Monday, February 1, 2016

चला परिवर्तन घडवूया, साहित्य परिषद बदलूया!

परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम आहे. माणसाचे आयुष्य प्रवाही असायला हवे. पाणी एकाच जागी तुंबून राहिल्यास त्याचे गटार होते. साहित्य, नाट्य, नृत्य, शिल्प, संगीत या व अशा कला माणसाला समृद्ध बनवतात. जीवनमान उंचावत त्यांना प्रगल्भतेकडे नेतात. साचलेपण दूर करतात. नवा उत्साह, प्रेरणा देतात. सकारात्मक ऊर्जा वाढवतात. या सार्‍यात माणूस घडविणार्‍या प्रत्येक संस्थेची जबाबदारी लाखमोलाची आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्यातून नवे सृजन घडेल, समाजाची बौद्धिक उंची वाढेल असा त्यांचा कयास होता. साहित्यातील अनेक दिग्गजांनी या मातृसंस्थेचे नेतृत्व केले आणि साहित्यिक जाणीवा समृद्ध केल्या.
हा गौरवशाली इतिहास असला तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेची आजची स्थिती काय आहे? साहित्याचे व्यापारीकरण झाले आणि बुजगावण्यांच्या खोगीरभरतीमुळे साहित्य परिषदेत साहित्य शोधावे लागते. म्हणूनच परिषदेला साहित्याभिमुख आणि समाजाभिमुख करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. लौकिकाला साजेसे नेतृत्व न लाभणे हे कोणत्याही समाजाचे दुर्भाग्यच! अशावेळी कोणीतरी पुढाकार घेऊन हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करायलाच हवा! साहित्य, भाषा, संस्कृती याविषयी कळवळ असणार्‍या प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार या त्रयींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेची परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जायला सज्ज आहे. परिषदेतील दुकानदारी संपुष्टात येऊन राजकारणविरहीत निर्मळ कारभाराची अपेक्षा या चमूकडून ठेवता येईल.
नामवंत व्यवस्थापन तज्ज्ञ असलेले 86 वर्षीय निवृत्त प्राचार्य, सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. ‘प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापासून मला दूर ठेवले गेले, मी नामधारी अध्यक्ष आहे’ असे त्यांना परिषदेच्याच व्यासपीठावरून जाहीरपणे सांगावे लागले यातच सारे काही आले. अशा सज्जन, सोज्वळ वृत्तीच्या आणि प्रत्येकावर भरभरून प्रेम करणार्‍या बुजुर्गाची ही अवहेलना, त्यांचे शल्य जर आपण समजून घेणार नसू तर आपल्याला मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचा नैतिक अधिकार आहे का?
आमच्या तरूण मित्रांना पुण्यातील पत्ता कळवताना काही वर्षापूर्वी स्थापन झालेले दुर्वांकूर हॉटेल लक्षात येते मात्र साहित्य परिषदेची इमारत काही केल्या कळत नाही. या आद्य साहित्य संस्थेचे हे मोठे अपयश आहे. तरूण पिढी तर सोडाच मात्र परिषदेचे कित्येक आजीव सभासदही या इमारतीकडे फिरकत नाहीत. इथल्या लोकांचे राजकारण, स्वकेंद्रीत वृत्ती आणि अहंकाराचे सतत पिटले जाणारे डांगोरे यामुळे अनेक साहित्य रसिकांचा परिषदेशी सुतराम संबंध राहिलेला नाही. किंबहुना परिषद कोणते उपक्रम राबवते, मराठी भाषा, संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करते याचीही कोणाला खबरबात नसते. शालेय विद्यार्थी, तरूण, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही आद्यसंस्था काही विधायक, रचनात्मक, प्रयोगशील कार्य करते, मराठीचे संवर्धन करते यावर कुणाचा सांगूनही विश्‍वास बसत नाही. परिषदेच्या मागच्या काही वर्षातील कारभार्‍यांनी आपल्या अकर्तबगारीमुळे ही नकारात्मक मानसिकता निर्माण केली आहे. उखाळ्या-पाकाळ्या आणि एकमेकातील कलगीतुरे, हेवेदावे, साहित्यबाह्य विषय यामुळेच परिषद चर्चेत राहते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही अधोगती रोखण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे ही काळाची गरज होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर महाराष्ट्रात रसिकप्रिय ठरलेले, लेखणी आणि वाणीवर उत्तम प्रभुत्व असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी काळाची ही हाक ऐकली. त्यातूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिवर्तन आघाडीची स्थापना झाली. तीस टक्के जुन्या आणि सत्तर टक्के नव्या उमेदवारांचा या आघाडीत समावेश आहे. व्यापारी मनोवृत्तीच्या धनाढ्यांना या निखळ साहित्यप्रेमींनी आव्हान दिले आहे. समोरच्या पॅनलने स्त्रीशक्तीचा अनादर करत एकाही महिलेला स्थान दिलेले नसताना परिवर्तन आघाडीने चार कर्तृत्ववान महिलांना उमेदवारी दिली आहे. विविध वयोगटातले, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी पार पाडणारे, स्वत:च्या क्षमता विकसित करण्याबरोबरच साहित्य क्षेत्रात योगदान पेरणारे हे उमेदवार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व उपक्रम पार पाडतानाच नव्या परिप्रेक्ष्यातून मसापसाठी नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या परिवर्तन आघाडीचा संकल्प आहे. स्वच्छ, पारदर्शक कारभाराद्वारे साहित्यकारणावर भर देणार्‍या आघाडीने महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमांचे पुण्यात यथोचित स्मारक उभारण्याचा मानस जाहीर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे मसापच्या शाखा विस्ताराबरोबरच या नव्या शाखांच्या आर्थिक सबलीकरणाचा प्रयत्न करून कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करणे व शाखांना उपक्रम देणे, फेसबुक-ब्लॉग अशा समाजमाध्यमांद्वारे तरूणाईशी सुसंवाद साधणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, महाविद्यालयातील वाङ्मय मंडळे परिषदेला जोडणे, साहित्यातील विविध प्रवाहात समन्वय साधून सुसंवाद घडविणे, समविचारी साहित्यसंस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य समीक्षा आणि संशोधनाचे प्रकल्प हाती घेणे, मसापच्या अतिथी निवासाचे व्यवस्थापन अधिक नेटके करून अतिथी निवास सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज करणे, मराठी विषय घेऊन स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक मिळावेत यासाठी सहकार्य करणे, मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांची अध्यापन क्षमता वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्न करणे, विविध वाङ्मय प्रकारांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या परिषदेच्या त्रैमासिक मुखपत्राचे स्वरूप अधिक संदर्भमूल्य वाढविणारे आणि उपयुक्त करणे, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, मसापच्या ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे आणि मुख्य म्हणजे मसापच्या आजीव सभासदांचा विविध उपक्रमात सहभाग वाढविणे यासाठी ही परिवर्तन आघाडी क्रियाशील राहणार आहे.
हे सारे शक्य होईल का? असा प्रश्‍न अनेक वाचकांना पडणे स्वाभाविक आहे; मात्र याहून अनेक उपक्रम या आघाडीच्या समोर असून त्याच्या पूर्तीसाठी सर्व उमेदवार सज्ज आहेत. प्रा. मिलिंद जोशी हे परिषदेच्या इतिहासात सर्वात तरूण कार्याध्यक्ष होतील. प्रकाश पायगुडे यांच्या कार्याची चुणूक साहित्य क्षेत्राने अनुभवलीच आहे. अतिशय जिद्दीने प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सुनिताराजे पवार, ‘साहित्यदीप’ संस्थेच्या माध्यमातून पुणेकरांना सुपरिचित असलेल्या कवयित्री आणि आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना चांदगुडे, संपादकीय कामाचा समृद्ध अनुभव असणार्‍या निलिमा बोरवणकर, कवी, चित्रपट समीक्षक आणि लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेल्या ‘केसरी’ या राष्ट्रीय बाण्याच्या दैनिकात वृत्तसंपादक असलेले स्वप्निल पोरे, ज्येष्ठ लेखिका नंदा सुर्वे, बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले प्रा. क्षितीज पाटुकले, ऍड. श्रीधर कसबेकर, मसापच्या पिंपरी शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, डॉ. पुरूषोत्तम काळे, सासवडचे रावसाहेब पवार असे एकाहून एक सरस उमेदवार या परिवर्तन आघाडीत आहेत. कवी आणि शिक्षक वि. दा. पिंगळे हे स्थानिक कार्यवाह म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. लेखक, कवी, प्रकाशक, संपादक, शिक्षक, वक्ते आणि पत्रकार अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील उमेदवारांचा परिवर्तन आघाडीत समावेश आहे.
सरतेशेवटी...
‘चपराक’च्या माध्यमातून मराठी साहित्याचा विजयध्वज डौलात फडकावा यासाठी गेली 14 वर्षे आम्ही अव्याहतपणे कार्यरत आहोत. एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय पुस्तके प्रकाशित केल्याने ‘चपराक’ची वेगळी ओळख निर्माण झालेली आहेच. चुकीच्या प्रवृत्तीला, विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना परखडपणे ‘चपराक’ देताना आम्ही सातत्याने ठाम भूमिका घेतल्या आहेत. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन आम्ही 2002 साली ‘चपराक’ ही संस्था स्थापन केली आणि त्याद्वारे प्रांजळपणे कार्यरत आहोत. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशक परिषदेचा बहिष्कार धाडसाने फेटाळून लावणे किंवा यंदाच्या साहित्य संमेलनाध्यक्षांचा चेहरा आणि मुखवटा वाचकांसमोर आणणे हे आमचे कार्य आपणास ठाऊक आहेच. एकाच वेळी पंधरा-पंधरा पुस्तकांचे प्रकाशन असेल किंवा दीडशेहून अधिक साहित्यिकांचा समावेश असलेला, सहा राज्यात वाचक असलेला तब्बल 468 पानांचा ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक प्रकाशित करणे हे सारे कार्य आपण जाणताच. त्यामुळेच बरबरटलेल्या राजकारणातून साहित्य परिषदेला बाहेर काढण्यासाठी आम्हीही प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे या द्वयींना समर्थ साथ द्यायची ठरवली. परिवर्तनाच्या या लढाईत म्हणूनच आपले आम्हास सक्रीय सहकार्य, पाठिंबा अपेक्षित आहे. फक्त उमेदवार म्हणून नाही, हितचिंतक म्हणून नाही तर एक साहित्यरसिक या नात्याने, पत्रकार या नात्याने आमची कायम ‘जागल्या’ची भूमिका असेल. परिवर्तन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात जे-जे मांडले आहे त्याच्या पूर्ततेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कार्यरत राहू याची ग्वाही आम्ही देतो. त्यामुळेच विश्‍वासाने साद द्यावीशी वाटतेय की, ‘चला परिवर्तन घडवूया; साहित्य परिषद बदलूया!’

- घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

3 comments:

  1. फार भयानक वास्तव मांडले आहे आपण ।
    दुर्वांकुर च्या शेजारी मसाप असे सांगावे लागते ।
    जुनाट इमारत
    जुनाट विचार
    नाविन्याची कास न धरने ह्यामुळे मसाप मागे राहीले
    मसापच्या प्रगतिपेक्षा स्वतःची प्रगति करण्यात अनेक माजी अन् प्रस्थापित मंडळीनी धन्यता मानली ।
    माजी संमेलन अध्यक्ष ह्यांचे फोटो लावणे ह्यपलिकडे काही काम दिसत नाही ।
    घनश्याम पाटील सर आपल्या लेखणीतुन अंगार ओकला गेला पण त्याला वास्तवाची प्रखर किनार लाभली आहे ।
    हयात बदल करायचाच अन् आंम्ही आपल्या सोबत आहोत ।
    परखड
    मत
    योग्य
    विचार
    घनश्याप पाटील चपराककर पुणे दंडवत !

    ReplyDelete
  2. फार भयानक वास्तव मांडले आहे आपण ।
    दुर्वांकुर च्या शेजारी मसाप असे सांगावे लागते ।
    जुनाट इमारत
    जुनाट विचार
    नाविन्याची कास न धरने ह्यामुळे मसाप मागे राहीले
    मसापच्या प्रगतिपेक्षा स्वतःची प्रगति करण्यात अनेक माजी अन् प्रस्थापित मंडळीनी धन्यता मानली ।
    माजी संमेलन अध्यक्ष ह्यांचे फोटो लावणे ह्यपलिकडे काही काम दिसत नाही ।
    घनश्याम पाटील सर आपल्या लेखणीतुन अंगार ओकला गेला पण त्याला वास्तवाची प्रखर किनार लाभली आहे ।
    हयात बदल करायचाच अन् आंम्ही आपल्या सोबत आहोत ।
    परखड
    मत
    योग्य
    विचार
    घनश्याप पाटील चपराककर पुणे दंडवत !

    ReplyDelete
  3. दादा परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि परिवर्तन होणार याचा आम्हला विश्वास आहे. जुने ते सोने हे काही बाबतीत ठीक आहे पण कुठे तरी जुन्या गोष्टी मध्ये बदल झालाच पाहिजेल

    ReplyDelete