Wednesday, February 10, 2016

साहित्य परिषदेत परिवर्तन घडावे!

ठोकळेबाज विचारसरणीचे चार कळीचे नारद एकत्र आले की त्याची ‘परिषद’ होते, असा काहींचा गैरसमज झालाय. त्याला कारण अशा प्रवृत्तीचे मूठभर लोकच आहेत. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी निर्मितीक्षम, स्वयंप्रज्ञा असलेले लोक महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या मातृसंस्थेत हवेत. आपल्या लेखणी आणि वाणीने वाचक-रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रा. मिलिंद जोशी यांनी हे ताडले आणि परिषदेच्या कारभारात काही बदल घडावा यासाठी चार पावले पुढे टाकली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी ‘मसाप परिवर्तन आघाडी’ स्थापन करून उडी घेतली आहे. साहित्य परिषद समाजाभिमुख आणि साहित्याभिमुख (होय, त्याची खरी गरज आहे!) व्हावी, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. आजीव सभासदांचा परिषदेतील सहभाग वाढून मराठी साहित्य, समीक्षा आणि संशोधनाचे हे ज्ञानकेंद्र व्हावे यासाठी या आघाडीच्या पाठिशी राहणे हे आपले सांस्कृतिक कर्तव्य आहे.
विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यांवर अव्वल ठरणार्‍या प्रा. जोशी यांचे कार्य मोठे आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, योगी अरविंद, शाहू महाराज ते महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्यापर्यंत प्रत्येक महापुरूषांवर सलग व्याख्यानांचा त्यांचा विक्रम आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची क्षणोक्षणी आठवण करून देणार्‍या जोशी यांचे लेखणी आणि वाणीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. मागच्या बारा-तेरा वर्षांपासून आम्ही त्यांना जवळून ओळखतो आणि त्यांचे कार्य उघड्या डोळ्यांनी पाहतो. व्याख्यानांच्या निमित्ताने दुर्गम भागात गेल्यानंतर रात्री तेथील कवी-लेखकांची मैफिल जमवणारे आणि त्यातील काही कलावंतांच्या नोकरीसाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आत्मियतेने सोडवणारे मिलिंद जोशी आम्ही अनुभवले आहेत. त्यामुळेच परिवर्तनाच्या या लढाईत ‘चपराक’ त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. इतकेच नाही तर ही साथ अधिक भक्कमपणे देता यावी यासाठी आम्ही त्यांच्या आघाडीतर्फे परिषदेच्या निवडणुकीतही उडी घेतली आहे.
‘चपराक’चा वाढता व्याप आणि उभारलेेला डोलारा सर्वपरिचित आहे. एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून अल्पावधीतच ‘चपराक’ने वाचकांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे. नव्या-जुन्या लेखकांचा समन्वय साधताना ‘चपराक’ने ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे धोरण स्वीकारले. त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक प्रतिभावंत लेखक आम्ही आपल्यापुढे आणू शकलो. अनेक प्रतिभावंतांसाठी साहित्य परिषदेच्या बाहेर अलिखित असलेला ‘नो एन्ट्री’चा फलक आम्हास खुपत होता. सकस लिहिणार्‍या अनेक हातांना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे, नाउमेद करणे, अनुल्लेखाने मारणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील या कंपुशाहीला ‘चपराक’ देत आम्ही एक व्यापक चळवळ सुरू केली.
साप्ताहिकाच्या माध्यमातून अनेक समस्यांना सातत्याने वाचा फोडल्याने प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. लेखणीतून शब्दास्त्रांचा मारा केल्याने अनेक प्रश्‍न मार्गी लागले. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या भावनेने आम्ही अनेकांचा आवाज बनलो. लिहित्या हातांना बळ दिले. त्यातूनच अनेक सृजनशील लेखक पुढे आले. ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची सुरूवात करून एकेकावेळी पंधरा-पंधरा पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विख्यात निवेदक सुधीर गाडगीळ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ, सदानंद मोरे अशा मान्यवरांना बोलवून या पुस्तकांचे प्रकाशन केले. दगडखाणीत काम करणार्‍या वर्गाचे चित्रण करणार्‍या युवा लेखक हणमंत कुराडे याच्यापासून ते सुप्रसिद्ध संशोधक संजय सोनवणी, सदानंद भणगे यांच्यापर्यंत अनेकांची पुस्तके ‘चपराक साहित्य महोत्सवा’त प्रकाशित केली.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आवर्जून आले. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते 2002 साली ‘चपराक’चा पहिला अंक प्रकाशित झाला आणि आम्ही साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचा, कार्यक्रमांचा धडाका लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार, अभिनेत्री बेबी शकुंतला, चंदू बोर्डे, जगन्नाथ कुंटे, मंगेश तेंडुलकर, समाजवादी नेते भाई वैद्य, उद्योजक डी. एस. कुलकर्णी, भाजपा नेते माधव भंडारी, ह. भ. प. किसनमहाराज साखरे, प्रा. वीणा देव, अभिनेत्री आशा काळे, डॉ. न. म. जोशी, डॉ. कुमार सप्तर्षी, ह. मो. मराठे, अंजली कुलकर्णी, डॉ. माणिकराव साळुंखे अशा अनेक मान्यवरांनी ‘चपराक’च्या व्यासपीठावर आपली उपस्थिती लावली. जातीभेद, धर्मभेद, प्रांत, वय, स्त्री-पुरूष असे सारे भेद छेदत आम्ही लेखकांचा कबीला निर्माण केला.
महाराष्ट्राबरोबरच सहा राज्यात ‘चपराक’चा वाचकवर्ग निर्माण केला. बृहन्महाराष्ट्रातील लेखकांचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर प्रकाशित केले. हे सर्व पाहून साहित्य क्षेत्रातील आम्हाला आदर्श वाटणार्‍या काही दिग्गजांनी सांगितले की, ‘आपल्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते साहित्य परिषदेत हवेत. महाराष्ट्र साहित्य परिषद तळागळातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी तरूणांनी परिषदेला बाहेरून नावे ठेवण्यापेक्षा पुढाकार घ्यायला हवा आणि परिवर्तन घडवून साहित्य क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करायला हवे.’
‘साहित्य परिषद साहित्यबाह्य विषयांवरूनच नेहमी चर्चेत असते. एकमेकांच्या कुचाळक्या करण्यातच तेथील महाभाग धन्यता मानतात; त्यामुळे त्या दलदलीत तुम्ही उतरू नका’ असा सल्लाही काहींनी दिला. ‘शिवाजी जन्मावा पण शेजार्‍याकडे’ हे आम्हाला कदापि मान्य नाही. काठावर बसून पोहणार्‍याला उपदेश करणार्‍यांपैकी आम्ही नाही. ‘चपराक’ने सातत्याने विविध विषयांवरून धाडसाने भूमिका घेतल्यात. त्या परिणामकारक आणि लक्ष्यवेधीही ठरल्यात. सकारात्मक परिवर्तनाचा ध्यास आम्ही घेतलाय. त्यासाठी मागची चौदा वर्षे रचनात्मक संघर्ष उभारलाय. साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक हे त्याचेच एक पाऊल आहे.
प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे हे या आद्यसंस्थेत परिवर्तन घडवू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी ही आघाडी स्थापन केली. प्रकाशन विश्‍वात अल्पावधीतच भरीव योगदान देणार्‍या सुनिताराजे पवार, ‘साहित्यदीप’ संस्थेच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या ज्योत्स्ना चांदगुडे, साहित्यिक जाणीवा समृद्ध असणार्‍या नीलिमा बोरवणकर, कथा-कविता, चित्रपट समीक्षा यात योगदान पेरणारे ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांचा या आघाडीत समावेश आहे. ‘चपराक’च्या माध्यमातून चौदा वर्षे कार्यरत असल्याने आम्हीही या आघाडीतर्फे स्थानिक कार्यवाह क्र. 6 (अतिथी निवास आणि इमारत देखभाल) या पदासाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. लेखिका नंदा सुर्वे, ‘कर्दळीवन’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक दत्तोपासक प्रा. क्षितिज पाटुकले आणि ऍड. श्रीधर कसबेकर असे लेखक या आघाडीत आहेत. समोरच्या पॅनेलने एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नसताना प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांनी स्त्रीशक्तीचा सन्मान राखत बारा पैकी चार महिला उमेदवारांना परिवर्तन आघाडीत समाविष्ट केले आहे.
कसलीही निर्मितीची क्षमता नसलेले लोक नवनिर्माणाची भाषा करीत आहेत, यापेक्षा अतिशयोक्ती ती कोणती? आता परिवर्तन झाल्याशिवाय नवनिर्माण होणार नाही. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपले एक मत निर्णायक ठरणारे आहे. पुणे शहराचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात समावेश झालाय. शहर स्मार्ट करताना येथील हरवत चाललेले सांस्कृतिक पर्यावरण जतन करणे, समृद्ध करणे ही काळाची गरज आहे. अब्दूल कलाम यांनी ‘2020 साली भारत महासत्ता होणार’ असे स्वप्न पाहिले होते. त्याच्या पुर्ततेसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. यंत्रणेला, व्यवस्थेला शिव्या घालून, त्यांच्या नावे खडे फोडून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे साहित्यविषयक भरीव योगदान देण्यासाठी परिवर्तन आघाडी सज्ज आहे. त्याला आपल्या शुभेच्छांची, पाठिंब्याची सक्रीय साथ मिळाल्यास आम्ही निश्‍चितपणे काही बदल घडवू याचा आपण विश्‍वास बाळगावा. जोशी-पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिवर्तन आघाडीला आपण बहुमताने विजयी करावे. मी आणि माझे सर्व सहकारी आपणा सर्वांचा विश्‍वास सार्थ ठरवू आणि परिषदेत नवचैतन्य निर्माण करू, याची ‘चपराक’चा संपादक या नात्याने आपणास ग्वाही देतो.
- घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२
------------------------------
---------

काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या साहित्य व्यवहाराचे मानबिंदू असले तरी प्रत्यक्षात असाहित्यिक राजकारणाचा अड्डा बनत अनेकदा टीकेचे धनी झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची आता निवडणूक होणार आहे. ही निवडणूक म्हणजे एका अर्थाने साहित्य प्रेमींना नव्या दमाच्या, कल्पक, साहित्याशीच खर्‍या अर्थाने निगडित व मराठी साहित्याची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरीत तरुणांना निवडून देत साहित्य परिषदेचा कारभार संपुर्णपणे सुधारण्याची एक अनमोल संधी आहे.
या निवडणुकीत माझे बंधुतूल्य मित्र घनश्याम पाटील स्थानिक कार्यवाह क्र. 6 या पदासाठी उभे आहेत. त्यांनी साहित्य परिषदेच्या पुर्वीच्या व्यवस्थापनावर अनेकदा जाहीरपणे परखड टीका करुन त्याला काही बाबतीत बदलायला भाग पाडले आहे. ते स्वत: सिद्धहस्त लेखक, पत्रकार व प्रकाशक असल्याने त्यांचा साहित्य क्षेत्रातील नव्या-जुन्या साहित्यिकांशी जवळचा संबंध आहे. साहित्य क्षेत्राशी निगडित प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून साहित्य परिषदेचा चेहरा-मोहरा बदलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे, याचा मला विश्वास वाटतो. ज्यांनाही त्यांच्या निगर्वी पण परखड आणि रोखठोकपणाचा अनुभव आहे ते माझ्या मताशी सहमत होतील याचाही मला विश्वास आहे. घनश्याम पाटील यांच्या उमेदवारीस माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
याशिवाय परिवर्तन आघाडीचे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, माझ्या स्नेही ज्योत्स्नाताई चांदगुडे, ‘केसरी’चे वृत्तसंपादक, लेखक-कवी स्वप्निल पोरे यांच्यासह  घनश्याम पाटील यांच्या सर्व सहकार्‍यांना आपण भरघोस मतांनी निवडून देत मसापमध्ये खरोखरचे परिवर्तन घडवून आणावे, असे मी जाहीर आवाहन करतो.

-संजय सोनवणी, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
9860991205

------------------------------
----------------------------

घनश्याम पाटील हे माझे उत्तम मित्र आहेत. ‘चपराक’च्या माध्यमातून ते कुठल्याही दडपणांना बळी न पडता अनेक व्यक्ती आणि संस्थांची प्रकरणे बाहेर काढत असतात. हा नव्या दमाचा पत्रकार-लेखक साहित्य परिषदेच्या कारभारात नीट डोकावून पाहण्यासाठी, तिथे जाणं आवश्यक आहे. शुभेच्छा!
-सुधीर गाडगीळ, सुप्रसिद्ध निवेदक
९८२२०४६७४४
------------------------------


  नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, शाळा- कॉलेजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याची गोडी निर्माण करणे, ग्रामीण परिसरातील सांस्कृतिक संस्थांना आधार देणे आणि साहित्य परिषदेचे स्वरुप आणि क्षेत्र व्यापक करणे अशी काही स्वप्ने मनाशी धरुन जी मंडळी येत्या म. सा. परिषदेच्या निवडणुकीत उभी आहेत, त्यात घनश्याम पाटील यांचा समावेश अग्रकमाने करावयास हवा. पत्रसृष्टी, प्रकाशनसृष्टी, संस्कारसृष्टी नी तरुणांना बरोबर घेऊन स्वप्नसृष्टी साकार करण्याचे व्रत घेतलेले श्री. पाटील हे महाराष्ट्र समाज जीवनाला अधिक सशक्त करतील. सांस्कृतिक जीवनाला अधिक श्रीमंत करतील यात शंका नाही म्हणून पुण्यनगरीच्या सुजाण मतदारांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भरघोस मतदान करुन उर्जा द्यावी, असे मला वाटते.
द. ता. भोसले, ज्येष्ठ साहित्यिक
पंढरपूर
९४२२६४६८५५

2 comments:

  1. vastvachi janiv krun denara lekh, ek na anek sahityshivaychya bhangdi mhnje MSaP

    ReplyDelete
  2. मराठी साहित्याच्या नियोजनबध्द संवर्धनासाठी,नवसाहित्यिकाना प्रकाशात आणून त्याना प्रोत्साहन मिळण्यासाठी,परंपरागत कंपूशाहीचा नायनाट होण्यासाठी परिवर्तन आघाडीचे जोशी,पायगुडेंसारखे विचारवंत व घनश्याम पाटील,स्वप्नील पोरे यांच्यासारखी निर्भिड माणसे महाराष्ट्र साहित्य परिषदेत निवडून जाणे व साहित्य परिषदेत आमुलाग्र
    परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे आणि हे परिवर्तन आता अटळ आहे! पाटील साहेब,आपणास व आपल्या परिवर्तन आघाडीमधील सर्व उमेदवाराना खुप खुप शुभेच्छा.

    ReplyDelete