Monday, March 28, 2016

‘लकवा’मार विकारवंत!

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बालगंधर्वला झालेल्या एका कार्यक्रमात राज्य सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले होते, ‘मुख्यमंत्री कोणत्याही फाईलवर सह्या करत नाहीत. त्यांना ‘लकवा‘ झालाय.’
त्यापूर्वी राम मनोहर लोहिया यांनी सांगितले होते की, ‘‘आजच्या काही समाजवाद्यांना ‘लकवा’ झालाय! विचारावर ठाम नसणार्‍या आणि कृतीशुन्य समाजवादी कार्यकर्त्यांना ‘लकवामार समाजवादी’ म्हटले पाहिजे.’’
सध्या पुरोगामित्वाच्
या नावावर मिरवणारे काही तथाकथित समाजवादी याच ‘लकवामार विकारवंता’त मोडतात. कन्हैयाकुमारला छोट्या भावाची उपमा देणारे कुमार तथा सुमार सप्तर्षी याच विकारवंतांपैकी एक! अर्धसत्य माहिती ठासून मांडणे आणि आपणच समाजाला तारण्याचा ठेका घेतलाय अशा आविर्भावात असे ‘विकारवंत’ जगत असतात. सप्तर्षींनी एकेकाळी ‘युक्रांद’च्या माध्यमातून थोडेफार काम हाती घेतले होते; मात्र ज्याच्याकडे किमान सभ्यता आणि मूलभूत ध्येयनिष्ठा नाही तो समाजमनावर कितपत प्रभाव पाडू शकणार? एकीकडे ‘जातीअंताची लढाई’ असे बोजड शब्द वापरायचे आणि दुसरीकडे भेटणार्‍या प्रत्येकाला थेट त्याची जात विचारायची आणि आपण आयुष्यभर किती दिवे लावले याचे पाल्हाळीक चर्वितचर्वण करायचे यातच यांची हयात गेली. एकेकाळी अण्णा हजारे यांना ‘थोरले बंधू’ मानणारे सप्तर्षी आता कन्हैयाला ‘धाकल्या’ भावाची उपमा देत आहेत. त्याला पुण्यात गांधीभवनात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे असे एकेकाळचे समाजवादी आणि आजच्या काळातील कुमार सप्तर्षीसारखे सुमार लोक पाहिले की समाजवादी चळवळीला खीळ का बसली याचे उत्तर मिळते. समाजवादाच्या नावाने कोकलणार्‍यांनी समाजवादी नेत्यांनी कोणते संघटनात्मक कार्य केले याचे उत्तर द्यावे! राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध बोलणे, लिहिणे इतक्या मर्यादित स्वरूपात यांची पुरोगामित्वाची व्याख्या येऊन ठेपली आहे. ही मंडळी केवळ वयाने वाढली आहेत. त्यांची बौद्धिक उंची मात्र कधीच खुंटली आहे, हे इवलेसे पोरही सांगेल. म्हणूनच त्यांची सातत्याने चर्चेत राहण्याची केविलवाणी धडपड सुरू असते. आचार्य अत्रे यांनी त्या काळात समाजवादी विचारधारेविषयी लिहिले होते की, ‘‘समाजवाद या शब्दातला स कधीच गळून पडलाय आणि केवळ ‘माजवाद’ उरलाय!’’ अत्रेंच्या या निरीक्षणात आजदेखील तसूभरही फरक पडल्याचे दिसत नाही.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर विचारतात, ‘‘विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे, ही भाषा पुरोगाम्यांना कधी कळली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे का?’’ भाऊंचा हा सवाल बिनतोड आहे. आजचे समाजवादी या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढे सक्षम नाहीत. त्यांची तेवढी वैचारिक कुवतही नाही. जाती-जातीत, धर्मा-धर्मात, प्रांता-प्रांतात फूट पाडणे, येनकेनप्रकारे स्वत:चा स्वार्थ साधणे आणि आपल्या आडमुठ्या भूमिकेपायी समाजाला वेठीस धरणे हा यांचा उद्योग नवा नाही.
कन्हैयाकुमार पुण्यात आल्याने विशेष असे काय घडेल? कुमार सप्तर्षी यांच्यासारखे अडगळीत पडलेले ‘विकारवंत’ चर्चेत येतील, काही राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष यांच्याकडे केंद्रीत होईल. आजच्या तथाकथीत पुरोगाम्यांचे, समाजवाद्यांचे ‘बापजादे’ काय करत होते याचेही ज्ञान या भामट्यांना नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कम्युनिष्टांविषयीची मते काय होती, याचा अभ्यास आपण करणार की नाही? प्रकाश आंबेडकर ज्या दिशेने आजच्या समाजाला नेऊ पाहत आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते का? हिंदुंचा, ब्राह्मणांचा द्वेष हा एकमेव अजेंडा घेऊन या लोकांची वाटचाल सुरू आहे. एकीकडे जातीच्या आधारावर मिळणारे ‘सर्वप्रकारचे’ लाभ घ्यायचे, आरक्षणासारख्या विषयावरून रान पेटवायचे आणि दुसरीकडे जातीयवाद संपवण्याची भाषा करायची, ब्राह्मणांना शिव्या घालायच्या अशी दुटप्पी भूमिका हे लोक घेतात.
कन्हैयाकुमार आणि राहुल गांधी या दोघांच्या बौद्धिक पातळीत तसा फारसा फरक दिसत नाही. दुर्दैवाने अशी बिनडोक मंडळी आजच्या तरूणाईचे नेतृत्व करू पाहत आहेत. राष्ट्रभक्ती हे पाप वाटावे अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे. आपल्या नेत्यांनी अशा भामट्यांना पाठिशी घातल्याने समाजात दुफळी निर्माण होत आहे. केजरीवाल, हार्दीक पटेल, रोहित वेमुला, कन्हैयाकुमार अशांनी समाजाला कोणता नवा विचार दिला किंवा ते समाजाचे नेतृत्व करण्याच्या लायकीचे आहेत का? हे तटस्थपणे पडताळून पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘सुविद्य’ आमदार जितेंद्र आव्हाड कायम नौटंकी करत असतात. ‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार’ अशी त्यांची ओळख करून दिली जाते. त्यांचा कोणता ‘वारसा’ आव्हाडांनी चालवला हे मात्र सिद्ध होत नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली नाचवणे, अतिक्रमणाच्या प्रश्‍नावरून प्रशासकीय अधिकार्‍याशी अरेरावी करणे, पोलिसांवर हात उगारणे, फर्ग्युसनसारख्या ठिकाणी येऊन महाविद्यालयाच्या स्थापनेविषयीच तारे तोडणे ही व अशी कामे ‘वारसा प्रकारा’त मोडतात का?
‘आम्ही मराठे कुणाला घाबरत नाही. आम्हा सगळ्यांनाच तुरूंगात टाका’ असे बालिश विधान खासदार सुप्रिया सुळे यांनीही नुकतेच केले आहे. (भुजबळ, तटकरे, अजितदादा यांचे भवितव्य त्यांना दिसत असणार!) सुप्रियाताईंच्या ‘बाबां’नी आजवर कायम जातीचे राजकारणच केंद्रस्थानी ठेवले आहे. ‘मराठा लीडर’ अशी प्रतिमा असूनही त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले याचेही उत्तर कोणी देऊ शकणार नाही. पवारांमुळे किती ‘मराठा’ शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या किंवा पवारांनी किती ‘मराठा’ नेते तयार केले? हा प्रश्‍न उपस्थित केला तर त्याचे उत्तरही नकारात्मकच येते. केवळ गरजेपुरते जातीय अस्मितेचे राजकारण करून या लोकांनी कायम स्वत:ची तुंबडी भरलेली आहे.
कन्हैयाकुमार, कुमार सप्तर्षीपासून ते राजदीप सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेपर्यंत प्रत्यक्षात ज्यांचा धिक्कार करायला हवा त्यांना काहीजण ‘नेते’ मानून त्यांची पूजा बांधत आहेत.
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हेही सध्या चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे असलेल्या अणेंनी वेगळ्या विदर्भाबरोबरच स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मुंबईतील 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिले त्याचा विदर्भ किंवा मराठवाड्याशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद ते करतात. राज्य सरकारचा वकील राहिलेला हा पाखंडी ‘विचारवंत’ कसा असू शकेल? सध्या जिकडे-तिकडे अशा ‘लकवामार विकारवंतां‘चीच संख्या फोफावली आहे.
आचार्य अत्रे यांनी मालोजीबुवा निंबाळकर यांच्याविषयी लिहिताना सांगितले होते की, ‘‘जन्मभर देहविक्रय करणार्‍या वेश्येने म्हातारपणी लग्न लावल्यानंतर ‘माझा नवरा मेला तर मी सती जाईन!’ अशा पातिव्रत्याच्या वल्गना करू नयेत!’’
पुरोगामित्वाच्या नावावर नाचणार्‍या आजच्या ‘विकारवंतां’चीही अशीच अवस्था आहे. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीच तारतम्य नसते. सामान्य माणसापुढे जगण्यामरण्याचे अनेक गंभीर प्रश्‍न असताना अशा पद्धतीचे राजकारण कोणीही करू नये! देशातील सर्व प्रश्‍न संपले अशा आविर्भावातच कन्हैयासारख्या भुलभुलैयाचे उदात्तीकरण सुरू आहे. स्वार्थसंकुचित राजकारण, कुटीलतावाद, सर्व प्रकारचा कट्टरतावाद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ‘लकवामार विकारवंतां’कडे दुर्लक्ष करून प्रत्येकाने आता माणुसकीच्या धर्मातून कार्यरत राहिले पाहिजे; तरच येणारे आरिष्ट्य थोपविण्यात आपण यशस्वी ठरू!

-घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, March 19, 2016

लोकसत्ता की शोकसत्ता?

लोकशाही व्यवस्थेत वृत्तपत्रांचे स्थान महत्त्वाचे आहे. व्यवस्थेचा हा चौथा स्तंभ समजला जातो. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर अशा धुरीणांनी लेखणीची ताकत अनेकवेळा दाखवून दिली. परिवर्तनाच्या चळवळीत माध्यमांना पर्याय नाही. मात्र भारतीय वृत्तपत्र सृष्टीत महत्त्वाचे स्थान असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाच्या ‘लोकसत्ता‘ने या वैचारिक परंपरेला तडा दिला आहे. ‘लोकसत्ता’सारख्या अग्रणी वृत्तपत्राने माफी मागत चक्क अग्रलेख परत घेतल्याने ‘लोकसत्ता’चा ‘शोकसत्ता’ झाल्याची चर्चा आहे. मराठी वृत्तपत्रांसाठी तर ही अतिशय दुर्दैवी आणि काळीकुट्ट घटना आहे. ‘कुबेर’ आडनावाच्या एका संपादकाची ही ‘गरिबी’ समजून घेणे वाटते तेवढी सोपी घटना नाही.

असंतांचे संत
क्षमस्व! प्रिय वाचक! ‘असंतांचे संत’ या 17 मार्च 2016 च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. - संपादक


अशी इवलीशी चौकट कुबेरांनी 18 मार्चच्या ‘लोकसत्ता’मध्ये छापून ‘अग्रलेख वापसी’ केली आहे. काही साहित्यिकांनी यापूर्वी ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम राबवली होती. हे परत केलेले पुरस्कार पुन्हा काहींनी स्वीकारले. देशात अशा नाट्यपूर्ण घडामोडी सुरू असतानाच आपल्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजले. श्रीपाल सबनीस नावाचा एक समीक्षक संमेलनाध्यक्ष झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी भाषा वापरत काही तारे तोडले. ‘कोण हे सबनीस?’ असा प्रश्‍न त्यावेळी केला जात होता. हे चित्र पाहून ‘लोकसत्ता’ने त्यांच्याविषयी ‘श्रीपाल की शिशुपाल?’ असा अग्रलेख लिहिला. ‘चपराक’नेही सबनीसांचे ‘बौद्धिक’ घेतले. या प्रकाराने सबनीसांनी ‘मी माझे भाषण माघार घेतो’ असे म्हणत भाषण वापसी केली. झालेले भाषण माघार कसे घ्यायचे हा प्रश्‍न आम्हाला पडला होता. मात्र वादावर पडदा पडतोय म्हणून आम्ही त्यावर फारशी चर्चा केली नाही. मराठी साहित्य, संस्कृती, समीक्षा, भाषा या दृष्टीने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे हे अत्यंत दुर्दैवी होते. संमेलनाध्यक्षांची बौद्धिक क्षमता आणि त्यांना लागलेली प्रसिद्धीची चटक पाहता तिकडे आमच्याप्रमाणेच अनेकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. असाच प्रकार कुबेरांच्या बाबत घडल्याने सांस्कृतिक क्षेत्रात असलेली दहशत पुन्हा एकदा वाचकांसमोर आली आहे.
सबनीस, कुबेर अशा माणसांची तशीही फारशी विश्‍वासार्हता नाही. त्यांनी काय लिहावे आणि काय बोलावे हा त्यांच्या आणि त्यांच्या मालकांचा प्रश्‍न आहे. मात्र ते ज्या संस्थांचे, पदांचे प्रतिनिधित्व करतात त्याला मात्र यामुळे अप्रतिष्ठा येत आहे. सबनीस फारसे गंभीरपणे घेण्यालायक व्यक्तिमत्त्व नाही; मात्र गिरीश कुबेर भूमिका घेणारे संपादक म्हणून ओळखले जातात. चेंबरमध्ये बसून अग्रलेखाची पानेच्या पाने खरडणारे कुबेर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत. बर्‍याचवेळा त्यांचे अग्रलेख भांडवलदारधार्जिने असतात. ते चूक की बरोबर हा चर्चेचा विषय असू शकतो; पण ‘अग्रलेख वापसी’चे समर्थन कुणीही सुज्ञ व्यक्ती करू शकणार नाही. कालचा अग्रलेख आज दिलगिरी व्यक्त करत माघार घ्यावा लागतो म्हणजे गिरीश कुबेर यांच्यावर किती दबाव आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यातही त्यांनी ‘मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो’ अशी संपादकाला न शोभणारी एकेरी भाषा वापरली आहे. ‘पगारी संपादकां’चे कसे हाल होतात यावर अनेक वेळा चर्चा होत असली तरी कुबेरांच्या या कृतीतून ते प्रत्यक्ष दिसून आले आहे.
अग्रलेख माघार न घेता अन्य सहकार्‍यांनी त्याचा प्रतिवाद करणे, तटस्थपणे त्याविषयीची दुसरी बाजू मांडणे, ज्यांना तो अग्रलेख पटला नाही त्यांनी लोकशाही मार्गाने कुबेरांना आणि ‘लोकसत्ते’ला न्यायालयात खेचणे असे लोकशाही मार्ग उपलब्ध असताना कुबेरांनी चक्क माघार घेत वृत्तपत्राच्या मूलतत्वालाच तिलांजली दिली आहे. असा नामुष्कीचा प्रकार आजवर कोणत्याही संपादकावर आला नाही आणि यापुढेही येऊ नये. ‘पत्रकारांनी नेहमी दुसरी बाजू बघावी. विरोधी प्रवाह समजून घेतले तरच तुम्ही ठामपणे लिहू शकता’ असे उपदेशाचे प्रवचन झाडणारे गिरीश कुबेर हेच का? असाही प्रश्‍न अनेकांना पडला आहे. कुबेर लोकसत्तेच्या चेंबरमध्ये बसून अग्रलेख लिहित असल्याने त्यावेळी त्यांनी मद्यपान केले असण्याचीही शक्यता नाही! मग हे कसे घडले?
मदर तेरेसा या संत नव्हत्या तर एक सामान्य धर्मप्रसारक होत्या हे अनेकांनी अनेकवेळा सिद्ध केलेले सत्य आहे. त्यांचे सेवा-सुश्रुषेचे कार्य महत्त्वाचे असले तरी त्यातून त्यांनी ख्रिश्‍चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच स्वत:ला वाहून घेतले होेते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. खुद्द मदर तेरेसा यांनीही हे आपल्या कृतीतून कायम दाखवून दिले आहे. हिंदू धर्मातील विविध संत-महंतांवर आपल्या लेखणीद्वारे तुटून पडणार्‍या कुबेरांनी कधी नव्हे ते या विषयाला हात घालत सत्य मांडले. विविध समाजमाध्यमांद्वारे त्यांचा तो अग्रलेख मोठ्या प्रमाणात वाचला गेला. एकांगी भूमिकेमुळे ज्या वाचकांनी ‘लोकसत्ता’ वाचणे कायमचे सोडून दिले त्यांनीही फेसबुक, ट्वीटरसारख्या माध्यमातून या अग्रलेखाचे समर्थन केले. हा अग्रलेख वाचकप्रिय होत असतानाच कुबेरांनी तो माघार घेण्याची घोषणा केली.
बरे! कालच्या वृत्तपत्रातील अग्रलेख आज कसा माघार घ्यायचा हेही आम्हास कळले नाही. त्यांच्या वृत्तपत्राचा जेवढा खप आहे त्याहून कितीतरी मोठ्या प्रमाणात हा अग्रलेख वाचला गेला. मध्यंतरी शेतकर्‍यांच्या विरोधी कुबेरांनी अग्रलेख लिहिला आणि त्यांचे लेखन म्हणजे अग्रलेख नसतात तर ‘हाग्रलेख’ असतात अशी टीका झाली. संपादकांनी कोणत्या विषयावर काय लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. घटनेच्या कलम 19 अ अन्वये आपणास विचारस्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र हिंदू धर्मावर कायम पोटतिडिकेने लिहिणार्‍या आणि ‘असहिष्णूते’वरून रान पेटवणार्‍या कुबेरांना इतर धर्मावर टीका केली की कसे शेपूट घालून पळावे लागते याची प्रचिती आली. हिंदू धर्मावर कुणी काहीही लिहिले तरी आपण खपवून घेतो. ख्रिश्‍चन-मुस्लिम अशा कडवट धर्मावर लिहिल्यानंतर मात्र अग्रलेख माघार घ्यावे लागतात; व्यंग्यचित्रे छापल्यावरही खुनाच्या राशी पडतात हा इतिहास सर्वपरिचित आहे. कुबेरांनी पळपुटेपणा करत माघार घेतल्याने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे नाक कापले गेले आहे.
एखाद्या चित्रपटावर, नाटकावर बंदी आणणे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे आणि आता एका आघाडीच्या वृत्तपत्राने त्याचाच कित्ता गिरवत चक्क अग्रलेख मागे घेणे हे प्रचंड क्लेशकारक आहे. मुळात बहुतांश वृत्तपत्रातील संपादकीय लेख वाचक सध्या वाचत नाहीत. संपादकांनीही केवळ औपचारिकता पूर्ण करायची आणि तेवढी जागा भरायची असा खेळ सुरू आहे. याला जी चार-दोन वृत्तपत्रे अपवाद होती त्यात ‘लोकसत्ता’चा समावेश आवर्जून व्हायचा. या प्रतिमेला कुबेरांनी तडा दिला आहे. त्यांनी हा अग्रलेख का माघार घेतला, नक्की कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे तरी स्पष्ट करायला हवे होते.
‘जॅकेट कव्हर’ या नावाने पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात छापणे ‘लोकसत्ता’ने सुरू केले त्यावेळी ‘बाईने कपाळावरील कुंकू कधीही विकू नये’ अशी प्रतिक्रिया आम्ही दिली होती. पुढे जॅकेट कव्हर हा प्रकार सर्वच वृत्तपत्रांनी सुरू केला. ‘लोकसत्ता’ने  अग्रलेख माघार घेऊन एक दुर्दैवी पाऊल टाकले आहे. याची री इतर वृत्तपत्रांनी ओढू नये म्हणजे मिळवली. ‘लोकसत्ता’ आज खर्‍याअर्थी ‘शोकसत्ता’ झाला अशा ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या दुर्दैवाने सत्य ठरू नयेत असेच आम्हास अजूनही वाटते. 

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२