Sunday, August 9, 2015

व्यामिश्र अनुभवांची प्रगल्भ कविता


‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या विश्‍वास वसेकर लिखित ‘तरी आम्ही मतदार राजे’ या काव्यसंग्रहाचे परीक्षण आजच्या ‘सकाळ’ने ‘सप्तरंग’ पुरवणीत दिले आहे. राजकीय कवितांच्या या संग्रहाचे प्रकाशन घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, भारत देसडला यांच्या हस्ते करण्यात आले होते.
धन्यवाद ‘सकाळ’.


मराठी कवितेच्या प्रांतात 1980 नंतरच्या कालखंडातले विश्‍वास वसेकर हे महत्त्वाचे कवी आहेत. ‘कोरस,’ ‘काळा गुलाब,’ ‘पैगाम,’ ‘शरसंधान’ आणि ‘मालविका’ या कवितासंग्रहांनंतरचा ‘तरी आम्ही मतदारराजे’ हा त्यांचा अलीकडचा राजकीय कवितांचा आगळावेगळा कवितासंग्रह होय. आपली अनुभवाची नाळ, वास्तवाशी जोडून भेदक आणि तिरकस शैलीत त्यांची कविता प्रकटते. मराठीतल्या प्रमाणभाषेतील शब्दांना योग्य जागी ठेवताना जनभाषेतूनही ते कवितेला अर्थवत्ता प्राप्त करून देतात. त्यांचा हिंदी-उर्दू साहित्याचा व्यासंग मराठी कवितेत सहजपणानं प्रकटतो. त्यांची कविता त्यांचे वास्तव अनुभव साकारताना सौंदर्यवादी मन आणि हुन्नरी व्यक्तिमत्त्वही उभं करण्यात यशस्वी झालेली दिसते.
आजच्या शिक्षणव्यवस्थेतील वरवरचा शैक्षणिक देखावा, पोटार्थी सहकार्‍यांवर आपली महात्मता दाखविणारे आणि संस्थाचालकांना खूश करण्यासाठी बोटचेपी भूमिका घेणारे ‘हेडसर’ आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वत्रच ‘पाट्या’ टाकण्याचे काम करणारे आहेत, हेही वास्तव कवी मोठ्या खुबीनं काही कवितात सांगतो. वर्तमानपत्रांतील कोणत्याही भडक बातम्या पाहिल्या, की ‘जांभई’ देणारा वाचक महागाई भत्ता वाढल्याची बातमी वाचून मात्र सुखावतो. आजच्या ‘नोकरशाही’च्या जीवनाचे मर्मच कवी साध्या सोप्या शब्दांत सांगतो. कोणत्याही क्षेत्रात काहीतरी नवं करून दाखविण्याचा हुरूपच हरवलेला असून, त्याची जागा कंटाळा या स्थायिभावाने घेतलेली आहे. कारण चुकारपणाच्या ‘शिक्षा’ आज कुणालाच मिळत नाहीत, ही सार्वजनिक जीवनातली अवस्था कवीला अस्वस्थ करते. स्पर्धा करावी आणि काहीतरी चांगलं उभं करावं, ही ईर्षाच राहिली नसल्याचं शल्य कवीला बोचतं. ‘कर्मचारी,’ ‘व्याख्या’ या कविता उथळ आणि सवंग जीवनव्यवहार सूचित करतात. या संग्रहातल्या काही कविता मुळातून वाचल्या म्हणजे व्यक्ती, समाज, देश आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पट मांडणार्‍या वसेकरांच्या विचारांचा आणि कवितेचा अवकाश खूपच मोठा असल्याचं लक्षात येतं.
‘परदेशी किचक,’ ‘रंगाचे रॅगिंग,’ ‘बाप्तिस्मा,’ ‘गोमेचे पाय,’ ‘भुकेचा चिद्विलास,’ ‘आदिमाय भूक,’ ‘मांजरनजर,’ ‘अस्पृश्य भावना,’ ‘बर्फाचा पाऊस,’ ‘प्रश्‍नांचे मोहळ’ आदी प्रतिमांमुळं काव्याशय अधिक अर्थवाही होतो. त्याचप्रमाणे ‘कारवॉ,’ ‘महफिल,’ ‘जिक्र,’ ‘थ्रिल,’ ‘बॉम्ब,’ ‘ऍडव्हान्स,’ ‘मेन्टनन्स,’ ‘रिलॅक्स,’ ‘सिडाऊन,’ ‘ट्रॅजेडी,’ ‘पॅसिव्ह शोषण’ असे हिंदी-इंग्लिश भाषेतल्या शब्दांनी कवीचा अन्य भाषांच्या व्यासंगाबरोबरच त्यांचं औचित्यपूर्ण उपयोजनही कवितेची व्यामिश्रता वाढवितो. वसेकर वास्तवाला परखडपणानं, कधी उपहास; तर कधी विडंबनाच्या माध्यमातून साकारतात. मानवी जीवन सुंदर आणि समाजजीवन निकोप व्हावं, हाच या संग्रहातल्या कवितांचा हेतू आहे.
- डॉ. पंडितराव पवार
 
पुस्तकाचं नाव - तरी आम्ही मतदारराजेकवी
- विश्‍वास वसेकर
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे.

(020- 24460909, 9226224132)
पृष्ठ - 104 मूल्य - 100 रुपये.



No comments:

Post a Comment