Wednesday, February 18, 2015

‘चपराक साहित्य महोत्सवा’त एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन

लिहा! लिहा! लिहा! वाचक निश्‍चित भेटतील
‘चपराक साहित्य महोत्सवा’त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी): बाबासाहेब म्हणाले, ’’आजच्या काळात लेखन करणं आवश्यक आहे, असं ज्या व्यक्तिला वाटतं त्या व्यक्तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शेतकरी असो, मजूर असो वा उद्योजक असो; प्रत्येकाची अंगभूत प्रतिभा बाहेर आलीच पाहिजे. आजही समाजाची वाचनाची भूक कमी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक लेखक, कवीने थांबता कामा नये.’’ समाजातातील महापुरूषांची ओळख सर्वसामान्यांना करून देण्यासाठी लेखक, कवींनी लिहावं असा वडिलकीचा सल्ला देत असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. या प्रकाशन सोहळ्यात सदानंद भणगे यांचा ‘ओविली फुले मोकळी’ हा ललित संग्रह, घनश्याम पाटील यांचा ‘झुळूक आणि झळा’ हा निवडक अग्रलेखांचा संग्रह, संजय वाघ यांचा ‘गंध माणसांचा’ हा व्यक्तिचित्रण संग्रह, सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्यापितम्’ हा कथासंग्रह, प्रभाकर तुंगार लिखित ‘शांतिदूत - लालबहादूर शास्त्री’ हे चरित्र, सागर सुरवसे यांचे ‘एकनाथजी रानडे - जीवन आणि कार्य’ हे चरित्र, विनोद पंचभाई यांचा ‘मुलांच्या मनातलं’ हा बालकथासंग्रह, हणमंत कुराडे यांची ’दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ ही कादंबरी तर माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’, संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’, प्रभाकर चव्हाण यांचा ‘सुंबरान’ आणि शांताराम हिवराळे यांच्या ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. 
‘‘ज्या बिटिशांच्या प्रत्येक वाईट गोष्टींचा आपण भारतीयांनी प्रचार केला त्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले. मात्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या महापुरूषांची आपण चेष्टा करतो. आपण फक्त गप्पा मारतो; थोर पुरूषांचे अनुकरण करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुरूंगात असताना त्यांना लेखन करायला कागद उपलब्ध करून दिले जात नव्हते. अशावेळी त्यांनी भिंतीवर लेखन केले. ते पाठ केले आणि आपल्यासोबत असणार्‍या परंतु दोन महिन्यानंतर सुटका होणार असलेल्या कैद्याला ते पाठ करायला लावले आणि बाहेर जाऊन ते लिखाण मुर्तरूपात आणायला त्यांनी सांगितले. ते प्रतिकूल परिस्थितीत लिहू शकत असतील तर आपण का लिहू शकत नाही?’’ असा सवालही बाबासाहेबांनी केला. 
प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘घनश्याम पाटील यांची धडपड बघितल्यावर माझ्या उमेदीचा काळ आठवतो. कालांतराने माझ्या लेखणीची धार कमी होत गेली तरी घनश्याम पाटील यांच्या लेखणीची धार कायम आहे. घनश्याम पाटील हे गावाकडच्या लेखक, कवींचं प्रतिनिधीत्व करतात. चॅनेल, मोठी वृत्तपत्रे सोडून पत्रकार ‘चपराक’कडे येत आहेत.’’ 
‘शिवप्रताप’कार उमेश सणस म्हणाले, ‘‘आज तानाजी मालुसरे यांना सिंहगड कसा जिंकला हे विचारायला जाल तर ते ‘‘आधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास विचारा; नंतर काही शंका असतील तर आमच्याकडे या’’ असे ते म्हणाले असते. अशा बाबासाहेबांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणे हे या लेखक, कवींचे भाग्य आहे. आज दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. कवींचं नाव मोठं नसेल तर प्रकाशक त्याला उभंही करत नाहीत. अशा स्थितीत चार कवितासंग्रहांचे प्रकाशन होणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे घनश्याम पाटील हे प्रकाशनविश्‍वातले ‘केजरीवाल’ आहेत. माणसाचा माणुसपणाकडे प्रवास सुरू राहणे हे सदानंद भणगे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे’’ असेही ते म्हणाले.
विनायक लिमये म्हणाले, ’’तंत्रज्ञान बदललं तरी पुस्तकांचं महत्त्व अबाधित राहणार आहे. आज मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत पुस्तकं आली आहेत. ‘चपराक’च्या या 12 पुस्तकांमध्ये माणुसकीचा ओलावा, सत्याचा वास आहे. ही सर्व पुस्तके काळाशी सुसंगत आहेत. घनश्याम पाटील यांच्या ‘झुळूक आणि झळा’ या  अग्रलेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकात संपादकांची परखड आणि रास्त भूमिका दिसून येते. तर कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍या मराठी मुलांना मराठीची ओळख होण्यासाठी संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा काव्यसंग्रह उपयुक्त ठरणार आहे.  चांगुलपणा शोधणारी नजर असली की चांगलंच होतं’’ असेही लिमये यावेळी म्हणाले.
सदानंद भणगे म्हणाले, ‘‘वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे असे बोलले जात आहे. मात्र, अशा स्थितीत एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन ही असे बोलणार्‍यांना सणसणीत ‘चपराक’ आहे. घनश्याम पाटील हे एक धाडसी संपादक, प्रकाशक आहेत. इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार टाकला असताना ‘घुमानलाच काय अफ्रिकेच्या जंगलात जरी मराठी साहित्य संमेलन असलं तरी जाणार’ हे सांगणारे घनश्याम पाटील एकमेव प्रकाशक आहेत. त्यांच्या लेखणातून ते आपली ठाम भूमिका मांडतात.’’
प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन माधव गिर यांनी तर शुभांगी गिरमे यांनी आभार मानले. 


प्रकाशनादिवशीच आवृत्ती संपली

या सोहळ्यात प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीची हातोहात विक्री झाली. यात ‘झुळूक आणि झळा’, ‘नवं तांबडं फुटेल’, ‘एकनाथजी रानडे-जीवन आणि कार्य’, ‘गंध माणसांचा’, ‘सुंबरान’,  ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री‘ या पुस्तकांचा समावेश आहे. बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर तापकीर, सुप्रसिद्ध उद्योजक आणि स्प्रेजा इंडस्ट्रिजचे संचालक एस. डी. सोनवणे, आरंभिनी इंडस्ट्रिजचे श्रीपाद भिवराव, तळेगाव नाट्य परिषद यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल

या प्रकाशन सोहळ्यात ‘शिवप्रताप’कार उमेश सणस यांनी दिल्लीत भाजप, कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. मात्र, घनश्याम पाटील हे मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल असल्याची कोटी केली.




1 comment:

  1. प्रिय मित्र,
    बाबासाहेब अम्बेडकर कभी जेल नहीं गए. इसलिए उन्हें कागज की कमी होने का प्रश्न ही नहीं है. हाँ यह उदाहरण सावरकर पर जरूर लागू होता है.

    ReplyDelete