Saturday, April 2, 2016

विश्‍वास नसेकर!

विश्‍वास नसेकर!

वाद आणि वितंडवाद याशिवाय सध्या कोणतीही साहित्य संमेलने पार पडतच नाहीत. अनेकांचे हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, मानापमान, आयोजक यामुळेच संमेलने चर्चेत येतात. साहित्यिक विषयांवरून चर्चेत येणारी संमेलने दुर्मीळ होत चालली आहेत. भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन या व अशा क्षेत्रात कमालीचा दुष्काळ पडलाय. मोठमोठे लेखकही रतीब टाकल्याप्रमाणे तेचतेच विषय वेगवेगळ्या व्यासपीठावरून ठासून मांडत असतात. तेच कवी, त्यांच्या त्याच कविता यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही कंटाळवाणे होत चालले आहे. असो.
तर सध्या मराठवाड्यात चर्चा आहे ती 37 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची. येत्या 9 व 10 एप्रिल रोजी जालना येथे हे संमेलन होणार आहे. दत्ता भगत हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मागच्या वर्षी सुधाकर वायचळकर आणि रामचंद्र तिरूके यांनी प्रयत्न करून उदगीरमध्ये या संमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रम पत्रिका ठरल्यानंतर त्याची तयारीही जोरदार झाली. मात्र ऐनवेळी कुठेतरी पाणी मुरले आणि उदगीरचे हे संमेलन रद्द करावे लागले. ‘प्रशासकीय अधिकारी’ अशी ओळख असलेले लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. उदगीरचे संमेलन रद्द झाल्याने नांदेड येथील एका जिल्हा दैनिकाने हे संमेलन घेतले. सुदैवाने अध्यक्षस्थानी देशमुखच होते.
काही महिन्यांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. कौतुकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. सर्वच्या सर्व जागा पटकावण्यात ठाले पाटलांनी बाजी मारली. मराठवाड्यात त्यांचे मोठे प्रस्थ. साहित्य वर्तुळातही चांगलाच दबदबा. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचे नेतृत्व ते गेली अनेक वर्ष करीत आहेत. इतकेच नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असावे याबाबत ठाले पाटलांची भूमिका नेहमीच निर्णायक असते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या 37 व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विनयकुमार कोठारी हे असून जालना संस्कृत महाविद्यालय समितिने या संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रा. जयराम खेडेकर हे निमंत्रक तर डॉ. संजीवनी तडेगावकर या कार्यवाह आहेत. दत्ता भगत यांच्यासारखा तगडा संमेलनाध्यक्ष लाभल्याने अनेकांना आनंद झाला आहे. मुळचे मराठवाड्यातील असलेले मात्र सध्या पुण्यात स्थायिक झालेले कवी, लेखक आणि समीक्षक प्रा. विश्‍वास वसेकर यांनी अविवेक दाखवत यंदाच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
मद्य, स्त्री, कविता आणि नश्‍वरतेची जाणीव यापैकी प्रत्येक गोष्ट माणसाला आयुष्यातून उठवते. मग या चारही गोष्टी ज्याच्या आयुष्यात आल्या असतील त्याचे काय होते हे पाहण्यासाठी विश्‍वास वसेकर यांच्यासारख्या लोकांकडे पहावे! वसेकर हे सातत्याने लिहित असतात. त्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारही मिळालेला आहे. आयुष्यभर अध्यापन क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांच्यात म्हणावी तशी प्रगल्भता दिसत नाही. नुकतेच त्यांचे ‘तहानलेले पाणी’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षांशी असलेल्या संबंधांमुळे त्यांनी त्यांचे हे पुस्तक भगत यांना अभिप्रायार्थ पाठवले.
नवोदित किंवा अन्य लेखकांनी प्रस्थापित आणि मान्यवर लेखकांना आपली पुस्तके पाठवणे यात नवे असे काही नाही. भगत यांना ही पुस्तके मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले. या पुस्तकातील त्रुटी प्रांजळपणे दाखवून देत त्यांनी वसेकरांना प्रामाणिक अभिप्राय पाठवला. या प्रकाराने वसेकर बिथरले. आपण लिहिले ते सर्वोच्च, अशा भ्रमात काहीजण असतात. दत्ता भगत यांनी या पुस्तकातील सुमार बाजू पुढे आणल्याने वसेकरांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी ‘यंदाच्या संमेलनाध्यक्षांनी माझ्या साहित्याचा अपमान केला’ अशी बोंब ठोकत संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
विश्‍वास वसेकर यांचा निमंत्रितांच्या कवी संमेलनात सहभाग होता. मात्र दत्ता भगतांनी थारा न दिल्याने त्यांना संमेलनात जाणे ‘अप्रतिष्ठेचे’ वाटले. त्यामुळे भगत यांचा निषेध म्हणून ते संमेलनाला जाणार नाहीत. वसेकरांसारखी टिनपाट मंडळी संमेलनाला गेली नाहीत म्हणून असा कितीसा फरक पडणार? पण यानिमित्ताने त्यांनी आपला जो वैचारिक आणि बौद्धिक दुष्काळ दाखवून दिला आहे तो हास्यास्पद आहे.
विश्‍वास वसेकर यांना भगत यांनी पंधरा वर्षांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या घरात झाप झाप झापले होते. तेव्हापासूनच वसेकरांच्या मनात भगत यांच्याविषयी आढी असावी. त्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांनी भगत यांना अभिप्रायार्थ पुस्तके पाठवली. भगतांनी अभिप्राय पाठवल्यानंतर वसेकरांनी त्यांना भलेमोठे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात वसेकर भगत यांना लिहितात, ‘‘तहानलेले पाणी हे माझे पुस्तक शुद्ध वाङ्मयीन अपेक्षेतून मी तुम्हाला पाठवले; पण आज कळले की तुम्ही स्वमनातल्या हिणकसाचे मोठेच संग्राहक आहात. तुमच्या या हिणकसाला तुम्ही स्वत:ची अस्मिता समजता हा फार मोठा अंतर्विरोध आहे. तुमचे हिणकस तुम्हाला लखलाभ असो. कुरूंदकरांच्या मृत्यूवार्तेने मी कमालीचा हादरलो, हळहळलो. त्यावेळी उत्स्फूर्तपणे मी सुंदर मृत्यूलेखही लिहिला आहे. माझी मर्यादा ही आहे की ‘रसाळ स्कूल’ मधून आल्यामुळे मी त्यांचा भक्त होऊ शकलो नाही! आणि कुरूंदकरांच्या मृत्यूमुळे आपण बालविधवा झालो असे नांदेडच्या लेखक कवींना वाटले तसे मला वाटले नाही. त्यांच्या लेखनापुढे आणि वक्तृत्वापुढे आपली बुद्धी गहाण टाकावी इतका मतिमंद मी नाही.’’
वसेकर यानिमित्ताने आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना लिहितात, ‘‘वाईट याचे वाटते की कुरूंदकरांना जाऊन जवळजवळ अर्धशतक लोटलं तरी त्यांचे शिष्य अजून अविकसितच आहेत. ते गेले तेव्हा त्यांच्या या बालविधवा धड ऋतुस्नातही झाल्या नव्हत्या. एकविसाव्या शतकात, वयात आल्यानंतरही त्यांनी पुनर्विवाह करू नये, जन्मभर त्यांची विधवा म्हणून जगावे हे आपला समाज अजूनही किती मागासलेला आहे याचे गमक आहे.’’
वसेकर यांनी भगत यांना अभिप्रायार्थ जी दोन पुस्तके पाठवली ती रजिस्टर पोस्टाने परत मागवली आहेत. मनाजोगता अभिप्राय न दिल्याने पुस्तके परत पाठवा किंवा त्याचे मूल्य पोस्टाने पाठवून द्या अशी तंबीही त्यांनी दिलीय. साहित्यक्षेत्र कोणत्या बजबजपुरीतून जात आहे याचेच हे उदाहरण!
विश्‍वास वसेकर हे ‘चपराक’चे लेखक आहेत. मागच्या वर्षी घुमान संमेलनाच्या आधी चार-पाच दिवस ते ‘चपराक’ कार्यालयात आले. त्यांचा ‘तरी आम्ही मतदारराजे’ हा काव्यसंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित करावा यासाठी त्यांनी गळ घातली. चार-पाच दिवसात पुस्तक होणे शक्य नव्हते. मात्र ते उठायलाच तयार नाहीत. घुमानला त्याचे प्रकाशन झालेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. आम्ही दिवसरात्र एक करून त्या धावपळीतही तो संग्रह प्रकाशित केला. 31 मार्चला घुमानच्या तयारीविषयी आमचे त्यांच्याशी बोलणेही झाले. मात्र दुसर्‍या दिवशी ते संमेलनाला आलेच नाहीत. शेवटी घुमानमध्ये त्यांच्या अनुपस्थितीत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आयोजक भारत देसडला यांच्या हस्ते आम्ही या संग्रहाचे प्रकाशन ‘चपराक’च्या ग्रंथदालनातच केले. तेव्हापासूनच त्यांचे नामकरण आम्ही ‘विश्‍वास नसेकर’ असे केले आहे.
जालना येथील संमेलनाला अध्यक्षांवर नाराज असल्याने ते जाणार नाहीत असे सांगत असले तरी 10 तारखेला विजय तरवडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करणार असल्याचे कळते. हा कार्यक्रम जालन्याच्याही आधी ‘पूर्वनियोजित’ आहे. त्यामुळे वसेकरांनी कितीही आव आणला तरी त्यांचे इप्सित साध्य होणार नाही.
दत्ता भगत यांनी वसेकरांच्या ‘तहानलेले पाणी’ या पुस्तकाबाबत मांडलेली मते फारच सौम्य आहेत. ‘क्लेषकारक आयुष्याचा माफीनामा’ या पठडीतले ते पुस्तक आहे. आपल्या मनातील लैंगिक वासना विकृत स्वरूपात मांडणे, कुणाकुणासोबत किती वेळा दारू प्यालो याचे रसभरीत वर्णन करणे, नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासह अनेक ज्येष्ठांवर चिखलफेक करणे आणि वर आपण त्यांचे किती चांगले मित्र आहोत हे ठासून मांडणे, अनेक कपोलकल्पित गोष्टी चरित्राच्या नावावर खपवणे हे सारे उद्योग वसेकरांनी केलेले आहेत.
या पुस्तकासोबतच त्यांचे ‘पोट्रेट पोएम्स’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दलाई लामापासून ते इंदिरा गांधी, अमृता प्रीतम यांच्यापर्यंत त्यांच्यावर प्रभाव पाडणार्‍या अनेकांवर त्यांनी चरित्रात्मक कविता या संग्रहात केल्या आहेत. त्यांचा स्नेही म्हणून ‘राजकुमार’या शीर्षकाची एक सुंदर रचना त्यांनी ‘चपराक’चा संपादक या नात्याने माझ्यावरही केली आहे. हा माझा बहुमान असला तरी ‘तहानलेले पाणी’बाबतची प्रांजळ मते व्यक्त करणे हे दत्ता भगत यांच्याप्रमाणेच माझेही सांस्कृतिक कर्तव्य आहे.
- घनश्याम पाटील, 

संपादक ‘चपराक’
7057292092

Monday, March 28, 2016

‘लकवा’मार विकारवंत!

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बालगंधर्वला झालेल्या एका कार्यक्रमात राज्य सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले होते, ‘मुख्यमंत्री कोणत्याही फाईलवर सह्या करत नाहीत. त्यांना ‘लकवा‘ झालाय.’
त्यापूर्वी राम मनोहर लोहिया यांनी सांगितले होते की, ‘‘आजच्या काही समाजवाद्यांना ‘लकवा’ झालाय! विचारावर ठाम नसणार्‍या आणि कृतीशुन्य समाजवादी कार्यकर्त्यांना ‘लकवामार समाजवादी’ म्हटले पाहिजे.’’
सध्या पुरोगामित्वाच्
या नावावर मिरवणारे काही तथाकथित समाजवादी याच ‘लकवामार विकारवंता’त मोडतात. कन्हैयाकुमारला छोट्या भावाची उपमा देणारे कुमार तथा सुमार सप्तर्षी याच विकारवंतांपैकी एक! अर्धसत्य माहिती ठासून मांडणे आणि आपणच समाजाला तारण्याचा ठेका घेतलाय अशा आविर्भावात असे ‘विकारवंत’ जगत असतात. सप्तर्षींनी एकेकाळी ‘युक्रांद’च्या माध्यमातून थोडेफार काम हाती घेतले होते; मात्र ज्याच्याकडे किमान सभ्यता आणि मूलभूत ध्येयनिष्ठा नाही तो समाजमनावर कितपत प्रभाव पाडू शकणार? एकीकडे ‘जातीअंताची लढाई’ असे बोजड शब्द वापरायचे आणि दुसरीकडे भेटणार्‍या प्रत्येकाला थेट त्याची जात विचारायची आणि आपण आयुष्यभर किती दिवे लावले याचे पाल्हाळीक चर्वितचर्वण करायचे यातच यांची हयात गेली. एकेकाळी अण्णा हजारे यांना ‘थोरले बंधू’ मानणारे सप्तर्षी आता कन्हैयाला ‘धाकल्या’ भावाची उपमा देत आहेत. त्याला पुण्यात गांधीभवनात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे असे एकेकाळचे समाजवादी आणि आजच्या काळातील कुमार सप्तर्षीसारखे सुमार लोक पाहिले की समाजवादी चळवळीला खीळ का बसली याचे उत्तर मिळते. समाजवादाच्या नावाने कोकलणार्‍यांनी समाजवादी नेत्यांनी कोणते संघटनात्मक कार्य केले याचे उत्तर द्यावे! राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध बोलणे, लिहिणे इतक्या मर्यादित स्वरूपात यांची पुरोगामित्वाची व्याख्या येऊन ठेपली आहे. ही मंडळी केवळ वयाने वाढली आहेत. त्यांची बौद्धिक उंची मात्र कधीच खुंटली आहे, हे इवलेसे पोरही सांगेल. म्हणूनच त्यांची सातत्याने चर्चेत राहण्याची केविलवाणी धडपड सुरू असते. आचार्य अत्रे यांनी त्या काळात समाजवादी विचारधारेविषयी लिहिले होते की, ‘‘समाजवाद या शब्दातला स कधीच गळून पडलाय आणि केवळ ‘माजवाद’ उरलाय!’’ अत्रेंच्या या निरीक्षणात आजदेखील तसूभरही फरक पडल्याचे दिसत नाही.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर विचारतात, ‘‘विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे, ही भाषा पुरोगाम्यांना कधी कळली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे का?’’ भाऊंचा हा सवाल बिनतोड आहे. आजचे समाजवादी या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढे सक्षम नाहीत. त्यांची तेवढी वैचारिक कुवतही नाही. जाती-जातीत, धर्मा-धर्मात, प्रांता-प्रांतात फूट पाडणे, येनकेनप्रकारे स्वत:चा स्वार्थ साधणे आणि आपल्या आडमुठ्या भूमिकेपायी समाजाला वेठीस धरणे हा यांचा उद्योग नवा नाही.
कन्हैयाकुमार पुण्यात आल्याने विशेष असे काय घडेल? कुमार सप्तर्षी यांच्यासारखे अडगळीत पडलेले ‘विकारवंत’ चर्चेत येतील, काही राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष यांच्याकडे केंद्रीत होईल. आजच्या तथाकथीत पुरोगाम्यांचे, समाजवाद्यांचे ‘बापजादे’ काय करत होते याचेही ज्ञान या भामट्यांना नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कम्युनिष्टांविषयीची मते काय होती, याचा अभ्यास आपण करणार की नाही? प्रकाश आंबेडकर ज्या दिशेने आजच्या समाजाला नेऊ पाहत आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते का? हिंदुंचा, ब्राह्मणांचा द्वेष हा एकमेव अजेंडा घेऊन या लोकांची वाटचाल सुरू आहे. एकीकडे जातीच्या आधारावर मिळणारे ‘सर्वप्रकारचे’ लाभ घ्यायचे, आरक्षणासारख्या विषयावरून रान पेटवायचे आणि दुसरीकडे जातीयवाद संपवण्याची भाषा करायची, ब्राह्मणांना शिव्या घालायच्या अशी दुटप्पी भूमिका हे लोक घेतात.
कन्हैयाकुमार आणि राहुल गांधी या दोघांच्या बौद्धिक पातळीत तसा फारसा फरक दिसत नाही. दुर्दैवाने अशी बिनडोक मंडळी आजच्या तरूणाईचे नेतृत्व करू पाहत आहेत. राष्ट्रभक्ती हे पाप वाटावे अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे. आपल्या नेत्यांनी अशा भामट्यांना पाठिशी घातल्याने समाजात दुफळी निर्माण होत आहे. केजरीवाल, हार्दीक पटेल, रोहित वेमुला, कन्हैयाकुमार अशांनी समाजाला कोणता नवा विचार दिला किंवा ते समाजाचे नेतृत्व करण्याच्या लायकीचे आहेत का? हे तटस्थपणे पडताळून पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘सुविद्य’ आमदार जितेंद्र आव्हाड कायम नौटंकी करत असतात. ‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार’ अशी त्यांची ओळख करून दिली जाते. त्यांचा कोणता ‘वारसा’ आव्हाडांनी चालवला हे मात्र सिद्ध होत नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली नाचवणे, अतिक्रमणाच्या प्रश्‍नावरून प्रशासकीय अधिकार्‍याशी अरेरावी करणे, पोलिसांवर हात उगारणे, फर्ग्युसनसारख्या ठिकाणी येऊन महाविद्यालयाच्या स्थापनेविषयीच तारे तोडणे ही व अशी कामे ‘वारसा प्रकारा’त मोडतात का?
‘आम्ही मराठे कुणाला घाबरत नाही. आम्हा सगळ्यांनाच तुरूंगात टाका’ असे बालिश विधान खासदार सुप्रिया सुळे यांनीही नुकतेच केले आहे. (भुजबळ, तटकरे, अजितदादा यांचे भवितव्य त्यांना दिसत असणार!) सुप्रियाताईंच्या ‘बाबां’नी आजवर कायम जातीचे राजकारणच केंद्रस्थानी ठेवले आहे. ‘मराठा लीडर’ अशी प्रतिमा असूनही त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले याचेही उत्तर कोणी देऊ शकणार नाही. पवारांमुळे किती ‘मराठा’ शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या किंवा पवारांनी किती ‘मराठा’ नेते तयार केले? हा प्रश्‍न उपस्थित केला तर त्याचे उत्तरही नकारात्मकच येते. केवळ गरजेपुरते जातीय अस्मितेचे राजकारण करून या लोकांनी कायम स्वत:ची तुंबडी भरलेली आहे.
कन्हैयाकुमार, कुमार सप्तर्षीपासून ते राजदीप सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेपर्यंत प्रत्यक्षात ज्यांचा धिक्कार करायला हवा त्यांना काहीजण ‘नेते’ मानून त्यांची पूजा बांधत आहेत.
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हेही सध्या चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे असलेल्या अणेंनी वेगळ्या विदर्भाबरोबरच स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मुंबईतील 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिले त्याचा विदर्भ किंवा मराठवाड्याशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद ते करतात. राज्य सरकारचा वकील राहिलेला हा पाखंडी ‘विचारवंत’ कसा असू शकेल? सध्या जिकडे-तिकडे अशा ‘लकवामार विकारवंतां‘चीच संख्या फोफावली आहे.
आचार्य अत्रे यांनी मालोजीबुवा निंबाळकर यांच्याविषयी लिहिताना सांगितले होते की, ‘‘जन्मभर देहविक्रय करणार्‍या वेश्येने म्हातारपणी लग्न लावल्यानंतर ‘माझा नवरा मेला तर मी सती जाईन!’ अशा पातिव्रत्याच्या वल्गना करू नयेत!’’
पुरोगामित्वाच्या नावावर नाचणार्‍या आजच्या ‘विकारवंतां’चीही अशीच अवस्था आहे. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीच तारतम्य नसते. सामान्य माणसापुढे जगण्यामरण्याचे अनेक गंभीर प्रश्‍न असताना अशा पद्धतीचे राजकारण कोणीही करू नये! देशातील सर्व प्रश्‍न संपले अशा आविर्भावातच कन्हैयासारख्या भुलभुलैयाचे उदात्तीकरण सुरू आहे. स्वार्थसंकुचित राजकारण, कुटीलतावाद, सर्व प्रकारचा कट्टरतावाद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ‘लकवामार विकारवंतां’कडे दुर्लक्ष करून प्रत्येकाने आता माणुसकीच्या धर्मातून कार्यरत राहिले पाहिजे; तरच येणारे आरिष्ट्य थोपविण्यात आपण यशस्वी ठरू!

-घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, March 19, 2016

लोकसत्ता की शोकसत्ता?

लोकशाही व्यवस्थेत वृत्तपत्रांचे स्थान महत्त्वाचे आहे. व्यवस्थेचा हा चौथा स्तंभ समजला जातो. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर अशा धुरीणांनी लेखणीची ताकत अनेकवेळा दाखवून दिली. परिवर्तनाच्या चळवळीत माध्यमांना पर्याय नाही. मात्र भारतीय वृत्तपत्र सृष्टीत महत्त्वाचे स्थान असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाच्या ‘लोकसत्ता‘ने या वैचारिक परंपरेला तडा दिला आहे. ‘लोकसत्ता’सारख्या अग्रणी वृत्तपत्राने माफी मागत चक्क अग्रलेख परत घेतल्याने ‘लोकसत्ता’चा ‘शोकसत्ता’ झाल्याची चर्चा आहे. मराठी वृत्तपत्रांसाठी तर ही अतिशय दुर्दैवी आणि काळीकुट्ट घटना आहे. ‘कुबेर’ आडनावाच्या एका संपादकाची ही ‘गरिबी’ समजून घेणे वाटते तेवढी सोपी घटना नाही.

असंतांचे संत
क्षमस्व! प्रिय वाचक! ‘असंतांचे संत’ या 17 मार्च 2016 च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. - संपादक


अशी इवलीशी चौकट कुबेरांनी 18 मार्चच्या ‘लोकसत्ता’मध्ये छापून ‘अग्रलेख वापसी’ केली आहे. काही साहित्यिकांनी यापूर्वी ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम राबवली होती. हे परत केलेले पुरस्कार पुन्हा काहींनी स्वीकारले. देशात अशा नाट्यपूर्ण घडामोडी सुरू असतानाच आपल्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजले. श्रीपाल सबनीस नावाचा एक समीक्षक संमेलनाध्यक्ष झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी भाषा वापरत काही तारे तोडले. ‘कोण हे सबनीस?’ असा प्रश्‍न त्यावेळी केला जात होता. हे चित्र पाहून ‘लोकसत्ता’ने त्यांच्याविषयी ‘श्रीपाल की शिशुपाल?’ असा अग्रलेख लिहिला. ‘चपराक’नेही सबनीसांचे ‘बौद्धिक’ घेतले. या प्रकाराने सबनीसांनी ‘मी माझे भाषण माघार घेतो’ असे म्हणत भाषण वापसी केली. झालेले भाषण माघार कसे घ्यायचे हा प्रश्‍न आम्हाला पडला होता. मात्र वादावर पडदा पडतोय म्हणून आम्ही त्यावर फारशी चर्चा केली नाही. मराठी साहित्य, संस्कृती, समीक्षा, भाषा या दृष्टीने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे हे अत्यंत दुर्दैवी होते. संमेलनाध्यक्षांची बौद्धिक क्षमता आणि त्यांना लागलेली प्रसिद्धीची चटक पाहता तिकडे आमच्याप्रमाणेच अनेकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. असाच प्रकार कुबेरांच्या बाबत घडल्याने सांस्कृतिक क्षेत्रात असलेली दहशत पुन्हा एकदा वाचकांसमोर आली आहे.
सबनीस, कुबेर अशा माणसांची तशीही फारशी विश्‍वासार्हता नाही. त्यांनी काय लिहावे आणि काय बोलावे हा त्यांच्या आणि त्यांच्या मालकांचा प्रश्‍न आहे. मात्र ते ज्या संस्थांचे, पदांचे प्रतिनिधित्व करतात त्याला मात्र यामुळे अप्रतिष्ठा येत आहे. सबनीस फारसे गंभीरपणे घेण्यालायक व्यक्तिमत्त्व नाही; मात्र गिरीश कुबेर भूमिका घेणारे संपादक म्हणून ओळखले जातात. चेंबरमध्ये बसून अग्रलेखाची पानेच्या पाने खरडणारे कुबेर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत. बर्‍याचवेळा त्यांचे अग्रलेख भांडवलदारधार्जिने असतात. ते चूक की बरोबर हा चर्चेचा विषय असू शकतो; पण ‘अग्रलेख वापसी’चे समर्थन कुणीही सुज्ञ व्यक्ती करू शकणार नाही. कालचा अग्रलेख आज दिलगिरी व्यक्त करत माघार घ्यावा लागतो म्हणजे गिरीश कुबेर यांच्यावर किती दबाव आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यातही त्यांनी ‘मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो’ अशी संपादकाला न शोभणारी एकेरी भाषा वापरली आहे. ‘पगारी संपादकां’चे कसे हाल होतात यावर अनेक वेळा चर्चा होत असली तरी कुबेरांच्या या कृतीतून ते प्रत्यक्ष दिसून आले आहे.
अग्रलेख माघार न घेता अन्य सहकार्‍यांनी त्याचा प्रतिवाद करणे, तटस्थपणे त्याविषयीची दुसरी बाजू मांडणे, ज्यांना तो अग्रलेख पटला नाही त्यांनी लोकशाही मार्गाने कुबेरांना आणि ‘लोकसत्ते’ला न्यायालयात खेचणे असे लोकशाही मार्ग उपलब्ध असताना कुबेरांनी चक्क माघार घेत वृत्तपत्राच्या मूलतत्वालाच तिलांजली दिली आहे. असा नामुष्कीचा प्रकार आजवर कोणत्याही संपादकावर आला नाही आणि यापुढेही येऊ नये. ‘पत्रकारांनी नेहमी दुसरी बाजू बघावी. विरोधी प्रवाह समजून घेतले तरच तुम्ही ठामपणे लिहू शकता’ असे उपदेशाचे प्रवचन झाडणारे गिरीश कुबेर हेच का? असाही प्रश्‍न अनेकांना पडला आहे. कुबेर लोकसत्तेच्या चेंबरमध्ये बसून अग्रलेख लिहित असल्याने त्यावेळी त्यांनी मद्यपान केले असण्याचीही शक्यता नाही! मग हे कसे घडले?
मदर तेरेसा या संत नव्हत्या तर एक सामान्य धर्मप्रसारक होत्या हे अनेकांनी अनेकवेळा सिद्ध केलेले सत्य आहे. त्यांचे सेवा-सुश्रुषेचे कार्य महत्त्वाचे असले तरी त्यातून त्यांनी ख्रिश्‍चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच स्वत:ला वाहून घेतले होेते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. खुद्द मदर तेरेसा यांनीही हे आपल्या कृतीतून कायम दाखवून दिले आहे. हिंदू धर्मातील विविध संत-महंतांवर आपल्या लेखणीद्वारे तुटून पडणार्‍या कुबेरांनी कधी नव्हे ते या विषयाला हात घालत सत्य मांडले. विविध समाजमाध्यमांद्वारे त्यांचा तो अग्रलेख मोठ्या प्रमाणात वाचला गेला. एकांगी भूमिकेमुळे ज्या वाचकांनी ‘लोकसत्ता’ वाचणे कायमचे सोडून दिले त्यांनीही फेसबुक, ट्वीटरसारख्या माध्यमातून या अग्रलेखाचे समर्थन केले. हा अग्रलेख वाचकप्रिय होत असतानाच कुबेरांनी तो माघार घेण्याची घोषणा केली.
बरे! कालच्या वृत्तपत्रातील अग्रलेख आज कसा माघार घ्यायचा हेही आम्हास कळले नाही. त्यांच्या वृत्तपत्राचा जेवढा खप आहे त्याहून कितीतरी मोठ्या प्रमाणात हा अग्रलेख वाचला गेला. मध्यंतरी शेतकर्‍यांच्या विरोधी कुबेरांनी अग्रलेख लिहिला आणि त्यांचे लेखन म्हणजे अग्रलेख नसतात तर ‘हाग्रलेख’ असतात अशी टीका झाली. संपादकांनी कोणत्या विषयावर काय लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. घटनेच्या कलम 19 अ अन्वये आपणास विचारस्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र हिंदू धर्मावर कायम पोटतिडिकेने लिहिणार्‍या आणि ‘असहिष्णूते’वरून रान पेटवणार्‍या कुबेरांना इतर धर्मावर टीका केली की कसे शेपूट घालून पळावे लागते याची प्रचिती आली. हिंदू धर्मावर कुणी काहीही लिहिले तरी आपण खपवून घेतो. ख्रिश्‍चन-मुस्लिम अशा कडवट धर्मावर लिहिल्यानंतर मात्र अग्रलेख माघार घ्यावे लागतात; व्यंग्यचित्रे छापल्यावरही खुनाच्या राशी पडतात हा इतिहास सर्वपरिचित आहे. कुबेरांनी पळपुटेपणा करत माघार घेतल्याने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे नाक कापले गेले आहे.
एखाद्या चित्रपटावर, नाटकावर बंदी आणणे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे आणि आता एका आघाडीच्या वृत्तपत्राने त्याचाच कित्ता गिरवत चक्क अग्रलेख मागे घेणे हे प्रचंड क्लेशकारक आहे. मुळात बहुतांश वृत्तपत्रातील संपादकीय लेख वाचक सध्या वाचत नाहीत. संपादकांनीही केवळ औपचारिकता पूर्ण करायची आणि तेवढी जागा भरायची असा खेळ सुरू आहे. याला जी चार-दोन वृत्तपत्रे अपवाद होती त्यात ‘लोकसत्ता’चा समावेश आवर्जून व्हायचा. या प्रतिमेला कुबेरांनी तडा दिला आहे. त्यांनी हा अग्रलेख का माघार घेतला, नक्की कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे तरी स्पष्ट करायला हवे होते.
‘जॅकेट कव्हर’ या नावाने पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात छापणे ‘लोकसत्ता’ने सुरू केले त्यावेळी ‘बाईने कपाळावरील कुंकू कधीही विकू नये’ अशी प्रतिक्रिया आम्ही दिली होती. पुढे जॅकेट कव्हर हा प्रकार सर्वच वृत्तपत्रांनी सुरू केला. ‘लोकसत्ता’ने  अग्रलेख माघार घेऊन एक दुर्दैवी पाऊल टाकले आहे. याची री इतर वृत्तपत्रांनी ओढू नये म्हणजे मिळवली. ‘लोकसत्ता’ आज खर्‍याअर्थी ‘शोकसत्ता’ झाला अशा ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या दुर्दैवाने सत्य ठरू नयेत असेच आम्हास अजूनही वाटते. 

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, February 20, 2016

‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संस्थेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. मात्र गेल्या काही वर्षात या संस्थेची रयाच गेली. वादविवाद आणि वितंडवाद यामुळे साहित्य परिषद चर्चेत येतेय. साहित्य परिषदेतून साहित्यच हरवलेय असे वाटते. आजीव सभासदांचाही परिषदेशी फारसा संबंध राहिलेला नाही. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे मुखपत्र असलेले त्रैमासिक आणि पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी आलीच तर मतपत्रिका, एवढाच काय तो आजीव सभासदांचा परिषदेशी संबंध येतोय.
मात्र यंदा चित्र बदलतेय. अतिशय परखड बाण्याचे, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय निवडणूक निर्णय अधिकारी लाभल्याने त्यांनी अनेक विधायक, सकारात्मक बदल घडविले आहेत. निवडणूक प्रक्रियेत त्यांनी केलेले आमुलाग्र बदल स्वागतार्ह आहेत. त्यामुळे यापूर्वी मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत जी उलटसुलट चर्चा व्हायची त्याला चाप बसला. एकतर त्यांनी यावेळी प्रत्येक मतपत्रिकेला सांकेतिक क्रमांक (बारकोड) दिले आहेत. शिवाय मतदारांचे ओळखपत्र अनिवार्य केल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येते. त्यामुळे आमच्यासारख्या काहींनी या व्यवस्थेचे आणि प्रक्रियेचे जोरदार स्वागत केले आहे तर काहींच्या पायाखालची वाळू सरकली.
पत्रकार या नात्याने आम्ही आजवर अनेक निवडणुका अनुभवल्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा, समृद्ध करणारा आहे. परिषदेतील अपप्रवृत्तींवर बाहेरून अनेकवेळा मी धाडसाने दगडफेक केली; मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे स्वतः परिषदेत उतरून आपण काहीतरी करावे या विचाराने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना कायम ‘चपराक’ देताना आम्ही कधीही डगमगलो नाही. त्यामुळेच ‘तुमच्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते परिषदेत हवेत’ असे अनेक मान्यवर आवर्जुन सांगत आहेत. सभासदांचा मिळणारा हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. त्यांच्याकडून मिळणारी कौतुकाची थाप ही मोठी पावती होय.
निवडणुकीच्या निमित्ताने अनेक बरेवाईट अनुभव येत असून त्यावर आधारित ‘जावे त्याच्या वंशा’ हे पुस्तक मी लवकरच आपणास वाचावयास देईन! साहित्य परिषद साहित्याभिमुख व्हावी, समाजाभिमुख व्हावी यासाठी आमच्या ‘परिवर्तन आघाडी’चे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांनी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांचाच या आघाडीत समावेश केला. समोरच्या पॅनलने एकाही महिलेला स्थान दिले नसताना ‘परिवर्तन’ने मात्र बारा जागांपैकी चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देऊन साहित्य क्षेत्रातील स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. ‘पुरूषी मानसिकतेतून मला त्रास दिला जातो आणि माझी कुचंबणा होते’ असे गळे काढणारी विदुशी मात्र खुल्या दिलाने या निर्णयाचे स्वागत करत नाही!
साहित्य परिषदेचे 11300 मतदार आहेत. त्यात पुण्यातील 2865 जणांचा समावेश आहे. परिषदेने उमेदवारांना या सभासदांची जी यादी दिली त्यात कुणाचेही संपर्क क्रमांक किंवा मेल आयडी नाहीत. त्यामुळे संपर्कात अनंत अडचणी येत आहेत. त्यातील कित्येक सभासद हयात नाहीत, काहींची नावे दुबार आहेत तर काहींचे पत्ते बदलले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतोय. शिवाय या यादीत सर्वांची नावे आद्याक्षराप्रमाणे असल्याने त्या त्या भागातील सभासदांची यादी वेगळी करणे हे जिकिरीचे काम आहे. वेळेच्या मर्यादा लक्षात घेता यातील सभासदांपर्यंत थेट पोहोचणे कुणालाही शक्य होत नाही. त्यामुळे पत्रव्यवहाराला पर्याय नाही. त्यातही पत्ते किंवा पिन कोड क्रमांक चुकीचे असतील तर पत्रं त्यांच्यापर्यंत जात नाहीत. या सार्‍या अडचणींवर मात करण्याचे आव्हान दोन्ही पॅनलपुढे आहे.
व्यक्तीशः मला या निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मतदारांच्या घरी गेल्यानंतर ते जोरदार स्वागत करतात. साहित्यावर चर्चा होते. त्यांची ग्रंथसंपदा कळते. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती कळतात. अनेक सभासद गेल्यानंतर आधी ‘चपराक’ची वर्गणी हातात टेकवतात. ते सांगतात, ‘‘आम्ही परिवर्तन आघाडीला मत तर देणार आहोतच, पण आधी ‘चपराक’च्या अंकाची वर्गणी घ्या! तुमचा अंक आमच्यापर्यंत आलाच पाहिजे...’’ हा प्रतिसाद उमेद वाढवणारा आहे. लोकांना परिवर्तन हवेय. साहित्य परिषद साहित्यिक उपक्रमांनी चर्चेत यावी, या मातृसंस्थेची अप्रतिष्ठा होऊ नये असेच अनेकांना वाटते.
अर्थात, काही कटू अनुभवही आहेत पण ते मोजकेच! एका नामवंत लेखकाने विचारले, ‘‘तुम्हाला व्हर्र्च्युअल रिऍलिटी माहिती आहे का?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘हो, म्हणजे भासात्मक सत्य!’’
त्यांनी सांगितले, ‘‘अगदी बरोबर! आता एक भासात्मक सत्य मनावर बिंबवा की, मागील वर्षभर मी तुमच्याकडे लेखन केले आहे. त्याचे मानधन आणून द्या आणि आमची इतकी मते घेऊन जा!’’
लेखन केलेले नसतानाही असे मानधन मागणे हा केवढा मोठा गैरव्यवहार! राजकारण्यांना लाजवेल असा हा अनुभव! त्यामुळे आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आणि बाहेर पडलो.
काहीजण घरी बोलवून प्रेमाने पाच-दहा कविता ऐकवतात आणि मत आमच्याच परिवर्तन पॅनलला देणार असल्याचे सांगतात. लेखणी-वाणीवर जबरदस्त प्रभूत्व असलेले प्रा. मिलिंद जोशी हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. प्रकाश पायगुडे यांनी परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी चांगले कार्य केले आहे. सुनिताराजे पवार या ‘संस्कृती प्रकाशन’च्या माध्यमातून साहित्य शारदेची उपासना करतात. ज्योत्स्ना चांदगुडे या ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आहेत. निलिमा बोरवणकर यांची सकस ग्रंथसंपदा आहे. स्वप्निल पोरे हे ‘केसरी’चे वृत्तसंपादक आहेत, उत्तम कवी आणि कथाकार आहेत. चित्रपटविषयक लेखनात त्यांचा हातखंडा आहे. वि. दा. पिंगळे हे शिक्षक आहेत, कवी आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाली. मी ‘चपराक’च्या माध्यमातून गेली चौदा वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. नंदा सुर्वे गेली अनेक वर्षे परिषदेवर कार्यरत आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले हे उत्तम लेखक असून दत्तोपासक आहेत. त्यांच्या ‘कर्दळीवन’ या पुस्तकाने इतिहास रचला. श्रीधर कसबेकर हे विधिज्ञ आहेत. असा हा भक्कम संघ परिषदेच्या विकासासाठी, मराठीच्या संवर्धनासाठी मैदानात उतरलाय. त्यामुळे त्याला बळकटी देणे हे सुजाण मतदारांचे कर्तव्य आहे.
आमच्यासारख्या तरूणांनी या निवडणुकीत भाग घेतल्याने साहित्य परिषदेचे वय कमी झाले आहे. प्रा. मिलिंद जोशी हे सर्वात कमी वयाचे कार्याध्यक्ष होतील. हा विक्रम नोंदविला गेला तर साहजिकच परिषदेशी तरूणांचे नाते अधिक घट्ट होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरूणांची खंबीर साथ या बळावरच हा मराठीचा गाडा हाकावा लागेल. त्यासाठी आता परिवर्तन घडवा. कोणतेही किंतु मनात न ठेवता आमच्या आघाडीचे हात मजबूत करा. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन यासाठी हे पूरक आणि पोषक ठरणार आहे. केवळ मराठी भाषा दिन साजरा करणे, मराठी सप्ताह साजरा करणे यामुळे फारसे काही होणार नाही. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ हे सूत्र लक्षात घ्यायला हवे. आम्हाला चांगली कृती करायचीय. त्यासाठी आपणा सर्वांचा पाठिंबा मिळावा, इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. बाकी या सार्‍या प्रक्रियेविषयी लवकरच एक पुस्तक लिहून साहित्य क्षेत्राचा चेहरा लख्खपणे दाखवतोय. तूर्तास, परिवर्तनाच्या प्रतिक्षेत! 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Wednesday, February 10, 2016

साहित्य परिषदेत परिवर्तन घडावे!

ठोकळेबाज विचारसरणीचे चार कळीचे नारद एकत्र आले की त्याची ‘परिषद’ होते, असा काहींचा गैरसमज झालाय. त्याला कारण अशा प्रवृत्तीचे मूठभर लोकच आहेत. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी निर्मितीक्षम, स्वयंप्रज्ञा असलेले लोक महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या मातृसंस्थेत हवेत. आपल्या लेखणी आणि वाणीने वाचक-रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रा. मिलिंद जोशी यांनी हे ताडले आणि परिषदेच्या कारभारात काही बदल घडावा यासाठी चार पावले पुढे टाकली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी ‘मसाप परिवर्तन आघाडी’ स्थापन करून उडी घेतली आहे. साहित्य परिषद समाजाभिमुख आणि साहित्याभिमुख (होय, त्याची खरी गरज आहे!) व्हावी, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. आजीव सभासदांचा परिषदेतील सहभाग वाढून मराठी साहित्य, समीक्षा आणि संशोधनाचे हे ज्ञानकेंद्र व्हावे यासाठी या आघाडीच्या पाठिशी राहणे हे आपले सांस्कृतिक कर्तव्य आहे.
विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यांवर अव्वल ठरणार्‍या प्रा. जोशी यांचे कार्य मोठे आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, योगी अरविंद, शाहू महाराज ते महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्यापर्यंत प्रत्येक महापुरूषांवर सलग व्याख्यानांचा त्यांचा विक्रम आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची क्षणोक्षणी आठवण करून देणार्‍या जोशी यांचे लेखणी आणि वाणीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. मागच्या बारा-तेरा वर्षांपासून आम्ही त्यांना जवळून ओळखतो आणि त्यांचे कार्य उघड्या डोळ्यांनी पाहतो. व्याख्यानांच्या निमित्ताने दुर्गम भागात गेल्यानंतर रात्री तेथील कवी-लेखकांची मैफिल जमवणारे आणि त्यातील काही कलावंतांच्या नोकरीसाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आत्मियतेने सोडवणारे मिलिंद जोशी आम्ही अनुभवले आहेत. त्यामुळेच परिवर्तनाच्या या लढाईत ‘चपराक’ त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. इतकेच नाही तर ही साथ अधिक भक्कमपणे देता यावी यासाठी आम्ही त्यांच्या आघाडीतर्फे परिषदेच्या निवडणुकीतही उडी घेतली आहे.
‘चपराक’चा वाढता व्याप आणि उभारलेेला डोलारा सर्वपरिचित आहे. एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून अल्पावधीतच ‘चपराक’ने वाचकांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे. नव्या-जुन्या लेखकांचा समन्वय साधताना ‘चपराक’ने ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे धोरण स्वीकारले. त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक प्रतिभावंत लेखक आम्ही आपल्यापुढे आणू शकलो. अनेक प्रतिभावंतांसाठी साहित्य परिषदेच्या बाहेर अलिखित असलेला ‘नो एन्ट्री’चा फलक आम्हास खुपत होता. सकस लिहिणार्‍या अनेक हातांना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे, नाउमेद करणे, अनुल्लेखाने मारणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील या कंपुशाहीला ‘चपराक’ देत आम्ही एक व्यापक चळवळ सुरू केली.
साप्ताहिकाच्या माध्यमातून अनेक समस्यांना सातत्याने वाचा फोडल्याने प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. लेखणीतून शब्दास्त्रांचा मारा केल्याने अनेक प्रश्‍न मार्गी लागले. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या भावनेने आम्ही अनेकांचा आवाज बनलो. लिहित्या हातांना बळ दिले. त्यातूनच अनेक सृजनशील लेखक पुढे आले. ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची सुरूवात करून एकेकावेळी पंधरा-पंधरा पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विख्यात निवेदक सुधीर गाडगीळ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ, सदानंद मोरे अशा मान्यवरांना बोलवून या पुस्तकांचे प्रकाशन केले. दगडखाणीत काम करणार्‍या वर्गाचे चित्रण करणार्‍या युवा लेखक हणमंत कुराडे याच्यापासून ते सुप्रसिद्ध संशोधक संजय सोनवणी, सदानंद भणगे यांच्यापर्यंत अनेकांची पुस्तके ‘चपराक साहित्य महोत्सवा’त प्रकाशित केली.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आवर्जून आले. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते 2002 साली ‘चपराक’चा पहिला अंक प्रकाशित झाला आणि आम्ही साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचा, कार्यक्रमांचा धडाका लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार, अभिनेत्री बेबी शकुंतला, चंदू बोर्डे, जगन्नाथ कुंटे, मंगेश तेंडुलकर, समाजवादी नेते भाई वैद्य, उद्योजक डी. एस. कुलकर्णी, भाजपा नेते माधव भंडारी, ह. भ. प. किसनमहाराज साखरे, प्रा. वीणा देव, अभिनेत्री आशा काळे, डॉ. न. म. जोशी, डॉ. कुमार सप्तर्षी, ह. मो. मराठे, अंजली कुलकर्णी, डॉ. माणिकराव साळुंखे अशा अनेक मान्यवरांनी ‘चपराक’च्या व्यासपीठावर आपली उपस्थिती लावली. जातीभेद, धर्मभेद, प्रांत, वय, स्त्री-पुरूष असे सारे भेद छेदत आम्ही लेखकांचा कबीला निर्माण केला.
महाराष्ट्राबरोबरच सहा राज्यात ‘चपराक’चा वाचकवर्ग निर्माण केला. बृहन्महाराष्ट्रातील लेखकांचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर प्रकाशित केले. हे सर्व पाहून साहित्य क्षेत्रातील आम्हाला आदर्श वाटणार्‍या काही दिग्गजांनी सांगितले की, ‘आपल्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते साहित्य परिषदेत हवेत. महाराष्ट्र साहित्य परिषद तळागळातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी तरूणांनी परिषदेला बाहेरून नावे ठेवण्यापेक्षा पुढाकार घ्यायला हवा आणि परिवर्तन घडवून साहित्य क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करायला हवे.’
‘साहित्य परिषद साहित्यबाह्य विषयांवरूनच नेहमी चर्चेत असते. एकमेकांच्या कुचाळक्या करण्यातच तेथील महाभाग धन्यता मानतात; त्यामुळे त्या दलदलीत तुम्ही उतरू नका’ असा सल्लाही काहींनी दिला. ‘शिवाजी जन्मावा पण शेजार्‍याकडे’ हे आम्हाला कदापि मान्य नाही. काठावर बसून पोहणार्‍याला उपदेश करणार्‍यांपैकी आम्ही नाही. ‘चपराक’ने सातत्याने विविध विषयांवरून धाडसाने भूमिका घेतल्यात. त्या परिणामकारक आणि लक्ष्यवेधीही ठरल्यात. सकारात्मक परिवर्तनाचा ध्यास आम्ही घेतलाय. त्यासाठी मागची चौदा वर्षे रचनात्मक संघर्ष उभारलाय. साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक हे त्याचेच एक पाऊल आहे.
प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे हे या आद्यसंस्थेत परिवर्तन घडवू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी ही आघाडी स्थापन केली. प्रकाशन विश्‍वात अल्पावधीतच भरीव योगदान देणार्‍या सुनिताराजे पवार, ‘साहित्यदीप’ संस्थेच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या ज्योत्स्ना चांदगुडे, साहित्यिक जाणीवा समृद्ध असणार्‍या नीलिमा बोरवणकर, कथा-कविता, चित्रपट समीक्षा यात योगदान पेरणारे ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांचा या आघाडीत समावेश आहे. ‘चपराक’च्या माध्यमातून चौदा वर्षे कार्यरत असल्याने आम्हीही या आघाडीतर्फे स्थानिक कार्यवाह क्र. 6 (अतिथी निवास आणि इमारत देखभाल) या पदासाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. लेखिका नंदा सुर्वे, ‘कर्दळीवन’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक दत्तोपासक प्रा. क्षितिज पाटुकले आणि ऍड. श्रीधर कसबेकर असे लेखक या आघाडीत आहेत. समोरच्या पॅनेलने एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नसताना प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी स्त्रीशक्तीचा सन्मान राखत बारा पैकी चार महिला उमेदवारांना परिवर्तन आघाडीत समाविष्ट केले आहे.
कसलीही निर्मितीची क्षमता नसलेले लोक नवनिर्माणाची भाषा करीत आहेत, यापेक्षा अतिशयोक्ती ती कोणती? आता परिवर्तन झाल्याशिवाय नवनिर्माण होणार नाही. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपले एक मत निर्णायक ठरणारे आहे. पुणे शहराचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात समावेश झालाय. शहर स्मार्ट करताना येथील हरवत चाललेले सांस्कृतिक पर्यावरण जतन करणे, समृद्ध करणे ही काळाची गरज आहे. अब्दूल कलाम यांनी ‘2020 साली भारत महासत्ता होणार’ असे स्वप्न पाहिले होते. त्याच्या पुर्ततेसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. यंत्रणेला, व्यवस्थेला शिव्या घालून, त्यांच्या नावे खडे फोडून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे साहित्यविषयक भरीव योगदान देण्यासाठी परिवर्तन आघाडी सज्ज आहे. त्याला आपल्या शुभेच्छांची, पाठिंब्याची सक्रीय साथ मिळाल्यास आम्ही निश्‍चितपणे काही बदल घडवू याचा आपण विश्‍वास बाळगावा. जोशी-पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिवर्तन आघाडीला आपण बहुमताने विजयी करावे. मी आणि माझे सर्व सहकारी आपणा सर्वांचा विश्‍वास सार्थ ठरवू आणि परिषदेत नवचैतन्य निर्माण करू, याची ‘चपराक’चा संपादक या नात्याने आपणास ग्वाही देतो.
- घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२
------------------------------
---------

काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या साहित्य व्यवहाराचे मानबिंदू असले तरी प्रत्यक्षात असाहित्यिक राजकारणाचा अड्डा बनत अनेकदा टीकेचे धनी झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची आता निवडणूक होणार आहे. ही निवडणूक म्हणजे एका अर्थाने साहित्य प्रेमींना नव्या दमाच्या, कल्पक, साहित्याशीच खर्‍या अर्थाने निगडित व मराठी साहित्याची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरीत तरुणांना निवडून देत साहित्य परिषदेचा कारभार संपुर्णपणे सुधारण्याची एक अनमोल संधी आहे.
या निवडणुकीत माझे बंधुतूल्य मित्र घनश्याम पाटील स्थानिक कार्यवाह क्र. 6 या पदासाठी उभे आहेत. त्यांनी साहित्य परिषदेच्या पुर्वीच्या व्यवस्थापनावर अनेकदा जाहीरपणे परखड टीका करुन त्याला काही बाबतीत बदलायला भाग पाडले आहे. ते स्वत: सिद्धहस्त लेखक, पत्रकार व प्रकाशक असल्याने त्यांचा साहित्य क्षेत्रातील नव्या-जुन्या साहित्यिकांशी जवळचा संबंध आहे. साहित्य क्षेत्राशी निगडित प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून साहित्य परिषदेचा चेहरा-मोहरा बदलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे, याचा मला विश्वास वाटतो. ज्यांनाही त्यांच्या निगर्वी पण परखड आणि रोखठोकपणाचा अनुभव आहे ते माझ्या मताशी सहमत होतील याचाही मला विश्वास आहे. घनश्याम पाटील यांच्या उमेदवारीस माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
याशिवाय परिवर्तन आघाडीचे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, माझ्या स्नेही ज्योत्स्नाताई चांदगुडे, ‘केसरी’चे वृत्तसंपादक, लेखक-कवी स्वप्निल पोरे यांच्यासह  घनश्याम पाटील यांच्या सर्व सहकार्‍यांना आपण भरघोस मतांनी निवडून देत मसापमध्ये खरोखरचे परिवर्तन घडवून आणावे, असे मी जाहीर आवाहन करतो.

-संजय सोनवणी, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
9860991205

------------------------------
----------------------------

घनश्याम पाटील हे माझे उत्तम मित्र आहेत. ‘चपराक’च्या माध्यमातून ते कुठल्याही दडपणांना बळी न पडता अनेक व्यक्ती आणि संस्थांची प्रकरणे बाहेर काढत असतात. हा नव्या दमाचा पत्रकार-लेखक साहित्य परिषदेच्या कारभारात नीट डोकावून पाहण्यासाठी, तिथे जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा!
-सुधीर गाडगीळ, सुप्रसिद्ध निवेदक
९८२२०४६७४४
------------------------------


  नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, शाळा- कॉलेजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याची गोडी निर्माण करणे, ग्रामीण परिसरातील सांस्कृतिक संस्थांना आधार देणे आणि साहित्य परिषदेचे स्वरुप आणि क्षेत्र व्यापक करणे अशी काही स्वप्ने मनाशी धरुन जी मंडळी येत्या म. सा. परिषदेच्या निवडणुकीत उभी आहेत, त्यात घनश्याम पाटील यांचा समावेश अग्रकमाने करावयास हवा. पत्रसृष्टी, प्रकाशनसृष्टी, संस्कारसृष्टी नी तरुणांना बरोबर घेऊन स्वप्नसृष्टी साकार करण्याचे व्रत घेतलेले श्री. पाटील हे महाराष्ट्र समाज जीवनाला अधिक सशक्त करतील. सांस्कृतिक जीवनाला अधिक श्रीमंत करतील यात शंका नाही म्हणून पुण्यनगरीच्या सुजाण मतदारांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भरघोस मतदान करुन उर्जा द्यावी, असे मला वाटते.
द. ता. भोसले, ज्येष्ठ साहित्यिक
पंढरपूर
९४२२६४६८५५

Sunday, February 7, 2016

हे झाड सारस्वताचे !


महाराष्ट्र साहित्य परिषद परिवर्तन आघाडीतर्फे मी स्थानिक कार्यवाह क्रमांक 6 (अतिथी निवास व्यवस्थापन, वास्तुदेखभाल) या पदासाठी निवडणुक लढवत आहे. काहीतरी विधायक, सकारात्मक कार्य करून साहित्य परिषद समाजाभिमुख करावी यासाठी आमच्या आघाडीचे प्रमुख प्रा. मिलिंद यांनी ही आघाडी स्थापन केली आहे. त्यात साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या लोकांचा समावेश आहे. प्रा. जोशी यांनी तब्बल एक वर्षापूर्वी (8 फेब्रुवारी 2015) माझ्या कार्याविषयी गोव्यातील अग्रगण्य असलेल्या दैनिक ‘गोमन्तक’ला एक लेख लिहिला होता. तो आपण अवश्य वाचावा. निवडणुकीचा विचारही डोक्यात नसताना आजच्या आघाडीप्रमुखाने केलेले कार्याचे मूल्यमापन मला सुखावून गेले.

पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. विद्येचे माहेरघर आहे. अशा शहरात येवून कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका जिद्दी तरूणाने केवळ आत्मविश्वासाच्या बळावर साप्ताहिक सुरू करणे, साहित्याला वाहिलेले मासिक सुरू करणे, दर्जेदार दिवाळी अंक काढणे आणि साहित्य क्षेत्रातील जाणकारांची वाहवा मिळविणे ही गोष्ट स्वप्नवत वाटावी अशीच आहे पण हे स्वप्न सत्यात उतरविले आहे ते घनश्याम पाटील नावाच्या मराठवाड्यातल्या एका हरहुन्नरी तरूणाने! साप्ताहिक 'चपराक', मासिक 'साहित्य चपराक' आणि दिवाळी अंक तसेच नवोदितांबरोबरच, नामवंतांच्या साहित्यकृतींना प्रकाशात आणणारे 'चपराक प्रकाशन' ही सुद्धा या तरूणाच्या सर्जनशीलतेला आलेली सुगंधी फुलेच आहेत. लाडक्या अपत्यांप्रमाणे या सर्वांचा सांभाळ घनश्याम पाटील मोठ्या प्रेमाने आणि कर्तव्यनिष्ठेने करीत आहेत.
त्यांना मी पहिल्यांदा भेटलो. त्यांचे पोरसवदा रूप पाहिले. त्यात कुठेही पोरकटपणाचा अंश नव्हता. त्यांच्या वागण्या, बोलण्यात एकप्रकारची प्रगल्भता होती. साहित्याविषयीची आस्था होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना अंगी आवश्यक असलेली निर्भीडता होती. प्रसंगी वाईटपणा विकत घेण्याची तयारीही होती. मुख्य म्हणजे स्वतःविषयीचा आत्मविश्वास होता. तो मला अतिशय भावला आणि मी त्यांचा स्नेहांकित झालो. त्यांची 'झिरो टू हिरो' ही जी वाटचाल सुरू आहे त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. आपल्या समोर एखादे झाड बहरावे आणि आपण ते पाहत रहावे तितक्याच मनस्वीपणे मी त्यांचे बहरणे पाहतो आहे. 'चपराक' आणि घनश्याम पाटील हे अद्वैत आहे. ते एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. 'चपराक' हा घनश्याम पाटील यांचा प्राण आहे आणि घनश्याम पाटील हा 'चपराक'चा आत्मा आहे. त्यांना असणारी साहित्याची जाण, स्वतःला अधिक समृद्ध करता यावे यासाठीची त्यांची धडपड, अखंड कार्यरत असण्याची त्यांची वृत्ती, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील माणसे जोडण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब, प्रसंगी भीडभाड न ठेवता स्पष्ट भूमिका घेण्याची आणि त्याची किंमत मोजण्याची त्यांची तयारी आणि या सर्व गुणांच्या जोडीला असणारी त्यांची धडाडी यामुळे त्यांची दमदार पावले पडत गेली. त्यांच्यासह 'चपराक'चा परिघ त्यामुळे विस्तारत गेला. ग्रामीण भागातून आलेला हा मुलगा आणि त्याचं प्रकाशन हा सारस्वतांच्या कौतुकाचा विषय बनला.
एक काळ असा होता की साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू हा फक्त पुण्या-मुंबईपुरता मर्यादित होता. आता तो ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागाकडे सरकतो आहे. जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष या भागातून येणारे नवे लेखक प्रभावीपणे मांडत आहेत. आजचा काळ लेखनासाठी अनुकूल आहे पण लेखकांसाठी मात्र प्रतिकूल आहे. याचे कारण वृत्तपत्रांंना नामवंत लेखक हवे आहेत. जी वाड्मयीन नियतकालिके कशीबशी चालू आहेत ते चौकटीतून बाहेर पडायला तयार नाहीत. वर्षातून एकदाच दिवाळी अंकाचे निमित्त असते त्या अंकाचे संपादकही वर्षानुवर्षे त्याच त्या लेखकांची आरती करताना दिसतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अप सारखी माध्यमे आहेत पण त्यावरील लेखनाला अजून प्रतिष्ठा मिळत नाही अशा परिस्थितीत नव्या लोकांच्या हुंकाराला आणि अभिव्यक्तीला सामावून घेणार्‍या एका सशक्त व्यासपीठाची आवश्यकता होती! ती 'चपराक'ने पूरी केली. प्रतिभेच्या अनेक नव्या कवडशांना उजेडात आणण्याचे काम 'चपराक'ने केले. 'चपराक'च्या लेखकांच्या मांदियाळीत अनेक नामवंत लेखकांचा समावेश आहे. परंपरा आणि नवता यांचा सुरेख समन्वय साधत 'चपराक'ची वाटचाल योग्य रीतिने सुरू आहे.
घनश्याम पाटील हे प्रतिमेत अडकलेले संपादक नाहीत. ते निर्भीड आहेत. त्यामुळे 'चपराक'ला कोणताही विषय वर्ज्य नसतो. खरंतर साहित्याने कोणतेही क्षेत्र आणि विषय वर्ज्य मानता कामा नये पण आज जो कप्पेबंदपणा सर्वत्र प्रत्ययाला येतो त्या पार्श्वभूमीवर 'चपराक'चे वेगळेपण उठून दिसते.
महाराष्ट्राला वेगळ्या वाटा चोखाळणार्‍या संपादकांची समृद्ध परंपरा आहे. 'वाङ्मयाच्या पाकात राजकारण तळून वाढेन' या ध्येयाने 'नवयुग' किंवा 'मराठा' चालविणारे आचार्य अत्रे असोत, केवळ जाई काजळाच्या जाहिरातीवर 'सोबत' चालविणारे ग. वा. बेहरे असोत, घनश्याम पाटील मला त्याच कुळातले वाटतात. जग काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला काय वाटतंय याला प्राधान्य देत आपल्या वाटा आपणच शोधणारी जी माणसे आहेत त्या पंथातले घनश्याम पाटील आहेत.
पुण्यात राहून चुकलेल्या राजकारणी पुणेकर सारस्वतांना तेच धार्‍यावर धरू शकतात. साहित्य संस्थांमधील राजकारणाचा तेच पर्दाफाश करतात, पुरस्कार संस्कृतीतल्या विकृतीवर हल्लाबोल करतात, राजकारण्यांना धडकी भरेल अशापद्धतीने त्यांच्या कारवाईचा समाचार घेतात. या सार्‍यांमागे काहीतरी मिळवणे हा त्यांचा हेतू कधीच नसतो. लोकांना अपमानित किंवा बदनाम करण्याचाही प्रयत्न नसतो. त्यांच्या लेखनामागे असते ती दांभिकतेची चीड आणि समाजस्वास्थ्याची कळकळ. त्यामुळेच ते परखडपणे लिहितात आणि स्पष्टपणे लिहिणार्‍या लेखकांची पुस्तके प्रकाशित करतात. एक तरुण मुलगा एखाद्या वडिलधार्‍याला शोभेल असे काम आज साहित्य क्षेत्रात करीत आहे. ही कौतुकाची बाब आहे.
तुच्छतावाद आणि प्रतिसादशून्यता या दोन रोगांनी आज साहित्यक्षेत्राला ग्रासले आहे. अंगावरती प्रेमाने थाप पडली तर जनावरंसुद्धा शहारून येतात पण माणसं मात्र मठ्ठासारखी असंवेदनशील झाली आहेत. अशा परिस्थितीत घनश्याम पाटील आणि त्याचा 'चपराक' परिवार साहित्य क्षेत्राला आलेले स्थितीस्थापकत्व दूर करून तो प्रवाह गतिमान करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत तेच त्यांचे वेगळेपणे आहे आणि सामर्थ्यही!
आज एकीकडे पुस्तके विकली जात नाहीत म्हणून रडणारे प्रकाशक आहेत. त्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी त्यांच्यातलाच पुस्तकांचा संसार करणारा घनश्याम पाटील यांच्यासारखा एक प्रकाशक एकाचवेळी बारा-बारा, पंधरा-पंधरा पुस्तकांचे प्रकाशन एकाच व्यासपीठावर करतो ही निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. साहित्य सोनियाची खाण अधिक समृद्ध व्हावी, सारस्वतांची अभिव्यक्तीची दिवाळी साजरी होत राहावी आणि सर्व प्रकारचे तिमीर नष्ट व्हावे यासाठी विचारांची दिवेलागण करणार्‍या साहित्योत्सवाची समाजाला नितांत गरज आहे. पाटील यांनी सुरू केलेल्या 'चपराक'च्या साहित्योत्सवामागेही हीच भावना आहे. अशा या वेगळेपण जपणार्‍या लेखक-प्रकाशकाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

- प्रा. मिलिंद जोशी 
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते
९८५०२७०८२३

Monday, February 1, 2016

चला परिवर्तन घडवूया, साहित्य परिषद बदलूया!

परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम आहे. माणसाचे आयुष्य प्रवाही असायला हवे. पाणी एकाच जागी तुंबून राहिल्यास त्याचे गटार होते. साहित्य, नाट्य, नृत्य, शिल्प, संगीत या व अशा कला माणसाला समृद्ध बनवतात. जीवनमान उंचावत त्यांना प्रगल्भतेकडे नेतात. साचलेपण दूर करतात. नवा उत्साह, प्रेरणा देतात. सकारात्मक ऊर्जा वाढवतात. या सार्‍यात माणूस घडविणार्‍या प्रत्येक संस्थेची जबाबदारी लाखमोलाची आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्यातून नवे सृजन घडेल, समाजाची बौद्धिक उंची वाढेल असा त्यांचा कयास होता. साहित्यातील अनेक दिग्गजांनी या मातृसंस्थेचे नेतृत्व केले आणि साहित्यिक जाणीवा समृद्ध केल्या.
हा गौरवशाली इतिहास असला तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेची आजची स्थिती काय आहे? साहित्याचे व्यापारीकरण झाले आणि बुजगावण्यांच्या खोगीरभरतीमुळे साहित्य परिषदेत साहित्य शोधावे लागते. म्हणूनच परिषदेला साहित्याभिमुख आणि समाजाभिमुख करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. लौकिकाला साजेसे नेतृत्व न लाभणे हे कोणत्याही समाजाचे दुर्भाग्यच! अशावेळी कोणीतरी पुढाकार घेऊन हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करायलाच हवा! साहित्य, भाषा, संस्कृती याविषयी कळवळ असणार्‍या प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार या त्रयींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेची परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जायला सज्ज आहे. परिषदेतील दुकानदारी संपुष्टात येऊन राजकारणविरहीत निर्मळ कारभाराची अपेक्षा या चमूकडून ठेवता येईल.
नामवंत व्यवस्थापन तज्ज्ञ असलेले 86 वर्षीय निवृत्त प्राचार्य, सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. ‘प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापासून मला दूर ठेवले गेले, मी नामधारी अध्यक्ष आहे’ असे त्यांना परिषदेच्याच व्यासपीठावरून जाहीरपणे सांगावे लागले यातच सारे काही आले. अशा सज्जन, सोज्वळ वृत्तीच्या आणि प्रत्येकावर भरभरून प्रेम करणार्‍या बुजुर्गाची ही अवहेलना, त्यांचे शल्य जर आपण समजून घेणार नसू तर आपल्याला मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचा नैतिक अधिकार आहे का?
आमच्या तरूण मित्रांना पुण्यातील पत्ता कळवताना काही वर्षापूर्वी स्थापन झालेले दुर्वांकूर हॉटेल लक्षात येते मात्र साहित्य परिषदेची इमारत काही केल्या कळत नाही. या आद्य साहित्य संस्थेचे हे मोठे अपयश आहे. तरूण पिढी तर सोडाच मात्र परिषदेचे कित्येक आजीव सभासदही या इमारतीकडे फिरकत नाहीत. इथल्या लोकांचे राजकारण, स्वकेंद्रीत वृत्ती आणि अहंकाराचे सतत पिटले जाणारे डांगोरे यामुळे अनेक साहित्य रसिकांचा परिषदेशी सुतराम संबंध राहिलेला नाही. किंबहुना परिषद कोणते उपक्रम राबवते, मराठी भाषा, संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करते याचीही कोणाला खबरबात नसते. शालेय विद्यार्थी, तरूण, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही आद्यसंस्था काही विधायक, रचनात्मक, प्रयोगशील कार्य करते, मराठीचे संवर्धन करते यावर कुणाचा सांगूनही विश्‍वास बसत नाही. परिषदेच्या मागच्या काही वर्षातील कारभार्‍यांनी आपल्या अकर्तबगारीमुळे ही नकारात्मक मानसिकता निर्माण केली आहे. उखाळ्या-पाकाळ्या आणि एकमेकातील कलगीतुरे, हेवेदावे, साहित्यबाह्य विषय यामुळेच परिषद चर्चेत राहते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही अधोगती रोखण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे ही काळाची गरज होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर महाराष्ट्रात रसिकप्रिय ठरलेले, लेखणी आणि वाणीवर उत्तम प्रभुत्व असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी काळाची ही हाक ऐकली. त्यातूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिवर्तन आघाडीची स्थापना झाली. तीस टक्के जुन्या आणि सत्तर टक्के नव्या उमेदवारांचा या आघाडीत समावेश आहे. व्यापारी मनोवृत्तीच्या धनाढ्यांना या निखळ साहित्यप्रेमींनी आव्हान दिले आहे. समोरच्या पॅनलने स्त्रीशक्तीचा अनादर करत एकाही महिलेला स्थान दिलेले नसताना परिवर्तन आघाडीने चार कर्तृत्ववान महिलांना उमेदवारी दिली आहे. विविध वयोगटातले, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी पार पाडणारे, स्वत:च्या क्षमता विकसित करण्याबरोबरच साहित्य क्षेत्रात योगदान पेरणारे हे उमेदवार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व उपक्रम पार पाडतानाच नव्या परिप्रेक्ष्यातून मसापसाठी नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या परिवर्तन आघाडीचा संकल्प आहे. स्वच्छ, पारदर्शक कारभाराद्वारे साहित्यकारणावर भर देणार्‍या आघाडीने महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमांचे पुण्यात यथोचित स्मारक उभारण्याचा मानस जाहीर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे मसापच्या शाखा विस्ताराबरोबरच या नव्या शाखांच्या आर्थिक सबलीकरणाचा प्रयत्न करून कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करणे व शाखांना उपक्रम देणे, फेसबुक-ब्लॉग अशा समाजमाध्यमांद्वारे तरूणाईशी सुसंवाद साधणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, महाविद्यालयातील वाङ्मय मंडळे परिषदेला जोडणे, साहित्यातील विविध प्रवाहात समन्वय साधून सुसंवाद घडविणे, समविचारी साहित्यसंस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य समीक्षा आणि संशोधनाचे प्रकल्प हाती घेणे, मसापच्या अतिथी निवासाचे व्यवस्थापन अधिक नेटके करून अतिथी निवास सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज करणे, मराठी विषय घेऊन स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक मिळावेत यासाठी सहकार्य करणे, मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांची अध्यापन क्षमता वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्न करणे, विविध वाङ्मय प्रकारांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या परिषदेच्या त्रैमासिक मुखपत्राचे स्वरूप अधिक संदर्भमूल्य वाढविणारे आणि उपयुक्त करणे, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, मसापच्या ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे आणि मुख्य म्हणजे मसापच्या आजीव सभासदांचा विविध उपक्रमात सहभाग वाढविणे यासाठी ही परिवर्तन आघाडी क्रियाशील राहणार आहे.
हे सारे शक्य होईल का? असा प्रश्‍न अनेक वाचकांना पडणे स्वाभाविक आहे; मात्र याहून अनेक उपक्रम या आघाडीच्या समोर असून त्याच्या पूर्तीसाठी सर्व उमेदवार सज्ज आहेत. प्रा. मिलिंद जोशी हे परिषदेच्या इतिहासात सर्वात तरूण कार्याध्यक्ष होतील. प्रकाश पायगुडे यांच्या कार्याची चुणूक साहित्य क्षेत्राने अनुभवलीच आहे. अतिशय जिद्दीने प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सुनिताराजे पवार, ‘साहित्यदीप’ संस्थेच्या माध्यमातून पुणेकरांना सुपरिचित असलेल्या कवयित्री आणि आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना चांदगुडे, संपादकीय कामाचा समृद्ध अनुभव असणार्‍या निलिमा बोरवणकर, कवी, चित्रपट समीक्षक आणि लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेल्या ‘केसरी’ या राष्ट्रीय बाण्याच्या दैनिकात वृत्तसंपादक असलेले स्वप्निल पोरे, ज्येष्ठ लेखिका नंदा सुर्वे, बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले प्रा. क्षितीज पाटुकले, ऍड. श्रीधर कसबेकर, मसापच्या पिंपरी शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, डॉ. पुरूषोत्तम काळे, सासवडचे रावसाहेब पवार असे एकाहून एक सरस उमेदवार या परिवर्तन आघाडीत आहेत. कवी आणि शिक्षक वि. दा. पिंगळे हे स्थानिक कार्यवाह म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. लेखक, कवी, प्रकाशक, संपादक, शिक्षक, वक्ते आणि पत्रकार अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील उमेदवारांचा परिवर्तन आघाडीत समावेश आहे.
सरतेशेवटी...
‘चपराक’च्या माध्यमातून मराठी साहित्याचा विजयध्वज डौलात फडकावा यासाठी गेली 14 वर्षे आम्ही अव्याहतपणे कार्यरत आहोत. एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय पुस्तके प्रकाशित केल्याने ‘चपराक’ची वेगळी ओळख निर्माण झालेली आहेच. चुकीच्या प्रवृत्तीला, विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना परखडपणे ‘चपराक’ देताना आम्ही सातत्याने ठाम भूमिका घेतल्या आहेत. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन आम्ही 2002 साली ‘चपराक’ ही संस्था स्थापन केली आणि त्याद्वारे प्रांजळपणे कार्यरत आहोत. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशक परिषदेचा बहिष्कार धाडसाने फेटाळून लावणे किंवा यंदाच्या साहित्य संमेलनाध्यक्षांचा चेहरा आणि मुखवटा वाचकांसमोर आणणे हे आमचे कार्य आपणास ठाऊक आहेच. एकाच वेळी पंधरा-पंधरा पुस्तकांचे प्रकाशन असेल किंवा दीडशेहून अधिक साहित्यिकांचा समावेश असलेला, सहा राज्यात वाचक असलेला तब्बल 468 पानांचा ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक प्रकाशित करणे हे सारे कार्य आपण जाणताच. त्यामुळेच बरबरटलेल्या राजकारणातून साहित्य परिषदेला बाहेर काढण्यासाठी आम्हीही प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे या द्वयींना समर्थ साथ द्यायची ठरवली. परिवर्तनाच्या या लढाईत म्हणूनच आपले आम्हास सक्रीय सहकार्य, पाठिंबा अपेक्षित आहे. फक्त उमेदवार म्हणून नाही, हितचिंतक म्हणून नाही तर एक साहित्यरसिक या नात्याने, पत्रकार या नात्याने आमची कायम ‘जागल्या’ची भूमिका असेल. परिवर्तन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात जे-जे मांडले आहे त्याच्या पूर्ततेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कार्यरत राहू याची ग्वाही आम्ही देतो. त्यामुळेच विश्‍वासाने साद द्यावीशी वाटतेय की, ‘चला परिवर्तन घडवूया; साहित्य परिषद बदलूया!’

- घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२