Tuesday, September 19, 2017

कृतघ्न नको; कृतज्ञ राहा!


राजकारणात कुणी आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’ ठरतात आणि दुसर्‍या पक्षातून आपल्या पक्षात आले तर ते त्यांचे ‘हृदयपरिवर्तन’ असते! 

हा नियम खरे तर आता प्रत्येक क्षेत्रात लागू पडतोय. त्यासाठी राजकारणच कशाला हवेय?

माणूस इतका स्वार्थी झालाय की तो प्रत्येक घटनेचा, कृतीचा, निर्णयाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून मोकळा होतो. बोलीत आणि करणीत इतकी मोठी दरी निर्माण झालीय की आयुष्य विसंगतीनेच व्यापून गेलेय.

हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यातील नितेश राणेंचे विधान! 

कोण आहेत हे नितेश राणे?

तर त्यांची स्वतःची अशी काही विशेष ओळख नाही. त्यांचे तीर्थरूप, महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते सु(?)पूत्र! राणे कुटुंबातील सदस्य इतर राजकारण्यांप्रमाणेच अधूनमधून वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. नाहीतर अशा उपटसुंभांना कोण विचारणार?

तर त्याचं झालं असं, की या राणेपुत्रानं, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आव्हान दिलंय...! 
काय आव्हान आहे? तर ‘तुम्ही एकटे बाहेर फिरून दाखवा...’

बाबासाहेबांचे सध्या वय आहे, शहाण्णव! 
राणे पितापुत्रांचे वय एकत्र केले तरी ते इतके व्हायचे नाही! असो.

तर या निमित्तानं आम्हाला काही वर्षापूर्वीची एक घटना पुन्हा आठवली.

श्रीपाल सबनीस नावाचे एक गृहस्थ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे होते. त्यावेळी ‘सनातन’चे वकील असलेल्या पुनाळकरांनी त्यांना सल्ला दिला होता की, ‘‘रोज मॉर्निंग वॉकला जात जा...’’ 

त्यावरून प्रचंड गहजब माजला. निखिल वागळेसारख्या पुरोगामी पत्रकारांनी त्या विधानावर खास ‘शो’ केले. त्यात अनेकांनी पोपटपंची केली. सगळ्यांना म्हणे ती खूप मोठी धमकी वाटली.

ऍड. पुनाळकरांचे म्हणणे होते, ‘‘श्रीपाल सबनीस यांना मी कधी भेटलो नाही. त्यांच्याशी माझा परिचयही नाही, पण ते संमेलनाध्यक्षपदासाठी उभे आहेत. वृत्तपत्रात, वाहिन्यांवर त्यांचा चेहरा बघितला. प्रत्येकवेळी ते खूप गंभीर दिसतात. आमच्या कोकणात पोट साफ होत नसेल तर असे विकार होतात असे मानले जाते. अशावेळी आम्ही सांगतो, ‘जरा मॉर्निंग वॉकला जात जा.’ त्याने अशा व्याधी कमी होतात. पोट साफ झाल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. त्याच्याकडे बघून समोरच्याला आनंद मिळणे राहू द्या पण किमान दिवस खराब जात नाही. माणूस ‘मंद आणि मठ्ठ’ वाटत नाही. ते साहित्यक्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक लढवत असल्याने त्यांना हा प्रेमाचा सल्ला दिला.’’

पण हे विधान कुणाला कळले नाही किंवा पुनाळकरांचा प्रामाणिक उद्देशही कुणी ध्यानात घेतला नाही. जमाते पुरोगामींची फौज रस्त्यावर उतरली. सबनीसांनी ‘सामुहिक मॉर्निंग वॉक’ केले. 
वर ‘इथून पुढे मी रोज ‘सकाळी’ मॉर्निंग वॉकला जाणार’ असेही  विनोदी विधान केले. त्यांचा तो संकल्प किती दिवस टिकला हे माहीत नाही, मात्र त्यावरून प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेक दिवस चवीने चघळला होता.

हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यावेळीही हे नितेश राणे सबनीसांसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या कुमठेकर रस्त्यावरील निवासस्थानी जाऊन त्यांनी सबनीसांना ‘धीर’ दिला होता. ‘पुरोगामी महाराष्ट्रात अशा धमक्या सहन करणार नाही' असे म्हणत त्यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक शो’ही केला होता. सबनीसांनी त्यांच्या सवयीप्रमाणे नितेश यांचा शाल घालून सत्कार केला होता आणि त्यांना ‘मानलेला’ मुलगाही जाहीर केले होते. हेच नितेश राणे आता बाबासाहेबांना एकटे फिरण्याची धमकी देत आहेत आणि सबनीसांसारखे सगळे तथाकथित लेखक त्याविरूद्ध ब्रही काढत नाहीत. जमाते पुरोगामींच्या फळीतील पत्रकारांना यावर चर्चा घडवावी वाटत नाही, कारण बाबासाहेब अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत. 

बाबासाहेबांवर टीका केल्याने त्यांचे योगदान कमी होणार नाही. शिवचरित्रासाठी समर्पित आयुष्य घालणारे इतके त्यागी दुसरे व्यक्तिमत्त्व दाखवा. बाबासाहेब या वयातही शिवकालच जगतात. त्यांचा तो ध्यास आहे, श्वास आहे. ज्यांना शिवचरित्रावर काही करावेसे वाटते त्यांनी इतके निरोगी आणि समाधानी दीर्घायु जगावे. हे काम व्रत म्हणून स्वीकारावे. बाबासाहेब कुठे कमी पडलेत असे वाटत असेल किंवा त्यांनी काही चुकीचे लिहिलेय असे वाटत असेल तर संशोधनातून, अभ्यासातून ते खोडून काढावे. मात्र त्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्याला चिंतन लागते. गड, कोट, किल्ले पालथे घालावे लागतात. घरदार सोडून सातत्याने भ्रमंती करावी लागते. डोळ्यात तेल घालून इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. हजारो-लाखो कागदपत्रे वाचावी लागतात, अभ्यासावी लागतात. त्यासाठी भाषेचाही अभ्यास लागतो. नितेश यांच्यासारख्या कुणालाही बाबासाहेब चुकीचे वाटत असतील तर त्यांनी पोकळ धमक्या देण्याऐवजी हे करून दाखवावे. त्यातून प्रत्येकाला आपली ‘उंची-खोली’ लक्षात येईल. काहीच नाही झाले तर किमान श्रीमंत कोकाटेसारखा ‘विनोदी’ इतिहास तरी लिहावा. ‘शिवाजी’ या नावातच इतकी जादू आहे की त्यांच्याविषयी काहीही काम केले तरी त्या माणसाच्या आयुष्याचे सोनेच होते. नाहीतर कोकाटेसारखी माणसे महाराष्ट्राला कळली तरी असती का?

शिवाजीराजांचा पराक्रम समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी एक पायवाट तयार केलीय. भविष्यात त्या वाटेवरून कुणी गेले तर आनंदच आहे. मात्र केवळ टीका-टिपन्नी करून अशा विषयात राजकारण साधता येत नाही. एकेकाळी शिवसेनेसोबत संसार करताना हेच राणे कुटुंबिय बाबासाहेबांना ‘दैवत’ मानत. खुद्द नितेश राणे यांनीच बाबासाहेबांचे ‘आशीर्वाद’ घेतानाचे फोटो ट्विट केले होते. आता त्यांचा घटस्फोट झालाय. आता कॉंग्रेसबरोबरही त्यांचा घरोबा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे त्यांना होऊ घातलेल्या नव्या कुटुंबातले नियम, रूढी, परंपरा जपाव्या लागतात. नवर्‍याची खप्पामर्जी होईल असे काहीही करण्यास कोणतीही बायको सहजासहजी धजावत नाही.  ती आवडती असेल, नावडती असेल... पण तिला आपले पातिव्रत्य दाखवून देण्यासाठी धडपड करावीच लागते. नितेश यालाही अपवाद ठरले नाहीत. त्यांच्या तीर्थरूपांची राजकीय ससेहोलपट होत असली, घुसमट चालू असली तरी हा मांडलेला ‘संसार’ तर टिकवायला हवाच! म्हणून तर मग बाबासाहेबांसारख्या तपस्वी माणसांवर काहीबाही बोलण्याचे धाडस करावे लागते. नाहीतर त्यांना त्यांची स्वत:ची योग्यता माहीत नाही असे थोडेच आहे? महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस ही अगतिकता समजून घेऊ शकतो.
  
नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरभरून दिलेय. दगडाचा देव केल्यानंतर त्याने आपले ‘देवपण’ जपले पाहिजे. इथे हा ‘दगड’च स्वयंभू झाल्याच्या आविर्भावात वावरू लागला आणि म्हणूनच मोठी समस्या निर्माण झाली. दगड तो दगडच! तो निर्मितीच्या कामाला आला तर त्याचे वेगळे महत्त्व असते! इथे मात्र विध्वंसच दिसतो. ज्यांनी निर्मिती करायला हवी ते तोडण्या-मोडण्याची भाषा करू लागतात तेव्हा त्यांचे अस्तित्व संपते. राणे कुटुंबियांचेही तसेच झाले आहे. द्वेषाने पछाडलेल्या मानसिकतेतून ते फक्त आरोप करत सुटले आहेत, धमक्या देत सुटले आहेत.

जाताजाता आचार्य अत्रे यांचे एक विधान सांगावेसे वाटते. अत्रे साहेब म्हणाले होते, ‘‘भविष्यात जर कुणाला माझी समाधी उभारावीशी वाटली, तर त्यावर एक वाक्य हमखास लिहा. हा माणूस अविवेकी असेल, प्रमादशील असेल मात्र हा माणूस कृतघ्न कधीही नव्हता! कारण कृतज्ञता हे मानवी आयुष्याला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे आणि कृतघ्नता हा सर्वात मोठा शाप!’’

राणेसाहेब, महाराष्ट्राने तुम्हाला आजवर भरभरून दिले आहे. त्याविषयी तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त केल्याचे स्मरत नाही; निदान वाटेल ती विधाने करून कृतघ्नपणा तरी दाखवून देऊ नकात!
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२ 

7 comments:

  1. फारच चपखल अशी चपराक दिलीत सर तुम्हीं ।ह्यांचे वय आणि प्रतिष्ठाकिती आणि हे बोलतात किती । असो । पण तुम्ही हे बेस केलेत ।

    ReplyDelete
  2. विनाशकाले.....विपरीत...बुध्दी..

    ReplyDelete
    Replies
    1. जबरदस्त चपराक दिलीत आपण.

      Delete
  3. अतिशय परखड व सडेतोड लेख..।

    ReplyDelete
  4. विझणारा दिवा हा विझण्याआधी फडफडतो ...
    अशीच हि पण फडफड

    ReplyDelete
  5. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली ?कुठे बाबासाहेब कुठे हे वाचाळवीर ? राजकीय नेते म्हणून आधीच दिवे लावले आहेतच आता .... नाटक आणि सिनेमात जाऊन "नट"म्हणून दिवे लावा .

    ReplyDelete