Saturday, July 9, 2016

फुटू द्या धुमारे साहित्याचे...

लग्नाच्या गाठी या स्वर्गातचं जुळलेल्या असतात, असे म्हणतात. स्वर्ग-नरक या कल्पना आपण काही काळासाठी बाजूला ठेवू. मात्र यावर आमचे संमित्र समीर नेर्लेकर म्हणतात,लग्नाच्या गाठी जर स्वर्गात जुळत असतील तर तिथल्या काराभारात काहीतरी गोंधळ आहे. नाहीतर इतकी लग्ने तुटलीच नसती.’
 या विषयावर डोक्याचा
केमिकल लोचा’ करून घेण्याऐवजी काहीतरी मार्ग काढता येईल  का? हे पाहणे समाजातील धुरीणांचे काम आहे. पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक तीन-चार महिन्यांपूर्वी पार पडली. लेखणी आणि वाणीवर प्रभूत्व असणारे प्रा. मिलिंद जोशी हे या निवडणुकीत मोठ्या मतांनी निवडून आले. त्यांच्या परिवर्तन आघाडीने दणदणीत विजय मिळवला. साहित्य संस्था समाजाभिमुख व्हाव्यात’ हे ठासून मांडतानाच जोशी यांनी समाजही साहित्याभिमुख व्हावा’ अशी भूमिका घेतली होती. समाजातील साहित्य संस्थाही बदलल्यात आणि समाजही बदलतोय. महाराष्ट्र साहित्य परिषदेने विवाह प्रश्‍नी लक्ष घालावे’ अशी मागणी एका विवाह मंडळाने परिषदेकडे केली आहे. याविषयी त्यांनी लग्न हा सध्या समाजातील महत्त्वाचा प्रश्‍न झाला आहे. अपेक्षा, मुलामुलींचे व्यस्त प्रमाण यामुळे लग्न जमवताना प्रचंड अडचणी येत आहेत. साहित्य हे समाजाचा आरसा मानले जाते. त्यामुळे समाजातील विवाह या महत्त्वाच्या प्रश्‍नासाठी आता साहित्य संस्थांनीच पुढाकार घेतला पाहिजे’ अशी मागणी त्यांनी चक्क पत्र लिहून केली आहे. हे पत्र मसापच्या दप्तरी दाखल करण्यात आले असून त्याला काहीच उत्तर देण्यात आलेले नाही, असे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी सांगितलेय.
परिषदेत परिवर्तन घडल्यानंतर ही मंडळी काहीतरी विधायक आणि रचनात्मक काम उभे करतील अशी अपेक्षा होती. ती बर्‍यापैकी पूर्णत्वासही येत आहे. परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह आमूलाग्र बदललेले आहे. येथील साहित्यिकांच्या फोटोंवरील धूळ झटकण्याचे कामही वर्षानुवर्षे होत नव्हते. एखादी आई आपल्या बाळाला घेऊन या सभागृहात आली तर मध्यरात्री ते बाळ झोपेतून घाबरून उठावे असा सारा मामला. 1990 च्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनीही जाहीरपणे सांगितले होते की,
जी काही मदत लागेल ती घ्या. मात्र या इमारतीचे सुशोभिकरण करा.’ तरीही केवळ इच्छाशक्ती अभावी ही सूचना कोणी गंभीरपणे घेतली नाही. प्रा. मिलिंद जोशी परिषदेच्या इतिहासातील सर्वात तरूण कार्याध्यक्ष आहेत. उत्तम जनसंपर्क असणारे प्रकाश पायगुडे हे प्रमुख कार्यवाह म्हणून तर अल्पावधीत प्रकाशन क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या आमच्या मायीराजे म्हणजेच सुनीताराजे पवार कोषाध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबतीला आहेत. ऍड. प्रमोद आडकर वास्तू देखभाल आणि अतिथी निवास व्यवस्था विभागाचे कार्यवाह आहेत. या सर्वांनी साहित्य परिषदेच्या वास्तूचे रूप पालटले आहे. आईसोबत आलेल्या तान्हुल्याची भीती नाहीशी व्हावी इतपत काम या मंडळींनी केले असले तरी त्या आईच्या मनात साहित्याविषयी असलेला गोडवा आणखी वृद्धिंगत व्हावा यासाठी काम करणे हे या चमूंचे प्रमुख कर्तव्य आहे. अनेक उमलते अंकूर या इमारतीत उमलण्याआधीच खुडून टाकण्यात आलेत. डॉ. ग. ना. जोगळेकर, डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. द. मा. मिरासदार डॉ. प्र. चिं. शेजवलकर अशा मान्यवरांनी परिषदेचे नेतृत्व केले आहे. प्रा. मिलिंद जोशी कर्णधार असलेल्या सध्याच्या कार्यकारणीत डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासारखा विचारवंत अध्यक्ष आहे. डॉ. तारा भवाळकर, निर्मला ठोकळ, चंद्रकांत शेवाळे असे उपाध्यक्ष तर डॉ. शिवाजीराव कदम, उल्हासराव पवार, यशवंतराव गडाख यांच्यासारखे विश्‍वस्त परिषदेवर असल्याने परिषदेची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे.
मुळात महाराष्ट्र साहित्य परिषदेची सध्याची इमारत टिळक रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी आहे. जवळपास 110 वर्षे डौलात उभ्या असलेल्या या इमारतीवर अनेकांचा डोळा आहे. ही इमारत पाडून तेथे नव्याने सुसज्ज इमारत बांधावी इथपासून ते शहाराच्या जवळपास नव्या जागेत नवी इमारत उभारावी इथर्पंतच्या अनेक सूचना वेळोवेळी आल्या आहेत.
परंपरा’ हे कारण देत या वास्तूत कोणतेही बदल करण्यास अनेक सभासदांचे आक्षेप आहेत; तर काळाबरोबर चालताना नवे बदल स्वीकारायला हवेत अशी भूमिकाही काहीजण घेतात.
तरूणांनी साहित्य परिषद आणि त्या अनुषंगाने विविध उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी नवे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या
साहित्यसेतू’ या संस्थेच्या माध्यमातून तरूणाईला परिषदेशी जोडून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संकेतस्थळ, फेसबुक, ट्वीटर, ब्लॉग आणि यू ट्युब चॅनेल अशा समाजमाध्यमांद्वारे परिषद प्रथमच काळाबरोबर चालतेय. वाचक आणि लेखकांची ऑनलाईन नोंदणी परिषदेने त्यांच्या संकेतस्थळावर सुरू केली आहे. त्यामुळे सभासदांची, लेखक-वाचकांची माहिती सर्वांनाच उपलब्ध हाईल. वाचक आणि लेखक यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टिने हे पाऊल स्वागतार्ह आहे.विविध महाविद्यालयातील वाड्मयीन मंडळे साहित्य परिषदेला जोडून घेणार’ हे निवडणुकीच्या प्रचारात प्रा. मिलिंद जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या विश्‍वासाने सगळ्यांना सांगितले. त्यांच्या जाहीरनाम्यातही तरूणाईच्या मु्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. परिषदेत सक्रिय होताच या नव्या कारभार्‍यांनी अनेक नव्या उपक्रमांचा धडाका लावला आहे. (खरेतर यात नवे कुणीही नाहीत. प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनीताराजे पवार हे तिघेही पूर्वीच्या कार्यकारणीत होते. बदल फक्त नेतृत्वात झालाय) कॉफीक्लब’सारखे अनेक बंद पडलेले चांगले उपक्रम नव्याने मसाप गप्पा’सारख्या कार्यक्रमांद्वारे सुरू करण्यात आले आहेत.
हे सर्व पाहता एखाद्या विवाह मंडळाला परिषदेच्या सभागृहात अक्षदा उधळाव्याशा वाटल्या आणि एखाद्या वधूपित्याला याच वास्तूत कन्यादान करावेसे वाटले तर त्यात आश्‍चर्य ते काय? एकेकाळी कवी मन्मथ बेलूरे यांच्या ढोलकीवर मधू कांबीकर यांच्यासारख्या विख्यात नृत्यांगिणीने परिषदेच्या व्यासपीठावर नृत्य केलेच होते. या घटनेचे आम्ही साक्षीदार असल्याने परिषदेने विवाह जमविण्यात पुढाकार घेतल्यास आश्‍चर्य वाटू नये. तरूणांचे संघटन करतानाच त्यांच्या संसाराची अन् पर्यायाने कुटुंबाची चिंता वाहणे हे परिषदेचे कर्तव्यच असावे असा विचार संबंधितांनी पत्र लिहिताना केला असावा. यातून सामान्य माणसाचा साहित्य परिषदेवर आणि नव्या पदाधिकार्‍यांवर असलेला विश्‍वासच दिसून येतो.
अनेक नवकवी आणि कवयित्री सातत्याने एका व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात गुलाबी संबंध प्रस्थापित होऊन ते यशस्वीरित्या पूर्णत्वास गेले तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही. बाई आणि बाटलीच्या मागे असलेल्या तथाकथित सारस्वतांची लफडी सर्वश्रूत आहेतच. म्हणूनच हे क्षेत्र जितके बदनाम झाले त्याहून आजच्या पिढीला ते अधिक किळसवाणे वाटते. एखाद्या वधू-वर सूचक मंडळाच्या कार्यालयात जेवढी गर्दी असते त्याच्या काही अंशीही उपस्थिती साहित्य संस्थांत आणि त्यांच्या उपक्रमांत नसते. तरूणाईच्या
सर्व प्रकारच्या’ गरजा लक्षात घेणे दूरच; मात्र त्यांच्यात साहित्यिक अभिरूची निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीला हातभार लागावा, त्यातील लिहित्या हातांना बळ देऊन त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, त्याच त्या लेखक, कवी-कवयित्रींचा  रतीब घालण्याऐवजी समाजातील नव्याने फुटणार्‍या धुमार्‍यांची दखल घ्यावी असे काही केले तरी पुरेसे!
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. मायबोली आणि मायभूमीविषयी वाटणारी आदराची भावना परिषदेसारख्या संस्थांविषयी निर्माण व्हावी. यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असलेला खमक्या नेता या संस्थेला लाभलाय.
येथील राजकारण दूर करू’ असे ते सातत्याने सांगतात. खरेतर कोणत्याही संस्थेतील राजकारण कधीही दूर होत नसते. फारतर तेथील गलिच्छ राजकारण त्यांना टाळता येईल. त्यांनी इतके जरी केले तरी भविष्यात साहित्य परिषदेसारख्या संस्थांविषयी आणि पर्यायाने मायमराठीविषयी नव्या पिढीच्या मनात आत्मियता निर्माण होईल. 
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

4 comments: