Saturday, August 20, 2016

आलेख ‘हसरी गॅलरी’चा!

मराठीत स्त्रियांची चरित्रं आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं आली आहेत. मराठी वाचकांकडून त्यांचं नेहमीच जोरदार स्वागत झालं. सुप्रसिद्ध विनोदी लेखिका शकुन्तला फडणीस यांनी आता यात सकारात्मक भर घातली असून त्यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीकडून वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस आणि शकुन्तलाबाईंचा जीवनपट सशक्तपणे उलगडला जाणार आहे. 24 प्रकरणांद्वारे या पुस्तकात फडणीस दाम्पत्याचे विविध पैलू शकुन्तलाबाईंनी मांडले आहेत. शिदंच्या ‘हसरी गॅलरी’चे अनेक प्रयोग देशविदेशात झाले असून मराठी वाचकांनी, रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली आहे. या पुस्तकात शिदंच्या चित्रप्रदर्शनाविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी सविस्तरपणे वाचायला मिळेल.
शि. द. फडणीस यांचे मराठी करमणूक विश्‍वावर अनंत उपकार आहेत. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी व्यावसायिक करमणूक कर माफ करून घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेल्यानंतरही शिदंनी चित्रकलेची वाट धरली. त्यासाठी हट्टाने ते मुंबईला गेले. हास्यचित्रकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1944 साली सुट्टीत सहज म्हणून त्यांनी एक आर्टवर्क केले. त्याकाळी त्यांना त्या कामाचे दहा रूपये मिळाले. हे दहा रूपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली आणि अत्यंत परिश्रमपूर्वक या क्षेत्रात त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
शिदंचं बालपण, मुंबईतले जे.जे.तले दिवस, शिदंच्या आई, खुद्द शिदंच्या स्वभावाचे सहचर म्हणून शकुन्तलाबाईंना भावलेले पैलू, त्यांची नादिष्ट चित्रे, शकुन्तलाबाईंचं बालपण, त्यांच्या लीना आणि रूपा या दोन्हीही लेकी, शिदंचा चित्रप्रवास आणि फडणीस गॅलरी या सगळ्यांविषयी या पुस्तकात वाचायला मिळेल. शकुन्तला फडणीस या मोजकंच पण सकस लिहिणार्‍या लेखिका! त्यामुळं ओघवत्या शैलीत त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. या पुस्तकातील अनेक प्रकरणं विविध नियतकालिकांत, दिवाळी अंकात लेख स्वरूपात प्रकाशित झाली असल्याने पुस्तकातही अनेक ठिकाणी काही विषयांची पुनरूक्ती झाली आहे. ती टाळली असती तर पुस्तकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली असती. असे जरी असले तरी यातील कोणतेही प्रकरण वाचताना कुठेही कंटाळवाणं होत नाही. एक विनोदी लेखिका आणि हास्य चित्रकार यांचं चरित्र जाणून घेताना अशा किरकोळ गोष्टी निश्‍चितपणे गौण ठरतात.
हास्यचित्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असणारे आणि हास्यचित्रांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शि. द. फडणीस हे मराठी बांधवांचे वैभव आहेत. या दाम्पत्याने आपले आयुष्य या क्षेत्रासाठी पणाला लावले. दोघांचे काम परस्परपूरक असले तरीही क्षेत्र मात्र भिन्न आहेत. अगदी लग्नाच्या आधीपासून ‘केसरी-सह्याद्री’ संस्थेत कार्यरत असल्याने शकुन्तलाबाई शिदंच्या चित्राच्या समीक्षक आहेत. शिदंच्या चित्राविषयी त्या आधीही लिहायच्या आणि लग्नानंतर तर पोळ्या लाटणे सोडून त्या चित्राविषयी चर्चा करायच्या. शकुन्तलाबाईंच्या विनोदी कथा वाचून शि. द. त्या कथांना शीर्षक सुचवायचे. या दोघांच्या सहजीवनातील अनेक प्रसंग शकुन्तलाबाईंनी खुमासदार पद्धतीने मांडले आहेत.
‘एकमेकांविषयी आलटून-पालटून’ हे प्रकरण तर या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग लख्खपणे दाखवून देतं. शिदंचं आणि शकुन्तलाबाईंचं लग्न झालं 1955 साली. त्याआधी शकुन्तलाबाईंची शिदंशी एकतर्फी ओळख होती. म्हणजे शिदंची चित्रं त्या बघत होत्या, बघून हसत होत्या, हसून त्यावर चर्चा करत होत्या. ‘केसरी’साठी त्यावर अभिप्रायही लिहित होत्या. पुढं ते कायमस्वरूपी बंधनात अडकले. चित्र आणि संसारात बेमालूमपणे मिसळून गेलेल्या फडणीस दाम्पत्याची माहिती त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. शि. द. मोजक्या शब्दात, नेमकेपणे व्यक्त होणारे. त्याउलट शकुन्तलाबाई कविता, कथा, कादंबर्‍यांमध्ये रमणार्‍या. त्यांच्या एका साहित्यिक मित्राने त्यांना सांगितलं, ‘‘तुम्ही घर-प्रपंचात जास्त गुरफटता हे बरोबर नाही. तुमच्या लेखणाकडे तुम्ही अधिक लक्ष द्यायला पाहिजे.’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या जीवनाचं सार आहे. त्या म्हणतात, ‘‘घरप्रपंचात नाही पण नवर्‍यात मात्र जरा जास्त अडकते. खरं सांगू? माझ्या इतपत लेखिका पुष्कळ असतील; पण शिदंसारखा चित्रकार एखादाच असेल. कलावंत म्हणून त्यांची ‘तब्येत’ सांभाळणं यात मला जास्त आनंद वाटतो.’’
शिदंना शकुन्तलाबाईंच्या लंब्या, घन्या केसांविषयी फारच प्रेम. त्यांनी शकुन्तलाबाईंना सांगितलं, ‘‘तुझे केस पाहिले अन् नुसता फिदा झालो बघ.’’ पुढे त्या लिहितात, ‘‘आता एवढं ज्या केसाबद्दल प्रेम, त्या केसात माळण्यासाठी कधी गजरा आणायचीसुद्धा त्यांना आठवण नसते. गजरा, आईस्क्रीम, भेळ, शहाळं अन् कधीतरी चांगलसं नाटक इतपतच माझ्या चैनीच्या संकल्पना होत्या. त्यामुळे नवर्‍याकडून साड्या किंवा दागिणे न मिळाल्याचं दुःख कधी उद्भवलंच नाही.’’
तर त्या केसाबद्दल सांगत होत्या. घरात सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं. सगळी टेबलं, टीपॉय, खुर्च्या यावरही सामानाचे ढीग. शकुन्तलाबाई तिथं खाली बसून केस विंचरत होत्या. नेमका त्यावेळी शिदंना टेस्टर हवा होता. तो सापडत नव्हता. टेस्टर शोधता शोधता ते तिथं आले अन् चक्क त्यांच्या केसावर पाय देऊन पुढे गेले. त्या किंचाळल्या. त्यांनी त्यांच्याकडे धड पाहिलेसुद्धा नाही. ‘सॉरी’ असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते पुढं गेले. त्यावर शकुन्तलाबाई लिहितात, ‘‘त्यांच्या डोळ्यापुढे फक्त त्यांना तातडीने हवा असणारा टेस्टरच दिसत होता अन् मला त्यांच्या चेहर्‍यावर द्रोणाचार्यांची टेस्ट देणारा अर्जुनच साक्षात दिसत होता.’’
‘हसरी गॅलरी’चे उलट-सुलट अनुभवही मजेशीर आहेत. हजारोंच्या संख्येत त्यांना येणारी पत्रं, चित्रांविषयीच्या प्रतिक्रिया सगळंच मुळातून वाचण्यासारखं आहे. चित्रांविषयी असलेली असाक्षरता आणि त्यातून घडलेले विनोद याचेही अनुभव या पुस्तकात आलेत. विनोदी चित्र काढताना कराव्या लागणार्‍या कसरती, खुद्द त्यांनाही अपेक्षित नसलेले आणि प्रेक्षकांनी काढलेले अर्थ, कोणत्याही चित्रातील अर्थ आणि आशय यापुढे जाऊन ती कलाकृती परिपूर्ण असावी यासाठीचा त्यांचा आग्रह हे सारं शकुन्तलाबाईंनी शैलीदारपणे लिहिलं आहे. ’या कल्पना तुम्हाला सुचतात कशा?’ यावर फडणीस सांगतात, ‘आपल्या सभोवतीच्या दुनियेत इतक्या विसंगती आणि इतक्या चमत्कृती आहेत की यापैकी काही थोड्यानांच ते चित्ररूप देऊ शकतात.’
‘पडद्यामागे’ या प्रकरणात त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयातील एक अनुभव दिला आहे. या प्रदर्शनाला स. प. महाविद्यालयाच्या हॉलपासून मधलं पटांगण ओलांडून पार टिळक रस्त्यापर्यंत प्रेक्षकांच्या रांगा लागायच्या. तेथील अभिप्रायासाठी त्यांनी एक टपालपेटी ठेवली होती. त्यात रोज शे-दीडशे खुशीपत्रं जमायची. एकदा त्यात एक निनावी पत्र आलं, ‘प्रदर्शनातला तो बुद्धांचा पुतळा हलवा. तो आमच्या भावना दुखवणारा आहे.’ फडणसीनांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं; मात्र पुन्हा चार दिवसांनी पत्र आलं, ‘मागचं पत्र मिळालं ना? पुतळा अजूनही हलविलेला नाही. ताबडतोब हलवा. नाहीतर गंभीर परिणामाला तयार रहा.’
कसला होता तो पुतळा? एका रेडिओ सेटवर ठेवलेला गौतम बुद्धांचा पुतळा! मात्र त्या पुतळ्याने कानात बोटं घातली आहेत. कपाळाला आठ्या आहेत. चेहराही त्रासिक आहे. शिदंनीच हा पुतळा तयार केलेला. 1956 साली मोहिनी दिवाळी अंकावर प्रकाशित झालेलं हे चित्र. त्यावर्षी गौतम बुद्धांच्या महानिर्वाणाला 2500 वर्षे झाली होती. तो रेडिओचा जमाना होता. अनेकांनी घरातल्या रेडिओवर बुद्धांचा पुतळा हौसेनं मांडला होता आणि इकडं आकाशवाणीवर बुद्धांवरील कार्यक्रमांचा अतिरेक चालला होता. तो ऐकून लोकांना कंटाळा तर आलाच; पण अगदी गौतम बुद्धांच्या पुतळ्यानंसुद्धा वैतागून कानात बोटं घातली अशी ती विनोदी कल्पना होती. त्यावर आक्षेप घेत धमकीसत्र सुरू होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांना त्रास नको म्हणून तो पुतळा काढला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी मांडताना शकुन्तलाबाई लिहितात, ‘शांतीदूत भगवान बुद्धांच्या भक्तांचा हा संतप्त पवित्रा बघून आम्ही मात्र हतबुद्ध झालो.’
गणिताच्या पुस्तकात शिदंच्या चित्राचा झालेला समावेश, गॅलरीतून डोकावताना, काही चित्रांच्या जन्मकथा आणि मुख्य म्हणजे पुस्तकात जागोजागी वापरलेली शिदंची हास्यचित्रे यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय झाले आहे. सुरेश एजन्सीच्या शैलेंद्र कारले यांनी फडणीस कुटुंबीय आणि शिदंच्या काही रंगीत हास्यचित्रांचाही पुस्तकात समावेश केलाय. एकंदरीत एका महान मराठी कलाकाराचे चरित्र या पुस्तकामुळे वाचकांसमोर आले आहे. साधी-सोपी भाषा हेही शकुन्तलाबाईंच्या लेखणीचे सामर्थ्य आहे. वाचकांकडून या पुस्तकाचे जोरदार स्वागत होईल याबाबत शंकाच नाही.

पाने - 160, मूल्य - 190
प्रकाशक - सुरेश एजन्सी, पुणे (020-24470790)


* घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Sunday, August 14, 2016

चेतना पेटवणारी धर्मशाळा


काव्य जीवनात आहे
जरा जवळून बघा
वाफ पाण्यामध्ये आहे
पाणी उकळून बघा

असं सांगणार्‍या लोककवी म. भा. चव्हाण यांच्या ‘धर्मशाळे’चे संपादन दस्तुरखुद्द व. पु. काळे यांनी केले आहे. वपुंचा आणि मभांचा याराना अनेकांना सुपरिचित आहे. व. पु. प्रतिभावंत लेखक म्हणून सर्वांना ठाऊक आहेत; मात्र ते उत्तम कवीही होते हे थोडक्या लोकांना माहीत असावे. त्यांचा ‘नको जन्म देऊस आई’ हा छोटेखानी काव्यसंग्रह मभांनीच त्यांच्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित केला आहे. लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर यांच्यात जे आणि जसं नातं होतं तसंच या जोडगोळीचं. या कलंदर कलाकारांचे माय मराठीवर ऋण आहेत.
तर मभांच्या या ‘धर्मशाळे’चे 336 प्रवासी आहेत, जीवनाचे सारे रंग त्यात आलेत. प्रत्येक कविता चार ओळींची. म्हटलं तर स्वतंत्र; म्हटलं तर अखंड. सगळ्या रचना अष्टाक्षरी. जीवनावर भाष्य करणार्‍या, नाना पैलू उलघडून दाखविणार्‍या, भविष्य वर्तविणार्‍या ओळी. या ‘धर्मशाळे’त जो कोणी विसावेल तो तिथलाच प्रवासी बनेल. नेकीने जगणार्‍या, जगू पाहणार्‍या प्रत्येकाला वाटेल की, आपल्या आयुष्याचा अर्कच मभांनी या पुस्तकात काढून दिलाय.
कधीतरी जन्मा आलो
कुण्या गावात वाढलो...?
माझ्या जीवनाची गाथा
मीच लिहाया बैसलो...!

अशी ‘धर्मशाळे’ची दमदार सुरूवात मभांनी केली आहे. मात्र लगेचच ते म्हणतात,
 तसे सांगण्यासारखे
आहे कुठे माझ्यापाशी?
माझ्या स्वत:च्या गावात
मीच आहे वनवासी!

‘हे विश्‍वची माझे घर’ अशी भावना बाळगणार्‍या मभांनी ‘धर्मशाळे’तून लाखमोलाची शिकवण दिली आहे. त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध असल्याने या सर्व ओळी त्यांच्या ह्रदयातून आल्यात. म्हणूनच वाचणार्‍याला त्या आपल्याशा वाटतात. महाकवीची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय! मग म. भा. तरी त्याला अपवाद कसे ठरतील? या महाकवीच्या जीवनाचा आलेख बघितला तर पुन्हा लोककवी मनमोहन आठवतात. ते म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने चालत असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ मभांच्या बाबतीतही तसेच आहे. कविता जगणार्‍या या कवीला मात्र त्याची फिकिर नाही.
 माझी स्वत:ची बायको
मला नवरा मानेना
तरी वडाच्या झाडाला
फेर्‍या घालणे सोडेना...

अशी आजूबाजूची विसंगती म. भा. नेमकेपणे मांडतात.
माझ्या सग्यासोयर्‍यांची
काय सांगू नवलाई
माझ्या आजारपणाची
त्यांनी वाटली मिठाई

असे सांगून म. भा. लिहितात,
माझ्या सग्यासोयर्‍यांनी
काही कमी नाही केले
माझ्या दहाव्याआधीच
गाव जेवण घातले!

अशा सोयर्‍यांविषयीच्या या ओळी पहा-
माझ्या कातड्याचे जोडे
त्यांच्या पायी मी घातले
तरी बोलतात साले
‘नाही कातडे चांगले...!’

‘धर्मशाळे’तल्या कोणत्याही चार ओळी घेतल्या तरी त्या आपल्याला आपल्या आयुष्याची गाथाच वाटतील. प्रेमापेक्षा श्रमाला किंमत मिळावी असा आग्रह धरणार्‍या मभांना भुकेची जाणीव आहे. त्यांच्या कष्टमय आयुष्याचा ते कधी बागुलबुवा करीत नाहीत; मात्र ‘धर्मशाळे’तून जणू मभांचे चरित्रच वाचकांसमोर आले आहे.
पोटामध्ये भूक माझ्या
मात्र ओठात कविता
पाण्याशिवाय वाहते
माझी जीवन सरिता

असे ते म्हणतात. भुकेचे भयंकर वास्तव त्यांच्या लेखणीतून साकारले आहे. पुढच्या ओळी त्याची साक्ष पटवून देतील.
भूक तुलाही छळते
भूक मलाही छळते
भूक विश्‍वमित्रालाही
कुत्रे खायला घालते
 
भूक माय ममतेचे
पाश तोडून टाकते
भूक पोटच्या पोरीला
बाजारात बसवते

भूक लहानथोरांना
देशोधडीला लावते
गरिबाच्या घरातला
भूक दिवा विझवते

आजूबाजूचे वास्तव मभांनी इतक्या नेमकेपणे टिपलेय की त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे यात त्यांनी भाषेचे कसलेही अवडंबर माजविले नाही.
त्याची आणि तिची सुद्धा
नाही ओळख पटली
जरी दोघांनी जिंदगी
एका घरात काढली

या ओळीतून त्यांनी ‘घरघरची कहाणी’ मांडली ती शंभर पानांच्या पुस्तकातून तरी मांडणे शक्य आहे का?
मभांच्या कविता तरूणाईत कायम आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहेत. विविध महाविद्यालयातून होणारे त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम अफाट तरूणाईप्रिय आहेत. 

ज्यांना कुणीच नाहीत
मुलेबाळेही नाहीत
त्यांनी त्यांच्या वंशासाठी
फक्त झाडे लावावीत

स्त्रियांचा सन्मान हे तर मभांच्या जीवनाचे मूलतत्त्वच आहे.
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा

‘धर्मशाळा’ वाचणार्‍याला फक्त मभांच्या कवितांची भुरळच पडत नाही तर ते कवितांवर प्रेम करू लागतात. कवितेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा लोककवी आहे.
कुणाच्याही संसारात
कुणी आणू नये बाधा
कुणाची जाऊ नये
कुण्या कृष्णाकडे राधा

अशी रास्त अपेक्षा त्यांची कविता व्यक्त करते. अनेकांना बागेतल्या फुलाचे महत्त्व कळतच नाही. प्रत्येक व्यक्तित, प्रत्येक कामात दोषच दिसतात. अशांना मभांनी चपराक दिलीय. ते म्हणतात,
काही लोक असतात
चालताना भुंकणारे
बागेतल्या फुलांवरी
जाताजाता थुंकणारे

एकीकडे ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करताना दुसरीकडे खुद्द भगवंतालाच त्यांनी सवाल केलाय,
जेव्हा रावणाने तुझी
होती पळविली सीता
का रे नाही भगवंता
तेव्हा सांगितली गीता

एकंदरीत म. भा. चव्हाण हे आजच्या पिढीचे नेतृत्व करणारे, वंचित उपेक्षितांच्या वेदना प्रभावी शैलीत मांडणारे लोककवी आहेत. त्यांनी पेटवलेला कवितेचा दिवा भविष्यात समाजातील अंधार दूर करीत राहील हे मात्र नक्की!
प्रकाशक - पृथ्वीराज प्रकाशन, पुणे (9922172976)
पाने - 112, किंमत - 60

-घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२ 

Saturday, August 6, 2016

लघुकथांचे लखलखते बेट

सध्याच्या काळात कथा हा साहित्यप्रकार नामशेष होत आहे, अशी अफवा पसरविणार्‍यांना प्रत्यक्ष आपल्या साहित्य कृतीतून सणसणीत चपराक देण्याचे काम समीर नेर्लेकर या ताकतीच्या कथाकाराने केले आहे. अगदी सुरूवातीच्या काळापासून कुणीही आणि कुणालाही ‘तुला एक गोष्ट सांगतो’ असे म्हटले की समोरचा माणूस गांभीर्याने कान टवकारतो. सांस्कृतिक मूल्य असणार्‍या कथा बालमने घडवतात. मोठ्यांना उभारी देतात. काहीवेळा हसवतात, काहीवेळा रडवतात! माणसांच्या जिवंतपणाचे रहस्यच जणू या दडलेल्या कथाबीजांमधून उलगडते. विविध आशयाच्या, विविध विषयाच्या अशा कथा समीर नेर्लेकर या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून साकारल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह मराठी वाचकांची सांस्कृतिक भूक पूर्णपणे भागविण्याइतका सक्षम आहे, हे मला आनंद आणि अभिमानपूर्वक सांगावेसे वाटते.
समीर नेर्लेकर हे एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. कसलाही डांगोरा न पिटता, शेखी न मिरवता अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांचे जीवनानुभव समृद्ध आहेत आणि सातत्याने ते त्यांच्या लेखणीतून उतरलेही आहे. कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा विविध भूमिकातून कार्यरत असताना त्यांनी कधीही त्यांची नेकदिल वृत्ती सोडली नाही. ‘काय चांगले आणि काय वाईट’ यातील फरक सामान्य माणसाला निश्‍चितपणे कळतो; मात्र त्याची अभिव्यक्ती त्याला जमत नाही. अशा परिस्थितीत समाजातील विसंगतीवर नेर्लेकर नेमकेपणाने बोट ठेवतात. नेर्लेकरांच्या कथा वाचल्यानंतर कथा या साहित्य प्रकाराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झालीय, हे सांगण्यासाठी कुण्या ठोकळेबाज विचारसरणीच्या समीक्षकाची गरज नाही.
‘एमरल्ड ग्रीन’ या शीर्षककथेतील रहस्य मानवी वृत्तीच्या पैलूंवर प्रकाश टाकते. समाजात जे काही अनिष्ट चाललेले आहे ते संयमित शब्दांत अधोरेखित करताना लेखक एका अतिउत्साही सामान्य माणसाच्या आयुष्याची झालेली जीवघेणी फरफट मांडतात. कथांचा रहस्यमय, गूढ आणि अनपेक्षित शेवट करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय आहे. नेर्लेकरांची एक स्वतंत्र शैली आहे आणि त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवण्यात ते वाकबगार आहेत. त्यांच्या कथा सोप्या आणि संवादी भाषेेत असल्याने कुणालाही कंटाळवाण्या वाटत नाहीत. प्रत्येक कथेतून एक सामाजिक संदेश देतानाच ते पोटतिडकिने सामान्य माणसाची वकिली करतात, त्यांचे दुःख समर्थपणे मांडतात. ‘व्यवहार’, ‘निरोप’, ‘परपुरूष‘, ‘लंगडा घोडा’, ‘कॉकटेल पार्टी,’ ‘रेड कार्पेट‘, ‘म्हातारीची फणी‘, ‘डोह’ अशा सर्वच कथा त्यादृष्टिने बोलक्या ठरतील.
कॉकटेल पार्टीचे निमंत्रण मिळूनही ‘पेशल कटिंग’ने तृप्त होणारा शरद नगरकर, मालकशाहीच्या फसवणुकीला बळी पडलेला कामगार, विशिष्ट आजारामुळे मुलांकडूनच्या निरोपाची वाट पाहणारी आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारी वाढत्या वयातील मुलगी, आपल्या प्रेमाची प्रतारणा करून ‘नवरा’ नावाच्या एका परपुरूषाबरोबर जाणारी स्त्री, अंगी असलेल्या प्रामाणिकपणामुळे स्त्रीचा गैरफायदा न घेणारा अ‘व्यवहारी’ पुरूष, माणूस होण्याची इच्छा बाळगून रात्र संपली की क्षितिजावर परतणारा आणि पहाट होण्याची वाट पाहणारा सूर्य या सार्‍यातून मानवी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समीर नेर्लेकर यांनी प्रभावीपणे मांडले आहेत.
एकेकाळी सुप्रसिद्ध कथाकार ह. मो. मराठे यांनी अनेक ‘कामगार कथा‘ लिहिल्या होत्या. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ‘कंपनी कामगार‘ नाममात्र राहिला आहे. कामगार संघटना, बंद, संप असे काही फारसे जोमात दिसत नाही. मालक आणि कामगार संघटनांच्या पुढार्‍यांचे संबंध बर्‍यापैकी सुधारल्याने कामगारांच्या अडचणी मांडणार्‍या कथाही खूप कमी झाल्या आहेत. अशा काळात समीर नेर्लेकर यांनी ‘लंगडा घोडा‘ या कथेद्वारे कामगारांचे होणारे शोषण, त्यांचा घेतला जाणारा गैरफायदा नेमकेपणाने मांडलाय.
‘रेड कार्पेट‘ आणि ‘उपसंपादक पाहिजे‘ या दोन कथांमधून सध्याच्या साहित्य, संस्कृती व्यवहाराचे आणि पत्रकारितेचे त्यांनी अक्षरशः वाभाडे काढले आहेत. कवी मोहन भारद्वाज याची होणारी घुसमट आणि त्याने महानगराचा घेतलेला अनुभव त्याच्या आत्मस्वरूपी भाषेत नेर्लेकरांनी शब्दबद्ध केलाय. तो वाचताना कोणत्याही सच्च्या साहित्यप्रेमीच्या डोळ्याच्या कडा ओलावतील. ‘आपली स्वतःची ओळख गुणवत्तेच्या जोरावर निर्माण करावी‘ असे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका संवेदनशील कवीचे आत्मकथन त्यांनी मोठ्या खुबीने या कथेद्वारे मांडले आहे. स्वतःच्याच नावाने विद्यापीठ काढून ‘सबकुछ‘ भूमिका पार पाडणारे ठक असतील किंवा गटातटाचे राजकारण करणारी काव्यमंडळे, ‘कविता कसल्या करताय, कवितेनं पोट भरतं का?‘ असा खुळचट सवाल करणारे प्रकाशक, थेट ‘बिझनेस‘चीच विचारणा करणारे प्रकाशक, नवोदितांनी कविताच करू नयेत, असे म्हणून त्यांचे खच्चीकरण करणारे महाभाग या सर्वांचा समाचार ‘रेड कार्पेट’ या कथेद्वारे घेऊन नेर्लेकरांनी साहित्य क्षेत्र ढवळून काढले आहे. ‘या रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्‍यातून दिसत नाही’ या वाक्याने कथेचा शेवट करताना या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने धडपडणार्‍यांचा आक्रोश व्यवस्थेवर घाव घालतो.
‘उपसंपादक पाहिजे‘ ही या संग्रहातील एक धमाल कथा. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक वृत्तपत्रात दिसणारे चित्र त्यांनी ज्या ढंगाने मांडले आहे ते खरोखरी लाजवाब आहे. अनेक वर्षे पत्रकारितेत काढल्याने अगदी बारीक सारीक गोष्टींचे निरीक्षणही समीर नेर्लेकर यांच्यातील लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. रद्दीच्या दुकानापासून प्रगती करत, जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दै. गडगडाट या वृत्तपत्राचे  मालक बनलेल्या सुभानरावांच्या रूपाने त्यांनी मराठी पत्रकारितेचा  खरा चेहरा दाखवून दिला आहे. आचार्य अत्रे यांनी सांगितले होते की, ‘‘वृत्तपत्र हा धंदा आहे आणि पत्रकारिता हा धर्म! एकवेळ धंद्याचा धर्म करा; पण धर्माचा धंदा होऊ देऊ नकात!’’ नेमके आज तालुका पातळीवर आणि अनेक ठिकाणी जिल्हा स्तरावरही छोट्या वृत्तपत्रांनी पत्रकारिता धर्माचा जो धंदा करून ठेवलाय ते त्यांनी उद्वेगी वृत्तीने आणि विनोदी शैलीने मांडले आहे. या क्षेत्रातील अनेक हौशी पत्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम समीर नेर्लेकर यांनी केले आहे. माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकारितेचे विद्यार्थी आणि सामान्य वाचकांनाही ही कथा वाचताना हास्यरसाचा आनंद घेता येईल.
‘प्लँचेट’च्या माध्यमातून मृतात्म्याशी संवाद साधू पाहणार्‍यांचा खुळचटपणाही त्यांनी अशाच विनोदी शैलीने हाणून पाडलाय. एखादी कल्पना डोक्यात घुसल्यानंतर माणूस कसा अस्वस्थ आणि हतबल होतो हे त्यांनी मार्मिकपणे या कथेतून मांडले आहे.
‘म्हातारीची फणी’ ही कथाही आपल्याला जीवनाचे सार सांगून जाते. गीता, कुराण, बायबल असे धर्मग्रंथ वाचून जे तत्त्वज्ञान सहजासहजी मिळणार नाही ते या कथेतून मिळते. ‘स्वरूप शोधा, विश्‍वरूप आपोआप गवसेल’ हे आचार्य विनोबाजींचे तत्त्वज्ञान इतक्या सहजपणे कथेच्या
माध्यमातून मांडणारे समीर नेर्लेकर मराठी कथाविश्‍वाच्या प्रवासातील एक लखलखते शिखर ठरतील.
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे (७०५७२९२०९२)
पाने : ७२, मूल्य : ७५ 
घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
 

Saturday, July 30, 2016

काळजातील ढगफुटी

एक नेते विधानसभेवर निवडून आले. त्यांनी पार्टी द्यावी असा आग्रह काही पत्रकार मित्रांनी धरला. ते पार्टी टाळायचे. ‘‘बघूया, पैसे जमले की जाऊ,’’ असे सांगून सुटका करून घ्यायचे. शेवटी त्यांनी पत्रकारांना पार्टीला नेलेच. ते म्हणाले, ‘‘मित्रांनो, हवं ते पोटभर जेवा.’’ त्यांनी वेटरला सांगितलं, ‘‘इनको जो जितना चाहिए, वो दे दो।’’ थोड्या वेळात ते उठले. हॉटेलच्या मॅनेजरजवळ गेले आणि पत्रकारांकडे न येता सरळ बाहेर पडले. पत्रकारांना आश्‍चर्य वाटलं. त्यांची जेवणं संपत आली होती. ते आईस्क्रिम वगैरे सांगण्याच्या बेतात होते. तेवढ्यात ते घाईघाईतच आले आणि म्हणाले, ‘‘मित्रांनो माफ करा थोडा उशीर झाला. मध्येच सोडून जावं लागलं.’’
पत्रकारांनी विचारलं ‘‘कशासाठी?’’
ते म्हणाले, ‘‘कशासाठी म्हणजे फार महत्त्वाचं नव्हतं पण जावं लागलं.’’
पत्रकारांनी पुन्हा विचारलं, ‘‘पण कशासाठी?’’
ते म्हणाले, ‘‘त्याचं काय झालं. जेवणाचं बिल किती येईल याचा अंदाज मला येत नव्हता. मेन्यूकार्ड वाचल्यानंतर थोडा अंदाज आला होता. खात्री करावी म्हणून मॅनेजरकडे गेलो. त्यालाच बिलाचा अंदाज विचारला. मग लक्षात आलं की, एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. चटकन बाहेर पडलो. टॅक्सी केली आणि आमदार निवास गाठलं. एकाकडून हातउसणे घेतले आणि आलोय; पण तुम्ही पोटभर जेवा. काळजी करू नका. आपल्याकडे आता भरपूर पैसे आहेत.’’
नंतर त्यांनी घाईगडबडीत दोन-चार घास खाल्ले. कदाचित त्यांचं टेन्शन वाढलं असावं. आपण अधिक जेवलो तर अधिक बिल वाढेल याची काळजी त्यांना वाटली असावी...
वाचकांच्या एव्हाना हा नेता लक्षात आला असेलच. सध्याच्या बरबटलेल्या काळात इतका प्रामाणिक आणि निर्मळ मनाचा नेता आर. आर. आबांशिवाय दुसरा कोण असू शकेल? हा आणि असे काळजाला भिडणारे कितीतरी किस्से अंत:करणापासून लिहिले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी. त्यांचे ‘काळजातले आर. आर. आबा’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीचे प्रकाशक गुलाबराव कारले यांनी दर्जेदाररित्या प्रकाशित केले आहे.
आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पुजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीवालेही त्याला अपवाद ठरले नाहीत. स्वच्छ चारित्र्याचे आबा राष्ट्रवादीवाल्यांना कधी कळलेच नाहीत. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हरपला अशी आवई देताना त्यांचा एकही गुण घेतलाय असे वाटत नाही. म्हणूनच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी आणि मुख्य म्हणजे ज्यांचा चांगुलपणावर विश्‍वास आहे अशा सर्वांनीच उत्तम कांबळे यांनी लिहिलेले आबांचे हे चरित्र वाचलेच पाहिजे. यातून आर. आर. पाटील आणि उत्तमराव कांबळे या दोघांचेही चरित्र आणि चारित्र्य दिसून येते.
आबांची आणि उत्तम कांबळे यांची जवळपास चाळीस वर्षांची मैत्री. कांबळे लिहितात, ‘माझं दारिद्र्य वाटून घेणारे, माझं दु:ख वाटून घेणारे, माझं कष्ट वाटून घेणारे, माझ्या घामाचे कौतुक करणारे आणि लिहायला, बोलायला साधेपणानं पण स्वाभिमानानं जगायला शिकवणारे मित्र म्हणजे आबा. त्यांच्याविषयी लिहिताना आठवांची ढगफुटी झाली.’
या ढगफुटीत कांबळे यांच्या काळजातले आबा तर दिसतातच; पण आबांचे काळीजही तितक्याच ताकतीने वाचकांसमोर येते. शालेय जीवनात उत्तम कांबळे यांना मदत म्हणून त्यांच्यासोबत रोजंदारीने जाणारे आबा, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभव पचवणारे आबा, दारिद्र्याच्या मगरमिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे आबा, एकाहून एक गब्बर शत्रू असताना यश खेचून आणणारे आबा, अंजनीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आबा, व्यसनमुक्तीपासून ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापर्यंत विविध चळवळीत अग्रेसर असणारे आबा, धनदांडग्यांचा विरोध झुगारून देत डान्सबार बंदीसारखे निर्णय घेणारे आबा, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री झालेले आबा ही सगळी रूपे वाचताना त्यांच्या आठवणीने गलबलून येते.
सध्याच्या नेत्यांची विशेषत: राष्ट्रवादीवाल्यांची कोटीच्या कोटी उड्डाणांची चर्चा माध्यमातून सुरूच असते. त्यात आर. आर. आबांच्या झेडपीच्या निवडणुकीचा किस्सा वाचताना कुणालाही शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण येईल. आबांचे पोलीस खात्यात असलेले सख्खे भाऊ राजाराम यांनी कांबळे यांना सांगितलेला एक किस्सा या पुस्तकात आला आहे. आजच्या काळातील राजकारणाचे चित्र पाहता कुणालाही त्याचे आश्‍चर्य वाटेल. त्याचं झालं असं, झेडपीची निवडणूक लढण्याचं ठरलं तेव्हा आबा गांधी होस्टेलमध्ये राहत होते. ही बातमी सांगण्यासाठी ते सायकलीवरूनच शांतीनिकेतनमध्ये आले. तिथे राजाराम अकरावी-बारावीत शिकत होते. आबा त्यांना म्हणाले, ‘‘हे बघ राजाराम, सावळजमध्ये झेडपीसाठी मी निवडणूक लढवावी असा खूप दबाव येतोय. दादांकडून (वसंत दादा) निरोप येतोय. काय करूया?’’ राजाराम चटकन म्हणाले, ‘‘आबा आपण निवडणूक लढवू शकणार नाही.’’ आबांनी त्याचं कारण विचारल्यावर राजाराम म्हणतात, ‘‘अरे दादा, ग्रामपंचायतीत आपली थकबाकी आहे. ती भरल्याशिवाय नो ऑब्जेक्शन मिळत नाही.’’ आबांनी ‘थकबाकी किती आहे’ असे विचारले.
‘‘किती? अरे तेवीस रूपये थकबाकी आहे. कशी भरणार ती? पैसे कुठंयत आपल्याकडं?’’ राजारामानी प्रतिप्रश्‍न केला. आबा शांतपणे म्हणाले, ‘‘ज्यांनी उभं करण्याचा आग्रह धरला आहे. ते भरू शकतात. तो काही खूप मोठा विषय नाही. विषय वेगळाच आहे. मी जर राजकारणात उतरलो तर नोकरीधंदा काही करू शकणार नाही. राजकारणात मी काही मिळवायला निघालो नाही. घरी कमवणारं कोणी नाही. बाबाही हयात नाहीत. मी राजकारणात उतरलो तर घर सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मला त्यात गृहीत धरू नये. माझ्याकडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. घर सांभाळायचं तर राजकारणात उतरता येणार नाही. राजकारणात उतरायचं तर मला काही कमावता येणार नाही. विषय गंभीर आहे म्हणून तुला इथं आणलं आहे.’’
यातून आबांच्या चारित्र्याची कल्पना सहजपणे येते. महत्त्वाचे म्हणजे म. द. हातकणंगलेकर सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी आबांची तळमळ आणि त्यांनी केलेली प्रचंड धडपड या पुस्तकात आली आहे. मुंबईहून हेलिकॉप्टरनं निघताना उत्तम कांबळे यांच्यासाठीि स्वत: आबांनी केलेला चहा, मदंना काहीही करून साहित्य संमेलनाध्यक्ष कराच अशी घातलेली गळ यातून त्यांची गुरूभक्ती दिसून येते. सांगलीच्या साहित्य संमेलनात, सगळ्यांचा कडवा विरोध झुगारून देत उत्तम कांबळे यांच्यासारख्या प्रगल्भ संपादकास आणि दिलदार मित्रास दिलेले स्वागताध्यक्ष पद यावरही कांबळेंनी प्रकाश टाकलाय. एकंदरीत साहित्य संमेलन निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजकीय हस्तक्षेप कसा होतो याची थोडक्यात झलकच या पुस्तकातून दिसून येते. केवळ आर. आर. पाटील यांच्यासारखा अत्यंत प्रामाणिक नेता प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष व्हावा यासाठी धडपडत असतो.
हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर वाचक ते खाली ठेवणार नाहीत. हृदयाला भिडणारे प्रसंग, ओघवती भाषा, आबांसारखं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवताना थेट काळजातून आलेले शब्द हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले असून प्रकाशकांनी पुस्तकात आबांच्या काही रंगीत चित्रांचाही समावेश केला आहे. उत्तम कांबळे आणि आर. आर. पाटील यांच्या मैत्रिचा सुगंध या पुस्तकातून दरवळतोच; मात्र वाचकांना अंतर्मुखही करतो.

प्रकाशक : सुरेश एजन्सी, पुणे (020-24470790)
पाने : 87
मूल्य : 120

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, July 16, 2016

शंभरीच्या तरूणाची लेखनगाथा

‘वय देहाला असतं मनाला नाही. मनानं तरूण असणारी माणसं कधीच वृद्ध होत नाहीत. जीवन सुरेल आहे, आपल्याला ते सुरात गाता आलं पाहिजे. जग सुंदर आहे, डोळ्यात जीव ओतून ते पाहता आलं पाहिजे. नाविन्याच्या खिडक्या उघड्या ठेवून जगत गेलं की जगण्याचं कधी ओझ होतं नाही...’
असं कोण म्हणतयं? तर वयाच्या शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले दुर्गानंद गायतोंडे! कोण हे गायतोंडे? तर ते लेखक आहेत. 29 मार्च 1919 चा त्यांचा जन्म. जन्मस्थळ हुबळी. कराची आणि मुंबईतून त्यांनी एम. ए., एल. एल. बी. केलं. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर नोकरी केली. ब्रिटिश, डच आणि अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यात  बर्‍याच वरच्या हुद्यावर त्यांनी नोकरी केली. त्यानिमित्त नागपूर, सिमला, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि दुर्गापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. 1980 ला ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर शांत बसतील ते गायतोंडे कसले. त्यांनी देशातल्या अनेक कंपन्यात व्यवस्थापक आणि कामगारांसाठी कार्यशाळा घेतल्या. त्याकाळात त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली. वयाच्या नव्वदीनंतर त्यांना मराठी पुस्तके लिहिण्याची प्रेरणा झाली. मग त्यांनी लेखन, समाजकार्य, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण आणि आर्थिक मदत, अध्यात्म क्षेत्रात संशोधन चालू ठेवले. या आदर्श कर्मयोग्याची वयाच्या नव्वदीनंतर मराठीतील चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
विषयांची विविधता, अभ्यासपूर्ण लेखन आणि थेट भिडणारी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वेगळेपण. म्हणूनच ‘वय देहाला असतं, मनाला नाही’ असं ते ठामपणे सांगू शकतात. साहित्यात वय, जात, धर्म, प्रांत असे निकष नसतात. ते असूही नयेत; मात्र दुर्दैवाने असे घटक प्रकाशन क्षेत्रात आल्याने हे क्षेत्र काळवंडत चाललं आहे. अशा परिस्थितीत दुर्गानंद गायतोंडे यांच्यासारख्या लेखकांचा आदर्श नवोदितांनी घ्यायला हवा.
गायतोंडे यांच्या पुस्तकांच्या शीर्षकावरूनही त्यांच्या लेखन सामर्थ्याचे वैविध्य सहजपणे ध्यानात येईल. ‘सुंदरा मनामध्ये भरली,’ ‘आभास’, ‘विनोदाच्या फुलझड्या’, ‘गूढ’, ‘कवडसे’, ‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’, ‘ओंकारमय व्हा’, ‘भावलेल्या व्यक्ती’, ‘थरार’, ‘अंतरीच्या नानाकळा’, ‘पुनर्जन्मा ऐक तुझी कहाणी’, ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ ही त्यांची काही पुस्तके! हा सर्व संच पुण्यातील ‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर जोशी यांनी आत्मियतेने प्रकाशित केला आहे. गायतोंडे यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी लेखक व ‘उत्कर्ष’सारखी मान्यवर प्रकाशन संस्था यामुळे मराठीत सकस साहित्याची भर पडली आहे.
गायतोंडे म्हणतात, ‘मी संशोधनाचा भोक्ता आहे. आपल्याकडे सर्व शास्त्रात आणि विज्ञानात सतत संशोधन चालू असतं; पण अध्यात्मात तसं काही दिसून येत नाही. एखादा अपवाद असेलही; पण त्याने जे काही निष्कर्ष काढले असतील ते माझ्या वाचनात आले नाहीत.’
‘‘सत्ययुगात हनुमानाची अनेक देवळे आणि हजारो भक्त होते. द्वापारयुगात देवही कमी झाले आणि भक्तही कमी झाले आणि आता कलियुगात तर कहरच झाला. नावापुरतीच देवळं उरली आणि नावापुरतेच भक्त राहिले आहेत. परवा रात्री तर एक चोवीस वर्षांची मुलगी देवळात आली आणि मला म्हणाली, हाय हनु!’’ अशी हनुमानाची आत्मनिवेदनात्मक दंतकथा सांगत गायतोंडे यांनी समाज किती बदलला आहे. हे दाखवून दिले आहे. त्यातूनच त्यांनी ‘पुनर्जन्मा, ऐक तुझी कहाणी’ आणि ‘संशोधनात्मक ओंकारमय व्हा’ ही पुस्तके लिहिली. त्यांनी 56 प्रश्‍नांची उत्तरे 35 व्यक्तिंकडून घेतली आणि त्याचे निष्कर्ष त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. ‘वयानुसार डोळे साथ देत नसले तरी ही ‘ओम’ची श्रद्धा आहे’ असे त्यांना वाटते.
त्यांच्या ‘आभास’ या पुस्तकाचे मनोगत तर प्रत्येक नवोदित लेखकाने पुन्हा पुन्हा वाचायला हवे. यात त्यांनी नवशिक्या लेखकांची आणि प्रकाशकांची कथा व व्यथा प्रांजळपणे मांडली आहे. नव्वदीनंतरही मराठी प्रकाशकांचे त्यांना दुर्दैवी अनुभव आले. मराठी भाषेच्या संवर्धनाचा ठेका आपणच घेतलाय अशा अविर्भावात मिरवणार्‍या पुण्या-मुंबईतील प्रकाशकांना दुर्गानंद गायतोंडे यांनी दिलेली ही सणसणीत चपराकच आहे. ‘एक वर्ष बिझी आहोत’,  ‘पु. ल. देशपांड्यांचं पुस्तक हाती घेतलं आहे; नंतर आपलंच घेऊ’,  ‘तुम्ही पुस्तक दिलं होतं हे आठवतचं नाही’,‘या वर्षाचे कॅलेंडर भरले आहे. तुम्ही जानेवारीत येता का?’,  ‘प्रकाशन हा आमचा जोडधंदा आहे. त्यामुळे पैसे दिले तर पुस्तक करू’ ही व अशी सगळी उत्तरे त्यांना वयाच्या नव्वदीनंतर ऐकायला मिळाली. मग त्यांची गाठ पडली ‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर जोशी यांच्याशी. जोशीकाकांनी मात्र प्रकाशकांच्या या उर्मटपणाला अपवाद ठरत गायतोंडे यांची पुस्तके सुबकरित्या प्रकाशित केली आहेत.
‘भावलेल्या व्यक्ती’ या पुस्तकात त्यांची 62 वर्षांची सहचरी मीरा,  राजदूत आप्पासाहेब पंत, महात्मा गांधींच्या निकटच्या सहकारी सुशिला पै, उत्तम आणि मिश्किल शिक्षक बापू प्रभावळकर, परिस्थितीवर मात करणारी शरयु कुंटे, चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसरचा एका बाईने केलेला अंध:पात अमरसिंग, मालकाच्या घरात स्वत:चं बाळंतपण करणारी कुमारिका शेवंता माळी आणि इतर चार जणांचा समावेश केला आहे. ‘कवडसे’ या पुस्तकातही भारताचे न्यायमूर्ती यशवंत चंद्रचुड, कुमार गंधर्वांची पहिली पत्नी भानुमती कोमकल्ली, असंख्य लोकांचे श्रद्धास्थान माताजी निर्मला देवी, सी. पी. आयचे जनरल सेक्रेटरी ए. बी. बर्धन, आंतरराष्ट्रीय कंपनी नीतीचे सर्वेसर्वा एच. प्रॅट आणि इतर चार जणांची ओळख करून दिली आहे.
कथा, रहस्यमय कादंबरी, विनोदी लेख, गूढ लेखन, संशोधनात्मक, अध्यात्मिक, व्यक्तिचित्रणात्मक अशा चौफेर विषयांवर सशक्तपणे लेखणी चालविणार्‍या दुर्गानंद गायतोंडे यांचा पुण्याच्या महापौरांच्या हस्ते सत्कार झाला आहे. शारदा ज्ञानपीठ आणि सिक्कीमच्या राज्यपालांनीही त्यांचा गौरव केला; मात्र इतके मोठे योगदान देऊनही आपल्या राज्यसरकारला त्यांचा विसर पडलेला दिसतोय. फुटकळ लेखकांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार देऊन गौरविणार्‍या वशिलेबाज सरकारने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थांनी त्यांची दखल घ्यावी असे वाटते.
दुर्गानंद गायतोंडे यांच्याकडे पाहून व्यक्तिश: मला लोककवी मनमोहन नातू यांची आठवण येते. प्रतिभावंतांची उपेक्षा हा विषय युगानुयुगे चालतच आलेला आहे. त्या प्रवृत्तीला फटकारताना मनमोहन म्हणाले होते, ‘उद्याचा कालिदास अनवाणी पायाने जात असेल; तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’  शंभरीच्या घरात असलेल्या आणि मुख्य म्हणजे अजूनही लिहिते असलेल्या दुर्गानंद गायतोंडे यांची दखल किमान आपल्याकडील साहित्य संस्थांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वयाची बंधने झुगारून देत आजही अखंडपणे साहित्यसेवा करत असल्याबद्दल गायतोंडे यांचे अभिनंदन करतो.
(दुर्गानंद गायतोंडे यांच्या सर्व मराठी पुस्तकांसाठी संपर्क ‘उत्कर्ष प्रकाशन’ पुणे-9822410037)

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

राष्ट्रवादीची ‘रसिक’ता!

विविध क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या पूजनीय आणि ऋषितुल्य व्यक्तिंच्या कार्याचा वसा नवीन पिढीसमोर यावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूजन गौरव सोहळ्याचे आयोजन करते. यंदाच्या ‘गुरूजन’ सोहळ्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. शरद हर्डीकर, कायदेतज्ज्ञ भास्करराव आव्हाड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘गुटखाकिंग’ रसिकलाल धारिवाल यांची निवड केली आहे. या सगळ्या मान्यवरात धारिवालांचे नाव घुसडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्याच्या साहित्य संमेलनात ‘गुटखावाल्याची देणगी नको’ म्हणून धारिवालांचे वीस लाख रूपये परत करण्यात आले होते. त्याच शहरात त्यांचा ‘गुरूजन’ म्हणून सत्कार होणे क्लेशकारक आहे.
आपल्या ‘कार्यकतृत्वाने’ विख्यात असलेले पुण्यातील नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. लोकसभा निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजेच एनसीपी ही ‘नॅशनल करप्ट पार्टी’ असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. मोदी यांच्या या विधानातील सत्यता अनेकवेळा सिद्ध होऊनही पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत या पक्षाचे प्राबल्य आहे याला काय म्हणावे? श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे म्होरके असलेले शरदराव पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मुळात बाबासाहेब इतिहास संशोधक, अभ्यासक अथवा शिवशाहीर नाहीत असे राष्ट्रवादीवाले बेंबीच्या देठापासून ओरडत सांगत असतात. याच बाबासाहेबांचाही यापूर्वी राष्ट्रवादीने अशाच गुरूपौर्णिमेनिमित्तच्या सोहळ्यात ‘गुरूजन’ म्हणून सत्कार केलेला आहे. यापूर्वी बाबासाहेबांसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ विजय भटकर, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, दाजीकाका गाडगीळ यांचा गौरव राष्ट्रवादीने केला आहे. यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात हिमालयाच्या उंचीची! त्या जोडीला आता रसिकलाल धारिवाल यांच्यासारख्या गुटखाकिंगचे नाव जोडल्याने राष्ट्रवादीची मूळ प्रवृत्तीच दिसून येते.
कोणी कोणता व्यवसाय करावा याला आपल्याकडे बंधने नसली तरी ‘माणिकचंद’सारख्या गुटख्याने अनेकांच्या आयुष्याचे मातेरे केले आहे. ज्या पक्षाचे स्थानिक नेते या सोहळ्याचे आयोजन करत आहेत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना म्हणजेच शरद पवार यांनाही या गुटख्याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभरच्या व्यग्रतेत अनेकवेळा हा गुटखा चघळण्याची सवय असल्याने त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला. सुदैवाने योग्य उपचार झाल्याने कॅन्सरमुळे माणूस ‘कॅन्सल’ होत नाही हे त्यांच्याबाबत दिसून आले; मात्र दुर्दैव हे की याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आपल्या कार्यकतृत्वाची प्रामाणिक छाप उमटविणारे आर. आर. तथा आबा पाटील यांचा कॅन्सरने बळी घेतला. असे सगळे असताना एखाद्या ‘गुटखाकिंग’चा ‘गुरू’ म्हणून सत्कार करणे हे कुणालाही न पचणारे आहे.
गुटख्यासारख्या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात आणि प्रसंगी त्यात जीवही जाऊ शकतो इतकी अक्कल रसिकलाल धारिवाल यांच्यासारख्या लोकांकडे बघून येते; म्हणूनही त्यांची या गौरव सोहळ्यासाठी निवड केली असावी. हा ‘बोध’ देणारे धारिवाल राष्ट्रवादीसाठीच नव्हे तर समाजासाठीही गुरूच म्हणावे लागतील!! राष्ट्रवादी भ्रष्टवादी झालाय (किंवा सुरूवातीपासूनच आहे) हे सत्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. छगन भुजबळ, अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे अशा नेत्यांकडे बघितल्यास त्याची प्रचिती यावी. महाराष्ट्रातील ‘पॉवर’फूल पक्ष म्हणून अनेकजण राष्ट्रवादीकडे बघतात. त्यामुळे अशा धनदांडग्यांचा गुरूही ‘गब्बर’च असायला हवा. रसिकलाल धारिवाल यांच्या गौरवाने ही बाब अधोरेखित झाली आहे.
यशवंतराव चव्हाणांसारख्या लोकनेत्यासोबत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणार्‍या शरद पवार यांनी साबरमती आणि बारामती या दोन्ही संस्कृतींचा परिचय वारंवार घडवून दिला आहे. ‘मुँह में राम बगल में छुरी’ अशा प्रवृत्तीच्या मंडळींचाच या पक्षात भरणा आहे. सत्तेत असताना आणि नंतरही अनेक ठिकाणी, अनेक प्रकरणात राष्ट्रवादीची भ्रष्टवादी वृत्ती दिसून आलेली आहे. विजय मल्ल्या, शशी थरूर अशा लोकांची मैत्री एकेकाळी अभिमानाने मिरवणारे शरद पवार रसिकलाल धारिवालसारख्या गुटखाकिंगवर कौतुकाचा वर्षाव करताना कचरणार नाहीत. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे काही ‘सुविद्य’ आमदार त्यांची तळी उचलायला सोबत आहेतच.
पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे. विद्येचे माहेर घर असा या शहराचा लौकिक आहे. राजकीय उलथापालथी, घोटाळे, भ्रष्टाचार, अरेरावी, दादागिरी, जुलूमशाही हे सगळे सगळ्याच पक्षात थोड्याफार प्रमाणात चालते; मात्र आपण सांस्कृतिक क्षेत्रात किती भरीव योगदान देतोय हे दाखविण्यासाठी साहित्य संमेलनात लूडबूड करणे, साहित्य संस्थांच्या कारभारात दखल घालणे, सांस्कृतिकतेच्या नावावर माणिकचंदच्या रसिकलाल धारिवाल यांचा ‘गुरू’ म्हणून गौरव करणे हे सारेच या शहराच्या प्रतिमेला कलंकित करणारे आहे. भटकर, माशेलकर, पुरंदरे यांच्या बरोबरीने धारिवालचा इतिहास गिरवावा लागणे यापेक्षा शरमेची बाब कोणती असू शकते?
अशा अनेक कारनाम्यांमुळे देशात आणि राज्यात राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांना धूळ चाखावी लागली आहे. या नैराश्येतून शरद पवार यांच्यासारखे जबाबदार नेतेही सुटले नाहीत. हातची सत्ता गेल्यानंतर वेळोवेळी त्यांनी जी बालिश विधाने केली ती उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलीच आहेत. त्यांच्याच संस्कारात वाढणारे शहरातील नेते त्यांचाच कित्ता गिरवत अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ हे मोदींचे स्वप्न पूर्ण होईल की नाही हे आम्हास ठाऊक नाही; पण राष्ट्रवादीच्या अशा अनेक ‘पराक्रमा’मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मात्र बुडण्याच्या मार्गावर आहे हे या सर्वातून लख्खपणे दिसून येत आहे. 

-घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, July 9, 2016

समाजमनाचा आरसा

लेखक - विनोद श्रा. पंचभाई
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)
पाने - 120, मूल्य 120


माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार निश्‍चितपणे प्रकाशमार्गी असतात. जे जगतो, जसं जगतो तसं बिनधास्तपणे कागदावर उतरवणारे लेखक कमी होत चाललेत. विनोद श्रा. पंचभाई हे अशा अपवादभूत लेखकांपैकी एक आहेत. आपल्यावर रूसलेल्या प्रेयसीची समजूत काढत तिला अलगदपणे आपल्या कुशीत घ्यावे, तितक्याच सहजतेने सर्व मनोवृत्तीच्या वाचकांचा ते ठाव घेतात आणि त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीतील प्रभावी मांडणी, अधेमधे कविता, संत कबीरांचे दोहे, राष्ट्रसंत तुकडोजींच्या ओव्यांची साखरपेरणी यामुळे त्यांच्या लिखाणाला अवीट गोडी प्राप्त झाली आहे.
‘थोडं मनातलं’ हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित केला आहे. परमेश्‍वर कुठे आहे, इथपासून ते जीवनातील रागलोभ, बालपण, सण-समारंभ, संस्कार आणि संस्कृती, गुरू-शिष्य, शेजारी, वाचनसंस्कृती अशा सर्व विषयांवरील चिंतन त्यांनी या लेखातून प्रकट केले आहे. हे लेख थेट काळजाला जाऊन भिडतात. विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यांवर यशस्वी झेप घेण्यासाठीचा संकल्प दृढ करतात. माणसाला हलवून सोडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे हे साहित्य मनावर असलेले मणामणाचे ओझे कमी करण्यास मदत करते.
या पुस्तकातील लेख म्हणजे कुणा व्यास-वाल्मीकींची कवीकल्पना नाही. जीवनाच्या विविध टप्प्यांवर एका सामान्य माणसाला पडलेले, पडणारे प्रश्‍न त्यांनी पोडतिडिकेने मांडले आहेत. निकोप समाजनिर्मितीसाठी सामान्य माणसाला नेहमी काही ना काही प्रश्‍न पडायला हवेत आणि त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा त्याने प्रयत्नही करायला हवा! विनोद पंचभाई यांनी एका वेगळ्या पातळीवर मानवी मनाचा झालेला गुंता या पुस्तकात ठामपणे मांडलाय.
आपले मन कठोर करणे, मोह टाळणे हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे असे सांगणारे पंचभाई म्हणतात, तुमच्या कुटुंबावर तुमचे मनापासून प्रेम असेल तर अनावश्यक मोह टाळा! येणारी संभाव्य संकटे टाळायची असतील तर स्वतः व्यसनापासून दूर रहा आणि इतरांनाही त्यासाठी परावृत्त करा. माणसातील देव कुणालाही दिसत नसल्याची खंत व्यक्त करून ते अपेक्षा व्यक्त करतात की तो कधीतरी म्हणेल, ‘तुझमे रब दिखता है....!’
पंचभाईंच्या लेखनात कधी त्यांच्यातला सुहृदयी देशभक्त डोकावतो, कधी प्रेमळ पिता दिसतो, कधी एखादा समाजसेवक, तत्त्ववेत्ता आढळतो, प्रबोधनाची मशाल हाती घेऊन अंधार्‍या राती गस्त घालणारा जागल्या दिसतो तर कधी उफाळलेल्या सात्विक संतापातून ‘माणूस खरंच बुद्धिमान प्राणी आहे का?’ असा सवाल करणारा सामान्य माणूसही दिसतो. मात्र या प्रत्येक लेखात त्यांनी आशावादाचे बीज पेरलेय. कसदार धान्याची टपोरी कणसं देण्यासाठी आधी एखाद्या बीयाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं, हे जगरहाटीचं सूत्र त्यांना कधीचच कळून चुकलंय.
या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, ‘‘आज नेते-अभिनेते न होता खर्‍याअर्थाने ‘जेते’ व्हा. कुठल्याही भोंदूबाबाला आदर्श न मानता ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवले त्या स्वतःच्या आईबाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. जीवनात सच्चा आनंद मिळवण्यासाठी देवानंद न होता विवेकानंद व्हा. सुखरामकडे न बघता रामनामातच सुख शोधा!’’ शिवाय ‘जेते’ व्हा असे सांगतानाच त्यांनी एका लेखात ‘जगज्जेता’ सिकंदर ‘जाताना’ मात्र ‘मोकळ्या’ हातानींच गेला होता, याचीही आठवण करून दिलीय. पंचभाईंची हीच वस्तुनिष्ट भूमिका झापडबंद आयुष्य जगणार्‍या अनेकांना मात्र भानावर आणते.
‘बालपण देता का बालपण?’ या लेखातील टिंकूचे मनोगत तर प्रत्येकाला हेलावून सोडणारे आहे. आजोबांनी लहानपणी सांगितलेल्या स्वच्छंदी जगण्याच्या सुरस कथा ऐकून ट्विंकल तसे जगण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला खेळायला ना मैदान मिळते ना आईवडिलांचा पाठिंबा! सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी होत चाललेले असताना अशा अनेक ट्विंकल दुर्दैवाने गावोगावी दिसतात. ‘‘मलाही मनापासून वाटतं, आपण आपल्या आजोबांसारखं मनसोक्त मजेत भटकावं, खेळावं, खूप खूप मजा करावी, दमायला होईपर्यंत मैदानात पळावं. मग दूऽऽर जाऊन सूर्यास्त बघत बसावं. आपल्याला शोधत मग मम्मीनं आपल्याजवळ यावं, लाडानं आपल्याला जवळ घ्यावं, डोळे भरून तिनं माझ्या डोळ्यात बघावं, खरंच राहून राहून इतक्यात मला असं मनापासून वाटतंय!’’ हे टिंकूचे आत्मकथन वाचताना आपसूकच डोळे पानावतात. नव्या पिढीला आपण काय देतोय, याची आत्मजाणीव निर्माण होते. केवळ भाषेचे फुलोरे म्हणून या लेखांचे कौतुक नाही; तर समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम विनोद श्रा. पंचभाई यांनी ताकतीने केले आहे. हे लेख वाचून कित्येकांना नवी दृष्टी मिळेल. हरवलेली दिशा गवसेल! समाजातील विसंगती, दुटप्पीपणा, ढोंग याचा पर्दाफाश करण्यात पंचभाईंची लेखणी बर्‍यापैकी यशस्वी ठरलीय!
‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने गरीब, दुर्लक्षित, वंचित, वनवासी यांचे प्रश्‍न त्यांनी ठामपणे मांडले आहेत. शासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचारांमुळे मदतकार्यात येणारे अडथळे ते दाखवून देतात. चौफेर फटकेबाजी करणारी आणि विविध विषयांना स्पर्श करणारी त्यांची लेखणी वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.
‘प्रामाणिकपणा म्हणजे काय रे भाऊ?’ असे उपहासाने विचारतानाच ते इथल्या व्यवस्थेचे बुरखे टरटरा फाडतात. ‘उनकी बेईमानीमे आप पुरी इमानदारी से साथ निभाओ’ अशा परिस्थितीमुळे मनात नकळत ठिणगी पेटायला लागते पण आपल्यासमोरील अनेक मजबुरीमुळे त्याचे भडक्यात रूपांतर होत नाही, इकडे ते जाणीवपूर्वक लक्ष वेधतात. ‘घेण्यादेण्याचे’ व्यवहार करताना खाणार्‍याचे पुन्हा नवे घोटाळे करण्यासाठी केवळ ‘खाते’ बदलले जाते, हे वास्तव त्यांनी मांडले आहे. मात्र असे जरी असले तरी ‘जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों’ या गाण्याची आठवण करून देण्यासही ते विसरत नाहीत. एक अगतिकता, तगमग यापेक्षाही स्वतःतील चांगुलपण शाबूत ठेवण्यासाठीची त्यांची धडपड या लेखनातून दिसून येते.
माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने बर्‍याचवेळा तो एकटा असूनही अनेकांत असतो. आपण अनेकांत आणि अनेकांसाठी असतो, हे मात्र कित्येकदा त्याला कळत नाही. म्हूणनच त्यांनी ‘एकटा’ या लेखाचा समारोप करताना लिहिले आहे, ‘मै तो अकेलाही चला था, लोग मिलते गए, और कारवॉं बनता गया।’
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा संदर्भ देऊन लिहिलेला ‘एक पत्थर तो तबियत से उछालों यारो’ हा लेख तर प्रत्येक तरूण - तरूणींनी वाचायलाच हवा! एकदा वेळ निघून गेली तर त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी या लेखातून दिलाय. अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे अफाट सामर्थ्य आजच्या युवा पिढीत आहे. त्यांना फक्त अचूक व योग्य दिशा ठरवण्याची गरज आहे एवढेच...! असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे आणि ते रास्तही आहे.

--
घनश्याम पाटील
संपादक, चपराक 

भ्रमणध्वनी : ७०५७२९२०९२