Saturday, June 30, 2018

हे करायलाच हवे!


मध्यंतरी एक अत्यंत हृदयद्रावक गोष्ट ऐकली होती. सातारचे एक गृहस्थ. त्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून पुण्यात एका वसतीगृहात रहात होता. ते त्याला भेटायला आले होते. त्यावेळी त्याच्या लग्नावरून चर्चा झाली. मुलाने ठाम नकार दिला. दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. तो ऐकत नाही म्हणून ते पुण्यात एका मित्राच्या घरी गेले. त्याच्याकडे पाहुणचार घेऊन रात्री सातार्‍याला परतले. 

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना कळले की काल त्यांच्या मुलाचा अपघात झाला. वडिलांसोबत कधी नव्हे ते भांडण झाल्याने दुखावलेला मुलगा त्यांची माफी मागण्यासाठी दुचाकीवर पुण्याहून सातार्‍याला निघाला होता. ‘सरप्राईज’ म्हणून त्याने वडिलांनाही कळवले नाही. त्याचा गंभीर अपघात झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यात तो गेला. दुर्दैव हे की, आदल्या रात्री वडील जेव्हा सातार्‍याला त्यांच्या कारने परत येत होते तेव्हा शिरवळजवळ गर्दी होती. लोक सांगत होते, की ‘‘मुलाचा दुचाकीवरून जाताना अपघात झालाय. तो गंभीर आहे. रूग्णवाहिका वेळेत येत नाहीये. त्याला उपचाराला नेण्यासाठी गाडी हवीय. कोणीही थांबायला तयार नाही.’’ तिथल्या कार्यकर्त्यांनी यांनाही विनंती केली, पण ‘नसते लचांड नको’ म्हणून त्यांनीही नकार दिला. आज कळले की तो त्यांचा एकूलता एक मुलगा होता. 

या गोष्टीतला खरेखोटेपणा मला माहीत नाही. एकाकडून ऐकलेली ही बातमी! पण आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी घटना घडतात. वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर सातत्याने प्रबोधन करूनही आपली मानसिकता काही बदलत नाही. कुणाचा अपघात झाल्यास आधी त्याच्यावर उपचार करण्याच्या सूचना रूग्णालयांना देण्यात आल्यात. तरीही काहीजण पोलीस येण्याची वाट पाहतात. उपचाराला टाळाटाळ करतात. हे सगळे थांबायला हवे. अपघात काही सांगून किंवा ठरवून होत नाहीत. त्यामुळे अशावेळी सर्वांनीच किमान माणुसकी दाखवत एकमेकांना सहकार्य करायला हवे.

आपल्याकडे युद्धापेक्षा जास्त माणसे अपघातात मरतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या वाहतुकीतला बेशिस्तपणा. एकतर रस्त्यावर गरजेपेक्षा अधिक कितीतरी वाहने आहेत. ते थांबवणे आपल्या हातात नाही. घरापासून दहा मीनिटाच्या अंतरावर कॉलेज असले तरी पोरांना सध्या गाड्या लागतात. ती प्रत्येकाची गरज झालीय! मात्र ही वाहने चालवताना वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. किंबहुना ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात’ असा एक मिजासखोरपणा अनेकांच्या अंगात मुरलाय.

मध्यंतरी एक विनोद वाचला होता, ‘आम्ही कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, गायी-म्हशीही पाळतो; पण वाहतुकीचे नियम ही काय ‘पाळायची’ गोष्ट आहे काय?’ या आणि अशा प्रवृत्तीमुळेच तर अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत.

आपल्याकडे 18 ते 30 या वयोगटातील मुलांचे गाडा दामटण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यात अनेकजण व्यसनाच्या आहारी गेलेत. गाड्या चालवताना सेल्फी, फेसबुक लाईव्ह यामुळेही काही दुर्दैवी प्रसंग ओढवल्याच्या घटना पुढे येत आहेत. मद्यपान करून वाहने चालविण्यात अशिक्षितांपेक्षा कितीतरी मोठे प्रमाण उच्चशिक्षितांचे असल्याचा एक अहवाल मध्यंतरी वाचण्यात आला.

नो एन्ट्रीतून गाडी चालवणे, चारचाकी चालवताना सिट बेल्ट न लावणे, दुचाकीवर हेल्मेट न वापरणे, वाहन परवाना नसतानाही केवळ कौतुक म्हणून अल्पवयीन मुला-मुलींना गाडी चालवण्यास देणे आणि त्यांच्या त्या कृतीचे समर्थन आणि कौतुक करणे, वाहतूक दिव्यांच्या सूचनांचे पालन न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत घेणे हे सगळे प्रकार थांबायला हवेत. अनेकांच्या गाड्या नादुरूस्त असतात. दुचाकींचे ब्रेक व्यवस्थित लागत नसतील तर ते सुरळीत करायला अक्षरशः एक मिनिट लागतो! पण तितकेही तारतम्य आपण दाखवत नाही. काही वर्षापूर्वी कोकणात एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला होता. त्यात गाडी पूलावरून सरळ नदीत गेल्याने चाळीस प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. नंतर तपासात कळले की त्या गाडीला वायपर नसल्याने पावसात पुलाच्या वळणाचा अंदाज आला नाही. पावसामुळे पुढचा रस्ताच दिसत नव्हता. म्हणजे केवळ चाळीस रूपयांचे वायपर बसवण्यास टाळाटाळ केल्याने चाळीस जणांचा मृत्यू ओढवला होता. 

महत्त्वाच्या शहरातील भाजी मंडईत सकाळी सर्वप्रथम येणार्‍या वाहन चालकास काही रोख बक्षिसी दिली जाते. ही रक्कम वेगवेगळ्या शहरात शंभर रूपयांपासून ते पाचशे रूपयांपर्यंत आहे. त्यामुळे तरकारीची सेवा देणारे अनेक वाहनचालक गाड्या भरधाव वेगाने दामटतात. भल्या पहाटे त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. थोडक्या लाभासाठी ते आपला आणि इतरांचा अनमोल जीव धोक्यात घालतात. काही प्रवासी भाड्याच्या गाडीतून प्रवासास जाताना गाडी वेगात नेण्यासाठी चालकास काही आमिषे दाखवतात. थोडासा वेळ वाचवण्यासाठी अशाप्रकारे जीव धोक्यात घालणे हे काही प्रगल्भतेचे लक्षण नाही. 

वाहतूक सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणार्‍या पोलिसांची संख्या वाढवणेही गरजेचे आहे. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे वाहतूक नियंत्रणात त्यांना अनेक अडचणी येतात. बहुसंख्य पोलीस इमानेइतबारे त्यांची जबाबदारी पार पाडत असतात; मात्र काहीजण चिरीमिरी घेऊन वाहतुकीचे उल्लंघण करणार्‍यांना सोडून देतात. त्यामुळे नियम मोडणार्‍यांचे तर फावतेच पण पोलिसांची प्रतिमाही मलीन होते. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरात आजही साधी सिग्नल यंत्रणानाही नाही. मग हे अपयश कुणाचे?

ट्रक ड्रायव्हर हा तर एक अजबच प्रकार. ट्रान्सपोर्टचे ते एक महत्त्वाचे माध्यम. त्यामुळे त्यांना देशभर मोठमोठ्या गाड्या घेऊन जावे लागते. अनेक ट्रक चालक हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत. लांबच्या पल्ल्यावर असताना ते जेवणासाठी ढाब्यावर हमखास थांबतात. अर्थातच त्यावेळी अनेकजण मद्यपान करतात. नंतर पुन्हा अवजड सामान घेऊन जाणे आलेच. त्यामुळे त्यांच्या अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. त्यांच्यात याविषयी जागृती करणे, त्यांचे प्रबोधन करणे हे व्यवस्थेचे कर्तव्य आहे. 

सिग्नलला थांबणे, नो एन्ट्रीत न घुसणे, चालत्या गाड्यावरून गुटखा-तंबाखूसारखे घातक पदार्थ खाऊन न थुंकणे, गाड्यावरून किंवा गाड्यातून कोणत्याही वस्तू रस्त्यावर न फेकणे अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण मोठे काम करू शकतो. राष्ट्रसेवा करण्यासाठी हे पुरेसे आहे. आपली एक कृती एक अनर्थ टाळण्यासाठी पुरेशी ठरणारी असते. इतर देशातील वाहतुकीच्या शिस्तीची उदाहरणे देताना आपण स्वतःत बदल घडवणे कधीही श्रेयस्कर! एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला हे करायलाच हवे. ही जागृती ज्या दिवशी निर्माण होईल तो आपल्यासाठी सुदिन! 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Wednesday, June 27, 2018

दहशतवादाला धर्म असतो!


वटसावित्री पौर्णिमेची धामधूम सुरू असतानाच नेहमीप्रमाणे सगळीकडून विनोदांचा पाऊस पडत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सणावर कोणत्याही थराला जाऊन ‘विनोद’ करणं आणि आपण ते गंभीरपणे न घेता उलट समाजमाध्यमांद्वारे पुढे पाठवत राहणं ही आता एक ‘फॅशन’ बनत चाललीय. आपल्या प्रत्येक सणांवर,  रीतीरिवाजावर, देवदेवतांवर, प्रथा आणि पद्धतींवर केली जाणारी टिंगलबाजी आपण अगदी सहजतेने घेतो. यालाच अनेकजण ‘सहिष्णुता’ समजतात. आपल्या नेत्यांना मुस्लिम धर्मातील तलाक पद्धती त्यांच्या धर्माचा भाग आहे याची सोयीस्कर आठवण येते. रमजानच्या महिन्यात शत्रू पक्षांकडून घातपात आणि रक्तपात होणार  नाही याची खात्री असते. दुसरीकडे मात्र ‘भगवा दहशतवाद,’ ‘हिंंदू दहशतवाद’ असा धोशा सुरूच असतो. 

हे सर्व मांडण्याचं कारण म्हणजे वटसावित्रीची यथेच्छ टर उडवली जात असतानाच केरळमधील कोट्टायम शहरात घडलेली एक दुर्दैवी घटना. इथल्या एका महिलेचे लग्नापूर्वी एका पाद्रीसोबत लैंगिक संबंध होते. लग्नानंतर या गोष्टीचा मानसिक त्रास होऊ लागल्याने तिने तिच्या धर्मातील प्रथेप्रमाणे मन मोकळे करण्याच्या उद्देशाने  ऑथोडॉक्स सीरियन चर्च गाठले. तिथल्या ‘कन्फेक्शन’च्या खोलीत तिने तिच्या या चुकीची कबूली दिली. या महिलेचे लग्नापूर्वीचे हे प्रेमसंबंध कळल्यावर तिथल्या पाद्रीनेही तिला धमकावले. या माहितीचा गैरवापर करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचे चित्रीकरण केले. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर त्या चित्रफितीचा आधार घेत तिथल्या पाच पाद्रींनी तिच्यावर अत्याचार केले. हे सगळेच असह्य झाल्यावर त्या महिलेने सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला. पतीने चर्चच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर या पाच पाद्रींच्या विरूद्ध चौकशी समिती नेमून त्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे.

हिंदू मंदिरात पूजार्‍यांकडून बलात्कार झाला म्हणून आरडाओरडा करणारी आणि नंतर सत्य बाहेर येताच शेपूट घालून गप्प बसणारी प्रसारमाध्यमे या विषयावर काहीच बोलणार नाहीत. त्यांना ‘कन्फेक्शन’ची घटना ‘अंधश्रद्धा’ न वाटता धर्माची प्रथा वाटते. वडाची पूजा करणार्‍या महिलांची टवाळी करताना ते याबाबत मात्र चिडीचूप असतात. त्या अभागी भगिनीवर पाच पाद्रींनी अत्याचार करूनही ते ‘धर्मपंडित’ ठरतात. यालाच तर आपल्याकडे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. 

सध्या एक चित्रफित समाजमाध्यमांवर सर्वत्र फिरत आहे. त्यातील मुस्लिम धर्मगुरू त्यांच्या चेल्यांना मार्गदर्शन करताना सांगतात की, ‘‘तुम्ही हिंदुंना त्यांच्या सणाच्या शुभेच्छा देऊ नकात. तुम्ही जर त्यांना ‘हॅप्पी दसरा’ म्हणालात तर दसर्‍याचे महत्त्व मान्य केल्यासारखे होईल. जर एखाद्या हिंदुने तुम्हाला दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या तर तुम्ही ‘सेम टू यू’ असंही म्हणू नकात. कारण तुम्ही त्यालाही शुभेच्छा देता म्हणजे तुम्ही रामाचे अस्तित्व मान्य करता. रामाने रावणाचा वध केला ही घटना मान्य करून त्या शुभेच्छा असतात. उलट त्यांना त्या त्या सणांची माहिती विचारा. अनेकांना ती सांगता येणार नाही. मग या कशा अंधश्रद्धा आहेत म्हणून त्यांची टिंगल करा...’’

आपल्या धर्माविषयी, त्यातील प्रथांविषयी जागरूक असणारे हे लोक इतरांना कमी लेखतात. जे कोणी अल्लाचे अस्तित्व मान्य करत नाहीत ते सर्व ‘काफिर!’ आपण मात्र त्यांना रमजानच्या शुभेच्छा देताना त्यांचा शिरखुर्मा आनंदाने हादडत असतो. त्यांच्या दर्ग्यात जाऊन आदराने माथा टेकवत असतो. यालाच तर ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात... खरंतर हिंदुइतका कोणताही धर्म सहिष्णू नसताना आपल्यालाच धर्मवादी, जातीयवादी, प्रथावादी ठरवले जाते. रोज पाच वेळा नमाज पाडणारा मुस्लिम आपल्यासाठी ‘नमाजी’ असतो. त्याच्याविषयी आपल्या मनात आदराचे स्थान असते! पण एखादा भाविक मंदिरात गेला आणि देवाच्या पाया पडत असेल तर तो अंधश्रद्ध, बुरसटलेला ठरतो.

‘दहशतवादाला धर्म नसतो’ असे कायम म्हटले जाते. मग अतिरेकी कारवायांत पकडले जाणारे बहुसंख्य विशिष्ठ धर्माचेच का बरे असतात? कारण दहशतवादाला धर्म असतो! फक्त आपण तो समजून घेतला, मान्य केला तर आपण ‘धर्मवादी, प्रतिगामी’ ठरतो. 

सध्या तर आपल्याकडे हिंदू धर्माला शिव्या घालणे, नावे ठेवणे  म्हणजे पुरोगामीत्व ठरवले जाते. आपल्या धर्माचा, संस्कृतीचा, रूढी, परंपरांचा विचार न करता, अभ्यास न करता दुषणे देणे वाढत चालले आहे. त्यात आपण सर्वजण सहजपणे सहभागी होतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या सर्वांच्या दुर्दैवी हत्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री या सर्वांची काही मिनीटात पहिली प्रतिक्रिया होती की, ‘यामागे हिंदुत्त्ववादी शक्तींचा हात आहे.’ मग तो ‘हात’ अजून कुणाला का दिसत नाही? कोणत्या आधारावर त्यांनी ते विधान केले होते? म्हणजे गुन्हेगार कोण हे त्यांना माहीत होते का? त्यांच्यावर अजूनही कारवाई का झाली नाही? तेव्हाच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारकिर्दीत घडलेल्या या घटनेचे खापर आपण आजच्या सरकारवर फोडतो आणि त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतो. गुन्हेगार, मग तो कुणीही असेल! त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई व्हायलाच हवी. मग अशा घटनांत आरोपी इतके मोकाट कसे फिरू शकतात? की तेव्हाच्या सत्ताधार्‍यांना त्यांना पकडायचेेच नव्हते? तपास यंत्रणांची दिशाभूल करून वेळकाढूपणा करण्याचा उद्देश तर त्यांच्या विधानात नव्हता ना? 

लॉर्ड मेकॉले हा एक शिक्षणतज्ज्ञ होता. त्याने त्यावेळी सांगितले होते की, ‘भारतावर राज्य करायचे असेल तर एकच पर्याय आहे. यांच्यात फूट पाडा. देवा-धर्मावरील त्यांच्या श्रद्धा कमकूवत करा. इथली आदर्श असलेली गुरूकूल शिक्षणपद्धती नष्ट करा. त्यांच्याकडील संस्कार, निष्ठा, त्याग यामुळे त्यांच्या श्रद्धा मजबूत आहेत. त्या जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्यावर राज्य करू शकत नाही...’

मेकॉलेचे हे तत्त्वज्ञान अजूनही आचरणात आणले जाते. आजही आपल्यात फूट पाडण्याचेच काम सुरू आहे. आपणही या षडयंत्राला बळी पडतो.

हिंदू धर्मासह सर्वच धर्मातील चुकीच्या प्रवृत्ती, परंपरा, अंधश्रद्धा दूर व्हायला हव्यात. आपण ‘माणूस’ म्हणून जगायला हवे. फक्त विशिष्ठ धर्माची तळी उचलताना कायम हिंदुना दुषणे देणे म्हणूनच अयोग्य आणि अन्यायकारकही आहे. केरळमध्ये पाद्रींकडून घडलेल्या दुर्वर्तनाचे पडसाद कुठेच न पडणे हा आपला ‘सोयीस्करपणा’ आहे. यातूनच ‘दहशतवादाला धर्म असतो’ हे सिद्ध होते.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

Tuesday, June 26, 2018

व्यवस्थेची लाज राखा!


एका तत्त्ववेत्यानं सांगितलं होतं की, ‘‘तुमच्या देशातील तरूणांच्या ओठावर कोणतं गाणं आहे हे सांगा म्हणजे मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो.’’

सध्या आपली तरूणाई ‘झिंग झिंग झिंगाट’ आणि ‘शांताबाई’ सारख्या गाण्यावर ताल धरते. मग आपलं भविष्य सांगायला कोणता ज्योतिषी कशाला हवा?

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातलं दाताळा हे एक छोटंसं गाव. राजेश हिवसे हा इथल्या सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक. एक शेतकरी जोडपं त्याच्याकडं पीक कर्ज मागण्यासाठी गेलं. राजेशनं शेतकर्‍याच्या बायकोचा संपर्क क्रमांक घेतला आणि तो कर्जाच्या बदल्यात तिच्याकडं शरीरसुखाची मागणी करू लागला. बँकेचा सेवक असलेल्या मनोज चव्हाण या सेवकाला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं त्या शेतकरी भगिनीला फोन करून सांगितलं होतं की, ‘‘साहेबांच्या इच्छा पूर्ण करा, ते तुम्हाला पीक कर्जाबरोबरच इतरही पॅकेजेस देतील.’’ यातील प्रमुख आरोपी राजेश हिवसे फरार होता. काल (मंगळवार) त्याला नागपूरातून अटक करण्यात आली आहे. ‘झिंगाट’च्या तालावर नाचणार्‍या राष्ट्राचं हे चित्र आपल्या देशाची परिस्थिती स्पष्ट करतं.

अडल्या-नडलेल्यांच्या परिस्थितीचा फायदा घेणारे, त्यांना धमकावणारे, त्यांच्यावर बंधनं घालणारे, दबाव आणणारे हे सगळे एका माळेचे मणी. या लोकांमुळं आपला देश कलंकित झालाय. आपल्या जबाबदारीचं भान न राखता असं क्लेषकारक वर्तन केल्यानं अपेक्षेप्रमाणं त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. ‘याला सर्वस्वी सरकारची धोरणं आणि शेतकरी वर्गाबद्दलची अनावस्था कारणीभूत’ असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मुळात कोणीही आपल्या अधिकारांचा असा गैरवापर करण्यास का धजावते? कारण त्याच्यावर व्यवस्थेचा, कायद्याचा धाक नसतो. कुणीही आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही या अहंकारातून, मिजासीतून अशा विकृती निर्माण होतात. त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई होणं, दोषींना गंभीर शिक्षा देणं अत्यावश्यक ठरतं. 

दरम्यान, या शेतकरी महिलेच्या घरी सेंट्रल बँकेचे कर्मचारी गेले. त्यांनी त्यांचं 65 हजार रूपयांचं पीक कर्ज मंजूर झाल्याचं सांगितलं. मात्र या महिलेनं ‘मला सेंट्रल बँकेचं कर्ज नको’ असा पवित्रा घेतला आहे. हे कळताच जिल्हा बँकेनं पुढाकार घेऊन तातडीनं त्यांना 50 हजार रूपयांचं कर्ज दिलं आहे.

‘शेतकर्‍यांच्या रानातल्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ अशी ताकीद देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकरी कायम नाडला जातो. निसर्गाची अवकृपा, सरकारी धोरणांची उदासीनता, खासगी सावकारी, वेळेत बी-बियाणं, खतं उपलब्ध न होणं, पिकांना हमीभाव न मिळणं, आडत्यांकडून अडवणूक आणि त्यात अशा बँकेच्या अधिकार्‍यांचा मुजोरपणा, मस्तवालपणा यामुळं शेतकर्‍यांचं कंबरडं मोडलं जातं. मुलांचं शिक्षण, मुलींची लग्नं यामुळं तो आधीच मेटाकुटीला आलेला असतो. त्यामुळं त्यांच्या हिताच्या योजना राबवणं, त्या त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं हे राज्यकर्त्यांचं प्रथम कर्तव्य असायला हवं. त्यात कुचराई करणार्‍या व्यवस्थेतील संबंधित घटकांला आवर घालणं हेही त्यांचं कर्तव्यच आहे.

‘भारत हा कृषीप्रधान देश आहे’ हे गुळगुळीत झालेलं वाक्य सातत्यानं ऐकताना आणि ऐकवताना कुणाच्याही मनात घृणा निर्माण होईल असं एकंदरीत सामाजिक वातावरण आहे. शेतकर्‍यांच्या शेती करणार्‍या मुलांसोबत कुणी लग्नही करायला तयार होत नाही हे आपण अनेकदा बघितलं आहे. केवळ निवडणुका आल्या की, यांना ‘बळीराजा’ आठवतो. इतरवेळी त्याचाच सातत्यानं बळी दिला जातो. जगाचा पोशिंदा ठरणारा शेतकरी उपाशी राहतो, मदतीसाठी दारोदार फिरतो तेव्हा आपल्या राष्ट्राचं ते खरं अपयश असतं. उगीच महासत्तेच्या गोष्टी करायच्या आणि ‘देश आगे बढ रहा है’ म्हणत स्वतःची पाठ थोपटून घ्यायची ही सगळी नाटकबाजी आहे. 

आपल्याकडं अजूनही श्रमाला प्रतिष्ठा नाही. असण्यापेक्षा दिसण्यालाच अधिक महत्त्व आहे. एखाद्या अधिकार्‍याचा ‘प्रामाणिक’ अधिकारी म्हणून सत्कार होतो, माध्यमात त्याचे फोटो झळकतात तेव्हा अधिकारी म्हणून तो ‘प्रामाणिकच’ असायला हवा हा मुलभूत विचार हरवलेला असतो. ‘प्रामाणिक’ असणं हा अधिकार्‍यांचा ‘गुण’ ठरावा इतका काळ झपाट्यानं बदललाय. अशा वातावरणात सामान्य माणूस, शेतकरी, कामगार देशोधडीला लागला, त्यांची अडवणूक झाली तर दोष कुणाला देणार?

एकेकाळी आपले कृषीमंत्री सांगायचे, शेतकरी प्रेमप्रकरणातून आत्महत्या करतात. महाराष्ट्रातल्या एका जबाबदार मंत्र्यानं सांगितलं होतं की, ‘रात्रीच्या वेळी भारनियमन असल्यानं शेतकर्‍यांना दुसरं काय काम असतं? त्यामुळं आपली लोकसंख्या वाढतेय...’ सध्या तर देशाचे आणि राज्याचे कृषीमंत्री कोण आहेत हे तपासण्यासाठी गुगलचा आधार घ्यावा लागतो. 

शेतकर्‍यांची दुःखं सहसा कुणी समजून तर घेत नाहीच पण तो कायद्याची मदत घेण्यासाठी गेला तरी त्याची पिळवणूकच होते. वकील, पोलीस सगळे त्याला लूटता कसे येईल याचाच विचार करत असतात. अन्यथा राजेश हिवसेसारख्या लंपट अधिकार्‍याची एवढी हिंमत होणारच नाही. ‘शेतकर्‍यांना आपल्या बँकेतूल पीक कर्ज देऊन आपण त्याच्यावर उपकार करत आहोत’ अशी भावना निर्माण झाल्याने त्यातून अशा प्रकारच्या ‘मागण्या’ पुढे येतात. 

देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात अजूनही स्वतंत्र गृहमंत्री नाही. सगळी ‘खाती’ आपल्याकडंच ठेवली की ‘खाता’ येतं असा त्यांचा समज असावा! किंवा राज्यात गृहमंत्री पद सांभाळू शकेल असा एकही सशक्त नेता नाही, असे त्यांना वाटत असावे. सर्वत्र सतत गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असताना, पोलीस आणि प्रशासनावर त्याचे कोणत्याही स्वरूपाचे नियंत्रण नसताना मुख्यमंत्री मात्र पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवून विदेश दौर्‍यावर असतात. म्हणूनच राजेश हिवसेसारख्या विकृतांच्या मुसक्या वेळेत आवळल्या जात नाहीत. जलद गती न्यायालयात हे खटले चालवले जात नाहीत आणि त्यांना वेळीच शिक्षाही होत नाही. 

व्यवस्थेची लाज राखायची तर अशा प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात. त्यात कसलीही हयगय होऊ नये. यांच्यावर कठोर कारवाई केली तर आणि तरच सामान्य माणसाला जगण्याचं बळ मिळू शकेल. 
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

Monday, June 25, 2018

अजब तुझे सरकार!


ही गोष्ट आहे एका अत्यंत त्यागी, देशसेवेला वाहून घेतलेल्या आदर्श पंतप्रधानांची. अर्थात लालबहाद्दूर शास्त्री यांची. त्यावेळी ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य होते. 

एके रात्री त्यांचा एक मित्र अचानक त्यांच्या घरी आला. त्यानं सांगितलं, ‘‘शास्त्रीजी, माझ्या बायकोची तब्येत अचानक बिघडलीय. तिला तातडीने डॉक्टरकडे नेले पाहिजे. मला पन्नास रूपये हातउसणे द्या!’’

ते ऐकून शास्त्रीजी विचारात पडले. ते म्हणाले, ‘‘मला कॉंग्रेस वर्किंग कमिटीकडून पन्नास रूपये महिना मानधन मिळते. त्यात माझे घर चालते. शिल्लक अशी काही राहत नाही; पण तुमची अडचण मी समजू शकतो. आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू...’’

त्यांचा हा संवाद शास्त्रीजींच्या पत्नी ललितादेवी ऐकत होत्या. त्यांनी लगबगीने घरातून पन्नास रूपये आणले आणि त्या ग्रहस्थांना दिले. ललितादेवींचे आभार मानत ते निघून गेले.

शास्त्रीजींना आश्‍चर्य वाटले. त्यांनी विचारले, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’

ललितादेवींनी सांगितले, ‘‘तुम्ही मला घरखर्चाला महिना पन्नास रूपये देता. त्यातून काटकसर करत मी महिना पाच रूपये वाचवते. एखाद्याच्या अडचणीला हे पैसे कामाला आले नाहीत तर ते साठवून करायचे काय?’’

शास्त्रीजींना ललितादेवींचे कौतुक वाटले. त्या आत गेल्या. त्याबरोबर शास्त्रीजींनी कागद घेतला आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिले, ‘‘माझे घर दरमहा पंचेचाळीस रूपयांत चालते. त्यामुळे आपल्याकडून पाच रूपये जास्त येत असल्याने ते तातडीने कमी करावेत आणि अन्य गरजूंना देण्यात यावेत...’’

आजकाल असा कोणी माणूस असेल तर आपण त्याला वेड्यात काढू! आपल्या संवेदनाच तितक्या बोथट झाल्यात. शास्त्रीजींसारख्या माणसांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक छान शब्द वापरलाय. ‘सद्गुण विकृती!’

अशी सद्गुण विकृती असणारी माणसं आजच्या काळात शोधावी लागतात. तो शोध सहसा अपूर्णच राहतो.

शास्त्रीजींच्या या प्रामाणिकपणाची आठवण होण्याचे कारण म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील. त्यांच्या चिरंजिवांचे, सुजय विखे पाटील यांचे राहता तालुक्यातील लोणी बुद्रुकजवळ ऊसाचे शेत आहे. त्या शेतात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मिळालेले हायमास्टचे दिवे उभारण्यात आलेत. कोणतीही लोकवस्ती नसताना या रानात झगझगाट असतो. आजचे नेतेमंडळी असा ‘उजेड’ पाडतात. त्यांना ना समाजाची चिंता, ना नैतिकतेची. त्यांच्या शेतातील खांबाला चार हायमास्ट दिवे असून खांबाच्या मध्यभागी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या फाटोसह योजनेचेही नाव आहे. मुख्य म्हणजे वीज मंडळाने तातडीने वीज जोडही दिली असून सर्वसामान्यांसाठी असलेल्या विकासयोजनांचा असा गैरवापर चालवला आहे.

सत्तेचा असा गैरवापर करणारे विखे काही एकमेव नेते नाहीत. राजकारणातला हा नियमच झालाय. ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ असे ठामपणे सांगितले जाते. सरकारी योजनांचा स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी वापर केला नाही असा राजकारणी शोधून दाखवा. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीत स्वतःच्या नातेवाईकांच्या म्हणजे, सासूबाईंच्या, मेव्हणींच्या नावे सैन्यातील अधिकार्‍यांच्या सदनिका घेतल्या होत्या हे आपणास माहीत आहेच. नाशिकमध्ये भुजबळांनी अतिभव्य उड्डाणपूल केलाय. मुंबईहून येणार्‍यांची सोय हा त्यामागचा उद्देश! मात्र तो येतो ते थेट भुजबळांच्या घराजवळच. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

‘पहिल्या महिला राष्ट्रपती’ म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या प्रतिभा पाटील यांनी त्यांची कारकिर्द संपल्यावर राष्ट्रपती भवनातल्या सगळ्या वस्तू ‘उचलून’ आणल्या होत्या. त्या परत ‘मागवण्याची’ नामुष्की संबंधितांवर आली. परवा अखिलेश यादव यांनी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे निवासस्थान सोडताना चक्क घराच्या भिंतीही पाडून टाकल्या.

राजकारण्यांचे सोडा प्रशासकीय अधिकारीही याला अपवाद नाहीत. सरकारी गाड्या, अन्य साधने ते स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खाजगी कामासाठी वापरतातच पण त्यांच्या कनिष्ठांना अक्षरशः घरगड्यासारखी वागणूक देतात. अर्थात, याला काही सन्माननीय अपवाद आहेत; पण ते प्रमाणाने तुरळकच! 

राजकारण्यांचे, प्रशासकीय अधिकार्‍यांचे एकवेळ सोडा... आपल्याकडील साहित्यिकांची, विचारवंतांची काय अवस्था आहे? ना. धों. महानोर यांच्यासारख्या लेखकाने त्यांच्या घराचे आणि शेतीचे वीज बिलच भरले नव्हते. किती दिवस? थोडे थोडके नव्हे तर तब्बल चौदा वर्षे! एका वृत्तपत्राने हा विषय उचलून धरला. त्यावेळी त्यांनी निलाजरे समर्थन दिले की, ‘‘मला बिल आलेच नाही तर कसे भरणार?’’

सामान्य माणसांकडून वीज बिल भरायला एक दिवस उशीर झाला तरी वीज तोडली जाते. मग हे काय सरकारचे जावई आहेत का? बरे, वीज बील आले नाही तर मग ते का आले नाही हे विचारण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवू नये? तुम्ही विचारवंत म्हणून मिरवता ना? हा सगळा मामला तेव्हाचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी अजित पवार यांनी महानोरांचे हे थकित वीज बील भरले.

साधा नगरसेवक असेल किंवा गावातला ग्रामपंचायतीचा सदस्य. त्याच्या दारात सगळ्या सोयीसुविधा आलेल्या असतात. आपल्याला सामान्य माणसाचा किती पुळका आहे हे दाखवणारे महाभाग सगळं काही स्वतःच्या पदरात पाडून घेतात. त्यांना कशाचीही ददात नसते. गावचा सरपंच असेल तरी तो टोलनाक्यावर पाच-पन्नास रूपयांच्या टोलसाठी कर्मचार्‍यांसोबत अरेरावी करतो. यातून आपल्या समाजाची, नेतृत्व करणार्‍यांची मनोवृत्ती दिसून येते.

महात्मा गांधी म्हणाले होते, ‘‘राजकारणात भ्रष्टाचार हा अपरिहार्य असतो. मात्र त्याचे प्रमाण लक्षात घ्यावे. एखादी मधमाशी मधाच्या पोळावर असते तेव्हा तिच्या पायाला जितका मध लागतो तितकाच व्यवस्थेचा लाभ यातील लोकांनी घ्यावा...’’

आजकाल या ‘मधमाशा’ मधात पूर्ण बुडल्यात. इतक्या, की त्यातून त्यांना बाहेरही पडता येत नाही. 

घराणेशाहीसारखे विषय तर आपल्या सर्वच राजकीय पक्षांसाठी तकलादू ठरलेत. कोणीही कुणावर ‘घराणेशाहीचा’ आरोप करू नये अशी एकंदर परिस्थिती आहे. मात्र सगळी सत्ता आपल्याच घरातील सदस्यांकडे आल्यानंतर त्याचा विनीयोग तरी प्रामाणिकपणे व्हावा. तळे राखताना तुम्ही पाणी जरूर चाखा! पण जितकी तहान आहे तितकेच! शेजारचा गरजू तहानेने व्याकूळ झालेला असताना तुम्ही त्याला आडकाठी तर करत आहातच पण दांडगाईने ते पाणीही इतरत्र पळवताय. हे काही बरे नाही.

शेवटी एक गाणे आठवते.

लबाड जोडती इमले माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणीहार...
उद्धवा अजब तुझे सरकार!

- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, June 23, 2018

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!



दारू प्यायल्याने लोकांचे तारतम्य सुटते आणि अनेक तंटे निर्माण होतात म्हणून दारूबंदी करता का?

रस्त्यावर मोठ्या संख्येने गाड्या आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांचे त्यात जीव जात आहेत म्हणून सर्व वाहनांवर बंदी आणणार का?

...मग प्लॅस्टिकच्या उत्पादनावर बंदी आणणे म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशातला प्रकार नव्हे काय?

सध्याच्या जीवनशैलीचा विचार करता प्लॅस्टिकशिवाय आपले पानही हलत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेत तीस टक्के वाटा प्लॅस्टिकचा आहे. सकाळी उठल्यानंतर हातात ब्रश घेण्यापासून ते रात्री ‘गुड नाईट’पर्यंत प्लॅस्टिकशिवाय पर्याय नाही. प्लॅस्टिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. अनेक प्रगत राष्ट्रात प्लॅस्टिकचा पुनर्वापर, त्याचे विघटन सहजपणे होत असताना आपल्याकडे त्याचा बागुलबुवा करणे म्हणूनच योग्य नाही. जर इतर देश पर्यावरणाला हानी न पोहोचवता प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे करत असतील तर आपण नेमके कुठे कमी पडतो? हे अपयश आपल्या व्यवस्थेचे की समाजाचे?

कालपासून (दि. 23 जून) आपल्याकडे सर्वप्रकारच्या प्लॅस्टिकवर म्हणजे पॉलिथीन, पॉलिप्रॉपेलीन, पॉलिस्टायरीन, नायलॉन, ऍक्रेलीक, थर्माकोलवर बंदी आणलीय. अविघटनशील वस्तुंचे उत्पादन, त्यांचा वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर बंदी आणली आहे. याचे जो कोणी पालन करणार नाही त्याला आर्थिक दंडाबरोबरच तीन महिन्यांच्या तुरूंगवासालाही सामोरे जावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसा ‘कॉंग्रेसमुक्त भारत’चा संकल्प केला तसेच आपल्या व्यवस्थेने प्लॅस्टिकला हद्दपार करण्याचा संकल्प केलाय. 

प्लॅस्टिक बंदीचे दूरगामी परिणाम काय होतील हे बघितले पाहिजेच; पण सध्या महाराष्ट्रातले पन्नास हजार लघुउद्योजक रस्त्यावर येणार आहेत. त्यातील साधारण पाच लाख कामगार बेकार होणार आहेत. ज्या उद्योजकांनी प्लॅस्टिक निर्मितीचे कारखाने काढलेत, जे पॅकेजिंगच्या व्यवसायात आहेत ते संकटात येणार आहेत. त्यांचा व्यवसायच बंद पडल्याने त्यांनी काढलेल्या कोट्यवधींच्या कर्जाची परतफेड केवळ अशक्य आहे आणि त्यामुळे अनेक बँकाना मोठा फटका बसणार आहे. केवळ दांडगा महसूल मिळतो म्हणून दारूबंदीचा निर्णय न घेणार्‍या शासनाचा प्लॅस्टिक बंदीमुळे कोट्यवधींचा जीएसटी बुडणार आहे. 

याबाबत कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप कुंभोजकर सांगतात, ‘‘प्लॅस्टिक बंदीबरोबरच शेती आणि अन्नप्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल्स व गारमेंट, औद्योगिक स्पेअर पार्टस्, स्टेशनरी, स्पोर्टस्, कॉस्मेटिक इत्यादी उद्योगांना पॅकिंगचा प्रश्‍न भेडसावणार आहे. या उद्योगात किमान पंचवीस लाख लोक काम करतात. उत्पादकांबरोबरच दुकानदार संकटात येतील. आज साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रात 20 ते 25 लाख दुकानदार आहेत. पॅकिंगशिवाय कोणतीही वस्तु विकणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे सरकारी कायदेशीर कारवाईला ते सर्वप्रथम बळी पडतील.’’

पुणे जिल्हा प्लॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि ‘मेकिंग इंडिया’ प्रकल्पात भरीव योगदान देणारे यशस्वी उद्योजक अनिल नाईक म्हणतात, ‘‘आपल्याकडील लोकांची मानसिकता बदलायला हवी. रिप्रोसेस प्लॅस्टिकपासून स्वस्त व मस्त ताडपत्री, कचरा पिशवी, पेव्हिंग ब्लॉक, पाण्याचे पाईप्स, पॅकिंग शिटस्, पेलेटस्, भाजीपाला व फळांचे क्रेटस्, प्लॅस्टिकचे डबे, घागर, कॅन्स अशा वस्तू तयार करता येतात. खुर्च्यापासून टेबलापर्यंत अनेक वस्तू प्लॅस्टिकच्या असतात. त्या पुन्हा लाकडाच्या बनवायच्या झाल्या तर वृक्षतोड अटळ आहे. कागदाचा वाढलेला वापर गैरसोयीचा तर आहेच पण त्यामुळेही मोठ्या प्रमाणात झाडं तोडावी लागतील. म्हणजे प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहताना पर्यावरणाला प्रतिकूल ठरतील अशा कितीतरी गोष्टी या निर्णयामुळे घडतील.’’

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, वेफर्स, बिस्किटं, चॉकलेट, मसाले, फरसाण या सर्वांची वेष्ठणं प्लॅस्टिकची असतात. ती बंद केल्यानं हे सर्व पदार्थ टिकवायचे कसे आणि ग्राहकापर्यंत पोहोचवायचे कसे? यातून आरोग्याच्या काही गंभीर समस्या निर्माण झाल्या तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही नाईक करतात.

अल्पावधीत महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ‘कामंत मसाले’चे संचालक आणि समाजसेवक मच्छिंद्र कामंत यांना यात राजकारण दिसते. ते म्हणतात, ‘‘निवडणुका आल्या की असे फंडे वापरावेच लागतात. त्याशिवाय उद्योजकांकडून पैसे कसे काढणार? गुटखाबंदी केली तरी आपल्याकडे गुटखा सहजपणे मिळतो. हेल्मेटसक्ती केली त्याचे काय झाले ते आपण बघितलेच. आमच्या मसाला प्रोजेक्टच्या पॅकिंगसाठी आणलेले काही लाखाचे प्लॅस्टिक पडून आहे. त्याचे काय करायचे हा प्रश्‍न आहेच. पर्यावरणारच्या दृष्टिने प्लॅस्टिकबंदी करायची असेल तर ती टप्प्याटप्प्याने करावी आणि आम्हाला पॅकिंगसाठी नवा काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा.’’

कामंत म्हणतात, ‘‘आपल्याकडे जनजागृती लवकर होत नाही. पाणी बचतीच्या उद्देशाने आम्ही भारतात सर्वप्रथम ‘सोलर एज्युकेशन किट’ ही कल्पना राबवली. विद्यार्थ्यांत आणि पालकांत त्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून तेव्हाचे मंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील शाळेत तीन आणि राणा जगजितसिंह यांच्या उस्मानाबाद येथील शाळेत दोन किट भेट म्हणून दिले. मात्र शाळांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अनेक मंत्र्यांना, अधिकार्‍यांना भेटूनही व्यवस्था ढिम्मच होती. त्यांनी सांगितले, हा विषय शालेय अभ्यासक्रमात आला तरच आम्ही काहीतरी करू शकतो. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी ऐवजी प्लॅस्टिकच्या वापराविषयी जागरूक करणारा धडा शालेय अभ्यासक्रमात द्यावा.’’

कोणतीही बंदी, सक्ती ही वाईटच असते. गुटखाबंदी होऊनही आज सर्वाधिक प्लॅस्टिकचा कचरा हा गुटख्यांच्या पुड्यांचाच असतो. मग या ‘हप्तेबाजावर’ कोण कारवाई करणार? लोकसंख्या नियंत्रणात आणायची म्हणून शस्त्रक्रिया, नसबंदी असे पर्याय पुढे आले. कंडोमसारखी साधनं आली. त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकारनं कोट्यवधी रूपये पाण्यात घालवले. ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी सेक्स करूच नका’ असा तुघलकी फतवा त्यांनी काढला नाही. मग प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालून काय साध्य होणार?

प्लॅस्टिक जमिनीवर पडल्यानंतर तिथे काही उगवत नाही कारण ते नष्ट होत नाही. अनेक जनावरे, विशेषतः भटक्या गायी प्लॅस्टिक खाऊन दगावल्या. गटारे तुंबली. नद्यांचे प्रदूषण वाढले असे सांगण्यात येते. हे सगळे का घडते? कारण लोक प्लॅस्टिक कुठेही फेकतात. त्यांच्यावर कठोर आणि दंडात्मक कारवाई करा. कायद्याचा धाक दाखवा. एखाद्याने गाडीतून पाण्याची बॉटल फेकली म्हणून अनुष्का शर्मा त्याला कशी झापडते अशा फडतूस बातम्या दाखवून लोकांचे मनोरंजन करण्याऐवजी प्लॅस्टिकच्या वापराविषयी काही आदर्श नियमावली घालून द्या. त्याविषयी प्रबोधन करा. दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अशा वस्तुंवर बंदी आणण्याऐवजी काहीतरी मार्ग काढावा असेच बहुसंख्य लोकांना वाटते हे शासनाने ध्यानात घ्यावे, इतकेच. आपल्याकडे कांद्यावरून सरकार पडते हा इतिहास आहे. प्लॅस्टिकचा बागुलबुवा केल्याने सामाजिक वातावरण प्रदूषित होऊन सरकार गडगडू नये असे वाटते.
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

Friday, June 22, 2018

नाव मोठे, लक्षण खोटे!



हनुमंता राव (वय 35) हे तेलंगण राज्याच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील एका तेलगू वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार. तुटपूंज्या पगारामुळे प्राथमिक गरजाही पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. ज्यांच्याकडून सातत्याने हातउसणे पैसे घेतले ते तगादा लावू लागले. ही परिस्थिती त्यांनी त्यांच्या पत्नी मीना (वय 30) यांना सांगितली. प्राप्त परिस्थितीत कोणताच मार्ग निघत नसल्याने दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या 5 व 3 वर्षांच्या मुलांची गळा दाबून हत्या केली. हनुमंता यांनी पंख्याला दोरी लावून गळफास घेतला तर मीनानेही विषप्राषण केले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत असे दुर्दैवी कृत्य घडावे हे दुःखद आहे. आत्महत्या, मग ती कुणाचीही असो! ती वाईटच! हतबल होऊन आत्मनाश घडविणे हे शेवटचे टोक आहे. कोणत्याही परिस्थितीत जगण्यातला संघर्ष संपता कामा नये. इतरांच्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणारे पत्रकार जेव्हा असे कृत्य करतात तेव्हा ती आणखी चिंतेची बाब असते. लोककवी मनमोहन नातू म्हणायचे, ‘‘उद्याचा कालीदास जर अनवानी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते!’’

कलावंतांचे, प्रतिभावंतांचे असे जाणे त्यामुळे ही त्यांची हार तर ठरतेच पण हे सत्ताधार्‍यांचे, समाजाचेही मोठे अपयश असते.

वृत्तवाहिन्यांवर झळकणारे चार-दोन चेहरे आणि काही भांडवलदार वृत्तपत्रांचे संपादक म्हणजेच प्रसारमाध्यमं अशी काहींची समजूत झालीय. माध्यमांशी संबंधित सगळ्या चर्चाही नेहमी त्यांच्याच भोवती फिरत असतात. अगदी तळागाळातल्या वार्ताहरांचा विचार केला तर त्यांचं जगणं मात्र भयावह आहे. मोठमोठ्या वृत्तपत्रांच्या ग्रामीण वार्ताहरांनाही आज दीड-दोन हजार रूपये मासिक वेतनावर काम करावं लागतं हे भेदक वास्तव आपण स्वीकारत नाही. इतरांना पगारवाढ व्हावी, त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, कर्मचार्‍यांवर कसा अन्याय होतो हे गळे काढून सांगणार्‍या माध्यमांच्या बुडाशी काय जळतंय हे पाहणं म्हणूनच गरजेचं आहे. मुद्रित माध्यमं सोडाच पण दृकश्राव्य माध्यमातही हीच अवस्था आहे. त्यांच्या तालुका वार्ताहरांना तर काहीच किंमत नाही. चार-दोन महिन्यात त्यांची एखादी बातमी लागते. त्याचे त्यांना हजार-पाचशे रूपये मिळतात. मग स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कुटुंबाची गुजरान करण्यासाठी त्यांना पत्रकारितेसोबत अन्य काही उद्योग करावे लागतात.

अनेक ठिकाणी स्थानिक शिक्षक बातम्या पाठवायचे. आता ‘शिक्षकांनी पत्रकारिता करू नये’ असे फर्मान निघालेय. काही ठिकाणी स्थानिक वृत्तपत्र विक्रेतेच बातम्या पाठवण्याचे काम करतात. अशा ‘पार्ट टाईम’ पत्रकारांच्या अधूनमधून बातम्या छापून येत असल्याने त्यांना गावात मान-सन्मान मिळतो. थोडीफार प्रतिष्ठा असते; पण त्यांनी घरात खायचे काय? याचा कोणी विचार करतच नाही. मोठ्या जिज्ञासेने, प्रामाणिक भावनेने या क्षेत्रात जी मुलं आलीत त्यांचा तर खूप लवकर भ्रमनिरास होतो. त्यातून अनेकांना सावरता येत नाही.

हनुमंता राव यांच्या आत्महत्येने हे भेदक वास्तव पुन्हा समोर आले आहे. त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे असे जाणे कदाचित मोठ्या व्यवस्थेत गृहितही धरले जाणार नाही. त्यांच्या पत्नी मीना या अत्यवस्थ आहेत. त्यांचे पुढे काय होईल याचाही कुणी फारसा विचार करणार नाही. तितकी संवेदनशीलता आपल्याकडे राहिलीच नाही. प्रत्येक आत्महत्यांवरून रान पेटवणारी प्रसारमाध्यमे याची दखलही घ्यायचे नाहीत. कारण त्यातून त्यांचाच विद्रूप चेहरा समाजासमोर येईल.

सरकारचे उदासीन धोरण, शासकीय जाहिरातीत केलेली कपात यामुळे छोटी वृत्तपत्रे कधीच देशोधडीला लागलीत. भांडवलदार वृत्तपत्रांना त्याचा फारसा धोका नाही. शहरी भागात कामाची अशाश्‍वतता असली तरी काही मोठी वृत्तपत्रे पत्रकारांना बरे मानधन  देतात. मात्र त्यांच्यासाठी राबणार्‍या ग्रामीण वार्ताहरांची हीच अवस्था आहे.

काही साखळी वृत्तपत्रे त्यांच्या जुन्या कर्मचार्‍यांना नारळ देत आहेत. कोणतेही कारण न सांगता ‘पुढचा दहा महिन्यांचा पगार घ्या आणि घरी बसा’ अशी ताकीद त्यांना दिली जातेय. नव्याने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या अननुभवी मुला-मुलींना अल्पवेतनावर कामाला घेऊन वृत्तपत्रांचा गाडा हाकला जातोय. मुद्रित शोधक, टंकलेखक ही पदे तर कालबाह्य होत आहेत. पत्रकारांनी स्वतःच्या बातम्या स्वतः टाईप करून पाठवायच्या. जाहिरातीतून जागा उरलीच तर उपसंपादकांनी काटछाट करून त्या लावायच्या असा मामला अनेक ठिकाणी दिसतो. ‘नाव मोठे अन् लक्षण खोटे’ अशीच गत अनेक वृत्तपत्रांची झालीय. काही जिल्हा वृत्तपत्रे तर ग्रामीण वार्ताहरांना सांगतात, ‘आम्हाला जाहिराती द्या! तुमच्या बातम्या प्रकाशित करू. बातम्यांसाठी तुम्हाला कुणी काही चिरीमिरी दिली तर त्यात तुमचे घर चालवा...’

तालुका स्तरावरील अनेक पत्रकार संघ म्हणजे तर संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या झाल्यात हे आम्ही वारंवार सांगत आलोय. एलआयसी एजंटपासून ते स्थानिक राजकारण्यांची तळी उचलण्यापर्यंत त्यांना मग सर्वकाही करावे लागते. त्यांच्याकडून न्यायाची, तटस्थतेची काय अपेक्षा करणार? 

असं म्हणतात की पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटते. लोकांना दिशा मिळते. भल्या-बुर्‍याची जाणीव होते. मात्र हे अर्धसत्य आहे. आरश्यात आपल्याला आपली ‘मिरर इमेज’  दिसते. आपले उलटे प्रतिबिंब आपण सहजपणे स्वीकारतो. पत्रकारितेचेही तसेच झालेय. जे नाहीच ते सत्य म्हणून दाखवण्याचे काम माध्यमं जोरात करतात. ‘व्हर्च्युअल’च्या नादात ‘ऍक्च्युअल’ काहीच दिसत नाही. वर आपणच कसे सत्याचे दिवे लावलेत याची हाकाटी सुरू असते. म्हणूनच लोकांचा पत्रकारितेवरील विश्‍वास उडालाय. पत्रकार म्हणजे त्यांना संबंधितांच्या सुपार्‍या घेऊन लूट करणारे वाटतात.

‘सिंहासन’ चित्रपटातील निळूभाऊंप्रमाणे आजचे पत्रकार वेडेपिसे होणार नाहीत. त्यांना या क्षेत्रातील बदलाची थोडीफार जाणीव झालीय! पण हनुमंता राव यांच्यासारखे काहीजण असे दुर्दैवी मार्ग निवडत आहेत. अनेक पत्रकार अल्पवयात हृदयविकारासारख्या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या कामाचा ताण कोणीही विचारात घेत नाही. घरच्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांच्यातील खमकेपणा कमी होतोय. अनेक आजारांना त्यांना बळी पडावे लागतेय. जेवणाच्या, झोपेच्या वेळा तर निश्‍चित नसतातच पण कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. सतत अपडेट राहण्याच्या नादात तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.

हे सर्व थांबवायचे असेल तर निदान त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील इतक्या सुविधा, लाभ त्यांना द्यायला हवेत. भांडवलदार म्हणून मिरवणार्‍या वृत्तपत्रांनी त्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या शिलेदारांना बळकटी द्यावी. तसे झाले नाही तर ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशीच या वृत्तपत्रांची, वाहिन्यांची आणि पर्यायाने या क्षेत्राचीही अवस्था होईल हे मात्र नक्की!
- घनश्याम पाटील
7057292092

भय इथले संपत नाही!


तानाजी धोंडिराम कोरके हा लातूर जिल्ह्यातील एक तरूण. पुण्यात वाढप्याचे काम करायचा. गेल्या शनिवारी (दि. 16) तो ऑटोरिक्षाने रविवार पेठेत उतरला. ऑटोचे बिल चाळीस रूपये झाले. तानाजीकडे केवळ वीस रूपये होते. त्यावरून रिक्षाचालक अतुल उर्फ ईश्‍वर दशरत हराडे याच्यासोबत त्याची बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने त्याचा सहकारी रोहन गोडसेच्या मदतीने तानाजीला जबर मारहाण केली. तानाजी बेशुद्धावस्थेत पडल्याचे परिसरातील लोकांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्याच रिक्षाचालकाच्या मदतीने तानाजीला ससून रूग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. तो जिथे बेशुद्ध पडला होता तिथल्या दुकानातील एका सीसीटीव्हीत घटना दिसत होती. त्याच रिक्षाचालकाने केवळ वीस रूपयांसाठी तानाजीचा जीव घेतला.

आपल्या अनेक वाचकांना या बातमीचे काहीच वाटणार नाही. कारण अशा घटना आजूबाजूला नित्याच्या झाल्या आहेत. काहीजण हळहळतील. काहीजण केवळ वीस रूपयांसाठी (?) असे करायला नको होते म्हणून शिव्याही घालतील. एकंदरीत आपल्या समाजाच्या खालावलेल्या आणि दळभद्री मानसिकतेचे हे उदाहरण आहे. 

अशा घटना घडल्या की आपण चार-दोन दिवस प्रतिक्रिया देतो. ‘महाराष्ट्राचा बिहार होतोय’ अशी चिंता व्यक्त करतो. खरंतर बिहारही आपल्यापेक्षा कितीतरी पुढे जातोय; पण नसलेल्या गोष्टींचा अहंकार बाळगत आपण स्वतःची भलावण करतो. 

गरिबी, बेरोजगारी, दारिद्य्र हे पिढ्या न पिढ्या सुरूच आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरूच आहेत. सामान्य माणसाला जगण्याचा आधार देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. प्रश्‍न उरतो तो आपल्या इच्छाशक्तीचा. एकीकडे कोणत्याही क्षेत्रात जा, सर्वांची ओरड आहे की, कामगारच मिळत नाहीत आणि दुसरीकडे एक मोठा वर्ग सातत्याने गळे काढतोय की, कामच मिळत नाही. मग असे ऐतोबा परिस्थितीने गांजतात. आपल्या नाकर्तेपणाचे खापर इतरांवर फोडतात. त्यातून नैराश्य वाढते. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. त्यातून पुढे अनेक समाजविघात कृत्ये घडतात.

ज्या देशात वीस रूपयांसाठी एखाद्याला आपला जीव गमवावा लागत असेल त्या देशाच्या भवितव्याची आपण कल्पना करू शकाल. महासत्तेच्या गप्पा मारताना आपल्यासमोरी आव्हानांचा अंदाज येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. बरं, या घटनेत या रिक्षाचालकाचे आणि मयत तानाजी कोरकेचे काहीच नाते नव्हते. आपण दुसरी घटना बघूया. 

लातूरच्याच साधुराम आणि गयाबाई कोटंबे या दुर्दैवी दांम्पत्याचा ज्ञानदीप हा मुलगा. साधुराम प्राचार्य पदावरून निवृत्त झालेले. ज्ञानदीपने एम.एस्सी. पर्यंत उच्चशिक्षण घेतलेले. त्याला लातूरच्या मोरेनगर परिसरातील राहते घर स्वतःच्या नावे करून हवे होते. वडिलांची त्याला तयारी नव्हती. ज्ञानदीपचे महिनाभरापूर्वी लग्न झाले. ‘माझा संसार बघायला या’ म्हणून त्याने आईवडिलांकडे आग्रह केला. आईवडिल मोठ्या मनाने मुलाकडे आले. नव्या सूनबाईला साडी घ्यावी म्हणून तिला घेऊन सासूसासरे बाजारात गेले. परत आल्यावर ज्ञानदीपने त्यांना प्यायला नारळपाणी दिले. वडील घेत नसतानाही त्याने सांगितले की, ‘घ्या, तरतरी येईल...!’ आईवडिलांनी ते घेतले. या पठ्ठ्याने त्या नारळपाण्यात घूस मारण्याचे विषारी औषध मिसळले होते. ती कडवट चव जाणवू नये म्हणून त्यात साखरही मिसळली. हे पाणी पिऊन वडील जागीच गेले. आई अत्यवस्थ आहे...

आपल्या समाजाच्या खालावलेल्या मनोवृत्तीचे भिकार रूप यातून दिसेल. असे क्रौर्य हा आपल्या समाजजीवनाचा एक भाग बनतोय. सत्तेसाठी आपल्या आप्तेष्टांना ठार मारणारा क्रूरकर्मा औरंगजेब आणि आपल्या जन्मदात्यांचा बळी घेणारा ज्ञानदीप यात फरक तो कोणता? जिथे बाप मुलीवर बलात्कार करतोय, पोर्न साईट पाहून चौदा वर्षाचा मुलगा आपल्या सोळा वर्षाच्या बहिणीवर अत्याचार करतोय त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आपली संस्कृती, आपले आदर्श, आपल्या रूढी-परंपरा, आपले तत्त्वज्ञान याच्या बाता करणार्‍यांनी, प्रगतीच्या, विकासाच्या, सुधारलेपणाच्या गोष्टी मांडणार्‍यांनी आजच्या भारताचे हे वास्तव चित्र आधी समजून घ्यायला हवे.

विकास ही संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘देश आगे बढ रहा है’ अशी जाहिरात कोट्यवधी रूपये खर्च करून करणे सहजशक्य असते. भौतिक प्रगती, नवनवे शोध-संशोधन, विविध क्षेत्रातील उपलब्ध करून दिलेल्या संधी, उद्योग-व्यवसायातील फुगवलेले आकडे यावरून कागदोपत्री कोटीच्या कोटी उड्डाणे जरूर घेता येतील. मात्र आपल्या ढासळलेल्या या मनोवृत्तीचे काय? त्याला कोण अपवाद राहिलंय? इथे जात-पात, धर्म, लिंग, वय, प्रांत, भाषा, गरीब-श्रीमंत असे कसलेही निकष नाहीत. शोषित, पिडीत अन्याय सहन करत आहेत. संधी मिळताच तेही इतरांवर अन्याय करत आहेत. त्यातून आलेला मुजोरपणा त्यांचे मनोबल वाढवतो. कायद्याचा धाक नसणे आणि ढिम्म व्यवस्थेला विकत घेणे यामुळे गुन्हेगार कोणतेही कृत्य करायला धजावतात. नैतिक-अनैतिक अशा कोणत्याही फूटपट्ट्या तिथे नसतात. 

इतरांचे नुकसान करणे, त्याला त्रास देणे यात आसुरी आनंद मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याची कारणमीमांसा होऊ शकत नाही. ‘तो असा का वागला?’ याचे उत्तर देणे सोपे नाही. चांगुलपण हरवत चाललेल्या समाजात त्यामुळेच आपली जबाबदारी मोठी आहे. ‘भय इथले संपत नाही’ हे तर खरेच! त्यामुळे समाजसुधारणा गेली खड्ड्यात! तो आविर्भाव आपण आणायलाच नको. आपण फक्त स्वतः बदलूया! कोणीतरी म्हटलेच आहे, ‘‘जर आपण स्वतः बदललो तर जगातला एक वाईट माणूस कमी होईल.’’ हे वाईटपण संपवणं, निदान कमी करणं आपल्याच हातात आहे. कोणताही ‘देवदूत’ त्यासाठी काहीही करू शकणार नाही. 

आपण सध्या जिथे आहोत तिथे विचाराला, सुधारणेला थोडाफार वाव आहे. आणखी काही वर्षे अशीच गेली तर येणारी पिढी आणखी अंधारात ढकलली जाईल. काळही आपल्याला माफ करणार नाही!
- घनश्याम पाटील
7057292092

Thursday, June 21, 2018

खरे जातीयवादी कोण?

परवा एक विनोद वाचला.
भारताचा प्रमुख राष्ट्रीय खेळ कोणता?
त्याचे उत्तर होते, आडनावावरून जात ओळखणे!

विनोदातही क्लेशकारक वाटावं असं हे वास्तव. ते नाकारण्याचं धारिष्ट्य आपल्यात निश्चितपणे नाही.

मागच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या वाकडी गावात एक घटना घडली. सचिन आणि राहुल चांदणे हे चुलत भाऊ गावातील एका विहिरीत पोहण्यासाठी गेले. कर्णफाट्याजवळील ही विहिर ईश्वर जोशी यांच्या मालकीची आहे. या विहिरीत पोहल्याच्या रागातून जोशी यांनी चांदणे बंधुंना पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांची धिंड काढल्याचेही सांगण्यात आले. वाकडी हे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील गाव. त्यात ज्याने मारहाण केली तो ‘जोशी!’ त्यामुळे वातावरण तापायला वेळ लागला नाही. राहुल गांधी यांच्यापासून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या. माध्यमांनी जोरदार बातम्या चालवल्या. सगळे तथाकथित पुरोगामी निषेधासाठी बाहेर पडले. मनुवाद कसा फोफावलाय आणि मोदींनी राजीनामा देणे किती अगत्याचे आहे यावर खुमासदार चर्चा रंगली. जो तो आपल्या बुद्धिप्रमाणे अक्कल पाजळत होता. ही बातमी देशभर गेली आणि दुपारपर्यंत दुसरी बातमी येऊन धडकली. यातील आरोपी ‘जोशी’ हा ब्राह्मण जोशी नव्हता! तो भटक्या जमातीतला ‘जोशी’ होता. झाले! या घटनेचा विरोध करणार्‍यांचा फुगा फुटला. जी घटना जातीवादातून झालीय असे वाटत होते ती आता या लोकांना सामाजिक विकृती वाटू लागली.

या घटनेच्या थोडे मुळाशी जायला हवे. घटना घडल्यानंतर ज्यांना मारहाण झाली त्या मुलांच्या आजीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीजवळ पहिली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘‘जोशी यांच्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी त्यांनी अनेकदा आमच्या मुलांना इथे पोहू नका म्हणून तंबी दिली होती. मुलं ऐकत नव्हते. म्हणून त्यांना मारले...’’

माध्यमांनी गळे काढले की त्यांना ‘नग्न करून मारले..’ 
यातली वस्तुस्थिती ही होती की ही मुलं पोहण्यासाठी आली होती. त्यामुळे त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. अनेकदा सांगूनही ते ऐकत नसल्याने विहिरीत उड्या मारून आलेल्या या पोरांना पकडले आणि जोशींनी धुतले. ‘जोशींनी मारले’ म्हटल्यावर सगळे तुटून पडले. त्यांच्यावर ऍट्रोसिटीपासून सर्व गुन्हे लावण्यात आले. ब्राह्मणांना झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. फडणवीस आणि मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. राज्यात दलित कसे असुरक्षित आहेत आणि ‘शेंडीवाल्यांची’ मुजोरी कशी वाढलीय याचे चर्वितचर्वण सुरू झाले.

महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा कधीच विद्रुप झालाय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच एक विधान केलं होतं. ‘सध्या पेशवे शाहूंची निवड करतात’ अशा आशयाचं ते विधान होतं. खासदार राजू शेट्टी यांचीही त्यांनी जात काढली होती. राष्ट्रवादीच्या स्थापना दिन सोहळ्यात तर त्यांनी पुणेरी पगडी नाकारून फुले पगडी घालण्याचे आवाहन जाहीरपणे केले. हे सर्व पुरोगामित्वात बसते. त्याउलट नरेंद्र मोदी यांच्यासारखा बहुजन समाजातला माणूस देशाचा पंतप्रधान झालाय तो जातीयवादी आणि मनुवादी ठरतो. अमित शहा यांच्यासारखा नेता सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो ब्राह्मणवादी ठरतो. म्हणजे असे लांच्छनास्पद आरोप करायला आपली जिभ झडत नाही. येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची झाल्यास आरोपांची राळ उडवण्याशिवाय दुसरे हातात काहीच उरत नाही. विकासाच्या मुद्यावर बोलायचे झाल्यास आजवरचे आपले नाकर्तेपण पुन्हा लख्खपणे उघड होईल हे काय यांना कळत नाही का? मग असे वाद पेटवत ठेवावे लागतात. जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण करून ‘पुरोगामित्वाचे’ टेंभे मिरवायचे असा सगळा उद्योग सुरू आहे. 

जळगावातील घटनेचा आरोपी जर ब्राह्मण असता तर एव्हाना देश पेटला असता. मग प्रश्न पडतो खरे जातीयवादी कोण? लोककल्याणकारी राज्य आणि सर्वसमावेशक न्यायाची भूमिका घेताना आपण असे सोयीस्कर कसे वागू शकतो? 

सध्या जातीजातीतील कट्टरतावाद वाढत चाललाय. प्रत्येकजण आपापल्या जातीचं घोडं पुढं दामटतोय. फुले, शाहू, आंबेडकर हे आपले आदर्श असायला हवेत. आपण केवळ त्यांचे नाव घेऊन जातीचे राजकारण करतो. त्या-त्या महामानवाच्या विचारांना, त्यांच्या तत्त्वांना आपणच दिलेली ही तिलांजली आहे.

महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं, ‘‘जातीनिर्मुलन करायचे असेल तर आंतरजातीय लग्नं करा.’’

फुल्यांचे फोटो देवाप्रमाणे लावून मिरवणार्‍या किती जणांनी आपल्या मुलींची लग्नं इतर जातीतल्या लोकांशी लावून दिली?

आंबेडकरांनी सांगितलं होतं, ‘‘मद्यपान करू नकात! शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.’’

त्यांना मानणार्‍यांपैकी कितीजण व्यसनापासून दूर आहेत? कितीजणांनी शिकून द्वेषविरहित आणि रचनात्मक संघर्ष उभारलाय?

महाराजा शाहूंचे नाव घेणार्‍यांपैकी कितीजणांनी त्यांचे विचार अंमलात आणलेत?

मग हे सगळं कशासाठी चाललंय? 

आपल्यापुढील नेमक्या समस्या कोणत्या आहेत?

रोजचे जगण्यामरण्याचे प्रप्रश्न न सुटल्याने मेटाकुटीला आलेला सामान्य माणूस या सगळ्याच्या मागे अकारण धावत स्वतःची फरफट का करून घेतोय? आपल्याला आपला, कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने अर्थातच देशाचा विकास घडवायचा असेल तर आणखी व्यापक व्हायला हवे. त्यासाठी जातीपातीची जळमटं दूर सारायला हवीत. अन्याय! मग तो कुणावरचाही असो! तो घडता कामा नये. ज्याच्यावर घडतोय त्याच्या बाजूने आपण ठामपणे उभे रहायला हवे. चुकीच्या वृत्ती-प्रवृत्तीवर आसूड ओढायला हवेत. 

स्वार्थाशिवाय राजकारण पूर्ण होत नसतं. मग त्यांच्या स्वार्थाची जपणूक करण्यासाठी आपण आपलं चांगुलपण का बरं पणाला लावावं?

हे सगळं थांबवणं आपल्याच हातात आहे. ‘खरे जातीयवादी कोण?’ असा सवाल आपण स्वतःला केला तर समोरच्या आरशात आपलीच प्रतिमा काळवंडलेली दिसेल. चला तर मग! ती स्वच्छ, निर्मळ करण्याचा प्रयत्न करूया!

Saturday, June 16, 2018

दोन घडीचा डाव...


अनेकांच्या मनात प्रेरणेची ज्योत चेतवणारे आणि अनेकांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणारे, मदतीचा हात देणारे युवा संत भैय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली आणि अनेकांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसला. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक, नेते, अभिनेते त्यांचे अनुयायी, भक्त होते. अध्यात्माच्या क्षेत्रातील एका प्रतिभावंताचे असे जाणे चटका लावणारे तर आहेच पण या क्षेत्रातील माणूसही मनावर, इंद्रियावर संयम ठेऊ शकत नाही असा दुर्दैवी संदेश देणारे आहे.

काही दिवसांपूर्वी हिमांशू रॉय या कर्तव्यतत्पर अधिकार्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आपल्याकडे जगाचा पोशिंदा ठरणार्‍या बळीराजाच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. धर्मा पाटील या बुजूर्ग शेतकर्‍यानं तर मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या, तरूण-तरूणींच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. म्हैसकर दांपत्याच्या तरूण मुलाने केलेली आत्महत्याही अनेकांना चुटपूट लावून गेली. कौटुंबिक कलह आणि व्यवसायातील अपयशामुळे अतुल तापकीर या युवा निर्मात्याने काही महिन्यांपूर्वीच फेसबुकवर पोस्ट टाकून आपली जीवनयात्रा संपवली.

जे कोणी नियतीच्या, निसर्गाच्या, दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेत, ज्यांची हतबलता विकोपाला गेलीय, ज्यांना नैराश्याने ग्रासलेय, ज्यांच्या ताणतणावाचा अतिरेक होतोय असे अनेकजण आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलताना आढळतात. दुःखाचा आवंढा गिळताना मनातील शल्य कुणालाही सांगावसं न वाटणं यामुळं होणारा कोंडमारा घातक ठरतोय. व्यावसायिक स्पर्धा विकोपाला जात आहेत. या सगळ्याची परिणीती आत्महत्येत होतेय.

अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातही लोकांचे मानसिक संतुलन बिघडतेय. मनोरूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या सर्वाचे कारण मन मोकळं करण्यासाठीच कोणी नाही. वाफ फार काळ कोंडून ठेवली तर त्या भांड्याचा स्फोट अटळ असतो. तसंच मानवी मनाचं झालंय. आजूबाजूला असंख्य माणसं असतात पण ज्यांच्याजवळ मन रीतं करावं अशा लोकांची वानवा आहे. विशेषतः जे उच्चपदस्थ आहेत, महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडणारे आहेत त्यांच्याभोवतीचं माणसांचं कोंडाळं हे स्वार्थापोटी जमलेलं असतं. याची त्यांनाही जाणीव असते. अशा लोकांना आपल्या कर्तव्यापोटी कुटुंबियांसाठीही वेळ देता येत नाही. नवनवीन आव्हानं पेलताना, इतर अनेकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवताना स्वतःच्या आयुष्याचं मात्र डबकं झालेलं असतं. म्हणूनच रॉय यांच्यासारखे वर्दीतले आणि भय्यूजी महाराजांसारखे गर्दीतले लोक आपली जीवनयात्रा संपवतात.

प्रत्येकाच्या जीवनात काही भलेबुरे प्रसंग येतातच. काहीवेळा त्याचा अतिरेक झाल्यावर असे नकारात्मक विचार सुरू होतात. कितीही खमक्या मनाचा माणूस असला तरी त्यातून त्याची सुटका नाही. अशावेळी मनावर संयम ठेवणं जिकिरीचं असतं. आपल्यावर अवलंबून असणारे लोक, आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारे लोक आठवले की प्रतिकूलतेतही जगण्याचं बळ मिळतं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यावेळी त्यांच्याही मनात नैराश्याचं मळभ दाटून आलं होतं. त्यांनाही आत्महत्या करावीशी वाटली. सावरकरांना जेव्हा मृत्युचं आकर्षण वाटू लागलं तेव्हा त्यांनी एक निर्धार केेला. ‘‘या कारागृहात जो देशसेवा करील तो खरा देशसेवक. जे मूल्य दिल्याविना देशोद्वार होणेच नाही. ते कारापीडनाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे. कीर्तीचे, लौकिकाचे, मनाचे मधाचे बोट त्यास लागलेले नाही पण म्हणूनच ते अधिक अव्यर्थ होय. आणि निदान... मग असा का मरतोस? तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही मग त्याचा नैतिक परिणाम कोणता होणार? मग व्यर्थ कष्ट का म्हणून? मरणारच असशील तर असे कुत्र्याचे मोलाने आपल्या हाताने का मरतोस? त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वतःचे हाताने करून आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात आणखी भर का घालतोस? जर मरणे तर सेनेतील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे एखादे कार्य करून मग तरी मर.. फाशी घेऊन नव्हे तर... आपल्या एका जीवास्तव... असे मर!’’

भगवतगीता सांगते, ‘‘सुख-दुःख, लाभ-अलाभ, जय-पराजय, पाप-पुण्य या कशाचाही विचार न करता आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला हवं.’’ कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरणं, आलेल्या परिस्थितीतून निर्धारानं बाहेर पडणं गरजेचं आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ असेच वातावरण अवतीभोवती असले तरी मरण्यात कसली मर्दुमकी आलीय? तो भ्याडपणाच आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय... मी जाता राहील कार्य काय!’ याचा विचार केला पाहिजे. 

आपण देश बदलू शकत नाही, समाज सुधारू शकत नाही! पण आपल्यामुळे एक माणूस जरी घडला तरी आयुष्याचे सार्थक झाले. मग जीवनाच्या कसोटीवर यशस्वी व्हायचे तर कणखर राहण्याशिवाय पर्याय नाही. 

कवी माधव गिर यांच्या आई एक गोष्ट वारंवार सांगायच्या. त्या म्हणायच्या ‘‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपलं एक घर असावं!’’

म्हणजे प्रत्येक गावात एकजण तरी इतक्या जवळचा असावा की ते त्याला आणि आपल्याला आपलंच घर वाटावं. अशी मायेची माणसं जोडायला हवीत. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत. गिर सरांच्या आईच्या म्हणण्यातला व्यापकपणा सोडून द्या! पण किमान चार-दोन मित्र असे असावेत की त्यांच्याशी आपण सगळं काही विश्‍वासानं शेअर करू शकू. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ शकू. 

मनाचा गुंता सोडवण्यासाठी कुटुंबात, मित्रपरिवारात काही हक्काच्या जागा असतात. त्यांच्याशी मोकळेपणे बोला. विचारांचा, अडचणींचा डोंगर थोडासा बाजूला ठेवा. समस्या नाहीत, दुःख नाहीत असा जगात कोणीच नाही. त्याची तीव्रता आणि ते सहन करण्याची, त्याला सामोरं जाण्याची प्रत्येकाची क्षमता मात्र वेगवेगळी! त्यामुळं दुःखाचा बाजार मांडणं, त्याचा बागुलबुवा करणं, त्यापासून दूर पळणं हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे. संघर्ष आपल्या नसानसात आहे. शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेली ही भूमी आहे. कितीही मोठं दुःख आलं तरी त्याला आपल्याला कोलता आलं पाहिजे.

रामशास्त्री’ या ऐतिहासिक चित्रपटात छोटा राम आणि त्याची सखी जानकी हे दोघे खेळत असताना एक गीत घालण्यात आलं. शांताराम आठवले यांनी मराठी चित्रपटगीतात मानाचं स्थान प्राप्त झालेलं  हे गीत लिहिलं. जीवनाचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात सांगितलेलं इतरत्र कुठंही सापडणार नाही. बेबी शकुंतला यांनी या चित्रपटात अभिनय केला होता. आज ते गीत मला आठवतंय.

दोन घडीचा डाव 
याला जीवन ऐसे नाव
जगताचे हे सुरेख अंगण, 
खेळ खेळूया सारे आपण
रंक आणखी राव, 
खेळू या रंक आणखी राव
याला जीवन ऐसे नाव.
माळ यशाची हासत घालू, 
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव, 
झेलू या पराजयाचे घाव
याला जीवन ऐसे नाव.
मनासारखा मिळे सौंगडी, 
खेळाया मग अवीट गोडी
दु:खाला नच वाव, 
दु:खाला नच वाव
याला जीवन ऐसे नाव.
(दैनिक 'पुण्य नगरी', १७ जून २०१८)

- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, June 9, 2018

समर्थ ऊर्जाकेंद्र!


देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 50 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.

10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात, ‘साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो’ असे ठासून सांगतात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.

नियती न मानणारे पवार साहेब आजवर नियतीच्या अनेक तडाख्यातून सहीसलामत सुटले आहेत! सध्या मोदी लाटेमुळे अनेक प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेले असताना ‘मी प्रचंड आशावादी’ म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा राहण्याची धडपड करतोय. जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे ही नेतेमंडळी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील पाळेमुळे त्यांनी भक्कम केलीत. एक मोठा वर्ग ‘अच्छे दिन’च्या मोहजालात अडकलेला असतानाच खेड्यापाड्यातील धास्तावलेल्या लोकांना धीर देण्याचे काम राष्ट्रवादीची नेतेमंडळी करत आहेत.

10 जून हा राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! त्यामुळे सिंहावलोकन करताना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला आणि त्यांच्या कारकिर्दीला नेमक्या शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ‘तोंडओळख’ करून घेेतली तरी कुणालाही अचंबा वाटेल. कोणत्याही नेत्यावर, संस्थेवर टीका करायला फार काही लागत नाही; मात्र त्यांची सकारात्मक बाजू पाहणेही तितकेच गरजेचे आहे. ती पाहताना ‘शरद पवार’ या ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची त्यांची व्याप्ती अफाट आहे.

‘राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची नीतिमूल्ये समजून घ्यायला  हवीत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली. देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे. आज भारतभर कोणत्याही निवडणुकीत फुटकळ उमेदवारांसाठी सातत्याने सभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला कौतुकास्पद वाटतात; पण हीच कर्तव्ये पार पाडणार्‍या शरदराव पवार यांची आपण टवाळी करतो हे आपले दुर्दैव आहे.

वाजपेयींनी पंतप्रधान असताना गुजरातच्या भूकंपावेळी त्यांनी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे मोठेपण सिद्ध करतात.

गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘‘जो माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’’ 

म्हणूनच महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार साहेबांचे नाव जोडले जाते. ‘‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’’ असे विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. 

ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करणार नाही.’’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते.

शरद पवार यांचे राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांची तुलना होते आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्‍याअर्थी छाप टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.

पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी लागली नाही; मात्र पक्षातील इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष या नात्याने साहेबांनी माफी मागितली. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. 

शरद पवार हे फक्त नाव नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय. इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ज्या झाडाला भरपूर फळे लगडलेली असतात त्यालाच पोरंसोरं दगडं मारतात, हा निसर्गनियम सर्वज्ञात आहेच.

भारतीय राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहे. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते (पूर्वाश्रमीचे), छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.

या महिन्यात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! तो साजरा करताना या पक्षाने जे काही विधायक केलेय त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. त्यांच्या चुकीच्या धोरणांवर, निर्णयावर आपण कायम तुटून पडू! पण देशातील एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पवार साहेबांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्रातील असंख्य लोकांसाठी हे एक सकारात्मक ‘ऊर्जाकेंद्र’ आहे हे मान्य करावेच लागेल. जहाज बुडायला लागलं की उंदरं आधी बाहेर उड्या मारतात असं म्हणतात. अगदी त्याप्रमाणंच मध्यंतरीच्या एका लाटेत इतर अनेकांप्रमाणेच राष्ट्रवादीची नौका थोडी डळमळीत झाली असता अनेकांनी त्यांचे रंग दाखवले.  या कशालाही न जुमानता राष्ट्रवादी कॉंग्रेस येणार्‍या संग्रामासाठी सज्ज असेल आणि आपली विजयपताका डौलात फडकवत ठेवेल यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२