Monday, January 18, 2021

मनोहरी नौटंकी


शाळेत दाखल झाल्यावर आम्हाला पाटीवर आधी सरस्वतीमातेचं रेखाटन काढायला लावायचे. विद्येची देवता म्हणून सरस्वतीमाता त्या वयातच आराध्य बनली. त्यानंतर कळत्या वयात त्रावणकोर घराण्यातील चित्रकार राजा रवीवर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांच्या काढलेल्या चित्रांची ओळख झाली. त्यातही प्रकाशनक्षेत्रात कार्यरत असल्यानं असेल पण सरस्वतीमातेच्या दरबारातील उपासकांविषयीही कमालीचा आदर वाटू लागला. मराठीत यशवंत मनोहर नावाचे एक कवी आणि लेखक आहेत. विदर्भ साहित्य संघानं त्यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार जाहीर केला होता. ‘धार्मिक प्रतिकं व्यासपीठावर नको’ म्हणून त्यांनी तो नाकारला. साहित्य संघाच्या पदाधिकार्‍यांनी मात्र त्यांचा स्वाभिमानी बाणा दाखवत ‘आमची ही परंपरा आहे आणि सरस्वती मातेची प्रतिमा व्यासपीठावर असेलच’ अशी भूमिका घेतली. हे सगळं पाहताना वाटलं की, लहानपणी शाळेत सरस्वतीचं चित्र पाटीवर रेखाटूनही ती सर्वांनाच प्रसन्न होते असं नाही. मनोहरांसारखे काही लोक विद्येपासून वंचित राहतात. मग विदर्भ साहित्य संघानं त्यांना पुरस्कार जाहीर करण्याची जी चूक केली ती खुद्द मनोहरांनीच दुरूस्त केली असं माझ्यासारख्या श्रद्धावान माणसाला वाटणं अपरिहार्य आहे.


खरंतर आपल्या देशातच नाही तर जगातही अशी अनेक प्रतिकं आहेत. त्यामुळं समाज एकसंघ राहण्यास मदत होते. सरस्वतीचा फोटो हे धार्मिक प्रतिक वाटत असेल तर मग त्याठिकाणी चांद तारा, भगवान महावीर, येशू ख्रिस्त यांचे फोटो ठेवायचे होते का? त्या-त्या संस्थेची काही धोरणं असतात आणि आपण ती मोठ्या मनानं मान्य करायला हवीत. जर यशवंत मनोहर नावाच्या कुण्या लेखकाला सरस्वतीचा इतकाच द्वेष वाटतो तर त्यांनी आधी शाळेतून सरस्वतीपूजन हद्दपार व्हावं यासाठी एखादी चळवळ राबवणं गरजेचं होतं. तसं काहीही न करता केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ करायचा आणि आपण फार काही वेगळं करतोय, वागतोय अशा आविर्भावात रहायचं हे म्हणजे निव्वळ ढोंग आहे. लेखकांनी-कवींनी समाज जोडण्याचं काम करायला हवं. मात्र अशा वर्तनातून ‘तुकडे तुकडे गँग’ला प्रोत्साहनच मिळतं. देश जोडण्याऐवजी तोडणार्‍याला प्रतिभावंत तरी कसं म्हणावं?


भारतीय संस्कृती ही परंपरेतून चालत आलीय. त्यातून काही प्रतिकं निर्माण झालीत. एखाद्याच्या जिभेवर सरस्वती आहे, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो ज्ञानी, व्यासंगी असतो असं आपल्याला अभिप्रेत असतं. ही प्रतिकं आपल्याकडं प्रत्येक धर्मात तर आहेतच पण अगदी जात-धर्म याचा फारसा गंध नसलेल्या अनेक आदिवासी-दुर्गम जमातीतही प्रतिकं वापरली जातात. त्यांच्यासाठी काही प्रतिकं शुभ आहेत तर काही अशुभ. त्यावर त्यांची श्रद्धा मात्र आहेच आहे. 


विदर्भ म्हटले की आमच्या डोळ्यासमोर संत गाडगेबाबा येतात. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असं म्हणणार्‍या गाडगेबाबांनाही तुम्ही बहिष्कृत करणार का? इरावती कर्वे यांनी पंढरीच्या विठ्ठलाला सर्वात मोठा ‘मानसोपचारतज्ज्ञ’ म्हटलं होतं. वारकर्‍यांच्या या श्रद्धा, त्यांची प्रतिकं हेही तुम्ही नाकारणार का? नाण्यावर अशोकस्तंभ असणं किंवा नोटावर महात्मा गांधींचं चित्र असणं यावरही तुमचे आक्षेप आहेत का? एखादं नाटक सुरू होताना ‘नाट्यदेवता, रंगभूमी आणि रसिक-प्रेक्षकांना विनम्र वंदन करून सादर करीत आहोत...’ असं यापुढे कोणी म्हटलं तर ‘नाट्यदेवता’ हे धार्मिक प्रतिक म्हणून त्यावरही बहिष्कार टाकणार का? 


तुम्हालाच पुरस्कार का द्यायला हवा? तुमच्या साहित्याचा दर्जा काय? तुमची योग्यता काय? महाराष्ट्रभर किती लोकांना तुमचं साहित्य माहीत आहे? अशा कोणत्याही गोष्टीत आम्हाला पडायचं नाही. त्या सर्व बाजूला ठेवून विचार केला तरी विदर्भ साहित्य संघानं तुम्हाला पुरस्कार मागच्या महिन्यातच जाहीर केला होता. आपण फार मोठे पुरोगामी आहोत अशा थाटात तुम्ही तो नाकारला. त्याऐवजी विनम्रतेनं हा पुरस्कार स्वीकारत आपण सरस्वती किंवा अन्य कोणत्याही प्रतिमा-प्रतिकांविरूद्ध तुमच्या कवितांतून, ललितबंधातून, अन्य साहित्यप्रकारातून तुटून पडला असता तर निदान थोडंफार प्रबोधन तरी घडलं असतं. 


सरस्वतीमातेमुळं कोणताही जातीय संघर्ष निर्माण होत नाही, धार्मिक संघर्ष निर्माण होत नाही, समाजात फूट पडत नाही, तेढ निर्माण होत, दंगली उसळत नाहीत किंवा स्फोटही घडत नाहीत. मग साहित्यिकांनी सामंजस्याची, समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी असा भेद निर्माण करून दरी वाढवणं हे कितपत योग्य आहे? एखाद्या मुस्लिम कुटुंबात आपण जेवायला गेलो तर त्यांनी शिरकुरमा ऐवजी पुरणपोळी का केली नाही म्हणून आपण त्यांच्याशी वाद घालत नाही. एखाद्या बौद्ध स्तुपात गेल्यानंतर तिथं आरतीचं ताट का नाही आणि आरती का म्हणायची नाही म्हणून आपण कुणाला जाब विचारत नाही. एखाद्या मंदिरात प्रसाद म्हणून मांसाहरी जेवण का मिळत नाही असा प्रश्न करून काही उपयोग नाही. त्या त्या ठिकाणचे ते रीतिरिवाज असतात. कवी हा संवेदनशील, इतरांच्या भावनांची कदर करणारा असतो असे म्हणतात. मग पुरस्कार नाकारून या वयात यशवंत मनोहर यांनी नेमका कोणता संदेश साहित्य क्षेत्राला दिला? कवींनाच जर समाजात सामंजस्य निर्माण करायचं नसेल तर आग लावा तुमच्या साहित्याला. 


एखाद्या पाहुण्याचं जेवणाचं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं आणि तिथं जाऊन हाच पदार्थ का केला, म्हणून त्याच्याशी भांडत बसलात तर ती तुमची विकृती असते. त्या-त्या संस्थेचे जे अधिकाराचे विषय असतात त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नसतो. मनोहर म्हैसाळकर यांच्यासारखा आयोजक असताना ते त्यांच्या परंपरा पाळूनच कार्यक्रम पार पाडतील इतकंही सामान्यज्ञान तुमच्याकडं नव्हतं का? एखाद्या राजकारण्यानं, अभिनेत्यानं, प्रसिद्धीलोलूप माणसानं अशी नौटंकी केली असती तर एकवेळ दुर्लक्ष केलं असतं पण यशवंत मनोहर यांच्यासारख्या लेखकानं अशी ड्रामेबाजी करणं हे त्यांना न शोभणारं आहे. ज्याला कवीचं मन आणि कवीचं अंतःकरण लाभलेलं आहे असा कोणताही विचारी माणूस असं काही करणार नाही. तुमच्यातला कवी जिवंत आहे की मेलाय हे तपासण्याची वेळ आता आलीय.


जी प्रतिकं सर्वमान्य आहेत आणि काळाच्या ओघात टिकलेली आहेत, ज्यापासून कुणाला कसलाही त्रास नाही आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही त्या प्रतिकांवर-प्रतिमांवर प्रेम केलं तर बिघडलं कुठं? 


ख्रिश्चन धर्मात काही प्रतिकं आहेत. लिओनार्दो दा विंचीचं मोनालिसानंतर जगातलं दुसर्‍या क्रमांकाचं जे चित्र आहे ते म्हणजे ‘द लास्ट सपर.’ पूर्ण धार्मिक प्रतिमा असलेलं हे चित्र आहे. त्यात येशू ख्रिस्त निवडक शिष्यांना घेऊन मेजवानी देत आहेत. मग धार्मिक प्रतिक म्हणून ते चित्रही रद्द करायचे का? त्यावर संशोधकांनी आजवर शेकडो पानं लिहिलीत. जागतिक साहित्य आणि जागतिक कला ही प्रतिकांना  किंमत देते, त्यांचा सन्मान करते. मराठी साहित्य जागतिक स्तरावर न जाण्यात असे फडतूस वाद कारणीभूत ठरतात. जागतिक साहित्य, कला, चित्रे, शिल्पे, इतिहास अशांचा अभ्यास नसणारी अर्धवट माणसेच असे वाद निर्माण करू शकतात.


यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा जपली गेले असेच आम्हाला वाटते.
- घनश्याम पाटील
7057292092 

36 comments:

  1. वा क्या बात है!सडेतोड लिहलय पाटील सर! अत्यंत सुंदर, ओघवती पण धारदार भाषा कविमनाला स्पर्शून गेली!👌👍💐

    ReplyDelete
  2. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा विचार आहेत. या लेखामुळे मनोहरांचे डोळे उघडतील की नाही ते सांगता येणार नाहीत परंतु पुढे कुणी जिवंत मनाचा साहित्यिक असे वाटते. एखाद्या व्यक्तिला पुरस्कार मिळाल्याने त्या पुरस्काराची शान वाढते असे म्हणतात परंतु या लेखाच्या शेवटी यशवंतांनी पुरस्कार नाकारल्याने त्या पुरस्काराची प्रतिष्ठा जपल्या गेलीय हे लिहून पाटलांनी एक सत्य अधोरेखित केले आहे.

    ReplyDelete
  3. अतिशय मार्मिक आणि मर्मदृष्टी असलेली ही प्रतिक्रिया प्रगल्भ मनाचं एक थोर उदाहरण आहे.

    ReplyDelete
  4. अगदी.... दाखलेही मस्त . सडेतोड ....

    ReplyDelete
  5. जबराट लेख
    बंधू आपण सडेतोड भूमिकेसाठी तसेही प्रसिद्ध आहातच

    ReplyDelete
  6. घनशामजी माफ करा. पण वरील तर्क बोथट आहेत

    १. मुस्लिमाच्या घरी जेवायला जाताना
    जेवण शाकाहारी की मांसाहारी याची किमान चौकशी दोघेही करतात. शाकाहारी असलेल्या माणसाला मांसाहार खाऊ घालणारे कोणीही दिसले नाही. विदर्भ साहित्य संघाने पुरस्कार देताना खाणाऱ्याचा आहार व स्वतःची पंगत याचा विचार केला नाही.

    २. बौद्ध स्तुपात समजा हिःदू माणूस गेलाच तर तो तेथे आरती करण्याचा कुजकटपणा करणार नाही. त्याला एवढे समजते की आरती मःदिरातच होते. पण देवाच्या मंदिरात पुजाऱ्या बोलवायचे सोडून भन्तेला बोलावून आरती म्हण असा आग्रह विदर्भ साहित्य संघाने केला आहे.

    ३. मंदिरात मांसाहार प्रसाद का नाही असाही विवाद कोणीही घालत नाही. प्रसाद म्हणून काय द्यायचे ? हे देणारा ठरवतो. भक्ताच्या अपेक्षेने प्रसाद देण्याची परंपरा अजून तरी कोणत्या मंदिरात नाही. आणि हो विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार म्हणजे प्रसाद नाही, यशवंत मनोहर हे मंदिराचा प्रसाद खाणारे भक्त तर मुळीच नाही.

    विदर्भ साहित्य संघाने आपली चादरजागा पाहून पसरायला हवी होती. यशवंतमनोहर यांच्याशी नीटपणे संवाद करायला हवा होता.

    ReplyDelete
    Replies
    1. क्र २ शी सहमत आहे. दोन्ही बाजूंनी तुटेपर्यन्त ताणले, की असेच होणार.

      Delete
    2. तिवारीजी मनोहर सरांशी विदर्भ साहित्य संघाने संपर्क केला नाही असं आपणास म्हणायचं आहे का? वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मनोहर सर स्वतः या संघाच्या कार्यकरिणीवर सहा वर्षे सदस्य होते.त्यामुळे त्यांना संघाच्या प्रथा, परंपरा यांची माहिती नसेल अस आपण कसं मानावं ? शिवाय एक महिना आधी हे निमंत्रण दिले गेले होत.

      Delete
    3. वाह वाह.. म्हणा....मग टोळी तयार होते..या टोळीच्या विरोधात बोलले की मग ..आक्रमण...ठरलेले आहे...मनोहरंचा निषेध केला ...की आत्मा शांत होतो..घनश्याम तिवारीजी उगीच या भानगडीत पडू नका..हो ला हो लावा .प्रत्येकाला आपली भुमिका मांडण्याचा अधिकार आहे ही कल्पना सहा वर्षापूर्वीच नष्ट झाली आहे हे कदाचित आपल्याला माहीत नसेल .जाऊ द्या आणि आनंदात रहा... श्रीकांत पवनीकर

      Delete
    4. यशवंत मनोहर यांचे बरोबर आहे. कारण जी मूल्ये घेऊन आयुष्य जपले त्याला जर तडा जात असेल तर पुरस्कार स्वीकारण्याचा अर्थ नव्हता.

      Delete
    5. धर्मांतरानंतर दोन समाजांच्या मध्ये पडलेली दरी वाढली तरी चालेल, पण तत्वनिष्ठा मुळीच सोडता कामा नये. यशवंत मनोहरांसारख्या साहित्यिकाने विद्रोहाची आग धगधगत ठेवलीच पाहिजे. त्यात काय जळलं, कोण जळलं या फालतू गोष्टींचा विचार त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाने अजिबात करू नये. पाण्याऐवजी तेलाचे डबे घेऊन फिरण्यातच त्यांच्या साहित्यसेवेचं सार्थक आहे. सामाजिक बांधिलकी नावाचा प्रकार फक्त एका विशिष्ट समाजासाठीच राबवला पाहिजे. त्यात सर्वसमावेशकता आणून चालणार नाही. शोषणकर्त्यांनी हजार वर्षे गाय मारली असेल तर शोषितांनी पुढची किमान दोन हजार वर्षं वासरं मारलीच पाहिजेत. तो त्यांचा घटनाधिष्ठीत अधिकारच आहे. त्याशिवाय सवर्णांना अद्दल घडणार नाही. साक्षात बुद्ध जरी आडवा आला तरी आयुष्यभर जी मूल्ये सांभाळली ती जपण्यासाठी त्याचीही गय करता कामा नये. विद्रोह चिरायू होवो !

      Delete
  7. अप्रतिम सर......सडेतोड....एका प्रवृत्तीची तोडफोड केल्याबद्दल आपले अंतःकरण पूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  8. वास्तव मांडलंय..जबरदस्त लेख!

    ReplyDelete
  9. कुठलाही अतिरेक हा त्याज्यच असतो/असावा। या प्रकरणी मनोहरांची वागणूक(!) माझ्यासारख्या त्यांच्या प्रशंसक वाचकालाही अतिरेक करणारी वाटली। जोडणे हे साहित्यिकाचे कर्तव्य मानले,तर ही कृती'जोडणारी-पैकी'आहे काय, याचा प्रत्येकाने स्वशोध घेणेच श्रेयस्कर!

    ReplyDelete
  10. घनःशाम पाटलानीं या लेखाद्वारे जबरदस्त ' चपराक ' देऊन , मनोहरजींची जागा दाखविली आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर... आणि समर्पक. निर्लज्ज मनुष्याला जरा जोरात थोबाडीत दिली पाहिजे. तरच लागते.

      Delete
  11. मस्त लेख.हे भ्रष्ट पुरोगामी लोक आहेत. यांचा अजेंडा हा एका पक्षाचा अजेंडा आहे. यांच्या डोक्यात स्वतःचा मेंदू असा नाही. आणि असेल तर तो जीवशास्त्रीय दृष्ट्या असेल. त्यांचा विवेक झोपा काढतो आणि मेंदू स्थूल झाला आहे.कारण ते गुलामी करतात एका पक्षाची,त्यांच्या विचारांची. मस्त लेख. ही मंडळी सगळी भोंदू आहेत. फक्त चांगली कपडे घालतात,राहतात म्हणून यांना आपण भोंदू न म्हणावे असे काही नाही.

    ReplyDelete
  12. मस्त लेख.हे भ्रष्ट पुरोगामी लोक आहेत. यांचा अजेंडा हा एका पक्षाचा अजेंडा आहे. यांच्या डोक्यात स्वतःचा मेंदू असा नाही. आणि असेल तर तो जीवशास्त्रीय दृष्ट्या असेल. त्यांचा विवेक झोपा काढतो आणि मेंदू स्थूल झाला आहे.कारण ते गुलामी करतात एका पक्षाची,त्यांच्या विचारांची. मस्त लेख. ही मंडळी सगळी भोंदू आहेत. फक्त चांगली कपडे घालतात,राहतात म्हणून यांना आपण भोंदू न म्हणावे असे काही नाही.

    ReplyDelete
  13. व्वा ...सर..अगदी मनातलं बोललात...एकदम जबरदस्त... सोदाहरण ...खूपच आवडला लेख...ही चपराक गरजेचीच आहे...👌💐👍

    ReplyDelete
  14. अहो काय बोलताय?
    मनोहरांनी योग्य तेच केलं.
    त्यांनी पुरस्कार नाकारला नसता तर इतकी प्रसिद्धी (?(तीही फुकट)) पुरस्कार स्वीकारून तरी मिळाली असती का?
    बाकी ज्यांना कणाच नाही त्यांना भूमिका कुठून असणार?

    कोण लेकाचा सत्याचा विचार करतोय?
    आम्हाला फक्त प्रसिद्धी हवीय?(at any cost.)😀😀

    ReplyDelete
  15. मनोहर नाव ही बदला म्हणावं ,ते त्यांच्या आई-बाबानी ठेवलेलं भगवान कृष्णाचं नाव आहे. मग काय कराल कवी महाराज? कवि असून जर सरस्वती देवी चा इतका तिटकारा असेल तर अश्या निर्बुद्ध माणसाला कोणीही पुरस्कार देऊच नये. त्या माणसाची ती लायकीच नाही. स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणार्या या महाशय ची माझ्या मते बुद्धि भ्रष्ट झालेली वाटतय. असो. अश्या माणसाची पुरस्कार न देऊन संयोजकाने पुरती फजिती केली हे बरे झाले.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर, शहाणे म्हटलं तर दीडशहाणे बनतात.

      Delete
  16. हिंदीत तर साहित्याची निर्मिती करणाऱ्यांना सारस्वत म्हणतात. म्हणजे सरस्वतीचे शिष्य, अनुयायी, भक्त. अथवा सरस्वतीची मुलेच म्हणू.मग ते कुठल्याही जातीधर्माचे असोत. सारस्वत म्हणवून घेणे ही सुध्दा अभिमानाची गोष्ट आहे.पुरस्कार हे साहित्याच्या निकषावरच ठरावेत. साहित्य संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिला यासाठी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. कारण साहित्य आणि विद्या या गोष्टी कुठल्याही जाती-धर्माची खाजगी संपत्ती नव्हे. शिवाय प्रतीके ही संस्कृतीतून जन्माला आलेली असतात.

    ReplyDelete
  17. मनोहरांनी इतकी हयातभर जी साहित्य निर्मिती केली ती फळाला न आल्याने कदाचित हा स्टंट केलेला दिसतोय. आपण त्यांना झणझणीत चपराक दिली आहे , अर्थात ते या वयात सुधारण्याची शक्यता नाहीच.

    ReplyDelete
  18. संकुचित विचारांच्या यशवंत मनोहर याला पुरस्कार द्यायलाच नको होता. दैवाने योग्य तेच घडले.

    ReplyDelete
  19. हल्ली आपण जिथे राहतो जिथले खातो जो समाज आपल्या ला सन्मान देतो त्यांच्या सांस्कृतिक प्रतीकांचा अपमान करणे म्हणजे पुढारलेले आहोत असा समज वाढत चालला आहे याचं विचारांचा पगडा मनोहर यांच्यावर पडला आहे असे वाटते
    आणि इथली संस्कृती आवडत नसेल तर जा मग पाकिस्तान मध्ये आणी दाखवा आपले पुरोगामीत्व

    ReplyDelete
  20. अतिशय सुंदर लेख. एका राजकीय आकांक्षेपोटी आणि विशिष्ट धर्मद्वेष नसानसांत भरलेलला असल्यामुळे हे घडणे स्वाभाविक आहे. यांना फक्त हिंदू धर्मातील प्रतिमा प्रतिकांचा तिटकारा आहे. इतर धर्मातील प्रथा परंपरा आणि प्रतिमा, प्रतिकांवर टुकार शब्द बोलायला जीभ उचलत नाही यांची.

    ReplyDelete
  21. प्रत्येकाला स्वतःच्या भावना आहेत. त्यांच्या मनात शिरून त्या भावनांना नकारण्याचा अधिकार कोणालाच नसतो. कवी साहित्यिक हे तर भावनेने विचार करणारे. सह + अनुभूती हे त्यांचे वैशिष्ट्य, सार्वजनिक रित्या या वैशिष्ट्यलाच धक्का लागलेला आहे. अतिउत्तम लेख

    ReplyDelete
  22. विचारी नाही तर विकारी मनोवृत्ती आहे यांची. विकारजंत.

    ReplyDelete
  23. काळाआड जात आहोत अशी अनुभूती झाली असावी, त्यामुळे चर्चेत येण्यासाठी केला स्टंट असावा

    ReplyDelete
  24. काळाआड जात आहोत अशी अनुभूती झाली असावी, त्यामुळे चर्चेत येण्यासाठी केला स्टंट असावा

    ReplyDelete
  25. धर्मांतरानंतर दोन समाजांच्या मध्ये पडलेली दरी वाढली तरी चालेल, पण तत्वनिष्ठा मुळीच सोडता कामा नये. यशवंत मनोहरांसारख्या साहित्यिकाने विद्रोहाची आग धगधगत ठेवलीच पाहिजे. त्यात काय जळलं, कोण जळलं या फालतू गोष्टींचा विचार त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाने अजिबात करू नये. पाण्याऐवजी तेलाचे डबे घेऊन फिरण्यातच त्यांच्या साहित्यसेवेचं सार्थक आहे. सामाजिक बांधिलकी नावाचा प्रकार फक्त एका विशिष्ट समाजासाठीच राबवला पाहिजे. त्यात सर्वसमावेशकता आणून चालणार नाही. शोषणकर्त्यांनी हजार वर्षे गाय मारली असेल तर शोषितांनी पुढची किमान दोन हजार वर्षं वासरं मारलीच पाहिजेत. तो त्यांचा घटनाधिष्ठीत अधिकारच आहे. त्याशिवाय सवर्णांना अद्दल घडणार नाही. साक्षात बुद्ध जरी आडवा आला तरी आयुष्यभर जी मूल्ये सांभाळली ती जपण्यासाठी त्याचीही गय करता कामा नये. विद्रोह चिरायू होवो !

    ReplyDelete