Sunday, March 22, 2015

‘मराठवाड्यातून मिळवले आणि पुण्यात टिकवले’






सुप्रसिद्ध कथाकार प्रा. भास्कर बडे यांच्याकडून स्वागत

कवी रामदास केदार आणि सुधाकर वायचळकर

मराठवाडा आणि कविता हे दोन विषय माझे आत्यंतिक जिव्हाळ्याचे आहेत. अनेक वर्षानंतर केवळ दोन दिवसासाठी मराठवाड्यात गेलो आणि मायभूमिच्या दर्शनाने आत्मिक सामर्थ्याची ऊर्जा कैक पट वाढल्यासारखे वाटले. माझ्या मराठवाड्यातील लोकाचे उदंड प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारी जिव्हाळ्याची वागणूक याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
मी आणि सागर सुरवसे! आम्ही दोघांनी परवा लातूर शहर गाठले. तिथे भल्या सकाळी माझे स्नेही, सुप्रसिद्ध कथाकार डॉ. भास्कर बडे  यांचे घर गाठले. बडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती नभाताई यांनी जोरदार स्वागत केले. त्याठिकाणी कवयित्री अस्मिता फड याही आल्या होत्या. विविध विषयांवर आमच्या दिलखुलास गप्पा झाल्या. बडे सरांनी पत्रकारिता, राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक रंजक व तितक्याच सुरस कथा सांगितल्या. त्याचवेळी तिथे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे युवा पत्रकार निशांत भद्रेश्‍वर, लातूर पत्रकार संघाचे सचिव विजयकुमार स्वामी हे भेटण्यासाठी आले. विजयकुमार स्वामी म्हणजे शून्यातून वेगळे विश्‍व निर्माण करणारा संघर्षशील माणूस!

मराठवाडयातील पत्रकार आणि लेखकांसह!
मराठवाड्यातील ‘पुण्य नगरी’च्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
बडे संराचे ‘वावर’ हे निवासस्थान म्हणजे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्रच झाले आहे. त्याठिकाणी सौ. नभाताई नृत्याचे प्रशिक्षण वर्गही चालवतात. या दाम्पत्याने आमचे जोरदार स्वागत केले. साप्ताहिक आणि मासिकाच्या अंकाची त्यांनी स्वतःची व बीड जिल्ह्यातील काही ग्रंथालयांची वर्गणी भरली. अस्मिताताई फड याही सभासद झाल्या. मराठवाड्यात ‘चपराक’चा विस्तार व्हावा यासाठी लातूरकरांनी सदैव पुढाकार घेतला आहे. थोडावेळ गप्पा झाल्यानंतर डॉ. बडे, भद्रेश्‍वर, स्वामी, सागर आणि मी असे सर्वजण गांधी चौकात पोहोचलो. तिथे माझे जुने स्नेही, ज्येष्ठ पत्रकार प्रदीपजी नणंदकर आले. पुन्हा सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि आम्ही उदगीरकडे निघालो.
उदगीर हे माझे आजोळ! मात्र मामा कंपनी आता पुण्यातच स्थायिक झाल्याने फारसा संपर्क राहिला नाही. उदगीरला सांस्कृतिक, ऐतिहासिक मोठी परंपरा आहे. या परंपरेचे खंदे पाईक आणि प्रचंड सद्गुणी असलेल्या सुधाकरराव वायचळकर यांनी आमचे जोरदार स्वागत केले. उदगीरमध्ये ‘चपराक’च्या विस्तारात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आतिथ्याने भारावून गेलो. अनेक साहित्यविषयक गप्पा, जेवण यात तीन-चार तास गेले. मराठवाड्याची ओळख ठरण्याची क्षमता असलेले ताकतीचे युवा कवी प्रा. रामदास केदार आणि ज्येष्ठ कवयित्री सुनंदा सरदार यांनी वायचळकर सरांच्या घरी भेट घेऊन चर्चा केली.
तिथून आम्ही देगलूरला पोहोचलो. या सर्व व्यापात देगलूरला जायला उशीर झाला. तब्बल सात वर्षाने देगलूरला गेल्याने तिथे माझ्या ताईकडे कल्ला केला. भाचे कंपनीत रमताना मिळणारे सुख अवर्णनीय असते. सर्व थकवा धूम पळून गेला आणि पुन्हा ताजातवाना झालो.

सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. शेषराव मोरे सरांसोबत
काल सकाळी (शनिवार. दि. 21) देगलूरहून नांदेडला गेलो. जाताना चालकाशी गप्पा सुरू होत्या. मराठवाड्यातील दुष्काळ, विकासयोजना, भ्रष्टाचार अशा विषयांवर गप्पा सुरू होत्या. गाडीचे चालकही त्या परिसरातील बातमीदार असल्याने नवनवीन माहिती मिळत होती. ‘अशोक चव्हाणांचे कॉंग्रेसने पुनर्वसन केल्याने नांदेडकर खुश असतील ना?’ असे विचारल्यावर त्याने ‘मुडद्याला सफारी घालून काही उपयोग आहे का साहेब?’ असा प्रतिप्रश्‍न करून आमची बोलती बंद केली.
मराठवाड्याचेच नव्हे तर साहित्य क्षेत्राचे वैभव असलेल्या ज्ञानयोगी तत्त्वचिंतक प्रा. शेषराव मोरे सरांच्या घरी झालेल्या गप्पा अविस्मरणीय आहेत. त्याविषयी लवकरच एक वेगळा लेख लिहितो. सावरकर, आंबेडकर, टिळक, आगरकर, गांधी, जिना अशा असंख्य विषयांवर सरांनी इतकी तर्कसुसंगत मांडणी केली की अवाकच झालो. त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही कळमनुरीला नरेंद्र नाईक यांच्या निवासस्थानी पोहोचलो.
त्याठिकाणी कळमनुरी, हिंगोली परिसरातील साहित्यिक, कवी आमची वाटच पाहत बसले होते. त्यांच्याकडे प्रथम ग्रंथपूजन केले. साहित्यविषयक चर्चा केली. मराठवाडा मुक्ती दिनाविषयी जास्तीत जास्त लिहिण्याचे आवाहन केले. या लढ्याचे अभ्यासक असलेल्या विजय वाकडे काकांनी लगेच आम्हाला या विषयावरील एक दुर्मिळ ग्रंथ दिला. नरेंद्र नाईक, कवी शफी बोल्डेकर, कवी राजाराम बनसोडे, डॉ. रमेश पाईकराव, गजानन थळपते, धनंजय मुुळे, कलानंद जाधव, शीलवंत वाढवे आदींनी भेट घेतली, अंकाची वर्गणी भरली. नरेंद्र नाईक यांच्या आग्रहाने पुन्हा त्यांच्या घरी ‘सक्ती’ने जेवावे लागले. गुडीपाडव्याच्या दिवशी मराठवाड्यातील या माझ्या बांधवांकडून मिळणार्‍या प्रतिसादाने, त्यांच्या निर्व्याज प्रेमाने शब्दशः भाराऊन गेलो. नरेंद्र नाईक हे चिकित्सक वृत्तीचे कवी, लेखक, कादंबरीकार आहेत. ‘चपराक’च्या विस्तारासाठी त्यांनी स्वतःहून घेतलेला पुढाकार हे आमचे मोठे यश आहे.नरेंद्र नाईक यांनी केलेला सत्कार
तिथून आम्ही हिंगोली मार्गे परभणीला पोहोचलो. तिथे संतोष धारासुरकर आणि विजयराव जोशी यांनी दैनिक ‘दिलासा’चे पुनर्प्रकाशन सुरू केले आहे. त्यांच्या प्रथमांक सोहळ्यास हजेरी लावली. तिथे ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्यासह अनेकांशी गप्पा झाल्या. ‘दिलासा’च्या प्रथमांक सोहळ्याची मुख्य बातमी त्यांच्याकडे बसून लावून घेतली. शीर्षक दिले आणि बाहेर पडलो.
मराठवाड्याच्या या आठवणी माझी श्रीमंती वृद्धिंगत करणार्‍या आहेत. जीवनात आनंद निर्माण करणार्‍या आहेत. ‘आपण कुठे आहोत, यापेक्षा कुठून आलोय याला जास्त महत्त्व असते’ असे म्हणतात. मराठवाड्याच्या मातीशी जोडलेली नाळ हे माझे खरे वैभव आहे. या मातीनेच माझ्या आयुष्याचे सोने केले आहे आणि त्यामुळेच मी स्वतःला धन्य समजतो. पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत चांगल्याला चांगले म्हणणारे आहेत, त्यामुळे उत्साह द्विगुणीत होतो. ‘मराठवाड्यातून मिळवले आणि पुण्यात टिकवले’ अशी काहीसी माझी गत आहे.
आठवणींचा हा मृद्गंध असाच दरवळत रहावा आणि ‘चपराक’च्या व्यासपीठावर सामान्य माणसाचा आवाज आणखी बुलंद व्हावा, यासाठी माझे आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांचे प्रामाणिक प्रयत्न असतील!
नरेंद्र नाईक यांच्याकडून सत्कार स्वीकारताना


- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२




2 comments: