Saturday, September 26, 2015

‘सत्तांतर’ उलगडणारा ग्रंथ

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या 'कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट' या सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित पुस्तकाचे परीक्षण आजच्या दैनिक 'संचार'ने 'इंद्रधनू' पुरवणीतून करून दिले आहे. संचार आणि श्री. प्रशांत जोशी यांना मन:पूर्वक धन्यवाद! हे पुस्तक आपण आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावरून विकत घेवू शकाल.

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय मोलाचे वाटते. यातील विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत आलेच पाहिजेत.
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्वान प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ आहे.
हेनरिख हायने नावाचा जर्मन कवी, विचारवंत म्हणतो, ‘‘आपल्यालाच सत्य गवसते आहे असा ज्यांना भ्रम होतो, असे लोक तेच सत्य सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेपणाचा मार्ग चोखाळू शकतात.’’
‘सत्तांतर’ हा ग्रंथ केवळ वाचकांची दिशाभूल करणारा नाही तर, तो एक फ्रॉड आहे, कारण केवळ पैसा मिळवणे एवढेच त्या लेखकांचे उद्दिष्ट नव्हते तर अभ्यासू विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्फत नव्या पिढीला संपूर्णत: चुकीची माहिती शिकवूण समाजाला भरकटायला लावणारे आहे. हे भरकटणे म्हणजे फार मोठा पुरोगामीपणा, आधुनिकता, वैचारिक दृष्टेपणा आहे अशी समजूत दृढ करायला लावण्याचा अत्यंत दूषित वैचारिक भ्रष्टतेचा कळस करणारा प्रकार आहे.
‘तपशील चुकीचा असेल तरी आमचा थिसिस खरा आहे’, असा युक्तीवाद करून या लेखकद्वयांनी विद्यापीठीय शिक्षणात असेच शिक्षण दिले जाते की काय अशी शंका निर्माण करण्याइतपत वैचारिक दारिद्र्य प्रगट केले आहे. ‘ग्रंथाली’ या प्रतिष्ठित संस्थेने असा विकृतीपूर्ण ग्रंथ भाबड्या, बेसावध, निरागस ग्रंथप्रेमी वाचकांच्या गळ्यात मारून धंदा केलाच, परंतु वर आपण फार मोठे सत्कर्म करीत आहोत अशी शेखी मिरविण्याचे औचित्य दाखविले आहे. ग्रंथालीने केलेला हा फ्रॉड आहे. त्यांनी कोंबडं कितीही झाकले तरी या म्हातारीची गोष्ट लोकांना सांगितलीच पाहिजे, या कळकळीने हे पुस्तक नव्हे ही चिरफाड ‘चपराक’ने मांडली आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन!
हे लेखक आणि प्रतिष्ठित प्रकाशक विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या मेंदूशी खेळ करीत असल्याने शिक्षणमंत्री, कुलगुरू यांनीसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीच पाहिजे.
इतिहासाची मांडणी अलिप्तपणे न करता आपल्याला जो दृष्टिकोन, जीवनध्येय किंवा जीवन तत्त्वज्ञान लोकाच्या गळी उतरवायचे आहे, त्या दृष्टिकोनातून खर्‍याचे खोटे करून किंवा काल्पनिक घटना घडवून त्याचा इतिहास लिहिला जात आहे. अलीकडे हा एक धंदा पुरोगामी चळवळीच्या नावावर सुरू आहे. प्रतिष्ठा व त्यातून मिळणारी समाजमान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबांचा, लोककल्याणाचा कळवळा घेणारी दांभिक सत्ताकेंद्रही त्याला पाठिंबा देण्यात मग्न झालेली आहेत. त्यामुळे असे प्रयत्न करणारे इतिहासकार, लेखक समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठित म्हणून मिरवले जात आहेत. ही तर भयानक गुन्हेगारी स्वरूपाची गोष्ट आहे आणि याचा केवळ निषेध नव्हे तर न्यायालयीन चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
विकृत स्वरूपाचे इतिहास लेखन आणि त्याचे दूरगामी परिणाम हे कमी अधिक प्रमाणात समाजालाच भोगावे लागतात. सामान्य चूक भीषण अपघात घडवू शकते म्हणून त्या चुकीचे परिणाम किती गंभीर होतील याचा विचार करणे महत्त्वाचे असते. शरद पवार कॉंग्रेस पक्षात नामोहरम झाले म्हणून महाराष्ट्रातील निरंकुश सत्ता गमवावी लागली तसेच महाराष्ट्रातील राजकारण हे जाती-जमाती यांच्या हितसंबंधातून पुढे सरकत असते हे त्यांचे सिद्धांत आहेत.
‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाचे दोन लेखक, प्रकाशक यांनी खरं तर या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल केलेला गुन्हा मान्य करून ताबडतोड जनतेची विशेषत: वाचकांची व विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. या पुस्तकाच्या प्रती नष्ट करायला पाहिजेत. तसेच विद्यापीठाच्या पातळीवर एखादी तज्ज्ञांची समिती नेमून याची गंभीर चौकशी केली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या कृत्यांना, फसवणूक करणार्‍यांना जरब बसेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून 1985 पर्यंत व पुढे 1995 पर्यंत महाराष्ट्रातील जनता सातत्याने कॉंग्रेस विरोधात राहूनही आणि तसे सावध संकेत सातत्याने मिळूनही कॉंग्रेस सत्तेत राहिली आणि विरोधी पक्ष सत्तेपर्यंत पोहचू शकले नाहीत याचे उत्तम पुरावे दिलेले आणि अखिल भारतीय राजकारणाचा संदर्भ देऊन केलेेले मुद्देसुद विवेचन श्री. तोरसेकरांनी पुस्तकात मांडून ऐतिहासिक सत्य अलिप्त पत्रकाराच्या भूमिकेतून या पुस्तकात मांडले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.
कॉंग्रेस पक्षाची चौकट यशवंतरावांनी कशी बांधली व नेतृत्व मराठा समाजाच्या हाती कसे राखले याची माहिती देऊन श्री. तोरसेकर लिहितात, ‘तीन दशकात कॉंग्रेस कधीही सदृढ वा सशक्त राजकीय संघटन म्हणून निवडणूक जिंकू शकला नाही. दुबळा विरोधी पक्ष आणि पांगळे विरोधी राजकारण हेच कॉंग्रेसचे बळ राहिले.’
‘धोरण, कार्यक्रम, योजना, विचार अथवा जातीय हितसंबंधांच्या कारणास्तव कॉंग्रेसकडे कुठलाही कार्यकर्ता आकर्षित होऊ शकला नव्हता. तर सत्तेकडे जाण्याचा सोपा मार्ग, स्वार्थ साधायची संधी म्हणून कार्यकर्ते व नेते कॉंग्रेसकडे येत राहिले. पक्ष व संघटना न राहता सत्तालंपट स्वार्थसाधू  हावरटांची टोळी बनत गेली.
त्यात समस्त मराठा-कुणबी जातीलाही स्थान नव्हते. तर घराणेशाही स्थापन झालेली होती. बारामतीचे पवार, सांगलीचे वसंतदादा, पुसदचे नाईक, नाशिकचे िंहरे, नांदेडचे चव्हाण, माळशिरसचे माहिते-पाटील, लातूरचे देशमुख... यांच्या पलीकडे कुण्या मराठ्याला या रचनेत, सत्तावर्तुळात स्थान नव्हते.’ हळूहळू साखर कारखानदारीच्या माध्यमातून अशी नवी घराणी तयार झालेली होती. पण पळशीकर-व्होरांच्या अभ्यासात या कशाचीही दखल घेतलेली नाही.
वस्तुस्थितीचे अत्यंत सुस्पष्ट विश्‍लेषण श्री. तोरसेकरांनी मांडलेले आहे. ते लिहितात, ‘समाजवादी, कम्युनिष्ट, शेकाप आदी डावे पक्ष पुस्तकी, निष्क्रिय तोंडाळ असे कागदावरले पक्ष उरले आहेत. लोकामध्ये पुरोगामी-प्रतिगामी या गुळगुळीत शब्दांना महत्त्व उरलेले नाही. फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही वस्तुस्थिती नव्हे तर बहुजनांना भुलविण्यासाठी वापरले जाणारे खोटी नावे बनली आहते. (पृष्ठ क्र. 33)
तोरसेकरांनी प्रकरणश: या लेखकद्वयांनी मांडलेले लेखन उद्ध्वस्त करून त्याचा खोटेपणा, चुकीची विधाने यांचा सोदाहरण परामर्श घेतला आहे.
शिवसेना कधी स्थापन झाली, कसकशी आपले वर्चस्व वाढवत गेली याचा थांगपत्ता नसावा किंवा शिवसेनाच ठाऊक नसावी असे म्हणणे भाग आहे. स्थापनेपासूनच शिवसेनेने मुंबईवर आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलेले आहे (पृष्ठ क्र. 55) हे तोरसेकरांनी ठणकावून सांगितले आहे.
समजूत आणि समज यावर आधारित मते नेहमीच फसवी कशी असतात याचे सोदाहरण विश्‍लेषण, ‘आत्याबाईला मिशा असत्या तर’ या प्रकरणात वाचायला मिळते. लेखकांची पाहणी, तर्कट, अनेक निष्कर्ष हे कसे फसवे आहेत हे वाचणे हा ज्ञानाबरोबरच करमणुकीचा विषय या लेखकांच्या लिखाणामुळे कसा बनला हे मुळातून वाचकांनी वाचलेच पाहिजे.
भाऊ तोरसेकरांनी ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ याची चिरफाड करून आपले काम थांबवले नाही तर नंतरच्या पानांमध्ये त्यांनी अतिशय सविस्तर महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्तांतराचं विश्‍लेषण करून केवळ शवविच्छेदन करून न थांबता वाचकांना मोलाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे झाकणार्‍या म्हातारीला उघडं केल्यानंतर कोंबडं नक्की काय आहे हे वाचकांना समजते.
शेवटच्या 8-10 पानात तोरसेकरांनी त्यांचा या संबंधितांशी झालेला पत्रव्यवहार दिलेला आहे आणि ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकातील चुकांची पान क्रमांकासहित यादी दिलेली आहे.
11 ऑगस्ट 1997 साली दिनकर गांगल यांनी तोरसेकरांना लिहलेल्या मोहक पत्रात ‘तुमच्या अनुभवाचे पुस्तक होते का ते पाहू या का?’ असे लिहिले आहे.
तसे ते पुस्तक झालेले दिसत नाही. असो तोरसेकरांच्या या पुस्तकाने एक महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे म्हणून त्याचे मूल्य फार आहे. विशेषत: राजकारणात ज्यांना रस आहे, जे विद्यार्थी आहेत, पत्रकार आहेत त्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे संदर्भ मुल्यही या पुस्तकास आहे.
कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पृष्ठ - 148, मूल्य - 150
-सुधाकर द. जोशी.
9860777440



No comments:

Post a Comment