Friday, May 22, 2020

दरवळ वाचकांना सुगंधित करणारा


माझ्या ‘दरवळ’ या नव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी प्रस्तावना लिहिलीय. अवश्य वाचा. घरकोंडी संपल्यानंतर हे पुस्तक लगेचच हातात येत आहे. या पुस्तकाची पूर्वनोंदणी नक्की करा. या प्रस्तावनेसोबतच सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांनी केलेली पाठराखणही जोडतो आहे. 
- घनश्याम पाटील 

संवाद म्हणजे माणसाच्या रंगहीन व्यक्तिमत्त्वाला सुगंध देणारी सामाजिक देणगी आहे किंवा दुसर्‍या शब्दात बोलायचे झाले तर साद नसलेल्या माणसाच्या जीवनाला मिळालेला तो दागिना आहे, नव्हे ती देणगी आहे. ही देणगीही पुन्हा सप्तसुरांची असते. तृप्त करणारी असते. माणसाचं अस्तित्व, माणसाचं व्यक्तित्व, माणसाचं कर्तृत्व आणि माणसाचं वक्तृत्व संवादातून सिद्ध होते. संवादामध्ये समाजाच्या हृदयाला स्पर्श करता येतो. माणसं जोडणं किंवा माणसं ‘तोडणं’ हे केवळ संवादच करू शकतात. मग तो संवाद पुस्तकाच्या माध्यमातून झालेला असो किंवा दुसर्‍या एखाद्या कलेच्या द्वारे झालेला असो. त्यातही लेखक आणि वाचक हे एकाच पातळीवर येणे रसास्वादाच्या दृष्टिने आवश्यक असते. आपण त्या लेखकाचा ग्रंथ वाचत नसून त्याच्याशी आपण संवाद साधतो आहोत याचा एक अनामिक आनंद वाचकाला त्यातून लाभत असतो. त्यातही एखादा लेखक एकाचवेळी पत्रकार, संपादक, प्रकाशक असेल तर त्या दोहोंच्या संवादात अंतराय निर्माण होण्याची शक्यता असते. या दोघांमध्ये एक अदृश्य स्वरुपाची भिंत निर्माण झालेली असते. जागतिक राजकारणाचा सखोल आणि सर्वांगीण अभ्यास असलेल्या एखाद्या संपादकाने लिहिलेला व्यासंगपूर्ण लेख सर्वसामान्य वाचकांशी संवाद साधेलच असे नाही आणि तो संवाद त्याच्या रक्तामध्ये एकरूप होईल याविषयी देखील शंका वाटते. या पार्श्वभूमीवर श्री. घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा ग्रंथ वाचकाच्या डोक्यावरून न जाता अंत:करणात झिरपतो आणि झिरपता झिरपता तो वाचकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक बनतो हे विशेष म्हणावे लागेल. संवाद हा घटक वाचक आणि लेखक यांना जोडणारा, फुलांनी माखलेला आनंदमार्ग आहे असे मला मनापासून वाटते.

हा संवाद साधणारा ग्रंथ आणखी एका कारणाने वाचकांशी मैत्री करतो. ते कारण म्हणजे वाचकांबरोबर लेखकाने केलेला संवाद हा खाजगी स्वरूपाचा नाही अथवा कौटुंबिक अडीअडचणी सांगणारा नाही. ‘साहेबानं आज माझी चांगलीच खरडपट्टी केली’, ‘अंगणात वाळत घातलेला माझा टॉवेल कोणीतरी चोरून नेला’, ‘नव्या सेवेमुळे मिळणारे पैसे बायकोला मंगळसूत्रासाठी द्यावे लागतील’,  ‘नव्या फॅशनचे मंगळसूत्र मला द्या’ असा तिचा रोज धोशा असतो, ‘आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी काल तिने मला गार चहाच दिला’, ‘एका विवाहसोहळ्यामध्ये वेड्यासारखं जेवल्यामुळे दोन दिवस झाले पोटदुखीचा त्रास सुरु झाला’ अशाप्रकारचे तात्कालिक, निरर्थक संवाद या संग्रहात नाहीत. असले संवाद म्हणजे ईश्वराने दिलेल्या आयुष्यातील एक दिवस वाया घालवण्यासारखा असतो. याउलट या ग्रंथात समाजजीवनाला शुद्ध आणि श्रीमंत करणार्‍या गोष्टींवर विवेचन आहे. इथे सामाजिक दोषांवर भाष्य आहे. मूल्यांच्या झालेल्या पडझडीवर विवेचन आहे. चंगळवादाची शिकार बनलेल्या दिशाहीन समाजजीवनाचे दर्शन घडविले आहे. समाजात परंपरेने चालत आलेल्या आणि नव्याने निर्माण झालेल्या प्रथापरंपरांवर भाष्य आहे. 

समाजजीवनावर होणारे अत्याचार आणि तिची गुलामगिरी येथे लेखकाने पोटतिडकीने सांगितली आहे. आजच्या साहित्य व्यवहारातील गुण-अवगुण यांचा स्वानुभव त्यांनी सांगितला आहे. जाती-पातीचा राजकीय सत्तेसाठी केला जाणारा गैरवापर आणि आजच्या राजकारणाला आलेले स्वार्थी आणि विकृत स्वरूप आणि महापुरुषांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन अशा जिव्हाळ्याच्या सार्वत्रिक बाबींबर लेखकाने संवाद साधलेला आहे. त्यामुळे हा संवाद एकाचवेळी तीन गोष्टी सांगतो. तो तुम्हाला माहिती सांगतो. तो तुमच्या ज्ञानात भर घालतो आणि तो तुम्हाला जगण्यासाठी लागणारे शहाणपणही देतो.  शहाणपण तुम्हाला जीवनातल्या अनुभवातून मिळते. रक्ताळलेल्या पावलांनी काटेरी वाटेवरून केलेल्या प्रवासातूनही मिळते.  संवादातून साधलेला हा आणखी एक फायदा म्हणावा लागेल.

या लेखकाने वाचकांशी केलेला हा संवाद आणखी एका गोष्टीतून अधिक प्रभावी नि परिणामकारक वाटला. ती गोष्ट म्हणजे लेखकाने स्वत:ची सांगितलेली जीवन-कहाणी. ज्याच्या घरात दारिद्य्राची श्रीमंती ओसंडून वाहते आहे,  ज्याच्याकडे पोट भरायला उपयोगी नसलेली जिराईत जमीन आहे, ज्यांचा भूतकाळ काळोखात लपलेला, ज्यांचा वर्तमान हा वंचना, विवेचना आणि भडकलेल्या भुकेने धगधगणारा आणि ज्याच्या माथ्यावर जन्मापासून मृत्युपर्यंत कर्जाने सोबत केलेली अशा घरातील मुलगा शाळा नावाच्या नक्षत्राकडे झेपावतो  ही खरोखर तशी अपवादात्मक गोष्ट आहे. हे शिक्षण घेतानासुद्धा त्याने म्हणजे घनश्याम पाटलांनी कष्ट केले; तेही अपवादात्मक म्हणावे लागतील. शाळेला जाता-येता त्यांनी आठ-दहा किलोमीटरची पायपीट केलेली आहे. पुढे शिक्षणासाठी त्यांनी वृत्तपत्रे वाटपाचे काम केले आहे. पुण्यात येऊन ‘संध्या’ दैनिकात अग्रलेख लिहिले. पडेल ती कामे केली. त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे वाद-विवादही झाले आणि अशा अवस्थेत पायांना भूमीचा आधार आणि वरती आभाळाचे छत्र एवढ्या दोनच गोष्टी हक्काच्या असताना वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी संपादक, मालक, मुद्रक नि प्रकाशक म्हणून पुण्यामध्ये प्रारंभ केला, हे क्षणभर अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

जिद्द, ध्यास आणि परिश्रम या तीन गोष्टींचा सुरेख आविष्कार म्हणजे त्यांचे ‘चपराक’ म्हणावे लागेल. संकटे माणसाला मोठी करतात. दारिद्य्र माणसाला लढण्याची प्रेरणा देते आणि परिश्रम माणसासमोर यशोमंदिर उभे करते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेड्यातील मुलांना ऊर्जा देणारे हे आत्मकथन आहे. या आत्मकथनातील संवादामुळे या ग्रंथाला अधिकच गोडी निर्माण झालेली आहे. या त्यांच्या लेखांमध्ये चिंतन आहे. अनुभवकथन आहे. समाज-निरीक्षण आहे. समाजाच्या विकृतीकरणाचे चित्रण आहे आणि समाजशिक्षणाची भूमिकाही एकरूप झालेली आहे. आजच्या दिशाहीन आणि गोंधळलेल्या समाजाचे समग्र दर्शन या ग्रंथातील अनेक लेखांतून आपणाला घडते. त्यातील काही बाबींचा थोडासा विस्ताराने परिचय व्हावा असे वाटते, म्हणून हे विवेचन.

काही अपवाद सोडले तर जवळजवळ सार्‍याच लेखांचा प्राणभूत घटक आहे परिपूर्ण आणि कृतार्थ जीवनाचा ध्यास! ही कृतार्थता व परिपूर्णता कशी प्राप्त होते त्याचेही लेखकाने विवेचन केलेले आहे. पाश्चात्य जीवनशैलीचे आंधळे अनुकरण आणि शरीरालाच सर्वस्व मानणारी चंगळवादी मनोवृत्ती यांचा समाजाने केलेला तृप्त अनुभव म्हणजे परिपूर्ण जीवन अशी धारणा झालेली आहे. पाश्चात्य जीवनशैली भौतिक सुखाला सर्वसुख मानते. आपली जीवनशैली या भौतिक सुखाला सात्त्विक वा आध्यात्मिक अधिष्ठान द्यायला सांगते. पाश्चात्य जीवनशैली शरीरसुखाला सर्वस्व मानते तर आपली जीवनशैली इंद्रियावर अंकुश ठेवायला सांगते. पाश्‍चात्य जीवनशैली देहसमाधानावर उभी आहे तर आपली जीवनशैली आत्मिक आनंदावर उभी आहे. पाश्चात्य जीवनशैली फक्त उद्याचा विचार करते तर आपली जीवनशैली युगाचा विचार करते. आपली जीवनपद्धती निसर्गाला चैतन्याचे प्रतीक मानते, तिची पूजा करते तर पाश्चात्य संस्कृती निसर्गाला स्वसुखाचे साधन मानते. पैसा टाकला की ती गोष्ट मिळते यावर पाश्चात्य जीवनशैली उभी आहे. आपली जीवनशैली नात्यांच्या रेशमी धाग्यांनी बांधलेली आहे. चौदा-सोळा वर्षे वयाच्या मुली, ज्यांचा ओठ पिळल्यावर दूध निघेल अशा मुली 50 हजारापासून विकल्या गेल्या अशी गेल्याच आठवड्यात बातमी आलेली होती. आंधळेपणा आणि प्रगतीची खोटी धारणा यामुळे इथला आमचा समाज, भौतिक सुखाने ‘सजला’ असला तरी आतून तो कुजत चालला आहे. 

जगणे म्हणजे सोन्याच्या ताटात अमृताचा घास खाणे नव्हे. अंगावर दहा पंधरा किलो सोने घालणे म्हणजे कृतार्थ जीवन नव्हे किंवा दोन कोटींच्या गाडीतून भटकणे म्हणजे कृतार्थ जीवन नव्हे. किंवा चार-सहा बेडरूमचा महाल असणे म्हणजे परिपूर्ण नि कृतार्थ जीवन नव्हे. ज्याचा श्वास दुसर्‍या गरिबांसाठी अस्वस्थ होतो, ज्याचा घास भुकेल्या जिवाच्या मुखात जातो, ज्याचे वस्त्र, वस्त्र नसलेल्या अनाथाच्या शरीरावर पांघरले जाते, ज्याचा ध्यास सत्तेपेक्षा सेवेकडे अधिक झुकलेला आहे अशा उपेक्षितांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणारा माणूस हा परिपूर्ण जीवन जगतो, कृतार्थ जीवन जगत असतो. यासाठीच श्रीमान पु. ल. देशपांडे यांनी एक मार्मिक विधान केलेलं आहे. ते म्हणतात, ‘‘फ्रेंच संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे, तर आपली संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे.’’

स्वत: घनश्याम पाटलांनासुद्धा चिरंतन मूल्यांची होणारी उपेक्षा, जगण्याची हरवलेली दिशा, जीवनध्येयाचा एक असणारा निश्चित दृष्टिकोन, स्त्रीविषयक असणारी पारंपरिक जुनाट कल्पना, देशभक्तीचे बदललेले स्वरूप, समाजात जातीयतेचा केला जाणारा स्वार्थी वापर अशा बर्‍याच जिव्हाळ्याच्या विषयांवर त्यांनी वाचकांशी संवाद साधलेला आहे. राजकारणामधील तर सारी ‘आधुनिक’ सामर्थ्ये त्यांनी सोदाहरण सांगितली आहेत. आजचा राजकारणी पूर्वीच्या तत्त्वनिष्ठ राष्ट्रभक्ताच्या सावलीजवळही उभा राहू शकणार नाही असे मला वाटते. या अशा लहान-मोठ्या जीवनाला गिळून टाकणार्‍या किंवा नासवून टाकणार्‍या गोष्टींचा नि:पात कसा करायचा हा आजचा खरा प्रश्न आहे.

या निमित्ताने वरून ‘सुरूप’ असलेल्या पण आतून ‘कुरूप’ असणार्‍या समाजाच्या काही अपप्रवृत्ती मला सांगाव्याशा वाटतात. आपला समाज कितीही शिकला आणि सुधारला तरी त्याच्या अस्तित्वाला दंश करणार्‍या पाच गोष्टी आजही कमी झालेल्या नाहीत. या पाच गोष्टी म्हणजे 1) अहंकार, 2) अनाचार, 3) अत्याचार, 4) भ्रष्टाचार आणि पाचवी गोष्ट म्हणजे स्वार्थाचार! भ्रष्टाचार आणि स्वार्थाचार यात मी फरक करतो. एखाद्या शेतकर्‍याकडून सातबाराचा उतारा घेण्यासाठी जेव्हा एखादा तलाठी पाच-पन्नास रुपये घेतो तो स्वार्थाचार झाला पण एखाद्या बँकेला खोट्या कागदपत्रांधारे अधिकारी आणि राजकारणी-व्यापारी-उद्योजक चार-दोन हजार कोटींना फसवितात त्याला भ्रष्टाचार म्हणावा लागेल. हा भ्रष्टाचार अगदी महाभारतापासून चालत आलेला आहे. या पाच अवगुणांपोटी अहंकार सज्जन माणसालाही शूद्र समजतो. स्वत:ला समाजाचा नायक समजतो. अनाचार मानवी मूल्यांचे अपहरण करतो. अत्याचार शरीराला तृप्त करण्यासाठी धडपडतो. भ्रष्टाचार सुखोपभोगाला स्वामी बनण्यासाठी धडपडतो आणि स्वार्थाचार कष्टाविना पैसा मिळविण्यासाठी वापरला जातो. या पाच गोष्टी माणसाला तृप्त आणि मनपसंत आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आहेत अशी सामान्य माणसाची धारणा झालेली आहे आणि चंगळवादामुळे ती जगण्याचा अपरिहार्य घटक झालेली आहे. आजकाल आत्मप्रेमामुळे स्वत:विषयीच्या कल्पनाही पार बदलून गेल्या आहेत. आश्रितांचे चार नमस्कार, लाचारांचे चार हार आणि देशाचे नेतृत्व करणारा कर्तबगार नेता असे मजकूर असलेले चार फोटो लावले की हा देशाचा नेता म्हणून मोकळा होतो. तुंबलेली गटारे याला स्वच्छ करून घेता येत नाहीत तरीही त्याला (ओठावर शिवी ठेवून) नमस्कार घालावा लागतो. सारांश असा की समाजाचा सर्वांगीण विकास करणारी कोणतीही गोष्ट न करता नेत्याला नमस्कार आणि कार्यकर्त्यांना नाश्ता दिला की याचे समाजकार्य पुरे होते.

वरती उल्लेख केलेले जे चार-पाच अवगुण (खरे तर त्या विकृतीच आहेत) त्यांचे व्यवहारातले दर्शन कसे घडते त्या सार्‍यांचा सोदाहरण आणि विस्तृत परिचय करून देण्याऐवजी या सार्‍या अवगुणांना एकच शब्द वापरतो तो म्हणजे ‘गुलाम’ हा! आपण सारे पैशाचे गुलाम झालो आहोत. आपण सत्ताधीशांचे गुलाम झालेलो आहोत. त्यांचे खोटे-नाटे व्यवहार करणार्‍या कार्यकर्त्यांचे गुलाम झालो आहोत. आपणाला आपले मतदान करताना गुलाम रहावे लागते. आपण रक्ताला चटावलेल्या इंद्रियांचे गुलाम झालो आहोत. दुष्काळ आणि महापूर यांच्या गुलामीचा तर अंदाजच येत नाही. सावकाराची गुलामगिरी तर संसार उद्ध्वस्त करणारी असते. आपण वेगाचे गुलाम झालो आहोत आणि ‘आपण गुलाम झालो आहोत’ ही भावनाही शेवटी आपल्याला गुलाम करीत असते. स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकांची आजची ही स्थिती आहे. घटनेने आपणाला स्वातंत्र्य दिलेले आहे. भोगासक्त वृत्तीने ते आपण टाकून दिलेले आहे.

श्री. घनश्याम पाटील यांनी काही लेखात जाती आणि धर्माविषयी अतिशय मर्मभेदक आणि तितकेच मार्मिक लेखन केलेले आहे. ते मला विशेष महत्त्वाचे वाटले. आजकाल तर धर्माने सत्तेला सल्ला देणे सुरु केले आहे. माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर निर्बंध घातले आहेत. परधर्मियांचा द्वेष हे राष्ट्रभक्तीचे लक्षण मानले जाते आहे. पारंपरिक, वर्णश्रेष्ठ समाजविघातक बाबींना प्रतिष्ठा मिळू लागली आहे. चारित्र्य आणि सद्गुणांवरून माणूस ओळखण्याऐवजी तो धर्मावरून ओळखला जातो आहे. वैदिक आचार-धर्माला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली आहे. आपापल्या जातीच्या संघटना करून राजकारण खेळले जात आहे. त्यातून जातीजातींमध्ये द्वेष निर्माण होऊ लागला आहे. धर्माचे हे विषद्ग्ध रूप विशद करताना स्वत: लेखकानेही एक-दोन ठिकाणी फार चांगली व्याख्या केलेली आहे. एका लेखात ते लिहितात, ‘दुर्बलांना निरपेक्ष भावनेने जो सबळ करतो, म्हणजे मदत करतो तो खरा धार्मिक होय’. दुसर्‍या एका लेखात ते विवेकानंदांचा दाखला देतात, ‘आत्मानुभूती व आत्मसाक्षात्कार म्हणजे धर्म!’ त्यापुढे ते लिहितात, ‘स्वत:च्या क्षमतांची ओळख होणे म्हणजे धर्म!’ पण ही गोष्ट आज दुर्मीळ झाली आहे. उलट अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या आणि अर्थशून्य असलेल्या कर्मकांडालाच आपला समाज धर्म मानतो आहे. खेड्यातील निरक्षर माणसांना धर्माचे हे ठेकेदार ‘हाच धर्म’ म्हणून या कर्मकांडातून श्रमाविना विलासी जीवन जगत आहेत. कर्मकांड वगळून जो शाश्वत विचार करतो तो खरा धर्म होय! पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की धर्मग्रंथांची अर्थशून्य पोपटपंची करणे म्हणजे धर्म नव्हे. मनामध्ये स्वार्थ, वासना आणि भोगलालसा ठेवून तीर्थस्थानी स्नान करून प्रदक्षिणा करणे म्हणजे धर्म नव्हे. ओठावर नामस्मरण आणि पोटामध्ये स्त्री-चिंतन असे दुटप्पी आचरण म्हणजे धर्म नव्हे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून हजार-पाचशे रुपयांची देणगी म्हणजे धर्म नव्हे. अंगावर भगवी वस्त्रे परिधान करून पंचेन्द्रीयांचे गुलाम होणे म्हणजे धर्म नव्हे. मठ-मंदिरांची संस्थाने करून त्यावर अधिसत्ता गाजवणे म्हणजे धर्म नव्हे. अर्धा तास देवपूजा करून नंतरच्या वेळात दिलेल्या कर्जासाठी गरिबाचे घर लुटणे म्हणजे धर्म नव्हे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालायच्या आणि तरुण वयातील भक्त स्त्रीच्या गळ्याला मिठी मारणे म्हणजे धर्म नव्हे. देवदर्शनासाठी आलेल्या भक्ताला देणगी म्हणून मोठी रक्कम मागायची आणि देवाचा प्रसाद म्हणून भक्तानेच दिलेला बिनपाण्याचा नारळ प्रसाद म्हणून द्यायचा याला ‘भक्ती धर्म’ म्हणत नाहीत. खरा धर्म माणसातले चैतन्य बघायला शिकवतो. माणसाला माणसाशी जोडतो. खरा धर्म प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा संगम साधतो. तो चिरंतन मूल्यांची उपासना करण्याची प्रेरणा देतो. माणसाचा विशुद्ध आणि उन्नत करणारा, शाश्‍वत स्वरूपाचा, कायम प्रवाही नि काळाबरोबर चालणारा विचार म्हणजे खरा धर्म! खरा धर्म भोगाचे त्यागात रुपांतर करतो. विकृतीचे संस्कृतीत रुपांतर करतो. आसक्तीचे विरक्तीत रुपांतर करतो आणि माणसामध्ये असलेल्या पशुत्वाला देवत्वाचे रूप देतो. चराचरात चैतन्य व्यापून उरलेले आहे याचा साक्षात्कार याच खर्‍या धार्मिकाला होत असतो आणि मुख्य म्हणजे धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही याचे विस्मरण होता कामा नये. हे विस्मरण पुन्हा कर्मकांडाने गढूळ झालेल्या धार्मिक आचरणाकडे नेते. याच स्वरूपाचे एक वचन गौतम बुद्धांनी ‘धम्मपद’मध्ये नोंदविले आहे. ते म्हणतात, ‘‘ज्याचे अंत:करण स्वच्छ नाही, जो मनाने निर्मळ नाही, राग-द्वेषादी विकारापासून जो मुक्त नाही अशा माणसाने जरी भगवी वस्त्रे अंगावर घातली तरी तो ती घालण्यास लायक नाही.’’  

सारांश म्हणून मी असे म्हणेन की आजच्या गोंधळलेल्या काळात धर्म आणि अधर्म यातला फरक स्पष्ट करण्यासाठी श्री. घनश्याम पाटील यांनी जे लेखन केले आहे ते तरुण पिढीने वाचले पाहिजे; नव्हे ते आचरणात आणले पाहिजे असे मला वाटते.

या ग्रंथात श्री. घनश्याम पाटलांनी स्त्री जीवनाशी निगडित तीन-चार लेख समाविष्ट केले आहेत. त्या लेखांतून काही नव्या समस्या उपस्थित केल्या आहेत. काही वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा त्याच मांडलेल्या आहेत. त्यांनी नोंदविलेले एक मत असे की, स्त्री आणि पुरुष यात समानता असली पाहिजे. दोघांमध्ये कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही. तिलाही सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तिच्या इच्छेनुसार तिला शिक्षण घेता आले पाहिजे आणि तिच्या इच्छेप्रमाणे प्रेमविवाह करता आला पाहिजे. त्यांच्या मते घरात अनेक पुरुष आपल्या पत्नीवर हुकमत गाजवीत असतात. बाहेर मात्र स्वातंत्र्य आणि समतेवर बोलत असतात.  त्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची सूचना अशी की, शहरामध्ये अनेक संघटना असतात. त्या सर्वांची एकच संघटना झाली तर प्रश्न सुटायला मदत होईल.  शासनालाही दडपण येईल. त्यांनी सांगितलेली तिसरी क्रांतिकारी सूचना अशी की समाजात सर्रास प्रेमविवाह झाले पाहिजेत. त्याशिवाय जातीपातीची काटेरी झुडपे नष्ट होणार नाहीत! तसेच जाहिरातीमध्ये स्त्री शरीराचा वापर उचित वाटत नाही. आपली चैन, मौज भागवण्यासाठी महानगरात प्रौढ वा वृद्धाबरोबर बायकोप्रमाणे राहतात हेही त्यांना खटकते. एखाद्या हरामखोराने त्या बाईला म्हणजे तात्पुरत्या पत्नीला वेश्यागृहात विकले तर या बाईचे कसे हाल होतील? कसले आयुष्य जगावे लागेल? याचा विचार या तरुण मुलींनी करायला हवा. तसेच प्रेम आणि लग्न याच्या संकल्पना अलीकडे बदलत जाणार्‍या आहेत.  नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची मैत्री होते, प्रेमाच्या दिशेने वाटचाल होते पण विविध कारणांनी वासना आणि प्रेम यातला फरक त्यांना कळत नाही.  त्याचा फटका त्यांनाही बसतो आणि त्यांच्या कुटुंबांनाही बसतो, याचाही विचार समाजाने करावा असे श्री. पाटील यांना वाटते. शेवटी त्यांनी ‘आई ही देवी आहे, तिला देवीचा दर्जा दिला पाहिजे’ असा एक शाश्‍वत विचार सांगितला आहे. माझ्या मते तर ईश्वरी शक्तीचे सगुण रूप म्हणजे आई. नाहीतरी आपल्या संस्कृतीने मानवी जीवनाला पूर्णत्व देणारी शक्ती मानलेलीच आहे. आदिशक्तीचे निकोप, निष्कलंक, निरामय, शुभदाई सगुण रूप म्हणजे स्त्री होय. ती मानवी जीवनाला आकार देते, मूल्यांना साकार करते, संस्कृतीला श्रीमंत करते, श्रमाला प्रतिष्ठा देते आणि माणसाला माणूसपण देते. सर्जन, संगोपन, संरक्षण आणि जगण्यासाठी लागणारी डोळस जाणीव स्त्रीशिवाय पूर्णच होत नाही. मग ती व्यक्तीची असो अथवा समाजाची असो. म्हणून आपण तिला सृजनाची देवता मानतो. संस्कृतीची आदिशक्ती मानतो. कर्तृत्वाची प्रेरक शक्ती मानतो आणि सेवेचे प्रतीक मानतो. येशू ख्रिस्ताचे एक वचन आहे. तो म्हणतो, ‘‘परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.’’ स्वामी विवेकानंदांनी आणि साने गुरुजींनी दिला देवता मानले आहे. विवेकानंदांनी म्हटले आहे की, ‘‘जिथे तिचा सन्मान होत नाही तो देश कधीच मोठा होऊ शकत नाही.’’

आता अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याचा वेगळा विचार, शरीरसुखाला आलेले प्राधान्य, चिरंतन मूल्यांची होणारी उपेक्षा, तात्कालिक सुखाची चटक आणि जीवनातील श्रेयस-प्रेयसाचा बदलेला क्रम या बाबी ज्यांना मोलाच्या वाटतात त्यांनी मुक्त कामाचार करायला हरकत नाही. मात्र ज्ञानेश्वरांच्या भाषेत डोळे दिपविणारे तुमचे सौंदर्य कालातंराने सुकेलेल्या पडवळासारखे होईल तेव्हा तुमच्याकडे बघणार कोण आणि खायला देणार कोण? गौतम बुद्धाने एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘कामसुख हे एखाद्या चिखलासारखे आहे. त्यातून बाहेर पडणे शक्य नाही.’’ म्हणून स्त्रीच्या कर्तृत्वाला सारे आकाश मोकळे करून देणे आणि त्यासाठी तिला आपण ते पुरविणे यातूनच समाजात समता नांदेल. स्त्री कर्तृत्वाला बहर येईल.      
    
या ग्रंथात काही राजकीय स्थितीची चर्चा केलेली आहे. आजचे राजकारण देशहिताचा दीर्घकालीन विचार करून सचोटीने अंमलबजावणी करणारे नाही.  आज प्रत्येक जातीचे राजकीय पक्ष निर्माण झाले आहेत. त्या जातीच्या उद्धारापेक्षाही यांना स्वत:ची प्रगती हवी आहे. पूर्वी सचोटी, त्याग, देशप्रेम, रयतप्रेम, प्रबोधन विचार, साधी राहणी याला महत्त्व दिले जात होते. आता ज्याच्याकडे उदंड स्वरुपाची ‘मनीपॉवर’ आहे, विरोधकांना यमसदनाला पाठविणारी ‘मॅनपॉवर’ आहे आणि आपल्या विरोधात काम करणार्‍या कार्यकर्त्यांची हाडे मोडणारी ‘मसलपॉवर’ आहे तोच राजकारणात येऊ शकतो, टिकाव धरू शकतो. त्यात पुन्हा कार्यकर्त्यांना मानधन, कार्यकर्त्यांना पार्ट्या, मतदारांना पैसे, प्रसिद्धीसाठी येणारा अफाट खर्च या गोष्टी आजच्या राजकारणाचे अध:पतन करणार्‍या आहेत.  जॉर्ज बर्नाड शॉने एक विधान केले होते. तो म्हणतो, ‘‘समाजातली बदमाशगिरी करण्याची सारी क्षेत्रे संपली की माणसे राजकारणात येतात.’’ हे विधान आजच्या राजकारणाला लागू पडते. अशा या नासलेल्या राजकारणावर लेखन करण्यात अर्थ काय आणि केले तरी ते कोणी वाचणार नाही.

समारोप म्हणून मी असे म्हणेन, घनश्याम पाटलांचा हा ग्रंथ शाश्वत मूल्यांचा आग्रह धरणारा, शाश्वत समतेचा पुरस्कार करणारा, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा, वाचकांचे वाचन वाढविणारा आणि मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांपासून ते मातीमोल आयुष्य जगणार्‍या माणसांची नोंद करणारा, सदाचार, सद्भाव, मैत्र, प्रेम, पुस्तकप्रेम, कारुण्य, उदारता, जिव्हाळा आणि अभिजात साहित्यप्रेम यांचा उत्कृष्ट नमुना आहे. तो या एकाच ग्रंथात एकजीव झाला आहे. म्हणून तो प्रत्येकाने जिवाभावाने वाचला पाहिजे.
- डॉ. द. ता. भोसले 

या पुस्तकाची पूर्वनोंदणी करण्यासाठीची लिंक - 
https://shop.chaprak.com/product/darval/

आपण ७०५७२९२०९२ या क्रमांकावर भीम अँप द्वारेही आपली नोंदणी करू शकाल. 


Friday, April 17, 2020

चोर सोडून संन्याशाला फाशी



'अफवा पसरवू नका' असं सातत्यानं सांगणाऱ्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अफवा पसरविण्याच्याच आरोपावरून अटक झाली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली असली तरी 'सगळ्यात मोठी बातमी,' 'ब्रेकिंग न्यूज,' 'सर्वप्रथम आम्ही,' 'सबसे तेज' अशा टॅगलाईन देत स्वतःची विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्या दृकश्राव्य माध्यमांना ही सणसणीत चपराक आहे. 

राहुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथून अंगावरच्या कपड्यावर उचलण्यात आलं. त्यावेळी त्यांना त्यांची औषधंही सोबत घेऊ देण्यात आली नाहीत असा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय. कोरोनासारख्या आजाराच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे आपले सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच राहुल यांना उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आलं. त्यांनी दिलेली बातमी चूक की बरोबर? त्याचा कितपत परिणाम झाला याची  चर्चा होऊ शकते. मात्र एखाद्या पत्रकाराला अशाप्रकारे जेव्हा अटक केली जाते तेव्हा संपूर्ण यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहते. कायद्याच्या कामात अडथळे न आणणं हे प्रत्येक सुशिक्षित माणसाचं कर्तव्य असतं. त्यामुळं राहुल हे स्वतःदेखील तपासयंत्रणांना सहकार्यच करतील पण यानिमित्त कुण्याही विचारी माणसाला काही प्रश्न स्वाभाविकपणे पडतात आणि त्याची चर्चाही व्हायलाच हवी. 

रेल्वेच्या एका अंतर्गत पत्राचा हवाला देत राहुल यांनी गाड्या सुरू होण्याबाबतची बातमी दिली होती. त्यानंतर दोनच तासांनी अशा कोणत्याही गाड्या सुरू होणार नसल्याची दुसरी बातमी त्यांनी दिली आणि ती दिवसभर  चालवली. एका मराठी वाहिनीवरील ही बातमी पाहून जवळपास तीन हजार अमराठी परप्रांतीय बांद्रा स्टेशनवर आल्याचं सांगण्यात आलं. संचारबंदीच्या काळात हे तीन हजार लोक बाहेर पडले कसे आणि एकत्र जमले कसे हेही पाहावं लागेल. राहुल यांना तातडीनं अटक करणारे त्यांच्यावर कोणती कारवाई करतील हेही स्पष्ट होईलच. मुख्य म्हणजे 'राहुल यांची बातमी काहीही चुकीची नव्हती' असा निर्वाळा संजय राऊत यांनी त्यांच्या अग्रलेखातून दिलाय. ज्या वृत्तपत्रासाठी ते अग्रलेख लिहितात त्या 'सामना'च्या संपादक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे आहेत. 'इतकी वर्षे पत्रकारितेत उगीच झक मारली असे वाटू लागले आहे' इतक्या स्पष्ट शब्दात राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला फाशी' अशातला प्रकार असल्याचं सांगितलं जातं.

'बाहेर गर्दी करू नका, जसे आहात तसेच घरात रहा' असं आवाहन सातत्यानं करण्यात येतंय. कोरोनाविरुद्धच्या लढाईतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र तरीही अनेकजण 'मला काय होतंय?' या अहंकारात बाहेर गर्दी करत आहेत. पोलिसांनी त्यांना प्रसाद देऊनही अनेकांत सुधारणा होत नाही. त्यामुळं सामाजिक आरोग्याचा विचार करून काही कठोर पावलं उचलावी लागतात. या सगळ्यात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. खरा कळीचा मुद्दा इथूनच सुरू झाला. मुद्रित माध्यमं आणि दृकश्राव्य माध्यमं यांच्यातली धुसफूस नवी नाही. निखिल वागळे यांच्यासारख्या काहींनी अत्यंत आक्रस्ताळेपणा करत, आरडाओरडा करत, अगदी समोरच्या व्यक्तीच्या तावातावानं अंगावर जात कार्यक्रम करण्याची कुप्रथा पाडली. त्यातून अल्पावधीतच या माध्यमाची विश्वासार्हता संपुष्टात आली. अनेकांनी अशा चर्चा पाहणं बंद केलं. काहींच्या तो फक्त मनोरंजनाचा विषय राहिला. दुसरीकडं मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता यांच्या तुलनेत टिकून आहे. या परिस्थितीत राहुल कुलकर्णी यांनी सर्वप्रथम 'वृत्तपत्राच्या कागदातून कोरोना पसरतो' अशी अफवा पसरविल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं अनेक वृत्तपत्रं बंद करावी लागली. विक्रेत्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यानं त्यांनी ती विकण्यास नकार दिला आणि अनेक वृत्तपत्र बंद ठेवावी लागली. यात कित्येकांच्या पोटावर पाय पडला. बंद पडलेले छापखाने पुन्हा सुरू करताना ती यंत्रंही मोठा खर्च काढणार आहेत आणि हा सगळा एका 'फेक न्यूज'चा प्रताप आहे.

काही गोष्टी खटकत असूनही खरंतर राहुल कुलकर्णी यांच्याविषयी मला नेहमी अभिमान वाटतो. पुण्या-मुंबईचा पत्रकारितेचा केंद्रबिंदू त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राकडं, प्रामुख्यानं मराठवाड्याकडं वळवला. पूर्वी व्यंकटेश चपळगावकर हेही याच वाहिनीसाठी अशीच मेहनत घ्यायचे. शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्या वार्तांकनाला जाताना चपळगावकर यांचा अपघात झाला आणि दुर्देवानं ते त्यातच गेले. त्यांच्यानंतरचा आश्वासक चेहरा म्हणून राहुल यांच्याकडं पाहता येईल. अतिशय मोकळ्याढाकळ्या शैलीत पण अभ्यासूपणे ते ज्याप्रमाणं प्रत्येकाला भिडतात ते पाहता त्यांचं कौतुकच वाटतं. एबीपी माझाला 'बीजेपी माझा' म्हणणं किंवा राजीव खांडेकरांना 'पवारांचे हस्तक' ठरवणं म्हणूनच हे या वाहिनीसाठी अन्यायकारक होईल. राहुल यांच्यासारखे अनेकजण दिवसरात्र एक करत प्रचंड कष्ट उपसत असतात म्हणून ढिम्म व्यवस्था हलत असते. मग राहूल यांना नेमकी अटक का झाली याचाही विचार करायला हवा. 

'गंगाधर ही शक्तिमान था' हे आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगण्याची वेळ नाही. तरीही त्यांच्यासोबतचे नेते त्यांच्या पाठीत कधीही खंजीर खुपसू शकतात. 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' असं उद्धव ठाकरे यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मात्र याच गाण्यातली 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा' ही पुढची ओळ त्यांनी लक्षात ठेवायला हवी. मुळातच कलावंत असल्यानं कसलेही छक्केपंजे ते करत नाहीत, खोटेपणा त्यांना चालत नाही, मात्र आजचं राजकारण याच्याच पायावर उभं आहे. त्यामुळं राहुल कुलकर्णी हे फक्त निमित्त असलं तरी या प्रकरणाच्या मुळाशी त्यांनी जायलाच हवं. 

वाधवान कुटुंबीयांचा भंडाफोड राहुल यांनी केला आणि गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले. गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे या तरुणाला आपल्या बंगल्यावर बोलवून घेऊन त्यांच्या टग्याकरवी त्याला मारहाण केली. सत्तेची नशा चढल्यानंतर नेते कसे रंग बदलतात हे अशा प्रकरणातून दिसून येतं. राहुल यांच्यासारखे पत्रकार हे सगळं आक्रमकपणे मांडत होते आणि या सगळ्या प्रकारांकडून लक्ष वळवण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याचं बोललं जातं. सरकार किती कडक भूमिका घेते हेही यातून दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो.

प्रसारमाध्यमं अनेक गोष्टीत आततायीपणा करतात हे तर खरंच. अगदी छोट्या गोष्टीही ते 'आत्ताची सर्वात मोठी बातमी' असं किंचाळत परत परत सांगत असतात. या बातम्या ज्यांच्याकडून मिळतात ती साधनंही अनेकदा दुय्यम असतात. त्यातून भलेभले आयुष्यातून उठल्याची उदाहरणंही आहेत. कसलीच खातरजमा न करता अशा ज्या बातम्या दिल्या जातात त्यामुळं अनेकांचं मोठं नुकसान होतं. 

या अनुषंगानं माझ्याबाबत नुकताच घडलेला एक अनुभव नोंदवावासा वाटतो. 8 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मी आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं एक तक्रार दिली. तक्रारकर्त्यानं त्या तक्रार अर्जावर 'तातडीचे आणि गोपनीय' असं स्पष्ट लिहिलं होतं. मात्र काही मिनिटातच सर्व वाहिन्यांवर याची ब्रेकिंग न्यूज झाली. 'पुण्यात पत्रकाराविरुद्ध गुन्हा' म्हणून त्याचा विपर्यास केला गेला. 

त्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यासोबत एका प्रकल्पावर काम करत बसलो होतो आणि ही बातमी येऊन धडकली. सगळ्यांचे अचानक फोन सुरू झाल्यानं आम्ही बातमी बघितली आणि हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. 'ठाकरे सरकार उलथवून लावायचा प्रयत्न आणि शरद पवार यांच्या हत्येचा कट' असा गंभीर आरोप आमच्याविरुद्ध होता. गंमत म्हणजे एकाही वाहिनीनं याबाबत आमची प्रतिक्रिया न घेता हल्लाबोल केला. त्यानंतर माझ्या आणि भाऊंच्या मागं पोलिसांचा ससेमिरा लागला. आम्ही दोघंही त्याला धाडसानं सामोरे गेलो. या प्रकरणात काहीच दम नाही, हे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यापासून अनेकांनी आम्हाला सांगितलं. खूप चौकशी करून पोलीस अधिकारी थकले आणि त्यांनीही सांगितलं की, "केवळ व्यवस्थेचा रेटा म्हणून आम्हाला तपास करावा लागतोय. यात तुमची काहीच चूक दिसत नाही मात्र लोकशाहीत पोलीस सत्ताधाऱ्यांचा गुलाम असतो..."

त्यांच्या गुलामीमुळं आमचा वेळ गेला, मनस्ताप झाला आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे यंत्रणा वेठीस धरली गेली. हे सगळं त्या एका तक्रारीमुळं झालं नाही तर एका फडतूस तक्रार अर्जावरून दृकश्राव्य माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्यामुळं झालं. या प्रकरणात आम्ही निर्दोष आहोत असा अहवाल पोलिसांनी देऊनही याची बातमी मात्र कोणीच केली नाही. उलट मला आणि भाऊंना जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या आल्या. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल कुलकर्णी यांना अटक हा फक्त राजकारणाचा फार्स बनून राहतो. 

राहुल चूक की बरोबर हे आपली न्यायव्यवस्था ठरवेल. त्यांची बरी-वाईट शैली लक्षात घेतली तरी एका पत्रकारावर अन्याय होऊ नये असंच मला वाटतं. दिल्लीत उत्तरप्रदेशचे लाखो कामगार रस्त्यावर आले होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे विळ्याभोपळ्याचे सख्य असलेले दोन मुख्यमंत्री एकत्र आले. योगी यांनी युपीवरून एक हजार बस दिल्लीला पाठवल्या आणि या लोकाना परत आणले. केजरीवाल यांच्या मदतीनं उरलेल्यांची व्यवस्था तिथंच केली. हे आपल्या सत्ताधाऱ्यांना जमलं नाही. त्यामुळं असं सगळं नैराश्य बाहेर पडत आहे. 

जे झालं ते झालं. राहुल यांच्या बातमीचा परिणाम कितपत झाला, बांद्रा येथून युपीला गाडी नसताना सगळे तिथं का जमले? नेमके एका मस्जिदीपुढं ते एकत्र आले असं सांगितलं जातंय ते खरं आहे का? असल्यास त्याची कारणं कोणती? एकत्र येण्याचे संकेत कोणते? उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे कुणी गद्दार सहकारी यात आहेत का? हे प्रशासनाचं अपयश आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतीलच पण यापुढं तरी दृकश्राव्य माध्यमांनी सावध होणं गरजेचं आहे. 'हातात बुम आला म्हणून आपण न्यायाधीश होत नाही' इतकं जरी या पत्रकारांना कळलं तरी सध्या पुरेसं आहे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Thursday, April 16, 2020

कोरोनाच्या लढाईतील देवाचं काम


आपल्या देशाची अखंडता टिकून राहण्यात सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर तो आहे आपल्या संस्कृतीत आणि माणूस म्हणून असलेल्या चांगुलपणात. आपल्याकडे गरीब-श्रीमंतीची दरी आहे, जात-धर्मातील संघर्ष आहे, प्रथापरंपरांचं जोखड आहे, विविध समूहांच्या टोकदार अस्मिता आहेत, विविध विचारधारांचा झापडबंदपणा आहे. हे सगळं खरं असलं तरी आपल्या श्रद्धा प्रबळ आहेत, आपल्या भावभावना सच्च्या आहेत, इतरांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच आपलं चांगुलपण टिकून आहे, देश टिकून आहे, त्यातून मानवता टिकून आहे. आपल्या राष्ट्रावर अनेक आक्रमणे झाली, संघर्ष झाले, नैसर्गिक आपत्ती आल्या, आजारांच्या साथी आल्या. तरीही आपण टिकून आहोत, ठाम आहोत, जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहोत. सध्या कोरोनामुळं जगातील प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना माणसामाणसातील अंतर कमी होतंय. 'सोशल डिस्टन्स' राखताना आपण मनानं जवळ येतोय आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जगभर मोठ्या प्रमाणात जे सकारात्मक प्रयोग सुरू आहेत त्याची सर्वत्र दखल घेतली जात आहेच. भविष्यातही घेतली जाईल. आज आपण आपल्या आजूबाजूला छोट्या स्वरूपात सुरू असलेल्या काही चांगल्या प्रयोगाकडे बघूया. अर्थात हे सगळे विधायक उपक्रम मांडायचे तर एक जाडजूड ग्रंथ होईल पण आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं बघूया. मानवता जिवंत ठेवणाऱ्या या सगळ्या घटना आपलं मनोधैर्य वाढवायला मदत करतील. 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर सर्वतोपरी मदत करत आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अव्याहतपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असं म्हणत प्रत्येकाला धीर दिला आहे. शिवथाळीच्या माध्यमातून कोणीही उपाशी राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. इतर राज्यातील आपल्याकडं अडकलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी सगळी व्यवस्था केलीय. सातत्यानं जनतेशी संपर्क साधून ते करत असलेल्या कार्याची माहिती देत आहेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मंत्रीमंडळातील सर्वच नेते उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करत आहेत. उद्धवसाहेबांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, सैनिक, डॉक्टर, नर्स आदींनी या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या महापौर विनिता माने यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विनिताताई पूर्वी नर्स होत्या. सध्या महापौर आहेत. हे पद फक्त मिरवण्यासाठी नसतं तर जनतेची सेवा करण्यासाठी असतं याचं भान त्यांना आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी महापौरपदाची झुल, सगळा दिखाऊपणा बाजूला सारत डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून कोरोनाग्रस्तांची सेवा सुरू केली आहे. त्यांच्या या मातृहृदयी सेवाकार्याची भविष्यात योग्य ती नोंद नक्की घेतली जाईल.

अशा आपत्तीच्या काळात आपला दातृत्वभाव दाखवत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. रतन टाटा यांच्यासारख्या माणसातल्या देवानं थोडेथोडके नव्हे तर तब्बल पंधराशे कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले. आपल्या विविध देवस्थानांच्या विरुद्ध अनेकांकडून कायम राळ उडवली जात असली तरी यावेळी बहुतेक तीर्थक्षेत्रांनी यथायोग्य मदतीचा हात पुढं केला. सोलापुरातील आराध्या अजय कडू या दुसरीतील विद्यार्थीनीनं आपला जन्मदिवस साजरा करणं रद्द करून ती मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. उद्धव ठाकरे यांनी आराध्याचं जाहीर कौतुक करत तिला आशीर्वाद दिले. बीड येथील पाच वर्षाच्या पार्थ पाटील आणि जयदत्त पाटील यांनीही त्यांच्या वाढदिवसाठी जमवलेली रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडं सुपूर्त केली. या बालचमुंची ही सजगता अनेकांचे डोळे उघडणारी आहे. पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचा नुकताच 56 वा वाढदिवस झाला. 56 वर्षाच्या आयुष्यातील रोजचा एक रुपया याप्रमाणं त्यांनी 20464 रुपयांचा धनादेश आयुक्तांकडं मदत म्हणून दिला. प्रशांत दामले यांच्यासारख्या कलावंतानं कला क्षेत्रातील अनेक गरजूंना सढळ हातांनी मदत केली. आजूबाजूची अशी असंख्य उदाहरणं पाहता माणुसकीवरील विश्वास दृढ होतो.

घरकोंडीमुळं बाहेर पडणं अवघड झालं आहे. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना एकवेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. अशावेळी मदतीसाठी कोणी पुढं सरकलं नाही तरच नवल.  अनेकांनी अक्षरशः अन्नछत्र उघडल्याप्रमाणं यात योगदान दिलंय. पुण्यातील वंदे मातरम संघटना, सरहद काश्मीरी संघटना आणि गुरू गौतमी मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं गरजूंना भोजनाची व्यवस्था केली जातेय. श्रमिक वर्गासह परगावातील विद्यार्थ्यांची त्यामुळं मोठी सोय झाली. बुधवार पेठेतील देवदासी भगिनींना अन्नदान करून त्यांनी जो आदर्श निर्माण केला त्याला तोड नाही. सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी पडद्याआड राहत जे निर्माण केलंय ते पाहता महाराष्ट्रानं त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ रहायला हवं.

सोलापूरच्या बाळे भागातील अनेक गरजूंना अन्नधान्याची गरज होती. त्यांच्या चुली बंद पडल्या होत्या. अशावेळी लोणार गल्ली येथील शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बिज्जू प्रधाने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी 'एक घास तुम्हालाही' हा उपक्रम राबवत एक हजारहुन अधिक लोकाना मदतीचा हात दिला. भीम नगर, साठे नगर, खडक गल्ली, राहुल नगर, लक्ष्मी नगर, पाटील नगर, चांभार गल्ली येथील कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रधाने कुटुंबीय पुढं सरसावलं. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवानं तर त्याचा एक एकर गहू आसपासच्या गरजू कामगार स्त्रियांना वाटून टाकला. 

हा लेख लिहीत असतानाच साप्ताहिक 'विवेक'च्या रवींद्र गोळे यांची एक पोस्ट वाचण्यात आली. रवीदादांनी रेशनचं धान्य आणलं. इतकं धान्य घरात लागणार नसल्यानं ते गरजूंना द्यायचा त्यांचा विचार होता. 'घाई करू नका' असा सल्ला पत्नीनं दिला. थोड्या वेळात एक परप्रांतीय संडास साफ करण्याचे पैसे न्यायला आला. गोळे वहिनींनी त्याची विचारपूस केली. त्यानं सांगितलं कामही बंद आहे आणि चुलही. ते चार-पाच कर्मचारी एका खोलीत बंद होते. वहिनींनी ते धान्य त्याला देऊन टाकलं. 'भीक आणि भूक यांना धर्म नसतो' असंही त्यांनी सांगितलं. आपण कोणी फार मोठे दाते नाही मात्र माणूस आहोत, अशी भावना त्या व्यक्त करतात. या भावनेवरच तर आपला समाज तग धरून आहे. सरकारी पातळीवर जी मदत केली जातेय, दिली जातेय त्याची नोंद होईल पण सामान्य माणूस अशा पद्धतीनं त्याच्या घासातला घास इतरांना देतोय हे चित्र फार सुखद आहे.

प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचा 'मराठी संस्कृती' हा व्हाट्सऍपचा एक समूह आहे. त्यावर सुधाकर शेलार यांनी सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करायची संकल्पना मांडली. सुधाकर शेलार, राहुल पाटील, तुषार चांदवडकर, आनंद काटीकर, विजय केसकर अशा सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि बघताबघता 75 हजार रुपये जमा झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत हा मदतनिधी कोरोनाच्या लढाईसाठी देण्यात आला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते अनेक संस्था संघटनापर्यंत सर्वजण यावेळीही नेटानं कामाला लागलेत. आपली सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस, अन्य सरकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, प्रसारमाध्यमं हे सर्वजण यावेळी जे काम करत आहेत त्यालाच तर 'देवाचं काम' म्हणतात. कोरोनाच्या काळात चांगुलपणावरील श्रद्धा वृद्धिंगत करणारी असंख्य उदाहरणं दिसून आली. त्यातल्या कित्येक घटना काळाच्या ओघात पुढे यायच्या नाहीत पण म्हणून त्यांचं महत्त्वही कमी होणार नाही. या घरकोंडीत माणूस किती हतबल असतो हे जसं दिसून आलं तसंच तो एकमेकांची किती काळजी घेतो हेही दिसून आलं. आपण एकटे नाही, आपल्यासोबत आपला समाज आहे, आपलं सरकार आहे, आपल्यावर प्रेम करणारी, आपली काळजी करणारी माणसं आहेत, इथली भक्कम यंत्रणा आपल्यासोबत आहे हे ठळकपणे अधोरेखित झालं. ही जागतिक समस्या आपल्याला अगतिक करू शकली नाही हे आपल्या राष्ट्राचं यश आहे. भविष्यात आपापल्या क्षेत्रात नव्या जोशात उभं राहण्याचं बळ यातूनच आपल्याला मिळणार आहे. हा एकोपा, हे सामंजस्य टिकून रहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी रमेश गोविंद वैद्य यांच्या चार ओळी सांगून आपला निरोप घेतो.

पाप आणि पुण्य यांचा दूर ठेवा ताजवा
किर्रर अंधारी प्रकाश देण्या पुरेसा एक काजवा
अंतराळी उंच जावो प्रीतीची ही आरती
माणसाने माणसाला ओळखावे आणखी!

-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Monday, April 13, 2020

'डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती'

मुंबईला परतताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना त्यांच्या एका मित्रासह सातारा रोड  स्टेशनला जावे लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. एके ठिकाणी त्यांनी टांगा थांबवला आणि खाली उतरून ते एका मैदानात शिरले. अचानक ते व्याकुळ होऊन रडू लागले. मित्राला काय झाले काहीच कळेना. थोडा दुःखभार कमी झाल्यावर ते म्हणाले, "इथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी खूप खस्ता खाल्ल्या. या पलीकडच्या पडक्या वाड्यात आम्ही राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे खडी फोडून मोलमजुरी करीत होती. मी या रानात लहानपणी खूप खेळलो. माझी आई व बाबा मी किती शिकलो हे पाहण्यास जगले नाहीत. मी फार दुर्देवी आहे," अशी हेलावून टाकणारी एक आठवण डॉ. माधवराव पोतदार यांनी त्यांच्या 'डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती' या पुस्तकात नोंदवली आहे. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर यांचा विपुल सहवास लाभलेल्या डॉ. माधवराव पोतदार यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. महाड येथील वास्तव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक मित्रांशी, सहकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच त्यांनी हे संशोधनात्मक लेखन केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अपरिचित पैलू यात मांडण्यात आले आहेत.  

डॉ  बाबासाहेब  आंबेडकर यांचे जीवनशिल्प कोरणारे त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्यावर या पुस्तकात पहिलेच प्रकरण आहे. "आपले वडील धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्यामुळेच माझा धार्मिक पिंड घडला. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात जायचे ठरले ते त्यांच्यामुळेच" असे डॉ.  बाबासाहेब  त्यांच्या मित्राला म्हणजे वामनराव गोडबोले यांना सांगतात आणि "रामदासांचे श्लोक मला मिळतील का?" असा असा प्रश्नही विचारतात. रामदास स्वामी ब्राह्मण होते म्हणून त्यांनी त्यांचा धिक्कार केला नाही तसाच समर्थांच्या प्रगाढ ज्ञानाचाही केला नाही, ते ज्ञानाचे पूजक होते आणि मनाने सश्रद्ध होते हेच यातून सिद्ध होते.  

बाबासाहेबांची प्राणप्रिय पत्नी रमाबाई आंबेडकर यांना बाबासाहेबांनी विलायतेतून पैसे मागताच रमाबाई बेभान झाल्या. त्यांनी धुणीभांडी केली, झाडलोट केली, शेण थापले, डोक्यावर गोवऱ्या घेऊन त्या विकल्या आणि त्यांना पैसे पाठवले. शिक्षणासाठी ते पैसे अगदी वेळेत मिळाल्यावर बाबासाहेब त्यांना पत्रातून लिहितात, "रमा, मला क्षमा कर! मी घरी आलो की तुझ्या हाताला तेल लावून देईन. तू पाठवलेले पैसे वेळेवर मिळाले. मला तुझा अभिमान वाटला. पत्नी असावी तर अशी! आयुष्याला साथ देणारी!"

ही कर्मयोगिनी त्यांना सोडून गेल्यावर मात्र ते अत्यंत अस्वस्थ झाले. तिच्यावरील उत्कट प्रेमामुळे त्यांनी रमाबाईंचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने त्यांच्या मुलाच्या हातून केले. याविषयी लिहिताना डॉ. पोतदार म्हणतात, "ते राजगृहात गाद्यागिरद्यावर लोळत होते पण पत्नीच्या फाटक्या लुगड्याचा त्यांना जराही विसर पडला नव्हता."

बाबासाहेबांचे अतिशय निकटवर्ती म्हणजे गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे. ते बापूसाहेब नावाने ओळखले जात. बाबासाहेबांनी कधीही त्यांचा एकही शब्द अव्हेरला नाही. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि अनंतराव चित्रे हे दोन 'आगरकरी ब्राह्मण' डॉक्टरांच्या वैचारिक प्रवासातील मोठे साक्षीदार होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती स्वतः न जाळता बापूसाहेबांच्या हातून एकेक पान होमकुंडात टाकले. त्यांनी स्वतः मनुस्मृती का जाळली नाही यावर भाष्य करताना डॉ. पोतदार लिहितात, बाबासाहेबांना मनुस्मृतीतील ब्राह्मण श्रेष्ठता, वर्णश्रेष्ठता याचे दहन ब्राह्मणांच्याच हातून करायचे होते. हे एकप्रकारचे सनातनी वृत्तीला दिलेले उत्तर होते. त्यातली दुसरी बाजू म्हणजे मनुस्मृती हा ज्ञानग्रंथ होता याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आपल्याच हाताने मनुस्मृतीला चूड लावणे त्यांना योग्य वाटले नसावे. 

डॉ. बाबासाहेबांचे खास साथी आर. बी. मोरे यांच्याविषयी लिहिताना डॉ. आंबेडकर म्हणतात, "ज्या थोड्या व्यक्तीमुळे मी राजकारणात प्रवेश केला त्यातील एक म्हणजे हे मोरे." एक स्वार्थत्यागी आणि प्रामाणिक अनुयायी म्हणून बाबासाहेबांच्या परिवारात त्यांना मानाचे स्थान होते. 
बाबासाहेबांच्या वाचनाचे साथी असलेले शां. शं. रेगे सर हेही असेच अफलातून व्यक्तिमत्त्व. सिद्धार्थ कॉलेजचं ग्रंथालय त्यांनी समृद्ध केलं. वाचनाची जबरदस्त भूक असलेल्या अशा महापुरुषाला हवे ते पुस्तक वेळीच उपलब्ध करून द्यायची तत्परता त्यांनी जपली. बाबासाहेबांची वाचनाची भूक शमविणे यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य वाहून घेतले. 

बाबासाहेबांच्या कार्यात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत चित्रे यांच्याप्रमाणेच यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, हरी गणेश पटवर्धन, देवराव नाईक अशा अनेक 'ब्राह्मण' साथींचा सहभाग होता. याविषयी डॉ. पोतदार लिहितात, "डॉक्टरांचा लढा समतेचा होता. तो विषमतेविरुद्ध होता. त्यामुळे बाबासाहेब अस्पृश्यांनाच घेऊन लढले हा गैरसमज आहे."

देवराव नाईक यांची भूमिका समतावादी होती. ते म्हणायचे, "ब्राह्मणातला अहंकार हाच अनेक अनर्थांना कारणीभूत ठरला आहे." 

देवरावांनी 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' हे पाक्षिक सुरु केले होते. त्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी लिहिले होते, "पेशवाईच्या काळात ज्यांचा छळ झाला त्या गोवर्धन ब्राह्मण जातीचे आपण! केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून भ्रष्ट ब्राह्मण इतर जातीतील कोणाहीपेक्षा श्रेष्ठ ही काही ब्राह्मणांची प्रवृत्ती जितकी आत्मघातकी आहे तितकीच 'ब्राह्मण ब्राह्मण तेवढा हरामखोर' ही काही ब्राह्मणेतरांनी पत्करलेली वृत्तीही आत्मघातकी व ऐक्य घातकीही आहे."

असे अनेक ब्राह्मण साथी असलेल्या आंबेडकरांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता तर 'ब्राह्मण्याला' होता हे आजही समजून घेणे म्हणूनच गरजेचे आहे.

मैत्रीचा व कृतीचा चमत्कार असलेले सुरबानाना टिपणीस हेही त्यांचे खास मित्र होते. "सुरबा टिपणीस महाडला असताना तुम्ही मंडळी माझ्याकडे कशाला येता? तो तुम्हाला निश्चित न्याय मिळवून देईल" असे बाबासाहेब म्हणायचे. 

भाईशेठ वडके हेही बाबासाहेबांचे एक महत्त्वाचे साथी. दुर्देवाने त्यांचा उजवा हात निकामी झाला व तो कापावा लागला. त्यांच्याबाबतची एक छान आठवण पोतदारांनी या पुस्तकात दिली आहे. चवदार लढ्यात ज्यांचा सहभाग होता त्यांचा बाबासाहेबांच्या सोबत एकत्रित फोटो काढायचे ठरले. त्यासाठी सर्वजण गांधी टॉकीजजवळ एकत्र जमले. बाबासाहेबांच्या लक्षात आले की यात भाई वडके नाहीत. त्यांनी छायाचित्रण थांबवले. भाईशेठविना फोटो निघणार नाही असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी 'महत्त्वाच्या कामासाठी भेटून जा' असा निरोप भाईंना दिला आणि मग सर्वांचा एकत्र फोटो काढला. आपल्या कार्यकर्त्यावर असे विलक्षण प्रेम ते करीत. 

या पुस्तकातील महत्त्वाचा लेख म्हणजे बाबासाहेबांच्या सावली झालेल्या त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी विझत्या प्राणज्योतीशी स्वतःची तुलना केलीय. या ज्योतीला तेवत ठेवण्याचे श्रेय त्यांनी माईना दिलेय. माईंचे शारदा हे नाव बदलून त्यांनी सविता हे नाव ठेवले. त्यातून त्यांनी माईंची तेजस्विता कबूल केली. बाबासाहेबांच्या जीवनातील अंधारलेली जीवनसाथी म्हणून त्यांच्या जीवनात प्रवेश करून माईंनी सवितेची म्हणजेच सूर्याची तेजस्विता प्रत्ययास आणून दिली आहे. हा लेख वाचताना वाचकांचे डोळे आपोआप पाणावतात. बाबासाहेबांना मिळालेला 'भारतरत्न' पुरस्कार स्वीकारण्याची कृतार्थ संधी माईंना मिळाली.   

लोकमान्य टिळक यांचा विरोध उलटवून लावतानाच त्यांचे पुत्र श्रीधरपंत यांच्याशी मात्र त्यांचे घरोब्याचे संबंध होते. श्रीधरपंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्थ साथ दिली. त्यांनी सनातन्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करताना शेवटचे पत्रही बाबासाहेबांनाच लिहिले. श्रीधरपंत टिळक यांच्या आत्महत्येने बाबासाहेबांच्या हृदयाला जखम झाली होती. 

वैचारिक संवादासाठी जवळ गेलेले ग. त्र्यं. माडखोलकर यांच्याविषयीचा लेखही मस्त झालाय. बाबासाहेब भाऊसाहेबांना म्हणाले होते, "तुम्ही सगळे सवर्ण हिंदू मला अस्पृश्यांचा पुढारी समजता. माझ्याकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यात मात्र तुम्हाला माझ्या जमातीचे फार लोक दिसणार नाहीत. कायस्थ प्रभू आणि ब्राह्मणच जास्त दिसतील. माझी भाषा आणि विचार ब्राह्मणांना लवकर समजतात आणि तो माझ्याशी चटकन समरस होतो."

प्रबोधनकार ठाकरे, पुढारीकार डॉ. ग. गो. जाधव, वामनराव गोडबोले, ना. ना. पाटील, आर. बी. मोरे, बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे अण्णासाहेब ललिंगकर यांच्यावरील लेखही वाचनीय आहेत. ललिंगकर यांना त्यांनी 'खान्देशचा वाघ' हा किताब दिला तर ललिंगकरांनी त्यांच्या मुलाचे नाव बाबासाहेबांच्या नावावरून 'जयभीम' असेच ठेवले. सुदाम गेनू या त्यांच्या सातवीपास नोकराला त्यांनी फक्त पगारच दिला नाही तर त्याचे बचतपत्रही काढून दिले. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांच्या निवडक स्नेहीजणांची ओळख व्हावी म्हणून डॉ. माधवराव पोतदार यांच्या या पुस्तकाची ही थोडक्यात ओळख करून दिली. ग्रंथ हेच गुरु मानणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला वंदन!
- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२

दैनिक 'पुण्य नगरी'
१४ एप्रिल २०२०

Thursday, April 9, 2020

*आर्थिक शिस्त महत्त्वाची*

"नरेंद्र मोदी देशामध्ये कलम ३६० अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. देशाच्या आर्थिक स्थिरतेला किंवा भारताची राष्ट्रीय पत कमी होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती कलम ३६० नुसार देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करु शकतात" असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत पटेल उमराव यांनी ट्विटरवर व्यक्त केलं. त्यामुळं आर्थिक आणीबाणी म्हणजे नेमकं काय किंवा ती भारतात लागू होऊ शकते का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशा आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते. त्यात वावगं असं काहीच नाही. 

मुळात आणीबाणी म्हणजे निर्बंध. ते कितपत कठोर असतात त्यावर त्याचं यशापयश अवलंबून असतं. सद्यस्थितीचा विचार करता माणसाचं जगणं हेच महत्त्वाचं झालं आहे. आपल्या अस्तित्त्वाची लढाई सुरू असताना देशाचा आर्थिक डोलारा कोसळेल की अधिक भक्कम होईल याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. ही फक्त सरकारची जबाबदारी आहे असं म्हणून आपण त्यापासून दूर पळू शकत नाही.

'आर्थिक आणीबाणी'ची सोपी व्याख्या म्हणजे सर्व प्रकारचे अनावश्यक खर्च कमी केले जातात. सध्या आपल्या मंत्रिमंडळानं लोकप्रतिनिधींचे पगार तीस टक्क्यांनी कमी करून हे स्पष्ट केलं आहे. या दरम्यान सरकारच्या नवीन कोणत्याही खर्चिक योजना जाहीर होणार नाहीत. चालू असलेल्या खर्चिक योजनांचाही पुनर्आढावा घेऊन प्राधान्यक्रम ठरवले जातील. अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा ठराविक बाबी वगळता अन्य योजनांवरील खर्च मागे घेऊन तो अशा जीवनावश्यक तरतुदींकडे वळवला जाईल. 

शंकरराव चव्हाण यांनी यापूर्वी 'झिरो बजेट' आणलं होतं. आजच्या परिस्थितीत ते शक्य नसलं तरी आपले खर्च आटोक्यात आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक सवयी बदलणं भाग पडणार आहे. तुमचा खर्च किती यापेक्षा तुमची बचत किती हे नेहमीच महत्त्वाचं असतं हे आता स्वतःच्या मनावर बिंबवायला हवं.  

यातून बाहेर पडायला पुढची काही वर्षे प्रत्येकाला खूप प्रयत्न करावे लागतील. सरकारी पातळीवर जे शक्य आहे ते आपले राज्यकर्ते करतील. किंबहुना त्यांनी ते गंभीरपणे करावं. मात्र या सगळ्यात आपल्यासारख्या सामान्य माणसाची जबाबदारी मोठी असणार आहे.  

मराठी माणूस मनानं मोठा आहे. तो कंजूष नाही. मात्र आता 'कंजूषपणा' आणि 'काटकसर' यातला फरक समजून घेण्याची वेळ आहे. स्वतःच्या अनावश्यक गरजा कमी करणं, काटकसर करणं ही काळाची गरज आहे. पुढची काही वर्षे कोणीही जमीन घेणार नाही, महागड्या गाड्या घेणार नाही. गुंतवणूकीचे अनेक पर्याय बंद होतील. स्वाभाविकच त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. सरकारी पातळीवर सुरू असणारे मोठे प्रकल्प कदाचित थांबवले जातील. मोठमोठे रस्ते, धरणं, विमानतळं अशा प्रकल्पांचा पैसा जीवनावश्यक लोककल्याणकारी प्रकल्पाकडं वळवला जाऊ शकतो. वेतन आयोगाच्या मागं लागलेल्यांचे गलेलठ्ठ पगार कमी केले जाऊ शकतात. या गोष्टींचं भान ठेवून आपल्या खर्चाची स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार आहे. 

शंभर कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यासाठीची त्यांची धोरणं बदलणं क्रमप्राप्त आहे. उद्योजकांनी हतबल न होता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी की आपली माणसं हेच आपलं भांडवल आहे. संपत्ती निर्माण करता येते. ती निर्माण करणारे आपणच असतो. अशा अडचणी येतात, जातात. कोणत्याही परिस्थितीत डगमगुन न जाता संकटाशी चार हात करणं हा आपला स्थायीभाव आहे. 

जागतिक परिस्थितीचा विचार करता आपल्या आयात-निर्यात धोरणांवर याचा फार फरक पडेल असं मात्र वाटत नाही. अनेक अत्यावश्यक उत्पादनांची आयात-निर्यात अपरिहार्य असते. चीनबाबत मात्र अनेक देश अपवाद म्हणून यापुढं वेगळा विचार करू शकतात. या आपत्तीच्या काळातही चीननं काही कोटींचे व्हेंटिलेटर अमेरिकेला विकल्याची बातमी आलीय. त्यामुळं यातील आर्थिक पैलूही लवकरच जगासमोर येतील. यापुढं भारतानं आपली देशांतर्गत उत्पादनं वाढवणं, आपण त्यांना बळ देणं गरजेचं आहे. आपल्या देशातील पैसा, संसाधनं बाहेर जाऊ नयेत याची काटेकोर काळजी घेतल्यास या आपत्तीतून बाहेर पडून आपण जगाचं आर्थिक नेतृत्व करू शकू. 

अमेरिका हा गरीब लोकाचा श्रीमंत देश आहे. त्यांची अर्थव्यवस्था कर्जाच्या डोलाऱ्यावर उभी आहे. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढून आपली चैन पूर्ण करणारा अमेरिकन भारतीयांची बरोबरी कधीही करू शकणार नाही. त्यामुळं आपण मनावर घेतलं तर कोरोना ही भारतासाठी इष्टापत्ती ठरू शकते. 

सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही आर्थिक सेवासुविधा घ्यायच्या नाहीत आणि सरकारला कोणते करही द्यायचे नाहीत, असा एक मतप्रवाह पूर्वीपासून आपल्याकडे आहे. मात्र तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे अंमलात येऊ शकत नाही. 

जाताजाता एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की आपली ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारी तत्त्वावर अवलंबून होती. ती अधिक बळकट करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारनं अधिक भक्कम धोरण राबवायला हवं. आपला महाराष्ट्र सहकारपंढरी म्हणून ओळखला जातो.  स्वाहाकार कमी होऊन सहकार वाढला तर भारत जगाचे आर्थिक नेतृत्व नक्की करेल आणि महाराष्ट्र त्याचा मेरूमणी असेल हे मात्र नक्की. 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
(दैनिक पुण्य नगरी - १० एप्रिल २०२०)

Sunday, March 15, 2020

‘जागर’ समर्थ महासंगमाचा!

उपासनेला दृढ चालवावे । 
भूदेव संताशी सदा नमावे ।
सत्कर्म योगे वय घालवावे । 
सर्वामुखी मंगल बोलवावे ॥
जय जय रघुवीर समर्थ ॥

वेद, उपनिषदं, धर्मग्रंथ वाचणं, साधना, तपश्‍चर्या करणं, देव-देश अन् धर्माच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणं हे आजच्या काळात प्रत्येकाला जमेलच असं नाही. ते जमावं अशी अपेक्षा ठेवणंही खुळेपणाचंच! मग हे सारं साध्य करायचं असेल तर काय करावं? त्यासाठी एक ‘समर्थ’ पर्याय आहे. तो प्रवाह ‘चैतन्य’दायी आणि प्रवाही आहे. मनावरचं मळभ, नैराश्येची पुटं दूर करणारा आहे. संसारात राहून भक्तीयोगाचा अर्थ समजावून सांगणारा आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी आपल्या नित्यक्रमात फार काही बदल करावे लागतील असा तो पर्याय नाही. हा साधा पण आयुष्य बदलून टाकणारा मार्ग म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामींनी घालून दिलेल्या आदर्शांचा अभ्यास करणं, आपल्या जगण्यात त्याचे काही अंश उतरवणं...!

रामदास स्वामी आपल्याला कर्मकांडं शिकवतात का? ते अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलतात का? आपला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन दूर लोटतात का? संसारापासून पळ काढण्याचा सल्ला देतात का? तर त्याचं उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असंच आहे. उलट ते सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका । मग साधावे परमार्थ विवेका ॥

व्यक्तिशः आमच्यावर समर्थ विचारांचा पगडा का आहे? तर त्यांनी ठामपणे सांगितलं की ‘ज्ञानोपासना’ हा भक्तीचाच एक मार्ग आहे. राजकारणही ते बहिष्कृत मानत नाहीत. स्त्रियांना कमी लेखत नाहीत. दुर्बलांचे समर्थन करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत विवेकापासून दूर जात नाहीत. जात-धर्म-पंथ भेदाला थारा देत नाहीत, ‘चोवीस तास देव-देव करत बसा’ असा निष्क्रियतेचा सल्ला देत नाहीत. मुख्य हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपणा । सर्वांविषयी ॥ हा जगण्याचा मूलमंत्र मात्र ते देतात. 

त्याकाळातही त्यांच्याकडं प्रचंड ग्रंथसंग्रह होता ही गोष्ट ‘ग्रंथप्रेमी’ म्हणून आम्हाला नेहमीच सुखावते. औरंगजेबानं त्यांचे अनेक मठ उद्ध्वस्त केले. त्यातील अनमोल ग्रंथ जाळून टाकले. तरीही त्यातील साडेचार हजार ग्रंथ आजही धुळ्याच्या ‘समर्थ वाग्देवता’ मंदिरात उपलब्ध आहेत. हे ग्रंथ त्याकाळी कुणाला वाचायला हवे असतील तर समर्थशिष्य स्वहस्ते त्याच्या प्रती लिहून काढून इतरांना देत. ‘समर्थ प्रताप’ या ग्रंथातील सूचीनुसार त्याकाळी त्यांच्याकडं उपलब्ध असलेल्या ग्रंथसागरात विविध जातीधर्माच्या, पंथांच्या 85 ग्रंथकारांचे ग्रंथ होते. त्यात चोखा मेळा, सेना न्हावी यांच्यापासून ते शेख महंमद यांच्यापर्यंत सर्वांच्या ग्रंथांचा समावेश होता. विविध जातीधर्माचे लोक तिथं त्या ग्रंथांचा अभ्यास करायचे याच्या अधिकृत नोंदी मिळतात. सध्याच्या ‘बारामतीश्वरांनी’ त्यांना जगभरातून भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचं जे भव्य प्रदर्शन मांडलंय इतकं हे काम सोपं नव्हतं. या ग्रंथांच्या अभ्यासासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत नव्हती की त्यासाठी कसलं शुल्क भरावं लागत नव्हतं. जे कोणी ‘ज्ञानोपासक’ आहेत त्यांची ज्ञानाची भूक भागविण्यासाठी त्याला ईश्‍वरोपासनेचं अधिष्ठान देण्यात आलं होतं. 

त्यांना उपेक्षितांचं जगणं कळलं होतं. वंचितांचं अर्थशास्त्र कळलं होतं. स्वराज्याची आणि त्याच्या अस्तित्वाची किंमत ठाऊक होती. भक्ती आणि शक्तीची महती ज्ञात होती. मातृशक्तीची अगाध लीला त्यांनी हेरली होती. वेणाबाईसारख्या बालविधवेला अनुग्रह देणं, तिला कीर्तनाच्या कलेत तरबेज करणं, इतरांना अनुग्रह देण्याचे अधिकार देणं आणि मिरजच्या मठाच्या मठपती बनवणं यातून त्यांची स्त्री-पुरूष समानतेची दृष्टी दिसून येते. समर्थांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्या असलेल्या अक्कास्वामींनी समर्थ संप्रदायाचं नेतृत्व केलं. महत्त्वाचं म्हणजे वेणाबाईंना ‘वेणास्वामी’, अक्काबाईंना ‘अक्कास्वामी’ असं विशेषणही त्या काळापासून लावण्यात येतंय. ‘मातृशक्तीला स्वामित्वाचा अधिकार देणारे समर्थ’ हेच तर खर्‍या पुरोगामित्वाचे मानदंड आहेत. ‘स्त्रियांना आम्ही 33 टक्के आरक्षण दिले’, ‘स्त्री-पुरूष समानतेची शिकवण आम्हीच दिली’ असा वृथा अहंकार बाळगणार्‍यांनी समर्थ चरित्राचा अभ्यास केल्यास त्यांचा अहंकार आणि न्यूनगंड दूर होण्याची शक्यता आहे. 

थोडक्यात काय तर समर्थांनी सर्वप्रकारचा संकुचितपणा दूर सारला. ‘चिंता करितो विश्‍वाची’ असं आपल्या बालवयात सांगणार्‍या समर्थांनी आपल्या सततच्या चिंतनातून समाजाला व्यापक दृष्टी दिली. शारीरिक आणि मानसिक सुदृढतेचं दुसरं नाव म्हणजेच समर्थ रामदास स्वामी! सर्वप्रकारच्या समानतेचा, समरसतेचा बुलंद आवाज म्हणजे रामदास स्वामी!! म्हणूनच ते काळाच्या प्रवाहात अभेद्य राहतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे विचार कालबाह्य होत नाहीत. जगण्याला दिशा देण्याचं काम ते अव्याहतपणे करतात. आजच्या कट्टरतावादाच्या काळात तर कधी नव्हे इतकी त्यांच्या विचार-आचारांची, आचरणाची गरज आहे. 

प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांना अनुग्रह देऊन चारशे वर्षे उलटली. त्यानिमित्त पुण्यातील चैतन्य ज्ञानपीठानं मराठवाड्यातील श्रीसमर्थ जांब या समर्थांच्या जन्मगावी समर्थसंगमाचं आयोजन केलं. त्याची माहिती वाचकांना व्हावी, त्याची अनुभूती मिळावी या उद्देशानं हा अंक या उपक्रमाला समर्पित करत आहोत. 

‘चैतन्य ज्ञानपीठ’ ही नेहमीच्या पठडीतल्या विद्यापीठासारखी बाजारू संस्था नाही. चैतन्याचे मानवी मनोरे उभे करण्याचं असिधारा व्रत जपणारे आणि सशक्त, समर्थ व बलशाली भारताचं स्वप्न साकारण्यासाठी धडपडणारे कर्तबगार समर्थप्रेमी यासाठी पुढं सरसावले आहेत. त्यांची आचार-विचारांची दिशा सुस्पष्ट आहे. म्हणूनच धार्मिकतेचं अवडंबर न माजवता, समाजसेवेचे बुरखे न पांघरता, व्यापारी मनोवृत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन न घडवता ही सर्व मंडळी परोपकार आणि समाजोद्धारासाठी धडपडत आहेत. श्रीसमर्थांच्या विचारांची दिव्य प्रेरणा, समर्थहृदय शंकर देवांचे आदर्श, निर्मळ आणि निकोप वृत्तीच्या कृतिशिलांचं संघटन यामुळं हा रथ वेगात पुढे जाईल याबाबत आमच्या मनात कसलाच किंतू नाही.

जांब येथे झालेल्या समर्थ संगमात अद्रश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, आचार्य स्वामी गोविंददेव गिरी यांनी अनमोल मागदर्शन केलं. चैतन्य ज्ञानपीठाची पुढची दिशा ठरण्यास हे सारं महत्त्वपूर्ण ठरणारं आहे.

श्रीसमर्थ जांब या गावात या महासंगमाचं आयोजन केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. करमळकर यांनी गावातील बुद्धविहाराची स्वच्छता केली. तिथल्या सर्व बांधवांना या समर्थ संगमाचं निमंत्रण दिलं. समर्थांनी घालून दिलेल्या सामाजिक एैैक्याचंच हे प्रतीक आहे. त्यामुळंच सर्व समाजबांधवांनी या उपक्रमात आपली वर्णी लावली. 

भारताच्या नकाशाच्या हृदयस्थानी असलेलं हे छोटंसं गाव गुगलच्या नकाशात दिसतं की नाही हे आम्हास माहीत नाही पण आगामी काळात श्रीसमर्थ जांब हे प्रत्येकाचा अभिमानाचा, गौरवाचा केंद्रबिंदू नक्की असेल याची मात्र खात्री वाटते. हा विश्वास सार्थ ठरवणं ही फक्त ‘चैतन्य ज्ञानपीठा’च्या पदाधिकार्‍यांचीच जबाबदारी नाही तर समाज म्हणून आपलंही ते कर्तव्य आहे. याच सामाजिक भानातून डिसेेंबर 2019 च्या अंकानंतर ‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा अंकही श्रीसमर्थ वंदनेच्या उद्देशानं प्रकाशित करत आहोत. आमच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आणि समर्थ संगमाच्या आयोजन-नियोजनातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या दिलीपराव कस्तुरे काकांचे यामागील परिश्रम आणि त्यांच्या समर्थनिष्ठा अलौकिक आहेत, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करतो आणि थांबतो.
जय जय रघुवीर समर्थ! 
- घनश्याम पाटील
7057292092

Wednesday, March 4, 2020

दुराव्याचा ‘पुरावा’ गवसतो तेव्हा...

काही काही गोष्टी अशा घडतात की, त्याची आपल्याला लाज तर वाटतेच पण आपण अंतर्मुखही होतो. माझ्याबाबतही असंच काहीसं घडलंय.

मी माझं गाव सोडून जवळपास पंचवीसएक वर्षे तरी उलटलीत. इतक्या वर्षात काही प्रसंगानिमित्त तीन-चार वेळा गावाकडं गेलो असेल, तेही एखाद्या दिवसासाठी! मला सख्खे सात चुलते आहेत, चार आत्या आहेत. तीन मामा आहेत. त्यातल्या एक आत्या मध्यंतरी गेल्या.

...तर या काकांना, आत्यांना, चुलत-आत्ते, मामेभाऊ-बहिणींना भेटून मला वीसएक वर्षे तरी ओलांडली असतील. माझे आईबाबा या सर्वांच्या आणि हे सर्वजण आईबाबांच्या नियमित संपर्कात आहेत. मी मात्र दुर्मीळ प्राणी!! त्यांच्याकडं तर कधी जाणं होतच नाही पण ते कधी घरी आले तरी मी नसतो. या सर्वांची लग्नं, इतर कार्ये यातही मला कधी रस वाटला नाही.

माझ्याशी सबंधित असंख्य मुली-बायका मला ‘दादा’ म्हणतात आणि त्या ते नातं निभावतातही. समाजमाध्यमातल्याही अनेक स्त्रिया ‘दादा’च म्हणतात. माझ्या अशा कितीतरी ‘बहिणी’ अनेकदा मोकळेपणे त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मीही त्यांना शक्य ती मदत करतो. काही गोष्टी सुचवतो...

फेसबुकवर अशीच एक ताई मला नियमित फॉलो करते. ‘‘सर प्रकाशकांच्या अडचणी आणि त्यावर तुम्ही शोधलेल्या नवीन वाटा कौतुकास्पद...’’ म्हणून प्रोत्साहन देते. ‘असंख्य वाचकांपैकी एक’ म्हणून मी तिला कधी प्रतिसाद दिला नाही.

मी माझ्या मोबाईलवरचं ‘मेसेंजर ऍप’ उडवलंय. त्यामुळं तिथले संदेश वाचता येत नाहीत. आज खूप दिवसांनी जरा वेळ मिळाल्यानं कार्यालयात संगणकावर फेसबुक उघडलं तर अनेक एसएमएस येऊन पडलेत. 

त्यात त्या ताईचाही संदेश आहे. 15 डिसेंबर 2019 चा तो संदेश मी आज वाचला. त्यात तिनं लिहिलंय, 

‘‘हाय घनश्याम, आय ऍम अमुक तमुक... फ्रॉम औरंगाबाद. युवर कझीन सिस्टर...’’ आणि पुढं बरंच काही...

तिचं तिकडचं आडनाव सुद्धा माझ्या लक्षात न आल्यानं मी तिची प्रोफाईल बघितली तर ती माझ्या मोठ्या काकांची मुलगी. माझी सख्खी चुलत बहीण! तिला मी दुसरी-तिसरीत असताना भेटलो असेल... म्हणजे साधारण 27-28 वर्षे तरी उलटली.

डोळे आपोआप पाणावले. 

या क्षेत्रात काम करताना मी असंख्य बहिणी मिळवल्यात पण घरच्या लोकाकडं अक्षम्य दुर्लक्ष झालंय. त्याची कारणं काहीही असोत पण मी ‘रक्ता’च्या सगळ्या नात्यांपासून कोसो मैल दूर गेलोय.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला माझ्या सख्ख्या छोट्या भावाच्या, श्रीच्या लग्नालाही जाता आलं नव्हतं. 

काहीवेळा आपण हे सगळं कशासाठी करतोय? असाही प्रश्न पडतो. आपण याला ‘समाजासाठी वाहून घेणं’ म्हणतो, पण त्याची खरंच काही गरज आहे का? हजारो-लाखो लोक आपापल्या परीनं मोठमोठी कामं करत असतात. त्यात आपण किती क्षुल्लक! मग हे मी केलं नाही तर असा काय फरक पडणार आहे? कुणावाचून कुणाचं काही अडत नाही! नात्याचे सगळे पाश सोडून असं अलिप्तपणे जगणं खरंच आवश्यक आहे?  

म्हणून मीही आता जरा ‘माणसात’ यावं म्हणतोय! सध्याचे हातातले काही व्याप उरकले की दोन-महिने मस्त सुट्टी घेतो. सगळ्यांच्या गाठी-भेटी (खरंतर ‘ओळख परेड’ म्हणूया!) घेतो. बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो. नातेवाईक, बालसवंगडी यांच्यात रमतो. तेव्हाच्या शिक्षकांना भेटतो.

आज या एसएमएसनं डोळे उघडलेत... कामाच्या, प्रतिष्ठेच्या, राग-लोभाच्या अहंकाराची जळमटं जरा दूर झालीत. माझं या क्षेत्रात येणं माझ्या आईबाबांचा अपवाद वगळता माझ्या घरच्या अन्य कुणालाही आवडलेलं नाही. मी मस्तपैकी एखादी नोकरी करावी, मोठा उद्योग उभारावा असंच सगळ्यांना वाटतं. म्हणून कळत्या वयापासून मी सगळ्यांना जाणिवपूर्वक दूर सारलं. हे क्षेत्र म्हणजे ‘भिकेची लक्षणं’ असंच सर्वांना वाटायचं. ते दिवस मी बदललेत. प्रकाशनक्षेत्रातला एक यशस्वी ‘उद्योजक’ म्हणून मी आता त्यांचे विचार बदलू शकतो. 

पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. या क्षेत्रातलं माझं यश बघून अनेकजण अनेक नाती जोडत असतात. मी कसा त्यांच्या जवळचा आहे हेही सातत्यानं दाखवत असतात. ज्यांनी कायम राग केला, द्वेष केला, सदैव पाण्यात पाहिलं असे अनेकजण माझं त्यांच्याशी असलेलं नातं सध्या उलगडत असतात. त्यामुळं त्यांचं मला फार काही वाटत नाही. जे माझ्या व्यग्रतेमुळं आणि मनातल्या अढीमुळं दुरावले गेलेत, नकळत दुखावले गेलेत त्यांना मात्र जवळ करण्याची वेळ आलीय मित्रांनो.  

समाजमाध्यमामुळं जग एका क्लिकवर आलंय... आपण आपल्या माणसांपासून, परिवारापासून, कुटुंबापासून मात्र कसे आणि किती दूर गेलोय याची व्यक्तिशः मला आज प्रकर्षानं जाणीव झाली. असं म्हणतात की, माणसानं हजार चुका कराव्यात पण एकच चूक हजारवेळा करू नये. मी चुकलो असेन किंवा नसेन! सगळ्यांना नव्यानं जोडून घेणं आणि प्रेम वाटणं हे मात्र दुरापस्त होऊ नये. 

-घनश्याम पाटील
‘चपराक,’ पुणे
7057292092