Friday, March 24, 2023

राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे


असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खातरी केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्‍या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्‍या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. 
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्‍याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे कार्य आजच्या तरुणाईपर्यंत पोहचायला हवे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
पूर्वप्रसिद्धी : दैनिक पुण्य नगरी, शनिवार, दि. 25 मार्च 23

Saturday, March 18, 2023

सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत. 
अफाट सामर्थ्य असलेल्या या कविराजांच्या आयुष्यात अनेक विलक्षण घटना घडल्या. व्यावहारिक पातळीवर कदाचित ते मागे राहिले असतील; पण कवी केशवसूत ते मर्ढेेकर या परंपरेचा मागोवा घेताना सर्वाधिक झगमगणारं उंचच उंच शिखर म्हणजे मनमोहन हे कोणीही नाकारू शकणार नाही.
मनमोहनांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले आणि त्यांचे अनोखे कारनामे जवळून न्याहाळणारे ‘तरणे बॉण्ड कवी’ रमेश गोविंद वैद्य आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विख्यात साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्याकडून मनमोहनांचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या.
कुणी शाईने लिहिली कविता
कुणी रक्ताने लिहिली कविता
करी लव्हाळी लवचिक घेऊन
मी पाण्यावर लिहिली कविता
असे सांगणारे मनमोहन स्वच्छंदी वृत्तीचे होते.
रॉय किणीकर नावाच्या एका बलाढ्य संपादकाने मनमोहनांची पहिली कविता प्रकाशित केली आणि पुढे किणीकर-मनमोहन ही जोडी अजरामर झाली. घरात दारिद्य्राचा सागर वहात असल्याने मनमोहन त्यांच्या मित्रांना ‘मला दहा रूपये उसने देण्याएवढे तुम्ही श्रीमंत आहात काय?’ असा प्रश्न रूबाबात विचारत. त्यांच्या मागणीचा ढंग आणि स्वभावातली सच्चाई बघून त्यांना नकार देण्याची हिंमत कोणालाही होत नसे. अशा परिस्थितीत दिवस काढतानाही त्यांनी लक्ष्मीची उपासना कधी केलीच नाही.
याबाबतीतली डॉ. न. म. जोशी यांनी सांगितलेली एक आठवण फारच बोलकी आहे. लोककवी मनमोहन यांचा तो शेवटचा काळ होता. वृद्धापकाळाने त्यांना घेरले होते. अंथरूणावरून उठून बसणेही त्यांना अशक्य झाले होते. ही वार्ता तेव्हाचे तरूण नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत गेली. शिंदे त्यांच्या लवाजम्यासह तातडीने मनमोहनांच्या सदाशिव पेठेतील निवासस्थानी दाखल झाले. ते म्हणाले, ‘‘कविराज, माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता रेडिओवरून ऐकायचो. गावागावातील यात्रा आणि जत्रात जाऊन लोकांना त्या गाऊन दाखवायचो. लोक मला पाच पैसे, दहा पैसे द्यायचे. त्यातूनच मी शिक्षण पूर्ण केले आणि प्रगती साधली. आज मला कशाचीच कमतरता नाही. मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी काय करू, ते निसंकोचपणे सांगा.’’   
आजारपणामुळे मनमोहनांना बोलता येत नव्हते. त्यांनी खुणेनेच कागद आणि पेन मागवून घेतला आणि त्यावर चार ओळी लिहिल्या. त्यांचा हात थरथरत होता. त्यामुळे अक्षर व्यवस्थित लागत नव्हते. त्यांच्याच शेजारी राहणारे न. म. त्यांचे अक्षर वाचू शकतात म्हणून त्यांना बोलावले. डॉ. न. म. जोशी यांनी त्या कागदावर वाचलेला मजकूर असा होता-
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
आयुष्याच्या संध्याकाळीही कसलीच आसक्ती नसलेला हा राजा माणूस होता, हे या उदाहरणावरून लक्षात येते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणारे मनमोहन जगरहाटीची पर्वा कधीच करत नसत. निःस्पृह वृत्तीचे मनमोहन एकदा त्यांच्या घरासमोर उघडे उभे होते. त्याचवेळी एक नेता त्यांच्या घरासमोरून कार्यकर्त्यांसह जात होता. मनमोहनांची अकारण खोड काढत त्याने त्यांच्या कपड्यावरून मल्लिनाथी केली. कपडे घातल्यावर माणूस कसा रूबाबदार दिसतो यावर प्रवचन दिले. त्याला थांबवत मनमोहन म्हणाले, ‘‘हे बघ मित्रा, तू पुढारी असल्यामुळे तुला कपड्यांची झूल अंगावर वागवावीच लागेल. मी कवी असल्यामुळे आंतर्बाह्य उघडाच असतो.’’ त्या पुढार्‍याला त्यांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. 
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू बाबरपेक्षा
गालिब हृदये वेधित राही
आपल्या पत्नीच्या निधनानंतर वेड्यापिशा झालेल्या मनमोहनांनी  ‘वृंदावनातली तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा’ हे अजरामर शोकगीत लिहिले. मनमोहन इतके भावूक आणि हळवे होते की, त्यांच्या घरासमोर असलेला सुंदर गुलमोहोर कोसळला तर त्याची त्यांनी शोकसभा घेतली. या सभेला रणजित देसाई, बापू वाटवे यांच्यासारखे दिग्गज हजर होते. 
मनमोहनांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. संपूर्ण शिवकाल काव्यात्मक भाषेत उभा केला.
या कलंदर कवीने कविबद्दलच लिहिलेल्या चार ओळी त्यांची ओळख पटवून देण्यास पुरेशा ठरतात.
शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतचि होता;
फुले तयावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता.
अशा या सतत जळणार्‍या आणि फुलणार्‍या महाकवीस आमची मानवंदना!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
प्रसिद्दी - दैनिक पुण्य नगरी, रविवार, दि. 19 मार्च 23

Friday, February 24, 2023

मातृभाषा ज्ञानभाषा व्हावी

मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्‍या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते. 
याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी इश्वरावर प्रीत जडली’. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत पडतं!’ हा दोन संस्कृतीतला फरक आहे. इंग्रजीकडं मराठीच्या तुलनेत शब्दसंग्रह खूप कमी आहे. काका-काकी हे शब्द आपण चुलता-चुलतीसाठी वापरतो. मामा-मामी हे शब्द आईच्या भावासाठी आणि त्याच्या बायकोसाठी वापरतो. इंग्रजीत अशा नातेसंबंधांना एकच शब्द वापरतात. इंग्रजीकडं शब्दसंग्रह कमी असल्यानं असं घडतं. 
मराठीचा भाषिक इतिहास खूप जुना आहे. अँग्लो सॅक्शन टोळ्या ज्यावेळी इंग्लंडमध्ये लढत होत्या त्यावेळी मराठीत म्हाइंभट सरोळेकर लीलाळचरित्राचं तत्त्वज्ञान सांगत होते, ज्ञानेश्वर गीतेवर निरूपण करत होते. मराठी ही शूर आणि पराक्रमी लोकांची भाषा आहे. कोणत्याही भाषेत किती कर्तबगार माणसे झाली यावरून त्या भाषेचं महत्त्व ठरतं. मराठी भाषेनं जगाला सर्व क्षेत्रातील दिग्गज दिलेत. विसाव्या आणि एकविसाव्या शतकाचा जरी त्यासाठी विचार केला तरी क्रिकेटचे महानायक मराठी आहेत, गायनातील सम्राज्ञी मराठीतील आहेत, चित्रपटसृष्टीचे जनक आणि महानायक मराठीतील आहेत. मग प्रश्न पडतो की, ज्या भाषेतील सुपूत्र जगभर लौकिक प्राप्त करत आहेत ती भाषा का मोठी होत नाही? आपल्या भाषेचं सामर्थ्य का वाढत नाही? ती उपेक्षित का राहते? याचा विचार होणं गरजेचं आहे. 
दोन मराठी माणसं बाहेर कुठंही भेटली की हिंदी किंवा इंग्रजीत संभाषण सुरू करतात. हा न्यूनगंड विसाव्या आणि एकविसाव्या शतकात निर्माण झालाय. सोळाव्या किंवा सतराव्या शतकात मराठी माणसात असा न्यूनगंड नव्हता. तसं नसतं तर ज्या ज्या अमराठी भागात आपली मराठी माणसं आहेत ते तिथं तिथं आपापल्या घरी मराठीत बोलत राहिले नसते. तिथं मराठी शब्दांची पखरण झाल्याचं आपल्याला दिसलं नसतं. त्यामुळे मराठी माणसानं भाषेविषयीचा आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे.
कोणाच्या कसल्याही प्रयत्नाशिवाय, कोणत्याही चळवळीशिवाय, कोणत्याही मोठ्या आर्थिक मदतीशिवाय किंवा कसल्या अनुदानाशिवाय मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या जगभर आहे. महाराष्ट्रातील बारा कोटी, भारताच्या अन्य प्रांतातील चार कोटी आणि जगभरातील विखुरलेली मराठी माणसं त्यांचं मराठीपण टिकवून आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषेत मराठी दहाव्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ ही सामर्थ्यशाली भाषा आहे. ही भाषा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची संभाषणासाठी वापरली, या भाषेतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे व्यक्त झाले, ही भाषा अभिव्यक्त करण्यासाठी सगळ्यात चांगली आणि सगळ्यात मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. त्यामुळे ही भाषा सामर्थ्यशाली आहे, हे सांगण्यासाठी कुणाचे प्रमाणपत्र कशाला हवे?
आपली भाषा इतकी सामर्थ्यशाली असताना या भाषेतून सर्व शाखांचे शिक्षण का दिले जाऊ नये? आत्ता आत्ता अभियांत्रिकीपासून ते विधीशाखेपर्यंतचे शिक्षण मराठीत उपलब्ध झाले असले तरी त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. हे असं नेमकं का होतं? आपण इंग्रजीतून मराठी करताना किंवा मराठीचं इंग्रजीकरण करताना कोणते शब्द वापरतो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ‘अकॉर्डिंग टू सेक्शन थ्री हंड्रेड अ‍ॅन्ड टू मर्डर इज क्राईम’ हे अनेकांना समजतं. ‘भारतीय दंडसंहितेच्या धारा 302 अन्वये मृत्यूदंड हा दखलपात्र गुन्हा आहे’ हे समजायला अवघड जातं. त्यामुळे ‘भाषेतली क्लिष्टता काढून टाका’, असं आचार्य अत्रे सांगायचे. मराठी भाषेतील अनावश्यक अरबी, फारसी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजीमहाराजांनी भाषाशुद्धा केलीय. त्यांनी सामान्य माणसाला कळावं यासाठी व्यवहारकोश तयार केला. त्यामुळं भाषेतला किचकटपणा जाऊ द्यात पण आपल्याकडे रूळलेले इंग्रजी शब्द काढायचे, हिंदी शब्द काढायचे हे काय चाललंय? ऑक्सफर्ड स्वतःचा शब्दकोश काढते. त्यात इतर भाषेतील दीडशे ते दोनशे शब्द दरवर्षी इंग्रजीत वाढतात. आपणही इतर भाषेतले आपल्याकडे रूजलेले शब्द आपल्यात समाविष्ट करून घेण्याऐवजी ते काढून टाका म्हणून ओरड करतो. असे शब्द काढून टाकणं हा भाषा समर्थ, सामर्थ्यशील करण्याचा उपाय नाही. उर्दू शायरी लिहिणारे शायर अन्य भाषेतील अनेक शब्द बिनदिक्कत वापरतात. ‘ये श्याम हो गई, सूरज ढल गया पश्चिम की तरफ। हम भी ढल गये गिलास में’ असं लिहिताना ‘ग्लास’ हा इंग्रजी शब्द ‘आहे तसा’ उचलल्याने त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे मराठीत आलेले व्हाटसअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल, जिमेल, नेटफ्लिक्ससारखे तंत्रज्ञानाविषयीचे किंवा अन्य रूजलेले, रूळलेले शब्द आपण स्वीकारायला हवेत. त्यावरून भाषाशुद्धीच्या नावावर आकांडतांडव करणार्‍यांमुळे आणखी भीती वाढते. 
जुन्या-नव्या शब्दांचे संशोधन करणारे प्रामाणिक लोक आपल्याकडे कमी झालेत. मराठीत पहिल्यांदा ‘गाढव’ ही शिवी कधी दिली गेली यावर ज्ञानतपस्वी रा. चिं. ढेरेअण्णांनी लिहिलं. चौदाव्या शतकात सर्वप्रथम माणसाला गाढव म्हणून शिवी दिली गेल्याची मांडणी त्यांनी केली. इंग्रजीतील शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधणारे महाभाग मराठीत नव्या शिव्या तयार होत नाहीत याकडे लक्ष देत नाहीत. राग व्यक्त करण्यासाठीचं शिवी हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळं शिव्यांचे अर्थ कळायला हवेत. त्याचा आविर्भाव लक्षात घ्यायला हवा. आजकालच्या पोरांना मराठीत धड शिव्याही देता येत नसतील तर भाषासौंदर्याची, भाषाशुद्धतेची मांडणी करणार्‍यांचे हे अपयश आहे.
रिचर्ड बर्टन नावाचा एक ब्रिटिश संधोधक होता. त्याला उत्तम मराठी येत होतं. तो काही काळ मुंबईत रहायला होता. त्यानं सांगितलं होतं, एखादी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतल्या शिव्या आधी शिका. ‘माणसाला जे योग्य वाटतं ते मनसोक्त करणं म्हणजे पुरूषार्थ’ असं सांगणारा रिचर्ड बर्टनसारखा माणूस सोळा-सतरा भाषा बोलत होता. आचार्य विनोबा भावे मराठीसह अनेक भाषा बोलायचे. पी. व्ही. नरसिंहरावांना अनेक भाषा ज्ञात होत्या. ही मंडळी बहुभाषिक होती. त्यामुळं मराठी भाषेचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर शिक्षणाची ज्ञानभाषा ही मातृभाषा असायला हवी, याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवावं. ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय त्यांच्यासाठी विविध नोकर्‍यात वीस टक्के जागा राखीव ठेवायला हव्यात. 
भाषेबाबत मानसिकता बदलणं आणि भाषेवर प्रेम करणं आत्यंतिक गरजेचं आहे. जाता जाता इतकंच सांगतो की, दिपीका पादुकोन कितीही सुंदर असली तरी ती आपल्या आईपेक्षा सुंदर असू शकणार नाही. त्यामुळे हिंदी, इंग्रजी, उर्दू, जर्मन, फ्रेंच अशा कोणत्याही भाषा आपल्याला भुरळ घालत असल्या तरी ज्ञान मिळवण्याच्या द़ृष्टिने त्या आत्मसात कराव्यात पण आपली आई मराठी आहे, याचं भान कायम ठेवावं. हे भान ठेवलं की मातृभाषेचा ज्ञानभाषेकडील प्रवास खर्‍याअर्थाने सुरू होईल.
-घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - दैनिक 'देशदूत', नाशिक
शनिवार, दि. 25 फेब्रुवारी 23

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. पटवर्धनबुवा

ही गोष्ट आहे इ. स. 1900 सालातली. हा काळ ऐन वंगभंग चळवळीचा! लाल, बाल, पाल या त्रिमुर्तींनी बंगालच्या फाळणीविरूद्ध रान उठवले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शिरोळ येथील दत्तात्रेय पटवर्धन हे कोलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये (होमियो) डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करत होते. तिथे असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महर्षि दादाभाई नवरोजी यांची भाषणे त्यांच्या कानावर पडत. लोकमान्य टिळकांच्या झंजावाती लेखनाचा मनावर मोठा परिणाम होत होता. ‘देशाचा संसार आहे माझ्या शिरी । ऐसे थोडे तरी वाटू द्या हो’ ही सेनापती बापटांची हाक त्यांना राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी खुणावत होती.
दरम्यान, कोल्हापूर संस्थानच्या रोषाला बळी पडल्याने प्रा. अण्णासाहेब विजापूरकरांना कोल्हापूर सोडावे लागल्याने त्यांचे समर्थ विद्यालय सरकारने बंद पाडले. अत्यंत परिश्रमपूर्वक ते नव्याने तळेगावला सुरू झाले. तिथे डॉक्टर म्हणून दत्तोपंत पटवर्धन यांची निवड झाली. हे विद्यालय पुन्हा इंग्रजांच्या रोषाला बळी पडले आणि 1910 साली डॉ. गोपाळराव पळसुले या आपल्या सहकार्‍यासह दत्तोपंतांनी पुण्यात आपला दवाखाना सुरू केला. तेथे प्रसिद्ध वारकरी विष्णुबुवा जोग राहत. त्यांची निरूपणे ऐकत ऐकत दत्तोपंत अभंग म्हणायला लागले. स्वतः कीर्तने, निरूपणे करू लागले. स्वच्छ वाणी, उत्तम गोड आवाज, प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक, पांगारकर, अण्णासाहेब पटवर्धन असे मान्यवर येऊ लागले.
1914 साली लोकमान्य टिळकांनी सांगितले, ‘‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर निःसंशय कीर्तनकार झालो असतो. वर्तमानपत्रे साक्षर लोकांसाठी असतात पण कीर्तनातील अभंग, गाणी, कथा लोकांच्या मनाला स्पर्श करतात. दत्तोपंतांनी आजवर लोकांच्या आरोग्याची सेवा केली. आता त्यांची मने तंदुरूस्त व्हावीत, त्यांच्यात राष्ट्रभक्तिचे स्फूल्लिंग चेतावे यासाठी कीर्तनाचे माध्यम जीवनध्येय म्हणून स्वीकारायला हवे.’’ 
या प्रोत्साहनानंतर पंतांनी दवाखान्याला रामराम ठोकला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जुलमी ब्रिटिश राज्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य शोधले. राष्ट्रीय आणि ऐतिहासिक नायकांबद्दल उत्तररंग सादर करत ‘राष्ट्रीय कीर्तना’ची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांत, रस्त्यावर धुमधडाक्यात कीर्तने करत त्यांनी ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ म्हणून लौकिक मिळवला. सुखासीन चालू असलेला वैद्यकीय व्यवसाय बंद करून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभ्या महाराष्ट्राला खडबडून जागे केले. स्नेह्यासोबत्यांनी, गणगोतांनी त्यांना नावे ठेवली पण कशालाही न जुमानता त्यांनी या माध्यमातून स्वतःला राष्ट्रीय कार्यात वाहून घेतले. त्यांच्या कीर्तनाला कमीत कमी आठ-दहा हजार श्रोते असत. त्यावेळी गावात नाटक असेल तर बुवांच्या कीर्तनाने ते ओस पडे. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य आणि बहिष्कार ही त्यांच्या कीर्तनाची चुतःश्रुती असे. 1960 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. टिळकांनी त्यांना सांगितले होते की, ‘‘हे राष्ट्रप्रबोधनाचे माध्यम आहे. त्यामुळे कीर्तन करण्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत.’’ बुवांनी हे वचन कायम पाळले. त्यांनी टिळकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. हाताने दळलेले, हाताने सडलेले धान्य, गाईचे दूध, ताक आणि तूप याशिवाय त्यांनी काही सेवन केले नाही. हे न मिळाल्यास त्यांनी उपवास पत्करले पण व्रतभंग केला नाही. त्यांनी शेवटपर्यंत हातमागावर विणलेली खादी वापरली. ‘नमस्कारप्रियो भानुः’ या शास्त्रवचनावर विश्वास ठेवून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी संकल्प केला की, आयुष्यात एक कोटी सूर्यनमस्कार घालायचे! हा ‘नमस्कारयज्ञ’ त्यांच्या मृत्युदिवसापर्यंत सुरू होता. आयुष्यभर त्यांनी 97 लाख सूर्यनमस्कार घातले. त्यांच्या निधनानंतर बेळगाव येथील ‘नमस्कार मंडळा’ने उर्वरित तीन लाख सूर्यनमस्कार घालून त्यांना आदरांजली अर्पण केली. 
‘शीलवंत लोकच संस्कृतीचे रक्षण करू शकतात,’ असा त्यांचा सिद्धांत होता. भारतीयांची दिनचर्या कशी असावी, पूर्वी आयुरारोग्य व सुखसंपत्ती याचा लाभ घेणारे आर्य कसे वागत असत? यासंदर्भातले आचार्यधर्म लोकांनी तंतोतंत पाळावेत यासाठी त्यांनी ‘आर्यांची दिनचर्या’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री परत बिछान्यात पडेपर्यंत आहार, विहार, विधि, नित्यनेम कसे असावेत? माणसाने प्रतिदिनी कसे वागावे? याबाबत प्राचीन ऋषिमुनींनी कोणते नियम घालून दिले आहेत? मनुष्य आरोग्यसंपन्न व सुखी कसा होईल? याबाबत या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन आहे. बुवांचे सहकारी पुंडलिकजी कातगडे यांनी त्यांचे ‘राष्ट्रीय कीर्तनकार कै. डॉ. पटवर्धनबुवा विचारधारा आणि शिकवण’ हे चरित्रही लिहिले आहे. त्यांचे हे दुर्मीळ चरित्र आणि ‘आर्यांची दिनचर्या’ हे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक पुन्हा वाचकांच्या भेटीस आणावे यासाठी व्यापक, उदात्त हेतूने कळमनुरी येथील श्री. दिलीपराव कस्तुरे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या अथक आणि निःस्वार्थ भावाने ही पुस्तके नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहेत. 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कराड येथे त्यांची भेट झाली. त्यावेळी ते बुवांना म्हणाले, ‘‘येथे कृष्णामाईचे घाटावर पूर्वी तुमची होणारी कीर्तने मी लहानपणापासून ऐकली आहेत. आता या वयातही तुमचे तसेच खडतर कार्य चालू आहे याचे नवल वाटते. तुम्हास काही आर्थिक मदतीची अपेक्षा असेल तर विचार करू!’’
यावर बुवा काहीच बोलले नाहीत. काही दिवसांनी एक सरकारी कर्मचारी आर्थिक मदतीसाठीचा अर्ज घेऊन त्यांच्याकडे आला. तो वाचून बुवा म्हणाले, ‘‘पोटाकरिता अशा रीतिने अर्ज करण्याची कल्पना मला अगदी असह्य होते. हा पटवर्धनबुवा अशी अर्ज करण्याची लाचारी करणार नाही हे वर कळवा आणि अर्ज परत न्या...’’
बुवांचा हा बाणा आज पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावणार्‍या कीर्तनकारांनी लक्षात घ्यायला हवा. 
एका रामनवमीनिमित्त पुण्यात कीर्तनास आले असताना ते नेहमीप्रमाणे टिळकांच्या भेटीस गेले. लोकमान्यांनी त्यांना विचारलं, ‘‘रामाच्या आख्यानात तुम्ही लोकांना काय सांगता?’’
बुवा म्हणाले, ‘‘भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवताराचे महात्म्य वर्णून, त्यांचे देवकोटीतील श्रेष्ठत्व मी सांगत असतो.’’
त्यावर टिळक म्हणाले, ‘‘बुवा, तुम्ही अगदी चुकता आहात. असे खोटे तत्त्वज्ञान सांगू नका. राम हा प्रथम देव नव्हता. साधासुधा देहधारी मनुष्य होता. केवळ परिश्रमाने, त्यागाने, विहित कर्तव्यबुद्धिने म्हणजे कर्म साधून, प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने तो शेवटी मनुष्याचा म्हणजे नराचा नारायण कसा झाला ते सांगत जा! नाही तर लोक काय, तो देव म्हणून दहा वेळा त्याच्या फक्त पाया पडतील व बोध न घेता आणि काही त्याग व कर्म न करता केवळ दैवावर हवाला ठेवून पंगू व निष्क्रिय होतील.’’
तेव्हापासून लोकमान्यांचे हे वळण बुवांनी यथाशक्ती गिरवले. 
ज्यांनी देशाला विचारांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तिचे बाळकडू पाजले त्यात दत्तोपंत पटवर्धनबुवांचे योगदान मोठे आहे. आजच्या वारकरी संप्रदायासह सामान्य माणसानेही म्हणूनच त्यांच्या विचारांचे, त्यागाचे स्मरण ठेवायला हवे.
- घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - दैनिक 'पुण्य नगरी', 
शनिवार दि. 25 फेब्रुवारी 23

Friday, February 10, 2023

कुणास कळले...कुणास न कळले

जगातले उत्तुंग मनोरे शोधायचे झाले तर त्यात महाराष्ट्राची माती सर्वाधिक सुपिक आहे. इथं अशा काही महान हस्ती होऊन गेल्यात की त्यांची सर कोणत्याही मनोर्‍याला येणार नाही. लोककवी मनमोहन आणि रॉय किणीकर ही जोडीही आपल्या प्रतिभेच्या तेजाने झळाळत होती. सहसा एक कवी दुसर्‍या कवीला मोकळेपणाने दाद देत नाही असे म्हणतात; मात्र मनमोहनासारख्या सिद्धहस्त लेखकानं लिहून ठेवलंय, 
‘‘कधीकाळी दगड स्वस्त होतील 
आणि शिल्पकारही पुष्कळ होतील 
त्यावेळी, पुतळा माझा घडवणार्‍यांनो, 
रॉय किणीकर आधी खोदा, 
असेच मी ‘त्या’ जगातून ओरडून सांगेन...’’ 
मनमोहनांसारख्या कवीला किणीकरांचं खोदकाम करावंसं वाटतंय. कोण होते हे किणीकर? रमेश गोविंदांच्या भाषेत सांगायचं तर - 
तरंगणारा धोतर कुर्ता, शुभ्र धुक्याचा
इथे तिथे फिरताना हृदयी, भाव तुक्याचा
कुणास कळले... कुणास न कळले, फिकीर नाही
दरवळणारा धूप ठेवूनी, फकीर जाई...
शब्द, रंग, स्वर अशा कोणत्याही प्रतिभेचा स्फोट झाला की तिथं किणीकर आनंदानं बागडायला लागत. ‘धरती’, ‘दीपावली’, ‘आरती’ अशा दिवाळी अंकांचे सिद्धहस्त संपादक, उमर खय्याम यांच्या तोडीस तोड रूबायांमुळे मराठीची पताका डौलात फडकत ठेवणारे कवी, प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, एक मनस्वी आणि तितकंच बेभरोशाचं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. 
रॉयसाहेबांनी त्या काळात दीनानाथ दलालांच्या सहकार्याने 'शिरडीचे श्री साईबाबा' हा उत्कृष्ट साहित्यमूल्य असलेला चित्रपट काढला. त्याची खूप चर्चा झाली, पुरस्कार मिळाले पण आर्थिकदृष्ट्या तो फसला. त्यावर ते विनोदाने म्हणायचे, ‘‘साईबाबांनी अनेकांना भरभरून दिले, आमच्या खांद्यावर मात्र त्यांनी झोळी दिली.’’
त्यांनी दत्तगुरूवरील चित्रपट केला त्याचा एक धमाल किस्सा आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्यात सुरू होतं. प्रसंग असा होता की, दत्त महाराजांचा लवाजमा जातोय. सोबत शिष्य आहेत आणि त्यांच्या मागे कुत्री येत आहे. या शूटमध्ये कुत्री एक तर मागे रहायची किंवा पुढे निघून जायची. एका पाठोपाठ एक बिड्या शिलगावत ते ही गंमत पाहत होते. शेवटी ते जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, ‘‘दहा मिनिटाच्या शूटसाठी तुम्ही दोन तास घालवले.’’ 
‘‘कुत्री सोबत येत नाहीत त्याला आम्ही काय करणार?’’ संबंधितांनी विचारलं. ते म्हणाले, ‘‘दहा मिनिटाचा ब्रेक घ्या. मी दोन मिनिटात हे शूट पूर्ण करतो!’’
सगळे त्यांच्या या बोलण्यावर वैतागले होते. आम्ही इतका प्रयत्न करतोय तरी जमत नाही हे काय करणार? अशा त्यामागे भावना होत्या. किणीकरांनी स्पॉटबॉयला बोलावलं आणि पाव किलो मटन आणायला सांगितलं. सदाशिवपेठी स्पॉटबॉयनं नाकं मुरडत ते आणलं आणि रॉयसाहेबांकडं दिलं. ते म्हणाले, ‘‘हे मला नको, टाक त्या दत्त महाराजांच्या झोळीत...’’ ही मात्रा लागू पडली! त्या वासानं कुत्री मागोमाग येऊ लागली. खरंच दोन मिनिटात चित्रीकरण झालं. चित्रपटात दत्त महाराजांचा ताफा, सोबत भक्त, मागोमाग येणारी कुत्री हा प्रसंग पाहून भक्त अक्षरशः नतमस्तक व्हायचे. 
कोल्हापूरातल्या एका दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम त्यांच्याकडं आलं होतं. त्यांनी त्या संपादकांकडून प्रवासासाठी म्हणून एक हजार रूपये उचल घेतले. मुंबई गाठली. तिथं जिवाची मुंबई केली. पैसे संपल्यावर ते परत गेले. जयवंत दळवी, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे अशा सर्वांचे लेख, कथा त्यांनी संपादकाला दिल्या. सगळ्या नामवंतांच्या सहभागानं तो अंक दणदणीत झाला. अंक आल्यावर ते प्रत्येकाला भेेटले. अंक दिला आणि त्यांचं साहित्य दमदार झाल्याचं सांगितलं. पु.ल. म्हणाले, ‘‘किणीकर, ही कथा माझ्या स्टाईलची आहे पण मी कधी लिहिलीय आठवत नाही.’’ 
किणीकर म्हणाले, ‘‘आठवत नाही ना? मग मी तुम्हाला फुकटची प्रसिद्धी दिली. हे मीच लिहिलंय आणि त्याचं मानधनही मीच घेतलंय. ते तुम्ही विसरा!’’ आणि ते चालते झाले. त्या पंचवीस कथा-लेखांपैकी प्रत्येकाला त्यांनी हे सांगितलं. अंक जोरात खपतोय म्हणून संपादक खूश होता. हा प्रकार कुणालाही कळला नाही. पुढे एक-दोघांनी त्यांच्याकडं आमच्या नावानं लेखन केलं म्हणून तक्रार केली पण एकाही वाचकाला असं वाटलं नाही. इतक्या समकालिन लेखकांचं साहित्य त्यांच्या त्यांच्या स्टाईलनं लिहिणं म्हणजे केवढी मोठी प्रतिभा! हे काम येरागबाळ्याचं नक्कीच नाही.
असाच प्रसंग त्यांच्या ‘धरती’च्या दिवाळी अंकाचा आहे. त्या वर्षी त्यांनी भारतातल्या विविध प्रांतातील कवींच्या कविता अनुवादित करून दिवाळी अंकात प्रकाशित केल्या. सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची यथायोग्य दखल घेत कौतुक केलं की ‘यंदाच्या ‘धरती’च्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रांतातील कवींच्या अनुवादित केलेल्या दर्जेदार कविता!’ म्हणजे बंगालचे कुणी मुखर्जी, काश्मीरचे महंमद! त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी लिहिलं ‘‘अरे, ज्यांच्या नावाने कविता छापल्यात त्या नावाचे कुणी कवी त्या भाषेत आहेत की नाही हे तर बघा. ही सगळी टोपणनावं आहेत आणि या सगळ्या कविता माझ्याच आहेत.’’
असाच प्रकार त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाबाबत. त्यात पहिल्याच पानावर एक रूबाई आहे. 
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे,
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्तान!
त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर!’ मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या क्षमतेच्या या ओळी किणीकरांच्याच आहेत हे नंतर कळले.
किणीकरांबाबत पु. ल. देशपांडे लिहितात, ‘‘उत्तररात्र वाचताना वाटलं ह्या अवलियाकडे आपण अधिक आस्थेनं आणि आदरानं पाहायला हवं होतं. त्यांनी स्वतः आदराची किंवा मानसन्मानाची चुकूनही अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून काय आपण त्यांना ओळखायला नको होते? आपण ओळखीच्या माणसाबाबतही किती अनोळखी राहतो पहा!’’
मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेत, साहित्यात, संपादनात, चित्रपट-नाटकात गौरवशाली योगदान देणार्‍या रॉय किणीकर यांनी संपूर्ण आयुष्य दारिद्य्रात घालवलं. आपल्या दीड खोलीच्या विश्वात कमालीच्या उपेक्षेत जगत असतानाही त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केलं. ‘कुणास कळले, कुणास न कळले’ हे जरी खरे असले तरी या आणि अशा चरित्रनायकांनी दिलेलं योगदान न विसरणं हीच त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली असेल.
-घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी - दि. 11 जानेवारी 23
दैनिक 'पुण्य नगरी'

रॉयसाहेबांच्या रुबयांचा हा आविष्कार पहा -

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातिल तो म्हणतो
***
ऋण नक्षत्रांचे असतें आकाशाला
ऋण फळाफुलांचे असतें या धरतीला
ऋण फेडायाचें राहुन माझें गेलें
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेलें
***
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला कांही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझें होते
***
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला कांही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझें होते
***
कोरून शिळेवर जन्ममृत्युची वार्ता
जा, ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कोणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास याचे स्मरण
***
पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगायाचे सांगून झाले नाही 
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही
***
आभाळ झिरपते भरलेल्या माठात
अन निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलीकडे माठ फुटे हा इकडे
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे
***
गेले पैगंबर, येशु, बुद्धही गेले
श्रीकृष्ण, रामही गेले म्हणजे मेले
चुकणार नसे देवालाही मरण
वाचले कुणी का आभाळाचे पान
***
हे चित्र, शिल्प ही वीणा आणि मृदंग
येतात कोठुनी त्यातील भावतरंग
हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे
आहे हे संचित, देणे भगवंताचे
***
जळल्यावर उरते, एक शेवटी राख
ती फेक विडी, तोंडातली काडी टाक
जळण्यातच आहे, गंमत वेड्या मोठी
दिव्यत्व अमरता, मायावी फसवी खोटी
***
अश्रूंना नाही रूप नि कसला रंग
का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग
जाणारा जातो अनंत आहे काळ
तुटणार कधीतरी मृत्यूची ती नाळ

Saturday, January 28, 2023

सद्वर्तनाची श्वेतपत्रिका

नोव्हेंबर 1956 ला अलियारपूर येथे रेल्वेचा एक भीषण अपघात झाला. त्यात 144 प्रवासी मरण पावले. या विभागाचे मंत्री असल्याने, ‘‘रेल्वे अपघाताची कसून चौकशी होईल, अपराध्यांना कडक शासन होईल, मृतांच्या कुटुंबियांना सर्व ती मदत करण्यात येईल,’’ असं काही ते सांगत बसले नाहीत. रेल्वेमंत्री या नात्याने ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे मानून रेल्वेमंत्र्यांनी आपला निस्पृहपणा दाखवला आणि रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बरं, राजीनामा दिल्यानंतर ते मंत्र्यासाठी असलेल्या गाडीने नाही तर सरकारी बसने घरी आले. घरी आल्यावर आपल्या पत्नीला सौ. ललितादेवी यांना सांगितलं की, ‘‘आपल्या घरी जेवणात रोज दोन भाज्या असतात. यापुढे ही अशी ‘श्रीमंती’ आपल्याला परवडणारी नाही. आजपासून रोज एकच भाजी करत जा...’’
आजच्या काळात साध्या ग्रामपंचायत सदस्याचाही तोरा पाहता केंद्रीय मंत्र्याचं हे वागणं अविश्वसनीय वाटेल. हाच प्रामाणिक नेता आपल्या देशाचा पंतप्रधान झाला आणि त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली. लालबहादूर शास्त्री नावाच्या या शांतीदूताचं आपल्या देशाच्या विकासात मोलाचं योगदान आहे.
शास्त्रीजींचं चरित्र म्हणजे सद्वर्तनाची श्वेतपत्रिकाच होती. या विधानाच्या अनुशंगानं एक प्रसंग सांगावासा वाटतो. शास्त्रीजी त्यावेळी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाचे चिटणीस होते. एके रात्री त्यांचा एक मित्र अचानक घरी आला आणि त्यानं सांगितलं की, ‘‘माझ्या बायकोची तब्येत बिघडलीय. तिला इस्पितळात नेण्यासाठी पन्नास रूपये उसने हवेत.’’
शास्त्रीजी एकदम शांत झाले. त्यांनी सांगितलं, ‘‘मला दरमहा पन्नास रूपये मानधन मिळतं. त्यात माझं घर चालतं. बचत अशी काही होतच नाही. त्यामुळं जवळ पैसे तर नाहीत. आणखी काय करता येतं ते आपण बघूया!’’
त्यांचा हा संवाद ऐकत असलेल्या ललितादेवी घरात गेल्या आणि त्यांनी आतून पन्नास रूपये आणून शास्त्रीजींच्या हातावर टेकवले. ते पैसे घेऊन मित्र आनंदाने निघून गेला. तो गेल्यावर शास्त्रीजींनी विचारलं, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललितादेवींनी सांगितलं, ‘‘तुम्ही मला घरखर्चाला दरमहा तुमच्या मानधनाचे पन्नास रूपये देता. चाळीस रूपयात मी घरखर्च भागवते. अडीनडीसाठी म्हणून दहा रूपये दरमहा बचत करते. अशा अडचणीच्या वेळी कुणाला त्यातून मदत झाली तर आनंदच आहे की...’’
शास्त्रीजींनी आपल्या पत्नीच्या या वृत्तीचं कौतुक केलं. त्या आत जाताच त्यांनी कागद घेतला आणि काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाला पत्र लिहिलं, ‘‘माझं घर दरमहा चाळीस रूपयात चालतं! त्यामुळं पुढील महिन्यापासून माझ्या मानधनाचे दहा रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूंना द्यावेत...’’
एकदा एका सदस्यानं लोकसभेत आक्षेप घेतला की, शास्त्रीजींच्या बंगल्याचं आणि त्यांच्या इमारतीच्या आवाराचं एका महिन्याचं बिल पाचशे रूपये आहे. ते ऐकताच शास्त्रीजी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या सरकारी बंगल्याचं सर्वच्या सर्व बिल आपल्या खाजगी पैशांतून भरलं!
एक प्रसंग तर खूपच विदारक आहे. त्यांची दीड वर्षाची सुंदर कन्या विषमज्वराने आजारी पडली. तिच्या आईला, सौ. ललितादेवींना अत्यंत काबाडकष्ट करूनही तिच्या उपचारासाठी पैसे जमवता आले नाहीत. या सगळ्यात उपचाराअभावी मंजुचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ राष्ट्रासाठी आपल्या कुटुंबाकडे, मुलांबाळांकडे सुद्धा लक्ष देता आलं नाही म्हणून शास्त्रीजी अस्वस्थ झाले होते.
1920 साली त्यांनी वाराणशी येथे महात्मा गांधी यांचे व्याख्यान ऐकून प्रभावीत झाल्याने देशासाठी आत्मसमर्पणाचा निर्धार केला. त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. कारावास सहन केला. नंतर अलाहाबाद काँग्रेसचे चिटणीस, अध्यक्ष व नंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे चिटणीस झाले. 1937 ला विधानसभेवर निवडून आले. नंतर मुख्यमंत्री, गृह व वाहतूक मंत्री, 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन ते राज्यसभेवर गेले आणि रेल्वेमंत्री झाले. 1957 ला त्यांची लोकसभेवर दुसर्‍यांदा निवड झाली आणि ते दळणवळण व वाहतूक मंत्री झाले. 1961 ला गृहमंत्री असताना आसाम-बंगाल भाषिक दंगल, पंजाब सुभा चळवळ, केरळ काँग्रेस-प्रजा समाजवादी पक्षातील तंटे थांबविण्यात त्यांना यश आले. 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडालेला असताना ते देशाचे पंतप्रधान झाले. पाकिस्तानच्या आक्रमणास त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. ताश्कंद-भारत सलोख्यासाठी ते रवाना झाले. 11 जानेवारी 1966 ला त्यांचे देहावसान झाले. या त्यागी, निःस्पृह, सेवाभावी, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रभक्त नेत्यास मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्यात आला.
‘‘अधिकारी किंवा पुढारी बुद्धिमान, हुशार किंवा चलाख असेल पण तो लाचखोर, भ्रष्ट असेल तर तो निरूपयोगी आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला बढती किंवा जबाबदारीची कामे देता कामा नये. सार्वजनिक कामात त्याचा स्वीकार करणे अतिशय घातक आहे. त्याच्या वाईट कृत्याला संरक्षण देणे हा राष्ट्रद्रोह आहे,’’ असे ते आग्रही प्रतिपादन करत आणि न डगमगता त्याप्रमाणेच वागत.
पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत ते म्हणाले होते, ‘‘पाकबरोबर शांततेने नांदायची आमची मनापासूनच इच्छा आहे पण त्यासाठी आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचा बळी आम्ही देणार नाही. आम्हाला कोणाचा इंचभर प्रदेश नको पण आमचाही इंचभर प्रदेश कोणी घेतलेला आम्ही बिलकूल खपवून घेणार नाही.’’
कितीही बिकट प्रसंग असला तरी ते विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घेत. त्यांच्या विचारांचा ते आदर करत. समोरच्याचे ऐकून घेऊन त्यावर सखोल विचार करणे हा आजच्या राजकारणात हरवत चाललेला गुण त्यांच्याजवळ होता. विरोधकांनाही यथायोग्य मान देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यामुळे विरोधकांनाही त्यांच्याविषयी आदर वाटायचा.
देशातील अन्नधान्याचा तुटवडा पाहून त्यांनी संध्याकाळचे जेवण वर्ज्य केले होते. स्वतःच्या घरी भात खाणे बंद केले होते. देशातील गरिबी पाहून अस्वस्थ झाल्याने त्यांनी आठवड्यातून एकदा उपवास सुरू केला आणि देशबांधवांनाही त्याचे आवाहन केले. त्यांचा नैतिक अधिकार पाहून या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून सोमवारला ‘शास्त्रीजींचा वार’ म्हणण्याची प्रथा पडली.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून लोककल्याणासाठी तन, मन, धन अर्पण करणारे लालबहादूर शास्त्री यांचे जीवन आणि चरित्र सर्वांसाठीच स्फूर्तिदायी आहे. त्यांच्या स्मृतिस अभिवादन.
- घनश्याम पाटील
7057292092
प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, दि. 29 जानेवारी 2023

Saturday, January 14, 2023

संतांचे कवी - संत महिपती!

हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, ‘‘स्नानसंध्या आटोपून येतो...’’ 
सैनिक म्हणाले, ‘‘असेल तसे या, असा निरोप आहे.’’ 
हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, ‘‘यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी केली तर ती फक्त भगवंताची करेन!’’ 
इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी सांगितलं, ‘‘आपल्या वंशात इथून पुढे सात पिढ्या कुणीही सरकारी नोकरी करू नये! केल्यास तो निपुत्रिक राहील.’’
ते वचन आजची त्यांचे वंशज तंतोतंत पाळतात. ते केवळ भजन, कीर्तन करूनच आपला उदरनिर्वाह भागवतात.
त्यानंतर त्यांनी भगवंतभक्तीसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. महाराष्ट्रातील 168 आणि महाराष्ट्राबाहेरील 116 अशी 284 संतचरित्रे काव्यमय शैलीत लिहिली. या संतचरित्राशिवाय त्यांच्या स्फूट रचनाही मोठ्या आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘पांडुरंग महात्म्य’ अत्यंत भक्तीरसपूर्ण आहे. पांडुरंगाविषयी इतकं लिहून ते समाधानी झाले असं नाही. त्यामुळं त्यांनी ‘पंढरीमहात्म्य’ आणि ‘पांडुरंगस्त्रोत’ही लिहिले. आज आपल्याला असंख्य संतांची चरित्रे कळतात ती त्यांच्यामुळेच! या संतांच्या कवींचं नाव म्हणजे, संत महिपतीबुवा ताहाराबादकर! 1715 ते 1790 हा त्यांचा कालखंड. मात्र त्यांनी जे संतसाहित्य लिहून ठेवलं आहे ते काळाच्या खूप पुढचं आणि म्हणूनच अजरामर ठरणारं आहे.
त्यांचे मूळ आडनाव कांबळे. वडिलांचे नाव दासोपंत. मंगळवेढ्याचे कांबळे नगर जिल्ह्यातील ताहाराबादला स्थायिक झाले. मुलबाळ नसल्याने ‘आपल्यानंतर पंढरीची वारी कोण करणार?’ असा प्रश्न पडून ते अस्वस्थ झाले. अत्यंत आर्ततेनं त्यांनी त्यांचं गार्‍हाणं पांडुरंगापुढं मांडलं आणि वयाच्या साठीनंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचं नाव ‘महिपती!’ याच मुलानं पुढे वारकरी संप्रदायात भरीव योगदान दिलं. जे कोणी संत हयात असतील त्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी त्यांची काव्यमय चरित्रं लिहिली. जे हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांना, नातलगांना, मित्रांना भेटून त्यांनी आपलं लेखनकार्य पुढं नेलं. आपले गुरू संंत तुकाराम महाराज यांनी आपल्या स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला आणि त्यांनी फर्मावलं की ‘तू संतचरित्रे वर्णन कर’ म्हणून मी इकडे वळलो असं त्यांचं म्हणणं.
संत महिपतींनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत गोरोबा, संत चोखोबा, संत कबीर, बोधलेबुवा, गणेशनाथ उद्धव, चिद्घन, विसोबा खेचर, संत सेना महाराज, संत रोहिदास अशा संतांची रसाळ चरित्रे लिहिली आहेत. त्यांचे भक्तविजय, कथा सारामृत, भक्तलीलामृत, संतलीलामृत, संत विजय हे आणि असे अनेक ग्रंथ वारकरी संप्रदायात प्राथःस्मरणीय आहेत. शिवाय त्यांनी  लिहिलेलं पंढरी महात्म्य, अनंतव्रतकथा, दत्तात्रेय जन्म, तुळशी महात्म्य, गणेशपुराण, पांडुरंगस्त्रोत, मुक्ताभरणकथा, ऋषिपंचमी महात्म्य, अपराधनिवेदन स्त्रोत या स्फुटांसह अनेक अभंग, आरत्या, पदे, सारांश ज्ञानेश्वरी असं लेखन केलं.
पूर्वी आपल्याकडे देवांची चरित्रे गायली जात. महिपतींनी देवांचे मूर्त रूप असलेल्या संतांची चरित्रे गायिली. त्यामुळेच ते ‘संतांचे कवी’ झाले. मराठी संतसाहित्यात त्यांनी जे अवर्णनीय योगदान दिलं ते म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.
वारकरी संप्रदायात त्यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. दादोपंतांची पंढरीची वारी महिपतीबुवांनी पुढे चालू ठेवली. वृद्धावस्थेत ते पंढरपूरला वारीला गेले. त्यावेळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी आर्तपणे सांगितलं की, ‘‘हे पांडुरंगा, यापुढे म्हातारपणामुळे वारीसाठी तुझ्या दर्शनास येण्यास अंतरेल असे वाटते. तेव्हा मला क्षमा कर व तुझ्या दर्शनाची माझी आसक्ती कायम अशीच राहू दे...’’
त्यानंतर विठ्ठलाने त्यांना स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘आषाढ शूद्ध एकादशीस भक्त मला भेटावयास पंढरपूरला येतात. आषाढ वद्य एकादशीस मी तुला ताहाराबादेस येऊन दर्शन देईन!’’
त्यानंतर सकाळी बुवांनी चंद्रभागेत स्नान केले. त्यावेळी त्यांना चंद्रभागेत श्री विठ्ठलाची वाळुमिश्रीत पाषाणाची मूर्ती सापडली. ती त्यांनी ताहाराबादला आणून, प्राणप्रतिष्ठापना करून विठ्ठलाचे मंदीर बांधले. आजही ही मूर्ती ताहाराबाद येथे पाहावयास मिळते. भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव ही कल्पनाच तर आपल्या वैभवशाली परंपरेचा भाग आहे.
महिपतींनी श्री विठ्ठलाला जे पत्र लिहिले त्यात त्यांची आर्त भक्ती दिसून येते. ते लिहितात, ‘‘विठ्ठला, चित्तवृत्ती तुझे पायी ठेवली आहे. त्रितापाचे आघात या देहाने किती सोसावेत? ते या पत्रात किती लिहावेत? शरीरात शक्ती नाही. इतका क्षीण झालो आहे की, हातात लेखणी धरवत नाही. देवा, या देहाचा संबंध तोड. तुझ्या पायाशी ठाव दे. वाचेने आणखी बोलता येत नाही. मागे अंतकाळी जसा भक्तास पावलास तसा मला पाव.’’
संत महिपतींनी 1790 साली वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी श्रावण वद्य द्वादशीला ताहाराबाद येथे समाधी घेतली. आषाढ वद्य त्रयोदशीला तेथे फार मोठी यात्रा भरते. हजारो भाविक तिथे जमून महिपतींच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. तिथे त्यांच्या नावाने एक ट्रस्टही स्थापन करण्यात आला असून सुंदर मंदिर बांधले आहे.
आजही वारकरी संप्रदायात संत महिपतीबुवांचे दाखले दिल्याशिवाय कीर्तनकारांना पुढे जाता येत नाही. जर संत महिपती नसते तर कित्येक संतांची कामे सोडा त्यांची नावेही आपल्याला कळली नसती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, असे म्हणताना ही संत परंपरा जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणार्‍या संत महिपती बुवांविषयी संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लेखन केले आहे. प्राचार्य डॉ. रमेश आवलगांवकर, डॉ. वा. ना. उत्पात, विद्याधर ताठे, महिपतींचे वंशज अविनाश कांबळे, माझे स्नेही दत्तात्रय नाईकवाडे, दत्तात्रय गायकवाड अशा काहींनी वेळोवेळी प्रसंगानुरूप त्यांच्याविषयी लिहिले आहे. राहुरी येथील श्री. ज्ञानेश्वर आणि शामबाला माने यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर एक चित्रपटही निर्माण केला होता. मात्र तरीही अनेक संतांना प्रकाशझोतात आणणारे संत महिपती आजच्या पिढीपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे आपले दुर्दैव आहे. किमान वारकरी संप्रदायातील काही जाणकारांनी पुढाकार घेत संत महिपतींच्या नावे काही उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून शासनदरबारीही काही प्रयत्न झाले तर या थोर संत चरित्रकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल.
- घनश्याम पाटील
7057292092
(प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, 15 जानेवारी 2023)

Saturday, December 31, 2022

सामाजिक सुधारणांचे अग्रदूत

मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? असा प्रश्न केला की आपण डोळे झाकून सांगतो, बाळशास्त्री जांभेकर!
...मग मराठीतले पहिले मासिक कोणी सुरू केले?
पहिले सार्वजनिक वाचनालय कोणी सुरू केले?
पहिले असिस्टंट प्रोफेसर कोण?
पहिले मराठी शिक्षणाधिकारी कोण?
या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर म्हणजे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर!
त्यांनी 6 जानेवारी 1832 साली ‘दर्पण’ हे मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र सुरू केले. हा दिवस आपण ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करतो. तरीही दुर्दैवाने आजच्या पिढीला या महान समाजसुधारकाची हवी तशी माहिती नाही. आज महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात जी प्रगती सुरू आहे त्याचा श्रीगणेशा बाळशास्त्रींनी त्या काळात केला.
मराठी वृत्तपत्राची गंगोत्री बाळशास्त्रींनी सुरू केली. त्याचा निम्मा भाग इंग्रजी असायचा. त्यामुळे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारेही ते पहिले भारतीय संपादक ठरले. दर्पण वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी लोकशिक्षणाच्या हेतूने ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. एल्फिस्टन स्कूलला त्यांची पहिले सहायक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. दादाभाई नौरोजी, भारतीय पुराणेतिहास संशोधक डॉ. भाऊ दाजी लाड, विख्यात गणिती प्रो. केरो लक्ष्मण छत्रे, मुंबईचे न्यायनिष्ठुर प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट रा. ब. नाना मोरोजी त्रिलोकेकर, योराबजी शापूरजी बंगाली, के. शि. भवाळकर असे त्याकाळातील वलयांकित मान्यवर हेही त्यांचे विद्यार्थी. वयाच्या सतराव्या वर्षी तेरा भाषा अवगत असलेले बाळशास्त्री हे ‘आधुनिक पश्चिम भारताचे जनक होते,’ असे गौरवोद्गार मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर ऑस्किन पेरी यांनी काढले होते.
मराठी पत्रकारितेबरोबरच मराठी मासिक, अध्यापनशास्त्र, इतिहास संशोधन, सामाजिक सुधारणा, विविध पुस्तकांचे लेखन, गद्य निबंध, सामाजिक-शैक्षणिक चळवळी अशा सर्वांचे प्रेरक प्रणेते म्हणून कोकणातील पोंभुर्ले गावच्या बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आधी स्त्री शिक्षणाचा विचार मांडणारे आणि आपल्या लेखनातून सातत्याने त्याचा ध्यास घेणारे बाळशास्त्री समाजसुधारणेचे दीपस्तंभ ठरावेत.
लोकमान्य टिळक यांच्याबाबत एक आख्यायिका आहे. गोपाळ गणेश आचवळ यांनी 1 ऑगस्ट 1947 च्या ‘केसरी’त ती लिहिली आहे. गंगाधर टिळक यांनी त्यांच्या मुलाचे नाव प्रथम ‘केशव’ असे ठेवले होते. त्याचवेळी बाळशास्त्री जांभेकर यांची विद्वत्ता देशभर पसरली होती. बाळशास्त्री 1842 मध्ये दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्र विभागाचे शाळा तपासणीस होते. त्यामुळे गंगाधरपंत टिळक यांना बाळशास्त्रींबद्दल अतोनात आदर व अभिमान होता. आपला पुत्रही त्यांच्यासारखाच विद्वान व लोकप्रिय व्हावा या भावनेने त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘बाळ’ असे ठेवले. बाळ गंगाधर टिळक हे पुढे ‘लोकमान्य’ झाले, मात्र बाळशास्त्री जांभेकरांची त्यावेळची लोकप्रियता आणि जनभावना यातून दिसून येते.
बाळाशास्त्री जांभेकर यांचे चरित्रकार, ज्येष्ठ संपादक रवींद्र बेडकिहाळ लिहितात, ‘‘मराठी वृत्तपत्रसृष्टीची परंपरा सांगताना टिळक, आगरकरांचा उल्लेख होतो. निबंधमाला संदर्भात विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख होतो. स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणांच्या संदर्भात फुले, आगरकर, आंबेडकर, महर्षि कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना अगर सांगताना हे उल्लेख योग्यच आहेत. तथापि पत्रकारिता, निबंध, लोकशिक्षण, बालवाङमय, सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण इत्यादी बाबतीत या सर्वांच्याही आधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या विषयांना स्पर्श करून वाचा फोडली होती. त्यामुळे या सर्वांची परंपरा सांगताना बाळशास्त्रींचे नाव न घेणे अन्यायकारक आहे. मराठी पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक म्हणूनच केवळ त्यांचा उल्लेख नाही तर वरील सर्व क्षेत्रातील प्रेरणांचा स्त्रोत बाळशास्त्री जांभेकरांपासूनचाच आहे, असे इतिहास सांगतो. याकडे आजच्या साहित्यिक, पत्रकारांनी निरीक्षण वृत्तीने पाहिले पाहिजे.’’
बेडकिहाळ फक्त बाळशास्त्रींचे चरित्र लिहूनच थांबले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्रींच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले आहे. दरवर्षी तेथे राज्यातील पत्रकारांचे व साहित्यिकांचे मेळावे होत असतात.
हाडाचे शिक्षक असलेल्या बाळशास्त्रींनी त्या काळात शिक्षकांना जो बहुमोल उपदेश केला तो आजच्या काळातही अंतर्मुख करणारा आहे. ते लिहितात, ‘‘पूर्वकाळाचे महाप्रबुद्ध ऋषिजन हे अरण्यवास पत्करून विद्यासंपन्न होत आणि विद्यादान करीत. त्यांनी आपल्या देशात अपूर्व ज्ञानभांडारे भरून ठेवली आहेत. ती इतकी तुडुंब आणि ओतप्रोत आहेत की ती नुसती चाळायला सुद्धा संबंध जन्म पुरायचा नाही. मग विद्याभ्यास अन विद्यादान करण्याची आपणास का लाज वाटावी? विद्या शिकून तुम्हाला कारकून किंवा अंमलदार व्हावेसे वाटते. शिक्षकाचा व्यवसाय लोक हलका मानतात पण तसे नाही. प्रजा मूढ आहे, म्हणून सरकारी नोकरांचे महत्त्व. विद्याप्रसार जसजसा होत जाईल तसतसे सरकारी नोकरांचे ढोंगसोंग अन थाटमाट नाहीसा होईल. प्रजा शहाणी आणि समजूतदार झाली म्हणजे कारकूनीला कोण विचारतो? म्हणून विद्याभिलाषी व्हा. विद्याभ्यास करा. लोकांना सुशिक्षण द्या. सरकार व प्रजा, धनी व चाकर, आईबाप व पुत्र, ह्यामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्वदेशाभिमान आणि स्वधर्माभिमान लोकांच्या मनात निर्माण उपजावा असा प्रयत्न करा. हेच आपले ऋषिवंशजाचे कर्तव्य.’’
आपल्या फक्त मेंदुचीच नाही तर दृष्टीचीही कवाडे सताड उघडी ठेवणार्‍या बाळशास्त्रींचा अफाट व्यासंग पाहून त्यांना ‘बाल बृहस्पती’ म्हटले जायचे. भारतीय शिलालेख, ताम्रपट याचे संशोधन करणारे ते त्या काळातले एकमेव भारतीय होते. रॉयल एशियाटिक पत्रिकेच्या आठ अंकात त्यांनी यावरचे शोधनिबंध लिहिले. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील भाषांतर समितीचे कार्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती. 1840 मध्ये त्यावेळच्या अत्यंत बहुमानाच्या ‘जस्टिस ऑफ दि पीस’ या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. अशा प्रकारे नेमण्यात आलेल्या व्यक्तिला हायकोर्टात ‘ग्रॅन्ड ज्युरी’मध्ये बसण्याचा अधिकार होता.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या प्रेरणांचे अग्रदूत असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन!
- घनश्याम पाटील
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - दै. 'पुण्य नगरी' 1 जानेवारी 22)

भाजपासमर्थक अजितदादा पवार



साधारणतः वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाची अधिवेशने प्रचंड गाजायची. अधिवेशन संपल्यानंतर त्याचं विश्लेषण लिहिलं जायचं. ते लिहिणारे तज्ज्ञ पत्रकार, विश्लेषक होते. रोजच्या अधिवेशनाचं इतिवृत्त आकाशवाणी, दूरदर्शनवरून सांगितलं जायचं. त्याचं वार्तांकन अधिक जबाबदारीनं व्हायचं. या अधिवेशनात लोकांचे कोणते प्रश्न मांडले जात आहेत हे प्रामुख्यानं सांगितलं जायचं. आचार्य अत्रे यांच्यासारखा सिद्धहस्त लेखक जेव्हा सभागृहात होता तेव्हा साहित्यावरही चर्चा व्हायची. बेळगाव प्रश्नाबद्दल महाराष्ट्राच्या विधिमंडळात कधी दुमत नव्हतं. परकीयांशी भांडताना, मुंबई महाराष्ट्राची हे सांगताना आपलं विधिमंडळ एक व्हायचं. आता ती परिस्थिती राहिली नाही. पूर्वीचं सगळं चांगलं आणि आत्ताचं सगळंच वाईट हे म्हणायची पद्धत असते. हा भाग त्यातला नाही. खरोखरीच फार बिकट परिस्थिती आहे.
महाराष्ट्रानं अतिशय ताकदवान विरोधी पक्षनेते बघितले आहेत. त्या नेत्यांत शरद पवार, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक नेते होते. अत्यंत हौसेनं अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवलं. विधिमंडळात यंदा दादांनी विरोधी पक्षनेता म्हणून काय केलं? एकनाथ खडसे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले. 85 कोटींचा सरकारी भूखंड दोन कोटींना विकला गेला. अशा प्रकरणात भाजपाने त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. स्वतःच्या पक्षातील दोन नंबरच्या मंत्र्याला भाजपने नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा द्यायला भाग पाडलं असेल आणि त्याची चौकशी लावली असेल तर तो न्याय भारतीय जनता पक्ष ज्यांच्याबरोबर युती करून सत्तेत आला त्या मुख्यमंत्र्यांबाबत का नाही? म्हणजे भाजपची नैतिकता ढासळली, नैतिकतेच्या कल्पना बदलल्या, एकनाथ शिंदे कोणीतरी महान नेते आहेत की भाजपा बदलला आहे? हे प्रश्न सामान्य माणसाने नाही तर विरोधी पक्षनेत्याने सभागृहात विचारायला हवेत.
फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या फाईल आणि त्यांच्या भानगडी बाहेर आल्या. शंभूराजे देसाई यांचं बेकायदेशीर बांधकाम, उदय सामंतांचं अपात्र कंपनीला जास्तीत जास्त मदत करणं, अब्दुल सत्तार यांची साधी चौकशी लावायचं सामर्थ्यही अजित पवारांनी विरोधी पक्षनेता म्हणून दाखवलं नाही. त्यांची किमान चौकशी सुरू करा, त्यासाठी एखाद्या निवृत्त न्यायाधीशाची समिती नेमा अशा साध्या मागण्याही सभागृहात केल्या गेल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाचे समर्थक असलेले अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेता म्हणून निःपक्षपातीपणानं काम करू शकत नाहीत. जेव्हा विरोधी पक्ष सक्षम, कार्यक्षम, लढाऊ नसतो तेव्हा सत्ताधार्‍यांना मोकळं रान मिळतं.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून फिरून पुढे गेली. अशावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळात यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, धीरज देशमुख, अमित देशमुख, विश्वजित कदम, पृथ्वीराजबाबा चव्हाण, विधानपरिषदेत भाई जगताप यांचे बुलंद आवाज दिसायला हवे होते. एकनाथ शिंदेंच्या सरकारला सहा महिन्याचा कालावधी मिळालेला होता. हे लोक गुवाहटीला परत का गेले? महाराष्ट्राचं तिथं काय आहे? ज्यांनी राज्याभिषेक केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं असं या चाळीस फुटीर आमदारांना वाटत नाही. त्याचवेळी गुवाहटीला जाऊन मात्र कामाख्या देवीचा नवस फेडावा वाटतो. हा महाराष्ट्र नरेंद्र दाभोलकरांचा आहे, हे सत्ताधार्‍यांना सभागृहात का सांगितलं गेलं नाही? काँग्रेसच्या आमदारांनी हे प्रश्न विचारले असते तर त्यांचं अस्तित्व जाणवलं असतं. त्यांचं काही अस्तित्व आहे की नाही? काँग्रेसच्या एखाद्या आमदारानं काही भ्रष्टाचाराचं प्रकरण काढलंय, सामान्य माणसाचा एखादा प्रश्न धसाला लावलाय असं चित्र नव्हतं. फडणवीसांच्या चार फाईल पुढे आल्या, मुनगंटीवारांची काही चौकशी केली, चंद्रकांतदादांवर काही आरोप केले अशा किमान काही अपेक्षा काँग्रेसच्या आमदारांकडून होत्या. महापुरूषांच्या अपमानाबद्दल राज्यपालांना विधिमंडळानं जाब विचारावा, अशी साधी मागणीही केली गेली नाही. ‘महापुरूषांचा अपमान करणारे भाजपचे छोटे नेते प्रसाद लाड, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करतो, जे सभागृहात त्यांचा निषेध करणार नाहीत ते शिवभक्त नाहीत’ असं म्हणून शिंदे गटाला आणि भाजपला उघडे पाडण्याची संधी अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्याकडे होती. ती त्यांनी गमावली. सत्ताधार्‍यांवर तेव्हाच अंकुश राहतो, सत्ताधारी तेव्हाच कार्यक्षम असतात जेव्हा विरोधी पक्ष ताकदवान असतो. भाजपसमर्थक अजितदादा पवार यांच्यामुळे सत्ताधारी निवांत आणि आरामात राहिले असं चित्र होतं.
विधिमंडळात हे चार आमदार बोलतील, असं राष्ट्रवादीचं काही धोरण होतं का? एकीकडून राजेश टोपे, दुसरीकडून अजितदादा, तिसरीकडून जयंत पाटील, चौथीकडून अजून कोणी प्राजक्त तनपुरे बोलतील असं काही ठरलं होतं का? यांचं कसलंच धोरण दिसलं नाही. दादांनी यायचं, त्यांना वाटेल तेव्हा समर्थन करायचं! त्यांचं गेल्या सहा महिन्यातलं वर्तन बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी एका मराठी व्यक्तिची निवड झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घेतला गेला. या कार्यक्रमावर जयंत पाटील यांनी टीका केली. ‘जे आरोपी आहेत, ज्यांच्यावर न्यायमंडळात केेसेस सुरू आहेत त्यांच्या कार्यक्रमाला न्यायाधीशांनी उपस्थित राहू नये,’ अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जयंत पाटील हे बोलत असताना अजितदादांनी गप्प राहणं गरजेचं होतं परंतु ते म्हणाले, ‘शासकीय कार्यक्रम होता आणि मराठी माणसाचा सत्कार होता... गेले तर जाऊ देत!’

विरोधी पक्षनेता म्हणून पद मिळवायचं आणि त्या पदाशी प्रामाणिक रहायचं नाही, ही राज्यातील जनतेची प्रतारणा आहे. आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलनं करता येत नाहीत, अशा विषयांवर बोलता येत नाही आणि आपलं भाजपप्रेम सर्वश्रुत आहे अशावेळी दादांनी हे पद घेतलं नसतं तरी चाललं असतं. त्या पदावर जाऊन सत्ताधार्‍यांना वेठीस धरण्याची खरी ताकद दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांची होती. सत्ताधार्‍यांना कशी मदत होईल, कुठल्याही अडचणी न येता त्यांचं कामकाज कसं सुरळीत होईल, ते कसं सुखाने नांदतील असंच अजित पवार वागत आहेत. सत्ताधार्‍यांना समर्थन असणारा असा विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला आजवर कधी मिळाला नाही. अधिवेशन सुरू असताना जामिनावर सुटलेल्या अनिल देशमुखांना भेटण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ हे नेते सरकारी विमानानं गेले. त्याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, ‘विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो.’ लोकांचे प्रश्न विधिमंडळात मांडायचे सोडून अजित पवारांनी मुंबईला जाणं किंवा एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाणं हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. अजित पवार तर फक्त ‘हो ला हो’ मिळवत आहेत. पहाटेच्या वेळी देवेंद्रजीसोबत जाऊन शपथविधी उरकण्यापूर्वीचे अजितदादा पवार आणि त्यानंतरचे अजितदादा पवार यात प्रचंड फरक दिसतो. त्यामुळंच मी त्यांना ‘भाजप समर्थक’ म्हणतो.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारांचा जेवढा प्रभाव आहे त्यापेक्षा त्यांनी जास्त काम केलं. ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ अशी त्यांची अवस्था झालीय. उद्धव ठाकरे स्वतः आले आणि ते बेळगाव प्रश्नाबाबत बोलले. त्यामुळं नाईलाजानं सीमा प्रश्नाचा ठराव सत्ताधार्‍यांना मांडावा लागला. आदित्य ठाकरे जेवढे आक्रमक दिसले तेवढा आक्रमकपणा काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या लोकांना दाखवता आला नाही. आदित्य ठाकरे यांच्यावर किमान प्रकाशझोत असतो. मात्र चर्चेत नसलेले त्यांच्या गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही आक्रमकपणा दाखवला. बाकी विरोधक आयपीएलची मॅच बघायला आल्याप्रमाणं अधिवेशनाला आले आणि निघून गेले. यांनी फोटोसेशन करून ते सोशल मीडियावर टाकले पण जनतेचे प्रश्न काही मांडले नाहीत.
सत्ताधारी म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा सुखी मुख्यमंत्री आजवर झाला नाही. एखादा ऐतोबा नवरा घरी बसून आरामात खात असतो आणि त्याची बायको दिवसरात्र मेहनत घेत असते, असं त्यांचं झालंय. त्यांच्यावरील आरोपांची त्यांना फिकिर नाही. त्यांच्या गटाच्या आमदारांवर जे आरोप होताहेत त्याला देवेंद्रजी उत्तरं देत आहेत. सरकारविषयी काही विचारलं तरी देवेंद्रजी बोलत आहेत. एखाद्या वर्गातील मॉनिटर मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवतो, त्यांना प्रार्थनेसाठी शांततेत वर्गाबाहेर घेऊन जातो, पुन्हा आत आणतो, कुणी गोंधळ घातला तर त्यांची नावे लिहून ठेवून वर्गशिक्षकांना दाखवतो, अगदी एखादे शिक्षक वर्गावर आले नाहीत तर तेही मुख्याध्यापकांना जाऊन सांगतो. तो खूप कामे करत असला तरी सगळ्यांसाठी अप्रिय असतो. त्यामुळे संधी मिळताच इतर विद्यार्थी एकत्र येऊन त्याची धुलाई करतात. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले, आपल्या पत्नीच्या मतांचा आदर करत तिला पूर्ण स्वातंत्र्य देणारे, प्रत्येक विषयात अभ्यास करूनच मत मांडणारे असे देवेंद्रजी सध्या मात्र ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा, सब कुछ मै अकेला हजम करूँगा’ असे म्हणत सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यात ठेवत आहेत. पाच-सहा मंत्रीपदं, तितक्याच जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असं सगळं त्यांच्याकडं पाहून माझ्या डोळ्यासमोर दिवाळीतील एखादा हावरट मुलगा येतो. ज्याच्या एका हातात लाडू असतो, दुसर्‍या हातात अनारसा, तोंडात करंजी, खिशात चिवडा-शंकरपाळे! भाजपासाठी ही निश्चितपणे धोक्याची घंटा आहे. त्यांच्या या खादाड वृत्तीवर विरोधकांपैकी कोणीही तुटून पडत नाही. अन्यथा एव्हाना फडणवीस दिल्लीत दिसले असते. रामदास आठवले यांच्याप्रमाणे त्यांनाही ‘समाजकल्याण’सारखं  एखादं खातं देऊन गप्प बसवलं असतं.
एकनाथ शिंदे यांनी यंदा सभागृहात काही चांगलं केलं असेल तर ते म्हणजे अमोल मिटकरी यांच्यासारख्या वाचाळवीरांना फटकारून जागेवर बसवलं. देशाच्या पंतप्रधानांना ‘रावण’ असे संबोधल्यानंतर शिंदेंनी त्यांना सुनावलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे अभ्यासू, शांत आणि सर्वसमावेशक नेते आहेत त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे जयंत पाटील. त्यांनी ‘आमच्या आमदारांना बोलू न देण्याचा निर्लज्जपणा बरा नाही’ हे सभापतींना सांगितल्यानंतर त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करत त्यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. खरंतर जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काही सूचना केली तर एखादा शब्द असंवैधानिक ठरवण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं होतं. त्यात त्यांनी त्या शब्दाबद्दल माफीही मागितली होती. तरीही त्यांचं निलंबन झालंच. सभापती राहुल नार्वेकर यांची या वर्तनातून ‘स्वामी निष्ठा’ दिसून येते. त्यांनी सभापती कसा नसावा हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा सभापती असताना तटस्थ असायचे. त्यांच्याकडून काही बोध घेतला असता तरी हा प्रसंग टळला असता. त्यांचे पट्टशिष्य असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावरही ज्या प्रकरणाचा निकाल लागला आहे ते सभागृहात उकरून काढत आरोप करण्यात आले. महाविकास आघाडीतील कोणीही बोलू लागले की सभापती नार्वेकर सतत ‘पुढे चला-पुढे चला’ म्हणत होते त्यावेळी अनेकांना पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक आठवली असेल. कधीतरी त्यांनी फडणवीसांनाही ‘पुढे चला’ केले असते तर त्यांचा त्यातील प्रामाणिकपणा दिसला असता. मुख्य म्हणजे जयंत पाटलांच्या निलंबनावरूनही अजित पवार यांनी सरकारला म्हणावे तसे धारेवर धरले नाही. पाटील नसल्याने आपला भाव वाढेल असे तर त्यांना वाटले नाही ना?
राज्यातील उद्योग गुजरातला पळवले गेल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतात, ‘हे निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत घेतले गेले.’ आजचे विरोधक सांगतात, ‘हे फडणवीसांनी घडवले.’ मग या विषयावर एखादी श्वेतपत्रिका का काढली गेली नाही? सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे नवे व्यापार आणि उद्योगविषयक धोरण ठरवणे गरजेचे नाही का?
ज्येष्ठ नेते शरद पवार काय करत आहेत तर रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वपक्षिय आमदार-खासदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांना धीर देत आहेत. 83 वर्षाचा एक नेता वेगवेगळ्या रूग्णालयात जाऊन साठीतल्या नेत्यांना ‘काळजी घ्या’ असे सांगतो हे दुःखदायक आहे. फडणवीस किंवा अजितदादा पवारांनी स्वतःचे आरोग्य राखण्याचा किंवा माणसे जोडण्याचा हा आदर्श घेणे गरजेचे आहे.
या सगळ्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. राज ठाकरे त्यांच्या सर्व आमदारांसह ('सर्व' म्हणजे एकुलत्या एक) विधिमंडळात गेले. सध्या त्यांना कुणाचा बँड वाजवायच्या सुपार्‍या मिळत नसाव्यात. त्यामुळं त्यांनी कुणालाही फैलावर घेतलं नाही. फडणवीसांकडून स्वागत स्वीकारून ते परतले. आम्ही मागेच सांगितल्याप्रमाणे ‘घे दोनशे, बोल मनसे’ अशी खिल्ली सामान्य माणसांकडून उडवली जात आहे. विधिमंडळात सत्ताधारी, विरोधक यांची एकजूट दिसत असताना सभागृहाबाहेर मात्र सरकारवर सातत्याने दोन तोफा बरसत आहेत. पहिले संजय राऊत आणि दुसर्‍या सुषमा अंधारे! विरोधी पक्षनेता म्हणून सरकारने जे करणे, जे बोलणे अपेक्षित होते ते हे दोघे अव्याहतपणे आणि सर्व प्रकारची किंमत मोजून करत आहेत.
असं म्हणतात की शेतकर्‍यांचा सर्वाधिक कळवळा विरोधी पक्षाला असतो. मात्र सत्तेत आले की त्यांचं ते प्रेम गळून पडतं. ‘शेतकर्‍यांचा एकच पक्ष, विरोधी पक्ष’ हेही यंदाच्या अधिवेशनात  दिसले नाही. त्याला कारणही भाजपासमर्थक अजितदादाच आहेत.
विधिमंडळ हे सामान्य माणसाच्या आशा-अपेक्षांचं पवित्र मंदिर असतं. त्याचं पावित्र्य या लोकांनी धुळीला मिळवलं आहे. हुजर्‍यांना नको तितकं महत्त्व आलंय. अन्यथा चंद्रकांतदादा या मंत्रीमंडळात दिसले नसते. ‘एकवेळ माझ्या आईवडिलांना शिव्या घाला पण शहा-मोदींना बोललेलं मी खपवून घेणार नाही’ असे त्यांनी सांगितले त्याचवेळी त्यांचे मंत्रीपद पक्के झाले. महापुरूषांच्या अपमानावरून त्यांच्यावर शाई फेकली गेली त्यावेळचा त्यांचा थयथयाट हास्यास्पद होता. हरविंदसिंग कौर नावाच्या एका माथेफिरूने शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांच्या कानाखाली वाजवली होती. मात्र पवारांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्याला माफ केले होते. पवार आणि पाटील यांच्या वृत्तीतील फरक यात दिसून येतो. म्हणूनच चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांवर अजितदादांनी तुटून पडणे अपेक्षित होते.
एकंदरीत काय तर ‘नेमेची येतो पावसाळा’ याप्रमाणे हे अधिवेशन आले, गेले. यातून सामान्य माणसाच्या भल्याचे काही झाल्याचे दिसत नाही. भाजपासमर्थक अजितदादा पवारांच्या सहकार्याने सरकारचे हे ‘अनिर्णित अधिवेशन’ याच शब्दात त्याचे वर्णन करावे लागेल.
- घनश्याम पाटील
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक 'अजिंक्य भारत' 
पूर्वार्ध दि. 31 डिसेंबर 22, उत्तरार्ध दि. 1 जानेवारी 23)

Wednesday, December 21, 2022

संपले इलेक्शन, जपूया रिलेशन!

ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण मुंबईतल्या स्टुडिओत बसून वाहिन्यांचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक करत आहेत. त्यांनी कधी तरी ग्रामीण महाराष्ट्र बघितला, अनुभवला पाहिजे. एखाद्या गावातली निवडणूक कशी होते हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला पक्ष, गट, तट असे काहीही बघितले जात नाही. जुनी उणीदुणी काढली जातात. जुने हिशोब फेडले जातात. भावकी सांभाळली जाते. या सगळ्या पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात. त्यामुळे भाजपला इतक्या जागा आल्या, महाविकास आघाडीला इतक्या आल्या, शिंदे गटाला इतक्या मिळाल्या असं जे मांडलं जातंय ते गंमतीशीर आहे.
 
मुळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. अनेक तालुक्यात, अनेक गावात एकाच आमदाराचे दोन-तीन गट असतात. ते एकमेकांविरूद्ध लढतात. त्या गटांपैकी कोणीही निवडून आले तरी तो ‘माझीच लोकं निवडून आली’ म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतो. इतर निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणूक यात प्रचंड तफावत आहे.

सध्या सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जातो. भाजपाचे या मागे काही आखाडे आहेत. समजा एक हजार लोकवस्तीचे गाव आहे. त्यातील शंभर ते दीडशे माणसं भाजप, आर.एस.एस.ला मानणारी आहेत. या गावात सरासरी 60% मतदान झालं तर सहाशे जण मतदान करतील. त्या गावात तीन ते चार उमेदवार असतील तर जिंकणार्‍याला दोनशे मते खूप झाली. भाजपची दीड-दोनशे मतं पक्की असतात. मग भाजप इथून उमेदवार देताना हिशोबीपणा दाखवतो. समजा ओबीसी आरक्षण असेल तर पन्नास-शंभर मते स्वत:च्या हिकमतीवर घेणारा उमेदवार दिला जातो. ओपनसाठीही हाच निकष असतो. मग त्याच्यामागे आपली मतदार संख्या उभी केली की भाजपचा सरपंच होतो. थेट सरपंच निवडीचं हे तंत्र भाजपच्या पथ्यावर पडणारं आहे. म्हणूनच अजित पवार जनतेतून सरपंच निवडीला विरोध करतात. त्यांचं म्हणणं आहे की, ‘मग मुख्यमंत्रीही असाच थेट जनतेतून निवडा!’
 
वॉर्डनिहाय निवडणुका झाल्या तर तिथं आपली माणसं कशी बसवायची, आरक्षित वॉर्ड कोणते ठेवायचे? ओपन कोणते ठेवायचे? यात काँग्रेस संस्कृतीत तयार झालेली मंडळी तरबेज आहेत. जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक घेताना काय दक्षता घ्यायची याचा अभ्यास आता अजित पवार आणि बाळासाहेब थोरात करत आहेत. यात फडणवीसांची एव्हाना पीएचडी झालीय.

आत्ताचे ग्रामपंचायतीचे निकाल बघितले तर तो एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का आहे.
विद्यमान आमदार स्वत:च्या मतदार संघातल्या ग्रामपंचायती मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी प्रयत्नशील असतात. निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य हीच भविष्यातली त्या आमदारांची मोठी ताकद असते.

सातारा जिल्ह्यात बाबाराजे भोसले यांच्या मतदारसंघात एकही ग्रामपंचायत इकडे-तिकडे झाली नाही. बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघात बारापैकी अकरा ग्रामपंचायती त्यांच्याकडे आहेत. स्थानिक आमदारांनी स्वत:च्या मतदार संघातल्या ग्रामपंचायती राखल्यात हे यातून दिसून येते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे जे आमदार राहिले ते बहुतेक नागरी भागातले आहेत. ग्रामीण भागातला एखाद-दुसरा आमदार तरी त्यांच्याकडे आहे की नाही याची शंका आहे. ग्रामीण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकही ग्रामपंचायत मिळणे अपेक्षित नव्हते. असे असतानाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ग्रामपंचायत सदस्यांची आणि सरपंचांची संख्या पाहता हा एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी हात सोडला तर काय करायचे, महाविकास आघाडीशी कसे लढायचे याचे त्यांचे नियोजन दिसत नाही. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातही भाजपाचा झेंडा दिमाखात फडकत आहे.

भविष्यात शिंदे गटातील लोकांचं संरक्षण करणं किंवा त्यांना वार्‍यावर सोडून देणं हे दोनच पर्याय भाजपच्या हातात आहेत. शिंदेंच्या सोबत गुहावटीत गेलेले चाळीस आमदार आपल्याला मिठी मारूनच बुडतील याचं फारसं आकलन चंद्रकांत पाटील  यांना नाही. महाराष्ट्रातल्या या सगळ्या परिस्थितीचं सगळ्यात चांगलं आकलन आजच्या परिस्थितीत एकाच नेत्याचं आहे. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस! शरद पवार यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राची नस ओळखणारा आणि पवारांना जमलं नाही त्याप्रमाणे सकारात्मक राजकारण करणारा हा नेता आहे. देवेंद्रजी पुढची पाऊलं कशी टाकतील याची त्यामुळंच उत्सुकता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक मोठ्या गावात दोन-तीन पारंपरिक गट आहेत. नेहमी त्यांच्यातच सत्तापालट होते. ही मंडळी सातत्यानं पक्षांतर करतात. त्यामुळं ग्रामपंचायतीच्या निकालातून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज बांधणं कठीण आणि धाडसाचं आहे. यातून प्राथमिक निष्कर्श एवढाच निघतो की, लोक शिंदे गटावरील रोष व्यक्त करत आहेत. संभाजीनगर ग्रामीण किंवा नाशिक अशा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचं कोणी राहिलं नाही. असं असतानाही उद्धव ठाकरे गटाकडे ग्रामपंचायती जात असतील तर ही शिंदे गटासाठी धोक्याची घंटा आहे. आत्तापर्यंत शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नावे ठेवून स्वत:चा बचाव करता येत होता. आता त्यांना यांच्याबरोबर लढतानाच दुसरीकडे भाजपकडेही लक्ष ठेवावं लागेल. हे शिंदे गटाला सहजी जमेल असं वाटत नाही. अशावेळी भाजपच्याच गळ्यात पडून बुडताना त्यांना वाचवणं शक्य नसल्यानं देवेंद्रजींना त्यांना सोडून द्यावं लागेल.

दुसरी गोष्ट म्हणजे इतर निवडणुकांप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीतही धनसत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. गावातल्या निवडणुकीतही नेते मंडळी सढळ हाताने पैसा खर्च करत आहेत. कोविडच्या काळात ग्रामस्थांनी ज्यांना ‘गावात येऊ नका’ असं सांगितलं होतं त्यांच्यासाठी आता ‘मतदानाला या’ म्हणून गाड्या पाठवल्या गेल्या. यातले काही शहरी लोकही  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहिले. त्यांनीही इर्षेने प्रचार केला. या काळात गावागावातून आबकारी कर किती मिळाला आणि मद्यविक्री किती वाढली हे ही तपासून पाहिले पाहिजे. ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंतची याबाबतची माहिती घेतली तर निश्चितपणे डोळे फिरतील.
 
सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्श म्हणजे जिथे ओपनची जागा होती तिथे जास्त आर्थिक उलाढाली झाल्या. जिथं पुरूषांसाठी सरपंचपद ओपन होतं तिथं पुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भविष्यात विकास होईल किंवा होणार नाही पण तिथं लोकांना दणकून पैसे मिळाले. पुढे पाच-पन्नास वर्षे आपल्याला संधी मिळणार नाही हे गृहित धरून या निवडणुका लढल्या गेल्या. विशेषत: या ओपनच्या जागेतून ब्राह्मण समाजाने निवडणुका लढल्या नाहीत. बहुसंख्य ठिकाणी मराठ्यांनीच निवडणुका लढल्या आणि पैशांचा पूरही वाहिला. स्वत:च्या जमिनी विकून ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढणारी लोकं आजही आपल्याला दिसतात. हे सगळे बदल आपण कसे स्वीकारणार आहोत? ते बघितलं पाहिजे.
 
‘तरूणांच्या हाती सत्ता द्या’ असं आपण म्हणतोच पण ग्रामपंचायत निवडणुकीत अजून हे मिश्र स्वरूप आहे. काही ग्रामपंचायतीत ठरावीक तरूण असले तरी बर्‍याच ठिकाणी चाळीशीच्या पुढचे लोक आहेत. वीस ते तीस वयाच्या तरूण-तरूणींच्या हातात ग्रामपंचायती देण्याची वेळ आली आहे. जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरूणी महाराष्ट्रात येऊन सरपंच बनली आहे. यशोधरा महिंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील वड्डी गावची सरपंच बनली आहे. अशा तरूणाईला बळ देत त्यांचं नेतृत्व तिथं उभं केलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थात वर्षानुवर्षे काम केलेल्या शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस यांनी इकडे लक्ष घातलं पाहिजे. चंद्रपूरमध्ये राहून ग्रामीण विदर्भ सांभाळणार्‍या सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत लक्ष घालून आग्रही राहिलं पाहिजे.

इतकं सगळं घडूनही मुक्ताईनगर कार्यक्षेत्रातील बहुतेक ग्रामपंचायती एकनाथ खडसे यांनी घेतल्यात. या निवडणुकीत हे सगळे बदल आपण अनुभवले. गावपातळीवरचे हे राजकारण मानणारा एकही लेखक, नाटककार आजघडीला पुढे येत नाही. किंबहुना बहुतेक वृत्तवाहिन्या त्याचे वृत्तांकन जबाबदारीने करत नाहीत याची खंत वाटते. एखादा ओबीसी समाजातला माणूस दारूचे दुकान चालवत असेल तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणूनच त्याला उमेदवारी दिली जाते. कोणताही पक्ष याला अपवाद नाही. हे सगळं आपण अचूकपणे टिपलं पाहिजे.
 
बदलत्या ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल तर ग्रामपंचायती भक्कम व्हायला हव्यात. राज्यशासनाकडून ग्रामपंचायतींना थेट भरीव निधी दिला जायला हवा. ग्रामपंचायतींना स्वत:चे उद्योग निर्माण करता यायला हवेत. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जमिनींचा वापर त्यांना करण्यासाठी सरकारने त्यांना बळ द्यावे. ग्रामपंचायती स्वयंपूर्ण झाल्या तर देशच बदलेल. या निवडणुकीचा अन्वयार्थ इतकाच की मराठी माणसाकडे कितीही पैसा आला, त्याने उपजिविकेसाठी गाव सोडले तरी त्याला गावात येऊन निवडणूक लढवावीशी वाटते. यातून सामाजिक प्रतिष्ठा मिळेल असे त्याला अजूनही वाटते. म्हणूनच तो मोठमोठ्या उठाठेवी आणि उलाढाली करतो.

जाताजाता व्यवस्थेचे डोळे उघडण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते. अनेक तालुक्यातील अनेक गावात बांगलादेशी नागरिक आले आहेत. लोकांनी शेतकामासाठी किंवा पोल्ट्री फार्मवर बांगलादेशी जोडपी कामाला ठेवली आहेत. कन्नड मजुरापेक्षा हे लोक कमी पैशात काम करतात. मतदार वाढविण्यासाठी या लोकांना रेशनकार्ड, आधारकार्ड काढून द्यायचे असे प्रकार घडत आहेत. शहरी भागातील हे लोण ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आलंय. गृहखाते सांभाळणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. हे असले उद्योग सर्वपक्षीयांनी केले आहेत. या स्थलांतरितांच्या नोंदी मतदारयाद्यात केल्या जात आहेत. असे उद्योग करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कमालीचे दडपण आहे. त्यांच्या रहिवासाचे खोटे पुरावे तयार केले जात आहेत. याची गंभीर दखल घेतली गेली नाही तर लवकरच ही मंडळी स्थानिक भूमिपुत्रांना बाजुला सारून या निवडणुका लढण्याचं आणि जिंकण्याचंही धाडस करतील.

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बदलते, सामाजिक स्तर मात्र आहे तसाच दिसतोय. बर्‍याच ठिकाणी राखीव जागेतून महिला निवडून आली तरी नवराच सगळी कामे करताना, सत्ता उपभोगताना दिसतो. काही ठिकाणी मात्र विशी-बावीसीतल्या मुली डोळ्यावर महागडा गॉगल, जीन्स-टी शर्ट घालून सरपंचदाच्या खुर्चीवर बसलेल्या दिसतात. हे असे आश्वासक चित्र वाढायला हवे. राजकारण होत राहील मात्र या सगळ्या व्यवस्थेत तरूणांना प्राधान्य दिले गेले तर गावाच्या विकासात आमूलाग्र बदल जाणवतील. ‘इलेक्शन संपले तरी रिलेशन संपू नयेत’ असे आपल्या पूर्वसुरींनी सांगून ठेवले आहे. ते सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.
घनश्याम पाटील
7057292092

Monday, December 19, 2022

मराठीचे मारेकरी

मराठी साहित्यात जे लेखक लिहितात त्या लेखकांच्या कलाकृतींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात. विविध साहित्यप्रकारातील हे पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित लेखक किंवा प्रकाशकांना सरकारकडे अर्ज करावा लागतो. अशा अर्ज करून आलेल्या पुस्तकांपैकी त्यांची योग्यायोग्यता पाहून परीक्षक पुस्तकांची निवड करतात. यावर्षी जे पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यातील अनुवादाच्या पुरस्कारासाठीचे पुस्तक नक्षलवादाचे समर्थन करणारे आहे, असे म्हणत शासनाने जाहीर केलेला पुरस्कार रद्द केला. मग पुरोगामी गँग सक्रिय झाली आणि त्यांनी सरकारचा निषेध म्हणून पुरस्कारवापसी सुरू केली. काहींनी त्यांना मिळालेले पुरस्कार घेणार नसल्याचे कळवले तर काहींनी त्यांच्याकडे असलेल्या साहित्यिक समित्यावरील राजीनामे दिले. मुळात स्वतः अर्ज करून मिळवलेले हे पुरस्कार परत करण्यात कसली मर्दुमकी आलीय? आणि जे विविध साहित्य समित्यांचे राजीनामे देत आहेत त्यांची तशीही हकालपट्टीची वेळ आलेलीच होती. सरकारने बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या आधी यांनी हे निमित्त करून बाहेर पडणे योग्यच आहे. निदान यामुळे तरी काही नव्या, कार्यक्षम लोकांना या ठिकाणी संधी मिळून आपली कर्तबगारी सिद्ध करता येईल. त्यामुळे जे बाहेर पडत आहेत त्यांचे नागरी सत्कार व्हायला हवेत.

लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समितीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी मंत्र्यांकडं जोडे झिजवले होते. त्यानंतर सरकार बदललं. मग पुढच्या नेमणुका करता याव्यात यासाठी स्वाभिमानानं बाहेर पडणं अपेक्षित असताना शासनाच्या विरोधी भूमिका घेत राजीनामा देणं म्हणजे ‘आपण कसे महान आहोत’ हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. फक्त राजीनामा देऊन न थांबता त्यांनी मसापला विचारले आहे की, ‘‘तुम्ही मिंधे का? मी एक दगड भिरकावलाय आता तुम्ही पुढे या!’’

महाराष्ट्र साहित्य परिषदेने 116 वर्षाच्या इतिहासात एकही पुरस्कार मागे घेतलेला नसताना त्यांना मिंधे ठरविणारे लक्ष्मीकांत देशमुख कोण? एखाद्या व्यक्तिने भूमिका घेणे आणि संस्थेने भूमिका घेणे यातील फरक लक्षात घ्यायला हवा. उजव्या विचारधारेच्या लेखकाच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर डावे विरोध करतात. डाव्यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर उजवे नाराज होतात. मात्र साहित्य परिषद त्याला कधीही बधलेली नाही. सरकार दरबारी पदासाठी खेटे घालणार्‍यांनी मिंधेपणाची भाषा इतरांना शिकवूच नये.
 
आपण शेण खाल्ल्यावर इतरांनीही ते खावे हा पुरोगामी दुराग्रह कशासाठी? मसापच्या पदाधिकार्‍यांनी आजवर अनेकदा तुमच्यापेक्षा ठाम भूमिका घेतलेल्या आहेत. ज्या देशमुखांनी आयुष्यभर सरकारची चाकरी केली, आयएस अधिकारी म्हणून मंत्र्यांसमोर टाचा घासल्या, माना झुकवल्या ते निवृत्त झाल्यावर मतपत्रिका गोळा करून लोकशाहीविरोधी भूमिकेतून संमेलनाध्यक्ष झाले. त्यासाठी त्यांनी काय काय केलं हे आम्ही सांगावं का?
इतकं सगळं करून बडोद्याच्या संमेलनात ते मानभावीपणे व्यासपीठावरून सांगतात, ‘राजा तू चुकलास!’ ज्या राजाच्या जिवावर तुम्ही आयुष्यात सगळं केलं त्या राजाला निवृत्तीनंतर ‘तू चुकलास’ असं सांगताय! हेच जर पदावर असताना सांगितलं असतं तर तुमची देशमुखी दिसली असती.

महाराष्ट्र साहित्य परिषद ही एक स्वायत्त संस्था आहे. ती कुणाला मिंधी नाही. ती राजाश्रयावर चाललेली नाही. मसाप रसिकाश्रयावर चालते. या संस्थेनं आजवर कुणाचं मिंधेपण स्वीकारलंय किंवा कुणाच्या आश्रयाला गेलीय असं दिसलं नाही. वाचक आणि रसिकांशिवाय साहित्य परिषद कुणाच्या दारात गेली नसल्यानं त्यांनी काय करावं हे देशमुखांसारख्या आणखी कुणाला सांगायची गरज नाही. परिषदेला राजकारणाशी, विचारधारेशी देणंघेणं नाही. शरद पवार पंतप्रधान झाले तरी मराठी माणूस म्हणून परिषदेला अभिमान वाटेल किंवा नितीन गडकरी पंतप्रधान झाले तरी हे मराठमोळं नेतृत्व सर्वोच्चपदी पोहोचलं म्हणून समाधान असेल. परिषदेला समोरचा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या वंशाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे याच्यात स्वारस्य नाही. तो मराठी माणूस आहे, भाषाप्रेमी आहे इतकंच पुरेसं आहे. अशा सोयीस्कर भूमिका आपले काही लेखकच घेऊ शकतात.

पुरस्कार परत घेण्यावरून परिषदेनं भूमिका घ्यावी असं देशमुखांना वाटतं. ज्यांनी अर्ज करून पुरस्कार घेतलेत त्यांच्याबाबत परिषदेनं काय भूमिका घ्यावी? ज्या ‘अर्जदारांनी’ पुरस्कार पदरात पडावा म्हणून प्रयत्न केले त्यांनी सांगू नये ‘मी पुरस्कार परत करतोय’ किंवा ‘राजीनामा देतोय!’ ज्यांनी अर्ज करून पुरस्कार स्वीकारलेत त्यांना तो परत करण्याचा अधिकार नाही. अगदीच वाटलं तर त्यांनी सरकारकडे तसा अर्ज करावा की ‘माझा पुरस्कार परत घ्या!’ त्यांची ती विनंती मान्य करायची की नाही हा सरकारचा अधिकार आहे. केवळ चमकोगिरी करण्यासाठी हे लेखक दुटप्पीपणा करत आहेत.

साहित्य आणि कला शासनदरबारी कायम दुर्लक्षित असते. एखाद्या नेत्याच्या घराकडे जाणारा रस्ता तातडीनं केला जातो. नाशिकमध्ये मुंबईहून येणारा उड्डाणपूल थेट छगन भुजबळांच्या घराजवळ थांबवला जातो. साहित्यिक उपक्रमासाठी मात्र सरकारकडे कसलीही तरतूद नसते. देशमुख अशा विषयांवर बोलणार नाहीत. सरकार कोणतंही असेल यात फार फरक नसतो. मनोहरपंत मुख्यमंत्री असताना पु. ल. देशपांडे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मान देण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘हे युतीचे सरकार लोकशाहीविरोधी आहे’ अशा आशयाचं विधान केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘झक मारली अन याला पुरस्कार दिला!’ तेव्हा सरकारी चाकरीत असलेले देशमुख याविषयी काही बोलल्याचं स्मरत नाही.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज असलेल्या डॉ. सदानंद मोरे यांनीही नेहमीप्रमाणे बोटचेपी आणि सोयीस्कर भूमिका घेतली आहे. ‘मी पदावर असल्यानं बोलू शकत नाही’ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना कोणीतरी सांगायला हवं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सुवर्णमुद्रा दिल्यानंतर त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या होत्या. श्री संत तुकाराम महाराज राज्यकर्त्यांचे भाट नव्हते. त्यामुळे त्यांनी तो नम्रपणा दाखवला. आजकालचे लेखक सरकारपुढे चापलुसी करत पुरस्कार घेतात आणि पुन्हा त्यावरून सरकारलाच ट्रोल करतात. आपल्याकडील पद टिकवण्यासाठी सरकारपुढे लाचारी करणारे सदानंद मोरे आणि आपले पद जाणार हे माहीत असताना आपण किती स्वाभिमानाने राजीनामा देतोय हे दाखवणारे लक्ष्मीकांत देशमुख हेच आजच्या व्यवस्थेचे नागडे वास्तव आहे. एखादे पद मिळावे, एखादा पुरस्कार मिळावा, आपले साहित्य अभ्यासक्रमात लागावे यासाठी लाळघोटेपणा करणारे साहित्यिक मराठी भाषेचे मारेकरी आहेत. त्यामुळेच सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, त्यांचे वारसदार नाहीत हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध झाले. हरी नरके, सदानंद मोरे हे ज्यांचं सरकार आहे त्यांच्याशी जमवून घेतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला काही अर्थ राहत नाही. तरीही त्यांचा सोयीस्कर ढोेंगीपणा अशा प्रकरणात सिद्ध होतोच. कोणतेही सरकार असू द्या, महत्त्वाच्या पदावरील खुर्च्या अडवायला हे महाभाग कायम तत्त्पर असतात.

बरं, या अशा पुरस्कारांनी लेखक फार मोठा होतो असेही नाही. आजवर ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांनी भविष्यात आणखी काही मोठं योगदान दिलंय असंही दिसत नाही. मग इतकी हुजरेगिरी कशासाठी? या कणाहीन मराठी लेखकांचे ढोंग वाचकांनी ध्यानात घ्यायला हवे. महाकवी कालिदास, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी अशा कोणालाही सरकारी पुरस्काराची गरज वाटली नाही. शेक्सपिअर कोणत्या पुरस्काराने मोठा झाला नाही. एकही पुरस्कार न मिळालेल्या जगदगुरू तुकाराम महाराजांनी जे लिहिलं ते बघा. आज महाराष्ट्रातलं एकही गाव नसेल जिथे तुकाराम महाराजांच्या चार ओळी रोज कुणा न कुणाच्या ओठात नसतील. किंबहुना सामान्य वाचकांचाही या पुरस्काराशी, असल्या राजकारणाशी काडीमात्र संबंध नसतो.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी स्तंभलेखन या साहित्यप्रकाराचा परीक्षक म्हणून मी काम केले. त्यावेळी मी प्रखर हिंदुत्त्वादी विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे गुरूजींच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाची निवड केली होती. आज शासनाने हा पुरस्कार मागे घेतला म्हणून थयथयाट करणारे त्यावेळी साहित्य परिषदेवर शेवडे गुरूजींचा पुरस्कार परत घ्या म्हणून दबाव आणत होते. विश्वंभर चौधरी, हरी नरके, संजय आवटे अशा अनेकांचा त्यात पुढाकार होता. त्यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे आणि कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे माझ्या पाठिशी ठामपणे राहिले. त्यांनी असा पुरस्कार परत घेण्याचा पराक्रम केला नाही. कोणत्याही राष्ट्रविरोधी शक्तिंचा पुरस्कार आम्ही करणार नाही याचा त्यांना विश्वास असल्यानेच त्यांनी परीक्षक म्हणून आमची निवड केली होती.

राज्य शासनाकडे प्रत्येक साहित्यप्रकारात दरवर्षी पुरस्कारासाठी किती अर्ज येतात? अशा अर्ज करून आलेल्या पुस्तकांपैकी किती पुस्तके परीक्षकांकडे दिली जातात? ती वाचण्यासाठी त्यांना किती वेळ मिळतो? वाचल्यानंतर ते आपला निर्णय कोणत्या निकषांवर देतात? हे जाहीर व्हायला हवे. इतकेच नाही तर या परीक्षकांची नावेही जाहीर व्हायला हवीत. त्यात कसली गोपनीयता आलीय? एखाद्या गंभीर प्रकरणाचा खटला सुरू असतानाही आरोपी आणि फिर्यादी यांना न्यायाधीश कोण ते माहीत असते. मग स्वाभिमान जागा असलेल्या अशा समीक्षकांना घाबरण्याचे काय कारण? तुम्ही योग्य न्यायनिवाडा करत असाल तर तुमचे नाव जाहीर व्हायलाच हवे.

देशमुख म्हणतात, साहित्य परिषद मिंधी का? उलट त्यांनी लक्षात घ्यायला हवे की परिषद अतिशय तटस्थपणे पुरस्कार वितरण करते. त्यामुळे असे गोंधळ यापुढे व्हायचे नसतील तर राज्य शासनाकडे आलेल्या अर्जातून पुरस्कारांसाठी निवड करण्याचे अधिकारही सरकारने महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या मातृसंस्थेकडे द्यावेत. तसे झाले तर ही निवड आणखी पारदर्शक होईल. लक्ष्मीकांत देशमुख आणि गँगचा थयथयाट त्यांच्या पवारप्रेमात आहे हे न समजण्याइतका मराठी माणूस लेचापेचा नाही. देशमुख, ‘राजा तू चुकलास’ असे सांगताना एक गोष्ट लक्षात घ्या की खरंच काही चूक झाली असेल तर असे पुरस्कार परत घेऊन ती चूक दुरूस्त करता येते पण तुमच्यासारखे लोक केवळ आपल्या विरूद्ध विचारधारेच्या सरकारला बदनाम करायचे म्हणून असे स्वार्थांधपणे वागत असतील तर मराठीचे मारेकरी म्हणून इतिहासात तुमच्या नावाची नोंद होईल.
- घनश्याम पाटील

चपराक प्रकाशन, पुणे
7057292092

Saturday, December 10, 2022

साहित्य स्वानंदातून मिळालेली 'ज्योती!'

माझ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची माहिती नाही, माझी जात, धर्म, पंथ माहिती नाही. मी दिसतो कसा, बोलतो कसा याचाही फेसबुकवरूनच अंदाज घेतलेला. आमची दोघांची किंवा आमच्या दोघांच्या घरच्यापैकी एकमेकांची कुणाचीही एकदाही भेट नाही. गेला बाजार आम्ही कधी एकमेकांना व्हिडीओ कॉलवरही बोललो नाही... तीन-चार वेळा व्हाट्सअ‍ॅपवर बोलणं झालं होतं तेही ‘चपराक’च्या अनुषंगानं! म्हणजे तिचा मला मेसेंजरवर एसएमएस आला तर मी लहरीनुसार चार-दोन दिवसांनी उत्तर द्यायचो. मी उत्तर दिल्यावर ती एक-दोन दिवसांनी त्याला प्रतिउत्तर द्यायची.

...असं सगळं असताना एके दिवशी अचानक तिनं मला व्हाट्सअ‍ॅपवरच लग्नाची मागणी घातली. ‘लग्न केलं तर तुमच्याशीच’ हेही निक्षून सांगितलं. माझं थोडंफार लेखन तिनं वाचलं होतं आणि त्यावरच इतका मोठा ‘धोका’ स्वीकारला होता. तिनं मला माझ्याविषयी थोडं विस्तारानं विचारलं होतं. मी माझ्या आळशी स्वभावाप्रमाणं तिला मित्रवर्य महादेव कोरे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्‍या ‘साहित्य स्वानंद’ दिवाळी अंकातील ‘राहिलेलं राहूच द्या’ हा लेख पाठवून दिला. या लेखानं एखाद्या प्रेमपत्राप्रमाणं किमया केली आणि तिच्यावर गारूड घातलं. तिनं सांगितलं, ‘यातली तुमची राहून गेलेली एक तरी गोष्ट मला पूर्ण करायची आहे. आजवर माझ्यासाठी अनेक स्थळं आलीत पण दिवसभर काम करून नवरा घरी आल्यानंतर किंवा मी बाहेरून घरात पाऊल टाकल्यावर ज्याच्याविषयी आदर वाटावा असं स्थळ आलं नाही. ते मला तुमच्यात दिसतंय. तुम्ही जसे आहात तसे मला माझे वाटता...’

का ते अजूनही सांगता येणार नाही पण मीही भारलेल्या अवस्थेतच तिला होकार दिला. माझ्यासाठी आदरणीय असलेल्या माझ्या यशोदामैय्याशी मी याबाबत चर्चा केली. त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केल्यानं त्यांचा सल्ला मोलाचा होता. मी लग्न करण्यासाठी तयार आहे या बातमीनंच त्या आनंदविभोर झाल्या. मग मी निश्चिंत मनानं तिला कळवलं, ‘प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं मी आजपासून तुला पत्नी म्हणून स्वीकारत आहे. यानंतर आपली भेट होईल, पुढचं काय ते ठरेल. ती केवळ औपचारिकता. मी तुला मनानं स्वीकारलंय. माझ्या आईविषयी माझ्या मनात जसा आणि जितका आदर आहे तसं आणि तितकंच प्रेम तुझ्यावर असेल...’

दुसर्‍या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 2021 ला तिचे आईवडील आणि भावाशी माझं बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं, ‘तुमच्या मुलीनं मला लग्नासाठी प्रपोज केलंय. आम्ही दोघे किंवा आपण कुणीही भेटलो नाही, बोललो नाही. गेली वीस वर्षे माझा संघर्ष सुरूच आहे. तो आयुष्यभर तसाच राहील. माझी संस्था माझ्यासाठी सर्वस्व आहे. ‘चपराक’ हे माझं पहिलं प्रेम असेल. चपराकची सवत म्हणून माझ्या आयुष्यात तुमची मुलगी असेल. माझ्या गुणदोषासह मला स्वीकारणं तुम्हाला जमणार आहे का?’

त्यापूर्वी तिनं त्यांना माझ्याविषयी कल्पना दिली होती. ‘चपराक’चे अंकही तिच्या घरात गेलेले होते. तिच्या आईला श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध वर्गात ‘चपराक’ मिळालेला होता. त्याहून मोठी गंमत म्हणजे त्या कण्हेरी मठाच्या प. पू. काडसिद्धेश्वर स्वामींच्या अनुयायी आहेत. गेल्या वर्षीच्या चपराक दिवाळी अंकात मी स्वामीजींची सविस्तर मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आणि स्वामीजींसोबतचा माझा फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची दक्षता माझ्या होणार्‍या बायकोनं घेतली होती. ते पाहताच त्यांना विरोध करण्याचं काही कारण बाकी नव्हतं.

दुसर्‍या दिवशी फोनवर बोलून आम्ही लगेचच चौथ्या दिवशीचा आमच्या साखरपुढ्याचा मुहूर्त काढला. ती म्हणाली, ‘पुण्यात माझे मामा असतात. आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करू!’

मी म्हणालो, ‘मुलगी म्हणजे भाजीपाला नाही. माझ्यासारख्या फकिरासोबत तुला लग्न करावं वाटतंय यातच सगळं आलं. माझी काही पुस्तकांची धावपळ सुरू आहे. लग्नदिनी आपण मंगल कार्यालयातच भेटू! माझं लेखन तू वाचलंय. तुझं लेखन मी बघितलंय. मी जात-धर्म मानत नाही. शारीरिक सौंदर्य चिरकाल टिकत नाही. मनाच्या सौंदर्यावर, कर्तृत्वावर माझा विश्वास आहे.’

ती वैमानिक शास्त्राची अभ्यासक. एरॉनॉटिकल इंजिनिअर म्हणून बंगळूरूत काम केलेलं. तिची ‘कॅलिबर कंटेट’ ही संस्थाही कोल्हापूरात कार्यरत होती. उत्तम गीतकार आणि कवयित्री म्हणून मी तिच्याकडे बघायचो. आम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केल्यानंतरचा तो मोरपंखी दिवस... तिनं तातडीनं तिच्या कार्यालयात या घडामोडी कळवल्या. केवळ चार दिवसांनी साखरपुडा होणार म्हणून लगबगीनं सर्वांचा निरोप घेतला. ज्या एका प्रकल्पावर काम सुरू होतं ते लॅपटॉपवर पूर्ण करून पाठवेन असं तिनं तिच्या वरिष्ठांना सांगितलं. सगळंच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असलं तरी आनंददायी होतं. त्यामुळं कसलीही अडचण आली नाही. ती बेंगळूरूहून कोल्हापूरला निघाली. बेळगाव येईपर्यंत आमचं एकमेकांविषयी बोलणं सुरू होतं.

...रात्र सरली. सकाळ झाली. कोल्हापूर आलं. मी म्हटलं ‘मी थोड्या वेळानं आवरून फोन करतो. तोपर्यंत तुही घरच्यांना सगळं सांग.’ साडे-अकरा बाराला मी पुन्हा फोन केला. तिला म्हटलं, ‘मी प्रकाशक, पत्रकार! रिकामा डामडौल मला आवडत नाही. अनावश्यक उधळपट्टी तर नाहीच नाही. समाज काय म्हणतो हे मला कधीच महत्त्चाचं वाटलं नाही. आपण लग्न केलं तरी ते अतिशय साधेपणानं करणार आहोत. कोर्ट मॅरेज! त्यासाठी जेमतेम दहा-पंधरा स्नेही उपस्थित असतील. साखरपुड्यासाठी मात्र माझ्या घरचे आणि कार्यालयातले असे दहा-पंधरा जण येत आहेत. तुमच्या घरचेही तितकेच लोक असावेत. आताच कोविडचा काळ संपलाय. त्यातून आपण बाहेर पडतोय. मग वेळेचा आणि पैशाचा असा अनावश्यक उपयोग करण्याऐवजी आपण लग्नच का करू नये?’

ती म्हणाली, ‘माझ्याही मनात हे आलं होतं! पण आज 23 तारिख. दोनच दिवस हातात राहिले. इतक्यात सगळं होईल का?’

तिला म्हटलं, ‘आपल्याला कोण विचारणार आहे? जसं होईल तसं करू! तुझ्या घरच्यांना विचार.’

त्यांनीही आनंदानं सहमती दिली. माझ्या आईबाबांना तर गगन ठेंगणं वाटत होतं.

24 तारखेला माझी यशोदामैय्या सौ. शुभांगी गिरमे, आमच्या परिवाराच्या ज्येष्ठ सदस्य सौ. चंद्रलेखा बेलसरे, रवींद्र कामठे काका, माधव गिर सर आणि जिगरी यार प्रमोद येवले अशा सर्वांची एक छोटीशी बैठक झाली. माझी ताई, आई आणि भाच्या यांना कपडे खरेदीला पिटाळलं. गिरमे, बेलसरे, कामठे, गिर, प्रमोद आणि मी दागिणे खरेदी करायला गेलो. तिकडे कळवलं, ‘मुलीचे कपडे, अंगठी तिकडेच घ्या. मुलाचे कपडे, अंगठी आम्ही इकडे घेऊ! म्हणजे आवड, माप अशा अडचणी येणार नाहीत.’ दोन तासात आमची सगळी खरेदी उरकली आणि आम्ही कार्यालयात येऊन पुस्तकाच्या कामात गढून गेलो. 26 डिसेंबरला लग्न होतं. त्या दिवशी रविवार असला तरी सुटी घ्यावी लागणार होती. समोर कामं तर खूप पडली होती. मग 25 ला मध्यरात्रीपर्यंत मी काम करत होतो. तिकडे तिनेही अचानक नोकरी सोडल्याने जो प्रकल्प अर्धवट राहिला होता तो मध्यरात्रीपर्यंत पूर्ण केला. त्यांना तो पाठवला. दोघांचंही काम पूर्ण झाल्याचं आम्ही एकमेकांना कळवलं आणि दुसर्‍या दिवशीची वाट पाहू लागलो.  

रविवारी आईवडिलांसह घरातले पाच-सात सदस्य आणि कार्यालयातले बारा-पंधरा सहकारी अशा वरातीसह आम्ही श्री क्षेत्र नृसिंहवाडी गाठली. गाडीवरील ‘चपराक’ ही अक्षरे पाहून एक गृहस्थ जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, ‘मी मुलीचा बाबा!’

मंगल कार्यालय परिसरात आमची नजरानजर झाली आणि बोहल्यावर थांबल्यावर आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष बघितलं. कसलाही थाटमाट न करता, अतिशय साधेपणानं आमचं लग्न झालं. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ऐनवेळी काही लेखक आले. माझा आवडता युवा कवी प्रशांत केंदळे यांना त्याच दिवशी एक महत्त्वाचा पुरस्कार होता. त्यासाठी त्यांना नागपूरला जायचं होतं. अचानक माझ्या लग्नाची ही बातमी कळल्याने आदल्या रात्री ते पुण्यात आले. रवींद्र कामठे काकांच्या घरी त्यांनी मुक्काम केला आणि पुरस्कार समारंभ टाळून तेही लग्नाला आवर्जून उपस्थित राहिले.

त्यांचा ‘गुलमोहराचं कुकू’ हा संग्रह ‘चपराक’नं प्रकाशित केलाय. त्यातील हीच शीर्षककविता मला अतिशय आवडते. प्रशांतदादांनी मंगल कार्यालयात लग्नस्थळी मंगलाष्टक म्हणून हीच कविता गाऊन सादर केली. एका आवडीच्या कवितेच्या साक्षीनं आम्ही एकमेकांना माळा घातल्या.  

आजच्या काळात अविश्वसनीय वाटेल असा हा पाच दिवसातला घटनाक्रम. तिला बेंगळुरूहून लग्नासाठी कोल्हापूरला यायचं म्हणून ती त्या चार दिवसात दिवसरात्र कार्यरत होती. अचानक जॉब सोडल्यानं सगळ्या गोष्टींची तिला पूर्तता करावी लागणार होती. लग्नाच्या आदल्या रात्री बारा-साडेबारापर्यंत आम्ही आपापलं काम पूर्ण करत होतो. रविवारी लग्न झालं आणि सोमवारी मी कार्यालयात होतो. इतकंच नाही तर अंगावरची हळदही उतरलेली नसताना अवघ्या चार दिवसात मी बीड जिल्ह्यात चौथ्या एकता साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून गेलो... ते सगळं पाहून काहींनी प्रश्न उपस्थित केले. ‘समाजमाध्यमावरून झालेली अशी लग्नं फार काळ टिकत नाहीत’ हेही स्पष्टपणे कळवायचा अगोचरपणा केला. त्या सगळ्याकडं दुर्लक्ष करत आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत. दोघांचंही विश्व वेगळं असं राहिलंच नाही. आमच्यात जी एकरूपता साधलीय ती कमालीची आश्चर्यकारक आहे.

हे सगळं सांगण्याचं कारण आम्ही फार काही वेगळं केलंय हे नाही. साहित्य माणसाला मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा यासह योग्य जोडीदार देतं हे सांगणं मात्र आहे. यासाठी कारणीभूत ठरला तो ‘साहित्य स्वानंद’चा दिवाळी अंक. दिवाळी अंकातील एक लेख काय करू शकतो? असं मला कोणी विचारलं तर मी आनंद आणि अभिमानानं सांगू शकतो की, ‘बाबा रे, एक लेख आपला संसार उभा करतो.’

एकमेकांना समजून घेत आमचा संसार सुखात चाललाय. येत्या 26 डिसेंबरला आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल.

...आणि हो,

आमच्या दोघात आता तिसर्‍याची गोड चाहूलली लागलीय बरं! आमच्या पहिल्या लग्नदिनाला आमच्या दोघांसोबत तिसराही असेल. आमचे उमेश सणस सर मला नेहमी गंमतीनं म्हणायचे, ‘संपादक महोदय, लवकर लग्न करून हिंदुंची लोकसंख्या वाढवा...’

‘कधीच लग्न करायचे नाही,’ या निश्चयाचा डोलारा सपशेल आपटला असून सणस सरांची ही इच्छा आम्ही पूर्ण केली आहे.

जीवन खरंच खूप विलक्षण आहे. आयुष्यात कसे आणि काय बदल होतील हे कोणीही सांगू शकणार नाही.

माझ्यावर अमाप प्रेम करणारी माझी प्रिय बायको, माझी सच्ची मैत्रिण तिच्या क्षेत्रात तळपत आहे. आमच्या ‘लाडोबा’ या बालकुमारांच्या मासिकाची ऑनलाईन संपादक म्हणून काम पाहतानाच ती सहायक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत योगदान देत आहे. लवकरच प्रदर्शित होणार्‍या ‘मुगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या सिनेमात गीतकार म्हणून ती झळकतेय. तिची गाणी ऐकताना माझं मन प्रफुल्लित होतं. बालपणापासून आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं आणि तारूण्यात आवडीच्या क्षेत्रातच कार्यरत असलेली जीवनसाथी मिळणं ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.

तिचं नाव ज्योती! ती तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश सर्वत्र पेरत आहे. अशावेळी तिला माझं एकच सांगणं आहे, तू मनासारखं जग, हवं ते कर, आभाळासारखी विशाल हो! बस्स! मला आणखी काय हवंय?

- घनश्याम पाटील
7057292092

ता. क. : ‘साहित्य स्वानंद’चा दिवाळी अंक हाती आला आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे 2 नोव्हेंबरला आमच्या परिवारात तिसरी सदस्य आली आहे. परमेश्वरानं एक गोड परी आमच्या घरी पाठवलीय. ‘यशदा’ असं तिचं नामकरण आम्ही केलंय.


Friday, December 9, 2022

'लिव्ह इन'सारख्या 'अनोख्या रेशीमगाठी'

ज्येष्ठ लेखक श्री. रवींद्र कामठे यांची ‘अनोख्या रेशीमगाठी’ ही महत्त्वपूर्ण कादंबरी नुकतेच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केली आहे. या कादंबरीची प्रस्तावना.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशभक्तिवरील अनेक कार्यक्रमांना उधाण आले आहे. ‘आम्हीच कसे देशभक्त!’ हे दाखवून देण्याची अहमहमिका तर कायम सुरूच असते. या सगळ्या वातावरणात आम्हाला प्रामुख्याने आठवतात ते गोपाळ गणेश आगरकर! ‘देशाला स्वातंत्र्य तर मिळेलच पण आधी समाजसुधारणा आवश्यक आहेत’ या त्यांच्या आग्रही प्रतिपादनाचा फारसा गांभिर्याने विचार झालाच नाही. तो झाला असता तर समाजात आज सररासपणे दिसणार्‍या कुप्रथा मोडीत निघाल्या असत्या.


एखादी व्यक्ती मोहाच्या झाडाखाली थांबली तर ती मद्यपिच आहे, या समजातून अनेकजण संबंधितांकडे पाहतात. अशा वातावरणात रवींद्र कामठे यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक मोहाच्या झाडाखाली बसून तल्लीनतेने बासरीवादन करतात आणि प्रसंगी गीतापठणही करतात. अशावेळी ‘लोक काय म्हणतील?’ असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यातील निर्मळता ते जपू आणि जोपासू शकतात. वेदांचा अभ्यास तर करूयाच पण वेदापेक्षा सामान्य माणसाच्या वेदना कळणे अधिक महत्त्चाचे आहे, अशा भूमिकेतून त्यांची मांडणी असते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखा नाजूक विषय पुढे आल्यास काही तथाकथित धर्मरक्षक नाक मुरडत असताना कामठेकाकांनी आगरकरांच्या सुधारणावादी भूमिकेतून या विषयाची मांडणी केली आहे. मुख्य म्हणजे कादंबरीच्या माध्यमातून हा विषय मांडताना त्यांनी भारतीय संस्कृतीतील सद्विचारांचेही जतन आणि संवर्धन केले आहे.

भारतीय जीवनव्यवस्थेत विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात, असा अनेकांचा समज आहे. इथल्या परिस्थितीनुसार अनेकदा या गाठी सैल होतात, काही वेळा तुटतात. अकाली अशा गाठी तुटून एकाकी असलेल्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. आपल्या समाजात आजही विधवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे, हे नागडे सत्य कोण नाकारणार? एखादा विधुर असेल तर त्यालाही त्याचे जीवन एकट्याने जगणे असह्य होते. काही वेळा एकटे असणे परवडते पण एकाकी पडणे म्हणजे दिव्यातील तेल संपल्यानंतर वातीने मिणमिणत राहिल्यासारखे आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याइतकीही संवेदनशीलता आपण अंगी बाळगू शकत नाही. हाच धागा पकडून रवींद्र कामठे यांच्यासारख्या जीवनानुभव समृद्ध असलेल्या लेखकाने पुढाकार घेत कादंबरी लिहिणे म्हणजे प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे आगरकरांचा विचार पुढे नेण्यासारखेच आहे. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील या कादंबरीकडे व्यापक नजरेने पहायला हवे.

प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे. एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आई आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. या सगळ्यांना जवळ आणताना लेखकाने ‘लिव्ह इन’सारखा पर्याय निवडूनही कुठेही उथळपणा येऊ दिला नाही. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन हा प्रश्न सामर्थ्याने मांडताना त्यांनी आपल्या परंपरा, रीतिरिवाज जपले आहेत. अशा धाडसी विषयाला हात घालूनही संस्कार आणि संस्कृतीला मूठमाती दिली नाही. दोन पिढ्यातील प्रेमसंबंध फुलवताना कुठेही वाह्यातपणा येऊ दिला नाही. एकमेकांना समजून घेणे, आधार देणे, दुःखातून सावरायला मदत करणे यातून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.

कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहारी वर्णन हा तर या कादंबरीचा आत्मा आहे.
तिथल्या आजीने म्हणजे प्रभाकर-दिवाकरच्या आईने एका विधवेला आपल्या मुलासोबत सत्यनारायणाच्या पूजेला सन्मानाने बसवणे, आपल्या मुलासोबत लग्न होण्यापूर्वीच तिचा सून म्हणून स्वीकार करणे, हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात तिची सर्वांसोबत ओळख करून देणे आणि या दोघांना एकत्र आणण्यासाठी धडपड करणे यातून आजचा बदलता भारत दिसतो. असा पुरोगामी विचार जपणे हीच तर काळाची खरी गरज आहे. रवींद्र कामठे यांच्या लेखणीने ही किमया साध्य केलीय.

आंजर्ल्याहून परत येताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, मुंबईला परतल्यावरचे दोन्ही जोडप्यांचे सहजीवन, वकीलकाका, विजयकाकांनी केलेली मदत आणि स्वतःच्या स्वतःच्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण अशा अनेक प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे. विवाहसंस्था समजून घेण्याच्या आधीची एक महत्त्चाची पायरी म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था समजून घेणे! त्याच्याच प्रांजळ प्रतिबिंबातून या अनोख्या रेशीमगाठी सिद्ध झाल्या आहेत. वाचकांनी ही कादंबरी वाचणे, समजून घेणे आणि जमल्यास आचरणात आणून अशा परिस्थितीतील स्त्री-पुरूषांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणे हेच या कलाकृतीचे फलित असणार आहे.
अनोख्या रेशीमगाठी
लेखक - रवींद्र कामठे
प्रकाशन - चपराक
(7057292092)
पाने - 192, मूल्य - 300/-
- घनश्याम पाटील

ही कादंबरी www.shop.chaprak.com वरून घरपोच मागवू शकाल.