Tuesday, September 24, 2013

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

 
काल आमचे अर्थमंत्री दादाराजे तथा श्रीपाद भिवराव आणि  'चपराक' चे लेखक संदिपान पवार यांच्यासह  ज्येष्ठ संपादक श्री. शरद कारखानीस यांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे 'लोकसत्ता', 'गोमन्तक' आणि 'एकमत'चे अनेक रंजक अनुभव सांगितले.  ते म्हणाले, "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. ना. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रसिद्धी माध्यमांना द्यायला सरकारकडे त्यांचा एखादा चांगला फोटोच नव्हता; किंवा मोहमद रफ़ी साहेब गेले तेव्हा 'लोकसत्ता' कडे त्यांचा फोटो नसल्याने पहिल्या दिवशी बातमी फोटो न देताच द्यावी लागली."
त्यांचे हे अनुभव ऐकून वाटले, आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, सर्व काही एका क्लिकवर मिळते. तरीही आजचे माझे व्यवसाय बंधू पूर्वीसारखी निर्भिड पत्रकारिता करू शकत नाहीत, हे वास्तव कोणीही नाकारण्याचे कारण नाही. 
"काही हजार करोडची संपत्ती बाळगुन असलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांनाही गरीब कसे म्हणावे?" असा बिनतोड सवालही  त्यांनी केला. वृत्तपत्रे कशासाठी चालवली जातात? हे सांगताना त्यांनी अनेक किस्से सांगितले. "काही वृत्तपत्रे केवळ छोट्या जाहिराती आणि नोटीसा छापण्यासाठी काढली जातात. त्यांना अंकाचा खप वाढवायचाच  नसतो कारण या जाहिराती कमीत कमी लोकांपर्यंत जाण्यासाठीच दिल्या जातात. मुंबईत काही स्थानकावर रात्री १० नंतर मोठी वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणात विकली जातात. कारण उशीराची गाडी गेल्याने रात्री मुक्काम स्थानकावर करावा लागतो. मग कमी पैशात जास्त पाने असलेली  वृत्तपत्रे  विकत घेवून ती  झोपण्यासाठी 'अंथरुण' म्हणून वापरली जातात…!"
"आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची मुले फारसे वाचत नाहीत. जे वाचायचे ते संगणक किंवा भ्रमणध्वनिवर! त्यावर हवी ती माहितीही त्यांना सहज मिळत असल्याने वृत्तपत्र विकत घेवून, त्यासाठी वेळ काढून वाचणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी  होत चालली आहे," असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. 'पर्यावरण' या विषयावर वृत्तपत्रांनी लिहिणे हा तर मोठा विनोद आहे कारण वृत्तपत्रांच्या कागदासाठीच सर्वाधिक वृक्षतोड होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकंदर अडीच-तीन तासांत त्यांनी अनेक नवनवीन माहिती दिली. त्यातील बरीचशी माहिती ही गोपनीय असल्याने ती मित्रांसाठी देता येत नाही; मात्र या भेटीतून बरेच काही मिळाल्याचे समाधान मात्र नक्की आहे.

Monday, September 23, 2013

किल्लारी : बीस साल बाद!

  1. किल्लारी : बीस साल बाद!

गणेश उत्सव संपला …  आम्हा मराठवाड्यातील लोकांना हे दिवस विसरणे अजूनही खूप अवघड जाते.  ३० सप्टेम्बर १९९३ च्या काळरात्री मराठवाड्यात एकच हाहाकार उडाला. धरणी मातेचा कोप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांना भूकंपाचा तडाखा बसला. सर्वत्र अंधार! अनेक आप्त, मित्र या विनाशात दुरावले गेले.
माझे शिक्षण किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात झाले. किल्लारी बस स्थानकाजवळ माझा वृत्तपत्र विक्रीचा गाळा होता. किल्लारी आणि परिसरात यानिमित्ताने फिरताना मी वाचकपत्र लिहू लागलो. काही कविता आणि लेख प्रकाशित झाले. पुढे पत्रकारितेची सुरवातही किल्लारीतून झाली आणि आज पुण्यासारख्या शहरात माझे स्वत:चे नियतकालिक आहे. लोकांची दुभंगलेली मने एक करताना जे अनुभव यायचे तेच माझ्या लेखणीतून कागदावर उतरायचे. त्यामुळे भूकंपाने माझ्यातील पत्रकार घडवला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
भूकंपानंतर या ५२ गावांचे पुनर्वसन झाले. काही युवकांना सरकारी खात्यात नोक-या मिळाल्या. काहीजण अजूनही त्या प्रयत्नात आहेत. ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले त्यांना आर्थिक मदत मिळाली. लोकांनी दुःख विसरून त्या पैशाचा कसा विनियोग केला त्यावर लवकरच एक पुस्तक लिहितोय. ते जितके दुःखद आहे तितकेच रंजकही आहे. व्यसनाच्या, बायकांच्या आहारी गेलेल्या अनेकांची मात्र फारच वाताहात झाली.
मराठवाड्यातील लोकांत माणुसकी मात्र कायम जिवंत आहे. काही ठराविक अपवाद आहेत; मात्र सुखद अनुभव जास्त आढळतील. किल्लारीचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराच्या दर्शनाला जाताना आजही अंगावर काटा येतो. जुन्या आठवणी मनात येताच थरकाप होतो.
वृत्तपत्र विक्रेता ते संपादक असा माझा प्रवास किल्लारीच्या साक्षीने झाला आहे. लहानपणीच निसर्गाचे तांडव बघिल्याने कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. यापेक्षा मोठे संकट, दुःख, येवूच शकणार नाही याची खात्री आहे. निसर्ग एकदा परीक्षा बघतो मात्र त्यातून बरेच धडेही देतो. आज २० वर्षानंतर हा परिसर झपाट्याने बदलला आहे. परिवर्तन हा निसर्गाचा अटळ नियम असतो. त्याचे स्वागत करायला हवे. मात्र हे परिवर्तन कशा पद्धतीने होते हॆ पाहणेही औत्सुक्याचे असते. हा बदल कसा घडला, काय घडला, कोणी घडवला याविषयी लवकरच एक दीर्घ लेख 'चपराक' मध्ये लिहितोय.