Wednesday, April 12, 2017

शाकाहाराची चळवळ राबवा!

- घनश्याम पाटील

 राजस्थानातील अलवार मार्गावर काही गोरक्षकांनी गाय वाहून नेणार्‍या मुस्लिम बांधवांना जबर मारहाण केली आणि त्यात हरियाणातील पेहलू खान यांचा जीव गेल्याचे वास्तव पुढे येत आहे. खान कुटुंबिय हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुख्य म्हणजे ते गायींची तस्करी करत नव्हते तर त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय होता आणि पेहलू खान म्हैस खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. तिथे एका शेतकर्‍याने या गाईचे बारा लिटर दूध काढून दाखवल्याने त्यांनी त्यांचा इरादा बदलला आणि म्हशीऐवजी ही गाय खरेदी केली! मात्र ती त्यांच्या गावाकडे आणत असताना काही तथाकथित गोरक्षकांनी त्यांना आडवले. या उन्मादी लोकांना त्यांनी गाय खरेदीची पावतीही दाखवली; मात्र त्या सर्वांनी पेहलू खान आणि त्यांच्या सहकार्‍यांना जबरदस्त मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ‘दूध व्यवसायासाठी गाय खरेदी करणे ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने या दुर्दैवी घटनेनंतर दिली आहे. कायदा हातात घेणार्‍या आपल्याकडील अशा काही लोकांमुळे सातत्याने अराजक माजवले जात आहे. धर्माच्या नावावर केल्या जाणार्‍या या विवेकहीन कृत्यामुळे आपले धार्मिक ऐक्य धोक्यात आले आहे.
गोवंश हत्या प्रतिबंद कायदा 1995 नुसार कत्तलीसाठी गोवंशातील गायी वाहून नेता येत नाहीत; मात्र शेतीच्या कामासाठी किंवा दुधदुभत्या व्यवसायासाठी ही जनावरे पूर्वपरवानगी घेऊन नेता येतात. पेहलू खान यांनी दूध व्यवसायासाठी म्हणून ही गाय खरेदी केली होती आणि त्याची रितसर पावतीही त्यांच्याकडे होती. मात्र टेम्पोतून गाय वाहून नेताना त्यांचे ‘मुस्लिम’ असणे त्यांच्या जीवावर बेतले. पेहलू हे ही गाय कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेत होते असा दावा संबधितांनी केला असला तरी या हत्येचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. गायीसाठी माणूस मारणारे धर्मरक्षक नसून धर्मासाठी कलंक आहेत. ज्यांच्याकडे किमान माणुसकी, करूणा नाही आणि जे निरपराध माणसे मारण्याइतके निष्ठूर होऊ शकतात अशांना धर्म कधी कळणार?
उत्तर प्रदेशचे नवे कार्यक्षम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये गो तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर बंदी घातली. त्यांच्या आदेशानुसार तेथील अवैध कत्तलखान्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईही होत आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा पद्घतीने नियम आणि कायदे राबवले जाऊ शकतात. गुजरातमध्येही गोवंश हत्या करणार्‍याला दहा वर्षांची शिक्षा व्हायची! त्या कायद्यात सुधारणा करून आता जन्मठेप देण्यात येते. मात्र गोरक्षकांनी परस्पर अशा कारवाया करणे आणि संबधितांना मृत्युपर्यंतची शिक्षा देणे हे कोणत्या अधिकारात बसते? त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे. अशा प्रवृत्ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून त्यांना चाप लावणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
गोहत्येच्या नावाखाली देशात गुंडगिरी सुरू असून अखलाखनंतर ही सहावी हत्या असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. पेहलू खान यांच्या हत्येमुळे ओवेसी यांच्या विधानावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातूनच त्यांनी ‘‘उत्तर प्रदेशमध्ये गाय ही ‘मम्मी’ असून ईशान्य भारतात ती ‘यम्मी’ आहे’’ असे म्हटले आहे. हिंदू-मुस्लिमांत भाईचारा प्रस्थापित करण्याऐवजी अशा घटनांमुळे राज्यकर्ते त्यात तेल ओतत राहतात आणि द्वेषाचा हा वणवा आणखी विस्तारत जातो.
खरंतर आपल्याकडे गवालंब, गोमेध, शूलगव अशा यज्ञात गायीची आहूती दिली जायची. इतकेच नाही तर नंतर प्रसाद म्हणून गाईचा कोणता भाग कोणी खायचा याचीही वर्णने आढळतात. पूर्वी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ‘मधुपर्क’ हा प्रकार सर्रासपणे दिला जायचा. त्यात गायीच्या वासराचे कोवळे मांस असायचे. आपली पशूपालक संस्कृती असल्याने असे मांस खाणे हे गैर नव्हते. पुढे या गायीत तेहतीस कोटी देव असल्याची खुळी कल्पना रूढ झाली आणि गोमूत्रासह तिचे शेणही अनेकजण आनंदाने खाऊ लागले. त्यासाठी त्यातील रोगप्रतिकारक उपयोगीता मूल्याचे महत्त्व सांगितले जाऊ लागले. ज्यांना शेण खायचे त्यांनी ते अवश्य खावे पण माणसे मारण्याचे पातक कोणत्याही परिस्थितीत करू नये! स्वामी रामदेव बाबा यांच्यासारखा उद्योजक गोमूत्र आणि गायीचे शेण विकून कोट्यधीश होतो आणि गाय खाणारे मात्र कुठेतरी पंक्चर काढत बसतात हे वास्तव लक्षात घ्यायला हवे! गायीसारख्या उपयुक्त पशुचा सर्वच तथाकथित धर्मपंडितांनी आणि राजकारण्यांनी बाजार मांडलाय. स्वामी विवेकानंदही मांस भक्षण करायचे हे सत्य त्यामुळेच त्यांना पचणारे नाही. इतिहास, धर्मग्रंथ सोयीस्करपणे घ्यायचे आणि भेदनीतिचा वापर करत द्वेषाचे, सूडाचे राजकारण करायचे हा काहींचा धंदाच झालाय.
जनावरे वाचवा असे सांगणार्‍या काही रानटी टोळ्या त्यासाठी निर्दयीपणे माणसे मारत आहेत. शाकाहारी-मांसाहारी या संकल्पना धार्मिक आहेत, वैज्ञानिक नाहीत. त्यातून अशी अविचारी कृत्ये घडतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर त्याकाळात लिहिले होते, ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे!’ त्यात त्यांनी लिहिले होते, ‘गाय ही फक्त एक उपयुक्त पशू आहे, तिच्याकडे पशू म्हणूनच बघा. ती माणसाची माता होऊ शकत नाही. असलीच तर ती बैलाची माता आहे. उपयुक्त पशू म्हणून गाय रक्षणीय आहे. गोरक्षणाचे धार्मिक स्वरूप सोडून, त्यास आर्थिक स्वरूप दिले की झाले!’
आपण नेमके त्याच्या उलट करतोय! गायीला आई समजून जो अतिरेक केला जातोय तो समाजात फूट पाडणारा आहे. मध्यंतरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गोरक्षकांना सुनावले होते. गोरक्षणाच्या नावावर अनेक व्यक्ती आणि संस्था राजकारण करत असल्याने त्यांचा सुळसुळाट आवरला पाहिजे असेही पंतप्रधान म्हणाले होते. त्यात त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले, ‘आपल्याकडे गायींच्या जितक्या कत्तली केल्या जातात त्याहून अधिक गायींचे मृत्यू प्लॅस्टिक कागद खाल्ल्याने होतात. त्यामुळे रस्त्यात किमान प्लॅस्टिक टाकू नका; कुणी टाकलेच तर ते आधी उचला. तुम्ही इतके काम जरी केले तरी अनेक गायींचे प्राण वाचू शकतील!’ मात्र त्यांच्या या सूचनेकडे कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही.
कृषी व्यवस्थेत गाय आणि गोवंश याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्याशिवाय हा गाडा चालूच शकत नाही. शेतकरी जनावरांवर अपत्याप्रमाणे प्रेम करतात. त्यामुळे तेे त्यांना मारायचा विचारही करत नाहीत. मात्र अनेकदा अल्पभूधारक शेतकर्‍यांकडे जनावरे विकण्याशिवाय पर्यायही नसतो. त्यातून काही भाकड जनावरे हृदयावर दगड ठेवून कसायाच्या दावणीला बांधली जातात. या सगळ्या समस्यांचा शोध घेऊन उपाययोजना करण्याऐवजी स्वयंघोषित गोरक्षकांनी उच्छाद मांडलाय. कायदा हातात घेऊन संबधितांना शिक्षा देण्याचे काम तेच करतात. आता तर माणसे ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय.
गोमांस भक्षणामुळे कर्करोगापासून अनेक गंभीर आजार होतात, त्यातून प्रचंड उष्णता वाढते आणि पोटाशी संबंधित सर्व व्याधी तत्काळ सुरू होतात असे जगभरातील अनेक नामवंत वैद्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या माहितीचा प्रचार व्हायला हवा. कत्तलखान्यांना दुषणे देताना तेथून गोमांस विकत घेणार्‍यांचे प्रबोधन करणे जास्त महत्त्वाचे आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने त्यांची दुकानदारी सुरू असेल तर तो दोष कुणाचा? इतर काही राष्ट्रात गोमांस हे सररासपणे विक्रीस उपलब्ध असते. त्यांच्याकडे ते विकण्याची किंवा विकत घेऊन खाण्याची बंदी नाही. उलट गायी, बैलं यांचे संगोपण त्या हेतूनेच केले जाते. त्या त्या भौगोलिक परिसरानुसात तिथला आहार असतो. त्यामुळे ज्याला वाटते त्यांनी खावे, ज्यांना नको वाटते त्यांनी खाऊ नये इतका साधा नियम पाळला तर अनेक प्रश्‍न सहज सुटण्यास मदत होईल.
कोंबड्या, बकर्‍या, मासे हादडणारे गोमांस खाऊ नका म्हणून वाद घालतात. कोणतीही हत्या ही वाईटच हे एकदा ठरवले तर मग असे विभाजन कसे करता येईल? ही विसंगती आहे! एक तर  मांसाहार पूर्ण वर्ज्य करा, शाकाहाराची चळवळ राबवा आणि कोणत्याही हत्येचा निषेधच करा! गाय मारू नका म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे माणसे कशी मारू धजावतात? त्याचाही तीव्र निषेधच व्हायला हवा आणि प्रगल्भ लोकशाहीत तो होताना दितस नाही, ही खरी चिंतेची बाब आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

2 comments:

  1. लेख सुंदर आहे, तथाकथित गोरक्षकांना आवरलेच पाहिजे.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete