Thursday, June 21, 2018

खरे जातीयवादी कोण?

परवा एक विनोद वाचला.
भारताचा प्रमुख राष्ट्रीय खेळ कोणता?
त्याचे उत्तर होते, आडनावावरून जात ओळखणे!

विनोदातही क्लेशकारक वाटावं असं हे वास्तव. ते नाकारण्याचं धारिष्ट्य आपल्यात निश्चितपणे नाही.

मागच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या वाकडी गावात एक घटना घडली. सचिन आणि राहुल चांदणे हे चुलत भाऊ गावातील एका विहिरीत पोहण्यासाठी गेले. कर्णफाट्याजवळील ही विहिर ईश्वर जोशी यांच्या मालकीची आहे. या विहिरीत पोहल्याच्या रागातून जोशी यांनी चांदणे बंधुंना पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांची धिंड काढल्याचेही सांगण्यात आले. वाकडी हे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील गाव. त्यात ज्याने मारहाण केली तो ‘जोशी!’ त्यामुळे वातावरण तापायला वेळ लागला नाही. राहुल गांधी यांच्यापासून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या. माध्यमांनी जोरदार बातम्या चालवल्या. सगळे तथाकथित पुरोगामी निषेधासाठी बाहेर पडले. मनुवाद कसा फोफावलाय आणि मोदींनी राजीनामा देणे किती अगत्याचे आहे यावर खुमासदार चर्चा रंगली. जो तो आपल्या बुद्धिप्रमाणे अक्कल पाजळत होता. ही बातमी देशभर गेली आणि दुपारपर्यंत दुसरी बातमी येऊन धडकली. यातील आरोपी ‘जोशी’ हा ब्राह्मण जोशी नव्हता! तो भटक्या जमातीतला ‘जोशी’ होता. झाले! या घटनेचा विरोध करणार्‍यांचा फुगा फुटला. जी घटना जातीवादातून झालीय असे वाटत होते ती आता या लोकांना सामाजिक विकृती वाटू लागली.

या घटनेच्या थोडे मुळाशी जायला हवे. घटना घडल्यानंतर ज्यांना मारहाण झाली त्या मुलांच्या आजीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीजवळ पहिली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘‘जोशी यांच्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी त्यांनी अनेकदा आमच्या मुलांना इथे पोहू नका म्हणून तंबी दिली होती. मुलं ऐकत नव्हते. म्हणून त्यांना मारले...’’

माध्यमांनी गळे काढले की त्यांना ‘नग्न करून मारले..’ 
यातली वस्तुस्थिती ही होती की ही मुलं पोहण्यासाठी आली होती. त्यामुळे त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. अनेकदा सांगूनही ते ऐकत नसल्याने विहिरीत उड्या मारून आलेल्या या पोरांना पकडले आणि जोशींनी धुतले. ‘जोशींनी मारले’ म्हटल्यावर सगळे तुटून पडले. त्यांच्यावर ऍट्रोसिटीपासून सर्व गुन्हे लावण्यात आले. ब्राह्मणांना झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. फडणवीस आणि मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. राज्यात दलित कसे असुरक्षित आहेत आणि ‘शेंडीवाल्यांची’ मुजोरी कशी वाढलीय याचे चर्वितचर्वण सुरू झाले.

महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा कधीच विद्रुप झालाय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच एक विधान केलं होतं. ‘सध्या पेशवे शाहूंची निवड करतात’ अशा आशयाचं ते विधान होतं. खासदार राजू शेट्टी यांचीही त्यांनी जात काढली होती. राष्ट्रवादीच्या स्थापना दिन सोहळ्यात तर त्यांनी पुणेरी पगडी नाकारून फुले पगडी घालण्याचे आवाहन जाहीरपणे केले. हे सर्व पुरोगामित्वात बसते. त्याउलट नरेंद्र मोदी यांच्यासारखा बहुजन समाजातला माणूस देशाचा पंतप्रधान झालाय तो जातीयवादी आणि मनुवादी ठरतो. अमित शहा यांच्यासारखा नेता सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो ब्राह्मणवादी ठरतो. म्हणजे असे लांच्छनास्पद आरोप करायला आपली जिभ झडत नाही. येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची झाल्यास आरोपांची राळ उडवण्याशिवाय दुसरे हातात काहीच उरत नाही. विकासाच्या मुद्यावर बोलायचे झाल्यास आजवरचे आपले नाकर्तेपण पुन्हा लख्खपणे उघड होईल हे काय यांना कळत नाही का? मग असे वाद पेटवत ठेवावे लागतात. जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण करून ‘पुरोगामित्वाचे’ टेंभे मिरवायचे असा सगळा उद्योग सुरू आहे. 

जळगावातील घटनेचा आरोपी जर ब्राह्मण असता तर एव्हाना देश पेटला असता. मग प्रश्न पडतो खरे जातीयवादी कोण? लोककल्याणकारी राज्य आणि सर्वसमावेशक न्यायाची भूमिका घेताना आपण असे सोयीस्कर कसे वागू शकतो? 

सध्या जातीजातीतील कट्टरतावाद वाढत चाललाय. प्रत्येकजण आपापल्या जातीचं घोडं पुढं दामटतोय. फुले, शाहू, आंबेडकर हे आपले आदर्श असायला हवेत. आपण केवळ त्यांचे नाव घेऊन जातीचे राजकारण करतो. त्या-त्या महामानवाच्या विचारांना, त्यांच्या तत्त्वांना आपणच दिलेली ही तिलांजली आहे.

महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं, ‘‘जातीनिर्मुलन करायचे असेल तर आंतरजातीय लग्नं करा.’’

फुल्यांचे फोटो देवाप्रमाणे लावून मिरवणार्‍या किती जणांनी आपल्या मुलींची लग्नं इतर जातीतल्या लोकांशी लावून दिली?

आंबेडकरांनी सांगितलं होतं, ‘‘मद्यपान करू नकात! शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.’’

त्यांना मानणार्‍यांपैकी कितीजण व्यसनापासून दूर आहेत? कितीजणांनी शिकून द्वेषविरहित आणि रचनात्मक संघर्ष उभारलाय?

महाराजा शाहूंचे नाव घेणार्‍यांपैकी कितीजणांनी त्यांचे विचार अंमलात आणलेत?

मग हे सगळं कशासाठी चाललंय? 

आपल्यापुढील नेमक्या समस्या कोणत्या आहेत?

रोजचे जगण्यामरण्याचे प्रप्रश्न न सुटल्याने मेटाकुटीला आलेला सामान्य माणूस या सगळ्याच्या मागे अकारण धावत स्वतःची फरफट का करून घेतोय? आपल्याला आपला, कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने अर्थातच देशाचा विकास घडवायचा असेल तर आणखी व्यापक व्हायला हवे. त्यासाठी जातीपातीची जळमटं दूर सारायला हवीत. अन्याय! मग तो कुणावरचाही असो! तो घडता कामा नये. ज्याच्यावर घडतोय त्याच्या बाजूने आपण ठामपणे उभे रहायला हवे. चुकीच्या वृत्ती-प्रवृत्तीवर आसूड ओढायला हवेत. 

स्वार्थाशिवाय राजकारण पूर्ण होत नसतं. मग त्यांच्या स्वार्थाची जपणूक करण्यासाठी आपण आपलं चांगुलपण का बरं पणाला लावावं?

हे सगळं थांबवणं आपल्याच हातात आहे. ‘खरे जातीयवादी कोण?’ असा सवाल आपण स्वतःला केला तर समोरच्या आरशात आपलीच प्रतिमा काळवंडलेली दिसेल. चला तर मग! ती स्वच्छ, निर्मळ करण्याचा प्रयत्न करूया!

9 comments:

  1. सर अतिशय सत्य परिस्थिति आणि वस्तुस्थिति असलेला लेख अभिनंदन ..

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप वास्तववादी लिखाण आहे. जातीयवाद मीडिया च्या अंगाअंगात भिनलेला आहे. याला कुठेतरी चाप लागायला हवा.

      Delete
    2. खूप वास्तववादी लिखाण आहे. जातीयवाद मीडिया च्या अंगाअंगात भिनलेला आहे. याला कुठेतरी चाप लागायला हवा.

      Delete
  3. योग्य शब्दांत मांडणी...

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर वास्तववादी स्वतःच ठेवावे झाकून दुसऱ्याचे पहावे वाकून ही पुरोगामी वृत्ती आहे.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर वास्तववादी स्वतःच ठेवावे झाकून दुसऱ्याचे पहावे वाकून ही पुरोगामी वृत्ती आहे.

    ReplyDelete
  6. शब्दात मांडणी

    ReplyDelete