Monday, May 25, 2020

‘दरवळ’च्या निमित्ताने...

माझं ‘दरवळ’ हे चौथं पुस्तक घरकोंडीनंतर लगेचच प्रकाशित होतंय. मागच्या तीन दिवसात जवळपास दोन हजार प्रतींची पूर्वनोंदणी करून वाचकांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखवलाय त्याबद्दल त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकाची आपण अजून पूर्वनोंदणी केली नसेल तर नक्की करा. त्यासाठी लिंक देतो -  https://shop.chaprak.com/product/darval/
माझ्या 7057292092 या क्रमांकावर फोन पे किंवा भीम ऍपनेही आपण पूर्वनोंदणी करू शकाल. या पुस्तकाचं मनोगत खास आपल्यासाठी देतोय. अवश्य वाचा. प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.

हे पुस्तक खरं तर मागच्याच वर्षी प्रकाशित करायचं होतं. त्यासाठीची सगळी तयारी केली. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले सर म्हणाले होते, ‘‘मी सध्या कुणाच्याही पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. मात्र आजच्या काळात तुम्ही विविध विषयांवर धाडसी भूमिका घेऊन जे काम करता ते पाहता मला तुमच्या एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना लिहायची इच्छा आहे...’’

त्यांचे हे प्रोत्साहनाचे शब्द हाच माझ्यासाठी मोठा सन्मान होता. त्यामुळं मी माझे काही लेख एकत्र केले आणि त्यांच्याकडं पाठवून दिले.

त्यांना मी पाठवलेली संहिता मिळाली आणि चारच दिवसांनी त्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘मी तुमचे सगळे लेख वाचले. हे सगळं वेगळ्याच धाटणीचं झालंय. त्यावर मी टिपण काढलंय. गंमत म्हणजे प्रकृती अस्वास्थ्यामुळं मला सलाईन लावलं होतं. माझा मुलगाच डॉक्टर असल्यानं त्यानं सांगितलं होतं की लेखन-वाचन पूर्ण बंद! पण मी त्याला सांगितलं की या पुस्तकाची प्रस्तावना मला लिहायचीच आहे. त्यामुळं हा एक अपवाद! मग माझ्या एका हाताला सलाईन होतं आणि दुसर्‍या हातात तुमचे हे लेख. हे सगळं वाचताना मला माझ्या वेदनांचाही विसर पडला. तुमचं हे पुस्तक मराठी साहित्यात इतिहास घडवणार!’’

सरांचे हे शब्द म्हणजे मोठा पुरस्कारच! त्यावर मी कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय काय बोलणार? एखादा प्रचंड संदर्भमूल्य असणारा शोधनिबंध सादर करावा त्याप्रमाणं सरांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलीय. ही प्रस्तावना वाचून मलाच मी नव्यानं कळलो.

योगायोगानं त्या वेळी ‘चपराक’च्या दिवाळी अंकाचं काम सुरू होतं. मग ही प्रस्तावना दिवाळी अंकात प्रकाशित केली. त्यानंतर या पुस्तकाची मागणी करणारे असंख्य फोन सुरू झाले. दिवाळी अंकासोबत आम्ही काही लेखकांची दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केली. त्या पुस्तकांचं वितरण आणि नवे काही प्रकल्प यात दोन-अडीच महिने गेले. दरम्यान आमच्या परिवाराचे सदस्य, सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी ‘दरवळ’चं मनोहारी मुखपृष्ठ साकारलं होतं. आता पुस्तक छपाईला द्यावं असा विचार करत होतो तर राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या एका पदाधिकार्‍यानं मी आणि भाऊ तोरसेकर अशा दोघांविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यात ‘ठाकरे सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न’ आणि ‘शरद पवार यांच्या हत्येचा कट’ असे गंभीर आणि धादांत खोटे आरोप करण्यात आले होते. 

मी आणि भाऊ विविध वृत्तपत्रांतून सातत्यानं जे लेखन करतोय, भाषणं करतोय, व्याख्यानं देतोय, वृत्तवाहिन्यांवरून, यूट्युब चॅनेलवरून बोलतोय त्यामुळं ठाकरे आणि पवार यांच्याविरूद्ध जनमत तयार होत असून त्यातले काहीजण त्यांच्या हत्येचा कट करतील, असा त्यांचा अंदाज होता. त्यावरून आमच्याविरूद्ध तक्रारी देण्यात आल्या. 

या हास्यास्पद प्रकारातून बाहेर पडून पुन्हा पुस्तकाची तयारी केली. मांडणीसह सगळं छपाईसाठी सज्ज होतं आणि करोनामुळं घरकोंडी सुरू झाली. मग मात्र सगळंच बंद! घराच्या बाहेर पडणंही कठीण होतं. मी ‘चपराक’च्या कोथरूड येथील मुख्य कार्यालयात स्वतःला बंदी करून घेतलं आणि इतर पुस्तकांची कामं उरकण्याचा धुमधडाका सुरू केला. किमान पुस्तकं तयार ठेवावीत, म्हणजे घरकोंडी नंतर ती छपाईला देता येतील असा मानस होता. 

त्याचवेळी दिवाळी अंकातील भोसले सरांची प्रस्तावना वाचून एका वाचकाचा फोन आला. त्यांनी सांगितलं, ‘‘तुमचं ‘दरवळ’ मला हवंय म्हणजे हवंय!’’ 

मी त्यांना सांगत होतो की ‘‘त्याची अजून छपाई पूर्ण झाली नाही. घरकोंडीनंतर होईल, मी तुम्हाला कळवतो.’’ 

...पण ते काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले, ‘‘हे पुस्तक वाचल्याशिवाय मी मरणार नाही. त्यामुळं माझी किमान पूर्वनोंदणी घ्या...’’ 

त्यांच्या सल्ल्यानुसार गंमत म्हणून ‘चपराक’च्या संकेतस्थळावरून ‘दरवळ’ची पूर्वनोंदणी सुरू केली आणि चमत्कारच घडला. पहिल्या दिवशी या पुस्तकाच्या 489 प्रतींची नोंदणी झाली. घरकोंडीमुळं सगळीच अनिश्चितता असताना आणि हे पुस्तक कधी प्रकाशित होईल हे माहीत नसूनही वाचकांनी दाखवेला हा विश्वास अनमोल होता. त्यामुळं दुसर्‍या दिवशी मी भोसले सरांची प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची पाठराखण माझ्या ब्लॉगवर प्रसारित केली. ते वाचून इतकी नोंदणी सुरू झाली की मी आश्चर्यचकितच झालो. तीन दिवसात या पुस्तकाच्या जवळपास दोन हजार प्रतींची पूर्वनोंदणी झाली. मराठी साहित्यातला कदाचित हा एक विक्रमच असेल. ‘हे पुस्तक कुणा म्हणजे कुणाला भेट मिळणार नाही, नंतर ग्रंथ विक्रेत्यांकडंही मिळेल याची खात्री नाही. या पुस्तकात तुम्हाला घनश्याम पाटील हसताना, नाचताना, गाताना आणि ओरडतानासुद्धा दिसेल’ असं मी जाहीर केलं होतं आणि माझ्यावर, माझ्या लेखनावर प्रेम करणार्‍या सर्वांनीच अक्षरशः झुंबड उडवली. आमच्या संकेतस्थळाचं ‘ट्रॅफिक’सुद्धा अक्षरशः ‘जाम’ झालं होतं. वाचकांचा हा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो.

अनेक दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करत असतानाच मी सातत्यानं विविध वृत्तपत्रांसाठी, दिवाळी अंकासाठी लेखन करतोय. त्यामुळं थोडाथोडका का असेना पण मी माझा स्वतंत्र वाचकवर्ग तयार करण्यात यशस्वी ठरलोय. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रावर सातत्यानं स्पष्ट आणि परखड भूमिका घेतल्यामुळं विविध घडामोडीनंतर असंख्य वाचकांचे सलग फोन येतात की ‘या विषयावरील तुमच्या भूमिकेची उत्सुकता आहे.’ 

मी लिहिल्यानंतर किंवा बोलल्यानंतर यातील बहुसंख्यजण प्रतिक्रियाही कळवतात. म्हणूनच माझ्या या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व दोन हजार प्रतींची नोंदणी करून घेण्यात मी यशस्वी ठरलो. त्या सर्वांच्या मी कायम ऋणात आहे. 

यापूर्वी माझी ‘दखलपात्र’ व ‘झुळूक आणि झळा’ ही अग्रलेखांची दोन पुस्तकं प्रकाशित झालीत. ‘अक्षर ऐवज’ हे समीक्षा लेखांचं पुस्तक झालं. या तीनही पुस्तकांना उत्तम वाचकप्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन्ही अग्रलेखसंग्रहांची भाषा आक्रमक होती. ‘दरवळ’मधील हे लेख मात्र अन्य ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. स्वतः संपादक असताना इतरत्र दिलेलं लेखन दर्जेदारच असावं असा एक नैतिक धाक असतो. त्यामुळं शक्य तितक्या साध्या-सोप्या भाषेत हे सारं मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. वैचारिक भूमिका घेताना ती किचकट शैलीत मांडली तर ठराविक वाचकवर्ग सोडून ते फारसं कोणी वाचत नाही आणि गंभीरपणेही घेत नाही असा माझा प्रकाशक म्हणून अनुभव आहे. त्यामुळं क्लिष्टता टाळणं हा माझ्या लेखणीचा सवयीचा भागच झालाय. 

या पुस्तकातील पंचवीस लेख म्हणजे माझ्या मनाचा आरसा आहे. त्यातून उमटलेलं बरं-वाईट प्रतिबिंब वाचकांना कितपत भावतं हे नंतर येणार्‍या तुमच्या प्रतिसादावरून कळेल. ‘राजकीय भाष्यकार’ अशी माझी ओळख असली तरी या पुस्तकात वैविध्यपूर्ण विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय. तो करताना कुठंही शब्दांची जुळवाजुळव केली नाही किंवा कुणाला काय वाटेल याचाही मुलाहिजा राखला नाही. सामान्य माणूस म्हणून विविध प्रश्‍नांकडं पाहताना जे काही मनात येईल ते प्रांजळपणे मांडलं आहे. त्यातले विचार कुणाला पटतील, कुणाला पटणार नाहीत. कुणाला ‘पटवण्या’साठी लेखणीचा वापर करण्याऐवजी माणूस म्हणून आतला जो काही हुंकार असेल तो व्यक्त करणं मला नेहमीच महत्त्वाचं वाटत आलंय. 

माझ्या प्रत्येक लेखाच्या पहिल्या वाचक या आमच्या समूहाच्या सदस्य शुभांगीताई गिरमे आहेत. साडेतीनशे लेखांतून या पंचवीस लेखांची निवड त्यांनीच केलीय. ‘चपराक’ परिवाराचे ज्येष्ठ सदस्य मोरेश्वर ब्रह्मेकाका आणि माझ्यावर निर्व्याज प्रेम करणारे अरूण कमळापूरकर यांनी या पुस्तकाचं मुद्रितशोधन केलंय. ‘योगीराज नागरी पतसंस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सल्लागार ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री चंद्रलेखा बेलसरे, दिलीप कस्तुरेकाका अशा सर्वांचं वेळोवेळी मला मिळणारं प्रोत्साहन महत्त्वाचं आहे.

रविंद्र कामठे, माझा वर्गमित्र प्रमोद येवले, विनोद श्रावणजी पंचभाई, माधव गिर, दिनकर जोशी, प्रशांत आर्वे, सागर कळसाईत, सुनील जवंजाळ ही सगळी टीम माझ्यासोबत कायम भक्कमपणे उभी असते. साप्ताहिक आणि मासिकाचं काम, नवनवीन पुस्तकांचं सातत्यानं प्रकाशन, विविध कार्यक्रमांचं आयोजन, सततचा प्रवास या सगळ्यात या सर्वांची मिळणारी मोलाची साथ महत्त्वाची आहे. मुख्य म्हणजे माझ्या काही आक्रमक भूमिकांमुळं काही वादाचे प्रसंग उद्भवले तरी हे सर्वजण ठामपणे कायम माझ्या पाठिशी उभे असतात. म्हणूनच कोणतीही भूमिका घेताना मनात कसलाच किंतु-परंतु नसतो.

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे
माय बापाहुनी बहु मायावंत, करूं घातपात शत्रुहूनि

हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग हीच माझी प्रेरणा आहे. त्यामुळं हा दरवळ प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं घ्यायचाय. चंदन झिजत राहतं तेव्हा त्याचा दरवळ सर्वत्र पसरतो. त्यामुळं मनाला जी प्रसन्नता लाभते ती विलोभनीय असते. तीच अनुभूती शब्दातून द्यायचा माझा प्रयत्न आहे.

जाताजाता माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी कवी दुष्यंत कुमार यांच्या एका गझलेचा आधार घेतो आणि थांबतो. 

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए। 
हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गॉंव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

या पुस्तकाविषयी आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वांचे आभार.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक आणि लेखक
7057292092

7 comments:

  1. सर,खूपच छान!
    हर सीने मे आग लगेगी!
    जरूर लगेगी!!

    ReplyDelete
  2. सर,खूपच छान!
    हर सीने मे आग लगेगी!
    जरूर लगेगी!!

    ReplyDelete
  3. तुमच्या विचारांचा आरसा वाचकांना नक्की भावेल..👌 बुकिंगने उचांक केलेलाच आहे.. वाचकांचे अभिप्रायांचा सुद्धा मेरू बनेल.. हा विश्वास आहे..😊

    ReplyDelete
  4. पाटील सर....सगळीकडे फक्त आणि फक्त "दरवळ".
    तिमिराकडून तेजाकडे ,
    अशक्याकडून शक्याकडे....

    ReplyDelete
  5. खूप छान, लवकर दरवळ आमच्यापर्यंत पोहचावी आणि आम्हीही सुगंधीत व्हावं! खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  6. या लेखातील प्रत्येक शब्द मनाच्या आतल्या कप्प्यातुन
    आला असल्यामुळे वाचतानांं वेगळीच अननुभुती आली.मस्त अवर्णनीय आनंद मिळाला. ही " दरवळ " आमच्या पर्यंत लवकर यावी.खूप खूप धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा !!! अभिनंदन !!!

    ReplyDelete
  7. खूप छान... 'दरवळ'चे स्वागत ! आपले लेखन आणि व्यक्तित्व असेच बहरत राहो हीच सदिच्छा !!

    ReplyDelete