Saturday, August 6, 2016

लघुकथांचे लखलखते बेट

सध्याच्या काळात कथा हा साहित्यप्रकार नामशेष होत आहे, अशी अफवा पसरविणार्‍यांना प्रत्यक्ष आपल्या साहित्य कृतीतून सणसणीत चपराक देण्याचे काम समीर नेर्लेकर या ताकतीच्या कथाकाराने केले आहे. अगदी सुरूवातीच्या काळापासून कुणीही आणि कुणालाही ‘तुला एक गोष्ट सांगतो’ असे म्हटले की समोरचा माणूस गांभीर्याने कान टवकारतो. सांस्कृतिक मूल्य असणार्‍या कथा बालमने घडवतात. मोठ्यांना उभारी देतात. काहीवेळा हसवतात, काहीवेळा रडवतात! माणसांच्या जिवंतपणाचे रहस्यच जणू या दडलेल्या कथाबीजांमधून उलगडते. विविध आशयाच्या, विविध विषयाच्या अशा कथा समीर नेर्लेकर या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून साकारल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह मराठी वाचकांची सांस्कृतिक भूक पूर्णपणे भागविण्याइतका सक्षम आहे, हे मला आनंद आणि अभिमानपूर्वक सांगावेसे वाटते.
समीर नेर्लेकर हे एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. कसलाही डांगोरा न पिटता, शेखी न मिरवता अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांचे जीवनानुभव समृद्ध आहेत आणि सातत्याने ते त्यांच्या लेखणीतून उतरलेही आहे. कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा विविध भूमिकातून कार्यरत असताना त्यांनी कधीही त्यांची नेकदिल वृत्ती सोडली नाही. ‘काय चांगले आणि काय वाईट’ यातील फरक सामान्य माणसाला निश्‍चितपणे कळतो; मात्र त्याची अभिव्यक्ती त्याला जमत नाही. अशा परिस्थितीत समाजातील विसंगतीवर नेर्लेकर नेमकेपणाने बोट ठेवतात. नेर्लेकरांच्या कथा वाचल्यानंतर कथा या साहित्य प्रकाराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झालीय, हे सांगण्यासाठी कुण्या ठोकळेबाज विचारसरणीच्या समीक्षकाची गरज नाही.
‘एमरल्ड ग्रीन’ या शीर्षककथेतील रहस्य मानवी वृत्तीच्या पैलूंवर प्रकाश टाकते. समाजात जे काही अनिष्ट चाललेले आहे ते संयमित शब्दांत अधोरेखित करताना लेखक एका अतिउत्साही सामान्य माणसाच्या आयुष्याची झालेली जीवघेणी फरफट मांडतात. कथांचा रहस्यमय, गूढ आणि अनपेक्षित शेवट करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय आहे. नेर्लेकरांची एक स्वतंत्र शैली आहे आणि त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवण्यात ते वाकबगार आहेत. त्यांच्या कथा सोप्या आणि संवादी भाषेेत असल्याने कुणालाही कंटाळवाण्या वाटत नाहीत. प्रत्येक कथेतून एक सामाजिक संदेश देतानाच ते पोटतिडकिने सामान्य माणसाची वकिली करतात, त्यांचे दुःख समर्थपणे मांडतात. ‘व्यवहार’, ‘निरोप’, ‘परपुरूष‘, ‘लंगडा घोडा’, ‘कॉकटेल पार्टी,’ ‘रेड कार्पेट‘, ‘म्हातारीची फणी‘, ‘डोह’ अशा सर्वच कथा त्यादृष्टिने बोलक्या ठरतील.
कॉकटेल पार्टीचे निमंत्रण मिळूनही ‘पेशल कटिंग’ने तृप्त होणारा शरद नगरकर, मालकशाहीच्या फसवणुकीला बळी पडलेला कामगार, विशिष्ट आजारामुळे मुलांकडूनच्या निरोपाची वाट पाहणारी आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारी वाढत्या वयातील मुलगी, आपल्या प्रेमाची प्रतारणा करून ‘नवरा’ नावाच्या एका परपुरूषाबरोबर जाणारी स्त्री, अंगी असलेल्या प्रामाणिकपणामुळे स्त्रीचा गैरफायदा न घेणारा अ‘व्यवहारी’ पुरूष, माणूस होण्याची इच्छा बाळगून रात्र संपली की क्षितिजावर परतणारा आणि पहाट होण्याची वाट पाहणारा सूर्य या सार्‍यातून मानवी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समीर नेर्लेकर यांनी प्रभावीपणे मांडले आहेत.
एकेकाळी सुप्रसिद्ध कथाकार ह. मो. मराठे यांनी अनेक ‘कामगार कथा‘ लिहिल्या होत्या. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ‘कंपनी कामगार‘ नाममात्र राहिला आहे. कामगार संघटना, बंद, संप असे काही फारसे जोमात दिसत नाही. मालक आणि कामगार संघटनांच्या पुढार्‍यांचे संबंध बर्‍यापैकी सुधारल्याने कामगारांच्या अडचणी मांडणार्‍या कथाही खूप कमी झाल्या आहेत. अशा काळात समीर नेर्लेकर यांनी ‘लंगडा घोडा‘ या कथेद्वारे कामगारांचे होणारे शोषण, त्यांचा घेतला जाणारा गैरफायदा नेमकेपणाने मांडलाय.
‘रेड कार्पेट‘ आणि ‘उपसंपादक पाहिजे‘ या दोन कथांमधून सध्याच्या साहित्य, संस्कृती व्यवहाराचे आणि पत्रकारितेचे त्यांनी अक्षरशः वाभाडे काढले आहेत. कवी मोहन भारद्वाज याची होणारी घुसमट आणि त्याने महानगराचा घेतलेला अनुभव त्याच्या आत्मस्वरूपी भाषेत नेर्लेकरांनी शब्दबद्ध केलाय. तो वाचताना कोणत्याही सच्च्या साहित्यप्रेमीच्या डोळ्याच्या कडा ओलावतील. ‘आपली स्वतःची ओळख गुणवत्तेच्या जोरावर निर्माण करावी‘ असे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका संवेदनशील कवीचे आत्मकथन त्यांनी मोठ्या खुबीने या कथेद्वारे मांडले आहे. स्वतःच्याच नावाने विद्यापीठ काढून ‘सबकुछ‘ भूमिका पार पाडणारे ठक असतील किंवा गटातटाचे राजकारण करणारी काव्यमंडळे, ‘कविता कसल्या करताय, कवितेनं पोट भरतं का?‘ असा खुळचट सवाल करणारे प्रकाशक, थेट ‘बिझनेस‘चीच विचारणा करणारे प्रकाशक, नवोदितांनी कविताच करू नयेत, असे म्हणून त्यांचे खच्चीकरण करणारे महाभाग या सर्वांचा समाचार ‘रेड कार्पेट’ या कथेद्वारे घेऊन नेर्लेकरांनी साहित्य क्षेत्र ढवळून काढले आहे. ‘या रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्‍यातून दिसत नाही’ या वाक्याने कथेचा शेवट करताना या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने धडपडणार्‍यांचा आक्रोश व्यवस्थेवर घाव घालतो.
‘उपसंपादक पाहिजे‘ ही या संग्रहातील एक धमाल कथा. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक वृत्तपत्रात दिसणारे चित्र त्यांनी ज्या ढंगाने मांडले आहे ते खरोखरी लाजवाब आहे. अनेक वर्षे पत्रकारितेत काढल्याने अगदी बारीक सारीक गोष्टींचे निरीक्षणही समीर नेर्लेकर यांच्यातील लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. रद्दीच्या दुकानापासून प्रगती करत, जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दै. गडगडाट या वृत्तपत्राचे  मालक बनलेल्या सुभानरावांच्या रूपाने त्यांनी मराठी पत्रकारितेचा  खरा चेहरा दाखवून दिला आहे. आचार्य अत्रे यांनी सांगितले होते की, ‘‘वृत्तपत्र हा धंदा आहे आणि पत्रकारिता हा धर्म! एकवेळ धंद्याचा धर्म करा; पण धर्माचा धंदा होऊ देऊ नकात!’’ नेमके आज तालुका पातळीवर आणि अनेक ठिकाणी जिल्हा स्तरावरही छोट्या वृत्तपत्रांनी पत्रकारिता धर्माचा जो धंदा करून ठेवलाय ते त्यांनी उद्वेगी वृत्तीने आणि विनोदी शैलीने मांडले आहे. या क्षेत्रातील अनेक हौशी पत्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम समीर नेर्लेकर यांनी केले आहे. माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकारितेचे विद्यार्थी आणि सामान्य वाचकांनाही ही कथा वाचताना हास्यरसाचा आनंद घेता येईल.
‘प्लँचेट’च्या माध्यमातून मृतात्म्याशी संवाद साधू पाहणार्‍यांचा खुळचटपणाही त्यांनी अशाच विनोदी शैलीने हाणून पाडलाय. एखादी कल्पना डोक्यात घुसल्यानंतर माणूस कसा अस्वस्थ आणि हतबल होतो हे त्यांनी मार्मिकपणे या कथेतून मांडले आहे.
‘म्हातारीची फणी’ ही कथाही आपल्याला जीवनाचे सार सांगून जाते. गीता, कुराण, बायबल असे धर्मग्रंथ वाचून जे तत्त्वज्ञान सहजासहजी मिळणार नाही ते या कथेतून मिळते. ‘स्वरूप शोधा, विश्‍वरूप आपोआप गवसेल’ हे आचार्य विनोबाजींचे तत्त्वज्ञान इतक्या सहजपणे कथेच्या
माध्यमातून मांडणारे समीर नेर्लेकर मराठी कथाविश्‍वाच्या प्रवासातील एक लखलखते शिखर ठरतील.
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे (७०५७२९२०९२)
पाने : ७२, मूल्य : ७५ 
घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
 

No comments:

Post a Comment