Wednesday, March 7, 2018

प्राप्त काळ हा विशाल भूधर!

गुरूवर्य राम शेवाळकर म्हणायचे, ‘‘रामाचा आदर्श ठेवायचा तो सत्यवचनासाठी; बायकोच्या त्यागासाठी नव्हे!’’

सध्या मात्र याउलट परिस्थिती निर्माण झालीय. प्रत्येकजण सोयीस्कर भूमिका घेतो. प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक विधानाचे आपल्याला हवे तसे अर्थ लावतो. आपले म्हणणे रेटून नेण्यासाठी वाद आणि वितंडवादही घालतो; पण सत्याच्या तळाशी जाण्यात कोणालाच रस नसतो. ऐकीव माहितीवर मते मांडणे, समोरच्याचे मूल्यमापन करणे यातच यांना धन्यता वाटते. आपल्या सारासार बुद्धिचा वापर करायचाच नाही असा अलिखित करार आपल्याकडच्या विचारवंतांनी केलाय की काय अशी शंका येण्याइतपत बिनडोकपणा ही मंडळी करतात. 

परवा भाऊ तोरसेकर यांच्याशी चर्चा करत होतो. माझ्या एका सहकार्‍याने त्यांना विचारले, ‘‘भाऊ, हिंदुंनी किमान दहा मुलांना जन्म द्यावा’’ असे विधान करणार्‍या भाजप नेत्यांना मोदी आवरत का नाहीत? त्यांना वेळीच दाबले नाही तर ही मंडळीच पक्ष संपवतील असे वाटत नाही का?’’

भाऊंनी छान उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘एकीकडे तुम्हीच ओरडता की, मोदी सगळ्यांची गळचेपी करतात. कुणालाच बोलू देत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून देतात. मग त्यांनी कुणाला समज का द्यावी? कुणाचे आवाज का दाबावेत? पंतप्रधान म्हणून हे त्यांचे काम आहे का? रोज किती वाचाळवीरांना त्यांनी समज द्यावी? त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कुणाला समज द्यावी आणि कुणाला मोकळीक हे सांगणारे आपण कोण? आपल्या सल्ल्यानुसार आणि आपल्याला हवे तसेच त्यांनी इतरांशी सोयीस्करपणे वागावे का?’’

त्यांच्या या बोलण्यावर मित्र अर्थातच निरूत्तर झाला. 

आपले असेच होतेय. प्रत्येक गोष्टीतले आपल्यालाच खूप कळते अशा आविर्भावात आपण मते मांडत असतो. कुणाला चुकीचे ठरवतो तर कुणाला बरोबर! आपल्या मनासारखेच सगळे झाले पाहिजे अशी आपली भाबडी भावना असते. राज्य आणि देश चालवताना काय काय कसरती कराव्या लागतात? कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं याचा मात्र आपण विचार करत नाही. व्हाट्स ऍप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून जे वाचायला, पहायला मिळतं त्यावर आपण आपली मतं ठरवतो. सोबतीला प्रसारमाध्यमं आहेतच.

माध्यम क्षेत्राशी संबंधित एक वाक्य वाचलं होतं. बहुतेक मार्क ट्वेन यांचं असावं. ते म्हणाले होते, ‘‘वृत्तपत्रं वाचली तर तुम्हाला जगाची माहिती मिळेल! आणि नाही वाचली तर चुकीची माहिती मिळणार नाही.’’ सध्या दुर्दैवानं असंच झालंय. दृकश्राव्य माध्यमं असतील किंवा मुद्रित माध्यमं! बातमीसाठी वाटेल ते! मग श्रीदेवीचं निधन कसं झालं हे सांगण्यासाठी आजच्या वार्ताहरांना ‘बाथरूम टब’मध्येही उतरावं लागतं. मस्जिदीत जाऊन वार्तांकन करावं लागतं. हरतर्‍हेच्या वेशभूषा करून वार्तांकन करावं लागतं. बातमीदार कमी आणि सोेंगाड्या जास्त अशी यांची गत!

दुर्योधन हा अत्यंत कपटी, स्वार्थी, आतल्या गाठीचा होता. कोणत्याही परिस्थितीत पांडवांना संपवायचं असा चंग त्यानं बांधला. पांडव हे भाऊ असूनही तो इतक्या टोकाला का आला? कारण भीमासारख्या बलवानानं बालपणापासून कौरवांचा छळ केला होता. म्हणजे हे शंभर भाऊ एखाद्या जलाशयात खेळत असतील तर भीम यायचा आणि त्यांची शेंडी धरून त्यांना पाण्यात बुडवायचा. ही पोरं गटांगळ्या खायची. जर ते झाडावर खेळत असतील तर भीम यायचा आणि ते झाड गदगदा हलवायचा. पिकलेली पाडं टपाटप पडावीत तसं सगळे झाडावरून खाली पडायचे. या बलदंडापुढं कुणाचंच काही चालायचं नाही. यातूनच दुर्योधनाच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण झाला. त्यातून पराकोटीची सूडभावना निर्माण झाली. इतकं करूनही पांडव पराभूत होत नाहीत हे पाहून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. एकप्रकारची हतबलता निर्माण झाली. हतबलतेची जागा द्वेषानं, मत्सरानं, सूड भावनेनं घेतली. त्यातून पुढं इतका मोठा विध्वंस घडला. सगळे भाऊ मारले गेले. हस्तिनापूरनगरी बेचिराख झाली.

आपलंही असंच होतंय. आपल्या मनातील शत्रूला आपण सातत्यानं डिवचतोय. त्याला कमी लेखतोय. यातूनच नैराश्य येतंय आणि आपण त्यांनाच बळ देतोय! त्यामुळं त्यांच्याकडूनच आपला खात्मा सहजशक्य आहे. त्यासाठी वेगळ्या शत्रूंची मुळात गरजच नाही. आपल्या मनातील विकार आपल्याला स्वस्थ बसू देतच नाहीत मुळी! त्यातून काय काय प्रसंग ओढवतात याचंही गांभीर्य आपणास नाही.

‘चपराक’ परिवाराचे सदस्य आणि सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्याकडं परवा खेड तालुक्यातल्या पूर या गावातली काही मंडळी आली होती. ते सांगत होते, पूर हे कवी नामदेव ढसाळ यांचं गाव! या गावात पद्मश्री ढसाळांचं यथोचित स्मारक व्हावं, त्यांच्या नावे अद्ययावत ग्रंथालय उभारावं यासाठी राज्य शासनाकडून काही कोटींचा निधी मंजूर झालाय. असं असलं तरी गावकर्‍यांचा मात्र येथे स्मारक उभारणीस विरोध आहे. हा विरोध आता-आता सुरू झालाय. किंबहुना येथे पद्मश्री नामदेव ढसाळांचं स्मारक व्हावं म्हणून जे प्रयत्न करत होते त्यांनीच या विरोधाचं शस्त्र उगारलंय.

आपल्या बंडखोरीनं मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून देणार्‍या या ‘निळ्या पँथर’ने वाङमयविश्‍व समृद्ध केलं. त्यामुळं त्यांच्या स्मारकाला विरोध का होतोय हे जाणून घेतल्यास आपली मान शरमेनं खाली जाईल. किंबहुना आधी ‘पद्मश्री ढसाळांच्या स्मारकाला गावकर्‍यांचा विरोध’ ही बातमी ऐकूनच संताप आला होता; मात्र त्यांची बाजू समजून घेतल्यास संतापाऐवजी मनात वैषम्य दाटून आलं.

स्पष्टच लिहायचं तर संबंधित ग्रामस्थ म्हणाले, ‘‘आमच्या गावकर्‍यांना भीती आहे की दुर्दैवानं उद्या आमच्या गावात दुसरे ‘कोरेगाव भीमा’ उसळले तर काय घ्या! ते आरिष्ट्य येण्याऐवजी हे स्मारकच नको! आम्ही ढसाळ साहित्यातून जिवंत ठेवू!’’

मला वाटतं यावर आणखी वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही.

महाराष्ट्रातल्या गावागावात गेलात तर सध्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. प्रत्येक गोष्टीला जातीय, राजकीय रंग द्यायचे! कोणतीही विचारधारा अशा ‘कट्टरतावादा’पासून दूर नाही. ही ‘जिवंत प्रेतं’ पाहून कोणत्याही विचारी माणसाच्या मनाचा थरकाप उडेल. मुख्य म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे असंख्यजण रोज कित्येकदा मरतात. 

असं म्हणतात की, मृत्यू हे शाश्वत सत्य असतं! पण हे असं इतकं सहजपणे मरण येणं बरं नाही. खरं सांगतो, मी माझ्या उभ्या आयुष्यात एकदाही मेलो नाही. आजूबाजूला अनेकांना रोजच मरताना मात्र पाहतोय!

मोठी स्वप्नं न पाहणं, त्याच्या पूर्तीसाठी अहोरात्र परिश्रम न घेणं म्हणजे मरण!

स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून लाचारीनं जगणं म्हणजे मरण!

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा निमुटपणं भोगत राहणं, आपल्यावरील अन्यायाविरूद्ध आवाज न उठवणं म्हणजे मरण!

परिस्थितीपुढं हतबल होत तडजोडी करणं, त्यातून न्यूनगंड आणि नैराश्य येणं म्हणजे मरण!

त्यामुळं आपलं आयुष्य आपण बेदरकारपणे जगायला हवं. अगदी कशाचीच तमा न बाळगता... पावलापावलाला संघर्ष करावा लागला, दुःखाचे डोंगर फोडावे लागले, सगळी आमिषं लाथाडावी लागली तरी आपण आपलं इप्सित गाठायलाच हवं. त्यासाठी अंगी थोडंसं ‘माणूसपण’ येणं गरजेचं आहे. 

परवा आणखी एक अत्यंत दुर्दैवी बातमी कळली. ही बातमी बातमीदारांचीच आहे. आजूबाजूचं सत्य तटस्थपणे वाचकांसमोर आणणारे, इतरांना न्याय मिळावा म्हणून धडपडणारे, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे अनेक पत्रकार आजही आहेत. भांडवलदार वृत्तपत्रांच्या मालकशाहीपुढं त्यांचं फारसं काही चालत नसलं तरी अनेकांनी या क्षेत्रासाठी सर्वस्व पणाला लावलंय. असो. मुख्य विषयाकडं वळतो.

मराठीतल्या एका बड्या वृत्तपत्रानं सध्या कामगार कपतीचं धोरण स्वीकारलंय. त्यांना जास्तीत जास्त जुनी लोकं कमी करायचीत आणि कमी पगारावर नवख्यांना राबवून घ्यायचंय. मग त्यांनी एक ‘ऑफर’ दिली... त्यांनी फर्मानच काढलं की, ‘ज्यांची नोकरी दहा वर्षे राहिलीय त्यांनी पुढच्या वीस महिन्यांचा पगार घ्या आणि घरी बसा!’

त्यांचं म्हणणं कोणी ऐकलं नाही तर त्यांच्या दूरदूरवर बदल्या केल्या. त्यांच्यावर सातत्यानं काही ना काही आरोप करून मग त्यांना अपमानास्पदरित्या काढलं जातंय. याहून गंभीर बातमी पुढं आहे. खरंतर ती ऐकल्यापासून हृदयाचं पाणी पाणी होतंय. इतरांसाठी हिरिरीनं भांडणारे पत्रकार आपल्या रोजीरोटीचा विचार करून गप्पगार आहेत.

ज्या संस्थेनं ही जुलूमशाही चालवलीय त्यांनी एका वरिष्ठ पत्रकाराला सांगितलं की, ‘तुम्हीही घरी बसा.’ हे पत्रकार अर्धी चड्डी घालायचे तेव्हापासून या वृत्तपत्रात कार्यरत होते. सगळ्या विभागात त्यांनी काम केलं. ‘आपण भले आणि आपले काम भले’ असा त्यांचा बाणा! रात्री साडेदहाला ‘शिफ्ट’ संपूनही ते सर्व पाने छपाईला जाईपर्यंत म्हणजे रात्री एक-दीड पर्यंत काम करायचे. अर्थात, कार्यालयात यायला पंधरा मिनिटं उशीर झाला तरी ‘हाफ डे’ पडायचा; मात्र रोज रात्री तीन-साडेतीन तास जादा काम करणं (विनातक्रार आणि विनामानधन) हा संस्थेचा शिरस्ताच! त्यामुळं त्यांचाही नाईलाज होता. या पत्रकाराची संस्थेप्रतीची ही निष्ठा पाहून इतर काही बड्या वृत्तपत्रांनी त्यांना नोकरीची ‘ऑफर’ दिली होती. असे असले तरी प्रत्येक ध्येयवान माणसात एक कीडा असतो. तो त्यांच्यातही होता. आता वेळ आणि सोबतच वयही निघून गेल्यानं इतर वृत्तपत्रंही विचारत नव्हती आणि ते ज्या वृत्तपत्राला ‘मातृसंस्था’ मानायचे त्यांनी तर त्यांना घरी बसण्याचा हुकूम दिला. मुलाचं शिक्षण चालू. मुलगी लग्नाला आलेली. या वयात ‘नोकरी गेली’ हे घरी तरी कसं सांगणार?

मग ते रोज घरून डबा घेऊन यायचे. एका बागेत बसून खायचे आणि इकडं तिकडं भटकून रात्री घरी जायचे. महिनाभर त्यांचा हाच दिनक्रम! आणि तो काळा दिवस उगवला. नैराश्य आणि हतबलतेतून त्यांनी आत्महत्या केली...

इतरांसाठी कायम संघर्ष करणार्‍याचा असा दुर्दैवी आणि करूणामय अंत झाला; मात्र संबंधित वृत्तपत्रातील महत्त्वाचे संपादक किंवा मालक अंत्यविधीलाही फिरकले नाहीत. 

इथे दिसतो माध्यमांचा फक्त व्यवसाय! त्यांना मिळणारा अघोरी नफा आणि नफा! बस्स!! 

इथं सर्वच क्षेत्र बरबटलीत! आभाळच फाटलं तर ठिगळं कुठं कुठं घालणार?

तरीही आपण खचता कामा नये. 

हे दिवस बदलण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे. 

कोणतीही क्रांती अशीच होत असते. त्यासाठी कुण्या ‘अवताराची’ गरज 
पडत नाही. ते फक्त आपल्या मनाचे समाधान!

जे जे चुकीचं वाटतं त्याला प्राणपणानं विरोध करूया. पूर्वग्रह बाजूला ठेवून जे जे चांगले आहे ते सर्व मोठ्या मनानं स्वीकारूया!  मुख्य म्हणजे अल्पसंतुष्ट न राहता सतत नव्याचा ध्यास घेऊया! 

गुढीपाडवा म्हणजे आपलं नववर्ष! त्यानिमित्त निर्भय आणि निर्मळ होण्याचा प्रयत्न करूया!

शेवटी कवीवर्य केशवसुतांच्या भाषेत सांगतो,

प्राप्त काळ हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा!
निजनामे त्यावरती गोंदा
विक्रम करा चला उठा तर....!
- घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Tuesday, February 6, 2018

संमेलनाची शंभरी!

यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होत आहे. हे 91 वं संमेलन असल्यानं त्याची वाटचाल शंभरीकडं सुरू आहे. दरवर्षी असं साहित्य संमेलन घेणारी मराठी ही जगातली एकमेव भाषा असावी. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बडोद्यात होणारं हे पहिलंच संमेलन आहे. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यात तीन साहित्य संमेलनं झाली होती. 1909, 1921 आणि 1934 साली झालेल्या या संमेलनांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि बडोद्याचे सुपूत्र चिं. वि. जोशी हे होते. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत देशमुख. पहिल्या तीन नावांची आणि देशमुखांची तुलना कुणीही करू नये! अशी तुलना अप्रस्तुत आहे. ‘खांडेकर-शिरवाडकरांच्या तुलनेचे साहित्यिक आज नाहीत,’ असं काही संपादक सांगत असले तरी ‘आज अत्रे-भावेंच्या तुलनेचे संपादकही नाहीत’ हेही सत्य आपण ध्यानात घ्यायला हवं. सगळ्याच क्षेत्रातला कस हरवत जाणं हा तर काळाचा महिमा आहे. त्यामुळं ‘आलिया भोगासी असावे सादर...’ म्हणत नव्या आव्हानांना सामोरं जायला हवं. 

कोणती आहेत ही आव्हानं? नव्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल? मराठी भाषेच्या अस्तित्वाची गेल्या काही काळात होणारी चर्चा कशाचं द्योतक आहे? या व अशा सगळ्या प्रश्नांचा आपण गांभिर्यानं विचार केला पाहिजे.

आपण आधी साहित्य संमेलनांचा विचार करूया! आपल्याकडं आधी ‘ग्रंथकारांचं संमेलन’ होतं. 1909 साली बडोद्यात झालेलं सातवं साहित्य संमेलन ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ म्हणून ओळखलं गेलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1954 साली दिल्लीत झालेल्या या संमेलनाची ही प्रादेशिक ओळखही पुसली गेली आणि ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झालं. या नावाचा असा व्यापक विस्तार करण्यामागं त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मराठी ही जगातील प्रमुख वीस भाषांपैकी एक भाषा आहे. त्यामुळं ते अखिल भारतीय व्हावं असं त्यांना वाटणं रास्तच आहे. आजची परिस्थिती मात्र फारच वेगळी आहे. आज या संमेलनाचं शब्दशः डबकं झालंय.

गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनांची झालेली घसरण हा चिंतेचा विषय आहे. कोणीही उठतंय आणि समंलनाध्यक्ष होतंय. बरं, त्यांना दुषणं द्यावीत तर ते साहित्य महामंडळाच्या घटनेकडं बोट दाखवतात. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवतात. त्यात काय राजकारण होतं? कोणत्या खटपटी-लटपटी केल्या जातात, त्यांचा चेहरा आणि मुखवटा कसा असतो? हे सर्व यापूर्वी आम्ही ‘चपराक’च्या वाचकांसमोर आणलंच आहे. 

औरंगाबादला कौतुकराव ठाले पाटील नावाचे एक गृहस्थ आहेत. या माणसाच्या नावापासूनच मला कौतुक वाटतं. साहित्यिक राजकारणातला हा ‘ढाण्या वाघ’ आहे. आजवर त्यांनी अनेक ‘चिरकुटांना’ संमेलनाध्यक्ष केलं आहे. त्यांनी ठरवलं तर शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजित पवार असतील! तसं झालं तर आयोजकांना निधी गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. संमेलनात मद्याचे पाट वाहतील. सहभागी साहित्यिकांना उत्तम प्रतीचं शाकाहारी-मांसाहारी जेवण मिळेल. निवासाची पंचतारांकित व्यवस्था होईल. प्रसारमाध्यमांना वेगळे ‘प्रायोजक’ शोधावे लागणार नाहीत. संमेलनात नाचवण्यासाठी जगभरातील ‘हव्या त्या’ देखण्या ‘मॉडेल्स’ बोलावल्या जातील. सनी लिओनी किंवा पुनम पांडेसारख्या तेव्हाच्या ज्या कोणी ‘स्टार’ असतील त्या त्यांची ‘कला’ सादर करण्यासाठी निमंत्रित केल्या जातील. आयोजकांपुढचा गर्दी गोळा करण्याचा प्रश्‍न सुटेल आणि अशा निमंत्रितांमुळं ती नियंत्रित कशी करावी? असा काहीसा प्रश्‍न पडेल. गेल्या काही वर्षातले अध्यक्ष, साहित्यिक आणि साहित्य संस्थांचं राजकारण, संमेलनातील साहित्यिक कार्यक्रम हे सर्व पाहता वरचं ‘चित्र’ सहजपणे सत्यात येऊ शकतं. म्हणूनच संमेलनाची शंभरी भरत चाललीय असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये!

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले उमेदवार शरद पवारांपासून नितिन गडकरीपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवतात. काही बड्या वृत्तपत्राचे संपादक एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांचं अस्तित्व पणाला लावतात. काही संपादक थेट निवडणुकीला सामोरं जात त्यांच्या त्या त्या भागातील वार्ताहरांना मतदारांची यादी देऊन मतपत्रिका हातात घेण्यासाठी पिटाळतात. काहीजण समीक्षकांना-प्रकाशकांना मेजवान्या देतात आणि त्यांचे त्यांचे ‘मतदार लेखक’ गाठण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकाशकही आपापले लेखक संमेलनाध्यक्ष व्हावेत आणि आपली पुस्तकं खपावीत यासाठी प्रयत्नशील असतात. इच्छुक उमेदवार तयारीला लागल्यापासून आधी पाच-दहा वर्षे पेरणीही उत्तम करतात. साहित्य वर्तुळातील महत्त्वाच्या लोकांचे सातत्यानं दिवे ओवाळणं, त्यांच्या पुस्तकांवर गौरवपूर्ण परीक्षणं लिहिणं, त्यांचे सत्कार-सोहळे घडवून आणणं, त्यांची जितकी तळी उचलता येतील तितकी उचलणं हे सारं काही करतात. किंबहुना कोणते साहित्यिक प्रांतवाद जपतात, कोणाची कोणती विचारधारा असते, कोण कोणत्या जातीचा अभिमान बाळगणारे आहे, कोणाचे कुणाशी हितसंबंध आहेत, कोण कुणासोबत ‘मधुर’ संबंध जोपासतोय या सर्वांचा त्यांचा कमालीचा अभ्यास असतो. म्हणूनच संमेलनाध्यक्षाची प्रतिभा, त्याचा साहित्यिक वकुब, त्याचं वाचन, भाषेचं ज्ञान, सामाजिक आणि साहित्यिक भान, त्याचं व्याकरण, त्याचं निर्मळ अंतःकरण या व असल्या मूल्यांना या बाजारात काही किंमत नाही.

येनेकेनप्रकारे संमेलनाध्यक्ष होणं, सगळीकडं मिरवून घेणं, नंतर वर्षभर वाटेल ती उथळ विधानं करून चर्चेत राहणं हेच या लोकांचं जीवितकर्म झालंय. आपल्याकडं ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ म्हटलं जायचं; पण या बिनडोक लोकांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचे कौतुकसोहळे पाहता समाजाचीही कीव कराविशी वाटते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रसिद्धीची जबाबदारी पाहणारे, त्यांच्या मतपत्रिका घरोघरी जाऊन गोळा करणारे दलाल हमखास साहित्य संमेलनात ‘निमंत्रित’ म्हणून सहभागी असतात. गेल्या काही काळातल्या निमंत्रणपत्रिका पाहता ही नावं सहजपणे कुणाच्याही लक्षात येतील. 

बरं, संमेलनाध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची मजल कुठपर्यंत जावी? तर.. ‘‘मी निवडून आल्यास इतक्या कोटीचा प्रायोजक संमेलनासाठी मिळवून देतो’’ अशी हमी ते आयोजकांना देतात. मग त्यांच्या मतांचा ‘कोटा’ कुणाच्या पारड्यात पडेल हे सांगायलाच नको. पिंपरीत झालेल्या साहित्य संमेलनाचे आयोजक ‘गब्बर’ होते. त्यांनी मात्र साहित्यक्षेत्रावर पैशांची खैरात केली. पी. डी. पाटील नावाच्या एका धनदांडग्याचा आर्थिक उन्माद प्रत्येकाला दिसत होता. तेव्हाचे अध्यक्ष तर सोडाच पण माजी अध्यक्षांनाही त्यांनी लाखोंच्या थैल्या दिल्या. बाकीच्यांचे सोडा, पण सदानंद मोरे, नागनाथ कोत्तापल्ले अशा ज्येष्ठांनीही हे पैसे स्वीकारले. ‘शिक्षणसम्राट’ म्हणून मिरवणार्‍यांकडून असे पैसे घेताना आम्हाला संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘भाट’ झालेले दिसत होते. सरकारकडून निधी स्वरूपात मिळणारे पंचवीस लाख रूपयेही परत करणारे पाटील हे  कदाचित एकमेव आयोजक असावेत. जे ‘लक्ष्मीपूत्र’ म्हणूनच कुविख्यात आहेत त्यांच्याकडं तथाकथित ‘सरस्वती मातेचे उपासक’ पाणी भरत होते.

यंदाची परिस्थिती याउलट आहे. ‘सहभागी लेखकांनी प्रवासखर्च आणि मानधनाचीही अपेक्षा ठेऊ नये’ असं आयोजकांनी जाहीर केलं आहे. हाही सगळा काळाचा महिमा! आमचे उस्मानाबादवाले गेली कित्येक वर्षे साहित्य संमेलन घ्यायची तयारी करत आहेत. ‘आमच्याकडे या, साधी चटणी-भाकरी खा आणि साहित्यिक कार्यक्रम करा’ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना मात्र ती संधी दिली जात नाही. कारण यांच्या ‘हरतर्‍हेच्या’ मागण्या कशा पूर्ण होतील?

पिंपरीतील थाटामाटाचं दडपण आल्यानं मागच्या वर्षी डोंबिवलीच्या  साहित्य संमेलनाकडं अनेक साहित्यरसिकांनी पाठ फिरवली. आमचा सुनील जवंजाळ सांगोला तालुक्यातील चोपडीसारख्या दुष्काळी गावात त्याच्या कादंबरीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम घेतो; तरी हजार-पाचशे लोक सहजपणे जमतात; मात्र डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाला जेमतेम शे-दीडशे लोक उपस्थित असणं हे कशाचं लक्षण आहे? वर्षानुवर्षे निष्ठेनं साहित्य संमेलनाला येणारे साहित्यरसिकही संमेलनाकडं का पाठ फिरवत आहेत याचा विचार झाला नाही तर संमेलन म्हणजे केवळ एक सोपस्कार उरेल.

साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमांचीच अधिक चर्चा होते. कोणत्या नट-नट्या सहभागी झाल्यात, उद्धाटनाला कोण येणार, राजकीय नेते काय गंमतीजमती करणार, कोण कुणाची खेचणार, कोणते नवे वाद उद्भवणार, इतकेच काय तर जेवणाचे ‘मेन्यू’ काय असणार यावरच आमच्याकडे अधिक चर्चा होते. संमेलनात वर्षानुवर्षे तेच ते ठराव मांडले जातात. बेळगावसारख्या विषयावर ठराव मांडणे हा केवळ सोपस्कारच झालाय का? त्यांच्या वेदना आपल्याला खरंच कळल्यात का? कळल्या असतील तर संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष, आयोजक आणि अर्थातच पर्यायानं सरकार त्यावर वर्षभर काय विचार करतं, काय कारवाई करतं? हे तपासलं तर आपल्याला नैराश्यच येईल. मग साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गुळाचा गणपती, संमेलन म्हणजे बैलबाजार किंवा संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग अशी टीका झाली तर त्यात गैर ते काय?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर केली आणि तो कवी महाराष्ट्रापुढं ताकतीनं आला अशी उदाहरणं मोजकीच आहेत. संमेलनाध्यक्ष, आयोजक आणि साहित्य संस्थांच्या पदाधिकार्‍यापुढं लाळघोटेपणा करणारे तेच ते कवी मराठीला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी काय घंटा योगदान देणार? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? म्हणून हे ग्रहण सुटलं पाहिजे. आज खेड्यापाड्यात जी छोटी संमेलनं होतात ती या अखिल भारतीयच्या तुलनेत अधिक दमदार होतात. सातारा ग्रंथ महोत्सवाला जी प्रतिष्ठा प्राप्त झालीय तितकीही प्रतिष्ठा अखिल भारतीयला राहिली नाही. उलट महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणतात, ‘‘हे फक्त प्रदर्शन आहे, विक्री केंद्र नाही. त्यामुळं इथं या, तुमच्या पुस्तकाची एक एक प्रत दाखवा आणि निघा....’’ मग साहित्य संमेलनात ‘ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री’ या कारणासाठी विक्रेत्यांकडून आणि प्रकाशकांकडून भाडं वसूल करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? ‘साहित्य महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. प्रत्येकानं किमान एक-एक रूपया द्यावा’ अशी अपेक्षा व्यक्त करूनही तुमच्या आवाहनाला कोणी भीक घालत नाही त्याची हीच कारणं आहेत. साहित्याविषयी, साहित्य संस्थांविषयी, साहित्यिकांविषयी नव्या पिढीला आदर नसण्याचं द्योतक अशा लोकांच्या मानसिकतेत आहे. 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या पुस्तकांविषयी नव्या पिढीला विचारा. त्यांची चार-दोन पुस्तकं सांगता आली तरी खूप झालं. सदानंद मोरेंना राजकीय पाठबळ असल्यानं किंवा उत्तम कांबळे बर्‍याच काळ एका बड्या वृत्तपत्राचे संपादक राहिल्यानं ‘साहित्यिक चर्चेत’ तरी आहेत. सबनीसांसारखा वाचाळवीर मात्र रोज नवनवे वाद आणि वितंडवाद घालत असताना त्यांची किती पुस्तकं आजच्या तरूणाईपर्यंत गेलीत? अक्षयकुमार काळेसारखा ‘विद्वान’ अनेक विषयांवर ‘संशोधन’ करून लिहितो पण ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचतं का? फ. मु. शिंदेसारख्या मंचीय कवीच्या त्याच त्या कविता किती काळ ऐकणार? लक्ष्मीकांत देशमुख त्यांच्या ‘प्रशासकीय’ मानसिकतेतून बाहेर पडलेत का? रा. ग. जाधव, द. भि. कुलकर्णी अशा दिग्गजांची समीक्षा सामान्य वाचकांपर्यंत पोहोचलीय का? नसेल तर यासाठी साहित्य संमेलनांनी, साहित्य संस्थांनी किंवा आपल्या सरकारनं काही भरीव केलंय का? 

एखाद्या वर्षी साहित्य संमेलन रद्द करा आणि काही चांगली पुस्तकं प्रकाशित करा. भले, इथंही कमिशनबाजी केली तरी चालेल पण काही प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं विकत घेऊन ती शाळा, महाविद्यालयांपर्यंत, खेड्यापाड्यातील ग्रंथालयांपर्यंत पोहोचवा. काही पुस्तकांवर चर्चा घडवून आणा. लेखक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवा. तुमची संमेलनातील अय्याशी आणि मिरवून घेण्याची हौस यापेक्षा हे निश्चितच महत्त्वाचं आहे. 

एकीकडं परंपरा-परंपरा म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडं आपणच भाषेचा, साहित्याचा खून करायचा हे काही बरं नाही. आजच्या पिढीनं सकस साहित्य वाचावं, त्यांच्यात ‘विचार’ करण्याची क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. साहित्य संमेलनाचं जत्रा-यात्रांचं स्वरूप भाषेची धुगधुगी जिवंत ठेवतं हे जरी खरं असलं तरी ‘अशा जगण्यापेक्षा मरण परवडलं’ असं वाटायला नको. 

मुळात आपण ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या संदेशाप्रमाणे खूप अल्पसंतुष्ट आहोत. म्हणजे एखाद्याला महिना चाळीस हजार रूपये पगार असेल तर तो म्हणेल, ‘मला देवानं भरपूर दिलंय. मी आहे त्यात समाधानी आहे.’ पण वस्तुस्थिती ही असते की साल्या यापेक्षा जास्त कमावण्याची तुझी लायकीच नाही! तू ना कुठला चांगला व्यवसाय करून यशस्वी होणार ना तुझा पगार चाळीस हजारांवरून दहा लाखावर जाणार! मग तुला ‘समाधान’ मानण्यावाचून पर्यायच नाही. तशी आपलीच फसवणूक आपणच करू नये! साहित्य संमेलनं किती महत्त्वाची आहेत, ती कसा साहित्यिक झरा पाझरत ठेवतात, त्यांचं साहित्यिक योगदान किती मोठं आणि श्रेष्ठ आहे हे सांगताना यात आणखी काय विधायक आणि सकारात्मक बदल घडवता येतील, ते जास्तीत जास्त सर्वसमावेशक कसे होईल, इथं केवळ आणि केवळ निखळ साहित्यालाच कशी प्रतिष्ठा मिळेल, सर्व राजकारण बाजूला सारून गुणवंतांना संमेलनं कसा न्याय देतील या दृष्टिनं विचार झाला पाहिजे. 

असं झालं तरच संमेलनाध्यक्ष तीन दिवसाचा गुळाचा गणपती वाटणार नाही. साहित्य संस्थांविषयी लोकांच्या मनात प्रेमभाव निर्माण होईल. साहित्यिकांविषयी आदर वाटेल! आणि नाही झाले तर शंभरीकडं वाटचाल करणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शंभरी भरेल हे नक्की!
घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
चलभाष - 7057292092

Monday, January 8, 2018

चला, माणूस होऊ या!



पुण्यात नुकतीच ‘एल्गार’ परिषद झाली. 
‘एल्गार’ म्हणजे काय?
...तर ‘बेसावध क्षणी शत्रूवर केलेला आकस्मिक हल्ला’ म्हणजे ‘एल्गार’!
मग आता या परिषदेचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं? त्यांचे शत्रू कोण? आणि त्यांच्याविरूद्ध एल्गार पुकारण्यासारखं काय घडलं?
तर याचंही उत्तर सोपं आहे.
आपल्या राज्यात आणि देशात मोठं सत्ता परिवर्तन घडलं. नव्या सत्ताधार्‍यांच्या विरूद्ध केलेला ‘हल्लाबोल’ म्हणजे हा ‘एल्गार!’
कोणी याला ‘हल्लाबोल’ म्हणतं तर कोणी ‘एल्गार!’
फक्त शब्दातच काय तो बदल! भावना मात्र त्याच! 
त्यात विरोध आला, द्वेष आला, सूड आला!!
मग हा सूड उगवण्यासाठी पुढाकार कोण घेणार?
युद्धात ‘मास्टर माईंड’ कोणीही असू द्यात; काही प्यादे मात्र पुढं करावे लागतात. 
ते लढतात, लढवतात, मरतात, मारतात! 
महाराष्ट्रातल्या या ‘रणभूमी’त यांनी पुढं केलं ते गुजराती आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना! 
जिग्नेशला कॉंग्रेसचा जोरदार पाठिंबा! 
आणि हो! बरोबर ओळखलंत... खालीद तोच! 
त्यानंच वेळोवळी देशविघातक भूमिका घेऊन दहशतवाद्यांना, देशद्रोह्यांना सातत्यानं मदत केलीय. अफजल गुरूच्या समर्थनार्थ उभं असताना ‘भारत तेरे तुकडे होंगे...’ अशा घोषणा देणारा हा उमर!
जिग्नेशला निवडणुकीसाठी ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनांनी अर्थसाह्य केल्याचे फोटोही मध्यंतरी ‘व्हायरल’ झाले होते.
मग या मंडळींनी पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या या परिषदेत सहभाग घेतला. त्यांना म्हणे ‘पेशवाई’ संपवायचीय.
यांची भूमिका म्हणे ‘धर्मनिरपेक्ष’ असते. 
ब्राह्मणांना झोडपणे म्हणजे यांचे पुरोगामित्व! 
आणि जात-पात न मानण्याचं आवाहन करत, मुख्यमंत्र्यांची जात काढत, त्यांच्या नेतृत्वाला ‘पेशवाई’ ठरवणं ही यांची जातीनिरपेक्ष भूमिका!
सध्या देश ‘गुजराती’ लोकांच्याच हातात आहे. मोदी असोत किंवा शहा! या नेत्यांसोबत संघर्ष करणं येरागबाळ्याचं काम नाही. 
पराक्रमाची परंपरा सांगणार्‍या अनेकांनी त्यांच्यापुढं नांग्या टाकून सपशेल शरणागती पत्करलीय.
मग यांना कन्हैयाकुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी असे ‘प्यादे’ लागतात! अल्पावधीत कॉंग्रेस गवतासारखे उगवलेेले हे कर्तृत्वशून्य लोक यांचे ‘नेते’ झाले. म्हणून त्यांची सर्वप्रकारची बडदास्त राखणं हे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍यांचं कर्तव्यच! 
या जिग्नेशचा आवाका तो केवढासा?
परावलंबी बांडगुळाची वाढ तशी फारशी होत नसतेच! 
त्यामुळं शनिवारवाड्यावर होणार्‍या या एल्गार परिषदेकडं माध्यम प्रतिनिधींपैकी कोणी फारसं फिरकलं नाही.
आपापल्या विचारधारा पुढं दामटत सुरू असलेलं हे सरळसरळ राजकीय युद्ध आहे.
त्यातून चांगलं काही घडेल अशी अपेक्षा ठेवताही येणार नाही.
द्वेषाच्या पायरीवर उभारून कधी क्रांती घडत नसते. त्यामुळं एकमेकांशी संवाद साधायला हवा. 
मात्र असा संवाद साधला तर यांच्या स्वार्थाची पोळी भाजली जाणार नाही. त्यामुळं यांनी सुरू केलं द्वेषाचं राजकारण!
या जिग्नेशच्या विकृत मनोवृत्तीची आणि आगलाऊ स्वभावाची कल्पना असल्यानं एक युवक या परिषदेला गेला. 
अक्षय बिक्कड हे त्या विचारी तरूणाचं नाव! 
अक्षयचे काही लेख आपण यापूर्वी ‘चपराक’च्या अंकात वाचले आहेतच. मागच्या म्हणजे डिसेंबर 2017 च्या ‘चपराक’ मासिकाची मुखपृष्ठ कथाही त्याचीच होती. यापूर्वी त्यानं आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन ‘पारंबी’ या दिवाळी अंकाचं संपादन केलं होतं.
अक्षयनं जिग्नेशचं सर्व भाषण ऐकलं. ते संपूर्ण भाषण रेकॉर्डही केलं. त्यात जिग्नेशने आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांनी उपस्थितांची माथी भडकवली. अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरत ‘दोनशे वर्षापूर्वीच्या पेशवाईच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची’ अपेक्षा व्यक्त केली. 
गेली वर्षभर त्यांचं हे नियोजन सुरू होतं. 
1 तारखेला कोरेगाव भीमाला काहीतरी विध्वंसक घडणार हे अक्षयनं गेल्याच आठवड्यात त्याच्या फेसबुक पेजवर स्पष्टपणे नोंदवलं होतं. त्याविषयी एकानं लिहिलेल्या पुस्तकातील एका पानाची प्रतही त्यानं शेअर केली होती. मात्र तिकडं कोणीच लक्ष दिलं नाही.
धोक्याची पूर्वसूचना मिळूनही काहीच कारवाई न करणारे बघे हे सुद्धा आपल्यापुढचं मोठं संकटच आहे. 
अक्षय हे भाषण रेकॉर्ड करून थांबला नाही. त्यानं जिग्नेश आणि खालिद यांच्याविरूद्ध अधिकृत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला आणि अनेक माध्यमे खडबडून जागी झाली.
हे रेकॉर्डिंग कुणाकडंच नव्हतं. त्या परिषदेला माध्यम प्रतिनिधींपैकी कुणी उपस्थितही नव्हतं.
अशा गढूळ वातावरणात तडफडत राहण्याऐवजी अक्षयनं कृतिशिलता दाखवली. त्याची सर्वत्र दखल घेतली गेली. आंबेडकरी बांधवांपुढं भडक भाषणं देऊन ही सर्व गँग निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांच्या बंगल्यावर 31 डिसेंबरची पार्टी साजरी करत होती हे अक्षयनं मांडलं. 
कोरेगाव भीमाला जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. मात्र अशा ‘द्वेष निर्मिती कारखान्याचे’ काय? संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर ऍट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. खरेच यात त्यांची काही भूमिका होती का? किंबहुना असे काही घडविण्याची त्यांची क्षमता तरी आहे का? हे सर्व यानिमित्त पडताळून पाहिलं पाहिजे.
उमर खालिद म्हणाला, ‘‘1808 च्या लढाईचा इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे. आजची लढाई ही संविधानिक मार्गाने होणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल...’’ म्हणजे तुम्हाला पुन्हा सशस्त्र लढाई करायची आहे का? कोरेगाव भीमाला जे घडले त्यात अशा वक्तव्याचा काहीच वाटा नाही?
या सर्व प्रकारानंतर अक्षयची जात शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर झाले. त्याची काहीच पाश्वर्भूमी न कळल्यानं अनेकजण बिथरले. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर आमदार कपिल पाटील यांनी अक्षयला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करत ‘भाजपनं योग्य माणसाची नेमणूक करावी’ अशी अक्कल पाजळली. अक्षयसारख्या तरूणाच्या सतर्कतेवर असे आक्षेप घेणं आणि त्याची कुणाकडून तरी ‘निवड’ झालीय म्हणणं हास्यास्पद आहे. अशी निवड फक्त कॉंग्रेसमध्ये होऊ शकते. राहुल गांधी यांच्या निवडीनं त्यांनी ते सिद्धही केलं आहे. अक्षय बिक्कड हा आमचा फक्कड मित्र अशा कुणाच्या ‘निवडी’तून पुढे येणार्‍यापैकी नाही.
महत्त्वाचं म्हणजे याच कार्यक्रमात समर महंमद खडस नावाच्या एका पत्रकारानं बराच आरडाओरडा केला. अक्षयचं धाडस त्यांना चांगलंच झोंबलं होतं. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यापूर्वीच ‘स्मार्ट मित्र नव्हे; पिसाळलेलं कुत्रं’ असं ठामपणं लिहित खडस यांची ओळख करून दिली होतीच. ‘‘जिग्नेश यांचं भाषण ऐकून आंबेडकरी जनतेनं ही दंगल केली का?’’ असा एकच प्रश्‍न खडस विचारत होते. याचं उत्तर अक्षयनं नाही तर तपास यंत्रणांनी द्यावं. यात मेलेला मात्र दलित नव्हता इकडं आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही.
‘‘तुम्ही काय एकट्यानं भाषण ऐकलं का?, आम्ही तुमचं कीर्तन ऐकायला बसलोय का? आँ....!!, तुम्हाला इंटरप्रिटेशन काय कळतं?, तुमचं वय, अनुभव काय? तुम्ही बोलताय का?’’ असे अनेक बालीश प्रश्न विचारून खडस यांनी पुरोगामित्वाचे चेहरे आणि मुखवटे दाखवून दिले. जगातले सगळे प्रश्न केवळ आपल्यालाच कळतात आणि त्याची उत्तरंही आपणच देऊ शकतो अशा ढोंगी आविर्भावात ही मंडळी असतात.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे नारे देणारे आज देशभक्तीचा आव आणत आहेत आणि खर्‍या देशभक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. यांचे बुरखे फाडण्यासाठी अक्षयप्रमाणेच अनेक तरूणांनी पुढं येणं गरजेचं आहे. अक्षयसारख्या तरूणांचा आवाज दाबणं कुणाच्याही तीर्थरूपांना शक्य नाही; कारण ही तरूणाई कुणालाच बांधील नाही. त्यांचं सामाजिक भान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी असायला हवं. या सगळ्या प्रकारात अक्षय एकटाच असला तरी त्याच्या प्रामाणिकपणासोबत आपण सर्वांनी ठामपणं उभं रहायला हवं. त्यानं एकट्यानं जे पाऊल टाकलंय त्याला बळ देत आपण तो एकटा नाही हे सिद्ध करायला हवं. हे आपलं सामाजिक कर्तव्यच आहे.
कोरेगाव भीमाचा इतिहास या अंकात या विषयाचे अभ्यासक संजय क्षीरसागर यांनी दिला आहेच. ‘मिथकप्रियतेचे बळी’ या लेखातून संजय सोनवणी यांनीही भाष्य केलंय.
जातीपातीला खतपाणी घालणारे, त्यावर राजकारण करणारे इतर पक्षाला ‘जातीयवादी’, ‘हिंदुत्ववादी’, ‘धर्मवादी’ अशी बिरूदं लावून मोकळे होतात. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेता लेखक जातीसंस्थेचं समर्थन करतो तेव्हा त्यांच्या पाठिशी उभे राहणारे, विविध जातींच्या आरक्षणासाठी मागच्या कित्येक वर्षात समाजासमाजात फूट पाडणारे, जातीजातीचे मेळावे घेऊन द्वेष पेरणारे जातीअंताची भाषा करतात. इतरांना वेगळे ठरवून भांडणं लावतात, कोेरेगाव भीमासारख्या दंगलीही पेटवतात. 
महाराष्ट्रातले नेते शरद पवार यांनी ‘आधी पेशव्यांची निवड व्हायची, आता पेशवे निवड करतात’ असे भाष्य केलेच होते. ब्राह्मण समाजाविरूद्ध रोष निर्माण करून अशा नेत्यांनी मराठ्यांना भडकवले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही हे लक्षात आल्यावर दलितांना चिथावणी दिली. खरंतर ब्राह्मण, मराठा, दलित अशा वर्गवारीत न अडकता आपण माणूस म्हणून एकत्र यायला हवं. असं झालं तर यांचं पोट कसं भरणार? यांची दुकानदारी चालू ठेवायची तर द्वेषाला खतपाणी घालण्याला पर्याय नाही.
याच कोरेगाव भीमाला शरद पवारांच्या कारकिर्दीत कशी दंगल झाली होती? मुंबई बॉम्बस्फोटांची साखळी मालिका कशी झाली? पवारांसोबत विमानातून कोण कोण गुन्हेगार पळाले हे सारे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाही. संभाजी ब्रिगेडसारख्या विघातक संघटनांना कृतिशीलतेतून संपवण्यासाठी एक संभाजी भिडे गुरूजी पुढं आले आणि यांची सटकली. त्यांनाच ते ‘दहशतवादी’ ठरवून मोकळे! 
गेल्या काही वर्षात आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार झाल्यात. बरं, या कोणत्याही जातीतील बांधव एकत्र येऊन फार काही विधायक घडवतात, संघटित होऊन सकारात्मक पेरतात असेही नाही. केवळ इतरांचा द्वेष करणे आणि आपल्या नसलेल्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गाणे हेच यांचे इतिकर्तव्य झाले आहे. 
शिक्षण, विज्ञान यातून सुसंस्कृत होण्याऐवजी आपण पुन्हा रानटी होत चाललो आहोत. हे थांबवायचं असेल तर स्वतःपासून सुरवात करायला हवी. जे झाले ते झाले. ते आपल्याला बदलता येणार नाही. यापुढं तरी आपण आपल्या भल्याचा विचार करायला हवा. नव्या पिढीपुढं काही चांगले आदर्श ठेवायला हवेत. त्यांच्या मनात प्रेम आणि बंधुत्वाची रूजवात करायला हवी. अनेक महापुरूषांनी, संतांनी आपल्या माणुसकीची जी शिकवण दिलीय त्याचा अंगिकार करायला हवा. ‘माणूस’ होण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. वानराचा नर झालाय, आता नराचा नारायण व्हायला हवा. पुन्हा पशुत्वाकडं जाणं बरं नाही.
या प्रक्रियेत म्हणूनच अक्षय बिक्कडसारख्या धैर्यवान तरूणांची गरज आहे. असा बेडरपणा सगळ्यात आला पाहिजे. जे चांगले ते स्वीकारायला हवे. वाईट ते अव्हेरायला हवे. घटना कितीही लहान असू द्या किंवा मोठी! आपण नेहमी सत्याची कास धरायला हवी. किमान त्या वाटेनं जे कोणी जात आहेत त्यांच्या पाठिशी तरी भक्कमपणे उभं रहायला हवं. म्हणून अक्षय आम्ही तुझ्या सोबत होतो, आहोत आणि भविष्यातही राहू, इतकंच! सूज्ञास अधिक सांगणे न लगे!
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Tuesday, November 21, 2017

‘वादे वादे जायते कंठशोषः’



एखादा वारकरी ज्या भक्तीभावानं पंढरीच्या वारीला जातो त्याच ओढीनं मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जातो. तिथं लेखकांच्या, साहित्य रसिकांच्या, वाचकांच्या गाठीभेटी होतात. सगळा गोतावळा जमतो. म्हणूनच 2003 पासून माझी ही संमेलनवारी सुरू आहे. यातल्या सर्वच संमेलनाच्या अनेक आठवणी माझ्या पोतडीत आहेत आणि त्या मी वेळोवेळी विविध माध्यमांतून मांडल्याही आहेत; मात्र गेल्या काही संमेलनातील वाद आणि ‘चपराक’ची भूमिका याविषयी इथे थोडक्यात उहापोह करणार आहे.

गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वाद आणि वितंडवादाची परंपराच निर्माण झाली आहे. त्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिनं ‘चपराक’नं आग्रही भूमिका घेतली आहे. काहीवेळा मात्र प्रस्थापितांविरूद्ध हंटर उगारणं अपरिहार्य ठरतं. साहित्य संमेलन आणि त्यातील राजकारण याविषयी आम्ही सजगपणं अनेक विषय पुढे आणले आहेत.

महाबळेश्‍वर येथील 82 व्या साहित्य संमेलनात आनंद यादव जेव्हा संमेलनाध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’वरून मोठं वादळ निर्माण झालं. या कादंबरीत त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांविषयी काही आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं आम्ही आवाज उठवला होता. त्यावेळी यादवांनी ‘कादंबरी वाचण्याची एक पद्धत असते; घनश्याम पाटलांना कादंबरी वाचता येत नाही. कादंबरी म्हटले की कल्पनाविलास हा आलाच! तो गृहित धरून ती वाचायला हवी,’ असं विधान केलं. आता यातली मेख अशी होती की, ‘संतसूर्य तुकाराम’च्या पहिल्याच पानावर त्यांनी एक वाक्य ठळकपणे छापलं होेतं. ते होतं, ‘संशोधन सिद्ध करून लिहिलेली वास्तववादी कलाकृती.’ म्हणजे एकीकडं ‘कादंबरी म्हणजे कल्पनाविलास’ म्हणायचं आणि दुसरीकडं ‘वास्तववादी कलाकृती’ असंही म्हणायचं! हा सरळ सरळ दुटप्पीपणा होता. कल्पना आणि वास्तव ही दोन टोकं एकत्र आणणारे यादव हे मराठीतील पहिले लेखक असावेत. म्हणून आम्ही त्याविरूद्ध जोरकस आवाज उठवला. ह. भ. प. बंडातात्या कर्‍हाडकर यांच्यासारखे काही वारकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘टाळ’ आंदोलन सुरू केलं आणि यादवांनी देहूला जाऊन सगळ्यांची जाहीर माफी मागितली.

खरंतर यादवांनी हे लिहायला नको होतं आणि लिहिलंच तर त्यावर ठाम रहायला हवं होतं. ‘मला संमेलनाध्यक्षपद नको, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे’ असं त्यांनी सांगितलं असतं तर त्यांचा कणखरपणा दिसला असता. मात्र तसं काही घडलं नाही. झुंडशाही आणि दडपणाला ते बळी पडले आणि वारकर्‍यांना शरण गेले. यादवांनी त्यांची चूक मान्य केल्यावर मी त्यांचा विरोध सौम्य केला आणि ‘यांना आवरा, त्यांना सावरा’ असा विशेष लेख लिहिला. त्यात वारकर्‍यांच्या झुंडशाहीला आवरणं आणि यादवांना या परिस्थितीतून सावरणं गरजेचं आहे हे स्पष्टपणे नोंदवलं; पण यादव संमेलनाध्यक्ष होऊनही साहित्य संमेलनाला जाऊ शकले नाहीत. मराठी साहित्याच्या दृष्टिनं ही काळीकुट्ट घटना ठरली.

पुण्याच्या साहित्य संमेलनाचे आयोजक होते पुण्यभूषण संस्थेचे डॉ. सतीश देसाई. ते माझे स्नेहीच आहेत. पुण्याचे उपमहापौर, नगरसेवक, साहित्य परिषदेचे पदाधिकारी, त्रिदल संस्था, पुण्यभूषण या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलंय. मात्र पुण्यातील संमेलन साहित्यबाह्य विषयांवरूनच गाजलं. त्यात अमिताभ बच्चन हे प्रमुख आकर्षण होतं. डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारखा प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष असूनही चर्चा मात्र अमिताभचीच होती. त्यानं मराठीत ‘नमस्कार मित्रांनो’ कसं म्हटलं, त्याचा पेहराव कसा होता, तो व्यासपीठावर कसा आला आणि ‘मधुशाला’च्या ओळी कशा म्हणून दाखवल्या याचीच माध्यमांनी चर्चा घडवली.

तर या संमेलनाच्या आयोजनानंतर आयोजक संस्थेनं महामंडळाला हिशोब द्यायला बराच वेळ घालवला. महामंडळानं सातत्यानं मागणी करूनही त्यांनी टंगळमंगळ केली. शेवटी या संमेलनातून नऊ लाख रूपये उरल्याचं त्यांनी जाहीर केलं. माध्यमांनी आरडाओरड केल्यानंतर मात्र डॉ. सतीश देसाई यांनी तब्बल 82 लाख रूपये परत केले आणि तेव्हापासून त्या निधीतून संमेलनाध्यक्षला वर्षभर साहित्यसेवेसाठी फिरावे लागते, म्हणून एक लाख रूपये देण्याची परंपरा सुरू झाली. 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून हे 82 लाख रूपये मिळणे पुढच्या अध्यक्षांसाठी मोलाचे ठरले. त्यावेळी ‘कुणाचे पुण्य, कुणाचे भूषण?’ असा जळजळीत लेख लिहून मी यावर घाव घातले होते.

86 वं साहित्य संमेलन झालं ते चिपळूणला. या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. त्यांच्याविरूद्ध ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी चांगली लढत दिली होती. साहित्यनिर्मिती आणि कर्तबगारी या पातळीवर हमो कितीतरी पटीने अव्वल होते. मात्र त्यांनी त्यांच्या परिचय पत्रकात ब्राह्मण समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली होती. आम्ही हमोंच्या पाठिशी ठामपणं उभे होतो; पण ही माहिती त्यांनी देऊ नये असं आम्हास वाटत होतं. त्याविषयी आम्ही त्यांना स्पष्टपणे बोललो पण त्यांचं म्हणणं होतं, ‘‘मी जे केलंय ते मतदारांपुढं मांडायला हवं.’’ ते पत्रक मी सर्वप्रथम ‘चपराक’मधून प्रकाशित केलं आणि त्यावर्षीच्या सर्व मतदारांपर्यंत पाठवलं. अपेक्षेप्रमाणं त्यावरून वाद निर्माण झाला आणि संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना हमोंविरूद्ध रस्त्यावर उतरल्या. चिपळूणच्या आयोजक संस्थेनंही ‘जातीयवादाला खतपपाणी घालणार नाही’ म्हणून हमोंविरूद्ध भूमिका घेतली. खरंतर हमोंची साहित्य कारकिर्द अफाट होती पण झुंडशाहीपुढं त्यांचा निभाव लागला नाही. त्यावेळी ‘मराठ्यांची ढाल व्हा’ असं म्हणत मी त्यांच्या पाठिशी उभा होतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापासून त्यांना संरक्षण देण्यापर्यंत आमचा पुढाकार होता. माझे मित्र भालचंद्र कुलकर्णी यांनीही त्यावेळी उत्तम संघटनकौशल्य दाखवलं होतं. हमो यांच्यासारखा ताकदीचा साहित्यिक संमेलनाध्यक्ष होऊ शकला नाही याची खंत कायम आहे.

87 वं साहित्य संमेलन झालं ते सासवडला. या संमेलनाचे अध्यक्ष होते कवी फ. मुं. शिंदे. तेव्हाचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यांचा त्यांना पाठिंबा होता. फमुंविरूद्ध सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी उभे होते. इथेही राजकारण आणि वशीलेबाजीनंच बाजी मारली. मराठीत 85 कादंबर्‍या लिहिणारा संजय सोनवणी यांच्यासारखा बलाढ्य लेखक पराभूत झाला आणि एका रंगमंचीय कवीच्या गळ्यात विजयाची पताका पडली. त्यावेळी मी ‘व्यासपीठावर आई या विषयावर कविता सादर करणारा हा कवी व्यासपीठावरून खाली उतरला की बाईचा विचार सुरू करतो, हे मराठी कवितेचं दुर्दैवच’ अशा स्पष्ट शब्दात हल्ला चढवला होता. 

88 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वार्थानं वेगळं ठरलं. हे संमेलन झालं पंजाबमधील घुमान या खेड्यात. घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी. इकडं माझे मित्र संजय नहार यांचं अफाट काम. त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना साथ मिळाली ती भारत देसरडा या उद्योजक आणि साहित्यप्रेमी मित्राची. दोघांनी नेटानं सर्व व्यवस्था केली. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. सदानंद मोरे यावेळी निवडून आले. अर्थातच मोरे यांच्या विजयासाठीही सर्व राजकीय यंत्रणा कामाला लागली होती.

घुमानच्या संमेलनात अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फार वाद घातला नाही. त्यावेळी ठिणगी टाकली ती प्रकाशक परिषदेनं. ‘अमराठी भागात साहित्य संमेलन होत असल्यानं पुस्तक विक्री होणार नाही. त्यामुळं एकही मराठी प्रकाशक या संमेलनात सहभागी होणार नाही’ अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. ‘एकही मराठी प्रकाशक सहभागी होणार नाही’ हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणून मग मी ठाम भूमिका घेतली, ‘‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तरी आम्ही तिथं जाणार! कारण धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा...’’ 

असं ठणकावल्यावर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं त्याची जोरदार दखल घेतली. मुंबई सकाळ, झी 24 तास, साम टीव्ही यांनी विशेष बातम्या करून माझ्या भूमिकेचं समर्थन केलं.

प्रकाशक परिषदेचा हा विरोध मोडून काढताना केवळ त्यांना विरोध अशी मर्यादित भूमिका नव्हती. अमराठी भागात जर साहित्य संमेलन होत असेल तर त्यांना मराठीचं वैभव कळायला हवं. दोन्ही भाषा भगिनीत समन्वय साधायला हवा अशी त्यामागची तळमळ होती. त्यामुळं ‘चपराक’च्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रेल्वेचा डबा भरून पुस्तकं आम्ही घुमानला नेली. ‘चपराक’ची सोळा सदस्यांची टीम त्यासाठी घुमानला गेली. 

या साहित्य संमेलनात पंजाबचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनी हजेरी लावली. या संमेलनामुळं त्या गावचा कमालीचा विकास झाला. आज जर कोणी घुमानला गेलं तर या संमेलनाचं महत्त्व त्याच्या लक्षात येईल. यावेळी अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा होत्या डॉ. माधवी वैद्य. त्यांना कमालीची मिरवण्याची हौस. व्यासपीठावर सर्व मान्यवर असताना नऊवारी साडी, नाकात नथ आणि हातात तलवार घेऊन त्यांनी ‘फाटो सेशन’ केलं. त्यात संमेलनाध्यक्ष मोरे पार दुसर्‍या रांगेत मागं ढकलले गेले. तो फाटो प्रकाशित करून मी ‘कॅपशन’ दिली होती, ‘संमेलनाथ नथ दिसली पण नाक मागं गेलंय...’ मोरेंचं अंग अवघडून मागं स्वतःला सावरत थांबणं आणि वैद्यबाईंचं मिरवणं त्यामुळं चांगलंच चर्चेत आलं.

मुख्य म्हणजे ज्या प्रकाशक परिषदेनं या संमेलनाला विरोध केला होता त्याचे पदाधिकारी मात्र इथल्या परिसंवादात सहभागी होते. असो. ‘चपराक’च्या पुस्तकांची प्रचंड विक्री झाली. कवितासंग्रह तर आम्ही ग्राहकांना भेट देण्यासाठीच नेले होते मात्र एकही कवितासंग्रह भेट द्यायची वेळ आली नाही. मराठी प्रकाशकांची इंग्रजी वृत्तपत्रे चार ओळीतही दखल घेत नाहीत, हा इतिहास असताना ‘इंडियन एक्सप्रेस’सारख्या मान्यवर दैनिकानं दिल्ली आवृत्तीला माझी मुलाखत प्रकाशित केली. केवळ एका धाडसी भूमिकेमुळं हे असं सारं वाट्याला आलं. माधवी वैद्य यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत; मात्र या संमेलनातनंतर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी जाहीरपणे ‘चपराक’च्या भूमिकेचं कौतुक केलं आणि ‘चपराक’नं प्रकाशकांतील तिढ सोडवल्याचं सांगितलं.

89 वं साहित्य संमेलन म्हणजे माझ्यासाठी मोठं मानसिक द्वंद होतं. आमचे तेव्हाचे सल्लागार डॉ. श्रीपाल सबनीस या निवडणुकीला उभे होते. त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र एक केला होता. सातआठ महिने आमची तयारी सुरू होती. त्यांच्या अर्ज भरताना महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होतो. सबनीस यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र जी मेहनत घेतली होती त्यानुसार त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक होती. 

मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्यापुढं लोटांगण घातलं आणि सांगितलं की, ‘तुम्हाला नमस्कार म्हणजे हा शरद पवारांना नमस्कार. संमेलनाध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला...’ या प्रकारानंतर मी अतिशय अस्वस्थ झालो. त्यांच्या सौभाग्यवती ललिताताई यांनी हातावर बांधलेली राखी उदासपणं पाहत कार्यालयात आलो आणि ‘चपराक’च्या सल्लागार पदावरून त्यांना बडतर्फ केलं. अंकावरून त्यांचं नाव कमी करणं हा माझ्या पद्धतीनं त्यांचा निषेध होता. कालपर्यंत मी त्यांची बाजू समर्थपणं मांडत होतो आणि आज मला आतला आवाज सांगत होता की आपण अयोग्य माणसाला डोक्यावर घेतलं. त्यामुळं मी त्यांच्याविरूद्ध एक शब्दही लिहिला नाही.

पुढं निकाल जाहीर झाल्यावर त्यांचा वारू सुसाट सुटला. ज्यांना ज्यांना त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं त्या त्या मतदारांनी त्यांना अभिनंदनाचे फोन केल्यावर त्यांनी सांगितलं, ‘‘मला तुमच्या शुभेच्छाही नकोत...’’ केवळ माझ्या शब्दाखातर ज्यांनी कसलीही ओळख नसताना यांना मतदान केलं होतं ते त्यामुळं अस्वस्थ झाले आणि मी पेटून उठलो. मग त्यांनी अध्यक्षपदासाठी काय काय उठाठेवी केल्या याचा पंचनामा करणारा एक लेख मी लिहिला. त्याचं शीर्षक होतं, ‘कुत्र्याला खीर पचली नाही.’

हा लेख प्रचंड व्हायरल झाला. त्यावरूनही काही वृत्तपत्रांनी, वृत्त वाहिन्यांनी बातम्या केल्या. पिंपरीत साहित्य संमेलनात हा अंक आम्ही विक्रीसाठीही ठेवला होता. पहिल्या दिवशी या अंकाची बेफाम विक्री झाली. 

दुसर्‍या दिवशी सकाळी मी आवरण्यासाठी म्हणून घरी आलो. तेवढ्यात मला ‘झी 24 तास’चे संपादक उदय निरगुडकर यांचा फोन आला. तो लेख आवडल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल पंधरा मिनिटं ते त्या लेखावरच बोलत होते. त्यांचा फोन मी ठेवला आणि संमेलनातील ‘चपराक’च्या ग्रंथ दालनातून मला फोन आला. त्यांनी सांगितलं ‘‘दादा, आपले अंक आयोजकांनी जप्त केले...’’ हा माझ्यासाठी खरंतर मोठा धक्का होता. मी लगेच निरगुडकरांना पुन्हा फोन केला आणि सांगितलं, ‘‘ज्या लेखाचं तुम्ही तोंडभरून कौतुक केलं त्या लेखाचं बक्षीस मला मिळालं. आत्ताच चपराकचे अंक ग्रंथ दालनातून जप्त केले.’’ त्यांनी तो फोन तसाच त्यांच्या स्टुडिओत जोडला आणि माझा ‘फोनो’ महाराष्ट्राला ऐकवला. मी तसाच ग्रंथ दालनात पळालो. तिथं तोपर्यंत सगळ्याच प्रसारमाध्यम प्रतिनिधींची गर्दी झाली होती. सगळ्यांनी माझ्या लाईव्ह प्रतिक्रिया चालवल्या. ‘चपराक’च्या ग्रंथदालनात तुडुंब गर्दी झाली. थोड्याच वेळात आयोजक पी. डी. पाटील आणि संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस ‘चपराक’च्या दालनात आले आणि त्यांनी ‘अनावधानाने’ झालेल्या प्रकाराबद्दल माध्यम प्रतिनिधींसमोर माफी मागितली. दुसर्‍या दिवशी ‘नवा काळ’सह अनेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ती मुख्य बातमी केली. माझा संपूर्ण लेख पुनर्मुद्रित केला. काहींनी तर ‘चपराक’वर विशेष अग्रलेख केले. ‘कोण हे श्रीपाल सबनीस?’ असा प्रश्‍न विचारणार्‍यांना ‘सबनीस कोण?’ याचे सणसणीत उत्तर दिले होते.

डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात मी परिसंवादात सहभागी होतो. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृतीला प्रतिसादशून्यतेचं जे ग्रहण लागलंय त्यावर मी जोरकस हल्ला चढवला. त्याचीही प्रसारमाध्यमांनी योग्य ती दखल घेतली. डॉ. अक्षयकुमार काळे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते पण त्यांचा प्रभाव संमेलनात कुठंच दिसला नाही. या साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवीसंमेलनात एका कवयित्रीनं अंजली कुलकर्णी यांची कविता ढापली. चक्क साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच साहित्यचोरी झाल्यानं मी आणि माझ्या सहकार्‍यांनी तिथंच आवाज उठवला. माध्यमांनी त्याहीवेळी आमची साहित्य तळमळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

आगरकरांनी त्याकाळातही ‘वादाला का भीता?’ असा सवाल केला होता. वाद व्हायला हवेत. त्यातून चांगले ते बाहेर येते. समुद्रमंथन झाल्याशिवाय त्यातून रत्ने बाहेर कशी येणार? मात्र सध्याचा काळ बदललाय. हे वाद इतके निरर्थक आहेत की त्यात वैयक्तिक मानपान आणि हेवेदावे, मत्सर याशिवाय काहीच नाही. त्यामुळे साहित्य संमेलनांचीही अप्रतिष्ठा होत आहे. हे असेच चालू राहिले तर हा केवळ वेळ आणि पैशाचा अपव्यय ठरेल. भविष्यात साहित्याला आणखी चांगले दिवस यायचे असतील तर या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यापक आणि दीर्घकालिक विचार करायला हवा.

मला नेहमी वाटतं की, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना किमान विधानपरिषदेवर घ्यायला हवं. राज्यकर्त्यांनी त्यांचे पडके वाडे बांधण्याऐवजी मसापचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष यांच्यापैकी कुणाला तरी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून घ्यायला काय हरकत आहे? ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ असं म्हटलं जायचं. साहित्य संमेलनात मात्र वाद इतक्या खालच्या पातळीवर जात आहेत की ‘वादे वादे जायते कंठशोषः’ असं म्हणायची पाळी येतेय.

साहित्य क्षेत्राला अजूनही प्रतिष्ठा आहे. साहित्य संमेलनांनी ती जाणिवपूर्वक जपावी. मराठी भाषेच्या सर्जनासाठी ते अत्यावश्यक आहे. 
- घनश्याम पाटील
संपादक ‘चपराक’, पुणे 
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - ‘रानफूल’ दिवाळी अंक)

Sunday, November 12, 2017

जो बदलतो तो टिकतो!

एखादा माणूस मेला तर त्या कुटुंबाचे नुकसान होते. तो कर्तबगार असेल तर समाजाचीही ती हानी असते! पण एखादी संस्था संपली तर त्याचा फटका आणि दुःखाची तीव्रता आणखी असते. त्यातही बुद्धिच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन काम करणारी संस्था बंद होणे म्हणजे समाजाचे मोठे नुकसानच! ‘अंतर्नाद’ हे मासिक बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि मराठी साहित्यविश्वात बरीच उलट-सुलट चर्चा झाली. एखादे चांगले मासिक बंद होणे हे जितके दुःखद आहे त्याहून वाईट आहे त्यांच्या संचालकांची नकारात्मक मानसिकता! सर्वत्र वाचनसंस्कृती कमी होत असल्याचे चित्र रंगवले जात असताना अशा बातम्या म्हणूनच अनेकांची उमेद संपवणार्‍या ठरतात.

वयानुसार धावपळ होत नाही, एकहाती काम करण्याच्या नादात संस्था पुढे चालवू शकेल असे नेतृत्व निर्माण करू शकलो नाही, आजारपण, अन्य व्याप, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव किंवा बिघडलेले आर्थिक व्यवस्थापन अशा कारणांमुळे एखादे नियतकालिक बंद होऊ शकते; मात्र इथे ‘अंतर्नाद’च्या संपादकांनी ते बंद करताना जी कारणे दिलीत त्यातले एक प्रमुख कारण आहे, ‘नवीन लेखक मिळत नाहीत...’

एकीकडे लेखनासाठी व्यासपीठ नाही म्हणून अनेक नवोदित धडपडत असताना ‘लेखक नाहीत’ म्हणणे म्हणजे मोठी विसंगती आहे. ‘आम्ही उच्च सांस्कृतिक अभिरूची जोपासतो’ असे म्हणत नव्याने लिहिणार्‍यांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि असे खापर त्यांच्यावर फोडणे म्हणूनच स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासारखे आहे. आजच्या फळीतील उमेदीच्या लेखकांच्या दृष्टिने हे अन्यायकारक आहे.

आजच्या काळात मराठीत कोणते मासिक नव्याने सुरू झाल्याने फार मोठी क्रांती होणार नाही किंवा एखादे मासिक बंद पडल्याने समाज रसातळालाही जात नाही. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे बंद पडल्याने हळहळ वाटावी अशा ‘तत्त्व’ बाळगून असणार्‍या संस्था आजच्या काळात नगण्य आहेत. असे म्हणतात की, आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही. तरीही ‘अंतर्नाद’बद्दल अनेकांना दुःख का वाटावे? कारण आपला समाज अजूनही सद्गुणांची पूजा बांधतो. चांगले ते स्वीकारतो आणि वाईट ते अव्हेरतो. 

बावीस-तेवीस वर्षे सुरू असलेल्या मासिकाची साधी वेबसाईटही नसावी यावरून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अकरा कोटीच्या महाराष्ट्रात पाच-दहा हजार लोकांनाही ज्या मासिकाचे नाव माहीत नव्हते ते बंद पडल्याने चर्चेत येणे म्हणूनच आश्चर्यकारक आहे. बरे, अशी मासिके स्वतःचे वेगळे वाचक घडवतात, लेखक तयार करतात असेही नाही. वाचकांची साहित्यिक अभिरूची वाढावी, त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे यासाठी काही उपक्रम त्यांनी राबवलेत का? मग ठराविक कंपुने ‘मराठी साहित्यावर दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला’ म्हणून गळे काढण्यात काय अर्थ? कोणत्याही भाषेतील, कोणतेही मासिक बंद होणे हे वाईटच असले तरी त्यामुळे त्यांनी वाचकांना किंवा लेखकांना दोष देणे सर्वस्वी चुकीचे आहे.

मागच्या वर्षीची नोटाबंदी, जीएसटी अशा कारणांमुळे यंदा अनेक दिवाळी अंकांना फटका बसल्याच्या ‘अफवा’ अशाच काही ‘नाकर्त्या’ लोकांकडून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे किंमतीत केेलेली लक्षवेधी वाढ, पानांची घटलेली संख्या, कमी दराने वाढवलेल्या जाहिराती हे सारे पहावे लागत आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशातला हा प्रकार आहे. महाराष्ट्रात जवळपास सातशे ते आठशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील अडीचशे ते तीनशे अंक शासनाकडे नोंदणीकृत नाहीत. केवळ ठराविक लोकांच्या जाहिराती मिळवणे आणि नफा कमावणे या उद्देशाने निघणारी ही बेकायदेशीर मासिके, नियतकालिके सरकारी धोरणांचा बागुलबुवा करत आहेत. त्यांची साहित्यिक जाणीव आणि लेखनभान तपासून बघितले तर हाती मोठा भोपळा येईल. आरएनआय म्हणजे ‘रजिस्ट्रेशन ऑफ न्युजपेपर्स फॉर इंडिया’ या संस्थेकडून साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, वार्षिक या सर्वांची नोंदणी करणे बंधनकारक असताना अनेकजण हवे ते नाव घेऊन बिनबोभाट ‘धंदा’ करतात. काहींनी कित्येक वर्षांपूर्वी केवळ ‘टेंपररी’ परवाना मिळवला असून अनियमिततेमुळे तो रद्द झालेला असतानाही ही मंडळी कोणतीही सरकारी बंधने, निकष न पाळता ‘अधूनमधून’ अंक काढतात आणि समाजात संपादक, पत्रकार म्हणून मिरवत असतात.

आम्ही ‘चपराक’ हे मासिक 2002 सालापासून चालवतो. सहा राज्यातील मराठी वाचकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले आहे. ज्यांचा शालेय अभ्यासक्रमानंतर वाचनाशी कसलाच संपर्क राहिला नव्हता त्यांची अभिरूची वाढवून आम्ही त्यांना ‘वाचते’ केेले आहे. प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो हे ध्यानात घेऊन त्यातील अनेकांना ‘लिहिते’ही केले आहे. म्हणूनच ज्यांनी आयुष्यात कधी प्रेयसीला साधे प्रेमपत्रही लिहिले नाही असे अनेकजण आज कथा-कादंबर्‍या लिहित आहेत. 

सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही दर्जेदार मराठी मासिके नाहीत. जी आहेत त्यातील बहुतेकजण विविध विचारधारांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे सर्व विषयांना स्पर्श करणारे आणि माहिती, मनोरंजन आणि ज्ञान एकाचवेळी देणारे ‘चपराक’सारखे मासिक अल्पावधीत वाचकप्रिय ठरत आहे. लेखकांची आडनावे, गावे बघून आम्ही कधीही साहित्य छापले नाही. गुणात्मकदृष्ट्या जे अव्वल आहे ते दिल्याने वाचकांनी ते स्वीकारले. हीच भूमिका घेऊन काम करणारी एक पिढी सध्याच्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. ‘अंतर्नाद’ बंद पडत असतानाच मुकुल रणभोरसारखा इवलासा पोर ‘अक्षर मैफल’सारखे मासिक सुरू करण्याचे धाडस दाखवतो इकडे आम्ही सोयीस्कर कानाडोळा करतो. नकारात्मक मानसिकता आणि प्रस्थापितांची प्रतिसादशून्यता हे मराठी साहित्याला लागलेलं ग्रहण सुटणं म्हणूनच गरजेचं आहे. 

2002 ला आम्ही ‘चपराक’ मासिक सुरू केले तेव्हा पहिली पंचवार्षिक वर्गणी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी भरली होती. त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदरातून त्यांची वर्गणी घ्यायला नकार दिल्यानंतर ते म्हणाले होते की, ‘‘तुम्हाला मदत करायची म्हणून मी वर्गणी भरत नाही. ही वर्गणी घेतल्यावर पुढची पाच वर्षे मला अंक पाठवणे ही तुमची नैतिक जबाबदारी असणार आहे. जर तुम्ही पाच वर्षे अंक टिकवला तर ब्रह्मदेवाचा बापही तुम्हाला थोपवू शकणार नाही.’’

निळुभाऊंचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले. केवळ वाचकांच्या जिवावर चालणारे मासिक म्हणून ‘चपराक’ पुढे आले. ज्या भानू काळे यांनी त्यांचे ‘अंतर्नाद’ मासिक बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय जाहीर केला त्याच काळे यांनीही मध्यंतरी ‘चपराक’ला अनपेक्षितपणे पाच हजार रूपयांचा धनादेश पाठवून आमच्या कामाचा गौरव केला होता. असा गुणग्राहक माणूस जेव्हा नकारात्मक बोलू लागतो तेव्हा ते अधिकच घातक असते. नियतकालिक चालवणार्‍या प्रत्येकाने नव्या काळाची आव्हाने समजून घेणे गरजेचे आहे. ‘जो बदलतो तो टिकतो’ हा डार्विनचा सिद्धांत कुणीही विसरून चालणार नाही. आपल्या तत्त्वावर ठाम राहतानाच नव्याचे स्वागत जो कोणी उदारपणे करेल त्याच्यासाठी या क्षेत्रात असंख्य संधी आहेत.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Friday, November 3, 2017

प्रकाशन विश्वातील नकारात्मकतेला चपराक



वाचनसंस्कृती कमी होत असल्याचं सांगितलं जात असताना आणि त्यामुळं प्रकाशनविश्वाला घरघर लागलेली असतानाच काही प्रकाशन संस्था मात्र सातत्यानं वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. त्यांच्या पुस्तकांना मागणीही उत्तम असून नवीन वाचक घडविण्याचं काम त्यांनी नेटानं केलंय. आजच्या तरूणाईला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या आणि नकारात्मकतेचं मळभ दूर सारून ग्रंथ व्यवहारात चेतना निर्माण करणार्‍या पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’चे तरूण संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांच्याशी नगर येथे होणार्‍या विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ना. सुर्वे यांनी साधलेला हा संवाद.

* नगरला विभागीय साहित्य संमेलन होतंय. अशी साहित्य संमेलनं कितपत महत्त्वाची आहेत?

- साहित्य माणसाच्या मनाला उभारी देतं, त्याचं नैराश्य दूर सारून त्याला दिशा दाखवतं. त्यामुळं या साहित्याकडं सामान्य माणसाला आकर्षित करून घ्यायचं झालं तर अशा संमेलनांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. संमेलनात वाचक-रसिकांना लेखक भेटतात, त्यांचे विचार जवळून ऐकता येतात. छोट्या संमेलनात लेखक आणि वाचकांचा थेट संवाद होतो. त्यामुळं विभागीय साहित्य संमेलनं ही मोलाची आहेत. नगरला होणारं साहित्य संमेलन त्यामुळंच महत्त्वपूर्ण आहे.

* अशी अनेक विभागीय साहित्य संमेलनं होत असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची काय गरज? ते बंद करावं अशी मागणी सातत्याने होते. त्याबाबत तुमचं मत काय?

- अनेक छोट्याछोट्या नद्या एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार होतो आणि तो पुढं सागराला मिळतो. त्यामुळं छोट्या नद्या आणि सागराचं महत्त्व कमी होत नाही. दोन्ही तितकेच गरजेचे आहेत. या छोट्या नद्या तो तो भाग संपन्न करतात. आजूबाजूच्या जमिनीचं, गावाचं भवितव्य त्यांच्यावर असतं. या नद्यांचं पाणी जसं झिरपत, मुरत येतं तसंच छोट्या आणि विभागीय साहित्य संमेलनामुळं आपली साहित्यिक भूक भागवली जाते. यातूनच चांगले वाचक तयार होतात, लेखक तयार होतात. साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी, ती वृद्धिंगत होण्यासाठी ही संमेलनं मोठी भूमिका पार पाडतात. त्याचे विशाल रूप म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते आयोजनापर्यंत आणि जेवणाचे पदार्थ कोणते असावेत इथपासून ते सहभागी लेखक-कवी कोण असावेत इथपर्यंत तिथं सातत्यानं वाद आणि वितंडवाद होत असले तरी या संमेलनांचं योगदान आणि परंपरा मोठी आहे. काळानुसार तिथंही आवश्यक ते बदल होत आहेत. त्यामुळं संमेलनच काय, तर कोणताही विधायक उपक्रम बंद करण्याची मागणी अप्रस्तुत आणि दुर्दैवी आहे.

* वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी ओरड असताना तुम्ही नवनवीन पुस्तकं सातत्यानं कशी काय प्रकाशित करता?

- काही ठराविक प्रकाशकांनी हा बागुलबुवा निर्माण केलाय. वाचक कमी होत असल्याची ‘अंधश्रद्धा’ ‘चपराक’ने प्रयत्नपूर्वक दूर केलीय. आमची सर्व पुस्तकं ‘बेस्ट सेलर्स’ ठरली. त्यामुळं त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. जर जुन्या आणि नामवंत प्रकाशकांची पुस्तकं खपत नसतील तर त्यांना काळाबरोबर चालता येत नाही. आजच्या काळाची गरज ओळखून नवे साहित्य पुढे यायला हवे. वाचक कमी झालेत असे म्हणण्यापेक्षा त्यांची वाचनाची अभिरूची आणि माध्यमं बदललीत हे आपण समजून घ्यायला हवं. ‘अंतर्नाद’सारखं एक चांगलं मासिक बंद पडल्याबद्दल आपण हळहळतो; पण त्यांची साधी वेबसाईटही नव्हती किंवा नवे वाचक तयार करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत इकडं आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळं नकारात्मकता बाजूला सारून आपण जोमानं कार्यरत राहिलं पाहिजे. आम्हाला हे जमलं म्हणून आम्ही नवनवीन पुस्तकं प्रकाशित करू शकलो.

* ‘चपराक’चा विस्तार राज्याबाहेरही झाला. तो कसा काय?
- हो! आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत.  शिवाय अनेक अंक, पुस्तके देश-विदेशात पोहोचली. मराठी माणूस जगभर विखुरलाय. आपण त्यांचा कधी विचारच करत नाही. त्यांचीही साहित्यिक भूक मोठी आहे. त्यासाठी ते आसुसलेले असतात. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही एखादे मासिक प्रभावीपणे पोहोचू शकत नाही. त्यामुळं इतर तर त्यांच्या खिजगणतीतही नसतात. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. बेळगाव, गुलबर्गा, हैद्राबाद, बेंगलुरू, कारवार, अमृतसर, दिल्ली, इंदूर, भोपाळ, सूरत, अहमदाबाद, चेन्नई, पणजी अशा महत्त्वाच्या शहरातील मराठी वाचकांपर्यंत आम्ही पोहोचलो. तिथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिलं. त्यातील अनेकजण सध्या लिहितेही झाले आहेत. प्रत्येक वाचकांमध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला जागे करण्याचे काम ‘चपराक’ने केेले.

* मराठी मासिकांची पिछेहाट का झाली? 
- मी सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणं नवे वाचक तयार व्हावेत यासाठी कोणीही फार प्रयत्न केले नाहीत. अनेक मासिकं विविध विचारधारांत अडकून पडली. कोणी समाजवादी आहे तर कोणी हिंदुत्त्ववादी. मग तेच तेच विचार वाचकांच्या माथी मारले जातात. त्यामुळं ती मासिकं कोणी वाचत नाही. सत्तर वर्षांची पंरपरा सांगायची आणि सात हजार वाचकांपर्यंतही पोहोचायचं नाही हे त्यामुळंच होतं. मग ठरलेल्या विचारधारांचा उदोउदो करायचं, पाककृतीपासून मेहंदीपर्यंत विशेषांक काढायचे आणि आलेला दिवस ढकलायचा अशी यांची गत होणे स्वाभाविक आहे; पण त्यामुळे नवे वाचक नाहीत किंवा मासिकांची पिछेहाट झालीय असे म्हणता येत नाही. फक्त पर्याय बदललेत. ‘चपराक’सारख्या अनेक मासिकांचा उदय आणि त्यांना भरभरून मिळणारा वाचकाश्रय हेच सिद्ध करतो.

* वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते प्रयोग केले?
- एकतर आम्ही भारतातील सर्व प्रमुख शहरात गेलो. तिथल्या मराठी लोकांशी संवाद साधला. अगदी इंदूरसारख्या शहरात जाऊन तिथंही ‘चपराक’चा साहित्य महोत्सव घेतला. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशकांची कोंडी फोडली. लिहित्या हातांना बळ दिलं. ते करताना त्यांचं नाव, गाव, प्रांत, धर्म, लिंग याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळं केवळ ‘चपराक’मध्ये तुम्हाला साहित्याचं इतकं वैविध्य दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी ‘चपराक’चाही साहित्य महोत्सव घेतो. त्यात एकाचवेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातल्या लेखकांची, वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील पुस्तके प्रकाशित होतात. परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन, अभिवाचन, अभ्यासपूर्ण व्याख्यानं, इतर दिवाळी अंकांचा गौरव असे उपक्रम त्यात असतात. मुख्य म्हणजे त्यात वाचकांचाही सहभाग घेतला जातो. त्यामुळं अल्पावधीत ‘चपराक’ वाचकाभिमुख झालाय.

* पाचशे पानांचा दिवाळी महाविशेषांक काढण्यामागची संकल्पना काय?
- आम्ही पहिल्या अंकापासून म्हणजे 2002 पासून दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो. गेल्या काही वर्षात चर्चा होती की, नव्यानं कोणी फारसं चांगलं लिहित नाही, दिवाळी अंकांचं दिवाळ निघतंय. ते बंद पडत आहेत. या व अशा नकारात्मक चर्चेला उत्तर म्हणून आम्ही ‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक करायचा ठरवलं. त्याला वाचक आणि लेखकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नवोदित आणि प्रस्थापित यांचा समन्वय साधत आम्ही सर्वोत्तम ते वाचकांना दिलं. त्यामुळं अनेकजण नव्यानं लिहिते झाले. वाचकही म्हणतात, दहा दिवाळी अंक घेण्यापेक्षा ‘चपराक’चा एकच दिवाळी महाविशेषांक घ्यावा! म्हणजे पैसेही वाचतील आणि दर्जेदार साहित्य वाचल्याचे समाधानही मिळेल.

* नवीन लेखकांना काय सांगाल?
- उत्तमोत्तम वाचत रहा, लिहित रहा. लिखाणाचं स्वयंपाकासारखं आहे. रोज केलात तर चपात्या उत्तम होतील. कधीतरीच करायला गेलात तर जगाचा नकाशा होणे अटळ आहे. सध्या समाजमाध्यमासारखं महत्त्वाचं शस्त्र तरूणांच्या हातात आहे. अनेक युवकांच्या ब्लॉगला लाखो वाचक मिळतात. त्यामुळं कोणी दखल घेत नाही म्हणून हतबल होऊ नकात, निराश होऊ नकात. तुमची दखल त्यांनी स्वतःहून घ्यावी इतके स्वसामर्थ्य बाळगा. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार लेखन करणार्‍यांना आणि त्यात सातत्य ठेवणार्‍यांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळं केवळ हौस म्हणून न लिहिता उत्तमतेच्या ध्यासातून कार्यरत रहा म्हणजे तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही.

Saturday, October 28, 2017

वाचेल तो टिकेल!

मुद्रित माध्यमाच्या भवितव्याविषयी सध्या सातत्याने चर्चा होते. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय,’ ‘आणखी काही वर्षांनी वृत्तपत्रे बंद पडणार’, ‘सध्याचा जमाना ऑनलाईन असल्याने कोणी फारसे वाचत नाही’ ही व अशी वाक्ये सतत ऐकायला मिळतात. या सर्व प्रकारच्या चर्चा म्हणजे निव्वळ थोतांड आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.

पूर्वी महानगरातला वाचक सकाळी घरी किंवा प्रवासात वृत्तपत्र वाचायचा. हे चित्र जाऊन सध्या बहुतेकांच्या हातात मोबाईल दिसतो हे खरे आहे. फेसबुक, व्हाटस ऍपसारख्या माध्यमांमुळे ‘वाचणे ही सुंदर सवय’ अशी वाक्ये माग पडत चालल्याचे सांगितले जाते. मात्र हे पूर्ण सत्य नाही. 

मुळात समाजमाध्यमे, दृकश्राव्य माध्यमे आणि मुद्रित माध्यमे यात प्रचंड तफावत आहे हे आपण समजून घ्यायला हवे. समाजमाध्यमात किंवा दृकश्राव्य माध्यमात अभ्यास नसलेली माणसे खपून जातात. मुद्रित माध्यमात मात्र अभ्यासू माणसे लागतात. कारण सर्वाधिक विश्वासार्हता मुद्रित माध्यमांचीच आहे. रात्री क्रिकेटचा सामना वृत्तवाहिनीवर बघितला तरी सकाळी वृत्तपत्रात ती बातमी वाचण्याची मजा काही औरच असते. ‘विराटचे विराट शतक’ ही बातमी वाचताना जितकी मजा येते तो आनंद अनेकदा तो सामना पाहतानाही येत नाही.
 
वृत्तपत्रात संपादकीय लेख असतात. त्यासाठी संबंधित संपादकाला चालू घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. वर्तमानाचे आणि भूतकाळाचे संदर्भ त्याला माहीत असावे लागतात. भविष्यात काय परिणाम साधले जातील याचा अभ्यास असावा लागतो. त्याउलट वृत्तवाहिन्यांवर ज्या चर्चा होतात त्यात बहुतेकदा वादावादीच असते. इथे निवेदकाचा संबंधित विषयाचा अभ्यास असावाच लागतो असा दंडक नाही. त्यामुळे चर्चेतले लोक मुख्य विषय सोडून काहीही बोलत असतात. एकमेकांना उचकावत असतात. कार्यक्रमाची सुरूवातच गोंधळाने करायची असा त्यांचा खाक्या असतो. म्हणूनच या चर्चा कुणी फार गंभीरपणे घेत नाही. ‘या वृत्तपत्राने अमक्या तमक्याला अग्रलेखातून चांगलाच चोपला’ अशी चर्चा होते. तशी गंभीर चर्चा वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाबाबत होताना दिसत नाही. कारण वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम टिकून आहे.

सध्याचा जमाना धावपळीचा आहे. त्यामुळे ‘गतिमान आयुष्य नको’ असे वाटणारा एक मोठा वर्ग तयार होतोय. त्यांना आक्रस्थाळेपणा नकोय. निवांतपणा हवाय, शांतता हवीय. ही शांतता दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत. वृत्तपत्रातील महिलांविषयक, आरोग्यविषयक, पुस्तकविषयक, क्रीडाविषयक, चित्रपटविषयक मजकूरावर चर्चा होते. बोधकथेपासून विनोदापर्यंत आणि व्यंग्यचित्रापासून प्रासंगिक लेखापर्यंत हवा तो मजकूर वृत्तपत्रात वाचता येतो. शब्दकोड्यासारखी ज्ञानवर्धक आणि रंजक साधने दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत.

न्यूज आणि व्ह्यूज दोन्ही हवे असेल तर वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. एखादी महत्त्वाची बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर प्रेक्षक चॅनेल बदलतात आणि ती बातमी खरी आहे का याची खात्री करून घेतात. वृत्तपत्रांबाबत सहसा असे होत नाही. छापील बातमीवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. वृत्तपत्रातील भाषा लोकांना सोपी आणि सरळ वाटते.
एखादी बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर ती अचानकच गायब होते. त्याउलट एखाद्या वृत्तपत्राने काही महत्त्वाचा विषय हाताळला तर तो तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी, संपादकांनी लेखनासाठी मोठी किंमत मोजली. सरकारविरोधी रोष व्यक्त केला म्हणून लोकमान्य टिळकांना तुरूंगवास भोगावा लागला. त्याउलट सहकारी बाईवर बलात्कार केला म्हणून तरूण तेजपालसारख्या संपादकाला तुरूंगाची हवा खावी लागली. काही अपवाद वगळता माध्यमात काम करणार्‍या लोकांच्या गुणवत्तेतला हा फरक आहे. अर्थात, दृकश्राव्य माध्यमात काम करणार्‍या सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा माझा मानस नाही; परंतु वृत्तपत्रातील लोकांविषयी अजूनही व्यापक विश्वासार्हता आहे हे मान्य करावेच लागेल.

स्थानिक घडामोडींची प्रभावी दखल अजूनही वृत्तपत्रांद्वारेच घेतली जाते. रस्त्यावर पडलेले खड्डे असोत किंवा गावातील अखंड हरीनाम सप्ताह... या बातम्या वृत्तवाहिन्यांवर येणे तितकेसे सोपे नसते. स्थानिक समस्या वृत्तपत्रांतून मांडल्यानंतर प्रशासनही त्याची योग्य ती दखल घेते. वृत्तपत्रांत काम करणार्‍या लोकांचा संबंध भाषेशी येतो. त्यामुळे ते सरस्वतीचे भक्त असतात. विविध सदरे, प्रासंगिक लेख, बातम्या हे तर सोडाच पण ‘स्वयंपाकी हवा’, ‘घरकामाला बाई पाहिजे’, ‘पेस्ट कंट्रोलवाला हवा’, ‘विविध कामासाठी गरजू लोक हवेत’ अशा लोकोपयोगी छोट्या जाहिराती सुद्धा केवळ आणि केवळ वृत्तपत्रांतच वाचावयास मिळतील. सामान्य माणसाला मदत होणे आणि त्याच्या दैनंदिन समस्या सोडविण्यास हातभार लावणे हेच वृत्तपत्रांचे ध्येय असते. गावातील लोकांच्या ‘निधन वार्ता’सुद्धा देऊन वृत्तपत्रे वाचकांची सहवेदना अनुभवतात. त्यामुळे वृत्तपत्रांचे वाचकांशी अनोखे बंध निर्माण होतात. कामगार दिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी अशा जेमतेम चार सुट्ट्या घेतल्या आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी वृत्तपत्र आले नाही तरी अनेकांना चुकल्याचुकल्या सारखे होते. हेच तर मुद्रित माध्यमांचे मोठे यश आहे.

एक अखबार हूँ, अवकात ही क्या है मेरी
लेकिन पुरे शहर आग लगाने काफी हूँ 

असे वृत्तपत्रांबाबत म्हटले जाते ते उगीच नाही. कोणताही विषय ठामपणे मांडणे ही त्यांची खासियत असते. तरीही सध्या अनेक छोटी आणि विशेषतः जिल्हा दैनिके अडचणीत आहेत. सरकार दरबारी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील वार्ताहर तुटपुंज्या मानधनावर काम करतात, पण त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सोडला नाही. बातम्यांसाठी ते कठोर परिश्रम घेतात. मिळेल त्या साधनांद्वारे प्रवास करतात. लोकांशी बोलतात. खरेखोटे पडताळून पाहतात. आपल्या लेखनातून कुणावर अन्याय होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेतात. त्याउलट ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावावर अनेक वाहिन्या वाटेल तशा बातम्या चालवतात. बहुतेकांना फक्त ‘टीआरपी’शी देणेघेणे असते.

सध्या दुर्दैवाने काही वाङमयीन नियतकालिके बंद पडत आहेत. नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यवस्थापनात नाही. असे असले तरी राज्यभरातील दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांची जनमत घडवण्यातली ताकत मोठी आहे. त्यांची सर कुणालाच येणार नाही. म्हणूनच वाचनसंस्कृती कमी होतेय, भाषा संपत चाललीय असे नकारात्मक सूर लावण्यात अर्थ नाही. केवळ आणि केवळ विश्वासार्हतेच्या बळावर मुद्रित माध्यमे चिरकाल तग धरून राहतील याबाबत माझ्या मनात कसलाही किंतु नाही. मुद्रित माध्यमांच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना सांगावेसे वाटते,

ना तोफ से, ना बंदुक से
जो होता नही तलवार से
होता है अखबार से!
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092