जात ही संकल्पना कालबाह्य ठरत असतानाच फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत ब्राह्मण समाजाला सतत टिकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. ब्राह्मणांना झोडपणे, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांना त्रास देणे म्हणजेच पुरोगामित्वाचे प्रतिक असा गृह काही समाजकंटकांनी करून घेतलेला दिसतोय. ‘जातीने ब्राह्मण’ असणं हा गुन्हा आहे की काय, असेच आता अनेकांना वाटू लागले आहे. जातीजातीत तेढ आणि द्वेषाचे राजकारण करून सामाजिक वातावरण दूषित करणार्यांना आवरणे हे आता राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे.
प्रत्येक जातीत काही गुणदोष असतात हे मान्य! मात्र त्यामुळे एखाद्या जातीचा टोकाचा द्वेष करणे आणि त्यांच्या ‘कत्तली करा’, त्यांच्या ‘बायका पळवून आणा’ अशा घाणेरड्या वल्गना करून समाजस्वास्थ्य खराब करणे हे समाजातील वाढत्या अराजकतेचे लक्षण आहे. आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत ब्राह्मणांनी दिलेले योगदान दुर्लक्षून चालणार नाही. समाज ‘भटमुक्त’ करण्याचा विडा उचलणार्या फुरफुरत्या घोड्यांना आवरले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या राष्ट्राला भोगावे लागतील.
गांधीहत्येनंतर देशात ब्राह्मणविरोधी लाट निर्माण झाली. अनेकांच्या कत्तली झाल्या, घरे जाळली गेली. त्यावेळी ब्राह्मण समाज शेतीपासून दुरावला गेला. आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत. ब्राह्मणांची संख्यात्मक वाढ कमी होणं हे कशाचं द्योतक आहे? 1948 नंतर ज्या गावात ब्राह्मण राहिले तेथील शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, हे कोण नाकारणार? त्यांच्या घरी वृत्तपत्रे यायची. बहुजन आणि मराठा समाजातील बांधव ते वाचण्याचा प्रयत्न करायची. ब्राह्मण समाजातील मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी जायला लागली. समाजातील इतर बांधवांनीही त्यांचे अनुकरण करून आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवले. मात्र त्यानंतर होत गेलेले सामाजिक बदल मन व्यथित करणारे आहेत.
1970-75 च्या दरम्यान शासकीय सेवा, बँका, एलआयसी, शिक्षण संस्था, न्यायालय अशा ठिकाणी नोकर्या करणारे ब्राह्मण साधारण सत्तर टक्के होते. नव्वदच्या दशकात हाच आकडा अक्षरशः वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आला. सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ब्राह्मणांनी नोकर्या सोडल्या आणि अतिशय जिद्दीने, चिकाटीने विविध उद्योगधंद्यात यश मिळवले. गुणवत्तेच्या बळावर यश मिळू शकते आणि ते टिकू शकते यावर विश्वास असल्याने त्यांनी शक्य होतील ते उद्योग केले. अगदी हॉटेल चालविण्यापासून तेे केशकर्तनालयापर्यंत कोणताही व्यवसाय आपल्याला वर्ज्य नाही, हे त्यांनी कृतितून दाखवून दिले. आज कोल्हापुरात अभ्यंकरांची चप्पल प्रसिद्ध होते किंवा डी. एस. कुलकर्णी यांच्यासारखा यशस्वी उद्योजक बहुजन समाज पक्षाकडून निवडणुक लढवतो यावरून ब्राह्मण समाजाने कष्ट करताना कोणताही व्यवसाय अथवा पर्याय निषिद्ध मानला नाही, हे सिद्ध होते.
ब्राह्मण समाज शासकीय नोकर्यांपासून दूर गेला आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्ष्यवेधी वाढले, असा जर निष्कर्ष कोणी काढला तर आश्चर्य वाटू नये. न्यायालयातील ब्राह्मण आणि जंगम (स्वामी) आज कुठे गेले? या व्यवस्थेने त्यांना कसे सामावून घेतले? जातीचे राजकारण करणार्या काहींनी इथलं सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अशा पद्धतीनं विकसित केलं की त्यांना बाहेर पडण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. प्रत्येक व्यवसायात ब्राह्मणांनी आपली कर्तबगारी दाखवून दिली. किर्लोस्कर, कल्याणी, गरवारे, डी.एस.के. हे उद्योजक संघर्षातून पुढे आले.
स्वतःच्या ताकतीवर उद्योगधंदे करणार्यांसाठी इथल्या व्यवस्थेने कोणती धोरणे आखली? ‘इथे नकोच, इथे आपल्याला न्याय मिळणार नाही’ अशी भावना निर्माण झाल्याने अनेकांनी देश सोडला. विविध नामवंत कंपन्यात व्यवस्थापकीय पदावरच्या नोकर्या मिळवून स्वतःच्या कुटुंबाची प्रगती साधली. देशाविषयी त्यांना काही वाटत नव्हते, अशातला भाग नाही. मात्र ‘इथल्यापेक्षा तिथं सुरक्षित’ असं वाटल्याने पुण्या-मुंबईसारख्या शहरातील अनेक कुटुंबे परदेशात स्थायिक झाली. यातूनच आर्थिक सुबत्ता असलेली पिढी निर्माण झाली; पण या मातीशी असलेली नाळ तुटत चालल्याने समाजाला ब्राह्मणांच्या कर्तबगारीचा लाभ घेता आला नाही.
आजही ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणात ते नाईलाजाने महाराष्ट्र सोडून गेले तर राज्याच्या प्रगतीस खिळ बसू शकेल, हे वास्तव आहे. आज सांस्कृतिक आणि वृत्तपत्र क्षेत्राचा विचार केला तरी बहुतेक माध्यमांत मारवाडी मालक आहेत आणि ब्राह्मण संपादक आहेत. समाज घडविणारे बहुतेक साहित्यिक ब्राह्मण आहेत. हा मक्ता ब्राह्मणांकडेच नाही; सर्व क्षेत्रात सर्व जातीधर्मातील लोक पुढारलेले आहेत; मात्र ब्राह्मणद्वेषातून वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण करणारे समाजात फूट पाडत आहेत.
आज राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, आर.पी.आय., बहुजन समाज पक्ष अशा सर्व विचारधारांच्या सर्व पक्षात ब्राह्मण लोक सामावलेले आहेत. मात्र काकासाहेब गाडगीळ आणि वसंतराव साठे यांच्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचे राजकीय नेतृत्व खर्याअर्थी संपले असे वाटते.
महाराष्ट्रातील दूरदृष्टीचे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ब्राह्मणांची क्षमता ओळखली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी यांना सांस्कृतिक क्षेत्रात पुरेशी संधी देऊन त्यांनी ही बाब कृतितून दाखवून दिली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्राह्मणांनी मोलाचं योगदान दिल, गुणवत्तापूर्ण दलित साहित्याचं कौतुक ब्राह्मणांनी केलं, स्त्रियांसाठी चळवळी त्यांनीच उभारल्या, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यात पुढाकार घेतला, श्री. म. माट्यांसारख्या व्यक्तिने तर जातीची बंधने केव्हाच झुगारून दिली होती! हे सर्व करताना ब्राह्मणांनी आपण ‘ब्राह्मण’ आहोत, असा बागुलबुवा कधीही केला नाही. किंबहुना ‘जात’ हा विचार त्यांच्या मनासही शिवला नाही. मात्र तरीही आज ब्राह्मणद्वेषाचे राजकारण करण्यात येत आहे.
प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक जातीत भलेबुरे असणारच पण त्याचे खापर आजच्या ब्राह्मण समाजावर फोडून जातीच्या राजकारणाला खतपाणी घालणार्यांना आवरावे. हा लेख ब्राह्मणांची थोरवी गाण्यासाठी, त्यांची बाजू घेण्यासाठी किंवा कुणाला तरी विरोध करण्यासाठी नाही; मात्र दादोजी कोंडदेवांचे प्रकरण असेल किंवा सध्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह. मो. मराठे असतील; अशा निमित्ताने ब्राह्मण समाजाला सातत्याने डिवचल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची, भीतीची भावना निर्माण झाली आहे. स्वसंरक्षणासाठी म्हणून या समाजाने काही भूमिका घेतली तर त्यात राज्याचेच अहित आहे, या वास्तवाचा विसर पडू नये!
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२