Sunday, May 28, 2017

भंपक ‘पू’रोगामी विश्‍व!

प्रत्येक विचारधारेत, संस्थेत, पक्षात काही घरभेदी असतात. मूळ उद्दिष्टांपासून दूर जात ते त्याचा अतिरेक करतात. थोडक्यात काय तर ही ‘बांडगुळं’ असतात. झाडाच्या ज्या फांदीवर हे बसलेले असतात तीच फांदी हे महाभाग तोडतात. त्यांना त्याचं काही गांभीर्यच नसतं. गांभीर्य नसतं असं म्हणण्यापेक्षा मुळात तितकी अक्कलच नसते. मध्यंतरी काही कट्टरतावाद्यांनी हिंदू आणि हिंदुत्त्व हे शब्दही बदनाम केले होते. अशा वाचाळवीरांची पुरोगाम्यातील विकृत आवृत्ती म्हणजे विश्‍वंभर चौधरी!
पुरोगामी हा शब्द ‘ढोंगी’ या शब्दाला समानार्थी झालाय. त्यात पू भरल्याने हे रोगी झालेत. आपल्या भंपकपणामुळे वाटेल त्या थराला जायचे, वाटेल तसे तारे तोडायचे हेच त्यांचे जीवितकर्म झालेय. एखादी चांगली योजना पुढे फसावी तसे पुरोगामी विचारधारेचे झालेय. ‘पुरोगामी महाराष्ट्र’ ही व्यापक संकल्पना इतकी खुरटी झालीय की त्याला काही अर्थच नाही. पूर्वी धर्मावरून घसरणारे आता जातीवर उतरतात. त्यातूनही काही साध्य होत नाही म्हणून एखाद्या साहित्य संस्थेने एखाद्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लेखकाच्या कलाकृतीला पुरस्कार दिला म्हणून त्याचेही राजकारण करतात. कोणतेच मुद्दे नसल्याने यांचे सैरभैर होणे समजून घेण्यासारखे असले तरी यामुळे ‘पुरोगामी’ या संकल्पनेचे मात्र बारा वाजले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. जवळपास 111 वर्षे अव्याहतपणे आणि साहित्यिक निष्ठेने ही संस्था काम करतेय. ही संस्था विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानीत करते. यंदा ‘स्तंभलेखन’ या साहित्यप्रकारासाठी डॉ. सच्चिदानन्द शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाची निवड झाली. पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडलाय. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची त्याला विवेचक प्रस्तावना आहे. शेवडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा उत्तम आविष्कार या पुस्तकात आहेच; पण केवळ भाऊंच्या या प्रस्तावनेसाठीही हे पुस्तक विकत घ्यायला हरकत नाही.
हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांची मळमळ, खदखद बाहेर पडली. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी होती -
‘‘मसाप या अतिशय सुमार दर्जाच्या साहित्यिक संस्थेनं ’सेक्युलर नव्हे, फेक्युलर’ नावाच्या (नावातच सुमारपण दाखवणार्‍या) पुस्तकाला पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी विश्वात खळबळ माजली आहे. ती खळबळ अप्रस्तुत आहे कारण मसाप नावाच्या धोतर्‍याच्या झाडाला हापूस आंबे लागतील अशी वृथा अपेक्षा पुरोगामी ठेवत आहेत! हा दोष सर्वस्वी पुरोगाम्यांचाच.
मुळात या ’मसाप’ मध्ये ’साहित्य’ शोधायला पुरोगाम्यांनी जावेच कशाला? ही संस्था एखाद्या गणपती मंडळासारखी किंवा दहीहंडी मंडळासारखी नाहीय का? वर्षाला एकदा 2500000 रुपयांचा शासकीय रमणा घेऊन संमेलनाचा ऊरूस भरवणे आणि शासनात कोणते वारे वाहते ते कुक्कुटयंत्राच्या संवेदनशीलतेनं बघून काही पुरस्कार देणे एवढंच या संस्थेचं सध्या जिवीतकार्य! माझा तर अगदी अलीकडे असा समज झाला आहे की साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबू, सतरंज्या, खुर्च्या आदि) बाळगून असलेली परिषद! मला तरी विंदा करंदीकर किंवा मंगेश पाडगावकर कधी टिळक रस्त्याला दिसलेले नाहीत. माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या मनात तरी या संस्थेची एवढीच प्रतिमा आहे.
तेंव्हा एवढ्या प्रतिष्ठीत संस्थेकडून कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला तरी पुरोगाम्यांना काय फरक पडतो? सुमारांच्या सद्दीत दुसरे काय अपेक्षित असते?’’
विश्‍वंभर चौधरी यांनी यात जी अक्कल पाजळली आहे ती त्यांच्या बिनडोकपणाचा पुरावा आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या संस्थेला ‘सुमार’ समजणे हे यांच्या सडलेल्या मेंदूचे लक्षण आहे. ‘पुरोगामी विश्‍वात खळबळ’ म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे? असे काही ‘पुरोगामी विश्‍व’ अस्तित्वात आहे का? म्हणजे घरातल्या सिलेंडरवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे आणि ‘ज्वालामुखी खदखदू लागला’ असं म्हणायचं अशातला हा प्रकार झाला. गणपती मंडळ किंवा दहीहंडी मंडळाच्या माध्यमातून काय पुरोगामी विचार देता येतो हे जितेंद्र आव्हाडांनी दाखवून दिले आहेच. म्हणजे पुरोगामी म्हणून मिरवायचे आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत दहीहंड्या लावायच्या, तिथे बायका नाचवायच्या!! असे गोरखधंदे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले नाहीत.
पंचवीस लाखाचा ‘रमणा’ घेणे हे त्यांना या संस्थेचे जीवितकार्य वाटते. यातली पहिली गोष्ट म्हणजे संमेलन भरवणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम नाही. ते निमंत्रक संस्था आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही संस्था भरवते. त्यामुळे या निधीचा आणि मसापचा बादरायण संबंध नाही. आयुष्यभर रमणा घेऊनच जगणार्‍या विश्‍वंभरला असेच शब्द सुचणार. त्यांनी कष्टाने चार पैसे मिळवलेत हे कुणाला ठाऊक आहे का? ते जी तथाकथित एनजीओ चालवतात त्यासाठी कुणापुढे तरी वाडगा पसरून, खरीखोटी कागदपत्रे सादर करून, अंबानी-अदानीच्या मागे लागून, किंवा रस्त्यावरचा चोर, लुटारू, अगदी बेकायदा टपरी लावणारासुद्धा; अशा लोकांकडून पैसे घेऊन अशा एनजीओ चालतात. विश्‍वंभर चौधरींनी कोणत्या व्यवसायातून इतके पैसे मिळवले आणि सामाजिक काम केले, त्यांच्या संस्थेच्या या अमुक तमूक कामातून हे पैसे मिळाले हे त्यांनी जाहीर करावे! किंवा त्यांच्या या कामातून, विचारातून महाराष्ट्राला कोणता नवा पैलू मिळाला, कोणता प्रकल्प मार्गी लागला, बेरोजगारी संपली, साहित्यिक निर्माण झाले हे जाहीर करावे. त्यातून त्यांचे योगदान स्पष्ट होईल. माझ्यासारखा प्रकाशक कष्टाने चार पैसे मिळवतो. मसापचे पदाधिकारी अशा ‘रमण्या’वर पोट भरत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाची वेगळी साधने आहेत. विश्‍वंभर चौधरी मात्र त्यांच्या ज्या काही पर्यावरणवादी संस्था आहेत त्यावर जगतात.
यांना टिळक रस्त्यावर कधी पाडगावकर, विंदा दिसले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. उद्या ते म्हणतील की, मला सेनापती बापट रस्त्यावर कधी सेनापती बापट किंवा टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळक दिसलेच नाहीत! साहित्य संमेलनासाठी लागणारे तंबू, सतरंज्या, खुर्च्या बाळगणारी ही संस्था असा यांचा ‘समज’ आहे. मुळात ही मंडळी समजावर जगतात. ना त्यांचा अभ्यास असतो, ना जीवनानुभव समृद्ध असतात. ‘समजा’तच जगणारे काहीही विचार मांडू शकतात. त्यांना कोण आवरणार? यांचा वास्तव जगाशी काही संबंधच नाही. हेच वास्तव तर शेवडे यांच्या या पुस्तकात मांडले आहे. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची या पुस्तकाची प्रस्तावना प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पुस्तक सोडा, पण ही प्रस्तावना वाचूनच विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्यांचा जळफळाट होणे आणि ते मनोरूग्ण होणे अपेक्षित होते. घडलेही तसेच.
दलित चळवळीचे अभ्यासक रावसाहेब कसबे हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिवाजीराव कदम, उल्हास पवार, यशवंतराव गडाख हे विश्‍वस्त मंडळावर आहेत. ही मंडळी हिंदुत्त्ववादी नाहीत. साहित्य परिषदेची एक यंत्रणा आहे. त्यांच्याकडे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवावी लागतात. आलेल्या पुस्तकातून त्या त्या साहित्य प्रकारातील पुस्तके संबधित परीक्षक निवडतात. यंदा स्तंभलेखन या साहित्य प्रकारासाठी मी परीक्षक होतो आणि यातील सच्चिदानन्द शेवडे यांचे हे सर्वोत्तम पुस्तक आहे. या निवड प्रक्रियेत मसापच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. मुळात हा पुरस्कार ‘विचारधारेला’ नाही तर ‘साहित्यप्रकाराला’ दिलाय हे लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे या पुस्तकातील लेख एका समाजवादी विचारधारेच्या वृत्तपत्रातूनच सदर स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत.
दुसरे म्हणजे विश्‍वंभर चौधरी काही लेखक नाहीत. माझ्या माहितीनुसार ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासदही नाहीत. मग ही जळाऊ वृत्ती कशासाठी? मसापच्या पुरस्कारावर त्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांनी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावे एखादी साहित्यिक संस्था काढावी आणि पुरूषोत्तम खेडेकरांपासून श्रीमंत कोकाटेपर्यंत हवे त्यांना पुरस्कार द्यावेत. त्यांना अडवतंय कोण? स्वतः तर काही विधायक करायचे नाही आणि इतर कोणी केले तर त्रागा करायचा हे कसले लक्षण?
अण्णा हजारे, केजरीवाल, मेधा पाटकर अशा परजीवी लोकासोबत राहून विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्या अनेकांच्या डोक्याचा ‘केेमिकल लोच्या’ झालाय. द्वेष पसरवणं, वाद निर्माण करणं, आक्रस्ताळेपणा करणं आणि आपली असभ्य, उर्मट वृत्ती दाखवून देत येनकेनप्रकारे चर्चेत राहणं हा यांचा आवडता उद्योग. प्रत्येक घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे आणि ते ग्राह्य धरले पाहिजे या दुराग्रहामुळे त्यांचा अहंकार सातत्याने दुखावला जातो. ‘अभ्यासाविन प्रगटे तो एक मूर्ख’ हे रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान यांच्याकडे पाहून पूर्णपणे पटते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने यंदा सर्व विचारधारांच्या सर्व लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केलाय. अर्थात यात कुणाचीही विचारधारा बघितली नाही तर त्यांची साहित्यिक ‘कलाकृती’ बघितली. यांचा आक्षेप मात्र फक्त सच्चिदानन्द शेवडे यांच्या पुस्तकावरच आहे. मनाच्या या कोतेपणामुळेच महाराष्ट्र कधीही पुरोगामी राज्य होऊ शकले नाही आणि अशा चिरकुटांची बौद्धिक दिवाळखोरी पाहता भविष्यातही ते कधी होईल असे वाटत नाही, हेच यानिमित्ताने अधोरेखित करावे वाटते.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Saturday, May 27, 2017

मृत्युंजयी!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. निलंगा येथून परतताना त्यांच्या विमानाचा छोटासा अपघात झाला. सुदैवाने त्यात कुणालाही काही लागले नाही.  या दुर्घटनेमुळे महत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांचे विमान कोसळणे हा निव्वळ अपघात असला तरी या घटनेकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. या अपघातातून बचावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 11 कोटी 20 लाख जनतेचे, आई भवानीचे, पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्यावर मुख्यमंत्री थोडक्यात बचावल्याची बातमी समाजमाध्यमांत आली आणि अनेक प्रतिक्रियावाद्यांच्या अनेक प्रवृत्तींचे दर्शन घडले.
‘ये, उग काई बी बोलू नका बे, वजन वाडल्यानं काय इमान पडत न्हाय’, ‘आज अमावस्या असल्यानं मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळायला हवा होता, भूतं सोडतील का?’, ‘मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा हा तळतळाट आहे’, ‘हा पुनर्जन्म समजून आता तरी मामुंनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे’, ‘यातून हा वाचला हे महाराष्ट्राचे दुर्दैवच’, ‘विलासरावांच्या जयंतीच्या पूर्वदिनी त्यांनी ह्याला पाडले’ ‘ह्ये लोकान्सी तर फशीवत्यातच पर यांनी यमदेवालाबी फसवलं’, ‘जर कुणाला भल्लाळदेवची गाडी बनवायची असंल तर त्यांनी निलंग्यात जावं. तिथं हेलिकॅप्टरची पंख पडल्यात’ या व अशा स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रियांचा पाऊस समाजमाध्यमांत पडला.
काही तथाकथित पुरोगाम्यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचेही सांगितले; मात्र त्याचवेळी ‘मुख्यमंत्र्यांविषयी इतके सुमार विनोद होतात म्हणजे त्यांची लोकप्रियता किती घसरलीय? सोशल मीडियावर ‘लाफ्टर चॅलेंज’चा मुकाबला का सुरू झाला?’ असाही प्रश्‍न उपस्थित केला. ‘इथं हेलिकॉप्टर पडून काही होत नाहीये, तिथं मुंडेंच्या गाडीला धक्का लागून मृत्यू होतोय... दया कुछ तो गडबड है...?’ अशीही कुजकट शंका काहींनी उपस्थित केली; तर ‘ह्याची पुण्याई म्हणून हा वाचला म्हणता; मग आर. आर. आबा, विलासराव, महाजन, मुंडे यांची पुण्याई नव्हती का?’ असाही प्रश्‍न काहींनी उपस्थित केला. या सगळ्यावरून एकंदरीत आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे लख्खपणे दिसते.
माणसाला तंत्रज्ञानाचं वरदान लाभलंय असं म्हणताना ते टोकाचं मारक ठरतंय, हेच आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय आणि प्रत्येक स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. मग ‘विचारवंत’ म्हणून मिरवण्याचा त्यातला त्यात सोपा पर्याय म्हणजे ‘व्हाट्स ऍप’ला जे काही येईल ते जसेच्या तसे पुढे पाठवणे....! या तंत्रज्ञानाच्या गैरवापरापुढे माणसाने त्याची बुद्धी वापरणे सोडून दिले आहे की काय, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे कधी नव्हे इतका जातीयवाद पसरवला जात असून यात सुशिक्षितांचे प्रमाण मोठे आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सातत्याने जातीवरून डिवचले जातेय, हे जगजाहीर आहे. पुरोगाम्यांचे ‘जाणते राजे’ म्हणून मिरवून घेणार्‍या शरद पवार यांनी तर ‘पूर्वी शाहू महाराज पेशव्यांची नेमणूक करायचे आता पेशवे महाराजांची नेमणूक करतात’ असे उघडपणे बोलून त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती. बी. जी. कोळसे पाटील यांच्यासारख्या एकेकाळी न्यायाधीश असलेल्या माणसाने कुलभूषण जाधव यांचा खटला लढवणार्‍या वकिलाची ‘जात’ काढून त्यांच्या ‘काळ्याकुट्ट’ मनोवृत्तीचे दर्शन घडवले. कोणतीच भूमिका न घेणं ही एकमेव भूमिका घेणार्‍या साहित्य क्षेत्रानं याविषयी मूग गिळून गप्प बसणं पसंत केलं असताना संजय सोनवणी यांच्यासारखा लढवय्या लेखक मात्र या प्रवृत्तीला अपवाद ठरला. त्यांनी ‘कोळश्यां’ची जाहीर लक्तरे काढून हे समाजासाठी किती घातक आहे याची जाणीव करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या अपघाताने लोकांची मानसिकता दिसून येतेय. त्यावरून आपल्या राष्ट्राचे भवितव्य काय असेल आणि आपण कोणत्या दिशेने जातोय याचे चित्र स्पष्ट होते.
माणसाच्या मरणावर टपून बसलेली गिधाडं पुरोगामीपणाची अक्कल समाजाला शिकवतात. एखाद्यावर कोणतेच आरोप करणे शक्य नसेल तर त्याची जात काढायची हे शेवटचे अस्त्र त्यांना ठाऊक असते. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तेच होतेय. खरंतर मुख्यमंत्री या नात्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा नेता. त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद असू शकतात; पण त्यांचे जगणे का नाकारावे? तो जगला तर भांडत बसू! त्यातून काही विधायक हाती येईल! पण अपघातातून तो बचावला तर यांची विनोदबुद्धी जागी होते!! यालाच तर द्वेष म्हणतात! बरं, हे दीर्घद्वेषी लोक मरणाचाही आनंद साजरा करतात. त्यापुढे जाऊन गांधी हत्येनंतर कसे पेढे वाटले गेले इथपासून ते सावरकरांनी नथुराम गोडसेला ‘यशस्वी व्हा, काम फत्ते केल्याशिवाय परत येऊ नका’ हे कसे सांगितले इथपर्यंतचे दाखले देतात. ते देताना ते या प्रत्येक घडामोडीचे ‘प्रत्यक्ष साक्षीदार’ होते, असा त्यांचा आविर्भाव असतो!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपघातानंतर अजित पवार यांनी मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या संरक्षणाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे वेळोवेळी ‘मेंटनंस’ होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या माणसाच्या जीवाची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विमान हे जगातल्या काही अव्वल विमानांपैकी एक आहे. त्याचा वैमानिक हा अत्यंत अनुभवी आणि कुशल आहे; मात्र महाराष्ट्राच्या मंत्रालयाकडे हे एकच अत्याधुनिक विमान आहे. याचा वापर केवळ राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या दौर्‍यासाठी करावा असा संकेत आहे. तो संकेत धुळीस मिळवून कोणताही मंत्री त्याच्या गरजेसाठी या विमानाचा वापर करतो. इतकेच नाही तर निवडणुकीत प्रचारदौर्‍यासाठीही या विमानाचा वापर केला जात असल्याचे पुढे येत आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक सूचना मांडली आहे. ‘प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक हेलिपॅड असावे. त्याची योग्य ती निगाही राखली जावी. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती त्या त्या जिल्ह्यात आल्यास त्याच ठिकाणी सुरक्षितपणे उतरतील. तिथून पुढचा प्रवास इतर वाहनाने करणे सहज शक्य असते.’ त्यांच्या या सूचनेचाही विचार केला जावा.
शासकीय विमान, त्याची देखभाल, दुरूस्ती आणि वर सुचवलेले काही पर्याय याला मोठा खर्च येणार असल्याने हे टाळले जाते. अनेक महत्त्वाच्या योजनांचा निधी अपुरा पडत असताना असा खर्च सरकारी तिजोरीतून केला तर विरोधक त्यावर तुटून पडतील हे साधे गणित आहे; पण राज्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांची आणि इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची सुरक्षा हेही आपले कर्तव्य नाही का? आपापल्या अधिकारांसाठी सर्व समाजघटक भांडत असताना त्यांना या कर्तव्याचा मात्र सोयीस्करपणे विसर पडतो.
अफजलखानाच्या वधानंतर त्याची समाधी बांधणार्‍या शिवरायांच्या महाराष्ट्रात राज्याचा प्रमुख मेला कसा नाही? म्हणून त्रागा केला जातो आणि कुणी मरणाच्या दारात असेल तर आनंदोत्सव साजरा केला जातो; हे आपल्या सर्वांचेच दुर्दैव! ही मुर्दाड मानसिकता आपल्याला कुठे घेऊन जाईल हे ठाऊक नाही. ‘मी आणि माझे’ अशी मानसिकता गेल्या काही वर्षात वाढत गेली आहे. आता त्यापुढे जाऊन ‘माझे माहीत नाही पण समोरच्याचे आधी वाटोळेच झाले पाहिजे’ अशी मानसिकता निर्माण होत चालली आहे. जे विध्वंस घडवतात त्यांच्यात निर्मितीची क्षमता अभावानेच असते. अशा विध्वंसी मानसिकतेची कीड आपल्याला लागलीय. मुळात एक माणूस म्हणून जे काही थोडेफार चांगूलपण असावे तेही अस्तास जात आहे. त्यामुळे भविष्यात ही समस्या अक्राळविक्राळ रूप घेईल हे वेगळे सांगायला नकोच!
आपल्या राज्याचे प्रमुख एका अपघातातून बचावलेत. त्यांच्या मर्यादा आणि त्यांचे सामर्थ्य या दोन्हींची पूर्ण जाणीव त्यांना आहे. कर्तव्यतत्परता, प्रत्येक समस्येचा मुलभूत अभ्यास, व्यापक दृष्टिकोन आणि स्वच्छ चारित्र्य हे त्यांचे भांडवल आहे. म्हणूनच मग जातींचे राजकारण केले जाते. त्यांच्या अपघातातून वाचल्याचा खेद व्यक्त केला जातो. हे सारे क्लेषकारक आहे. संगमनेर येथील कवी मुरारीभाऊ देशपांडे या प्रवृत्तीविषयी लिहितात,
अपघातातून ‘सीएम’ बचावताच
प्रतिक्रिया आल्या रग्गड
विकृत, हीन वृत्तीचे
महाभाग पडले उघड


मरणावर टपलेली गिधाडे
घिरट्या घालून थकली
यमराजसुद्धा म्हणाला,
आमची वाट चुकली!


ही ‘चुकले’ली वाट मुख्यमंत्र्यांना ‘जीवनदान’ देणारी आहे, याचा या राज्याचा नागरिक म्हणून मला आनंद वाटतो. या गोष्टीचा ज्यांना पोटशूळ वाटतो त्यांना पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची उमेद सोडू नये आणि याच जोशात, याच उत्साहात भविष्यात विधायकतेचे डोंगर उभारावेत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. चिल्लरथिल्लर घुबडांच्या बुभुक्षित नजरांपेक्षा मुख्यमंत्र्यांविषयी जिव्हाळा असणारे अधिक आहेत आणि हेच देवेंद्रांचे मोठे यश आहे, इतकेच!

घनश्याम पाटील
7057292092


 


Sunday, May 21, 2017

स्मरण ‘राजहंसा’चे!

 
एखादा जवळचा माणूस अचानक आपल्यातून गेला की, त्याच्या आठवणीने मन व्याकुळ होते. त्याचे ‘नसणे’ मान्य करणे आपल्याला अवघड जाते. निसर्गनियमापुढे कुणाचे काही चालत नाही, ते अटळ आहे हे माहीत असूनही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. त्या माणसाच्या आठवणी दाटून आल्या की अश्रूंचा बांध फुटतो. परमेश्‍वर इतका निष्ठुर कसा, असे उगीचच वाटू लागते. अतीव दुःखाने आपण भयकंपित होतो. जवळच्या माणसाचे चटका लावून जाणारे ‘जाणे’ पचवणे फार अवघड असते.
विलासराव देशमुख असेच अचानक गेले. महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणार्‍या सर्व क्षेत्रातील लोकांना हा मोठा धक्का होता. माणूस गेल्यानंतर त्याचे मोठेपण कळते. जिवंतपणी त्याची कदर करणारे तुलनेने फारच कमी असतात. आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. विलासरावांच्या जाण्याने एक अफाट क्षमतेचे पर्व संपले. याच आठवड्यात, म्हणजे 26 मे रोजी त्यांची जयंती! त्यामुळे या राजहंसाचे स्मरण करताना डोळे आपोआपच पाणावतात. हीच या लोकनेत्याची पुण्याई!
एक जळणारा दोरा मेणबत्तीला विचारतो, ‘‘जेव्हा मी जळत असतो तेव्हा तू स्वतःला का संपवतेस?’’ मेणबत्ती म्हणते, ‘‘अरे, ज्याला आपल्या हृदयात स्थान दिलं तो जळतोय हे पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येणारच ना!’’ विलासरावांच्या बाबतही काहीसं असंच झालं. लोकांना आपल्या भावनांचा बांध आवरणे अवघड जात होते. हे रडणे नाटकी नव्हते. एक विकासपर्व संपल्याची जाणीव झाल्याने प्रत्येकाला पोरके झाल्यासारखे वाटत होते.
सरपंच ते केंद्रीय मंत्री अशा दीर्घ प्रवासात विलासरावांनी असंख्य माणसे जोडली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढउतार अनुभवले; मात्र कधी कुणाविषयी आपल्या मनात द्वेष बाळगला नाही. शत्रू असला तरी त्याचे निष्कपटपणे हसून स्वागत करणारे विलासराव राजकारणात त्यामुळेच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. ते शरीराने गेले असले तरी त्यांचे विचार कायम जिवंत राहतील. राजकारणात भवितव्य आजमावू पाहणार्‍यांना प्रेरणा देतील.
आपल्या जगण्यावर आणि जन्मावर विलक्षण प्रेम करणारे विलासराव हे वैभवशाली कुटुंबातून पुढे आले होते. ‘गढीवरच्या देशमुखांचे’ त्यांचे घराणे! त्यांच्या रूबाबदार व्यक्तिमत्त्वाचा सरंजामशाही थाट प्रत्येकाला लुभावणारा होता. रयतेची काळजी घेणारे विलासराव गरिबीत कधी जगले नाहीत; मात्र गरिबांविषयी त्यांच्या मनात कनवाळा होता. श्रीमंतीची, अधिकाराची किंवा पदाची मिजास त्यांना कधी वाटलीच नाही. प्रत्येक क्षण हा लोकांच्या भल्यासाठी जगायचा हेच त्यांचे तत्त्वज्ञान! यश-अपयशाची पर्वा न करता ते अखंडपणे राजहंसी डौलात चालत राहिले.
लातूरविषयी त्यांंच्या मनात प्रचंड जिव्हाळा होता. 1982 साली धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्हा अस्तित्वात आला. त्यांनतर लातूरच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. ‘जे नवे; ते लातूरला हवे!’ असा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांनी अनेक कर्तबगार अधिकारी लातूरला आणल्यानेच लातूरचा विकास शक्य झाला. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणे, सुख-दुःखात सहभागी होणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष!
त्यावेळी नव्यानेच लातूर महानगरपालिका अस्तित्वात आली होती. लातूरचा पहिला महापौर कॉंग्रेसचा होऊ नये यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. देवेन्द्र फडणवीसांसारख्या नेत्याने लातूरात ठाण मांडून वातावरण तापविले. त्यात त्यांना यश आले नाही हा भाग निराळा; पण या काळात विलासरावांनी लातूरमध्येच आपला तळ ठोकला. एक केंद्रीय मंत्री लातूरसारख्या स्थानिक निवडणुकीत इतके लक्ष का घालतात, अशी टीका त्यांच्यावर झाली. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्यातील प्रेमळ नेत्याचे दर्शन घडवून देते.
ते म्हणाले, ‘‘मी लातूरात फक्त माझ्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाच्या काळात त्यांची साथ द्यायला आलोय. महानगरपालिकेचा नगरसेवक हे माझ्या दृष्टीने छोटे पद असले तरी या कार्यकर्त्यांचे ते फार मोठे स्वप्न आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीत हेच कार्यकर्ते पूर्णवेळ सक्रीय असतात; सर्व कामकाज, प्रचार हेच लोक पाहतात. त्यांच्यामुळेच माझे अस्तित्व आहे. मग त्यांच्या कठीण काळात मी त्यांच्यासोबत राहिलो तर बिघडले कुठे?’’ असे होते विलासराव!!
कुणालाही ‘नाही’ म्हणणे त्यांना कधीच जमले नाही. त्यांच्याकडे कुणीही, कुठलेही काम घेऊन गेले तरी त्यावर हमखास मार्ग निघायचा. आलेला प्रत्येक फोन स्वतः घेणे आणि प्रत्येकाशी त्याच्या अडचणींसंदर्भात बोलणे ही त्यांची खासीयत! त्यांच्या भिडस्त स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला पण त्यांनी त्यांचे चांगुलपण कधी सोडले नाही.
साहित्य, संगीत, नाट्य अशा कलांची अमर्याद आवड जोपासणारे विलासराव संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी आग्रही असायचे. विरोधकांशीही वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणारा हा नेता म्हणूनच कॉंग्रेसचा ‘आधारवड’ होता. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेकवेळा आंदोलनाचा इशारा दिला; मात्र प्रत्येकवेळी त्यांना थोपवून ठेवण्यात विलासराव यशस्वी ठरले. इतकेच काय पण दिल्लीत अण्णांनी आंदोलनाचे अस्त्र उपसल्यानंतर सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच पडली आणि त्यांनी ती चोखपणे पारही पाडली.
आमच्या लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात वेळ आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यादिवशी पांडवांचे पूजन केले जाते. रानात आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना बोलवून वनभोजनाचा आनंद लुटला जातो. आंबील, खीर, भज्जी, भाकरी, तिळाच्या पोळ्या हे त्यादिवशीचे विशेष! विलासराव यादिवशी मुंबईहून न चुकता बाभळगावला येत. ‘देशमुख गडी’वर त्यादिवशी आनंदाला भरते आलेले असे. मुंबईहून येताना ते तेथील अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या मित्रांना आवर्जून सोबत आणत. लातूरपासून बाभळगावपर्यंत असणारा हा गाड्यांचा ताफा त्यांच्यातील उत्साहाचे प्रतिक असायचा. आता हे चित्र दिसत नसल्याने अनेकांच्या दुःखाचे बांध फुटत आहेत.
1971 साली विलासराव शिक्षणासाठी म्हणून पुण्यात होते. त्यावेळी त्यांना सिनेमाची जबरदस्त आवड होती. पुढे हा मुलगा ‘राजकारणातला सुपरस्टार’ होईल असे कोणी भाकित केले असते तर कदाचित त्यावर कुणी विश्‍वात ठेवला नसता पण ही किमया घडली. पुणे आणि लातूर येथे जेमतेम साडेतीन वर्षे वकिली केल्यानंतर ते बाभळगावच्या राजकारणात सक्रिय झाले. गावची ‘देशमुखी’ असल्याने सरपंचपद त्यांच्याकडे चालत आले. पुढे उल्हासदादा पवार यांच्या शिफारशीनुसार त्यांना धाराशिव जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. आमदार झाल्यानंतर वेगवेगळ्या मंत्रीपदाच्या खात्याचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी आपली छाप उमटवली.
1995 साली त्यांच्या सुसाट सुटलेल्या वारूला लगाम बसला. विधानसभेत त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. अशी अचानक खिळ बसल्याने त्यांना नैराश्य आले होते. कॉंग्रेसनेही त्यांच्याकडे याकाळात दुर्लक्ष केले पण पराभवातून आलेल्या या संधीचा फायदा उठवत त्यांनी आपला दिल्लीतील संपर्क वाढवला. प्रत्येकाशी चांगले संबंध प्रस्थापित केले. पुढे 1999 ला मोठ्या मताधिक्क्याने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
त्यांनी आपल्याला मदत करणार्‍या प्रत्येकाला भरभरून दिले. मध्यंतरी अडगळीत पडलेल्या उल्हास पवारांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांनी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
या नेत्याचे अचानक जाणे त्यामुळेच चटका लावणारे आहे. सध्याच्या भयंकर राजकीय वातावरणात मुळातच ‘चांगल्या’ राजकारण्यांची कमतरता आहे. ज्यांच्याकडून देशहिताच्या काही अपेक्षा ठेवता येतील, असे नेते प्रमाणाने खूपच कमी आहेत. विलासराव देशमुखांच्या अकल्पित जाण्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. सध्या राज्यात आणि देशात मोेठे परिवर्तन घडलेय. विलासरावानंतर लातूरचीही गणिते बदललीत. त्यांनी लातूरात मोठ्या प्रमाणात उद्योग आणले होते पण त्यांच्या जाण्याने त्यातील अनेक प्रकल्प परत गेले. आता तर उगवत्या सूर्याला नमस्कार करावा याप्रमाणे लातूरकरांनी अनेक बदल स्वीकारलेत पण तरीही विलासराव देशमुख यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्याची उणीव पावलापावलाला जाणवते. लातूर आणखी विकासासाठी आतूर आहे. विलासरावांच्या जाण्याने अनेक योजनांना खीळ बसलीय. राजकीय नेता म्हणून त्यांच्याबाबत काहींची मतमतांतरे नक्की असू शकतात पण त्यांच्या आठवणीने माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे व्याकूळ होणे हे त्यांचे माणूस म्हणून असलेले मोठेपणच आहे. ते नाकारणे त्यांच्या तथाकथित विरोधकांनाही शक्य नाही.
- घनश्याम पाटील
7057292092



Sunday, May 14, 2017

‘साला’ची साल किती काढणार?


राजकारण हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी त्याला समाजकारणाची कड होती. सध्या राजकारणातून फक्त लाभ बघितले जातात. सत्तेच्या राजकारणाचा हव्यास सुटल्याने त्यातील सेवाधर्म मागे पडत गेला आणि हा धंदा बनला. कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना राजकारण्यांना नैतिकेतेची चाड राहत नाही. मग त्यातूनच एक मस्तवालपणा अंगात येतो आणि सत्तेचा कैफ चढल्याने आपण कुणी फार वेगळे आहोत असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो. आजूबाजूची परिस्थिती त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालते आणि ते स्वतःला राजे समजू लागलात. त्यातून त्यांच्या वागण्यात बेतालपणा येतो. रगेलपणा वाढत जातो. दर्पोक्तीचे ग्रहण त्यांना लागते. मनावरचा ताबा सुटल्याने हवी ती विधाने त्यांच्या तोंडात येतात. काही काळासाठी त्यातून जनभावना दुखावल्या जातात आणि पुन्हा लोक सगळे विसरतात व ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते.
हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान! जालना (मराठवाडा) येथे भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना तुरीवरून प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्या कार्यकर्त्याला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तू जास्त पेपर वाचतो का? वाचू नको... तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी हे विषय सध्या तुम्ही बंद करा. ज्या मालाचे हमीभाव केंद्र सरकारने ठरवले आहेत तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी केला जात असेल तर सरकार 25 टक्के माल खरेदी करते. आपल्या सरकारने तर सारीच्या सारी तूर घ्यायला सुरूवात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 400 रूपयांपेक्षा जास्त अनुदान तुरीला दिले आहे. त्यामुळे रडे धंदे करू नका. आपल्या कार्यकर्त्यांनी आता रडायचे नाही लढायचे! पुन्हा काढायचा नाही आता तुरीचा विषय. ते काय ते आम्ही बघू. सगळी तूर आम्ही खरेदी करणार आहोत. आता परवाच एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्राने परवानगी दिली. तरीही रडतात साले...!’’
त्यांच्या या विधानातील ‘साले’ या शब्दावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमात, समाजमाध्यमात केवळ दानवे यांचाच उद्धार होत आहे. आतापर्यंत राजकारण्यांची असभ्य, अप्रगल्भ, असंविधानिक भाषा आपण अनेकवेळा बघितली आहे. अगदी ‘धरणात पाणी नाही तर मी त्यात मुतू का?’ असाही प्रश्‍न यापूर्वीच्या उपमुुख्यमंत्र्यांनी विचारला होता. इतकेच काय तर ‘ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांना रात्री काही काम नसते; म्हणूनच आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललीय’ असेही वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजे कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी ‘आत्मक्लेश’ही केला. या पार्श्‍वभूमीवर हेच नेते आज दानवे यांच्या ‘साला’ शब्दावरून राजकारण करत आहेत. शेतकर्‍यांचा केवळ आपल्यालाच कसा पुळका आहे हे दाखवताना दानवेंचा मात्र वाटेल त्या शब्दात उद्धार करत आहेत. शेतकर्‍यांचा संताप आणि आक्रोश व्यक्त करतोय असे म्हणत दानवे यांना शिव्यांची जी लाखोली वाहिली जात आहे ती यांचा खरा चेहरा दाखवून देणारी आहे.
दानवे हे ग्रामीण मुशीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांचे आईवडील स्वतः शेतकरी होते. हा माणूस सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून राहणारा आहे. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून ते त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या साधेपणाचे अनेकांनी अनुभव घेतले आहेत. सत्तेची आणि पदाची कसलीही धुंदी नसणारा हा रस्त्यावरचा माणूस आहे. गावच्या सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कुणालाही अचंबित करायला लावणारा आहे. हा माणूस त्यांच्या मतदारसंघात पायी फिरतो. बांधावर जाऊन शेतकर्‍यांसोबत त्यांच्या डब्यातली भाकरी खातो. त्यांची सुखदु:खे समजून घेतो. नेता म्हणून नव्हे तर प्रामाणिक लोकप्रतिनिधी या भावनेतून त्यांना जमेल तशी मदत करतो. म्हणूनच रोजच्या बोलण्यात जे एकमेकांचा आईबहिणीवरून उद्धार केल्याशिवाय चार वाक्येही धड बोलू शकत नाहीत, ते दानवेंच्या ‘साला’ शब्दावरून रान पेटवत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळसच म्हणायला हवा.
मुळात दानवे ज्या कार्यक्रमात बोलले ती कसली सभा नव्हती. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. हे वाक्य त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला उद्देशून वापरल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे. मात्र पराचा कावळा करणार्‍यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यापासून, जाळपोळ करण्यापासून ते त्यांच्या राजीनाम्यापर्यंतची मागणी लावून धरली आहे. ‘आदर्श’ प्रकरणात ज्यांचे हात कोळशासारखे काळेकुट्ट झालेत असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, करंगुळीवीर अजित पवार असे नेते दानवे यांच्या ‘साला’ शब्दावरून जेव्हा जंग जंग पछाडतात तेव्हा कुणालाही आश्‍चर्य वाटते. प्रसारमाध्यमांनी या घटनेत अकारण हवा भरल्याने दानवे यांच्यासारखा कार्यक्षम नेता हकनाक बळी जातोय. त्यांच्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही जे सुडाचे राजकारण केले जातेय ते महाराष्ट्राच्या सभ्य संस्कृतीला तडा देणारे आहे.
मुळात रावसाहेब दानवे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा ‘एक दानवे, बाकी जानवे’ अशा शब्दात आम्ही त्यांचे वर्णन केले होते. भाजपसारख्या पक्षाला जातीवादाच्या विटाळातून बाहेर पाडण्यात ज्या मोजक्या नेत्यांचा हात आहे त्यात दानवे यांचे स्थान मोठे आहे. महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा पक्ष झालेल्या भाजपाचे सर्वसमावेशक धोरण टिकून आहे ते दानवे यांच्यासारख्या नेत्यांमुळे! स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केले तोच वारसा दानवे नेटाने पुढे चालवत आहेत आणि हेच विरोधकांचे खरे दुखणे आहे. म्हणूनच अगदी ठरवून त्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे.
यापूर्वी नाशिक येथे त्यांनी शेतकरी आत्महत्येवरून जे वक्तव्य केले होते त्यावरून त्यांना अडचणीत आणले गेले. त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त जो अवाढव्य खर्च केला गेला त्यावरून टिकेची झोड उठवली गेली. प्रत्यक्षात त्या लग्नाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते विरोधकांपर्यंत सर्वजण सहभागी होते. मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना कोट्यवधी रूपयांचा चुराडा का केला असा त्यांच्यावरचा आक्षेप! यापैकी कितीजणांनी या लग्नाच्या खर्चाचा तपशील मागितला? दानवे यांनी हा खर्च केवळ काळ्या पैशातून केला का? त्या खर्चाचा तपशील, त्यांनी मिळवलेल्या संपत्तीचा कर त्यांनी भरलाय का हे खरे प्रश्‍न असायला हवेत. जर त्यांनी नैतिक मार्गाने हा पैसा मिळवला असेल तर तो त्यांनी कुठे आणि कसा खर्च करावा  याबाबत त्यांना सांगणारे आपण कोण? तो पैसा ते त्यांच्या मुलाच्या लग्नात खर्च करतील किंवा दानधर्म करतील! तो पूर्णतः त्यांचा अधिकार आहे.
यापूर्वी दुष्काळात सामान्य माणूस तग धरून रहावा म्हणून रोजगार हमीसारख्या योजना राबवल्या गेल्यात. रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला याचा अर्थ त्या परिसरातील अनेकांना मोठ्या संख्येने रोजगारच मिळाला. मग हे वाईट आहे का? आयुष्यात एक रूपयाही कधी कोणत्या विधायक कामाला न देणारे अशा खर्चावरून बोलतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते.
शेती आणि शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. विरोधक त्यावरून सातत्याने राजकारण करतात. ते करायलाही हवे; मात्र नैतिकतेचे डांगोरे पिटताना आपण किती स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवण्याचा जो केविलवाणा अट्टाहास आहे तो वाईट आहे. ‘रावसाहेब दानवे यांना पदावरून दूर करण्याची मागणी करू नका. असे नेते भाजप बुडवायला पुरेसे आहेत. त्यांच्यामुळे आपले काम सोपेच होत आहे’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलीय. ‘जाणता राजा’ असे बिरूद मिरवणार्‍या या नेत्याने केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने भरीव योगदान दिले असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी शेतकर्‍यांसाठी काही ठोस केल्याचेही उदाहरण नाही. त्यांनी ‘कर्जमाफी’चा निर्णय घेतला खरा; पण त्याचे फलित काय? आज शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झालाय आणि पुन्हा कर्जमाफीचीच मागणी सुरू आहे. त्यावरून राज्य पेटवले जातेय. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे असे नेते लोकक्षोभ ओढवून सत्य सांगण्याचे काम करत आहेत. कर्जमाफीने तत्कालीक प्रश्‍न सुटतील पण शेतकर्‍यांना सावरण्याचा हा उपाय होऊ शकत नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या खायीत ढकलला जाईल. त्यांच्यासाठी भरीव अशा काही योजना राबवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. आपण त्याकडे सकारात्मक दृष्टिने पहायला हवे. दानवे यांच्या ज्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे त्यातील ‘साला’ हा शब्द सोडला तर बाकी काहीही चुकीचे नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते त्यांची बाजू उत्तम पद्धतीने मांडताना दिसतात. ‘रडायचे नाही, लढायचे’ असे म्हणत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसतात. त्यामुळे याची आपण आणखी किती साल काढणार? तळागाळातून वर आलेल्या आणि शेतकर्‍यांच्या  परिस्थितीची योग्य ती जाण असलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्याला संपवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे आणि दुर्दैवाने आपली प्रसारमाध्यमेही एकतर्फी बाजू मांडत त्यांना सहकार्य करत आहेत. यात सार्‍यांचेच हात बरबटले असल्याने दानवे यांना एकट्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे योग्य होणारे नाही.
- घनश्याम पाटील
7057292092


Saturday, April 29, 2017

खरा वीर वैरी पराधीनतेचा


महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!
मुंबईसह अखंड महाराष्ट्राचे सेनानी सेनापती बापट यांच्या या ओळी! सेनापती बापट, आचार्य अत्रे अशा धुरिणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असे म्हणणारे यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि अखंड महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांनी वाजत गाजत आणला. त्यावेळी आचार्य अत्रे यांच्यासारख्या या लढ्यातील प्रमुख सेनानीला साधे बोलवायचे सौजन्यही तेव्हाच्या नेतृत्वाने दाखवले नाही. 1 मे 1960 नंतर आता 2017 पर्यंत महाराष्ट्र ज्या स्थित्यंतरातून जातोय त्यामुळेच ते पाहणे मोठे मनोरंजक आहे.
‘हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे?’ असा सवाल ग. त्र्यं. माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाण यांना केला. त्यावेळी त्यांनी हे राज्य ‘मराठी’चेच असल्याचे सांगितले होते. त्यांच्यानंतर ‘मराठा’ नेते अशीच प्रतिमा असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीर्घकाळ महाराष्ट्राचे नेतृत्व केले. प्रारंभीच्या काळात यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा पवारांनी घेतला; मात्र पुढे पुढे त्यांची दिशा बदलत गेली. अफाट महत्त्वाकांक्षेने ग्रासलेल्या या नेत्याने देशाच्या राजकारणात आपली छाप उमटवली; पण राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांना विश्‍वासार्हता निर्माण करता आली नाही. त्यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही अशी अनेकांची गत असतानाही शरद पवार काळाच्या कसोटीवर पिछाडीवर पडले. अन्यथा त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला पंतप्रधान मिळाला असता; पण ते होणे नव्हते!
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने महाराष्ट्राचा गाडा हाकला! पण अनेक ‘खुरट्या’ नेत्यांनी महाराष्ट्राला बरेचसे मागे नेले. नारायण राणे, अशोक चव्हाण अशांची ‘आदर्श’ कारकिर्द आपण बघितली आहेच. वसंतदादा पाटील यांच्यासारखा साधा नेता या राज्याचे कधीकाळी नेतृत्व करायचा ही गोष्ट आता अविश्‍वसनीय वाटावी इतकी राजकारणाची पातळी घसरली आहे.
महाराष्ट्रासाठी या सर्व नेत्यांनी, सत्ताधार्‍यांनी जे काही बरेवाईट करायचे ते केले! पण आज महाराष्ट्राची नेमकी काय गत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. सर्व समाजातील वाढलेला कट्टरतावाद, जातीय अस्मितेचे ओंगळवाणे प्रदर्शन, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, श्रमाची प्रतिष्ठा धुळीस मिळणे, प्रामाणिक आणि कर्तबगार लोकांवर आणि त्यांच्या गुणवत्तेवर केलेला अन्याय, स्त्रियांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, अजूनही मुलभूत सेवासुविधांपासून अनेकजण कोसो मैल दूर असणे, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचेही बाजारीकरण, बेरोजगारी, गुन्हेगारी, वाढती महागाई, या सर्वांतून निर्माण झालेली असुरक्षितता या व अशा असंख्य गोष्टींमुळे महाराष्ट्र ‘महान राष्ट्र’ होऊ शकले नाही.
मुलगी झाली म्हणून तिला विष खाऊ घालून मारणारा बाप आणि आपल्या लग्नासाठी बापाकडे पैसे नाहीत, तो कर्जबाजारी असल्याने अजून त्याच्या दुःखात भर नको म्हणून आत्महत्या करणारी मुलगी हे दुर्दैवी चित्र अजूनही महाराष्ट्रात आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा यासाठी काही गंभीर प्रयत्न होताना दिसत नाहीत. या सगळ्या परिस्थितीला कंटाळलेल्या जनतेने देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठे परिवर्तन घडवले. कॉंग्रेसची राजवट जाऊन भाजपचे सरकार स्थिरावले आहे. हे परिवर्तन मात्र केवळ ‘खांदेपालट’ इतक्याच स्वरूपाचे होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ची घोषणा दिली होती. प्रत्यक्षात आज मात्र ‘कॉंग्रेसयुक्त भाजप’ अशी परिस्थिती निर्माण झालीय. निवडणुकीच्या आधी चार-दोन दिवस भाजपमध्ये दाखल झालेले अनेकजण आज सत्तेत आहेत. म्हणूनच एकीकडे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये धडाकेबाज निर्णय घेऊन आपली कृतीशिलता दाखवून देत असताना इथले सरकार मात्र ढीम्म आहे. विरोधकांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून पक्षात सामावून घेतल्याची चर्चा सर्वत्र जोरकसपणे सुरू आहे. ‘इनकमिंग फ्री’ ही पद्धत इतक्या टोकाला गेली की विचारता सोय नाही.
राज्यात नुकत्याच काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. पुण्यासारख्या शहरात एका मताचा भाव होता पाच ते आठ हजार रूपये! कोणी कितीही संतपणाचा आव आणला तरी ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जे भाजपमध्ये आले त्यांच्यावर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन सहकारी उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली होती. म्हणजे एका मतदारसंघात कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून आयात केलेला एक उमेदवार असेल तर त्याने त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजपायींचा पूर्ण खर्च करायचा. अशापद्धतीने पैशाचा पाऊस पाडल्याने अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल आले आहेत.
मध्यंतरी मराठा मूक मोर्चाची हवा जोरात होती. कोपर्डीतील अत्याचारित मुलीला न्याय मिळावा या मागणीपासून सुरू झालेला हा मोर्चा मराठा आरक्षणापर्यंत आला. यातून साध्य काय झाले हे अजून तरी दिसून येत नाही; पण यामुळे अनेक जातीत असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय हे मात्र नक्की! सर्वच जातीत वाढलेला कमालीचा कट्टरतावाद हे आपल्या राष्ट्राला लागलेले मोठे ग्रहण आहे. या मराठा मोर्चानंतर दलित आणि इतर बांधवांचे प्रतिमोर्चेही निघाले. प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्याने असे प्रतिमोर्चे काढू नयेत असे आवाहन केले होते; अर्थात नेहमीप्रमाणे त्यांना कोणी जुमानले नाही. ‘हम भी किसी से कम नही’ हे दाखवून देण्याची अहमहमीका सर्वच जातीत निर्माण झालीय. त्यातूनच जातीजातींत दुफळी निर्माण झाली आहे.
‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’ असे सेनापती बापटांनी सांगितले होते. मात्र हा ‘मराठा’ त्यांना ‘मराठी’ या न्यायाने अपेक्षित होता. जो कोणी महाराष्ट्रात राहतो तो ‘मराठा’ इतकी त्यांची साधी सोपी व्याख्या होती. आपण मात्र ‘मराठा’ हा शब्दच जातीयवाचक करून टाकला. अशोक चव्हाणांनी ‘आदर्श‘ हा शब्द जसा बदनाम केला तसेच काहीसे ‘मराठा’चे झाले आहे. ‘महाराष्ट्रगीत’ लिहिणार्‍या राम गणेश गडकरी यांचा पुतळाही आता महाराष्ट्रात, तेही पुण्यासारख्या शहरात सुरक्षित नाही यातच सारे काही आले.
संभाजी ब्रिगेडसारख्या काही संस्थांनी मराठ्यांना पुढे करत टोकाचा जातीय द्वेष निर्माण केला. ‘ब्राह्मणांना मारा, कापा, त्यांच्या बायका पळवून आणा’ इथपासूनची भाषा पुरूषोत्तम खेडेकर नावाच्या या संघटनेच्या टोळीप्रमुखाने केली. राष्ट्रद्रोहापासूनचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. जातीजातीत सूडभावना निर्माण करण्याचे काम यांनी नेटाने केले. वेळ आल्यावर मात्र न्यायालयात माफी मागून ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ अशी भूमिका घेतली. संस्काराचा टेंभा मिरवणार्‍या भाजपसारख्या पक्षानेही मग अशा सगळ्या प्याद्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यातूनच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनाग भाजपमधून उमेदवारी मिळाली. हेच शिवीश्री खेडेकर उगवत्या सूर्याला नमस्कार करावा याप्रमाणे आता भाजपची भलावण करताना दिसतात. ‘मराठा मोर्चा हा मराठ्यांचा सर्वात अविवेकी निर्णय होता’, ‘ब्राह्मण समाजात सगळेच वाईट नसतात’, ‘मुख्यमंत्री ब्राह्मण असले तरी कर्तबगारीच्या पातळीवर त्यांचा हात कुणी धरू शकत नाही’, ‘शरद पवार हे कट्टर जातीयवादी नेते आहेत’ अशी विधाने खेडेकरांनी सुरू केली आहेत. सरड्यालाही लाज वाटावी इतके रंग ही माणसे बदलतात.
सेनापती बापट यांनी दिलेला महत्त्वाचा संदेश म्हणजे ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा!’ आपल्याला नेमका याचाच विसर पडत चाललाय. पराधीनता रक्तात भिनलीय. स्वावलंबन हरवलेय. त्यामुळेच नवी ऊर्जा निर्माण होताना दिसत नाही. पराधीनतेच्या मानसिकतेतून आपण पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा पराभव आपल्या संस्कारांचा आहे. आदर्शांचा आहे. मूल्यात्मकतेचा आहे. ज्यावर राष्ट्र उभे राहते तो कणखर माणूस नैराश्याने ग्रासत चाललाय. त्यातून बाहेर पडायचे तर ही पराधीनता दूर सारायला हवी. स्वार्थ साधताना स्व-अर्थ ध्यानात घ्यायला हवा. तो ज्याला कळेल तोच भविष्यात यशस्वी होईल! अन्यथा ये रे माझ्या मागल्या आहेच!

- घनश्याम पाटील, 7057292092

Saturday, April 22, 2017

साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत!

‘योद्धा संन्याशी’ अशी ओळख असलेल्या युगपुरूष स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही..’’ महापुरूषांच्या विचारधारांवरून वाद आणि वितंडवाद घालताना आपण त्यांच्या अशा मतांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतो.
सध्याचा जमाना विज्ञानाचा आहे, तंत्रज्ञानाचा आहे. आपण सर्व क्षेत्रात लक्षवेधी प्रगती करतोय. पुण्यामुंबईसारख्या महानगरातील तर घरटी एक मुलगा विदेशात आहे. असे सारे असताना दुर्दैवाने आपल्या संस्कृतीशी असलेली त्याची नाळ मात्र कायमची तोडली जातेय. ‘एनआरआय’ मुलांचे वृद्ध आईबाबा ‘येणाराय येणाराय’ म्हणत दिवस कंठतात. बाहेर गेलेली मुले आणि आपल्या देशात असणारे तरूण यांच्यापैकी काही अपवाद वगळता बहुतेकजण पाश्‍चात्य विचारधारांचे पालन करताना दिसतात. अगदी योगापासून ते गुरूकुल शिक्षणपद्धतीपर्यंत इतर प्रगत राष्ट्रे आपले अनुकरण करत असताना आपण मात्र त्यांनी फेकून दिलेल्या इहवादी परंपरांचे अंधानुकरण करतोय. नात्यातील दुरावा, उदासीनता, नैराश्य, भौतिक सुखसुविधा असूनही निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना हे सर्व त्यातूनच येत आहे. आपल्या राष्ट्रापुढील ही मोठी समस्या आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात एका नव्या राजकीय, सामाजिक पर्वाची नांदी सुरू झाली. ‘या देशात माझ्या गुणवत्तेची कदर केली जात नाही, येथे माझ्या क्षमता सिद्ध करण्याची संधी नाही, हा देश माझ्यासाठी सुरक्षित नाही, इथे उद्योग-व्यवसायासाठी पुरक वातावरण नाही, चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत’ ही व अशी कारणे मागे पडत चालल्याने आपला देशही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. या परिवर्तनात जे सहभागी होत आहेत ते देशाच्या विकासात हातभार लावत आहेत. ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हटले जाते ते उगीच नाही. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फ़डणवीस, मनोहर पर्रीकर अशी नेतेमंडळी एक ध्येय घेऊन देशाला पुढे नेत आहेत. हा बदल निश्‍चितच सुखावह आहे.
आपल्या देशातील तरूण दिशाहीन आहेत, असा आरोप सातत्याने केला जातो. त्यात काही तथ्य नाही; असे चित्र लख्खपणे दिसून येते. दिशाहीन तरूणांपेक्षा आपल्याकडे सध्या ध्येयवादी तरूणांची संख्या मोठी आहे. या तरूणाईला स्वतःबरोबर देशाचा विकास घडवायचाय. त्यांची सामाजिक बांधिलकी कमालीची आहे. विविध ठिकाणी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम निस्पृहपणे राबवणारे तरूण त्याची साक्ष पटवून देतात. मात्र ‘आमच्यावेळी असे नव्हते’ असे खोटे खोटे सांगत आजच्या तरूणाईला दुषणे देणार्‍या आणि बोल लावणार्‍यांनी एकदा त्यांच्या जीवनाच्या आरशात नीट न्याहाळून पहायला हवे. भारतात कदाचित आजवर जितक्या पिढ्या झाल्या त्यातील सर्वात कर्तबगार आणि व्यापक, सर्वसमावेशक दृष्टिकोन असणारी आजची पिढी आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये! या तरूणाईच्या ऊर्जास्त्रोतांचा, त्यांच्या उन्मेषाचा उपयोग राष्ट्रासाठी करून घेता येत नसेल तर हा दोष त्यांचा नाही तर इथल्या व्यवस्थेचा आहे. तरूण त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने उत्तमरित्या करीत आहेत. स्वतःला सिद्ध करताना दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करत आहेत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बौद्धिक क्षत्रियांची निर्मिती करायची असेल तर ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या वाढायला हवी. हे ज्ञान म्हणजे फक्त विज्ञान-तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. त्याला संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प अशा ललित कलांत आणखी मोठे व्यासपीठ द्यायला हवे. अनेक नामवंत डॉक्टर, अभियंते, वित्तीय अधिकारी यांच्यापेक्षा अनेक कलाकार प्रचंड पैसा कमावतात आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही आहे, हे सत्य आता ठळकपणे अधोरेखित केले पाहिजे. गलेलठ्ठ शूल्क भरून केवळ विज्ञान आणि वाणिज्य शाखांत प्रवेश घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. संबंधित संस्थांना हवा तितका निधी देणगी म्हणून देण्यापासून ते राजकीय हस्तक्षेपापर्यंत अनेक उद्योग केले जातात. अशा परिस्थितीत अनेक महाविद्यालयांतील कला शाखांचे वर्ग मात्र ओस पडत आहेत.
या देशातील प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी, राज्यकर्ते, विरोधी पक्ष नेते, वकील, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, इतर खाजगी उद्योगातील कर्मचारी असे कित्येकजण कला शाखांतून जातात. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांत मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करून आपले इप्सित साध्य करतात. आपल्याकडे प्राध्यापकांना पगारही लाखोंच्या घरात आहे. तितकी कमाई तर अनेक डॉक्टरांचीही होत नाही. शिवाय प्राध्यापकांना, कलाकारांना समाजात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे कला शाखांकडे  अक्षम्य दुर्लक्ष करण्याचा अविचार मुलांनी आणि पालकांनी मुळीच करू नये. विद्यार्थ्याच्या कलागुणांनुसार जर कुणाला डॉक्टर, अभियंता व्हावे वाटले तर त्यात गैर काही नाही; मात्र काही खुळचट कल्पना मनाशी बाळगून त्यांच्यावर पालकांनी सक्ती करू नये; किंवा माझा अमुक नातेवाईक, तमुक मित्र तिकडे गेलाय म्हणून त्याचे अनुकरणही विद्यार्थ्यांनी करू नये!
सध्या अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वात दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र म्हणजे साहित्य! मराठी आणि अन्य भाषांत लेखन करणार्‍या तरूणांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. आपली पिढी जागतिकिकरण अनुभवतेय, मोठमोठे सत्तांतर पाहतेय, देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा अनुभव घेतेय. आपले अनुभवविश्‍व इतके समृद्ध असतानाही ते अपवादानेच कागदावर उतरते. जे लिहिते हात आहेत त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. आजच्या तरूणाईचे लेखन अव्वल आहे आणि त्याला गुणात्मकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. कुणाच्याही प्रभावाखाली दडपून न जाता ते त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवत आहेत. प्रस्थापित यंत्रणेला चपराक देत त्यांची निश्‍चित ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. हे चांगले चित्र आणखी चांगले व्हावे यासाठी मात्र काही प्रयत्न जाणिवपूर्वक करावे लागतील.
मराठीतील प्रकाशक या नात्याने मी कायम सांगत असतो की, नव्याने लिहिणार्‍यांची, बोलणार्‍यांची एक मोठी फळी आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. विविध समाजमाध्यमांद्वारे सातत्याने व्यक्त होणार्‍या तरूणाईला थोडी दिशा दिली तर प्रतिभेचे अनेक कवडसे गवसू शकतात. आपल्याकडे ‘पूर्णवेळ लेखन’ ही कल्पना आजही अनेकांना ‘भिकेचे डोहाळे’ वाटते; कारण त्यादृष्टिने काही प्रयत्नच होताना दिसत नाहीत. ‘साहित्य’ आपल्याला आत्मभान देते, स्वओळख देते, अर्थकारण साधते हे सांगितले तर तो विनोद ठरावा अशी परिस्थिती काहींनी निर्माण केलीय. मात्र हे सत्य आहे. फक्त त्यासाठी लेखकांनी सजग असायला हवे. त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि निकोप असावा. अभ्यासाची आणि कठोर परिश्रमाची तयारी असावी. वाचन असावे. गुणात्मकतेचा ध्यास हवा आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने सातत्याने लिहिते असायला हवे. एक ठराविक वर्ग सातत्याने लिहिणार्‍यांना ‘बहुप्रसवा’ म्हणून कुचेष्टेने हिणवतो. आपाल्याकडे गाणार्‍याने रोज रियाज केला पाहिजे. खेळाडूने, संगीतकाराने, चित्रकाराने, नृत्यकाराने रोज सराव केला पाहिजे. पैलवानाने रोज व्यायाम केला पाहिजे, वक्त्याने सातत्याने बोलले पाहिजे! मग लेखकाने रोज काहीतरी लिहिले पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय? लेखकाने सातत्याने दर्जेदार वाचले पाहिजे, उत्तमोत्तम लिहिले पाहिजे, जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे जाऊन चांगले ऐकले पाहिजे. असे झाले तरच सर्जनशीलतेला वाव मिळेल. रामदास स्वामींनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे सांगितलेय; त्यात ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ असे त्यांना अभिप्रेत होते. ‘काहीतरीच’ लिहिणार्‍यांनी याचे भान ठेवले तर आपल्याकडील साहित्य व्यवहाराला मोठी गती मिळू शकेल. एखादी गृहिणी रोज स्वयंपाक करते म्हणून तो उत्तम होतो. ती कधीतरीच चपात्या लाटायला गेली तर जगाचा नकाशा तयार झालाच म्हणून समजा! लेखनाचेही तसेच आहे. तुम्ही रोज काहीतरी लिहिले, काहीतरी वाचले तरच तुम्हाला त्यात प्रगती करता येईल.
सध्या लेखनासाठी खूप चांगला काळ आहे. विविध मालिकांसाठी संहिता, चित्रपटासाठी पटकथा, लघुचित्रफितीसाठी लेखन, विविध जाहिरातींसाठी अर्थपूर्ण मजकूर तयार करून देणे, आकाशवाणी-दूरचित्रवाणीसाठी संहिता लेखन करणार्‍यांना चांगले पैसे मिळतात.  चित्रपटात आणि मालिकांत गाणे लिहिणार्‍यांनाही बरे मानधन मिळते. नवीन लेखकांच्या पुस्तकांना चांगली मागणी येतेय. आधीच्या पिढीतील बायकोचा किंवा प्रेयसीचा हात हातात घेतल्यास फार मोठा तीर मारल्याचे दिवस कधीच संपलेत. नव्या युगाच्या गरजा लक्षात घेऊन, नव्या पिढीचा हुंकार समजून घेऊन लेखन केल्यास त्याला हमखास यश येते. चेतन भगतसारखा लेखक ‘हाफ गर्लफ्रेंड’ सारखी कादंबरी लिहितो आणि त्याची पहिलीच आवृत्ती सत्तर लाख प्रतींची छापतो व ती खपवतो हे केवढे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. आमचा सागर कळसाईत आज असंख्य तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनलाय.
मराठीत एक झालेय! लेखन हा ‘अर्धवेळ’ उद्योग झालाय. आपापल्या नोकर्‍या, व्यवसाय सांभाळून लिहिणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी, इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या हुद्यावर असणारी मंडळी प्रतिष्ठेसाठी वाटेल तेवढी गुंतवणूक करून सुमार दर्जाची पुस्तके प्रकाशित करतात. त्यामुळे नवसाहित्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदललाय. इतकेच काय अनेक चुकीच्या संकल्पना, अविचारी आणि समाजद्रोही ‘नायक’ आपल्या माथी मारले जातात. पद आणि प्रतिष्ठेचा वापर करत अशा कलाकृती गाजवल्या जातात, खपवल्या जातात. याबाबत नरेंद्र जाधव यांचे नाव उदाहरण म्हणून घेता येईल. त्यांच्या ‘आमचा बाप आन् आम्ही’च्या अनेक आवृत्या गेल्यात. जाधव आरबीआयचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. त्याचा वापर करत त्यांनी असंख्य पुस्तके खपवलीत हे सत्य नाकारण्याचे धाडस कोणात आहे? त्या पुस्तकाचा गाभा म्हणून त्यांच्या वडिलांचे उदाहरण सातत्याने सांगितले जाते. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितले, ‘जे काही करशील त्यात टापला जा; भलेही गुंड झालास तरी बी चालल पर टापचा गुंड हो!’ काहीही करून यश मिळवायचेच अशी शिकवण त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली. ‘एकवेळ टापला गेला नाहीस तरी चालेल पण आधी एक चांगला माणूस हो’ अशी शिकवण मात्र त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली नाही! तरीही या पुस्तकाच्या इतक्या आवृत्त्या जात असतील  तर आनंदच आहे.
नवीन लेखक आणखी लिहिते व्हावेत, त्यांना प्रस्थापित यंत्रणेकडून डावलले जाऊ नये, विविध विषयांवर त्यांनी सातत्याने गुणवत्तापूर्ण लिहावे, जुन्या-नव्या लेखकांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा त्यांचा अभ्यास व्हावा, त्यांना व्यासपीठ मिळावे आणि मुख्य म्हणजे त्यांना लेखनाच्या समाधानाबरोबरच आर्थिक लाभही व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लेखनाची न आवरण्याइतकी हौस असेल, साहित्यविषयक जीवननिष्ठा प्रबळ असतील, अखंडपणे अभ्यासाची आणि सतत नव्याचा ध्यास घ्यायची तयारी असेल तर त्यांनी माझ्याशी 7057292092 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. मराठी साहित्याला फार मोठा वारसा आहे आणि तो अधिक सशक्त करणे, जागतिक साहित्यविश्‍वात माय मराठीचा विजयध्वज फ़डकवत ठेवणे यासाठी आता साहित्यिक जीवनव्रतींची गरज आहे. ते पुढे आले तर आणि तरच स्वामीजींना अपेक्षित असलेले ‘बौद्धिक क्षत्रिय’ निर्माण होऊ शकतील.
- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, April 15, 2017

इंदौरचा मराठी साहित्य महोत्सव

महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटींहून अधिक आहे. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या समस्या मोठ्या आहेत. एका विशिष्ट वर्गाची आर्थिक सुबत्ता चांगली असताना दुसरीकडे मात्र एकवेळच्या जेवणासाठीही मोताद असणारे आपल्याकडे कमी नाहीत. अशावेळी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा हे व असे विषय फारच दूर राहतात. इथे प्राध्यापकांचे एक मोठे टोळके साहित्यात उचापत्या करत असते. त्यांना वाटते की, प्राध्यापक म्हणजेच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. या अंधश्रद्धेतून ते बाहेरच पडायला तयार नाहीत. विशिष्ट विषयात विद्यावाचस्पती होण्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासातून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटतो. एकदा का नावामागे साहित्यातील ‘डॉक्टर’ लागले की यांचे घोडे गंगेत न्हाते. मग त्यांना अवांतर वाचनाची गरज राहत नाही. गरजेपुरत्या माहितीतून मिळालेली छटाकभर अक्कल पुढे त्यांना साहित्यिक आणि समीक्षक म्हणून मिरवण्यास पुरेशी ठरते. अर्थात, याला काही अपवाद निश्‍चितच आहेत; पण अपवाद म्हणजे नियम नव्हे!
महाराष्ट्रात ज्ञानाच्या क्षेत्रात अशी दूरवस्था असताना महाराष्ट्राबाहेर मराठीचे काय होत असावे, झाले असावे असा प्रश्‍न आपल्याला नक्की पडत असेल. तो पडायला हवा! कारण थोडे थोडके नव्हे तर तब्बल चार-साडेचार कोटी मराठी लोक महाराष्ट्राबाहेर राहतात. तिथे राहून ते त्यांचे मराठीपण जपतात. चार-चार, पाच-पाच पिढ्या अमराठी भागात वास्तव्यास असूनही त्यांची आपल्या साहित्य आणि संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे. आपणही आपले मराठीपण जपण्यासाठी जितके प्रयत्न करत नाही, तितके प्रयत्न ही मंडळी करतात! मात्र त्यांच्याकडे ना आपले लक्ष आहे, ना आपल्या राज्यकर्त्यांचे! इथे आपलीच खायची मारामार तिथे तिकडे कधी लक्ष देणार? अशी संकुचित मनोवृत्ती तयार झालीय!
आपल्याकडे म्हणजे मराठीत अनुवादित पुस्तके मोठ्या संख्येत येतात. त्यातही इंग्रजीतून मराठीत येणारी पुस्तके लक्षवेधी आहेत. मग आपल्या भारतीय भाषा भगिनीची काय अवस्था आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. बंगाली, कानडी, तमीळ, गुजराती, उर्दू, हिंदी, पंजाबी अशा भारतीय भाषात उत्तमोत्तम पुस्तके असताना फक्त इंग्रजीतूनच येणार्‍या अनुवादाला प्रतिष्ठा प्राप्त होते. त्याचे हे कारण आहे की, इतर भारतीय भाषांचा आपला अभ्यास कमी पडतो. इंग्रजी ही परकीय भाषा असली तरी बालपणापासून या भाषेचा आपला अभ्यास झालेला असतो.
मराठी पुस्तके खपत नाहीत, अशी खोटी आवई सातत्याने दिली जात असताना अनुवादित पुस्तके मात्र मोठ्या प्रमाणात खपतात. अनुवादित पुस्तके छापणारे प्रकाशकही गब्बर असतात. याचा एक अर्थ असा आहे की, मराठीत गुणवत्तापूर्ण आणि अस्सल साहित्य येणे कमी झाले असावे! नाविण्यपूर्ण विषयांची कमतरता, अनुभवविश्‍व समृद्ध नसणे, जागतिकीकरणाचा आणि नव्या बदलांचा अंदाज न येणे, एखाद्या विषयासाठी झोकून देऊन अभ्यास करण्याची तयारी नसणे ही त्यापैकी काही कारणे असू शकतात!
हे सारे दुर्दैवी चित्र असताना आम्ही मात्र इतर भारतीय भाषात काम करण्याचा निर्णय घेतला. ‘आम्हाला कोणता कीडा चावला?’ असा प्रश्‍न काहींना पडला; मात्र मराठीतील साहित्य इतर भारतीय भाषात जावे आणि इतर भारतीय भाषेतले साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीत यावे असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात ‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने आम्ही ही घोषणा केली आणि अनेकजण आश्‍चर्यचकित झाले. त्या स्वप्नपूर्तीची सुरूवात आम्ही नुकतीच केली आहे.
मध्यप्रदेशची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून इंदौर शहर सर्वांना सुपरिचित आहे. जवळपास पाच हजार औद्योगिक कंपन्या या शहरात असल्याने इंदौरचा आर्थिक विकास झालाय. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या स्मार्ट सिटीत इंदौरचा समावेश आहे. येथील साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुण्यासारखाच संपन्न आहे. त्यामुळे या शहरापासून आम्ही हिंदी भाषा साहित्य निर्मितीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. आमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अभिजात’ हा काव्यसंग्रह आणि उज्जैन येथील लेखक सुधीर आनन्द यांची ‘लव-कुश’ ही किशोर कादंबरी या दोन पुस्तकांपासून आम्ही हिंदी साहित्य निर्मितीचा यज्ञ आरंभिला. या निमित्ताने इंदौरमधील कवींचा गझल मुशायरा, तिकडच्या मराठी लोकांचे आणि महाराष्ट्रातून गेलेल्या कवींचे मराठी कवी संमेलन असे कार्यक्रम ठेवून दि. 8 व 9 एप्रिल 2017 रोजी आम्ही इंदौरमधील श्री मध्य भारत साहित्य अकादमीच्या शिवाजी सभागृहात ‘चपराक’चा पाचवा साहित्य महोत्सव घेतला. ‘लिवा क्लब’चे आमचे स्नेही विश्‍वनाथ शिरढोणकर, मध्यप्रदेश साहित्य अकादमीचे निदेशक अश्‍विन खरे, मराठी भाषेच्या वैभवात भर घालणारे इंदौर स्थित प्रा. डॉ. श्रीकांत तारे, हिंदी साहित्यिक हरेराम वाजपेयी, सूर्यकांत चतुर्वेदी, लेखक सुधीर आनन्द आणि त्यांच्या पत्नी सौ. संध्या या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील मराठी बांधवांना जोडणारा सेतू आम्ही तयार केला आहे. अश्‍विन खरे यांच्यासारखे साहित्यिक नेतृत्व मध्यप्रदेशला लाभले असल्याने गेल्या अठरा वर्षापासून ते हे कार्य अव्याहतपणे करतच आहेत; पण आम्ही त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलून या भाषा भगिनींना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला आहे.
इंदौरमध्ये ‘लिवा क्लब’ अनेक मराठी उपक्रम सातत्याने राबवते. आपल्याकडील अनेक मान्यवरांना त्यांनी वेळोवेळी निमंत्रित केले आहे. ‘लिवा’ ही आद्याक्षरे आहेत. म्हणजे ‘लिहावे-वाचावे क्लब!’ किती अर्थपूर्ण आणि थेट उद्देश स्पष्ट करणारे नाव! शिरढोणकर, खरे, शोभा तेेलंग अशा मंडळींनी ही चळवळ सुरू ठेवलीय. ज्या श्री मध्य भारत हिंदी साहित्य समितिच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला तिथे 1918 साली महात्मा गांधी आले होते. त्यावेळी त्यांनी ‘हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी’ अशी आग्रही मागणी केली होती. मात्र आजतागायत हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. भारताला अजूनही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केवळ ‘संपर्क भाषा’ आहे.
हाच मुद्दा उपस्थित करत आम्ही सांगितले की, हिंदीला राष्ट्रभाषेचा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. या चळवळीत आपणही सहभागी व्हावे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच लाख पत्रे पाठविण्याचा उपक्रम सुरू आहे. त्यातील जवळपास एक लाख पत्रे एव्हाना पाठवली गेलीत. महाराष्ट्र सरकारही अमराठी भागातील उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्याचा थेट लाभ लवकरच इंदौरमधील चळवळीलाही होईल. आपण आपले मराठीपण जपत आहात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच ‘चपराक’च्या माध्यमातून तुमचे साहित्य जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
पुण्यातून आमच्यासोबत सुप्रसिद्ध लेखक भारत सासणे हेही आले होते. मुंबईतून नामवंत गझलकार ए. के. शेख सहभागी होते. शिवाय ‘चपराक’ परिवारातील शुभांगी गिरमे, चंद्रलेखा बेलसरे, माधव गिर, सरिता आणि अरूण कमळापूरकर, सागर कळसाईत, समीर नेर्लेकर, तुषार उथळे पाटील, प्रमोद येवले, मोरेश्‍वर ब्रह्मे, सचिन सुंबे, विनोद पंचभाई ही भक्कम टीम सहभागी झाली होती. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक दुवा साधण्यासाठी ‘चपराक’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विश्‍वनाथ शिरढोणकर यांनी लिहिलेले ‘मध्यप्रदेशातील मराठी माणसे’ हे पुस्तक लवकरच ‘चपराक’कडून वाचकांच्या भेटीस येत आहे. गेल्या काही पिढ्यातील मराठी बांधवांनी तिकडे जे अतुलनीय योगदान दिले त्याची माहिती या निमित्ताने सर्वांना होईल.
मराठी वाचकांना जोडून घेण्यासाठी आमचे विविध राज्यात सातत्याने दौरे चाललेले असतात. अमराठी भागात कृतीशील असणार्‍या मराठी बांधवांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. मागच्या वर्षी हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जाण्याचा योग आला. डॉ. विद्या देवधर यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये ख्ूप मोठे काम सुरू आहे. त्याची आठवण इंदौरमध्ये आमच्या सहकार्‍यांनी काढली. हैदराबादप्रमाणेच इंदौरमध्येही उन्हाचा कडाका असेल असे वाटले होते; मात्र इथे तर महाबळेश्‍वरपेक्षाही थंड वातावरण होते. इंदौरचे सांस्कृतिक वातावरणही पुण्यासारखेच वाटले. शनिवार, रविवारी इथे किमान पंधरा-वीस सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शनिवार दि. 8 रोजी ज्या संस्थेत आमचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी त्याच वास्तुतील तिन्ही मजल्यावर तीन स्वतंत्र कार्यक्रम सुरू होते आणि एकाही कार्यक्रमात एकही खुर्ची रिकामी नव्हती. असे रसिक आणि श्रोते सध्या पुण्यासारख्या महानगरातही दुर्मीळ झाले आहेत. म्हणूनच इंदौर आम्हाला आपलेसे वाटत होते. माझ्या सहकारी मित्रांना मी सहजपणे बोलून गेलो की, हैदराबादमध्ये निजामांची राजवट होती. इंदौरमध्ये होळकरांनी राज्य केले. मराठी माणसांनी अमराठी भागात येऊन एक देदीप्यमान इतिहास निर्माण केला. होळकरांच्या राजवाड्यासह येथील वास्तू, संस्कृती त्याची साक्ष पटवून देतात. म्हणूनच इंदौरविषयी आंतरिक आत्मियता वाटत असावी.
साहित्यिक चमू सोबत असल्याने रेल्वेत केलेली धमाल, इंदौरमधील हिंदी साहित्यिक, 90 वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेली ‘वीणा’ ही सांस्कृतिक पत्रिका, श्री मध्य भारत हिंदी साहित्य समिती, लिवा क्लब, मराठी साहित्य अकादमी, होळकरांचा ऐतिहासिक राजवाडा, जगप्रसिद्ध खाऊगल्ली, तिथली मिठाई, इंदौरकरांचे आदरातिथ्य, नेटाने साहित्यसेवा करणारी मराठी मंडळी अशा सर्वांचा जवळून परिचय झाल्याने आमचा इंदौर दौरा अविस्मरणीय झाला. महाराष्ट्राबाहेर राहणारे आणि आपले मराठीपण जपणारे सर्वजन आपले बांधवच आहेत, याची जाणीव आपल्याला कायम असावी एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. 

- घनश्याम पाटील
7057292092