Monday, March 9, 2015

स्त्री-पुरुष भेद अमंगळ!


कालच जागतिक महिला दिन झाला. प्रत्येक दिवसाप्रमाणे हा दिवसही ‘साजरा’ करण्याची पद्धत रूढ होऊ पाहत आहे. महिलांच्या आरोग्य शिबिरापासून ते चर्चासत्र, व्याख्याने, पुरस्कार सोहळे असे कार्यक्रम या निमित्ताने पार पडतात. आज बर्‍याच ठिकाणी स्त्री सन्मानाचे चित्र रंगवले जात असले तरी महिला या ‘दीन’च असल्याचे चित्र दुर्दैवाने पहायला मिळते. एकीकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते  देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत, राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्याचे वास्तव असताना दुसरीकडे मात्र गावागावात, वस्त्यांवस्त्यांवर महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.
यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्‍वभूमिवर दोन घटना प्रामुख्याने चर्चेत आल्या. पहिली म्हणजे, दिल्लीतील निर्भयाच्या बलात्कार प्रकरणात जो आरोपी आहे त्याची बीबीसीने तिहार तुरूंगात जाऊन मुलाखत घेतली. त्याबदल्यात त्याला चाळीस हजार रूपयेही दिले. स्त्रियांनी कसे कपडे घालावेत, येथपासूनची मुक्ताफळे त्याने उधळली आणि आपण किती ‘दिव्य ज्ञान’ लोकापर्यंत पोहोचवतोय या आविर्भावात बीबीसीने ते प्रेक्षकापर्यंत आणले. ‘चेहराच खराब असेल तर आरशाला दोष देण्यात अर्थ नाही’ असा युक्तीवादही त्यावर काहींनी केला; मात्र कवडीचीही नैतिकता शिल्लक नसलेल्या प्रसारमाध्यमांचे हे हिडीस आणि ओंगळवाणे रूप आहे. आसारामसारख्या भोंदूने किंवा तरूण तेजपालसारख्या लिंगपिसाटाने चारित्र्यावर प्रवचने झोडणे जितके हास्यास्पद आहे तितकेच प्रसारमाध्यमांनी ‘आपण फक्त सत्य समोर आणतोय’ असे म्हणणे हास्यास्पद आहे. समाजाला ज्ञान देणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे रंजन करणे ही वृत्तपत्रांची उद्दिष्टे केव्हाच मागे पडलीत आणि त्यांना ‘धंदेवाईक’ रूप आलेय. त्यामुळे अशा माध्यमांनी आपण समाजमन कसे घडवतोय, याचा डांगोरा पिटणे म्हणजे ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ असा प्रकार आहे.
दुसरी घटना नागालँडमधील दिमापूर शहरातील आहे. येथील सईद फरिद खान या 35 वर्षाच्या नराधमाने एका महाविद्यालयीन युवतीवर धमकावून सातत्याने अत्याचार केले. तो दिमापूर जिल्हा तुरूंगात होता. तेथील जमावाने एकत्र येऊन सईदला आपल्या ताब्यात देण्याची मागणी तुरूंग प्रशासनाकडे केली. त्याला नकार मिळाल्याने जमावाने तुरूंगावर हल्लाबोल केला. पोलिसांनी त्यांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार केला पण त्यांचे काही चालले नाही. तेथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या चौकापर्यंत सईदला फरफटत नेऊन जाहीर फाशी द्यायची असा जमावाचा बेत होता. त्यांनी त्याला नग्न करून गाडीला अडकवले आणि फटकारत चौकापर्यंत नेले. मात्र त्याआधीच या माराने त्याचा मृत्यू झाला. जनक्षोभ उसळल्यानंतर काय होते याचे हे उदाहरण आहे.
गुन्हेगाराला ठेचून मारण्याच्या घटना यापुर्वीही आपल्याकडे घडल्या आहेत. 13 ऑगस्ट 2004 ला नागपूर जिल्हा न्यायालयात बलात्कार प्रकरणातीलच अक्कू यादव नावाच्या गुन्हेगारास संतप्त झालेल्या दोनशे महिलांनी एकत्र येऊन न्यायालयाच्या आवारातच मारले होते. त्याच्यावर लाल तिखट टाकून आणि दगडांचा मारा करून या रणरागिणींनी त्याला ठेचून काढले. बलात्काराचा आरोप सिद्ध होऊनही त्याला वेळेत शिक्षा होत नसल्याने या महिलांनी कायदा हातात घेतला. आपली न्यायप्रक्रिया संथ गतीने चालते आणि बर्‍याच प्रकरणात सत्य प्रभावीपणे मांडूनही न्याय मिळेलच याची खात्री नसल्याने महिला असे करायला धजावतात. ही टोकाची प्रतिक्रिया असली तरी हा उद्रेक आपण समजून घेतला पाहिजे. एखादी गोष्ट आपण जितकी दाबून ठेऊ तितकी ती उफाळून येणार, हे सर्वमान्य सत्य आहे. त्यामुळे महिला अत्याचारांचा अतिरेक झाल्याने भविष्यात अशा घटना वाढल्या तर आश्‍चर्य वाटायला नको!
पुरूषांची वाढत चाललेली विकृती आणि आधुनिकतेच्या, स्वातंत्र्याच्या नावावर स्त्रियांचा वाढलेला स्वैराचार या दोन्ही चिंतेच्या बाबी आहेत. जिथे पाच वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार होतो तिथे काय बोलावे? मोकाट जनावरातही अशी विकृत वासना नसते. आज भारतातील एकही शहर स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य नसेल तर हे आपले सर्वांचेच मोठे अपयश आहे. जिथे तिथे वखवखलेल्या नजरा! एखादे भुकेजलेले हिंस्त्र श्‍वापद शिकारीवर तुटून पडते तसे स्त्रियांना ओरबाडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारेही यात मागे नाहीत. बायकोवरच्या ‘बलात्कारातून’च जन्माला येणारी ‘हायब्रिड’ पिढी पुढे स्त्रीकडे फक्त ‘मादी’म्हणूनच पाहते.
दुसरीकडे काही स्त्रियांही या प्रवृत्तीला खतपाणी घालताना दिसतात. फुटकळ आमिषाला, वैयक्तिक लाभाला बळी पडलेल्या स्त्रिया अशा घटनांच्या मोठ्या प्रमाणात शिकार होतात. ‘शरीर’ आणि ‘सौंदर्य’ या अनेकींच्या दृष्टिने त्यांच्या प्रगतीच्या पायर्‍या आहेत. ‘एकाच पुरूषासोबत अनेकवेळा झोपणे किंवा काही पुरूषांसोबत काहीवेळा झोपणे यात फरक तो काय? शेवटी आपली प्रगती महत्त्वाची नाही का?’ असा निर्लज्ज सवाल करणार्‍या काही करंट्या बायकाही आम्हाला भेटल्यात. त्यामुळे समाजात आज जे काही चालले आहे ते भविष्यात कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज बांधणेही अवघड आहे.
एकीकडे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांच्यावर कायम अन्याय होतो, त्यांना नागवले-पिचवले जाते असे गळे काढायचे आणि दुसरीकडे स्त्रियांनी असे उद्योग करून समाजमन कलुषित करायचे याला काही अर्थ नाही. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा करताना ज्या दुर्बल आहेत त्यांच्या पाठिशी आपण उभे रहायला हवे. त्या स्वावलंबी होतील, कुटुंब आणि समाजात मानाने राहू शकतील, इतरांना दिशा देऊ शकतील, संस्काराची शिदोरी नव्या पिढीकढे हस्तांतरीत करू शकतील, असे पोषक वातावरण निर्माण व्हायला हवे. स्त्रियांकडे केवळ ‘भोगवस्तू’ म्हणून पाहणार्‍या, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणार्‍या पुरूषांना कठोर शासन व्हायला हवे. समाजमनावर वचक बसेल अशा जबर शिक्षा त्यांना न्यायव्यवस्थेने द्यायला हव्यात.
स्त्रीमुक्ती असेल किंवा पुरूषमुक्ती असेल! हे केवळ हवेचे बुडबुडे आहेत. आपण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. ज्ञानाची, माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली झालीत. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध झाल्यात. ग्रामीण भागातील ‘संधी’अभावी वंचित असलेले स्त्री-पुरूष आणि शहरी भागातील ‘अतिरेक’ करणारे स्त्री-पुरूष यांच्याकडे  आता लक्ष दिले पाहिजे. सर्व असूनही त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचले नाही असा वर्ग आणि सर्व असूनही त्याचा गैरवापरच करणारा वर्ग यातील फरक आपल्या ध्यानात आला तर बर्‍याचशा समस्या सुटतील. देशासमोर अनेक आव्हाने असताना किमान स्त्री-पुरूष असा भेद आता रोडावत जायला हवा. सर्वजण एकमेकांचा सन्मान उंचावत, निर्भयपणे जगतील अशी अपेक्षा बाळगूयात आणि ती पूर्णत्वास येईल यासाठी खारीचा वाटा उचलूयात!


- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Wednesday, March 4, 2015

साहित्याचं घुमान घोंगडं




येत्या एप्रिल महिन्यात पंजाब येथील घुमान या छोट्याशा गावात ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जे साहित्यिक मैदानात उतरले होते त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे यंदाचे संमेलन ‘वादाशिवाय’ पार पडण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी प्रकाशक परिषदेने घुमानच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आणि नव्या वादाची ठिणगी पडली.
मराठी भाषा, मराठी संस्कृती हाच आत्मा असलेल्या ‘चपराक’ला प्रकाशक परिषदेची ही भूमिका मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रकाशक परिषदेने संमेलनावर बहिष्कार टाकताच ‘चपराक’ने आपली अस्मिता दाखवून देत या संमेलनाला पाठिंबा दिला. प्रकाशक परिषदेने सुरूवातीला एल्गार करत ‘एकही मराठी प्रकाशक या संमेलनाला जाणार नाही’ अशी भूमिका घेतली. जे प्रकाशक परिषदेचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी काही निर्णय झाला तर एकवेळ मान्य करता येईल, मात्र ‘चपराक प्रकाशन’सारखे अनेक प्रकाशक कुणाशीही बांधील न राहता, मिंधे न राहता वेगळ्या वाटेने जात असतील तर त्यांच्यावर आचारसंहिता लादणारे हे कोण? त्यामुळेच ‘चपराक’ने ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि तिथे जर मराठी वाचक असतील तर आम्ही आमच्या सर्व सदस्यांसह तिथे आवर्जून जाणार’ अशी भूमिका घेतली.
घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे. त्याकाळी एक मराठी संत पंजाबमध्ये गेला. त्याने आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा तिकडे फडकवला. इतकेच काय तर शीख बांधवांचा धर्मग्रंथ असलेल्या ‘गुरूग्रंथसाहिबात’ही संत नामदेवांना स्थान मिळाले. असे सारे असताना इतक्या शतकांनी जर पुन्हा मराठी माणसाला पंजाबला सन्मानाने जाण्याची संधी मिळत असेल तर यापेक्षा मोठा आनंद तो कोणता? मात्र काही कर्मदरिद्री लोकाना धंद्यापुढे कधीही धर्म दिसत नाही. प्रत्येकवेळी केवळ धंदाच करायचे ठरवले तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यात आपण हातभार लावतोय, असा डांगोरा पिटण्याचा अधिकार यांच्याकडे राहतो का? म्हणूनच ‘चपराक’ने कशाचीही पर्वा न करता ही रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिका घेतली.

माधवी वैद्यांच्या गळ्यातले ताईत? -


‘चपराक’च्या या भूमिकेनंतर प्रकाशनविश्‍व ढवळून निघाले. मराठी प्रकाशकांनी ‘ज्यांना जाण्याची इच्छा आहे, ज्यांना जाणे परवडते त्यांनी जावे’ अशी भूमिका घेतली असती तर ते रास्त ठरले असते. मात्र ‘एकही मराठी प्रकाशक साहित्य संमेलनाला जाणार नाही’ असे सांगण्याचा नैतिक अधिकार यांच्याकडे उरतो का? त्यामुळेच ‘चपराक’ने प्रवाहाविरूद्ध भूमिका घेत ही कोंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. समाजमाध्यमाद्वारे ‘चपराक’ने आपली भूमिका जाहीर करताच सर्व प्रसिद्धीमाध्यमांनी त्याची योग्य ती दखल घेतली. त्यावेळी प्रकाशक परिषदेच्या अण्णा कुलकर्णी यांनी ‘माधवी वैद्य यांच्या गळ्यातले ताईत बनायला जाऊ नका’ असा सल्ला दिला.

सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर -


चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वाचनसंस्कृती वाढीस हातभार लावणारी पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’चा लौकीक आहे. ‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे आमच्या संस्थेचे मूलतत्त्व आहे. साहित्य परिषद, साहित्य महामंडळ किंवा अन्य कोणत्याही संस्था, संघटनांना, राजकीय पक्षांना ‘चपराक’ने कधी भीक घातली नाही. ‘संवाद आणि संघर्ष’ ही भूमिका घेऊन कार्यरत असताना जे चांगले ते आम्ही स्वीकारले आणि जे वाईट ते अव्हेरले. डॉ. माधवी वैद्य यांच्यावर आम्ही अनेकवेळा तोफगोळे फेकले आहेत. मात्र घुमानबाबत त्यांची भूमिका योग्य वाटल्याने ‘चपराक’ने त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. येथे त्यांच्या गळ्यातला ताईत बनण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? ‘चपराक’ साहित्य, संस्कृती, राजकारण अशा सर्व क्षेत्रात नेकीने कार्यरत आहे, पुढेही राहील. अण्णा कुलकर्णी ज्येष्ठ प्रकाशक आहेत. योगायोगाने तेही मराठवाड्यातले आहेत. त्यामुळे मराठवाडी माणसाला आपल्या कर्तव्यापुढे बाकी कशाचीही फिकीर नसते, हे काय आम्ही त्यांना सांगावे?


‘मी मराठी’वर येण्याचे निमंत्रण -

प्रकाशकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकल्याची बातमी येताच मराठीतील काही लोकानी प्रकाशन क्षेत्र बदनाम करण्यास सुरूवात केले. सर्वच प्रकाशक पैशाच्या मागे लागले असून ते आपले तुंबडे भरण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकताच ‘चपराक’ने क्षणाचाही विलंब न करता ‘आम्ही संमेलनाला जाणार व तिथे पुस्तकेही विकणार’ अशी भूमिका घेतली. ही भूमिका योग्य वाटल्याने ‘सकाळ’, बेळगाव ‘तरूण भारत’, ‘केसरी’, ‘नवभारत’ अशा मान्यवर वृत्तपत्रांनी ‘चपराक’चा आवाज सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. त्याचवेळी ‘मी मराठी’ या वृत्तवाहिनीने आमचा ‘फोनो’ घेऊन ‘चपराक प्रकाशन घुमानला जाणार, प्रकाशक परिषदेच्या निर्णयाला विरोध’ अशी बातमी चालवली. सर्व माध्यमातून ‘चपराक’ची भूमिका वाचकांपर्यंत पोहोचल्याने प्रकाशक परिषदेत असलेली चार टाळकीभडकली. याचवेळी ‘मी मराठी’ने या विषयावर स्वतंत्र कार्यक्रम ठेवला. घुमानला जाणार, अशी भूमिका तोपर्यंत केवळ ‘चपराक’ने घेतली होती. त्यामुळे त्यांच्या ‘पॉईंट ब्लँक’ या कार्यक्रमातील चर्चासत्रात सहभागी होण्याची विनंती ‘मी मराठी’या वाहिनीने केली. त्यासंदर्भात त्यांनी निमंत्रण देऊन पुण्याच्या स्वारगेट येथील स्टुडिओत रात्री येण्यास सांगितले.

‘मी मराठी’ची दुटप्पी भूमिका -


असे निमंत्रण देऊन पाहुणे ठरल्यानंतर त्यात फारसा बदल होत नाही. दरम्यान ही बातमी इतर पाहुण्यांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात पोहोचल्याने ‘प्रकाशक परिषदेबाबत कठोर भूमिका घेऊ नका’ अशा काही सूचना आमच्याकडे येत होत्या. मात्र आम्ही आमच्या विचारावर ठाम होतो. अचानक संध्याकाळी पाचच्या सुमारास ‘मी मराठी’च्या मुंबई कार्यालयातून दूरध्वनी आला आणि ‘काही तांत्रिक कारणामुळे आजचा हा कार्यक्रम रद्द झाला आहे’ असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात ठरलेल्या वेळी हा कार्यक्रम प्रसारित झाला आणि त्यात सर्वांनीच गुळगुळीत भूमिका घेतली. स्वतःच निमंत्रण देऊन, एखाद्याची भूमिका दाबण्यासाठी असे वागणे हे दृकश्राव्य माध्यमातील संकेतांना धरून नव्हते. मात्र काळ बदललाय म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले.

तर निखिल वागळेंची पुस्तके कोण खपवणार? -


या कार्यक्रमानंतर पुण्यातील एका मात्तबर विक्रेत्याने आम्हाला आवर्जून कळवले की, ‘‘तुम्ही प्रकाशक परिषदेविरूद्ध भूमिका घेतल्याने आम्ही ठरवून तुमचे नाव चर्चासत्रातून वगळले. या कार्यक्रमाचे निवेदक असलेले निखिल वागळे हे आमच्या शब्दाबाहेर नाहीत. जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर त्यांची पुस्तके कोण खपवणार? त्यांच्या निर्भिड आणि निःपक्ष पत्रकारितेच्या गप्पा फक्त स्टुडिओत असतात. शेवटी ही यंत्रणा सांभाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते, हे ध्यानात ठेवा.’’

साम टीव्ही आणि ‘सकाळ’ने केलेले सहकार्य -


प्रकाशकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे क्षेत्र बदनाम होऊ नये, अशी आमची आंतरिक ईच्छा होती. त्यामुळे याच दरम्यान  आम्ही समाजमाध्यमाद्वारे ‘घुमानला जाऊ चला’ अशी चळवळ सुरू केली होती. अनेक वाचक, लेखकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. ‘महाराष्ट्राबाहेरील मराठी वाचकांना आपण आणखी कितीकाळ गृहीत धरणार नाही?’ याचा विचार करण्यास आम्ही भाग पाडले. त्याचवेळी मुंबई ‘सकाळ’च्या श्रद्धा पेडणेकर यांनी आमची ही भूमिका ‘सकाळ’च्या माध्यमातून राज्यभर प्रभावीपणे पोहोचवली होती. ती वाचून पुण्यातील ‘साम टीव्ही’ची बातमीदार स्नेहल कांबळे आमच्याकडे आली आणि ‘चपराक’ कार्यालयात येऊन तिने आमची आणि आमच्या सहकार्‍यांची प्रतिक्रिया नेली. त्यावर एक विशेष कार्यक्रमही केला. विविध माध्यमाद्वारे आमचा आवाज एव्हाना मराठी वाचकांपर्यंत पोहोचल्याने प्रकाशक परिषदेचे बुडबुडे फुटले होते.

प्रकाशक परिषदेचा बहिष्कार मागे -


घुमानवरून प्रकाशक परिषदेत फूट पडल्याचे वृत्त आमचा संदर्भ देत काही वृत्तपत्रांनी दिले. मात्र आम्ही इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो की, ‘चपराक’ची भूमिका ‘एकला चलो रे’ ची आहे. आम्ही कोणत्याही प्रकाशक परिषदेचे अजून तरी सदस्य नाही. (होय, ‘कोणत्याहीच. कारण प्रकाशक परिषदही एकच नाही. प्रत्येकाचे वेगळे कळप.’) असो. आमच्या या भूमिकेनंतर प्रकाशक परिषद आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांत काही चर्चा झाली आणि प्रकाशक परिषदेने सकारात्मक चर्चा करून बहिष्कार मागे घेतला असल्याचे प्रकाशक परिषदेचे पदाधिकारी आणि ‘पद्मगंधा’चे मालक अरूण जाखडे यांनी जाहीर केले. त्यानंतर काही वृत्तपत्रांनी आपणच प्रकाशक परिषद आणि महामंडळात समेट घडवून आणली, अशा बातम्याही दिल्या.

किमान दहा मराठी कुटुंब असलेल्या गावात संमेलन व्हावे -


हा बहिष्कार मागे घेताना ‘किमान दहा मराठी कुटुंबे असलेल्या गावात यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे आणि विभागीय साहित्य संमेलने व ग्रंथ प्रदर्शन भरविण्यास महामंडळाने सहकार्य करावे अशी मागणी केली असून ती मंजुर झाल्याने हा बहिष्कार मागे घेत आहोत’, असे जाखडे यांनी पत्रकारांना सांगितले. प्रकाशक परिषदेच्या बहिष्कारानंतरही राज्यभरातील अनेक प्रकाशक संमेलनाला जाणार, असे चित्र तोपर्यंत निर्माण झाले होते आणि त्यामुळेच प्रकाशक परिषदेला अशी नरमाईची भूमिका घ्यावी लागली.

मुंबईत ग्रंथप्रदर्शन -


दरम्यान ‘घुमानला येणार नाही’ असे राणा भीमदेवी थाटात जाहीर केल्यानंतर प्रकाशक परिषदेने घुमानच्या निर्णयाला विरोध म्हणून मुंबईत पुस्तक प्रदर्शन भरवले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासारख्या मान्यवर लेखकांचे तिथे कार्यक्रम घेऊन चांगली गर्दी जमवली आणि गल्लाही भरून घेतला. हे प्रदर्शन संपताच आपली भूमिका बदलत प्रकाशक परिषदेने घुमानला ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, आमची त्यांच्यावर बंधने नाहीत, ही सांमजस्याची भूमिका घेतली.

संमेलनाच्या पार्श्‍वभूमिवर बारा पुस्तके -


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान होत असल्याने ‘चपराक’ने पुण्यात साहित्य महोत्सव घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये, कादंबरीकार उमेश सणस उपस्थित होते. यात सदानंद भणगे, संजय वाघ, चंद्रलेखा बेलसरे, प्रभाकर तुंगार, सागर सुरवसे, हणमंत कुराडे, विनोद श्रा. पंचभाई, माधव गिर, संदिपान पवार, प्रभाकर चव्हाण, शांताराम हिवराळे यांच्या पुस्तकांसह आमच्या झुळूक आणि झळा या अग्रलेख संग्रहाचेही प्रकाशन केले. मराठी लेखक सातासमुद्रापार पोहोचावेत यासाठी ‘चपराक’ने सुरुवातीपासूनच विशेष प्रयत्न केले आहेत. साने गुरुजी यांची ‘आंतरभारती’ची संकल्पना घुमान येथील 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे, असे आम्हांस वाटते. ‘चपराक’च्या साहित्य महोत्सवात बाबासाहेब पुरंदर यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे या सर्व साहित्यिकांसाठी पर्वणीच होती. आपली पुस्तके घुमानला जाणार याचे समाधान या सर्व लेखक आणि कविंच्या चेहर्‍यावर दिसत होते. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविणे ही आमची साहित्यिक जबाबदारी आहे.

‘चपराक’ची पुस्तके घुमानलाच विका;

काही विक्रेत्यांची मगु्ररी -

प्रकाशक परिषदेची अरेरावी मोडीत काढल्याने काही विक्रेत्यांनी ‘चपराक’ची पुस्तके विकणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ‘तुम्ही घुमानला जाणार आहात, तिकडे तुम्हाला वाचक मिळतील. आमच्याकडे आधीचीच कोट्यवधी रूपयांची पुस्तके विक्रीअभावी पडून आहेत, तुम्ही घुमानलाच पुस्तके विका...’ असे काही धंदेवाईक विक्रेत्यांनी आम्हास कळवले. मात्र ‘सामान्य वाचकांची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती’ यावर आमची श्रद्धा असल्याने आम्ही त्यांना भीक घातली नाही, किंवा किंचितही डगमगलो नाही. उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणे, मराठीतील नवनवे लेखक प्रकाशात आणणे हे आमचे व्रत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यात खंड पडू देणार नाही.

पंजाबमध्ये साहित्यिक वातावरण नाही -


भारतातील विविध शहरात उत्तम सांस्कृतिक वातावरण आहे. मात्र देशाचा विचार करता, पंजाब साहित्याच्या बाबत सर्वात मागासलेले राज्य आहे, असा अपप्रचार काही नतद्रष्ट मंडळी करत आहेत. अमृता प्रीतम यांच्यासारखी ज्ञानपीठ विजेती कवयित्री जिथे होऊन गेली त्यांना ‘साहित्यिक मागासलेपण’ म्हणून कसे हिणवता येईल? संत नामदेवांनी आपल्या विद्वत्तेचा प्रभाव ज्या भूमिवर पाडलाय ती मागासलेली असूच शकत नाही. उलट पंजाब ही शूरांची भूमी आहे. भारतीय सैन्यदलात पंजाबी बांधवाचे प्रमाण मोठे आहे. पंजाबी बांधव हे शूर तर आहेतच पण स्वाभिमानीही आहेत. एकही शीख बांधव तुम्हाला कधी भीक मागताना दिसणार नाही. इतकेच काय, नोेकरी करणारा शीख बांधवही तुम्हाला अभावानेच सापडेल. शौर्य आणि स्वाभिमानाची पंरपरा जपणार्‍या या लोकाकडून उद्यमशीलतेचे हे संस्कार घेण्याऐवजी आपण त्यांची ‘मागासलेले’ म्हणून चेष्टा करत असू तर तो दोष आपला आहे. ‘विद्वत्तेचा ठेका’ हा कुण्या एका जातीकडे, एका धर्माकडे, एका प्रांताकडेच आहे, असा जर कुणाचा ग्रह झाला असेल तर त्या कपाळकरंट्यांचा विचार करण्याची गरज नाही.

संमेलनाध्यक्षांची आणि महामंडळाची भूमिका -


भालचंद्र नेमाडे नावाच्या एका लेखकाने ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ अशी दर्पोक्ती केल्यानंतर आम्ही ‘नेमाडेंचा बेेगडी नेम’ या अग्रलेखाद्वारे त्यांचा समाचार घेतला. त्यावेळी अनेकांनी दूरध्वनीद्वारे आमचे कौतुक केले. मात्र वैयक्तिक हितसंबंधामुळे कोणीही आमच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला नाही. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील सर्वच दिग्गज मुगाचे अख्खे पोते गिळून गप्प बसले. किंबहुना ‘चपराक’ने घुमानबाबत धाडसी भूमिका घेऊनही  संमेलनाध्यक्ष, साहित्य परिषद, साहित्य महामंडळ किंवा आयोजक यांच्यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. आमच्या भूमिकेचे राजकारण करणार्‍यांनी प्रकाशक परिषदेचा बहिष्कार मोडून काढला मात्र त्यासंदर्भात साधा दूरध्वनीही आम्हास केला नाही. घुमानसाठी पुस्तक विक्री गाळा आरक्षित करायला गेल्यानंतर मात्र महामंडळाच्या कार्यालयात डॉ. माधवी वैद्य भेटल्या. त्यावेळी निमित्त म्हणून त्यांनी ‘तुमची भूमिका ऍप्रिसिएट केली,’ असे मोघमपणे सांगितले.

आता सगळेच ढोल पिटत आहेत -


‘चपराक’ने घुमानला जाण्यासाठी वातावरण निर्मिती केली. ‘चपराक’परिवाराचे सर्व सदस्य पदरचे पैसे टाकून घुमानला जात आहेत. वाचकांनीही या संमेलनात सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आम्ही सुरूवातीपासून केले आहे. त्याचा परिणाम घुमानला येणार्‍या साहित्य रसिकांच्या नोंदणीवरून येतच आहे. आयोजक, महामंडळ, संमेलनाध्यक्ष आता मात्र नेमाडेंच्या भूमिकेविरूद्ध बोलत आहेत. घुमानला चला, असे आवाहन करत आहेत. त्याला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हेही सांगत आहेत.

घुमानला पायी गेलो असतो -  द. भि. -


घुमानच्या पार्श्‍वभूमिवर माजी संमेलनाध्यक्षांचा एक कार्यक्रम झाला. त्यात पुण्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्यांनी पार पाडले ते ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणाले की, ‘‘आता मी वयाने ऐंशीच्या घरात आलोय. जर मी अठरा वर्षाचा असतो तर पुण्याहून घुमानपर्यंत साहित्यप्रेमींची दिंडी घेऊन पायी गेलो असतो. संत नामदेवांना वंदन करण्यासाठी ‘नामा आकाशाएवढा’ हे सर्वांना कळण्यासाठी मराठी रसिकांनी, वाचकांनी घुमानला अवश्य जायला हवे.’’ या संमेलनाच्या अध्यक्षपदी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे हे असून हा दुग्धशर्करा योग आहे, साहित्यप्रेमींनी या साहित्योत्सवात सहभागी होऊन मराठीची अस्मिता उंचवावी, असेही दभिंनी सांगितले.

‘चपराक’ साहित्यक्षेत्रात नवे मानदंड तयार करणार -


‘चपराक’ने वेळोवेळी स्पष्ट, परखड भूमिका घेत विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना सणसणीत चपराक देण्याचे काम केले आहे. प्रस्थापित प्रकाशक ज्यांना जवळपासही फिरकू देत नाहीत अशा अनेक लेखकांचे दर्जेदार साहित्य ‘चपराक’ने प्रकाशित केले आहे. हा वारसा आम्ही प्राणपणाने जपू! माय मराठीची सेवा करण्यात आम्ही खारीचा वाटा नक्की उचलू! कुणाचीही भिडभाड न बाळगता, कशाचीही तमा न बाळगता ‘चपराक’ अविरत कार्यरत राहील, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, न आवरण्याएवढी लेखनाची ऊर्मि आहे, त्यांच्यासाठी ‘चपराक’ हे हक्काचे व्यासपीठ आहे. कसल्याही राजकारणाला बळी न पडता, मनात न्यूनगंड न बाळगता, कसदार लिहिणार्‍यांनी ‘चपराक’शी संपर्क साधावा.


घुमानला जाऊ चला! -


जवळपास सात हजार मराठी बांधव घुमानला येत असल्याचे आयोजकांनी नुकतेच सांगितले आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे जाणे हे आपले आद्य सांस्कृतिक कर्तव्य आहे. रोजच्या जीवनाचे रहाटगाडे चालूच असते. मात्र आपल्यापासून दुरावत चाललेल्या अन्य प्रांतातील मराठी बांधवांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांना साहित्याच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सर्वांनी घुमानच्या संमेलनात सहभागी व्हावे. तेथील मराठी बांधवांशी संपर्क साधावा. ज्या पंजाबी बांधवांनी त्याकाळात संत नामदेवांना त्यांच्यात सामावून घेतले, त्यांना देवाचा दर्जा दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे ‘चपराक’चे सर्व सदस्य या साहित्योत्सवात सहभागी होत आहेत. परप्रांतातील या संमेलनाला प्रारंभी जो विरोध होत होता तो आता मावळला आहे. हे भिजतं घोंगडं आता वाळलं आहे. ‘विचार अन् पुस्तकं घेऊ द्या की रं, मला बी घुमानला येऊ द्या की रं’ असं म्हणतं अनेक साहित्यरसिक संमेलनात सहभागी होत आहेत. आपणही घुमानला नक्की भेटूया! तोपर्यंत जय हरी!!


Sunday, March 1, 2015

त्यांना आवरा; यांना सावरा!


एक माणूस सोफ्यावर बसून बायकोला विचारतो की, आज कोणती भाजी केलीय? बायको, काहीच उत्तर देत नाही म्हणून आणखी जवळ जाऊन विचारतो. तरीही प्रतिसाद शून्य. असे करत शेवटी तिच्या अगदी मागे उभा राहतो. बायकोची त्याला चिंता वाटायला लागते. तिला श्रवणयंत्र घेऊन द्यायला हवे, असा विचार करत अगदी जवळ जाऊन पुन्हा विचारतो, ‘‘आज भाजी कुठली केली?’’ तेव्हा बायको त्याच्यावर खेकसते, ‘‘मी तीनवेळा सांगितले की, आज भरलेल्या वांग्याची भाजी केलीय. हाच प्रश्‍न कितीवेळा विचारताय?’’ तेव्हा त्याला लक्षात येते की, श्रवणयंत्राची गरज बायकोला नाही तर आपल्या स्वत:लाच आहे.
महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेही असेच काहीसे सुरू आहे. भाजपवाले शिवसेनेवर वाट्टेल तसे तोंडसुख घेत आहेत. ‘‘सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना सत्ताधारी आहे की विरोधी?’’ असा खुळचट सवाल राज्याचे कृषीमंत्री असलेल्या एकनाथ खडसे नावाच्या नेत्याने विचारला आहे. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे की विरोधी हे जनतेपुढे मांडण्याएवढे हे नेते निगरगट्ट झालेत. शिवसेनेच्या सहकार्यानेच यशाची अनेक शिखरे भाजपने पादाक्रांत केली. प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शिवसेनेची ताकत माहिती आहे. म्हणूनच भू-संपादन विधेयकाबाबत शिवसेनेची समजूत काढावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ’मातोश्री’वर शिष्टाई करण्यास पाठवले. गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही सूचना स्वीकारून सेना-भाजपमधील तणाव निवळावा यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे खडसे मात्र पक्षीय भूमिका विचारात न घेता सातत्याने सेनेवर तुटून पडत आहेत. 
भू-संपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. ‘वाट्टेल ते करून शेतकर्‍यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग चालू देणार नाही’ असे त्यांनी निक्षून सांंगितले आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी घेताना त्यांना जमिनीच्या किंमतीच्या चारपट रक्कम द्यावी, त्यासाठी सत्तर टक्केहून अधिक शेतकर्‍यांची संमती हवी, संबंधित प्रकल्प पाच वर्षात सुरू झाला नाही तर त्याला न्यायालयात जाता यायला हवे अशा त्यातल्या काही तरतुदी होत्या. मात्र या सर्व तरतुदी रद्द करून मोदी सरकार मनमानी कारभार करत आहे असा आक्षेप शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यासह देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी घेतला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी भूमिका घेऊन कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना सहकार्य करण्याची या सर्व प्रादेशिक पक्षांची मानसिकता आहे. तरीही खडसे यांच्यासारखे नेते आपल्या अहंकारापोटी दुधात खडे टाकून आपापसात वैतुष्ट्य निर्माण करत आहेत. कॉंग्रेसच्या कालावधीत अण्णा हजारेंनी उपोषण केल्यानंतर ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायच्या ते सर्वजण मात्र आज चिडीचूप आहेत. 
केंद्र सरकारने जमिनीचे व्यवहार ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बर्‍याच प्रमाणात भ्रष्टाचार आटोक्यात येईल. सातबारा उतारा आणि अन्य जीर्ण झालेल्या कागदपत्रांची डिजीटलायझेशन करण्याचे धाडसी पाऊलही मोदी सरकारने उचललेले आहे. विधायक दृष्टिकोनातून सुरू असलेल्या या कामाला बळ देण्याऐवजी भाजपातील अनेक नेते मात्र अकारण ‘तू तू-मै मै’ करीत आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मोठ्या झटक्यानंतरही त्यातून काही शिकण्याची यांची वृत्ती दिसत नाही. अहंकाराने आणि न्यूनगंडाने पछाडलेली माणसे स्वत:ची आणि राष्ट्राचीही वाट लावतात. भाजपमधील अनेकांचा अहंकार टोकाला गेला आहे तर विरोधक सपाटून मार खाल्ल्याने न्यूनगंडातून सावरायला तयार नाहीत. हे सारे चित्र लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टिने घातक आणि तितकेच मारक आहे.
देश प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकतोय असे वाटत असतानाच महाराष्ट्राची मात्र पुरती धुळधाण उडाली आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे अशा नेत्यांचा अपवाद वगळता सत्ताधारी नेते फारसे गंभीर दिसत नाहीत. केवळ अपघाताने आणि कॉंग्रेसविरोधी लाटेने मिळालेल्या या संधीने ते बिथरले आहेत. पंतप्रधान या नात्याने मोदी उत्तमोत्तम निर्णय घेत असताना यांचा कलगीतुरा थांबायला तयार नाही. आर. आर. आबांच्या   अकाली निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेस हादरली आहे. राष्ट्रवादीतील स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजमान्य नेतृत्व म्हणून आबांकडे पाहिले जायचेे. भुजबळ, अजित पवार, तटकरे, जितेंद्र आव्हाड, पद्मसिंह पाटील या नेत्यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यातून पक्षाला बाहेर काढणे आणि राष्ट्रवादीने जनहिताची भूमिका घेणे हा आता एक कल्पनेचाच भाग बनून गेलाय. 
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकतेचा उसना आव आणतेय. ‘जिथे अन्याय दिसेल तिथे लाथा मारा’ असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. जनतेने अशा लाथा घालायच्या ठरवल्या तर मनसेला युपी-बिहारी लोकाप्रमाणे पळ काढावा लागेल. ‘‘आम्ही पुढे कशी वाटचाल करायची यासाठी आम्हाला कोणी बाळकडू देण्याची आवश्यकता नाही, कारण ते बाळासाहेबांच्या सोबत राहून मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,’’ असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. अपयशातून, न्यूनगंडातून अशी दर्पोक्ती करणे स्वाभाविकच आहे. ‘‘निवडणुकीनंतर मी एकेकाची औकात दाखवतो’’ असे सांगणार्‍या राज यांचा गर्व अजूनही उतरलेला दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत मनसेची शिवसेनेशी तुलना होऊ शकत नाही, हे न कळण्याएवढे राज ठाकरे दुधखुळे नाहीत. पक्ष कार्यकर्त्यांत, नेत्यात, पदाधिकार्‍यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा यासाठी पक्षप्रमुखांनी धीरोदात्त भूमिका घ्यायलाच हवी. मात्र ते करताना इतरांचा द्वेष केल्यास काय होते ते भारतीय लोकशाहीत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना माझे खासदार पाठिंबा देतील’ असे सांगणार्‍या राज ठाकरे यांनी मोदींना तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात याचे भान ठेवा, असे सांगण्याचा अधिकार तरी उरतो का? ही नैतिकता तूर्तास तरी राज ठाकरे यांच्याजवळ दिसत नाही. 
मोदींच्या निमित्ताने मारवाडी, गुजराथ्यांवर आगपाखड करण्याऐवजी आपण आता व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी. विधायक आणि सकारात्मक निर्णयाचे मोठ्या मनाने स्वागत करायला हवे. या मातीतल्या पक्षांना बळकटी द्यायला हवी. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधणार्‍या नेत्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे. हे काम शिवसेनेशिवाय अन्य कुणी करताना दिसत नाही. शिवसेनेने त्यांचा स्वाभिमानी बाणा टिकवत, दूरदृष्टितून घेतलेले निर्णय राज्यहिताचे आहेत. आपल्या शहराच्या, राज्याच्या विकासासाठी यापुढे प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. तशी दक्षता घेतली गेली तर आणि तरच महाराष्ट्र देशापुढे काहीतरी वेगळा आदर्श निर्माण करू शकेल.  
- घनश्याम पाटील 

संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२
Follow Me : @EditorChaprak

Friday, February 27, 2015

लाभले आम्हास भाग्य...!


एक पंडित होता. त्याला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान होते. तो ज्या भाषेत बोले तीच त्याची मातृभाषा वाटे. प्रत्येक भाषेवरील त्याचा व्यासंग अफाट होता. एकदा तो राजाच्या दरबारी आला. राजाने त्याच्या भाषाज्ञानामुळे त्याला मोठे इनाम दिले. मात्र पंडिताचा अहंकार वाढला होता. त्याने राजाला आव्हान दिले की, त्याच्या दरबारातील किंवा प्रजेतील कुणीही विद्वान असेल तर त्याने त्याची मातृभाषा ओळखावी. अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून बघितले. मात्र तो ती भाषा इतक्या सफाईदारपणे बोले की कुणालाही त्याची मातृभाषा कळली नाही. राजाने शेवटचा पर्याय म्हणून बिरबलाला निरोप धाडला. बिरबल आला. त्याने त्या पंडिताला विनम्रतेने नमस्कार केला आणि सांगितले की, ‘‘तुम्ही आमचे पाहुणे आहात. आज रात्री मुक्काम करा. उद्या आपण चर्चा करू.’’
बिरबलाने त्या पंडिताची सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्याचा योग्य तो पाहुणचार केला. पंडितही त्यामुळे सुखावला. रात्री मिष्ठान्नाचे सेवन केल्यानंतर पंडित आलिशान गालिचावर झोपी गेला. तो झोपलेला असताना अचानक एक मोठा आवाज झाला. पंडित घाबरून उठला. त्याच्या निद्रेत व्यत्यय आल्याने बिरबलाने त्याची अंतःकरणपूर्वक माफी मागितली. 
दुसर्‍या दिवशी दरबारात प्रवेश करताच बिरबलाने ठामपणे सांगितले की हा पंडित कन्नड भाषक आहे. पंडितही अवाक् झाला. त्याची मातृभाषा आतापर्यंत कोणीही ओळखू शकले नव्हते. त्याने आपली मातृभाषा मान्य करत बिरबलाने ती कशी ओळखली हे विचारले. बिरबल म्हणाला, सोपे आहे. रात्री जेव्हा तुम्ही घाबरून उठलात तेव्हा तुम्ही कानडी भाषेमध्ये बोलत होतात. संकटाच्या काळी आपल्याला आपली मातृभाषाच आठवते.
भाषेविषयी जागृती करणारी, स्वाभिमान पेरणारी ही बालकथा अनेकांना माहिती असेल. मात्र आज काय परिस्थिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतच बोलत नाही. मराठी बोलणे आपल्याला कमीपणाचे वाटते. खरेतर भारताला राष्ट्रभाषा नाही. लोकशाही व्यवस्था मान्य करणार्‍या बहुतेक राष्ट्रांना राष्ट्रभाषा नाही. केवळ हुकूमशाही राष्ट्रातच राष्ट्रभाषा लादली गेली आहे. 
संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. मात्र केवळ उत्तर प्रदेशपुरता संकुचित विचार करणार्‍या पंडित नेहरूंनी हिंदीसाठी आग्रह धरला. शेवटी हिंदीला ‘संपर्क भाषा’ म्हणून मान्यता मिळाली. त्या धबडग्यात राष्ट्रभाषेचा मुद्दा बाजुलाच पडला. हिंदुस्तानाच्या सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी माय मराठी आज मरणासन्न अवस्थेत आहे. 
खरेतर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात मराठी आहेच; मात्र कर्नाटकातही मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बडोदा, झांशी, ग्वाल्हेर, तंजावर अशा प्रांतातही मराठी प्रशासक होते. त्यामुळे त्या त्या प्रांतातही मराठी भाषकांचे प्रमाण लक्ष्यवेधी होते. मध्यप्रदेश सारख्या ठिकाणी आजही मराठी वाचक मोठ्या संख्येने आहे. इतकेच काय, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमधून ‘केरळ पर्यटन’ नावाचे मराठी मासिक प्रकाशित व्हायचे आणि त्याचे त्याकाळी तब्बल 3200 सभासद होते. याचा अर्थ केरळमध्ये मराठी वाचता येणारे असंख्य लोक होते. एखाद्या मासिकाची सभासद संख्या 3200 म्हणजे वाचकसंख्या किमान त्याच्या पाचपट नक्की असणार! भारतात तर सोडाच पण इस्त्राईल सारख्या देशातही मराठी बांधवांचे प्रमाण लक्ष्यवेधी आहे. 
बुद्धिमत्तेच्या, गुणवत्तेच्या बाबतीत मराठी माणूस आघाडीवर आहे. नवीन पिढी वाचनापासून दूर जातेय, असा जावईशोध काहींनी लावला असला तरी त्यात तथ्य नाही. आजचे तरूण झपाट्याने वाचत आहेत. त्यांची वाचनाची अभिरूची बदलली असेल, मात्र सकस आणि दर्जेदार साहित्य न वाचण्याचा करंटेपणा ते कधीही करत नाहीत. इतके सगळे असूनही माय मराठीचे अस्तित्व धोक्यात का येतेय, तर खोट्या प्रतिष्ठेपायी आपण मराठी बोलणे टाळतोय. हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या दुराग्रहामुळे आपण मराठी बोलण्याबाबत आग्रही राहत नाही. सरकारही त्यादृष्टिने ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत, नवीन शाळांना परवानगी मिळत नाही, अनुदान मिळत नाही आणि दुसरीकडे गल्लीबोळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. 
इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणारी बहुतेक मराठी मुले नालायक निघतात, असा एका विश्‍वसनीय सर्वेक्षणाचा निकाल आहे. कारण या मुलांना मातृभाषा असलेली मराठीही जमत नाही आणि परकीय भाषा असलेल्या इंग्रजीचेही धड ज्ञान घेता येत नाही. या कोंडमार्‍यात त्यांचे मोठे नुकसान होते. त्याऊलट मराठी माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण घेवून अनेक जागतिक कंपन्यात महत्त्वाच्या हुद्यावर समाधानाने कर्तव्य बजावणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. जिथे आई आपल्या चिमुकल्याला प्यायला दूध दिल्यानंतर तो तिला ‘थँक्स ममा’ म्हणतो तिथेच आपली संस्कृती संपतेय! 
भाषा, संस्कृती याविषयी जागृत न राहता पाश्‍चात्य राष्ट्रांची भलावण करणारे महाभाग हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. आपण शेक्सपिअरचा अभ्यास जरूर करू; मात्र तो करताना आपल्याला आपल्या महाकवी कालीदासाचा विसर पडत असेल तर ते आपले दुर्दैव आहे. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त प्रत्येकाने आता मराठीतच बोलण्याचा संकल्प करायला हवा. इंग्रजी नववर्षाच्या संकल्पाप्रमाणे त्याचे बुडबुडे न उडता तो अंमलातही आणायला हवा. मराठी भाषा, मराठी संस्कृती जगवण्यासाठी आपण किमान मराठीत बोलणे सुरू ठेवायला हवे. मराठी भाषेबाबत आग्रही असणारेच आजच्या काळात मराठीचे तारणहार ठरू शकतील!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Tuesday, February 24, 2015

माझ्या मातीचे गायन...!

सध्या सर्वत्र मराठी भाषा सप्ताह साजरा होत आहे. अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेत आहेत. माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘झुळूक आणि झळा’ या अग्रलेख संग्रहातील माय मराठीचा जागर घालणारा हा लेख खास तुमच्यासाठी!!


‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे आम्ही नुकतेच एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आम्हाला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’
अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या गैरसमजाबद्दल हसावे की रडावे हेच आम्हाला कळत नव्हते. मराठी माणसाविषयी सातत्याने कोकलणार्‍यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती या दृष्टिने इथल्या व्यवस्थेने दिलेली ही चपराकच होती. ‘खंजीर खुपसणे म्हणजे ‘मर्डर’ करणे’ हे पक्के ठाऊक असणार्‍या एका महाविद्यालयीन युवकाला मराठी भाषेचे ज्ञान देणे यासारखे आव्हानात्मक काम दुसरे कोणते असू शकते काय?
गलेलठ्ठ पगार घेऊन शाळा-महाविद्यालयातून आजची ही पिढी बरबाद केली जात आहे. भाषेचे गर्भितार्थ, उपहास, व्यंग्य, अर्थच्छटा हे सारे त्यांच्या डोक्यावरून जाते. विशेषतः ग्रामीण जीवनाचा परिचय नसल्यानेही अनेक घोटाळे होतात.  कृषी संस्कृतीशी तर या पिढीला काहीच देणेघेणे नाही. नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, बैलगाडी, कासरा, जू, रान, पिकं, धसकटं, वाफे, धार या व अशा गोष्टी तर त्यांच्या गावीही नसतात. ‘खुरप्याच्या तोंडी पिकाचं अमृत असतं’  असं मी म्हणालो तर मित्रानं लगबगीनं विचारलं, ‘हा खुरपं नावाचा प्राणी आपल्याला कसा मिळवता येईल?’ मुंबईत मध्यंतरी ‘दूध कोठून येते?’ या प्रश्‍नाचे उत्तर एका विद्यार्थ्याने ‘दुधवाल्या भैय्याकडून’ असे दिले होते. गाय, म्हैस, शेळी याविषयी ऐकून घेण्यासही तो तयार नव्हता.
परवा एका निरागस चिमुकल्याने गव्हाच्या ओंब्यासोबत आपले छायाचित्र काढून घेतले आणि ‘पोळीच्या झाडासोबत’ म्हणून  त्याच्या पालकांनी मोठ्या कौतुकाने ते फेसबुकवर टाकले. अर्थात, त्यात विनोदाचा आणि गमतीचाच भाग अधिक असल्याने सगळ्यांनी त्याचे कौतुकच केले; मात्र आजच्या मुलांना या सर्व गोष्टी कळेनाशा झाल्या आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. 
याबाबत एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. मध्यंतरी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचा नातू नील तिथे आला. गाडगीळांनी चिमुकल्या नीलला आमच्यासमोर संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवायला सांगितला. तो ऐकत नाही हे पाहून त्यांनी निवेदनाच्या शैलीत गमतीने सांगितले, ‘‘आता नील गाडगीळ सादर करतील एक संस्कृत श्‍लोक...’’ आणि त्याने खरेच एकदोन श्‍लोक म्हणून दाखवले. त्याचे पाठांतर आणि स्पष्ट शब्दोच्चार पाहून आम्हास आश्‍चर्य वाटले. त्याविषयी विचारले असता गाडगीळांनी दिलेले उत्तर मार्मिक तर आहेच पण प्रत्येकाने विचार करावा असेच आहे.
ते म्हणाले, ‘‘मूल जन्मल्यापासून आपण उगीच त्याच्याशी बोबडे बोलतो. अलेले... माझं गोड्ड बाल... असं म्हणत बसण्यापेक्षा त्याच्याशी स्पष्टपणे बोलावे. त्याच्या बालमनावर चांगल्या भाषेचे संस्कार करावेत. उगीच बाललीलेच्या नावाखाली भाषेची वाट लावण्याऐवजी त्याच्या कानावर उत्तमोत्तम आणि अर्थपूर्ण शब्द पडतील याची काळजी घ्यावी, म्हणजे तो तसाच वागेल, बोलेल!’’ 
गाडगीळांचे हे तत्त्वज्ञान खरोखरी प्रत्येकाने आचरणात आणावे असेच आहे. सध्या अनेक कुटुंबात पालकच पाल्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि काही ठिकाणी अन्य भाषेचेही शब्द बोलण्यात सर्रासपणे वापरले जातात. त्याचे गांभिर्य कुणाच्या गावीही नसते. मग भाषाशुद्धी कशी होईल? महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे बघा. ते हिंदीत बोलताना फक्त हिंदीतच बोलतात. इंग्रजीत बोलताना अस्खलीत इंग्रजीतच बोलतात. त्यांच्या बोलण्यात भाषेची सरमिसळ नसते. भेसळ तर नसतेच नसते! म्हणूनच त्यांनी असंख्य लोकांवर मोहिनी घातली. त्यांचा आवाज, त्यांची भाषा हीच त्यांची ओळख आहे. मराठीच्या नावावर राजकारण करणार्‍यांनी त्यांचा हा एवढा एक गुण जरी आत्मसात केला तरी खूप काही साध्य होईल.
सध्या शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही बहुसंख्य पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी वाटेल तितका निधी द्यायचीही त्यांची तयारी असते. ‘इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे’ आणि ‘इंग्रजी ही जागतिक भाषा आहे’ या दोन ‘अंधश्रद्धा’तून मानसिकदृष्ट्या खचलेले लोक इंग्रजीचे स्तोम अकारण माजवतात. मातृभाषेत शिक्षण न झाल्याने या मुलांची प्रगती खुंटते. त्यांना धड इंग्रजीसारखी ‘मागास’लेली भाषा आत्मसात करणे जमते ना मराठीतला गोडवा कळतो! बरे, हे ध्यानात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपापल्या मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांनीच यशाचे नवनवे मानदंड तयार करत विक्रम नोंदवले आहेत. मराठीतच काय अन्य कोणत्याही भाषेत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही.
इतर जातींचा, इतर धर्मांचा तसेच इतर भाषेचा द्वेष करू नकात! मात्र आपली मातृभाषा तरी धडपणे बोलणार की नाही? मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते, ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा; मी तुम्हाला ‘मम्मी’ म्हणणारे लाखो हिंदुस्थानी दाखवेन!’ ही वस्तुस्थिती आहे. विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत झाल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले, तरीही आम्ही सुधारायला तयार नाही. याला काय म्हणावे? 
मराठी भाषेला इंग्रजीपासून धोका आहेच आहे; पण त्याहून अधिक धोका हिंदीपासून आहे. आपण सहजपणे बोलतानाही हिंदीचा आधार घेतो. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट आम्ही अभिमानाने करतो. खरे तर या अर्धवट शहाण्यांना हिंदीही व्यवस्थित येत नाही. प्रशासकीय कामकाजातली हिंदी भाषा कळणारे कितीजण आहेत? चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणारी भाषा, हिंदी भाषा म्हणून खपवली जाते. मात्र त्या भाषेत अन्य भाषिक शब्दांचाच भरणा अधिक असतो. मध्यंतरी एकदा एका हिंदी सिनेमाचे कथानक वाचल्यानंतर एका हिंदी अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘‘मी इंग्रजी सिनेमात काम करणार नाही...’’ या चित्रपटात खरेच निम्मे संवाद इंग्रजीत असतात, हिंदुस्तानातल्या विविध प्रांतातले काही शब्द घुसडले जातात आणि हिंदी या नावाखाली ते आमच्यावर लादले जातात. म्हणूनच ‘सहज बोलली अन् चव गेली’ अशी आमची अवस्था होते.
मराठी भाषेतले आशयसंपन्न असणारे विविध शब्द, त्यांच्या अर्थच्छटा आजच्या तरूणाईला कळत नाहीत. संगणक महाजाल, भ्रमणध्वनी या माध्यमांतून तर वेगळीच भाषा निर्माण होत चालली आहे. इतर भाषेतले अनेक शब्द मराठीत रूजले आहेत, आपण ते सामावूनही घेतले आहेत. तरीही भाषेबाबत कोणी आग्रही असल्याचे दिसत नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही भाषा अंथरूणाला खिळल्याचे चित्र आहे. भाषेबाबत आग्रही असणारे पुणेकर सध्या अनेकांचे चोचले पुरवता पुरवता या व्यवस्थेचाच एक भाग बनत चालले आहेत.
पुण्यातल्या एक विदुषी अनेक साहित्यिक व्यासपीठावर दिसतात. ‘अमुक लेखकाची मुलगी आणि अमुकची आई’ अशीच त्यांची सर्वत्र ओळख करून दिली जाते. प्रत्यक्षात त्या कोण आहेत, हे महत्त्वाचे असताना अशा गोष्टींचाच उहापोह केला जातो. त्यांचा परिचय करून देताना बर्‍याचवेळा ‘सुप्रसिद्ध महिला लेखिका’ असाच भाषाप्रयोग केला जातो आणि पुणेकरही निमूटपणे ऐकून घेतात. लेखिका म्हटल्यावर त्या महिला आहेत याचे तुणतुणे का वाजवावे लागते? ‘गोल सर्कल’, ‘पिवळे पितांबर’, ‘गाईचे गोमूत्र’, ‘लेडिज बायका’, ‘चुकीची मिस्टेक झाली’ असे काही शब्दप्रयोगही सर्रासपणे ऐकायला मिळत आहेत.
भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर राष्ट्र बेचिराख होईल, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भाषा शुद्धीकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्याच्या दृष्टिने प्रत्येकाने आता मराठी भाषेत बोलण्याबाबत आग्रही रहायला हवे. आपल्या नाकापर्यंत पाणी आले आहे. आता हालचाल केली नाही तर स्वतःसह आपल्या मातेची हत्या केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे!!

Saturday, February 21, 2015

दखलपात्र Dakhalpatra: दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रय...

दखलपात्र Dakhalpatra: दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रय...: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात ...

दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न?





अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर भाजप सरकारलाही सपशेल अपयश आले. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नसतानाच डाव्या चळवळीचे पितामह अशी ओळख असलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर त्याच पद्धतीने हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रासाठी निश्‍चितच हा मोठा कलंक आहे. 
या दोन्ही प्रकरणात हल्लेखोरांनी सकाळच्या वेळी दुचाकीवरून येऊन गोळ्या घातल्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मिनिटांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, ‘यामागे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.’ कोणताही पुरावा नसताना मुख्यमंत्री महोदयांनी हे जे तारे तोडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विचलित झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाची दिशा बदलायची होती की काय? अशी शंका येण्यास मोठा वाव आहे. यामागे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते तर आजपर्यंत त्यांना अटक का झाली नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना पाठीशी तर घातले नाही ना? राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री अशी विधाने करून तपासकामात अडथळे आणतो हे दुर्देवी आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असणार्‍या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नावे चव्हाणांनी जाहीर करावीत.
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतरही धर्मवादाचे राजकारण करत हिंदुत्ववाद्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. हे जर खरे असेल, तर आरोप करणार्‍यांनी तसे पुरावे देऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्यावी. उगीच आरोप करून किंवा निषेधाचे काळे झेंडे फडकवून काहीही साध्य होणार नाही. विचारवंतांवरील, सामाजिक कार्यकर्त्यांवरील असे हल्ले दुर्देवी आहेत. त्यामागील खरी कारणे शोधून काढण्यासाठी आणि हल्लेखोर पकडण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे. 
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा प्रमुख स्तंभ असतो. मात्र, काही भांडवलदार वृत्तपत्रे अशा घटनांचे भांडवल करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत. समाज किती असंवेदनशील आहे, पोलीसयंत्रणा किती सुस्तावलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी दैनिक ‘लोकमत’ने पुण्यात काल एक स्टींग ऑपरेशन केले. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुप्रसिद्ध विचारवंत हरी नरके, पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्यावर पाळत ठेऊन, हल्ल्याचा प्रयत्न करून ‘लोकमत’सारख्या जबाबदार वृत्तपत्राने काय सिद्ध केले हे कळायला मार्ग नाही. आपल्या शहरात कुणालाही, कधीही, कसेही मारता येते याचे प्रात्यक्षिकच ‘लोकमत’ने दाखवून दिले आहे. विद्या बाळ यांच्यावर हल्ला करताना वापरलेल्या दुचाकीवर ‘प्रेस’ असे लिहिलेेले स्पष्टपणे दिसते, तर विश्‍वंभर चौधरी यांना गोळ्या घालणारा हल्लेखोर हसताना दिसतो. हे सारेच क्लेषकारक आहे. आपले शहर असुरक्षित असल्याने काहीही होऊ शकते अशी भीतीची भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली आहे. 
वृत्तपत्रांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करायला हवे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या लक्षात आणून द्यायला हव्यात. लोकाना निर्भय करायला हवे. मात्र, घडतेय ते उलटेच! प्रसारमाध्यमे लोकाच्या मनातील भीती वाढवत आहेत. यंत्रणेचे हसे करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, तथाकथीत विचारवंत कोणतीही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववाद्यांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, कायद्याचा धाक निर्माण व्हावा, असे कुणाला गंभीरपणे वाटते की नाही?
जवखेडा प्रकरणात ‘दलित अत्याचार’ म्हणून राज्य धुसमुसत असताना हल्लेखोर त्यांच्याच नात्यातील निघाले. ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. कोणत्याही जातीत किंवा कोणत्याही धर्मात सगळेच चांगले अथवा सगळेच वाईट असूच शकत नाहीत. जे चुकीचे आहेत, समाजद्रोही आहेत, त्यांना कठोर शासन अवश्य करावे, मात्र यानिमित्ताने कोणत्याही धर्माला बदनाम करू नये ही विनंती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे सर्वांसाठी वंदनीय होते. त्यांचे कार्य खरोखरीच अफाट होते. स्वामी विवेकानंदांनीही हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टी ठामपणे दाखवून दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही. दाभोलकर, पानसरे हेसुद्धा समाजातील कुप्रवृत्तींविरूद्ध संघर्ष करत होते. त्यांचा संघर्ष द्वेषमूलक नव्हता, हे त्यांच्या अनुयायांनी लक्षात घ्यावे. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी समाजानेही दक्षता घ्यायला हवी. आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे, ते जागरूकपणे पहावे आणि कुप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. विचारांची लढाई विचारानेच लढली गेली तर ती खरी अशा विचारवंतांना श्रद्धांजली ठरेल.
घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक, ‘चपराक‘, पुणे
7057292092