Saturday, June 9, 2018

समर्थ ऊर्जाकेंद्र!


देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 50 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.

10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात, ‘साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो’ असे ठासून सांगतात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.

नियती न मानणारे पवार साहेब आजवर नियतीच्या अनेक तडाख्यातून सहीसलामत सुटले आहेत! सध्या मोदी लाटेमुळे अनेक प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेले असताना ‘मी प्रचंड आशावादी’ म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा राहण्याची धडपड करतोय. जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे ही नेतेमंडळी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील पाळेमुळे त्यांनी भक्कम केलीत. एक मोठा वर्ग ‘अच्छे दिन’च्या मोहजालात अडकलेला असतानाच खेड्यापाड्यातील धास्तावलेल्या लोकांना धीर देण्याचे काम राष्ट्रवादीची नेतेमंडळी करत आहेत.

10 जून हा राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! त्यामुळे सिंहावलोकन करताना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला आणि त्यांच्या कारकिर्दीला नेमक्या शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ‘तोंडओळख’ करून घेेतली तरी कुणालाही अचंबा वाटेल. कोणत्याही नेत्यावर, संस्थेवर टीका करायला फार काही लागत नाही; मात्र त्यांची सकारात्मक बाजू पाहणेही तितकेच गरजेचे आहे. ती पाहताना ‘शरद पवार’ या ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची त्यांची व्याप्ती अफाट आहे.

‘राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची नीतिमूल्ये समजून घ्यायला  हवीत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली. देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे. आज भारतभर कोणत्याही निवडणुकीत फुटकळ उमेदवारांसाठी सातत्याने सभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला कौतुकास्पद वाटतात; पण हीच कर्तव्ये पार पाडणार्‍या शरदराव पवार यांची आपण टवाळी करतो हे आपले दुर्दैव आहे.

वाजपेयींनी पंतप्रधान असताना गुजरातच्या भूकंपावेळी त्यांनी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे मोठेपण सिद्ध करतात.

गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘‘जो माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’’ 

म्हणूनच महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार साहेबांचे नाव जोडले जाते. ‘‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’’ असे विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. 

ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करणार नाही.’’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते.

शरद पवार यांचे राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांची तुलना होते आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्‍याअर्थी छाप टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.

पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी लागली नाही; मात्र पक्षातील इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष या नात्याने साहेबांनी माफी मागितली. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. 

शरद पवार हे फक्त नाव नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय. इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ज्या झाडाला भरपूर फळे लगडलेली असतात त्यालाच पोरंसोरं दगडं मारतात, हा निसर्गनियम सर्वज्ञात आहेच.

भारतीय राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहे. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते (पूर्वाश्रमीचे), छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.

या महिन्यात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! तो साजरा करताना या पक्षाने जे काही विधायक केलेय त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. त्यांच्या चुकीच्या धोरणांवर, निर्णयावर आपण कायम तुटून पडू! पण देशातील एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पवार साहेबांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्रातील असंख्य लोकांसाठी हे एक सकारात्मक ‘ऊर्जाकेंद्र’ आहे हे मान्य करावेच लागेल. जहाज बुडायला लागलं की उंदरं आधी बाहेर उड्या मारतात असं म्हणतात. अगदी त्याप्रमाणंच मध्यंतरीच्या एका लाटेत इतर अनेकांप्रमाणेच राष्ट्रवादीची नौका थोडी डळमळीत झाली असता अनेकांनी त्यांचे रंग दाखवले.  या कशालाही न जुमानता राष्ट्रवादी कॉंग्रेस येणार्‍या संग्रामासाठी सज्ज असेल आणि आपली विजयपताका डौलात फडकवत ठेवेल यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

9 comments:

  1. साहेबांच्या कर्तृत्व आणि राजकारणातले महत्व अधोरेखित करणारा दखलपात्र लेख!

    ReplyDelete
  2. सुंदर परिपूर्ण लेख

    ReplyDelete
  3. सुंदर परिपूर्ण लेख

    ReplyDelete
  4. सुंदर परिपूर्ण लेख

    ReplyDelete