Monday, September 19, 2016

कविता काही करा चला तर...!

मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींची किंमतच कळत नाही. अनेक अनमोल गोष्टी आपल्या जवळच असूनही आपण त्यांची कदर न करता ‘आणखी हवे’ चा हव्यास धरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या शरीराच्या विविध अवयवांचे देता येईल. शरीराच्या कोणत्याही अवयवात बिघाड झाली तर आपण पुरते त्रासून जातो; मात्र याच अवयवांची निगा राखणे आपल्या गावीही नसते. आपण क्षणाक्षणाला श्‍वासोच्छ्वास घेतो पण या श्‍वासाचे महत्त्व आपल्या ध्यानात येत नाही. जेव्हा आपण शेवटचा श्‍वास घेतो तेव्हा आप्तेष्ट, मित्रमंडळी हळहळतात; मात्र आपल्याला त्याची पुसटशीही जाणीव नसते. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत श्‍वासाचे महत्त्व कळू नये, हे दुर्दैवच खरे! 

हे वैश्‍विक सत्य अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे कविता! माणसाच्या बारशापासून बाराव्यापर्यंत साथ देणारी कविता आपल्या खिजगणतीतही नसते. जन्मापासून मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर कविता आपल्याला साथ देते. ती अंगाईच्या माध्यमातून असेल, व्रतबंधाच्या श्‍लोकातून असेल, मंगलाष्टकाच्या माध्यमातून असेल किंवा अंत्येष्टीच्या मंत्राच्या माध्यमातून असेल! कविता आपली साथ सोडत नाही. देशभक्तीच्या गीतातून, पोवाड्यातून जसे क्रांतीचे अंगार फुलतात तशीच अनेक प्रेमगीतातून प्रीतही फुलून येते. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करायचा असले किंवा विरहाच्या वेदना थोड्याशा हलक्या करायच्या असतील; प्रत्येक ठिकाणी कविताच गीत आणि संगीताची साथ घेऊन आपल्या मदतीसाठी धावून येते. 

ज्यांनी समाजाची मानसिक, बौद्धिक जडणघडण केली त्यातील बहुतांश काव्यग्रंथ आहेत. महाराष्ट्रातील कवितेचा मागोवा घेतला तर आपल्याकडे काव्याचे प्रमुख तीन टप्पे आढळून येतात. संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य हे ते तीन प्रकार आहेत. संत काव्यात संत ज्ञानेश्‍वर, जगद्गुरू तुकोबा, रामदास स्वामी अशा असंख्य विभुतींचा समावेश होतो. वामन पंडित, कवी मोरोपंत अशा महान कवींचा पंत काव्यात समावेश होतो; तर शाहीर राम जोशी, होनाजी बाळा अशांच्या कविता तंतकाव्यात मोडतात. यानंतर आपला ज्याच्याशी सर्वाधिक संपर्क येतो त्या आधुनिक मराठी काव्याचा टप्पा सुरू होतो. आधुनिक मराठी कवितेने कवितेला अध्यात्म, ईश्‍वरचिंतन अशा विषयांतून बाहेर काढले आणि निसर्ग, सामाजिक सुधारणा, संसारातील वैयक्तिक सुखदुःखे या व अशा विषयांचा अचूक वेध आधुनिक कविता घेऊ लागली. यासंदर्भात आधुनिक मराठी कवितेत काही ठिकाणी बदल झालेला दिसतो. काही कवींनी छंद, वृत्त, मात्रा यांच्या बेड्या तोडून अधिक मोकळ्या शैलीत म्हणजे मुक्तछंदात आपल्या मानसिक, बौद्धिक गोष्टींच प्रगटीकरण केलं. यात केशवसूत, राम गणेश गडकरी, बा. सी. मर्ढेकर आदींची कारकिर्द पाहता येईल. 

गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत कविता हा दुर्लक्षित आणि उपेक्षित प्रकार होता. अधूनमधून कवी संमेलने होत; पण गर्दी रोडावलेली! ‘कवितेला मानधन द्यायच असतं’ ही संकल्पनाच त्यावेळी रूजलेली नव्हती. अशा प्रतिकूल काळातही लोककवी मनमोहन नातू, रॉय किणीकर अशा कविंनी असंख्य हालअपेष्टा सहन करत कवितेचा झेंडा डौलात फडकावला. लोककवी मनमोहनांचा एक किस्सा याठिकाणी आवर्जून नमूद करावासा वाटतो. अफाट प्रतिभेचे किमयागार असलेले मनमोहन समाजाकडून आणि राज्यकर्त्यांकडून कायम उपेक्षित राहिले. ‘उद्याचा कालीदास अनवाणी जात असेल तर त्यात अब्रु त्याची नाही, राजा भोजाची जाते’ असे ठणकावून सांगणारे मनमोहन कधीही धनप्राप्तीच्या मागे लागले नाहीत. एकेदिवशी सकाळी ते त्यांच्या घराबाहेर आंघोळीसाठी पाणी तापवत बसले होते. त्यांच्या अंगावर त्यावेळी मोजकेच कपडे होते. त्यांच्या घरासमोरून तेथील स्थानिक नगरसेवक त्यांच्या बगलबच्यासह चालले होते. उघडेबंब बसलेल्या मनमोहनांना पाहून त्यांची चेष्टा करायची लहर नगरसेवकाला आली. ते म्हणाले, ‘‘काय कवीराज? अंगावर कपडे का घातले नाहीत?’’ मनमोहन म्हणाले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, म्हणून घातले नाहीत.’’ नगरसेवकाने चेष्टेने विचारले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, की घालण्यासाठी कपडेच नाहीत?’’ त्याचा अहंकाराचा सूर ध्यानात आलेल्या मनमोहनांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. ते म्हणाले, ‘‘राजकीय पुरूषांची कीर्ती 
मुळीच मजला मत्सर नाही 
आज हुमायू बाबरपेक्षा 
गालिब हृदय वेधित राही’’ 
याला म्हणतात प्रतिभेचा स्फोट! हुमायू आणि बाबराचे दाखले आदर्श 
म्हणून कोणीही देत नाही मात्र कलावंत असलेले गालिबमियॉं त्यांच्या काव्यातून अजरामर झाले, ही वस्तुस्थिती आहे. 

प्रतिभेलाच आपले सामर्थ्य मानणार्‍या या कवींनी मराठी कविता जगवली; मात्र व्यवहाराच्या पातळीवर ते सपशेल अपयशी ठरले. आर्थिक चणचण असल्याने आलेला दिवस कसाबसा ढकलत कुटुंबाचा गाडा ओढणे त्यांच्यासाठी कष्टप्रद आणि प्रचंड आव्हानात्मक होते. मात्र आधुनिक मराठी कवितेने हे दिवस बदलले. आता कविंनाही सुगीचे दिवस आले आहेत. अनेक कवींच्या कवितासंग्रहाची गावपातळीवरही चांगली विक्री होऊ लागली आहे. या विक्रमी विक्रीतून आणि शहराबरोबरच खेड्यापाड्यातही होणार्‍या विविध काव्यविषयक उपक्रमातून चांगली अर्थप्राप्ती होऊ लागली आहे. प्रवीण दवणे, आमचे मराठवाड्यातील प्रा. इंद्रजित भालेराव, अशोक नायगावकर, विसुभाऊ बापट, संदीप खरे यांच्यासारखे अनेक कवी, गीतकार हजारो रूपये मानधन घेतात आणि लोकही त्यांना सन्मानाने काव्यविषयक उपक्रमांना सातत्याने बोलावतात. इंद्रजित भालेरावांनी कवितेच्या मानधनातून परभणीत हक्काचे घर बांधल्याचे आदर्श उदाहरण आम्हास ठाऊक आहे. 

ही चांगली परिस्थिती अधिक चांगली होण्यासाठी मात्र काही गोष्टी अधिकाराने मांडाव्याशा वाटतात. डार्विनने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे ‘जो लायक आहे तोच जगतो.’ त्यामुळे या स्पर्धेच्या युगात कवींनी आपल्या कवितेचा कस आणि सादरीकरणाचा दर्जा उत्तम असावा याची काळजी घ्यावी. लेखन आणि सादरीकरण या दोन्ही निकषांवर अव्वल उतरणार्‍या कविता मोजक्याच असतात. काही कविता वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून किंवा संग्रहातून वाचायलाच चांगल्या वाटतात; तर काही कविता प्रभावी सादरीकरणाने रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवता येतात. मात्र या कविता छापील स्वरूपात वाचताना त्या अगदीच सामान्य वाटतात. असे का होते आणि अशा परिस्थितीत काय करावे, हे ज्याने त्याने आपापल्या बुद्धिप्रमाणे ठरवावे. कवींचे विविध विषयांवर भरपूर वाचन असणे हे तर आवश्यकच आहे. आपले शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. सध्या अनेक छोटीमोठी काव्यसंमेलने, कवितांचे एकपात्री आणि समूह कार्यक्रमही मोठ्या संख्येने होतात. अशा संमेलनांना हजेरी लावून अन्य कवींच्या कविता ऐकणे, त्यांना दाद देणे, त्यांच्या कवितेचे आणि सादरीकरणाचे बारकावे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. कवींनी इतरांच्या काव्यवाचनाला हजेरी न लावणे ही व्यक्तिशः आम्हाला मोठी नैतिक विकृती वाटते. 

गटबाजी आणि तटबाजीला थारा न देता जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे तिथे हजर राहून अन्य कवींना मोठ्या मनाने दाद ही दिलीच पाहिजे. ‘चपराक’च्या वतीने आम्ही गेल्या दहाबारा वर्षात अनेक काव्यविषयक उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने अनेक कवी संमेलनांचे आयोजन, राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, नवोदित कवींचे काव्यसंग्रह प्रकाशित करणे आणि त्यांचे समारंभपूर्वक प्रकाशन सोहळे घेणे, कवीवर, कवितेवर चर्चा घडवणे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कवींनाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक वातावरण सुदृढ, पोषक ठेवणे आदींचा समावेश आहे. आम्हाला तर असेही वाटते की, सध्या नवोदित कवींनी स्वतःचे व्यासपीठ स्वतःच निर्माण करावे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजार आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याच्या धर्तीवर कविता वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. या कवितांचे एखादे कडवे कानावर पडल्यानंतर संपूर्ण कविता ऐकल्याशिवाय ऐकणार्‍याचे पाऊल पुढे पडणार नाही, इतक्या ताकतीच्या त्या ओळी असाव्यात. ब्लॉग, वदनपुस्तिका (फेसबूक), ट्विटर अशा माध्यमातून उगीच काहीतरी रतीब टाकून लोकांचे कवितेविषयीचे मत आणखी कलुषित करण्याऐवजी दर्जेदार कविता द्याव्यात. लोकांना कविता या साहित्याच्या सर्वोत्कृष्ट प्रकाराविषयी आणखी जिव्हाळा वाटायला हवा. कवी आणि कवितांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी सर्व कवींनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

आपल्या रचना विविध नियतकालिकांना आणि वृत्तपत्रांना पाठवूनही प्रकाशित न झाल्याने उदास असलेले अनेकजण आम्हास भेटतात. मात्र गुणात्मक दर्जा उत्तम असूनही जागेची मर्यादा असल्याने अनेक संपादकांना इच्छा असूनही अनेकवेळा काही चांगले साहित्य देता येत नाही. त्यामुळे कविता छापून आली नाही, याचे शल्य उराशी न कवटाळता आणखी चांगले काव्यलेखन करावे. गुणवत्ता आणि दर्जा असेल तर कुणाचाही बळी जाणार नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. प्रकाशमार्गावरच्या सर्व शब्दयात्रींकडून भविष्यात आणखी चांगल्या, आशयसंपन्न, अर्थपूर्ण कविता ऐकायला, वाचायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो! 

-घनश्याम पाटील
संपादक 'चपराक', पुणे 
 ७०५७२९२०९२

Saturday, September 17, 2016

मृत्युंजयी शोकांतिका!

छत्रपती संभाजीराजे म्हणजे शौर्याचं प्रतीक! शिवाजी सावंत, विश्‍वास पाटील अशा काही लेखकांनी मांडलेला संभाजी आपण वाचला, अनुभवला. 1 फेबु्रवारी 1689 ला संभाजीराजांना संगमेश्‍वरात कैद करण्यात आले. 11 मार्च 1689 ला त्यांची व कवी कलशाची हत्या करण्यात आली. या दोघांच्याही अटकेपासून हत्येपर्यंतचा प्रवास चिरवेदनांचा आहे. अनंत यातना देऊन त्यांचा शिरच्छेद केला गेला. या 39 दिवसातील संभाजीराजांच्या भावनांची दखल आजपर्यंत कोणीही घेतली नव्हती. ‘ते 39 दिवस’ धावत्या आणि प्रभावी शैलीत, इतिहासाशी प्रामाणिक राहत वाचकांसमोर आणण्याचे काम केले आहे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक संजय सोनवणी यांनी. सोनवणी यांची ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ ही कादंबरी पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’च्या जालिंदर चांदगुडे यांनी प्रकाशित केली आहे. अवघ्या 125 पानात संभाजीराजांच्या भावभावना जिवंतपणे साकारण्यात सोनवणी यांना यश आले आहे. या कादंबरीत एका सशक्त चित्रपटाची कथाबिजे आहेत. या विषयावर नाटक आल्यास तेही रंगभूमीवर विक्रमी ठरेल. संभाजीराजे म्हणजे साक्षात मृत्युवरही मात करणारे वीरपुरूष! घनघोर जंगलात असलेल्या, दर्‍याखोर्‍यांनी वेढलेल्या संगमेश्‍वर या सुरक्षित ठिकाणी त्यांना अटक झाली आणि त्यांचा मृत्युकडचा प्रवास सुरू झाला. मोगलांची अचानक पडलेली धाड, राजांना व कवी कलशाला झालेली अटक आणि पुढील 39 दिवसातील प्रवास वाचताना वाचक भारावून जातात. ‘झपाटलेपण’ हे तर लेखक संजय सोनवणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. वाचकही ही कादंबरी वाचताना झपाटून जातात. शिर्क्यांची खोड मोडून राजे संगमेश्‍वरला आले होते. संगमेश्‍वर दुर्गम आहे, दर्‍याखोर्‍यात आणि अरण्यात वेढलेले आहे, म्हणूनच नव्हे तर येथे येणारे मार्ग पूर्ण सुरक्षित केले गेलेले आहेत म्हणून सारेजण निगुतीत होते. मात्र स्वराज्याच्या शत्रुंनी, रायगडावरील मुत्सद्यांनी, काही घरभेद्यांनी कटकारस्थाने केली आणि कवी कलशासह संभाजीराजांना अटक झाली. सोनवणी लिहितात, ‘मानवी विश्‍वासाला सीमा असतात. स्वप्नातही कल्पना येणार नाही अशी आकस्मित संकटे माणसावर येतात. क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. संभाजीराजे म्हणजे आजवर अनवरत संघर्षांच्या तांडवांना छाताडावर झेलत स्थिरचित्त राहणारा साक्षात सह्याद्रीचा पहाड! पण दुष्टबुद्धीचे लोक विरोधात एकत्र आले की पहाडांनाही गलितगात्र व्हावे लागते हा मानवी जगाचा नियम! तो चिरकालिक नियम बनावा हे मानवजातीचे दुर्भाग्यच नव्हे काय?’ संभाजीराजांना अटक झाल्यानंतरही त्यांना सुटकेची आशा वाटत असते. त्यांच्या सहकार्‍यांवर त्यांचा विश्‍वास होता. कात्रज, शिरवळ, सातारा कुठूनतरी आपले शूरवीर मराठे चाल करून येतील, शत्रुचा नायनाट करून आपल्या बेड्या काढून टाकतील असे त्यांना वाटत राहते. मराठ्याच्या राजाला अत्यंत अपमानास्पदरित्या फरफटत नेले जाते; मात्र कुणीही मराठे त्यांना सोडवायला येत नाहीत. हातापायात बेड्या, चेहर्‍यावर पट्टी बांधलेली... संभाजीराजांना कुठे नेत आहेत हेही त्यांना ठाऊक नसते! या मानसिकतेतही त्यांची असहाय्यता, अगतिकता, उफाळून येणारा संताप, ठणकणार्‍या वेदना, आप्तस्वकियांकडून झालेली फसगत, त्यातूनच आलेली बेफिकीरी, मृत्युला दिलेले आव्हान असा सारा आशावादाकडून हतबलतेकडचा झालेला प्रवास वाचताना वाचकांच्या अंगावरही शहारे येतात. त्यांचे रक्त तापू लागते. मराठ्यांनीच ‘मराठा’ राजाची केलेली फसवणूक मांडणारा ‘काळाकुट्ट इतिहास’ आजच्या मराठ्यांनी जरूर वाचला पाहिजे. आपण मृत्युंजयी संभाजीराजांचे वारसदार आहोत की तेव्हाच्या गद्दार आणि ‘घरबुडव्या’ मराठ्यांचे वारस आहोत हे आता तपासून पाहिले पाहिजे. कटकारस्थाने रचत संभाजीराजांना मृत्युच्या दरीत ढकलणारे ब्राह्मण नव्हे तर तत्कालीन मराठेच होते हे सत्य या कादंबरीद्वारे अधोरेखित होते. संगमेश्‍वरातून बाहेर पडल्यानंतर संभाजीराजे कवी कलशाला उद्देशून वाचकांशी संवाद साधतात. ओघवती भाषाशैली आणि जेधे शकावली, साकी मुस्तैदखान (मासिरे आलमगिरी), ईश्‍वरदास नागर (फुतहाते आलमगिरी) असे अस्सल संदर्भ देत संजय सोनवणी यांनी ही कलाकृती फुलवली आहे. त्यासाठी त्यांनी आत्मनिवेदनात्मक शैली वापरल्याने संभाजीराजे त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलगडून दाखवतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, संभाजीराजांच्या बालपणीच्या आठवणी, महाराजांची आग्रा भेट, महाराजांच्या सुचनेनुसारच त्यांच्या विरोधातही केलेल्या लढाया, सत्तालोलूपांनी आखलेली आणि दुर्दैवाने तडीस गेलेले डावपेच, औरंगजेब, मोगल यांना दिलेल्या झुंजी, संभाजीराजांच्या अटकेनंतर राजारामाचा झालेला राज्याभिषेक, येसूबाईंच्या आठवणी हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. खुद्द संभाजीराजे असहाय्यपणे ही सारी परिस्थिती वाचकांसमोर मांडतात असेच ही कादंबरी वाचताना वाटते. संभाजीराजांचे भावविश्‍व साकारण्यात संजय सोनवणी पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. संवादी भाषा, विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, संतोष घोंगडे या तितक्याच मनस्वी कलाकाराच्या कुंचल्यातून साकारलेले जबरदस्त मुखपृष्ठ, सुबक आणि आकर्षक छपाई हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. संभाजीराजे मावळ्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘अरे या... लढा मर्दाप्रमाणे! आमची पर्वा नका करू! पर्वा करा आबासाहेबांनी तुम्हाला मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची! आम्ही मेलो तर राजारामाला गादीवर बसवा... औरंग्याला नष्ट करा... दिल्लीवर सत्ता गाजवा! या आभाळातून आम्ही कवतुकाने तुमचे सोहळे पाहू! अरे देह नश्‍वर आहे! गडबडून जाऊ नका. एक संभा पडला तर या मातीतून लाखो संभा पैदा होतील. होय... ही आमची महाराष्ट्रभूमी आहे!’’ मात्र महाराजांचा हा आशावाद सपशेल खोटा ठरतो. वेदनांच्या काळडोहात लोटणारे क्षण त्यांना अस्वस्थ करतात. वाचकही ते वाचून सुन्न होतात. संभाजीराजे जिवंत असताना राजारामांचा झालेला राज्याभिषेक त्यांच्या भावनांना साद घालतो. ‘आम्ही मुक्त असू, स्वराज्याचे पाईक असू’ हा आशावाद संपवतो. राजांना साखळदंडात बांधून बळजबरीने ओढत नेले जाते. त्यांच्या काळजाच्या चिंध्या होतात. वेदनांचा कल्लोळ उसळतो. त्यांच्या अंगावर विदुषकी कपडे घातले जातात. त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यांना उंटावर बसवून, नगारे वाजवत धिंड काढली जाते. बघ्यांची गर्दी जमते. लोक हसतात, चित्कारतात. एका राजाला गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. मृत्यू अटळ आहे हे समोर दिसू लागते. तरीही त्यांना सोडवण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अंधारच असतो. ‘‘संभा, उद्या सकाळी तुझे हात-पाय तोडून मग मस्तक छाटायची आज्ञा आलमगिरांनी दिली आहे. तुझा मित्र कलशालाही हीच सजा फर्मावण्यात आली आहे’’ असे त्यांना सांगण्यात येते. तेव्हा उद्विग्नपणे संभाजीराजे म्हणतात, ‘‘मरणा... ये लवकर. स्वागत आहे तुझे! पण लक्षात ठेव... आम्ही मृत्युंजय आहोत. जिवंतपणे कैकदा मेलो आम्ही. कधी आप्तांच्या हातून, कधी घरभेद्यांच्या हातून. आताचा हा मृत्यू म्हणजे आमच्या मृत्युवृक्षाला आलेले अंतिम फळ. आम्ही आनंदी आहोत कारण आम्ही तुझ्यावरही जीत मिळवणार आहोत.’’ संजय सोनवणी हे इतिहास संशोधक आहेत. त्यांची जवळपास 85 पुस्तके प्रकाशित आहेत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ज्यांची पुस्तके ठेवलीत असे ते एकमेव मराठी लेखक आहे. त्यांच्या कादंबर्‍यानी इतिहास घडवला. भल्याभल्या इतिहासकारांना हजारो पानात जे मांडता आले नाही ते ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ या कादंबरीत त्यांनी केवळ सव्वाशे पानात मांडले आहे. एका जाज्ज्वलनतेजस राजाची शोकांतिका त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत मांडली आहे. भाषेच्या पातळीवर हे पुस्तक सामान्यात सामान्य वाचकालाही वाचावेसे वाटेल. इतिहासापासून प्रेरणा घेतानाच संभाजीराजांसारख्या महापुरूषाची झालेली उपेक्षा, अवहेलना, फितुरी हे सारे समजून घेतले पाहिजे. केवळ संभाजीराजांचे नाव घेऊन ‘बी’च काय कोणत्याही ‘ग्रेड’चे राजकारण करणे म्हणजे मराठ्यांची फसवणुकच आहे. इतिहासापासून काही बोध घेण्याऐवजी आजही तोच प्रकार खुल्लमखुल्ला सुरू आहे. कृतघ्नतेची परिसिमा ओलांडणार्‍यांचे बुरखे सोनवणी यांनी या कादंबरीत टरटरा फाडले आहेत. मृत्युला आव्हान देऊन पराक्रमाची परंपरा तेवत ठेवणारी आणि प्रत्येक मराठी माणसात नवचैतन्याचे स्फूल्लिंग पेटवणारी संजय सोनवणी यांची ही कादंबरी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पाने - 125, मूल्य - 140 
प्रकाशन - प्राजक्त प्रकाशन, पुणे (9890956695) 

- घनश्याम पाटील, 
संपादक, 'चपराक', पुणे ७०५७२९२०९२ 

Thursday, September 8, 2016

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवाच!



कोण लेकाचा कोणाची देशसेवा पाहतो?
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो!
लोककवी म. भा. चव्हाण यांच्या या ओळी. समाजमाध्यमांच्या लाटेमुळे स्वयंघोषित देशभक्तांची आपल्याकडे मुळीच वानवा राहिली नाही. एकमेकांची आरती ओवाळणारे हे महाभाग ‘देशभक्त’ ठरवले जात आहेत. खरेतर एकेकाळी महाराष्ट्र ही संतांची भूमी होती. आता ती चोर, लफंग्यांची, लुच्च्यांची झालीय! यात सत्ताधारी आणि विरोधक ‘आपण सारे भाऊ, अर्धे अर्धे खाऊ’ याप्रमाणे वागतात. महाराष्ट्र सध्या दोलायमान परिस्थितीतून जात आहे. अर्थात देशातच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे चित्र सार्वत्रिक झालेय असे म्हणायला मोठा वाव आहे.
साधारण दोन वर्षापूर्वी देशात आणि नंतर राज्यातही सत्तांतर झाले आणि लोकांच्या लोकशाहीविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या; मात्र ‘आगीतून उठून फुफाट्यात’ यापेक्षा काही वेगळे चित्र दिसत नाही. ‘इंग्रज गेले आणि कॉंग्रेसवाले आले’ अशी परिस्थिती होती. आता ‘कॉंग्रेसवाले गेले आणि भाजपवाले आले’ असेच म्हणावे लागेल. गेल्या काही काळात बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, आर. आर. पाटील यांच्यासारखे राजकारणातले हिरे गेले आणि उरलेल्या कोळश्यांनी त्यांचा रंग दाखवायला सुरूवात केलीय.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख असे काही कर्तबगार मुख्यमंत्री यापूर्वी आपल्याला लाभले. नंतरच्या काळात ‘हसमुखराय’ अशी ओळख असलेले सुशीलकुमार शिंदे आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा आवाका माहीत असलेले, पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी ताकतीने पेलणारे पृथ्वीबाबाही मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ कामगिरी आपण बघितली. पुढे सत्ता गेल्यावरही त्यांना त्याबद्दल प्रदेशाध्यक्षपदाची ‘बक्षिसी’ मिळाली. शरद पवार यांनीही महाराष्ट्राचे नेतृत्व करून देशभरात आपली छाप उमटवली. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या प्रतिमेचे मुख्यमंत्री आपल्याला मिळाले.
खरेतर यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्याचे नाव देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असते. हा इतिहास लक्षात घेता यावेळी नितीन गडकरी यांच्यासारखा बलाढ्य नेता राज्याचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती. मात्र गडकरी ‘स्वयंप्रभावित’ नेते असल्याने तुलनेने नवख्या देवेंद्र यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली गेली. सत्तेवर आल्यानंतर हा माणूस काहीतरी भरीव, विधायक करेल असे वाटत होते; मात्र अपेक्षांना फाट्यावर मारत फडणवीसांनी श्रीहरी अणेंसारख्या लोकांना पुढे करत वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू केली. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशा पक्षांतर्गत तगड्या लोकांचे खच्चीकरण करण्यातच त्यांची कारकीर्द जातेय.
सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. गृहमंत्रीपदही त्यांच्याकडेच आहे. सत्तेचा हव्यास असेल किंवा आत्मकेंद्री वृत्ती असेल; त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण ते करत नाहीत. त्यांच्या खात्याला ते न्याय देऊ शकत नाहीत. देवेंद्र यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे आपल्या पोलीस यंत्रणेचे जेवढे अपयश आहे तेवढेच किंबहुना काकणभर अधिक अपयश देवेंद्र फडणवीसांचे आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले असताना यांना फक्त स्वतःची प्रतिमा जपण्याचे पडले आहे. त्यातून ते बाहेर पडतच नाहीत.
सोलापूरमधील ज्योती खेडकर या तेवीस वर्षीय तरूणीचे तुकडे करून तिला जाळण्यात आले. चार महिने उलटूनही या प्रकरणातील आरोपींवर काहींच कारवाई झाली नाही. ज्योती खेडकरच्या आईवडिलांनी आत्महत्येचा इशारा दिला; मात्र आरोपींची नावे घेत तक्रार दाखल करून घेण्याचे सौजन्यही पोलिसांनी दाखवले नाही. याबाबतची माहिती मिळताच माझे सहकारी सागर सुरवसे यांनी वस्तुस्थिती पुढे आणणारी बातमी ‘चपराक’च्या माध्यमातून वाचकांसमोर आणली. आम्ही ‘मुख्यमंत्री महोदय, ढेरीबरोबरच गुन्हेगारीही कमी करा’ हा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. परिणामी गृहराज्यमंत्र्यांनी सोलापूरच्या पोलीस अधिक्षकांना या प्रकरणातील आरोपींना अटक करून तपासाच्या सूचना दिल्या. सुदर्शन गायकवाड, बंडू गायकवाड आणि सुहास गायकवाड या तीन आरोपींना सोलापूर पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत सोलापूरचे पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले की, मृत ज्योतीचा आणि खेडकर कुटुंबीयांचा ‘डीएनए’चा अहवाल अजून आला नसल्याने यातील आरोपींना अटक केली नव्हती. नावात ‘वीर’ आणि आडनावात ‘प्रभू’ असूनही हा माणूस इतका कमकुवत आहे. अत्याचार आणि खुनासारखी गंभीर घटना घडूनही हे लोक कोणत्या तंद्रीत असतात हे देवेंद्र फडणवीस यांनाच ठाऊक! राज्यात ‘डीएनए’ तपासणीची केवळ एकच लॅब असणे हेही आपल्या यंत्रणेचे मोठे अपयश आहे.
राज्यातील अनेक पोलीस स्थानकांच्या गाड्या बंद आहेत. ज्यांच्या चालू आहेत त्यातीलही अनेकजण ठरवून त्यांचा वापर करत नाहीत. म्हणजे गाड्यांसाठी लागणार्‍या पेट्रोलचा खर्च सरकारकडून उकळला जातो. गाड्यांचा ‘मेंटेनन्स’ वसूल केला जातो; मात्र या गाड्यांचा वापर तपास यंत्रणेसाठी केला जात नाही. जो आरोपी आहे किंवा फिर्यादी आहे त्यांच्याकडून गाड्या मागवणे, पेट्रोलचा खर्च घेणे असे प्रकार अनेक ठिकाणी सर्रासपणे सुरू आहेत. ग्रामीण महाराष्ट्र तर सोडाच पण पुण्यासारख्या महानगरातही अनेक आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी कोठड्याच नाहीत. एकाच इवल्याशा कोठडीत पाच-पंचवीस आरोपींना एकत्र ठेवले जाते. तेथील शौचालये म्हणजे तर साक्षात नरकच! तिथेच पिण्याच्या पाण्याचा नळ असतो. विशेषतः महिला आरोपींना अटक केली तर फार विचित्र परिस्थिती असते. एखाद्या बाईला एखाद्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले आणि तिला कोठडी झाली तर तिला आणि त्या परिसरातील पकडलेल्या वेश्यांना, छापा मारून पकडलेल्या ‘कॉल गर्ल्स’नाही एकत्रच ठेवले जाते. मानवी हक्क आयोगवाले या सगळ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
नुकतेच मुंबईतील एक घटना वाचनात आली. एका बाईने एका सावकाराकडून दहा हजार रूपये व्याजाने घेतले. सतत तगादा लावूनही पैसे परत न मिळाल्याने त्या सावकाराने त्या आईच्या मदतीनेच तिच्या मुलीवर पाच महिने वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकरणात ती आई स्वतःच्या मुलीला आणि त्या सावकाराला एका खोलीत डांबून बाहेरून कुलूप लावायची. 
दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये
जिची ममता आटली, तिले माय कधी म्हणू नये!
या बहिणाबाईंच्या ओळी या ठिकाणी आठवतात; मात्र यापेक्षा मोठे क्रौर्य जगात खरेच असू शकते का?
सध्या मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. काय तर म्हणे मूक मोर्चा. कशासाठी? तर कोपर्डीतील अत्याचारित बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी! यांची मागणी काय? तर ‘मराठ्यांना आरक्षण द्या आणि ऍट्रॉसिटी रद्द करा...’ म्हणजे अत्याचार, आरक्षण आणि ऍट्रॉसिटी याचा काय संबंध? (कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगार ‘दलित’ होते यासाठीचा हा कांगावा.) समाजमाध्यमात तर याविषयी अनेक संदेश फिरत आहेत. ‘पहिल्यांदा आणि शेवटचेच मराठा मूकपणे रस्त्यावर उतरलाय.. यानंतर मराठा रस्त्यावर आला तर शस्त्र घेऊनच येईल...’ अशा आशयाचे अनेक संदेश समाजमाध्यमात सातत्याने दिसत आहेत. त्यात शरद पवार यांच्यासारखे ‘जाणते’ नेते आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. हे सारेच चिंताजनक आहे. मुख्यमंत्री मात्र सगळेच मूकपणे पाहत आहेत. ‘ऍट्रॉसिटी’चा अनेक ठिकाणी गैरवापर करण्यात येतोय, हे सत्य लक्षात घेऊन त्याविरूद्ध कायदेशिर लढाई लढायला हवी. अशा एखाद्या घटनेचे ‘भांडवल’ कोणीही करू नये.
धुळ्यात तर भांडणे सोडवायला गेलेल्या पीएसआयला लोकांनी जाम चोप दिला. त्यांना अक्षरशः पळवू पळवू मारला. खाकीतील एका कर्तव्यदक्ष पोलिसाला मारल्याबद्दल 135 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. मुंबईत विलास शिंदे या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 ऑगस्ट 2016 रोजी असाच प्रकार बारामतीतही घडला. तेथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सागर देवकाते-पाटील आणि त्याच्या साधारण 15-20 सहकार्‍यांनी अर्जुन व्यवहारे, राजेश गायकवाड आणि व्ही. एस. वाघमोडे या पोलीस कर्मचार्‍यांना  बेदम मारहाण केली. हातात तलवार घेऊन ते त्याठिकाणी वाढदिवस साजरा करत होते. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत त्यांना त्यासाठी अडवले असता त्यांनी ‘यांना मारून टाका, कॉलेजशी यांचे काय देणे-घेणे’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली व तेथील सिमेंटच्या ब्लॉकने त्यांना मारहाण केली. या जमावाने पोलिसांच्या गाडीचीही मोडतोड केली. यात सदर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहेत. ठाण्यात एका पोलीस निरीक्षकांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. जालण्यात एका भाजप आमदारांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांसह आत्महत्या करण्याचा इशारा एका पोलीस उपनिरिक्षकांनी दिलाय... राज्यात खुद्द पोलिसही सुरक्षित नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे असलेले गृहखाते चव्हाट्यावर आले आहे. वाईत डॉ. संतोष पोळ या विकृताने अनेक खून करून ते मृतदेह चक्क आपल्या फार्महाऊसमध्येच गाडले. हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे का? इथे सामान्य माणूस सुरक्षित नाही, समाजातील विचारवंत सुरक्षित नाहीत, लेखकांवर हल्ले होतात, पोलिसांना बदडले जाते; तरी मुख्यमंत्री ढिम्मच! देवेंद्र फडणवीस, जरा लाज बाळगा!! तुमच्या अकार्यक्षमतेसाठी, तुमच्या प्रतिमेसाठी, तुमच्या महत्त्वाकांक्षेसाठी, तुमच्या सत्तास्पर्धेसाठी सामान्य माणसाला आणि पर्यायाने राज्याला वेठीस धरू नका!
सगळीकडे अंधाधुंदी माजली असताना त्रस्त जनता जर खर्‍याअर्थी रस्त्यावर उतरली तर सगळ्यांनाच पळता भुई थोडी होईल. अजूनही इथल्या न्याय यंत्रणेवर, प्रशासनावर, माध्यमांवर आणि मुख्यत्त्वे सत्ताधार्‍यांवर लोकांचा विश्‍वास आहे. तो गमावला तर धुळ्यात जी अवस्था पोलिसांची झाली तीच या सर्व घटकांची होईल. मुख्यमंत्री म्हणजे ‘औट घटकेचा राजा’ असतो. कायदा आणि न्याय व्यवस्था अजून आपल्याकडे मजबूत आहे; मात्र लोकशाहीचे असे धिंडवडे खुलेआमपणे निघत असतील तर येणारा काळ भयंकर असेल.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे. जर शिवसेनेला गृहखाते दिले तर ते निश्‍चितपणे गुन्हेगारी आटोक्यात आणू शकतील. आपल्या सहकार्‍यांपैकी एकहीजण लायकीचा वाटत नसेल किंवा त्यांच्यावर तुमचा विश्‍वास नसेल तर देवेंद्रजी शिवसेनेकडे गृहखाते द्याच! त्याचा तुमच्या सरकारलाच फायदा होईल. तुमची विश्‍वासार्हता नक्की वाढेल! आणि जाता जाता मराठा समाजातील फुरफुरत्या घोड्यांना सांगावेसे वाटते, बाबांनो, सोलापूरात ज्या मुलीचे तुकडे करून तिला जिवंत जाळण्यात आले तिही ‘मराठा’च होती आणि तिच्यावर अत्याचार करणारेही ‘मराठा’च होते. त्याची साधी दखलही कुणाला घ्यावीशी वाटली नाही. ‘जातीसाठी खावी माती’ या ध्येयाने तुमच्या ‘स्वार्था’चे राजकारण करताना किमान थोडीफार नैतिकता ठेवा. ही ‘स्टंटबाजी’ फक्त तुमच्या ‘पुढार्‍यांचे’ कल्याण करेल. यात सामान्य मराठा माणसाचे काहीच हित नाही. भांडारकर इन्स्टिट्यूटची मोडतोड करणारे, तिथला दुर्मीळ ठेवा जाळून टाकणारे आज भीकेला लागलेत. मराठवाड्यातून पुण्यात कोर्टाच्या चकरा मारण्यातच त्यांचे तारूण्य वाया जातेय. कर्जाने पैसे काढून ती पोरे पुण्यात तारखांना येतात. ज्यांनी त्यांना चिथावणी दिली त्यापैकी कुणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. एकदा त्यांची भेट अवश्य घ्या. त्यांच्या वेदना ऐका आणि मग खुशाल तुमच्या नेत्यांची पाठराखण करा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा... वेळीच सावध व्हा राजांनो, नाहीतर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणायची वेळ येईल! तशी वेळ कुणावरही येऊ नये, इतकंच! बाकी तुमची मर्जी!!

आरोपींना फाशी व्हावी!
गेल्या चार महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे न्याय मागत होतो; मात्र पोलिसांनी आमची कोणतीही तक्रार ऐकून घेतली नाही. आमच्या डोळ्यादेखत आरोपी मोकाट फिरत असताना आम्ही रोज मरत होतो; मात्र केवळ ‘साप्ताहिक चपराक’ने दिलेल्या वृत्तामुळे आमची न्याय मिळण्याची आशा जिवंत राहिली. आता आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, तरच आम्हाला न्याय मिळेल.
 रत्नमाला खेडकर
(मृत ज्योती खेडकरची आई)

घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२
 


Sunday, September 4, 2016

जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे



सामान्य माणसाच्या असामान्यत्वावरील श्रद्धा बळकट करणारे संजय वाघ यांचे
गंध माणसांचा’ हे पुस्तक जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे उभारणारे आहे. हे पुस्तक चपराक’च्या परंपरेत मानाचा तुरा ठरावे.
माणसाची अनंत रूपे आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. प्रत्येकाच्या नाना तर्‍हा.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ असे आपण म्हणतो ते त्यामुळेच. मात्र यांच्यातील चांगुलपण हेरणे, ते समाजासमोर आणणे यासाठी निकोप दृष्टी लागते. मित्रवर्य संजय वाघ हे पंचवीस वर्षाहून अधिककाळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांच्याकडे अशी व्यापक दृष्टी आहे. गुणग्राहकता आहे. त्यामुळेच त्यांनी स्वत:च्या खिशाला झळ देऊन समाजातील काही रत्नं शोधली. त्यांच्यातील तेज जगाला दाखवून दिले. ‘स्वत:साठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तरच जगलास’, असे म्हणतात. अशा इतरांसाठी जगणार्‍या माणसांचा गंध वाघां’ना येतो. मात्र हे वाघ त्यांची शिकार करण्याऐवजी त्यांच्यातील ‘दिव्यत्वाचे प्रकटीकरण’ घडवतात.
यातील प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी; मात्र ती नेमकेपणाने मांडण्याचे वाघ यांचे कसब थक्क करायला लावणारे आहे. महाभारतातील संजय जसे युद्धभूमिवरील वर्णन जिवंत करायचा अगदी त्याचप्रमाणे हा आधुनिक संजय सामान्य माणसाचा अलौकिक संघर्ष अलवारपणे उलगडून दाखवतो. जणू आपण त्या व्यक्तिला भेटतोय आणि त्याच्या आयुष्याचे सार जाणून घेतोय, असेच यातील व्यक्तिचित्रणात्मक लेख वाचताना शब्दाशब्दाला जाणवते. चांगुलपणावरील विश्‍वास घट्ट करणारे, बेचिराख झाल्यावरही पुन्हा जोमाने मुसंडी मारण्यासाठी प्रेरणा देणारे, प्रामाणिकपणा, जिद्द, सेवाभाव, दानत याचे जवळून दर्शन घडवणारे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक जबरदस्त क्षमतेचे ‘टॉनिक’ ठरणारे आहे.
देवभूमी नाशिक हे संजय वाघ यांचे कार्यक्षेत्र. त्यामुळे हाच परीघ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील या कस्तुरीमृगांचा शोध घेतला. प्रतिकूलतेवर मात करत आपल्या अचाट कर्तृत्वाचा सुगंध दरवळत ठेवणार्‍यांना अचूकपण हेरत त्यांनी पत्रकारिता धर्माचे पालन केले आहे. इतकेच नाही तर
ध्येयाकडे वाटचाल करणारी माणसे मला माझ्या जातकुळीतली वाटली, त्यांचा आणि माझा रक्तगट एक वाटला’, असे ते आत्मीयतेने सांगतात. त्यांच्यातील मुळातच असलेले चांगुलपण त्यांना अशा ध्येयनिष्ठ माणसांकडे खेचून नेत असावे. त्याशिवाय अशी एकरूपता साधणे शक्य नाही.
मातीत पुरलेल्या एका निष्पाप
जाई’ला वाचवताना डॉक्टर देवीप्रसाद शिवदे या धन्वंतरी’ने आरोग्यसेवेचा धर्म निभावला व परिचारिकारूपी सिंधूताईंच्या लेकीं’नी खरोखर मातृधर्म पार पाडला. या ग्रंथातील हा पहिलाच लेख वाचताना डॉक्टरांना देवाची उपाधी का दिली जाते याचे भान येते. विधायक वृत्ती वाढवण्याबरोबरच समाजातील भयाण वास्तव वाघ यांनी प्रभावीपणे मांडले आहे. यातील लेख वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात, अभिमानाने उर भरून येतो, काहीवेळा कुप्रवृत्तीविषयी रागही उफाळून येतो. म्हणजे एकंदर काय तर आपल्यातील माणूसपण जिवंत असल्याची खात्री पटते. ‘इगतपुरीतील शिवसेनेच्या पहिल्या तालुकाप्रमुखावर गाव त्यागण्याची वेळ का आली?’ असा बनतोड सवाल करताना भिका राजू बोडके या निष्ठावंताच्या नशिबी जे संन्याशाचे जिणे आले त्याची हेलावून टाकणारी कथा संजय वाघ यांनी मांडली आहे.
सत्प्रवृत्तींचा वारसा नेकीने जपणारे नेरकर दाम्पत्य,
अंजुमन’द्वारे बेवारस प्रेतांचे वारसदार होणारे हुसेनभाई शेख, जवळपास पंचेचाळीस लाख रूपये खर्च करून शिवरायांचे अश्‍वारूढ शिल्प साकारणारे भाऊसाहेब अहिरे, सरकारी दवाखान्यातील गरजूंना मोफत अन्नसेवा पुरवणारे गंगाराम पांडे, जलदान करून जीवन’ जनास वाटणारे विलास सावंत, निर्मलग्रामसाठी चपलांचा त्याग करणारे आगळे वेगळे असे सिद्धार्थ आगळेे, वृद्धाश्रमात जीवन कंठणार्‍या असहाय्य पक्षिणीची आर्त हाक देणार्‍या कुसुमताई भडक, गजानन महाराजांचे परमभक्त असणारे वृत्तपत्र विक्रेते प्रल्हाद भांड यांची नाशिक ते शेगाव अशी सायकलवारीची दशकपूर्ती, गोदामात ग्रंथसंसार थाटून विनाअनुदानित वाचनालय चालवणारे जयंतराव कुलकर्णी, सर्पमित्र मनीष गोडबोले आणि 28 टाक्यांच्या वेदना सहन करून चोवीस तासात चौदा अंडी घालणार्‍या धामणीला जीवदान देणारे डॉ. संजय गायकवाड, सेवाभावी पुस्तक विक्रेते प्रा. मच्छिंद्र मुळे अशा अद्भूत आणि अफाट क्षमतेच्या लोकाविषयी वाचताना भारावून गेल्यासारखे होते.
संजय वाघ यांनी यापूर्वी 26/11 च्या हल्ल्यातील हुताम्यांवर पुस्तक लिहिले होते. देशभक्त, समाजभक्त यांच्या कीर्तीचे पोवाडे गाताना ते हरखून जातात. समाज इतकाही रसातळाला गेला नाही, अजून चांगुलपण टिकून आहे याची साक्ष पटवणारे त्यांचे लेखन आहे. सध्याच्या बजबजपुरीत असे लिखाण करणे, ते वाचले जाणे हे समाजाच्या सदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. पैशाची, वेळेची, आरोग्याची पर्वा न करता गुणवंतांच्या आदर्शांचे पोवाडे गाणारे संजय वाघ सद्गुणांची पेरणी करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडत सुट्टीच्या दिवशी कुशल कर्मवीरांना शोधून काढणारे वाघ समाजात सकस आणि निकोप विचार भक्कमपणे रूजवत आहेत. एका जागरूक पत्रकाराचे हे कार्य आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे.
ही यशोगाथा सदर स्वरूपात प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे शब्दांची मर्यादा सांभाळत त्यांनी मोजक्या शब्दात जो संदेश दिलाय त्याला तोड नाही. त्यांच्या लेखणीचा हा आविष्कार नवोदित पत्रकारांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. यातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव करताना त्यांनी जो फॉर्म हाताळलाय तो भाषेच्या पातळीवर दखलपात्र ठरला आहे. उगीच शब्दांचे फुलोरे फुलवण्याऐवजी आणि आलंकारीक भाषेतून क्लिष्टता वाढवण्याऐवजी सामान्यातील सामान्य व्यक्तिला कळेल अशी शब्दयोजना त्यांनी केली आहे. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेला प्रबोधनाचा, जनजागृतीचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनाची विजयपताका सातत्याने डौलात फडकेल यात शंका नाही.
संजय वाघ यांनी या पुस्तकाच्या रूपाने मराठी साहित्यात मोठी भर घातली आहे. फक्त नाशिक जिल्ह्यात इतक्या ताकतीच्या व्यक्ती असतील तर आपल्या आजूबाजूला असे भरीव कार्य करणारे कितीजण आहेत, याचा शोध वाचकांनी घेतला पाहिजे. आपापल्या पातळीवर त्यांना शक्य ते सहकार्य केले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकी दृष्टी जरी या पुस्तकातून मिळाली तरी वाघ यांच्या लेखनाचे सार्थक होईल. भविष्यात त्यांनी असेच उत्तमोत्तम लेखन करावे यासाठी त्यांना हृदयापासून शुभेच्छा देेतो.

पाने - 128, मूल्य 130
‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)

Monday, August 29, 2016

आईपणाच्या कविता!

पूर्वीच्या काळी एखादी निपुत्रिक दायी अनेक बाळंतपणं  यशस्वीरित्या पार पाडायची. तिच्याकडे जी कला असायची तो झाला तिचा अनुभव आणि ज्या बायका आई व्हायच्या ती झाली त्यांची अनुभूती!
माणसाकडे अनेक कला असतात. त्या कलांचा ते आपापल्या पद्धतीने उपयोगही करतात; मात्र अनुभूतीतून पुढे आलेले वास्तव म्हणजे साधनेचा सर्वोत्कृष्ठ आविष्कार! त्यातूनच आयुष्य समृद्ध होत जातं. सौ. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी तब्बल 21 वर्षांपूर्वी मातृत्वाचा सोहळा अनुभवला. त्यावेळचे अनुभव, सोबतच येणारी अनुभूती शब्दबद्ध केली आणि या रचनांचा जन्म झाला.
असे म्हणतात, ‘जन्म से पहले और भाग्यसे जादा कभी किसीको कुछ नही मिलता!’ मात्र हे विधान या कविता वाचल्यानंतर खोटे वाटू लागते. बाळाच्या जन्मापूर्वी नऊ महिने नऊ दिवस आईचे पोट त्याला लाभते! म्हणजे ‘जन्म से’ पहले त्याला खूप काही मिळते; आणि आईने दिलेला जन्म हेच खूप मोठे भाग्य आहे. त्यामुळे संपूर्ण आयुष्य म्हणजे ‘भाग्यसे जादा’ असेच म्हणावे लागेल.
कवयित्री आपल्या पहिल्याच रचनेत लिहितात,
गर्भसंस्काराच्या वेळी
मी ऐकवल्या गर्भाला
थोर जिजाऊंच्या अन्
महाराजा शिवछत्रपतींच्या गोष्टी
कारण मला हव्या होत्या
आऊसाहेब
परत एका
शिवाजीच्या जन्मासाठी!

वाढलेल्या अराजकतेच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पुनर्आगमनाची वाट पाहणारी ही माऊली खरेच धन्य होय! बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर मनातील हुरहूर, बाळाविषयी पाहिलेली स्वप्ने, कुटुंबियांची मिळणारी समर्थ साथ, रूग्णालयातील दिवस, प्रत्यक्ष बाळाचा जन्म, डॉक्टरांच्या आश्‍वासक सूचना, बाळाची घेतलेली काळजी हे सर्व काही नेमकेपणाने आणि प्रत्येक आईच्या हृदयातील हुंकार त्यांनी प्रभावीरित्या शब्दबद्ध केलेत. ‘नऊ महिन्यांचे गर्भारपण पेलताना, नऊ युगे व्यतीत झाल्यासारखी वाटली’ असे सांगणार्‍या कवयित्री आशावादाचा नवा अर्थही सृजनाच्या याच प्रक्रियेतून कळल्याचे आवर्जून नमूद करतात. ‘पेढा की बर्फी?’ या रूढीला त्यांनी कधीच मूठमाती दिली. आपल्या हाडामांसाची निर्मिती त्यांना विस्मयकारक वाटते.
बाळाच्या आत्याचे पोटावर कान ठेऊन हालचालींचा कानोसा घेणे हे किती लोभसवाणे असते याचे वर्णन त्यांनी या संग्रहात केले आहे.
एका गरीब बाईने
सात महिने डोहाळे पुरविले
आणि काय आश्‍चर्य?
तेच पदार्थ बाळही
चवीने खाऊ लागले!

अशा शब्दात त्यांनी गर्भसंस्काराचे महत्त्व विशद केले आहे. बाळ पोटात असताना आईचे खाणे-पिणे, मनात येणारे विचार, घरातील वातावरण, त्या काळात केलेले वाचन अशा सर्व गोष्टींचा परिणाम बाळावर होतो, हे अध्यात्माने आणि विज्ञानानेही सिद्ध केले आहे. निर्मिती प्रक्रियेचे हे सारे अनुभव काव्यबद्ध करताना उंचबळून आलेले आईचे वात्सल्य या संग्रहातील शब्दाशब्दांतून दिसून येते.
ऑपरेशन थिएटरमध्ये शिरताना एकटेपणाची भीती वाटू लागली. तेवढ्यात बाळाने आतून ‘ठुशी’ मारली आणि कवयित्री निर्धास्त झाल्या. जणू काही बाळ आयुष्यभर ‘मी तुझ्या सुखात, दुःखात सोबतीला आहे’ असेच सांगत असल्यासारखे त्यांना वाटते.
प्रसुतीपूर्वीच्या रात्रीही देवीला विनवणी करताना कवयित्री दैत्याच्या निःपातासाठी आणखी एका महिषासुरमर्दिनीची मागणी करतात. एकवीस वर्षापूर्वीच्या काळात मुलाऐवजी मुलगी व्हावी आणि ती लढावू, संघर्षशील, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी असावी अशी अपेक्षा बाळगणारी आई हे खरे आपल्या सांस्कृतिक फलिताचे संचित आहे. परमेश्‍वराकडे ‘धनाची पेटी’ मागणार्‍या (आणि एकाच ‘बेटी’वर थांबणार्‍या) कवयित्री एकेठिकाणी मात्र लिहितात,
हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी
क्षणभर उगाचंच वाटले
येऊच नये बाळाने बाहेर
राहावं त्यानं असंच माझ्या कुशीत
माझ्याशी एकरूप होऊन!

बाळाशी एकरूप होणारी आई आणि पुढे त्याच्या कल्याणासाठीच स्वतःला झिजवणारी, त्याच्यात आपले प्रतिरूप शोधणारी, त्याला योग्य संस्कार देणारी आई हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. परमेश्‍वराने निर्मितीचे कार्य फक्त स्त्रीकडेच सोपविलेले असते. याचा अभिमान बाळगून, त्याच्या जडणघडणीसाठी कार्यरत असणार्‍या कवयित्री आपल्या ‘बेटी’ला आपणास राजमातेचे राज्ञीपद बहाल केल्याचे सांगतात.
बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये शुभेच्छा देणार्‍या मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या शुभाशीर्वादाची दखलही त्यांनी घेतली आहे.
तू येण्यापूर्वी
जीवन अपूर्ण होते
आज परिपूर्ण मी आई
बाळा कशी होऊ रे?
तुझ्या ऋणातून उतराई!

असे सांगत बाळाने आपणास आईपणाचा सर्वोंच्च किताब दिल्याची भावना त्या अभिमानाने मिरवतात. कन्यारत्नाचे दान पदरात पडल्यानंतर बाळाच्या वडिलांचा भांबावलेला चेहराही त्यांनी मिष्किलपणे टिपलाय. बाळ कुशीत आल्यावर सहस्त्र हत्तींचे बळ अंगात आल्याचे सांगून ‘माझ्या चिमुकल्या विश्‍वातील मी जगज्जेती झाले’ असे त्यांना वाटते. बाळाच्या काळजीने त्यांचे मन विचारमग्न होते आणि ‘आईचीच दृष्ट बाळाला लागेल’ म्हणून थोडी धास्तावतेही! बाळाला कवेत घेताना त्याच्या डोळ्यात जन्मोजन्मीची ओळख असल्याचे भाव दिसतात; कारण नऊ महिने गर्भात राहिल्याने हे बंध इतके घट्ट झालेत अशी त्यांची श्रद्धा आहे.
या संग्रहात फक्त भावभावनांचे आणि शब्दांचे खेळ नाहीत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बाळाची काळजी घेणार्‍या नर्स त्यांना मदर तेरेसांचा अवतार वाटतात. सेवा करणार्‍यांची आणि श्रमिकांची ‘डोळसपणे’ घेतलेली ही दखल सौ. चंद्रलेखाताई बेलसरे यांच्या विशाल अंतःकरणाची साक्ष पटवून देते.
बाळाचे बोबडे बोबडे बोलणे, बाळाने चवीने पहिला घास खाणे, त्याच्या येण्याने बापाच्या हृदयाचे सूर झंकारणे, बाळाचे माऊच्या गोजिरवाण्या पिलासोबत खेळणे, टी. व्ही. पाहण्यात दंग होणे अशी सर्व रूपे पहाताना, अनुभवताना त्यांच्यातील मातृत्वाच्या भावना सार्वत्रिक, वैश्‍विक आणि म्हणूनच ‘शाश्‍वत’ही वाटतात!
मराठी साहित्यात आजवर आईवर विपुल लेखन झाले आहे. आईवर कविता न करणारा कवी अभावानेच सापडेल; मात्र आपल्या कन्येच्यावेळी आईपणाची अनुभूती घेताना मांडलेल्या भावना या मराठी साहित्यात कदाचित प्रथमच आलेल्या असाव्यात! या कविता फक्त बेलसरे कुटुंबियांच्या नाहीत. आई होणार्‍या, झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनोवृत्तीचे दर्शन या संग्रहातून घडते. चंद्रलेखाताई बेलसरे यांच्या ‘आईपणाच्या’ या कविता वाचल्यानंतर प्रत्येक संवेदनशील मनास या वैश्‍विक सत्याची निश्‍चितपणे खात्री पटेल!

पाने ६४, मूल्य ६०
चपराक प्रकाशन, पुणे (०२०-२४४६०९०९)

Sunday, August 28, 2016

मुख्यमंत्री महोदय, ढेरीबरोबर गुन्हेगारी कमी करा!

पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. विठूरायाच्या या नगरीत काही महिन्यांपूर्वी एक अजब प्रकार घडला होता. पंढरपूर जवळील एका ढाब्यावर येथील पोलीस रोज रात्री ढाबा मालकाशी दमदाटी करून फुकटात जेवायचे. दारूच्या नशेत अधिकारी जेवणावर ताव मारत असतानाच तेथील पोलीस शिपाई एक महत्त्वाचा निरोप घेऊन आपल्या वरिष्ठांकडे आला. त्यावेळी त्याने बघितले की, दोन तीन माणसे एका गाढवाला घेऊन ढाब्याच्या मागच्या बाजूला जात आहेत. पंढरपुरात गाढवे हरवल्याच्या अनेक तक्रारी आल्याने त्या शिपायाने ही वार्ता वरिष्ठांना दिली ते सगळेजण ढाब्याच्या मागच्या बाजूला गेले तर तिथे त्यांना अनेक गाढवांचे सापळे आढळून आले. फुकटात जेवणारे पोलीस रोज गाढवाचे मांस खात होते. ढाबा मालकावर त्यांनी गुन्हे दाखल करून चांगलेच उट्टे काढले. अशी गाढवे खाऊन पंढरपूर पोलिसांच्या बुद्धीला कदाचित गंज चढला असावा. त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही या गाढवाच्या मनोवृत्तीची लागण झाली असावी. खरेतर गाढव हे त्याचे काम अत्यंत इमानेइतबारे करते. मालकाने पाठीवर टाकलेले ओझे इच्छित स्थळी ते विनातक्रार पोहचवते; मात्र पंढरपूर पोलीस सरकारी पगार घेऊन आणखी कुण्या खासगी मालकाच्या मुठीत आहेत की काय, अशी शंका घ्यावी असे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपुरातील एका मुलीचा सातत्याने विनयभंग केला जातो, रस्त्यात गाठून अश्‍लील चाळे केले जातात, तिच्या लग्नाची पत्रिका छापून तिची बदनामीही केली जाते. त्या मुलीचे नातेवाईक तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांना हाकलून दिले जाते. कायदा आणि न्यायव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगण्याचे काम अशा पोलिसांकडून सुरू आहे. एकीकडे पोलिसांवरील असणारा असाह्य ताण, त्यांची जागेची असलेली कमतरता हे सर्व पाहता पोलिसांची कीव केली जाते आणि दुसरीकडे पोलीस त्यांच्या खाकीचा माज दाखवत सामान्य माणसांशी मग्रुरीने वागतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या विश्‍वासू सहकार्‍यांना बाजूला ठेवत गृहखाते स्वत:च्या हातात ठेवतात. सत्तेचे विकेंद्रीकरण न करता सर्व जबाबदार्‍या आपल्याकडेच ठेवायच्या या भिकार मानसिकतेतून मुख्यमंत्री बाहेर पडत नसल्याने राज्यातील असे काही पोलीस बोकाळले आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच जर सामान्यांचे भक्षण करत असतील तर न्याय कोणाला मागणार? एकवेळ इंग्रजी राजवट परवडली पण असे जुलमी पोलीस नको असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रात आणि दुर्दैवाने त्यातही पंढरपुरसारख्या अध्यात्मनगरीत आली आहे.
काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील एका हॉटेल मालकाने एका बारबालेसोबत विवाह केला. काही दिवस मजेत गेल्यानंतर त्या दोघात विसंवाद निर्माण झाले. त्यातून त्याने पुणे शहरात त्या बारबालेचे म्हणजे स्वत:च्याच बायकोचे फोटो असलेले पोस्टर छापून ते सर्वत्र लावले. ‘या बाईला एड्स झालेला असून तिच्याशी संबंध ठेवताना सर्वांनी विचार करावा’ अशा आशयाचा मजकूर त्या फोटोवर होता. भांडारकर रस्त्यापासून ते थेट विधी महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर या परिसरात असे पोस्टर झळकत होते. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली. पंढरपुरातील या घटनेत मुलीच्या मनाविरूद्ध तिचे नाव टाकून विक्रांत कासेगावकर, अमोल पंडित, आनंद कासेगावकर या आरोपींनी तिची खोटी लग्नपत्रिका छापली. मुलीसाठी स्थळे आल्यानंतर त्या पाहुण्यांना ते ही पत्रिका दाखवतात आणि तिचे लग्न आपल्यासोबत ठरल्याचे ठासून सांगतात. या अपप्रवृत्तीविरूद्ध दाद मागितल्यानंतर पोलीसही निर्ढावलेपणा दाखवतात. शेवटी एका आमदाराच्या फोनवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. हे सारेच लांच्छनास्पद आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा सवाल एकेकाळी विचारणार्‍या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हा प्रकार गांभीर्याने घ्यावा. या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची मानसिकता प्रचंड उद्विग्न असून त्यांना संरक्षण देणे, तिची काळजी घेणे, तिच्यावरील अन्याय दूर करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पंढरपुरातील मस्तवाल पोलीस अधिकार्‍यांचे कान मुख्यमंत्र्यांनी वेळीच उपटले नाहीत, तर त्यांच्या नाकर्तेपणाचे खापर स्वाभाविकपणे फडणवीसांच्या डोक्यावर फोडले जाईल.
दुसरी प्रचंड क्रौर्याची घटनाही सोलापूर जवळच्याच व्हनसळ या गावातील आहे. येथील सेवालालनगर परिसरातील एका तेवीस वर्षाच्या युवतीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याची तक्रार तिच्या अशिक्षित पालकांनी दिली आहे. या मुलीच्या अर्धवट जळालेल्या प्रेताचे लचके चक्क कुत्रे तोडत होते. अत्यंत अमानवीय, क्रौर्याची परिसीमा असलेली ही घटना घडून चार महिने उलटले. यातील संशयीत आरोपींची नावे मुलीच्या आईने पोलिसांकडे दिली. सुदर्शन बंडा गायकवाड, महावीर गायकवाड, सुहास गायकवाड तसेच बंडा विश्‍वनाथ गायकवाड आणि संगिता बंडा गायकवाड अशी या आरोपींची नावे आहेत; मात्र पोलीस तक्रारीत त्यांची नावे घ्यायला तयार नाहीत. मुलीचे आई आणि वडील अतिशय हतबल होऊन या प्रकाराने आपण लवकरच आत्महत्या करणार, असा इशारा देत आहेत; मात्र तरीही पोलिसांना त्याचे गांभीर्य नाही. संतप्त जनता सर्व मर्यादा, कायदा बाजूला ठेऊन अशा पोलिसांच्या ढुंगणाखाली हिरव्या मिरच्यांची धुरी देईल. मुर्दाड मानसिकतेच्या अधिकार्‍यांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवून या प्रकरणांचा छडा लावायला हवा. एकीकडे स्त्री शक्तिचा जयघोष करणारे सरकार अशा मस्तवाल अधिकार्‍यांना का पोसते? याचा जाब लोकांना देण्याची वेळ आली आहे.
आजूबाजूला इतक्या दुर्दैवी घटना घडत असताना समाजही त्याकडे तटस्थपणे पाहतोय. अशा चालत्या बोलत्या प्रेतांचा सुळसुळाट वाढल्याने भविष्यात आपल्याला आणखी काय पहावे लागेल याचा नेम नाही. पोलीस अधिकारी, सरकारी यंत्रणा आणि समाज यांनी आतातरी जागे होणे ही काळाची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यातील या हृदयद्रावक घटना बघून अजून कोणत्याही सामाजिक संस्था, स्त्रीमुक्तीसाठी लढणार्‍या संघटना, मानवी हक्क आयोगवाले, प्रसार माध्यमे यापैकी कोणीही पुढे आले नाही. प्रत्येक गोष्टीचे सोयीस्कर राजकारण आणि प्रसंगी अर्थकारण पाहणार्‍या धेंडांची संख्या कमी व्हायला हवी. माणुसकीला काळीमा फासणार्‍या आणि चांगुलपण संपुष्टात आणणार्‍या अशा घटना आपल्यासाठी चिंतनीय आहेत. महासत्तेच्या गप्पा मारणार्‍यांनी अशा घटनांचा विचार करून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल याकडे लक्ष द्यावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या पोटाचा सुटलेला घेर प्रयत्नपूर्वक तुम्ही कमी केलाय; मात्र गृहखाते सांभाळताना तुमच्या मस्तवाल पोलिसांवर तुमचे नियंत्रण राहिले नाही हेच यातून दिसून येते. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी तुम्ही तातडीने काही केले नाही, तर तुम्ही अखंड महाराष्ट्राचे शेवटचे मुख्यमंत्री ठराल हे आमचे भाकीत दुर्दैवाने खरे ठरेल.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, संपादक ‘चपराक’, पुणे
संपर्क : 7057292092

सोलापूर पोलिसांची खाबुगिरी
तरूणीला जाळूनही आरोपी मोकाटच

‘चपराक विशेष वृत्त’
* सागर सुरवसे : 9769179823

सोलापूर : एकीकडे राज्यात महिला छेडछाड, लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात मोठमोठ्या घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र चांगलंच सुस्तावलंय. अतिशय संताप आणणार्‍या घटना आणि त्याचे भांडवल करत पोलिसांची होणारी चंगळ यामुळे जिल्ह्यातील नागरिक हतबल झाला आहेत. एखादी बलात्काराची घटना घडल्यानंतर समाजातील सर्व घटक जागे होतात; मात्र डोळ्यादेखत गुन्हा घडत असताना पंढरपूर पोलीस स्टेशन आणि सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचं पहायला मिळतंय.
हे सर्व गार्‍हाणं मांडण्याचं कारण म्हणजे एका युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा एक युवक आणि येथील पोलीस यंत्रणा. जणू त्या युवतीने मरणाच्या दरीत टप्प्याटप्प्याने प्रवेश करावा अशीच ही ग्रामीण पोलीस यंत्रणा काम करतेय. इथे फक्त खाबुगिरीलाच जागा उरलीय. तुम्ही गुन्हा करा, आम्ही तुम्हाला पकडतो. तुम्ही पैसे खाऊ घाला, आम्ही तुम्हाला सोडतो, अगदी अशाच पद्धतीचा कारभार जिल्ह्यासह पंढरपुरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.

अत्याचार क्रमांक 1 -
एका युवतीला विक्रांत बाळासाहेब कासेगावकर या युवकाच्या वेड्या हट्टापायी आपली नोकरी सोडावी लागली. आपल्या दैनंदिन जीवनाचा क्रमही बदलावा लागला. चार महिने आपले गावही सोडावे लागले. एवढंच नव्हे तर चक्क आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला. तरीही गेंड्याच्या कातडीचे पोलीस हातावर हात धरून मख्खपणे पाहत राहिले. खाकी वर्दीविषयी अतिशय संताप आणणारी ही घटना विठूरायाच्या पंढरपुरात घडली.    
पंढरपुरातील एका युवतीने आणि तिच्या कुुटुंबियांनी 1 मे 2016 रोजी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये विक्रांत बाळासाहेब कासेगावकर हा लग्नपत्रिका आणि भविष्य पाहणारा युवक छेडछाड आणि मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. मात्र त्यावर पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई केली नाही. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचा फोन गेल्यानंतर 5 मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक म्हणून किशोर नावंदे हे तेथे कार्यरत होते. तर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे काम पाहत होते.
 त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपी विक्रांत कासेगावकरसह त्याचे दोन साथीदार अमोल पंडीत आणि आनंद विश्‍वंभर कासेगावकर यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांना लगेच जामीनही मंजूर झाला. या घटनेमुळे आरोपीचे मनोबल वाढले. आपण पैशाच्या जीवावर कसंही वागू शकतो, ही भावना त्याच्या मनात दृढ झाली.
कालांतराने 23 जून रोजी आरोपी विक्रांत बाळासाहेब कासेगावकरने पुन्हा एकदा त्या युवतीकडे लग्नासाठी तगादा सुरू केला. तिला पोस्टाद्वारे मेमरी कार्डमध्ये दोघांच्या नावाच्या लग्नपत्रिकेचा फोटो पाठवला. तसेच ही पत्रिका पाहुण्यांना पाठवेन असा दमही भरला. त्या युवतीला दोनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्नही केला गेला. एकदा अंंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न केला तर दुसर्‍यावेळी दुचाकीवर तोंडाला काळे मास्क लावून तिला पाडण्याचा प्रयत्न केला. ही सर्व आपबीती पीडितेने पोलिसांना सांगितली तरीही पोलीस शांत राहिले. आम्हाला काय तेवढीच कामे आहेत का? अशी उर्मट उत्तरेही पोलिसांनी युवतीच्या कुटुंबियांना दिली. पोलीस प्रशासनाच्या या सर्व अनास्थेमुळे आरोपी आणखी मोकाट सुटला. पुढे त्याची हिंमत इतकी वाढली की, त्याने तिला जीवे मारण्याची धमकी द्यायला सुरूवात केली. पुढे तिला अश्‍लील पत्रे, मेमरीकार्डमध्ये अश्‍लील व्हिडीओही पाठवले.
आरोपीची मजल इतकी वाढली की, मुलीच्या पाहुण्यांना, आमच्या दोघांचे लग्न जमले असून अमूक अमूक या दिवशी लग्नाला येण्याची लग्नपत्रिकाही पाठवली. पाहुण्यांचे फोन सुरू झाले. त्यामुळे ती युवती आणखी खचली. त्यानंतर तिने अन्नग्रहण करणे सोडले, एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. सुदैवाने त्यातून ती बचावली.
पंढरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस काहीही कृती करत नसल्याने या घटनेनंतर भांबावलेल्या कुटुंबियांनी 4 जुलै रोजी सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालयात येऊन उपअधिक्षक मनीषा दुबुले यांच्याकडेही गार्‍हाणे गायले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नावंदे यांनी तात्पुरती कारवाई करत मुख्य आरोपी वगळता त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आणि दुसर्‍या दिवशी सोडून दिले.
या प्रकारानंतर हे कुटुंबीय पोलीस स्टेशनला जाऊन जाऊन हताश झाले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पुढे 5 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांची भेट घेतली, मात्र परिस्थिती जैसे थे. आता तिचे कुटुंबीय हतबल झालेत. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे; मात्र अद्यापही आरोपी विक्रांत बाळासाहेब कासेगावकर मोकाटच फिरत आहे. तू माझ्याशिवाय इतर कोणाशी विवाह केला तर त्याला उभा चिरून टाकेन, असा दमही त्याने युवतीला दिलाय. त्यामुळे पोलीस यंत्रणा जिवंतपणी या युवतीला व तिच्या कुटुंबाला न्याय देतील का? की या युवतीचा देखील हकनाक बळी जाणार?
गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी जे गुन्हे घडतायत त्याबाबत मात्र ते कोणतीच दक्षता घेत नाहीत. सर्रासपणे राज्यातील अनेक भागात पोलीस कसल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेत नाहीत. घेतली तरी ती फारशी तडीस नेत नाहीत. अनेकदा जे आरोपी नाहीत त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातेय. त्यामुळे मूळ आरोपी बाजूला राहत आहेत. याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अशी दोन मंत्रीपदे मिरवणारे देवेंद्र फडणवीस तरी या युवतीला न्याय देणार की नाही?

अत्याचार क्रमांक - 2
साधारणपणे चार महिन्यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील व्हनसळ या गावी एका युवतीच्या मृतदेहाचे अर्धवट जळालेले तुकडे व्हनसळ-सेवालाल नगर शिवारात मिळून आले. तो मृतदेह ज्योती खेडकर या युवतीचा होता. ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून कुटुंबियांचे जबाब घेतले. त्या जबाबात कुटुंबियांनी संशयित आरोपी सुदर्शन बंडा गायकवाड, महावीर गायकवाड, सुहास गायकवाड तसेच बंडा विश्‍वनाथ गायकवाड आणि संगिता बंडा गायकवाड यांची नावे पोलिसांना सांगितली; मात्र निर्लज्जपणाचा कळस गाठत तत्कालीन पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍याने संशयित आरोपींची नावेच पंचनाम्यात नोंदविली नाहीत.
खेडकर कुटुंबीय हे अशिक्षित असल्याने त्यांना या सर्व प्रकाराचा गंधही आला नाही. ते वारंवार पोलिसांकडे खेटे मारत राहिले. न्याय मागत राहिले मात्र गेल्या चार महिन्यात त्यांना न्याय सोडाच पण किमान एकाही संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. सुदर्शन गायकवाड आणि ज्योती खेडकर यांच्यात प्रेमसंबंध होते; मात्र सुदर्शन लग्नाला टाळाटाळ करू लागल्याने तिने स्वतःला पेटवून घेतले. त्यातून तिच्या कुटुंबियांनी तिला जीवाचे रान करून वाचवले. ज्योतीने पेटवून घेतले हे कळताच आपल्याला जेलची हवा खावी लागेल अशी भीती निर्माण झाल्याने सुदर्शनने ज्योतीशी लग्न करतो असे आश्‍वासन देऊन प्रकरण मिटविले; मात्र कालांतराने तिला टाळू लागला. अखेरीस एकेदिवशी ज्योती अचानक गायब झाली. भरपूर ठिकाणी तिचा शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. दोन-तीन दिवसांनी तिचा मृतदेह खेडकर यांच्या शेतात अर्धवट जळालेला आणि तुकडे तुकडे पडलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेला साधारण चार महिने लोटले मात्र अद्यापही खेडकर कुटुंबियांना न्याय मिळेल या आशेचा किरणही दिसलेला नाही. खेडकर कुटुंबियांनी अनेकवेळा पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, पोलीस अधिक्षकांची भेट घेतली तरीही परिस्थिती जैसे थेच.
सोलापूर जिल्ह्यातील या दोन घटना हृदय पिळवटून टाकणार्‍या तर आहेतच शिवाय पैशासाठी चटावलेल्या या खाकी वर्दीतील धेंडांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणार्‍या आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पीडित युवतींना न्याय देणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

Monday, August 22, 2016

‘नाते मनाशी मनाचे’


‘नाते मनाशी मनाचे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना डावीकडून आनंद सराफ, मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, योगगुरू दत्तात्रय कोहिनकर पाटील, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, प्रकाशक घनश्याम पाटील आणि कवी रमेश जाधव. 
'चपराक प्रकाशन', पुणे
कवितेत व्याकरणाइतकंच अंत:करण महत्त्वाचं असतं. पुण्याच्या येरवडा परिसरातील कवी रमेश जाधव यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या अंत:करणातील भावभावनांचे प्रगटीकरणच. आयुष्यातील सुख-दु:खांचे प्रसंग डोळसपणे टिपणारे जाधव सामाजिक जाणीव कवितेच्या माध्यमातून व्यक्त करताना आशयाला महत्त्व देतात. आशयसंपन्नता, प्रासादिकता हे कोणत्याही श्रेष्ठ कवितेचे प्रतीक असते. जाधवांची कविता याबाबत अव्वल ठरते.
त्यांच्या अनेक कवितांत जगण्यातील अनुभव उतरले आहेत. आईच्या मृत्युनंतरची भावना शब्दबद्ध करताना ते हळवे होतात. ‘जपून ठेवल्यात तुझ्या अस्तित्वाच्या खुणा, आठवण येते तुझी पुन्हा पुन्हा’ असे ते सांगतात. जीवनाचे वास्तव टिपताना ‘उद्याचा सूर्य उगवेल की पुन्हा फितवेल’ अशी साशंकता त्यांच्या मनात आहे.
पोटात एक ओठावर एक
असे कधी वागलोच नाही
त्यामुळे
जवळचे कधी लांब गेले
कळलेच नाही

अशी आप्तस्वकियांबाबतची खंत ते व्यक्त करतात. ‘नाते मनाशी मनाचे’ या त्यांच्या कवितासंग्रहाच्या शीर्षकातूनच त्यांच्या कवितांचा ढाचा रसिकांच्या लक्षात येतो. कोणत्याही संस्कृतीत आदर्शांचे, मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे असते. संस्काराचा धागा बळकट करणारे साहित्यच मानवी मनात आशावाद पेरते. अशी अनेक चिंतनसूत्रे रमेश जाधवांच्या कवितांत आहेत. वाणगीदाखल त्यांची ‘आशा’ ही कविता पहा-
किती आली वादळे आणि संकटे
वादळात झेपावणार्‍या हातांमुळे
वाटले नाही एकटे
वाहणार्‍या मनास थांबवलं
संस्काराचं बीज रूजवलं...

हे संस्काराचं बीजच उद्याच्या पिढीच्या नीतिमत्तेचा वृक्ष डौलदार करतात. या संग्रहातील अनेक कविता मनाची दारं सताडपणे उघडणार्‍या आहेत. मनाचा गुंता सोडवणं अनेकांना शक्य नसतं. म्हणून कवी मनाचं दार बंद केल्यानंतर डोळे असून अंध असणार्‍यांना कुणालाही वेदनेचा गंध नसतो, हे काव्यात्म शैलीत वाचकांपुढे मांडतात.
रमेश जाधव यांच्या कविता फेसबुकसारख्या समाजमाध्यमातही वाचकप्रिय ठरल्या आहेत. यातून त्यांनी असंख्य माणसं जोडलीत. या माध्यमातूनच त्यांना अनेक ‘व्हर्च्युअल’ मित्र ‘ऍक्चुअली’ मिळालेत. ‘आभासी जग’ या कवितेतून ते समाज माध्यमाविषयी भाष्य करतात.
मृत्युसारखे चिरंतन सत्य स्वीकारणे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्युच्या विचारानेही  अनेकांच्या मनाचा आणि शरीराचा थरकाप उडतो; मात्र जाधव यांनी ‘माझी अंत्ययात्रा’ या कवितेद्वारे त्यांचे मृत्युविषयीचे चिंतनही धाडसाने प्रगट केले आहे. ही कविता वाचताना अनेकांना कविवर्य वसंत बापटांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
नका जमवू लोकांची जत्रा
नका काढू माझी अंत्ययात्रा
खांदा देऊन सोसू नका माझा भार
नको ते गळ्यात हार
लाकडे जाळून करू नका
निसर्गाची हानी
जाळण्यासाठी आहे ना
विद्युदाहिनी
नको ती रक्षा सावडणे
तेव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे
नको ते दहावा-तेराव्याचे विधी
त्यापेक्षा अनाथआश्रमात द्या निधी

इतक्या स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत त्यांनी या भावना मांडल्या आहेत. कोणत्याही कर्मकांडांना भाव न देणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, तरीही श्रद्धायुक्त अंत:करणाने संस्काराची बीजे पेरणारी, सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारी, सामान्य माणसांच्या सुख-दु:खाचा वेध घेणारी, स्त्रियांचा सन्मान करणारी, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणारी, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणारी, वास्तवतेचे भान ठेवणारी आणि तरीही स्वप्नातच अडकून राहिलेली त्यांची कविता आहे. बळीराजापासून एकत्र कुटुंब पद्धतीपर्यंत आणि नारीशक्तीपासून ‘लोक काय म्हणतील?’ या खुळचट सवालांचा वेध घेण्यापर्यंतचे वैविध्य त्यांच्या कवितेत आहे.
मनाशी मनाचं जडलेलं हे नातं अत्यंत दृढ आहे. यातील कविता मुक्तछंदातील आहेत. या कवितांना कोणी कवितेचे तंत्र किंवा कवितेच्या व्याकरणाचे नियम लावले तर त्याची फसगत होईल. हृदयाच्या गाभार्‍यातून आलेल्या भावना त्यांनी त्यांच्या कवितेत व्यक्त केल्या आहेत आणि हेच त्यांचे सामर्थ्य आहे. प्रत्येक वाचकाला, रसिकाला या कविता त्यांच्याच मनातील सूर व्यक्त करताहेत असे वाटेल. यापेक्षा कवीचे आणि कवितेचे मोठे यश ते कोणते?
रमेश जाधव यांचा हा दुसरा काव्यसंग्रह. छंदबद्ध रचना, गीत, गझल अशा तंत्रशुद्ध कविता घेऊन ते पुन्हा वाचकांच्या भेटीस येतील याची मला खात्री आहे. त्यांच्या साहित्य प्रवासाला उदंड शुभेच्छा देतो आणि या क्षेत्रातील त्यांची कमान कायम चढती राहील, असा आशावाद व्यक्त करतो.

घनश्याम पाटील
संपादक-प्रकाशन
‘चपराक’ पुणे
मो. 7057292092