Wednesday, March 7, 2018

प्राप्त काळ हा विशाल भूधर!

गुरूवर्य राम शेवाळकर म्हणायचे, ‘‘रामाचा आदर्श ठेवायचा तो सत्यवचनासाठी; बायकोच्या त्यागासाठी नव्हे!’’

सध्या मात्र याउलट परिस्थिती निर्माण झालीय. प्रत्येकजण सोयीस्कर भूमिका घेतो. प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक विधानाचे आपल्याला हवे तसे अर्थ लावतो. आपले म्हणणे रेटून नेण्यासाठी वाद आणि वितंडवादही घालतो; पण सत्याच्या तळाशी जाण्यात कोणालाच रस नसतो. ऐकीव माहितीवर मते मांडणे, समोरच्याचे मूल्यमापन करणे यातच यांना धन्यता वाटते. आपल्या सारासार बुद्धिचा वापर करायचाच नाही असा अलिखित करार आपल्याकडच्या विचारवंतांनी केलाय की काय अशी शंका येण्याइतपत बिनडोकपणा ही मंडळी करतात. 

परवा भाऊ तोरसेकर यांच्याशी चर्चा करत होतो. माझ्या एका सहकार्‍याने त्यांना विचारले, ‘‘भाऊ, हिंदुंनी किमान दहा मुलांना जन्म द्यावा’’ असे विधान करणार्‍या भाजप नेत्यांना मोदी आवरत का नाहीत? त्यांना वेळीच दाबले नाही तर ही मंडळीच पक्ष संपवतील असे वाटत नाही का?’’

भाऊंनी छान उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘एकीकडे तुम्हीच ओरडता की, मोदी सगळ्यांची गळचेपी करतात. कुणालाच बोलू देत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून देतात. मग त्यांनी कुणाला समज का द्यावी? कुणाचे आवाज का दाबावेत? पंतप्रधान म्हणून हे त्यांचे काम आहे का? रोज किती वाचाळवीरांना त्यांनी समज द्यावी? त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कुणाला समज द्यावी आणि कुणाला मोकळीक हे सांगणारे आपण कोण? आपल्या सल्ल्यानुसार आणि आपल्याला हवे तसेच त्यांनी इतरांशी सोयीस्करपणे वागावे का?’’

त्यांच्या या बोलण्यावर मित्र अर्थातच निरूत्तर झाला. 

आपले असेच होतेय. प्रत्येक गोष्टीतले आपल्यालाच खूप कळते अशा आविर्भावात आपण मते मांडत असतो. कुणाला चुकीचे ठरवतो तर कुणाला बरोबर! आपल्या मनासारखेच सगळे झाले पाहिजे अशी आपली भाबडी भावना असते. राज्य आणि देश चालवताना काय काय कसरती कराव्या लागतात? कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं याचा मात्र आपण विचार करत नाही. व्हाट्स ऍप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून जे वाचायला, पहायला मिळतं त्यावर आपण आपली मतं ठरवतो. सोबतीला प्रसारमाध्यमं आहेतच.

माध्यम क्षेत्राशी संबंधित एक वाक्य वाचलं होतं. बहुतेक मार्क ट्वेन यांचं असावं. ते म्हणाले होते, ‘‘वृत्तपत्रं वाचली तर तुम्हाला जगाची माहिती मिळेल! आणि नाही वाचली तर चुकीची माहिती मिळणार नाही.’’ सध्या दुर्दैवानं असंच झालंय. दृकश्राव्य माध्यमं असतील किंवा मुद्रित माध्यमं! बातमीसाठी वाटेल ते! मग श्रीदेवीचं निधन कसं झालं हे सांगण्यासाठी आजच्या वार्ताहरांना ‘बाथरूम टब’मध्येही उतरावं लागतं. मस्जिदीत जाऊन वार्तांकन करावं लागतं. हरतर्‍हेच्या वेशभूषा करून वार्तांकन करावं लागतं. बातमीदार कमी आणि सोेंगाड्या जास्त अशी यांची गत!

दुर्योधन हा अत्यंत कपटी, स्वार्थी, आतल्या गाठीचा होता. कोणत्याही परिस्थितीत पांडवांना संपवायचं असा चंग त्यानं बांधला. पांडव हे भाऊ असूनही तो इतक्या टोकाला का आला? कारण भीमासारख्या बलवानानं बालपणापासून कौरवांचा छळ केला होता. म्हणजे हे शंभर भाऊ एखाद्या जलाशयात खेळत असतील तर भीम यायचा आणि त्यांची शेंडी धरून त्यांना पाण्यात बुडवायचा. ही पोरं गटांगळ्या खायची. जर ते झाडावर खेळत असतील तर भीम यायचा आणि ते झाड गदगदा हलवायचा. पिकलेली पाडं टपाटप पडावीत तसं सगळे झाडावरून खाली पडायचे. या बलदंडापुढं कुणाचंच काही चालायचं नाही. यातूनच दुर्योधनाच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण झाला. त्यातून पराकोटीची सूडभावना निर्माण झाली. इतकं करूनही पांडव पराभूत होत नाहीत हे पाहून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. एकप्रकारची हतबलता निर्माण झाली. हतबलतेची जागा द्वेषानं, मत्सरानं, सूड भावनेनं घेतली. त्यातून पुढं इतका मोठा विध्वंस घडला. सगळे भाऊ मारले गेले. हस्तिनापूरनगरी बेचिराख झाली.

आपलंही असंच होतंय. आपल्या मनातील शत्रूला आपण सातत्यानं डिवचतोय. त्याला कमी लेखतोय. यातूनच नैराश्य येतंय आणि आपण त्यांनाच बळ देतोय! त्यामुळं त्यांच्याकडूनच आपला खात्मा सहजशक्य आहे. त्यासाठी वेगळ्या शत्रूंची मुळात गरजच नाही. आपल्या मनातील विकार आपल्याला स्वस्थ बसू देतच नाहीत मुळी! त्यातून काय काय प्रसंग ओढवतात याचंही गांभीर्य आपणास नाही.

‘चपराक’ परिवाराचे सदस्य आणि सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्याकडं परवा खेड तालुक्यातल्या पूर या गावातली काही मंडळी आली होती. ते सांगत होते, पूर हे कवी नामदेव ढसाळ यांचं गाव! या गावात पद्मश्री ढसाळांचं यथोचित स्मारक व्हावं, त्यांच्या नावे अद्ययावत ग्रंथालय उभारावं यासाठी राज्य शासनाकडून काही कोटींचा निधी मंजूर झालाय. असं असलं तरी गावकर्‍यांचा मात्र येथे स्मारक उभारणीस विरोध आहे. हा विरोध आता-आता सुरू झालाय. किंबहुना येथे पद्मश्री नामदेव ढसाळांचं स्मारक व्हावं म्हणून जे प्रयत्न करत होते त्यांनीच या विरोधाचं शस्त्र उगारलंय.

आपल्या बंडखोरीनं मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून देणार्‍या या ‘निळ्या पँथर’ने वाङमयविश्‍व समृद्ध केलं. त्यामुळं त्यांच्या स्मारकाला विरोध का होतोय हे जाणून घेतल्यास आपली मान शरमेनं खाली जाईल. किंबहुना आधी ‘पद्मश्री ढसाळांच्या स्मारकाला गावकर्‍यांचा विरोध’ ही बातमी ऐकूनच संताप आला होता; मात्र त्यांची बाजू समजून घेतल्यास संतापाऐवजी मनात वैषम्य दाटून आलं.

स्पष्टच लिहायचं तर संबंधित ग्रामस्थ म्हणाले, ‘‘आमच्या गावकर्‍यांना भीती आहे की दुर्दैवानं उद्या आमच्या गावात दुसरे ‘कोरेगाव भीमा’ उसळले तर काय घ्या! ते आरिष्ट्य येण्याऐवजी हे स्मारकच नको! आम्ही ढसाळ साहित्यातून जिवंत ठेवू!’’

मला वाटतं यावर आणखी वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही.

महाराष्ट्रातल्या गावागावात गेलात तर सध्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. प्रत्येक गोष्टीला जातीय, राजकीय रंग द्यायचे! कोणतीही विचारधारा अशा ‘कट्टरतावादा’पासून दूर नाही. ही ‘जिवंत प्रेतं’ पाहून कोणत्याही विचारी माणसाच्या मनाचा थरकाप उडेल. मुख्य म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे असंख्यजण रोज कित्येकदा मरतात. 

असं म्हणतात की, मृत्यू हे शाश्वत सत्य असतं! पण हे असं इतकं सहजपणे मरण येणं बरं नाही. खरं सांगतो, मी माझ्या उभ्या आयुष्यात एकदाही मेलो नाही. आजूबाजूला अनेकांना रोजच मरताना मात्र पाहतोय!

मोठी स्वप्नं न पाहणं, त्याच्या पूर्तीसाठी अहोरात्र परिश्रम न घेणं म्हणजे मरण!

स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून लाचारीनं जगणं म्हणजे मरण!

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा निमुटपणं भोगत राहणं, आपल्यावरील अन्यायाविरूद्ध आवाज न उठवणं म्हणजे मरण!

परिस्थितीपुढं हतबल होत तडजोडी करणं, त्यातून न्यूनगंड आणि नैराश्य येणं म्हणजे मरण!

त्यामुळं आपलं आयुष्य आपण बेदरकारपणे जगायला हवं. अगदी कशाचीच तमा न बाळगता... पावलापावलाला संघर्ष करावा लागला, दुःखाचे डोंगर फोडावे लागले, सगळी आमिषं लाथाडावी लागली तरी आपण आपलं इप्सित गाठायलाच हवं. त्यासाठी अंगी थोडंसं ‘माणूसपण’ येणं गरजेचं आहे. 

परवा आणखी एक अत्यंत दुर्दैवी बातमी कळली. ही बातमी बातमीदारांचीच आहे. आजूबाजूचं सत्य तटस्थपणे वाचकांसमोर आणणारे, इतरांना न्याय मिळावा म्हणून धडपडणारे, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे अनेक पत्रकार आजही आहेत. भांडवलदार वृत्तपत्रांच्या मालकशाहीपुढं त्यांचं फारसं काही चालत नसलं तरी अनेकांनी या क्षेत्रासाठी सर्वस्व पणाला लावलंय. असो. मुख्य विषयाकडं वळतो.

मराठीतल्या एका बड्या वृत्तपत्रानं सध्या कामगार कपतीचं धोरण स्वीकारलंय. त्यांना जास्तीत जास्त जुनी लोकं कमी करायचीत आणि कमी पगारावर नवख्यांना राबवून घ्यायचंय. मग त्यांनी एक ‘ऑफर’ दिली... त्यांनी फर्मानच काढलं की, ‘ज्यांची नोकरी दहा वर्षे राहिलीय त्यांनी पुढच्या वीस महिन्यांचा पगार घ्या आणि घरी बसा!’

त्यांचं म्हणणं कोणी ऐकलं नाही तर त्यांच्या दूरदूरवर बदल्या केल्या. त्यांच्यावर सातत्यानं काही ना काही आरोप करून मग त्यांना अपमानास्पदरित्या काढलं जातंय. याहून गंभीर बातमी पुढं आहे. खरंतर ती ऐकल्यापासून हृदयाचं पाणी पाणी होतंय. इतरांसाठी हिरिरीनं भांडणारे पत्रकार आपल्या रोजीरोटीचा विचार करून गप्पगार आहेत.

ज्या संस्थेनं ही जुलूमशाही चालवलीय त्यांनी एका वरिष्ठ पत्रकाराला सांगितलं की, ‘तुम्हीही घरी बसा.’ हे पत्रकार अर्धी चड्डी घालायचे तेव्हापासून या वृत्तपत्रात कार्यरत होते. सगळ्या विभागात त्यांनी काम केलं. ‘आपण भले आणि आपले काम भले’ असा त्यांचा बाणा! रात्री साडेदहाला ‘शिफ्ट’ संपूनही ते सर्व पाने छपाईला जाईपर्यंत म्हणजे रात्री एक-दीड पर्यंत काम करायचे. अर्थात, कार्यालयात यायला पंधरा मिनिटं उशीर झाला तरी ‘हाफ डे’ पडायचा; मात्र रोज रात्री तीन-साडेतीन तास जादा काम करणं (विनातक्रार आणि विनामानधन) हा संस्थेचा शिरस्ताच! त्यामुळं त्यांचाही नाईलाज होता. या पत्रकाराची संस्थेप्रतीची ही निष्ठा पाहून इतर काही बड्या वृत्तपत्रांनी त्यांना नोकरीची ‘ऑफर’ दिली होती. असे असले तरी प्रत्येक ध्येयवान माणसात एक कीडा असतो. तो त्यांच्यातही होता. आता वेळ आणि सोबतच वयही निघून गेल्यानं इतर वृत्तपत्रंही विचारत नव्हती आणि ते ज्या वृत्तपत्राला ‘मातृसंस्था’ मानायचे त्यांनी तर त्यांना घरी बसण्याचा हुकूम दिला. मुलाचं शिक्षण चालू. मुलगी लग्नाला आलेली. या वयात ‘नोकरी गेली’ हे घरी तरी कसं सांगणार?

मग ते रोज घरून डबा घेऊन यायचे. एका बागेत बसून खायचे आणि इकडं तिकडं भटकून रात्री घरी जायचे. महिनाभर त्यांचा हाच दिनक्रम! आणि तो काळा दिवस उगवला. नैराश्य आणि हतबलतेतून त्यांनी आत्महत्या केली...

इतरांसाठी कायम संघर्ष करणार्‍याचा असा दुर्दैवी आणि करूणामय अंत झाला; मात्र संबंधित वृत्तपत्रातील महत्त्वाचे संपादक किंवा मालक अंत्यविधीलाही फिरकले नाहीत. 

इथे दिसतो माध्यमांचा फक्त व्यवसाय! त्यांना मिळणारा अघोरी नफा आणि नफा! बस्स!! 

इथं सर्वच क्षेत्र बरबटलीत! आभाळच फाटलं तर ठिगळं कुठं कुठं घालणार?

तरीही आपण खचता कामा नये. 

हे दिवस बदलण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे. 

कोणतीही क्रांती अशीच होत असते. त्यासाठी कुण्या ‘अवताराची’ गरज 
पडत नाही. ते फक्त आपल्या मनाचे समाधान!

जे जे चुकीचं वाटतं त्याला प्राणपणानं विरोध करूया. पूर्वग्रह बाजूला ठेवून जे जे चांगले आहे ते सर्व मोठ्या मनानं स्वीकारूया!  मुख्य म्हणजे अल्पसंतुष्ट न राहता सतत नव्याचा ध्यास घेऊया! 

गुढीपाडवा म्हणजे आपलं नववर्ष! त्यानिमित्त निर्भय आणि निर्मळ होण्याचा प्रयत्न करूया!

शेवटी कवीवर्य केशवसुतांच्या भाषेत सांगतो,

प्राप्त काळ हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा!
निजनामे त्यावरती गोंदा
विक्रम करा चला उठा तर....!
- घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२