Saturday, February 25, 2017

ही राजभाषा असे!

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला यात दिवसेंदिवस प्रगती होत असताना आपण 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करतो. ज्यांनी मराठीला सौंदर्यपूर्ण साज चढवला अशा कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जयंतीदिन हा ‘भाषा दिन म्हणून साजरा करणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात आणि देशात नव्या पर्वाची नांदी लागलेली असताना, जातीय आणि प्रांतीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना आपल्यापुढे भाषेच्या संवर्धनाचे मोठे आव्हान आहे. एकीकडे मराठीत रोज उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित होत आहेत, नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, नाटकाचे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत आहेत, प्रवचन-कीर्तनासारख्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमतेय आणि दुसरीकडे ‘वाचक नाहीत’, ‘मुलं मराठी बोलत नाहीत’ अशा आवया दिल्या जात आहेत. शहरी भागातील एक ठराविक वर्ग सोडला तर अजूनही रोजच्या जीवनात मराठीचाच वापर केला जातो आणि संवादाचे प्रमुख माध्यम मराठीच आहे. तरीही मराठी ‘संपल्या’ची अफवा पसरविली जाते! यापुढे तो दखलपात्र गुन्हा ठरवायला हवा.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा ठेका आपणच घेतलाय, असा ‘समज’ असणारे काही राजकीय पक्ष, साहित्य संस्था, ठराविक साहित्यिक आणि मुख्यत्वे मराठीतील प्राध्यापक मंडळी, नियतकालिके यांनी मराठीचे वाटोळे करण्यात मोठा हातभार लावलाय. काही अपवाद वगळता, आजच्या मराठीच्या प्राध्यापकांचे वाचन पाहता या परिस्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही अनेकदा कोणी ना कोणी मराठीचे प्राध्यापकच असतात. वर्षानुवर्षे साहित्यिक निष्ठेने विविध संमेलनाला हजेरी लावणारा रसिक, संपूर्ण हयात मराठी भाषेचे अध्यापन करणारा  एखादा तत्त्वनिष्ठ शिक्षक, कीर्तनाच्या माध्यमातून रंजन आणि प्रबोधन करणारा एखादा कीर्तनकार, ‘लावणी’सारख्या माध्यमातूनही मराठी भाषा जिवंत ठेवण्यास हातभार लावणारी एखादी कलावंत, दुर्गम भागात वाचनसंस्कृती टिकून रहावी यासाठी अहोरात्र कार्यरत असलेला ग्रंथालय चळवळीतील एखादा कार्यकर्ता, किंबहुना उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारा कुणी प्रकाशक किंवा कष्टपूर्वक ती सर्वत्र वितरित करणारा विक्रेता यांच्यापैकी किंवा अशांपैकी कोणी एखादा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला काय हरकत आहे? यांनीही मराठी भाषा जिवंत ठेवण्यात मोठे योगदान दिलेच आहे की! प्राध्यापकीय वर्तुळात अडकलेला साहित्याचा हा केंद्रबिंदू इकडे वळला तर आपली भाषा अजून सशक्त होऊ शकते.
‘चांगले ते स्वीकारायचे’ आणि ‘वाईट ते अव्हेरायचे’ ही आपली वृत्ती असायला हवी. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात इतर भाषेतले अनेक शब्द मायमराठीने स्वीकारले आहेत. त्यावरून वादंग घालण्याऐवजी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मराठीतच बोलणे, मराठीतच लिहिणे याला आपण प्राधान्य द्यायला हवे. अनेकजण आपली ‘सही’ सुद्धा मराठीत करत नाहीत. बहुभाषिकता ही काळाची गरज आहे. इतर भाषांचा मुळीच द्वेष करू नये; मात्र आपली भाषा आणखी समृद्ध व्हावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी नाही का?
प्रकाशक या नात्याने मी भाषेबाबत आग्रही असतो. आमच्याकडे अनेक लेखक त्यांची संहिता पाठवतात. त्यात हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषेतील अनेक शब्दांचा भडिमार असतो. ती संहिता मी हमखास नाकारतो. एका विख्यात लेखकाने त्यावरून माझ्याशी वाद घातला. ते म्हणाले, ‘‘मी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकात सातत्याने लिहितो. आजवर मला कोणीही भाषेवरून कधी बोलले नाही. काही नामवंतांचे विचार ‘कोट’ करायचे असतील तर इंग्रजीला पर्याय नाही...’’
बराच वेळ समजावून सांगूनही त्यांना त्याचे महत्त्व पटत नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणालो, ‘‘ठीक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या एखाद्या वृत्तपत्रात तुम्ही तुमचा लेख छापून आणा आणि त्यात मध्ये मध्ये मराठी शब्द पेरा...’’
ते म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? ते असे काही छापणार नाहीत...’’
‘‘मग मराठी नियतकालिकांनी तुमच्या लेखनातील इंग्रजी शब्द, वाक्यं आणि काहीवेळा उतारेच्या उतारे का छापावेत?’’
त्यावर ते निरूत्तर झाले.
आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती याच्या जतन आणि संवर्धनासाठी आपणच तर पुढाकार घ्यायला हवा. बरं, इंग्रजी वापरण्याच्या दुराग्रहापोटी आपण अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थही पडताळून पाहत नाही. उदारहरणच घ्यायचे झाले तर ‘मिसेस’ या शब्दाचे घेऊया! ‘बायको’साठी मिसेस हा शब्द आपल्याकडे सर्रासपणे वापरला जातो. ‘ऑक्सफर्ड’ हा जगन्मान्य शब्दकोश आहे. यात ‘मिसेस’चा अर्थ काय दिलाय ते पहा! मूळ शब्द ‘मिस्ट्रेस!’ त्याचा अपभ्रंश झालाय ‘मिसेस.’ मराठीतला अर्थ काय दिलाय माहीत आहे का? तो आहे - रखेल, अंगवस्त्र किंवा लग्न न करता ठेवलेली बाई!
हे असे का झाले? कारण त्यावेळी इंग्रजांचे जगावर राज्य होते. इतर देशात राज्य करताना त्यांच्या लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी ज्या बायका ठेवायचे त्यांना ते ‘मिसेस’ म्हणायचे. लग्नाच्या बायकोसाठी इंग्रजीतला योग्य शब्द आहे ‘वाईफ.’ आपल्याकडे मराठीत बायको, अर्धांगिनी, भार्या, पत्नी, खटलं, बायडी असे कितीतरी शब्द असताना आपण अभिमानाने सांगतो की, ‘ही माझी मिसेस...’ त्यांना काय बोलावे?
मराठीला दुसरा रोग लागलाय द्विरूक्तीचा. त्यातही अनेकवेळा इंग्रजी शब्दांचा आधार घेतला जातो, काहीवेळा मराठीतही द्विरूक्ती होते. उदहारणार्थ - गाईचे गोमूत्र! आता गोमूत्र काय बैलाचे असणार का?, महिला लेखिका, महिला नगरसेविका असे शब्दही सध्या सर्रासपणे वापरले जातात. ‘लेखिका’ म्हटल्यावर ती ‘महिला‘ आहे हे सांगणे किती हास्यास्पद! पिवळं पितांबर, गोल सर्कल, लेडिज बायका, चुकीची मिस्टेक झाली असेही शब्द आणि वाक्य ऐकायला मिळतात. पाठिमागचे ‘बॅकग्राऊंड’ किंवा ‘सरकारी जी. आर.’ असे शब्दही प्रचलीत होत आहेत. माझा एक मित्र सांगतो, ‘‘मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो...’’ त्याला म्हणालो, ‘‘आम्ही रात्री मॉर्निंग वॉक करतो.’’ आणखी एक मित्र नेहमी सांगतो, ‘‘काल रात्री माझी नाईट होती...’’ आता यांच्याकडे ‘दिवसा’ही ‘नाईट’ असेल बहुतेक! अशा कितीतरी शब्दांनी आपण आपल्या भाषेच्या हत्येचे सत्र सुरू ठेवले आहे.
मध्यंतरी एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा मला दूरध्वनी आला. तो म्हणाला, ‘‘दादा, मी तुमचे लेखन नियमित वाचतो. तुम्ही खोटे लिहिणार नाही, याची मला खात्री आहे; पण शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचा खरंच ‘मर्डर’ केलाय का हो? हे तुम्ही ठामपणे लिहिलेय म्हणजे तुमच्याकडे काहीतरी पुरावा नक्की असेल...’’ क्षणभर मला घामच फुटला. सध्या माझ्या लेखनात सोयीस्कर फेरफार करून किंवा काहीवेळा चक्क माझे नाव टाकूनही त्यांना हवा असणारा मजकूर समाजमाध्यमातून फिरवला जातो. मला वाटले कोणीतरी आगाऊपणा केलेला दिसतोय. त्यामुळे त्याला मी शांतपणे संदर्भ विचारले. तो म्हणाला, ‘‘या अमुक अमुक लेखात तुम्ही लिहिलंय की, शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसला...’’ मग तो ‘पॉलिटिकल मर्डर’ होता हे त्याला इंग्रजीत सांगेपर्यंत कळले नाही... विशिष्ट वर्गातले हे चित्र नक्कीच दुर्देवी आहे.
मध्यंतरी एक वाक्य वाचण्यात आलं होतं. ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा, मी तुम्हाला ‘ममी’ म्हणणारे हजारो हिंदुस्थानी दाखवेन!’ किती खरे आहे हे! विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या आहारी जाऊन आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत होत चालल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केलं तरी आपण सुधरायला तयार नाही.
मराठीला इंग्रजीचा जितका धोका आहे तितकाच, नव्हे त्याहून अधिक धोका ‘हिंदी’चा आहे. हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे या अज्ञानातून आणि भ्रमातून आपण बाहेर पडायला तयार नाही. आपल्या राज्यघटनेत भारताला राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केवळ ‘संपर्क भाषा’ आहे. ‘संस्कृत’ ही राष्ट्रभाषा व्हावी असा अनेकांचा आग्रह असताना पंडित नेहरू यांनी त्याला विरोध केला आणि हिंदीचा हट्ट धरला. ‘उत्तर प्रदेशपेक्षा कोणतेही राज्य मोठे नसावे आणि हिंदी सर्वांवर लादली जावी’ असे त्यांचे मत होते. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. त्या वादात भारताला कोणतीही ‘राष्ट्रभाषा’ नाही हे सत्यच आपण विसरलो. म्हणूनच अनेक हिंदी शब्द आपल्याकडे सर्रासपणे वापरले जातात. बरं, हिंदी चित्रपटातून दाखवले जाते तेही अस्खलित हिंदी नसते. ज्याला हिंदीचे उमाळे दाटून येतात त्याने आपल्या प्रशासकीय कामकाजातील हिंदी वाचावी आणि त्याचे अर्थ लावावेत. एकेकाची भंबेरीच उडेल.
मराठी भाषा दिन हा एका दिवसापुरता ‘साजरा’ होऊ नये! आपण आपले मराठीपण रोज जगायला हवे. तसे वागायला हवे. भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर आपले राष्ट्र पुन्हा बेचिराख होईल. भाषा शुद्धिकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्यासाठी आपण आता पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने किमान मराठीत बोलणे सुरू केले तरी खूप फरक पडेल. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ आपली मातृभाषा आहे. ही राजभाषा आहे. आपण आता सजगपणे हालचाल केली नाही तर आपल्याच मातृभाषेचा खून आपणच केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे. मराठी माणूस इतका अविवेकी आणि कृतघ्न नक्कीच नाही. आपण सर्वांनी म्हणूनच मराठीतच बोलावे, मराठीतच लिहावे, मराठी वाचावे, मराठीतच व्यक्त व्हावे या शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

2 comments:

  1. नमस्कार घनश्याम सर,
    तुमचा हा लेख म्हणजे मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणाराच आहे । मी तुमच्या ह्या लेखातील मताशी शतप्रतिशत सहमत आहे । आपण सुचविलेल्या सुचनांवर माझ्या कुवतीने मार्गक्रमण करण्याचा संकल्प सोडतो आहे

    ReplyDelete
  2. मार्मिक विवेचन करणारा लेख.
    थारोळं हे विहरी जवळ असायचं. त्यातून पाणी शेतात जावून शेत फुलायचं. थारोळं कालौघात लोप पावलं मात्र आता रक्ताचं थोरोळं हा संदर्भ रुजलाय.

    ReplyDelete