Monday, December 5, 2016

वाल्याचा वाल्मिकी होईल का?

राम गणेश गडकरी यांच्याकडे एकदा काही कार्यकर्ते गेले. त्यांनी सांगितले की, ‘‘आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केलीय. तिच्या शुभारंभाचा नारळ तुमच्या हस्ते फोडावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे...’’
त्यावर गडकरी म्हणाले, ‘‘मी संस्थेचा नारळ फोडतो; संस्था कधी फुटणार हेही सांगा....’’
यातला विनोदाचा भाग सोडला तर मराठी माणसे फार काळ एकत्र राहू शकत नाहीत, संघटीतपणे काम करू शकत नाहीत असाच अनुभव आजही येतो.
गडकरींचा हा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे सध्याचे आपल्या राज्यातील असलेले राजकारण! आजवर अनेक संस्था, संघटनांनी, राजकीय पक्षांनी येनकेन प्रकारे आपापल्या ध्येयधोरणानुसार काम करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते संघटीत राहू शकत नाहीत असेच आजवर दिसून आले आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची मोट बांधण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला. मराठा समाजावर होणारे अत्याचार, त्यांची होणारी पिळवणूक, ऍट्रोसिटी कायद्याचा होणारा गैरवापर या सर्वांविषयी एक खदखद होती. कोपर्डीतील एका निष्पाप मुलीवरील अत्याचारानंतर हा रोष अधिक प्रमाणात वाढला आणि सर्वत्र क्रोधाच्या ज्वाळा निर्माण झाल्या. यात मराठा समाज शांतीच्या मार्गाने रस्त्यावर उतरला. त्यांनी सर्वत्र लाखोंचे मूक मोर्चे काढले. व्यवस्थेविषयीचा निषेध नोंदवतानाच त्यांनी कुठेही हिंसाचार होणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे मराठा समाजाची दखल मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. प्रशासन आणि प्रसारमाध्यमे खडबडून जागी झाली.
समुद्र मंथनातून जसे अमृत बाहेर येते तसेच विषही येते. त्यातून काय घ्यायचे हा ज्याचा त्याचा अधिकार. मराठा मूक मोर्चातून या समाजाचे संघटन दिसले असले तरी त्यातून नेमके काय साध्य झाले हे पाहण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. तूर्तास तर हातात काहीच आल्याचे दिसत नाही. उलटपक्षी मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर राज्यभर झालेल्या पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत सेना-भाजपचाच जोर दिसून आला आहे. याचा अर्थ आजच्या सरकारविषयी सामान्य माणसाच्या मनात राग नाही असा तर निघतोच पण दुसरी वस्तुस्थितीही लक्षात घ्यायला हवी. ग्रामीण भागातील बहुसंख्य असलेला मराठा समाज आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी
कॉंग्रेससोबत नाही तर सेना-भाजपसोबत आहे. म्हणजे ज्या भगव्या पताक्याची तथाकथित ‘मराठा’ संघटनांना ‘ऍलर्जी’ होती त्याच समाजातील बहुसंख्य लोक भगवी पताका श्रद्धेने खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
मराठा मूक मोर्चाचे अपत्य म्हणजे यातून ‘संभाजी ब्रिगेड’सारख्या संघटनेेेने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. अर्थात यापूर्वीही ही संघटना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या राजकारण करायचीच; पण ते द्वेषाचे, सूडाचे राजकारण होते. या संघटनेचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकर यांच्या सौभाग्यवती रेखा खेडेकर या भाजपाच्याच आमदार होत्या. हेच स्वयंघोषीत शिवश्री (नव्हे शिवीश्री) केवळ ब्राह्मण द्वेषाने पेटलेले होते. अगदी ब्राह्मणांना कापा, मारा, त्यांच्या बायका पळवून आणा इतके सांगण्यापर्यंत आणि लिहिण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांनी त्यांचे हे ‘दिव्य’ विचार त्यांच्याच घरी त्यांच्या बायकोला आणि आईला सांगावेत, त्या दोघीही त्यांच्या तोंडावर थुंकल्याशिवाय राहणार नाहीत, असे आम्ही यापूर्वीच निक्षून सांगितले होते. आता राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली या शिवीश्रींना अटक होण्याची शक्यता असतानाच मराठा मूक मोर्चाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून या संघटनेने राजकारणात उडी मारली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच मराठा समाजाला एकत्र करण्याच्या नावावर हा पक्ष उभा राहत आहे. त्याचे भवितव्य काय असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही; मात्र त्यांनी द्वेषाचे राजकारण सोडले, हिंदुत्वाचा विरोध कमी केला, समाजहिताचे चार निर्णय घेतले तर त्यांना किमान श्‍वास घेता येईल. पुण्या-मुंबईसारख्या महानगरात इच्छुक उमेदवारांची साठमारी सुरू असताना त्यातील काही अतृप्तांना ही संघटना (किंवा फार तर नवा पक्ष म्हणूया) सामावून घेऊ शकेल. स्थानिक समीकरणे पाहता त्यातील काही उमेदवार निवडून येतीलही! पण ब्रिगेडची विचारधारा किंवा ध्येयनिष्ठा असले काही प्रकार त्यांच्याकडे नसतील. निवडून आल्यानंतर तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसेल. ‘संभाजी ब्रिगेड’ची ध्येयधोरणे पाहून आणि त्यांच्या सूडाच्या राजकारणावर फिदा होऊन कोणी त्यांच्याकडे आकर्षित होईल असे वाटत नाही. केवळ अपरिहार्यता किंवा तात्कालिक तडजोड म्हणून काहीजण त्यांना साथसंगत करतील. हे चांगले की वाईट हे ज्याने त्याने ठरवावे.
नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक कणखर आणि सत्याची चाड असणारे पंतप्रधान लाभले आहेत. ते धाडसाने निर्णय घेत आहेत. अगदी शत्रूच्या गोटात जाऊन त्यांना मारणे असेल किंवा अंतर्गत साफसफाईसाठी एका रात्रीत नोटाबंदीचा निर्णय घेणे असेल, त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून त्यांचा कणखरपणा आणि स्वाभिमानी बाणा दिसून येतो. किंबहुना ‘मोदी म्हणजे भाजप नाही’ हेही आता आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यांची भूमिका कुण्या एका पक्षासाठी नसून ती देशहिताची आहे, यावरचा सामान्य माणसाचा विश्‍वासही अधिक दृढ होत चालला आहे. एका नव्या राजकीय पर्वाची नांदी झालेली असताना देशभरातील त्यांचे विरोधक पुरते भुईसपाट झाले आहेत. कॉंगे्रस असेल किंवा इतर प्रादेशिक पक्ष असतील; प्रत्येकांना त्यांनी लोळवले आहे. लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे चित्र देशभर आहे.
या अशा सार्‍या वातावरणात संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून पुढे येत असेल तर त्यांच्यापुढे निश्‍चितच मोठे आव्हान आहे. ऑल इंडिया मुस्लिम लिग असेल किंवा शिवसेनेसारखे मराठमोळे पक्ष असतील तेही अशाच कट्टरतावादातून पुढे आले आहेत; मात्र त्यांनी त्यांचा कट्टरपणा, कडवटपणा दूर सारत लोकहिताचे निर्णय घेतल्याने त्यांना बर्‍यापैकी मान्यता मिळाली आहे. संभाजी ब्रिगेडनेही त्यांची संकुचित वृत्ती आणि द्वेष बाजूला सारला तर त्यांना एक संधी उपलब्ध होऊ शकते. बहुसंख्य असलेला मराठा त्यांच्या पाठिशी राहील अशी मुळीच शक्यता नसली तरी जे कोणी हतबलतेने किंवा पर्यायाअभावी त्यांच्याकडे आकर्षित होतील त्यांच्याकडून जनहिताची कामे करून घेतली, वैचारिक संघर्ष उभारला तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. संभाजी ब्रिगेडसाठी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची ही संधी आहे. ते कात टाकून सकारात्मक राजकारण करतील की विषाचे फुत्कार सोडण्यातच धन्यता मानतील हे येणार्‍या काळात कळेल. तूर्तास महाराष्ट्राच्या राजकारणात इतर अनेक छोट्या-मोठ्या पक्षाप्रमाणेच आणखी एका पक्षाची भर म्हणून त्यांना शुभेच्छा देऊयात!!

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

5 comments:

  1. मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मराठा समाजाचा भावनीक फायदा संभाजी ब्रिगेड उचलणार ही शंका होतीच. ती खरी ठरली. लेखात या नवीन पक्षाचे भवितव्य नेमके मांडले आहे. शेवटी या पावसाळी छत्रीला खरी समाज छत्री होण्यास काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. लेखणीची तलवार कशी फिरवावी हे आपणाकडून शिकावे. संपादकीय 'चपराक' !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नाईक साहेब.

      Delete
  2. सडेतोड व परखड चपराक!

    ReplyDelete
  3. परखड शुभेच्छा........ वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी....!

    ReplyDelete
  4. परखड शुभेच्छा........ वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी....!

    ReplyDelete