Thursday, January 10, 2019

साहित्यिक दहशतवाद घातक


साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिले नाही. दरवेळी काहीतरी खुसपट काढायचे आणि वादाची ठिणगी पडताच त्याचा वणवा कसा होईल याची दक्षता घ्यायची हा काही समदुःखी लोकांचा धंदाच होवून बसला आहे. या सगळ्यात प्रसारमाध्यमेही न्यायाधीशाच्या भूमिकेत जातात आणि मग हे वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळत जातात. यंदा अरूणाताई ढेरे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेची निवड सर्वानुमते संमेलनाध्यक्षपदी झाल्याने हे संमेलन वादाशिवाय होणार असे वाटत होते. मात्र काहींनी आपल्या कद्रू मनोवृत्तीचे दर्शन घडवत यंदा काही खेळ्या केल्या आणि उद्घाटकावरून यवतमाळला होणारे हे संमेलन चर्चेत आले. 

नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिकेचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काय काम? या मुद्यावरून या वादाला सुरूवात झाली. त्यानंतर त्या पंडित नेहरूंच्या भाची आहेत आणि नरेंद्र मोदी सरकारच्या विरूद्ध एल्गार पुकारत साहित्य अकादमीच्या पुरस्कार वापसीची सुरूवात त्यांनी केली होती हे कळल्यावर याला राजकीय रंग चढला. त्यातही त्यांनी त्यांचे भाषण आयोजकांकडे पाठवल्यावर त्यांची गोची झाली आणि त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

कोणत्याही भाषेतील लेखकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येण्यास मज्जाव करणे हा अविवेक आहे. हे अखिल भारतीय संमेलन असल्याने सर्व भाषा भगिणीतील सौहार्द वाढण्याच्या दृष्टिने उलट हे अत्यावश्यक आहे. गेल्या काही काळातला विचार केल्यास घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाने याबाबत स्तुत्य पायंडा पाडला आहेे. आजवर इतर प्रांतातील अनेक लेखक साहित्य संमेलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे मराठी भाषेची पताका सर्वत्र डौलात फडकण्यात मदतच झाली आहे. पुण्याच्या साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अमराठी महानायकाला बोलावण्यात ज्यांनी पुढाकार घेतला तेही सहगल यांच्या ‘इंग्रजी लेखिका’ असण्यावरून टीकाटिपण्णी करत आहेत. त्यामुळे नयनतारा सहगल यांच्यासारख्या लेखिकेला नकार कोणी दिला यावरून चर्चा करतानाच त्यांना बोलवण्याचा निर्णय कोणाचा होता हेही तपासून पाहिले पाहिजे. आयोजकांचा आणि साहित्याचा अर्थाअर्थी दुरान्वयानेही संबंध नसताना ही खेळी नेमकी कोणी खेळली? यामागे काही ‘व्यापक कटाचा’ भाग होता का? हे पडताळून पाहणे अगत्याचे आहे.

सहगल यांचे साहित्यात फार काही मोठे योगदान आहे अशातलाही भाग नाही. त्या इथे येवून काय बोलणार याचा अंदाज बांधणेही अवघड नव्हते. त्या काही साहित्यिक मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे साहित्य व्यवहाराला काही वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा ठेवणे निव्वळ खुळेपणाचे होते. मग त्यांना साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून का बोलावले आणि पुन्हा नकार देण्याचा करंटेपणा का केला हे स्पष्ट झालेच पाहिजे. या सगळ्या प्रकारामुळे आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत.

साहित्य संमेलने बंद करा, असा एक मतप्रवाह गेल्या काही वर्षात सुरू आहे. हा म्हणजे ‘संधीवाचून ब्रह्मचारी’ अशातला प्रकार आहे. या संमेलनाला एक मोठी परंपरा आहे आणि भाषेच्या अस्तित्वाच्या, सन्मानाच्या दृष्टीने हा सोहळा साहित्यप्रेमींत चांगलाच रूजला, रूळला आहे. या निमित्ताने दरवर्षी साहित्यिक मंथन घडते,  साहित्यातीन चैतन्य बहरते आणि खळाळते राहते. या प्रेरणा अनेकांसाठी स्फूर्तिदायी ठरतात. हे संमेलन आणखी सर्वसमावेशक कसे होईल, प्रतिभावंतांचा सहभाग या संमेलनात कसा वाढेल, ते अधिकाधिक वाचकाभिमुख कसे होईल यादृष्टीने बरेच काम करता येण्यासारखे आहे आणि ते सुरूही आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाविषयी असलेली नकारात्मकता दूर सारून प्रत्येकाने यात योगदान दिले पाहिजे. पंढरीची वारी ज्याप्रमाणे असंख्य वारकर्‍यांना जगण्याचं बळ देते त्याचप्रमाणे साहित्य संमेलन बौद्धिक क्षेत्रातील माणसांना प्रवाही ठेवते.

ह. भ. प. बंडातात्या कर्‍हाडकर यांच्या विरोधामुळे यापूर्वी महाबळेश्‍वर येथील संमेलन अध्यक्षाविना पार पडले. आनंद यादव आणि त्यांचे प्रकाशक ‘मेहता’ यांनी जाहीर माफी मागितली. यादवांनी त्यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेतली त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे कुठे होते? चिपळूणच्या संमेलनात व्यासपीठावर परशुरामाची प्रतिमा लावल्याने ती बदलायला लावणारे आज गळे काढत आहेत. ठाण्याचे संमेलन दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होतेय म्हणून त्याला विरोध झाला होता. आपल्याकडे राजकारणात जाहीर केलेल्या उमेदवार्‍या रद्द होतात, आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघारी घेतला जातो, एखाद्या विषयावर ठेवलेली चर्चा ऐनवेळी रद्द केली जाते किंवा संबधितांच्या मताला अनुकूल नसलेले पाहुणे बदलले जातात; मग उद्घाटक बदलले तर सामान्य रसिकाला त्रास होण्यासारखे काहीच नाही. माघार घेणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याने त्यात जे कोणी दोषी असतील त्यांचा निषेध जरूर करावा परंतु यानिमित्ताने संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भाषा अत्यंत गैर आहे. 

महत्त्वाचे म्हणजे "अरूणा ढेरे यांना दुर्गा भागवत होण्याची संधी आहे' असे म्हणत त्यांच्यावर मानसिक दबाव आणणे हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे? हा लेख प्रकाशित होईपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली असेल किंवा त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्या या विषयावर बोलतील, लिहितील! मात्र त्यांनी निषेध नोंदवलाच पाहिजे म्हणून त्यांना भंडावून सोडणे हा साहित्यिक दहशतवाद नाही काय? गेल्या काही वर्षात खुज्या वृत्तीच्या संमेलनाध्यक्षांमुळे संमेलनाची रया गेलीय असा आरोप करणार्‍यांना अरूणाताई यांच्यासारख्या व्यासंगी कवयित्रीचा, प्रतिभावान लेखिकेचा सन्मान करणेही शक्य होऊ नये? हे सगळेच आपल्या व्यवस्थेला न शोभणारे आणि लाज आणणारे आहे.

अरूणा ढेरे या संमेलनाध्यक्ष आहेत. त्यामुळे जे कोणी त्यांच्यावर दोषारोप करीत आहेत किंवा अप्रत्यक्षरित्या वेठीस धरत आहेत त्यांनी त्यांची यत्ता तपासून पाहणे गरजेचे आहे. गेल्या काही काळात संमेलनाध्यक्षांनी प्रत्येक विषयावर त्यांची मते मांडायलाच हवीत असा एक नवीन प्रघात सुरू झालाय. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा यादृष्टीने हे वाईट आहे. ‘नरेंद्र मोदी सीमेवर कशाला बोंबलत फिरतोय? त्याला कुठून, कशी गोळी घुसेल हेही कळणार नाही’ असे विधान करून यापूर्वी एक संमेलनाध्यक्ष चर्चेत आलेच होते. मागच्या संमेलनातही ‘राजा तू चुकतोस’ असे म्हणत तेव्हाच्या संमेलनाध्यक्षांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. या सर्व साहित्यबाह्य विषयात साहित्याचा आत्माच हरवत चालला आहे. कधी प्रकाशक परिषदेचा बहिष्कार, कधी खाण्या-पिण्याच्या पदार्थावरून वाद, कधी साहित्यिक सहभागावरून मतभिन्नता, अध्यक्षांच्या निवडीवरून नाराजी या व अशा सगळ्या प्रकारात भाषेच्या विकासाकडे सगळ्यांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. साहित्यातले पुढारी त्यांच्या उंचीला साजेशी विधाने करून या परंपरेला गालबोट लावण्यात आणखी पुढाकार घेतात.

यापूर्वी यवतमाळला झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष गदिमा होते. त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा साहित्यप्रेमी नेता उपस्थित होता. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षपदी अरूणाताई ढेरे आहेत ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. 

काही सन्माननीय अपवाद वगळता साहित्य संमेलनाचे आयोजक, स्वागताध्यक्ष यांचा साहित्याशी काहीही संबंध नसतो. ते त्यांची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने काम करत असतात. शिवाय या संमेलनाला राजकीय पाठबळ आणि पुरेशा प्रमाणात पोटबळही लाभते. त्यामुळे संमेलनात राजकीय सहभाग नको, असे म्हणणे गैरलागू आहे. ज्यांना साहित्याचा पुळका येतो त्यांनी हे लक्षात घ्यावे की यापूर्वी एकदाच नव्हे तर अनेकदा शरद पवारांची साहित्य संमेलनातील भाषणे अध्यक्षांपेक्षाही जास्त प्रभावी ठरलेली आहेत. राजकारण हा सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी घरातही आपण ते टाळू शकत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात राजकारण आणि पुढार्‍यांचा वावर टाळता येणे शक्य नाही. हे सर्व पुढारीही मराठीच आहेत आणि मराठी माणसांचेच प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवा, असा गळा काढणारे टिकोजीराव ढोेंगी आहेत. 

साहित्यिकांनी त्यांच्या विचारधारा, गटतट याच्या पुढे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, गाडून किंवा पुरून टाका’ असे जर नव्या पिढीला वाटू लागले तर ते प्रस्थापितांचे मोठे अपशय असणार आहे. त्यांनी संकोचित भूमिका घेणे सोडून व्यापक दृष्टी बाळगणे आणि नवोदितांना प्रोत्साहन देणे, ही परंपरा समृद्ध करणे हेच त्यांच्या आणि साहित्यविश्‍वाच्या दृष्टीनेही भल्याचे आहे.
- घनश्याम पाटील
पुणे 
7057292092
( दैनिक 'पुढारी' संपादकीय पान)