गाव पातळीवर काम करणारे पत्रकार याला अपवाद नाहीत. अर्थार्जनाला कधीही महत्त्व न देता सतत कार्यरत राहणारे पत्रकार निष्ठेने सामाजिक बांधिलकी मात्र पार पाडतात. तुटपुंजे मानधन मिळत असूनही दुष्काळाविषयी संवेदनशीलता दाखवत संगमनेर येथील पत्रकारांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. पत्रकार राजाभाऊ वराट, नंदकुमार सुर्वे, श्याम तिवारी, वसंत बंदावणे, रियाज सय्यद, प्रकाश टाकळकर, प्रकाश आरोटे, शेखर पानसरे, विजय भिडे, निलिमा घाडगे, नितीन ओझा आदींनी पुढाकार घेऊन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला हातभार लावण्याचा विचार केला. त्यासाठी पत्रकारितेचा गैरवापर करत इतरांकडून पैसे उकळून ते मदत म्हणून देण्याऐवजी संगमनेरातील पत्रकारांनी प्रत्येकी हजार रूपये काढले. किमान अकरा हजार रूपये देण्याचा त्यांचा मानस होता.
महाराष्ट्रात अनेक पत्रकार दुष्काळाविषयी तळमळीने लिहित असतात. प्रशासकीय यंत्रणेकडे आणि राज्यकर्त्यांपुढे समस्या मांडत असतात; मात्र संगमनेर पत्रकार मंचचे सदस्य पुढे आले आणि महाराष्ट्रातील पत्रकारांपुढे त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला. पत्रकारितेसाठी ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने विचारमंथन करण्यासाठी ‘दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता’ या विषयावर संगमनेर पत्रकार मंचाने आमचे व्याख्यान ठेवले. ‘चपराक’च्या  सदस्यांसह आम्ही कार्यक्रमास गेलो. पत्रकारांच्या या स्तुत्य आणि विधायक उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिकात्मक स्वरूपात खारीचा वाटा म्हणून ‘चपराक’तर्फे पाच हजार रूपये त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि मदतीचा हा आकडा 36 हजारावर गेला. संगमनेरातील पत्रकारांच्या वतीने 21 हजार, पेटीटचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांच्याकडून पाच हजार, आधार फाउंडेशनकडून पाच हजार आणि ‘चपराक’चे पाच हजार असे एकूण छत्तीस हजार रूपये ‘नाम फाउंडेशन’साठी जमल्यानंतर अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत दुष्काळग्रस्तांसाठी हातभार लावण्याचा संकल्प केला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून संवेदनशीलता जपत उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आपला एखादा भाऊ अडचणीत असेल तर त्याला मदत करणे आपले कर्तव्यच ठरते. मराठवाडा, विदर्भ दुष्काळामुळे होरपळतोय. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, कर्जामुळे त्रस्त झालेला शेतकरी नैराश्यातून, वैफल्यातून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबतोय त्याला शक्य तितकी मदत करणे, त्याचे मनोबल उंचावणे हे आपले कर्तव्यच आहे. राजकीय यंत्रणा ढिम्म असली तरी सध्या थोडेफार आशादायी चित्रदेखील आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांचा आशावाद वाढलाय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सव्वाशे कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करतात आणि दुसरीकडे मराठवाड्यातील बांधवांकडे मात्र साफ दुर्लक्ष करतात, ही शोकांतिका आहे. अशावेळी फक्त वाचाळवीरतेचे दर्शन घडविण्याऐवजी, बोरूबहाद्दर कारकुनी करण्याऐवजी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’. त्यामुळे प्रत्येकाने दुष्काळग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत करायला हवी. तुम्ही तुमच्यावर ताण येईल असे काही करू नकात; मात्र शक्य तेवढी मदत नक्की करा. अनावश्यक खर्च टाळा. हजार, पाचशे, दोनशे, शंभर ज्याला जेवढे शक्य होईल त्याने तेवढी मदत अवश्य करावी. मदत कितीची असते यापेक्षा त्यामागच्या भावना या सर्वश्रेष्ठ आणि मानसिक समाधान देणार्‍या असतात.
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूने पाच लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे दिले आहेत. अक्षयकुमारसारख्या खिलाडूवृत्तीच्या कलाकाराने तब्बल नव्वद लाख रूपये दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केले आहेत. हिंदी माध्यमातील रजत शर्मा यांच्यासारखे पत्रकार ‘शेखावत फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी काहीतरी भरीव कार्य उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
यासगळ्यात अनेक सेलिब्रिटीज मागे पडतात. आजपर्यंत समाजाने ज्यांना भरभरून दिले आहे असे कलाकार पुढे यायला हवेत. ‘खाना’वळीने (आमीर, शाहरूख, सलमान, सैफ अली आदी) पुढाकार घेतला तर आणखी मोठी रक्कम उभी राहू शकेल. अजित पवार यांच्यासारख्या नेत्यावर सत्तर हजार करोड रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. छगन भुजबळ यांनी सत्तावीसशे करोड रूपये हडप केल्याची चर्चा आहे. ‘जेल भरो आंदोलन’ पुकारून लोकांची टाळकी भडकविणार्‍या थोरल्या साहेबांच्या संपत्तीचा अंदाज आम्हाला नाही. तो आकडा कदाचित आम्हाला लिहिता तर येणार नाहीच पण कॅलक्युलेटरवर मावेल याचीही शक्यता नाही. अशा बड्या आसामींनी गेंड्याची कातडी बाजूला सारून शेतकर्‍यांसाठी काहीतरी करायला हवे. निरर्थक आंदोलने आणि त्याची अमाप जाहिरातबाजी यात ही मंडळी जेवढा पैसा खर्च करतात तेवढ्यात किमान चार गावे दत्तक घेणे सहज शक्य आहे.
शेतकर्‍यांना रोख स्वरूपात केलेली मदत ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल असे अनेकजण सांगत आहेत. त्यात तथ्य असेलही! पण जखम भळभळत असताना ही मलमपट्टीही जीव वाचवण्यास पुरेशी ठरेल. शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यायला हवीत. वीज आणि पाणी याची त्यांना सोय करून द्यायला हवी. रोजगार हमीची कामे गरजूंना शेतीतच उपलब्ध करून द्यायला हवीत. ज्यांच्याकडे अवजारे आणि इतर साधने नाहीत त्यांना ती सहजी उपलब्ध करून द्यायला हवीत. बळीराजा वाचला तरच आपले अस्तित्व शिल्लक राहणार आहे.
ग्रामीण भागात रोजगार नसल्याने अनेक तरूण दिशाहीन होत आहेत. त्यांच्यापुढे कोणतेही ध्येय नसल्याने ते कट्टरतावादाकडे वळत  आहेत. राजकारणी लोक चुकीच्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घेत आहेत. यातूनच भविष्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आणखी हवे’चा हव्यास सोडून अशा गरजूंना प्रामाणिकपणे मदत करायला हवी. उद्याच्या उज्ज्वल राष्ट्रासाठी हे गरजेचे आहे. संगमनेरातील पत्रकारांनी हा सुज्ञपणा दाखवला आहे. आपणही त्यासाठी पुढाकार घ्या, जमेल तेवढा हातभार लावा. आपला खारीचा वाटा सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

- घनश्याम पाटील
चपराक, पुणे 
७०५७२९२०९२ 


Monday, September 14, 2015

घागर में सागर... एमरल्ड ग्रीन व इतर कथा

'चपराक प्रकाशन' पुणे/ ७०५७२९२०९२
‘चपराक प्रकाशन’ने समीर नेर्लेकर लिखित ‘एमरल्ड ग्रीन व इतर कथा’ हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.
कथालेखक हे कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा भूमिका निभावतात. त्यांच्या ह्या भूमिकांचा प्रभाव त्यांच्या विविध कथांमधून जाणवतो. अतिशय साधी-सोपी भाषा! पण उत्कंठा वाढविण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आहे. इंग्रजीमध्ये ‘शॉर्ट बट स्वीट’ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ‘छोट्या पण नेटक्या’ अशा शब्दात नेर्लेकरांच्या कथांबद्दल म्हणता येईल.

विविध विषयांवरच्या... विविध आशय असलेल्या... मनाचा वेध घेणार्‍या, मानवी स्वभावाचे विविध कंगोरे दाखवणार्‍या तर काही कथा समाजातल्या अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करणार्‍या आहेत. सामान्य मध्यमवर्गीय माणसाला कॉकटेल पार्टीचं आमंत्रण मिळालं तर त्याची वास्तवात आणि पार्टीत काय अवस्था होईल, याच मनोरंजनात्मक वर्णन आपल्याला ‘कॉकटेल पार्टी’त वाचायला मिळतं. कॉकटेल पार्टी त्यांनी डोळ्यासमोर उभी केली आहे. तसेच साहित्य प्रबोधन रंजन करत साहित्यिक नावारूपाला आल्यानंतर त्याचा मान-सन्मान केला जातो पण नवोदित साहित्यिकाच्या वाटेला उपेक्षा, अवहेलना येते. साहित्यिकांमध्ये कसे गट असतात यावर ‘रेड कार्पेट’मध्ये यथार्थ प्रकाश टाकला आहे. लेखक म्हणतात, ‘‘रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्‍यातून दिसत नाही... एव्हढंच!’’
‘म्हातारीच्या फणी’मधून एक शाश्‍वत सत्य मजेशीर पद्धतीने समजावून सांगितले आहे. एक विद्वान म्हातारीला म्हणतो, ‘‘तुझी फणी घरात हरवली आहे, तर ती घरातच शोध. त्यासाठी बाहेर डोकावण्याची गरज नाही.’’ तेव्हा म्हातारी म्हणते, ‘‘हेच तुला का समजत नाही, ज्या सत्याचा तू बाहेर शोध घेतो आहेस ते बाहेर सापडणारच नाही कारण ते तुझ्या आतच आहे.’’
भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता आणि अपेक्षाभंग याचं छान चित्रण ‘प्लॅचेंट’मध्ये आहे. ‘परपुरूष’ ही अगदी छोटी कथा... यामध्ये पूर्वाश्रमाचे प्रियकर-प्रेयसी अचानक रस्त्यात समोरासमोर येतात. तेव्हा प्रेयसी म्हणते, ‘‘परपुरूषाशी संबंध ठेवणं सभ्य स्त्रियांना शोभत नाही...’’ त्यावेळी पूर्वीचा प्रियकर म्हणतो, ‘‘तुझ्या दृष्टिने परपुरूष कोण? मी की तुझा नवरा?’’
‘कोड’ मुलींच्या लग्नाआड येतं. असं लग्न न ठरलेल्या, दरवेळी मोडणार्‍या मुलीची व्यथा आणि समाज मानचं वास्तव उघड करणारी कथा!
सामाजिक प्रवृत्ती ,समाजरिती याबरोबरच रहस्यकथाही लिहिल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन’ अशीच उत्कंठा वाढवणारी रहस्यकथा वाचायला मिळते.
स्वत:च्या फायद्यासाठी क्रौर्याचा कळस गाठणारे दुसर्‍यांचा कसा वापर करून घेतात हे सांगणारी ‘लंगडा घोडा’ ही अगदी थोड्या शब्दातील कथा अंतर्मु्ख करून जाते.
याचप्रमाणे ‘व्यवहार शून्य’, ‘सावली’ इत्यादी कथाही मानवी मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतात.
काही काही लोक इतके व्यवहारी असतात की त्यांना व्यवहारापुढे नाती, प्रेम काहीच दिसत नाही. परंतु काही माणसे जीवनात प्रामाणिकपणाच महत्त्वाचा मानतात. त्यांनाही समाज ‘व्यवहार शून्य’ ठरवतेही. बाब व्यवहार शून्य मध्ये अतिशय रंजकपणे सांगितली आहे.
मनोविज्ञानावरची ‘डोह’ कथा अंतर्मनाचा वेध घेते. ‘उपसांपादक पाहिजे’मध्ये पत्रकारितेची दुसरी बाजू दाखवली आहे. सध्याचा समाजजीवनाच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन घडवले आहे.
अशा विविध आशय, विषय असलेल्या कथा वाचकांना नक्कीच भावतील, मनात घर करून राहतील.
-सुवर्णा अ. जाधव
9819626647